Friday, May 30, 2025

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - १३०

जम्मू-काश्मीरची राज्यघटना जागतिक पातळीवर भारताचा काश्मीरवरील ताबा व दावा ही जबरदस्तीची कृती नसून ती विधीसंमत असल्याचे दर्शविणारा महत्वाचा दस्तावेज होता. . जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य भाग असल्याचे या राज्यघटनेत नमूद करण्यात आले होते. ती राज्यघटनाच सर्वोच्च न्यायालयाने निरस्त केली.
----------------------------------------------------------------------------------------


सर्वोच्च न्यायालयाने कलम ३७० प्रकरणी सुनावणी करताना आणि निर्णय देतांना अनेक असे मुद्दे पुढे आणलेत जे या प्रकरणातील अर्जदार आणि प्रतिवादी या दोहोनीही उचलले नव्हते किंवा त्यावर बाजूही मांडली नव्हती. सर्वोच्च न्यायालयाने उचललेल्या अनाहूत मुद्द्यावर मुख्यत: घटनापीठाचे प्रमुख चंद्रचूड यांनी बाजू मांडली आणि त्यावर वादी-प्रतिवादी यांचे म्हणणे ऐकून न घेताच निर्णय दिला. अशा मुद्द्यांमध्ये एक प्रमुख मुद्दा होता जम्मू-काश्मीरची राज्यघटना. संसदेच्या शिफारशी वरून राष्ट्रपतींनी कलम ३७० रद्द करण्या संदर्भात जे घटनात्मक आदेश क्रमांक २७२ आणि २७३ काढले होते त्यात कुठेही असे म्हंटले नव्हते की जम्मू-काश्मीर मध्ये पूर्ण राज्यघटना लागू झाल्याने जम्मू-काश्मीरची राज्यघटना अस्तित्वात राहण्याचे कारण उरलेले नाही. उलट जून २०१९ मध्ये राष्ट्रपतींनी कलम ३७० रद्द करण्या संबंधी काढलेल्या आदेशानंतर या बाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय होईपर्यंत म्हणजे तब्बल ५ वर्षे कलम ३७० अस्तित्वात नसताना जम्मू-काश्मीरची राज्यघटना अस्तित्वात होती. संघपरिवार आणि पूर्वीचा जनसंघ व आताचा भारतीय जनता पक्ष यांची जम्मू-काश्मीर संदर्भात सातत्याने आवडती घोषणा राहिली आहे, "देश मे दो प्रधान, दो निशाण और दो विधान नही चलेंगे" ! तरीही भारतीय जनता पक्षाच्या सरकारने कलम ३७० रद्द करण्या संदर्भात काढलेल्या आदेशात जम्मू-काश्मीरची राज्यघटना निष्क्रिय किंवा रद्द झाल्याचे म्हंटले नव्हते. जम्मू-काश्मीरची राज्यघटना सर्वोच्च न्यायालयाने निष्क्रिय केली. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर काश्मीर संदर्भात भारताची बाजू मांडताना भारतीय शिष्टमंडळानी वेळोवेळी जम्मू-काश्मीरच्या राज्यघटनेचा आधार घेतला आहे.  जम्मू-काश्मीरची राज्यघटना जागतिक पातळीवर भारताचा काश्मीरवरील ताबा व दावा ही जबरदस्तीची कृती नसून ती विधीसंमत असल्याचे दर्शविणारा महत्वाचा दस्तावेज होता. . जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य भाग असल्याचे या राज्यघटनेत नमूद करण्यात आले होते.  जम्मू-काश्मीरच्या निर्वाचित घटनासमितीने तिथल्या राज्यघटनेत हे नमूद करतानाच कलम ३७० चे अस्तित्व कायम राखले होते. याचा अर्थ स्पष्ट आहे कलम ३७० चे अस्तित्व, जम्मू-काश्मीरची राज्यघटना अस्तित्वात असणे आणि जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य भाग असणे यात कोणताही अंतर्विरोध नव्हता, या बाबी एकमेकांच्या विरोधात नव्हत्या तर परस्पर पूरक अशा होत्या.                           


 कोणाचीही मागणी नसताना जम्मू-काश्मीरची राज्यघटना निरस्त किंवा निष्क्रिय करताना सर्वोच्च न्यायालयाने असा तर्क दिला आहे की कलम ३७० मुळे जम्मू-काश्मीरची राज्यघटना अस्तित्वात आली. आता कलम ३७०च अस्तित्वात नसल्याने जम्मू-काश्मीरची राज्यघटना अस्तित्वात राहण्याचे कारण उरलेले नाही. इथे पुन्हा सर्वोच्च न्यायालयाने घटनेच्या पलीकडे जावून इतिहासातील घडामोडीचा चुकीचा किंवा सोयीचा अर्थ काढला आहे. कलम ३७० चा उपयोग या संबंधी आदेश काढण्यासाठी झालेला आहे. कलम ३७० अस्तित्वात आले तेव्हा हे गृहीत होते की जम्मू-काश्मीरचा राज्यकारभार तिथल्या अस्तित्वात असलेल्या कायदेशीर तरतुदीनूसार चालणार. काश्मीरसाठीच नाही तर सर्व संस्थाना पुढे सामिलीकरणाच्या वेळी दोन पर्याय ठेवण्यात आले होते. एक तर तयार होत असलेली भारतीय राज्यघटना स्वीकारा व त्याप्रमाणे कारभार करा किंवा निर्वाचित प्रतिनिधीकडून राज्यासाठी नवी लोकशाही प्रधान राज्यघटना तयार करा व त्याप्रमाणे कारभार करा. चार-पाच संस्थानांनी दुसरा पर्याय निवडून घटना तयार करण्याचे काम प्रारंभ केले होते पण मधेच ते सोडून त्यांनी भारतीय राज्यघटनेचा स्वीकार केला. जम्मू आणि काश्मीर एकमेव राज्य होते ज्याने दुसरा पर्याय निवडून स्वत:ची राज्यघटना तयार केली व त्याप्रमाणे राज्यकारभार केला. राज्याच्या पर्यायी राज्यघटनेचा मुद्दा कलम ३७० अस्तित्वात येण्याच्या आधी चर्चिला गेला होता व त्याला मान्यता दिली गेली होती. त्यामुळे कलम ३७० च्या कुशीतून काश्मीरच्या राज्यघटनेचा जन्म झाला असे म्हणण्याला ऐतिहासिक आधार नाही. हा सर्वोच्च न्यायालयाचा कुतर्क आहे. काश्मीरमध्ये जे काही घडले आणि घडत आहे ते केवळ कलम ३७० मुळे हा प्रचार सत्ताधारी भाजपाकडून सतत केला गेला. कलम ३७० आहे म्हणून काश्मीरची राज्यघटना आहे हा प्रचार त्यांचाच.                                                                                                                                 

काश्मीरच्या राज्यघटनेचा वेगळा संदर्भ सर्वोच्च न्यायालयाने लक्षात घेतला नाही. जम्मू-काश्मीरने वेगळ्या राज्यघटनेचा आग्रह कायम राखला म्हणून कलम ३७० आले असे म्हणता येवू शकते पण कलम ३७० आले म्हणून जमू-काश्मीरची राज्यघटना अस्तित्वात आली असे म्हणणे सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य निष्कर्षाच्या विरोधात जाते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा डोलाराच मुळी भारतीय राज्यघटना काश्मीरमध्ये लागू करण्यासाठी भारतीय राज्यघटनेत कलम ३७० समाविष्ट करण्यात आले यावर उभा आहे. निर्णयाचा हा पायाच कसा भुसभुशीत आहे हे पुढे पाहू पण सध्या एवढेच ध्यानात घ्यायचे आहे की कलम ३७० मुळे जम्मू-काश्मीरची राज्यघटना अस्तित्वात आली आणि भारतीय राज्यघटनेचा विस्तार करण्यासाठी कलम ३७० भारतीय राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आले हे सर्वोच्च न्यायालयाने काढलेले दोन निष्कर्ष परस्पर विरोधी आहेत. भारत हे संघराज्य आहे आणि संघ राज्यात राज्याच्या व केंद्राची राज्यघटनेचे सहअस्तित्व असणे ही जगन्मान्य गोष्ट आहे. भारतीय जनता पक्षाला ते मान्य नसेलही पण भारतीय जनता पक्षाला काय हवे काय नको हे पाहणे सर्वोच्च न्यायालयाचे काम नव्हते. राज्यांना - संस्थानांना- वेगळ्या राज्यघटना बनविण्याची अनुमती देतांना हे गृहीतच होते की सर्वसाधारणपणे संघराज्याची घटना व राज्यांची घटना परस्पर विरोधी असणार नाही पण राज्यातील परिस्थितीनुसार राज्याच्या घटनेचे संघराज्याच्या घटनेपेक्षा वेगळेपण असणार आहे. तसे वेगळेपण भारतीय राज्य घटना व जम्मू-काश्मीर राज्यघटना यात पाहायला मिळते. त्यामुळे भारतीय राज्यघटना जम्मू-काश्मीर मध्ये लागू झाली म्हणून कलम ३७० च्या अस्तित्वाला आणि परिणामी जम्मू-काश्मीरच्या वेगळ्या राज्यघटनेच्या अस्तित्वाला अर्थ उरत नाही हा सर्वोच्च न्यायालयाचा निष्कर्ष चुकीचा ठरतो. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात जम्मू-काश्मीरची वेगळी राज्यघटना भारत एकात्म होण्यात अडथळा असल्याचा वास येतो. या बाबतीत भारतीय जनता पक्षाच्या अपप्रचारात आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात विलक्षण साम्य आढळते. 

---------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि. यवतमाळ 
मोबाईल - ९४२२१६८१५८   

Thursday, May 22, 2025

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - १२९

 सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने कलम ३६७ चा आधार घेत कलम ३७० मधील 'राज्याची घटनासमिती' ऐवजी 'राज्याची विधानसभा' हा केंद्र सरकारने केलेला बदल रद्द करणारा निर्णयच तेवढा घटनेला धरून होता. या व्यतिरिक्त कलम ३७० संदर्भातील निर्णय पूर्णत: राजकीय स्वरूपाचा आहे. 
--------------------------------------------------------------------------------------------


सगळे चुकतात तसे न्यायालयही चुकू शकते आणि हे कलम ३७० प्रकरणात निर्णय देण्यासाठी स्थापित घटनापीठाचे अध्यक्ष न्यायमूर्ती चंद्रचूड चांगलेच जाणून आहेत. आणीबाणी काळात जबलपूर एडीएम प्रकरणात त्यांच्या पिताश्रीने दिलेला निर्णय चुकीचा होता असा निर्णय देणाऱ्या घटनापीठाचे ते सदस्य होते. तो निर्णय कसा चुकीचा होता या निर्णयाचे लेखन त्यांनी स्वत: केले होते. त्यामुळे कलम ३७० च्या ऐतिहासिक आकलनात घटनापिठाची चूक झाली असेल तर ती बाब आक्षेपार्ह ठरत नाही. कलम ३७० प्रकरणी न्यायालयाचे आकलनच चुकले नाही तर न्यायालयाने घटनेच्या कलमाचे वाचन करण्यातच गडबड केली. उदाहरणार्थ २५ नोव्हेंबर १९४९ च्या युवराज करणसिंग यांनी काढलेली अधिसूचना वाचताना 'राज्यघटनेत काश्मीर संदर्भातील तरतुदी' हा वाक्यातील भाग वगळून  देशात राज्यघटना लागू झाल्यानंतर ती काश्मीरमध्ये लागू होईल असे सरळसोट वाचन केले. एकवेळ झाले तर चुकून नजरेआड झाले असेल असा संशयाचा फायदा देता आला असता. पण घटनेतील तरतुदी वाचनात घटनापीठाने एकापेक्षा अधिक वेळा चुका केल्या आहेत. घटनेतील कलम ३७० [१] च्या तरतुदीनूसार राष्ट्रपतींना भारतीय राज्यघटनेतील तरतुदी जम्मू-काश्मीर मध्ये लागू करण्याचा अधिकार आहे पण त्यासाठी तिथल्या राज्यसरकारची सहमती हवी. घटनापीठाने यातील राज्यसरकारच्या सहमतीला महत्व दिले नाही. घटनेच्या कलमातील या तरतुदीला महत्व न देण्याचे अतिशय हास्यास्पद कारण घटनापीठाने दिले. राज्यसरकारच्या सहमतीची तरतूद ही घटनात्मक अनिवार्यता नसून घटना समितीने काश्मिरी जनतेप्रती दाखविलेली सद्भावना असल्याचे घटनापीठाने म्हंटले.                                                                                                                 

अशीच गंभीर चूक घटनापीठाने कलम ३७० [३] बाबत केली आहे. कलम ३७० रद्द करण्याचा किंवा त्यात बदल करण्याचा राष्ट्रपतींना अधिकार आहे पण त्यासाठी राज्याच्या घटनासमितीची शिफारस किंवा संमती आवश्यक आहे. न्यायालयाने या वाक्यातील पहिला भाग लक्षात घेतला आणि दुसरा भाग न्यायालयाच्या दृष्टीने अर्थशून्य ठरला. वाक्याचा आत्मा असलेला भाग अर्थशून्य ठरवताना कोणताही घटनात्मक आधार न्यायालयाने दिला नाही. यासाठी दिलेले कारण पूर्णत: राजकीय होते. इथे पुन्हा एक गोष्ट नमूद केली पाहिजे की न्यायालयाने सुनावणी दरम्यान वारंवार सांगितले होते की कलम ३७० रद्द करण्याची सरकारची कृती घटनात्मक आहे की नाही याचा निर्णय घटनेच्या चौकटीतच घेवू. याचा दुसरा अर्थ असा होतो की काश्मीर कोणत्या परिस्थितीत आणि कोणत्या अटी व शर्तीनुसार भारतात सामील झाले ते आम्ही बघणार नाही. राष्ट्रपतींनी कलम ३७० रद्द करण्या संदर्भात काढलेले आदेश घटनेनूसार आहे की नाही हे बघूनच निर्णय देणार. पण प्रत्यक्षात सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने कलम ३६७ चा आधार घेत कलम ३७० मधील 'राज्याची घटनासमिती' ऐवजी 'राज्याची विधानसभा' हा केलेला बदल रद्द करणारा निर्णयच तेवढा घटनेला धरून होता. या व्यतिरिक्त कलम ३७० संदर्भातील निर्णय पूर्णत: राजकीय स्वरूपाचा आहे. 

कलम ३७०[३] मध्ये कलम ३७० मध्ये बदल किंवा ते कलम राष्ट्रपती रद्द करू शकतील पण त्यासाठी जम्मू-काश्मीर संविधान सभेची शिफारस किंवा संमती असेल तरच असे स्पष्ट लिहिलेले असताना आणि यापूर्वीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात संविधान सभेच्या शिफारशी शिवाय राष्ट्रपती कलम ३७० [३] अंतर्गत मिळालेले अधिकार वापरू शकत नाही हे नमूद असताना कलम ३७० प्रकरणी निकाल देतांना घटनापीठाने जम्मू-काश्मीर संविधान सभेची शिफारस राष्ट्रपतीवर बंधनकारक नसल्याचा निष्कर्ष काढला. या निष्कर्षासाठी जे कारण दिले ते घटनात्मक नसून राजकीय स्वरूपाचे आहे. संविधान सभेत कलम ३७० वर झालेल्या चर्चेचा शब्द न शब्द लिखित स्वरुपात उपलब्ध असल्याने संविधान सभेच्या सदस्यांनी वापरलेल्या शब्दांचा अर्थ लक्षात घेण्या ऐवजी शब्दामागील भावना शोधणे हे सर्वोच्च न्यायालयाचे काम नव्हते. कलम ३७० घटनेत समाविष्ट करण्याचा हेतू जम्मू-काश्मीर मध्ये भारतीय राज्यघटना लागू करणे हा होता असे न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठाने दावा केला आहे. भारताच्या घटना समितीत कलम ३७० प्रस्तावित करताना केलेल्या गोपालस्वामी अय्यंगार यांच्या भाषणात आणि कलम ३७० चा प्रस्तावावर घटनासमितीच्या सदस्यांनी जे विचार व्यक्त केलेत त्यात कोणीही असे म्हंटले नाही की कलम ३७० भारतीय राज्यघटना जम्मू-काश्मीरमध्ये लागू करण्यासाठी स्वीकारलेले आहे.                               

इतर राज्यांपेक्षा जम्मू-काश्मीरला वेगळा दर्जा देणारे किंवा जम्मू-काश्मीरचे वेगळे स्थान दर्शविणारे हे कलम आहे याबाबत घटनासमितीच्या कोणत्याच सदस्याच्या मनात शंका नव्हती. असे वेगळे स्थान देणे , मान्य करणे कितपत योग्य आहे याबाबतचा संभ्रम घटनासमितीच्या सदस्यांच्या बोलण्यातून व्यक्त झाला . पण घटना समितीतीतील कोणाचेही असे म्हणणे कधीच नव्हते की जम्मू-काश्मीर मध्ये भारतीय राज्यघटना लागू करण्यासाठी कलम ३७० चा घटनेत समाविष्ट करण्यात आले. कलम ३७० मुळे भारतीय राज्यघटनेचा विस्तार जम्मू-काश्मीरमध्ये करणे सोपे आणि सोयीचे झाले असा दावा संसदेत कलम ३७० रद्द करण्या संदर्भात झालेल्या चर्चेला उत्तर देतांना  तत्कालीन गृहमंत्री गुलझारीलाल नंदा यांनी केला होता. कलम ३७० ही भींत नसून काश्मिरात प्रवेश सुलभ करणारा बोगदा असल्याने कलम ३७० रद्द करणे हिताचे नसल्याचे ते बोलले होते. अगदी नेहरू काळापासून केंद्र सरकारने कलम ३७० चा उपयोग भारतीय राज्य घटनेची विविध कलमे लागू करण्यासाठी केला हे अगदी खरे आहे. पण घटना समितीचा कलम ३७० समाविष्ट करण्यामागे तो हेतू होता असे घटनासमितीतील चर्चेतून दुरान्वयानेही तसा अर्थ ध्वनित होत नाही. कलम ३७० च्या प्रत्येक उपकलमातून आणि प्रत्येक शब्दातून काय ध्वनित होत असेल तर ते हेच होते की भारताशी कसे संबंध ठेवायचे याचे संपूर्ण अधिकार जम्मू-काश्मीर राज्याला असतील. सामीलनाम्यात जम्मू-काश्मीर राज्याचे जे विषय भारताच्या सुपूर्द करण्यात आले ते विषय सोडले तर बाकी विषयावर निर्णय घेण्याचे सर्वाधिकार जम्मू-काश्मीरकडे असतील हे घटना समितीने मान्य केले आणि ते लक्षात घेवूनच कलम ३७० ची रचना करण्यात आली. त्यामुळे भारतीय राज्यघटना जम्मू-काश्मीरमध्ये लागू करण्याच्या हेतूनेच कलम ३७० स्वीकारले गेले हे सर्वोच्च न्यायालयाचे म्हणणे पूर्णत: निराधार आहे. कल्पित गोष्टीच्या आधारे घेतलेला निर्णय घटनात्मक असू शकत नाही. 
--------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि. यवतमाळ 
मोबाईल : ९४२२१६८१५८ 

Thursday, May 15, 2025

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - १२८

सर्वोच्च न्यायालय दावा करते तशी भारतीय राज्यघटना जम्मू-काश्मीर मध्ये युवराज करणसिंग यांच्या २५ नोव्हेंबर १९४९ च्या अधिसूचनेने लागू झाली नाही. ती लागू करण्यासाठी जम्मू-काश्मीरचे प्रवेशद्वार किलकिले झाले ते १९५२ साली पंडीत नेहरू आणि शेख अब्दुल्ला यांच्यात झालेल्या कराराने. या कराराने आंशिक स्वरुपात भारतीय राज्यघटना जम्मू-काश्मीर मध्ये लागू होण्याचा मार्ग मोकळा झाला हेच ऐतिहासिक सत्य आहे.
-------------------------------------------------------------------------------------------


राजा हरीसिंग यांनी आपले सर्व अधिकार युवराज करणसिंग यांचेकडे सुपूर्द केले असले तरी सामीलनाम्यावर सही करण्याआधी राजा हरीसिंग यांचेकडे जसे सर्वंकष,सर्वव्यापी व अंतिम अधिकार होते तशी स्थिती युवराज करणसिंग यांची नव्हती. ते जम्मू-काश्मिरातील अंतरिम सरकारचे प्रमुख होते व मंत्रीमंडळाच्या सल्ल्याने निर्णय घेण्याचे बंधन त्यांचेवर होते. त्यामुळे राजा हरीसिंग यांनी ज्या सामीलनाम्यावर राजा म्हणून स्वत:च्या अधिकारात स्वाक्षरी केली होती त्यात एकतर्फी बदल करण्याचा अधिकार युवराज करणसिंग यांना नव्हता. अंतरिम सरकार निर्णय घेईल त्याप्रमाणे आदेश काढणे हे त्यांचे काम होते. जसे केंद्र सरकारच्या निर्णयाची अधिसूचना राष्ट्रपतीच्या सहीने निघते किंवा राज्यसरकारच्या निर्णयाची अधिसूचना राज्यपालाच्या स्वाक्षरीने निघते अगदी अशाच प्रकारे युवराज करणसिंग यांच्या सहीने अधिसूचना निघत. त्यांचे स्थान सार्वभौम राजाचे नव्हते तर आज राज्यपालाचे जे स्थान आहे तसे त्याकाळी ते जम्मू-काश्मीरचे राजप्रमुख होते आणि अंतरिम सरकारच्या सल्ल्याने राज्यकारभार चालवीत होते. जम्मू-काश्मीर राज्याचे भारता सोबत कसे संबंध असतील याच्या वाटाघाटी त्याकाळी सुरु होत्या आणि या वाटाघाटीचे नेतृत्व जम्मू-काश्मीरच्या वतीने शेख अब्दुल्ला करीत होते. त्यावेळच्या केंद्र सरकारने राजा हरीसिंग यांनी जरी आपले सर्व अधिकार युवराज करणसिंग यांचेकडे सोपविलेले असले तरी केंद्र सरकार वाटाघाटी करीत होते ते शेख अब्दुल्ला यांचेशी. युवराज करणसिंग यांचे सोबत नव्हे. ही गोष्टच स्पष्ट करते की सामीलनामा अंमलात येण्या आधी राजा हरीसिंग जसे जम्मू-काश्मीरचे सार्वभौम राजे होते ते स्थान करणसिंग यांचे नव्हते.                 

करणसिंग यांचे तसे स्थान असते तर इतर संस्थानिकांनी सामीलनाम्या नंतर बिनशर्त विलीनीकरण करण्याच्या दस्तावेजावर त्यांच्या इच्छेनुसार स्वाक्षरी करू शकले असते. तशी स्वाक्षरी केली असती तर काश्मीरचे स्थान इतर राज्यापेक्षा वेगळे राहिलेच नसते. युवराज करणसिंग यांनी विलीनीकरणाच्या दस्तावेजावर स्वाक्षरी केलेली नसताना २५ नोव्हेंबर १९४९ ची अधिसूचना काढून त्यांनी राजा म्हणून जम्मू-काश्मीरच्या सामिलनाम्यातील राखून ठेवलेल्या अधिकारावर पाणी सोडले असे मानणे केवळ सोयीस्कर अर्थ काढणे नसून इतिहासाचे केलेले विकृतीकरण आहे. सर्वोच्च न्यायालयाचा कलम ३७० संदर्भातील निकाल इतिहासाच्या विकृतीकरणाचा नमुना म्हणता येईल असा आहे. युवराज करणसिंग यांना ना सामिलनाम्यात बदल करण्याचा सार्वभौम अधिकार होता ना सार्वभौम अधिकारात २५ नोव्हेंबर १९४९ ची अधिसूचना त्यांनी जारी केली. ज्या सरकारचे ते प्रमुख होते त्या सरकारच्या सल्ल्याने त्यांनी ही अधिसूचना जारी केली होती. ती अधिसूचनाही संपूर्ण भारतीय राज्यघटना काश्मीरमध्ये लागू करण्याची नव्हती तर काश्मीर संदर्भात जी कलमे राज्यघटनेत समाविष्ट असतील ती लागू करण्या संदर्भात होती. सर्वोच्च न्यायालयाने मात्र आपल्या निकालात ती अधिसूचना संपूर्ण राज्यघटना जम्मू-काश्मिरात लागू करणारी होती असे म्हंटले आहे. कोणत्या पार्श्वभूमीवर ती अधिसूचना काढण्यात आली आणि २६ जानेवारी १९५० रोजी भारतात राज्यघटनेचा अंमल सुरु झाला तेव्हा काश्मीर मध्ये राज्यघटना लागू झाली की नाही हे लक्षात घेतले तर सर्वोच्च न्यायालयाचा या संदर्भातील दावा फोल असल्याचे लक्षात येईल. 

युवराज करणसिंग यांनी २५ नोव्हेंबर १९४९ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेच्या आधी शेख अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखालील जम्मू-काश्मीरच्या प्रतिनिधी मंडळाच्या भारत आणि जम्मू-काश्मीर यांचे संबंध कसे असतील हे निश्चित करण्यासाठी भारत सरकार सोबत वाटाघाटी आणि चर्चा सुरु होती. या वाटाघाटीच्या परिणामी भारतीय घटना समितीच्या विचारार्थ आणि संमतीसाठी कलम ३०६ अ चा मसुदा ठेवण्यात आला . युवराज करणसिंग यांच्या मंत्रीमंडळातील पंतप्रधान शेख अब्दुल्ला यांनी भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू व गृहमंत्री सरदार पटेल यांच्याशी वाटाघाटी केल्या होत्या. या वाताघाटीतून कलम ३०६ अ चा जन्म झाला ज्याचे प्रारूप गोपालस्वामी अय्यंगार यांनी तयार केले व घटनासमितीत चर्चेसाठी व स्वीकृतीसाठी मांडले. हे कलम केवळ जम्मू-काश्मीरसाठी असू नये तर इतरही राज्यांना लागू व्हावे असा मुद्दा उत्तर प्रदेशातून घटनासमितीत आलेले हसरत मोवानी यांनी मांडला. पण चर्चेच्या शेवटी मतदानासाठी हे कलम आले तेव्हा जम्मू-काश्मीरसाठीचे हे विशेष कलम घटनासमितीत जवळपास सर्वसंमतीने स्वीकृत करण्यात आले. १७ ऑक्टोबर १९४९ रोजी कलम ३०६ अ हे अधिकृतपणे कलम ३७० म्हणून राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आले. हे कलम आणि सामीलनाम्यात संरक्षण ,परराष्ट्र धोरण आणि दळणवळण या संदर्भातील सर्वाधिकार भारताला प्रदान करण्यात आलेले असल्याने त्या संदर्भातील घटनेतील कलमे जम्मू-काश्मीरमध्ये लागू करण्यासाठी आपल्या मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार युवराज करणसिंग यांनी २५ नोव्हेंबर १९४९ रोजी अधिसूचना जारी केली. २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय राज्यघटना भारतात लागू झाली तेव्हा जम्मू-काश्मीरमध्ये फक्त भारतीय राज्यघटनेतील कलम ३७० लागू झाले आणि कलम ३७० मधील निहित प्रक्रियेचा अवलंब करत भारतीय राज्यघटनेचे कलम १ लागू झाले होते. युवराज करणसिंग यांनी काढलेली अधिसूचना ही संपूर्ण भारतीय राज्यघटना जम्मू-काश्मीरमध्ये लागू करण्यासाठी नव्हती तर भारतीय राज्यघटनेतील कलम ३७० व कलम १ लागू करण्यासाठी होते.                                                                     

कलम १ प्रमाणे भारत हा राज्याचा संघ आहे व कलम १ जम्मू-काश्मीरमध्ये लागू केल्याने जम्मू-काश्मीर भारतीय संघराज्याचा भाग बनले. जम्मू-काश्मीरने सामीलनाम्यानुसार भारतीय संघराज्याचा हिस्सा बनण्यास मान्यता दिली असली तरी भारत आणि जम्मू-काश्मीरचे संबंध सामीलनाम्यातील अटी व शर्तीनुसार असतील याला मान्यता देणारे कलम ३७० होते. याचाच अर्थ जम्मू-काश्मीर भारतीय संघराज्याचा हिस्सा बनला असला तरी घटनात्मक संबंध निश्चित करणारे कलम होते ३७०. या पलीकडे २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय राज्यघटनेचा अंमल जम्मू-काश्मीर मध्ये झालेला नव्हता. भारतीय राज्यघटना जम्मू-काश्मीर मध्ये लागू करण्यासाठी जम्मू-काश्मीरचे प्रवेशद्वार किलकिले झाले ते १९५२ साली पंडीत नेहरू आणि शेख अब्दुल्ला यांच्यात झालेल्या कराराने. या कराराने आंशिक स्वरुपात भारतीय राज्यघटना जम्मू-काश्मीर मध्ये लागू होण्याचा मार्ग मोकळा झाला असे म्हणता येईल. पण कराराच्या अंमलबजावणीत नेहरू - अब्दुल्ला यांच्यात झालेलेले मतभेद आणि होत असलेल्या विलंबाने अधीर झालेल्या नेहरूंनी शेख अब्दुल्ला यांना पदावरून काढून टाकण्याचा व अटक करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतरच या कराराला कायदेशीर स्वरूप देणारा १९५४ चा राष्ट्रपतीचा आदेश जारी होवू शकला आणि या आदेशानुसार राज्यघटनेची काही कलमे लागू झालीत. नंतर हळू हळू कलम ३७० मधील प्रक्रियेचा अवलंब करत राष्ट्रपतीच्या आदेशाने जम्मू-काश्मीर मध्ये भारतीय राज्यघटनेचा विस्तार होत गेला. पण जम्मू-काश्मीरमध्ये राज्यघटना लागू होण्याशी युवराज करणसिंग यांची २५ नोव्हेंबर १९४९ ची अधिसूचना कारण आणि निमित्त नसताना सर्वोच्च न्यायालयाने तसा निष्कर्ष काढला.  काश्मीर हे इतर राज्यांपेक्षा वेगळे नव्हते हे दाखवून देण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आटापिटा होता पण तथ्य न्यायालयाच्या निष्कर्ष व निर्णयाच्या विरोधात आहेत. 

------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि.यवतमाळ 
मोबाईल - ९४२२१६८१५८ 

Thursday, May 8, 2025

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - १२७

 २५ नोव्हेंबर १९४९ रोजी जम्मू-काश्मीरचे राजप्रमुख म्हणून करणसिंग यांनी काढलेल्या अधिसूचनेच्या अर्थाबद्दल कधीच संभ्रम नव्हता. भारताची संपूर्ण राज्यघटना जम्मू-काश्मीरमध्ये लागू करणारी ती अधिसूचना नव्हती तर सामिलनाम्याच्या तरतुदीच्या मर्यादेत भारतीय राज्य्गघटनेच्या तरतुदी जम्मू-काश्मीरमध्ये लागू करण्यासाठी ती अधिसूचना असल्याबद्दल सर्वांमध्ये पुरेपूर स्पष्टता होती. ७६ वर्षानंतर सर्वोच्च न्यायालयाला त्या अधिसुचने बद्दल वेगळाच साक्षात्कार झाला !
-----------------------------------------------------------------------------------------


काश्मीरचा राजा हरीसिंग यांनी भारतात सामील होण्याच्या सामीलनाम्यावर स्वाक्षरी केल्यानंतर काही काळ जम्मू-काश्मीरचे राजप्रमुख म्हणून काम पाहिले. हरीसिंग राजा असले तरी जनतेचे प्रतिनिधी म्हणून शेख अब्दुल्ला हे काश्मीरचे सर्वोच्च नेते होते. राजा हरीसिंग यांच्या राजेशाही विरुद्ध १९३२-३३ पासून त्यांचा संघर्ष सुरु होता. त्यामुळे दोघांचे संबंध ताणलेले होते. राज्याची कार्यकारी सत्ता शेख अब्दुल्ला यांचेकडे सोपविणे सुकर व्हावे यासाठी राजा हरीसिंग यांनी निवृत्त व्हावे व आपले सर्व अधिकार आपला मुलगा करणसिंग यांचेकडे सोपवावे यासाठी त्यांचे मन वळविण्यात आले. राजा हरीसिंग यांनी मार्च १९४८ मध्ये एक आदेश काढून करणसिंग यांचेकडे राजाचे सर्व अधिकार सोपविले. राजप्रमुख बनलेल्या करणसिंग यांच्या नेतृत्वाखाली एक अंतरिम सरकार स्थापन करण्यात आले ज्यात प्रभावी आणि प्रमुख भूमिका शेख अब्दुल्ला यांची होती. शेख अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखालील प्रतिनिधींनी भारत आणि जम्मू-काश्मीरचे संबंध कसे असतील याची भारत सरकारच्या प्रतिनिधी बरोबर चर्चा करून संबंधांची रूपरेषा ठरविली. अंतरिम सरकारच्या शिफारशी वरून किंवा मान्यतेने राजप्रमुख असलेले करणसिंग यांनी २५ नोव्हेंबर १९४९ रोजी एक अधिसूचना जारी केली होती. त्या अधिसूचनेत असे स्पष्ट करण्यात आले होते की लवकरच लागू होणाऱ्या भारतीय राज्यघटनेतील ज्या तरतुदी जम्मू-काश्मीर संदर्भात असतील त्या जम्मू-काश्मीरमध्ये लागू होतील आणि त्या आधारे भारत आणि जम्मू-काश्मीरचे वैधानिक संबंध निर्धारित होतील. सामीलनाम्यातील तरतुदींना वैधानिक मान्यता मिळविण्यासाठी ही अधिसूचना आवश्यक होती. कारण सामीलनाम्यातील तरतुदीनुसार संरक्षण,दळणवळण आणि परराष्ट्र धोरण विषयक भारतीय कायदे जम्मू-काश्मीरमध्ये लागू करायचे होते आणि या तीन विषया संदर्भात कायदे करण्याचे अधिकार भारत सरकारकडे असल्याची वैधानिक मान्यता जम्मू-काश्मीर सरकारकडून घेणे गरजेचे होते. तशी मान्यता देणारी ती अधिसूचना होती. ही अधिसूचना काढण्यात आली तेव्हा भारतीय राज्यघटना लागू व्हायची होती.                                                                                                   

भारतीय राज्यघटने प्रमाणे कलम ३७० व कलम १ ही दोनच कलमे काश्मीरला लागू होणार होती. बाकी भारतीय राज्यघटनेची कलमे लागू करायची झाल्यास ती कशी लागू होतील याची प्रक्रिया कलम ३७० मध्ये देण्यात आली होती. ही प्रक्रिया सुद्धा सामीलनाम्यातील अटी व शर्तीनुसार निर्धारित केली गेली होती. भारताची भावी राज्यघटना स्वीकारण्याचे बंधन राज्याच्या प्रमुखावर असणार नाही. सामीलनाम्यातील विषय वगळता अन्य विषयाच्या घटनात्मक तरतुदी स्वीकारण्याचा किंवा न स्वीकारण्याचा अधिकार राज्याच्या प्रमुखाकडे होता. हेच कलम ३७० मध्ये प्रतिबिंबित झालेले होते. बाकी सर्व संस्थानिकांनी सामीलनाम्या नंतर भारतात पूर्ण विलीन होण्याला व संपूर्ण भारतीय राज्यघटना आपल्या संस्थानात लागू करण्यास मान्यता दिल्याने तिकडे भारतीय राज्यघटना लागू होण्यात काही अडचण नव्हती. जम्मू-काश्मीरच्या राज्य प्रमुखाने विलीनीकरण करारावर स्वाक्षरी न केल्याने इथे सामीलनाम्यातील तरतुदीच्या मर्यादेतच भारतीय राज्यघटना लागू होणार होती. २५ नोव्हेंबर १९४९ ची करणसिंग यांनी राजप्रमुख म्हणून काढलेल्या अधिसूचनेने या मर्यादेत भारतीय राज्यघटना जम्मू-काश्मीर राज्यात लागू करण्याचा मार्ग मोकळा झाला. कलम ३७० संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा ताजा निकाल येईपर्यंत राष्ट्रपतीपासून ते सर्वोच्च न्यायालया पर्यंत आणि केंद्र सरकार पासून ते जम्मू-काश्मीरची संविधान समिती आणि राज्य सरकार यांच्यात २५ नोव्हेंबर १९४९ रोजी जम्मू-काश्मीरचे राजप्रमुख म्हणून काढलेल्या अधिसूचनेच्या अर्थाबद्दल कधीच संभ्रम नव्हता. भारताची संपूर्ण राज्यघटना जम्मू-काश्मीरमध्ये लागू करणारी ती अधिसूचना नव्हती तर सामिलनाम्याच्या तरतुदीच्या मर्यादेत भारतीय राज्य्गघटनेच्या तरतुदी जम्मू-काश्मीरमध्ये लागू करण्यासाठी ती अधिसूचना असल्या बद्दल या सर्वांमध्ये पुरेपूर स्पष्टता होती. अगदी मोदी सरकारचा सुद्धा असा दावा नव्हता की २५ नोव्हेंबर १९४९ च्या अधिसूचनेनुसार जम्मू-काश्मीर राज्यात २६ जानेवारी १९५० रोजीच भारतीय राज्यघटना लागू झालेली आहे. न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील घटनापीठाने ७६ वर्षानंतर त्या अधिसूचनेने २६ जानेवारी १९५० रोजीच संपूर्ण राज्यघटना जम्मू-काश्मीर राज्यात लागू झाल्याचा निष्कर्ष काढला.                                     

ती अधिसूचना काढणाऱ्याला देखील सर्वोच्च न्यायालयाचा ताजा निकाल येईपर्यंत माहित नव्हते की आपण भारतीय राज्यघटना संपूर्णपणे जम्मू-काश्मीर मध्ये लागू करण्यासाठी ती अधिसूचना काढली होती ! नेहरू सरकार पासून मोदी सरकार पर्यंत कोणालाच हे समजले नाही. ही गोष्ट समजली ती फक्त न्यायमूर्ती चंद्रचूड आणि घटनापीठावरील त्यांच्या सहकारी न्यायमूर्तीना ! सर्व ऐतिहासिक तथ्य आणि सत्य बाजूला सारून, १९५० नंतरचा जम्मू-काश्मीरचा घटनात्मक प्रवास नजरेआड करून असा अनैतिहासिक आणि असंवैधानिक निष्कर्ष सर्वोच्च न्यायालयाने काढून आपला कलम ३७० वरील निकाल किती अतार्किक आणि तर्कदुष्ट आहे हे स्वत:च दाखवून दिले आहे. अर्थात घटनापीठाचा हेतू आणि अट्टाहास काश्मीरचे इतर राज्यापेक्षा असलेले वेगळेपण नाकारण्यासाठी आहे. सर्वोच्च न्यायालयासमोर प्रश्न होता तो असा : सरकार पक्ष आणि सरकारने घेतलेल्या निर्णया विरुद्ध सर्वोच्च न्यायालयाकडे अपील करणारा पक्ष या दोहोंचेही एकमत या मुद्द्यावर होते की कलम ३७० मुळे काश्मीरचे वेगळेपण कायम आहे. सरकारपक्षाला हे वेगळेपण संपवायचे होते आणि अपीलकर्त्यांना हे वेगळेपण राखायचे होते. यावर सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने काश्मीरचे वेगळेपण अस्तित्वातच नव्हते अशी बाजू स्वत:च मांडली आणि आपल्याच बाजूने निर्णय दिला ! काश्मीरचे वेगळेपण कशामुळे होते तर काश्मीरने इतर संस्थाना सारखे विलीनीकरण मान्य केले नाही. इतर संस्थानांनी विलीनीकरण करारावर स्वाक्षरी केली तशी काश्मीरने केली नाही. सरसकट भारतीय संविधान लागू करण्यास इतर संस्थानांनी मान्यता दिली तशी काश्मीरने दिली नाही. काश्मीरचा संघर्ष हा या बाबीबद्दल आग्रही असणाऱ्यातील व या बाबींचा विरोध करण्याऱ्यामधील असल्याचे गेली ७५ वर्षे देश बघत आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने २५ नोव्हेंबर १९४९ रोजी करणसिंग यांनी काढलेल्या अधिसूचनेत अभिप्रेत नसलेला अर्थ काढून काश्मीरचे वेगळेपण त्या अधिसुचनेमुळे तेव्हाच संपल्याचा निष्कर्ष वास्तवाकडे सर्वोच्च न्यायालयाने पाठ फिरविली असल्याचे दाखवून देणारा आहे. जो निकाल द्यायचा त्या अनुषंगाने सोयीस्कर असे अन्य निष्कर्ष सर्वोच्च न्यायालयाने काढले आहेत. 
-------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि. यवतमाळ 
मोबाईल : ९४२२१६८१५८ 

Thursday, May 1, 2025

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - १२६

 राजा हरीसिंग यांनी सामीलनाम्यावर स्वाक्षरी केल्या नंतर काश्मीरचे सार्वभौमत्व शिल्लक राहिले का हा मुद्दा ना वादीने उचलला होता ना प्रतिवादीने. घटनापीठातर्फे न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी हा मुद्दा पुढे केला. निर्णयाला प्रभावित करणारा हा मुद्दा असल्यामुळे याबाबतीत स्पष्टता गरजेची असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या निकालात या मुद्द्यावर न्यायालयाने जे निष्कर्ष काढले त्यातून भारतीय घटनासमितीसह आजवरच्या सर्व सरकारांना अक्षरशः वेड्यात काढले.
-----------------------------------------------------------------------------------------


कलम ३७० प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने दिलेला निकाल धक्कादायक आणि वादग्रस्त आहे. प्रकरण सुनावणीसाठी घेतले तेव्हाच सर्वोच्च न्यायालयाने हा विषय गुंतागुंतीचा करून टाकला होता. कलम ३७० प्रकरणी सरकारने घेतलेल्या निर्णयाला जे आव्हान देण्यात आले होते त्यातील मुख्य मुद्दे असे होते : १. कलम ३७० मध्ये दुरुस्ती करून त्या कलमात उल्लेख असलेल्या जम्मू-काश्मीर घटना समिती ऐवजी जम्मू-काश्मीरची विधानसभा असा बदल करणे वैध आहे का ? आव्हानाचा दुसरा मुद्दा होता कलम ३७० मध्ये कलम ३७० रद्द करण्याची , कलम ३७० मध्ये बदल करण्याची निहित प्रक्रिया डावलून राष्ट्रपतींना कलम ३७० रद्द झाल्याचे घोषित करण्याचा एकतर्फी अधिकार आहे का. या दोन मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाला निकाल द्यायचा होता. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने आधीच घोषित केले होते की हा विषय आम्ही घटनेच्या चौकटीतच तपासणार आणि सरकारचा निर्णय घटनेला धरून आहे की नाही एवढेच बघणार. प्रत्यक्षात सर्वोच्च न्यायालयाने अपिलातील जे मुद्दे होते त्याला फाटे फोडले किंवा त्याचा विस्तार केला. विस्ताराचा एक मुद्दा होता राजा हरीसिंग यांनी भारतात सामील होण्याच्या सामीलनाम्यावर स्वाक्षरी केल्या नंतर जम्मू-काश्मीरचे वेगळे सार्वभौम अस्तित्व उरते का. आणि दुसरा मुद्दा होता कलम ३७० तात्पुरते होते की नाही. हे कलम तात्पुरते असल्याचा युक्तिवाद सरकार पक्षाकडून केला गेला पण सरकार पक्षाने असे कुठेही प्रतिपादन केले नव्हते की कलम तात्पुरते असल्याने ते आम्ही रद्द केले. मुळात हा मुद्दा जम्मू-काश्मीर उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय यांनी यापूर्वी दिलेल्या निकालातून निकाली निघाला होता. असे असताना हा मुद्दा नवा समजून विचारात घेण्याचे कारण नव्हते आणि वादी किंवा प्रतिवादिनी या मुद्द्यावर निर्णय मागितलाच नव्हता.                                                                                                                         

जेव्हा कपिल सिब्बल यांनी अपीलकर्त्याच्या वतीने बाजू मांडायला सुरुवात केली तेव्हा त्यांनी कलम ३७० च्या उपकलम ३ मध्ये निर्देशित केल्या प्रमाणे कलम ३७० रद्द करण्यासाठी जम्मू-काश्मीर घटना समितीची शिफारस किंवा मान्यता अनिवार्य असल्याचे दाखवून दिले. घटना समिती विसर्जित झाल्याने दुसऱ्या कोणाच्या शिफारसीने किंवा शिफारसी विना कलम ३७० रद्द करण्याचा राष्ट्रपतींना अधिकार नसल्याचे प्रतिपादन करताच घटनापीठाचे अध्यक्ष असलेले सरन्यायधीश चंद्रचूड यांनी हस्तक्षेप केला. न्या. चंद्रचूड यांनी कपिल सिब्बल यांना सांगितले की जम्मू-काश्मीर घटना समितीचे विसर्जन झाल्यानंतर कलम ३७० कायमस्वरूपी बनले हे स्वीकारले किंवा प्रस्थापित झाले तरच तुमचे म्हणणे मान्य करता येईल. न्या. चंद्रचूड यांचे हे विधान अतिशय धक्कादायक व आक्षेपार्ह असे होते. यावर पूर्वी विचार किंवा निर्णय झालाच नाही, तो आम्हाला आधी घ्यावा लागेल असे सुचविणारे हे विधान होते. एकापेक्षा अधिक प्रकरणात आणि एकापेक्षा अधिक वेळा सर्वोच्च न्यायालयाने हे स्पष्ट केले होते की कलम ३७० रद्द करण्यासाठी जम्मू-काश्मीर घटना समितीची शिफारस किंवा मान्यता अनिवार्य आहे आणि तशी शिफारस करण्यासाठी किंवा मान्यता देण्यासाठी घटना समिती अस्तित्वात नसल्याने घटनेत तात्पुरते म्हणून उल्लेख असलेले कलम ३७० आता भारतीय राज्यघटनेतील कायमस्वरूपी कलम बनले आहे. असे स्पष्टीकरण देण्यात यापूर्वी बनलेल्या घटनापिठाचा देखील समावेश आहे. एकदा दिलेला निर्णय बदलता येत नाही असे नाही. पण तो बदलण्याची एक पद्धत आहे. कलम ३७० कायमस्वरूपी झाल्याच्या आधीच्या निर्णयाची आम्हाला समीक्षा करायची आहे असे हे घात्नापीठ सांगू शकत होते. मग आधी याची समीक्षा करून नंतर मूळ अपील विचारात घेतले असते तर ते विधीसंमत झाले असते. पण यात एक अडचण होती . आधीचे निर्णय ५ सदस्यीय घटनापीठाकडून देण्यात आलेले होते. एका ५ सदस्यीय घटनापीठाचा निर्णय दुसरे पाच सदस्यीय घटनापीठ कसे घेवू शकते असा प्रश्न उपस्थित झाला असता. आधीच्या निर्णयावर पुनर्विचार न करता निर्णय झालेल्या मुद्द्यावर पुन्हा निर्णय देणे हे न्यायिक अनौचित्य ठरते. 

राजा हरीसिंग यांनी सामीलनाम्यावर स्वाक्षरी केल्या नंतर काश्मीरचे सार्वभौमत्व शिल्लक राहिले का हा मुद्दा ना वादीने उचलला होता ना प्रतिवादीने. घटनापीठातर्फे न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी हा मुद्दा पुढे केला. निर्णयाला प्रभावित करणारा हा मुद्दा असल्यामुळे याबाबतीत स्पष्टता गरजेची असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या निकालात या मुद्द्यावर न्यायालयाने जे निष्कर्ष काढले त्यातून भारतीय घटनासमिती सह आजवरच्या सर्व सरकारांना अक्षरशः वेड्यात काढले. निर्णय देतांना चंद्रचूड यांच्या चेहऱ्यावरील भाव कसे होते मी बघितले नाही, पण निकालपत्रात जे लिहिले त्यावरून वाटते की त्यांना जी गोष्ट कळली ती घटना समितीला व त्यानंतर केंद्रातील सर्व सरकारांना कशी कळली नाही असे आत्मगौरवाचे भाव चंद्रचूड यांच्या चेहऱ्यावर असले पाहिजे. मुळात सामीलनाम्यावर सही केल्यानंतर काश्मीरचे  सार्वभौमत्व शिल्लक राहिले का हा प्रश्नच मुळात चुकीचा आहे. सामीलनाम्यात परराष्ट्र,संरक्षण आणि दळणवळण या तीन बाबतीतले अधिकार भारताला देण्यात आले तेव्हाच काश्मीरने आपल्या सार्वभौमत्वावर पाणी सोडले होते. त्यानंतर काश्मीर हा सार्वभौम प्रदेश आहे असा दावा कोणीच केला नव्हता. दावा एवढाच होता की काश्मीर आणि भारताचे संबंध सामीलनाम्यातील अटी व शर्तीनूसार राहतील. सामीलनाम्यावर सह्या झाल्या तेव्हा भारताची राज्यघटना तयार व्हायचीच होती. भविष्यात भारतात लागू होणारी राज्यघटना काश्मीरमध्ये लागू करण्याचे बंधन काश्मीरवर असणार नाही. भारतीय राज्यघटना पूर्णत: किंवा अंशत: लागू करायची की नाही याचा निर्णय घेण्याचा अधिकार फक्त काश्मीरच्या राज्यप्रमुखाला असेल. कलम ३७० एवढेच दर्शविते की सामीलनाम्यातील अटी व शर्ती भारताला मान्य आहे ! सार्वभौम शब्दाच्या शब्दकोशातील अर्थानुसार काश्मीर सार्वभौम राहिले नाही पण भारताच्या सुपूर्द करण्यात आलेल्या विषयाखेरीज बाकी सर्व विषयावर निर्णय घेण्याचा अधिकार काश्मीरने आपल्याकडे ठेवला होता हे ऐतिहासिक सत्य नाकारण्यासाठी चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठाने राजाच्या अधिकारात काढण्यात आलेल्या एका अधिसूचनेचा आधार घेतला. या अधिसूचनेचा आपल्या मनमर्जीने अर्थ लावत राजाने आपले सर्व अधिकार त्या अधिसूचनेनुसार सोडल्याचा व भारताने राज्यघटना स्वीकारली तेव्हा ती काश्मीरमध्ये लागू झाल्याचा अफलातून निष्कर्ष कलम ३७० वर निकाल देतांना घटनापीठाने काढला. 

-------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि. यवतमाळ 
मोबाईल- ९४२२१६८१५८