Thursday, September 24, 2015

उद्योगपती सख्खे , शेतकरी सावत्र

उद्योगपती सख्खे, शेतकरी सावत्र

----------------------------------------------------
 शेतकऱ्याला भांडवल मिळाले आणि शेतीतले नवे तंत्रज्ञान त्याला सहज उपलब्ध झाले तर शेती उत्पादनाचे चित्रच बदलून जाईल. चीन आणि अमेरिकेशी स्पर्धा करण्याची भारतात क्षमता आहे ती कृषी क्षेत्राची. जर ‘मेक इन इंडिया’चा आधार कृषीक्षेत्र बनविले आणि त्यातील सर्व क्षमता विकसित आणि उपयोगात आणण्याचा प्रयत्न केला तर देशाच्या अन्न धान्याच्या आणि तेलाच्या गरजा पूर्ण करून भारतीय कृषी उत्पादने जागतिक बाजारपेठेवर कब्जा मिळवितील. 
-----------------------------------------------------------------------------------------
 
‘मेक इन इंडिया’ची घोषणा होवून वर्ष उलटून गेले. भारतात भारतासाठी लागणारी उत्पादने बनावीत आणि भारत स्वावलंबी व्हावा एवढेच यात अभिप्रेत नव्हते.  भारत जगाचे मोठे आणि महत्वाचे उत्पादन केंद्र बनावे आणि येथून या उत्पादनाची जगात निर्यात व्हावी ही या घोषणे मागची कल्पना. आज चीन हे जगाचे सर्वात मोठे उत्पादन आणि निर्यात केंद्र बनले आहे. बलाढ्य राष्ट्र म्हणून गणल्या गेलेल्या अमेरिकेत सुद्धा चीनची उत्पादने मोठ्या प्रमाणात जातात. चीनची अमेरिकेत निर्यात अधिक आहे आणि आयात कमी. भारतात सुद्धा चीनी बनावटीच्या वस्तूंचा सुळसुळाट झाला आहे. टाचणी पासून ते इलेक्ट्रॉनिक वस्तू पर्यंतच चीनी वस्तूंचे भारतात प्राबल्य नाही तर आपल्याकडे पूजनीय असलेल्या देवादिकांच्या मूर्त्याही चीन मधूनच येत आहेत. अगदी या गणेशोत्सवात आपल्या घरात आपण ज्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली असेल ती मूर्ती देखील चीन मधून आली असण्याची शक्यता अधिक आहे. या सगळ्या वस्तूंवर ‘मेड इन इंडिया’ शिक्का असेल तर तो शिक्का देखील भारतात वस्तू आल्या नंतर त्यावर मारण्याचे कष्ट कोणी घेत नाही. तो शिक्काही तिकडूनच मारून आणतात. अशाप्रकारे चीनने जे स्थान आणि कब्जा जगाच्या बाजारपेठेवर मिळविला आहे त्याला मागे सारून ती जागा मिळविण्याचा प्रयत्न भारताला करायचा आहे . त्यासाठीच ‘मेक इन इंडिया’ आहे.

‘मेक इन इंडिया’ प्रत्यक्षात यावे यासाठी आपले प्रधानमंत्री जगभर फिरत आहेत. जिथे जिथे ते जात आहेत तिथल्या उद्योगपतींना भारतात तुमच्यासाठी पायघड्या घालून ठेवल्याचे सांगत ते त्यांना निमंत्रण देत आहेत. प्रत्येक ठिकाणी हजारो कोटी डॉलर्सचे गुंतवणूक करार होत आहेत. यातील प्रत्यक्षात भांडवल किती येत आहे आणि ते कोणत्या उत्पादनासाठी वापरात येत आहे ते फक्त प्रधानमंत्री मोदी आणि परदेशी करारकर्ते यांनाच माहित. बातम्या मात्र खुपसारे भांडवल भारतात येत असल्याच्या ऐकू येतात. खुपसारे भांडवल येत आहे आणि उत्पादनक्षेत्र विस्तारत नसेल तर ते भांडवल नुसते कुजत आहे असा त्याचा अर्थ होतो. पण कोणताही उद्योगपती कधीच आपले भांडवल असे तिजोरीत बंद करून ठेवत नसतो. भांडवल येत आहे असे मानले तर कोणत्या निर्यात प्रधान उद्योगासाठी ते येत आहे याचाही कोणी खुलासा करीत नाही. त्यामुळे मेक इन इंडियाची कल्पना हवाई आहे असे म्हणणे क्रमप्राप्त ठरते. आमचे प्रधानमंत्री उत्कृष्ट व्यापारी आहेत. कल्पना विकण्यात भारतातच काय जगात देखील कोणी त्यांचा हात धरणार नाही अशी महारत त्यांनी मिळविली आहे. प्रधानमंत्री जेव्हा ‘मेक इन इंडिया’ भारतीयांच्या गळी उतरवीत होते तेव्हा अनेक भारतीय या कल्पनेने किती रोमांचित आणि उत्तेजित झाले होते ! या उत्तेजनेत कोणालाही ‘सेझ’ची आठवण झाली नाही . प्रधानमंत्री ‘मेक इन इंडिया’च्या नावावर जी वस्तू खपवत आहे ती नवी नसून ‘सेझ’चा नवा अवतार आहे हे कोणाच्या ध्यानातच आले नाही . मोदींच्या आधी मनमोहन काळात ‘सेझ’चा प्रयोग झाला होता. त्यामागची कल्पना आणि प्रेरणाही चीनकडूनच घेण्यात आली होती. ‘सेझ’मध्ये उत्पादित मालाची १००% निर्यात अपेक्षित होती . त्यासाठी देता येतील तेवढ्या सवलतींची खैरात मनमोहन सरकारने उद्योगपतींवर केली होती. सेझ साठी शेतजमीन तर खिरापत दिल्यासारखी दिली होती . या सेझ मध्ये कुठेही कशाचीही निर्मिती झाली नाही. निर्यात होवू शकत होती फक्त शेतजमिनीच्या मातीची ! कारण उद्योगपती सेझच्या नावाखाली जमिनी तेवढे बळकावून बसलेत. उत्पादना व्यतिरिक्त होईल त्या कामासाठी या शेतजमिनीचा वापर झाला. त्यामुळे सेझ एवढे बदनाम झाले कि सेझच्या नावाखाली १ इंच शेतजमीन मिळणे मुश्कील होवून बसले. सेझ बदनाम झाले म्हणून तर ‘मेक इन इंडिया’चा जन्म झाला नसावा ना हा विचार देखील डोकावू नये या पद्धतीने या कल्पनेचे मार्केटिंग झाले. लोकांमध्ये असलेली देशभक्तीची भावना यासाठी वापरली गेली. सेझच्या ऐवजी ‘मेक इन इंडिया’ आणि त्याच्या जोडीला भुमिअधिग्रहन कायद्यात सुधारणा करण्याचा अध्यादेश लक्षात घेतला तर शेतकऱ्यांना वेठीस धरून उद्योगपतीचे घर भरण्याचा हा नवा प्रयत्न तर नाही ना अशी शंका आल्या शिवाय राहात नाही.

सेझचा अनुभव लक्षात घेता प्रधानमंत्र्यांनी आणि त्यांच्या सरकारने उद्योगपतींवर विसंबून कोणतीही योजना बनवायला नको होती. कारण आपले उद्योगपती एवढे सक्षम आणि दूरदृष्टीचे असते तर साधी खेळणी आणि टाचणी-कात्री सारख्या वस्तूंनी भारतीय बाजारपेठेवर कब्जाच केला नसता. कमीतकमी उत्पादन आणि जास्तीतजास्त नफा हेच त्यांचे सूत्र राहिले आहे. कमी नफा घेवून जास्त उत्पादन केले तर तेवढीच प्राप्ती होणार असेल तर मग कशाला जास्त उत्पादन घेवून स्वस्त विकायचे या ऐदी विचाराने भारताचे उद्योगक्षेत्र मागे राहिले. सेझ मध्ये हॉटेल आणि उंच इमारती बांधून जास्त पैसा मिळत असेल तर उत्पादनाची कटकट हवीच कशाला असा विचार करणाऱ्या उद्योगपतींच्या बळावर निर्यातप्रधान उद्योग उभे करण्याचा मनमोहनसिंग यांचा सेझचा प्रयत्न जसा फसला त्यापेक्षा वेगळे मोदींच्या ‘मेक इन इंडिया’त होईल असे मानायला आधार नाही. मनमोहन काय किंवा मोदी काय यांचे प्रयत्न अप्रामाणिक आहेत असे मानायचे कारण नाही. पण भारताची निर्यातक्षमता कशात दडली आहे याचा त्यांनी कधी गंभीरपणे विचार केला असावा असे वाटत नाही. तसा विचार केला असता तर शेती आणि शेतकरी त्यांच्या डोळ्यासमोर आले असते. उद्योगपतींच्या मृगजळामागे ते धावले नसते. जो संधी शोधतो आणि संधीचा उपयोग करून घेतो तो खरा उद्योजक . इथे जर प्रधानमंत्र्याला त्यांची बैठक घेवून जगभरात तुम्हाला संधी आहे , कामाला लागा असे सांगावे लागत असेल तर अशा झोपाळू उद्योगपतींच्या बळावर ‘मेक इन इंडिया’चा गाडा पुढे जाणारच नाही. भारतात बनविलेल्या उत्पादनांनी परदेशी बाजारपेठ काबीज करायची असतील तर ती किमया कृषी उत्पादनेच करू शकतील हे ‘मेक इन इंडिया’कारांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. आजवर शेती आणि शेतकऱ्यांच्या क्षमतेचा या अंगाने कोणी विचार केला नाही आणि आजही तसा विचार करण्याची कोणाची तयारी नाही. शेतकऱ्यांनी उत्पादन करावे आणि देशातील जनसंख्येची पोट भरण्याची सोय करावी या मर्यादेतच त्यांचा विचार होतो. देशांतर्गत शेतीमालाचे भाव वाढू नयेत या साठी  शेतीमालाच्या निर्यातीवर बंधने आणण्याचेच आजवर सगळ्या सरकारांचे धोरण राहिले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चांगले भाव मिळत असतील तरी निर्यात करायची नाही फक्त अत्याधिक उत्पादन झाले तरच भाव मिळो ना मिळो निर्यात करायची हेच आमचे धोरण राहिले आहे. म्हणजे आमच्यातील निर्यातक्षमतेचा वापर न करता आम्ही जगाची बाजारपेठ काबीज करण्याचे स्वप्नरंजन करीत आहोत. सहज स्वाभाविक निर्यात क्षमतेचा वापर न करता कृत्रिम निर्यात क्षमता विकसित करण्यात वेळ आणि शक्ती वाया घालविण्याचा हा प्रकार आहे.

उद्योगपतींनी कधीच आपल्या क्षमतेचा परिचय आणि पुरावा देशाला दिला नाही. औद्योगिकरणामुळे निर्माण होणाऱ्या सुखसोयींचा लाभ जागतिकीकरणानंतर परदेशी भांडवल आणि परदेशी कंपन्यांमुळे झाला. भारतीय उद्योगपतीची कामगिरी तर नव्या पिढीला माहित नसलेल्या लुना सारख्या दुचाकी निर्मितीवर येवून थांबली होती. याउलट कोणत्याही सोयीसुविधा नसताना अडाणी समजल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांनी शेतीतील नवे तंत्रज्ञान चटकन अवगत करत अन्नधान्याची तुट भरून काढली. नुसती तुटच भरून काढली असे नाही तर विक्रमी उत्पादन करून सरकारची गोदामे भरून टाकली. नतद्रष्ट सरकारला आजवर त्यांच्या उत्पादनाची साठवणूक करण्याची पुरेशी सोय देखील निर्माण करता आली नाही. आज भांडवला अभावी शेती रडत रखडत केली जात आहे तरी उत्पादनात शेतकऱ्यांनी कमी येवू दिली नाही. जेवढ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी उत्पादन वाढविले तेवढ्या प्रमाणात त्यांचे उत्पन्न वाढले असते तर अनेक शेतीआधारित उद्योग सुरु होवून देशाचे चित्र बदलले असते. पण देशात श्रीमंतांना आणि मध्यमवर्गीयांना आपले चोचले पुरविता यावेत यासाठी शेतीमालाचे भाव नियंत्रणात ठेवण्याचे आणि पाडण्याचे धोरण सातत्याने राबविल्या गेले. देशांतर्गत भाव वाढू नयेत यासाठी जागतिक बाजारपेठेत जाण्याचा शेतकऱ्यांचा रस्ता रोखून धरण्यात आला. परिणामी शेतकऱ्यांचे उत्पादन वाढले पण उत्पन्न घटले अशी अवस्था झाली.  दुसरा उद्योग सुरु करण्या इतपत भांडवल सोडाच शेती करण्यापुरते भांडवल देखील शेतकऱ्याजवळ उरत नाही. सरकारच्या तिजोरीत जे काही जमा होते त्याच्यावर पहिला अधिकार या देशाच्या अगडबंब आणि अजागळ अशा नोकरशाहीचा आणि राज्यकर्त्याच्या चैनीचा असतो. यातून उरले ते उद्योगपती बळकावतात आणि हाती भांडवल नसलेला शेतकरी आपल्या कुटुंबाच्या गरजा कमी करत कष्ट वाढवत शेती करतो आणि तरीही देशाला पुरून उरेल एवढे उत्पादन काढतो. एवढे सगळे करून शेतकऱ्याला सरकारकडून आणि अभिजनाकडून मिळणारी सावत्र वागणूक कायम आहे.

अशा शेतकऱ्याला भांडवल मिळाले आणि शेतीतले नवे तंत्रज्ञान त्याला सहज उपलब्ध झाले तर शेती उत्पादनाचे चित्रच बदलून जाईल. चीन आणि अमेरिकेशी स्पर्धा करण्याची भारतात क्षमता आहे ती कृषी क्षेत्राची. जर ‘मेक इन इंडिया’चा आधार कृषीक्षेत्र बनविले आणि त्यातील सर्व क्षमता विकसित आणि उपयोगात आणण्याचा प्रयत्न केला तर देशाच्या अन्न धान्याच्या आणि तेलाच्या गरजा पूर्ण करून भारतीय कृषी उत्पादने जागतिक बाजारपेठेवर कब्जा मिळवितील. परंपरागत शेती कष्टाची आणि अल्पमोबदल्याची किंवा तोट्याची असल्याने देशातील युवक विशेषत: ग्रामीण युवक शेती करण्या ऐवजी बेरोजगार राहणे पसंत करतो. निर्यातप्रधान शेतीसाठी शेतीचे तंत्रच बदलावे लागणार असल्याने या क्षेत्राकडे युवक आकर्षित होतील आणि युवकांना भेडसावणाऱ्या बेकारीच्या समस्येवर मात करता येईल. तेव्हा देशाचे प्रधानमंत्री जगभर भांडवल गोळा करीत फिरत आहेत ते शेतीक्षेत्रासाठी करावे. तंत्रज्ञानाचे जे करार करीत आहेत त्यात शेती विषयक नवे तंत्रज्ञान भारतात कसे येईल याला प्राधान्य दिले पाहिजे. कारण शेती हाच ‘मेक इन इंडिया’चा आधार बनू शकतो. त्यासाठी सरकारने उद्योगपतींच्या मागे न धावता शेतकऱ्याकडे लक्ष दिले पाहिजे.

--------------------------------------------------------------
सुधाकर जाधव , पांढरकवडा, जि. यवतमाळ
मोबाईल – ९४२२१६८१५८
-------------------------------------------------------------------

Thursday, September 17, 2015

शेतीचा खुळखुळा

कृषिमंत्री महोदय , वेद्काळावर  तुमचे खरेच प्रेम असेल आणि  तुमच्यासाठी तो सुवर्णकाळ असेल तर फुंकर मारण्याची बुवाबाजी शिकविण्यापेक्षा वेदकाळात किती लोक शेतीवर होते याचा अभ्यास करा. तेवढेच लोक शेतीवर ठेवा आणि बाकी सगळ्या लोकांना दुसऱ्या उद्योगधंद्यात सामील करून घ्या. शेतीवरचे लोकसंख्येचे ओझे वेदकाळा इतके कमी करा आम्ही तुमचे वेद डोक्यावर घेवून नाचू.
----------------------------------------------------------------------



देशाचे कृषी क्षेत्र किती संकटात आहे , शेतकरी किती विपन्नावस्थेत आहे याची आता सगळ्यांनाच कल्पना आली आहे. शेतीवर जगणाऱ्यांचे जगच दुसरे असल्याने या जगाविषयी विचार करण्याची गरज आणि वेळ कोणाकडे नाही. अशा दुर्लक्षित शेतकऱ्याकडे लोकांचे लक्ष जावे आणि हसू हरवलेल्या शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर हसू फुलवावे असे फक्त या देशाच्या राधामोहनसिंग नामक कृषीमंत्र्याला वाटत असावे असे त्यांच्या वक्तव्यावरून वाटत असते. काही महिन्यापूर्वी या कृषीमंत्र्याने शेतकरी आत्महत्येचे नामी कारण शोधून काढले होते हे सर्वाना आठवत असेलच. प्रेमभंग शेतकरी आत्महत्येचे एक कारण असल्याचे सांगून उन्हातान्हात राबून काळ्या पडलेल्या आणि मातीत राहून कळकट मळकट झालेल्या शेतकऱ्याला कल्पनेच्या विश्वात नेवून आनंदी केले होते. परिस्थितीने गांजलेल्या शेतकऱ्याला घरात दोन प्रेमाचे शब्द बोलणे अशक्य होवून बसलेले असतांना आमचे कृषिमंत्री त्याच्या आयुष्यात प्रेमिका घेवून आले होते. शेतकऱ्याच्या पोराला पोरगी द्यायला , कोणतीही पोरगी लग्न करून शेतकऱ्याच्या घरात नांदायला तयार नसतांना कृषीमंत्र्यांना मात्र जुन्या हिंदी सिनेमात पिक डोलत असलेल्या शेतात प्रेमगीत गात असलेले शेतकरी जोडपे दिसत होते. बहुधा तरुणपणी कृषिमंत्र्यांना सिनेमे पाहायचा फार छंद असावा. त्यामुळे त्यांना सर्वत्र हिरवाई आणि माणसेही हिरवे दिसत असावी. कृषी संकटामागे  त्याचमुळे त्यांनी फिल्मीस्टाईल प्रेमभंगाचे कारण शोधून काढले असावे. त्यांच्या या वक्तव्याने उमटलेले ओरखाडे भरून येत असतानाच कृषीमंत्र्याचे आता दुसरे वक्तव्य आले आहे. सरकार आता शेतकऱ्याला थेट वेदकाळातील शेती करायची पद्धत शिकविणार असल्याचे कृषीमंत्र्याने जाहीर केले आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना राजयोग शिकावा लागणार आहे. आता हा राजयोग काय आणि कसा असतो हे त्यांनी सांगितले नाही. पण शेतकऱ्याच्या शुष्क जीवनात प्रेमिका आणून जशी काल्पनिक बहार निर्माण केली होती तसा दरिद्री शेतकऱ्याला त्याच्या आयुष्यात राजयोगाचा आभास निर्माण करणारा हा नवीन नुस्खा त्यांनी शोधून काढला असावा .पुढेमागे सरकारी बाबा असलेले बाबा रामदेव किंवा दुसरे सरकारी संत श्री श्री रविशंकर महाराज या राजयोगावर प्रकाश टाकतील आणि कंगाल शेतकऱ्यांना तो कसा करायचा हे फुकट शिकवतील. म्हणजे सरकार काय द्यायचे ते त्यांना देईलच , शेतकऱ्याला काही द्यावे लागणार नाही अशी आशा करायला हरकत नाही. या राजयोगाने म्हणे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढून त्याच्या अंगी दैवीशक्तीचा संचार होणार आहे. राजयोगी शेतकऱ्यात संचार करणाऱ्या शक्ती त्याच्या एका फुंकरी सरसी त्याने शेतीसाठी आणलेल्या बियाणात शिरणार आहे. दैवी शक्तीने लैस बियाण्यावर मग हवामान बदलाचा परिणाम होणार नाही की ओल्या किंवा सुक्या दुष्काळाचा परिणाम होणार नाही . स्वत: देशाचे प्रधानमंत्री विज्ञान परिषदेत वेदकालीन विमानाच्या भराऱ्या मारतात तिथे राधामोहनसिंग यांनी वेदकालीन शेतीचा कल्पना विलास केला तर त्यांना काय आणि कशासाठी दुषणे द्यायचे. देशाचे कृषिमंत्री असलेले राधामोहनसिंग यांचे हे वक्तव्य पाहिले कि सरकारला शेतीच्या संकटाचे गांभीर्य नाही किंवा शेती संकट दूर कसे करायचे हे अजिबात कळत नाही. या सरकारचे संरक्षक आणि मार्गदर्शक असलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत विज्ञाननिष्ठ बनण्याचा सल्ला देत आहेत तर कृषीमंत्री  मंत्राने शेती कशी फुलवायची याचे धडे देत आहे.

शेतकऱ्याचा राजयोगाने आत्मविश्वास वाढविण्याचा आचरट प्रयत्न करण्या आधी कृषीमंत्र्याने त्यांच्याच मंत्रालयात धूळ खात पडलेले अहवाल आधी वाचून काढावेत. शेतकरी नेते शरद जोशी यांनी तयार केलेला अहवाल धूळ खात पडला आहे. त्यांनतर शेतीशास्त्रज्ञ स्वामिनाथन यांनी तयार केलेला अहवालही तसाच पडून आहे. कृषीमंत्र्यांनी वेदपठन करायला आणि वेदकालीन मंत्राचा छंद म्हणून शोध घ्यायला कोणाची हरकत असण्याचे कारण नाही. ते काम त्यांनी घरात बसून खुशाल करावे. त्याच्या आधी लोकांनी त्यांना ज्या कामासाठी निवडून दिले आणि सरकारात त्यांच्यावर जी जबाबदारी येवून पडली ती आधी पार पाडली पाहिजे. वेदकाळात जाण्यापेक्षा तुमच्या कार्यालयातील कपाटात पडलेल्या या अहवालातून शेती समस्या आणि त्याच्या वरील करावयाच्या उपाययोजना कळतील. स्वामीनाथन अहवालातील उत्पादन खर्च अधिक ५० % नफा हे हमीभावाचे सूत्र तुमच्या पक्षाने आणि तुमच्या नेत्याने निवडणूक प्रचारात मान्य केले होते ते लागू करण्याऐवजी कसली वेदकालीन शेती शिकवता शेतकऱ्याला. वेद्कालावर तुमचे खरेच प्रेम असेल आणि तो तुमच्यासाठी तो सुवर्णकाळ असेल तर फुंकर मारण्याची बुवाबाजी शिकविण्यापेक्षा वेदकाळात किती लोक शेतीवर होते याचा अभ्यास करा. तेवढेच लोक शेतीवर ठेवा आणि बाकी सगळ्या लोकांना दुसऱ्या उद्योगधंद्यात सामील करून घ्या. शेतीवरचे लोकसंख्येचे ओझे वेदकाळा इतके कमी करा आम्ही तुमचे वेद डोक्यावर घेवून नाचू.

या सरकारातील लोकांना स्वत:चे काम कळत नाही , पण शेती कशी करायची हे शेतकऱ्यांना शिकवायची दांडगी हौस आहे. तशी शेती न केलेल्या प्रत्येकाला ती असतेच. त्यामुळे शेतीसाठी स्वत: काय करायला पाहिजे हे विसरून शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे याचे ज्ञान पाजळणारे भरपूर सापडतील. केंद्रातील कृषीमंत्र्याची ही तऱ्हा तर राज्याच्या कृषीमंत्र्याची वेगळीच तऱ्हा. ते म्हणे सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देणार आहेत. तशी शेती करून हाती काही लागले नाही म्हणून शेतकरी दुसरीकडे वळला तर हे पुन्हा त्यांना तशा शेतीचे गाजर दाखवीत आहेत.या देशातील शेतकऱ्यांना शेती कशी करायची हे कोणी शिकविण्याची आवश्यकता नाही. सर्व प्रकारच्या प्रतिकूलतेवर मात करीत त्याने शेती पिकविली आहे. त्याचे काम त्याला करू द्या. तुम्ही तुमचे काम नीट आणि चोख करीत नाहीत ही खरी अडचण आहे. शेतीचा तुम्ही खुळखुळा बनविला आहे. लहान मुलगा रडला की खुळखुळा वाजवून त्याला शांत करतात तसे शेतीविषयक काल्पनिक भराऱ्याचा खुळखुळा वाजवून शेतकऱ्याला शांत करण्याचा तुमचा प्रयत्न त्याला कायमचा शांत करीत आहे.
सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्याच्या आधी महाराष्ट्र सरकारने जनुकीय परिवर्तीत बियाणांची चाचणी करण्याचा निर्णय घेतला होता. शेतकरी मोठ्या संख्येने या बियाणांकडे वळत असल्याने त्याची शास्त्रीय चाचणी करण्याचा निर्णय योग्यच होता. त्यामुळे त्याचा निसर्गावर , जैवविविधतेवर होणारा परिणाम , त्याची उत्पादक क्षमता या गोष्टी कळायला मदत झाली असती. पण विज्ञानाशी भाजप सरकारचे वैर असल्याने दोन महिन्यातच सरकारने जनुकीय परिवर्तीत बियाणांची चाचणी घेण्याचा निर्णय रद्द करून सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्याची घोषणा केली. पण जसे जनुकीय बियाणांचे दावे तपासण्याची गरज आहे तसेच सेंद्रिय शेतीच्या दाव्यांची देखील शास्त्रीय तपासणी करण्याची गरज आहे. कारण सेंद्रिय शेतीच्या प्रत्येक पुरस्कार्त्याचे दावे वेगळे वेगळे असतात. खरे तर सरकारने कृषी विद्यापीठांना जनुकीय परिवर्तीत बियाणाची आणि सेंद्रिय शेती अशा दोन्ही प्रकारच्या शेतीचे प्रयोग करायला सांगायला पाहिजे होते. विद्यापीठांच्या प्रयोगाच्या निष्कर्षा नंतर शेतकऱ्यांनी कोणत्या मार्गाने जायचे ते ठरविले असते. शेतकऱ्यांना शेती विषयक निर्णय स्वातंत्र्य असले पाहिजे. सरकारची जबाबदारी हे निर्णय स्वातंत्र्य अबाधित राखण्याची आहे. शेतकऱ्यांनी शेती कशी आणि कोणती करावी हे सांगण्याच्या भानगडीत सरकारने पडू नये.

उद्योगपतींना उद्योग कसा करायचा याचे धडे कोणी देत नाही. सरकारही देत नाही आणि उठसुठ शेतकऱ्याला शहाणपण शिकविणारे शहरी पंडीत आणि अभिजनही उद्योगपतीला शिकविण्याच्या भानगडीत पडत नाही. उलट हे दोघेही त्याच्या चरणाशी बसून त्याचे ऐकण्यात धन्यता मानतात. उद्योगपतीला ते जेवढे शहाणे समजतात त्याच्या पेक्षा शेतकरी जास्त शहाणे आहेत. राधामोहनसिंगचे म्हणणे खरे मानले तर अगदी वेदकाळापासून शेती होत आहे. शेतकरी पुस्तकातून नाही तर अनुभवातून शिकला आहे. वेदकाळापासून आजपर्यंत हवामानात किती बदल झाले , निसर्गचक्र बदलत गेले. त्या सगळ्या बदलांना सामोरे जाण्याचा अनुभव गाठीशी असणाऱ्या शेतकऱ्यांना वातावरण बदलावर मात करण्याचे वेदकालीन तंत्र आणि मंत्र कसले शिकवीत बसले आहात. गरज तर मंदीच्या काळात उद्योग कसा टिकवायचा आणि वाढवायचा याचे धडे उद्योगपतींना देण्याची आहे. पण त्याच्या हाती भांडवल आहे. ज्याच्या हाती भांडवल तो शहाणा हा नियमच आहे. शेतकऱ्याच्या हाती भांडवल नाही म्हणून तो वेडपट ठरतो. आणि या वेड्याला ज्ञान देण्यासाठी सगळे सरसावतात. पण उद्योगपतीच्या हाती दिसणारे  भांडवल त्याचेच आहे, चोरलेले आणि पळविलेले. तेव्हा त्याला बाकी शहाणपणा शिकवू नका. त्याने निर्माण केलेले भांडवल त्याच्या हाती राहील आणि ते वापरायचे स्वातंत्र्य अबाधित राहील एवढेच करा. सरकार म्हणून ते तुमचे कर्तव्यच आहे.

-------------------------------------------------------
सुधाकर जाधव , पांढरकवडा , जि. यवतमाळ
मोबाईल - ९४२२१६८१५८
--------------------------------------------------------

Thursday, September 10, 2015

शेतकऱ्याला भिकारी बनवू नका !

ज्यांना ज्यांना शेती आणि शेतकऱ्यासाठी काही तरी करावेसे वाटते त्यांनी शेतकरी कुटुंबाना वैयक्तिक मदत करीत फिरू नये. त्याऐवजी स्वत:चे भांडवल टाकून बाजारातून भांडवल उभे करावे आणि शेतकऱ्यांना बीज भांडवल म्हणून पुरवावे. मानवीय दृष्टीकोनातून निर्माण झालेल्या मदतीच्या प्रेरणेला व्यावसायिक स्वरूप दिले तर ती मदत कायम स्वरूपी होईल.
----------------------------------------------------------------------------------------------


तरुणपणी जग बदलायला निघालेल्या टोळीत सामील झालो तेव्हा भयाण वास्तवाचा सामना करण्यासाठी लढायची प्रेरणा देणारी गाणी म्हणायचो. त्यातील एक होते ' लाख मौत हो मगर मनुष्य कब मरा' ! शेतकरी चळवळीत पडलो तेव्हा या ओळीचा खरा अर्थ उमगला. आदिम काळापासून हालअपेष्टा, दुष्काळ ,अतिवृष्टी, रोगराई आणि दारिद्र्य याला बळी पडलेला एकमेव व्यावसायिक समाज हा शेतकऱ्यांचा आहे. प्रतिकूलतेशी चिवट झुंज देत मरणाराच्या सरणाला अग्नी देत पुन्हा निसर्गाशी आणि सुलतानाशी लढायला उभा राहणारा हा समाज आहे. निसर्गाच्या लहरीपणाने आणि सुलतानांच्या क्रूरतेने सर्वाधिक बळी या समाजातील जावूनही शेतकरी संपला नाही. स्वातंत्र्या नंतर सुलतानशाही बदलली तेव्हा सुलतानांच्या क्रूर चेहऱ्याची जागा धूर्त चेहऱ्यांनी घेतली. चिवटपणे परिस्थितीशी झुंज देवून परिस्थितीवर मात करणाऱ्या या समुदायाची झुंज संपविण्यासाठी त्याला लाचार बनविण्याचा फासा या धुर्तानी फेकला आणि डाव साधला. प्रलयात पोहून किनाऱ्याला लागणारा शेतकरी पुरुषभर पाण्यातच गटांगळ्या खाऊ लागला. मदतीसाठी ओरडू लागला. पुरुषभर पाण्यातून त्याला वाचविण्याचे नाटक करणारे राज्यकर्ते त्याचे उद्धारकर्ते म्हणून मिरवू लागलेत. असे उद्धारकर्ते म्हणून मिरवायचे असेल तर शेतकरी असाच गटांगळ्या खात राहील अशी तरतूद तशाप्रकारची धोरणे राबवून करण्यात आली आहे. स्वबळावर आणि सामुहिकपणे समस्यांवर मात करण्याची जिद्द आणि हुनर विसरलेल्या शेतकऱ्याला त्याचे आत्मभान जागे करण्याचे सर्वात मोठे आव्हान समोर उभे असताना समाजातील विचार करणारी , आपल्या क्षेत्रात झगडून नाव आणि यश मिळविलेली मंडळी सरकारपेक्षा वेगळे काय करता येईल याचा विचार न करता सरकारच्या पावलावर पावले टाकून शेतकऱ्याला मदतीकडे डोळे लावून बसलेला याचक बनवीत असतील तर शेतकरी समुदाय कायम गटांगळ्या खात राहील. वर येण्यासाठी सतत त्याला कोणाच्या तरी मदतीचा हात लागेल. एव्हाना माझ्या लिहिण्याचा रोख वाचकांच्या लक्षात आला असेल. होय मी सिने अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी हाती घेतलेल्या मोहिमे बद्दलच बोलत आहे.



सत्तापक्ष आणि विरोधीपक्ष संकटात सापडलेल्या शेतकऱ्याची जबाबदारी एकमेकावर ढकलत राजकारण खेळण्यात मग्न असताना मराठी माणसात लोकप्रिय असलेले हे दोन अभिनेते आपला वेळ आणि पैसा खर्च करून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावून येतात त्याबद्दल त्यांचे मोकळेपणाने कौतुक केले पाहिजे. या दोन अभिनेत्यांनी लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील स्वत:च्या कमाईतील पैशातून ११३ शेतकरी कुटुंबाना प्रत्येकी १५-१५ हजार रुपयाची मदत स्वहस्ते वाटत या कुटुंबाना धीर दिला आहे. यात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाचा समावेश आहे.  शेतकऱ्याच्या आर्थिक चादरीला एवढे भोके आहेत की या चादरीवर पडलेले १५००० टाकल्या टाकल्या कुठे गायब झाले असतील हे नाना आणि मकरंदला कळलेही नसेल. या अभिनेत्यांची पाठ फिरताच मदत केलेल्या कुटुंबाची परिस्थिती जैसे थे झाली असेल. गावागावातून फिरल्याने शेतकऱ्यांची दैना या दोन अभिनेत्यांच्या लक्षात आली असेल . त्यामुळे त्यांनी लोकांना मदतीचे आवाहन केले असून आपण स्वत: ती मदत गरजू शेतकरी कुटुंबां पर्यंत पोचवू असे आश्वासन त्यांनी दिले आहे. त्यांनी केलेल्या मदतीचे कौतुक झाल्याने अनेकांना अशी मदत करण्याची प्रेरणा होईल आणि लोक मदतीसाठी धावून जातीलही. ज्यांना नाना आणि मकरंद सारखा स्वत:च्या खिशातून पैसा खर्च न करता शेतकऱ्यांसाठी खुप काही केले आहे हे दाखवायचे आहे ते खंडणी गोळा करून पैसे वाटतील आणि पुण्य कमावतील. मनसे नेते राज ठाकरे यांनी त्याचे सुतोवाच केले आहेच. गणपती आणि दुर्गादेवी साठी वर्गणी गोळा करणाऱ्याच्या टोळ्या फिरतात तशा दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्याच्या मदतीसाठी वर्गणी गोळा करणाऱ्या टोळ्या शहरा-शहरातून फिरताना दिसण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी सद्हेतूने सुरु केलेल्या उपक्रमाची अशी परिणती होण्या आधीच हा उपक्रम थांबविण्यापेक्षा या उपक्रमाचे स्वरूप बदलण्याची गरज आहे.


आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवांना मदतीची गरज कोणीच नाकारणार नाही. घरातील कर्ता पुरुष गेल्यामुळे कुटुंबाला कसे पोसायचे हा त्यांच्या समोरचा प्रश्न आहे. हा प्रश्न अशा मदतीने सुटणारा नाही. मदत पाहिजे ती त्यांना त्यांच्या पायावर उभे करण्याची. त्या कमावत्या होवून कुटुंबाचा भार पेलण्यास समर्थ होतील याची. त्यांच्यासाठी गृहउद्योग उभा करून उत्पादित मालाच्या विक्रीची साखळी तयार करण्याची. मदतीचे रुपांतर बीज भांडवलात होणार नसेल तर दिलेली मदत कितीही चांगल्या भावनेने केलेली असली तरी ती भीक ठरते. अशा भिकेची सवय लागली की मग अशा मदतीकडे डोळे लावून बसण्याची सवय लागते. एखादेवेळी विधवांना मदत करून काही काळासाठी त्यांचा प्रश्न सोडविता येईलही. रोज आत्महत्या करणारे शेतकरी आणि त्यातून विधवा स्त्रियात दररोज पडणारी भर त्यामुळे रोखता येणार नाही. हे सगळे टाळायचे असेल तर भांडवल पुरविण्याची व्यवस्था उभी करणे हीच शेती , शेतकरी आणि त्यांच्या विधवांसाठीची सर्वात मोठी मदत ठरेल. याचा दुसरा अर्थ शेतकऱ्यांना व्यक्तिगत मदत करण्यापेक्षा भांडवल पुरविणाऱ्या संस्था निर्माण करण्याची जास्त गरज आहे. मदत करणारे मदत करून मोकळे होतात आणि पुण्य कमावल्याच्या भ्रामक समाधानात जगतात. भांडवल पुरविणाऱ्या संस्थाना असे 'नेकी कर कुए मे डाल' असे करता येणार नाही. भांडवल पुरविणाऱ्या संस्थाना लाभाची अपेक्षा राहील आणि तशी ती राहालायाच हवी. त्यासाठी त्या संस्थेला सतत शेतकऱ्याच्या संपर्कात राहणे , अधिक फायदा कसा करून घेता येईल या बाबतचे आदानप्रदान करणे जरुरीचे राहील. शेतीत गरजेचे असलेले नवे तंत्रज्ञान याच मार्गाने येणार आहे. सरकार नोकरशाहीच्या कह्यात आणि विळख्यात आहे. त्यांचे चोचले पुरविणे हेच त्याचे काम होवून बसले आहेत. शेतीत टाकण्यासाठी सरकार जवळ भांडवलही नाही आणि इच्छा व दृष्टी तर नाहीच नाही. त्यामुळे ज्यांना ज्यांना शेती आणि शेतकऱ्यासाठी काही तरी करावेसे वाटते त्यांनी स्वत:चे भांडवल टाकून बाजारातून भांडवल उभे करावे आणि शेतकऱ्यांना बीज भांडवल म्हणून पुरवावे. मानवीय दृष्टीकोनातून निर्माण झालेल्या मदतीच्या प्रेरणेला व्यावसायिक स्वरूप दिले तर ती मदत कायम स्वरूपी होईल. शेतकऱ्यांच्या भल्यासाठी धडपडणाऱ्या विदर्भ जनआंदोलन समितीच्या किशोर तिवारी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारने जे वसंतराव नाईक सहाय्यता मिशन स्थापन केले आहे ते तेव्हाच सफल होईल जेव्हा या मिशनच्या हाती शेतकऱ्यांना भांडवल आणि तंत्रज्ञान पुरविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी आणि त्याचा उपयोग करण्याचे अधिकार देईल. अशा निधी अभावी मिशन काही तरी करते आहे हे दाखविण्यासाठी शेतकऱ्यांनी नगदी पीके न घेता अन्नधान्य पिकवावे असा निरर्थक आणि बाष्कळ सल्ला देण्या व्यतिरिक्त मिशन काहीही करू शकणार नाही.


दुसऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले पाहिजे हे सांगत असताना शेतकऱ्यांनी स्वत:साठी काय केले पाहिजे याचाही विचार झाला पाहिजे. किंबहुना हा विचार जास्त महत्वाचा आहे. उद्या बीजभांडवल देणाऱ्या कंपन्या उभ्या राहिल्या तरी त्यांना वैयक्तिक शेतकऱ्या पर्यंत पोचणे किंवा व्यक्तिश: शेतकऱ्यांना त्यांच्या पर्यंत पोचणे हे व्यावहारिक नाही. भांडवल देणारी कंपनी असेल तशी शेतकऱ्यांची भांडवल स्विकारणारी कंपनी देखील लागेल. आजच्या घडीला शेतकऱ्यांच्या मोठ्या कंपन्या उभ्या राहण्यात शेतकऱ्यांच्या मानसिकतेसह अनेक व्यावहारिक अडचणी आहेत. थोडासा समजूतदारपणा आणि शहाणपणा दाखवून शेजारी-शेजारी शेती असलेल्या १५-२० शेतकऱ्यांनी एकत्र येवून त्यांच्या शेतीची प्रायवेट लिमिटेड कंपनी स्थापन करता येणे अवघड नाही. शहरातील ज्यांना शेतकऱ्यांसाठी मनापासून काही करावेसे वाटते त्यांनी अशा कंपन्या स्थापित करण्यासाठी शेतकऱ्यांना तयार करावे , त्यांची तांत्रिक मदत करावी. खरे तर वसंतराव नाईक शेतकरी सहाय्यता मिशनने हे आपले काम मानले तर फार मोठे काम केल्याचा मान आणि समाधान या मिशनला मिळेल. दुसऱ्या एका कारणाने शेतीच्या अशा प्रायवेट लिमिटेड कंपन्या स्थापण्याची गरज आणि योग्य वेळ देखील हीच आहे. सातवा वेतन लागू होवू नये अशी आपली कितीही इच्छा असली तरी तो रोखून धरण्याची ताकद आणि क्षमता आपल्यात नाही. हा वेतन आयोग लागू झाल्यावर राज्यसरकारांचे दिवाळे निघणार असले आणि शेतीक्षेत्रासाठी पैसा पुरविण्याची त्यांची क्षमता संपणार असली तरी फार मोठ्या संख्येतील नोकरदारांच्या हातात फार मोठा पैसा खुळखुळणार आहे. जमीनजुमला खरेदी करण्याची त्यांची इच्छा होणार पण भडकलेल्या किंमती त्यातील अडथळा ठरणार. अशावेळी शेतीच्या प्रायवेट लिमिटेड कंपनीचे शेअर्स त्यांना उपलब्ध करून देता आले तर त्यांची इच्छापूर्ती होईल आणि शेतीसाठी भांडवल उपलब्ध होईल. शेतीच्या प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या उभ्या राहिल्या तर शेती न करण्याची मानसिकता बनवून घेतलेल्या ग्रामीण तरुणांना कामाचे एक आकर्षक क्षेत्र खुले होईल . पानठेल्या भोवती सदैव घुटमळत गुटका खावून भारत अस्वच्छ करणाऱ्या आणि कुटुंबासाठी चिंतेचा विषय ठरलेल्या तरुणाईला काहीतरी करून दाखविण्याचे आव्हानात्मक पण आकर्षक असे काम या प्रायवेट लिमिटेड कंपन्या निर्माण झाल्या तर मिळणार आहे.

-----------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव , पांढरकवडा , जि. यवतमाळ

मोबाईल - ९४२२१६८१५८
------------------------------------------------------------------------------------

Thursday, September 3, 2015

नावात काय आहे ?

 एखाद्या रस्त्याला औरंगजेबाचे नाव राहिले काय आणि गेले काय याने तसा काही फरक पडत नाही. फरक पडतो तो चुकीच्या दृष्टीकोनातून इतिहासाची मांडणी करण्यासाठी ऐतिहासिक सत्याची तोडमरोड करून लोकांची मने कलुषित करण्याचा प्रयत्न करण्यातून . रस्त्याच्या किंवा शहराच्या नामांतराला विरोध करण्या पेक्षा अशा प्रयत्नांना विरोध करणे जास्त महत्वाचे आहे.
-------------------------------------------------------------------------

नाव कोणतेही असले तरी काय फरक पडतो या अर्थाने विलियम शेक्सपियर यांनी हा प्रश्न विचारला होता. शेक्सपियर भारतात जन्मले असते तर कदाचित हा प्रश्न त्यांना पडलाच नसता आणि पडलाच असता तर वेगळ्या अर्थाने पडला असता. नावात काय नाही असे त्यांनी विचारले असते. भारतीयांसाठी नाव हे जीवन-मरणाच्या प्रश्नापेक्षा जास्त महत्वाचे असते. याचे अगदी ताजे उदाहरण म्हणजे दुष्काळात होरपळून निघत असलेल्या औरंगाबाद शहराचे नाव बदलण्यासाठी आग्रह वाढू लागला आहे. ज्ञानपीठ पारितोषक विजेते साहित्यिक नेमाडे यांनी शहराचे नाव बदलण्याचा प्रयत्न करण्या ऐवजी तहानलेल्या औरंगाबादला घोटभर पाणी मिळेल यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले तेव्हा काही लोक त्यांच्यावर तुटून पडले. कारण त्यांच्या साठी लोकांचे जीवन मरणाचे प्रश्न गौण आहेत. असे भावनिक वादळ निर्माण करून वर्तमानातील प्रश्न बाजूला फेकला जाण्याचा धोका असल्यानेच नामांतराचा जो जीन दिल्लीतील दोन्ही सरकारच्या कृपाछत्राखाली बाटलीतून बाहेर काढण्यात आला आहे त्याला बाटलीबंद करण्याची गरज आहे. तुम्ही एक नाव बदलले कि हजारो ठिकाणावरून लक्षावधी नावे बदलण्याची मागणी होईल आणि खरे प्रश्न बाजूला पडून देशभर नामांतरासाठी लढाया सुरु होतील. डॉ. कलाम यांचे नाव एखाद्या रस्त्याला देणे याला कोणीच विरोध करणार नाही. दिल्लीच्या प्रतिष्ठीत आणि सत्तेच्या वर्तुळातील असे अनेक प्रसिद्ध रस्ते आहेत ज्याला व्यक्तीचे नाव दिले गेलेले नाहीत. अगदी उदाहरणच द्यायचे झाले तर रेसकोर्स रोडचे देता येईल. रेसकोर्स रोडला कलामांचे नाव दिले गेले असते तर ते आनंदाने सर्वांनी स्विकारले असते. ज्यांना कलामांपेक्षा समाजात दुही निर्माण करण्यात जास्त रस आहे त्यांनी कलामांच्या नावासाठी मुद्दाम औरंगजेब रस्त्याची निवड केली. कलामांच्या हयातीत औरंगजेब रस्त्याच्या नामंतरणाचा प्रयत्न झाला असता तर कदाचित अशा नामांतराला विरोध करणारे कलाम हे पहिले व्यक्ती असते.

 औरंगजेब हा आदर्शाचा पुतळा होता अशा समजुतीने त्यांनी विरोध केला नसता तर इतिहासातील मुडदे उकरून त्याच्याशी लुटुपुटूची लढाई करून बेगडी विजयोत्सव करण्यापेक्षा जिवंत आणि खऱ्या शत्रूशी लढण्यासाठी भारताला महासत्ता बनविण्याच्या आड अशा गोष्टी येतील म्हणून त्यांनी विरोध केला असता. आजच्या निकषावर त्या काळात झालेल्या एखाद्या व्यक्तीचे आणि त्याच्या कार्याचे मूल्यमापन करणे चुकीचे ठरते. त्यावेळच्या परिस्थितीत तो कसा वागला या आधारेच ते मूल्यमापन करायला हवे. धर्मनिरपेक्षतेचे नाव घेतले तरी ज्यांचे पोट दुखायला लागते ती मंडळी धर्मनिरपेक्षतेचा चष्मा घालून औरंगजेबच्या धर्माधारित राज्याचे दाखले देत त्याला दुषणे देवून रस्त्याच्या नामांतराचे समर्थन करीत आहेत. औरंगजेबाने ज्या पद्धतीने राज्यकारभार केला त्याच पद्धतीने राजा रामदेवराय याने राज्यकारभार केला असता तर आज औरंगजेबावर जी टीका होतेय ती रामदेवराय वर झाली असती का याचे उत्तर नकारार्थीच मिळेल. एखाद्या रस्त्याला औरंगजेबाचे नाव राहिले काय आणि गेले काय याने तसा काही फरक पडत नाही. फरक पडतो तो चुकीच्या दृष्टीकोनातून इतिहासाची मांडणी करण्यासाठी ऐतिहासिक सत्याची तोडमरोड करून लोकांची मने कलुषित करण्याचा प्रयत्न करण्यातून . रस्त्याच्या किंवा शहराच्या नामांतराला विरोध करण्या पेक्षा अशा प्रयत्नांना विरोध करणे जास्त महत्वाचे आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांसारखा सर्वगुणसंपन्न राजा दुर्मिळ असतो. अशा राजाची तुलना तुम्ही दुसऱ्या कोणत्याही राजाशी करायला जाल तर ती सूर्य आणि काजवा यांची तुलना केल्यासारखे होईल. औरंगजेबाचा बराच काळ शिवाजी महाराज आणि दक्षिणेवर ताबा ठेवण्यात गेला आणि त्याचा शेवटही इकडेच झाला या गोष्टी मुळे तुलना करण्याचा मोह होईलही. पण अशी तुलना न करता औरंगजेबाकडे पाहिले तर त्याच्या कामगिरीचे डोळसपणे मूल्यमापन करता येईल. हिंदू मंदिरे ध्वस्त करणारा , हिंदुंवर अत्याचार करणारा आणि वेगळा कर लादणारा हिंदूद्वेष्टा राजा अशी त्याची सरसकट प्रतिमा उभी करणारे इतिहासाला न्याय देत नाहीत. औरंगजेबाच्या ५० वर्षाच्या प्रदीर्घ राजवटीत त्याने त्याने हिंदूंची १५ मंदिरे उध्वस्त केल्याची नोंद आहे. त्याला तात्कालिक अशी काही कारणे आहेत. इतिहास तर हिंदू राजानी दुसऱ्या हिंदू राजावर आक्रमण करून त्या राज्यातील मंदिरे उध्वस्त केल्याचा दाखला मिळतो. मराठा सैन्याने श्रुंगेरीतील शंकराचार्याचे मंदिर १७९१ साली उध्वस्त केल्याचा उल्लेख सापडतो. कारण शृंगेरी पिठावर टिपू सुलतानचा वरदहस्त होता. मराठ्यांनी उध्वस्त केलेले शंकराचार्याचे मंदिराचे पुननिर्माण नंतर टिपू सुलताननेच केले. तेव्हा त्याकाळी मंदिरावर झालेले हल्ले धर्मकारणापेक्षा राजकारण आणि अर्थकारणातून झालेले आहेत . कोणत्याही कारणास्तव अशी मंदिरे उध्वस्त करणे चूकच होते , पण हिंदू मंदिरे नाहीसे करून त्याचे रुपांतर मस्जीदीत करणे हा काही औरंगजेबाचा हेतू आणि कार्यक्रम नव्हता. तसा हेतू असता तर त्याकाळी किती मंदिरे सुरक्षित राहिली असती आणि टिकली असती याचा सहज अंदाज आपणास करता येईल. औरंगजेबाची सर्वाधिक दमछाक शिवाजी महाराजांचे अस्तित्व असलेल्या दक्षिणेने केली. तरीही दक्षिणेत त्याने मंदीर उध्वस्त केल्याचे दाखले मिळत नाही. शेवटच्या काळात तर त्याचा तळ देवगिरी जवळ म्हणजे वेरूळ परिसरात होता. मात्र वेरुळच्या लेण्यांना त्याने कोणती इजा पोचविली याचा दाखला नाही.

वस्तुत: त्याने जेवढी मंदिरे उध्वस्त केल्याचा दाखला इतिहासात मिळतो त्यापेक्षा १०० पटीने त्याने हिंदू मंदिरे टिकावीत यासाठी मदत केल्याचे दाखले इतिहासात मिळतात. हिंदुंवर बसविण्यात आलेल्या जिझिया करा बद्दल बोलले जाते तेव्हा हे सांगितले जात नाही की औरंगजेबच्या काळात हिंदू मंदिराच्या उत्पन्नावर कोणताही कर नव्हता . त्याकाळात हिंदूधर्माचे पुढारपण आणि सूत्रे ब्राम्हणांच्या हातात होती आणि जिझिया करातून ब्राम्हणांना सूट होती असे इतिहास सांगतो ! महिला , मुले , अपंग आणि जे हिंदू औरंगजेबच्या सैन्यात होते किंवा चाकरीत होते त्यानाही जिझिया माफ होता. उर्वरित हिंदुवर जसा जिझिया होता तसा मुस्लीम धर्मियांना जकात कर द्यावा लागायचा. जकात आणि जिझिया या कराचे प्रमाण सारखेच होते हे लक्षात घेतले तर औरंगजेबाने भेदभाव केला असे म्हणता येत नाही. त्याकाळी धर्म आधारित व्यवहार असल्याने मुस्लिमांना जकात तर हिंदुना जिझिया द्यावा लागायचा असे म्हणता येईल. इतिहासात आणखी एक उल्लेख आहे. शहाजहानच्या काळात (आमच्या लेखी हा औरंगजेब इतका अनुदार नव्हता) जेवढे हिंदू अधिकारी आणि मनसबदार होते त्यांच्या संख्येत औरंगजेब याचे काळात सुमारे १० टक्क्यांनी वाढ झाली होती. औरंगजेब हा हिंदूद्वेष्टा असता तर हे प्रमाण वाढण्या ऐवजी कमी झाले असते. हिंदू भावनांचा आदर म्हणून औरंगजेबाने आपल्या राज्यात गोहत्या बंदी केली होती . औरंगजेब धर्मभिरू होता आणि स्वत:च्या धर्मावर त्याचे अतीव प्रेम होते हे खरे . तेवढ्या कारणाने तो दुसऱ्या धर्माच्या विरोधी ठरत नाही. त्याने इतरावर जी आक्रमणे केली ती इस्लामच्या प्रसारासाठी नव्हती तर स्वत:च्या राज्याच्या सीमा वाढविण्यासाठी होती. शिवाजी महाराज आणि मोगल यांच्यातील लढाया हा काहीलोक आपल्या राजकीय स्वार्थासाठी रंगवितात तशा दोन धर्मातील लढाया नव्हत्या. आपापल्या राज्याच्या सीमांच्या रक्षणासाठी आणि विस्तारासाठी झालेल्या त्या लढाया होत्या. ती धर्मयुद्धे असती तर शिवाजी महाराजाकडून मुस्लीम सरदार लढले नसते आणि औरंगजेबाकडून हिंदू सरदार मैदानात उतरले नसते. तेव्हा औरंगजेब हिंदुशी क्रूरपणे वागला असा कांगावा करत सूक्ष्मपणे एखाद्या धर्माबद्दल रस्त्याचे नाव बदलण्याचे निमित्त करून विषपेरणी करण्याचे थांबविले पाहिजे.
राज्यकर्त्यात असणारे  सगळे गुण-दोष औरंगजेबात होते. एका राजाने वैयक्तिक जीवनात किती साधेपणाने राहिले पाहिजे आणि स्वकमाईवर जगले पाहिजे याचा इतिहासातील एकमेव आदर्श औरंगजेब आहे. सत्ता हाती यावी म्हणून क्रूरपणाची परिसीमा गाठणारा राजा म्हणून औरंगजेब एकमेव नसला तरी अग्रस्थानी होता असे नक्कीच म्हणता येईल. संभाजी राजेचा जसा छळ करून क्रूर पद्धतीने मारण्यात आले तसाच छळ करून आपल्या सख्ख्या भावांना कपटाने मारले . आपल्या बापाला कैदेत ठेवणाऱ्या औरंगजेबाने कपटाने शिवाजीराजेंना कैद करून ठेवले तर त्यात नवल वाटावे असे काही नाही. असे करण्यामागे धर्मकांक्षा नव्हती तर राजकीय महत्वाकांक्षा होती . औरंगजेबाची ही काळी बाजू आहे. ही काळी बाजू पुढे करून कोणी औरंगजेबाचे नाव बदलण्याची मागणी करीत असेल तर ते समजून घेता येईल. मात्र तो हिंदुद्वेष्टे होता आणि त्याने हिंदुंवर खूप अत्याचार केलेत अशा कंड्या पिकवून नामांतरासाठी कोणी रान पेटवत असेल तर धार्मिक तेढ निर्माण करण्याचा त्यांचा दुष्ट हेतू जनतेने लक्षात घेतला पाहिजे. सर्वोच्च पदी कसे येवू नये याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणून दिल्ली पासून ते गल्लीपर्यंत प्रत्येक राजकारण्याने औरंगजेबाकडे पाहिले पाहिजे. मात्र पदावर पोचल्यानंतर त्या पदाचा स्वत:साठी आणि कुटुंबासाठी कसा वापर करायचा नसतो याचा आदर्श म्हणून औरंगजेबाकडेच पाहावे लागते. या दोन्ही गोष्टी सत्तेतला असो कि विरोधातील प्रत्येक राजकारणी व्यक्तीच्या डोळ्यासमोर असायलाच हव्यात. यासाठी तरी प्रत्येक राजकारण्याने औरंगजेब मार्गावरून चालण्याची गरज होती. राजकारण्यांना कदाचित हेच त्याच्या डोळ्यासमोर नको असावे. म्हणूनच भाजप आणि आप ने नामांतराला  पटकन पाठींबा दिला आणि कॉंग्रेस पक्षाने सोयीस्कर मौन पाळले असावे.  विकासाला मागे टाकत  देशाला अस्थिर करण्याची ताकद नावात आहे हे लक्षात घेवून नामांतराचा प्रश्न संवेदनशीलतेने आणि संयमाने हाताळण्याची गरज सगळ्यांनीच लक्षात घेतली पाहिजे.
--------------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव , पांढरकवडा , जि. यवतमाळ
मोबाईल - ९४२२१६८१५८
---------------------------------------------------------------------------------------

Thursday, August 27, 2015

गुजरात विकासाचा बुडबुडा फुटला

 आजचे आरक्षण आंदोलन म्हणजे शेतीत खोलवर बुडत चाललेल्याना काडीच्या आधारा सारखे आहे. त्यांना खरा आधार देता आला तरच ते असा काडीचा आधार शोधणार नाहीत. शेतीला नुसते चांगले दिवस आणून भागणार नाहीत. त्याच सोबत नोकरीला वाईट दिवस आणण्याची गरज आहे.
------------------------------------------------------------------------------------------


लोकसभा निवडणुकीच्या वेळी विकासाचे गुजरात मॉडेल खूप प्रसिद्धीला आले होते. मोदींच्या नेतृत्वाखाली गुजरात राज्याने जो विकास केला तो अभूतपूर्व असल्याचे सांगण्याची अहमिका संघपरिवारात लागली होती. या दाव्याला खोडून काढणारी आकडेवारी त्या काळात प्रसिद्ध होत होतीच. संघपरिवाराच्या कुशल प्रचारयंत्रणे पुढे वस्तुस्थिती दर्शविणाऱ्या त्या आकडेवारीचा टिकाव लागला नव्हता. मुळात लोक त्यावेळी कॉंग्रेसच्या राजवटीवर एवढे संतप्त होते की त्यांनी कॉंग्रेसला घरी पाठविण्याचा निर्णय घेतला होता. कॉंग्रेसला घरी बसवायचे तर संघपरिवाराने पुढे केलेल्या गुजरातच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांना समर्थन देण्याशिवाय दुसरा समर्थ पर्याय नव्हता. गुजरात दंगलीतील वादग्रस्त भूमिके साठीख्यात असलेल्या मुख्यमंत्र्याला समर्थन द्यायचे तरी कसे एवढाच काय तो प्रश्न होता आणि जनते समोरचा तो प्रश्न गुजरातचे विकासाचे मॉडेल समोर करून संघपरिवाराने सोडविला होता. गुजरात सारखा साऱ्या देशाचा विकास झाला पाहिजे म्हणून आपण पंतप्रधान पदासाठी मोदीजीना समर्थन देत आहोत ही समजूत करून घेणे जनतेसाठी गरजेचे असल्याने त्याकाळी गुजरातच्या विकासाच्या मॉडेलवर उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नचिन्हाकडे सोयीस्करपणे डोळेझाक केली आणि गुजरात विकासाच्या बलून मध्ये बसून मुख्यमंत्री नरेंद्र मोदी प्रधानमंत्र्याच्या सिंहासनावर आरूढ झाले. ज्या कॅगने मनमोहन सरकार अप्रिय करण्यात मध्यवर्ती भूमिका निभावली त्या कॅगने गुजरातमध्ये मोदीकाळातील अनेक योजनावर ताशेरे ओढले. अनेक बाबतीत गुजरात इतर राज्याच्या तुलनेत मागे असल्याचे कॅगच्या अहवालाने दाखवून दिले. पण तोवर विकासाच्या गुजरात मॉडेलने कार्यसिद्धी साधल्याने कॅगच्या अहवालाने फारसा फरक पडला नव्हता. गुजरातमधील संपन्न समुदाय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाटीदार किंवा पटेल समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी उभ्या राहिलेल्या आंदोलनाने मात्र गुजरातचे विकासाचे मॉडेल एका झटक्यात भंगारात काढले. गुजरातेतील पाटीदार समाज आजवर सगळ्याच क्षेत्रात आघाडीवर राहात आला आहे. या समाजाचा मुख्य व्यवसाय शेती असला तरी लहानमोठ्या उद्योगात याच समाजाची आघाडी आहे. सहकार क्षेत्रावर याच समाजाचा ताबा आहे. गुजरातेतील प्रसिद्ध हिऱ्याचा व्यवसाय या समाजाच्या मुठीत आहे. परदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांमध्ये गुजराती लोक आघाडीवर आहेत आणि त्यातही पाटीदार समाज आघाडीवर आहे. सर्वच क्षेत्रात आघाडी घेतलेला हा समाज आणि विशेषत: या समाजातील तरुणवर्ग आपल्या भवितव्या बद्दल साशंक बनला आहे. विकासाच्या ज्या मॉडेलमध्ये संपन्न समजला जाणारा समुदायच जर स्वत:ला असुरक्षित समजत असेल तर समाजातील इतर घटकांची काय अवस्था असेल याचा अंदाज बांधणे अवघड नाही.

गुजरातेत पटेल समाजाची राजकीय कोंडी झाली आहे आणि या कोंडीमुळे समाजात सरकार विरोधी भावनेला या आंदोलनाने वाट करून दिली असली तरी राजकारणाच्या सारीपाटातून हे आंदोलन उभे राहिलेले नाही. परंपरागत राजकीय नेतृत्व यामागे नाही. नुकताच बी,कॉम. झालेला २२-२३ वर्ष वयाच्या हार्दिक पटेल नामक तरुणाकडे या आंदोलनाचे नेतृत्व आहे. गुजरातेत कॉंग्रेस पराभवाच्या दणक्याने अद्यापही आडवी झालेली असल्याने त्यांच्या सहभाग आणि समर्थनाविना एवढे मोठे आंदोलन उभे राहिले आहे. पटेल समाजाने आपले वजन भाजपच्या पारड्यात टाकल्या नंतरच गुजरातेत कमळ फुलले हे लक्षात घेतले तर या आंदोलनामागे कोणी सरकार विरोधक नसून सरकार समर्थक समूहच रस्त्यावर उतरला आहे. केंद्रात आणि राज्यात प्रधानमंत्री मोदी यांची असलेली पकड लक्षात घेता एवढ्यात त्यांना स्व-राज्यातून कोणी आव्हान द्यायला उभे राहील हे संभवत नाही. पण ज्याचा जितका एकाधिकार तितका तो जास्त असुरक्षित असतो. त्यामुळे या आंदोलनाने प्रधानमंत्र्याला आव्हान मिळाल्याचे समजून मोदी समर्थक अस्वस्थ झाले आहेत. त्यातून या आंदोलनाचा नेता असलेल्या हार्दिक पटेलच्या राजकीय संबंधा बद्दल अफवा पसरवत त्याची बदनामी करण्याची कुजबुज मोहीम सुरु केली आहे. दुसरीकडे प्रधानमंत्री मोदी यांना आव्हान देण्याच्या स्थितीत नसलेले स्व-पक्षासकट सर्वपक्षीय मोदी विरोधक आंदोलनाचे संभाव्य परिणाम लक्षात न घेताच आंदोलनाला छुपे किंवा जाहीर समर्थन देवू लागले आहेत. हे आंदोलन का उभा राहिले याचा विचार न करताच आपल्या सवलतीवर परिणाम होईल या भीतीने सध्या ओबीसी मध्ये गणना होत असलेला समाज या आंदोलनाला विरोध करीत आहेत. दुसऱ्या राज्यात पाटीदार समाजा इतकेच त्या त्या राज्यातील प्रभावी जात समूह या आंदोलनाने उत्तेजित झाले आहेत.आपल्याकडेही गुजरातमध्ये सुरु असलेल्या आंदोलनाच्या धर्तीवर आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरु होण्याची स्वप्ने त्यांना पडू लागली आहेत. पाटीदार समाजाचे आंदोलन कुशलतेने हाताळून थांबविण्यात यश आले नाही तर आरक्षण आंदोलनाचा वणवा इतर राज्यात पसरायला वेळ लागणार नाही. गुजरात सरकार बळाचा वापर करून आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न सुरूच ठेवील तर हे आंदोलन राजकीय होण्याची शक्यता वाढेल. आजच्या घडीला खरी गरज कशाची असेल तर आंदोलकांच्या भावना समजून घेण्याची , त्यांचे प्रश्न समजून घेण्याची आहे. त्यांचे प्रश्न खरे आहेत पण ते आरक्षणातून सुटण्यासारखे नाहीत हे चर्चेतून पटवून देण्याची गरज आहे. त्यांचे प्रश्न आरक्षणातून सुटण्यासारखे नाहीत तर कशामुळे सुटतील या संबंधीचा आराखडा मांडण्याची आणि त्याची प्रामाणिक अंमलबजावणी करण्याची गरज आहे.

ज्या जातसमूहांना आरक्षण मिळत नाही त्यामुळे आपल्यावर अन्याय होतो आहे असे वाटत आहे ते सगळे जातसमूह शेतीशी निगडीत आहेत. गुजरातेतील पाटीदार , महाराष्ट्रातील मराठा आणि धनगर  किंवा उत्तरेतील जाट समुदाय यांचा व्यवसाय प्रामुख्याने शेती आहे. ६० टक्क्याच्यावर जनसंख्या शेती किंवा शेतीशी निगडीत व्यवसायावर उदरनिर्वाह करते. शेतीची आजची अवस्था पाहता या व्यवसायाला काही भवितव्य उरले आहे यावर कोणाचाच विश्वास नाही. आर्थिकदृष्ट्या अत्यंत असुरक्षित अशी ही जनसंख्या आहे. ग्रामीण भागातील शिक्षणाची अवस्था कोणापासून लपून नाही. शेतकरी समाजातील शिक्षणाची अनास्था इतर कोणत्याही समाजापेक्षा अधिक आहे. औद्योगीकरण नसल्यामुळे एकेकाळी समाजात शेतीशिवाय उत्पादनाची इतर साधनेच अस्तित्वात नव्हती त्याकाळी हाती शेती असलेला हा समूह प्रभावी होता . सामाजिक स्तर देखील उंचावलेला होता. हाती उत्पादनाचे साधन आणि वरचा सामाजिक स्तर यामुळे एकेकाळी या समाजाने मनमानी केली. औद्योगीकरण आणि शिक्षणाच्या प्रसारामुळे समाजात अनेक नव्या संधी निर्माण झाल्यात. आजवर ज्यांच्या हाती उत्पादनाची साधने नव्हती ते पटकन तिकडे वळले. शेतकरी समुदाय मात्र आपल्याच गुर्मीत स्वत:च्या हाताने शेतीच्या बेड्या आपल्या पायात अडकवून शेतीवर तळ ठोकून बसला. इतर समाज पुढे गेला. हा आहे तिथेच राहिला. थाट, विचार सरंजामीच राहिले पण आर्थिक पाठबळच नसल्याने सगळेच पोकळ वासा ठरले. इतर समाजाची बरोबरी , इतर समाजाशी स्पर्धा करण्याची त्याची शक्ती आणि क्षमता नगण्य असल्याची जाणीव त्याला आता कुठे होवू लागली आहे. अशी स्पर्धा करण्यासाठी त्याला आता आरक्षणाची गरज भासू लागली आहे. हा समाज आरक्षणाची मागणी करू लागला आहे त्याचे कारण न परवडणारी शेती आहे आणि शेतीतून निर्माण होणारी शिक्षण आणि आधुनिकते विरुद्धची मानसिकता आहे. आरक्षणामुळे या समाजाचा कोणताच प्रश्न सुटण्यासारखा नाही. आरक्षणाचा लाभ झालाच  तर या समाजात राजकारणामुळे आणि ज्यांना शिक्षणाची संधी मिळाली आणि या संधीचे ज्यांनी सोने केले अशा समाजातील प्रस्थापितांनाच होणार आहे. शेवटी नोकऱ्या मूठभरच असणार आहे आणि आरक्षण दिले तरी बहुसंख्य शेतकरी समाज त्यापासून वंचितच राहणार आहे. हा समाज दिवसेंदिवस एवढा अगतिक होत चालला आहे की साधक बाधक विचार करण्याच्या स्थितीत राहिलेला नाही. मुलगा नोकरीत नाही म्हणून त्याचे लग्न होत नसेल तर नोकरीत आरक्षण असावे या मागणीसाठी तो डोळे झाकून उतरणारच. आरक्षण मिळाले तर ज्यांना प्रत्यक्ष लाभ मिळेल असे प्रस्थापित या समुदायाला आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरायला लावणार हे समजून घेतले पाहिजे. यांच्या आरक्षणाच्या मागणीला विरोध करणारे या समाजाच्या हातून आहे ते निसटून चालले आहे आणि त्यामुळे आर्थिकदृष्ट्या हा समुदाय अंत्यंत असुरक्षित बनला आहे हे समजून घेत नाहीत.


आज जे आरक्षण आंदोलन गुजरातेत उभे राहात आहे आणि इतरही राज्यात उभे राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्याचे मूळ कारण शेतीत आहे. शेतीचा प्रश्न सोडविल्या शिवाय आरक्षण आंदोलनाला अटकाव करणे शक्य नाही. शेतीवरील जनसंख्येला दुसऱ्या फायदेशीर उद्योगात सामावून घेणे हा तो प्रश्न सोडविण्याचा राजमार्ग आहे. असे करायचे तर शेतकरी कुटुंबातील तरुण तंत्रकुशल बनला पाहिजे. त्यासाठी ग्रामीण भागातील शिक्षणाची पुनर्रचना आणि पुनर्व्यवस्था करावी लागेल. शेतीत मोठ्या प्रमाणावर भांडवल ओतल्या शिवाय आणि आधुनिक तंत्रज्ञान आणल्याशिवाय शेतीव्यवसाय तरणार नाही आणि त्यावरील लोकांना तारणारही नाही. आजचे आरक्षण आंदोलन म्हणजे शेतीत खोलवर बुडत चाललेल्याना काडीच्या आधारा सारखे आहे. त्यांना खरा आधार देता आला तरच ते असा काडीचा आधार शोधणार नाहीत. शेतीला नुसते चांगले दिवस आणून भागणार नाहीत. त्याच सोबत नोकरीला वाईट दिवस आणण्याची गरज आहे. एकीकडे शेतीला नोकरी सारखे स्थैर्य आणि चकाकी आणली आणि दुसरीकडे नोकरीत शेती सारखी अस्थिरता आणि असुरक्षितता निर्माण केली तर कोणीही आरक्षणासाठी रस्त्यावर उतरणार नाही.

-------------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव , पांढरकवडा , जि. यवतमाळ

मोबाईल - ९४२२१६८१५८
------------------------------------------------------------------------------------

Thursday, August 20, 2015

जनता आणि प्रधानमंत्री यांच्यातील वाढते अंतर

प्रधानमंत्र्याच्या लालकिल्ल्यावरील पहिल्या भाषणात सर्वाना सोबत घेवून राष्ट्राला कोणत्या उंचीवर न्यायचे याची दृष्टी आणि दिशा होती. या वर्षीचे भाषण मात्र प्रधानमंत्री कार्यालयातील कारकुनांनी तयार केलेला सरकारच्या कामगिरीचा भ्रामक लेखाजोखा प्रधानमंत्र्यांनी आपल्या भाषणात तेवढा मांडला. हा मांडताना प्रधानमंत्र्यातच उत्साह दिसत नव्हता मग लोकांमध्ये उत्साह कोठून येणार !
-------------------------------------------------------------------------------------

प्रधानमंत्री यांचे लाल किल्ल्यावरील दुसरे भाषण ऐकतांना वारंवार त्यांच्या लाल किल्ल्यावरील पहिल्या भाषणाची आठवण येत होती. याचा दुसरा अर्थ असा आहे कि त्यांच्या या दुसऱ्या भाषणात मन रमत नव्हते. एक वर्षापूर्वीची त्यांच्या भाषणावरील लोकांची उत्साहवर्धक आणि उत्स्फूर्त प्रतिक्रियेची जागा उदासवाण्या शांततेने घेतली याचा अर्थ या वेळी पंतप्रधान जे बोलत होते ते फक्त कानावर आदळत होते . कानातून लोकांच्या हृदया पर्यंत त्यांचे बोल पोचले नाहीत. पंतप्रधान आणि जनतेत अंतर वाढत चालल्याची ही खूण किंवा हे संकेत आहेत. अंतराळातील अंतर मोजण्यासाठी प्रकाशवर्ष ही संज्ञा वापरतात. तसे प्रधानमंत्री मोदीआणि जनता यांच्यात पडत चाललेले अंतर ३६५ दिवसाच्या वर्षात मोजायचे झाल्यास एक वर्षाचे अंतर पडले आहे हे त्यांच्या लाल किल्ल्यावरील पहिल्या आणि दुसऱ्या भाषणावर उमटलेल्या प्रतिक्रिया मधील फरकावरून म्हणता येईल. प्रधानमंत्री तेच , वक्तृत्वही तसेच, भाषाही लाघवी , तळमळ तीच तरी हा फरक पडला आहे . त्यांच्या पहिल्या भाषणात 'मेक इन इंडिया'. 'स्कील्ड इंडिया' , 'डिजिटल इंडिया', 'क्लीन इंडिया' , 'जन धन योजना' या सारख्या आकर्षक आणि उपयुक्त घोषणा होत्या तशा याही भाषणात लोकांचा उत्साह वाढवू शकतील अशा १२५ कोटी जनतेची 'टीम इंडिया' , 'स्टार्ट अप इंडिया' 'कृषी कल्याण मंत्रालय' सारख्या घोषणा होत्या. पण या घोषणा यावेळी लोकांना आंदोलित करू शकल्या नाहीत. याचे एक कारण तर पहिल्या वर्षीच्या घोषणांचे काय झाले हे जनता आपल्या डोळ्याने पाहते आहे , त्यामुळे या वर्षीच्या घोषणा बाबत जनता सावध आणि उदासीन बनली. फरक पडण्याचे मूळ कारण थोडे वेगळेच आहे. देशाच्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून बोलतांना देशाच्या आतापर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेणे , राष्ट्र म्हणून आपली उपलब्धी , आपल्या उणीवा आणि आपल्या भावी वाटचाली बाबत संकेत देणे अभिप्रेत असते. राष्ट्राच्या भावी वाटचालीला अनुरूप आपल्या सरकारची वाटचाल आहे हे दाखवून देण्या इतपत आपल्या सरकारच्या कामगिरीवर प्रकाश टाकणे प्रसंगानुरूप आहेच, पण सगळेच भाषण आपल्या सरकारच्या कामगिरीचे अवास्तव गुणगान करण्यात घालविले तर लाल किल्ल्यावरील भाषणाला अर्थ उरत नाही. आपल्या सरकारच्या उपलब्धी मांडायला आणि सांगायला संसदेचे व्यासपीठ आहे. माध्यमाशी बोलण्यातून ते साधता येते. जाहीर सभातून ते मांडता येते. स्वातंत्र्य दिनाच्या लाल किल्ल्यावरील भाषणाला जाहीरसभेतील भाषणासारखे स्वरूप आल्यामुळे स्वातंत्र्य दिनाचा जायचा तो संदेश लोकांपर्यंत पोचलाच नाही. प्रधानमंत्र्याच्या लालकिल्ल्यावरील पहिल्या भाषणात सर्वाना सोबत घेवून राष्ट्राला कोणत्या उंचीवर न्यायचे याची दृष्टी आणि दिशा होती. या वर्षीचे भाषण मात्र प्रधानमंत्री कार्यालयातील कारकुनांनी तयार केलेला सरकारच्या कामगिरीचा भ्रामक लेखाजोखा प्रधानमंत्र्यांनी आपल्या भाषणात तेवढा मांडला. हा मांडताना प्रधानमंत्र्यातच उत्साह दिसत नव्हता मग लोकांमध्ये उत्साह कोठून येणार !

प्रधानमंत्र्याच्या भाषणाला असे स्वरूप येण्याचे एक महत्वाचे कारण तर येवू घातलेल्या बिहार विधानसभेच्या निवडणुका आहेत. प्रधानमंत्री म्हणून पक्षावर आणि देशावर पकड कायम ठेवण्याच्या दृष्टीने बिहार राज्यातील निवडणूक मोदीजी साठी महत्वपूर्ण आहे. त्यामुळे त्या निवडणुकीवर प्रभाव पडेल असे भाषण देण्याचा मोह त्यांना टाळता आला नाही. निवडणुकीवर प्रभाव टाकणारे भाषण द्यायचे तर सत्याची थोडी तोड मरोड आणि अतिशयोक्ती आलीच. उद्दिष्टपूर्ती झाली हे सांगण्याची घाई अपरिहार्य आहे आणि उद्दिष्टपुरतीचा आभास निर्माण करणेही. भाषणातून हे सगळे दाखविणे सोपे आणि सोयीचे असेल पण त्यामुळे लोकांना तोंड द्यावे लागते ते जमिनीवरील वास्तव बदलत नाही. त्यामुळे प्रधानमंत्री जे घडले असे सांगत होते त्याचा परिणाम लोकांना आपल्या जीवनावर होतो आहे हे वाटतच नव्हते. प्रधानमंत्र्यांना जमिनीवरील वास्तव दिसत नव्हते की तोंडावर आलेल्या बिहार निवडणुकीमुळे त्यांनी तिकडे कानाडोळा करून स्वप्नरंजन केले हे सांगणे कठीण आहे. एक मात्र खरे कि सरकारच्या योजनांमुळे लोकजीवनात बदल होतोय असे चित्र नाही. असा बदल होत नाही याचे खरे कारण सरकार बदलले तरी सरकारी यंत्रणेत बदल होत नाही. सरकारी यंत्रणेचा लोकाप्रती भाव बदलत नाही. सरकारी यंत्रणेची कामगिरी त्यांनी अक्कलहुशारीने तयार केलेल्या आकडेवारीत दिसते. अशी आकडेवारी खुलवून आणि फुलवून दाखवत बदल झाल्याचा आभास निर्माण करण्यात या यंत्रणेने महारत हाशील केली आहे. या आकडेवारीचा जंजाळच राज्यकर्त्यांना भ्रमात ठेवतो आणि लोकांपासून दूर नेतो. लोक आणि राज्यकर्ते यांच्यात भिंत उभारण्याचे काम ही यंत्रणा बेमालूमपणे करीत असते. मोदीजीनी लाल किल्ल्यावरील पहिल्या भाषणात सरकारी व्यवस्थेत . यंत्रणेत जे बदल करायचे सुतोवाच केले होते ती ही स्थिती लक्षात घेवूनच. त्या दिशेने काहीच प्रगती झाली नाही हेच प्रधानमंत्र्याचे भाषण दर्शविते. एवढेच नाही तर प्रधानमंत्री आणि जनता यांच्यात भिंत उभी करण्यात ही यंत्रणा यशस्वी होत आहे याचे संकेत लाल किल्ल्यावरील दुसऱ्या भाषणातून मिळत आहेत. सरकारी यंत्रणेने प्रधानमंत्र्याला आकडेवारीच्या जंजाळात अडकविले आणि प्रधानमंत्र्यांनी त्या आकडेवारीने लोकांना गुंडाळण्याचा प्रयत्न केला. सरकारी यंत्रणेच्या तुम्ही जितके जवळ असता तितके लोकांपासून दूर असता. या सरकारी यंत्रणेला बदलण्याची भाषा मोदीजीनी केली होती . परंतु प्रधानमंत्र्याचे लालकिल्ल्यावरील भाषण ऐकल्यावर विपरीत घडत चालल्याचे प्रकर्षाने वाटायला लागते. प्रधानमंत्र्याला आपल्या अनुकूल घडविण्यात सरकारी यंत्रणेला यश मिळते आहे याचे दर्शन या भाषणातून होते.

असे नसते तर प्रधानमंत्र्यांनी गैस सबसिडी परत करण्याचा मुद्दा मोठी उपलब्धी म्हणून रंगविला नसता. मध्यंतरी या संबंधी जी आकडेवारी समोर आली होती त्यानुसार फक्त ०.२ टक्के लोकांनी सबसिडी नाकारली होती. यातून गैस सबसिडी वर खर्च होणाऱ्या ४६ हजार ४५८ कोटी रुपया पैकी अवघ्या १९३ कोटी रुपयाची बचत झाली.  एप्रिल महिन्यात समोर आलेल्या या आकडेवारीत ऑगस्ट पर्यंत दुप्पट तिप्पट वाढ झाली असे मानले तरी सबसिडीची कमी होणारी रक्कम अगदीच नगण्य ठरते. जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणून मिरविणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या गाव पातळीपासून ते दिल्ली पातळी पर्यंतच्या पक्ष आणि सरकारी पदाधिकाऱ्यांनी सबसिडी सोडली असती तर या पेक्षा १०० पट अधिक सबसिडी सोडणारे राहिले असते. भावनिक त्याग वगैरे बोलण्यासाठी योजना ठीक आहे पण एकूण अर्थकारणावर  याचा प्रभाव शून्य आहे. शिवाय ज्यांनी सबसिडी सोडली त्याच्या परिणामी किती गरिबांना गैस उपलब्ध झाला या बद्दल प्रधानमंत्री काहीच बोलले नाहीत. कोळसाखाणी आणि स्पेक्ट्रमच्या  लिलावातून सरकारने फार मोठी रक्कम जमा केली हे कागदोपत्रीच खरे आहे. प्रत्यक्षात ही रक्कम टप्प्या टप्प्याने मिळत जाणार आहे आणि कोळसा खाणीची रक्कम तर ज्या राज्यात खाणी आहेत त्यांनाच मिळणार आहेत. प्रधानमंत्री जन धन योजने अंतर्गत बँकेत उघडण्यात आलेल्या खात्यांची संख्या आणि या खात्यात जमा झालेली रक्कम प्रधानमंत्र्यांनी दावा केल्या प्रमाणे असेलही पण ज्यांनी खाती उघडली त्यांच्यापैकी कितीना काय लाभ झाला याची तपासणी केली तर निराशाच पदरी पडेल. काळा पैसा जमा होत असल्याचेही प्रधानमंत्र्यांनी कौतुकाने सांगितले. या काळ्या पैशाने तर लोकजीवन आमुलाग्र बदलणार होते. पण एका अंशानेही हा बदल दृष्टीपथात नाही. या सगळ्या योजना करा व्यतिरिक्त सरकारच्या गंगाजळीत भर घालणाऱ्या नक्कीच आहेत. तरीही सरकारच्या जमा-खर्चातील तुट काही केल्या कमी होत नाही.  खरा प्रश्न जमा होत असलेली ही रक्कम लोक कल्याणावर आणि शेती व उद्योगासाठी मुलभूत संरचना निर्माण करण्यावर खर्च होणार सरकारी यंत्रणा आणि राज्य चालाविण्यावरच खर्च होणार हा आहे. जे मिळते ते सरकारी यंत्रणाच फस्त करणार असेल तर लोकजीवनात बदल होणारच नाही. देशापुढील सर्वात ज्वलंत प्रश्न बनलेल्या शेतीच्या दैनावस्थेवर कोणतीही उपाययोजना न मांडता कृषी मंत्रालयाचे नाव बदलण्याची घोषणा तर शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणारी आणि त्यांच्या जखमेवर मीठ चोळणारी ठरली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या वर्षीच्या भाषणाने जो आशा आणि उत्साह निर्माण झाला होता तो वाढविणे तर सोडाच पण सरकारला टिकविता आला नाही हाच प्रधानमंत्र्याच्या लाल किल्ल्यावरील दुसऱ्या भाषणाचा परिणाम दर्शवितो. बोलणे फार झाले , आता करून दाखवा हेच प्रधानमंत्र्याच्या भाषणाप्रती लोकांची उदासीनता सांगत आहे. लोकांसाठी काही करायचे असेल तर प्रधानमंत्र्यांनी त्यांच्या डोक्यावर मिरे वाटणाऱ्या सरकारी यंत्रणेच्या पाठीवर स्वार होण्याची गरज आहे. निराशा विरोधक फैलावत नसून कथनी आणि करणी यातील अंतरातून आली आहे. हे अंतर कमी केले नाही तर जनता आणि प्रधानमंत्री यांचेतील अंतर वाढतच राहील.


------------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव , पांढरकवडा , जि. यवतमाळ 

मोबाईल - ९४२२१६८१५८
-------------------------------------------------------------------------------------

Thursday, August 6, 2015

धर्मनिरपेक्षतेचे वस्त्रहरण

याकुब मेमन फाशी प्रकरणात  धार्मिक आधारावर विचार न करता बोलण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या वाट्याला जो रोष आला तो पाहता धार्मिक आधारावर विचार न करणाऱ्यांचे समाजातील स्थान आणि वजन दिवसेंदिवस घटत चालले आहे हे स्पष्ट होते. असे होणे विविधतेने नटलेल्या भारता सारख्या देशासाठी  चिंतेचा आणि चिंतनाचा विषय झाला पाहिजे.
---------------------------------------------------------------------------------------------------------------


याकुब मेमन याच्या फाशीच्या निमित्ताने देशभर जी चर्चा झाली त्या निमित्ताने सगळेच उघडे पडले. राजकारणी लोकांचे विविध प्रसंगात झालेले वस्त्रहरण पाहण्याची आम्हाला सवय आहे. याकुबच्या फाशीच्या निमित्ताने ते पुन्हा एकदा झाले . संवेदनशील विषय संवेदनाशून्य पद्धतीने आणि बिनडोकपणे हाताळणे हे आता आमच्या राजकारणाचे वैशिष्ट्य आणि ओळख बनत चालली आहे. ज्यांना फक्त हिंदूंचा किंवा ज्यांना फक्त मुसलमानांचा विचार करून राजकारण करायचे आहे त्यांच्यासाठी असे संवेदनशील मुद्दे म्हणजे आपले विभाजनवादी राजकारण पुढे नेण्याची पर्वणीच असते. याकुब प्रकरणात फक्त हिंदूंचा आणि फक्त मुसलमानांचा विचार करणाऱ्या नेत्यांना त्या त्या समाजातील लोकांची सहानुभूती मिळाली. मुस्लीम आहे म्हणून याकुब मेमनला फाशी दिल्या जात आहे असा कांगावा करणाऱ्या ओवैसीला त्या समाजाची सहानुभूती लाभली. तर दुसरीकडे विविध कारणांनी त्याच्या फाशीला विरोध करणाऱ्यांचा मुस्लिमांचे लांगुलचालन करणारे आणि मुस्लीम आतंकवादाचे समर्थन करणारे खलनायक अशी संभावना करून देशात उन्माद निर्माण करण्याचा हिंदुत्ववाद्याचा प्रयत्न बऱ्यापैकी यशस्वी ठरला. या सगळ्या गदारोळात धार्मिक आधारावर विचार न करता बोलण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या वाट्याला जो रोष आला तो पाहता धार्मिक आधारावर विचार न करणाऱ्यांचे समाजातील स्थान आणि वजन दिवसेंदिवस घटत चालले आहे हे स्पष्ट होते. असे होणे विविधतेने नटलेल्या भारता सारख्या देशासाठी खूप महागात पडू शकत असल्याने तो चिंतेचा आणि चिंतनाचा विषय झाला पाहिजे. 


 धर्माधारित विचार न करणारांचे राजकारणातील आणि समाजकारणातील स्थान आणि प्रभाव घटत चालला यासाठी ते स्वत:च यासाठी कारणीभूत आहे हे तथ्य आणि सत्य याकुबच्या फाशी प्रकरणी समोर आले हे एका परीने चांगले झाले. असा विचार करणाऱ्या मंडळीनी ज्या पद्धतीने या फाशीच्या वादात उडी घेतली त्यामुळे धर्मनिरपेक्ष राजकारणाचे फार मोठे नुकसान झाले आहे. त्यांनी घेतलेली भूमिका चुकीची होती अशातला भाग नाही. अशी भूमिका घेण्याचा वेळ, काळ, स्थळ आणि संदर्भ सगळेच चुकीचे होते. फाशीची शिक्षा अमानवी आहे अशी चर्चा करण्याचा हा प्रसंग आणि वेळ नव्हती. याकुबच्या बाजूने नवे पुरावे आणि नवे तथ्य किंवा जुनेच तथ्य नव्याने मांडण्याची ही वेळ नव्हती. भूमिकेत तथ्य असूनही लोकांना एका अंशानेही त्यांचे म्हणणे पटत नव्हते उलट याकुबच्या फाशी विरुद्धचा त्यांचा प्रत्येक प्रयत्न आणि तर्क लोकक्षोभ वाढविणारा ठरत होता. धर्माधारित विचार न करणाऱ्यांनी लोकांमध्ये जावून विचार मांडण्याचे , लोकांना आपली भूमिका पटविण्याचे केव्हाच सोडले आहे त्याचा हा परिपाक आहे. चैनेल चर्चा ,  वृत्तपत्राचे रकाने किंवा जनहित याचिका या माध्यमातूनच त्यांच्या भूमिका समोर येत असतात ज्या सर्वसामन्यांच्या डोक्यावरून जातात.लोकांना आपली भूमिका पटत नाही हे जाणवल्याने ही मंडळी अधिक हताश , अधिक तर्ककर्कश बनत चालली आहे. हताशा दूर करण्याचा उपाय जनतेत जाणे , जनतेच्या गळी आपली भूमिका उतरविणे हा आहे. त्याऐवजी हे नेते न्यायालयाकडे धाव घेत आहेत किंवा राष्ट्रपतीकडे साकडे घालताना दिसतात. याच कारणाने ते लोकांच्या रोषास अधिक बळी पडू लागले आहेत आणि धर्मावर आधारित राजकारण आणि समाजकारण करणारांची चलती आणि चांदी झाली आहे.

एक खटला २१ वर्षे चालतो . खालच्या न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयात तो चालतो . या सगळ्या कालखंडात याकुबला न्याय मिळावा म्हणून ही मंडळी का उभी राहिली नाही असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. सर्वोच्च न्यायालयाने केलेला निवाडा योग्य किंवा सत्याला धरून असतोच असे म्हणणे धाडसाचे ठरेल. शेवटी आपण एक न्यायाची व्यवस्था उभी केली आहे आणि या व्यवस्थेकडून चुका होवू शकतात ,चुकीचे निर्णय दिले जावू शकतात हे मान्य केले तरी त्यावर न्यायालयाचा निर्णय अमान्य करणे हा उपाय असू शकत नाही. न्यायव्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करणे , दबाव वाढविणे हाच उपाय असू शकतो. याकुबच्या फाशीच्या बाजूने आणि फाशीच्या विरोधात तावातावाने चर्चेत उतरलेली मंडळी या खटल्याच्या बाबतीत आजवर कुंभकर्णी झोपेत होती. या २१ वर्षात याकुबला न केलेल्या गुन्ह्यासाठी अडकविण्यात आले हे त्याच्या परिवाराशिवाय कोणी बोलले नाही. मग शिक्षा झाल्यावर एकाएकी त्याला न्याय मिळावा म्हणून उभे राहणे ही दांभिकता आहे आणि न्यायाची बेगडी कळकळ आहे. दुसऱ्या बाजूने झाला तेवढा न्याय पुरे झाला आता याकुबला फाशी देवून बॉम्बस्फोटात ठार झालेल्यांच्या परिवाराला न्याय देण्यासाठी २१ वर्षे झोपलेले एकाएकी उतावळे झाले होते. या मंडळीना या २१ वर्षात बॉम्बस्फोट पीडितांची कधी आठवण झाली होती का याचे प्रामाणिक उत्तर नकारार्थी असणार आहे. दोन्ही बाजूच्या उथळ विच्राराच्या उतावळ्या उपटसुंभानी समाजातील सौहार्दाला तडा देवून वातावरण गढूळ करून ठेवले आहे. असे वातावरण तयार होण्यात न्यायालयीन गोंधळाने भरच पडली आहे. 


याकुब प्रकरणी अंतिम निर्णय आणि त्यावर फेरविचार झाल्यानंतर न्यायालयीन प्रक्रिया तेथेच थांबायला हवी होती. मरणाला सामोरा जाणारा आरोपी मिळेल तो मुद्दा समोर करून मरण टाळण्याचा प्रयत्न करणार हे उघड आहे. त्याने पुढे केलेल्या मुद्द्यात तथ्य आहे असे न्यायालयाला वाटत होते तर आधी फाशीच्या वारंटला स्थगिती देवून त्यांनी शांतपणे त्या मुद्द्याचा विचार करायला हवा होता. विचार करण्या इतपत गंभीर मुद्दा नसेल तर तेथेच अर्ज स्विकारायलाच नकार द्यायला पाहिजे होता. न्यायालयाने या दोन्ही गोष्टी केल्या नाहीत. ज्या आरोपीला पहाटे फाशी द्यायचे आहे त्याच्या अर्जावर रात्री विचार करण्याचा विक्रम केला. एकीकडे नागपूर तुरुंगात फाशी देण्याची तयारी चालली होती तर दुसरीकडे न्यायालय त्या फाशीच्या विरोधात विचार करीत होते.  न्यायालयाचा काय निर्णय येणार हे आधीच माहिती असल्या सारखी फाशीची तयारी सुरु असल्याने  सकृतदर्शनी असे चित्र निर्माण झाले कि न्यायालय सरकारच्या दबावाखाली काम करीत आहे किंवा न्यायाची औपचारिकता तेवढी पूर्ण करीत आहे. जो खटला न्यायालयात २१ वर्षे रेंगाळत राहिला त्यात आणखी एक दिवस वाढला असता तर काहीच फरक पडला नसता. पण सरकारने आधीच ठरविलेल्या वेळेत फाशी देणे शक्य व्हावे म्हणून रात्री न्यायालय चालविल्याने चुकीचा संदेश गेला.  याकुब प्रकरण सर्वोच्च न्यायालयाने ज्या पद्धतीने हाताळले त्यामुळे न्यायालयाच्या विश्वासार्हतेला आणि प्रतिष्ठेला धक्का लागला आहे. त्यात आधी दोन न्यायमूर्तीनी ज्या पद्धतीने वेगळी मते नोंदवून हे प्रकरण हातघाईवर आणले ते अधिक गंभीर आहे. हुकुमशहा बनून शाळेत गीता सक्तीची करण्याची जाहीर मनीषा व्यक्त करणारे एक न्यायाधीश आणि गुड फ्रायडेला पंतप्रधानांनी एक बैठक बोलावली म्हणून जाहीरपणे नाराजी व्यक्त करणारे दुसरे न्यायाधीश अशा दोन न्यायधीशाच्या खंडपीठाचे एकमत होणे कठीणच होते. गीता प्रेमी न्यायाधीशानी मनुस्मृतीचा आधार देत याकुबचा अर्ज फेटाळला तर धार्मिक भेदभावा वरून सरकारवर नाराज असलेल्या न्यायाधीशानी अर्जात न दिलेल्या कारणाचा आधार घेत याचिकेच्या बाजूने मत नोंदविले. दोन्ही न्यायाधीशांनी अर्जात दिलेल्या कारणाचा घटनात्मक विचार करून मत नोंदविले कि आपापले दृष्टीकोन मांडलेत असा प्रश्न पडावा असा हा निकाल होता. याकुबच्या खटल्याच्या निमित्ताने न्यायालयाचा जो गोंधळ देशासमोर आला त्याचे मूळ कारण शोधले तर ते घटनेने त्यांना दिलेल्या विशेषाधिकारात सापडेल. राज्यघटना आणि प्रस्थापित कायदा याच्या चौकटीतच निर्णय दिला पाहिजे याचे बंधन त्यांचेवर नाही . स्वविवेक वापरण्याची मुभाच न्यायालयीन निर्णया बाबत अनेक प्रश्न निर्माण करीत आहेत. 


ज्या दिवशी याकुबच्या फाशीवर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले त्याच दिवशी दुसऱ्या एका आतंकवादी घटनेतील आरोपीच्या  - ज्यात तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधीसह अनेक निरपराध नागरिक मारले गेले होते - फाशी ऐवजी जन्मठेप देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. गुजरात मधील अशाच गुन्ह्यासाठी तत्कालीन मोदी मंत्रिमंडळातील माया कोडनानी , बाबू बजरंगी यांना देखील फाशीची शिक्षा देण्या ऐवजी जन्मठेप सुनावण्यात आली आहे. हे असे घडू शकते ते न्यायाधीशांना असलेल्या विशेषाधिकारामुळे. आजवर राष्ट्रपती , पंतप्रधान , मंत्री यांच्या विशेषाधिकाराचा मुद्दा अनेकदा चर्चिला गेला आहे आणि त्यावर आक्षेप घेवून त्यांचे विशेषाधिकार रद्द करण्याची मागणी सतत होत आली आहे. या मागणीत गैर काहीच नाहीत. एखाद्या आरोपीला फाशी द्यायची कि नाही हे ठरविण्याचा विशेषाधिकार जसा राष्ट्रपतीला आणि पर्यायाने मंत्रिमंडळाला आहे तसाच तो शिक्षा सुनावणाऱ्या न्यायाधीशांना देखील आहे हे कोणी ध्यानात घेत नाहीत. विशेषाधिकार समाप्त करण्याची मागणी करीत असताना न्यायाधीशांचे विशेधिकार देखील रद्द व्हावेत हे स्पष्ट बोलण्याची गरज आहे. असा विशेषाधिकार नसता तर याकुबला एक शिक्षा , माया कोदनानी , बाबू बजरंगी आणि  राजीव गांधीचे मारेकरी यांना दुसरी शिक्षा असे घडले नसते. १९८४ साली इंदिरा गांधी हत्ये नंतर शिखांचा संहार झाला. त्यातील एकाही आरोपीला फाशी झाली नाही. मुंबई दंगलीचे आरोपी मोकळेच आहेत. अशा सगळ्या आरोपींना शिक्षा झाली असती तर  मुसलमान आहे म्हणून फाशी असे बोलायला जागाच उरली नसती. संवेदनशील प्रश्नावर जनतेने सुद्धा चिथावणीखोरांच्या चिथावणीला बळी न पडण्याची विशेष गरज आहे. इंदिरा गांधींच्या शीख मारेकऱ्याला फाशी होवू नये या गोष्टीला शीख समाजात मोठे समर्थन होते. आणि अशा समर्थनात पुढे असलेला अकाली दल केंद्र सरकारात सामील आहे. राजीव गांधीचे मारेकरी तामिळ भाषिक असल्याने त्यांना फाशी होवू नये असा तामिळनाडू विधानसभेने ठराव केला. गांधीजींना मारणाऱ्या गोडसेचा उदो उदो सुरूच आहे ना. या गोष्टींचा आम्हाला राग  येत नसेल तर मग याकुबच्या फाशीला विरोध करणाऱ्यांचाच आम्हाला एवढा का संताप येतो याचा विचार केला पाहिजे. धार्मिक धृविकरणाच्या प्रयत्नाला बळी पडून धर्मनिरपेक्षतेच्या वस्त्रहरणात आम्ही महाभारतातील पांडवाची द्रौपदीच्या वस्त्रहरणातील भूमिका तर निभावत नाही ना याची विचार करण्याची वेळ आली आहे. याकुब प्रकरणाने आमच्या सामाजिक , राजकीय आणि न्यायव्यवस्थेतील त्रुटीवर झगझगीत प्रकाश टाकला आहे. या प्रकरणाचा उपयोग धार्मिक ध्रुवीकरण वाढविण्यासाठी करण्या ऐवजी व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्यासाठी केला तर पुन्हा अशा अप्रिय चर्चेने देशातील वातावरण गढूळ होणार नाही.


---------------------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव , पांढरकवडा , जि. यवतमाळ 

मोबाईल - ९४२२१६८१५८
---------------------------------------------------------------------------------------------
 

Thursday, July 30, 2015

विज्ञानाची पिछेहाट

पंडीत जवाहरलाल नेहरू नंतर या देशात विज्ञान रुजविण्याचा , त्याचा प्रसार करण्याचा आणि विद्यार्थ्यांना - तरुणांना विज्ञानाकडे आकर्षित करण्याचा भगीरथ प्रयत्न कोणी केला असेल तर तो डॉ.कलाम यांनी केला . देशातील आजची विज्ञान क्षेत्राची दुरावस्था बघता कलाम यांची हीच ओळख समाजापुढे आली पाहिजे.
------------------------------------------------------------------------

विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या बळावर २०२० साला पर्यंत भारताला बलशाली बनविण्याचे स्वप्न पाहणारे थोर शास्त्रज्ञ माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या निधनाच्या निमित्ताने देशातील विज्ञानाच्या अवस्थेवर झगझगीत प्रकाश पडला आहे. महाराष्ट्रातील वाचकांनी एकाच वेळी शेजारी शेजारी छापल्या गेलेल्या दोन बातम्या वाचल्या असतील. एकीकडे डॉ.कलामांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानाची केलेली सेवा , केलेला प्रसार याचे वर्णन करणारी बातमी आणि दुसरीकडे पावसासाठी मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलाकडे घातलेले साकडे याची ठळक बातमी होती. या दुसऱ्या बातमीने पावसाविनाच कलामांचे विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील काम धुवून काढले ! कलाम यांच्या मृत्युनंतर त्यांना मनापासून श्रद्धांजली , आदरांजली वाहण्याची लहानापासून थोरापर्यंत अहमिका लागली होती. एक मिसाईल सोडले तर वैज्ञानिक म्हणून त्यांनी केलेल्या कामाचा , विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान रुजविण्याच्या त्यांच्या कामापेक्षा दुसऱ्याच बाबींना अवास्तव महत्व श्रद्धांजली अर्पण करताना देण्यात आल्याचे दिसून येते. वैज्ञानिक म्हणून सोडा एक उमदा हाडामासाचा माणूस म्हणूनही त्यांचा पुरेसा गौरव झाला नाही. आषाढी एकादशीला निधन झाले म्हणून त्यांना पुण्यात्मा म्हणून गौरविणारे कमी नव्हते . काहीना ते सच्चे मुसलमान वाटले ! काहीना ते जनतेचे राष्ट्रपती वाटले. आता त्यांना सच्चे मुसलमान म्हणत असताना कच्चे मुसलमानही आहेत हे दाखविण्याचा कुत्सितपणा सोडला तर त्यांचा असा गौरव चुकीचा आहे असे नाही. पण त्यांच्या व्यक्तिमत्वातील या गौण बाबी आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्वाची ही खरी ओळख नाही. ती त्यांची व्यक्तिगत वागण्याची पद्धत होती आणि त्यामुळे समाजात काही बदल झाला नाही. 


त्यांनी आपल्या जीवनात कधी धर्मवाद जोपासला नाही किंवा लोकांना धर्मवादी बनण्यासाठी कधी प्रोत्साहित केले नाही. त्यामुळे ते कोणत्या धर्माचे आहेत हे इंगित करण्याचे कोणतेच प्रयोजन नव्हते. देशातील राष्ट्रपतीचे सर्वोच्च पद आणि जनता यांच्यातील असलेले अंतर त्यांनी कमी केले आणि त्यामुळे कोणत्याही राष्ट्रपती पेक्षा ते लोकप्रिय ठरले हे खरे असले तरी त्या पदावर राहून त्यांना कोणतेही बदल करता आले नाहीत हे लक्षात घेता राष्ट्रपती म्हणून त्यांच्या कामगिरीला गौरविणे निरर्थक ठरते. यामुळे त्यांनी राष्ट्राला दिलेल्या खऱ्या योगदानाकडे दुर्लक्ष होते ते टाळले पाहिजे. जनतेच्या राष्ट्रपती पेक्षा जनतेचा , जनतेत मिसळलेला वैज्ञानिक हीच त्यांची समर्पक आणि समाजावर परिणाम करणारी ओळख आहे. पंडित जवाहरलाल नेहरू नंतर या देशात विज्ञान रुजविण्याचा , त्याचा प्रसार करण्याचा आणि विद्यार्थ्यांना - तरुणांना विज्ञानाकडे आकर्षित करण्याचा भगीरथ प्रयत्न कोणी केला असेल तर तो डॉ.कलाम यांनी केला . त्यांनी प्रत्यक्ष विज्ञान क्षेत्रात जे योगदान दिले , कर्तबगारी दाखविली त्यापेक्षाही त्यांचे विज्ञान प्रसाराचे कार्य मोठे आहे. समाजाने विज्ञानाची कास धरली तर भारत २०२० सालापर्यंत महासत्ता बनेल हे स्वप्न बिम्बविण्याचे कार्य अद्वितीय होते. देशातील आजची विज्ञान क्षेत्राची दुरावस्था बघता कलाम यांची हीच ओळख समाजापुढे येणे गरजेचे आहे. 


हे किती गरजेचे आहे याची प्रचीती विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत दिग्गजांची एवढ्यातील विधाने लक्षात आणून देतात. गेल्या ६० वर्षात भारतात एकही मुलभूत संशोधन झाले नाही किंवा जग बदलणारा एकही शोध भारतात लागलेला नाही हे माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज नारायण मूर्ती यांनी लक्षात आणून दिले. १६ व्या - १७ व्या शतकानंतर जग झपाट्याने बदलले ते विज्ञान क्षेत्रात लागलेल्या शोधानी आणि त्यातून निर्माण झालेल्या तंत्रज्ञानांनी. ज्यांनी ज्यानी विज्ञान आणि तंत्रज्ञानाची कास धरली ती राष्ट्रे प्रगतीच्या शिखराकडे वाटचाल करू लागली हे लक्षात घेतले तर विज्ञानातील मुलभूत संशोधनाचे आणि शोधांचे महत्व लक्षात येते. म्हणूनच नारायण मूर्ती यांचा इशारा झोप उडवून देणारा आहे. गेल्या अनेक वर्षात आमच्याकडे मुलभूत संशोधन का झाले नसावे याचे उत्तर दुसरे एक शास्त्रज्ञ भारतरत्न सी एन आर राव यांनी आय आय टी , आय आय एम यासारख्या संस्थातील विद्यार्थ्यांसमोर केलेल्या काही भाषणातून मिळते. त्यांच्यामते आमच्याकडे शाळा-महाविद्यालयातून जे विज्ञान शिकविले जाते ते कालबाह्य आहे. आज आधुनिक प्रयोगशाळेत संशोधनाचे जे काम चालते त्यात या विज्ञानाचा काही उपयोग नाही. कालबाह्य विज्ञान आणि विज्ञान शिकविण्याची निरस, रटाळ पद्धती यामुळे बहुसंख्य विद्यार्थ्यात विद्नानाबद्दल अप्रिती निर्माण होत आहे. 

आज आम्ही विद्यार्थ्यांना जे शिक्षण देतो आहोत ते कालबाह्य झालेले आहे असा शास्त्रज्ञ इशारा देत असतानाच दुसरीकडे राज्यकर्ते प्राचीन काळातील विज्ञानाकडे बोट दाखवून आम्हाला आणखी मागे नेण्याच्या तयारीला लागले आहेत. खुद्द पंतप्रधानांनी गणेशाकडे बोट दाखवून प्राचीनकाळी माणसाच्या शरीरावर हत्तीचे मुंडके बसविण्याची यशस्वी शस्त्रक्रिया झाल्याचे सांगून प्राचीनकाळच्या प्रगत तंत्रज्ञानाचे गोडवे गात भारद्वाजांचे काल्पनिक विमान उडविले होते ! यावर मुलभूत संशोधनात कार्यरथ टाटा विज्ञान संस्थेचे एक शास्त्रज्ञ मयंक वाहिया यांनी असे दावे गंभीर संशोधनाची खिल्ली उडविणारे असल्याचे सांगून बुद्धीप्रामाण्यवादांची पीछेहाट होणे विज्ञान विकासाला घातक असल्याचे प्रतिपादन केले आहे. विज्ञान आणि दंतकथा किंवा पुराणकथा यात फरक करण्याचा विवेक दाखविण्याची गरज त्यांनी बोलून दाखविली . हा विवेक दाखविला नाही तर गतकाळात रममाण होवून आम्ही आमचे भविष्य अंध:कारमय करण्याच्या वळणावर आज देश उभा आहे. कलामांच्या अंत्यसंस्काराची तयारी चालू असतानाच संसदेत एका बिलाच्या संदर्भात जी चर्चा झाली ती बघता आम्ही विज्ञानाच्याही अंत्यसंस्काराची तर तयारी करीत नाही ना असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. 

'स्कूल ऑफ प्लानिंग एंड आर्किटेक्चर' संबंधी बिलावर गेल्या आठवड्यात लोकसभेत चर्चा झाली. या चर्चेत शिक्षणात विज्ञानाची जागा धर्म घेवू लागल्याबद्दल काही सदस्यांनी गंभीर चिंता व्यक्त केली. एवढ्यात अशा गंभीर विषयावर गंभीरपणे संसदेत चर्चाच होत नाही ती या बिलाच्या निमित्ताने झाली. आजवर देशाचा मानबिंदू राहिलेल्या आय आय टी, आय आय एम किंवा विज्ञान संस्थेत बाबा-महाराजांचे येणेजाणे वाढल्यावर चिंता देखील व्यक्त झाली. अशा संस्थांचा दर्जा वाढविण्याचा प्रयत्न करण्या ऐवजी शाकाहार सक्तीचा करणे असे आचरट प्रयत्न सरकारने सुरु केल्याबद्दल चिंताही व्यक्त झाली. पण सत्ताधाऱ्यांचा प्रतिसाद विज्ञानाचा पराभव करणारा होता. या चर्चेत सत्ताधारी पक्षातर्फे बोलताना हरिद्वारचे खासदार निशंक यांनी आपल्या देशात फलजोतिष शास्त्र जेवढे विकसित झाले आहे त्याच्या तुलनेत जगात विकसित झालेले विज्ञान अगदीच खुजे असल्याचे प्रतिपादन केले. फलज्योतिषशास्त्र विज्ञाना पेक्षा श्रेष्ठ असल्याच्या दाव्यावर सत्ताधारी पक्षाच्या वतीने बडविण्यात आलेली  बाके विज्ञानाची मृत्युघंटा तर नाही ना याचा गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे. आमची वाटचाल कलामांनी सांगितलेल्या २०२० सालाकडे होणार की इसवीसना पूर्वीच्या शतकाकडे आणि सहस्त्रकाकडे आमची वाटचाल होणार आहे असा प्रश्न आजच्या परिस्थितीत पडल्या शिवाय राहात नाही.

-----------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव , पांढरकवडा , जि. यवतमाळ
मोबाईल - ९४२२१६८१५८
-------------------------------------------------------------------------- 

Thursday, July 23, 2015

शेतकऱ्यांना गारद करणारे प्रभावी भाषण !

विधानसभेत विरोधीपक्ष सत्तेत असताना त्यांनी केलेल्या कारभारावर मुख्यमंत्र्यांनी हल्ला करून विरोधीपक्षाला गारद केले असे भासविले जात असले तरी प्रत्यक्षात मुख्यमंत्र्यांनी प्रादेशिक वाद चेतवून आणि लहान-मोठा शेतकरी असा भेदभाव करून शेतकऱ्यांचे ऐक्य होणार नाही याची खबरदारी घेतली आहे. शेतकरी लढायला उठण्या आधीच त्याला गारद केले आहे.
------------------------------------------------------------------------------------------------


वक्तृत्व ही एक कला आहे असे का म्हणतात हे ज्यांना आमच्या पंतप्रधानांची  भुरळ पाडणारी भाषणे ऐकूनही समजले नसेल त्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केलेले भाषण ऐकावे. मुख्यमंत्र्यांनी भाषणात काय सांगितले या पेक्षा भाषण किती आणि कसे प्रभावी होते यावरच चर्चा झडायला लागाव्यात हे उत्तम वक्तृत्वाचे पहिले लक्षण आहे असे डोळे झाकून समजावे ! मूळ प्रश्नापासून भलतीकडेच भरकटत न्यायचे आणि तरीही टाळ्या मिळवायच्या ही कलाच अद्भुत आहे हे कोणीही मान्य करील. प्रश्न समजलेलाच नसताना अभ्यासपूर्ण मांडणीचा आभास निर्माण करणे ही सुद्धा एक कलाच आहे हे कोण अमान्य करेल ! या सगळ्या गोष्टी एकाच भाषणात दाखवून देवून आपले 'देवेंद्र' हे नाव किती सार्थक आहे हे त्यांनी प्रमाणित केले. तसे ते भाषणात काही चुकीचे बोलले असे नाही आणि बरोबर बोलले असेही नाही ! विरोधी पक्षात असताना सरकारवर ते जसे तुटून पडायचे तसेच ते आता सरकारात असल्याने विरोधी पक्षावर तुटून पडले. सरकार पक्ष आणि सध्याचा विरोधी पक्ष यांच्या भूमिका बदलल्यामुळे त्यांच्या तोंडचे शब्दही बदलले. विरोधी पक्षात असताना देवेन्द्रजी शेतकऱ्यांना कर्जमाफीची कशी आवश्यकता आहे हे जितक्या समर्थपणे मांडायचे तितक्याच समर्थपणे त्यांनी कर्जमाफीने काहीच कसा फरक पडत नाही ही सरकारची भूमिका मांडली आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गंभीर चर्चा झाली असे म्हणता येणे कठीण आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेत शेतकरी प्रश्नावरील वादविवाद स्पर्धा रंगली असे मात्र नक्कीच म्हणता येईल. या वादविवाद स्पर्धेत देवेंद्र फडणवीसांनी बाजी मारली असा दावा करून काहीजण फडणवीसांना डोक्यावर घेत आहेत ,  तर सरकारची कशी पोलखोल केली असे म्हणत काहीजण विरोधीपक्षाची तळी उचलत आहेत. विधानसभेत झालेल्या वादविवाद स्पर्धेत विषयाच्या ज्या बाजूने बोलायची अपरिहार्यता होती ती भूमिका प्रत्येकानेच चांगली बजावल्याने आपणच जिंकलो असे म्हणायची सोय आहे. या वादविवादात सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्या पैकी कोणी हरले नाहीत , कोणी हरला असेल तर ज्याच्या प्रश्नावर ही मंडळी वाद घालत बसली तो शेतकरी हरला आहे . 

विधानसभेतील शेती प्रश्नावर मुख्यमंत्र्याच्या भाषणासहित सारी चर्चा ऐकल्यावर महाराष्ट्राचे महसूल आणि कृषिमंत्री एकनाथ खडसे काही दिवसापूर्वी प्रांजळपणे जे बोललेत त्याची आठवण झाल्याशिवाय राहात नाही. खडसे म्हणाले होते की शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात हे कळत नाही. तुमच्याकडे काही उपाय असतील तर सुचवा ! त्यांच्या या विधानावर बरीच टीका झाली असली तरी खडसे बोलले ते खरेच होते. राज्यकर्त्यांना आणि धोरणकर्त्यांना शेतीचे दुखणे एक तर कळतच नाही , कळले तर वळत नाही किंवा कळत असेल तर शेतकरी आहे तसा राहण्यातच आपले हित आहे असे समजून चुकीचे औषधोपचार करण्या वरच त्यांचा भर असतो असे म्हणणे क्रमप्राप्त आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेत किंवा जिथे कुठेही शेती प्रश्नावर चर्चा होते तिथे शेतकऱ्याच्या कर्जावर फार चिंता व्यक्त होते. या कर्जाच्या बाबतीत कर्जमाफी, व्याज माफी , सुलभ हप्ते इत्यादी इत्यादी मार्गही सुचविले जातात आणि त्यापैकी काही मार्ग अवलंबिल्याही जातात. त्याने परिस्थितीत काडीचाही फरक पडत नाही. पुन्हा तीच चर्चा . आलटून पालटून पुन्हा तीच उपाययोजना या चक्रात आणि चक्रव्युहात आम्ही अडकलो आहोत. इतकी वर्षे शेतकरी कर्ज घेवून शेती करतो पण कर्जफेडीचा आनंद त्याला कधीच का साजरा करता येत नाही याचा मुळातून विचार करायला कोणी तयार नाही. शेती प्रश्नावर अधिकार वाणीने बोलणाऱ्या शहाण्या विचारवंत नि कार्यकर्त्यांची आमच्याकडे कमतरता नाही. शेतकऱ्याला कर्ज का फेडता येत नाही याचा विचार करण्या ऐवजी कर्ज घेवून शेतीच करू नये असे हे शहाणे सांगत असतात. घरचे बियाणे, घरचे खत आणि घरचे श्रम शेतीत घाला मग तुम्हाला आणि शेतीला मरण नाही असा उपदेश ही शहाणी , शिकली सावरलेली मंडळी करतात. एके काळी नव्हे तर पुरातन काळापासून अशी शेती करूनही सावकारांचे उंबरठे झीझवावे लागत हे या शहाण्यांना कळत नाही असे नाही. आधुनिकीकरणाच्या विरोधाची यांची खाज शेतकऱ्यांनी कणाकणाने मरण पत्करून पूर्ण करावी अशी ही चाल आहे. दुसरीकडे आधुनिकीकरणाचे फायदे सांगणारी आणि घेणारी मंडळी शेतकऱ्यांनी शेतीत राबावे यासाठी सरकारने शेतकऱ्याला सोयी सवलती पुरवाव्यात यासाठी दबाव आणत असतात. आधुनिकीकरणाचे समर्थक आणि विरोधक या दोन्हींचा शेतकरी कळवळा खरा मानला तरी या दोन्ही गटाकडून सुचविण्यात येणाऱ्या उपाययोजनांनी शेतकऱ्यांची दैना वाढतच जाते हे सत्य आहे. शेतीसाठी कर्ज दिले तरी शेतकरी मरतो. कर्ज माफ केले तरी मरतो आणि कर्ज मिळाले नाही तर मरणाला पर्याय नसतो. असे का होते यावर आम्ही विचार करत नाही तोपर्यंत शेतीक्षेत्र दरिद्री होत जाणार हे नक्की.


आजच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी ही विरोधी पक्षांची भूमिका चुकीची नव्हती. पिकलेच नाही तर कर्ज कुठून फेडायचे किंवा पिकले ते मातीमोल भावाने विकले गेले असेल तर कर्ज कुठून फेडायचे हा मुद्दा बरोबर आहे. त्याचवेळी कर्जमाफ करून काही फायदा होत नाही , परिस्थिती जैसे थी राहते हे मुख्यमंत्र्याचे म्हणणेही तितकेच तर्कशुद्ध आहे. मुद्दा असा आहे की शेतकऱ्यांची ही मागणीच नसतांना तुम्ही विधानसभेत या मुद्द्यावर कशासाठी डोकेफोड करीत आहात ? शेतकऱ्यांच्या बाजूने बोलून कोणी कोणाचे डोके जास्त फोडले याचे प्रदर्शन करण्यासाठी ? शेतकऱ्यांच्या कर्जाची फुकाची चिंता सोडा. त्याच्याकडे परतफेड करण्यासाठी पैसे असतील तर तो देईल आणि नसतील तर रुमणे हातात घेवून परतफेड मागणाराला पिटाळून लावील . फक्त आजच्या परिस्थितीत त्याने शेती कशी करावी एवढेच त्याला सांगा. मुख्यमंत्र्यांनी सहृदयतेने 'राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला' ही म्हण सार्थ ठरविणारी दिलेली प्रती एकरी ४००-४५० रुपयाची खैरात घेवून त्याने शेतीचे गणित कसे जुळवावे याचे फक्त मार्गदर्शन करा.  कर्जमाफी द्या किंवा देवू नका , पण घेतलेल्या कर्जाची परतफेड झाली नसतांना बँकांनी तरी त्याला कर्ज कसे आणि का द्यायचे हे तरी सांगा. विधानसभेत जे झाले ते कर्ज प्रश्नावर नुसते राजकारण झाले. आर्थिक प्रश्नावरच्या आर्थिक भूमिकेचा त्यात लवलेशही नव्हता. विधानसभेत विरोधीपक्ष सत्तेत असताना त्यांनी केलेल्या कारभारावर मुख्यमंत्र्यांनी हल्ला करून विरोधीपक्षाला गारद केले असे भासविले जात असले तरी प्रत्यक्षात मुख्यमंत्र्यांनी प्रादेशिक वाद चेतवून आणि लहान-मोठा शेतकरी असा भेदभाव करून शेतकऱ्यांचे ऐक्य होणार नाही याची खबरदारी घेतली आहे. शेतकरी लढायला उठण्या आधीच त्याला गारद केले आहे. कर्जमाफीचा फायदा तुलनेने गरीब असलेल्या मराठवाडा आणि विदर्भ या प्रदेशांना मिळण्या ऐवजी बरी स्थिती असलेल्या प.महाराष्ट्राला मिळाला हे त्यांनी आकडेवारी तोंडावर फेकून सांगितले. प.महाराष्ट्राची सुबत्ता कर्जाधारित आहे यात शंकाच नाही. विदर्भाच्या तुलनेत प्रति कुटुंब शेती कमी असताना त्यांना जास्त कर्ज मिळाले हे तिथल्या राजकीय नेतृत्वा मुळे साध्य झाले असेल तर तुमच्या भागात तसे न होणे हा तुमचा दोष नाही का ? प.महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या उपक्रमशीलतेने शेती आधारित निर्यात होत असेल किंवा शेती आधारित कारखानदारी निर्माण होवून बँकेच्या निकषाप्रमाणे अधिक कर्ज मिळाले असेल तर ती त्या भागाची उपलब्धी की दोष मानायचा ? तिथल्या शेतकऱ्यांना राजकीय नेतृत्व साथ देत असेल तर त्याला चुकीचे ठरविण्याचा मुख्यमंत्र्याचा आटापिटा हे मागासभागातील राजकीय नेतृत्वाची कमतरता आणि मर्यादा झाकण्याचा प्रयत्न मानावा लागेल. एका विभागाला दुसऱ्या विभागाच्या विरुद्ध उभे करून शेती प्रश्नावरून नव्याने डोकेफोड सुरु होईल अशी बीजे मुख्यमंत्र्याच्या भाषणाने पेरली आहेत. ही बीजे अंकुरली तर शेतीप्रश्न सुटणे तर दूरच राहील, उलट १९८० च्या दशकातील शेतकरी आंदोलन सुरु होण्यापूर्वी शेती आणि शेतकऱ्यांची जी परिस्थिती होती त्या कालखंडात आपण परत जावू . शेतकरी विरुद्ध शेतमजूर , लहान विरुद्ध मोठा शेतकरी , गरीब विरुद्ध श्रीमंत शेतकरी असे आम्ही आपसात लढत राहू. राज्यकर्ते कोणत्याही पक्षाचे असू द्या शेतकऱ्यांना आपसात लढवूनच सत्तेचा उपभोग कोडगेपणाने घेता येतो हे फडणविसांच्या भाषणाने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. शेतकऱ्याला अन्नसुरक्षा पुरविण्याची घोषणा करून मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्याच्या जखमेवर मीठच चोळले नाही तर शेती प्रश्नाविषयी आपले अज्ञानही प्रकट केले आहे. मुख्यमंत्र्यांचे भाषण ऐकून त्यांना राजकारण उत्तम कळते आणि करता येते याची पावती द्यावीच लागेल. मात्र त्यांना शेतीचे दुखणे कळलेलेच नाही असे म्हणणे भाग पडते. 



---------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव , पांढरकवडा , जि. यवतमाळ
मोबाईल - ९४२२१६८१५८ 
-----------------------------------------------------------------------------

Thursday, July 16, 2015

सरकारी जावई बनण्याच्या लालसेतून 'व्यापमं' घोटाळा !

सरकारी नोकरीतील शाश्वती, सोयी , सुविधाची चकाकी कायम राहील तो पर्यंत सरकारी नोकरीचे आकर्षण कमी होणार नाही.  एक व्यापमं घोटाळा खणून काढत असताना दुसरे अनेक घोटाळे जन्माला घालणारी ही परिस्थिती आहे. मध्यप्रदेशातील धांदली आज उघड झाली. पण आपल्याकडे त्यापेक्षा काही वेगळे चित्र नाही.
---------------------------------------------------------------------


मध्यप्रदेशातील व्यावसायिक परीक्षा मंडळाचा (व्यापमं) घोटाळा जगभर कुख्यात झाला आहे. या घोटाळ्याची व्यापकता आणि  घोटाळ्याशी संबंधित व्यक्तींचा एका पाठोपाठ एक असा होत असलेला रहस्यमय मृत्यू घोटाळा लपविण्याठीच होत असल्याचा संशय यामुळे या घोटाळ्याची सर्वत्र चर्चा होत आहे. आजवर म.प्र.उच्चन्यायालयाच्या देखरेखी खाली झालेल्या तपासात १८०० च्या वर लोकांना अटक होवूनही घोटाळ्याच्या मुळाशी जाता आले नाही. हा तपास चालू असतानाच संबंधित लोक 'नैसर्गिक' मृत्यूने मरत होते. घोटाळ्याची माहिती काढण्यासाठी गेलेल्या पत्रकाराच्या आणि घोटाळ्याशी नाव जोडल्या गेलेल्या मध्यप्रदेशाच्या राज्यपालाच्या मुलाच्या संशयास्पद मृत्यूने प्रकरणाचे गांभीर्य वाढविले. मृत्युसंख्या पन्नासी पर्यंत पोचल्याने सी बी आय चौकशीच्या मागणीने जोर पकडला. सर्वोच्च न्यायालयाने सी बी आय तपासाचा आदेश दिल्याने तापलेले प्रकरण काहीसे निवळले. ४० हजार अपात्र व्यक्तींची नियुक्ती या परीक्षा मंडळाद्वारे झाल्याचा संशय आहे. यात पोलीसा पासून डॉक्टर पर्यंत आणि पवित्र समजल्या जाणाऱ्या शिक्षण क्षेत्रातील नियुक्त्यांचा समावेश आहे. सरकारी नोकरी मिळविण्यासाठी कितीही पैसे मोजायची मानसिकता आपल्याकडे असल्याने गेल्या १० वर्षात त्या राज्यात झालेल्या सरकारी नोकर भरतीत किती आर्थिक उलाढाल झाली असेल याचा अंदाज करणे देखील कठीण झाले आहे. या घोटाळ्याच्या चौकशी पथकात घोटाळ्याचे लाभार्थी नसतीलच याची खात्री न देण्या इतकी वाईट परिस्थिती असल्याने सी बी आय चौकशीची गरज होतीच. सर्वपक्षीय प्रभावी राजकीय नेत्यांच्या शिफारसीच्या आधारे यातील अनेकांना नोकऱ्या मिळाल्या आहेत आणि हे प्रभावी नेते केंद्रात आणि राज्यात सत्तेत आहेत किंवा विरोधी पक्षात आहेत हे लक्षात घेता सी बी आयच्या तपासाची गती आणि प्रगती काय राहील याचा अंदाज बांधता येईल. हा घोटाळा जितक्या वर्षापासून सुरु आहे तितकी वर्षे या तपासाला लागू शकतात आणि कालांतराने विसरल्या गेलेल्या या घोटाळ्यात व्यापमंच्या काही अधिकारी आणि पदाधिकारी यांना शिक्षा होवून प्रकरण निकाली निघालेले असेल. पण म्हणून लोक सरकारी नोकरी मिळविण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याचे थांबणार नाहीत आणि यासाठी होणारी आर्थिक उलाढाल वाढतीच राहील. कारण यावर काय आणि कशी उपाययोजना करायची याचा कोणीच विचार करायला तयार नाही. जो पर्यंत लोक सरकारी नोकरीसाठी कितीही आणि कोणतीही किंमत मोजण्यास तयार आहेत तो पर्यंत कोणी कितीही चौकशा करा , कितीही लोकांना शिक्षा होवू द्या या ना त्या रुपात व्यापमं सारखे घोटाळे होतच राहतील हे लक्षात घेवून या विषयाची चर्चा व्हायला हवी होती तशी ती होताना दिसत नाही.


अशी चर्चा होण्याची आणि त्यावर उपाययोजना शोधण्याची किती गरज आहे हे मध्यप्रदेशातील 'व्यापमं' मार्फतच चतुर्थश्रेणी (चपराशी) कर्मचाऱ्याच्या भरतीसाठी नुकत्याच झालेल्या परीक्षेने दाखवून दिले आहे. एकीकडे व्यापमं घोटाळ्याची जोरदार चर्चा सुरु असताना झालेल्या या परीक्षेत १३३३ जागांसाठी साडेतीन लाखाच्यावर उमेदवारांनी निवड परीक्षा दिली . चपराशी पदासाठी झालेल्या या भरती परीक्षेत अभियांत्रिकीची पदवी घेतलेले १६०० उमेदवार होते आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलेले तर १४००० उमेदवार होते. यांच्यापैकी काहीना जेव्हा विचारण्यात आले कि तुम्ही एवढे उच्चशिक्षित असताना चपराशी पदासाठी का धडपड करीत आहात , यावर सर्वांचे एकच उत्तर होते. चपराशाची नोकरी असली म्हणून काय झाले , सरकारी नोकरी आहे ना ! सरकारी नोकरीला असे काय सोने लागले आहे कि देशातील प्रत्येक तरुण विद्यार्थी त्यामागे वेड्या सारखा धावतो आहे याचा विचार करण्याची गरज आहे. या चपराशी भरती परीक्षेत सहभागी झालेल्या अनेक विद्यार्थ्यांनी आय ए एस च्या परीक्षेच्या तयारी साठी वेळ आणि पैसा खर्च केलेला असणार आहे . सोबत राज्यातील मोठ्या पदासाठीच्या परीक्षेतही वेळ आणि पैसा खर्च करून भविष्य आजमाविलेले असणार आहे. पण ते आपल्या आवाक्यात नाही हे लक्षात आल्यावर चपराशी बनायला देखील ते तयार झालेत यामागचे गुपित सगळ्यांनाच माहित आहे. मात्र तोंड उघडून बोलायला आणि कबुल करायला कोणी तयार नाही. सरकारी नोकरी मिळणे हे सरकारचा जावई बनण्यासारखे आहे. आपल्याकडे घराघरातून जावयाची जशी बडदास्त ठेवल्या जाते त्यापेक्षाही जास्त चांगली बडदास्त सरकार आपल्या आणि निम सरकारी सेवेतील कर्मचाऱ्याची ठेवत असते. घरात जावयाचे जसे कौतुक आणि मान असतो तसा समाजात सरकारी नोकरांबद्दल मान असतो. किंबहुना आपला जावई हा सरकारी नोकरच असला पाहिजे हा समाजाचा आग्रहच नसतो तर अट देखील असते. अशा समाजात सर्व तरुण वर्ग सरकारी नोकरी मागे मेंढ्याच्या कळपासारखा धावला नाही तरच नवल !


सरकारी नोकरीत शाश्वती असते. एकदा चिकटला कि स्वत:च्या आणि कुटुंबाच्याही जीवाला घोर नाही ! तुमची कामगिरी कितीही कच्ची आणि खालावलेली असू द्या तुम्हाला कोणी हात लावू शकत नाही. काम जीवावर आले तर रजा टाकून मोकळे व्हा ! रजेचा अर्ज पाठविण्याची तसदी नाही घेतली तरी चालते. कारण तिथे बसलेले लोक जनतेचा सांभाळ आणि जनतेची कामे करण्यासाठी बसलेले नसतातच मुळी . पगार त्यासाठी घेत असले तरी एकमेकांना सांभाळून घेणे हे त्यांचे पहिले परम कर्तव्य असते. कोणाला न सांगताही महिनोन्महिने गैरहजर राहता येते. जावई कसाही निघाला तरी घराघरातून त्याला जसे सांभाळले जाते तसेच सरकार आपल्या जावयाला सांभाळून घेते. गैरहजर कर्मचाऱ्याला वृत्तपत्रात जाहिरात देवून कामावर हजर राहण्यासाठी विनवणी करते. महागाईची , निवासाची चिंता करायची गरजच नाही. महागाई ५ टक्क्यांनी वाढली तर १० टक्के वाढ घेवून सरकार हजर असते ! नुसत्या महागाई भत्त्यात वाढ होवून काय उपयोग . त्याने फार तर मुलाबाळा सोबत पिझ्झा खाता येईल . मग इतर चैनीचे काय ? त्यासाठीच तर मोठा खर्च करून सरकार वेतन आयोग नेमते . वेतन आयोग म्हणजे काय तर लोकांच्या श्रमातून निर्माण झालेल्या संपत्तीचे सरकारी जावयांचा मानपान बघून वाटप कसे करायचे याचे मार्गदर्शन करणारे मंडळ ! उच्च पदस्थ नोकरशाही बद्दल तर बोलायलाच नको. त्यांच्यापुढे पूर्वीचे राजे भिकारी वाटतील ! सत्ता आणि पैसा या दोन्ही दृष्टीने. त्यामुळेच मुलाला काही समजायच्या आधीच पालकाची त्याला आय ए एस बनविण्याची तयारी सुरु होते ! त्यात अपयश आले तर चपराशी तरी बन हा हट्ट असतो आमचा . सरकारी नोकरीतील शाश्वती, सोयी , सुविधाची चकाकी कायम राहील तो पर्यंत ही परिस्थिती बदलणार नाही. एक व्यापमं घोटाळा खणून काढत असताना दुसरे अनेक घोटाळे जन्माला घालणारी ही परिस्थिती आहे. मध्यप्रदेशातील धांदली आज उघड झाली. पण आपल्याकडे त्यापेक्षा काही वेगळे चित्र नाही.


आपल्याकडचे तर निमसरकारी नोकरीसाठीचे दरपत्रक छापील नसले तरी जगजाहीर आहे आणि ते किती प्रचंड आहे याची सर्वाना कल्पना आहे. शिक्षक किंवा प्राध्यापकाची नोकरी हवी असेल तर त्याचे दर २५ ते ३५ लाख असल्याचे बोलले जाते. एकदा का ७ वा वेतन आयोग लागू झाला कि हेच दर ५० लाखाचा आकडा ओलांडतील अशीही चर्चा आहे. नोकरी मिळविण्यासाठी एका रात्रीतून आम्ही एवढा पैसा उभा करू शकतो , पण या पैशातून स्वत:चा उद्योग-व्यवसाय उभा करता येईल आणि या व्यवसायात दुसऱ्याला कामावर ठेवता येईल हा विचार मात्र आमच्या मनाला कधी शिवत नाही.कारण जोखीम , मेहनत आणि जिद्द हा आमच्या अभ्यासक्रमाचा कधीच विषय राहिलेला नाही. उद्यमशीलते ऐवजी सुरक्षित नोकरीचे बाळकडू प्रत्येक घरातून आणि प्रत्येक शाळा-महाविद्यालयातून आम्हाला पाजले जाते. शिक्षण पदवीसाठी आणि पदवी नोकरीसाठी अशी आमची शिक्षण व्यवस्था आहे. जेथे शिक्षकच पैसे मोजून नोकरीची सुरक्षितता स्विकारतात ते मुलांची जोखीम पत्करण्याची आणि परिश्रम करण्याची मानसिकता निर्माण नाही करू शकत . या उलट शिक्षकालाच जोखीम पत्करायला लावली तर परिस्थिती वेगळी बनू शकते. मुलाला लिहिता वाचता येवो अथवा नाही , त्याला काही समजो अथवा न समजो शिक्षकाच्या पगारात फरक पडणार नसेल तर परिस्थिती बदलणारच नाही. या उलट जितक्या मुलांना जितके येते त्या प्रमाणात मोबदला देण्याची व्यवस्था असती तर ती नोकरी मिळविण्यासाठी कोणीही लाखो रुपये मोजलेच नसते !


 वेतन आयोगाची वेतन वाढ नाकारणारे महाराष्ट्रातील एकमेव शिक्षक हेरंब कुलकर्णी यांनी सरकारने शिक्षणासाठी ज्या पैशाची तरतूद केली आहे तो पैसा विद्यार्थ्यांना कुपन्सच्या स्वरुपात द्यावा आणि कोणत्या शिक्षकाकडे शिकायचे याचा निर्णय विद्यार्थ्याला घेवू द्यावा अशी सूचना केली होती. महाराष्ट्रातील दुसरे समाजसेवक डॉ. अभय बंग यांनी कोणाचाही पगार कुटुंबाच्या किमान गरजा भागविता येईल एवढाच असला पाहिजे अशी सूचना केली होती. त्याने केलेल्या कामाचे परीक्षण करून त्यासाठी अधिकच प्रोत्साहन भत्ता द्यावा ही डॉ.बंग यांची सूचना विचार करण्यासारखी आहे. अनेक देशात अमलात असलेल्या या व्यवस्थेचा आपल्याकडे स्विकार सोडाच विचार करायची देखील तयारी नाही. इथे शिक्षक हे उदाहरण म्हणून घेतले आहे. अशी व्यवस्था प्रत्येक क्षेत्रात करता आली पाहिजे. नोकरीची आणि पगाराची शाश्वती नाही. जेवढे काम तेवढे दाम . सर्व नागरिकांना मिळणाऱ्या सुविधांपेक्षा नोकरदारांना वेगळ्या किंवा जास्तीच्या सुविधा नाही. अशी व्यवस्था केली तरच झुंडीने नोकरीच्या मागे धावणारी तरुणाई आणि नोकरी मिळावी यासाठी वाटेल ते करण्याची तयारी असलेले पालक वेगळा विचार करतील. असे झाले नाही तर एकीकडे 'व्यापमं' घोटाळा खणून काढण्यासाठी चौकशी सुरु राहील आणि दुसरीकडे व्यापमंच्या माध्यमातून चपराशाची नोकरी मिळावी यासाठी इंजिनियर्स आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलेले तरुण हातात लाखो रुपये घेवून उभे असतील. व्यापमं घोटाळ्याची चौकशी आणि कारवाई ही झाडाच्या फांद्या छाटण्या सारखी आहे. फांद्या छाटल्या की काही काळातच झाड फांद्यांनी बहरते . पूर्वीपेक्षा जास्त फांद्या येतात. व्यापमं घोटाळ्याचा वृक्ष उन्मळून पडावा असे वाटत असेल तर फांद्या छाटून उपयोग नाही . त्यासाठी मुळावरच घाव घालावा लागेल . मूळ आहे नोकरीतील शाश्वती. परिश्रमा पेक्षा मोबदला किती तरी अधिक आणि नोकरदारांना मिळणाऱ्या इतर असंख्य सुखसुविधा ! यावरच घाव घालावा लागणार आहे. याची पहिली पायरी म्हणून ७ व्या वेतन आयोगाचा सर्व थरातून विरोध झाला पाहिजे.


---------------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव , पांढरकवडा , जि.यवतमाळ 

मोबाईल - ९४२२१६८१५८
-----------------------------------------------------------------------------------------  

Thursday, July 9, 2015

शेतीचे बळी

अर्थव्यवस्थेने १ लाख कोटी डॉलर्सचा टप्पा गाठणे आणि त्यानंतर लगेचच २ लाख कोटी डॉलर्सचा टप्पा गाठणे यात जागतिकीकरण किंवा उदारीकरण या अंतर्गत राबविण्यात आलेल्या आर्थिक धोरणाचा सिंहाचा वाटा आहे . पण झपाट्याने सुधारलेल्या अर्थव्यवस्थेपासून ग्रामीण भारत पूर्णपणे वंचित राहिला आहे हाच ग्रामीण भागातील आर्थिक, सामाजिक आणि जातीय जनगणनेचा सुस्पष्ट निष्कर्ष आहे.
---------------------------------------------------------------------------------------------


२०१५ साली  भारतीय अर्थव्यवस्थेवर प्रकाशझोत टाकणारे दोन अहवाल प्रसिद्ध झालेत. पहिला अहवाल होता स्वातंत्र्योत्तर काळात पहिल्यांदाच झालेल्या आर्थिक ,सामाजिक आणि जातगणनेचा अहवाल. सध्या प्रकाशित झालेला अहवाल हा ग्रामीण भारतावर प्रकाशझोत टाकणारा आहे. नागरी भागातील परिस्थितीचा अहवाल अजून प्रकाशित व्हायचा आहे.  याच सुमारास भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढी संबंधी जागतिक बँकेने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालाची भारत सरकारने जारी केलेल्या ग्रामीण भागातील आर्थिक गणनेच्या अहवालाशी केली तर उर्वरित भारताचे ढोबळ आर्थिक चित्र आपल्या डोळ्या समोर उभे राहील. जागतिक बँकेच्या अहवालानुसार गेल्या ७ वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दुपटीने झाला आहे. जागतिक बँकेच्या या अहवालानुसार दरडोई राष्ट्रीय उत्पन्नही १ लाखापेक्षा अधिक झाले आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला १ लाख कोटी डॉलर्सचा टप्पा गाठायला ६० वर्षे लागलीत .मात्र नंतरच्या ७ वर्षात भारतीय अर्थव्यवस्था २ लाख कोटी डॉलर्स पेक्षा अधिक मोठी झाली आहे. दुपटीच्या विकासाचे सर्व श्रेय अर्थातच मनमोहनसिंग यांच्या भ्रष्टाचाराच्या नावावर बदनाम करण्यात आलेल्या राजवटीकडे जाते. एक वर्ष वयाचे मोदी सरकार अजूनही आर्थिक आघाडीवर चाचपडत असल्याने या सरकारला अर्थव्यवस्थेच्या विकासाचे अगदी आंशिक श्रेय देणे देखील हास्यास्पद ठरेल. पण मुद्दा दोन सरकारच्या तुलनेचा नाही. मुद्दा दोन अर्थव्यवस्थेच्या तुलनेचा आहे. ग्रामीण आणि नागरी या देशांतर्गत अगदी वेगळ्या असणाऱ्या अर्थव्यवस्थांचा आहे. नव्याने प्रचलित झालेल्या शब्दात सांगायचे तर भारत आणि इंडिया यांच्यातील अर्थव्यवस्थेच्या तुलनेचा आहे. ग्रामीण भागातील आर्थिक जनगणनेचे जे भीषण चित्र भारत सरकारने जारी केलेल्या जनगणना अहवालातून पुढे आले ते सर्वांच्या डोळ्यात अंजन घालणारे आहे. झपाट्याने नागरीकरण होत असल्याचे चित्र दिसत असले तरी अजूनही ६० टक्क्यापेक्षा अधिक जनता ग्रामीण भागातच वास्तव्य करून आहे आणि यातील अवघ्या ५ ते १० टक्के लोकांची स्थिती बरी या सदरात मोडणारी आहे. स्वातंत्र्यानंतर देशाचे चित्र मोठ्या प्रमाणात बदलले असे आपण म्हणतो खरे , पण बदललेले हे चित्र प्रामुख्याने नागरी आणि औद्योगिक पट्ट्यातील आहे. ग्रामीण भागाच्या दैन्यावस्थेत सुधारणा गोगलगायीपेक्षाही कमी गतीने  झाल्याचे आर्थिक गणनेचा अहवाल सांगतो.अर्थव्यवस्थेने १ लाख कोटी डॉलर्सचा टप्पा गाठणे आणि त्यानंतर लगेचच २ लाख कोटी डॉलर्सचा टप्पा गाठणे यात जागतिकीकरण किंवा उदारीकरण या अंतर्गत राबविण्यात आलेल्या आर्थिक धोरणाचा सिंहाचा वाटा आहे . पण झपाट्याने सुधारलेल्या अर्थव्यवस्थेपासून ग्रामीण भारत पूर्णपणे वंचित राहिला आहे हाच ग्रामीण भागातील आर्थिक, सामाजिक आणि जातीय जनगणनेचा सुस्पष्ट निष्कर्ष आहे. 

ग्रामीण भारताचे जे विदारक आर्थिक चित्र आर्थिक गणनेतून पुढे आले आहे ते आकडे लक्षात  घेवून राज्यकर्त्यांना धोरणात्मक निर्णय घेण्यास मदत होणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र हा अहवाल ज्या पद्धतीने लोकांसमोर मांडण्यात येत आहे आणि त्यावर ज्या चर्चा झडत आहेत ते लक्षात घेतले तर अजूनही नितीनिर्धारक आणि पुस्तकी अभ्यासक यांच्या ध्यानात ग्रामीण भागातील दैन्यावस्थेचे कारण आलेले नाही असेच म्हणावे लागेल. कारण या अहवालात दैन्यावस्थेची जी कारणे मोजण्यात आली आहेत त्यातील सर्वात मोठे आणि महत्वाचे कारण भूमिहिनतेचे देण्यात आले आहे. स्वत:ची जमीन नसल्याने ग्रामीण भागातील ५१ टक्के लोकांची उपजीविका मजुरीवर अवलंबून असल्याने त्यांना दारिद्र्यावस्थेत जीवन कंठावे लागत असल्याचा निष्कर्ष या अहवालातून समोर येतो. दलित , आदिवासी आणि इतर समाज अशी फोड करून दारिद्र्याचा मुद्दा अप्रत्यक्षपणे जमिनीच्या मालकी हक्काशी जोडण्याचा प्रयत्न होतो आहे. समाजाची अशी विभागणी करून त्यांच्या आर्थिक परिस्थितीची आर्थिक जनगणनेतील आकडे घेवून तुलना केली तरी शेतजमिनीची मालकी असण्याने किंवा नसण्याने त्यांच्या राहणीमानात आणि दारिद्र्यात विशेष फरक पडलेला नाही. सर्वसाधारणपणे ग्रामीण भारतात राहणाऱ्या सुमारे १८ कोटी कुटुंबांपैकी ३० टक्के कुटुंब भूमिहीन आहेत. यात स्वाभाविकपणे अनुसूचित जातीच्या कुटुंबाकडे परंपरेने शेतीची मालकी नसल्याने त्यांच्यात भूमिहीन असण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. ग्रामीण भारतातील ४५ टक्क्यापेक्षा जास्त दलित कुटुंबे भूमिहीन आहेत. आदिवासी समाजातील कुटुंबे मात्र सर्वसाधारण सरासरी इतके म्हणजे ३० टक्के कुटुंबे भूमिहीन आहेत. तर ज्यांचा शेती हाच पिढीजात व्यवसाय होता अशा इतर समाजातील २६ टक्के लोक भूमिहीन आहेत. ज्या अर्थी ५१ टक्क्यापेक्षा अधिक कुटुंबे मजुरीवर जगतात त्याअर्थी त्या कुटुंबात सर्वच जाती धर्माच्या कुटुंबाचा समावेश होतो. शेती तोट्याची असल्याने या सर्वाना शेतीवर रोजगार मिळणे आणि पुरेशी रोजंदारी मिळणे अशक्यप्राय असल्याने यांची परिस्थिती तुलनेने खालावलेली दिसते. यांच्या तुलनेत शेतकरी समाजातील स्थिती किंचित बरी दिसत असेल तर त्याचे कारण त्यांना मिळू शकणारे कर्ज आहे ! मजुरी करणाऱ्या कुटुंबात आत्महत्या क्वचितच होतात , पण शेती करणाऱ्या कुटुंबातील आत्महत्या हा चिंतेचा विषय ठरला आहे. त्यामुळे ग्रामीण भारतातील दुरावस्थेचे कारण शेतीची मालकी कोणाकडे आहे हे नसून शेती हेच सर्व ग्रामीण भागातील कुटुंबाच्या दारिद्र्याचे आणि दैन्याचे मूळ कारण आहे. 

या अहवालानुसार ग्रामीण भागात दिसणाऱ्या हिरवळीची बेटे म्हणजे फक्त १० टक्के कुटुंबात येणारे पगारी उत्पन्न. ४ टक्क्यापेक्षा थोडे अधिक कर दाते आहेत ते बहुतांशी पगारधारक असणार हे उघड आहे. ग्रामीण भागातील २० ते २५ टक्के कुटुंबाकडे वाहने असणे, पक्के घरे असणे किंवा १०-१२ टक्क्याकडे रेफ्रीजीरेटर असणाऱ्यात १० टक्के पगारधारी कुटुंबाचा समावेश असणार हे उघड आहे. उर्वरित ८-१० टक्क्याकडे अशी साधने असण्यामागे त्यांच्या जमिनीच्या केलेल्या अधिग्रहणातून आलेला पैसा असू शकतो. ग्रामीण भागातील २-३ टक्के कुटुंबाकडे आलेल्या मोटारी हे शहरा जवळील जमिनी विकून मिळालेल्या पैशातून येणेच शक्य आहे. याचा अर्थ ग्रामीण भागात जी हिरवळीची बेटे दिसत आहेत ती शेतीबाह्य कारणामुळे निर्माण झाली आहेत . त्याच प्रमाणे या हिरवळीशी जातीपातीचा तिळमात्रही संबंध नाही. या उलट बाकी सर्व ग्रामीण कुटुंबाचे आणि ग्रामीण जनसंख्येचे दारिद्र्य आणि दैना शेतीशी निगडीत आहे हे सिद्ध होते. त्यामुळे शेतीच्या आजच्या अवस्थेत भूमिहीन असणे हे कदापिही गरीबीचे आणि दैन्याचे कारण असू शकत नाही. त्याचमुळे आर्थिक जनगणनेच्या अहवाला वरील चर्चा योग्य दिशेने व्हावी आणि योग्य उपाय योजना व्हावी असे वाटत असेल तर भूमिहीन असणे हा शाप नसून आजच्या परिस्थितीत वरदान आहे हे ठामपणे मांडले जाण्याची गरज आहे. अन्यथा भूमिहीनांना जमीन द्या म्हणजे त्याची गरिबी दूर होईल हे आजवरचे भ्रामक धोरण पुढे रेटण्याचा प्रयत्न होईल. याचा परिणाम वाढत्या ग्रामीण दारिद्र्यात होतो हा बोध आपण इतिहासापासून घेतला आहे अशी आज आर्थिक जनगणनेवर होत असलेली चर्चा पाहून वाटत नाही. म्हणूनच या चर्चेचा सूर बदलण्याचा प्रयत्न करण्याची गरज आहे. अधिक लोकांच्या पायात शेतीच्या बेड्या घालणे हा ग्रामीण दैना दूर करण्याचा उपाय नसून ग्रामीण जनतेच्या पायातील शेतीच्या बेड्या काढून त्यांना मुक्त करण्याची गरज आहे. ते करायचे असेल तर गेल्या ७ वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेत १ लाख कोटी डॉलर्सची जी भर पडली आहे त्यात ग्रामीण भागाला प्रवेश मिळाला पाहिजे. त्यांना त्यांचा न्याय्य वाटा मिळाला पाहिजे. १ लाख कोटी डॉलर्सची वाढलेली अर्थव्यवस्था ज्यांच्या घशात गेली आहे त्यांनी शेतीजन्य पदार्थासाठी मोठी किंमत मोजलीच पाहिजे. मुळात आज अर्थव्यवस्थेची विभागणी जागतिकीकरणाचे लाभ उचलणारा समाज आणि जागतिकीकरणा पासून वंचित समाज अशी होत आहे. संपूर्ण ग्रामीण समाज त्यातील सर्व जातीधर्मासाहित वंचित समूहात मोडतो. याला अपवाद दूरसंचार क्षेत्राचा राहिला आहे. मोबाईलचा प्रसार शहरा इतकाच ग्रामीण भारतात झाला. याचे कारण २ जी स्पेक्ट्रमचा लिलाव न करता केलेले वाटप होते. ज्या कारणासाठी मनमोहन सरकारवर प्रचंड टीका झाली . आरोप झाले आणि त्यामुळे सत्ता गमवावी लागली त्या २ जी स्पेक्ट्रमच्या धोरणामुळेच ग्रामीण भागात संचारक्रांती पोचली . ग्रामीण भारताची क्रयशक्ती लक्षात घेवून आर्थिक धोरणे आखली तर काय होवू शकते हे देशात झालेल्या दूरसंचार क्रांतीने दाखवून दिले आहे. त्यामुळे वाढत्या अर्थव्यवस्थेचे लाभ वंचिताना मिळतील असे धोरण निश्चित व्हावे यासाठी सरकारवर दबाव आणण्यासाठी सज्ज झाले पाहिजे. त्यासाठी आम्ही आजवर शेतीचे बळी ठरलो आहोत पण यापुढे असे बळी ठरणार नाही हे ठणकावून सांगण्याची गरज आहे. 


--------------------------------------------------------------
सुधाकर जाधव , पांढरकवडा , जि. यवतमाळ
मोबाईल- ९४२२१६८१५८
--------------------------------------------------------------