Thursday, February 18, 2016

राष्ट्रीय एकात्मतेच्या प्रतिकावर हल्लाबोल

संघ स्वयंसेवक चुकतो तेव्हा संघाचे मार्गदर्शक मा.गो. वैद्य यांचे मते संघ नाही तर संघ स्वयंसेवक तेवढा नापास ठरतो . जवाहरलाल नेहरू विद्यापीठा बद्दल मात्र संघाचे असे मत नाही. तिथल्या बोटावर मोजण्या इतक्या विद्यार्थ्यानी चूक केली तर ती त्या विद्यार्थ्यांची चूक नसते तर संपूर्ण विद्यापीठाची चूक असते आणि त्यासाठी ते विद्यापीठच बंद करण्याची मागणी संघ करतो. जेएनयु बद्दल असा दुटप्पी आणि टोकाचा विचार संघपरिवार का करतो ?
---------------------------------------------------------------

दिल्ली येथील आंतरारष्ट्रीय ख्याती प्राप्त जेएनयु या संक्षिप्त नावाने ओळखले जाणारे जवाहरलाल नेहरू केंद्रीय विद्यापीठ हे वादाच्या आणि वादळाच्या भोवऱ्यात सापडले आहे. या विद्यापीठाची ज्यांना ओळख आहे अशा प्रत्येक पालकांना आपल्या पाल्याला या विद्यापीठात प्रवेश मिळावा आणि या विद्यापीठातून शिकून तो बाहेर पडावा अशी इच्छा असते. या विद्यापीठाने देशाला चांगले राजकारणी , चांगले प्रशासक , कर्तव्यदक्ष अधिकारी , सिद्धहस्त लेखक - पत्रकार , कुशल संघटक आणि आंदोलक या देशाला दिले आहेत. प्रधानमंत्री मोदी सत्तेत आल्यानंतर परराष्ट्र धोरण , देशाची सुरक्षितता आणि आर्थिक धोरण ठरविण्याच्या मोक्याच्या जागी जेएनयु मध्ये शिकलेल्या अधिकाऱ्यांची निवड केली यावरूनही जेएनयुचे महत्व लक्षात येते. देशात घडणाऱ्या प्रत्येक घटनांचे प्रतिसाद जिथे उमटतात , त्यावर विचार आणि वाद-चर्चा होतात , प्रसंगी आंदोलनेही होतात असे हे देशातील एकमेव विद्यापीठ आहे. समाजकारण आणि राजकारण याचे धडे वर्गातून नव्हे तर इथल्या परिसरातून आणि परिसरात चाललेल्या विविध कृती कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना मिळत असतात. बाहेरच्या चर्चा , कार्यक्रम जेवढ्या गांभीर्याने होतात तितक्याच गांभीर्याने वर्गात अभ्यास विषयक चर्चा होतात. इथले विद्यार्थी - शिक्षक अभ्यासेतर कार्यक्रमातच आघाडीवर नसतात तर अभ्यासातही आघाडीवर असतात. त्यामुळे या विद्यापीठाला विद्यापीठाचे सर्वांगीण मुल्यांकन करणाऱ्या समितीकडून सर्वोच्च मानांकन प्राप्त होत आले आहे. माझा मुलगा आणि सून या विद्यापीठात शिकले असल्याने दशका पेक्षा अधिक काळ हे विद्यापीठ जवळून पाहता आले. या विद्यापीठातील चांगल्या घटना , चांगले प्रसंग शेकड्याने सांगता येतील.                                                                              

या पार्श्वभूमीवर जेएनयु मध्ये घडलेल्या दोन घटना या विद्यापीठाच्या सर्व चाहत्यांना व्यथित करणाऱ्या , धक्का देणाऱ्या ठरल्या आहेत. पुरावे नसते तर जेएनयु मध्ये असे घडू शकते यावर कोणाचाच विश्वास बसला नसता. निव्वळ अकल्पनीय अशा या घटना वाटतात. पहिली घटना साधारणत: दोन वर्षापूर्वी घडली. एका विद्यार्थ्याने एकतर्फी प्रेमातून म्हणा की प्रेमभंगातून म्हणा वर्गातच वर्ग मैत्रिणीवर हल्ला करून तीला गंभीर जखमी केले आणि स्वत: आत्महत्या केली. मुलामुलीतील मोकळेपणा , त्यांच्यातील समानतेची वागणूक हे या विद्यापीठाचे विशेष असे वैशिष्ट्य आहे. एवढी समानता आणि मोकळेपणा देशात कुठेही आढळणार नाही. मुलींसाठी हा विद्यापीठ परिसर म्हणजे देशातील एकमेव सुरक्षित परिसर आहे असे म्हंटले तर अतिशयोक्ती होणार नाही . झाडीनी व्यापलेल्या विद्यापीठ परिसरात एकटी मुलगी कुठेही आणि केव्हाही जावू शकते असे वातावरण असलेल्या या विद्यापीठात विद्यापीठाचाच एक विद्यार्थी आपल्याच वर्गमैत्रिणीवर हल्ला करतो ही जेएनयु वासियांसाठीच नव्हे तर जेएनयु माहित असलेल्या प्रत्येकासाठी प्रचंड धक्कादायक अशी बाब होती. आणि आता दुसरी अस्वस्थ करणारी घटना घडली आहे.

देशाची सामाजिक , आर्थिक आणि राजकीय रचना कशी असली पाहिजे याचा विद्यार्थी पातळीवर सखोल , चौफेर आणि गांभीर्याने कुठे विचार होत असेल तर तो जेएनयु मध्ये होतो असे नि:संदिग्धपणे सांगता येईल. इथे अनेक नव्हे तर देशाच्या कुठल्याही कोपऱ्यात आढळणारा प्रत्येक विचारप्रवाह जेएनयु मध्ये हमखास आढळेल. इतके विविध आणि व्यापक विचारप्रवाहांनी भरलेले आणि भारलेले हे विद्यापीठ आहे. डाव्यांची विचारधारा इथे प्रबळ आहेच , पण इतर सर्व विचारधारा कमकुवत किंवा दुर्लक्षणीय नाहीत. त्यामुळे देश कसा असावा या बाबत इथे विविध विचार व्यक्त होत असतात. पण जो काही विचार व्यक्त होतो तो देशाच्या भल्याचाच होतो. देशद्रोही विचाराला जेएनयु ने कधीच थारा दिला नाही. या पार्श्वभूमीवर तिथे भारत विरोधी घोषणा ऐकायला मिळणे अस्वस्थ करणारी बाब आहे. विद्यार्थ्याच्या एका अत्यल्प संख्येतील गटाने अशा घोषणा दिल्या असतील , काही बाहेरचे त्यात सामील झाले असतील हे खरे मानले तरी अशा घोषणांनी बसणारा धक्का कमी होत नाही. हा धक्का मोठा आहे कारण जेएनयु सारख्या ठिकाणी असे घडणे अपेक्षित नाही. वर वर्णन केलेली पहिली घटना जेएनयु साठी जितकी अनपेक्षित तितकीच अनपेक्षित आणि अविश्वसनीय वाटावी अशी ही घटना आहे. जेएनयु चा उज्वल इतिहास बघता या घटनेने संताप येणे स्वाभाविक आहे. पण जेएनयु सारख्या ठिकाणी असे घडणे हा संतापापेक्षा चिंतेचा आणि चिंतनाचा विषय ठरायला हवा. घटनेवर ज्या प्रतिक्रिया उमटत आहे त्यात चिंता आणि चिंतन कमी आणि हिशेब चुकते करण्याचे राजकारण अधिक होत आहे. घडलेली घटना जेवढी अतिरेकी आहे त्यावर उमटणाऱ्या प्रतिक्रिया त्यापेक्षा जास्त अतिरेकी आहेत. जे काही घडले ते जाहीरपणे घडले. त्याचे चित्रीकरणही झाले आहे. जे घडले ते गुन्हा या प्रकरणात मोडणारे आहेत आणि हा गुन्हा करणारे कोण आहेत हे शोधून त्यावर तत्परतेने कारवाई व्हायला हवी याबाबत दुमत असू शकत नाही. अशी कारवाई होत नसेल तर त्यासाठी आंदोलन करून दबाव आणायला हरकत नाही. पण गुन्हेगाराला पकडून न्यायालयात उभे करण्याची मागणी करण्या ऐवजी काही गट स्वत: न्यायधीश बनून निवाडा करू लागले आहेत आणि शिक्षाही करू लागले आहेत. गुन्हेगारांना पकडणे आणि त्यांच्यावर कारवाई करणे बाजूला राहिले आणि संघपरिवाराने घटनेचा फायदा उठवीत आपला अजेंडा राबविणे सुरु केले. स्वत:च्या कपाळावर देशभक्तीचा शिक्का स्वत:च्या हाताने मारून घ्यायचा आणि दुसऱ्याच्या पाठीवर देशद्रोहाचा शिक्का मारण्याचा सवंग  खेळ या लोकांनी सुरु केला आहे. यात संघपरिवार आघाडीवर आहे.  बोटावर मोजण्या इतक्या टाळक्यांच्या घोषणासाठी विद्यापीठातील प्रत्येक विद्यार्थी , शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्याला देशद्रोही ठरवून विद्यापीठच बंद करण्याची मागणी या परिवारातील लोक आणि संघटना करू लागल्या आहेत. हा केवळ आक्रस्ताळेपणा नाही . नियोजनबद्ध खेळी आहे. संघपरिवाराची ही खेळी वेळीच ओळखण्याची गरज या निमित्ताने निर्माण झाली आहे.

एखाद्या घरात एखाद्याने गुन्हा केला तर त्यासाठी संपूर्ण घराला जबाबदार धरल्या जात नाही. अनेक संस्थामधून गुन्हेगारी प्रकरणे घडत असतात तेव्हा गुन्हे करणारा बाजूला काढल्या जातो , त्यासाठी सर्व संस्थेला कधी जबाबदार धरल्या जात नाही. काही दिवसापूर्वी  पठाणकोट येथील वायुदलाच्या तळावर आतंकवादी हल्ला झाला त्यात पोलीस अधीक्षकांनीच आतंकवाद्यांना मदत केल्याचे सकृतदर्शनी पुरावे आहेत. जर ते खरे असेल तर काय आपण साऱ्या पोलीसदलाला देशद्रोही समजणार आहोत का ? खुद्द संघ परिवाराचे काय ? मध्यप्रदेशच्या व्यापम घोटाळ्यात संघ कार्यकर्त्याचा सहभाग उघड झाला आहे. काही कार्यकर्ते या घोटाळ्यात सामील आहेत म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाच भ्रष्टाचारी ठरविणे न्यायसंगत आणि विवेकसंगत ठरेल का ? मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपींना सहीसलामत बाहेर आणण्याची सिद्धता मोदीकाळात झाली असली तरी चुकून न्यायालयाने यातील आरोपींना शिक्षा केली तर सगळ्या संघपरिवारावर आतंकवादी असल्याचा शिक्का मारणे मुळीच न्यायोचित ठरणार नाही. मागे २-३ बेकायदेशीर प्रकरणात संघ स्वयंसेवक सापडले तेव्हा संघाचे मार्गदर्शक असलेले मा.गो. वैद्यची प्रतिक्रिया होती - संघस्वयंसेवक नापास झाला ! त्यांनी संपूर्ण संघाला नापास नव्हते केले . घोषणा देणारे ५-१० विद्यार्थी जेएनयु मध्ये आहे म्हणून जेएनयु देशद्रोही ठरत असेल तर मग याच तर्कटाने जेएनयु भारतात आहे म्हणून सारे भारतीय नागरिकच देशद्रोही नाही का ठरणार ! तेव्हा बोटावर मोजण्या इतक्या लोकांनी जेएनयु मध्ये देशविरोधी घोषणाबाजी केली तर जेएनयु मधील प्रत्येक विद्यार्थी , शिक्षक आणि कर्मचारी देशद्रोही कसा ठरतो याचा सामान्यजनानी शांतपणे विचार केला पाहिजे. संपूर्ण जेएनयु ला देशद्रोही समजून देशद्रोह्याचा हा अड्डा बंद झाला पाहिजे अशी मागणी कितपत न्यायोचित आहे याचा नागरिकांनी विचार केला पाहिजे. नागरिक असा विचार करतील तर त्यांना संघाचे या मागणी मागचे कारस्थान लक्षात यायला वेळ लागणार नाही. संघपरिवार  दोषींना शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी करण्या ऐवजी संपूर्ण जेएनयु ला दोषी ठरवून बंद करण्याची मागणी का करू लागला आहे हे देखील समजून घेतले पाहिजे. या मागणीचे मूळ आपल्याला संघाचे वैचारिक गुरु गोळवलकर गुरुजींच्या विचारधनात आढळेल. संघाचे जे काही विचारधन आहे ते गोळवलकर गुरुजींनी लिहून ठेवले तेवढेच आहे. मुसलमान आणि कम्युनिस्ट आपले शत्रू आहेत हे गुरुजींनी लिहून ठेवले आहे. जेएनयु मध्ये त्याच्या स्थापणेपासून आजतागायत कम्युनिस्ट विचाराच्या विद्यार्थी संघटनांचे वर्चस्व राहिले आहे. दिल्लीतील दिल्ली विद्यापीठात बऱ्यापैकी वर्चस्व राखून असलेल्या संघपरिवाराच्या विद्यार्थी परिषदेला जेएनयु मध्ये प्रयत्न करूनही वर्चस्व मिळविता आले नाही हे शल्य या परिवाराला सतत बोचत आले आहे. त्यांना वर्चस्व निर्माण करता आले नाही एवढेच दुखणे नाही. सातत्याने संघाच्या विचारधारेवर प्रहार येथून होत आल्याने या विद्यापीठाचे अस्तित्व संघपरिवाराच्या डोळ्यात खुपत आले आहे. प्रजासत्ताक दिन काळा दिवस म्हणून पाळणारी आणि तिरंग्याचा अवमान करणारी हिंदुमहासभा संघाला देशद्रोही वाटत नाही. यावर एका शब्दाने कोणी संघजन बोलत नाही आणि जेएनयु ला देशद्रोही ठरविण्यासाठी मात्र ही मंडळी गदारोळ करीत आहेत ते का हे समजून घेतले पाहिजे. ज्या कन्हैयाकुमारला या प्रकरणात देशद्रोहाच्या आरोपावरून अटक करण्यात आली त्याचे अटकेपूर्वीचे भाषण ऐकले तर जेएनयु परिसरात संघाचा किती पुरजोर विरोध होतो हे कळेल. घोषणा प्रकरणात गुंतलेल्या ५-१० आरोपींना शिक्षा होण्यात संघाला रस नाही. या निमित्ताने त्यांना हे विद्यापीठ लोकांच्या नजरेतून उतरवून बंद करण्यात विशेष रस का आहे हे वाचकाच्या लक्षात येईल.

नुसता संघाचा कावा ओळखून उपयोग नाही. जेएनयु काय आहे हे सुद्धा समजून घेतले पाहिजे. ते समजून घेतले तर लक्षात येईल कि जेएनयु हे राष्ट्रद्रोहाचे नाही तर राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक आहे. या विद्यापीठात देशाच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी येतात. देशाच्या मुख्यप्रवाहात नसलेल्या उत्तरपूर्वेतील आणि काश्मिर सारख्या प्रांतातील विद्यार्थी येथे येतात. खऱ्या अर्थाने राष्ट्रदर्शन जेएनयु मध्ये घडते. देशभरातील विद्यार्थी येथे येतात एवढेच नाही तर देशभरातील साऱ्या विचारधारा येथे गुण्यागोविंदाने नांदतात हे विशेष. तसे पाहिले तर उदारवादासाठी संघा इतकेच कम्युनिस्टजन देखील प्रतिकूल आहेत. पण जेएनयु मध्ये मात्र चित्र वेगळे आहे. कम्युनिस्टांच्या विद्यार्थी संघटना प्रबळ असताना देखील जेएनयु मध्ये उदारवादाचा प्रवाह अखंड वाहत असतो. हा प्रवाह अडविण्याचा प्रयत्न आणि हिम्मत तेथील कोणत्याच संघटनेने कधीच केली नाही. आज संघपरिवार जेएनयु ला संपविण्याची जी खेळी करत आहे त्या खेळीला जेएनयु मधील अभाविपच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देवून विरोध केला ही जेएनयु ची खरी ताकद आहे.  जेएनयु हे देशकल्याणाच्या प्रागतिक विचाराचे केंद्र आहे . उदारवादाचा स्त्रोत आहे. मुठभर विद्यार्थ्यांच्या आततायी आणि आत्मघातकी कृतीबद्दल त्यांना कायद्यानुसार शिक्षा झाली पाहिजे आणि तशी ती होईलही. खरी गरज आहे मुठभर विद्यार्थ्यांच्या चुकीचे निमित्त करून जेएनयु सारख्या आगळ्यावेगळ्या विद्यापिठावरून नांगर फिरवायला निघालेल्या संघजनाचा देशभक्तीच्या बुरख्याआड लपलेला हेतू ओळखण्याची.

-------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव , पांढरकवडा , जि. यवतमाळ

मोबाईल - ९४२२१६८१५८
--------------------------------------------------------------------------

1 comment: