Thursday, July 28, 2022

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - १८

 चीनने दिलेल्या दग्याने आणि चीन सोबतच्या युद्धात झालेल्या मानहानीकारक पराभवाने नेहरू आधीच खचले होते. हृदयविकाराचा झटकाही येवून गेला होता. शेख अब्दुल्लांना १० वर्षे तुरुंगात डांबून ठेवून आपण त्यांच्यावर अन्याय केला ही अपराधीपणाची भावना त्यांच्यात होती. काही झाले तरी आपल्या हयातीत काश्मीर प्रश्नावर तोडगा काढायचाच असा निर्धार त्यांनी केला होता.
------------------------------------------------------------------------------------------


तुरुंगातून सुटल्यानंतर २९ एप्रिल १९६४ ला शेख अब्दुल्ला काश्मीर प्रश्नावर चर्चा करण्यासाठी दिल्लीला पोचले. पंडीत नेहरूंच्या निवासस्थानीच त्यांचा मुक्काम होता. या मुक्कामात त्यांची पंडीत नेहरू व नेहरू मंत्रीमंडळातील बिनखात्याचे मंत्री लालबहादूर शास्त्री यांचेशी चर्चा होत होती. या शिवाय शेख अब्दुल्लानी स्वतंत्रपणे नेहरू मंत्रिमंडळातील काही सदस्यांशी आणि काही विरोधीपक्ष नेत्यांशी स्वतंत्रपणे चर्चा केली. शेख अब्दुल्लांशी बोलणी करून काश्मीर प्रश्नावर सन्मानजनक तोडगा काढावा अशी जाहीर भूमिका घेत शेख अब्दुल्लांच्या बाजूने उभे राहणारे दोनच नेते होते जयप्रकाश नारायण आणि चक्रवर्ती राजगोपालाचारी. नेहरू मंत्रीमंडळात नेहरू आणि लालबहादूर शास्त्री सोडले तर इतर सदस्य चर्चेला फारसे अनुकूल नव्हते. कॉंग्रेसच्या २३ खासदारांनी जाहीर पत्रक काढून काश्मीरचे भारतात विलीनीकरण होवून काश्मीर प्रश्न सुटलेला आहे असे प्रतिपादन करून काश्मीरवर पंतप्रधानांनी शेख अब्दुल्लांशी बोलणी करू नये असे सुचविले. शेख अब्दुल्ला दिल्लीला पोचण्याच्या एक दिवस आधी नेहरू व अब्दुल्ला यांच्या विरोधात घोषणा देत जनसंघाने मोर्चा काढला होता. कलम ३७० रद्द करून काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचे सरकारने जाहीर करावे ही प्रमुख मागणी होती. यावेळी जनसंघाचे नेते अटलबिहारी वाजपेयी यांनी केलेल्या भाषणात काश्मीर आधीच भारताचा अविभाज्य भाग बनलेला आहे त्यामुळे आता यावर चर्चा करण्यासारखे काही उरले नाही अशी भूमिका मांडली. काश्मीर प्रश्नी चर्चा करण्यासाठी शेख अब्दुल्ला दिल्लीत पोचले तेव्हा दिल्लीत चर्चेविरोधी वातावरण तयार झाले होते. 

चीनने दिलेल्या दग्याने आणि चीन सोबतच्या युद्धात झालेल्या मानहानीकारक पराभवाने नेहरू आधीच खचले होते. हृदयविकाराचा झटकाही येवून गेला होता. शेख अब्दुल्लांना १० वर्षे तुरुंगात डांबून ठेवून आपण त्यांच्यावर अन्याय केला ही अपराधीपणाची भावना त्यांच्यात होती. काही झाले तरी आपल्या हयातीत काश्मीर प्रश्नावर तोडगा काढायचाच असा निर्धार त्यांनी केला होता. नेहरू राजकीयदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या कितीही कमजोर झाले असले तरी काश्मीर प्रश्नावर तेच तोडगा काढू शकतात अशी अब्दुल्लांना खात्री वाटत होती. नेहरूनंतर तोडगा निघेल याची त्यांना आशा वाटत नव्हती. त्यामुळे दिल्लीतील राजकीय वातावरण चर्चेला अनुकूल नसताना नेहरू आणि शेख अब्दुल्ला यांच्यात बोलणी सुरु होती. स्वतंत्र पक्षाचे नेते मिनू मसानी यांनी त्यांच्या पक्षाचे नेते  राजगोपालाचारी यांना दिल्लीहून मद्रासला जी तार पाठवली होती त्यावरून त्यावेळच्या परिस्थितीची कल्पना येते. तारेत त्यांनी लिहिले होते की नेहरू आणि शास्त्री अब्दुल्लांशी बोलणी करत असले तरी कॉंग्रेस पक्षात गोंधळाची स्थिती आहे. मंत्रिमंडळातील सहकारीच चर्चेला विरोध करत आहेत. या चर्चे विरोधात तर जनसंघ आणि कम्युनिस्ट पार्टी यांची एकजूट झाली आहे. नेहरुंना बळ मिळेल असे आपण काहीतरी केले पाहिजे अशी विनंती मसानी यांनी राजगोपालाचारीना केली होती. अशा परिस्थितीतही नेहरू आणि शास्त्री यांची शेख अब्दुल्ला आणि त्यांच्या सहकाऱ्यांसोबत पाच दिवस चर्चा चालली होती. या चर्चेनंतर शेख अब्दुल्ला राजगोपालाचारी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मद्रासला रवाना झाले. वाटेत त्यांनी पवनारला आचार्य विनोबा भावेंची भेट घेतली.

शेख अब्दुल्लांच्या राजाजी उर्फ राजगोपालाचारी यांच्या भेटी आधी लालबहादूर शास्त्री आणि राजाजी यांच्यात या भेटी संदर्भात पत्रव्यवहार झाला होता. स्वातंत्र्य मिळाले तेव्हा राजाजी नेहरूंचे कट्टर समर्थक होते पण पुढे त्यांनी कॉंग्रेसमधून बाहेर पडून स्वतंत्र पक्षाची स्थापना केली व ते नेहरूंचे कट्टर विरोधक बनले होते. काश्मीर प्रश्न तातडीने सोडविण्याच्या नेहरूंच्या मताशी व प्रयात्नाशी ते सहमत असले तरी त्यांनी या मुद्द्यावर नेहरूंशी सरळ न बोलता शास्त्रींशी बोलणे पसंत केले. भारतीय संघराज्यात इतर प्रांतांच्या तुलनेत अधिक स्वायत्तता देणे हा या प्रश्नावरचा एक तोडगा असू शकतो हे त्यांनी शास्त्रींना पत्र लिहून कळविले होते. शास्त्रीजींनी राजाजीना लिहिलेल्या उत्तरात काश्मीर प्रश्नावर शेख साहेबांनी टोकाची भूमिका घेवू नये यासाठी त्यांचे मन वळवावे अशी विनंती केली होती. शेख नुकतेच तुरुंगातून बाहेर आल्याने त्यांनी सध्याची परिस्थिती नीट समजून घ्यावी असे शास्त्रींनी पत्रातून सुचविले होते. शेख अब्दुल्ला आणि राजाजी यांच्यातील चार तासाच्या चर्चेत काश्मीर प्रश्नावर काय तोडगा निघू शकतो यावर चर्चा झाली. राजाजीनी काय तोडगा सुचविला याबाबत शेख अब्दुल्ला किंवा राजाजीनी पत्रकारांना माहिती देण्याचे टाळले. पंतप्रधानांशी चर्चा केल्यानंतरच तोडग्याला अंतिम रूप दिले जावू शकते एवढेच अब्दुल्ला बोलले. पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अयुबखान यांचे पाकिस्तान भेटीचे निमंत्रण अब्दुल्ला यांना मद्रासला असतांनाच मिळाले होते. भारत आणि पाकिस्तानला मान्य होईल असा तोडगा निघाल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही व काश्मिरात शांतता नांदणार नाही या निष्कर्षाप्रत अब्दुल्ला आले होते. त्यांचे हे मत नेहरू , राजाजी आणि जयप्रकाश नारायण या नेत्यानाही मान्य होते.                                                                                       

पाकिस्तान भेटीचे निमंत्रण मिळाल्यावर पाकिस्तान समोर कोणते प्रस्ताव ठेवता येतील याची चर्चा करण्यासाठी शेख अब्दुल्ला मद्रासहून पुन्हा नेहरूंच्या भेटीसाठी दिल्लीला गेले. राजाजींशी झालेल्या चर्चेचा सार अब्दुल्लांनी नेहरुंना सांगितला. पाकिस्तान समोर कोणते प्रस्ताव ठेवायचे यासंबंधी अब्दुल्लांशी चर्चा करण्याची जबाबदारी नेहरूंनी तिघांची अनौपचारिक समिती नेमली. या समितीत परराष्ट्र सचिव गुंडेविया, भारताचे पाकिस्तान मधील राजदूत सी. पार्थसारथी आणि अलीगड विद्यापीठाचे कुलगुरू बद्रुद्दीन तय्यबजी यांचा समावेश होता. पाकिस्तानने बळकावलेल्या काश्मीरच्या भागासहित राजा हरिसिंग यांच्या काळात असलेल्या संपूर्ण जम्मू-काश्मीर संस्थानात स्वयंनिर्णयासाठी सार्वत्रिक मतदान घेणे या तोडग्यासाहित जम्मू आणि लडाख याचे भारतात विलीनीकरण व फक्त काश्मीरघाटीत स्वयंनिर्णयासाठी मतदान घ्यावे असाही प्रस्ताव समोर आला. मात्र धर्माधारित द्विराष्ट्रवाद मान्य न करण्याची भारताची ठाम भूमिका असल्याचे अब्दुल्लांनी पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षाला सांगावे असे समितीने सुचविले. दोन्ही देशातील अल्पसंख्याकांची सुरक्षा धोक्यात येणार नाही असाच तोडगा असला पाहिजे यावर चर्चेत एकमत झाले. कोणत्याही तोडग्यासाठी दोन्ही देशाच्या राष्ट्रप्रमुखानी भेटणे आवश्यक असल्याने तशी भेट घडवून आणण्यासाठी आपल्या पाकिस्तान भेटीत अब्दुल्लांनी तिथल्या राष्ट्राध्यक्षाशी चर्चा करावी असे ठरले. शेख अब्दुल्ला पाकिस्तान समोर कोणते प्रस्ताव ठेवणार आहेत यासंबंधी माहिती द्यायला नेहरू यांनी पत्रकार परिषदेत नकार दिला. मात्र पाकिस्तानची तडजोडीची तयारी असेल तर भारत पाकव्याप्त काश्मीर परत मिळविण्या बाबत आग्रही असणार नाही हे मात्र त्यांनी त्या पत्रकार परिषदेत सूचित केले होते. पुढे याच मुद्द्यावर पाकिस्तानशी तडजोड करण्यासाठी पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष मुशर्रफ व भारताचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची आग्रा येथे शिखर बैठक झाली होती. नेहरू आणि नेहरूंनी नेमलेल्या समितीशी चर्चा केल्यानंतर  शेख अब्दुल्ला पाकिस्तानच्या राष्ट्राध्याक्षशी चर्चा करण्यासाठी २३ मे १९६४ रोजी पाकिस्तानची राजधानी रावळपिंडीला पोचले.
                                                 (क्रमशः) 
--------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि. यवतमाळ 
मोबाईल : ९४२२१६८१५८ 

Thursday, July 21, 2022

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - १७

भारत सरकारने काश्मीरच्या दुसऱ्या नेत्यांना बळ देवून काश्मीरच्या जनतेची स्वायत्तता व सार्वमत याबद्दलची  मानसिकता बदलण्याचा प्रयत्न करून पाहिला होता. पण दुसरे नेते त्यात यशस्वी झाले नाहीत. काश्मीरप्रश्नी तोडगा काढायचा तर शेख अब्दुल्लांशिवाय पर्याय नाही हे लक्षात आल्यावर त्यांची १९६४ च्या एप्रिल मध्ये सुटका करण्यात आली. 
--------------------------------------------------------------------------------------------

 
१९५८ मध्ये शेख अब्दुल्लांच्या अल्पकालीन सुटके वेळी त्यांचे काश्मीरच्या जनतेने भव्य स्वागत करून भरभरून समर्थन दिले त्या घटनेने त्यावेळचे काश्मीरचे पंतप्रधान बक्षी गुलाम मोहम्मद यांना जसा धक्का बसला होता तसाच धक्का पंडीत नेहरुंना हजरत बाल चोरीला जाण्याच्या निमित्ताने सरकार विरोधात जनतेच्या उठावाने बसला होता. १५-१६ वर्षाच्या राजवटी नंतरही सरकार विरोधात मोठा उठाव होत असेल तर काश्मीरमधील परिस्थिती सामान्य असल्याची समजूत करून घेणे चुकीचे असल्याचे पंडीत नेहरूंनी मंत्रीमंडळाला ऐकवले. काश्मीर प्रश्नी कायमचा तोडगा काढण्याची गरज नेहरुंना तीव्रतेने जाणवली. शेख अब्दुल्लांना विश्वासात घेतल्याशिवाय तोडगा निघणे अशक्य आहे याची जाणीव नेहरुंना नव्याने झाली. काश्मीर प्रश्न प्राधान्यक्रमाने सोडविण्याचे त्यांनी मनावर घेतले. काश्मीरचे विलीनीकरण, घटनेत कलम ३७० चा समावेश या बाबतीत त्यांना सरदार पटेलांची जी मदत झाली तशी मदत आणि सहकार्य काश्मीर प्रश्नावर त्यांना नंतर मिळाले नव्हते. मंत्रीमंडळाकडून काश्मीरप्रश्नी फारसे सहकार्य मिळत नव्हते. त्यामुळे नेहरूंनी हा प्रश्न सोडविण्यास मदत करण्यासाठी लाल बहादूर शास्त्रींना दिल्लीत बोलावून घेतले आणि बिनखात्याचे मंत्री म्हणून त्यांचा केंद्रीय मंत्रीमंडळात समावेश केला होता. हजरत बाल प्रकरणी उठलेले वादळ शमविण्यास शास्त्रींची मदतही झाली. हजरत बाल प्रकरणानंतर पंतप्रधान शमसुद्दीन यांचा राजीनामा घेण्यात आला. त्यांच्या जागी काश्मीरचे चौथे पंतप्रधान म्हणून गुलाम मोहम्मद सादिक यांची नियुक्ती करण्यात आली. सादिक यांनी सत्ता हाती घेतल्यावर १९५८ मध्ये शेख अब्दुल्लांवर दाखल केलेला खटला मागे घेतला आणि त्यांची तुरुंगातून बिनशर्त मुक्तता केली. 

शेख अब्दुल्लांच्या सुटकेनंतर काय झाले हे जाणून घेण्या आधी आधीची एक घडामोड लक्षात घेतल्याशिवाय काश्मीर प्रश्नाचा गुंता समजणार नाही. काश्मीरच्या निर्वाचित घटना समितीने घटना बनविण्याचे काम पूर्ण झाल्यावर स्वत:ला विसर्जित करण्याचा निर्णय घेतला. घटना समितीने बनविलेल्या घटनेत काश्मीर हा भारताचा भाग असल्याची पुष्टी करून तसे कलम राज्यघटनेत समाविष्ट केले. मात्र भारतीय राज्यघटनेत सामील कलम ३७० मध्ये कोणताही बदल करण्याची किंवा ते कलम रद्द करण्याची शिफारस न करता घटना समितीचे विसर्जन करण्याचा निर्णय घेतला. याचा अर्थ काश्मीर भारताचा भाग असला तरी काश्मीर बाबतचा कोणताही निर्णय काश्मीरच्या विधीमंडळाच्या सल्ल्याने व संमतीने घेणे घटनात्मकदृष्ट्या बंधनकारक होते ते बंधन कायम राहिले. भारतीय राज्यघटनेत कलम ३७० तात्पुरते असल्याचा उल्लेख असला तरी त्या कलमात बदल करण्याची किंवा ते रद्द करण्याची जी प्रक्रिया नमूद करण्यात आली होती त्यात काश्मीरच्या घटना समितीचा सल्ला व संमती ही पूर्व अट होती. भारतीय संसदेला या कलमात एकतर्फी बदल करण्याचा किंवा ते रद्द करण्याचा अधिकार भारताच्या घटना समितीने दिलेला नव्हता. काश्मीरची घटना समिती ते कलम रद्द करण्यास संमती देईल या गृहितकावर आधारित ते तात्पुरते कलम असल्याचा उल्लेख भारतीय राज्यघटनेत करण्यात आला होता. पण काश्मीरच्या घटना समितीने तसे काही न करताच स्वत:ला विसर्जित केल्याने कलम ३७० कायम राहिले. आता हे कलम तात्पुरते राहिले नसून कायम असल्याचा निकालही जम्मू-काश्मीर हायकोर्टाने व सुप्रीम कोर्टाने दिला होता. मोदी सरकारने कलम ३७० मध्ये बदल करण्याचा जो निर्णय घेतला आणि त्याला संसदेने संमती दिली असली तरी झालेला निर्णय घटनात्मक आहे की नाही हा प्रश्न सुप्रीम कोर्टापुढे प्रलंबित आहे.                                                                                                                     

काश्मीरची घटना समिती विसर्जित झाली तेव्हा शेख अब्दुल्ला तुरुंगातच होते आणि काश्मीरमध्ये नवी दिल्लीला अनुकूल राजवट होती. काश्मीरच्या घटना समितीने भारताच्या अनुकूल राज्यघटना तयार केली असली तरी कलम ३७० हे काश्मिरी जनतेच्या स्वायत्ततेच्या भावनेशी जोडले गेले असल्याने त्याच्याशी छेडछाड करण्याची हिम्मत काश्मीरच्या घटना समितीची झाली नाही. काश्मीरची घटना समिती विसर्जित झाल्यानंतर जवळपास एक वर्षानंतर १९५८ साली शेख अब्दुल्लाची सुटका करण्यात आली होती. त्यांच्या झालेल्या स्वागताने स्वयंनिर्णयाचा अधिकार मिळाला पाहिजे ही भावना तसूभरही कमी झालेली नाही हे काश्मीर आणि भारत सरकारच्या लक्षात आले होते. शेख अब्दुल्ला बाहेर राहिले तर ही भावना वाढीस लागेल म्हणून शेख अब्दुल्लांना पुन्हा अटक करण्यात आली. भारत सरकारने काश्मीरच्या दुसऱ्या नेत्यांना बळ देवून जनतेची मानसिकता बदलण्याचा प्रयत्न करून पाहिला होता. पण दुसरे नेते त्यात यशस्वी झाले नाहीत. काश्मीरप्रश्नी तोडगा काढायचा तर शेख अब्दुल्लांशिवाय पर्याय नाही हे लक्षात आल्यावर त्यांची १९६४ साली सुटका करण्यात आली. पंडीत नेहरूंचे विशेष दूत लाल बहादूर शास्त्री यांनी स्वत: अब्दुल्लांना तुरुंगातून मुक्त केल्याचे जाहीर केले.                 

जम्मूमध्ये हिंदुत्ववाद्यांकडून कलम ३७० व काश्मीरला विशेष दर्जा देण्याला हिंसक विरोध झाला होता. त्याच जम्मूच्या तुरुंगातून मुक्त झाल्यावर उघड्या जीप मधून शेख अब्दुल्ला जम्मूच्या रस्त्यावरून फिरले जनतेने त्यांचे हारतुरे देवून आणि पुष्पवृष्टी करून स्वागत केले होते. दुसऱ्या दिवशी केलेल्या भाषणात नेहरू काळात १० वर्षे तुरुंगात राहूनही नेहरूंविषयी कोणतीही कटुता नव्हती. उलट  काश्मीरचा प्रश्न नेहरूंकडूनच  सुटू शकतो असा विश्वास त्यांनीभाषणातून व्यक्त केला. नेहरुनंतर मार्ग काढणे कठीण जाईल असेही ते बोलले. नेहरूंनीही तुरुंगातून मुक्त झाल्यावर सरळ दिल्लीला येवून त्यांचेकडे राहण्याचे आमंत्रण दिले होते. काश्मीरच्या जनतेचे दर्शन घेतल्याशिवाय आणि सहकाऱ्यांशी विचारविनिमय केल्याशिवाय दिल्लीला येणार नसल्याचे अब्दुल्लांनी नेहरुंना कळविले. मोकळ्या मनाने आपण नेहरुंना भेटू पण भेटीत काय निर्णय व्हावा याबाबत मतप्रदर्शन टाळावे अशी त्यांनी भारतीय जनतेला आणि नेत्यांना विनंती केली. पण त्यांच्या विनंतीकडे दुर्लक्ष करून अनेक नेत्यांनी , ज्यात कॉंग्रेसच्या नेत्यांचाही समावेश होता, अब्दुल्लांशी बोलणी करायची गरजच नसल्याची निवेदने प्रसिद्ध केलीत. कॉंग्रेस नेते इंग्रजांच्या वसाहतवादा  विरोधी लढाईत आघाडीवर होते पण आता काश्मीरच्या बाबतीत तेच वसाहतवादी भूमिका घेत असल्याची टीका कॉंग्रेस नेत्यांच्या निवेदनावर प्रतिक्रिया व्यक्त करताना सर्वोदयी नेते जयप्रकाश नारायण यांनी केली होती. काश्मीरमध्ये आठवडाभर फिरून जनतेच्या व कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेवून काश्मीर प्रश्नावर बोलणी करण्यासाठी शेख अब्दुल्ला नवी दिल्लीला गेले.  

                                     (क्रमशः)
---------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि. यवतमाळ 
मोबाईल : ९४२२१६८१५८ 

Thursday, July 14, 2022

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - १६

१९५३ च्या मध्यापासून १९६३ च्या मध्या पर्यंत म्हणजे १० वर्षे बक्षी यांची राजवट राहिली. या राजवटीत केंद्र आणि काश्मीर यांच्यात विसंवाद निर्माण झाला नाही आणि विकासकामांमुळे काश्मीरचा चेहरामोहराही बदलला. फक्त  बदलल्या नाही त्या काश्मिरी जनतेच्या स्वायत्तता आणि स्वातंत्र्य याच्यामध्ये झुलणाऱ्या भावना ! 
--------------------------------------------------------------------------------

गुलाम बक्षी मोहम्मद यांचे काळात शेवटचा महत्वाचा बदल झाला तो म्हणजे प्रशासन व पोलीस सेवेत काश्मीर बाहेरील अधिकाऱ्यांना सामील करून घेण्यास मान्यता देण्यात आली. आतापर्यंत काश्मीर मधील परिस्थिती हाताळण्यात केंद्र सरकार पडद्यामागे होते आणि समोर काश्मिरी लोकांचे शासन,प्रशासन आणि पोलीस दल होते. त्यामुळे काश्मिरी जनतेच्या नाराजीचे व असंतोषाचे धनी काश्मिरी सरकार व प्रशासन होत असे. अगदी शेख अब्दुल्लांच्या बडतर्फी व अटके बाबतही काश्मीरची जनता पंडीत नेहरूंपेक्षा काश्मीरचे सदर ए रियासत (घटनात्मक प्रमुख) करणसिंग आणि काश्मीरचे पंतप्रधान बक्षी गुलाम मोहम्मद यांनाच दोष देत होती. या नव्या सुधारणेने काश्मीर प्रशासनात व पोलीस सेवेत काश्मीर बाहेरचे अधिकारी येण्याचा मार्ग मोकळा झाल्याने काश्मिरी जनतेचा रोष आणि नाराजी आणि तक्रारी भारता विरुद्ध असण्याच्या युगाला प्रारंभ होणार होता.. 

  शेख अब्दुल्लांच्या अटकेनंतर काश्मिरात जमिनीवर आणि घटनात्मकदृष्ट्या झालेले बदल शेख अब्दुल्लांनी मान्य केले तर त्याचा आंतरराष्ट्रीय जगतावर प्रभाव पडेल हे लक्षात घेवून अटकेच्या ५ वर्षानंतर १९५८ मध्ये शेख अब्दुल्लांची सुटका करण्यात आली. सुटकेनंतर त्यांच्या स्वागतासाठी उसळलेला जनसमुदाय पाहून बक्षी गुलाम मोहम्मद यांना धक्काच बसला. लोक आपल्यामागे नाहीत याची त्यांना जाणीव झाली व हे केंद्र सरकारच्या देखील लक्षात आले. त्यांना सोडल्यानंतर अटके पूर्वीच्या शेख अब्दुल्लांच्या भूमिकेत फारसा बदल झाला नाही हेही केंद्र सरकारच्या लक्षात आले. त्यामुळे अवघ्या तीन महिन्यात पुन्हा शेख अब्दुल्लांना अटक करण्यात आली. १९५३ मध्ये शेख अब्दुल्लांना अटक करण्यात आली तेव्हा त्यांच्यावर कोणतेच आरोप ठेवण्यात आले नव्हते. दुसऱ्यांदा अटक केली तेव्हा मात्र पाकिस्तानशी हातमिळवणी करून भारताविरुद्ध कट रचल्याचा म्हणजेच देशद्रोहाचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आणि तसा खटला देखील दाखल करून चालविण्यात आला.

 नवी दिल्लीला संपूर्ण सहकार्य केले , नवी दिल्लीच्या सोयीचे घटनात्मक बदल करण्यास अनुमती मिळवून दिली तरी काश्मीर बाबतच्या हिंदुत्ववाद्यांच्या भूमिकेत काही बदल न झाल्याने पंतप्रधान बक्षी गुलाम मोहम्मद निराश झाले होते. शेख अब्दुल्लांच्या अटकेपासून काश्मिरी मुसलमानांची नाराजी कायम असल्याचेही त्यांच्या लक्षात आले. याच्या परिणामी नवी दिल्लीशी आणखी बदलासाठी सहकार्य करण्यास ते उत्सुक राहिले नाहीत. त्यामुळे नवी दिल्लीच्या दृष्टीने त्यांची उपयुक्तता संपली होती. काश्मीरच्या पंतप्रधान पदावरून पायउतार होण्याची त्यांची वेळ आली होती. जनतेचे समर्थन नसल्यामुळे पायउतार होण्यास विरोध करून नवी दिल्लीची नाराजी ओढवून घेण्याची त्यांची हिम्मत नव्हती. १९५३ च्या मध्यापासून १९६३ च्या मध्या पर्यंत म्हणजे १० वर्षे बक्षी यांची राजवट राहिली. या राजवटीत केंद्र आणि काश्मीर यांच्यात विसंवाद निर्माण झाला नाही आणि विकासकामांमुळे काश्मीरचा चेहरामोहराही बदलला. बदलल्या नाही त्या काश्मिरी जनतेतील स्वायत्तता आणि स्वातंत्र्य याच्यामध्ये झुलणाऱ्या भावना ! 
                                                                                                        

१० वर्षानंतर बक्षी गुलाम मोहम्मद पायउतार झालेत पण पंतप्रधानपदी आपल्या समर्थक व्यक्तीला बसविण्यात ते यशस्वी झालेत. ख्वाजा शम्सुद्दीन हे काश्मीरचे नवे पंतप्रधान बनले. या पदासाठी बक्षी गुलाम मोहम्मद यांच्या शब्दाबाहेर नसणे एवढीच त्यांची पात्रता होती. प्रशासनाचा कोणताच अनुभव त्यांच्याकडे नव्हता. ते सत्तेत आल्या नंतर २-३ महिन्याच्या आतच काश्मीरचे चित्र आणि चरित्र बदलणारी घटना घडली. हजरतबाल मस्जीदीत मोहम्मद पैगंबर यांच्या पवित्र हजरतबालची चोरी झाली. या घटनेने काश्मीरमध्येच गोंधळ आणि अव्यवस्था निर्माण झाली नाही तर भारतीय उपखंड हादरला. हा गोंधळ निस्तरण्या ऐवजी जनतेच्या रोषाच्या भीतीने काश्मीरचे नवे पंतप्रधान शम्सुद्दीन यांनी स्वत:ला घरात बंद करून घेतले होते. हजरतबाल चोरीला जाण्याच्या घटनेचे पडसाद देशाबाहेर उमटले.                                                                                                                                             

पाकिस्तानात हिंदू विरोधी दंगली झाल्या व अनेक हिंदूना भारतात आश्रय घ्यावा लागला. पाकिस्तानातील घटनेचे भारतात तीव्र पडसाद उमटून हिंदू-मुस्लीम तणाव निर्माण झाला होता. पाकिस्तानने हजरतबाल चोरीला जाण्याच्या घटनेचा पुरेपूर फायदा उचलून काश्मीर व भारत सरकार विरुद्ध रेडीओ आणि अन्य माध्यमातून अपप्रचार करून काश्मीरच्या जनतेला भडकविण्याचा प्रयत्न केला. काश्मिरात घडलेल्या या घटनेने पाकिस्तानातील हिंदू असुरक्षित झालेत मात्र काश्मिरात काश्मिरी पंडीत , इतर हिंदू आणि अन्य धर्मीय यांना इजा झाली नाही. ते सुरक्षित होते. काश्मिरात या घटनेचा संबंध पायउतार झालेले पंतप्रधान बक्षी गुलाम मोहम्मद यांचेशी जोडण्यात आला. आजारी आईला पवित्र हजरतबालचे दर्शन घडविण्यासाठी त्यांनीच चोरी घडवून आणल्याची अफवा पसरली होती. त्यामुळे जनतेकडून त्यांच्या अटकेची मागणी होत होती. काश्मीर सरकार परिस्थिती हाताळण्यास असमर्थ ठरत असल्याचे पाहून केंद्र सरकारने हालचाल केली.                                                                                                   

काश्मीरशी जवळून संबंध असलेल्या बी.एन. मलिक या अधिकाऱ्यास श्रीनगरला पाठविण्यात आले. ज्यांच्या विरुद्ध रोष निर्माण झाला होता त्या बक्षी गुलाम मोहम्मद यांना श्रीनगरहून जम्मूत हलविण्यात आले तर सदर ए रियासत करणसिंग जम्मूहून श्रीनगरला आले. त्यांनी पवित्र हजरतबाल सापडावा म्हणून हिंदू मंदिरात प्रार्थना करण्याचे आवाहन केले त्या आवाहनाला प्रतिसादही चांगला मिळाला. हजरतबालचे निमित्त साधून काश्मिरात हिंदू मुस्लीम दुही निर्माण करण्याचा पाकिस्तानचा मनसुबा सफल होवू शकला नाही. एक आठवड्यातच चोरी गेलेला पवित्र हजरतबाल पुन्हा जिथे होता तिथे आणून ठेवण्यात आला. चोरी कोणी केली आणि कोणी आणून ठेवला हे कधीच उघड झाले नाही. पण आणून ठेवलेला हजरतबाल खरोखरीच पवित्र हजरतबाल आहे की नाही याबाबत शंका घेण्यात आली.                                                                                                                                   

परिस्थिती हाताळण्यासाठी नेहरूंनी लाल बहादूर शास्त्रींना श्रीनगरला पाठविले. आणून ठेवलेला हजरतबाल खरा आहे की नाही याची तपासणी करण्यासाठी त्यांनी धार्मिक नेत्याची समिती नेमली आणि या समितीने पडताळणी करून आणून ठेवलेला हजरतबाल पवित्र हजरतबाल असल्याचे प्रमाणित केले तेव्हा या प्रकरणावर पडदा पडला. पण या निमित्ताने काश्मिरात हस्तपेक्ष करण्याचा नवा मार्ग पाकिस्तानला खुणावू लागला. हा नवा मार्ग म्हणजे धार्मिक कट्टरतेला खतपाणी घालणे. दुसरीकडे काश्मिरी जनतेची स्वायत्ततेची किंवा स्वातंत्र्याची आकांक्षेने धार्मिक वळण घेतले तर काय अनर्थ घडू शकतो याची जाणीव या घटनेने भारत सरकारला झाली आणि काश्मीरप्रश्न प्राधान्यक्रमाने सोडविला पाहिजे या निष्कर्षाप्रत भारत सरकार आले.           (क्रमश:)
--------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि. यवतमाळ 
मोबाईल : ९४२२१६८१५८ 

Wednesday, July 6, 2022

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - १५

शेख अब्दुल्लांच्या पंतप्रधान पदावरून बडतर्फी व अटके नंतर जम्मू-काश्मीर मध्ये आलेल्या बक्षी गुलाम मोहम्मद यांची राजवट विकासकामांमुळे जशी काश्मीरच्या फायद्याची ठरली तशीच ती काश्मीरवरील भारताची घटनात्मक पकड मजबूत करण्यासाठीही उपयोगी ठरली.
-----------------------------------------------------------------------------------------------
 

शेख अब्दुल्लांच्या अटकेनंतर उमटलेल्या उग्र प्रतिक्रिया शांत झाल्या नंतर नवे पंतप्रधान बक्षी गुलाम मोहम्मद यांनी अब्दुल्लांच्या अटकेने नाराज काश्मिरी जनतेला खुश करण्यासाठी विविध विकास योजनांवर जोर दिला. प्रशासन , शिक्षण , कृषी इत्यादी बाबत शेख अब्दुल्लांची धोरणे पुढे नेताना विकासाच्या बाबतीत मात्र थोडी वेगळी भूमिका घेतली. शेख अब्दुल्लासाठी काश्मीरची स्वायत्तता प्रिय आणि मध्यवर्ती होती. त्यामुळे आर्थिक बाबतीत भारतावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वावलंबनावर त्यांचा भर होता. डोग्रा राजवटीत आणि नंतर पाकिस्तानने कबायली वेषात केलेल्या आक्रमणाने काश्मीरची अर्थव्यवस्था नाजूक बनली होती. शेखच्या अटकेने निर्माण झालेली नाराजी आर्थिक अडचणी वाढल्या तर आणखी वाढेल हे दिल्लीश्वरांना पटवून काश्मीरच्या विकास कार्यासाठी मदत मिळेल अशी व्यवस्था केली. आपण नेमलेला काश्मीरचा पंतप्रधान यशस्वी व्हायचा असेल तर आर्थिक मदत पुरवावी लागेल याचे भान दिल्लीलाही होते. एकमेकांची गरज म्हणून नवी दिल्लीकडून सुरु झालेल्या मदतीतून नवा काश्मीर उभा राहिला. उद्योगांसाठी मुलभूत संरचना स्थापित करण्याचा प्रयत्न झाला. काश्मीर मध्ये उपलब्ध कच्चा माल आणि कारागिरी या आधारे उद्योग सुरु झालेत. आरोग्या संबंधीच्या सुविधांचे जाळे निर्माण करता आले.पर्यटन आणि दळणवळण वाढविण्यासाठी रस्ते तयार करण्याचे काम प्राधान्याने हाती घेण्यात आले. सर्वात महत्वाचे म्हणजे शेख अब्दुल्लांनी काश्मिरात धार्मिक शिक्षणाऐवजी धर्मनिरपेक्ष व आधुनिक शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली होती त्याला धक्का न लावता बक्षी काळात नवीन आर्थिक सुधारणांसोबत शिक्षण सुविधा वाढविण्यात आल्या आणि शिक्षणाचा बऱ्यापैकी प्रसार झाला. काश्मीरची आधीची अनेक वर्षापासूनची परिस्थिती लक्षात घेतली तर बक्षी गुलाम मोहम्मद यांची कारकीर्द विकासाभिमुख ठरली. पण अशा प्रकारच्या विकासकामाचे निहित दुष्परिणाम असतात ते झालेच. बक्षींची राजवट विकासासाठी जशी प्रसिद्ध झाली तशीच ती भ्रष्टाचारासाठीही कुप्रसिद्ध झाली.

नातलग आणि जवळच्या लोकांना विकासकामांचे कंत्राट देणे, विकासकामातील टक्केवारी यासाठी बक्षी , त्यांचे नातेवाईक आणि मित्र बदनाम झालेत. अर्थात भारताच्या इतर राज्यात जे घडत होते त्यापेक्षा वेगळा भ्रष्टाचार काश्मीर मध्ये झाला असे म्हणता येत नाही. पण काश्मीरच्या नेत्यांना याबाबतीत विशेष बदनाम करण्यात आले. आणि मुख्य म्हणजे एवढा पैसा खर्च करून काश्मीरची जनता भारतात बिनशर्त विलीन व्हायला तयार नाही ही काश्मिरेतर भारतीयांसाठी दुखरी नस बनली. काश्मीरच्या विकासासाठी पैसे व साधनसामुग्री पुरविणारे केंद्र व ते स्वीकारणारे काश्मीरचे नेते यांना इतरत्र झाला तोच भ्रष्टाचार काश्मीरमध्ये झाला हे विसरून बदनाम करण्याचा पद्धतशीर प्रयत्न झाला. या प्रयत्नातून काश्मीर नेतृत्वाची विश्वासार्हता कमी झाली. काश्मीरच्या जनतेचा काश्मीरच्या नेतृत्वावरील विश्वास कमी होणे हा पुढे जावून काश्मीर प्रश्न सोडविण्यात अडथळा बनला. बक्षी यांच्या राजवटीत जी दोन धोरणे विशेषत्वाने राबविण्यात आली त्यातून सामाजिक ताणतणाव निर्माण व्हायला सुरुवात झाली होती. त्यातील एक धोरण म्हणजे मुस्लिमांचा प्रशासनातील सहभाग वाढविण्यासाठी राखीव जागा आणि शिक्षण संस्थातील प्रवेशांसाठी राखीव जागा यामुळे हे धोरण आपल्या विरोधात आहे हे इतर समुदायाला विशेषत: पंडीत समुदायाला वाटू लागले. दुसरीकडे आधुनिक व धर्मनिरपेक्ष शिक्षणावरचा जोर आणि त्याचा सार्वत्रिक प्रसार या विरोधात मुस्लीम धर्मवाद्यांचा रोष वाढला. धर्मनिरपेक्ष शिक्षणाचा प्रभाव व प्रसार रोखण्यासाठी त्यांनी धार्मिक शिक्षण देणारे मदरसे सुरु केलेत. प्रारंभीच्या काळात तरी दोन्ही समुदायांचा रोष एकमेकांवर व्यक्त होण्यापेक्षा सरकारी धोरणावर व्यक्त होत होता. 

बक्षी गुलाम मोहम्मद यांची राजवट विकासकामांमुळे जशी काश्मीरच्या फायद्याची ठरली तशीच ती काश्मीरवरील भारताची घटनात्मक पकड मजबूत करण्यासाठीही उपयोगी ठरली. सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र काश्मीर पर्यंत विस्तारले ते याच काळात. पंडीत नेहरू यासाठी आधीपासूनच आग्रही होते. आणखी दुसऱ्या महत्वाच्या केंद्रीय संस्थेचा काश्मीरपर्यंत विस्तार झाला ती म्हणजे निवडणूक आयोग. काश्मीर संदर्भात कायदे बनविण्याचा भारतीय संसदेचा अधिकार संरक्षण, दळणवळण व परराष्ट्र धोरण यापुरता मर्यादित होता तो देखील वाढला. कॅगचे , कस्टम खात्याचे कार्यक्षेत्र काश्मीर पर्यंत विस्तारले. भारतातून काश्मीरमध्ये येणाऱ्या वस्तूंवर अबकारी कर  लागत होती तो बंद करण्यात आली. सर्वात महत्वाचे म्हणजे काश्मीरच्या संविधान सभेने काश्मीरची जी राज्यघटना तयार केली व तीला मान्यता दिली त्या राज्यघटनेच्या दुसऱ्या भागातील पहिल्या कलमात जम्मू आणि काश्मीर राज्य भारताचा अविभाज्य भाग असल्याचे नमूद करण्यात आले. तांत्रिकदृष्ट्या हे पाउल काश्मीरचे भारताशी झालेल्या विलीनीकरणावर शिक्कामोर्तब मानले जाते ज्याची आधी झालेल्या करारानुसार नितांत गरज होती. भारताच्या हिताच्या दृष्टीने काश्मीरची राज्यघटना हा महत्वाचा ऐतिहासिक दस्तावेज होता. पण ज्यांचे राजकारणच हिंदू-मुस्लीम दुहीवर पोसले गेले त्यांनी काश्मीरच्या वेगळ्या राज्यघटनेची गरज व महत्व , त्यासाठी आधी झालेले करार हे काहीच लक्षात न घेता अपप्रचार सुरूच ठेवला. एका चर्चेत तर बक्षी गुलाम मोहम्मद निराशेने म्हणाले होते की मी भारतासाठी एवढे केले पण तरीही हिंदूत्ववाद्यांच्या धोरणात आणि दृष्टीकोनात काहीच बदल झाला नाही.    दुसरीकडे मुस्लिमही बक्षीवर फारसे खुश नसल्याचे गुप्तचर संस्थांचे अहवाल दिल्लीला जात होते. केंद्र सरकार सोबत कट करून आपल्या नेत्याला तुरुंगात टाकून सत्ता मिळविणारा नेता अशीच बक्षींची प्रतिमा मुसलमानांमध्ये होती.विकासकार्याने ती प्रतिमा धुवून निघू शकली नाही.                 (क्रमशः)
-------------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि. यवतमाळ 
मोबाईल : ९४२२१६८१५८