Wednesday, January 11, 2012

संघाने केला अण्णा संघ गारद

------------------------------------------------------------------------------------------------

अनायासे भाजपचा राजकीय फायदा होण्याची परिस्थिती निर्माण झाल्याने आणि एकाधिकारवादी जन लोकपाल येण्याची शक्यता मावळल्याने टीम अण्णाच्या लाथा खाऊन आंदोलनात राहण्यापेक्षा बाहेर पडून टीम अण्णाला आपल्या शक्तीचे भान करून देणारा मार्ग राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पत्करला. मुंबईत संघाच्या या भूमिकेचा परिणाम दिसून आला. संघाशी संबंध असल्याच्या कारणावरून बाबा रामदेव यांना आंदोलनापासून दुर ठेवणाऱ्या टीम अण्णाला बाबा रामदेव साठी पायघड्या टाकायला लावून संघाने आपल्या शिवाय अण्णांचे आंदोलन चालू शकत नाही हे दाखवून दिले आहे.

------------------------------------------------------------------------------------------------

अण्णांचे वय आणि प्रकृती लक्षात घेता त्यांनी काही काळ आंदोलनातून बाजूला होने हे जितके स्वाभाविक आहे तितकेच अण्णांच्या पराक्रमी टीमने अण्णाच्या प्रकृतीचे कारण पुढे करून माघार घेणे हे अनपेक्षित आणि अस्वाभाविक आहे. अण्णांना इस्पीतळात दाखल करून उर्वरित टीमला मुंबईचा कार्यक्रम एक दिवस पुढे चालवून ठरल्या प्रमाणे समाप्त करता आला असता. पण मधेच कार्यक्रम गुंडाळून टीम अण्णाने स्वत;चे अवसान गळाल्याचे दाखवून देवून एकीकडे आंदोलन समर्थकांचा अवसानघात केला तर दुसरीकडे आपल्या विरोधकांचे आणि टीकाकारांचे अवसान वाढविले. ज्यांची स्मरणशक्ती ठीकठाक असेल त्यांना हे ही आठवत असेल कि दिल्लीच्या रामलीला मैदानातील उपोषणा दरम्यान सुद्धा अण्णांची प्रकृती बिघडली होती आणि तरीही अण्णांनी उपोषण पुढे रेटले होते आणि टीम अण्णाने त्यांना उपोषण सोडण्याचा अजिबात आग्रह केला नव्हता. शेवटी सरकार आणि संसद यांना मुत्सदीपणा दाखवून अण्णांना उपोषण सोडायला लावून त्यांची प्रकृती जास्त बिघडू दिली नव्हती. दिल्लीत टीम अण्णाने अण्णांना उपोषण सोडण्याचा आग्रह न करणे आणि सरकारने उपोषण सुटावे म्हणून अगतिक होवून प्रयत्न करणे यामागे त्यावेळी प्रकट झालेली लोकशक्ती होती. या लोकशक्तीच्या बळावर टीम अण्णाने अण्णांच्या उपोषणाला हत्यार बनवून सरकारला नाचविले आणि झुकविले होते. टीम अण्णाची ताकद आणि अवसान ही लोकशक्ती होती. मुंबई आंदोलनाच्या वेळी या लोकशक्तीचे दर्शन मुंबईतच नव्हे तर देश पातळीवर कोठेच घडले नाही. ज्या रामलीला मैदानाने अण्णा आंदोलनाला ऐतिहासिक बनविले , जगात मान आणि स्थान मिळवून दिले त्या मैदानात एका कोपऱ्यात शे-दोनशे लोकांना घेवून बसण्याची पाळी टीम अण्णाचे प्रमुख सदस्य असलेल्या भूषण पिता-पुत्रावर आली. आपण दिल्लीत गेल्याने गर्दी जमेल या भ्रमात असलेल्या टीम अण्णाच्या बहुचर्चित सदस्या किरण बेदी यांनी मुंबईहून दिल्लीला विमानझेप घेतली. पण त्यांच्या तेथे जाण्यानेही काहीच फरक पडला नाही. अवघ्या ३-४ महिन्याच्या काळात शिखरावर असलेले जन समर्थन पायथ्या पर्यंत घसरल्याने अण्णा आंदोलनाची घसरण हा अण्णांच्या जंतर मंतर व रामलीला मैदानाच्या आंदोलना इतकीच चर्चेचा विषय बनली आहे. टीम अण्णाचे काय चुकले याचे विश्लेषण आंदोलनाचे विरोधकच नाही तर समर्थक सुद्धा करीत आहे. विश्लेषण करणारे विरोधी असोत, समर्थक असोत किंवा तटस्थ असोत , या तिघांचेही जनसमर्थनात टीम अण्णा वाहवत गेली यावर एकमत आहे. जे काही टीम अण्णाचे यश आहे ते त्यांचे कर्तृत्व नसून लाभलेल्या जन समर्थनाचे यश आहे आणि ते समर्थन टिकविणे व वाढविणे अंतिम यशासाठी आवश्यक आहे याचे भान टीम अण्णाला राखता आले नाही. मिळालेले यश मुठीत पकडून ठेवण्या ऐवजी डोक्यात शिरू दिल्यानेच टीम अण्णा पासून आंदोलनात सामील अनेक घटक दुरावलेत व परिणामी जन समर्थन कमी कमी होत गेले यात शंका नाही. याचा अर्थ अण्णा आंदोलनाच्या यशापयशाची चिकित्सा जन समर्थन लाभले कसे आणि ओसरले कसे याचा विचार केल्याशिवाय पूर्ण होवू शकत नाही. पण सध्या या आंदोलनावर जी चर्चा होत आहे त्यात या मुद्द्याचा गांभीर्याने विचार होताना दिसत नाही.

जन समर्थन लाभले कसे ?

अण्णा आंदोलनाची सारी सूत्रे स्वयंसेवी संस्था आणि या संस्थांच्या प्रमुखांच्या हाती होती. अरविंद केजरीवाल, किरण बेदी , स्वामी अग्निवेश आणि संचालन समितीतील बहुतांश मंडळी संस्था चालविणारीच होती. अगदी अण्णा हजारे देखील याला अपवाद नाहीत. आज पर्यंत ही मंडळी जे काम करीत होती त्याला चळवळ असे नाव देत असले तरी त्यात लोक सहभाग नेहमीच मर्यादित राहात आला. या चळवळीच्या अनेक नेत्यांचा म्हणजे टीम अण्णाच्या अनेक सदस्यांचा लोकांना या आंदोलनातूनच पहिल्यांदा परिचय झाला आहे. सीमित क्षेत्रात सीमित लोकात काम असे स्वरूप त्यांच्या कामाचे होते. गेल्या २० वर्षा पेक्षा अधिक काळा पासून स्वत: अण्णा हजारे भ्रष्टाचार निर्मूलनाच्या आघाडीवर सक्रीय आहेत. पण त्यांची सक्रियता व लढा हा नेहमीच वैयक्तिक स्वरुपात राहात आला आहे. त्यांनी एकट्याने उपोषण करून महाराष्ट्रात आपल्या मागण्याही मान्य करून घेतल्या आहेत. पण जन लोकपाल साठी उभे राहिलेले आंदोलन हे त्यांच्या नेतृत्वाखाली उभे राहिलेले एकमेव जन आंदोलन आहे. मुख्य म्हणजे अण्णांनी महाराष्ट्रात जन संपर्क कायम वाढविला आणि राखला तरी हा लोकसंग्रह त्यांनी कधी जन आंदोलनात परिवर्तीत करण्याचा प्रयोग केला नव्हता. टीम अण्णा मधील इतर सदस्यांनी तर कधी असा लोकसंग्रह केलाच नाही. यांची कामे हवाईच राहात आल्याचे किरण बेदीच्या हवाई प्रवासाची जी चर्चा झाली त्यावरून सर्वांच्या लक्षात आलेच आहे. तरी देखील ज्यांनी जन चळवळी संघटीत करण्यात आणि चालविण्यात हयात घालविली त्यांना टीम अण्णाच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलना इतके काय पण त्याच्या पासंगाला पुरेल इतकेही यश लाभले नाही. म्हणूनच टीम अण्णाला लाभलेले जन समर्थन अचंब्यात टाकणारे आहे. असे समर्थन लाभण्या मागे अनेक कारणे आणि निमित्त पुढे केली जात आहेत. ती खरी असली तरी पुरेशी नाहीत हे लक्षात घेतले पाहिजे. हे आंदोलन उभे करण्यात आणि फैलावण्यात माध्यमांची भूमिका महत्वाची राहिली हे अण्णांचे म्हणणे खरे आहे. आंदोलनाच्या नेत्यांनी सर्व आधुनिक संपर्क साधनाचा सर्व शक्तीनिशी व पूर्ण क्षमतेने वापर केला हे वास्तव आहे. याच मुळे उघडकीस आलेली भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे अतिशयोक्त व भडक स्वरुपात लोकांच्या डोक्यात शिरवून लोकाची माथी भडकविणे मोठया प्रमाणात शक्य झाले . ज्या दूरसंचार घोटाळ्याचा उपयोग आंदोलन पेटविण्यासाठी झाला त्या दूरसंचार साधना मुळेच आंदोलन सर्वतोमुखी करता आले. पण हे सगळे खरे असले तरी यामुळे आंदोलनाची वातावरण निर्मिती होते , आंदोलनाला अनुकूलता निर्माण होते. पण प्रत्यक्ष आंदोलन उभारण्यासाठी कोणाला तरी पुढाकार घ्यावा लागतो. लोकांना रस्त्यावर उतरविण्यासाठी कोणालातरी घरोघरी संपर्क करावा लागतो. टीम अण्णा जवळ असे कोणतेही संगठन किंवा यंत्रणा नव्हती. ठिकठिकाणच्या स्वयंसेवी संस्थाचा त्यांना आधार होता हे खरे . पण आपल्याकडे या संस्थांच्या कामाची ज्या प्रकारे चर्चा होते त्यावरून भ्रष्टाचार विरोधी आंदोलन उभारण्यास अशा संस्था निरुपयोगी ठरतात. एखाद्या घटनेचे निमित्त होवून लोक अचानक रस्त्यावर उतरतात व त्याचे मोठया जन आंदोलनात परिवर्तन होवून मोठी उलथापालथ होते हे जगाने अनेकदा अनुभवले आहे. अगदी या आंदोलनाच्या काही दिवस आधीच अरब राष्ट्रात अशी आंदोलने उभी राहिलीत. तेथे अशी आंदोलने उभी राहण्या मागे विशिष्ठ अशा एखाद्या घटनेकडे अंगुली निर्देश करता येईल. पण जन लोकपाल साठीच्या आंदोलनास अशी एखादी घटना कारणीभूत होवून लोक अचानक रस्त्यावर उतरले अशा तऱ्हेचे हे उत्स्फूर्त आंदोलन नक्कीच नव्हते. हे ठरवून केलेले आंदोलन होते. पण आंदोलनाचा मुद्दा लोकांना भावला आणि रस्त्यावर येण्यासाठी आवाहन करण्यात ज्यांनी पुढाकार घेतला त्यांना लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला ही वास्तविकता आहे. लोकांना असे बाहेर काढण्यास कोणी पुढाकार घेतला ? याचे खरे उत्तर संघ परिवार असेच येईल. लोकांना बाहेर काढण्यात अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवर आदर व मान्यताप्राप्त व्यक्ती दिसत असल्या तरी आपण मागे राहून अशा व्यक्तींना पुढे करण्यात ,त्यांना बळ पुरविण्याची संघाची कार्यपद्धती राहिली आहे. म्हणूनच हे आंदोलन अनेकांच्या खांद्यावर उभे राहिल्याचे दिसले तरी त्याच्या तळाशी संघ परिवार होता हे प्रत्येक ठिकाणी झालेल्या आंदोलनाचा अभ्यास केला तर हाच निष्कर्ष निघेल . टीम अण्णाने मात्र हे वास्तव लक्षात घेतले नाही किंवा ते लक्षात घेणे सोयीचे न वाटून सोयीस्कर पणे दुर्लक्ष तरी केले. आंदोलन आपण उभे केले आणि लोक आपल्याच मागे आहेत या संभ्रमात राहिल्याने आंदोलनाचा फज्जा उडाला असे आता संघ परिवार उघडपणे बोलू आणि लिहू लागला आहे. टीम अण्णाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आधार नाकारण्याचा प्रयत्न केल्यानेच आंदोलन कोलमडले अशा निष्कर्षाप्रत संघाचे विचारवंत आले आहेत आणि संघ विचारसरणीच्या नियतकालिकात तसे लिखाणही प्रसिद्ध होवू लागले आहे. हा निष्कर्ष चुकीचा ठरविता येईल अशी परिस्थिती नाही. कॉंग्रेस राजकीय हेतूने बोलत असेल पण या आंदोलना मागे संघ परिवार उभा आहे असे काँग्रेसेतर विरोधकांची देखील धारणा होती आणि त्या धारणेच्या आधारावर या आंदोलनाला प्रखर विरोध झाला आणि होतो आहे हे मान्यच करावे लागेल. आंदोलन विरोधकांची धारणा बरोबर असल्याची पुष्टी स्वत: संघ परिवार करू लागला आहे. त्यामुळेच आंदोलन उभे करण्यामागे ज्या शक्ती कार्यरत होत्या त्यात संघ ही महत्वाची ताकद होती आणि ही ताकद दुर झाल्याने आंदोलन कोलमडले हा निष्कर्ष सहजा सहजी उडवून लावता येणारा नाही. आंदोलनात संघाची ताकद होती हे मान्य केले तरी संघ व टीम अण्णा हातात हात घालून हे आंदोलन चालवीत आहेत हा आंदोलन विरोधकाचा आरोप मात्र ओढून ताणून केल्या सारखा वाटतो. अर्थात यामुळे निष्कर्षात फरक पडत नाही हे खरे.

संघाच्या पुढाकाराची कारणे

संघ भ्रष्टाचारा विरोधात बोलत असला तरी भ्रष्टाचारात लिप्त स्वयंसेवका विरुद्ध कारवाई करण्याच्या भानगडीत संघ कधीच पडलेला नाही. भ्रष्टाचारात एखादा स्वयंसेवक सापडला तर 'स्वयंसेवक नापास झाला' अशी माफक प्रतिक्रिया संघा कडून व्यक्त होत असते. पण भ्रष्टाचारी स्वयंसेवकाला शाखेत येण्यावर बंदी घालण्याची शिक्षा संघाने कधीच कोणत्या स्वयंसेवकाला दिलेली नाही. त्यामुळे भ्रष्टाचार निर्मूलना बाबत संघ गंभीर आहे आणि म्हणून तो या आंदोलनात पुढे आहे असे मानता येत नाही. या चळवळीचा फायदा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला व्हावा एवढ्या एका कारणासाठी संघ सर्व शक्तीनिशी उतरला असे म्हणणे चुकीचे नसले तरी एकांगी नक्कीच आहे. संघ आणि संघ स्वयंसेवकांना अण्णा हजारेंचे आकर्षण आहे म्हणून संघ या चळवळीत नक्कीच नाही. मात्र अण्णा आंदोलनाची जन लोकपाल संकल्पना ज्यात एकाधिकारशाहीचे स्पष्ट दर्शन आहे ती संघ विचारसरणीच्या जवळची असल्याने संघ मनापासून या चळवळीत सामील झाला हेच संघ सहभागाचे समर्पक कारण पुढे येते. याच आकर्षणापायी संघाचा आदेश नसता तरी संघ स्वयंसेवक चळवळीच्या दुर राहू शकले नसते. टीम अण्णाची जन लोकपाल संस्थेची रचना आणि आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची एकचालकानुवर्ती संस्था आणि समाज याची संकल्पना यात असलेले साम्य याने टीम अण्णा आणि संघ यांच्यात दुव्याचे काम केले आहे. या दोघांचा संघटनात्मक पातळीवर काही संबंध नसला तरी त्यांची नाळ एकाधिकारवादी एकचालकानुवर्तीत्व संकल्पनेशी जोडलेली आहे. तन मन धनाने संघ या आंदोलनात उतरला तो त्याची ही संकल्पना अण्णा आंदोलनातून आकाराला येण्याची शक्यता निर्माण झाली म्हणून. भाजपा चा राजकीय फायदा ही संघासाठी अग्रक्रमाची नव्हे तर अनुषंगिक बाब होती . संघाची अण्णा आंदोलनाशी जुळलेली नाळ विचाराची आहे किंवा होती असे म्हणता येईल. एकाधिकारशाहीचे किंवा हुकुमशाहीचे आकर्षणच नाही तर वेड असलेले संघेतर समूह या आंदोलनात हिरीरीने आणि आक्रमकपणे सहभागी झाले ते याच कारणासाठी. त्यांना त्यांच्या कल्पनेतला शासक जन लोकपालच्या रुपात दिसतो आहे. आंदोलनाचे सगळे संघटक एकाधिकारवादी जन लोकपाल ने भारावलेले तर आंदोलनात सामील सर्व सामान्य जनता भ्रष्टाचाराचा प्रश्न धसास लागेल किंवा मार्गी लागेल या अंध विश्वासापायी आंदोलनाकडे आकर्षित झालेले असा हा तिढा आहे. त्याच मुळे संसदेत आलेल्या लोकपाल विधेयकाने पूर्णपणे नाही तरी काही अंशी भ्रष्टाचाराचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होईल यात समाधान मानून सर्व सामान्य लोक आंदोलना पासून बाजूला झाले आहेत, तर आपल्या कल्पनेतील एकाधिकारवादी व एकचालकानुवर्ती जन लोकपाल आणण्यासाठी काहींचे धडपडणे सुरु राहिल्याने आंदोलना बाबत गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यात कॉंग्रेसने संघाचा आणि टीम अण्णाचा संबंध जोडण्याचा वारंवार प्रयत्न केल्याने टीम अण्णा संघाचे आंदोलनातील योगदान विसरून संघाला सतत झिडकारू लागली. दिग्विजय सिंह हा अण्णा आंदोलनाचा नेहमीच कुचेष्टेचा विषय राहिला आहे . दिग्विजय यांनीच हा मुद्दा वेळोवेळी ताणून धरून टीम अण्णाला संघापासून दुर करण्यात यश मिळविले. अनायासे भाजपचा राजकीय फायदा होण्याची परिस्थिती निर्माण झाल्याने आणि एकाधिकारवादी जन लोकपाल येण्याची शक्यता मावळल्याने टीम अण्णाच्या लाथा खाऊन आंदोलनात राहण्यापेक्षा बाहेर पडून टीम अण्णाला आपल्या शक्तीचे भान करून देणारा मार्ग संघाने पत्करला. भाजप ने टीम अण्णाला हवा असलेला एकत्रित लोकपाल व लोकायुक्त कायदा धुडकावून संसदेत ही संघ शक्तीविना अण्णा काहीच करू शकत नाहीत याची जाणीव करून दिली आहे. मुंबईत संघाच्या भूमिकेचा परिणाम दिसून आला व टीम अण्णाला संघ शक्तीची आठवण आली. संघाशी संबंध असल्याच्या कारणावरून बाबा रामदेव यांना आंदोलनापासून दुर ठेवणाऱ्या टीम अण्णाला बाबा रामदेव साठी पायघड्या टाकायला लावून संघाने आपल्या शिवाय अण्णांचे आंदोलन चालू शकत नाही हे टीम अण्णाला दाखवून दिले आहे. पण टीम अण्णा कॉंग्रेस व दिग्विजय सिंह यांनी टाकलेल्या सापळ्यात अडकल्याने त्यांना संघाला जवळ करणे शक्य होत नाही आणि संघाशिवाय आंदोलन चालविणेही अशक्य बनले आहे . टीम अण्णा संभ्रमात आहे असे जे सांगितले जाते तो संभ्रम नेमका हा आहे. यावर दुसरा उपाय होता , पण तो अंमलात आणायचे नाकारून टीम अण्णाने आंदोलनाचे मोठे नुकसान केले आहे. स्वत: अण्णा हजारे यांनीच हा मार्ग सुचविला होता. सध्याच्या टीम ची पुनर्रचना करून सर्वसमावेशक व व्यापक अशी नवी टीम बनविण्याची गरज व इच्छा त्यांनी बोलून दाखविली होती. त्यांची कल्पना प्रत्यक्षात आली असती तर आंदोलनाला स्वत:चे संगठन लाभले असते व संघावर अवलंबून राहण्याची पाळी टीम अण्णा वर आली नसती. पण त्यामुळे आजच्या टीमची म्हणजे केजरीवाल , बेदी आणि भूषण यांची आंदोलनावरील आणि अण्णा वरील पकड सैल झाली असती . नेतृत्वात भागीदार वाढण्याच्या भीतीपायी आजच्या टीम अण्णाने अण्णांच्या आणि आंदोलनाच्या प्रभावाला ओहोटी लावली आहे.

(समाप्त)

सुधाकर जाधव

मोबाईल- ९४२२१६८१५८

पांढरकवडा ,

जि. यवतमाळ

2 comments:

  1. That is a real & original analysis of the present situation. I do not think any one else has explored this angle in such a depth as you have done.I think you have put up a marvelous theory about Anna's debacle, atheory which is not only intellectually attractive but also practically possible! Sanjeev

    ReplyDelete
  2. ठाकरे कंपनी बामणी कि मराठी
    मराठा आरक्षणासह सगळ्याच्याच आरक्षणाला विरोध
    देशभरातील सर्व क्लास वन. & क्लास टु आधिकारी हे बामण आहेत हे माहित आसून सुध्दा तोँडात दादुचं आसल्याने त्याबद्दल तोँड ऊघडत नाही.
    ह्यानी दादूच्या प्रेमापोटी शिवाजी महाराज नावाचे पुण्यातील सभाग्रह फोडले
    मराठी दिवस हा ईग्रजी रद्दितील पुस्तके वाचुन मराठीत भाषांतर करणाऱ्‍या शिरवाडकर बामणाच्या नावाने साजरा करतात
    दादु सेनेची (शिव) सत्ता आल्यावर जोश्याला साडेचार वर्ष मुख्यमंत्री बनवले
    आरबी समुद्रातील शिवरायाच्या स्मारकाला विरोध ह्या शेणाप्रमुखानी केला
    आयुष्यभर शिवाजी महाराजाच्या नावावर करोडो रु. कमवुन शेवटि शिवरायाच्या स्मारकाला विरोध केला काय म्हणाव ह्या मराठीला?
    मराठीच्या नावाने बोंबलणाऱ्‍याना आट्टल बिहारी चालतो, कारण बामण गुजराती मोदी चालतो पण मराठी छगण भुजबळ चालत नाही ह्या मराठीवाल्याना तेंडुलकर चालतो पण रणजी प्लेयर सदु शिंदे चालत नाही
    ह्याना आण्णाभाऊ साठे लेखक चालत नसून शिरवाडकर बामण लागतो ह्याच्या तोडांत क्रातिसीह नाना पाटिल येत नसून माफीवीर सावरकर येतात कारण बामण
    हे आद्य क्रातीवीर म्हणून फडकेच सागतात कारण बामण ऊमाजी नाईक चालत नाहित ह्याना शिवाजी महाजावर प्रेम नसुन दादु वर आहे काय म्हणाव या मराठीला?जिजाऊ मातेचा पुत्र तो मराठ्यांचा राजा होता,
    झुकला नाही कोणापुढे मुघ्लाचा तो बाप होता;
    कोणी चुकले तर त्याला सत्याची वाट दखवा,
    कोणी नडत असेल तर त्याला मराठ्याची जात दाखवा........

    ReplyDelete