Thursday, April 17, 2025

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - १२५

जम्मू-काश्मीरच्या राजाच्या अधिकारात करणसिंग यांनी २५ नोव्हेंबर १९४९ रोजी जारी केलेली अधिसूचना  म्हणजे सामिलनाम्यातील कलम ८ नूसार मिळालेल्या सार्वभौम अधिकारावर सार्वभौम राजाने पाणी सोडल्याचे द्योतक आहे. त्यामुळे २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय राज्यघटना लागू झाल्यानंतर काश्मीरचे सार्वभौमत्व समाप्त झाले  हा  निकालपत्रातील निष्कर्ष सर्वाधिक धक्कादायक आणि वादग्रस्त समजला जातो. 
-----------------------------------------------------------------------------------------


सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने कलम ३७० रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाच्या समर्थनार्थ तीन वेगवेगळी निकालपत्रे लिहिलीत. पहिले आणि मुख्य निकालपत्र न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी लिहिले ज्याच्याशी न्या.गवई आणि न्या. सुर्यकांत शब्दशः सहमत होते. दुसरे वेगळे निकालपत्र न्या. कौल यांनी लिहिले तर तिसरे निकालपत्र न्या. खन्ना यांनी लिहिले. या तिन्ही निकालपत्रात दोन गोष्टीवर पूर्ण सहमती होती. एक, कलम ३७० हे संक्रमणकाळासाठी तात्पुरत्या स्वरुपात घटनेत समाविष्ट करण्यात आले होते. दोन, हे कलम रद्द करण्याचा राष्ट्रपतींना पूर्ण अधिकार आहे आणि कलम रद्द करण्यासाठी जम्मू-काश्मीरची संविधान सभा किंवा अन्य कोणाच्या शिफारसीची गरज नाही. अशा कोणत्याही शिफारसी राष्ट्रापातीवर बंधनकारक नाही. या तीन निकालपत्रात न्या. कौल यांनी थोडा वेगळा सूर लावला. चंद्रचूड यांच्या निकालपत्रात काश्मीर कधी स्वायत्त नव्हतेच असा दावा आहे तर न्या. कौल यांनी काही प्रमाणात काश्मीर स्वायत्त होते हे मान्य केले. न्या.कौल यांनी आपल्या निकालपत्रात सामंजस्य निर्माण व्हावे यासाठी एक कमिशन स्थापन करण्याची सूचना केली. सुरक्षादल आणि दहशतवादी या दोहोकडून झालेल्या मानवाधिकाराच्या उल्लंघनाचा तपास या कमिशनने करावा आणि काश्मिरी तरुणात असलेला रोष व असंतोष कमी करण्यासाठी या कमिशनने पुढाकार घ्यावा असे न्या. कौल यांनी नमूद केले. अर्थात न्या. कौल किंवा न्या. खन्ना यांच्या निकालपत्राकडे त्यांचे मत म्हणून पहिले जाईल. कायद्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी केवळ या दोन निकालपत्राचा उपयोग आणि महत्व आहे. न्या. चंद्रचूड यांनी लिहिलेला बहुमताचा निकालच सर्वांवर बंधनकारक असणार आहे. हा निकाल ४७६ पानांचा असून त्यातील ठळक आणि निवडक बाबीचीच इथे नोंद घेवू.

कलम ३७० ची तरतूद ही तात्पुरत्या स्वरुपाचीच होती या मुद्द्यावर तिन्ही निकालपत्राचे एकमत आहे. त्यासाठी निकालपत्रात देण्यात आलेले एक कारण असे आहे की सदर कलमाचा समावेश घटनेच्या २१ व्या भागात करण्यात आला होता. संविधानाचा भाग २१ हा अस्थायी, संक्रमणकालीन  व विशेष तरतुदीचा समावेश असलेला भाग आहे. यातून संविधानकर्त्यांना हे कलम कायम राहावे असे वाटत नसल्याचे स्पष्ट होते असे न्यायमूर्तीनी नमूद केले आहे.स्वातंत्र्यापूर्वी राज्यकारभार १९३५ च्या भारत सरकार कायद्यानुसार चालत असे. १९३५ च्या कायदा व  नव्या राज्यघटनेच्या अंमलबजावणी या संक्रमण काळासाठी ही विशेष तरतूद घटनाकारांनी केल्याचा निष्कर्ष निकालपत्रात काढण्यात आला.  संविधानाचा भाग २१ हा अस्थायी, संक्रमनकालीन व विशेष तरतुदीचा समावेश असलेला भाग आहे.या कलमामुळे जम्मू-काश्मीर राज्याची संविधान सभा स्थापन होवून राज्याची राज्यघटना तयार होईपर्यंतच्या संक्रमणकाळासाठी ही तरतूद होती. राज्यात १९४७ साली झालेल्या टोळ्यांच्या आक्रमणातून निर्माण अस्थिर परिस्थितीत जम्मू-काश्मीर राज्याचे भारतात विलीनीकरण सुलभ व्हावे या हेतूने हे अस्थायी कलम संविधानात सामील करण्यात आल्याचा निष्कर्ष निकालपत्रात काढून कलम ३७० तात्पुरते होते असा निर्वाळा निकाल -पत्रातून देण्यात आला. कलम ३७० चा अर्थ जम्मू-काश्मीरचे भारतात झालेले विलीनीकरण तात्पुरते होते असा होत नसल्याचे निकालपत्रात नमूद करण्यात आले. 

भारतात सामील होण्याचा करार झाल्यानंतर काश्मीरची सार्वभौमिकता शिल्लक राहिली होती का या मुद्द्याचा न्या. चंद्रचूड यांनी आपल्या निकालपत्रात उहापोह केला. सामीलनाम्याच्या ८ व्या कलमात स्पष्ट नमूद करण्यात आले होते की,भारतात भविष्यात {त्यावेळी राज्यघटना तयार होत होती}लागू होणारी राज्यघटना स्वीकारण्याचे कोणतेही बंधन काश्मीरवर असणार नाही. काय स्वीकारायचे काय नाकारायचे हा अधिकार जम्मू-काश्मीर राज्याचा असेल.त्यामुळे सामीलनाम्यात ज्या विषयाचा उल्लेख आहे [संरक्षण,दळणवळण आणि परराष्ट्र संबंध] या विषयीचे कायदेच जम्मू-काश्मिरात लागू होतील. राज्यघटनेतील  इतर कलमे लागू करायची की नाही हे ठरविण्याचा अधिकार या कलमामुळे जम्मू-काश्मीरला मिळाला होता. उल्लेखित तीन विषय सोडले तर इतर सर्व बाबींचा निर्णय घेण्यास जम्मू-काश्मीर राज्य सार्वभौम होते. यावर निकालपत्रात असे नमूद करण्यात आले की, राजाचे सार्वभौम अधिकार असलेले व त्यावेळच्या काळजीवाहू किंवा अस्थायी सरकारचे प्रमुख असलेले करणसिंग यांनी २५ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय राज्यघटना जम्मू-काश्मीरमध्ये लागू करण्याची अधिसूचना जारी केली होती. या अधिसूचनेमुळे सामीलनाम्यातील कलम ८ निष्प्रभ ठरल्याचा निष्कर्ष निकालपत्रात काढण्यात आला. ही अधिसूचना म्हणजे सामिलनाम्यातील कलम ८ नूसार मिळालेल्या सार्वभौम अधिकारावर सार्वभौम राजाने पाणी सोडल्याचे द्योतक आहे. त्यामुळे २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय राज्यघटना लागू झाल्यानंतर काश्मीरचे सार्वभौमत्व समाप्त होवून इतर संस्थानासारखे संपूर्ण अर्थाने जम्मू-काश्मीरचे भारतात विलीनीकरण झाले. निकालपत्रातील हा निष्कर्ष सर्वाधिक धक्कादायक आणि वादग्रस्त समजला जातो. 

संसदेने कलम ३७० रद्द करण्याची केलेली शिफारस आणि जम्मू-काश्मीर राज्य केंद्रशासित प्रदेश करून लडाख वेगळा करण्याच्या घेतलेल्या निर्णयावर आधारित राष्ट्रपतींनी कलम ३७० अंतर्गत मिळालेल्या अधिकाराचा वापर करून संवैधानिक आदेश क्रमांक २७२ आणि २७३ काढलेत. याच आदेशांना सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले होते. २७२ क्रमांकाच्या आदेशात राष्ट्रपतींनी कलम ३६७ चा एखाद्या संदिग्ध कलमाचा अर्थ लावण्याचा अधिकार वापरून कलम ३७० मधील उल्लेखित संविधान सभाचा अर्थ विधानसभा समजण्यात यावा अशी दुरुस्ती केली होती. भारताची राज्यघटना काश्मीरमध्ये पूर्णपणे लागू करण्याचा निर्देश देण्यात आला होता. तर कलम ३७०[३] अन्वये मिळालेल्या अधिकारात  संवैधानिक आदेश २७३ जारी करून  कलम ३७० चे उपकलम १ वगळता कलम ३७० च्या सर्व तरतुदी निष्प्रभ करण्यात आल्या. याच आदेशात कलम ३७०[१] मध्ये दुरुस्ती करण्यात आली. भारतीय राज्यघटना जम्मू-काश्मीर मध्ये लागू झाल्याची या दुरुस्तीत म्हंटले आहे. या आदेशाबाबत निर्णय देतांना सर्वोच्च न्यायालयाने कलम ३६७ चा वापर करून कलम ३७० मध्ये संविधानसभा ऐवजी विधानसभा अशी राष्ट्रपतींनी केलेली दुरुस्ती सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने अवैध ठरवली.राज्यात राष्ट्रपती राजवट असल्याने संसदेलाच विधानसभेचे अधिकार मिळतात आणि या अधिकारा तहत संसदेने कलम ३७० रद्द करण्याची शिफारस राष्ट्रपतींना केली होती. अशी शिफारस आल्याने राष्ट्रपतींनी कलम ३७०[३] अंतर्गत मिळालेल्या अधिकाराचा वापर करून कलम ३७० रद्द केले होते. संवैधानिक आदेश २७२ मधील दुरुस्ती अवैध ठरवूनही सर्वोच्च न्यायालयाने कलम ३७० रद्द करण्याचा राष्ट्रपतीचा आदेश अवैध ठरविला नाही. कलम ३७०[३] नूसार मिळालेल्या अधिकारात कोणाच्याही शिफारसी विना कलम ३७० रद्द करण्याचा राष्ट्रपतींना अधिकार असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने देवून संवैधानिक आदेश २७३ वैध असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. 

-----------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि.यवतमाळ 
मोबाईल : ९४२२१६८१५८  

Tuesday, April 8, 2025

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - १२४

 कलम ३७० रद्द करण्यासाठी सरकारने वापरलेला मार्ग असंवैधानिक ठरवूनही सर्वोच्च न्यायालयाने अवांतर विषय महत्वाचे मानून त्यावर निर्णय देत केस सरकारच्या बाजूने फिरविली. खरे तर केस सरकारच्या बाजूने फिरविली म्हणण्यापेक्षा सरकारच्या बाजूने लढविली असे म्हणणे जास्त संयुक्तिक ठरेल. 
------------------------------------------------------------------------------------------------


कलम ३७० बाबत विचार करताना सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने दुसरा मुद्दा विचारात घेतला होता तो म्हणजे कलम ३७० रद्द करताना सरकारने कलम ३६७ चा घेतलेला आधार व केलेला वापर वैध होता का. घटनेच्या एखाद्या कलम बाबत स्पष्टता नसेल किंवा अर्थ लावण्याबाबत संभ्रमाची स्थिती असेल अशावेळी त्या कलमाचा अर्थ लावण्याचा किंवा स्पष्टीकरण करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना कलम ३६७ अन्वये मिळतो. कलम ३७० मध्ये कोणताही बदल करण्यासाठी किंवा ते रद्द करण्यासाठी जम्मू-काश्मीरच्या संविधान सभेची शिफारस अनिवार्य करण्यात आली होती. संविधान सभाच अस्तित्वात नसल्याने हे कलम रद्द करता येणार नाही हे यापूर्वीच्या सर्वच सरकारांनी प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष रित्या मान्य केले होते. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लोकसभेतच घोषणा केली होती की कलम ३७० रद्द करण्याची शिफारस करण्यासाठी जम्मू-काश्मीरची संविधान सभाच अस्तित्वात नसल्याने हे कलम आता कायम झाले आहे. हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचे अशा अर्थाचे सुस्पष्ट निर्णयही होते. यातून मार्ग काढण्यासाठी मोदी सरकारने कलम ३७० ची नव्याने व्याख्या करण्यासाठी कलम ३६७ चा आधार घेतला. कलम ३६७ अन्वये एखाद्या संदिग्ध कलमाचा अर्थ स्पष्ट करण्याचा मिळालेला अधिकार वापरून राष्ट्रपतींनी आदेश जारी केला की कलम ३७० मध्ये ज्या घटना समितीचा उल्लेख आहे त्याचा अर्थ राज्याची विधानसभा असा घेण्यात यावा !                   

हे करण्यामागे सरकारचा हेतू स्पष्ट होता. राज्यात राष्ट्रपती राजवट होती. राष्ट्रपती राजवट असताना राज्यासंबंधी निर्णय घेण्याचे अधिकार संसदेला असतात. संसदेत सत्ताधारी पक्षाचे बहुमत असल्याने विधानसभेचे अधिकार आपल्या हाती घेवून विधानसभेच्या नावाने कोणतीही शिफारस राष्ट्रपतींना करता येणे शक्य असते. याचाच उपयोग करून संसदेने कलम ३७० रद्द करण्याची शिफारस राष्ट्रपतींना केली आणि त्या शिफारसीच्या आधारे राष्ट्रपतींनी आदेश क्रमांक २७२ व २७३ काढून कलम ३७० निष्क्रिय केले.  वस्तुत: कलम ३७० किंवा कलम ३७० चे कोणतेही  उपकलम कोणत्याही अर्थाने अस्पष्ट किंवा संदिग्ध नव्हते. भारतीय घटना समितीने विधानसभा किंवा राज्यसरकार याच्या ऐवजी राज्याच्या घटनासमितीलाच कलम ३७० मध्ये बदल करण्याचा किंवा ते रद्द करण्याची शिफारस करण्याचा अधिकार दिलेला होता. असे असताना राष्ट्रपतीने कलम ३६७ चा वापर करून कलम ३७० मधील तरतुदीचा अर्थ लावण्याच्या नावाखाली अर्थच बदलून टाकला होता. त्यामुळे कलम ३६७ चा वापर करून कलम ३७० मध्ये बदल करणे व नंतर त्या बदलाचा आधार घेत ते रद्द करण्याची कृती वैध की अवैध हा खरा या सर्व घडामोडीतील मध्यवर्ती प्रश्न होता. त्यामुळे या प्रश्नाचा विचार करणे सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाला भाग होते. सर्वोच्च न्यायालयाने त्याचा विचार केला आणि त्यावर निर्णयही दिला.                                                                                                   


यावर कोर्टाने असा निर्णय दिला की की कलम ३६७ अन्वये मिळालेल्या अधिकाराचा वापर करून एखाद्या कलमाची , इथे कलम ३७०ची , व्याख्या करण्याच्या नावाखाली ते कलम बदलता येणार नाही. कलम ३७० मध्ये बदल करायचा असेल तर त्या कलमात निर्धारित बदलाच्या प्रक्रियेनुसार ते करता येईल. म्हणून कलम ३६७ वापरून कलम ३७० मध्ये केलेला बदल घटनेशी सुसंगत नसल्याचे सांगत सरकारची ती कृती अवैध ठरवली. कलम ३७० रद्द करण्याचा सरकारचा सगळा डोलारा कलम ३७० मध्ये केलेल्या बदलावर उभा होता. तो बदल अवैध ठरविल्यानंतर तो डोलारा कोसळणे अपेक्षित होते. पण सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने घटनापीठाचे प्रमुख न्या. चंद्रचूड यांच्या पुढाकाराने तो कोसळणारा डोलारा सावरला.अवांतर विषय महत्वाचे मानून त्यावर निर्णय देत सर्वोच्च न्यायालयाने केस सरकारच्या बाजूने फिरविली. खरे तर केस सरकारच्या बाजूने फिरविली म्हणण्यापेक्षा सरकारच्या बाजूने लढविली असे म्हणणे जास्त संयुक्तिक ठरेल. यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने विचारात घेतलेल्या तिसऱ्या मुद्द्याचा वापर केला. सर्वोच्च न्यायालयाने विचारात घेतलेला तिसरा मुद्दा होता जम्मू-काश्मीरच्या संविधान सभेच्या शिफारसी किंवा मंजुरी शिवाय कलम ३७० रद्द करता येते का . खरे तर सरकारी पक्षाचे सुद्धा असे म्हणणे नव्हते किंवा दावा नव्हता की संविधान सभेची शिफारस नसताना देखील राष्ट्रपतींना कलम ३७० रद्द करण्याचा अधिकार घटनेने दिला आहे !                                                               

सरकारी पक्षाला असे वाटले असते तर त्यांनी कलम ३६७ वापरून कलम ३७० मध्ये घटना समिती ऐवजी विधानसभा असा बदल केला नसता. संपूर्ण सुनावणीत सरकार पक्षाकडून राष्ट्रपतींना असे असिमित अधिकार असल्याचा दावा करण्यात आला नाही. याचिकाकर्त्यांचे तर म्हणणेच होते की राष्ट्रपतींना कलम ३७० मध्ये बदल करण्याचे अधिकार नाहीत. मग असा अमर्यादित अधिकार असल्याचा दावा कोण करीत होते तर सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाचे प्रमुख न्यायमूर्ती चंद्रचूड ! या संबंधीचा युक्तिवाद घटनापीठात बसून तेच करीत होते. सर्वोच्च न्यायालयाच्या यापूर्वीच्या अनेक निर्णयात कलम ३७० मध्ये बदल करण्याचे एकतर्फी अधिकार नसल्याचे स्पष्ट करण्यात आलेले आहे. असे असताना चंद्रचूड असा दावा करतात की राष्ट्रपतीना त्या कलमात बदल करण्यासाठी कोणाच्या शिफारशीची गरज नाही . घटनेनेच त्यांना तसे अधिकार दिले आहेत. संविधान पदावर एखाद्या व्यक्तीची नियुक्ती करताना राष्ट्रपतीच्या सहीचे जे नियुक्ती पत्र असते त्यात अमुक मुदतीपर्यंत किंवा राष्ट्रपतीचा विश्वास असे पर्यंत सदर व्यक्ती त्या पदावर राहील असे लिहिलेले असते. पण मग एखाद्या उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायधीशाला राष्ट्रपतीचा विश्वास गमावला म्हणून राष्ट्रपतीच्या आदेशाने काढून टाकता येते का ? तर याचे उत्तर नाही हेच आहे. मुदतीपूर्वी पदावरून काढून टाकायचे तर महाअभियोग चालवावा लागतो ज्याची प्रक्रिया संविधानात दिली आहे. तीच बाब कलम ३७० ला लागू होते. कलम ३७० मध्ये बदल किंवा रद्द करण्याची प्रक्रिया त्यात दिली आहे. ती प्रक्रिया पूर्ण करूनच राष्ट्रपतींना ते रद्द करता येईल. मनात आले आणि रद्द केले असे होवू शकत नाही. पण चंद्रचूड यांचे तसे म्हणणे आहे. या संबंधीचा युक्तिवाद त्यांनीच केला आणि त्यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठाने तो मान्य केला !

--------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि. यवतमाळ 
मोबाईल - ९४२२१६८१५८ 

Thursday, April 3, 2025

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - १२३

 भाजप जम्मू-काश्मीर सरकारात सामील असताना तिथल्या हायकोर्टाने कलम ३७० तात्पुरते राहिले नसून ते आता रद्द करता येणार नाही असा २०१५ मध्ये निकाल दिला. २०१७ साली वेगळ्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने असाच निकाल दिला होता. मात्र सरकारने हायकोर्टाच्या निकाला विरुद्ध याचिका दाखल केली नाही की सुप्रीम कोर्टाच्या निकाला विरुद्ध फेरविचार याचिका दाखल केली नाही.
-------------------------------------------------------------------------------------------------


कलम 'तात्पुरते' असल्याच्या संघ परिवाराच्या  प्रचाराच्या  प्रभावाखाली सामान्य जनते प्रमाणेच सर्वोच्च न्यायालयाचे घटनापीठ एवढे होते की सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी या संदर्भात दिलेला निर्णय देखील विसरले होते. २०१७-१८ साली सर्वोच्च न्यायालयानेच स्पष्ट केले होते की हे कलम तात्पुरते राहिले नसून ते कायम स्वरूपी बनले आहे. या निर्णयापूर्वी २०१५ साली जेव्हा पीडीपी व भाजपचे संयुक्त सरकार काश्मीरमध्ये सत्तारूढ होते तेव्हा जम्मू-काश्मीर हायकोर्टाने नि:संदिग्ध शब्दात कलम ३७० हे तात्पुरते राहिले नसून कायम बनले आहे. कारण जम्मू-काश्मीर राज्याच्या घटना समितीच्या शिफारसी शिवाय हे कलम रद्द करता येत नाही आणि तशी शिफारस करायला घटना समितीच अस्तित्वात नाही. त्यामुळे त्यात आता कोणताही बदल करणे शक्य नाही. जस्टीस मसुदी आणि जस्टीस जनक राज कोतवाल यांच्या खंडपीठाने आपल्या ६० पानी निकालपत्रात कलम ३७० मध्ये कोणताही बदल करता येणार नाही किंवा ते रद्दही करता येणार नसल्याचा निकाल दिला होता. इतर संस्थाना प्रमाणे जम्मू-काश्मीर भारतात विलीन झाले नव्हते आणि त्यामुळे मर्यादित स्वायत्तता काश्मीरच्या वाट्याला आली. या स्वयात्ततेचे संरक्षण करण्यासाठी कलम ३७० चा समावेश घटनेत करण्यात आला.                                     

 कलम ३७० [१] नूसार जम्मू-काश्मीर सरकारच्या संमतीने भारतीय राज्यघटनेतील अन्य कलमे लागू करण्याचा अधिकार राष्ट्रपतीला आहे. पण ३७० कलमात कोणताही बदल करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना नाही असा हायकोर्टाचा स्पष्ट निर्वाळा होता. कलम ३७० [३] नूसार राष्ट्रपती कलम ३७० मध्ये बदल करू शकत होते पण त्यासाठी जम्मू-काश्मीर संविधान सभेची तशी शिफारस किंवा संमती अनिवार्य होती. तशी शिफारस करणारी समितीच अस्तित्वात नसल्याने कलम ३७० मध्ये कुठलाही बदल करण्याचा किंवा ते रद्द करण्याचा राष्ट्रपतींना अधिकार उरलेला नसल्याचे या निकालात म्हंटले होते. हा निकाल आला तेव्हा जम्मू-काश्मीर सरकारात भाजप सामील होता. त्यावेळी भाजपने या निकालाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यासाठी राज्यसरकारकडे आग्रह धरला नाही. राज्य सरकार या निकालाला आव्हान देणार नसेल तर आम्ही सरकार बाहेर पडू अशीही भूमिका त्यावेळी भाजपने घेतली नव्हती. हा निकाल आल्यानंतर काही महिन्यांनी जम्मू-काश्मीरचे तत्कालीन मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांचे दु:खद निधन झाले व राज्यात राष्ट्रपती राजवट लागली. त्यावेळी ८८ दिवस जम्मू-काश्मीर मध्ये राष्ट्रपती राजवट होती आणि या काळात राज्यपालां मार्फत केंद्र सरकार जम्मू-काश्मीरचा कारभार पहात होते. या काळात या निकालाला सुप्रीम कोर्टात आव्हान देणे सहज शक्य असताना भारतीय जनता पक्ष आणि त्या पक्षाचे केंद्रातील सरकार गप्प बसून होते. नंतर सुप्रीम कोर्टाने दुसऱ्या एका प्रकरणात कलम ३७० बाबत २०१७-१८ साली असाच निर्णय दिला. 

कुमारी विजयालक्ष्मी झा यांनी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. या याचिकेत त्यांनी म्हंटले होते की,संविधानात कलम ३७० तात्पुरते म्हणून सामील केले होते. २५ जानेवारी १९५७ ला जम्मू-काश्मीरची संविधान समिती विसर्जित झाली त्याच वेळी कलम ३७० आपोआप बाद व्हायला हवे होते. आता तरी ते रद्द करण्यात यावे आणि जम्मू-काश्मीरचे वेगळे संविधान निरर्थक आणि निष्क्रिय घोषित करण्यात यावे अशी त्यांची मागणी होती.या प्रकरणी ३ एप्रिल २०१८ रोजी सुनावणी करताना जस्टीस नरीमन यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया विरुद्ध संतोष गुप्ता या प्रकरणात कलम ३७० चा मुद्दा निकालात काढल्याचे सांगितले. कलम ३७० हे कलम तात्पुरते राहिले नसून ते कायम स्वरूपी बनले आहे. त्या कलमात कोणताही बदल करता येणार नाही किंवा ते रद्द करता येणार नाही. याचे तेच कारण सुप्रीम कोर्टाने दिले जे जम्मू-काश्मीर हायकोर्टाने आपल्या निकालात दिले होते. ज्याअर्थी जम्मू-काश्मीरची संविधान समिती अस्तित्वात नाही त्याअर्थी कलम ३७० रद्द करण्याची शिफारस राष्ट्रपतींना करणारी समितीच अस्तित्वात नसल्याने हे कलम राष्ट्रपतींना रद्द करता येणार नाही. या निकालाने कलम ३७० चा मुद्दा कायमचा निकालात निघाल्याचा अभिप्राय २०१८ मध्ये सुप्रीम कोर्टाने दिला होता.  हायकोर्टाच्या निर्णया विरुद्ध सुप्रीम कोर्टात जसे अपील दाखल झाले नाही तसेच केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टाच्या निकाला विरुद्ध फेरविचार याचिका दाखल केली नाही. म्हणजे ५ ऑगस्ट २०१९ ला सरकारने संसदेत कलम ३७० रद्द करण्याचा प्रस्ताव पारित करून घेतला त्यावेळची घटनात्मक स्थिती ही होती की कोणत्याही परिस्थितीत कलम ३७० रद्द करता येणार नाही. 

 हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचा कलम ३७० तात्पुरते राहिले नसून ते कायमस्वरूपी बनले आहे असा निकाल असताना आणि या निकालाला आव्हान दिले गेले नसताना सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने कलम तात्पुरते असल्याचे मांडण्याची सरकारला मुभा कशी दिली आणि निकालात या मुद्द्याला महत्व कसे दिले. कलम ३७० च्या सुनावणी दरम्यान एक मुद्दा मांडण्यात आला की केंद्र सरकारने कलम ३७० रद्द करण्याच्या दुष्ट हेतूने राज्यात राष्ट्रपती राजवट लावली व नंतर पुढची पाउले उचलली. यावर घटनापीठाचे प्रमुख न्या.चंद्रचूड यांनी म्हंटले की राष्ट्रपती राजवटीला कोणी आव्हानच दिले नसल्याने आम्ही तो मुद्दा आता विचारात घेणार नाही. मग सुप्रीम कोर्टाने निकाल दिला होता हे कलम तात्पुरते राहिले नाही आणि या निकालाला आव्हान देण्यात आले नव्हते तर मग सुप्रीम कोर्टाने सरकारला का नाही सांगितले की कलम ३७० तात्पुरते आहे की नाही यावर आम्ही काही ऐकून घेणार नाही कारण त्या निकालाला तुम्ही आव्हानच दिले नव्हते. सर्वोच्च न्यायालयाचे घटनापीठ असे म्हणू शकत होते की कलम तात्पुरते आहे की नाही यावर आम्ही विचार करणार नाही. फक्त कलम रद्द करणे घटनात्मक आहे की नाही एवढेच बघू. पण स्वत: घटनापीठाचे प्रमुख न्या.चंद्रचूड हे सुप्रीम कोर्टाच्या निर्णया विरुद्ध सांगत होते की हे कलम तात्पुरते आहे ! तसे बघता हा मुद्दा महत्वाचा नव्हता पण यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाची पक्षपाती मानसिकता अधोरेखित झाली.

--------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि. यवतमाळ 
मोबाईल - ९४२२१६८१५८