Wednesday, July 26, 2023

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - ६६

प्रधानमंत्री नरसिंहराव यांनी परदेशातून काश्मिरी जनतेला उद्देशून केलेल्या संबोधनात नवलाईची गोष्ट ही होती की काश्मीरच्या स्वायत्ततेचा संकोच करणारे जे निर्णय आधीच्या पंतप्रधानांनी घेतले होते किंवा आधीच्या पंतप्रधानांच्या काळात झाले होते ते बदलण्याची तयारी त्यांनी दाखविली. 
--------------------------------------------------------------------------------------


अमेरिकेत पाउल ठेवण्याआधी प्रधानमंत्री नरसिंहराव यांना काश्मीर संदर्भात महत्वाची घोषणा करायची होती. ४ नोव्हेंबर १९९५ ला त्यांचा अमेरिका दौरा सुरु होणार होता. त्यापूर्वी ते आफ्रिकेतील बुरकीना फासो (पूर्वीचे रिपब्लिक ऑफ अप्पर व्होल्टा) येथे आलेले होते. तेथून त्यांना काश्मिरी जनतेला उद्देशून महत्वाचा संदेश रेकॉर्ड करून प्रक्षेपित करण्यासाठी भारतात पाठवायचा होता. आफ्रिकी देशाच्या दोन दिवसाच्या मुक्कामात काश्मीर बाबत जी घोषणा करायची होती त्याचा मसुदा तयार करण्यात आला. वेळ मिळेल तेव्हा नरसिंहराव त्याच्यात फेरबदल करीत होते. यावरून त्यांना द्यावयाचा संदेश अचूकपणे लोकांपर्यंत पोचला पाहिजे याची ते किती काळजी घेत होते हे लक्षात येईल. संदेश तर तयार झाला पण भारतात रेडीओ आणि दूरदर्शन वरून प्रक्षेपित करण्यासाठी पाठवायचा होता. त्याकाळी तंत्रज्ञान आजच्या सारखे  विकसित नव्हते आणि ते ज्या आफ्रिकन देशात होते तो देश तर तंत्रज्ञानाच्या बाबतीत आणखी मागासलेला होता. दिवसभरातून एकच उपग्रह त्या देशावरून जात होता. ती वेळ साधून संदेश प्रक्षेपित करण्यासाठी भारतात पाठवायचा होता. त्यात दूरदर्शनने एक घोळ करून ठेवला. कॅसेट टाकायचे विसरून नरसिंहराव यांचा संदेश रेकॉर्ड करण्यात आला होता आणि अमेरिकेला जाण्यासाठी पंतप्रधान विमानतळावर पोचले तेव्हा ही चूक लक्षात आली ! पण दूरदर्शन सोबत ए एन आय या वृत्तसंस्थेने देखील पंतप्रधानांचा संदेश रेकॉर्ड केलेला असल्याने प्रश्न सुटला. नरसिंहराव अमेरिकेत पोचले तेव्हा भारतात रेडीओ आणि दूरदर्शन वरून काश्मिरी जनतेला दिलेला संदेश प्रसारित झाला होता. काश्मीर बाबत प्रधानमंत्री नेहरू सह कोणत्याही पंतप्रधानांनी जी लवचिकता दाखविली नाही ती नरसिंहराव यांनी दाखविली. काश्मीर बाबत भारतीय जनतेची बनलेली आक्रमक मानसिकता आणि राजकीय पक्षांची या मुद्द्यावर जनतेचे लांगुलचालन करण्याची भूमिका यामुळे विरोध होईल याची जाणीव असून सुद्धा नरसिंहराव यांनी काश्मीर संबंधी आजवरच्या केंद्र सरकारच्या धोरणाला फाटा देणाऱ्या नव्या धोरणाची घोषणा केली.

काश्मीरच्या स्वायत्ततेची संवैधानिक हमी देणारे कलम ३७० कायम राहील, त्याला धक्का लागणार नाही  ही भारताच्या सगळ्याच पंतप्रधानांनी, होय सगळ्याच म्हणजे नरेंद्र मोदी सहित सगळ्या, दिलेले आश्वासन नरसिंहराव यांनीही आपल्या संबोधनात काश्मिरी जनतेला दिले ही काही नवलाईची गोष्ट नव्हती. त्यांच्या संबोधनात नवलाईची गोष्ट ही होती की काश्मीरच्या स्वायत्ततेचा संकोच करणारे जे निर्णय आधीच्या पंतप्रधानांनी घेतले होते किंवा आधीच्या पंतप्रधानांच्या काळात झाले होते ते बदलण्याची तयारी पंतप्रधान नरसिंहराव यांनी दाखविली. इंदिरा गांधी आणि शेख अब्दुल्ला यांच्यात करार झाला त्यावेळी शेख अब्दुल्लांनी १९५३ मध्ये त्यांच्या अटके नंतर काश्मीरच्या स्वायत्ततेचा संकोच करणारे जेवढे निर्णय झालेत ते मागे घेण्याची आग्रही मागणी केली होती. आता घड्याळाचे काटे उलटे फिरवता येणार नाही म्हणत इंदिरा गांधीनी शेख अब्दुल्लांची मागणी फेटाळून लावली होती. पुन्हा तशीच मागणी शेख अब्दुल्लाचे पुत्र फारूक अब्दुल्ला यांनी नरसिंहराव यांचे पुढे ठेवली होती. बदलत्या परिस्थितीत नरसिंहराव यांनी केवळ घड्याळाचे कांटे उलटे फिरविण्याची तयारीच दाखविली नाही तर त्याहीपुढे जाण्याची तयारी दाखविली. काश्मीर बाबतचे भारतीय जनमत आणि सर्वपक्षीय मत याच्या विरोधात जाणारी ही बाब होती. काश्मिरी जनतेला पाहिजे ते देण्याची तयारी दर्शविताना त्यांनी एकच मर्यादा घातली होती. स्वतंत्र काश्मीर सोडून त्यांच्या इतर सर्व मागण्या पूर्ण करण्याची तयारी त्यांनी दाखविली. शेख अब्दुल्ला आणि फारूक अब्दुल्ला यांची मागणी १९५३ पर्यंत मागे जाण्याची होती. १९५२ चा नेहरू-शेख अब्दुल्ला करार त्यांना मान्य होता. नरसिंहराव जे बोलले त्याचा अर्थ घटना समितीत कलम ३७० मंजूर होवून लागू झाले त्यावेळची काश्मीरची जी घटनात्मक स्थिती होती ती स्थिती बहाल करण्याची त्यांची तयारी होती असा होतो. त्यांनी त्यावेळी आपल्या संबोधनात जे शब्द वापरले ते होते,"संपूर्ण स्वातंत्र्य वगळता स्वायत्ततेसाठी संपूर्ण आकाश मोकळे आहे ! स्काय इज द लिमिट' असा शब्द प्रयोग त्यांनी केला होता. 

शास्त्री काळापर्यंत जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्र्याला वजीर ए आजम आणि राज्यपालाला सदर ए रियासत हे नामाभिदान वापरण्यात येते. नेहरू-शेख अब्दुल्ला यांच्यात १९५२ साली झालेल्या करारात पदांच्या अशा नामकरनास मान्यता देण्यात आली होती. पदांचे हे नामकरण लालबहादूर शास्त्री पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी रद्द केले होते. शास्त्री काळातील तो निर्णय बदलावा अशी मागणी होत होती. नरसिंहराव यांनी ही मागणी तत्वश: मंजूर असल्याचे सांगितले. या मागणी संबंधी आणि स्वायत्तते संदर्भात जम्मू-काश्मीर विधानसभेने ठराव केले तर केंद्र सरकार त्याला मंजुरी देण्याबाबत सकारात्मक विचार करील असे आश्वासन त्यांनी काश्मिरी जनतेला दिले. विधानसभेने ठराव करायचे तर त्यासाठी निवडणुका होवून निर्वाचित सरकार स्थापन झाले पाहिजे असे म्हणत त्यांनी काश्मिरात निवडणुका घेण्याचा मुद्दा रेटला. सशस्त्र संघर्षाला पाठींबा न देता राजकीय पक्षांनी आणि जनतेने निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी या संबोधनातून केले होते. या आवाहनाच्या परिणामीच काश्मिरात निवडणूक प्रक्रियेला गती मिळाली व तब्बल ६ वर्षानंतर काश्मिरात निर्वाचित सरकार येण्याचा मार्ग प्रशस्त झाला. प्रत्यक्षात या निवडणुका नरसिंहराव पंतप्रधान असताना झाल्या नाहीत. देवेगौडा पंतप्रधान झाल्यानंतर या निवडणुका पार पडल्या. मात्र जम्मू-काश्मिरात निवडणुकांना गती देण्याचे, जनतेला व राजकीय पक्षांना निवडणुकीसाठी तयार करण्याचे जिकीरीचे काम नरसिंहराव यांनीच केले. एप्रिल-मे १९९६ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेसचा पराभव झाल्याने नरसिंहराव पुन्हा पंतप्रधान होवू शकले नाहीत. नरसिंहराव सत्तेत आले तेव्हा काश्मिरी जनतेचा मूड बॅलेट ऐवजी बुलेटचे समर्थन करण्याचा होता. नरसिंहराव यांनी पदावरून पायउतार होण्यापूर्वी काश्मिरातील बंदुकीचा आवाज कमी करण्यात आणि बुलेट ऐवजी बॅलेटचे समर्थन करण्यासाठी जनतेचे मन वळविण्यात मोठे यश मिळविले. अत्यंत विपरीत आणि कठीण परिस्थितीतून मार्ग काढत काश्मीर सुरक्षितपणे निर्वाचित लोकप्रतिनिधींच्या हातात जाईल अशी परिस्थिती निर्माण करणे हे नरसिंहराव यांचे यश अतुलनीय होते.

                                                           (क्रमशः)

-------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि.यवतमाळ 
मोबाईल : ९४२२१६८१५८ 


Wednesday, July 19, 2023

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - ६५

 काश्मीरमध्ये त्यावेळी निवडणुका घेण्यास कॉंग्रेस पक्ष अनुकूल नव्हता तसेच इतर पक्षही विरोधात होते. पण काश्मीरची परिस्थिती सुधारण्यासाठी आणि काश्मीर संदर्भात जगाचे भारताबद्दल अनुकूल मत तयार करण्यासाठी निवडणुका घेणे गरजेचे आहे यावर नरसिंहराव ठाम होते
-------------------------------------------------------------------------------------


देशासमोरील आर्थिक समस्या सोडविण्याला पंतप्रधान नरसिंहराव यांनी जेवढे प्राधान्य दिले होते तेवढेच प्राधान्य काश्मीरमध्ये सुरु असलेली हिंसा थांबवून सामान्य परिस्थिती निर्माण करणे यासाठीही होते. त्याकाळी हे दोन्ही प्रश्न एकमेकांशी निगडीत बनले होते. आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी व इतर संस्था आणि देशांचे सहकार्य गरजेचे होते. काश्मीर धगधगते राहिले असते तर सहकार्य मिळण्यात अडथळे आले असते. सैन्य बळावर आतंकवाद समाप्त करण्यासाठी प्रयत्न सुरु असतानाच ठप्प झालेले नागरी प्रशासन पुनर्जीवित करण्याचे समांतर प्रयत्न त्यांनी सुरु ठेवले होते. यासाठी स्थानिकांचे सहकार्य गरजेचे होते. हे सहकार्य मिळविण्यासाठी त्यांनी दोन पातळीवर प्रयत्न सुरु ठेवले होते. या प्रयत्नात आतंकवाद्यांनी शस्त्र खाली ठेवून नागरी प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी सहकार्य करावे आणि काश्मीरमधील नेत्यांनी आतंकवाद्यांना पाठींबा न देता काश्मीरमध्ये निवडणुका घेण्यासाठी सहभाग आणि सहकार्य द्यावे यावर त्यांनी भर दिला. हे प्रयत्न पुढे नेण्यासाठी खास काश्मीर मंत्रालय निर्माण केले आणि त्याची जबाबदारी तरुण तडफदार केंद्रीय गृहराज्यमंत्री राजेश पायलट यांचेवर सोपविली. काश्मीरच्या राज्यघटनेनुसार राज्यपालाला निर्णय घेण्याचे सर्वाधिकार असले तरी पायलट यांनी आपले समांतर अधिकार केंद्र निर्माण केले. राज्यपाल आणि पायलट यांच्यात संघर्ष होवू नये यासाठी राजेश पायलट यांचे इच्छेनुसार तिथले राज्यपालही बदलण्यात आले होते. कोणत्याही धार्मिक,सामाजिक, राजकीय व्यक्ती व नेत्यांशी चर्चा करायला पायलट नेहमी उपलब्ध असायचे.                                                                                           

हिंसा सोडून निवडणूक प्रक्रियेत सामील होण्यासाठी स्वत: नरसिंहराव दिल्लीत काश्मिरी नेत्यांची भेट घेत होते. सीतापती यांनी नरसिंहराव यांच्यावर लिहिलेल्या 'हाफ लायन' या पुस्तकात तर त्यांनी आतंकवादी म्होरक्यांच्या गुप्त भेटी घेतल्याचा उल्लेख आहे. कसेही करून नागरी प्रशासन काश्मिरात बळकट झाले पाहिजे आणि हे प्रशासन निवडून आलेल्या सरकारने चालविले पाहिजे यावर नरसिंहराव यांचा जोर होता. आतंकवादाने काश्मिरातील राजकीय पक्षांचे अस्तित्वच धोक्यात आले होते. कोणत्याही राजकीय पक्षाचे काम आणि कार्यालय सुरु नव्हते. राजकीय पक्षांना जिवंत करण्याचे आणि निवडणुकीसाठी तयार करण्याचे मोठे आव्हान नरसिंहराव यांचे पुढे होते. नरसिंहरावांचा कॉंग्रेस पक्ष देखील निवडणुकीसाठी तयार नव्हता. नरसिंहराव यांनी आपल्या मंत्रीमंडळातील काश्मीरचे सहकारी गुलाम नबी आजाद यांना काश्मीरमधील कॉंग्रेस पक्षाची जबाबदारी घेवून पक्षाला निवडणुकीसाठी तयार करण्याची जबाबदारी घेण्याची सूचना केली. पण आझाद यांनी केवळ जबादारी घेण्यासच नकार दिला नाही तर निवडणुकीसाठी योग्य वातावरण नसल्याने निवडणुका घेण्यास जाहीर विरोध केला. काश्मीरमध्ये त्यावेळी निवडणुका घेण्यास कॉंग्रेस पक्ष अनुकूल नव्हता तसेच इतर पक्षही विरोधात होते. पण काश्मीरची परिस्थिती सुधारण्यासाठी आणि काश्मीर संदर्भात जगाचे भारताबद्दल अनुकूल मत तयार करण्यासाठी निवडणुका घेणे गरजेचे आहे यावर नरसिंहराव ठाम होते. फार कमी लोक मतदान प्रक्रियेत सामील होतील असा इशारा नरसिंहराव यांना त्यांच्या सहकाऱ्यांनी दिला होता. निवडणुका न घेण्यापेक्षा कमी मतदान झाले तरी निवडणुका घेणे चांगले यावर नरसिंहराव ठाम होते. काश्मिरातील नेत्यांना निवडणुकीसाठी तयार करण्यासाठी आय बी आणि इतर गुप्तचर यंत्रणांनाही नरसिंहराव यांनी कामी लावले होते. या सगळ्या प्रयत्नानंतर नरसिंहराव यांच्या एक गोष्ट लक्षात आली की अब्दुल्लांची नॅशनल कॉन्फरन्स निवडणुकीसाठी तयार झाल्याशिवाय काश्मीरमध्ये निवडणुका घेणे अवघड आहे. नरसिंहराव यांनी फारूक अब्दुल्ला यांचेशी त्यांनी व त्यांच्या पक्षाने निवडणुकात सहभागी होण्यासाठी बोलणी सुरु केली. 

निवडणुकीत सहभागी होण्यासाठी फारूक अब्दुल्ला यांनी तीन अटी नरसिंहराव यांचे समोर ठेवल्या. निवडणुकीनंतर त्यांना मुख्यमंत्री करण्यात यावे. कलम ३७० ला धक्का लागणार नाही याबद्दल जाहीरपणे काश्मिरी जनतेला आश्वस्त करण्यात यावे आणि १९५३ साली शेख अब्दुल्ला यांना अटक झाली त्यावेळी कलम ३७० अंतर्गत अस्तित्वात असलेली स्वायत्तता काश्मीरला देण्यात यावी. फारूक अब्दुल्लाशी बोलणी सुरु होती तेव्हाच नरसिंहराव यांना परदेश दौऱ्यासाठी निघायचे होते. बोलणी अर्धवट सोडून आणि काश्मीर संबंधीची कागदपत्रे अभ्यासण्यासाठी सोबत घेवून नरसिंहराव परदेश दौऱ्यावर रवाना झाले होते. सुरुवातीला एका छोट्या आफ्रिकन देशाला भेट देवून ते अमेरिकेला जाणार होते. काश्मीर बाबत अमेरिकेने दबावतंत्र वापरू नये यासाठी तिथे जाण्यापूर्वी त्यांना काश्मीर संबंधीची पुढील दिशा स्पष्ट करायची होती. त्यावेळचे अमेरिकेचे काश्मीर विषयक मत व धोरण भारताच्या प्रतिकूल आणि पाकिस्तानचे समर्थन करणारे होते. अशा स्थितीत नरसिंहराव यांचे समोर दोन आव्हाने होती. निवडणुकीसाठी काश्मिरातील जनतेला व तिथल्या पक्षांना तयार करणे आणि या निवडणुकांवर अमेरिके सारख्या राष्ट्राने विश्वास ठेवून निवडणुकांचे स्वागत करणे. अमेरिकेची अनुकूल भूमिका राहील यासाठी त्यांनी एक महत्वाचे पाउल उचलले होते. त्यावेळी अमेरिका काश्मीर हा विवादित भाग असल्याचे जाहीरपणे सांगत असे. ही भूमिका सौम्य करण्यासाठी नरसिंहराव यांनी अमेरिकेच्या भारतातील राजदूताला काश्मिरात प्रत्यक्ष जावून , लोकांशी बोलून आपले मत बनवायला आणि आपल्या देशाला कळवायला प्रोत्साहित केले. विशेषत: तिथे निवडणूक घ्यायला अनुकूल परिस्थिती आहेकी नाही यासंबंधी चाचपणी करायची विनंती केली.                                           


नरसिंहराव यांच्या सांगण्यावरून अमेरिकेचे राजदूत काश्मिरात गेले त्यावेळी काश्मीरची जनता दहशतवादी कारवायांना कंटाळली होती. काश्मिरी दहशतवाद्यांचे नेतृत्व संपवून पाकिस्तानी आणि पाकिस्तान समर्थक दहशतवाद्यांनी सूत्रे आपल्या हाती घेतली होती. काश्मिरी जनतेच्या स्वातंत्र्याच्या कल्पनेच्या हे विपरीत होते. पाकिस्तान समर्थक दहशतवादी आणि भारतीय सुरक्षादलाला शरण आलेले दहशतवादी या दोघांचाही त्रास वाढला होता. यातून त्यांना सुटका हवी होती. यातून सुटण्याचा निवडणुका हा एक मार्ग समोर दिसत होता. नेमकी ही परिस्थिती अमेरिकन राजदूताने टिपली आणि काश्मिरी जनता दहशतवादाला कंटाळली असून आपले मत व्यक्त करण्यासाठी वेगळे माध्यम जनतेला हवे  असल्याचा निष्कर्ष अमेरिकेच्या राजदूताने अमेरिकेला कळवला. या अहवालाने अमेरिकेची भूमिका बरीच सौम्य बनली होती. अशावेळी अमेरिकेत पोचण्याआधी निवडणुकीचे सुतोवाच केले तर अमेरिकेत स्वागत होईल ही नरसिंहराव यांना खात्री वाटत होती. त्यामुळे अमेरिकेत पोचण्यापूर्वी फारूक अब्दुल्ला यांनी केलेल्या मागण्या संदर्भात काश्मिरी जनतेला उद्देशून जाहीरपणे बोलायचे होते.

                                                       (क्रमशः)
----------------------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि. यवतमाळ 
मोबाईल : ९४२२१६८१५८ 

Wednesday, July 12, 2023

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - ६४

नरसिंहराव यांच्या काळात दहशतवादाची तीव्रता कमी कमी होत जाण्यामागे जशी सुरक्षादलांची धडक कारवाई कारणीभूत होती तशीच दहशतवादी संघटनांचा आपसातील संघर्षही कारणीभूत होता. 
---------------------------------------------------------------------------------


काश्मीर बाबतीत जगभर प्रचार करून आपली बाजू खरी असल्याचे भासविण्याची संधी पाकिस्तान व अतिरेकी संघटनांना मिळाली त्याचे कारण होते जगभरातील माध्यमांच्या प्रतिनिधीना त्यावेळी काश्मिरात जावून वार्तांकन करण्याची बंदी होती. सरकारी प्रसार माध्यमांवर फारसा कोणाचा विश्वास उरला नव्हता. अशा परिस्थितीत ज्या बातम्या काश्मीर बाहेर झिरपायच्या त्यांना जगभरच्या प्रसार माध्यमात स्थान मिळायचे. बातम्यांच्या खरे - खोटेपणा बद्दल तपासणी करायची संधीच नव्हती. काश्मिरात काय चालले हे काश्मिरी जनतेला बीबीसी रेडीओवर कळायचे. पुष्कळदा बीबीसीला काश्मीरमधील बातम्यांसाठी पाकिस्तानी प्रतिनिधीवर अवलंबून राहण्याची पाळी यायची. या सगळ्या कारणांनी त्याकाळी काश्मीर संबंधी अर्धवट व अर्धसत्य बातम्या प्रसारित होत होत्या. पाकिस्तान सांगते ते खोटे आहे तर मग खरे काय हा प्रश्न जगभर विचारला जाणे स्वाभाविक होते. जे काही चालले ते जगाला दिसले पाहिजे हाच त्यावरचा उपाय होता. पुन्हा जिनेव्हात आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहण्याची पाळी येवू नये यासाठी नरसिंहराव यांनी झटपट निर्णय घेतलेत. विविध देशाच्या दूतावासातील राजकीय प्रतिनिधींनी किंवा कोणत्याही देशाने काश्मीरमधील परिस्थिती पाहण्यासाठी प्रतिनिधी पाठविला तर त्यांना काश्मिरात जावू देण्याचा निर्णय घेतला. तसेच परदेशी वार्ताहराना काश्मीरमध्ये जावून वार्तांकन करण्याची परवानगी देण्यात आली. या काळात काश्मीरमधील वृत्तपत्रांचे प्रकाशन जवळपास ठप्प झाले होते. ती सुरु करण्यासाठी नरसिंहराव यांनी पाउले उचलली. दहशतवाद्यांनी दिलेल्या बातम्या प्रकाशित केल्या तर राज्य प्रशासन बडगा उगारत होते आणि त्यांच्या बातम्या दिल्या नाही तर दहशतवादी धमकावत होते. प्रशासन आणि दहशतवादी यांच्या कात्रीत सापडलेल्या अनेक वृत्तपत्रांनी प्रकाशन बंद करण्याचा निर्णय घेतला होता. वृत्तपत्रे सरकारी अधिकृत बातम्या प्रकाशित करीत असतील तर दहशतवाद्यांच्या बातम्या देतात म्हणून त्यांचेवर कारवाई करू नये असे केंद्राच्या वतीने राज्यप्रशासनाला निर्देश देण्यात आलेत. त्यामुळे अनेक वृत्तपत्रांनी आपले प्रकाशन पुन्हा सुरु केले. याचा परिणाम असा झाला की स्थानिक वृत्तपत्रा सोबत राष्ट्रीय वृत्तपत्रे लोकांपर्यंत पोचू लागली. त्याआधी राष्ट्रीय वृत्तपत्रे विमानाने श्रीनगरला पोचत होती पण पुढे त्यांच्या वितरणात अडचणी येत होत्या त्या दूर झाल्या. ही सगळी पाउले उचलणे त्याकाळात मोठ्या धाडसाची होती. सुरुवातीला साचलेल्या प्रतिकूल बातम्या जगभर गेल्या पण नंतर दहशतवाद्यांची काळी बाजूही जगासमोर येवू लागल्याने मानवाधिकारा संदर्भात भारता विरुद्धच्या टीकेची धार बऱ्याच प्रमाणात कमी झाली. शिवाय काश्मिरी जनतेचे आणि जगाचे काश्मीर मधील बातम्यांसाठी पाकिस्तान व बीबीसीवर अवलंबून राहण्याचे प्रमाण कमी झाले.  स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अफवांचा बाजार बंद झाल्याने परिस्थिती सुधारण्यास मदत झाली. 

नरसिंहराव यांच्या काळात दहशतवादाची तीव्रता कमी कमी होत जाण्यामागे जशी सुरक्षादलांची धडक कारवाई कारणीभूत होती तशीच दहशतवादी संघटनांचा आपसातील संघर्ष कारणीभूत होता. १९९० चा काश्मिरातील संघर्ष जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंट या संघटनेच्या नेतृत्वाखाली सुरु झाला होता. प्रशिक्षण, शस्त्रास्त्रे आणि आर्थिक मदत पाकिस्तानची होती. जेकेएलएफचे नेतृत्व मात्र काश्मिरी होते. १९७० च्या दशकातील दहशतवादी कारवायातही या संघटनेची महत्वाची भूमिका होती पण पुढे नेतृत्व परिवर्तना सोबत संघटनेची भूमिकाही बदलत गेली.१९७० च्या दशकातील जेकेएलएफला तिथे राहणाऱ्या पंडितांसह व पाकव्याप्त काश्मीरसह स्वतंत्र आणि धर्मनिरपेक्ष काश्मीर
पाहिजे होते. काश्मीरच्या भारतात किंवा पाकिस्तानात विलय होण्याच्या विरोधात ही संघटना होती. त्यामुळे पाकिस्तानने त्यावेळी या संघटनेची मदत करणे थांबवून अनेकांना तुरुंगात देखील टाकले होते आणि या कारवाईने तेव्हा ती संघटना तुटली होती.  १९९० च्या दशकातील जेकेएलएफला इस्लामी काश्मीर हवा होता. जेकेएलएफच्या या भूमिकेमुळेच काश्मीरच्या राजकीय संघर्षाने धार्मिक वळण घेतले होते. जहाल धर्मवादाने काश्मिरातील सुफी परंपरेचा पराभव केला होता. १९९० मधील जेकेएलएफलाही पाकव्याप्त काश्मीरसह इस्लामी काश्मीर हवा असला तरी त्याचे पाकिस्तानात विलीनीकरण नको होते. हेच पाकिस्तानला नको होते. काश्मीरमध्ये जनतेला भारताविरुद्ध उभे करून बंडाळी माजविण्याचे इप्सित जेकेएलएफ कडून पूर्ण होताच १९७० च्या दशकाप्रमाणे जेकेएलएफला दिली जाणारी मदत थांबविली. यावेळी केवळ मदत थांबवून पाकिस्तान थांबला नाही तर त्या संघटनेला संपवून पाकिस्तानच्या पूर्ण नियंत्रणात असणाऱ्या व काश्मीरचे पाकिस्तानात विलीनीकरण करण्यासाठी तयार असणाऱ्या हिजबुल मुजाहदिन सारख्या संघटनांच्या हाती काश्मीरमधील कारवायाचे नेतृत्व राहील असे प्रयत्न सुरु केले.

पाकिस्तानच्या मदतीने हिजबुल मुजाहदिनने जेकेएलएफला स्वत: संपविण्याचा प्रयत्न तर केलाच शिवाय भारतीय सुरक्षादलाना जेकेएलएफच्या ठावठिकाण्याची आणि संभाव्य कारवायांची माहिती पुरवून जेकेएलएफ विस्कळीत करण्यात यश प्राप्त केले. जेकेएलएफचे बरेचसे सदस्य मारल्या गेलेत, यासीन मलिक सारख्या म्होरक्यासह  अनेकजण तुरुंगात गेलेत, काही हिजबुलमध्ये सामील झालेत तर अनेकांनी भारतीय सेनेपुढे शरणागती पत्करली. पाकिस्तानपासून मोह्भंग झालेल्या दहशतवादी नेत्यांना दहशतवाद सोडून निवडणूक प्रक्रियेत त्यांनी सामील व्हावे यासाठी नरसिंहराव यांनी प्रयत्न केलेत. जेकेएलएफच्या यासीन मलिकने १९९४ साली तुरुंगातून सुटका होताच स्वतंत्र काश्मीरसाठी सशस्त्र संघर्ष सोडून देत असल्याची घोषणा केली होती. त्याच्या प्रमाणे अनेकांनी दहशतवादी मार्ग सोडला. जे शरण आलेत त्यांचा उपयोग सुरक्षादलाने दहशतवाद संपविण्यासाठी केला. पाकिस्तानी व पाकिस्तानी समर्थक दहशतवाद्यांविरुद्ध लढायला भारतीय सुरक्षा दलाच्या आशीर्वादाने काश्मिरी दहशतवाद्यांचा जो समूह तयार झाला त्याचे नाव होते इखवान ए मुसलमीन. या इखवानचा नेता होता मोहम्मद युसुफ पर्रे जो कुका पर्रे या नावाने ओळखला जायचा. दहशतवाद्यान्विरुद्ध लढण्यासाठी काश्मीर पोलिसांनी जावेद अहमद शाह याच्या नेतृत्वाखालील दहशतवाद्यांना पाठबळ दिले होते. तो जावेद अहमद शाह इखवान मध्ये सामील झाला. शिवाय अनंतनाग जिल्ह्यात दहशतवादी कारवायात सामील लियाकत खान हाही इखवान मध्ये सामील झाला. सुरक्षादलाच्या संरक्षणात व पाठबळाने इखवानने अनेक पाकी दहशतवाद्यांना ठार केले. पण ज्यामुळे सुरक्षादलाची बदनामी झाली असती अशा गोष्टी सुरक्षादलाने इखवान कडून करून घेतल्याचा आरोप त्याकाळी झाला. पत्रकार आणि मानवाधिकार कार्यकर्त्याची हत्या अशी कामे इखवानकडून करून घेतल्याचा आरोप झाला. सुरक्षादलाशी सहकार्य करण्याच्या बदल्यात इखवानने सुरक्षादलाच्या संरक्षणात अनेक अनैतिक व बेकायदेशीर कामे करून दहशत निर्माण केली होती. भारतीय सुरक्षादल समर्थित इखवान सारखी दहशतवादी संघटना आणि पाकिस्तान समर्थित अनेक दहशतवादी संघटना यांच्या एकमेकाविरुद्धच्या कारवायात काश्मिरी जनता भरडली गेली. दहशतवादी स्वातंत्र्यासाठी लढतात यावरचा काश्मिरी जनतेचा विश्वास उडाला आणि निवडणुकांना जनतेच्या  असलेल्या विरोधाची तीव्रता कमी झाली. निवडणुकीतील फसवेगिरीच्या अनुभवाने सशस्त्र संघर्षाच्या समर्थनार्थ उतरलेली जनता हळू हळू निवडणुकीला अनुकूल बनू लागली. इखवान उल मुसलमीन मार्फत निवडणुकीला विरोध करणाऱ्या दहशतवादी संघटनांचे कंबरडे मोडण्यात सुरक्षादल यशस्वी झाले. दहशतवादाच्या या कालखंडात विस्कळीत आणि मोडकळीस आलेल्या राजकीय पक्षांना निवडणुकीसाठी तयार करण्याचे मोठे आव्हान नरसिंहराव यांचे समोर होते. त्यासाठी त्यांनी उचललेली पाउले धाडसी म्हणता येईल अशीच होती.

                                              (क्रमशः)

---------------------------------------------------------------------- 
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि. यवतमाळ 
मोबाईल - ९४२२१६८१५८ 


Thursday, July 6, 2023

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - ६३

 जिनेव्हात इराणची मदत भारतासाठी निर्णायक ठरली. इराणने प्रस्ताव सौम्य करण्यावर नाही तर पाठीमागे घेण्यावर जोर दिला. जे आपल्या बाजूने ठामपणे उभे राहतील असा पाकिस्तानचा विश्वास होता तेच देश वेगळी भूमिका घेत असल्याचे पाहून ठराव पारित होण्याचा पाकिस्तानचा विश्वास डळमळीत झाला. 
-----------------------------------------------------------------------------------------



काश्मीर मधील मानवाधिकार उल्लंघना बाबत भारताला दोषी ठरवून निंदा करणारा ठराव पारित होणार याची तत्कालीन पाकिस्तानी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांना खात्री वाटत असल्याने भारताची तिथे होणारी नाचक्की पाहायला मिळेल या आशेने प्रेक्षक कक्षात बसण्यासाठी त्या जिनेव्हात दाखल झाल्या होत्या. इतर देशाच्या प्रतिनिधी मंडळावर प्रभाव पडून आपल्या बाजूने वळविणे हा देखील त्यांचा हेतू होताच. याला तोड म्हणून नरसिंहराव यांनी त्यावेळचे अर्थमंत्री मनमोहनसिंग यांना प्रेक्षक कक्षात चर्चेच्या वेळी हजर राहण्यासाठी पाठविले. मनमोहनसिंग यांचा संयुक्त राष्ट्राशी जुना संबंध होता आणि नरसिंहराव सरकारात अर्थमंत्री म्हणून आर्थिक सुधारणा राबविण्यात त्यांनी महत्वाची भूमिका निभावल्याने जागतिक पातळीवर त्यांचे नाव चर्चेत होते. त्याचा लाभ उठविण्यासाठी नरसिंहराव यांनी मनमोहनसिंग यांना जिनेव्हाला पाठविले. 'नहले पे दहला' म्हणता येईल अशा प्रकारची ही खेळी होती. आणि तसेही काश्मीर प्रश्नावर येणारे प्रस्ताव, सूचना या बाबतीत मनमोहनसिंग यांच्या मताला नरसिंहराव महत्व देत आले होते. मनमोहनसिंग राजकीय व्यक्ती म्हणून नाही तर अर्थशास्त्री म्हणून मंत्रीमंडळात होते. काश्मिरी नेत्यांशी चर्चा करण्यासाठी असा बिगर राजकीय चेहरा उपयोगी पडू शकतो असा नरसिंहराव यांचा होरा होता. मनमोहनसिंग यांना बेनझीर भुट्टोना शह देण्यासाठी जिनेव्हाला पाठवण्याच्या निर्णयाचे भारतात अनेकांना आश्चर्य वाटले पण तो काश्मीर संबंधी नरसिंह नीतीचा भाग होता. जिनेव्हात इस्लामी सहकार्य संघटनेचा भारता विरुद्धचा प्रस्ताव ८ मार्च १९९४ ला चर्चेला घेतला गेला. तत्पूर्वी विदेश राज्यमंत्री खुर्शीद अहमद यांनी युरोपियनच्या सदस्यांची भेट घेवून त्यांच्या प्रतिनिधींच्या काश्मिरात भेटीवर आधारित अहवालावर चर्चा करून काही स्पष्टीकरणे दिलीत. त्यामुळे युरोपियन युनियनचा काश्मीर बाबतच्या भारतीय धोरणाला असलेला तीव्र विरोध सौम्य व्हायला मदत झाली.                                                                                                                                             

ठराव चर्चेला यायच्या आधीच पाकिस्तानला एका पाठोपाठ एक असे धक्के बसायला सुरुवात झाली होती. आहे त्या स्वरुपात प्रस्तावाला साथ देवू शकत नाही म्हणत इंडोनेशिया आणि लिबिया बाजूला झाले. प्रतिनिधी मंडळाचे सदस्य व त्यावेळचे परराष्ट्र राज्यमंत्री सलमान खुर्शीद यांनी पाकिस्तानी प्रस्तावाला सात पानी जोरदार उत्तर दिले. त्यात पाकिस्तानच्या काश्मिरातील कारवायांवर प्रकाश टाकला. ठराव पारित झाला तर पाकिस्तान प्रेरित दहशतवाद्यांना बळ मिळून परिस्थिती सुधारण्या ऐवजी अधिक चिघळेल हे त्यांनी प्रभावीपणे मांडल्याने आधी प्रस्तावाचे समर्थक असलेले अनेक देश पुनर्विचार करू लागले. प्रत्युत्तरात पाकिस्तानच्या प्रतिनिधींनी जर्मनीत नाझी सैनिकांनी केलेल्या अत्याचारापेक्षा जास्त अत्याचार भारतीय सुरक्षादलांनी काश्मिरात केल्याचा आरोप केला. भारताकडून काश्मिरात मानवाधिकाराचे उल्लंघन होत आहे असे मानणाऱ्या देशानाही पाकिस्तानने भारतीय सुरक्षादलाची नाझी सैनिकाशी केलेली तुलना फारशी रुचली नव्हती. इस्लामिक सहकार्य संघटनेने मांडलेला प्रस्ताव सौम्य केली पाहिजे इतपत वातावरण निर्मिती करण्यात भारताला यश मिळाले होते. पण प्रस्ताव सौम्य झाला तर काठावर असलेले देश तटस्थ राहण्या ऐवजी ठरावाच्या बाजूने मतदान करतील ही भीती होती. पाकिस्तानने प्रस्ताव सौम्य न करण्याचा निर्णय भारताच्या पथ्यावरच पडला. फारूक अब्दुल्ला यांनीही भारताच्या बाजूने वातावरण निर्मिती करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. स्वत:ला काश्मिरी म्हणवून घेणाऱ्या पाकिस्तानी शिष्टमंडळातील सदस्यांशी काश्मिरी भाषेत बोलून त्यांना काश्मिरी येत नसल्याची पोलखोल भारतीय प्रतिनिधी मंडळाचे सदस्य डॉ. फारूक अब्दुल्ला यांनी केली. फारूक अब्दुल्ला यांनी अधिवेशनात बोलताना काश्मीर संदर्भातील आम्ही आमचे प्रश्न लवकर सोडवू. त्यानंतर गोल्फचा आनंद घेण्यासाठी तुम्ही सगळे या असे बोलून पाकिस्तान मांडतो तितकी वाईट परिस्थिती काश्मिरात नसल्याचे पटवून देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. 


चर्चा सुरु झाल्याच्या दुसऱ्या दिवशी काश्मीर विषयक ठरावावर चर्चा सुरु झाली तेव्हा इराणची भारताला खूप मदत झाली. इराणने प्रस्तावावर मतदानाची घाई न करता आपसात विचारविनिमय करण्याची संधी देण्याची मागणी केली. इराणची विनंती मान्य करण्यात आली. दरम्यान चीन विषयक एक प्रस्ताव मतदानाला आला तेव्हा भारताने चीनच्या बाजूने मतदान करून काश्मीर प्रस्तावावर चीन पाकिस्तानच्या बाजूने उभा राहणार नाही याची तजवीज केली. इराणने प्रस्ताव सौम्य करण्यावर नाही तर पाठीमागे घेण्यावर जोर दिला. इराणचे न ऐकता प्रस्ताव मांडला तर इराण प्रस्तावाच्या बाजूने मतदान करणार नाही याची पाकिस्तानला कल्पना आली. चीन देखील प्रस्तावाचे समर्थन करणार नाही हे स्पष्ट झाले होते. जे आपल्या बाजूने ठामपणे उभे राहतील असा पाकिस्तानचा विश्वास होता तेच देश वेगळी भूमिका घेत असल्याचे पाहून ठराव पारित होण्याचा पाकिस्तानचा विश्वास डळमळीत झाला. दरम्यान भारताने ठराव मांडणाऱ्या इस्लामिक सहकार्य संघटनेच्या देशांना व इतरही देशांना काश्मिरात येवून परिस्थिती पाहण्यासाठी भारताने परवानगी द्यावी अशी विनंती प्रस्तावावर भारत - पाकिस्तान यांच्यात मध्यस्थी करणाऱ्या इराणने भारताला केली. इराणची विनंती भारताने तात्काळ मान्य केली. इस्लामिक सहकार्य संघटनेच्या प्रस्तावात युनोच्या देखरेखीखाली आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींनी काश्मिरात जावून परिस्थिती पाहावी हा प्रमुख मुद्दा होता. कोणत्याही देशाच्या प्रतिनिधीला काश्मिरात येवून परिस्थिती पाहता येईल हे भारताने मान्य केल्याने  पाकिस्तान प्रेरित प्रस्तावातील हवाच निघून गेली आणि प्रस्ताव मागे घेण्याला मान्यता देण्याशिवाय पाकिस्तानपुढे पर्याय उरला नाही. प्रस्ताव मागे घेतल्याची अधिकृत घोषणा  करण्यात आली. भारताने युद्धात पाकिस्तानवर निर्णायक विजय मिळविलेत पण मुत्सद्देगिरीत निर्णायक विजय मिळविल्याची ही पहिली घटना मानली जाते. पंतप्रधान नरसिंहराव यांच्या मुत्सद्देगिरीचा हा मोठा विजय होता. नरसिंहरावाना चाणक्य म्हंटल्या जावू लागले ते तेव्हापासूनच ! वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली जिनेव्हा येथे गेलेल्या प्रतिनिधी मंडळाचे मायदेशी जोरदार स्वागत झाले. मात्र वाजपेयी यांनी जिनेव्हा विजयाने हुरळून न जाण्याचा सल्ला दिला. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताची एकी दिसली असली तरी काश्मीर बाबतच्या सरकारी भूमिकेशी आपल्या पक्षाचे मतभेद कायम असल्याचा पुनरुच्चार केला. आणखी एक महत्वाचा इशारा त्यांनी दिला. आम्ही आमच्या चुका दुरुस्त करण्याची गरज आहे. असे केले नाही तर दर महिन्याला जिनेव्हात भारताविरुद्ध प्रस्ताव येत राहील आणि भारता सारख्या देशाला मानवाधिकाराच्या मुद्द्यावर आमच्या बाजूने मत द्या अशी भिक मागण्याची पाळी येत राहील. नरसिंहराव सरकारनेही मानवाधिकाराच्या मुद्द्यावर जगाला उत्तर देण्याचा प्रसंग पुन्हा ओढवू नये यासाठी अनेक पाउले उचलली.
---------------------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि. यवतमाळ 
मोबाईल : ९४२२१६८१५८