Thursday, February 27, 2025

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - ११८

घटनात्मक दृष्ट्या बरोबर की चूक हे सांगण्या ऐवजी सापही मरेल आणि काठीही तुटणार नाही या पद्धतीने सर्वोच्च न्यायालयाने जम्मू-काश्मीर राज्याचे केंद्रशासित प्रदेशात  रुपांतर करण्याचा मुद्दा हाताळला आहे. जम्मू-काश्मीर राज्यातून लडाख प्रदेश वेगळा करून त्याचा केंद्रशासित प्रदेश बनविण्याचा केंद्र सरकारचा किंवा संसदेचा निर्णय सुप्रीम कोर्टाने वैध ठरविला. मात्र जम्मु आणि काश्मीरला केंद्रशासित करण्या बाबत मौन पाळले. 
------------------------------------------------------------------------------------------------


घटनेतील  कलम ३ मध्ये फक्त राज्य असा उल्लेख आहे. एका राज्याचे तुम्हाला दोन-तीन -चार राज्ये बनविता येतील पण ती पूर्ण अधिकार असलेली राज्येच असतील हे घटनेतील वाक्यरचनेवरून स्पष्ट होते. आजवर जी राज्यांची पुनर्रचना झाली ती अशीच झाली आहे. एखाद्या पूर्ण अधिकार असलेल्या राज्याचे केंद्रशासित प्रदेशात रुपांतर करण्याचा प्रकार पहिल्यांदाच घडला. जम्मू-काश्मीर राज्याच्या पुनर्रचने संबंधीचे विधेयक मांडताना गृहमंत्री अमित शाह यांनी कॉंग्रेसने राज्याच्या विधानसभेचा विरोध असताना देखील राज्याचे विभाजन केल्याचे उदाहरण दिले. उदाहरण बरोबर होते. आंध्रप्रदेश विधानसभेने राज्याच्या विभाजना विरोधात ठराव केल्यानंतरही मनमोहनसिंग सरकारने घटनेच्या कलम ३ नूसार मिळालेल्या अधिकारात राज्याचे विभाजन करून आंध्र मधून तेलंगाना राज्य वेगळे केले होते. एका राज्याचे दोन राज्यात रुपांतर करण्यात आले. राज्य म्हणून असलेले अधिकार व दर्जा कमी करून राज्याचे रुपांतर केंद्रशासित प्रदेशात केले नव्हते. त्यामुळे अमित शाह यांनी दिलेले उदाहरण बरोबर असले तरी या ठिकाणी अप्रस्तुत होते, लागू होणारे नव्हते. मूळ घटनेत केंद्रशासित प्रदेशाचा उल्लेख नव्हता. स्वातंत्र्यानंतर राज्यांची पुनर्रचना गरजेची बनल्याने राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना करण्यात आली होती. या आयोगाच्या शिफारसीनुसार केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्यात आले होते व ७ व्या घटनादुरुस्तीन्वये घटनेत केंद्रशासित प्रदेशाचा उल्लेख झाला. जो भूभाग राजकीय,सामाजिक,सांस्कृतिक दृष्ट्या एखाद्या राज्यात विलीन करणे उचित नसेल आणि राज्याचा दर्जा देण्याइतकी लोकसंख्या व क्षेत्रफळ नसेल तर अशी क्षेत्रे केंद्रशासित ठेवावीत अशी राज्य पुनर्रचना आयोगाची शिफारस होती. त्यानुसार त्यावेळेस केंद्रशासित प्रदेश निश्चित केले गेलेत आणि ७ व्या घटनादुरुस्तीने त्यांना संविधानात स्थान दिले गेले. पूर्ण अधिकार असलेल्या राज्याचे केंद्रशासित प्रदेशात करण्याचा विचार संघराज्य संकल्पनेला धक्का देणारा असल्याने ना राज्य पुनर्रचना आयोगाने त्याचा विचार केला किंवा ७ वी घटनादुरुस्ती झाली तेव्हा कलम ३ मध्ये दुरुस्ती करून राज्याचे रुपांतर केंद्रशासित प्रदेशात करण्याचा अधिकार संसदेला देण्यात आला. त्यामुळे जम्मू-काश्मीर राज्याचे केंद्रशासित प्रदेशात रुपांतर करायला घटनात्मक आधार नाही. केले गेले ते केंद्र सरकारची  मनमानी आणि ही मनमानी सहन करण्याची सर्वोच्च न्यायालयाची मजबुरी म्हणा की उदारता म्हणा त्यामुळे केंद्र सरकारला घटनेची ऐसीतैसी करणे शक्य झाले.                                   

राज्याचे केंद्रशासित प्रदेशात रुपांतर करण्या विरुद्ध अनेक याचिका सर्वोच्च न्यायालयासमोर प्रलंबित होत्या. सर्वोच्च न्यायालयाने त्यावर सुनावणी देखील घेतली पण निर्णय देण्याचे टाळले. फक्त राज्याचे विभाजन तेवढे वैध ठरवले आणि राज्याचे केंद्रशासित प्रदेशात रुपांतर करण्याचा केंद्र सरकारचा किंवा संसदेचा निर्णय घटनात्मक आहे का यावर भाष्य करण्याचे आणि  निर्णय देण्याचे टाळले. जसा कलम ३७० बद्दल सर्वोच्च न्यायालयाने मनमानी निर्णय [या निर्णयाची चिकित्सा पुढे करणार आहे ] दिला तसाच घटनात्मक तरतुदी विचारात न घेता राज्याचे केंद्रशासित प्रदेशात रुपांतर करण्याचा संसदेचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाने का मान्य केला नसावा याची दोन कारणे देता येतील. कलम ३७० बाबतच्या पक्षपाती निर्णयाने डागाळलेली प्रतिमा या निर्णयाने सुधारण्याचा प्रयत्न. आणि दुसरे कारण जम्मू-काश्मीर राज्याच्या पुनर्रचने संबंधीचा निर्णय फक्त त्या राज्यापुरता मर्यादित राहिला नसता. देशातील सगळी राज्ये त्यामुळे प्रभावित होवू शकत होती. महाराष्ट्राचे उदाहरण घेवून हा मुद्दा समजून घेवू. जम्मू-काश्मीरच्या बाबतीत जे केले ते घटनात्मक ठरविले असते तर हा प्रयोग अन्य राज्याच्या बाबतीत करणे शक्य झाले असते. मुंबईचे महाराष्ट्रात असणे कोणाला खटकते हे सारा महाराष्ट्र जाणतो. गुजरात मध्ये सामील करता येत नसेल तर किमान मुंबईला केंद्रशासित करावी ही अनेकांची इच्छा लपून राहिलेली नाही. जम्मू-काश्मीर राज्याचे केंद्रशासित प्रदेशात रुपांतर करण्यचा निर्णय घटनात्मक ठरविला असता तर महाराष्ट्रातून मुंबईला वेगळे करण्याचा आणि केंद्रशासित करण्याचा मार्गही मोकळा झाला असता. हे इतरही राज्यात घडले असते आणि सर्व राज्यात अशा निर्णयाने भीतीयुक्त अस्वस्थता पसरली असती. एका चुकीच्या निर्णयाने मणिपूर जळाले तसे राज्य पुनर्रचने बाबतच्या चुकीच्या निर्णयाने देश पेटण्याची शक्यता लक्षात घेवून सर्वोच्च न्यायालयाने निर्णय टाळला असावा. कलम ३७० च्या निर्णयाने काश्मीर पेटण्याची शक्यता होती पण तो जाळ काश्मीर पुरताच मर्यादित राहिला असता . कलम ३७० च्या निर्णयाने आपण देशात हिरो बनू याची कल्पना बेंचवरील प्रत्येक न्यायाधीशाला होती. त्यामुळे कलम ३७० बाबत निर्णय देणे जेवढे सोपे होते तेवढे सोपे राज्याचे केंद्रशासित प्रदेशात रुपांतर करण्याबाबत नव्हते. म्हणून सापही मरेल आणि काठीही तुटणार नाही या पद्धतीने सर्वोच्च न्यायालयाने जम्मू-काश्मीर राज्याचे केंद्रशासित प्रदेशात  रुपांतर करण्याचा मुद्दा हाताळला आहे. 


जम्मू-काश्मीर राज्यातून लडाख प्रदेश वेगळा करून त्याचा केंद्रशासित प्रदेश बनविण्याचा केंद्र सरकारचा किंवा संसदेचा निर्णय सुप्रीम कोर्टाने वैध ठरविला. मात्र जम्मु आणि काश्मीर बाबत मौन पाळले. अर्थात मौन फक्त वैध-अवैधते बद्दल. बाकी तोंडाच्या वाफा खूप दवडल्या. राज्याचे रुपांतर एक किंवा अनेक केंद्रशासित प्रदेशात करण्याने देशाच्या संघात्मक रचनेवर परिणाम तर होईलच शिवाय त्या राज्याची स्वायत्तता नष्ट होईल.प्रातिनिधिक लोकशाहीवर हा आघात ठरू शकतो असे त्यावेळचे सरन्यायधीश चंद्रचूड यांनी निकालपत्रात लिहिले. तर चंद्रचूड नंतर सरन्यायधीश बनलेल्या न्यायमूर्ती खन्ना यांनी चंद्रचूड यांच्या मताशी सहमती व्यक्त करत म्हंटले की, अशा कृतीचे गंभीर परिणाम होतील.नागरिकाला आपल्या राज्यात निर्वाचित सरकारला मुकावे लागेल.हा झाला शब्दबंबाळपणा. चिंता व्यक्त करून सर्वोच्च न्यायालय या बाबतीत केंद्र सरकारच्या सोयी प्रमाणे वागले हे खरे सत्य. तुम्ही चुकले की बरोबर हे काही न बोलता जम्मू-काश्मीरला लवकर राज्याचा दर्जा मिळाला पाहिजे अशी 'सर्वोच्च' इच्छा केंद्राकडे व्यक्त करण्यात आली. त्यासाठी केंद्राने कोर्टात आराखडा सादर करण्याची सूचना केली.  यावर सरकार तर्फे कोर्टाला सांगण्यात आले की लवकरच जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा देण्यात येईल. पण त्याबाबतीत वेळेचे कोणतेही बंधन सरकारने घालून घेतले नाही. विशेष म्हणजे कोर्टाने सुद्धा अमुक तारखेपर्यंत ते झाले पाहिजे असा आग्रह धरला नाही. सरकारने जम्मू-काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा देण्याचे मान्य केले असल्याने आम्ही यासंबंधीच्या याचिकांवर व ज्या प्रकारे राज्याची पुनर्रचना केली गेली त्याच्या घटनात्मक वैधतेवर निर्णय करणार नसल्याचे सुप्रीम कोर्टाने सांगितले. सरकार आणि सर्वोच्च न्यायालय हातात हात घालून कसे काम करते याचे हे उत्तम उदाहरण आहे. 

------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि. यवतमाळ 
मोबाईल - ९४२२१६८१५८  


Thursday, February 20, 2025

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - ११५

 

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - ११५

देशातील एकमेव मुस्लीम बहुल राज्याला विशेष अधिकार असणे हे संघ परिवाराला कधीच मान्य नव्हते. पण असे विशेष अधिकार देण्याचे तत्कालीन राज्यकर्त्यांनी मान्य केले नसते तर जम्मू-काश्मीर राज्य भारतात सामीलच झाले नसते याची संघपरिवाराला कल्पना नव्हती असे नाही. म्हणून तर जनसंघाचे संस्थापक अध्यक्ष शामाप्रसाद मुखर्जी यांनी संसदेत कलम ३७०चे समर्थन केले होते.
-----------------------------------------------------------------------------------

२०११ ची जनगणना आणि राष्ट्रीय कुटुंब सर्वेक्षणाचा शेवटचा अहवाल लक्षात घेतला तर शिक्षण,आरोग्य आणि कुटुंब नियोजन या बाबतीत उत्तरेकडील बिहार,उत्तर प्रदेश राज्यापेक्षा जम्मू-काश्मीरची कामगिरी चांगली आहे. भौगोलिक प्रतिकूलता, सोयींचा अभाव व सुरक्षा व्यवस्थेमुळे येणाऱ्या अडचणी वर मात करीत जम्मू-काश्मीरने उत्तरेकडील राज्यापेक्षा अधिक चांगली कामगिरी केली आहे. राष्ट्रीय सरासरी व दक्षिणेकडील राज्याच्या तुलनेत जम्मू-काश्मीरची प्रगती  कमी आहे पण अनेक राज्यांची परिस्थिती जम्मू-काश्मीरपेक्षा निकृष्ट आहे हे लक्षात घेतले तर कलम ३७० मुळे जम्मू-काश्मीरची प्रगती खुंटली असा निष्कर्ष काढणे तथ्याला धरून होणार नाही.  शिक्षण आणि आरोग्य सोयीच्या विस्ताराच्या बाबतीत जम्मू-काश्मीर राज्य अनेक राज्याच्या पुढे आहे.  मुस्लिमबहुल राज्य असताना शिक्षण,आरोग्य आणि कुटुंब नियोजन याबाबतीत जम्मू-काश्मीर राज्य देशाला चार पंतप्रधान देणाऱ्या उत्तर प्रदेशच्या कितीतरी पुढे आहे. इंग्रजी शिक्षणात जम्मू-काश्मीर राज्याने आघाडी घेतली आहे. ही आघाडी विशेष कौतुकास पात्र आहे कारण १९९० च्या दशकातील दहशतवादी कारवायामुळे शिक्षणाचा खेळखंडोबा झाला होता. त्या दरम्यान व नंतरही सैन्याचे कॅम्प शाळेत असायचे. दहशतवादी आणि सैन्य यांच्यात होणाऱ्या गोळीबाराच्या छायेत इथले विद्यार्थी शिक्षण घेत आलेत..                                             

जम्मू-काश्मीर मध्ये राहायला हॉटेल उपलब्ध नाही म्हणून पर्यटनाचा कधी खोळंबा झाला नाही. १९९० चे रक्तपाताचे दशक सोडले तर काश्मीरमध्ये पर्यटन उद्योग नेहमीच जोरात राहिला आहे आणि इतर राज्यापेक्षा जम्मू-काश्मीर राज्य सुस्थितीत असण्याचे पर्यटन उद्योग मोठे कारण आहे. बाहेरच्यांना जमीन खरेदी करता येत नसल्याने ना तिथे उद्योग धंदे उभे राहात ना जमिनीच्या किंमती वाढत त्याचे नुकसान राज्यातील नागरिकांना सहन करावा लागत असल्याचा कांगावा गृहमंत्र्याने लोकसभेत बोलताना केला. देशातील जम्मू-काश्मीर हेच एकमेव राज्य नाही जिथे परप्रांतीयांना जमिनी खरेदी करता येत नाहीत. आणखी काही राज्यात तसा प्रतिबंध आहे. आदिवासींच्या जमिनी खरेदी करण्यास महाराष्ट्रासह अन्य काही राज्यात प्रतिबंध आहे. काही राज्यात फक्त शेतकऱ्यांनाच जमीन खरेदी करण्याचा नियम आहे. हे सगळ गृहमंत्र्यांना माहित नाही अशातला भाग नाही. पण पर्यटनासाठी अनमोल असलेल्या राज्यात आपल्या प्रिय उद्योगपतीच्या झोळीत तिथली जामीन टाकता येत नाही हे गृहमंत्री अमित शाह यांच्या कांगाव्या मागचे खरे कारण आहे.                                                   

प्रत्येक राज्यात भ्रष्टाचाराच्या नवनव्या पद्धती उदयास येवून अभूतपूर्व भ्रष्टाचार होत असल्याच्या कहाण्या नित्य कानावर येतात. इथे कुठेही कलम ३७० नाही. इतर राज्यात होतो तसा भ्रष्टाचार जम्मू-काश्मीर मध्येही होतो. त्याचे खापर मात्र कलम ३७० वर फोडायचे. एका जागेसाठी महाराष्ट्र आणि गुजरात मध्ये उच्चशिक्षित बेरोजगारांनी किती गर्दी केली होती याची रसभरीत वर्णने वृत्तपत्रातून आली आहेत. कलम ३७० नसताना पुढारलेल्या म्हणविल्या जाणाऱ्या राज्यात बेरोजगारी कशी या प्रश्नाचे गृहमंत्र्याकडे उत्तर नाही. कलम ३७० असल्यामुळे जम्मू-काश्मिरात बेरोजगारी वाढली हे मात्र त्यांना ठाऊक आहे. ही सगळी सांगायची कारणे आहेत. मुळात देशातील एकमेव मुस्लीम बहुल राज्याला विशेष अधिकार असणे हे संघ परिवाराला कधीच मान्य नव्हते. पण असे विशेष अधिकार देण्याचे तत्कालीन राज्यकर्त्यांनी मान्य केले नसते तर जम्मू-काश्मीर राज्य भारतात सामीलच झाले नसते याची संघपरिवाराला कल्पना नव्हती असे नाही. म्हणून तर जनसंघाचे संस्थापक अध्यक्ष शामाप्रसाद मुखर्जी यांनी संसदेत कलम ३७०चे समर्थन केले होते. काश्मीरला असा वेगळा दर्जा मिळणे हे नव्याने स्थापित भारतीय जनसंघाला राजकारणात बस्तान बसवायला उपयोगी ठरेल हे लक्षात आल्या बरोबर घटना समितीत कलम ३७० चे समर्थन करणाऱ्या शामाप्रसाद मुखर्जींनी जनसंघाच्या स्थापनेपासून 'एक राष्ट्र,एक संविधान,एक निशाण' अशी मोहीम सुरु करून जम्मू-काश्मीरच्या स्वायत्त दर्जाला आव्हान देणे सुरु केले. याचा फार मोठा राजकीय फायदा तत्कालीन भारतीय जनता पक्षाला आणि त्यानतर स्थापन झालेल्या भारतीय जनता पक्षाला मिळाला.                                                                   

 कलम ३७० रद्द करण्याचा प्रस्ताव मांडताना अमित शाह यांनी राजकीय फायद्यासाठी हे कलम सुरु ठेवण्यात आल्याचे म्हंटले होते. पण या मुद्द्याचा फायदा कॉंग्रेसला कधीच झाला नाही. संघ परिवाराने जसा कलम ३७० चा आक्रमक विरोध सातत्याने केला तसे या विरोधाचा विरोध करून कलम ३७० चे समर्थन जाहीररित्या कॉंग्रेसने कधीच केले नाही. त्यामुळे या मुद्द्याचा राजकीय तोटाच कॉंग्रेसला झाला. मोदी राजवटीच्या पहिल्या पाच वर्षात सरकारने या कलमाला हात लावला नाही. कलम ३७० चालू राहिल्याने मिळणाऱ्या राजकीय फायद्यापेक्षा ते कलम रद्द करून मिळणारा राजकीय फायदा अधिक असल्याचे लक्षात आल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या सरकारने हा प्रस्ताव संसदेत मांडला आणि मंजूर करून घेतला.                                                                                                             

प्रस्ताव मंजूर झाल्यावर आजवर कोणाला जमले नाही ते आम्ही करून दाखविले असा टेंभा त्यांनी मिरविला. ज्यांनी हे काम केले नाही त्यांनी संवैधानिक नैतिकता पाळली होती. कारण त्या कलमात रद्द करण्याची निहित प्रक्रिया पूर्ण करणे शक्य नसल्याने कोणी ते रद्द करण्यामागे लागले नाही. यापूर्वी असा प्रयत्न कोणी केला असता तर तो सर्वोच्च न्यायालयात टिकला नसता. मोदी सरकार हे पाउल उचलण्यास धजावले त्यामागे एक विश्वास होता आणि हा विश्वास गृहमंत्री अमित शाह यांनी प्रस्ताव मांडताना केलेल्या भाषणाच्या शेवटी बोलून दाखविला. संसदेने कलम ३७० रद्द केल्यानंतर अनेक लोक आणि संस्था या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देतील याची सरकारला कल्पना आहे. पण तिथेही हा निर्णय बदलला जाणार नाही याची खात्री बाळगा असे अमित शाह यांनी संसद सदस्यांना सांगितले होते. त्यांचे विधान शब्दशः खरे ठरले ! अमित शाह जोतिषी नाहीत , राजकारणी आहेत हे लक्षात घेता त्यांनी हे विधान कशाच्या आधारे केले असेल याचा अंदाज करता येवू शकतो. कलम ३७० रद्द करण्यासाठी ज्या संविधानिक कसरती मोदी सरकारने केल्या त्यापेक्षा अधिक संविधानिक कसरती करत सर्वोच्च न्यायालयाने कलम ३७० रद्द करण्याचा सरकारचा निर्णय उचलून धरला ! 

--------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि. यवतमाळ 
मोबाईल : ९४२२१६८१५८  

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - ११७

राज्याची पुनर्रचना करण्याचा अधिकार घटनेने संसदेला बहाल केला असला तरी एखाद्या राज्याचा पूर्ण राज्याचा दर्जा काढून त्याला केंद्रशासित राज्य करण्याच्या अधिकाराचा घटनेत उल्लेख नाही. तरीही मागील ५ वर्षापेक्षा अधिक काळ जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेश आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या मेहेरबानीमुळे हे सुरु आहे

------------------------------------------------------------------------------------------------


जम्मू-काश्मीर राज्याचे विघटन करणे आणि राज्याचा दर्जा काढून घेवून त्याला केंद्रशासित प्रदेश करणे ही काही परिस्थितीची गरज नव्हती. ही सत्ताधारी समूहाची इच्छा होती. भारत स्वतंत्र झाला तेव्हा सरदार पटेल यांचे काश्मीरकडे लक्ष जाण्याआधी हिंदुत्ववादी संघटना काश्मीरवर लक्ष ठेवून होत्या. काश्मीरचे भारतात विलीनीकरण व्हावे यासाठी नाही तर तिथल्या हिंदू राजाने भारतात सामील न होता  मुस्लीमबहुल काश्मिरवर राज्य करावे ! हिंदू महासभेच्या सावरकरांनी तर उघडपणे राजा हरीसिंग यांना नेपाळच्या हिंदू राजाच्या मदतीने काश्मीरचे स्वतंत्र हिंदुराज्य स्थापित करावे असा आग्रह केला होता. पाकिस्तानने काश्मिरात घुसखोर पाठवून काश्मीरचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला त्याच्या काही दिवस आधीच तत्कालीन सरसंघचालक गोळवलकर गुरुजी श्रीनगरला राजा हरीसिंग यांचेकडे राहून आले होते. त्या दोघात काय चर्चा झाली हे त्यावेळी किंवा नंतरही जाहीर करण्यात आले नाही. आज मात्र ते सरदार पटेलच्या सांगण्यावरून राजा हरीसिंग यांना भारतात सामील होण्याचा आग्रह करण्यास गेल्याचे सांगितले जात आहे. पण त्याला कसलाच पुरावा नाही. संस्थानांचे संघराज्यात विलीनीकरण करण्यासाठी जे मंत्रालय स्थापन झाले होते त्याचे प्रमुख सरदार पटेल होते तर व्हि.पी. मेनन सेक्रेटरी होते. या व्हि.पी.मेनन यांनी संस्थानांच्या विलीनिकरनाविषयी सर्व बारीकसारीक माहिती लिहून ठेवली आहे. त्यात पटेलांनी गोळवलकर गुरुजीची मदत घेतल्याचा कोणताही उल्लेख नाही. जेव्हा गोळवलकर राजा हरीसिंग यांना भेटले तेव्हा सरदार पटेल यांचेसमोर काश्मीर भारतात विलीन करून घेण्याचा मुद्दाच विचारार्थ नव्हता असे मेनन यांच्या नोंदीवरून दिसते. काश्मिरच नाही तर अन्यत्र कोठेही हिंदुत्ववादी संघटनांनी पटेल व कॉंग्रेसची संस्थानांच्या विलीनीकरणासाठी मदत केली नाही.                                                                                                                                           

सावरकर यांनी काही राजांना भारतात सामील न होण्यासाठी उघड चिथावणी दिली होती. तेवढ्या उघडपणे आरेसेसने चिथावणी दिली नाही हे खरे पण त्यांना भारताची राज्यघटना मान्य नसल्याचे ते उघडपणे बोलत होते ,लिहित होते. सावरकर व गोळवलकर यांचा कॉंग्रेसला समान विरोध होता व त्यांनी संस्थानाच्या विलीनीकरणात कोणतीच मदत केली नाही हा इतिहास आहे. हिंदुत्ववादी संघटनांचे काश्मीरवर विशेष लक्ष असण्याचे कारण तिथला राजा हिंदू व प्रजा बहुसंख्येने मुसलमान असणे हे होते. बहुसंख्यांक मुस्लीम राज्यात हिंदू राजाची सत्ता असावी ही त्यांची मनोमन इच्छा त्यावेळच्या परिस्थितीमुळे पूर्ण होवू शकली नव्हती. हिंदू बहुसंख्य असलेल्या राज्यात किंवा संस्थानात मुस्लीम राजा असेल तर त्याच्या जोखडातून हिंदू प्रजेला मुक्त करण्यासाठी चाललेल्या संघर्षात संघ व हिंदूमहासभाचे  योगदान नव्हते. किंबहुना त्यात त्यांना रस नव्हता. उदाहरण म्हणून जुनागड व हैदराबाद ही राज्ये घेता येतील. दोन्ही ठिकाणी कॉंग्रेसच लढत होती. हैदराबाद संस्थानात काही प्रमाणात आर्य समाजी सक्रीय होते. हैदराबादच्या निजामाने कॉंग्रेसवर बंदी घातली तेव्हा कॉंग्रेस कार्यकर्ते आर्य समाजी म्हणून सक्रीय राहिले. पण संघ व हिंदुमहासभा यांचा पत्ता नव्हता. काश्मीरमध्ये मात्र बहुसंख्य असलेल्या मुस्लीम प्रजेला हिंदुहिंदू राजाच्या अधिपत्याखाली ठेवण्यात ते रस दाखवीत होते. तेव्हाची अपुरी राहिलेली इच्छा सध्याचे हिंदुत्ववादी केंद्रसरकार काश्मीरला केंद्रशासित प्रदेश बनवून त्यावर शासन करून पूर्ण करीत आहे. जम्मू-काश्मीर राज्याचा दर्जा कमी करण्यामागे अन्य कोणतेही सबळ कारण दिसत नाही. असे करणे घटनात्मक आहे का तर त्याचे उत्तरही स्पष्ट नाही.                                                                                                                                           

राज्याची पुनर्रचना करण्याचा अधिकार घटनेने संसदेला बहाल केला असला तरी एखाद्या राज्याचा पूर्ण राज्याचा दर्जा काढून त्याला केंद्रशासित राज्य करण्याच्या अधिकाराचा घटनेत उल्लेख नाही. तरीही मागील ५ वर्षापेक्षा अधिक काळ जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेश आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या मेहेरबानीमुळे हे सुरु आहे. घटनेच्या कलम ३ नूसार राज्याची पुनर्रचना करण्या संदर्भात काय म्हंटले आहे याचे अवलोकन केले तर आपल्या लक्षात येईल की राज्याचा दर्जा काढून घेण्याच्या अधिकाराचा त्यात उल्लेखच नाही. भारतीय संघराज्यात एखादे नवे राज्य जोडणे , सध्या अस्तित्वात असलेल्या राज्याचा काही भाग दुसऱ्या राज्याला जोडणे , राज्याचे विभाजन करणे , राज्याची नावे बदलणे अशा स्वरूपाच्या अधिकाराचा त्यात उल्लेख आहे. राज्याचा दर्जा कमी करून त्याचे केंद्रशासित प्रदेशात रुपांतर करण्याच्या अधिकाराचा उल्लेख त्यात नाही. राज्य आणि केंद्रशासित प्रदेश म्हणजे राज्यच असेल तर दोन्हीचा दैनंदिन शासकीय व्यवहारात वेगळा उल्लेख करण्याचे कारणच उरले नसते. पण राज्य व केंद्रशासित प्रदेश यांच्यामध्ये पुष्कळ फरक आहे. घटनेतील कलम १ मध्ये म्हंटले आहे की भारत देश हा राज्याचा संघ असेल. राज्याचा संघ याची फोड करताना तीन प्रकार सांगितले आहेत. राज्यघटनेच्या कलम १ मधील उपकलम ३ मध्ये राज्यक्षेत्रांचा उल्लेख आहे जे भारतीय संघराज्याचा भाग असतील. यानुसार : क] राज्यांची कार्यक्षेत्रे .ख] पहिल्या अनुसूचित उल्लेखिलेली संघ संघराज्य क्षेत्रे. आणि ग] संपादित केली जातील अशी राज्य्क्षेत्रे. यात राज्यक्षेत्र आणि संघराज्य क्षेत्र असा वेगवेगळा उल्लेख आहे. म्हणजे राज्यक्षेत्र व संघराज्य क्षेत्र एक नाहीत. कलम ३ नूसार राज्याच्या निर्मितीचा किंवा पुनर्रचनेचा अधिकार संसदेला आहे. त्यामुळे एखाद्या केंद्रशासित प्रदेशाला राज्याचा दर्जा देण्याचा अधिकार संसदेला आहे पण राज्याचे रुपांतर केंद्रशासित प्रदेशात करण्याच्या अधिकाराचा उल्लेख  कलम ३ मध्ये नाही. यापूर्वी केंद्रशासित प्रदेशाचे राज्यात रुपांतर झाले आहे. १९७० च्या दशकात केंद्रशासित प्रदेश असलेले मणिपूर, त्रिपुरा आणि हिमाचल प्रदेशला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात आला. केंद्रशासित प्रदेश कमी करावेत असाच प्रयत्न होत आला आहे. २०१९ साली मोदी सरकारने दादरा आणि नगरहवेली व दमन आणि दिऊ अशा दोन केंद्रशासित प्रदेशाचे रुपांतर एकाच केंद्रशासित प्रदेशात केले आहे. जम्मू-काश्मीर राज्याबाबातच विपरीत धोरण अवलंबिण्यात आले आहे.                                   

---------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि. यवतमाळ 
मोबाईल - ९४२२१६८१५८