Thursday, February 14, 2013

मोदी मनमोहना !


मोदींची आर्थिक कामगिरी कोणती असेल तर ती ही आहे की, त्यांनी  जागतिकीकरणाच्या मुलतत्वांचा  स्विकार केला आणि विनाअडथळा  अंमलबजावणी केली ! या बाबतीत मोदी हे पंतप्रधान मनमोहनसिंह यांचे  शिष्योत्तम ठरले आहेत. अज्ञानी मोदी समर्थक मात्र गुरूला लाथा घालत शिष्याला डोक्यावर घेवून नाचत आहेत !
--------------------------------------------------------------------------------------

चमत्काराला नमस्कार करणारा आपला देश आहे. विज्ञान कितीही प्रगत झाले आणि त्याने अनेक चमत्कारिक कथा मोडीत काढल्या असल्या तरी आमचा चमत्कारावरील विश्वास आणि चमत्काराचे आकर्षण तसूभरही कमी झालेले नाही हे आमच्या दैनंदिन व्यवहारातून प्रकट होत असते. सत्यनारायणाचे वाढते प्रस्थ याचे चांगले उदाहरण आहे. एखादा उपग्रह सोडणे किंवा क्षेपणास्त्राची चाचणी घेणे या सारख्या निखळ वैज्ञानिक प्रयोगाच्या यशासाठी पूजा-अर्चना करणारा भारत हा एकमेव देश नसेलही , पण आघाडीवर असलेला देश नक्कीच आहे. एखाद्याचे स्तोम माजवायचे असेल तर त्याच्या भोवती चमत्काराच्या कथा रचायच्या आणि त्याच्या भोवती वलय निर्माण करण्याच्या विज्ञानात मात्र आम्ही जगाने वाखाणणी करावी , तोंडात बोटे घालावीत इतकी प्रगती केली आहे. धार्मिक क्षेत्रात सिद्ध झालेल्या या विज्ञानाचा  राजकीय, सामाजिक क्षेत्रात वापर झाला नसता तरच नवल . तब्बल २० वर्षे राळेगण सिद्धी ते मुंबई मंत्रालय मार्गे आळंदी असा प्रवास करून मंत्रालयातील भ्रष्टाचाराचे तण काढण्यासाठी उपोषणाचे खुरपे सतत हातात घेणारे अण्णा हजारे या विज्ञानाचा परीसस्पर्श होई पर्यंत दुर्लक्षितच राहिले होते वलय निर्माण करण्याच्या विज्ञानाने एका रात्रीतून त्यांचा 'दुसरा गांधी' झाल्याचे देशाने पाहिले आहे.  गुजरात राज्यात सतत तीन निवडणुका एकहाती जिंकून देणारे नरेंद्र मोदी त्यांच्याच पक्षात अडगळीत पडले होते. ज्या पक्षात आज मोदी - मोदी  असा घोष ऐकू येतो आहे त्या पक्षाच्या सर्वोच्च नीती निर्धारण मंडळात कधी मोदींना स्थान मिळाले नव्हते. आज एकाएकी भारतीय जनता पक्षाला आणि देशाला मोदी शिवाय पर्याय नसल्याचे सांगितल्या जावू लागले आहे. असे एकाएकी कोणाला प्रतिष्ठीत आणि स्थापित करायचे असेल तर चमत्कारांच्या कथा प्रसृत करण्याखेरीज दुसरा कोणताच पर्याय नसतो. हे लक्षात घेवून मोदींच्या भोवती गुजरात राज्याच्या विकासाच्या कथा रचल्या जावू लागल्या आहेत. मोदींनी गुजरातच्या  केलेल्या  कायापालटाच्या सुरस कथा प्रसृत होवून मोदी म्हणजे विकास पुरुष , विकासाचा महामेरू असे वलय मोदींच्या भोवती निर्माण केले जात आहे.  गुजरात म्हणजे भारतीय भूमीवर मोदींनी बनविलेला स्वर्ग आहे आणि हा चमत्कारच असल्याने मोदींना नमस्कार करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. चमत्कार आपण कशाला म्हणतो ? जे कोणत्याही निकषात बसत नाही , ज्याची शास्त्रीय कारणमीमांसा करता येत नाही अशाच गोष्टीना चमत्कार म्हंटल्या जाते. गुजरातने विकासात आघाडी घेतली असेल तर त्याला खरोखरीच चमत्कार म्हणावा लागेल . कारण तो विकास कोणत्याच निकषावर सिद्ध होत नाही , विकास मापण्याचे कोणतेही शास्त्रीय मापदंड त्याला लावता येत नाहीत. शास्त्रीय निकषावर मोदींच्या गुजरातचा विकास तपासून पाहिला तर वेगळेच चित्र आपल्यापुढे उभे राहाते.

                                   गुजरातचा विकास 

सर्व सामान्य नागरिकांचे  महागाई वगळता इतर आर्थिक घडामोडीशी फारसे देणे घेणे नसते. तरीही काही शब्द सतत त्याच्या कानी आदळत असतात. अशा पूर्ण न समजलेल्या तरीही परिचित असलेल्या शब्दाच्या आधारे गुजरात आणि इतर राज्ये हे विकासाच्या संदर्भात कुठे उभे आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करता येईल. विकासाच्या संदर्भात तीन गोष्ठी नेहमी बोलल्या जातात. त्या म्हणजे विकासाचा दर , दरडोई उत्पन्न आणि मानवी विकास निर्देशांक. गुजरातच्या विकास दराची इतर राज्याच्या विकासदराशी तुलना केली तरी ढोबळमानाने विकासात कोणती राज्ये पुढे आहेत किंवा मागे आहेत हे कळू शकते. अगदी ताजी आकडेवारी उपलब्ध नसली तरी जुन्या आकडेवारी स्थिती निदर्शक नक्कीच आहे. मोदींच्या पहिल्या १० वर्षाच्या कार्यकाळाचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की २००१ ते २०१० या दशकात गुजरात राज्याचा सरासरी विकास वृद्धी दर ८.६८ टक्के राहिला आहे. हा विकास दर नक्कीच कमी नाही .  याच काळात भारतीय संघ राज्यातील काही राज्यांचा सरासरी विकास वृद्धी दर यापेक्षा अधिक राहिला आहे ! उत्तराखंड (११.८१ टक्के) व हरियाणा (८.९५ टक्के ) ही राज्ये गुजरातपेक्षा पुढे आहेत. मोदींच्या आधीच्या दहा वर्षात गुजरातचा सरासरी विकास दर ८.१ टक्के होता. म्हणजे मोदींच्या काळातील वृद्धी केवळ ०.६७ टक्के इतकीच झाली.  ओरिसा आणि बिहार सारख्या मागासल्या राज्यात ही वृद्धी अनुक्रमे ४.७१ टक्के व ४.३२ टक्के राहिली आहे. मोदींच्या गुजरात पेक्षा इतर राज्ये विकासाच्या घोडदौडीत पुढे आहेत याची पुसटशी कल्पना या आकडेवारी वरून येईल. याच काळातील म्हणजे २००४ साली केंद्रात मनमोहनसिंह सरकार सत्तारूढ झाल्यावर राष्ट्रीय विकासदाराने ९ टक्क्यापर्यंत अभूतपूर्व अशी झेप घेतली होती हे येथे लक्षात घेतले पाहिजे.  आर्थिक विकास दर्शविणारा दुसरा महत्वाचा मानदंड म्हणजे दरडोई उत्पन्न . दरडोई उत्पन्नात देखील गुजरात पहिल्या क्रमांकावर नसून सहाव्या क्रमांकावर आहे. २०११ साली गुजरातचे दरडोई उत्पन्न ६३,९९६ रु. इतके होते. याच काळात यापेक्षा अधिक दरडोई उत्पन्न असणारे राज्य आहेत हरियाणा (९२,३२७ रु.) , महाराष्ट्र (८३,४७१ रु.), पंजाब (६७,४७३ रु.), तामिळनाडू (७२,९९३ रु.), उत्तराखंड (६८,२९२ रु.). दारिद्र्य निर्मूलनात देखील गुजरात आघाडीवर नाही. विकासाचा स्वर्ग समजल्या जाणाऱ्या गुजरातेत आजही १४ टक्क्याच्या वर जनता दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत आहे. दारिद्र्य रेषेखालील जनतेच्या टक्केवारीत गुजरात चौथ्या क्रमांकावर आहे. मानवी विकास निर्देशांकाच्या बाबतीत तर गुजरात राज्याची कामगिरी जास्तच निराशाजनक राहिली आहे. यात जनतेशी निगडीत अशा शिक्षण , आरोग्य , रोजगार या महत्वाच्या बाबींचा समावेश होतो. मानवी विकास निर्देशांकाच्या बाबतीत गुजरात १० व्या स्थानावर आहे.केरळ , महाराष्ट्र , पंजाब यांच्यासह   ९  राज्ये या बाबतीत गुजरातच्या पुढे आहेत. याचा अर्थ गुजरातची परिस्थिती वाईट आहे असा नाही. पण विकासाच्या बाबतीत गुजरात हे सर्वांच्या पुढे असलेले आदर्श राज्य आहे असे म्हणण्याला कोणताच शास्त्रीय व सांख्यिकी आधार नाही . विविध क्षेत्रात गुजरात पेक्षा सरस कामगिरी करणारी अनेक राज्ये आहेत हे नाकारता येत नाही. देशी-परदेशी गुंतवणुकीचे करार करण्यात गुजरातने आघाडी घेतली आहे हे खरे , पण गुंतवणुकीच्या तुलनेत संभाव्य रोजगार निर्मिती कमी असणार आहे. महाराष्ट्रात गुजरातच्या तुलनेत थोडे कमी करार झाले असले तरी त्या गुंतवणुकीतून जास्त रोजगार अपेक्षित आहे. तामिळनाडूत होणारी  आर्थिक गुंतवणूक  तर गुजरातच्या निम्मीच आहे पण त्यातून गुजरातच्या गुंतवणुकीतून निर्माण होणाऱ्या रोजगारा पेक्षा कितीतरी अधिक रोजगार निर्मिती तामिळनाडूत अपेक्षित आहे. दोनच अशी क्षेत्रे आहेत जेथे मोदींच्या नेतृत्वाखालील गुजरातने इतर सर्व राज्यांवर निर्विवाद आघाडी घेतली आहे. रस्ते आणि सिंचन यावर इतर कोणत्याही राज्यापेक्षा गुजरातने दरडोई अधिक खर्च केला आहे आणि याचा तेथील शेतीक्षेत्राला लाभ झाला आहे . पण हा अपवाद वगळता गुजरात राज्याची कामगिरी देशातील इतर महत्वाच्या राज्या सारखीच राहिली आहे. गुजरात आणि इतर महत्वाची राज्ये यांच्या विकासाची तुलना करायची झाल्यास ' उन्नीस-बीस' अशीच करावी लागेल. कोणी फार मागे नाही आणि कोणी फार पुढे नाही ! 

                              मोदींचे यश
आर्थिक विकासाच्या बाबतीत इतर राज्यांना मागे टाकून गुजरातला फार पुढे नेण्यात मोदींना यश आले नसले तरी उद्योग - व्यवसायांना अनुकूल वातावरण निर्माण करण्यात मात्र मोदी कमालीचे यशस्वी ठरले आहेत आणि ही अनुकूलता कायम राहिली तर एक दिवस गुजरात विकासाच्या बाबतीत सर्वांना मागे टाकील ही शक्यता नाकारता येत नाही. मोदींनी उद्योग व्यवसायाला अनुकूल वातावरण निर्माण केले म्हणजे नेमके काय केले याची जाणीव मोदींच्या अंधभक्तांना नाही. मोदींनी जागतिकीकरणाच्या मुलतत्वांचा   मनापासून स्विकार केला आणि विनाअडथळा  अंमलबजावणी केली ! मोदी हे पंतप्रधान मनमोहनसिंह यांचे या बाबतीत शिष्योत्तम ठरले आहेत. इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी अपरिहार्यता म्हणून जागतिकीकरण स्विकारले  एकालाही आपल्या राज्यात अनुकूल वातावरण निर्माण करता आलेले नाही. त्यामुळे गुजरात वगळता इतर राज्यात कोणताही उद्योग किंवा व्यवसाय उभा करायचा असेल तर दमछाक करणारी अडथळ्यांची स्पर्धा पार पाडावी लागते. दमछाक करणाऱ्या स्पर्धेत भाग घेवून शक्ती , पैसा खर्चकरून मन:स्ताप विकत घेण्याऐवजी उद्योजक गुजरातला पसंती देतात. उद्योग उभा करण्यासाठी परवाने आणि परवानग्याचे जंजाळ कमी केले की श्रम,पैसा आणि वेळ वाचतो. उद्योग-व्यवसायातील सरकारी हस्तक्षेप व सरकारी अडथळा दुर करणे हे जागतिकीकरणातूनच साध्य होणार होते आणि ते मोदींनी करून दाखविले. गुजरात मधील जनता नेहमीच उद्योग व्यवसायाला अनुकूल राहिली आहे. त्यामुळे जागतिकीकरणाचा भारत भूमीत प्रवेश होण्या आधी सर्वाधिक संख्येने गुजराती लोक परदेशात स्थायिक होवून आपल्या उद्योग-व्यवसायाचा विस्तार करीत आले आहेत. गुजरातमध्ये जागतिकीकरणाला तीव्र विरोध न होण्याचे हे महत्वाचे कारण आहे. गुजरातच्या बाहेर कोणताही प्रकल्प उभा करायचा झाला तर त्यात स्वयंसेवीसंस्था लोकांना भडकावून त्या प्रकल्पाच्या मार्गात अनेक प्रकारचे अडथळे उभे करतात आणि प्रकल्पाचे काम रखडले जावून खर्चात वाढ होणे  ही नित्याची बाब होवून बसली आहे. गुजरातमध्ये असा प्रकार अपवादानेच घडतो. टाटानी  सिंगूर सोडून गुजरातमध्ये येणे का पसंत केले ते यावरून लक्षात येईल . इतर प्रांताचे उद्योग गुजरातच्या वाटेवर  आहेत ते गुजरातेतील अनुकूल वातावरणामुळे. गुजरातेतील जनता उद्योगात अडथळा आणण्यासाठी स्वयंसेवी संस्थांच्या अपप्रचाराला बळी पडत नाही किंवा त्यांना साथ देत नाहीत . म्हणूनच देशातील इतर भागाच्या तुलनेत गुजरात राज्य गुंतवणुकीसाठी सुरक्षित मानले जावू लागले आहे. मोदींनी नर्मदा प्रकल्पाला विरोध करणाऱ्या मेधा पाटकरांना गुजरातच्या भूमीत पाय रोवू दिले नाहीत आणि त्यापासून धडा घेवून इतर स्वयंसेवी संस्थांनी इतर राज्यात करतात तसा उत्पात गुजरात राज्यात करण्याची हिम्मत दाखविली नाही. मोदींची खरी कर्तबगारी एवढीच राहिली आहे- अर्थात २००२ च्या गुजरात मधील नरसंहाराच्या कामगिरीचा येथे विचार केलेला नाही. मोदींच्या कामगिरीचे वर्णन सारांश रुपाने करायचे असेल तर मनमोहनसिंह यांच्या जागतिकीकरणाच्या धोरणाची सफल अंमलबजावणी करण्यात आघाडी घेतलेला मुख्यमंत्री अशीच करावी लागेल.  गुजरात राज्य मोदींच्या एकहाती होते. भाजप नेतृत्वाने जशी आजपर्यंत मोदींना दिल्लीत लुडबुड करू दिली नाही तशीच मोदीने देखील भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला आपल्या कारभारात हस्तक्षेप करू दिला नव्हता. दिल्लीत बसून भाजप नेते जागतिकीकरणाचा बेंबीच्या देठापासून विरोध करीत होते तर गुजरातेत मोदी मनमोहनसिंह यांच्या  जागतिकीकरणाच्या धोरणाची शांतपणे अंमलबजावणी करीत होते. यात गमतीची गोष्ठ अशी आहे की मनमोहनसिंह यांच्या धोरणाला कडाकडा बोटे मोडणारीच माणसे आणि समूह गुजरातच्या विकासाचे मॉडेल   देशात राबविण्यासाठी मोदींना मनमोहनसिंह यांच्या खुर्चीवर बसविण्यासाठी धडपडत आहेत. हे लक्षात घेतले तर मोदी समर्थक देवाला लाथ मारून त्याच्या पुजाऱ्याला डोक्यावर घेत आहेत असेच म्हणावे लागेल !

                              (समाप्त)

सुधाकर जाधव
मोबाईल-९४२२१६८१५८
पांढरकवडा ,
जि.यवतमाळ .

4 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. उत्तम आणि वस्तुनिष्ठ लेख! मोदींच्या कार्याचे रास्त मूल्यमापन केले आहे.

    ReplyDelete
  3. Dear Sir,
    In democracy we have to select out of two contender. On that count Narendra Modi is certainly better then his present contender. If we go to elect our leader as per your given scale, then no party can be repeated in any election. Narendra Modi is our present national Icon because his opponent has made him so. He is the most abused leader of free India. Neither his party, nor media nor elite class of this nation ever acknowledged his stature and contribution. The ruling congress party is not acknowledging its responsibility to give any visionary leader for next generation. Third front is still occupied by its socialistic line of thinking, which has ruined the three generations of our past. In this scenario, if our middle class is looking towards him, we can not blame it. Top is vacant, leaders are absent and peoples are tired. Some one has to sing the national anthem with full vigor and commitment. He has shown that courage and hence he is the most popular leader of our time. May you and me like it or not.
    Dinesh Sharma

    ReplyDelete
  4. Dear Sudhakarji,

    You have hit the nail on its head! Problem in our democracy is that it should be a demo which should hit the heart and not the head. We are still feudals who want to run a BMW with a jap eminating from a stereo CD!

    Gujarat's Development is in for few as elsewhere in India. Lets take an example - Dial 108 and an Ambulance will be at your doorstep.- thats the slogan which Modiji has brought it. (Actually it was brought first in by Satyam under Chandrababu Naidu at AP, but Modiji's supporter would use it as their achievement. In fact, there are several locations in The North Gujarat, South Gujarat, Saurashtra etc., the roads are still not available or are in condition where ambulance cannot reach. And anyway roads were excellent wherever they are even before Modiji arrived. My contention is - why do we look for a charismatic person in our democratic format - parliamentary democracy? A good governance by a council of effective ministers and parliamentarians would do the job as Board of Directors/managers of a good corporate do.

    I donot understand Mr Dinesh Sharmaji's definition of courage. If singing national anthem is a sign of courage, the Bandmaster of Massed band of the Armed Forces would be the most courageous person who not only played well but orchestrated beautifully! He has participated in wars!

    ReplyDelete