Friday, November 24, 2023

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - ८१

 घटनेत बदल किंवा सीमारेषेत बदल हा काश्मीर प्रश्न सोडविण्याचा मार्ग नसल्याची मनमोहनसिंग यांची ठाम भूमिका होती. काश्मीर प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी फार पुढे जाता आले नाही तरी तिथे शांतता नांदण्यावर आणि भारत-पाकिस्तान संबंधातील तणाव कमी करण्यावर त्यांचा भर होता.
--------------------------------------------------------------------------------------


पाकिस्तान बरोबरच्या बॅंक चॅनेल चर्चेसाठी मनमोहनसिंग यांनी जसा प्रतिनिधी नेमला तसा काश्मिरी नेते व जनता यांच्याशी चर्चा करण्यासाठी वेगळा प्रतिनिधी  नेमला नाही. या चर्चेची सूत्रे त्यांनी आपल्या हातात ठेवली. नरसिंहराव मंत्रीमंडळात अर्थमंत्री असल्यापासून काश्मीर प्रश्नाशी त्यांचा संबंध आला होता. त्यानंतर अटलबिहारी यांच्या कार्यकाळात काश्मीर विषयक भूमिका ठरविण्याची जबाबदारी कॉंग्रेस पक्षाने त्यांच्यावरच सोपविली होती. याकाळात पीडीपी व कॉंग्रेस यांच्या युतीतून बनलेल्या काश्मीर सरकारचे ते शिल्पकार होते. काश्मीर प्रश्नाशी त्यांच्या आलेल्या संबंधाने परिस्थिती सुधारण्यासाठी नेमके काय केले पाहिजे याबाबत ते स्पष्ट होते. पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष मुशर्रफ यांनी 'चिनाब फॉर्म्युला' पुढे आणला होता. चिनाब नदी ही नवी सीमारेषा ठरवून काश्मीर प्रश्न सोडवावा असे त्यांनी सुचविले होते. पण  घटनेत बदल किंवा सीमारेषेत बदल हा काश्मीर प्रश्न सोडविण्याचा मार्ग नसल्याची मनमोहनसिंग यांची ठाम भूमिका होती. काश्मीर प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी फार पुढे जाता आले नाही तरी तिथे शांतता नांदण्यावर आणि भारत-पाकिस्तान संबंधातील तणाव कमी करण्यावर त्यांचा भर होता.  काश्मीरला विभागणारी नियंत्रण रेषा तणावाचे कारण न बनता शांतता व सौहार्दाचे प्रतिक बनली पाहिजे यावर त्यांचा जोर होता. त्यामुळे काश्मीरच्या दोन्ही भागात लोकांना सहज येता जाता येईल व त्यांच्यात व्यापार सुरु होईल यावर त्यांचा भर होता. नया जम्मू-काश्मीर - लडाख हे त्यांचे घोष वाक्य होते. नव्या काश्मीरच्या निर्मितीसाठी संवाद आणि विकास ही त्यांची द्विसूत्री होती. हिंसकं कारवाया सोडून जे बोलायला पुढे येतील त्यांच्याशी संवाद साधण्याची मनमोहनसिंग यांची तयारी होती. नव्या काश्मीरसाठी नव्याने सुरुवात करण्याचे आवाहन त्यांनी सत्ता हाती घेतल्यानंतर २००४ साली काश्मीरला दिलेल्या पहिल्या भेटीत तेथील जनतेला केले. 

डॉ.मनमोहनसिंग यांनी २००४ साली जम्मू-काश्मीर राज्यासाठी विकासनिधी जाहीर करताना आणखी एक घोषणा केली होती. राज्यात आतंकवादी घटना कमी झाल्याने राज्यातील सुरक्षादलाच्या संख्येत घट करण्याचे त्यांनी जाहीर केले. मात्र आतंकवादी घटनात वाढ झाली तर संख्या पुन्हा वाढविण्यात येईल हे त्यांनी स्पष्ट केले. २००० साली जनरल सुंदरराजन पद्मनाभन भारताचे लष्कर प्रमुख झाल्यावर त्यांनी सैन्याने जम्मू-काश्मिरातील आतंकवाद जवळपास संपुष्टात आणल्याने नागरी भागातून सैन्य कमी केले पाहिजे अशी सूचना केली होती. जम्मू-काश्मीर पोलिसांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळली पाहिजे असे त्यांनी मत व्यक्त केले होते. अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारने त्यांच्या सूचनेकडे दुर्लक्ष केले होते. उलट त्यांना सांगण्यात आले की सैन्य मागे घेण्याचा निर्णय राजकीय असेल व अशा निर्णयाच्या बाबतीत सेना प्रमुखांनी न बोललेले बरे. जनरल पद्मनाभन २००२ साली पदावरून निवृत्त झाले होते. सत्तेत आल्यावर मनमोहनसिंग यांनी त्यांच्या सुचनेची अंशत: का होईना अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला . सतत लष्कराच्या छायेत वावरणाऱ्या जनतेलाही या निर्णयाने दिलासा मिळाला व चर्चेसाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले. काश्मिरातील राजकीय-सामाजिक प्रतिनिधींशी चर्चा करण्यासाठी मनमोहनसिंग यांनी श्रीनगरमध्ये गोलमेज परिषद घेतली. २५ फेब्रुवारी २००६ रोजी पार पडलेल्या या परिषदेत प्रतिनिधींनी केलेल्या मागणीला प्रतिसाद देताना ज्यांच्यावर हिंसाचाराचे गंभीर गुन्हे नाहीत त्यांच्या प्रकरणाची समीक्षा करून त्यांना तुरुंगातून मुक्त करण्यासाठी एक समिती नेमण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. ही गोलमेज परिषद म्हणजे काश्मीरमध्ये शांतता आणि समृद्धीची सुरुवात असल्याचे त्यांनी सांगितले. हुरियत कॉन्फरन्सने मात्र मनमोहनसिंग यांनी बोलावलेल्या या गोलमेज परिषदेवर बहिष्कार टाकला होता. २५ मे २००६ रोजी सिंग यांनी बोलावलेल्या दुसऱ्या गोलमेज परिषदेवरही हुरियत कॉन्फरन्सने बहिष्कार टाकला. मात्र पहिल्या आणि दुसऱ्या गोलमेज परिषदे दरम्यान सरकारची हुरियत नेत्यांशी अनौपचारिक चर्चा झाली होती. या चर्चेत काश्मीर संबंधी पुढे कसे जाता येईल या संबंधीचे आपले प्रस्ताव सरकार समोर ठेवण्याची तयारी हुरियतने दाखविल्याची माहिती पंतप्रधानांनी या परिषदेत देवून आपले जे काही प्रस्ताव आहेत ते गोलमेज परिषदेत सहभागी होवून सादर करावेत असे हुरियतला आवाहन केले. गंभीर आरोप नसलेल्या आरोपींची तुरुंगातून मुक्तता करण्याच्या प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी पंतप्रधान कार्यालयात एक कक्ष उघडण्याची घोषणा मनमोहनसिंग यांनी दुसऱ्या गोलमेज परिषदेत केली.

कॉंग्रेस-पीडीपी यांच्यात संयुक्त सरकार स्थापन करण्यासाठी झालेल्या करारानुसार पहिले ३ वर्षे मुख्यमंत्री राहिल्यावर पीडीपी प्रमुख मुफ्ती मोहम्मद सईद यांनी राजीनामा देवून कॉंग्रेसचा मुख्यमंत्री होण्यासाठी वाट करून दिली होती. कॉंग्रेसने गुलाम नबी आझाद यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपविले होते. मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाल्यावर मुफ्ती मोहम्मद सईद यांनी नागरी भागातून लष्कर काढून घेण्यासाठी मनमोहनसिंग सरकारवर दबाव वाढविला. सुरक्षेशी कोणतीही तडजोड न करता सुरक्षादलाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलविता येईल का याचा विचार करण्यासाठी ३० मार्च २००७ साली एक पॅनेल नेमण्यात आले. तर दुसरे पॅनेल सशस्त्र दल विशेष शक्ती कायदा (आफसा) काही भागातून मागे घेता येईल का याचा विचार करण्यासाठी स्थापन करण्यात आले. २४ मार्च २००७ रोजी झालेल्या तिसऱ्या गोलमेज परिषदेत पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी काश्मीरमधील सैन्य स्थिती व सुरक्षे विषयीच्या मुद्द्यांची चर्चा केली. आतंकवादी हल्ल्यांची सतत आशंका असल्याने सुरक्षा बंदोबस्त ठेवणे गरजेचे बनले आहे. मात्र याचा सर्वसामान्य नागरिकांना आपले दैनंदिन व्यवहार पार पाडण्यात त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचे आश्वासन पंतप्रधानांनी दिले. सुरक्षा दलाकडून मानवी हक्काचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेतली जाईल असेही त्यांनी परिषदेत सांगितले. दहशतवाद्यांच्या अमानवीय कृत्यांवर परिषदेत त्यांनी टीका केली. तिसरी गोलमेज परिषद सुरक्षा विषयक स्थिती आणि मानवी अधिकाराचे उल्लंघन यावर केंद्रित होती. गोलमेज परिषदांचा हा इतिहास लक्षात घेतला तर २००४ साली सत्तेत आल्यानंतर मनमोहनसिंग सतत काश्मिरी जनतेशी संवाद साधण्याचा, त्यांना चांगल्या भविष्याकडे नेण्याचा प्रयत्न करीत होते हे लक्षात येते. त्यांच्या या प्रयत्नात पहिला अडथळा आला तो २००८ साली. जम्मू-काश्मिरात कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारने २६ मे २००८ रोजी अमरनाथ  न्यासाला १०० एकर जंगल जमीन देण्याचा निर्णय घेतला. या निर्णया विरोधात काश्मीरमध्ये मोठे आंदोलन उभे राहिले. अमरनाथ यात्रेकरूंसाठी सुविधा निर्माण करण्याला काश्मिरी जनतेचा विरोध नव्हता. जमिनीची मालकी न्यासाला सोपविण्याला त्यांचा विरोध होता. अशी मालकी सोपविली तर तिथे लोकांना वसविले जाईल व मुस्लीम बहुल काश्मीरच्या लोकसंख्येत बदल करण्याचा प्रयत्न होईल हा मुख्य आक्षेप होता. त्यामुळे या निर्णया विरोधात काश्मिरी जनता रस्त्यावर उतरली. काश्मिरी जनतेच्या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून हिंदुबहुल जम्मूची जनताही रस्त्यावर उतरली. मनमोहन सरकारला चार वर्षे काश्मीरमध्ये शांतता ठेवण्यात यश आले होते. पण या निर्णयाने पुन्हा एकदा जम्मू-काश्मीर अशांत क्षेत्र बनले.

                                                                               (क्रमशः)

------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि.यवतमाळ 
मोबाईल : ९४२२१६८१५८ 

Thursday, November 16, 2023

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - ८०

 मनमोहनसिंग यांनी काश्मीरच्या स्वायत्तते संदर्भात नरसिंहराव यांनी केली तशी 'स्काय इज द लिमीट' सारखी घोषणा केली नाही की अटलबिहारी वाजपेयी सारखी संविधानापलीकडे मानवीयता, लोकतंत्र आणि काश्मिरियत अशी काश्मीर प्रश्न सोडविण्याच्या त्रिसूत्री सारखे एखादे सुत्र सांगितले नाही. आजच्या परिस्थितीत काश्मीर प्रश्नावर आपण कितपत पुढे जावू शकतो याचा विचार करून त्यांनी पुढची दिशा सांगितली. 
--------------------------------------------------------------------------------------------


अटलबिहारी वाजपेयी यांचे काश्मीर विषयक धोरण पुढे नेत असतानांच डॉ. मनमोहनसिंग यांनी त्याला आपल्या भूमिकेची जोड दिली. मनमोहनसिंग अर्थशास्त्री असल्याने काश्मीर समस्येच्या निराकरणासाठी आर्थिक अंगाने त्यांनी विचार केला. १९९० च्या दशकात काश्मीर दहशतवादाने ग्रस्त राहिल्याने विकासकामे जवळपास ठप्प झाली होती. त्याचा रोजगाराच्या उपलब्धतेवरही विपरीत परिणाम झाला. १९९०च्य दशकात दहशतवादी टोळ्यात सामील होणे हाच एक रोजगार सुलभ होता. मनमोहनसिंग यांनी सत्तेत येताच काश्मीरसाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर केले होते ज्यात मोठ्या प्रकल्पांसह शिक्षण, आरोग्य, वीज आणि पानी पुरवठा या सारख्या बाबींना प्राधान्य देण्यात आले होते. पर्यटनाला प्रोत्साहन मिळावे रस्ते आणि रेल्वे यावर भर देण्यात आला होता. २००४ साली जाहीर केलेल्या या योजनांवर ३७००० कोटी खर्च करण्यात आले. केवळ विविध प्रकल्पच सुरु करण्यात आले नाही तर त्या प्रकल्पात काम मिळण्यासाठी लागणारे कौशल्य विकसित करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले होते. मनमोहनसिंग यांनी विदेशात उच्चशिक्षण घेतले ते केवळ शिष्यवृत्तीच्या बळावर. त्यामुळे शिष्यवृत्तीचे महत्व ते जाणून होते. काश्मीरमध्ये शिक्षणाचा विस्तार आणि कौशल्य विकास यासाठी आर्थिक विषयावर पंतप्रधानांना सल्ला देणाऱ्या समितीचे अध्यक्ष सी.रंगराजन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती. समितीने २१०० कोटी रुपये खर्चाची शिष्यवृत्ती योजना काश्मीरच्या युवकांसाठी तयार केली ज्याला मनमोहनसिंग यांनी मंजुरी दिली. त्यामुळे काश्मीरमधील प्रकल्पात काश्मीरमधील युवकांना काम मिळण्याचा मार्ग प्रशस्त झाला. मनमोहन काळातील वेगवान आर्थिक घडामोडीमुळे काश्मिरातील युवक व जनता दहशतवादाकडे वळण्या ऐवजी विकास कामात सहभागी झाली. ९०च्या दशकातील दहशतवादाने पोळलेल्या जनतेला मनमोहनसिंग यांचा विकासमार्ग भावल्याने काश्मिरातील मोठ्या दहशतवादी घटनात बरीच  घट झाली होती.                                               

२००८ ते २०१० या काळात काश्मीरमध्ये जनतेची मोठी आंदोलने झालीत व आंदोलकांवर गोळीबाराच्या मोठ्या घटनाही घडल्यात. सुरक्षादलाच्या  गोळीबारात एकाच दिवशी सर्वाधिक मृत्यू होण्याची घटना मनमोहनसिंग यांच्या काळातच घडली होती. मनमोहन काळात मुंबईत घडली तशी भयावह दहशतवादी घटना काश्मिरात घडली नाही हे खरे पण दहशतवादी गटाशी चकमकी होतच होत्या. भारतीय जनता पक्षाचा व पंतप्रधान मोदींचा मनमोहन काळात दहशतवादा बद्दल मऊ धोरणाचा आरोप आकड्याच्या आधारावर टिकणारा नाही. मनमोहन काळात ४०००च्या वर दहशतवादी मारले गेले. अटलबिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदी यांच्या काळात मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांपेक्षा ही संख्या मोठी आहे. असे असले तरी मनमोहनसिंग यांचा काळ काश्मीरच्या आर्थिक विकासासाठी सुवर्णकाळ मानला जातो. या काळात वीज निर्मिती आणि वितरण वाढले. गांवागांवात वीज पोचली. रस्त्यांची कामे झालीत. रेल्वेच्या कामांना वेग येवून सर्व मोसमात चालेल अशी रेल्वेही सुरु झाली. पर्यटन उद्योगाला चांगले दिवस आले. पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी २००४ मध्ये जे पॅकेज घोषित केले होते ते २४००० कोटीचे होते. पुढे किंमती वाढल्याने ते ३७००० कोटीचे झाले. यात ६७ कामे निश्चित करण्यात आली होती आणि त्यातील बहुतेक कामे पूर्णही झालीत. या ६७ कामातील एक काम होते जम्मू मध्ये राहण्याची नीट सोय नसणाऱ्या निर्वासित काश्मिरी पंडितांसाठी पक्के बांधकाम.  मनमोहनसिंग काश्मीरला सर्वाधिक वेळा भेट देणारे पंतप्रधान होते तरी पूर्ण झालेल्या प्रकल्पांच्या उद्घाटनासाठी त्यांना वेळ मिळाला नाही. कदाचित काम पूर्ण होणे महत्वाचे ,उद्घाटन महत्वाचे नाही या धारणेतूनही त्यांनी उदघाटनाकडे दुर्लक्ष केले असेल. त्यांच्या काळात पूर्ण झालेले पण त्यांनी उदघाटन न केलेले महत्वाचे प्रकल्प होते कटरा लिंक प्रोजेक्ट,उरी-२ वीज प्रकल्प, श्रीनगर - लेह ट्रान्समिशन लाईन, निमो - बाझगो प्रकल्प. पुढे मनमोहन काळात पूर्ण झालेल्या काही प्रकल्पांचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. मनमोहन काळातील काश्मिरात घडलेल्या आर्थिक घडामोडीने भारतापासून काश्मीरला वेगळे करू पाहणाऱ्या शक्ती अस्वस्थ झाल्या होत्या. २०१३ साली रेल्वेच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान जेव्हा काश्मीरमध्ये गेले होते तेव्हा विभाजनवाद्यांनी त्यांचे स्वागत काश्मीर बंद करून केले. हा बंद पुकारण्यात हुरियतचे दोन्ही गट आणि जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचा पुढाकार होता. त्यांचे म्हणणे होते की पंतप्रधान मनमोहनसिंग काश्मीरमध्ये येतात ते एखाद्या विकासकामाच्या उदघाटनासाठी किंवा विकासकामाचा प्रारंभ करण्यासाठी. काश्मीर प्रश्नाची राजकीय उकल करण्यासाठी पंतप्रधान पुढाकार घेत नसल्याची या फुटीरतावादी गटांची तक्रार होती. त्यासाठी त्यांनी बंद पुकारला होता. फुटीरतावादी गटांच्या तक्रारीत फारसे तथ्य नव्हते.                                                         

पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी काश्मीरच्या आर्थिक विकासाकडे जेवढे लक्ष दिले तेवढेच लक्ष काश्मीर प्रश्नावर राजकीय तोडगा काढण्याकडेही दिले होते. फरक एवढाच होता की तोडगा काढण्याचा प्रयत्न ते पुढच्या दाराने करण्यापेक्षा मागच्या दाराने करीत होते ज्याला बॅंक डोअर  बॅंक चॅनेल डीप्लोमसी म्हणतात. नरसिंहराव पासून ते मोदी पर्यंत सर्व पंतप्रधानांनी पाकिस्तान सोबत चर्चेसाठी हा मार्ग अवलंबिला आहे. कारण भारतीय जनमत हे पाकिस्तान सोबत चर्चा करणाऱ्या सरकारला कमजोर समजते ! भारतीय जनतेच्या माहितीपासून व नजरेपासून दूर भारत-पाकिस्तान प्रतिनिधींच्या बैठका होत असतात. अशा बैठकांचे दुसरे कारण हे आहे की दोन्ही देशाच्या काश्मीरबाबत घोषित भूमिकेच्या विपरीत चर्चा करणे दोन्ही देशातील जनतेला रुचत नाही आणि पटत नाही. अशा प्रकारच्या चर्चा अनधिकृत असल्या तरी अधिकृत चर्चेत घ्यायच्या निर्णयासाठी या चर्चांची उपयुक्तता वादातीत आहे. अशा अनधिकृत व अनौपचारिक  चर्चांसाठी नियुक्त प्रतिनिधी मात्र अधिकृतपणे नियुक्त केलेले असतात ! अशा चर्चेसाठी जो अजेंडा असतो तो उच्च पातळीवर अधिकृतपणे तयार केलेला असतो. त्या त्या वेळच्या राष्ट्रप्रमुखाचा कल लक्षात घेवूनच या चर्चा होतात. मनमोहनसिंग यांनी काश्मीरच्या स्वायत्तते संदर्भात नरसिंहराव यांनी केली तशी 'स्काय इज द लिमीट' सारखी घोषणा केली नाही की अटलबिहारी वाजपेयी सारखी संविधानापलीकडे मानवीयता, लोकतंत्र आणि काश्मिरियत अशी काश्मीर प्रश्न सोडविण्याच्या त्रिसूत्री सारखे एखादे सुत्र सांगितले नाही. आजच्या परिस्थितीत काश्मीर प्रश्नावर आपण कितपत पुढे जावू शकतो याचा विचार करून त्यांनी पुढची दिशा सांगितली. काश्मीरला विभाजित करणारी रेषा आपण बदलू शकत नाही याचे भान ठेवून त्यांनी मार्ग सांगितला. नियंत्रण रेषा राहणार आहे पण ती कागदावर राहील यासाठी प्रयत्न करता येतील. व्यवहारा मध्ये काश्मीरच्या दोन्ही भागातील लोक एकमेकांकडे जावू येवू शकतील. आपसात व्यापार करू शकतील. व्यापार वाढवू शकतील. सांस्कृतिक देवाणघेवाण होवू शकेल. असे झाले तर आज नियंत्रण रेषेवर भारत-पाकिस्तानात जो तणाव आहे तो संपुष्टात येईल. असे होणे शक्य आहे मात्र त्यासाठी पाकिस्तानने आतंकवाद व आतंकवाद्यांना आश्रय देणे थांबविले तरच. यामुळे दोन्ही देशांना हवा तसा काश्मीर प्रश्न सुटणार नाही पण दोन्ही देशात काश्मीरवरून असलेला तणाव व शत्रुता कमी होईल अशी मनमोहनसिंग यांची धारणा होती. या दृष्टीने पाकिस्तान सोबत अनौपचारिक चर्चा करण्यासाठी त्यांनी आपले प्रतिनिधी म्हणून सतिंदर लांबा या मुत्सद्याची निवड केली होती. 

                                             (क्रमशः)

----------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि. यवतमाळ 
मोबाईल : ९४२२१६८१५८ 

Thursday, November 2, 2023

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - ७९

मनमोहनसिंग यांचा  नरसिंहराव काळापासून काश्मीर प्रश्नाशी त्यांचा संबंध आल्याने काय करण्याची गरज आहे याबाबत त्यांची स्पष्ट अशी भूमिका होती. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील नियंत्रण रेषेत फेरफार किंवा बदल शक्य नाही पण काश्मिरी जनतेला विभागणारी सीमारेषा बदलता येत नसली तरी ती निष्प्रभ ठरवता येईल असा त्यांचा विश्वास होता. सीमेवरून दळणवळण आणि व्यापार वाढला तर सीमा आपोआप पुसट होईल असे त्यांना वाटत होते.
---------------------------------------------------------------------------------------


 सर्वाधिक वेळा काश्मीरचा दौरा करणारे पंतप्रधान म्हणून मनमोहनसिंग यांची नोंद घ्यावी लागेल. आपल्या १० वर्षाच्या कारकिर्दीत मनमोहनसिंग यांनी तब्बल १६ वेळा काश्मीरला भेट दिली. या भेटी प्रामुख्याने विकास योजनांचा प्रारंभ करण्यासाठी किंवा काश्मीरमध्ये चिरकाल शांतता टिकावी यासाठी विविध पक्षाशी आणि गटांशी चर्चा करण्यासाठी आयोजिलेल्या असायच्या. पंतप्रधानाच्या एवढ्या भेटी आणि एवढ्या बैठका हा त्याकाळात काश्मीर मधील दहशतवादी गटांच्या कारवायांना बराच आळा बसला होता याचा पुरावा मानला जातो. काश्मीरमध्ये आतंकवादी कारवायांसाठी आधी सारखी अनुकूल परिस्थिती नसल्यानेच भारताला धक्का देण्यासाठी पाकिस्तानच्या मदतीने पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनांनी  मुंबईत २००८ साली मोठा आतंकवादी हल्ला घडवून आणला.  मनमोहनसिंग यांच्या कारकिर्दीतील पहिली चार वर्षे काश्मिरात बऱ्यापैकी शांतता असल्याने विविध विकासकामांना याकाळात चालना मिळाली. भारत - पाकिस्तान संबंध सुधारले तरच काश्मिरात शांतता नांदेल हे अटलबिहारी वाजपेयी यांनी ओळखले होते आणि म्हणून अनुकूल स्थिती नसतानाही त्यांनी पाकिस्तानशी विविध पातळीवर चर्चा आणि संवाद सुरु ठेवला होता. मनमोहनसिंग यांनी या चर्चेत आणि संवादात खंड पडू दिला नाही. सार्क बैठकीच्या वेळी अटलबिहारी आणि मुशर्रफ यांच्यात २००४ साली शेवटची बैठक झाली होती. त्यात मंत्री आणि अधिकारी पातळीवर बैठका घेवून संबंध सुरळीत करण्यावर भर दिला होता. ही प्रक्रिया मनमोहनसिंग यांनी पुढे नेली. अधिकृत चर्चेशिवाय नागरिक आणि निवृत्त अधिकारी पातळीवर अनौपचारिक चर्चेवरही मनमोहनसिंग यांनी भर दिला होता. नरसिंहराव काळापासून काश्मीर प्रश्नाशी त्यांचा संबंध आल्याने काय करण्याची गरज आहे याबाबत त्यांची स्पष्ट अशी भूमिका होती. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील नियंत्रण रेषेत फेरफार किंवा बदल शक्य नाही पण काश्मिरी जनतेला विभागणारी सीमारेषा बदलता येत नसली तरी ती निष्प्रभ ठरवता येईल असा त्यांचा विश्वास होता. सीमेवरून दळणवळण आणि व्यापार वाढला तर सीमा आपोआप पुसट होईल असे त्यांना वाटत होते व म्हणून त्यांनी त्या दिशेने पाउले उचलली. यातील पहिले महत्वाचे पाउल होते श्रीनगर ते मुजफर्राबाद बस सेवा सुरु करण्याचे .

२००४ साली पंतप्रधान बनल्यानंतर काही महिन्यातच युनोच्या आमसभेच्या प्रसंगी मनमोहनसिंग - मुशर्रफ भेट झाली होती. या भेटीत दोन देशातील विश्वास वृद्धिंगत करण्यासाठी वाजपेयी काळात ठरल्या प्रमाणे अधिकारी व मंत्री पातळीवरच्या बैठका पुढे चालू ठेवण्याचा निर्णय झाला. त्यानुसार दोन देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या झालेल्या बैठकीत श्रीनगर ते मुजफर्राबाद बससेवा सुरु करण्याचा निर्णय झाला. स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानने पश्तुनी टोळ्यांना शस्त्रसज्ज करून काश्मिरात घुसखोरी केली तेव्हापासून या दोन शहरा दरम्यान सुरु असलेली बससेवा खंडित झाली होती. ही बससेवा सुरु करण्यावर पहिल्यांदा १९९९-२००० साला दरम्यान वाजपेयी आणि नवाज शरीफ यांचे दरम्यान चर्चा झाली होती. नंतर २००२ मध्ये मुफ्ती मोहम्मद सईद जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री बनल्यानंतर  पंतप्रधान वाजपेयी यांचेकडे या बससेवेचा विषय काढला. वाजपेयी अनुकूल होते पण पाकिस्तानचा प्रतिसाद फारसा उत्साहवर्धक नसल्याने तो विषय मागे पडला. सीमापार दळणवळण आणि व्यापार सुरु करण्यात मनमोहनसिंग यांना विशेष रस असल्याने त्यांच्या सरकारने पाठपुरावा करून ही बससेवा सुरु करण्यास पाकिस्तानला तयार केले. दोन्ही देशातील आणि काश्मीरच्या दोन्ही भागातील संबंध सुरळीत होणारे हे पाउल असल्याने दहशतवादी संघटनांचा या बससेवेला विरोध होता. ६ एप्रिल २००५ रोजी श्रीनगरहून सुटणाऱ्या बसला पंतप्रधान हिरवी झेंडी दाखविणार होते. तो कार्यक्रम हाणून पडण्यासाठी दहशतवाद्यांनी बस जिथून सुरु होणार होती तिथे जाळपोळ केली होती. तरी सुद्धा ठरलेल्या वेळी बससेवा सुरु करण्याचा निर्णय झाला आणि बसला हिरवी झेंडी दाखविण्यासाठी पंतप्रधान मनमोहनसिंग श्रीनगरला आले. मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांची कन्या व पीडीपी पक्षाची अध्यक्षा महेबुबा मुफ्ती यांनी या पहिल्या बस मधून प्रवास केला. सीमापार बससेवा हा दोन देशातील विश्वास वाढविणारी  घटना होती. हुरियत कॉन्फरन्स, जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंट, आणि इतर विरोधी गटांना बससेवा प्रारंभ करण्याच्या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले होते पण त्यांनी कार्यक्रमावर बहिष्कार टाकणे पसंत केले. काश्मिरी जनतेने मात्र या ऐतिहासिक बससेवेचे स्वागत केले. 

वाजपेयींनी जेव्हा नवी दिल्ली - लाहोर बससेवा सुरु करण्याचा व पहिल्या बसने लाहोरला जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर त्या निर्णयाचा गाजावाजा आणि स्वागत झाले होते. दोन देशातील संबंध सुधारण्याच्या दृष्टीने त्या काळातील ते मोठे पाउल होते. तेवढा गाजावाजा श्रीनगर-मुजफर्राबाद बससेवेचा झाला नसला तरी प्रत्यक्ष काश्मिरात सर्वसामान्य जनतेने या बससेवेला डोक्यावर घेतले. अनेक विभागलेल्या कुटुंबाच्या भेटीगाठी या बससेवेने सुकर केल्या होत्या. ही बससेवा सुरु झाल्यानंतर १० दिवसांनी पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष मुशर्रफ हे भारत-पाक क्रिकेट सामना पाहण्याच्या निमित्ताने भारत भेटीवर आले होते. त्यावेळी झालेल्या मनमोहन-मुशर्रफ बैठकीत दोन्ही देशा दरम्यान रेल्वेसेवा सुरु करण्याचा निर्णय झाला. काश्मीरमधील आणखी काही शहरा दरम्यान बससेवा सुरु करण्याला अनुकुलता दाखविण्यात आली. सर्वात महत्वाचा निर्णय झाला तो काश्मीरमधील नियंत्रण रेषा व्यापारासाठी खुली करण्याचा. नियंत्रण रेषा किंवा सीमारेषा बदलता येणार नसली तरी ती निष्प्रभ ठरविण्याच्या मनमोहनसिंग यांच्या विचाराला व प्रयत्नाला मिळालेले हे मोठे यश होते. याचवर्षी पाकव्याप्त काश्मीरला उध्वस्त करणारा मोठा भूकंपाचा हादरा बसला. या भूकंपात ८० हजाराच्यावर लोक मृत्युमुखी पडले आणि तितकेच जखमी झालेत. जगभरातून मदतीचा ओघ सुरु झाला. ही मदत लवकर पोचण्यासाठी जम्मू नियंत्रण रेषेवरील मार्ग खुला करणे गरजेचे होते. भारताने तात्काळ मान्यता दिली. हा नवा मार्ग खुला केला तर पाकव्याप्त काश्मीर मधील काही शहरावर भारतीय प्रभाव वाढण्याची पाकिस्तानला भीती वाटत होती. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरून मदतीसाठी मार्ग खुला करण्याचा दबाव वाढल्यानंतर जम्मू नियंत्रण रेषेवरून पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाण्याचा मार्ग पाकिस्तानने खुला केला व भूकंपग्रस्तासाठी भारताने केलेली मदत स्वीकारली पण ती देखील मनाचा कोतेपणा दाखवून.  मदत भारतातून आली आहे याचे कोणतेही चिन्ह दिसणार नाही याची काळजी पाकिस्तानने घेतली. श्रीनगर - मुजफार्राबाद बसमुळे विभक्त परिवारांना मिळालेला दिलासा व निर्माण झालेले सौहार्द लक्षात घेवून पुढे २००६ साली पुछ्-रावळकोट बस सुरु करण्यास दोन्ही देशांनी मान्यता दिली. त्यावेळी पीडीपी-कॉंग्रेस करारानुसार  जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री पद कॉंग्रेसचे गुलाम नबी आझाद यांचेकडे आले होते. त्यांनीच या बसला हिरवी झेंडी दाखविली. दोन देशातील विश्वास आणि जनतेचे संबंध वाढविण्यासाठी मनमोहन काळात झालेला आणखी एक महत्वाचा निर्णय म्हणजे अमृतसरहून गुरु नानक यांचे जन्मस्थान असलेल्या पाकिस्तानातील नानकाना साहिब येथे जाण्यासाठी बससेवा सुरु करणे. पंज आब या नावाने ही बस सेवा सुरु झाली. २४ मार्च २००६ साली पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी या बसला हिरवी झेंडी दाखविली. पाकिस्तानने दोस्ती नावाने या मार्गावर बससेवा सुरु केली. मनमोहनसिंग यांनी दोन देशातील विश्वास वाढविण्यासाठी आणि जनतेचे संबंध वाढविण्यासाठी बस डीप्लोमसीचा यशस्वीरीत्या वापर केला. मनमोहनसिंग यांचे जन्मगांव पाकिस्तानात असूनही १० वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी एकदाही पाकिस्तानला भेट दिली नाही.

                                                          (क्रमशः)

----------------------------------------------------------------------------------  

सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि.यवतमाळ 
मोबाईल : ९४२२१६८१५८