Thursday, February 22, 2024

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - ९३

 २०१० सालच्या आंदोलना नंतर काश्मीर तुलनेने शांत होते. ही शांतता बुरहान वाणीच्या मृत्यूने भंगली. पाकिस्तानने या घटनेचा उपयोग आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा डागळण्यासाठी केला. बुरहान वाणीचा मृतदेह दोन लाख लोकांच्या उपस्थितीत  पाकिस्तानच्या ध्वजात गुंडाळून दफन करण्यात आल्याने  भारतात पिडीपी - बिजेपी युतीच्या सरकार विरोधात जनमत तयार होवू लागले. तरीही या घटनेनंतर भारतीय जनता पार्टी सरकार मधून बाहेर पडली नाही. 
----------------------------------------------------------------------------------------


जम्मू-काश्मीर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या नेत्या महबुबा मुफ्ती या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या राज्याच्या पहिल्या महिला ठरल्या. राज्यातील १९९६ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीपासून त्यांच्या राजकीय जीवनाला प्रारंभ झाला होता. राजीव गांधी काळात व्ही-पी.सिंग यांचे सोबत त्यांचे वडील मुफ्ती मोहम्मद सईद कॉंग्रेस बाहेर पडले होते. नरसिंहराव पंतप्रधान झाल्यानंतर ते कॉंग्रेस मध्ये पुन्हा सामील झाले. त्याच वेळेस महबूबा मुफ्तीही कोंग्रेसमध्ये सामील झाल्या व १९९६ ची विधानसभा निवडणूक लढवून पहिल्यांदा आमदार झाल्या. कॉँग्रेसची नॅशनल कॉन्फरन्स सोबतची युती मान्य नसल्याने १९९९ मध्ये बाप-लेकीने कॉँग्रेसचा त्याग करून जम्मू-काश्मीर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी नावाच्या प्रादेशिक पक्षाची स्थापना केली. या पक्षाच्या पहिल्या अध्यक्षा  म्हणून महबूबा मुफ्ती यांची निवड करण्यात आली होती. या पक्षाच्या स्थापनेनंतर मुफ्ती मोहम्मद सईद यांचे जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न पूर्ण झाले आणि महबूबा मुफ्ती या देखील मुख्यमंत्री बनल्या. भारतीय जनता पक्षा सोबतच्या युती विरुद्ध काश्मीर घाटीतील जनमत जात असताना त्या मुख्यमंत्री बनल्या. जम्मू-काश्मीरच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री हा बहुमान त्यांना मिळाला असला तरी त्यांची मुख्यमंत्री पदाची कारकीर्द त्यांच्यासाठी, जम्मू-काश्मीरसाठी आणि देशासाठी काटेरी ठरली. मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर ३ महिन्यांनी घडलेल्या एका घटनेने संपूर्ण काश्मीरघाटी अशांत बनली.                                                                                         

काश्मीरला भारताच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी  हाती शस्त्र घेतलेल्या बुरहान वाणी या २१ वर्षीय तरुणाचा आणि त्याच्या दोन साथीदारांचा सुरक्षादला सोबत झालेल्या चकमकीत मृत्यू झाल्याच्या घटनेने संपूर्ण घाटीत लोक -विशेषत: तरुण- रस्त्यावर उतरले. बुरहान वाणी याने सोशल मेडियाचा वापर करून मोठी लोकप्रियता मिळविली होती व त्याचा वापर करून तो काश्मीरी तरूणांना भारतीय सुरक्षादला विरुद्ध लढण्यासाठी प्रोत्साहित करीत होता. मोठा भाऊ आणि त्याच्या मित्रांसोबत जात असताना सुरक्षादलांकडून अपमानित झाल्याने तो दहशतवादाकडे वळल्याचे सांगितले जाते. वयाच्या १५ व्या वर्षी बुरहान वाणी  घर सोडून हिजबूल मुजाहदिन या दहशतवादी संघटनेत सामील झाला होता. दरम्यान त्याचा मोठा भाऊ खालिद सुरक्षादलाकडून मारल्या गेल्याने बुरहान वाणी कट्टर भारत विरोधी बनला. त्याला पकडण्यासाठी सुरक्षादलाने १० लाखाचे बक्षीस जाहीर केले होते. चकमकीत ठार झाल्यानंतर ठिकठिकाणी लोकानी सुरक्षादलावर दगडफेक आणि हल्ले केलेत. या घटनेनंतर जवळपास ५० दिवस काश्मीरघाटीत कर्फ्यू लावावा लागला. कर्फ्यूचे उल्लंघन करून लोक रस्त्यावर येत होते आणि सुरक्षादलाशी चकमकी झडत होत्या. या काळात ९०च्यावर प्रदर्शनकारी सुरक्षादलाच्या गोळीबारात मृत्यूमुखी पडले. १५००० च्यावर लोक जखमी झालेत. ४००० सुरक्षाकर्मी देखील जखमी झाले होते. २०१० सालच्या आंदोलना नंतर काश्मीर तुलनेने शांत होते. ही शांतता बुरहान वाणीच्या मृत्यूने भंगली. पाकिस्तानने या घटनेचा उपयोग आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा डागळण्यासाठी केला. बुरहान वाणीचा मृतदेह दोन लाख लोकांच्या उपस्थितीत  पाकिस्तानच्या ध्वजात गुंडाळून दफन करण्यात आल्याने  भारतात पिडीपी - बिजेपी युतीच्या सरकार विरोधात जनमत तयार होवू लागले. तरीही या घटनेनंतर भारतीय जनता पार्टी सरकार मधून बाहेर पडली नाही. 


बुरहान वाणी प्रकरण पूर्णपणे शांत झालेले नसतानाच उरी जवळील सुरक्षादलाच्या कॅम्प वर पाकिस्तानी दहशतवादयानी  भीषण हल्ला केला. पाकव्याप्त काश्मीरमधून नियंत्रण रेषा ओलांडून १८ सप्टेंबर २०१६ च्या  पहाटे चार दहशतवादयानी उरी कॅम्प मध्ये घुसून ग्रेनेड फेकले. यामुळे तंबुना आग लागून १७ सैनिक शहीद झाले.. ३० च्या वर जखमी झालेत. पैकी दोघांचा इस्पितळात उपचार घेताना मृत्यू झाला. 4 तास चाललेल्या गोळीबारात चारही दहशतवादी मारले गेलेत. याची प्रतिक्रिया भारतभरच नाही तर जगभर उमटली. पाकिस्तानस्थित जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने हा हल्ला केला. दहशतवादी संघटनाना आश्रय व सहाय्यता देवून काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले घडवून आणण्यात पाकिस्तान नेहमीच सहभागी असतो असा आरोप भारताने केला. पाकिस्तानने मात्र या हल्ल्याचा संबंध बुरहान वाणी याच्या मृत्यू नंतर काश्मीरमध्ये जो संघर्ष सुरू आहे त्याच्याशी जोडला. भारताने या हल्ल्याचा पाकिस्तानशी संबंध दाखवून पाकिस्तानला एकटे पाडले. एवढेच नाही तर पाकव्याप्त काश्मीरच्या ज्या भागातून हल्ला झाला तेथील दहशतवादी तळांवर हल्ला करून ते उद्ध्वस्त केले व अनेक दहशतवादयाना कंठस्नान घातले. उरी घटनेने भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध ताणले गेले. भारताने पाकिस्तानात होवू घातलेल्या सार्क संमेलनावर बहिष्कार घातला.                                                       

काश्मीरमध्ये शांतता नांदण्यासाठी पाकिस्तान सोबत बोलणी सुरू ठेवली पाहिजे हा मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती आणि त्यांच्या पक्षाचा आग्रह होता पण बोलणी होण्यासारखी परिस्थिती न राहिल्याने काश्मीरच्या राजकारणात महबूबा मुफ्ती यांची स्थिति कमजोर झाली आणि त्या एकाकी पडल्या. काश्मीर प्रश्नावर भारत सरकार काश्मीर मधील विविध गटांशी व पाकिस्तानशी बोलणी करील ही मुफ्ती मोहम्मद सईद  आणि नंतर मुख्यमंत्री बनलेल्या महबूबा मुफ्ती यांनी दाखवलेली आशा मावळल्या नंतर दहशतवादी गटानी पिडीपीच्या नेत्याना लक्ष्य करायला सुरुवात केली. दक्षिण काश्मीर मधून महबूबा मुफ्ती यांच्या पक्षाला मोठे समर्थन मिळाले होते. त्या भागातच पक्षाच्या नेते  आणि कार्यकर्ते यांचेवर हल्ले होवू लागले. सप्टेंबर २०१७ मध्ये पिडीपीच्या नईम अख्तर या मंत्र्याच्या वाहनाच्या ताफ्यावर दहशतवादयानी ग्रेनेडने हल्ला केला. हा हल्ला हिजबूल मुजहादीनच्या दहशतवादयानी केला. या हल्ल्यात मंत्री बचावले पण एका महिलेसह तीन नागरिकांचा मृत्यू झाला. ३० जण जखमी झालेत. यात मंत्र्यासोबत प्रवास करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश होता. हा हल्ला झाल्यानंतर त्या भागातील तरुण रस्त्यावर उतरला आणि त्या भागात मंत्र्याच्या सुरक्षेसाठी तैनात सुरक्षासैनिकांवर दगडफेक करीत आजादीच्या घोषणा देवू लागला. बुरहान वाणीच्या मृत्यूनंतर आशा घटना काश्मीरमध्ये नित्याने घडू लागल्या आणि त्याचे चटके सत्तेत असलेल्या पिडीपीला मोठ्या प्रमाणात बसू लागले. 

                                                       (क्रमश:)

-------------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि . यवतमाळ 
मोबाईल - ९४२२१६८१५८ 

No comments:

Post a Comment