Thursday, May 21, 2015

आशेच्या शिखरावरून निराशेच्या घसरणीकडे नेणारे वर्ष

 मनमोहनसिंग यांच्या मौनाने जे गैरसमज झालेत तसे गैरसमज बोलक्या मोदींच्या बाबतीत होण्याचे कारण नसतांना मोदी सरकार बाबत वर्षाच्या शेवटी नाराजीचा सूर उमटत आहे. मोदींसाठी सगळी अनुकुलता असताना त्यांना अपेक्षित परिणाम का साधता आला नाही हा खरा चिंता आणि चिंतनाचा विषय आहे.
-----------------------------------------------------------------------


एक वर्षापूर्वी २७ मे २०१४ रोजी सत्तेवर येतांना मोदी सरकारने जनतेच्या मनात ज्या अपेक्षा निर्माण केल्या होता आणि जनतेत उत्साहाचा जो संचार निर्माण झाला होता त्याची जागा हळू हळू अपेक्षा भंग आणि निराशा घेवू लागली आहे. रिझर्व बँकेचे गव्हर्नर राजन यांनी म्हंटल्या प्रमाणे मोदी सरकारकडून ज्या अपेक्षा करण्यात येत आहेत त्या अव्यावहारिक आहेत. मोदी सरकारची धडपड , प्रयत्न सुरु आहेत आणि अर्थव्यवस्था गतिमान करण्यासाठी मोदी सरकार गंभीर प्रयत्न करीत आहे असे देखील राजन यांनी म्हंटले आहे. राजन यांची रिझर्व बँकेच्या प्रमुखपदी झालेली नियुक्ती ही मनमोहनसिंग यांच्या काळातील आहे हे लक्षात घेतले तर राजन उगीचच सरकारची री ओढत आहेत असे म्हणता येणार नाही. मोदी सरकारकडून लोकांच्या निर्माण झालेल्या अपेक्षा अव्यावहारिक होत्या हे खरे असले तरी या अपेक्षा स्वत: मोदींनी आणि उत्तम , खंबीर आणि विकासकेंद्री प्रशासक अशी मोदींची प्रतिमा तयार करणाऱ्या संघ-भाजप आणि प्रसार माध्यमांनी निर्माण केल्या आणि जनता त्याला भुलली असे म्हणणे वास्तवाच्या अधिक जवळ आहे. मोदी सरकारचा एक वर्षाचा कार्यकाळ लोकांना आपली भूल लक्षात आणून देणारा ठरला आहे. खोट सरकारच्या प्रयत्नात नाही खोट सरकारात येण्यासाठी लोकांची जी दिशाभूल करण्यात आली त्यात आहे.

गेल्या ६५ वर्षात देशाने काहीच प्रगती केली नाही आणि ६५ वर्षात जे झाले नाही त्यापेक्षा जास्त मी ५ वर्षात करून दाखवितो या मोदींच्या  दर्पोक्तीला खरे भासविण्यासाठी गढण्यात आलेल्या सुरस कथांमुळे मोदी भोवती चमत्काराचे वलय निर्माण करण्यात आले होते. त्यामुळे आता चमत्कार घडणारच अशी लोकभावना निर्माण झाली होती. .  लोकांचा अपेक्षाभंग झाला तो असा काही चमत्कार घडतांना दिसत नाही म्हणून. ज्या चमत्काराची अपेक्षा लोक मोदींकडून करत होते तो एक चुनावी जुमला होता हे भाजपच्या अध्यक्षानीच कबूल केले . मोदी सरकारची प्रतिमा खराब होत चालली ती त्या सरकारच्या निष्क्रीयतेमुळे नाही तर अशा चुनावी जुमल्यामुळे . आर्थिक - सामाजिक बदल असे एका रात्रीतून घडत नसतात . केवळ सरकारी यंत्रणेच्या बळावर तर अजिबात बदल घडविता येत नाही. त्यासाठी मोठे संघटन , अथक परिश्रम  विशालमन  आणि  दूरदृष्टी असावी लागते. ही कसोटी लावून पाहायचे झाले तर पंतप्रधान मोदी अथक परिश्रम करताना दिसतात हे खरे आहे. मोदींच्या मागे सदस्य संख्येने जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघा सारखी देशातील सर्वात मोठी स्वयंसेवी संस्था मोदींच्या मागे आहे. सामान्याला महात्मा बनविण्याची ताकद आणि कला अवगत असलेली आणि घराघरात पोचलेली शक्तिशाली प्रसारमाध्यमे मोदींच्या पाठीशी आहेत. विकासाची वेगळी नसली तरी मनमोहन दृष्टी मोदींकडे आहे. गेल्या पाच वर्षात जनतेने पाहिलेला सरकारच्या प्रत्येक कामात अडंगा आणणारा विरोधीपक्ष आज नाही. या वर्षभरात तर विरोधी पक्ष अस्तित्वात आहे असे जाणवले देखील नाही. निवडणुकीत आडवा झालेला पक्ष वर्षाच्या शेवटी उभा राहण्याची धडपड करताना दिसू लागला आहे. त्यामुळे मोदींना जे करायचे त्यासाठी सर्वार्थाने अनुकूल परिस्थिती या वर्षभरात होती. असे असताना मनमोहनसिंग सरकारच्या शेवटच्या २-३ वर्षात विकासाच्या पटरी वरून घसरलेला देश पुन्हा विकासाच्या पटरीवर आला आणि विकासाची घोडदौड सुरु झाली असे चित्र निर्माण करण्यात मोदींना पाहिजे तसे यश आले नाही . असे यश आले असते तर चुनावी जुमल्यामुळे लोकात आलेली नाराजी दूर झाली असती.
मनमोहनसिंग यांची सर्वात मोठी कमजोरी त्यांना लोकांशी संवाद साधण्याची कला अवगत नव्हती ही होती. लोकांशी संपर्क आणि संवाद नसल्याने जशी त्यांना आपली कामगिरी लोकांच्या मनावर बिम्बविता आली नाही तसेच तथ्यहीन आरोपांना स्पष्ट आणि रोखठोक उत्तरे न दिल्याने ते आरोप खरे मानले जावून त्यांच्या कपाळी चिकटले. दुसऱ्याच्या प्रश्नाची बेआबरू होवू नये म्हणून पाळलेल्या मौनाने त्यांचीच अब्रू गेली. मोदींचे तसे नाही. आपले म्हणणे पटविण्याची आणि ते लोकांच्या गळी उतरविण्याची हातोटी त्यांच्याकडे आहे. या हातोटीनेच तर ते पंतप्रधान बनले. मनमोहनसिंग यांच्या मौनाने जे गैरसमज झालेत तसे गैरसमज मोदींच्या बाबतीत होण्याचे कारण नसतांना मोदी सरकार बाबत वर्षाच्या शेवटी नाराजीचा सूर उमटत आहे. मोदींसाठी सगळी अनुकुलता असताना त्यांना अपेक्षित परिणाम का साधता आला नाही हा खरा चिंता आणि चिंतनाचा विषय आहे. मोदींना पाहिजे त्या वाटेवर न चालू देण्या इतपत विरोधी पक्षाची ताकद नाही. मोदींना खरा अडथळा आहे तो स्वत:चा , स्वत:च्या पक्षाचा आणि हा पक्ष ज्याच्या तालावर चालतो त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा. मोदींनी या वर्षभरात पक्षाला आपल्या मुठीत ठेवण्यात चांगले यश मिळविले असले तरी हे यशच पक्षाला आपल्या मागे उभे करण्यात अडथळा ठरले आहे. पक्षाच्या पहिल्या फळीतील नेत्याचे महत्व संपविल्याने हे नेते मोदींच्या यशासाठी प्रयत्न करण्या ऐवजी मोदी अपयशी ठरण्याची वाट पाहात बसले आहे. जे पक्ष नेत्याबद्दल तेच सरकारातील मंत्र्याबाबतही म्हणता येईल. मंत्रीमंडळातील सर्वात ज्येष्ठ मंत्र्याला देखील आपल्या पसंतीचा स्वीय सहाय्यक नेमता येत नाही. त्यांच्या मंत्रालयाचे निर्णय पंतप्रधान कार्यालयात होत आहेत. मंत्री म्हणून मिळणाऱ्या सुखसोयी उपभोगणे एवढेच त्यांना काम उरले आहे. सामुहिक निर्णय नाहीत त्यामुळे सामुहिक जबाबदारीही नाही. मोदी उत्साहात कामाला लागले असले तरी मंत्रिमंडळासाठी काम नसल्याने मंत्र्यात मरगळ आहे. पंतप्रधान विदेश दौरे करताहेत आणि विदेशमंत्री घरी बसून आहेत असे चित्र पहिल्यांदाच दिसते आहे .मोदींच्या या कार्यशैलीने त्यांना सामुहिक बळ मिळत नाही . सरकार म्हणजे मोदी आणि भालदार-चोपदारां सारखे एका बाजूला अमित शाह तर दुसऱ्या बाजूला अरुण जेटली असे चित्र निर्माण झाले आहे. मनमोहन कामे सोपवून मोकळे होत आणि मोदी कामे न देवून मंत्र्यांना मोकाट सोडतात . दोन्हीचा परिणाम सारखाच . सगळ्या दोषाचे वाटेकरी पंतप्रधान ! पंतप्रधान म्हणून मनमोहन एकाकी पडले होते तर मोदींनी स्वत:हून 'एकला चलो'ची भूमिका स्विकारली आहे. या दोन्ही पंतप्रधानांची कार्यशैली टोकाची भिन्न असली तरी कार्यशैलीचे परिणाम एकच. दोन्ही प्रकारात सामुहिक पुरुषार्थाला जागा नाहीच. मोदी दोषी आहेत ते इथे.

मोदी सरकारची सारी कामगिरी झाकोळण्याचे किंवा सरकारला अपेक्षित कामगिरी करू न देण्याचे खरे अपश्रेय कुणाचे असेल तर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आणि संघाच्या भाराभर संघटनांचे आहे. निवडणुकात फक्त विकासाची - सर्वांच्या विकासाची- भाषा बोलली गेली आणि हीच भाषा मोदींना भरभरून मते देवून सत्तारूढ करून गेली. ही भाषा मोदीच बोलत नव्हते तर सरसंघचालक भागवत देखील बोलत होते. मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर संघ आपल्या मूळ वळणावर गेला. हिंदुत्व, हिंदुराष्ट्र , अल्पसंख्याकांचा द्वेष हा आपला कार्यक्रम राबविण्याची हीच सुवर्णसंधी मानून संघ कामाला लागला. सबका साथ सबका विकास इथेच मागे पडला. विकासा ऐवजी घरवापसी आणि लव्हजिहाद हेच परवलीचे शब्द बनलेत. अन्न-धान्य आणि औद्योगिक उत्पादन वाढविण्याकडे लक्ष देण्या ऐवजी हिंदू मुलांचे उत्पादन वाढविण्याचा आदेश आणि उपदेश दिला जावू लागला. मोदी सरकारची प्रतिमा डागाळली ती संघाच्या या कारवायाने. मोदी सरकार करीत असलेल्या कामाची चर्चा प्रसिद्धीमाध्यमात जरूर होती, लोकमनावर  मात्र संघ कारवायाचीच छाप राहिली. अशी चर्चा न होता विकासाची चर्चा होत राहिली असती , मोदी सरकार त्यासाठी करीत असलेले प्रयत्न चर्चिले गेले असते तर नक्कीच मोदी सरकारची वेगळी आणि सकारात्मक प्रतिमा लोकांसमोर उभी राहिली होती. संघ संघटनांच्या कारवायामुळे विकास हा देखील चुनावी जुमला तर नव्हता ना अशी शंका लोकमनात निर्माण होवून वर्षभरातच मोदी सरकार बाबत साशंकता निर्माण झाली आहे. या प्रकाराने मोदींच्या खंबीर नेतृत्वावर देखील प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. सरकार घटनेप्रमाणेच चालेल हे मोदी वारंवार सांगत असले तरी घटना विरोधी कारवाई करणाऱ्यावर कारवाई करण्यास मोदी सरकार धजावत नाही हेच वर्षभरात दिसून आले आहे. अशा कारवायात लिप्त काही लोकांना पंतप्रधानांनी व्यक्तिगतरित्या झापले हे खरे. या मागे असलेल्या संघटन शक्ती विरुद्ध मात्र पंतप्रधान एका शब्दानेही बोलत नाहीत. पंतप्रधानांच्या विदेश दौऱ्यावर होणारी टीका नक्कीच अन्यायकारक आहे. परकीय गुंतवणूक आणण्यासाठी या दौऱ्यांचा नक्कीच उपयोग होणार आहे. मात्र संघ आपले ऐकत नाही आणि संघाला बोलण्याची सोय नाही यामुळे तर पंतप्रधान सतत विदेश दौऱ्यावर जात नाहीत ना असे वाटण्यासारखी परिस्थिती आहे.  सरदार वल्लभभाई पटेलांचे नाव घेतांना पंतप्रधान थकत नाहीत . मात्र समाजाला , राष्ट्राला विभाजित करणारी विषवल्ली ठेचण्यासाठी पटेलांनी जी धमक दाखविली होती त्याचा विचारही पंतप्रधानांच्या मनात येत नाही. पंतप्रधानाचा सगळा खंबीरपणा संघशक्तीपुढे लुळा पडतो हेच या वर्षभरात दिसून आले. याचा अर्थ वर्षभरात मोदी सरकारने फारसे काही केले नाही असा नाही. या वर्षभरात अनेक प्रश्न मार्गी लागलेत . आजवर होवू न शकलेले महत्वाचे निर्णयही झालेत ज्याचे भविष्यात चांगले परिणाम दिसणार आहेत. यात धक्कादायक एवढेच आहे की मार्गी लागलेली कामे , झालेले निर्णय हे मनमोहन सरकारच्या धोरणांचीच अंमलबजावणी आहे ! याचा आढावा आपण पुढच्या लेखात घेवू. इथे आता लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट एवढीच आहे कि वाचाळपणा सोडला तर या सरकारच्या  धोरणाच्या बाबतीत मनमोहन सरकारपेक्षा वेगळेपण दिसत नाही  किमान या वर्षात तरी हे वेगळेपण अधोरेखित झालेले नाही.

------------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव , पांढरकवडा , जि. यवतमाळ

मोबाईल - ९४२२१६८१५८
--------------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment