जम्मू-काश्मीर हायकोर्टाने ऑक्टोबर २०१५ साली दिलेल्या आपल्या ६० पानी निकाल पत्रात स्पष्ट केले होते की संविधानात हे कलम तात्पुरते असल्याचे म्हंटले असले तरी नंतरच्या घटनाक्रमाने कलम ३७० स्थायी झाले असून त्यात आता कोणताही बदल करता येणार नाही किंवा ते रद्दही करता येणार नाही. हायकोर्टाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते . एप्रिल २०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने हायकोर्टाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले होते
----------------------------------------------------------------------
गृहमंत्री अमित शाह यांनी कलम ३७० रद्द करण्याचा प्रस्ताव मांडताना मांडलेल्या मुद्द्यांचा उहापोह त्यांच्या शेवटच्या मुद्द्यापासून करू. घटनात्मक तरतुदीच्या आधारेच कलम ३७० रद्द करीत असल्याचा त्यावेळी त्यांनी केलेला दावा आश्चर्यात टाकणारा होता. १९७५ साली इंदिरा गांधीनी शेख अब्दुल्ला यांची तुरुंगातून सुटका करून त्यांच्याशी जो करार केला होता त्याचे संसदेत समर्थन करताना पहिल्यांदा नि:संदिग्ध शब्दात कलम ३७० तात्पुरते राहिले नसून ते कायम स्वरूपी झाले आहे. कारण हे कलम रद्द करण्याचा अधिकार फक्त जम्मू-काश्मीरच्या संविधान सभेचा होता आणि ते कलम रद्द न करता संविधान सभा विसर्जित झाली. हीच बाब जम्मू-काश्मीर हायकोर्टाने ऑक्टोबर २०१५ साली दिलेल्या निकालात अधोरेखित केली होती. हायकोर्टाच्या बेंचने आपल्या ६० पानी निकाल पत्रात स्पष्ट केले होते की संविधानात हे कलम तात्पुरते असल्याचे म्हंटले असले तरी नंतरच्या घटनाक्रमाने कलम ३७० स्थायी झाले असून त्यात आता कोणताही बदल करता येणार नाही किंवा ते रद्दही करता येणार नाही. कारण या कलमात बदल करण्याचा किंवा ते रद्द करण्याचा अधिकार केवळ जम्मू-काश्मीर राज्याच्या घटना समितीकडे होता आणि आता घटना समिती अस्तित्वात नाही. हायकोर्टाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते . एप्रिल २०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने हायकोर्टाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले होते ! कोर्टाचा असा सुस्पष्ट निर्णय असताना सरकारने घटनात्मक तरतुदीच्या आधारेच कलम ३७० रद्द करीत असल्याचा दावा करण्याला काय आधार आहे हे गृहमंत्र्याने आपल्या भाषणात स्पष्ट केले नव्हते.
कलम ३७० मुळे भारतीय राज्यघटना जम्मू-काश्मिरात लागू होवू शकली नाही असा दावा करताना आणि कलम ३५ अ केवळ राष्ट्रपतीच्या आदेशाने लागू करण्यात आले हे सांगताना त्यांनी हे सांगायचे टाळले की संसदेत कोणतीही चर्चा न करता घटना लागू झाल्याच्या ५० वर्षात भारतीय राज्यघटनेची विविध कलमे जम्मू-काश्मीर राज्यात लागू करण्यासाठी राष्ट्रपतींनी ४५ आदेश जारी करून केंद्र व राज्याशी संबंधित समवर्ती सूची लागू केली. एवढेच नाही तर पहिल्या ५० वर्षातच घटनेच्या ३९५ कलमापैकी २६० कलमे लागू झाली होती. ही सर्व कलमे संसदेत चर्चा न होता केवळ राज्याच्या संमतीने राष्ट्रपतीने काढलेल्या आदेशाने लागू झाली होती. कलम ३७० असल्यामुळे जम्मू-काश्मीर राज्य कॅगच्या अधिकार क्षेत्राबाहेर असल्याचे संपूर्ण असत्य त्यांनी संसदेत उजागिरीने मांडले. १९५८ सालीच जम्मू-काश्मीर राज्य कॅगच्या अधिकार क्षेत्रात आले होते. माहिती अधिकार कायदा आणि शिक्षणाचा अधिकार कायदा जम्मू-काश्मिरात नाही असे खोटेच त्यांनी सांगितले. जम्मू-काश्मीरमध्ये जो माहिती अधिकार कायदा होता त्या अंतर्गत दोन महिन्यात कोणतीही माहिती मिळत असे. उलट आता माहिती मिळण्यात अडचण जात आहे. शिक्षणाचा अधिकार कायदा जम्मू-काश्मिरात लागू होता. कलम ३७० मुळे काश्मीर मागासलेला राहिला हे अमित शाह यांचे रडगाणे खोटे असल्याचे नियमित होणारा राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्व्हेचे निष्कर्ष दाखवून देतात.
--------------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव
पांढरकवडा जि. यवतमाळ
मोबाईल - ९४२२१६८१५८