Thursday, September 10, 2015

शेतकऱ्याला भिकारी बनवू नका !

ज्यांना ज्यांना शेती आणि शेतकऱ्यासाठी काही तरी करावेसे वाटते त्यांनी शेतकरी कुटुंबाना वैयक्तिक मदत करीत फिरू नये. त्याऐवजी स्वत:चे भांडवल टाकून बाजारातून भांडवल उभे करावे आणि शेतकऱ्यांना बीज भांडवल म्हणून पुरवावे. मानवीय दृष्टीकोनातून निर्माण झालेल्या मदतीच्या प्रेरणेला व्यावसायिक स्वरूप दिले तर ती मदत कायम स्वरूपी होईल.
----------------------------------------------------------------------------------------------


तरुणपणी जग बदलायला निघालेल्या टोळीत सामील झालो तेव्हा भयाण वास्तवाचा सामना करण्यासाठी लढायची प्रेरणा देणारी गाणी म्हणायचो. त्यातील एक होते ' लाख मौत हो मगर मनुष्य कब मरा' ! शेतकरी चळवळीत पडलो तेव्हा या ओळीचा खरा अर्थ उमगला. आदिम काळापासून हालअपेष्टा, दुष्काळ ,अतिवृष्टी, रोगराई आणि दारिद्र्य याला बळी पडलेला एकमेव व्यावसायिक समाज हा शेतकऱ्यांचा आहे. प्रतिकूलतेशी चिवट झुंज देत मरणाराच्या सरणाला अग्नी देत पुन्हा निसर्गाशी आणि सुलतानाशी लढायला उभा राहणारा हा समाज आहे. निसर्गाच्या लहरीपणाने आणि सुलतानांच्या क्रूरतेने सर्वाधिक बळी या समाजातील जावूनही शेतकरी संपला नाही. स्वातंत्र्या नंतर सुलतानशाही बदलली तेव्हा सुलतानांच्या क्रूर चेहऱ्याची जागा धूर्त चेहऱ्यांनी घेतली. चिवटपणे परिस्थितीशी झुंज देवून परिस्थितीवर मात करणाऱ्या या समुदायाची झुंज संपविण्यासाठी त्याला लाचार बनविण्याचा फासा या धुर्तानी फेकला आणि डाव साधला. प्रलयात पोहून किनाऱ्याला लागणारा शेतकरी पुरुषभर पाण्यातच गटांगळ्या खाऊ लागला. मदतीसाठी ओरडू लागला. पुरुषभर पाण्यातून त्याला वाचविण्याचे नाटक करणारे राज्यकर्ते त्याचे उद्धारकर्ते म्हणून मिरवू लागलेत. असे उद्धारकर्ते म्हणून मिरवायचे असेल तर शेतकरी असाच गटांगळ्या खात राहील अशी तरतूद तशाप्रकारची धोरणे राबवून करण्यात आली आहे. स्वबळावर आणि सामुहिकपणे समस्यांवर मात करण्याची जिद्द आणि हुनर विसरलेल्या शेतकऱ्याला त्याचे आत्मभान जागे करण्याचे सर्वात मोठे आव्हान समोर उभे असताना समाजातील विचार करणारी , आपल्या क्षेत्रात झगडून नाव आणि यश मिळविलेली मंडळी सरकारपेक्षा वेगळे काय करता येईल याचा विचार न करता सरकारच्या पावलावर पावले टाकून शेतकऱ्याला मदतीकडे डोळे लावून बसलेला याचक बनवीत असतील तर शेतकरी समुदाय कायम गटांगळ्या खात राहील. वर येण्यासाठी सतत त्याला कोणाच्या तरी मदतीचा हात लागेल. एव्हाना माझ्या लिहिण्याचा रोख वाचकांच्या लक्षात आला असेल. होय मी सिने अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी हाती घेतलेल्या मोहिमे बद्दलच बोलत आहे.



सत्तापक्ष आणि विरोधीपक्ष संकटात सापडलेल्या शेतकऱ्याची जबाबदारी एकमेकावर ढकलत राजकारण खेळण्यात मग्न असताना मराठी माणसात लोकप्रिय असलेले हे दोन अभिनेते आपला वेळ आणि पैसा खर्च करून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावून येतात त्याबद्दल त्यांचे मोकळेपणाने कौतुक केले पाहिजे. या दोन अभिनेत्यांनी लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील स्वत:च्या कमाईतील पैशातून ११३ शेतकरी कुटुंबाना प्रत्येकी १५-१५ हजार रुपयाची मदत स्वहस्ते वाटत या कुटुंबाना धीर दिला आहे. यात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाचा समावेश आहे.  शेतकऱ्याच्या आर्थिक चादरीला एवढे भोके आहेत की या चादरीवर पडलेले १५००० टाकल्या टाकल्या कुठे गायब झाले असतील हे नाना आणि मकरंदला कळलेही नसेल. या अभिनेत्यांची पाठ फिरताच मदत केलेल्या कुटुंबाची परिस्थिती जैसे थे झाली असेल. गावागावातून फिरल्याने शेतकऱ्यांची दैना या दोन अभिनेत्यांच्या लक्षात आली असेल . त्यामुळे त्यांनी लोकांना मदतीचे आवाहन केले असून आपण स्वत: ती मदत गरजू शेतकरी कुटुंबां पर्यंत पोचवू असे आश्वासन त्यांनी दिले आहे. त्यांनी केलेल्या मदतीचे कौतुक झाल्याने अनेकांना अशी मदत करण्याची प्रेरणा होईल आणि लोक मदतीसाठी धावून जातीलही. ज्यांना नाना आणि मकरंद सारखा स्वत:च्या खिशातून पैसा खर्च न करता शेतकऱ्यांसाठी खुप काही केले आहे हे दाखवायचे आहे ते खंडणी गोळा करून पैसे वाटतील आणि पुण्य कमावतील. मनसे नेते राज ठाकरे यांनी त्याचे सुतोवाच केले आहेच. गणपती आणि दुर्गादेवी साठी वर्गणी गोळा करणाऱ्याच्या टोळ्या फिरतात तशा दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्याच्या मदतीसाठी वर्गणी गोळा करणाऱ्या टोळ्या शहरा-शहरातून फिरताना दिसण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी सद्हेतूने सुरु केलेल्या उपक्रमाची अशी परिणती होण्या आधीच हा उपक्रम थांबविण्यापेक्षा या उपक्रमाचे स्वरूप बदलण्याची गरज आहे.


आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवांना मदतीची गरज कोणीच नाकारणार नाही. घरातील कर्ता पुरुष गेल्यामुळे कुटुंबाला कसे पोसायचे हा त्यांच्या समोरचा प्रश्न आहे. हा प्रश्न अशा मदतीने सुटणारा नाही. मदत पाहिजे ती त्यांना त्यांच्या पायावर उभे करण्याची. त्या कमावत्या होवून कुटुंबाचा भार पेलण्यास समर्थ होतील याची. त्यांच्यासाठी गृहउद्योग उभा करून उत्पादित मालाच्या विक्रीची साखळी तयार करण्याची. मदतीचे रुपांतर बीज भांडवलात होणार नसेल तर दिलेली मदत कितीही चांगल्या भावनेने केलेली असली तरी ती भीक ठरते. अशा भिकेची सवय लागली की मग अशा मदतीकडे डोळे लावून बसण्याची सवय लागते. एखादेवेळी विधवांना मदत करून काही काळासाठी त्यांचा प्रश्न सोडविता येईलही. रोज आत्महत्या करणारे शेतकरी आणि त्यातून विधवा स्त्रियात दररोज पडणारी भर त्यामुळे रोखता येणार नाही. हे सगळे टाळायचे असेल तर भांडवल पुरविण्याची व्यवस्था उभी करणे हीच शेती , शेतकरी आणि त्यांच्या विधवांसाठीची सर्वात मोठी मदत ठरेल. याचा दुसरा अर्थ शेतकऱ्यांना व्यक्तिगत मदत करण्यापेक्षा भांडवल पुरविणाऱ्या संस्था निर्माण करण्याची जास्त गरज आहे. मदत करणारे मदत करून मोकळे होतात आणि पुण्य कमावल्याच्या भ्रामक समाधानात जगतात. भांडवल पुरविणाऱ्या संस्थाना असे 'नेकी कर कुए मे डाल' असे करता येणार नाही. भांडवल पुरविणाऱ्या संस्थाना लाभाची अपेक्षा राहील आणि तशी ती राहालायाच हवी. त्यासाठी त्या संस्थेला सतत शेतकऱ्याच्या संपर्कात राहणे , अधिक फायदा कसा करून घेता येईल या बाबतचे आदानप्रदान करणे जरुरीचे राहील. शेतीत गरजेचे असलेले नवे तंत्रज्ञान याच मार्गाने येणार आहे. सरकार नोकरशाहीच्या कह्यात आणि विळख्यात आहे. त्यांचे चोचले पुरविणे हेच त्याचे काम होवून बसले आहेत. शेतीत टाकण्यासाठी सरकार जवळ भांडवलही नाही आणि इच्छा व दृष्टी तर नाहीच नाही. त्यामुळे ज्यांना ज्यांना शेती आणि शेतकऱ्यासाठी काही तरी करावेसे वाटते त्यांनी स्वत:चे भांडवल टाकून बाजारातून भांडवल उभे करावे आणि शेतकऱ्यांना बीज भांडवल म्हणून पुरवावे. मानवीय दृष्टीकोनातून निर्माण झालेल्या मदतीच्या प्रेरणेला व्यावसायिक स्वरूप दिले तर ती मदत कायम स्वरूपी होईल. शेतकऱ्यांच्या भल्यासाठी धडपडणाऱ्या विदर्भ जनआंदोलन समितीच्या किशोर तिवारी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारने जे वसंतराव नाईक सहाय्यता मिशन स्थापन केले आहे ते तेव्हाच सफल होईल जेव्हा या मिशनच्या हाती शेतकऱ्यांना भांडवल आणि तंत्रज्ञान पुरविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी आणि त्याचा उपयोग करण्याचे अधिकार देईल. अशा निधी अभावी मिशन काही तरी करते आहे हे दाखविण्यासाठी शेतकऱ्यांनी नगदी पीके न घेता अन्नधान्य पिकवावे असा निरर्थक आणि बाष्कळ सल्ला देण्या व्यतिरिक्त मिशन काहीही करू शकणार नाही.


दुसऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले पाहिजे हे सांगत असताना शेतकऱ्यांनी स्वत:साठी काय केले पाहिजे याचाही विचार झाला पाहिजे. किंबहुना हा विचार जास्त महत्वाचा आहे. उद्या बीजभांडवल देणाऱ्या कंपन्या उभ्या राहिल्या तरी त्यांना वैयक्तिक शेतकऱ्या पर्यंत पोचणे किंवा व्यक्तिश: शेतकऱ्यांना त्यांच्या पर्यंत पोचणे हे व्यावहारिक नाही. भांडवल देणारी कंपनी असेल तशी शेतकऱ्यांची भांडवल स्विकारणारी कंपनी देखील लागेल. आजच्या घडीला शेतकऱ्यांच्या मोठ्या कंपन्या उभ्या राहण्यात शेतकऱ्यांच्या मानसिकतेसह अनेक व्यावहारिक अडचणी आहेत. थोडासा समजूतदारपणा आणि शहाणपणा दाखवून शेजारी-शेजारी शेती असलेल्या १५-२० शेतकऱ्यांनी एकत्र येवून त्यांच्या शेतीची प्रायवेट लिमिटेड कंपनी स्थापन करता येणे अवघड नाही. शहरातील ज्यांना शेतकऱ्यांसाठी मनापासून काही करावेसे वाटते त्यांनी अशा कंपन्या स्थापित करण्यासाठी शेतकऱ्यांना तयार करावे , त्यांची तांत्रिक मदत करावी. खरे तर वसंतराव नाईक शेतकरी सहाय्यता मिशनने हे आपले काम मानले तर फार मोठे काम केल्याचा मान आणि समाधान या मिशनला मिळेल. दुसऱ्या एका कारणाने शेतीच्या अशा प्रायवेट लिमिटेड कंपन्या स्थापण्याची गरज आणि योग्य वेळ देखील हीच आहे. सातवा वेतन लागू होवू नये अशी आपली कितीही इच्छा असली तरी तो रोखून धरण्याची ताकद आणि क्षमता आपल्यात नाही. हा वेतन आयोग लागू झाल्यावर राज्यसरकारांचे दिवाळे निघणार असले आणि शेतीक्षेत्रासाठी पैसा पुरविण्याची त्यांची क्षमता संपणार असली तरी फार मोठ्या संख्येतील नोकरदारांच्या हातात फार मोठा पैसा खुळखुळणार आहे. जमीनजुमला खरेदी करण्याची त्यांची इच्छा होणार पण भडकलेल्या किंमती त्यातील अडथळा ठरणार. अशावेळी शेतीच्या प्रायवेट लिमिटेड कंपनीचे शेअर्स त्यांना उपलब्ध करून देता आले तर त्यांची इच्छापूर्ती होईल आणि शेतीसाठी भांडवल उपलब्ध होईल. शेतीच्या प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या उभ्या राहिल्या तर शेती न करण्याची मानसिकता बनवून घेतलेल्या ग्रामीण तरुणांना कामाचे एक आकर्षक क्षेत्र खुले होईल . पानठेल्या भोवती सदैव घुटमळत गुटका खावून भारत अस्वच्छ करणाऱ्या आणि कुटुंबासाठी चिंतेचा विषय ठरलेल्या तरुणाईला काहीतरी करून दाखविण्याचे आव्हानात्मक पण आकर्षक असे काम या प्रायवेट लिमिटेड कंपन्या निर्माण झाल्या तर मिळणार आहे.

-----------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव , पांढरकवडा , जि. यवतमाळ

मोबाईल - ९४२२१६८१५८
------------------------------------------------------------------------------------

5 comments:

  1. योग्य प्रतिक्रिया..मी शेअर करतोय

    ReplyDelete
  2. it's a thought provoking article. Liked. Will think about your proposal & revert back. Kindly read my blog. It's link is given below my mail.

    ReplyDelete
  3. अगदी बरोबर
    फ़ेसबूक आणि वाटसअ‍ॅपवर शेअर करत आहे.

    ReplyDelete
  4. खूप धाडशी लेख ... भावनेत वाहत न जाता केलेले विश्लेषण

    ReplyDelete
  5. सुधाकरजी, आपण विधायक आणि प्रॅक्टीकल सुचना केली आहे. या मार्गाने जाणे गरजेचे बनले आहे, याबात भांडवल गुंतवणूक करु ईच्छीणारे आणि शेतकरी यांचा समन्वय होणे गरजेचे आहे. सामुहीकपणे उद्योग-व्यवसाय उभारणे आणि ते सुव्यवस्थीत चालवणे याची आपल्याकडे पूर्वपरंपरा नाही, आणि सद्यस्थितीत असे अनुकूल वातावरण पण नाही, तरी पण यापुढे कंपनी कन्सेप्ट शिवाय अन्य चांगला पर्याय नाही. कोणत्याही उद्योगात भांडवल हा घटक महत्वपूर्ण असतो, तसा तो शेतीसाठी पण महत्वाचा आहे, परंतु शेतीसाठी आवश्यक तितक्या आणि योग्य त्या वेळी सातत्याने भांडवलाचा अभाव राहिलेला आहे. याशिवाय पाणी, वीज आणि रस्ते या मूलभूत सोयींचा तर नेहमीच दुष्काळच राहिलेला आहे.
    केवळ निसर्गावर अवलंबून असलेला आणि सतत रिस्कमध्ये असलेल्या या व्यवसायास आवश्यक त्या पाणी, वीज आणि रस्ते या मुलभूत सुविधा आणि आवश्यक तेवढे भांडवल योग्य वेळी मिळाले तर, बाकीच्या सोयी शेतकरी आपल्या बळावर करण्यास समर्थ होय़ शकतो, आणि त्याला कर्गमाफीची अपेक्षा करण्याची गरजसुध्दा पडणार नाही. याशिवाय शेतीच्या क्षेत्रावर आधारीत बॅंकानी कायमची क्रेडीट व्यवस्था स्वीकारली तर यात बॅंका आणि शेतकरी या दोघांचाही फायदा होणार आहे. या सर्व प्रकारच्या उपाय-योजना अमलात आणणे या कांही अशक्य कोटीतील बाबी नाहीत, फक्त सध्या दुष्काळ आहे तो ईच्छाशक्तीचा.
    वर उल्लेखित सर्व उपाय-योजना या दिर्घपल्ल्याच्या विकासासाठी आहेत. आता या घडीला आत्मह्त्याग्रस्त शेतकरी कुटंबांना तातडीची मदत देणे गरजेचे आहे, त्याशिवाय दुष्काळाच्या अनुषंगाने योग्य त्या तातडीच्या उपाय-योजना करणे पण गरजेचे आहे.

    ReplyDelete