Thursday, December 17, 2015

शांत वादळाचा अंत

देशातील दारिद्र्याचा आणि शेतीमालाच्या भावाचा सरळ संबंध प्रस्थापित आणि सिद्ध करणारा विचारवंत म्हणून शरद जोशींचे स्थान अढळ असणार आहे. शेतीमालाला  बाजारात  भाव मिळू नये म्हणून कायदे आणि अन्य मार्गाने सरकारने जे अडथळे उभे केले आहेत ते दूर करण्यावर शरद जोशींचा भर होता. या दिशेने शेतकरी आंदोलन पुढे नेणे हीच शरद जोशींना खरी आदरांजली ठरेल.
--------------------------------------------------------------------------

वादळाचे अनेक प्रकार असतात आणि अनेक नावाने ते ओळखले जाते. आपल्या डोळ्यासमोर शरद जोशी यांच्या रूपाने त्यात नवी भर पडली. एक शांत वादळ ज्याने सर्व शेतकऱ्यांना आपल्या कवेत घेतले ते त्यांना उध्वस्त करण्यासाठी नव्हे तर सुस्थापित करण्यासाठी. म्हणूनच या वादळाच्या झांझावताने वरकरणी काहीच कोलमडून पडलेले दिसत नाही. या वादळाने आंदोलित केले ते शेतकऱ्यांचे मन जे निव्वळ थिजून गेले होते. लौकिकार्थाने जीवनमृत्युच्या फेऱ्यात या वादळाचा अंत झाल्याचे म्हणता येत असले तरी वस्तुस्थिती अशी आहे की, हे वादळ शेतकऱ्यांच्या अणुरेणूत कधीच सामावून गेले होते आणि शेतीच्या शोषणावर आधारित या व्यवस्थेला आव्हान देणाऱ्या शेतकऱ्यांच्या रुपात ते यापुढेही अनुभवले जाणार आहे. त्यांच्या मृत्युनंतर त्यांनी स्थापन केलेली शेतकरी संघटना जीवंत राहिली नाही तरी हे वादळ अनुभवले जाणार आहे. मुळात शेतीमालाला भाव मिळवून देण्या इतपत शरद जोशी आणि शेतकरी संघटनेचा विचार मर्यादित कधीच नव्हता.जे याच चौकटीत शरद जोशी यांचे मूल्यमापन करू पाहतात त्यांना ना शरद जोशींचा विचार कळला ना शेतकरी संघटनेच्या ऐतिहासिक आंदोलनाचा अर्थ कळला असेच म्हणावे लागेल.
शेतकरी संघटना आणि आंदोलनाच्या विस्ताराच्या प्रक्रियेत आणि शरद जोशींचे नेतृत्व प्रस्तापित होण्याच्या प्रक्रियेत मला सामील होण्याची संधी मिळाल्याने शेतकऱ्यांचे नेते म्हणून प्रसिद्ध झालेले शरद जोशी आणि त्या आधीच्या वर्ष-दोन वर्षातील शरद जोशी यांच्यात कधीच अंतर आढळून आले नाही हे मी ठामपणे सांगू शकतो. चांगल्या वक्तृत्वामुळे, किंवा भुरळ घालणाऱ्या व्यक्तिमत्वामुळे शरद जोशी नेते बनले नाहीत. किंबहुना या दोन्ही बाबी त्यांचे नेतृत्व प्रस्थापित होण्यातील अडसर ठराव्यात अशाच होत्या ! त्यांचे वक्तृत्व म्हणजे बोलताना कुठलाही चढउतार नसलेले संथ लयीतील प्रमाण भाषेत बोलणे होते. त्याकाळी धोतर टोपी असाच सर्वसाधारण पेहराव असलेल्या शेतकऱ्यांच्या समोर हा माणूस जीनची पैंट आणि सुती शर्ट घालून उभे राहायचे. नेतृत्व आणि खादीचे वस्त्र ही समजूत मोडीत काढणारा पहिला व्यक्ती म्हणून शरद जोशीकडे पाहता येईल. जातीचा पगडा घट्ट असलेल्या शेतकरी समाजा पुढे 'जोशी' नावाचा हा माणूस उभा राहणे आणि या माणसाचे संथ आणि कंटाळवाणे वाटावे असे भाषण शेतकऱ्यांनी शांतपणे ऐकणे हे विपरीतच म्हंटले पाहिजे. त्यांचे हे शांतपणे ऐकून घेतले जाणारे संथ भाषण शेतकऱ्यांच्या मनात अंगार निर्माण करीत होते जो नंतरच्या आंदोलनात पाहायला मिळाला. हा अंगार फुलविण्याची ताकद त्यांनी मांडलेल्या विचाराची होती.
शरद जोशी काय नवीन सांगत होते ? शेतकऱ्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांचा आणि दैनंदिन जीवनात त्याला जे भोग भोगावे लागतात त्याचा अर्थ साध्या सरळ भाषेत समजावून सांगत होते. आलीया भोगाशी असावे सादर अशी मनाची समजूत काढून जगण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकरी समाजाला हे नशिबाचे आणि निसर्गामुळे मिळालेले भोग नसून जाणीवपूर्वक हे भोग त्यांना भोगावे लागतील अशी व्यवस्थाच निर्माण करण्यात आल्याचे सत्य शरद जोशीनी मांडले तेव्हा त्या धक्क्याने शेतकरी समाज खडबडून जागा झाला. हा धक्का फक्त शेतकरी समाजालाच बसला असे समजणे चूक आहे. आजच्या अन्याय्य व्यवस्थेत बदल झाला पाहिजे या उद्देश्याने त्याकाळी कार्यरत माझ्यासारख्या शेकडो कार्यकर्त्यांना बसलेला धक्का तर त्यापेक्षाही मोठा होता. ज्या विचारसरणीच्या आधारावर आम्ही उभे होतो तो आधारच शरद जोशींच्या मांडणीने काढून घेतल्याने आमच्या सारख्यांचे पाय जमिनीला लागले ! समाज परिवर्तनाच्या विचाराला नवे आयाम , नवे परिमाण देणारी शरद जोशींची मांडणी होती . शेती आणि शेतकरी याकडे पाहण्याचा समाजाचा , शासनाचा दृष्टीकोन बदलण्याचे श्रेय जाते ते शरद जोशींच्या वैचारिक मांडणीला, या विचारामागे त्यांनी उभ्या केलेल्या संघटनेला आणि आंदोलनाला.


शरद जोशी आणि त्यांच्या आंदोलनाच्या आधीही पुष्कळ शेतकरी आंदोलने झालीत. शेकडो वर्षापासून शेतकरी आंदोलने होत आली आहेत. शेतीमालाच्या भावाचा प्रश्न शेतकरी कामगार पक्षाने देखील उचलला होता. या सगळ्याच्या परिणामी शेतकऱ्यांचे काही तात्कालिक प्रश्न सुटलेत हेही खरे , पण बदलला नाही तो शेती आणि शेतकऱ्यांकडे पाहण्याचा दृष्टीकोन . हा दृष्टीकोन संपूर्णपणे बदलण्याचे श्रेय जाते ते शरद जोशी आणि त्यांनी उभ्या केलेल्या शेतकरी संघटनेच्या शेतकरी आंदोलनाला. शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेल्या , त्या कुटुंबातील आहे म्हणून चटके बसलेल्या , सोसावे लागलेल्या माझ्या सारख्या आपल्या जाणीवा जागृत आणि उन्नत असण्याच्या भ्रमात त्याकाळी वावरणाऱ्या माझ्या सारख्या कार्यकर्त्यांची शेतकरी शोषक असल्या बद्दलची समाजवादी  खात्री होती. शेतकरी शेतमजुरांवर फार अन्याय करतो , त्याचे शोषण करतो आणि त्याच्या जीवावर चैन करतो या सारख्या धादांत खोट्या धारणेचे आम्हीच नाही तर सर्व विचारक , पत्रपंडित , नागरी समाज बळी होतो. तुरळक शेतकरी त्याकाळी दुध किंवा भाज्या घेवून फटफटीवर यायचे ते देखील नागरी समाजाच्या डोळ्यात कुसळा सारखे खुपयाचे. थोडीशी तिरकी टोपी घालून फटफटीवर दिसणारा शेतकरी नागरी आणि मध्यमवर्गीय समाजाला माजल्या सारखा वाटायचा. त्याचे स्वच्छ धुतलेले बिगर इस्तरीच्या  कपड्यांचा  देखील नागरी समाजाच्या डोळ्याला त्रास व्हायचा. विचाराकांच्या , पुरोगामी म्हणविणाऱ्याच्या दृष्टीने तर छोटा शेतकरी , मोठा शेतकरी किंवा कोरडवाहू शेतकरी , बागायती शेतकरी किंवा शेतकरी-शेतमजूर हे भेद त्यांच्या चळवळीसाठी महत्वाचे असायचे. शेतकरी तितुका एक हे सांगणारा आणि प्रभावीपणे मांडणारा महात्मा फुले यांच्या नंतरचा दृष्टा पुरुष म्हणजे शरद जोशी होय.


नागरी समाजाचा आणि समाजवादी विचारकाचा शेती आणि शेतकऱ्यांबद्दलचा हा विकृत आणि चुकीचा दृष्टीकोन धुवून टाकण्याचे श्रेय शरद जोशींच्या विचाराचे आणि चळवळीचे आहे. शेतकरी शोषक नसून सर्व प्रकारच्या - कोरडवाहू , बागायती , छोट्या , मोठ्या , भूमिहीन - शेतकऱ्यांचे शोषण होते , किंबहुना शेतीच्या शोषणावरच आजच्या तथाकथित प्रगत आणि औद्योगिक व्यवस्थेचा डोलारा उभा आहे हे त्यांनी गणिताने सिद्ध केले. संपूर्ण शेतकरी समाजाचे शोषण होते आणि संपूर्ण शेतकरी समाजाने एक होवून या शोषणा विरुद्ध लढाई दिली पाहिजे या त्यांच्या मान्यतेला नंतर सर्व गटानी , सर्व पक्षांनी आणि सर्व विचारधारांनी, मान्यता दिली. आजवर शेतकऱ्यांची अनेक मार्गांनी लुट झाली आणि आजच्या आधुनिक काळात ती भाव ठरविण्याच्या पद्धती आणि प्रक्रियेतून होते हे पहिल्यांदा सर्वमान्य करण्याचे श्रेय शरद जोशी आणि त्यांनी उभारलेल्या आंदोलनांना जाते. शेती मालाला भाव मिळाला नसेल आणि सरकारने तो द्यावा ही अपेक्षा देखील चूकच आहे , पण शेती मालाला भाव मिळत नाही हे सत्य तर आज कोणी नाकारू शकत नाही. देशातील दारिद्र्याचा आणि शेतीमालाच्या भावाचा सरळ संबंध प्रस्थापित आणि सिद्ध करणारा विचारवंत म्हणून शरद जोशींचे स्थान अढळ असणार आहे. मुळात शेतीमालाला भाव सरकारने देणे हे व्यावहारिक नसून शेती व्यवस्थेतील आमुलाग्र बदलातून आणि बाजारातून तो मिळवावा लागणार आहे हा विचार मांडण्याचे आणि रेटण्याचे धाडस शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शरद जोशी यांनी केले . बाजारात असा भाव मिळू नये म्हणून कायदे आणि अन्य मार्गाने सरकारने जे अडथळे उभे केले आहेत ते दूर करण्यावर शरद जोशींचा भर होता. सरकारकडून शेतीमालाचा भाव मान्य करून घेणे किंवा मिळविणे हे शरद जोशींचे , त्यांच्या संघटनेचे किंवा आंदोलनाचे कधीच उद्दिष्ट नव्हते हे ज्यांना समजले नाही तेच शरद जोशींचे मूल्यमापन शेतीमालाला भाव मिळाला कि नाही या मर्यादित चौकटीत करतील.
महात्मा फुलेंच्या काळात जगात औद्योगिकरणाला नुकतीच सुरुवात झाली होती. त्यामुळे शेतीच्या शोषणातून उभे राहिलेले औद्योगीकरण त्यांच्या मांडणीत येणे शक्य नव्हते. ब्राम्हणी व्यवस्थेत शेतकऱ्यांचे कसे शोषण होते आणि त्यातून मुक्त होण्याचा मार्ग दाखविणारे तत्वज्ञान फुलेंनी समर्थपणे मांडले. पुढे औद्योगीकरणाने ही ब्राम्हणी व्यवस्था मोडकळीस आली पण शेतकऱ्यांचे शोषण सुरूच राहिले. कारण प्रत्येक काळात व्यवस्था बदलत गेल्या तसे शेतकऱ्यांच्या व शेतीच्या शोषणाची साधने आणि व्यवस्था बदलत गेल्या. शेती आणि शेतकऱ्यांची शोषणातून कायम स्वरूपी मुक्तीची प्रक्रिया काय असेल हे शरद जोशींनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ही बदलाची प्रक्रिया दीर्घकाळ चालणारी असेल. मुक्त अर्थव्यवस्थेकडे ते या प्रक्रियेचा एक भाग म्हणून पाहत होते. शरद जोशींचे वेगळेपण कोणते असेल तर ते म्हणजे त्यांनी  समाजवादी विचाराच्या कैदेतून विचारकांची आणि सामान्यजणांची सुटका करण्याचा शतकातील सर्वात मोठा प्रयत्न आणि प्रयोग केला आणि त्यात ते कमालीचे यशस्वी झालेत !
---------------------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव , पांढरकवडा , जि. यवतमाळ
मोबाईल - ९४२२१६८१५८
--------------------------------------------------------------------------------------------  

6 comments:

  1. समर्पक आणि समयोचित

    ReplyDelete
  2. समर्पक आणि समयोचित

    ReplyDelete
  3. वस्तुनिष्ठ और ईमानदार विश्लेषण..

    ReplyDelete
  4. Right attitude with correct anyalisis
    Nishikant

    ReplyDelete
  5. Right attitude with correct anyalisis
    Nishikant

    ReplyDelete
  6. शरद जोशी गेले. आजच्या दिखाऊ राजकारणात आणि समाजकारणात त्यांना कदाचित मोठे स्थान नसेलही, पण तरीही त्यांचे जाणे आजच्या विचारवंतांना चटका लावून गेले ही विशेष बाब म्हणावी लागेल. जोशींवर लिहिले गेलेले बरेच मृत्युलेख वाचले, पण आपला लेख विशेष महत्त्वाचा वाटतो, अशासाठी की त्यातले विश्लेषण जास्त वास्तव आहे. त्या काळात तरुण असलेल्या आपल्यासारख्या तरुण विचारवंत कार्यकर्त्यांच्या विचारांना त्यांनी जी नवी दिशा दिली तिचे आपण यथोचित मूल्यमापन केलेत. आपल्या लेखात वैचारिकतेचा आणि भावनेचा हृद्य संगम दिसला, तो मला भावला!

    ReplyDelete