Thursday, September 17, 2015

शेतीचा खुळखुळा

कृषिमंत्री महोदय , वेद्काळावर  तुमचे खरेच प्रेम असेल आणि  तुमच्यासाठी तो सुवर्णकाळ असेल तर फुंकर मारण्याची बुवाबाजी शिकविण्यापेक्षा वेदकाळात किती लोक शेतीवर होते याचा अभ्यास करा. तेवढेच लोक शेतीवर ठेवा आणि बाकी सगळ्या लोकांना दुसऱ्या उद्योगधंद्यात सामील करून घ्या. शेतीवरचे लोकसंख्येचे ओझे वेदकाळा इतके कमी करा आम्ही तुमचे वेद डोक्यावर घेवून नाचू.
----------------------------------------------------------------------



देशाचे कृषी क्षेत्र किती संकटात आहे , शेतकरी किती विपन्नावस्थेत आहे याची आता सगळ्यांनाच कल्पना आली आहे. शेतीवर जगणाऱ्यांचे जगच दुसरे असल्याने या जगाविषयी विचार करण्याची गरज आणि वेळ कोणाकडे नाही. अशा दुर्लक्षित शेतकऱ्याकडे लोकांचे लक्ष जावे आणि हसू हरवलेल्या शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर हसू फुलवावे असे फक्त या देशाच्या राधामोहनसिंग नामक कृषीमंत्र्याला वाटत असावे असे त्यांच्या वक्तव्यावरून वाटत असते. काही महिन्यापूर्वी या कृषीमंत्र्याने शेतकरी आत्महत्येचे नामी कारण शोधून काढले होते हे सर्वाना आठवत असेलच. प्रेमभंग शेतकरी आत्महत्येचे एक कारण असल्याचे सांगून उन्हातान्हात राबून काळ्या पडलेल्या आणि मातीत राहून कळकट मळकट झालेल्या शेतकऱ्याला कल्पनेच्या विश्वात नेवून आनंदी केले होते. परिस्थितीने गांजलेल्या शेतकऱ्याला घरात दोन प्रेमाचे शब्द बोलणे अशक्य होवून बसलेले असतांना आमचे कृषिमंत्री त्याच्या आयुष्यात प्रेमिका घेवून आले होते. शेतकऱ्याच्या पोराला पोरगी द्यायला , कोणतीही पोरगी लग्न करून शेतकऱ्याच्या घरात नांदायला तयार नसतांना कृषीमंत्र्यांना मात्र जुन्या हिंदी सिनेमात पिक डोलत असलेल्या शेतात प्रेमगीत गात असलेले शेतकरी जोडपे दिसत होते. बहुधा तरुणपणी कृषिमंत्र्यांना सिनेमे पाहायचा फार छंद असावा. त्यामुळे त्यांना सर्वत्र हिरवाई आणि माणसेही हिरवे दिसत असावी. कृषी संकटामागे  त्याचमुळे त्यांनी फिल्मीस्टाईल प्रेमभंगाचे कारण शोधून काढले असावे. त्यांच्या या वक्तव्याने उमटलेले ओरखाडे भरून येत असतानाच कृषीमंत्र्याचे आता दुसरे वक्तव्य आले आहे. सरकार आता शेतकऱ्याला थेट वेदकाळातील शेती करायची पद्धत शिकविणार असल्याचे कृषीमंत्र्याने जाहीर केले आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना राजयोग शिकावा लागणार आहे. आता हा राजयोग काय आणि कसा असतो हे त्यांनी सांगितले नाही. पण शेतकऱ्याच्या शुष्क जीवनात प्रेमिका आणून जशी काल्पनिक बहार निर्माण केली होती तसा दरिद्री शेतकऱ्याला त्याच्या आयुष्यात राजयोगाचा आभास निर्माण करणारा हा नवीन नुस्खा त्यांनी शोधून काढला असावा .पुढेमागे सरकारी बाबा असलेले बाबा रामदेव किंवा दुसरे सरकारी संत श्री श्री रविशंकर महाराज या राजयोगावर प्रकाश टाकतील आणि कंगाल शेतकऱ्यांना तो कसा करायचा हे फुकट शिकवतील. म्हणजे सरकार काय द्यायचे ते त्यांना देईलच , शेतकऱ्याला काही द्यावे लागणार नाही अशी आशा करायला हरकत नाही. या राजयोगाने म्हणे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढून त्याच्या अंगी दैवीशक्तीचा संचार होणार आहे. राजयोगी शेतकऱ्यात संचार करणाऱ्या शक्ती त्याच्या एका फुंकरी सरसी त्याने शेतीसाठी आणलेल्या बियाणात शिरणार आहे. दैवी शक्तीने लैस बियाण्यावर मग हवामान बदलाचा परिणाम होणार नाही की ओल्या किंवा सुक्या दुष्काळाचा परिणाम होणार नाही . स्वत: देशाचे प्रधानमंत्री विज्ञान परिषदेत वेदकालीन विमानाच्या भराऱ्या मारतात तिथे राधामोहनसिंग यांनी वेदकालीन शेतीचा कल्पना विलास केला तर त्यांना काय आणि कशासाठी दुषणे द्यायचे. देशाचे कृषिमंत्री असलेले राधामोहनसिंग यांचे हे वक्तव्य पाहिले कि सरकारला शेतीच्या संकटाचे गांभीर्य नाही किंवा शेती संकट दूर कसे करायचे हे अजिबात कळत नाही. या सरकारचे संरक्षक आणि मार्गदर्शक असलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत विज्ञाननिष्ठ बनण्याचा सल्ला देत आहेत तर कृषीमंत्री  मंत्राने शेती कशी फुलवायची याचे धडे देत आहे.

शेतकऱ्याचा राजयोगाने आत्मविश्वास वाढविण्याचा आचरट प्रयत्न करण्या आधी कृषीमंत्र्याने त्यांच्याच मंत्रालयात धूळ खात पडलेले अहवाल आधी वाचून काढावेत. शेतकरी नेते शरद जोशी यांनी तयार केलेला अहवाल धूळ खात पडला आहे. त्यांनतर शेतीशास्त्रज्ञ स्वामिनाथन यांनी तयार केलेला अहवालही तसाच पडून आहे. कृषीमंत्र्यांनी वेदपठन करायला आणि वेदकालीन मंत्राचा छंद म्हणून शोध घ्यायला कोणाची हरकत असण्याचे कारण नाही. ते काम त्यांनी घरात बसून खुशाल करावे. त्याच्या आधी लोकांनी त्यांना ज्या कामासाठी निवडून दिले आणि सरकारात त्यांच्यावर जी जबाबदारी येवून पडली ती आधी पार पाडली पाहिजे. वेदकाळात जाण्यापेक्षा तुमच्या कार्यालयातील कपाटात पडलेल्या या अहवालातून शेती समस्या आणि त्याच्या वरील करावयाच्या उपाययोजना कळतील. स्वामीनाथन अहवालातील उत्पादन खर्च अधिक ५० % नफा हे हमीभावाचे सूत्र तुमच्या पक्षाने आणि तुमच्या नेत्याने निवडणूक प्रचारात मान्य केले होते ते लागू करण्याऐवजी कसली वेदकालीन शेती शिकवता शेतकऱ्याला. वेद्कालावर तुमचे खरेच प्रेम असेल आणि तो तुमच्यासाठी तो सुवर्णकाळ असेल तर फुंकर मारण्याची बुवाबाजी शिकविण्यापेक्षा वेदकाळात किती लोक शेतीवर होते याचा अभ्यास करा. तेवढेच लोक शेतीवर ठेवा आणि बाकी सगळ्या लोकांना दुसऱ्या उद्योगधंद्यात सामील करून घ्या. शेतीवरचे लोकसंख्येचे ओझे वेदकाळा इतके कमी करा आम्ही तुमचे वेद डोक्यावर घेवून नाचू.

या सरकारातील लोकांना स्वत:चे काम कळत नाही , पण शेती कशी करायची हे शेतकऱ्यांना शिकवायची दांडगी हौस आहे. तशी शेती न केलेल्या प्रत्येकाला ती असतेच. त्यामुळे शेतीसाठी स्वत: काय करायला पाहिजे हे विसरून शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे याचे ज्ञान पाजळणारे भरपूर सापडतील. केंद्रातील कृषीमंत्र्याची ही तऱ्हा तर राज्याच्या कृषीमंत्र्याची वेगळीच तऱ्हा. ते म्हणे सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देणार आहेत. तशी शेती करून हाती काही लागले नाही म्हणून शेतकरी दुसरीकडे वळला तर हे पुन्हा त्यांना तशा शेतीचे गाजर दाखवीत आहेत.या देशातील शेतकऱ्यांना शेती कशी करायची हे कोणी शिकविण्याची आवश्यकता नाही. सर्व प्रकारच्या प्रतिकूलतेवर मात करीत त्याने शेती पिकविली आहे. त्याचे काम त्याला करू द्या. तुम्ही तुमचे काम नीट आणि चोख करीत नाहीत ही खरी अडचण आहे. शेतीचा तुम्ही खुळखुळा बनविला आहे. लहान मुलगा रडला की खुळखुळा वाजवून त्याला शांत करतात तसे शेतीविषयक काल्पनिक भराऱ्याचा खुळखुळा वाजवून शेतकऱ्याला शांत करण्याचा तुमचा प्रयत्न त्याला कायमचा शांत करीत आहे.
सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्याच्या आधी महाराष्ट्र सरकारने जनुकीय परिवर्तीत बियाणांची चाचणी करण्याचा निर्णय घेतला होता. शेतकरी मोठ्या संख्येने या बियाणांकडे वळत असल्याने त्याची शास्त्रीय चाचणी करण्याचा निर्णय योग्यच होता. त्यामुळे त्याचा निसर्गावर , जैवविविधतेवर होणारा परिणाम , त्याची उत्पादक क्षमता या गोष्टी कळायला मदत झाली असती. पण विज्ञानाशी भाजप सरकारचे वैर असल्याने दोन महिन्यातच सरकारने जनुकीय परिवर्तीत बियाणांची चाचणी घेण्याचा निर्णय रद्द करून सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्याची घोषणा केली. पण जसे जनुकीय बियाणांचे दावे तपासण्याची गरज आहे तसेच सेंद्रिय शेतीच्या दाव्यांची देखील शास्त्रीय तपासणी करण्याची गरज आहे. कारण सेंद्रिय शेतीच्या प्रत्येक पुरस्कार्त्याचे दावे वेगळे वेगळे असतात. खरे तर सरकारने कृषी विद्यापीठांना जनुकीय परिवर्तीत बियाणाची आणि सेंद्रिय शेती अशा दोन्ही प्रकारच्या शेतीचे प्रयोग करायला सांगायला पाहिजे होते. विद्यापीठांच्या प्रयोगाच्या निष्कर्षा नंतर शेतकऱ्यांनी कोणत्या मार्गाने जायचे ते ठरविले असते. शेतकऱ्यांना शेती विषयक निर्णय स्वातंत्र्य असले पाहिजे. सरकारची जबाबदारी हे निर्णय स्वातंत्र्य अबाधित राखण्याची आहे. शेतकऱ्यांनी शेती कशी आणि कोणती करावी हे सांगण्याच्या भानगडीत सरकारने पडू नये.

उद्योगपतींना उद्योग कसा करायचा याचे धडे कोणी देत नाही. सरकारही देत नाही आणि उठसुठ शेतकऱ्याला शहाणपण शिकविणारे शहरी पंडीत आणि अभिजनही उद्योगपतीला शिकविण्याच्या भानगडीत पडत नाही. उलट हे दोघेही त्याच्या चरणाशी बसून त्याचे ऐकण्यात धन्यता मानतात. उद्योगपतीला ते जेवढे शहाणे समजतात त्याच्या पेक्षा शेतकरी जास्त शहाणे आहेत. राधामोहनसिंगचे म्हणणे खरे मानले तर अगदी वेदकाळापासून शेती होत आहे. शेतकरी पुस्तकातून नाही तर अनुभवातून शिकला आहे. वेदकाळापासून आजपर्यंत हवामानात किती बदल झाले , निसर्गचक्र बदलत गेले. त्या सगळ्या बदलांना सामोरे जाण्याचा अनुभव गाठीशी असणाऱ्या शेतकऱ्यांना वातावरण बदलावर मात करण्याचे वेदकालीन तंत्र आणि मंत्र कसले शिकवीत बसले आहात. गरज तर मंदीच्या काळात उद्योग कसा टिकवायचा आणि वाढवायचा याचे धडे उद्योगपतींना देण्याची आहे. पण त्याच्या हाती भांडवल आहे. ज्याच्या हाती भांडवल तो शहाणा हा नियमच आहे. शेतकऱ्याच्या हाती भांडवल नाही म्हणून तो वेडपट ठरतो. आणि या वेड्याला ज्ञान देण्यासाठी सगळे सरसावतात. पण उद्योगपतीच्या हाती दिसणारे  भांडवल त्याचेच आहे, चोरलेले आणि पळविलेले. तेव्हा त्याला बाकी शहाणपणा शिकवू नका. त्याने निर्माण केलेले भांडवल त्याच्या हाती राहील आणि ते वापरायचे स्वातंत्र्य अबाधित राहील एवढेच करा. सरकार म्हणून ते तुमचे कर्तव्यच आहे.

-------------------------------------------------------
सुधाकर जाधव , पांढरकवडा , जि. यवतमाळ
मोबाईल - ९४२२१६८१५८
--------------------------------------------------------

3 comments:

  1. That was a nice article. I think some administrators take it upon themselves to make a fool of themselves, how else are we to enjoy our life with so many problems around us!!

    ReplyDelete