Wednesday, November 2, 2011

अण्णा ,मनमोहन आणि त्यांची गुणी बाळं

------------------------------------------------------------------------------------------------

सरकार साठी सर्वाधिक अडचणीचा आणि लोकांसाठी सर्वात क्रांतिकारी ठरलेला माहिती अधिकाराचा कायदा आणण्यासाठी असा संघर्ष विकत घेण्याची गरज पडली नाही हा ताजा इतिहास आहे. आपण शुद्ध आणि स्वच्छ ,इतर सगळे भ्रष्टाचारी या अण्णा टीम च्या मनोवृत्तीने जन लोकपालचा संघर्ष उभा राहिला आहे. टीम अन्नाने न पेलणारा नैतिकतेचा जो भार आपल्या डोक्यावर घेतला आहे त्या भारानेच टीम अण्णा कोलमडू लागली आहे .

------------------------------------------------------------------------------------------------



मुले व्रात्य,उनाड आणि खोडकर निघाली की आई बापाचे काय हाल होतात याचा अनुभव सध्या भारताचे पंतप्रधान मनमोहनसिंह आणि भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाचे नेते अण्णा हजारे घेत आहेत. कानात वारे शिरलेली उनाड मुले गरिबाघरची असतील तर लोक बाहेरच्या बाहेर त्यांच्या पाठीत धपाटे घालून मोकळी होतात. पण मुले थोरा मोठ्याशी संबंधित असतील तर त्यांना बाहेरच्या बाहेर सरळ करणे शक्य नसते. त्यांच्या अपराधा साठी आपल्यालाच अपराधी भावनेने तक्रार करावी लागते. मनमोहनसिंह् आणि अण्णाजी हे तर सध्या देशातील सर्वाधिक प्रतिष्ठीत व्यक्ती मानले आणि गणले जातात.त्यामुळे त्यांच्या बाळांच्या करतुतीचा पाढा त्यांच्या पुढे वाचला जात आहे. पण तक्रारकर्ते ज्याला करतुत म्हणतात त्यालाच प्रत्येक आई किंवा बाप आपल्या मुलांची कर्तबगारी समजत असतात. मनमोहन आणि अण्णा ही त्याला अपवाद नसल्याचा अनुभव सध्या सारा देश घेत आहे. एवढेच नाही तर घरा घरात जसे 'आपले ते बाळ आणि दुसऱ्याचे ते कारटे ' याचा अनुभव येतो तसाच अनुभव या दोन महान हस्तीच्या बाबतीत येवू लागला आहे. स्वेच्छेने मौन व्रत स्वीकारूनही अण्णांना आपल्या बाळान्साठी तोंड नाही तरी लेखणी उघडावी लागली ती यासाठीच. मौन सुटे पर्यंत ही त्यांना धीर धरवला गेला नाही आणि आपल्या लाडक्या मुलांच्या करतुतीवर पांघरून घालून त्यासाठी चक्क मनमोहन बाळांना दोषी ठरविले! लोक आधीच मनमोहन बाळांनी घातलेल्या हैदोसानी कंटाळून व वैतागून गेले असल्याने अण्णांनी 'मनमोहन बाळांच्या 'चांडाळ चौकडी' वर घेतलेल्या तोंडसुखाने काहीसे सुखावले असणारच. शिवाय काही दिवसापूर्वी झालेल्या कुस्तीत मनमोहन यांच्या घोडम्या आणि उन्मत्त मुलांना अण्णांच्या रांगणाऱ्या बाळांनी धूळ चारल्याची आठवण ताजी असल्याने सर्व सामान्यांना अण्णांनी आपल्या बाळांच्या चुकांवर पांघरून घातल्याचे वावगे वाटत नसणार हे उघड आहे. पण गुण उधळणारी बालके काय करू शकतात हे मनमोहनसिंग यांची केविलवाणी अवस्था पाहून तरी अण्णा आणि त्यांच्या समर्थकांच्या लक्षात यायला हवे. मनमोहनसिंग यांचे अवरोहण आणि अण्णांचे आरोहण होण्यास मनमोहनाची गुण उधळणारी बालके ज्यांना अण्णांनी चांडाळ चौकडी संबोधले आहे तेच कारणीभूत असल्या बद्दल कोणाचेच दुमत असणार नाही. मनमोहनसिंह यांनी गुण उधळणाऱ्या मुलांचे कान वेळीच उपटले असते किंवा कान उपटून भागले नाही तर त्याला वेळीच घराबाहेरचा रस्ता दाखविला असता तर मनमोहनसिंह यांचे घर आज सुरक्षित आणि अभेद्य दिसले असते.पण प्रत्येकच बाप करीत असतो ती चूक मनमोहन यांनी केली आणि आता अण्णा देखील तेच करीत आहेत! पण मनमोहनसिंह यांना सासूबाईंच्या घरात राहावे लागत असल्याने कुटुंब प्रमुखाचा मान त्यांना मिळत नाही व त्यामुळे त्यांचा कोणाला धाकही न वाटणे स्वाभाविक आहे. पण अण्णांचे तर तसे नाही. त्यांना मागे ओढणारी दोरी दुसऱ्याच्या हातात नाही ,मात्र त्यांचे वात्सल्य उतु चालल्याने स्वत:च्या चौकडीच्या प्रतापाचे त्यांना कौतुक वाटते आहे. पण अण्णांची प्रतापी चौकडी आणि मनमोहन यांच्या चांडाळ चौकडी कडून गुणांचे जे प्रदर्शन झाले आहे त्यात काहीच गुणात्मक फरक नाही . फरक आहे तो संख्यात्मक आणि हा संख्यात्मक फरक प्रचंड असल्याने लोकांचे सगळे लक्ष या फरकावर केंद्रित करून या दोन चौकडीची तुलनाच होवू शकत नाही हे भासविणे शक्य होत आहे. शिवाय अण्णा टीम आणि त्यांच्या समर्थकांनी स्वत:च्या दोष मुक्तीसाठी दुसऱ्यावर दोषारोपण करण्याचा प्रचलित व साधा सोपा मार्ग निवडला आहे. त्यांच्या साठी हा मार्ग अतिशय सोयीचा व परिणामकारक आहे. कारण ज्या चांडाळ चौकडीवर ते आरोप करीत आहेत त्या चौकडीची विश्वासार्हता रसातळाला गेलेली आहे. आज टीम अन्नावर जे आरोप होत आहेत किंवा अण्णांची टीम वादग्रस्त बनत आहे या मागे सरकारचे कारस्थान असल्याचा सर्रास आरोप आणि कांगावा करण्यात येत आहे. जे भाबडे आहेत ते अशा कांगाव्यावर विश्वास ठेवतीलही , पण ज्यांना हे सरकार किती पाण्यात आहे याचे ज्ञान आहे त्यांच्यावर अशा कांगाव्याचा परिणाम होणे कठीण आहे. हे सरकार स्वत:च्या अपराधाखाली पार दबून गेले आहे , गलितगात्र झाले आहे. शेवटचे श्वास मोजणारी व्यक्ती जसा प्रतिकारही करू शकत नाही किंवा कोणाविरुद्ध कट कारस्थान रचू शकत नाही तीच बाब मनमोहन सरकारला लागू होते. या सरकारवर गाडलेले मुर्दे उखडण्याचा आरोप टीम अण्णा व त्यांचे समर्थक करीत आहेत. पण जे सरकार स्वत:च मुर्दा बनले आहे ते कसे दुसऱ्याचे गाडलेले मुर्दे उखडणार? आज जी काही अण्णा टीम बद्दल चर्चा आणि वाद सुरु आहे ती या टीम ची कर्माची फळे आहेत. त्यांच्या कर्माचा एकेक पदर डोळसपणे उकलुन पाहिला तर त्याची प्रचीती कोणालाही येईल.


टीम अण्णाचा कांगावा

अण्णांच्या दिल्लीतील जंतर मंतर उपोषणाच्या आधी तीन घटना समांतर पणे घडत होत्या. मुंबईतील 'आदर्श घोटाळा बाहेर येत होता. अण्णा टीम फारसा गवगवा न करता किंवा सिविल सोसायटीच्या इतर गटाना थांगपत्ता लागू न देता जन लोकपाल विधेयक तयार करीत होती. आणि त्याच वेळेस दिल्लीजवळील मोक्याच्या जागा , फार्म हाउस साठी उपयुक्त जागा याचे वाटप उत्तर प्रदेश सरकार कडून होत होते . ज्या पद्धतीने महाराष्ट्र सरकारने 'आदर्श' साठी जमीन व इतर सुविधा दिल्या त्याच पद्धतीने उ.प्र. सरकारने नोएडा जवळील भूखंडाचे वाटप केले. त्यातील एक लाभार्थी होते जन लोकपाल बिल तयार करण्यात ज्यांनी महत्वाची भूमिका निभावली ते टीम अन्नाचे ज्येष्ठ सदस्य शांती भूषण ! यावर प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक होते. मुळातच शांतीभूषण यांना देण्यात आलेला भूखंड बेकायदेशीर होता आणि तो तसा असल्याचे शांती भूषण यांना सुद्धा मान्य होते! यावर त्यांनी मला मिळालेला भूखंड मी का परत करू , ज्यांचा या वाटपावर आक्षेप असेल त्यांनी कोर्टात जावे असा पवित्रा घेतला! आता अण्णा आंदोलनाच्या पुढाऱ्याने असा भूखंड स्वीकारला आणि पचवीला तर त्याची सार्वत्रिक चर्चा होणार, टीका होणारच. खरे तर अण्णांनी स्वत: हस्तक्षेप करून त्यांना भूखंड परत करायला लावायला पाहिजे होते किंवा त्यांना टीम मधून बाहेर काढायला हवे होते. पण तसे काही न करता सरकार अण्णा टीमला छळत असल्याचा कांगावा करून त्या भूखंड घोटाळ्यावर पांघरून घालण्यात आले.
टीम अन्नाचे सर्वात प्रभावी सदस्य अरविंद केजरीवाल यांनी सरकारी नोकरीतील सेवाशर्तीचा भंग केल्याचे प्रकरण जुनेच आहे आणि त्यासाठी त्यांना पहिल्यांदा २००६ मध्ये ते नोकरीला असलेल्या आयकर विभागाने नोटीस दिली होती. त्यावेळी अण्णा टीम किंवा अण्णा आंदोलनाचा मागमूसही नव्हता. अण्णा आंदोलनाच्या आधीच त्यांना दुसऱ्यांदा नोटीस मिळाली होती. जंतर मंतर च्या आंदोलना नंतर तिसरी आणि आता आता चवथ्यांदा नोटीस मिळाली . मात्र केजरीवाल आणि अण्णा टीम कडून असेच भासविण्यात आले की आंदोलना नंतर मुद्दाम हे प्रकरण उकरून काढण्यात आले! केजरीवाल यांचे बद्दल जंतर मंतर आंदोलना नंतर अनेक आख्यायिका प्रचारित करण्यात आल्या आहेत. ते आय.ए.एस. असून देशसेवेसाठी त्यांनी मोठया पदाचा राजीनामा दिला ही त्यापैकी एक आख्यायिका. पण त्यांना मिळालेल्या नोटीस वरूनच हे स्पष्ट होते की ते महसूल सेवे तून आयकर विभागात रुजू झालेत. आणि ते एवढे भाग्यवान की एक वर्षाच्या सेवे आखेर त्यांना दोन वर्षाची भर पगारी अभ्यासासाठी रजा मंजूर झाली! त्यांनी त्या रजेचा उपभोग तर घेतला , पण केलेल्या अभ्यासाचा खात्याला काहीच लाभ करून न देता दोन वर्षाची पगारी रजा संपल्या बरोबर नोकरीचा राजीनामा देवून मोकळे झाले! काम एक वर्ष केले , पगार तीन वर्षाचा घेतला आणि वरून नोकरीला ठेंगा दाखवून मोकळे झाले. त्यांची ही कृती त्यांना व त्यांच्या समर्थकाला भ्रष्ट व नियम बाह्य आचरणाची वाटत नाही. आपण परत नोकरीत न येता माहिती अधिकाराचे काम केले असल्याने आयकर विभागाने सेवाशार्तीचा भंग केल्या प्रकरणी दिलेली नोटीस परत घ्यावी अशी मुजोर मागणी केली. पण नियमानुसार पगाराचे घेतलेले ऐसे परत केल्याशिवाय राजीनामाही स्वीकारला जाणार नाही असे त्यांना कळविण्यात आले होते. अण्णा आंदोलनाच्या चार-पाच वर्षे आधीची ही गोष्ट आहे. आता मात्र आव असा आणल्या जात आहे की प्रकरण मुद्दाम उकरून काढण्यात आले. आयकर विभागाची मागणी बेकायदेशीर व छळ करण्यासाठी असल्याचा कांगावा करणारे केजरीवाल आता मित्राकडून कर्ज घेवून पैसे भरायला तयार झालेत! आपण कफल्लक आहोत ,तरी पैसे भरून देतो आहोत असा आत्म गौरव करून घ्यायला केजरीवाल विसरले नाहीत. या प्रकरणीही अण्णांनी केजरीवाल यांना पैसे भरून टाकण्याचा आदेश द्यायला हवा होता. पण इथे सुद्धा अण्णांनी आपल्या चुकार सदस्याला पाठीशी घालून सरकार वरच तोफ डागली.
टीम अन्नाची सर्वाधिक बेअब्रू तर किरण बेदी या अब्रूदार महिलेने केली. त्या जिथे जिथे भाषणाला , कार्यक्रमाला गेल्या त्या त्या संस्थाना विमान भाड्याचे खोटे बिल देवून प्रत्यक्ष झालेल्या खर्चा पेक्षा कितीतरी पटीने त्यांनी अधिक भाडे वसूल केले. हा प्रकार त्यांनी अण्णा आंदोलनाच्या दरम्यान केल्याचे एका शोध पत्रकाराने उघड केले. हा प्रकार त्यांनी एक दोन वेळेस किंवा चुकून केला असे नाही तर हा त्यांचा नेहमीचा शिरस्ता होता हे नंतर उघड झाले व त्यांना कबूलही करावे लागले. पण कबुल करतानाही नैतिकतेचा टेंभा मिरवायला आणि यात त्यांना बदनाम करण्यामागे सरकारचा हात असल्याचा कांगावा करायला त्या विसरल्या नाहीत. असे करून आपण बचत केली व ती संस्थेला दान केल्याचा दानशूर पणाचा आव देखील त्यांनी आणला! झाल्या प्रकाराचा खुलासा करतानाही त्या ठासून खोटे बोलल्या. आपण जास्त पैसे घेवून कमी खर्चात प्रवास करतो व उरलेला पैसा संस्थेच्या खात्यात जमा करीत असल्याची माहिती यजमानांना असल्याचे त्यांनी सांगितले. पण त्या नंतर यजमानांनी खुलासे करून आपल्याला काहीच माहित नसल्याचे स्पष्ट केल्याने त्यांचा खोटेपणा उघड झाला.एवढेच नाही तर त्यांच्या कार्यालयाकडून किरण बेदी या विमानाच्या वरच्या वर्गातच प्रवास करतात असे पत्र यजमानांना जायचे हे ही स्पष्ट झाले.शेवटी तर सगळा दोष प्रवासी एजंट वर थोपविण्याचाही प्रयत्न झाला. त्यांच्या संस्थेचा ट्रस्टी असलेल्या त्यांच्या प्रवासी एजंट ने सुद्धा या प्रकाराने आपली बदनामी झाली असे सांगून त्या संस्थेचे प्रवासी एजंट चे कामच सोडले नाही तर ट्रस्टी पदाचा राजीनामा दिला. एवढे होवूनही बेदी बाईना आपण चुकलो हे मान्य नाही. फक्त सरकारला बदनामीची संधी मिळू नये म्हणून जास्तीचे घेतलेले पैसे परत करायला तयार झाल्यात! पुन्हा अरविंद केजरीवाल आणि किरण बेदी यांचा मानभावी पणा एवढा की जन लोकपाल आणा आणि त्यांच्याकडे आमचे प्रकरण सोपवा. यात मेख अशी आहे की अण्णा टीम च्या जन लोकपाल च्या कक्षेत स्वयंसेवी संस्थाचा भ्रष्टाचार येतच नाही. तसा तो येवू नये यासाठी केजरीवाल आणि बेदी या दोघांनी सरकार समवेतच्या बैठकीत आग्रहच धरला होता. किरण बेदी यांनी जे केले तो प्रकार सरकारी कर्मचारी नेहमीच करीत असतात. तेच कशाला विद्यापीठातले विद्वान प्राध्यापकही करतात. बस ने प्रवास करून कार चे भाडे घेतात. पण याला आम भाषेत भ्रष्टाचार म्हणतात व त्यावर कारवाई होते. बेदी बाईंचा बचाव जो त्यांच्या समर्थकांना पटला तो एवढाच आहे की तो पैसा त्या स्वत:च्या चैनी साठी खर्च न करता चांगल्या कामा साठी खर्च करतात. विदर्भातील वाचकांना काही महिन्या पूर्वी चंद्रपूर येथील घटना आठवत असेल . तेथील एक सिविल सर्जन लाच घेताना पकडला गेला तेव्हा त्याने पोलिसांना दिलेल्या जबाबात आपण लाचेचा पैसा स्वत:साठी खर्च करीत नसून तो सर्व पैसा योग विद्येचा प्रसार आणि प्रचार व्हावा म्हणून रामदेव बाबाच्या चरणी अर्पण करीत असल्याचे म्हंटले होते. त्याचा हा जबाब किरण बेदी पेक्षा वेगळा आहे का? पण त्याला तुरुंगात जावे लागणार आणि किरण बेदी मात्र अण्णांच्या खांद्याला खांदा लावून भ्रष्टाचार विरोधी लढाईत आघाडीवर राहणार ! लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे या प्रकरणात अण्णांनी स्वत: न्यायधीशाची भूमिका घेवून किरण बेदीना क्लिनचीट देवून सरकारातील चांडाळ चौकडीवर याचे खापर फोडले आहे.
अण्णा टीम नैतिकतेचा टेंभा मिरविण्याच्या नादात स्वत:च स्वत:ला अडकून घेत आहे याचे ताजे उदाहरण म्हणजे त्यांनी सादर केलेला जमा खर्च. हे पैसे कोणत्या खात्यात जमा व्हायला पाहिजे होते व कोणत्या खात्यात जमा झालेत हा स्वामी अग्निवेश यांनी उपस्थित केलेला मुद्दा तांत्रिक म्हणून बाजूला ठेवू. पण हा जमा खर्च सादर करताना अरविंद केजरीवाल आणि किरण बेदी यांनी आपली आणि आंदोलनाची नैतिकता दाखविताना जमा झालेल्या पैशात ४० लाख रुपयावर रक्कम अज्ञात व्यक्ती कडून जमा झाल्याचे सांगून ती संबंधिताना परत करीत असल्याचे ठोकून दिले. पण ही रक्कम बेनामी आहे तर परत कोणाला करणार ? ही रक्कम काळे धन आहे हे उघड असताना ते सरकार जमा करण्या ऐवजी अज्ञात व्यक्तींना ते परत केले जाणार आहे! यावर कोणी प्रश्न उभे केले तर ते मात्र भ्रष्टाचाराचे समर्थक ठरतात.

टीम अन्नाचा रथ जमिनीवर यावा

सरकारच्या चौकडीला भोंगळे करणे सोपे पण अण्णांच्या चौकडीच्या पदराला स्पर्श करणे सुद्धा किती अवघड आणि शिव्याखाऊ काम असते हे फक्त जे असे धाडस करतात त्यांनाच माहित. सरकारात बसलेले लाखो कोटीचा घोटाळा करतात ते तुम्हाला दिसत नाही , अण्णा टीम तेवढी दिसते. या शेऱ्या सोबत तुमची सरकारचे दलाल , भ्रष्टाचाराचे समर्थक असे आरोप ऐकण्याची तयारी ठेवूनच तुम्हाला अण्णा टीम च्या पदराला हात घालावा लागतो. जो अण्णा टीमची चिकित्सा करण्याच्या भानगडीत पडतो तो भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचारी लोकांचा समर्थक असतो ही बाब टीम अण्णांनी भाबड्या लोकांच्या मनावर बिंबवून स्वत:भोवती अतिशय मजबूत असे सुरक्षा कवच निर्माण केले आहे. या कवचामुळे त्यांची कोणतीही कृती कधी संशयाच्या भोवऱ्यात सापडत नाही आणि म्हणूनच संशयास्पद कृत्यही टीम अण्णा अतिशय बेरड पणे व बेदकारपणे करीत आली आहे. या टीम चा बचावाचा दुसरा सोपा मार्ग म्हणजे केजरीवाल-बेदीची १०-२० लाखाची अनियमितता आणि १.७६ लाख कोटीचा घोटाळा याची तुलना कशी होवू शकते हा प्रतिप्रश्न ! असा प्रतिप्रश्न विचारणारे हे विसरतात की ज्यांना भ्रष्टाचार करण्याची संधीच कमी असते ते कमीच भ्रष्टाचार करतात आणि ज्यांना जास्त संधी असते ते जास्त करतात. छोट्या रेषे समोर मोठी रेष ओढली तर छोटी रेष नजरेआड होते या शाळेत शिकविल्या जाणाऱ्या बाळबोध गोष्टीचा टीम अण्णा व त्याचे समर्थक असा बाळबोध उपयोग करून स्वत:च स्वत:च्या पाठीवर निर्दोषत्वाचा शिक्का मारून घेत आहे. खरे तर टीम अन्नाकडून मोठा अपराध घडला अशातला भाग नाही. पण अपराधाचे समर्थन करण्याचा मोठा अपराध टीम अण्णा नक्कीच करीत आहे. असे समर्थन केले नाही तर आपल्यात व सरकारातील लोकात काय फरक राहील अशी भीती या टीमला वाटत आहे. आपण सरकारातील लोकापेक्षा , राजकारणी लोकापेक्षा श्रेष्ठ या अहंगंडाने टीम अण्णा पछाडली असल्यानेच सरकार आणि सिविल सोसायटी यांच्यात संघर्ष उभा राहिला आहे. सरकार साठी सर्वाधिक अडचणीचा आणि लोकांसाठी सर्वात क्रांतिकारी ठरलेला माहिती अधिकाराचा कायदा आणण्यासाठी असा संघर्ष विकत घेण्याची गरज पडली नाही हा ताजा इतिहास आहे. आपण शुद्ध आणि स्वच्छ ,इतर सगळे भ्रष्टाचारी या अण्णा टीम च्या मनोवृत्तीने जन लोकपाल चा संघर्ष उभा राहिला आहे. टीम अन्नाने नैतिकतेचा जो भार आपल्या डोक्यावर घेतला आहे त्या भारानेच टीम अण्णा कोलमडू लागली आहे . तेव्हा टीम अन्नाने आपल्या डोक्यावरील नैतिकतेचे न पेलणारे ओझे फेकून देवून स्वत:च बनविलेल्या चक्रव्युहातून आपली आधी सुटका करून घेतली पाहिजे. अण्णा टीम ची जी प्रकरणें बाहेर आली आहेत त्यावर अण्णा टीमने आत्मपरीक्षण करून आपला रथ जमिनीवर टेकवला तर लोकपाल सहित सर्वच प्रश्नावर सौहार्द पूर्ण संवादाचा मार्ग खुला होईल. अशा संवादातून भ्रष्टाचार निर्मुलनासाठी लोकपाल पेक्षा अधिक परिणामकारक उपाय आणि मार्ग सापडतील. (समाप्त)

सुधाकर जाधव
मोबाईल-९४२२१६८१५८
पांढरकवडा ,
जि.यवतमाळ

1 comment:

  1. Karata tha to Kari raha,ab kahe pacchataye?
    Boye ped babhul ka, aam kanhase khay ? Man who lives by sword will die by sword. Without humility it's impossible to lead people's movement. Civil society word is now corrupted by high castes society's arrogance and shamelessness. Thank you for opening our eyes to see little better. All I can say " bura Jo dekhan mai chala, bura na miliya koy,
    Jo dil khoja apana, muz se bura na koy! Road to freedom goes through self criticism and graceful dialogue respecting the authorities but telling truth with love and humility.

    ReplyDelete