Friday, August 29, 2025

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - १४२

 जागतिक व्यासपीठावर भारत सरकार काश्मिरी जनतेचा स्वयंनिर्णयाचा हक्क मान्य करीत होते आणि संयुक्त राष्ट्रसंघाची सुरक्षा परिषद सार्वमत घेण्याचा निर्देश देत होती त्यावेळी काश्मिरातील जनतेने आधीच भारताच्या बाजूने कौल दिला आहे त्यामुळे नव्याने सार्वमत घेण्याची गरज नाही हे ठामपणे सांगणारे एकमेव नेते शेख अब्दुल्ला होते.
--------------------------------------------------------------------------------------------


पंडीत नेहरूंची देशाला आणि जगाला जी ओळख आहे त्याच्या विपरीत त्यांचे वर्तन काश्मीर आणि शेख अब्दुल्लांच्या बाबतीत घडले. काश्मीरच्या बाबतीत वारंवार ज्या भूमिकेचा पुनरुच्चार नेहरू १९४७ ते १९५२ या काळात करीत आलेत त्या भूमिकेलाच छेद देणारी कृती त्यांनी १९५३ मध्ये केली. शेख अब्दुल्लांची अटक भारताच्या काश्मीर विषयक घोषित भूमिकेला छेद देणारी होती. अटकेचे कारण फार दुबळे आणि हास्यास्पद होते. शेख अब्दुल्ला पाकिस्तानशी संगनमत करून भारतापासून काश्मीरला वेगळे करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करण्यात आला. हा आरोप त्या शेख अब्दुल्लावर करण्यात आला ज्यांनी फाळणीच्या वेळी पाकिस्तान ऐवजी भारताची निवड केली. धर्मांध व सरंजामशाही असलेल्या पाकिस्तान ऐवजी त्यांना लोकशाही समाजवादी भारत जवळचा वाटला. काश्मीरला लोकशाहीवादी आणि धर्मनिरपेक्ष समाजवादी बनवायचे असेल तर पाकिस्तानात राहून ते शक्य होणार नाही. त्यासाठी भारतासोबत राहणेच योग्य असल्याचे त्यांचे ठाम मत होते. जसे भारताने वेळोवेळी काश्मिरी जनतेचा स्वयंनिर्णयाचा हक्क जाहीरपणे मान्य केला होता तसेच शेख अब्दुल्लांनी आपल्या स्वप्नातील काश्मीर भारतात राहूनच साकार होईल हे वेळोवेळी सांगितले होते. पाकिस्तान बरोबर जायचे नाही यावर ठाम असल्याने त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी भारतीय सैन्याला पाकिस्तानी घूसखोरा विरुद्ध मदत केली होती. सैन्याच्या खांद्याला खांदा लावून शेख अब्दुल्ला समर्थक पाकिस्तानी घुसखोरांविरुद्ध लढल्याचा इतिहास आहे. १९५२ पर्यंत , अगदी १९५२ चा दिल्ली करार होईपर्यंत, भारत सरकार व शेख अब्दुल्लांचे सरकार यांच्यामध्ये मतभेद नव्हते. काश्मीरच्या बाबतीत जागतिक व्यासपीठावर भारत अनुकूल भूमिका घेण्यात शेख अब्दुल्ला भारताच्याही पुढे एक पाउल होते. जागतिक व्यासपीठावर भारत सरकार काश्मिरी जनतेचा स्वयंनिर्णयाचा हक्क मान्य करीत होते आणि संयुक्त राष्ट्रसंघाची सुरक्षा परिषद सार्वमत घेण्याचा निर्देश देत होती त्यावेळी काश्मिरातील जनतेने आधीच भारताच्या बाजूने कौल दिला आहे त्यामुळे नव्याने सार्वमत घेण्याची गरज नाही हे ठामपणे सांगणारे एकमेव नेते शेख अब्दुल्ला होते. त्यावेळी संयुक्त राष्ट्र संघाच्या व्यासपीठावर शेख अब्दुल्ला यांनी आणखी एक महत्वाची गोष्ट सांगितली होती की पाकिस्तानचा काश्मीरशी काही संबंधच नसल्याने काश्मीरने भारतात राहायचे की पाकिस्तानात यावर सार्वमत घेण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. १९५२ पर्यंत अशा भूमिकेवर ठाम असणाऱ्या शेख अब्दुल्लांना १९५३ मध्ये अटक करून भारत सरकारने काश्मीर समस्येचा पाया घातला. 

१९५२चा दिल्ली करार ते १९५३ मधील शेख अब्दुल्लांची अटक या दरम्यान शेख अब्दुल्लांची भूमिका बदलली का की आणखी काही वेगळी परिस्थिती निर्माण झाली का की ज्यामुळे शेख अब्दुल्लांना अटक करणे भाग पडले या प्रश्नाचे सरळ उत्तर सापडत नाही. पण १९५२ चा दिल्ली करार निमित्त ठरला भारत सरकार आणि शेख अब्दुल्ला यांचे मार्ग वेगळे करण्यासाठी. विशेष म्हणजे हा करार दोहोंच्या पूर्ण संमतीने झाला होता. हा असा करार होता ज्याची खरे तर काहीच आवश्यकता नव्हती. हा करार झाला तेव्हा काश्मीरची संविधान सभा गठीत होवून तिचे कामकाज सुरु झाले होते. भारत आणि काश्मीर यांच्यातील संबंध स्पष्ट आणि निश्चित करणारी सर्वोच्च आधिकारिक संस्था संविधान सभाच असल्याचे भारत सरकार आणि शेख अब्दुल्लाचे एकमत होते. अशावेळी जे काही ठरवायचे ते संविधान सभेला ठरवू द्यावे, संविधान सभेच्या विचारार्थ काही प्रस्ताव द्यायचे असतील तर ते द्यावेत हा मार्ग उपलब्ध असताना भारत सरकार व शेख अब्दुल्लाचे सरकार यांना तातडीने एखादा करार करण्याची काय आवश्यकता होती हा प्रश्न पडतो. अर्थात यात शेख अब्दुल्लांना दोष देता येणार नाही. करार नेहरूंच्या पुढाकाराने झाला. काश्मीरच्या संविधान सभेचे कामकाज सुरु झाल्या नंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणीत संघटनांनी काश्मीर वेगळे होणार असा प्रचार करून देशातील उरल्यासुरल्या धार्मिक सौहार्दाला सुरुंग लावण्याच्या प्रयत्न चालविला होता. त्याला आळा घालण्यासाठी आणि काश्मीर भारतापासून वेगळे होणार नाही हे दाखविण्याच्या उद्देशाशिवाय या कराराची कोणतीही निकड होती असे दिसत नाही. वास्तविक जम्मू-काश्मीरच्या संविधान सभेचे कामकाज सुरु झाले त्यावेळी केलेल्या भाषणात जम्मू-काश्मीरने भारतात राहणे त्याच्या हिताचे आणि गरजेचे असल्याचे प्रतिपादन शेख अब्दुल्लाने करून संविधान सभेच्या कामकाजाची दिशा स्पष्ट केली होती. त्यामुळे वेगळा करार करून हीच गोष्ट पुन्हा दाखवून देण्याची गरज नव्हती.                                                                                                       

संविधान सभेतील शेख अब्दुल्लांच्या प्रतिपादनावर संघप्रणीत संघटनांचा विश्वास नव्हता तो अशा कराराने बसेल असे मानणेच व्यर्थ होते. काश्मीरचा शासक म्हणून शेख अब्दुल्ला असणे त्यांना मान्य होण्यासारखे नव्हते. त्यामुळे काश्मीरच्या सामीलीकरण कराराबाबत आणि त्यावेळी दिलेल्या आश्वासना बाबत जनतेला पूर्ण आणि स्पष्ट माहिती देवून काश्मीरच्या बाबतीत गोंधळ निर्माण करणाऱ्या संघटना व पक्षांचा बंदोबस्त करण्याची गरज होती. ते न करता नेहरूंनी शेख अब्दुल्लाना अटक करून नवे प्रश्न निर्माण केलेत. १९५२ चा करार नेहरूंनी काश्मीरचे नेतृत्व भारतीय राज्यघटना लागू करण्याच्या विरोधी नाही हे विरोधकांना दाखवून देण्यासाठीच केला हे पूर्ण सत्य नाही. नेहरुंना कोणत्याही परिस्थितीत काश्मीर भारताचा अभिन्न हिस्सा असला पाहिजे असे वाटत होते.  याबाबत कोणत्याच शंकेला जागा नको असे वाटण्यातून हा करार जन्माला आला. एकीकडे हा करार अंमलात आणण्याची नेहरुंना झालेली घाई व त्यासाठी त्यांनी वाढविलेला दबावही शेख अब्दुल्लांना असुरक्षित वाटण्यास कारणीभूत ठरला. या असुरक्षिततेतून शेख अब्दुल्लांची नेहरुशी असहकार्याची भूमिका घेतली. या असहाकारातून दोन नेत्यात अविश्वास निर्माण झाला आणि याची परिणती शेख अब्दुल्लांच्या बडतर्फी व अटकेत झाली. अवेळी अनावश्यक करार करण्याची घाई ही नेहरूंची पहिली चूक आणि या कराराची अंमलबजावणी शेख अब्दुल्ला करायला तयार नाहीत म्हणून त्यांना अटक करण्याचे टोकाचे पाउल उचलून दुसरी चूक केली. वास्तविक ज्या परिस्थितीत व ज्या विश्वासाने शेख अब्दुल्ला यांनी भारताची निवड केली ते लक्षात घेता आपण शेख अब्दुल्लांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत हे जगाला आणि देशांतर्गत विरोधकांना दाखविण्याची गरज होती त्यावेळी अटक झाल्याने काश्मीरचे चित्रच पालटले. 
--------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि. यवतमाळ 
मोबाईल : ९४२२१६८१५८ 

Thursday, August 21, 2025

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - १४१

१९५२ च्या दिल्ली कराराद्वारे  देशाचे सार्वभौमत्व व काश्मीरची स्वायत्तता यात सुवर्णमध्य साधण्याचा नेहरूंनी प्रयत्न केला पण घडले उलटेच. या करारालाच स्वायत्ततेचा विरोध करणाऱ्यांनी विरोधाचा मुद्दा बनविला. या विरोधाने शेख अब्दुल्ला विचलीत झाले व कराराच्या पालना बद्दल त्यांच्या द्विधा मन:स्थितीमुळे त्यांचे नेहरू सोबतचे संबंध ताणले गेले. 
----------------------------------------------------------------------------------------  

१९५२ चा दिल्ली करार काश्मीर बाबतीत मैलाचा दगड ठरण्या ऐवजी समस्या निर्मितीचा प्रारंभ ठरला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची राजनीतिक शाखा म्हणून २१ ऑक्टोबर १९५१ रोजी स्थापन झालेल्या जनसंघ पक्षाला या कराराने एक कोलीत आणि कार्यक्रम मिळाला. जनसंघ स्थापन करण्यात श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी पुढाकार घेतला व या कामी त्यांना संघ प्रचारक असलेल्या बलराज मधोक व दीनदयाळ उपाध्याय यांची मदत झाली. जनसंघ स्थापन होण्याच्या आधी बलराज मधोक यांनी जम्मूत प्रजा परिषद नावाची राजकीय संघटना स्थापन केली होती. जम्मू-काश्मीरचे राजा हरीसिंग यांना बळ देण्यासाठी ही संघटना होती. राजा हरीसिंग यांनी भारत किंवा पाकिस्तानात सामील न होता जम्मु आणि काश्मीर स्वतंत्र ठेवून त्यावर राज्य करावे अशी प्रजा परिषदेची इच्छा होती. पण पाकिस्तानने काश्मीर बळकाविण्याच्या इराद्याने पश्तुनी कबाईली काश्मीर मध्ये घुसविल्याने राजा हरीसिंग यांना भारताकडे मदत मागावी लागली व त्यासाठी भारतात सामील होण्याच्या सामीलनाम्यावर स्वाक्षरी करावी लागली. राजा हरीसिंग यांना स्वतंत्र राहता आले नाही तरी काश्मीरवर शेख अब्दुल्लांचे वर्चस्व राहता कामा नये यासाठी बलराज मधोक यांच्या प्रजा परिषदेने कंबर कसली होती. प्रजा परिषदेच्या स्थापनेच्या आधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेने व राजा हरीसिंग यांच्या मदतीने डोग्रा हिंदूंची {राजा हरीसिंग डोग्रा हिंदू होते.} जम्मू-काश्मीर राज्य हिंदू सभा जम्मूत सक्रीय होती. आरेसेसचे जम्मू प्रमुख असलेले प्रेम नाथ डोग्रा जम्मू-काश्मीर हिंदू सभेचे प्रमुख नेते होते. जनसंघ, प्रजा परिषद आणि हिंदू सभा यांचा समान कार्यक्रम म्हणजे कलम ३७० व जम्मू-काश्मीर राज्याच्या स्वायत्ततेला विरोध हा होता.                                                                                                                     

जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी भारताच्या घटना समितीचे सदस्य होते . त्यांनी घटना समितीत कलम ३७० चा अजिबात विरोध केला नव्हता. पण जनसंघाची स्थापना केल्यावर मात्र पक्षाचा कलम ३७० ला विरोध हा मुख्य कार्यक्रम बनला. कलम ३७० मुळे जमू-काश्मीरला स्वायत्तता मिळाली नव्हती. स्वायत्ततेचे मूळ होते राजा हरीसिंग यांनी स्वाक्षरी केलेला सामीलनामा. या सामिलनाम्याचा घटनात्मक स्वीकार कलम ३७० अन्वये करण्यात आला. सामीलनाम्या नंतरच्या घटनांनी स्पष्ट झाले होते की राजा नामधारी असणार आणि राज्याची सारी सूत्रे राज्याचे लोकप्रिय नेते शेख अब्दुल्ला यांच्या हाती असणार. संघ, जनसंघ ,हिंदुसभा आणि प्रजा परिषद यांना हेच नको होते. राजा हरीसिंग यांच्या अधिपत्या खाली स्वतंत्र जमू-काश्मीर राष्ट्र त्यांना चालणार होते पण शेख अब्दुल्लाच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ राज्याचा स्वायत्त घटक असलेले जम्मू-काश्मीर राज्य त्यांना नको होते. त्यामुळे हे सगळे समूह राजा हरीसिंग यांचे समर्थक असताना राजा हरीसिंग यांनी ज्या अटी-शर्तीनिशी भारतात काश्मीर सामील केले त्या अटी -शर्तीचा हे समूह विरोध करू लागले होते. फाळणीमुळे हिंदू-मुस्लीम तणावाच्या पार्श्वभूमीवर शेख अब्दुल्लांना निशाणा बनविणे या समूहासाठी सोपे आणि सोयीचे होते. सामीलनाम्यात निहित स्वायत्तता कायम राहावी यासाठी शेख अब्दुल्ला कमालीचे आग्रही होते. १९५२ च्या दिल्ली कराराने राजा हरीसिंग यांनी केलेल्या सामीलनाम्याचा करार , जो हिंदुत्ववादी संघटनांसाठी गैरसोयीचा व अडचणीचा होता तो बाजूला पडला आणि त्या सामीलनाम्यामुळे नाही तर पंडीत नेहरूंनी हा जो करार केला त्यामुळे काश्मीरचे इतर राज्या पेक्षा वेगळे असे स्थान निर्माण झाल्याचे फसवे चित्र संघ ,जनसंघ, जम्मू-काश्मीर हिंदू सभा आणि प्रजा परिषद यांना निर्माण करता आले. अर्थात हा करार होण्याच्या आधीपासूनच या संघटनांनी व पक्षांनी कलम ३७० व जम्मू-काश्मीरच्या स्वयात्तते विरोधात रान पेटविले होते. याविरुद्ध जम्मूत हिंसक आंदोलनेही झालीत.                                                                               

हा विरोध शमविण्याचा एक भाग म्हणून नेहरूंनी काश्मीरच्या प्रतिनिधीना दिल्लीत बोलावून त्यांच्याशी चर्चा करून हा करार घडवून आणला होता.  काय होईल हा त्यांना प्रश्न पडला. परिणामी त्यांनी १९५२ चा करार अंमलात आणण्यास टाळाभारताचे सार्वभौमत्व व काश्मीरची स्वायत्तता यात सुवर्णमध्य साधण्याचा या कराराद्वारे नेहरूंनी प्रयत्न केला पण घडले उलटेच. या करारालाच स्वायत्ततेचा विरोध करणाऱ्यांनी विरोधाचा मुद्दा बनविला. या विरोधाने शेख अब्दुल्ला विचलीत झाले.  पंडीत नेहरू स्वतंत्र भारताचे सर्वोच्च व सर्वाधिक लोकप्रिय नेते असताना त्यांनी केलेल्या कराराला व काश्मीरच्या स्वायत्ततेला विरोध होत असेल तर नेहरू नंतरटाळ सुरु केली. यातून नेहरू आणि शेख अब्दुल्ला यांचे संबंध ताणले गेले. नेहरूंचे म्हणणे होते की काश्मीरच्या नेत्यांनी जे मागितले ते आम्ही दिले. मग त्या करारात आम्हाला अपेक्षित असलेल्या बाबींची शेख अब्दुल्लाने पूर्ती करायला हवी. वास्तविक या करारामुळे जम्मू-काश्मीरला काहीही वेगळे मिळाले नव्हते. यात शेख अब्दुल्लांच्या इच्छे प्रमाणे एकच गोष्ट झाली. राज्याचे प्रमुख राजा-महाराजा असू नयेत तर विधानसभेने निवडलेला व्यक्ती त्या जागी असावा आणि त्याला महाराजा ऐवजी सादर- ए - रियासत हे नामाभिधान असावे या त्यांच्या म्हणण्याला करारात मान्यता देण्यात आली.


काश्मीरमध्ये आधीपासूनच पंतप्रधान पद होते. त्यामुळे या करारामुळे काश्मीरच्या मुख्यमंत्र्याचे नामाभिधान पंतप्रधान झाले असे म्हणणे चुकीचे आहे. तीच बाब काश्मीरच्या ध्वजाची आहे. काश्मीरचे पंतप्रधानपद किंवा काश्मीरचा ध्वज सामिलीकरणाच्या अटी व शर्तीनुसार कायम राहणार होता. १९५२ च्या कराराने या गोष्टी त्यांना मिळाल्या हा मोठा गैरसमज आहे. उलट या कराराने जम्मू-काश्मीर मध्ये जिथे जिथे राज्याचा ध्वज तिथे तिथे भारतीय राष्ट्रध्वज फडकणे अनिर्वाय झाले. काश्मीरचे सदर ए रियासत पद , पंतप्रधानपद आणि काश्मीरमध्ये काश्मीरचा ध्वज या करारामुळे मिळाला असा अपप्रचार करत त्याविरुद्ध उपरोक्त संघटनांनी काहूर उठवले. ज्यांना शांत करण्यासाठी नेहरूंनी हा करार करण्याची घाई केली तेच या कराराने अधिक चेकाळले. या करारा विरुद्धच्या आंदोलनाचा भाग म्हणून जनसंघ प्रमुख श्यामाप्रसाद मुखर्जी बंदीहुकूम मोडून जम्मू-काश्मीर राज्यात गेले .तिथे त्यांना अटक झाली. अटकेत असताना त्यांचा आजार बळावला व त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे परिस्थिती अधिकच चिघळली. दुसरीकडे हिंदुत्ववाद्यांच्या विरोधामुळे  १९५२ चा करार शेख अब्दुल्ला अंमलात आणण्यास इच्छुक आणि उत्सुक नसल्याने पक्षांतर्गत नेहरू यांचेवर दबाव वाढला. जो पर्यंत नेहरू आणि शेख अब्दुल्लात सख्य होते तो पर्यंत अब्दुल्लांच्या विरोधात उघडपणे कॉंग्रेसनेते बोलत नव्हते. कॉंग्रेसमध्येही असे अनेक नेते होते ज्यांच्यावर हिंदुत्वाचा पगडा होता. नेहरू-अब्दुल्ला संबंधात तणाव निर्माण झाल्यावर त्यांनी दिल्लीत शेख अब्दुल्ला विरुद्ध वातावरण तयार केले. शेख अब्दुल्लाना पदावरून बडतर्फ करण्यात आले आणि त्यांना स्थानबद्ध करण्यात आले. काश्मीर समस्येची ही सुरुवात आहे ज्याचे अपश्रेय अशाप्रकारे पंडीत नेहरूंकडे जाते. 

 -----------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव
पांढरकवडा जि. यवतमाळ
मोबाईल : ९४२२१६८१५८ 

Thursday, August 14, 2025

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - १४०

 काश्मीर भारताचा भाग बनला या परिस्थितीत बदल होण्याची सुतराम शक्यता नाही हे स्पष्ट असताना देशात काश्मीरच्या सामिलीकरणाला वादग्रस्त बनविण्याचे काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ , जनसंघ आणि जम्मू-काश्मीरची प्रजा परिषद यांनी केले.
----------------------------------------------------------------------------------------


फाळणीची अधिकृत घोषणा होण्याच्या आधीपासून पंडीत नेहरूंची नजर काश्मीरवर होती. फाळणी आधीच काश्मीर बाबत लॉर्ड माउंटबॅटन यांचेशी नेहरूंची चर्चा झाल्याच्या नोंदी आहेत. फाळणीची रेषा आखताना मुस्लीम बहुल गुरुदासपूर भारतात आले हा योगायोग नव्हता. गुरुदासपूर भारताकडे आलें नसते तर काश्मीरशी भारताचा संबंध तेव्हाच तुटला असता. काश्मीर मध्ये पाकिस्तानने कबाइली आणि कबाइलीच्या वेषात आपले सैन्य घुसविल्यामुळे तळ्यात मळ्यात करणाऱ्या राजा हरीसिंग यांना भारताकडे मदतीची याचना करावी लागली व मदत मिळविण्यासाठी सामीलनाम्यावर सही करावी लागली. हे सगळे घाईगडबडीत झाल्याने सामीलनामा अंतिम मानण्यात येवू नये व काश्मीरचे भवितव्य सार्वमताने ठरवावे अशी भूमिका लॉर्ड माउंटबॅटन यांनी घेतली व ती त्यावेळच्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या गळी उतरविली आणि काश्मीरचे भारतात सामीलीकरण स्विकारताना काश्मिरातील परिस्थिती सामान्य झाल्यावर तिथली जनता सार्वमताने काश्मीरचे भवितव्य निश्चित करील असे पत्र राजा हरीसिंग यांना दिले. हे पत्र काश्मीर समस्येच्या मुळाशी आहे असा भ्रम आहे. युनोच्या ठरावातील अटींचे पालन करून सार्वमत शक्य होते पण पाकिस्तानने त्यातून काढता पाय घेतला व सार्वमताचा प्रश्न मागे पडला. नेहरू जाहीरपणे सार्वमताशी बांधिलकी व्यक्त करत होते तरी पाकिस्तानने जी परिस्थिती निर्माण केली त्यात सार्वमत शक्य नाही या निष्कर्षाप्रत नेहरू आले होते.                                                                                               

काश्मीरचे भवितव्य निश्चित करण्या संबंधीचे जे टिपण नेहरूंनी २५ ऑगस्ट १९५२ रोजी शेख अब्दुल्लांना पाठविले त्यात त्यांनी हा निष्कर्ष स्पष्टपणे मांडला होता. शेख अब्दुल्ला तर त्याच्याही पुढे एक पाउल होते. १९५१ साली जम्मू-काश्मीर राज्यात निवडणूक होवून राज्याची घटना समिती बनली त्या समितीच्या उदघाटन भाषणात शेख अब्दुल्लांनी स्पष्टपणे सांगितले होते की काश्मिरात सार्वमत घेण्याची गरजच नाही.ही जी निवडून आलेली घटना समिती आहे त्यातून लोकेच्छा प्रकट झाली आहे व ही घटना समितीच काश्मीरचे भवितव्य ठरविण्यास अधिकार पात्र आहे. जम्मू-काश्मीरची घटना समिती जो निर्णय घेईल तो मान्य करण्यास भारत बांधील असल्याचे नेहरूंनीही १९५२ च्या शेख अब्दुल्लांना पाठविलेल्या टिपणात नमूद केले होते. शेख अब्दुल्लाच्या जम्मू-काश्मीर घटना समिती समोर केलेल्या भाषणात आणि नेहरूंच्या टिपणात आणखी एक महत्वाचे साम्य आहे.शेख अब्दुल्लांनी म्हंटले होते की आम्ही भारताची निवड केली आहे आणि भारता अंतर्गत काश्मीर राहील पण ते स्वायत्त असेल. भारतीय राज्यघटनेतील कलम ३७० नूसार भारत आणि काश्मीरचे संबंध असतील. या संविधान सभेचे पहिले काम काश्मीरच्या भारता सोबतच्या झालेल्या सामीलीकरण करारावर शिक्कामोर्तब करणे असणार आहे. पंडीत नेहरूंनी देखील आपल्या टिपणात भारता अंतर्गत काश्मीर स्वायत्त राज्य असेल हे नमूद केले होते. त्यामुळे १९५२ पर्यंत काश्मीरच्या भवितव्या बद्दल आणि भारताशी काश्मीरचे संबंध कसे असतील याबाबत पंडीत नेहरू आणि शेख अब्दुल्ला यांच्यात एकवाक्यता होती.                                                                                                           

१९५० साली राज्यघटना देशात लागू झाली तेव्हा कलम ३७० मुळे भारताच्या राष्ट्रापतीचे अधिकार क्षेत्र काश्मीर पर्यंत विस्तारले होते आणि कलम ३७० च्या माध्यमातून घटनेच्या कलम १ मध्ये नमूद संघराज्याच्या यादीत जम्मु आणि काश्मीर राज्याचा समावेश झाला होता. सार्वमत घेण्यासारखी परिस्थिती नव्हती, शेख अब्दुल्लांचाही सार्वमताचा आग्रह नव्हता ,उलट विरोधच होता आणि जम्मू-काश्मीर राज्याची घटना समिती सामीलीकरण करारावर शिक्कामोर्तब करणार हे निश्चित होते . काश्मीर भारताचा भाग बनला या परिस्थितीत बदल होण्याची सुतराम शक्यता नाही हे स्पष्ट असताना देशात काश्मीरच्या सामिलीकरणाला वादग्रस्त बनविण्याचे काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ , जनसंघ आणि जम्मू-काश्मीरची प्रजा परिषद यांनी केले. हिंदुत्ववादी संघटनांनी आधी काश्मीरने भारतात सामील न होता राजा हरीसिंग यांनी स्वतंत्र काश्मीर राज्याची घोषणा करावी यासाठी प्रयत्न केला होता. पाकिस्तानच्या आक्रमणाने तो प्रयत्न फसला आणि राजा हरीसिंग यांना काश्मीर भारतात सामील करणे भाग पडले. काश्मीर भारतात सामील झाल्याने राजा हरीसिंग नामधारी बनले आणि जनतेचे नेते म्हणून काश्मीरची सारी सूत्रे शेख अब्दुल्ला यांचेकडे आली. या परिस्थितीशी जुळवून घेणे जम्मूतील अनेक वर्षे राज्यकर्ता राहिलेल्या डोग्रा हिंदुना आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शक्य नव्हते. त्यात शेख अब्दुल्लांनी जमीन सुधारणा कायद्याची जमीन मालकांना कोणताही मोबदला न देता कडक अंमलबजावणी केली.                                                                       

जमीनदारात बहुसंख्य डोग्रा समाजाचा समावेश असल्याने त्यांना शेख अब्दुल्लाचा निर्णय रुचला आणि पचला नाही. म्हणून ते शेख अब्दुल्लाच्या विरोधात उभे राहिले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला प्रिय असलेले राजा हरीसिंग यांचे शेख अब्दुल्ला हे कट्टर विरोधक होते. शेख अब्दुल्लांचे महत्व स्वीकारणे संघाला जड जात होते. शेख अब्दुल्लांनी जम्मू-काश्मीर घटना समिती समोर केलेल्या पहिल्या भाषणात भविष्यातील काश्मीर धर्मनिरपेक्ष, समाजवादी आणि लोकशाहीवादी असणार असल्याचे स्पष्ट केले होते. संघाला मान्य नसलेल्या या मुल्यांचा पुरस्कार दिल्लीतील सत्ताधारीही करत होते. दिल्ली आणि श्रीनगर मधील सत्ताधाऱ्याना अडचणीत आणण्यासाठी काश्मीरच्या स्वायत्ततेच्या मुद्द्याला वादग्रस्त बनविण्याचा चंग आरेसेसने बांधला. शेख अब्दुल्लांना स्वतंत्र निर्णय घेता येवू नये यासाठी त्यांचा काश्मीरच्या स्वायत्ततेला विरोध होता. हिंदुत्ववादी संघटनांनी राष्ट्रपतीला निवेदन देवून जम्मू-काश्मीरच्या स्वायत्ततेला विरोध दर्शविला. स्वायत्तता विरोधी वातावरण निर्मिती सुरु केली. दुसरीकडे कॉंग्रेसमध्ये देखील काश्मीरच्या स्वायत्त दर्जाला विरोध करणारे अनेक नेते होते. त्यांचाही दबाव नेहरूंवर होता. तत्व म्हणून काश्मीरचे भवितव्य काश्मीरच्या जनतेने आणि पर्यायाने जनतेने निवडलेल्या घटना समितीने ठरवायला त्यांची मान्यता असली तरी आंतरराष्ट्रीय राजकारण लक्षात घेता काश्मीर भारतासाठी महत्वाचे असल्याने तेथील जनतेने नाराज होवून दूर जाण्याचा विचार करता कामा नये असे नेहरुंना वाटत होते. स्वायत्ततेच्या विरोधकांना व स्वायत्ततेच्या समर्थकांना शांत करण्यासाठी पंडीत नेहरूंनी काश्मीरच्या प्रतिनिधी सोबत एक करार केला. हा करार १९५२ चा दिल्ली करार म्हणून ओळखला जातो. या करारानंतर काश्मीर मुद्दा शांत होण्या ऐवजी जास्त तीव्र बनला. कराराचा उद्देश्य काश्मीरचे विलीनीकरण व काश्मीरची स्वायत्तता यात संतुलन राखण्याचा होता. चांगल्या उद्देश्याने केलेला हा करार काश्मीर समस्येच्या निर्मितीला निमित्त ठरला. 

------------------------------------------------------------------------------ 

सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि. यवतमाळ 
मोबाईल : ९४२२१६८१५८ 

Friday, August 8, 2025

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - १३९

 सार्वमताला अनुकुलते पासून सुरु झालेला काश्मीरचा धोरणात्मक प्रवास सार्वमताच्या प्रतिकुलतेत रुपांतरीत होण्यास आमची धोरणेच कारणीभूत ठरली आहे. याची सुरुवात नेहरू काळापासून झाली आणि ती खुद्द पंडीत नेहरूंनी केली. 
------------------------------------------------------------------------------------------


युनो मध्ये काश्मीर विषय नेल्याने आपले कोणतेही नुकसान झालेले नाही. त्यावेळी युनोने केलेला ठराव पाकिस्तानला प्रतिकूल वाटल्याने पाकिस्तानने ठरावाची अंमलबजावणी करण्याचे टाळल्याने सार्वमताची पहाट उजाडली नाही. त्यावेळी काश्मिरी जनतेचे लोकप्रिय नेते शेख अब्दुल्ला भारता सोबत असल्याने भारताला काश्मीर प्रश्नावर सार्वमत घेतले तर आपलीच सरशी होईल असा विश्वास होता. पाकिस्तानला सार्वमत जिंकण्याचा विश्वास नसल्याने युनोच्या ठरावानुसार सार्वमत घेण्यासाठी युनोच्या ठरावातील पूर्वअटींची पूर्तता पाकिस्तानने केली नाही. सार्वमतात खोडा कोणी घातला असेल तर पाकिस्तानने. आज भारत सरकारने काश्मीरमध्ये सार्वमत घेण्याची मागणी देशद्रोही ठरविली आहे. वास्तविक त्याची गरज नव्हती. काश्मीरमध्ये सार्वमत होवू शकले नाही याला सर्वस्वी पाकिस्तान जबाबदार आहे ही वस्तुस्थिती काश्मिरी जनतेच्या नंतरच्या पिढीला पटवून देण्यात कमी पडल्याने सार्वमताच्या मागणीला देशद्रोह ठरविण्याची पाळी आली. काश्मीर भारतात सामील झाल्यानंतर ५ वर्षेपर्यंत देशात आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर सार्वमताने काश्मीरचे भवितव्य ठरविण्याचा वेळोवेळी पुनरुच्चार केला होता. आज मात्र काश्मीरमधून सार्वमत घेण्याची मागणी आमच्यासाठी अडचणीची ठरली आणि अशी मागणी देशद्रोही ठरविण्याची पाळी आमच्यावर आली.         

सार्वमताला अनुकुलते पासून सुरु झालेला काश्मीरचा धोरणात्मक प्रवास सार्वमताच्या प्रतिकुलतेत रुपांतरीत होण्यास आमची धोरणेच कारणीभूत ठरली आहे. याची सुरुवात नेहरू काळापासून झाली आणि ती खुद्द पंडीत नेहरूंनी केली. काश्मीरच्या भारतात सामिलीकरणाने आम्हाला आनंद झाला. सामिलीकरणाच्या अटी आणि शर्ती आम्ही मान्यही केल्या आणि देशांतर्गत राजकारणाच्या परिणामी त्या अटी व शर्ती आम्हाला नकोशा झाल्यात आणि त्याच्या उल्लंघनाची सुरुवात आम्हीच केली. मोदी सरकारचा कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय आणि त्यावर सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब हे त्यावेळच्या अटी आणि शर्तीचे उघडे नागडे उल्लंघन वाटत असले तरी हे निर्णय शवपेटी वर ठोकलेल्या शेवटच्या खिळ्या सारखे आहे. सामिलीकरणाच्या अटी व शर्तीची शवपेटिका तयार करण्याचे काम नेहरू काळात सुरु झाले आणि ही शवपेटिका तयार करतानाचा पहिला खिळा पहिले पंतप्रधान पंडीत नेहरूंनी ठोकला. नंतरच्या सर्व पंतप्रधानांनी आपापले योगदान देत शवपेटिकेचे काम पूर्ण केले आणि पंतप्रधान मोदींनी या शवपेटिकेवर शेवटचा खिळा ठोकला. 

सामिलीकरणाच्या वेळी जे ठरले त्याचे पालन न करण्यातून काश्मीर प्रश्न निर्माण झाला हे जनतेला समजत नाही आणि राज्यकर्त्यांना समजत असले तरी मान्य करण्याचे व मांडण्याचे धाडस त्यांचेकडे नाही. भौगोलिक आणि लोकसंख्येचे निकष हे काश्मीर भारतात सामील होण्यास प्रतिकूल असतानाही काश्मीर भारतात सामील झाले ते पंडीत नेहरू आणि शेख अब्दुल्लाची तशी इच्छा होती म्हणून. दोघांची इच्छा फार मोठा संघर्ष न करता  पूर्ण झाली ती पाकिस्तानने केलेल्या आगळीकीमुळे. काश्मीरचा राजा हरीसिंग यांची तर स्वतंत्र राहण्याची इच्छा होती आणि या इच्छेला सावरकर आणि आरेसेस यांनी खतपाणी घातले होते. पाकिस्तानने आक्रमण केल्याने राजा हरीसिंग यांना हतबल होवून भारताची मदत मागावी लागली. पाकिस्तानने आक्रमण केल्यानंतरही त्यांची इच्छा स्वतंत्र राहण्याचीच होती पण भारतात सामील झाल्याशिवाय भारत सैनिकी मदत करणार नाही हे स्पष्ट झाल्यावर राजा हरीसिंग यांनी सामिलीकरणाच्या दस्तावेजावर हस्ताक्षर केले. राजापासून स्वातंत्र्य मिळविण्याच्या चळवळीचे नेते म्हणून शेख अब्दुल्ला ओळखले जात. त्यांना सुद्धा काश्मीर स्वत:च्या कल्पनेप्रमाणे घडवायचा होता. गांधी-नेहरूच्या विचाराने ते प्रभावित होते आणि म्हणून त्यांचा कल भारताकडे होता. या मागे दोन कारणे होती. ज्या प्रकारचा काश्मीर शेख अब्दुल्लांना घडवायचा होता ते भारतात राहूनच शक्य होते. भारतातील मुस्लीम सरंजामदार व जमिनदारांनी पाकिस्तान पसंत केले होते आणि ज्या जामीन सुधारणा शेख अब्दुल्लांना राबवायच्या होत्या त्याला पाकिस्तानात विरोध झाला असता. भारतात सामील झालो नाही तर पाकिस्तान आपला घास घेईल ही भीती असल्याने शेख अब्दुल्लांचा कल भारतात सामील होण्याकडे होता.                                                                                         

काश्मीर स्वतंत्र राहणे व्यावहारिक नसल्याने शेख अब्दुल्लाने स्वतंत्र काश्मीरचा पुरस्कार केला नाही पण भारता अंतर्गत त्यांना पूर्ण स्वायत्तता हवी होती. सामिलीकरणाच्या अटी व शर्ती लक्षात घेता त्यांना हवी असलेली स्वायत्तता भारतात मिळण्याची शाश्वती होती आणि पंतप्रधान नेहरू यांचेवर पूर्ण विश्वास असल्याने शेख अब्दुल्लाने काश्मीरचे सामीलीकरण पाकिस्तान ऐवजी भारतात होण्यासाठी पुढाकार घेतला. भारतात इतर राज्यासारखे एक राज्य म्हणून काश्मीर राहील हे कधीच त्यांच्या मनात नव्हते. भारता अंतर्गत अधिकतम स्वायत्तता हीच त्यांची इच्छा आणि लक्ष्य होते. काश्मिरी जनतेला आपल्या इच्छेप्रमाणे निर्णय घेण्याचा अधिकार त्यावेळी मान्य करण्यात आला. सामिलीकरणा सोबत विलीनीकरणाचा आग्रह इतर राज्यांच्या बाबतीत धरला होता तसा काश्मीर बाबतीत भारताने धरला नाही आणि तसा आग्रह धरण्याची परिस्थिती देखील नव्हती.   

 हा प्रश्न सर्वस्वी काश्मिरी जनतेच्या इच्छेवर सोडण्यात आला आणि त्यामुळेच भारतात सामील होण्याला काश्मिरी जनतेचा विशेषत्वाने काश्मिरी मुसलमानांचा विरोध झाला नाही. काश्मीरचे भवितव्य तेथील जनता ठरवील या भारताने दिलेल्या वचनाची घटनात्मक अभिव्यक्ती म्हणून घटनेत कलम ३७० आले. असे अभिवचन देतांना नेहरू आणि इतर भारतीय नेत्यांना मात्र मनापासून काश्मीर इतर राज्या सारखाच भारताचा भाग बनावा ही इच्छा होती व कालांतराने तसे होईल ही खात्रीही होती. भारतीय नेत्यांची ही इच्छा आणि भारता अंतर्गत स्वायत्त राहण्याचा काश्मिरी जनतेचे नेते शेख अब्दुल्ला यांचा आग्रह यातून काश्मीर प्रश्नाची निर्मिती झाली. शेख अब्दुल्लांना काश्मीरच्या संविधानानुसार काश्मीरचा राज्यकारभार करायचा होता तर भारताला विशेषत: नेहरुंना भारतीय संविधान काश्मीर मध्ये लागू करण्याची घाई झाली होती. पूर्ण संविधान नाही पण किमान महत्वाच्या तरतुदी लागू व्हाव्यात यासाठी भारत सरकारचे प्रतिनिधी आणि काश्मीर सरकारचे प्रतिनिधी यांच्यात चर्चा होवून १९५२ चा नवी दिल्ली करार मान्य करण्यात आला. भारताच्या सोयीच्या आणि हिताच्या या कराराला भारतातातील हिंदुत्ववाद्यांनी केलेल्या तीव्र विरोधाचा परिणाम शेख अब्दुल्ला यांच्या बिथरण्यात झाला.  

-------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि.यवतमाळ 
मोबाईल : ९४२२१६८१५८ 

Friday, August 1, 2025

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - १३८

 पंडीत नेहरू यांच्या प्रयत्नाने काश्मीर भारतात सामील झाला हे जितके सत्य आहे तितकेच हेही सत्य आहे की स्वातंत्र्यापासून ज्या काश्मीर समस्येने भारताचा पिच्छा सोडला नाही त्या काश्मीर समस्येचा पाया पंडीत नेहरूंनीच घातला.
------------------------------------------------------------------------------------

 
कलम ३७० रद्द केल्याने काश्मीर प्रश्न संपला किंवा सुटला हा काश्मिरेतर भारतीयांचा भ्रम पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याने बऱ्याच अंशी दूर झाला पण असा दहशतवादी हल्ला प्रश्न संपला की नाही याचा मापदंड असू शकत नाही. हा हल्ला कलम ३७० शी निगडीत नाही. कधीही आणि कोणत्याही दहशतवादी गटाने किंवा संघटनेने कलम ३७० च्या पुनर्स्थापनेची मागणी केलेली नाही. काश्मीरखोऱ्यातील जनतेची ती मागणी आहे आणि त्यांनी विधानसभेसाठी झालेल्या निवडणुकीतून प्रकट केली आहे. स्वातंत्र्यानंतर काश्मिरातील घडामोडीचा जो आढावा इथे घेतला आहे त्यातून एक गोष्ट स्पष्ट होते की कलम ३७० मधील नमूद प्रक्रियेचा उपयोग करून पंडीत नेहरू पासून नरेंद्र मोदी पर्यंतच्या केंद्रातील सरकारने स्वत: मान्य केलेल्या काश्मीरच्या स्वायत्ततेचा गळा घोटण्यातून काश्मीर प्रश्न निर्माण झाला. पंडीत नेहरू यांच्या प्रयत्नाने काश्मीर भारतात सामील झाला हे जितके सत्य आहे तितकेच हेही सत्य आहे की स्वातंत्र्यापासून ज्या काश्मीर समस्येने भारताचा पिच्छा सोडला नाही त्या काश्मीर समस्येचा पाया पंडीत नेहरूंनीच घातला. काश्मीर बाबत ज्या करणासाठी संघ,जनसंघ किंवा भारतीय जनता पार्टी नेहरुंना सातत्याने दोष देत आली त्या बाबतीत पंडीत नेहरू पूर्णपणे निर्दोष आहेत. नेहरूंनी काश्मीरचे भवितव्य निश्चित करण्यासाठी सार्वमताला मान्यता दिली, काश्मीरचा प्रश्न संयुक्त राष्ट्र संघात नेला , पाकव्याप्त काश्मीर न घेताच शस्त्रसंधी केली आणि कलम ३७० चे निर्माता नेहरू आहेत आणि यातून काश्मीरचा प्रश्न निर्माण झाला आणि याला सर्वस्वी नेहरू जबाबदार ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व त्याच्या राजकीय शाखेचे म्हणजे जनसंघ-भारतीय जनता पार्टीचे मत. १९५२ पासून ते वर्तमान काळापर्यंत हिरीरीने आणि चिकाटीने ही मंडळी असे मत मांडत आली आहे. याला प्रत्युत्तर देण्याच्या भानगडीत कॉंग्रेस मागे राहिल्याने सर्वसामान्य जनताही या मताची बनत गेली. नेहरू संघ परिवार म्हणतो त्या कोणत्याही बाबतीत दोषी नाहीत आणि तरीही त्यांनी काश्मीर समस्येचा पाया घातला तो कसा हे नीट समजून घेतले तर काश्मीरची नेमकी समस्या आपल्या लक्षात येईल.                                                   

काश्मीर प्रश्न संयुक्त राष्ट्रात नेण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय असला तरी त्यात प्रमुख भूमिका नेहरूंची होती हे खरे. काश्मीरवर व पर्यायाने भारतावर पाकिस्तानने आक्रमण केले आहे आणि त्या बाबतीत पाकिस्तानला दोषी ठरवून आपल्या हद्दीत परत जाण्याचा आदेश द्या अशी तक्रारवजा मागणी भारताने संयुक्त राष्ट्राकडे केली. भारताने संयुक्त राष्ट्राकडे न जाता पाकिस्तानने ताब्यात घेतलेला भाग जिंकून घ्यायला हवा होता असा संघ परिवाराने निर्माण केलेला मतप्रवाह आहे. असे म्हणण्यामागे भारताने युद्ध थांबवून संयुक्त राष्ट्राकडे धाव घेतली असा समज या मागे आहे जो खरा नाही. भारत संयुक्त राष्ट्रात गेला तरी काश्मिरात युद्ध चालूच होते. राजा हरीसिंग यांनी काश्मीर भारतात सामील करण्याच्या सामीलनाम्यावर सही करेपर्यंत [२६ ऑक्टोबर १९४७] पाकिस्तानी घुसखोर श्रीनगरच्या सीमेजवळ पोचले होते. भारतीय सैन्य दुसऱ्या दिवशी श्रीनगरला उतरले आणि घूसखोरा विरुद्ध लढाई सुरु केली. ही लढाई सुरु असताना भारताने १ जानेवारी १९४८ रोजी पाकिस्तानी आक्रमणा विरुद्ध तक्रार नोंदविली. तक्रार नोंदविल्या नंतरही युद्ध सुरूच ठेवले. भारताच्या तक्रारीवर संयुक्त राष्ट्र संघाने ४ महिन्या नंतर निर्णय घेत ठराव केला. या ठरावात तेच होते ज्याची मागणी भारताने केली होती. संयुक्त राष्ट्र संघाने पाकिस्तानला सर्व घुसखोरांना व आपल्या सैन्याला परत घ्यायला सांगितले तर भारताने गरजेपुरते सैन्य काश्मीरमध्ये ठेवून अतिरिक्त सैन्य परत घ्यायला सांगितले. याचा अर्थ स्पष्ट आहे संयुक्त राष्ट्रसंघाने भारताची तक्रार खरी मानून पाकिस्तानला आक्रमक ठरवले आणि परत जायला सांगितले. ठरावातला दुसरा मुद्दा होता काश्मीरच्या जनतेला भारतात राहायचे की पाकिस्तानात याचा निर्णय घेण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाच्या देखरेखीखाली सार्वमत घेण्याचा. भारताने तर सामिलीकरणाच्या वेळीच सार्वमत घेण्याचे मान्य केले होते त्यामुळे या मुद्द्यावरही भारताच्या म्हणण्यानुसार निर्णय झाला. मग संयुक्त राष्ट्र संघात भारता विरोधात कोणताच निर्णय झाला नसताना संयुक्त राष्ट्रसंघात जाण्याची चूक झाली असे कसे म्हणता येईल.                                                                                                                   
भारत संयुक्त राष्ट्र संघात जाण्याआधी दोन महिने युद्ध सुरु होते, संयुक्त राष्ट्र संघाचा ठराव ४ महिन्यानंतर झाला तेव्हाही युद्ध चालूच होते आणि हा ठराव झाल्या नंतरही तब्बल ९ महिने युद्ध चालू होते! श्रीनगर पर्यंत आलेल्या पाकिस्तानी घुसखोर आणि सैनिकांना मागे ढकलत भारतीय सेनेने दोन तृतीयांश भागावर कब्जा मिळविला. मोठा भूभाग पाकिस्तानच्या ताब्यातून परत मिळविल्या नंतर हवामान व भौगोलिक परिस्थितीमुळे पुढे जाण्यात अडथळा निर्माण झाला होता. दोन दिवस नेहरूंनी युद्धविराम टाळला असता तर पाकव्याप्त काश्मीर भारताच्या ताब्यात आला असता हा निव्वळ अपप्रचार आहे. पाकिस्तान विरूद्धचे १९६५ चे युद्ध १७ दिवस आणि १९७१ चे युद्ध १३ दिवस चालले हे लक्षात घेतले तर अत्यल्प संसाधने असताना १५ महिने युद्ध चालल्याने त्यावेळच्या परिस्थितीत किती ताण आला असेल याची कल्पना येईल. संयुक्त राष्ट्र संघाने ऑगस्ट १९४८ मध्ये आपल्या मूळ ठरावाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने भारत आणि पाकिस्तानशी चर्चा केली. दोन्ही देशांनी सार्वमत घेवून काश्मीर प्रश्न सोडवायला मान्यता दिल्याने युद्ध चालू ठेवणे शहाणपणाचे नव्हते म्हणून भारताने शस्त्रसंधी स्वीकारली. पुढे पाकिस्ताननेच सैन्य मागे घेण्यास नकार दिल्याने सार्वमत घेता आले नाही. या सगळ्या प्रकरणात भारताची कोणती चूक झाली असेल तर ती ही होती की संयुक्त राष्ट्र संघाचा तो ठराव अंमलात यावा यासाठी भारताकडून विशेष प्रयत्न झाले नाहीत. संयुक्त राष्ट्र संघात अमेरिका व इंग्लंडची त्यावेळची दादागिरी बघून पंडीत नेहरूंचा संयुक्त राष्ट्र संघा बद्दल मोह्भंग झाला व आपण उगीच संयुक्त राष्ट्राचे दार ठोठावले अशी त्यांची भावना झाली होती. असे असले तरी  संयुक्त राष्ट्र संघात गेल्यामुळे कुठलाही आपल्या हिताच्या विपरीत निर्णय आपल्याला मान्य करावा लागलेला नाही. उलट आपल्याला पाहिजे तसा ठराव संयुक्त राष्ट्र संघाने केला .आधी त्या ठरावाला पाकिस्तानने मान्यता दिली पण नंतर अंमलबजावणी करण्याचे टाळले. त्यामुळे संयुक्त राष्ट्र संघात जाण्याचा भारताला फारसा फायदा झाला नाही असे म्हणता येईल. पण गेल्याने तोटा झाला असे म्हणायला काहीच आधार नाही. संयुक्त राष्ट संघात जाणे हे पाकिस्तानला आक्रमक ठरवून त्याला मागे जाण्याचा आदेश देण्याच्या मर्यादे पर्यंत होते. ज्याला काश्मीर प्रश्न म्हणतो तो सोडविण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाला मध्यस्थी करण्यास तेव्हा किंवा नंतर कधीही भारताकडून सांगण्यात आले नाही किंवा मध्यस्थी स्वीकारण्यात आली नाही. संयुक्त राष्ट्र संघात जाण्याने आपला कोणताही तोटा झाला नसताना नेहरुंना दुषणे देणे चुकीचे आहे. पण नंतर जे नेहरूंनी केले त्यातून काश्मीर प्रश्न निर्माण झाला. 


------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि. यवतमाळ 
मोबाईल - ९४२२१६८१५८ 

Friday, July 25, 2025

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - १३७

 

काश्मीर समस्येचे मूळ कलम ३७० मध्ये नसून काश्मीर समस्येचे समाधान कलम ३७० मध्ये आहे हे जो पर्यंत आपण समजून घेत नाही तो पर्यंत काश्मीर प्रश्न आपल्याला चकवा देत राहणार आहे. 
----------------------------------------------------------------------------------------


केंद्र सरकार कलम ३७० रद्द करून काश्मीर प्रश्न सोडविल्याचा दावा आणि कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयाचे काश्मिरी जनतेने स्वागत केल्याचा किंवा तो निर्णय स्वीकारल्याचा केलेला दावा काश्मीर खोऱ्यातील परिस्थितीशी मेळ खाणारा नसल्याचे आपण बघितले. काश्मीर समस्येच्या मुळाशी कलम ३७० आहे आणि ते का एकदा रद्द केले की समस्या संपेल ही धारणा जनसंघ, संघ आणि भारतीय जनता पक्ष यांची प्रारंभापासून राहिली आहे. त्यामुळे त्यांच्या दृष्टीने जी समस्या होती ती त्यांनी निकालात काढली आणि त्यांच्या दृष्टीने त्यांनी काश्मीर प्रश्न संपविला. हे फक्त त्यांचेच म्हणणे आहे असे नाही. काश्मिरेतर भारतीय जनतेचे सर्वसाधारणपणे तेच मानणे आणि म्हणणे आहे. कारण भारतीय जनता स्वातंत्र्य मिळाले तेव्हापासून काश्मीर बाबत जो प्रचार करत आली त्याचा बळी ठरली आहे. त्या प्रचाराला कधी कोणी समर्थपणे आणि सातत्याने उत्तर न दिल्याने संघपरिवाराचा एकतर्फी प्रचार खोलवर बिंबला गेल्याचा हा परिणाम आहे. सर्वसामान्यच नाही तर अभिजनही या प्रचाराला बळी पडले आहेत. याचा अस्सल पुरावा म्हणजे कलम ३७० रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयाची सर्वोच्च न्यायालयाने केलेली पाठराखण आहे. १९४७ पासून संघपरिवाराचा असा प्रचार एकीकडे आणि दुसरीकडे  १९४७ पासून देशात जी सरकारे आली त्यांनी काश्मीर प्रश्न सोडविण्याचा केलेला प्रयत्न बघितला तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार वगळता कोणत्याही सरकारने कलम ३७० ला काश्मीर समस्येचे मूळ मानले नव्हते हे लक्षात येईल. ही फक्त कॉंग्रेसचीच सरकारे नव्हती तर कॉंग्रेसेतर मोरारजी देसाई यांचे सरकार , चंद्रशेखर, देवेगौडा पासून व्हि.पी. सिंगचे सरकार आणि दस्तुरखुद्द अटलबिहारी बाजपेयी यांचे सरकार यांची भूमिका कधीच कलम ३७० च्या विरोधी राहिली नाही . यातील  प्रत्येक कॉंग्रेसेतर सरकारला संघपरिवाराचा आतून किंवा बाहेरून पाठींबा राहिलेला आहे.                                       

कॉंग्रेस किंवा कॉंग्रेसेतर सरकारांना काश्मीरचे नेमके दुखणे काय याची जाणीव होती. या दुखण्यावरचे औषध त्यांना माहित नव्हते असेही नाही. या औषधाने काश्मीरचे दुखणे थांबलेही असते पण या औषधाची काश्मिरेतर भारतीय जनतेवर तीव्र प्रतिक्रिया उमटेल ही भीती प्रत्येक सरकारला वाटत होती. त्यामुळे रोगाचे निर्मुलन करणारे औषध देण्याऐवजी रोग काबूत राहील अशी औषधे देण्याचा प्रयत्न झाला. याचाही फायदा उठवत संघ-भाजपने असा प्रचार केला की आजवर सगळय सरकारने वाटाघाटी, बोलणी करण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. खरी गोष्ट अशी आहे की समस्येच्या मुळाशी भिडण्याचा एकतर प्रयत्नच झाला नाही किंवा ज्या पंतप्रधानांनी समस्येच्या मुळाशी भिडण्याचा प्रयत्न केला त्यांनी तो मधेच सोडून दिला. याचा भारतीय जनतेच्या मानसिकतेवर असा परिणाम झाला की इतर कोणतेही उपाय प्रभावी सिद्ध झाला नाही. कलम ३७० रद्द करणे हाच उपाय यावरचा असू शकतो. त्यामुळे कलम ३७० रद्द करण्याचा मोदी सरकारचा निर्णय जनतेला आवडला. आता कलम ३७० रद्द झाले. कलम ३७० रद्द होवून ६ वर्षे झालीत आणि सरकारच्या त्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब करून वर्ष झालं पण कलम ३७० रद्द करण्यापूर्वी आम्ही जिथे होतो तिथेच उभे असल्याचे हळूहळू जनतेच्या लक्षात येवू लागले आहे. काश्मीर समस्येचे मूळ कलम ३७० मध्ये नसून काश्मीर समस्येचे समाधान कलम ३७० मध्ये आहे हे जो पर्यंत आपण समजून घेत नाही तो पर्यंत काश्मीर प्रश्न आपल्याला चकवा देत राहणार आहे. 

आपल्या संविधानकारांनी कलम ३७० ची जी रचना केली आहे ती नीट समजून घेतली तर नरेंद्र मोदी सरकारची कृती आणि त्या कृतीवर शिक्कामोर्तब करणारा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय त्या रचनेची प्रतारणा करणारा असल्याचे लक्षात येईल. कलम ३७० मधील शब्द न शब्द नीट समजून घेतला तर आपल्या लक्षात येईल की काश्मीर संबंधी कोणताही निर्णय भारत सरकार व भारताची संसद घेवू शकत नाही. काश्मीर संबंधी जो काही निर्णय होईल तो काश्मिरी जनतेच्या इच्छेने आणि संमतीनेच होईल. कलम ३७० ची अशी रचना करताना आणि ती स्वीकृत करताना संविधान सभेचे सर्व सदस्य अनुकूल होते असे नाही. पण काश्मीरच्या जनतेशी केलेला करार , भारतात काश्मीरला सामील करून घेताना दिलेला शब्द पाळला गेला पाहिजे या बाबतीत त्यांचे एकमत होते. म्हणून इतर राज्यासारखाच काश्मीर देखील भारताचा भाग असला पाहिजे असे मनोमन वाटत असताना संविधान सभेने आपली इच्छा काश्मिरी जनतेवर लादली नाहीच शिवाय कलम ३७० द्वारे अशी तरतूद केली की केंद्रात येणाऱ्या सरकारांनाही त्यांची इच्छा काश्मिरी जनतेवर लादता येणार नाही.                                                           

भारताच्या संविधान सभेने काश्मिरी जनतेच्या इच्छेचे व काश्मिरी जनतेच्या मताचे प्रकटीकरणाचे माध्यम म्हणून जम्मू-काश्मीरच्या सरकारला नव्हे तर जम्मू-काश्मीरच्या निर्वाचित संविधान सभेला मान्यता दिली होती. कलम ३७० स्वीकृत झाले तेव्हा जम्मू-काश्मीरची संविधान सभा अस्तित्वात नव्हती. म्हणून संविधान सभा अस्तित्वात येईपर्यंत जम्मू-काश्मीरचे सरकार व केंद्र सरकार यांच्यात जे काही करार होतील किंवा जम्मू-काश्मीर संबंधी जे निर्णय होतील त्याला जम्मू-काश्मीरच्या संविधान सभेने मान्यता दिली तरच ते अंतिम समजण्यात येतील असे ठरले होते. त्यावेळचे अंतरिम भारत सरकार व काश्मीरचे प्रतिनिधी यांच्यातील वाटाघाटीतून कलम ३७० आकाराला आले असले तरी त्या कलमा संबंधी अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार भारतीय संविधान सभेने जम्मू-काश्मीर संविधान सभेला बहाल केला होता. वैधानिक दृष्ट्या जम्मू-काश्मीरचे भवितव्य निश्चित करणारी अंतिम संविधानिक संस्था ही जम्मू-काश्मीरची संविधान सभा होती. भारतीय संविधान सभेने हा अधिकार ना आपल्याकडे ठेवला ना भारत सरकारला बहाल केला ना जम्मू-काश्मीर सरकारला दिला. त्यामुळे जम्मू-काश्मीर संविधान सभेने स्वत:ला विसर्जित करण्याच्या क्षणापर्यंत जे काही निर्णय जम्मू-काश्मीर संबंधी घेतलेत ते अंतिम ठरतात. तेव्हा केंद्र सरकारने व भारतीय संसदेने कलम ३७० बाबत जो निर्णय घेतला तो भारतीय संविधान सभेच्या निर्णयाच्या विरुद्ध आणि विपरीत आहे.  भारतीय संविधान सभेने काश्मीरचे भवितव्य ठरविण्याचा अधिकार काश्मिरी जनतेला दिला असताना काश्मीर संबंधी कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय कोणी घेतला तर उर्वरित भारतीय जनतेच्या प्रतिनिधींनी ! एक प्रकारे हा निर्णय काश्मिरी जनतेवर लादण्यात आला आहे. संविधान सभेच्या निर्णयाचा आणि भावनेचा आदर ना सरकारने केला ना सर्वोच्च न्यायालयाने. सध्याच्या सरकारने व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने काश्मीर समस्या सुटलेली नसून समस्या अधिक गुंतागुंतीची बनली आहे. 

----------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि. यवतमाळ 
मोबाईल - ९४२२१६८१५८ 

Friday, July 18, 2025

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - १३६

 लोकांच्या मनातील आणीबाणी विरोध रस्त्यावर प्रकट होवू शकला नाही पण संधी मिळताच मतपेटीतून तो व्यक्त झाला. काश्मीरमध्येही तेच घडले. जेव्हा मतदान करण्याची संधी मिळाली तेव्हा काश्मिरी जनतेने कलम ३७० चे समर्थन करणाऱ्या व त्या कलमाची पुनर्स्थापना करण्यासाठी लढण्याची तयारी असलेल्या पक्षाचे समर्थन करून कलम ३७० रद्द करण्याला असलेला विरोध व्यक्त केला. 
-----------------------------------------------------------------------------------


कलम ३७० रद्द करण्यावेळी काश्मीर खोऱ्यातील परिस्थिती आणि १९७५ साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पुकारलेल्या आणीबाणी नंतरची परिस्थिती याची तुलना आणखी एका मुद्द्याच्या बाबतीत केली तर कलम ३७० रद्द केल्यानंतर खोऱ्यात जनतेचा उठाव का झाला नाही हे लक्षात येईल. आणीबाणी पुकारल्यानंतर देशभरात जी धरपकड झाली त्याचे निश्चित असे निकष होते. पहिला निकष होता जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनात सक्रीय राजकीय पक्ष आणि संघटना यांच्याशी संबंधित कार्यकर्ते, दुसरे ज्यांना अटक झाली ते होते आनंदमार्गी आणि काळाबाजार करणारे लोक. एखाददुसरा अपवाद वगळता अटकेच्या बाबतीत हे निकष पाळले गेले आणि हे सगळे काम स्थानिक पोलिसांनीच केले. काश्मीरमध्ये कलम ३७० रद्द करताना झालेल्या धरपकडीला असे कोणतेच निकष नव्हते. तेथील राजकीयदृष्ट्या सक्रीय नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना पकडलेच पण ज्यांचा राजकारणाशी संबंध नसलेल्या अनेक प्रतिष्ठीत व्यावसायिकांना अटक केली गेली. आणीबाणी काळात ज्यांना अटका झाल्यात त्यांना कोणत्या तुरुंगात ठेवणार याची कुटुंबियांना माहिती असायची. अटक केल्यानंतर गरजेचे समान घरून घेण्यासाठी अटक करणाऱ्याला पोलीस त्याच्या घरी न्यायचे. काश्मीरखोऱ्यात कधी कोणाला पोलीसठाण्यात बोलावले जाईल याचा नेम नसायचा. अंगावरच्या कपड्यांखेरीज ज्यांना अटक होईल त्यांच्याकडे समान नसायचे. कोठे ठेवण्यात आले याची कुटुंबियांना माहिती नसायची. कोठे ठेवण्यात आले हे कळायलाच काही दिवस लागायचे. त्यावेळी ज्यांना अटक झाली त्यापैकी अनेकांना काश्मीर बाहेरच्या तुरुंगात ठेवण्यात आले होते. तेथे जावून भेटणे अजिबात सोपे नव्हते. आणीबाणीत निकष पळून केलेल्या अटकांमुळे किती दहशत पसरली होती हे तो काळ अनुभवणाऱ्या लोकांकडून कळेल.                                                                                                                     


आणीबाणीपूर्वी लाखांच्या सभा आणि लाखांचे मोर्चे ही नित्य बाब बनली होती. पण आणीबाणी जाहीर झाली आणि त्या आणीबाणीचा विरोध करण्यासाठी ना सभा झाल्या ना मोर्चे निघाले. जे लाखो लोक मोर्चात सामील व्हायचे, सभेला आवर्जून हजर राहून टाळ्या वाजवायचे त्या सर्वाना तर अटक नव्हती झाली पण त्यांच्या पैकी कोणी आणीबाणीचा विरोध करायला रस्त्यावर आले नाहीत. त्यावेळी तर सैन्यही रस्त्यावर नव्हते. कोणी रस्त्यावर आले नाही , आंदोलन केले नाही याचा अर्थ लोकांनी आणीबाणीचे स्वागत केले असा होत नाही. सरकारी दूरदर्शन व आकाशवाणीने मात्र त्यावेळी तसा प्रचार केला होता. आणीबाणी विरोधात त्यावेळी स्वयंस्फूर्त उठाव झाला नाही. आणीबाणीला विरोध करण्यासाठी पहिल्या सहा महिन्यात प्रयत्नपूर्वक सत्याग्रह झालेत ज्यात सामील होणाऱ्याची  संख्या अत्यल्प होती. त्यानंतर तसे सत्याग्रहही बंद झाले होते. याचा अर्थ लोकांनी आणीबाणी स्वीकारली होती असा नव्हता. पण प्राप्त परिस्थितीत आपण काहीही करू शकत नाही ही अगतिकता, हतबलता आणि निराशा सर्वव्यापी होती. कलम ३७० रद्द करण्यावेळी उचलण्यात आलेली पाउले आणीबाणी पेक्षा कठोर आणि कायद्याची तमा न बाळगणारी होती. शिवाय पावलोपावली सुरक्षादलाचे जवान तैनात होते. आणीबाणीच्या तुलनेत काश्मीर मध्ये अधिक विपरीत परिस्थितीचा सामना तेथील जनतेला करावा लागला .त्यामुळे कलम ३७० रद्द झाले तेव्हा विरोधाच्या स्वयंस्फूर्त अशा तुरळक घटना वगळता जनता मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरू शकली नाही. त्यामुळे आणीबाणी काळा सारखाच सगळ काही सुरळीत असल्याचा प्रचार झाला. लोक रस्त्यावर उतरले नाही याचा अर्थ कलम ३७० रद्द करणे त्यांनी मान्य केले एवढेच नाही तर स्वागत केले असा प्रचार आपण ऐकला आहे. लोकांच्या मनातील आणीबाणी विरोध रस्त्यावर प्रकट होवू शकला नाही पण संधी मिळताच मतपेटीतून तो व्यक्त झाला. काश्मीरमध्येही तेच घडले. जेव्हा मतदान करण्याची संधी मिळाली तेव्हा काश्मिरी जनतेने कलम ३७० चे समर्थन करणाऱ्या व त्या कलमाची पुनर्स्थापना करण्यासाठी लढण्याची तयारी असलेल्या पक्षाचे समर्थन करून कलम ३७० रद्द करण्याला असलेला विरोध व्यक्त केला. 

जम्मू-काश्मीर राज्य एकसंघ असताना लडाख मधील जनतेला सरकार आपले ऐकत नाही किंवा आपल्या हिताकडे लक्ष देत नाही असे वाटत होते. जम्मू आणि काश्मीरपासून आपल्याला वेगळे करण्यात यावे ही त्यांची आधीपासूनची भावना होती. त्यामुळे त्यानाही कलम ३७० नको होते. जेव्हा कलम ३७० रद्द करण्याची घोषणा झाली तेव्हा त्याचे व्यापक स्वागत लडाख मध्ये झाले होते. जम्मू-काश्मीर राज्यापासून वेगळे झाल्याचा त्यात आनंद अधिक होता. कलम ३७० मुळे लडाखचे वेगळेपण कायम राखण्यासाठी घटनेचे सहावे शेड्युल लागू करता येत नव्हते हे त्यांचे कलम ३७० ला विरोध असण्याचे मुख्य कारण होते. जम्मू-काश्मीर विधानसभेत कमी लोकसंख्येमुळे लडाखचे प्रतिनिधित्व कमी असल्याने लडाखकडे सतत दुर्लक्ष होत आले हे विरोधाचे दुसरे कारण होते. पण कलम ३७० रद्द झाल्या नंतरच्या ५ वर्षाच्या काळात लडाख मधील जनतेचा पूर्ण भ्रमनिरास झाला. आजच्यापेक्षा कलम ३७० लागू होते तेव्हाची परिस्थिती चांगली होती म्हणण्याची पाळी लडाखमधील जनतेवर आली. कारण कलम ३७० लागू असताना संपूर्ण जम्मू-काश्मीर राज्यात कलम ३५ अ चा अंमल होता. त्यामुळे बाहेरचे लोक येवून जमिनी खरेदी करण्याची भीती नव्हती. बाहेरच्याना नोकरी मिळणे शक्य नव्हते. कलम ३७० रद्द करण्यासोबत हे संरक्षण गेल्याने लडाख मधील जनता असुरक्षित बनली. घटनेचे सहावे शेड्युल लागू करण्याची मागणीने त्यातून जोर पकडला. कलम ३७० रद्द झाल्यानंतर सर्वात मोठे जनआंदोलन कुठे उभे राहिले असेल तर ते लडाख मध्ये राहिले. सोनम  वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली हजारो लडाखी स्त्री-पुरुष रस्त्यावर उतरले. तापमान शून्याच्या खाली असताना सोनम वांगचुक यांनी २४ दिवस उपोषण केले. हजारो महिला साखळी उपोषणात सामील झाल्या. हा लढा कलम ३७० च्या पुनर्स्थापनेसाठी नव्हता हे खरे पण कलम ३७० लागू असताना जम्मू-काश्मीर बाहेरच्या लोकांपासून जे संरक्षण होत होते तशाच प्रकारच्या संरक्षणाची व स्वशासनाची मागणी आंदोलनकर्त्याची होती आणि आहे. ज्या लडाखमध्ये कलम ३७० रद्द करण्याचे उघड स्वागत झाले होते त्या लडाख मध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकात आघाडी कोणी घेतली तर ती कलम ३७० चे समर्थन करणाऱ्या व त्या कलमाची पुनर्स्थापना झाली पाहिजे अशी आग्रही मागणी करणाऱ्या नँशनल कॉन्फरन्सने ! लडाख मध्ये झाले तसे आंदोलन जम्मू विभागात झाले नाही पण त्या विभागातील लोकांची देखील बाहेरच्यांना नोकरीत घेण्यात येवू नये व मालमत्ता खरेदी करता येवू नये अशी मागणी जाहीरपणे केलेली आहे. कलम ३७० रद्द करायला विरोध नाही पण कलम ३७० अंतर्गत या विभागांना मिळणारे संरक्षण मात्र कायम राहिले पाहिजे अशी जम्मू व लडाख मधील जनतेची भावना आहे. काश्मीर खोऱ्यातील मुस्लीम बहुल जनतेचे सोडा पण कलम ३७० रद्द करण्याच्या संघ-भाजपच्या मागणीला पाठींबा देणाऱ्या गटांनाही कलम ३७० चे महत्व नव्याने लक्षात येवू लागले आहे भलेही ते कलम ३७० रद्द करणे चुकीचे होते असे म्हणत नसतील. 

-------------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि. यवतमाळ 
मोबाईल : ९४२२१६८१५८  

Friday, July 11, 2025

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - १३५

 इंदिराजींच्या आणीबाणी काळात विश्वसनीय बातम्यांसाठी सुजाण लोक बीबीसी ऐकायचे. कलम ३७० रद्द झाल्या नंतर काश्मीर मध्ये काय प्रतिक्रिया उमटली हे जाणून घेण्यासाठी पुन्हा एकदा विदेशी प्रसिद्धी माध्यमांवर अवलंबून राहण्याची पाळी आली.
--------------------------------------------------------------------------------------------


कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय घोषित करण्याआधी केंद्र सरकारने केवळ काश्मिरातील जनतेला काश्मिरात कुठे काय चालले हे कळणार नाही याचीच व्यवस्था केली नव्हती तर देशातल्या इतर भागात व परदेशातही कलम ३७० रद्द झाल्या नंतर काश्मीरमधील जनतेची प्रतिक्रिया कळणार नाही याची व्यवस्था केली होती. मोदी सरकारवर अघोषित व असंवैधानिक आणीबाणी देशात लादल्याचा आरोप होत असतो. कलम ३७० रद्द झाल्या नंतरचे काही महिने काश्मिरात केंद्र सरकारने ज्या उपाययोजना अंमलात आणल्या त्याच्यावर दृष्टीक्षेप टाकला तरी अघोषित व असंवैधानिक आणीबाणी काय असते हे कळेल. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना १९७५ मध्ये आणीबाणी लादून जी पाउले उचलली होती त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक जाचक पाउले मोदी सरकारने कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय घेताना काश्मीरमध्ये उचलली होती. मी श्रीमती इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणीचा भुक्तभोगी असल्याने या दोन परिस्थितीची वस्तुनिष्ठ तुलना करू शकतो. इंदिरा गांधी यांच्या घोषित आणीबाणीत प्रसारमाध्यमावर सेन्सॉरशिप लादण्यात आली होती. प्रसिद्धीविभागाच्या अधिकाऱ्यांनी नजरेखालून घातलेला आणि मंजूर केलेला मजकूरच वृत्तपत्रांना प्रकाशित करावा लागत असे. एरव्ही प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींवर कुठलीही बंधने नसायची. ते कुठेही जावून बातमी मिळवू शकत होते. कलम ३७० रद्द करताना मोदी सरकारने ज्या उपाययोजना काश्मिरात केल्या त्यात आणीबाणी काळा सारखी घोषित सेन्सॉरशिप नव्हती. पण वृत्तपत्र व वृत्तवाहिन्याच्या  प्रतिनिधीना बातमी मिळविणेच शक्य होणार नाही अशाप्रकारची व्यवस्था करण्यात आली होती. टेलिफोन, मोबाईल आणि इंटरनेट बंद केल्याने आजूबाजूला व दूरवर काय चालले हे कळण्याचा मार्ग बंद झाला होता. नाही म्हणायला पत्रकारांना कर्फ्यू पास देण्यात आले होते. पण या पास वर फिरणे सोयीचे आणि सोपे नव्हते. प्रत्येक १०० मीटरवर सुरक्षा सैनिक अडवून तुमची चौकशी करणार असेल तर त्या पासचा काहीच उपयोग नसतो. पास दाखविला आणि सुरक्षा सैनिकांनी जावू दिले असे अजिबात घडत नव्हते. बऱ्याचदा सुरक्षा सैनिकाकडून अपमानास्पद वागणूक मिळायची आणि अनेकदा तर पास असूनही पुढे जायला नकार दिला जायचा. त्यामुळे त्या काळात कुठे काय चालले या संबंधीच्या बातम्या मिळविणे महाकठीण काम होते.                                                                                 

एवढे सगळे अडथळे पार करून बातमी मिळविली तरी आपल्या कार्यालया पर्यंत कशी पोचवायची हा मोठा प्रश्न होता. काश्मीर बाहेर जाणाऱ्या प्रवाशांच्या हातून अशा बातम्या पाठविल्या जायच्या पण बऱ्याचदा त्या बातम्या इप्सितस्थळी पोचायच्याच नाही. बातम्या बाहेर पोचल्या तरी त्या देशी माध्यमात प्रकाशित होतील याची खात्री नव्हती. विदेशी माध्यमात मात्र त्या प्रकाशित होत. इंदिराजीच्या आणीबाणीत दूरदर्शन हेच दृकश्राव्य मध्यम होते व जे सरकारी नियंत्रणात होते. मोदीकाळात सरकारी दूरदर्शन मागे पडून असंख्य खाजगी वृत्तवाहिन्या अस्तित्वात असल्या तरी सरकारी बाजू मांडणे हेच त्यांचे काम बनल्याने काश्मिरातील परिस्थिती देशवासियांना कळत नव्हती. अशा वृत्तवाहिन्यांसाठी आणि बाहेरच्या वृत्तपत्रांसाठी रोज प्रसिद्धी विभागाकडून बातम्यांचे ब्रीफिंग केले जायचे. त्यातून काश्मिरात सर्वत्र शांतता आहे आणि कलम ३७० रद्द करण्याला कोणीच विरोध केला नाही असाच समज निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. इंदिराजींच्या आणीबाणी काळात विश्वसनीय बातम्यांसाठी सुजाण लोक बीबीसी ऐकायचे. कलम ३७० रद्द झाल्या नंतर काश्मीर मध्ये काय प्रतिक्रिया उमटली हे जाणून घेण्यासाठी पुन्हा एकदा विदेशी प्रसिद्धी माध्यमांवर अवलंबून राहण्याची पाळी आली. कलम ३७० रद्द केल्याची घोषणा झाल्या नंतर श्रीनगर शहरात पावलोपावली सुरक्षा सैनिक तैनात असताना श्रीनगरच्या सौरा भागातील पार्कमध्ये या निर्णयाच्या विरोधात शेकडो लोक प्रदर्शन करीत होते अशी बातमी १० ऑगस्ट २०१९ रोजी बी बी सी ने प्रसारित केली जी कोणत्याच भारतीय प्रसिद्धी माध्यमाने दिली नव्हती. या निदर्शकांवर सुरक्षादलाने अश्रुधुराचा मारा केला आणि गोळीबार केल्याचा दावा बीबीसीने आपल्या प्रसारणात केला होता. अलजझीरा या वृत्तवाहिनीने सुरक्षादलाने रबरकोटेड स्टील बुलेटचा मारा केल्याचे आपल्या प्रसारणात नमूद केले. अर्थात सरकारने याचा इन्कार केला. काश्मीरमध्ये तर वृत्तपत्र प्रकाशित करणेच अशक्यप्राय असल्याने अशा बातम्या तिथे प्रकाशित आणि प्रसारित होणे शक्य नव्हते. अशा प्रकारच्या प्रदर्शनात कोणी जखमी झाले तर पोलीस त्यांना इस्पितळात भारती करतात आणि या बाबतची माहिती इस्पितळाकडून मिळत असते. पण मोदी सरकारने सगळ्याच आघाड्यावर चोख बंदोबस्त ठेवला होता. अशी कोणतीही माहिती देण्यावर इस्पितळ प्रशासनावर बंदी घालण्यात आली होती.                                     

इंदिराजीच्या आणीबाणी काळात सरकारच्या परवानगीनेच बातम्या प्रकाशित करायचे बंधन होते तसे बंधन मोदी सरकारने घातले नव्हते हे खरे पण काश्मीर संबंधी सरकारला अडचणीच्या वाटणाऱ्या किंवा सरकारच्या नेरेटीवला छेद देणाऱ्या बातम्या प्रकाशित व प्रसारित झाल्या तर अशा बातम्या देणाऱ्या काश्मिरातील प्रतिनिधीना अनेक अडचणींचा आणि सरकारी दडपशाहीचा सामना करावा लागल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे काश्मिरातील सगळ्याच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधित अत्यंत भीतीची, असुरक्षिततेची आणि आपले काम नीट करता येत नसल्याने निराशेची व अगतिकतेची भावना होती. प्रसिद्धी माध्यमात काम करणारे लोक एवढे अगतिक असतील तर सर्वसामान्य लोकांची काय स्थिती असेल याचा अंदाज करता येईल. सरकारशी अघोषित आणि अनियोजित असहकार हेच एक अस्त्र लोकांच्या हाती होते आणि त्यांनी ते वापरल्याचेही दिसून येते. कलम ३७० रद्द केल्या नंतर पाकिस्तानने भारत काश्मिरात दडपशाही करीत असल्याच्या आंतरराष्ट्रीय प्रचाराला उत्तर देण्याची गरज भारताला वाटू लागली तेव्हा भारत सरकारने काश्मिरातील बंधने शिथिल करायला सुरुवात केली . परराष्ट्रीय प्रतिनिधीना काश्मिरातील परिस्थिती सामान्य असल्याचे दाखविण्यासाठी काश्मिरात आणण्याच्या आधी दुकाने उघडी रहावीत असा प्रयत्न करण्यात आला. पण दुकानदारांनी फारसा प्रतिसाद दिला नाही. यातून कलम ३७० रद्द करण्यातून निर्माण झालेली काश्मिरातील लोकभावना प्रकट होते. हे खरे आहे की कलम ३७० रद्द करण्या विरुद्ध मोठा लोक उद्रेक टाळण्यात सरकारला यश आले पण याचा अर्थ कलम ३७० रद्द करण्याचा सरकारचा निर्णय काश्मीर खोऱ्यातील जनतेने स्वीकारला असा होत नाही. इंदिराजीच्या आणीबाणीतही लोक शांत होते. विरोध करीत नव्हते. भीतीची भावना लोकात होती. कलम ३७० रद्द झाल्यानंतरची काश्मीरखोऱ्यातील परिस्थिती अशीच होती. देशातील जनतेने आपला आणीबाणी विरोध प्रदर्शन व निदर्शन करून व्यक्त न करता मतदानातून प्रकट केला होता. कलम ३७० रद्द केल्याचा विरोध काश्मीरखोऱ्यातील जनतेनेही मतदानातून व्यक्त केला आहे. कलम ३७० रद्द करण्याला विरोध करणाऱ्या व या कलमाची पुनर्स्थापना करण्याची प्रतिज्ञा करणाऱ्या पक्षाला काश्मीर खोऱ्यातील जनतेने निवडून देवून कलम ३७० बाबत काश्मीर खोऱ्यातील जनतेची काय भूमिका आहे हे दाखवून दिले आहे. 

---------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि. यवतमाळ 
मोबाईल : ९४२२१६८१५८ 

Friday, July 4, 2025

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - १३४

 ५ ऑगस्ट २०१९ ला कलम ३७० रद्द करण्याच्या घोषणेनंतर महिनाभराने जेव्हा काही प्रमाणात बंधने शिथिल करण्यात आली तेव्हाच सरकारच्या निर्णयाविरुद्ध अनेक ठिकाणी उत्स्फूर्त विरोध प्रदर्शन झाल्याची माहिती बाहेर येवू शकली. ही माहितीही भारतीय प्रसारमाध्यमांपेक्षा विदेशी प्रसारमाध्यमातून कळू शकली. 
----------------------------------------------------------------------------------------------


बाकी काही जमो की न जमो प्रचाराच्या बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार प्रचाराच्या बाबतीत जगात नंबर एक आहे. २०१६ पासून नोटबंदी नंतर काश्मिरातील आतंकवादाचे कंबरडे मोडले असा प्रचार करीत राहिले. दरम्यान दहशतवादाच्या मोठ्या घटना घडतच राहिल्या. ५ ऑगस्ट २०१९ नंतर कलम ३७० रद्द केल्यामुळे काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद संपुष्टात आल्याचा प्रचार केला गेला. कलम ३७० रद्द केल्यानंतर दहशतवाद संपुष्टात आला असेल तर नोटबंदीनंतर दहशतवादाचे कंबरडे मोडले हा प्रचार आपोआप खोटा ठरतो. कलम ३७० रद्द केल्या नंतरही दहशतवादाच्या अनेक घटना घडूनही दहशतवाद संपल्याचा प्रचार कायम राहिला. सरकारी प्रचार खरा असल्याचा मानणाऱ्याना काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद संपला नसल्याची जाणीव नुकत्याच घडून गेलेल्या भीषण अशा पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर झाली. मोदी सरकारच्या काळात दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवादी आणि त्यांना रसद पुरविणाऱ्या पाकिस्तानवर तीन सर्जिकल स्ट्राईक करण्यात आलेत. प्रत्येक स्ट्राईक नंतर असाच प्रचार करण्यात आला की दहशतवाद्यांना आणि पाकिस्तानला धडा शिकविला. ज्या तीन सर्जिकल स्ट्राईकचा सरकारने आपली प्रतिमा उजळण्यासाठी उपयोग करून घेतला तेच सर्जिकल स्ट्राईक काश्मीर खोऱ्यात दहशतवादी कारवाया सुरु असल्याचा पुरावा आहे. ५ ऑगस्ट २०१९ नंतर काश्मीर खोऱ्यातील जनतेने कलम ३७० रद्द करण्याला विरोध केला नाही , विरोध प्रदर्शन झाले नाही, लोक रस्त्यावर उतरले नाहीत असा प्रचार धडाक्यात करण्यात आला. स्थिती नियंत्रणात व सुरळीत असल्याचा प्रचार करण्यात आला. भारतीय प्रसार माध्यमांनीही सरकारच्या या प्रचाराला हातभार लावला. तशी या प्रचारात अंशतः का होईना सत्यता होती. काश्मिरातील शहरांमध्ये आणि विशेषतः श्रीनगर मध्ये कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णया विरोधात जनता रस्त्यावर आली नव्हती. पाउला पाऊलावर सुरक्षा सैनिक तैनात असल्याने घराच्या बाहेर पडणे शहरात तरी कठीण होते. सगळीकडे कर्फ्यूसदृश्य परिस्थिती होती. एका कानाचे दुसऱ्या कानाला कळणार नाही याची दक्षता घेतली गेली होती.                                                                                                                                                       

वृत्तपत्रांवर सेन्सॉरशिप लादण्यात आली नव्हती पण इंटरनेट बंद करण्यात आले होते. मोबाईल आणि टेलिफोन सेवा सुरु नव्हती. प्रत्यक्ष रस्त्यावर फिरून परिस्थिती पाहता येत नव्हती. कोविड काळात देशात जसा लॉकडाऊन होता त्याची सुरुवात काश्मीरपासून कलम ३७० रद्द केल्यानंतर झाली होती. रस्त्यावर दिसत होते ते फक्त सुरक्षासैनिक आणि दूरदर्शनचे कॅमेरे ! त्यामुळे कलम ३७० रद्द करण्यात आल्यानंतर काश्मीरमधील परिस्थिती बाबत जे कळत होते ते ते फक्त दूरदर्शन आणि आकाशवाणी वरून. एक महिन्यानंतर जेव्हा काही प्रमाणात बंधने शिथिल करण्यात आली तेव्हाच सरकारच्या निर्णयाविरुद्ध अनेक ठिकाणी उत्स्फूर्त विरोध प्रदर्शन झाल्याची माहिती बाहेर येवू शकली. ही माहितीही भारतीय प्रसारमाध्यमांपेक्षा विदेशी प्रसारमाध्यमातून कळू शकली. झालेली विरोध प्रदर्शने ही अगदीच स्थानिक पातळीवरची आणि उत्स्फूर्त अशी होती. कारण  कलम ३७० रद्द करण्याची घोषणा होण्या पूर्वीच ४ ऑगस्टच्या रात्री सर्व प्रमुख राजकीय नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली होती. त्यामुळे संघटीत व राज्यव्यापी विरोध प्रदर्शन शक्य नव्हते. याचा अर्थ कलम ३७० बद्दलचा केंद्रसरकारचा निर्णय जनतेला मान्य होता असा होत नाही. स्थानिक पातळीवर जनतेने आपला विरोध तरी नोंदविला. दहशतवाद्यांनी मात्र या निर्णयाविरुद्ध एक गोळीही चालविली नाही आणि त्यामुळे सरकारलाही गोळी चालवावी लागली नाही. काश्मिरातील दहशतवादी आणि सर्वसामान्य जनता यातील फरक अधोरेखित करणारी ही बाब आहे. काश्मीरमधील सर्वसामान्य नागरिकांना भारतात राहण्यासाठी कलम ३७० च्या संरक्षणाची गरज वाटतेय तर कलम ३७० असले काय आणि नसले काय याच्याशी दहशतवादी गटांना काही देणेघेणे नाही. त्यांना तर काश्मीर भारतापासून वेगळा करायचा आहे. कलम ३७० मुळे काश्मिरात दहशतवाद आहे हा प्रचार दिशाभूल करणारा असल्याचे यातून अधोरेखित होते. 

संचारबंदीसदृश्य परीस्थिती, टेलिफोन,मोबाईल , इंटरनेट बंद या स्थितीत काश्मीरमध्ये काय चालू आहे हे काश्मिरातील जनतेलाच कळत नव्हते तर काश्मीर बाहेर काय कळणार. मात्र या काळात सरकारचा काश्मीरमध्ये सर्वकाही सुरळीत आहे आणि सरकारच्या निर्णयावर जनता खुष आहे हे दर्शविण्याचा जो आटापिटा चालला होता तो शंकास्पद होता. कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयानंतर भारत सरकारचे सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना श्रीनगरच्या रस्त्यावर फिरताना दाखविण्यात आले. वक्फ बोर्डाच्या सदस्यांना पकडून आणून रस्त्याच्या कडेला डोभल यांचे सोबत बिर्याणी खाताना दाखविण्यात आले. परिस्थिती शांत आणि सुरळीत असल्याचे भासविण्याचा केंद्र सरकारचा तो उथळ आणि केविलवाणा प्रयत्न असल्याचे स्पष्ट दिसत होते. काश्मीर प्रश्नाचे आंतरराष्ट्रीयकरण केल्याबद्दल भारतीय जनता पक्ष कायम नेहरूंच्या नावाने खडे फोडत आला आहे. कलम ३७० रद्द केल्यानंतर या पक्षाच्या सरकारने युरोपियन युनियन आणि अमेरिकन शिष्टमंडळाना आमंत्रित करून कलम ३७० रद्द केल्यानंतर काश्मीर मधील परिस्थिती सुरळीत असल्याचे पटविण्याचा प्रयत्न केला. या शिष्टमंडळातील सदस्य कोण असावेत हे सरकारनेच निश्चित केल्यामुळे या शिष्टमंडळांना काश्मीरमधील परिस्थिती सामान्य वाटल्याचे कोणाला आश्चर्य वाटले नाही. अमेरिकेतील डेमोक्रॅटिक पक्षाच्या एका प्रभावशाली खासदाराने आपल्याला काश्मिरातील परिस्थिती पाहू देण्याची विनंती मोदी सरकारला केली ती मात्र फेटाळण्यात आली ! परदेशी शिष्टमंडळाना काश्मीरमधील परिस्थिती पाहण्यासाठी उत्साहाने आमंत्रित करणाऱ्या भारत सरकारने भारतातील राजकीय नेत्यांच्या काश्मीरमधील प्रवेशावर मात्र बंदी घातली होती. काश्मीरच्या उपराज्यपालांनी आपण कोणालाही भेटण्यासाठी तयार असल्याचे सांगितल्यावर राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ उपराज्यपाल यांना भेटण्यासाठी व काश्मीरमधील लोकांच्या गाठीभेटी घेण्यासाठी विमानाने श्रीनगरला आले तेव्हा त्या शिष्टमंडळास विमानतळाबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली व नवी दिल्लीला परत पाठविण्यात आले. काश्मिरी असलेल्या गुलाम नबी आझाद यानाही सरकारने काश्मिरात प्रवेश करण्यास मनाई केली होती. काश्मिरात येण्यासाठी त्यांना सर्वोच्च न्यायालयाकडे परवानगी मागावी लागली होती. काश्मिरातील परिस्थितीवर भाष्य करायचे नाही या अटीवरच त्यांना आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरींना सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली होती. यावरून सरकारला कलम ३७० रद्द झाल्यानंतरच्या काश्मीर मधील परिस्थिती बाबत लपवायचे होते हे सिद्ध होते. 

-------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि. यवतमाळ 
मोबाईल : ९४२२१६८१५८ 


Friday, June 27, 2025

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - १३३

 कलम ३७० अस्तित्वात होते तेव्हा दहशतवादी हल्ले होतच होते आणि कलम ३७० रद्द झाल्यानंतरही ते सुरूच आहेत. ही गोष्ट कलम ३७० आणि दहशतवाद याचा परस्पर संबंध नसल्याचे निदर्शक आहे. 
-------------------------------------------------------------------------------------------


१९९० च्या दशकात काश्मीर घाटीतून बहुसंख्य पंडीत कुटुंबाना वाढत्या आतंकवादी घटनांमुळे काश्मीर सोडावे लागले होते. काश्मीर समस्येचा विषय निघाला की काश्मिरी पंडितांवर झालेल्या अन्यायाचा पाढा हमखास वाचला जातो. पलायन करावे लागलेल्या पंडीत समुदायाच्या कुटुंबाना परत काश्मिरात आणण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी काश्मीरघाटीत पलायन केलेल्या पंडीत कुटुंबातील सदस्यांना सरकारी नोकरीत सामील करून घेण्याची योजना तयार केली आणि अंमलात आणली. पंडीत समुदायानेही या योजनेचे स्वागत करून योजनेत सामील झालेत. तेव्हापासून हजारो काश्मीर पंडीत सरकारी नोकरदार म्हणून काश्मीर घाटीत कार्यरत आहेत. दशकभरात काश्मिरी पंडीत कर्मचाऱ्यांनी आम्हाला काश्मीरमध्ये असुरक्षित वाटते, काश्मीरघाटी बाहेर आम्हाला काम द्या अशी मागणी केली नव्हती. अशी मागणी कधी झाली तर कलम ३७० रद्द झाल्या नंतरच्या दिवसात. केंद्र सरकारने कलम ३७० रद्द झाल्या नंतर काश्मिरातील दहशतवाद संपल्याचा व परिस्थिती स्थिर आणि शांत असल्याचा प्रचार केला. सरकारच्या या प्रचारातील हवा काश्मीर पंडीत कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानेच काढली. कलम ३७० रद्द केल्या नंतर काश्मिरात जे दहशतवादी हल्ले झालेत त्यातील काही हल्ल्यात काश्मिरी पंडीत कर्मचाऱ्यांना लक्ष्य करण्यात आले. असे हल्ले होवू लागल्यामुळे पंडीत कर्मचारी भयभीत झाले होते. काश्मीरमध्ये १९९० च्या दशकात जी हिंसा झाली त्याची सुरुवात अशाच घटनांनी झाली होती व त्यामुळेच काश्मिरी पंडितांवर काश्मीर सोडण्याची वेळ आली या इतिहासाची पुनरावृत्ती तब्बल ३० वर्षानंतर झाली आणि तीही कलम ३७० रद्द झाल्या नंतर. काश्मिरी पंडीत कर्मचाऱ्यांना लक्ष्य करून झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे काश्मीर घाटीत कार्यरत कर्मचारी  १९९० सारखेच भयभीत झाले होते. सरकारने त्यांची नियुक्ती काश्मीरघाटी बाहेर जम्मूत किंवा इतरत्र करावी या मागणीसाठी २०२२-२३ साली संप पुकारून तब्बल ३१० दिवस जम्मूत आंदोलन केले होते.     

एरवी काश्मिरी पंडितावर कसा अन्याय झाला याचा पाढा वाचणाऱ्यानी ३१० दिवस चाललेल्या काश्मीर पंडीत कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाकडे साफ दुर्लक्ष केले. एवढेच नाही तर हे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी कर्मचाऱ्यांचे पगारच बंद केले. दहशतवादी हल्ल्यात मरायचे की उपासमारीने मरायचे एवढाच पर्याय सरकारने कर्मचाऱ्यांसमोर शिल्लक ठेवला होता. पगार बंद करणे हा सरकारी दहशतवाद असल्याचा आरोप काश्मिरी पंडीत कर्मचार्यांनी केला पण हा आरोप कोणी गांभीर्याने घेतला नाही. काश्मिरी पंडितांच्या हालअपेष्टांचे भांडवल करून कलम ३७० विरोधात वातावरण निर्माण करणाऱ्या सरकारने काश्मिरी पंडीत कर्मचाऱ्यांच्या मागण्याकडे साफ दुर्लक्ष केले. सरकारला शरण येण्यावाचून दुसरा पर्यायच नसल्याने ३१० दिवसानंतर पंडीत समुदायाचे सरकारी कर्मचारी कामावर परतले. त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या असत्या तर कलम ३७० रद्द केल्यानंतर काश्मिरातील परिस्थिती सुरळीत झाली हा सरकारी प्रचाराचा फुगा फुटला असता. सरकारने या कर्मचाऱ्यांचा पगार बंद करून नाक दाबल्याने पंडीत सरकारी कर्मचारी मना विरुद्ध काश्मीर घाटीत राहिलेत. पण या काळात अशा काही पंडीत कुटुंबांनी काश्मीर सोडले ज्यांनी १९९० च्या हिंसाचारा नंतरही काश्मीर सोडले नव्हते. कलम ३७० रद्द झाल्यानंतर काश्मिरी पंडीतच दहशतवादाचे बळी ठरले नाहीत तर अशा अनेक घटना घडल्यात ज्यात इतर नागरिकांचा आणि सैनिकांचा बळी गेला. 

ऑगस्ट २०१९ मध्ये कलम ३७० रद्द करण्यात आल्यानंतरचा घटनाक्रम लक्षात घेतला तर असे म्हणता येईल की दहशतवाद्यांनी दहशतवादी हल्ले करण्याच्या पद्धतीमध्ये बदल केला. पूर्वी नागरी वस्त्यात येवून सुरक्षादलावर आणि दहशतवादी ज्यांना पोलीस व सुरक्षादलाचे खबरे मानत त्यांच्यावर हल्ले केले जायचे. २०१९ नंतर तसे हल्ले कमी झालेत याचे कारण नागरी वस्त्यात वाढलेल्या सुरक्षादलाच्या चौक्या आणि संख्या. ७-८ लोकांमागे १ सुरक्षा सैनिक अशी स्थिती असेल तर दहशतवाद्यांना वस्तीत येवून हल्ले करणे सोपे राहिले नसणार. त्यामुळे जंगलातून सुरक्षादलावर अचानक हल्ले करणे, स्फोटका द्वारे विस्फोट घडवून आणणे असे मार्ग दहशतवाद्यांनी स्वीकारले. नागरी वस्तीत विशेषत: मुख्य रस्त्यापासून दूर असलेल्या खेड्यांमध्ये काम करणाऱ्या शिक्षक , पटवारी सारख्या पंडीत कर्मचाऱ्यांवर आणि बाहेरून मजूर म्हणून काम करायला आलेल्या श्रामिकावर हल्ले करण्याची पद्धत अवलंबिली. दहशतवाद्यांना मोठ्या राजकीय नेत्यावर हल्ले करता आले नसतील पण अनेक स्थानिक कार्यकर्त्यांवर हल्ले झाले आहेत. असा एक हल्ला यशस्वी झाला तरी मोठ्या क्षेत्रात दहशत पसरते. दहशतवाद्यांच्या अशा कार्यकलापामुळे मोठे दहशतवादी हल्ले न करताही काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांना आपली दहशत टिकवून ठेवता आली. सरकार मात्र मोठे दहशतवादी हल्ले झाले नाहीत म्हणजे दहशतवाद उतरणीला लागला असा भ्रम पसरविण्यात यशस्वी राहिले. काश्मिरेतर भारतीय जनतेला कलम ३७० रद्द करण्याचे एवढे अप्रूप की त्यांनी सरकारी प्रचारावर डोळे झाकून विश्वास ठेवला. 

कलम ३७० रद्द झाल्यानंतर नुकत्याच घडून गेलेल्या पहलगाम हल्ल्या आधीही मोठा हल्ला घडवून आणण्यात दहशतवादी यशस्वी झाले होते. काश्मीर खोऱ्यात प्रचंड संख्येने सुरक्षा सैनिक तैनात करण्यात आले असल्याने दहशतवाद्यांनी जम्मू विभागाला लक्ष्य बनविले. वर्षभरा पूर्वी जून २०२४ मध्ये धार्मिक यात्रेकरूंच्या बसवर जम्मूत दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला होता. या घटनेत १० यात्रेकरू ठार झाले होते तर ३० जखमी झाले होते. सुरक्षादलावर झालेल्या हल्ल्यांची संख्या तर मोठी आहे. सुरक्षा दलाच्या चौक्यांवर ग्रेनेड फेकणे, सुरक्षादलाच्च्या गस्तीपथकांवर हल्ला करणे, त्यांची वाहने विस्फोटाने उडवून देण्याचे प्रकार कमी होण्या ऐवजी वाढल्याचे दिसून येते. नागरी भागातील हल्ल्यातील कमी सुरक्षादलावर अधिक हल्ले करून भरून काढली. काश्मीरखोऱ्यात सुरक्षादलाच्या प्रचंड तैनातीमुळे आलेली कमी जम्मू विभागात अधिक हल्ले करून दहशतवाद्यांनी भरून काढली. असे म्हणता येईल की कलम ३७० रद्द झाल्यानंतर दहशतवादी हल्ल्याचे स्वरूप आणि पद्धत बदलली. पण याचा कलम ३७० रद्द करण्याशी काडीचाही संबंध नाही. कलम ३७० रद्द करतेवेळी काश्मीरखोऱ्यातील जनतेचा त्याविरुद्धचा आवाज आणि उद्रेक रोखण्यासाठी ठिकठिकाणी मोठ्या संख्येत सुरक्षादल तैनात करण्यात आले त्याचा हा परिणाम आहे. सुरक्षादलाच्या अशा तैनातीमुळे कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयाविरुद्ध काश्मीरखोऱ्यातील जनतेचा उद्रेक रोखण्यात केंद्र सरकार यशस्वी झाले असले तरी दहशतवाद्यांची हल्ला करण्याची क्षमता केंद्र सरकारला नष्ट तर सोडा कमी देखील करता आलेली नाही. याचे महत्वाचे कारण म्हणजे दहशतवाद, दहशतवादी आणि कलम ३७० याचा प्रत्यक्ष संबंध नाही. कलम ३७० अस्तित्वात होते तेव्हाही दहशतवाद होताच आणि कलम ३७० रद्द झाल्यानंतरही दहशतवाद संपलेला नाही. 

-------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि. यवतमाळ 
मोबाईल : ९४२२१६८१५८ 


Friday, June 20, 2025

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - १३२

 घटनेत लिहिलेले शब्द आणि त्या शब्दांचा शब्दकोशातीलच नव्हे तर व्यावहारिक अर्थ लक्षात घेतला तरी कलम ३७० प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा घटनेवर चालविलेला बुलडोजर वाटतो. 
-------------------------------------------------------------------------------------------


कलम ३७० संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल अनपेक्षित नाही. गेल्या १० वर्षातील निकालांकडे दृष्टीक्षेप टाकला तर सर्वोच्च निकालामागचे एक सूत्र स्पष्ट होते. केंद्र सरकार अडचणीत येणार नाही एवढेच नव्हे तर सरकार अडचणीत येत असेल तर अडचणीतून त्याची सुटका करणे हे ते सूत्र. इथे कोणी म्हणेल की इलेक्टोरल बॉंड प्रकरणी नाही का सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला. इथे हे लक्षात घेतले पाहिजे की या निकालाने सरकारची कोणतीच अडचण होणार नव्हती. पार्टीसाठी पैसा मिळविण्याचे एक साधन तेवढे गेले पण इतर अनेक मार्ग उपलब्ध आहेत. सरकारची अडचणीतून सुटका करण्याची कृती कशी असते टी एका प्रकरणावरून तपासता येईल. सरकारला आपल्या मर्जीतल्या अधिकाऱ्याकडे सीबीआय कडील महत्वाची प्रकरणे सोपवायची होती. या अधिकाऱ्यामुळे सीबीआय प्रमुखाचे पद नामधारी ठरू लागले होते. याचा अर्थातच त्यावेळच्या सीबीआय प्रमुखाने विरोध केला. सरकारच्या मर्जीतील अधिकाऱ्यावर विविध गंभीर आरोप ठेवून त्याच्या चौकशीचे आदेश दिले. स्वत: पंतप्रधानांनी सीबीआय प्रमुखाला बोलावून दोन्ही अधिकाऱ्यात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. पण त्यावेळचे सीबीआय प्रमुख सरकारच्या मर्जीतील अधिकाऱ्याची चौकशी करण्यावर ठाम राहिले. सरकारने त्यांना तात्काळ बडतर्फ केले. प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. तातडीच्या प्रकरणात वेळ घेवून सर्वोच्च न्यायालयाने सीबीआय प्रमुखाच्या बडतर्फी विरुद्ध निकाल दिला. पण विषय तिथेच संपविला नाही. सीबीआय प्रमुखाची नियुक्ती करणारी जी समिती होती तिची बैठक घेण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला. हा मुद्दाच सर्वोच्च न्यायालया समोर नव्हता. सरकारनेही अशी मागणी केलीच नव्हती. पण सरकारने बडतर्फ केलेला सीबीआय प्रमुख त्याच पदावर कायम राहणे हे केवळ सरकारसाठी अप्रतिष्ठेचे नव्हते तर अडचणीचेही होते. सरकारने "अवैध" मार्गाने बडतर्फ केलेल्या सीबीआय प्रमुखाला "वैध"मार्गाने बडतर्फ करण्यासाठी सीबीआय प्रमुखाच्या नियुक्तीसाठी असलेली समितीची बैठक बोलावण्याचा आदेश देण्यात आला होता. घटनेचे पालन करतो असे दर्शविण्यासाठी निर्णय द्यावा लागला आणि त्यामुळे सरकारची अडचण होत असेल तर तशा निर्णया सोबत अडचणीतून सुटका करण्याचा मार्गही दाखवायचा ही गेल्या १० वर्षातील सर्वोच्च परंपरा राहिली आहे.                                                                     

कलम ३७० प्रकरणात मागे घडून गेलेले सीबीआय प्रमुखाच्या प्रकरणाचे स्मरण व्हावे असेच घडले. सर्वोच्च न्यायालया समोर कलम ३७० रद्द करण्याची सरकारची कृती वैध की अवैध एवढाच मुद्दा होता. सरकारने अवलंबलेली पद्धत घटनात्मकदृष्ट्या अवैध असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला. पण सर्वोच्च न्यायालय तिथेच थांबले नाही. सरकारने जरी चुकीच्या पद्धतीने कलम ३७० रद्द केले असले तरी कलम ३७० रद्द करण्याचा राष्ट्रपतींना अधिकार असल्याचा निर्णय दिला. राष्ट्रपतींना असा अधिकार असल्याचा दावा सरकारने केलाच नव्हता. सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रपतीला असा अधिकार "प्रदान" केला नसता तर सरळ सरळ कलम ३७० रद्द करण्याची सरकारची कृती अवैध ठरली असती. या प्रकरणात तर अशा अनेक गोष्टी सर्वोच्च न्यायालयाने केल्या ज्यावर निर्णय देण्याची मागणी कोणीच केली नव्हती अगदी सरकार पक्षाने देखील केली नव्हती. अशा प्रकारच्या निर्णयात महत्वाचा निर्णय होता जम्मू-काश्मीर राज्याची स्वतंत्र राज्यघटना रद्द करण्याचा निर्णय. कलम ३७० मधील तरतुदी रद्द करण्याची अधिसूचना काढताना राष्ट्रपतींनी राज्याच्या राज्यघटनेला हात लावला नव्हता. त्यामुळे ५ ऑगस्ट २०१९ ला कलम ३७० रद्द करण्याच्या निघालेल्या अधिसुचने नंतर तब्बल ४ वर्ष सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये देशाची राज्यघटना आणि राज्याची घटना याचे सहअस्तित्व होते. कोणाच्याही मागणीविना सर्वोच्च न्यायालयाने हे सहअस्तित्व संपविले. जशी कलम ३७० प्रकरणी सरकारची सरकारच्या अवैध कृतीतून न्यायालयाने सरकारची सुटका केली तशीच सुटका याच प्रकरणात विचाराधीन असलेल्या जम्मू-काश्मीर राज्य पुनार्रचना विधेयका बाबत केल्याचे आपण बघितले आहे. पूर्ण अधिकार असलेल्या राज्याचे रुपांतर केंद्रशासित प्रदेशात करण्याचा सरकारला व संसदेला अधिकार आहे का या मुद्द्यावर निर्णय न देवून सर्वोच्च न्यायालयाने सरकारची अडचण होवू दिली नव्हती.                                                                                                     

त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करणे अनपेक्षित नव्हते. अनपेक्षित होते ते या निर्णयाच्या समर्थनार्थ दिलेली कारणे आणि असा निर्णय देण्यासाठी घटनेची केलेली व्याख्या. घटनेत लिहिलेले शब्द आणि त्या शब्दांचा शब्दकोशातीलच नव्हे तर व्यावहारिक अर्थ लक्षात घेतला तरी कलम ३७० प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा घटनेवर चालविलेला बुलडोजर वाटतो. कलम ३७० चा व्यवहारातला प्रभाव सरकारने कलम ३७० रद्द करण्याच्या व सर्वोच्च न्यायालयाने सरकारच्या या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्याच्या पुष्कळ आधीच संपला होता. त्यामुळे व्यावहारिकदृष्ट्या या निर्णयाने परिस्थितीत काहीच फरक पडलेला नाही. कलम ३७० रद्द होण्याआधीची काश्मीरमध्ये असलेली स्थिती व लोकभावना आणि कलम ३७० रद्द केल्यानंतरची काश्मीरची स्थिती आणि लोकभावना यामध्ये फरक पडलेला नाही. फरक पडला हा सरकारचा प्रचार होता आणि या प्रचाराने तसा लोकभ्रम तयार करण्यात सरकारला यशही आले होते. सरकार करीत असलेला प्रचार खोटा आहे हे पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर लोकांना हळू हळू समजायला लागले आहे. खरे तर पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या आधीही कलम ३७० रद्द झाल्यानंतर कित्येक आतंकवादी हल्ले झाले होते. काश्मीर मधील आतंकवाद कलम ३७० मुळे आहे या मागच्या ७० वर्षाच्या संघपरिवाराच्या प्रचाराचा प्रभाव जनमानसावर एवढा होता की जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवादी घटना घडत असतानाही जम्मू-काश्मिरात कलम ३७० रद्द झाल्यानंतर शांतता नांदत असल्याच्या सरकारी प्रचारावर जनतेने डोळेझाकून विश्वास ठेवला. असे डोळे झाकल्यामुळे आम्हाला काश्मीरमध्ये असुरक्षित वाटते , जम्मू मध्ये काम द्या अशी तब्बल ३१० दिवस मागणी करत आंदोलन करणारे काश्मिरी पंडीत कर्मचारी जनतेला दिसले नाहीत ! 

-----------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि.यवतमाळ 
मोबाईल - ९४२२१६८१५८ 

Wednesday, June 11, 2025

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - १३१

भारतीय संविधान सभेने कलम ३७० ची रचना करताना यात संसदेची काहीच भूमिका ठेवली नाही हे कलम ३७० च्या वाचनातून लक्षात येईल. प्रत्यक्षातही ५ ऑगस्ट २०१९ पर्यंत भारतीय संसदेत काश्मीर राज्या विषयी कोणताही निर्णय घेतला गेला नव्हता. कलम ३७० मध्ये उल्लेख आहे तो राष्ट्रपतीचा, राज्यशासनाचा आणि काश्मीरच्या संविधान सभेचा ! निर्णयाची ही साखळी सर्वोच्च न्यायालयाने लक्षात घेतली नाही.
---------------------------------------------------------------------------------------

 
सोयीचे तर्क देत कलम ३७० वरील निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे. यामुळे निकाल अंतर्विरोधाने भरलेला आहे. जशा इतर अनेक राज्यांसाठी तात्पुरत्या व विशेष तरतुदी संविधानात केल्या आहेत तशीच कलम ३७० ची तरतूद काश्मीर बाबत करण्यात आल्याचे कोर्ट सांगते. हा तर्क मान्य केला तर इतर राज्यांसाठी ज्या विशेष तरतुदी आहेत त्या सुरु आहेत तशी कलम ३७० ची तरतूद सुरु राहिली असती तर काही फरक पडला नसता असा अर्थ होतो. मग कलम ३७० रद्द करण्याचा आटापिटा सरकारने व न्यायालयाने कशासाठी केला या प्रश्नाचे एकच उत्तर असू शकते आणि ते म्हणजे इतर राज्यांसाठीच्या तात्पुरत्या आणि विशेष तरतुदी आणि काश्मीरसाठीच्या तात्पुरत्या आणि विशेष तरतुदी यात फरक आहे. हा फरक आणखी एका गोष्टीतून अधोरेखित होतो. कलम ३७० वरील सुनावणी दरम्यान एक प्रश्न वारंवार उपस्थित करण्यात आला तो म्हणजे संविधानात तात्पुरते म्हणून उल्लेख करण्यात आलेले कलम ३७० इतक्या वर्षात कसे रद्द करण्यात आले नाही ! हा प्रश्न उपस्थित करणाऱ्यात अग्रणी होते न्यायमूर्ती चंद्रचूड. इतर राज्यांसाठी असलेल्या तात्पुरत्या आणि विशेष तरतुदी अजूनही कशा सुरु आहेत हा प्रश्न मात्र चंद्रचूड किंवा कलम ३७० च्या तात्पुरत्या उल्लेखाकडे अंगुलीनिर्देश करणाऱ्या कोणालाही पडला नाही. त्या सुरु राहिल्या तरी चालतात पण कलम ३७० राहिल्याने अनर्थ घडतो असे वाटण्यातच काश्मीरसाठी करण्यात आलेल्या तरतुदीचे वेगळेपण सिद्ध होते. कलम ३७० रद्द झाल्याने घटनात्मक एकीकरणाचा मार्ग मोकळा झाल्याचा जो उल्लेख सर्वोच्च न्यायालयाने केला त्यातूनही इतर राज्यांसाठीच्या विशेष तरतुदी आणि काश्मीरसाठीच्या विशेष तरतुदी यात फरक असल्याचे स्पष्ट होते. आणखी एका बाबीतून हा फरक स्पष्ट होतो. कलम ३७० हे फक्त काश्मीरसाठी होते तसेच कलम ३७१ हे इतर राज्यांसाठी आहे. ३७१ अबकड... अशा उपकलमाखाली इतर काही राज्यांचा समावेश करण्यात आला आहे. आता कलम ३७० मध्ये जशी ते कलम रद्द कसे करता येईल याची प्रक्रिया दिली होती तशी कलम ३७१ अंतर्गत काही राज्यांसाठी विशेष तरतुदी करताना ते कलम तात्पुरत्या सदरात मोडत असताना देखील ते कलम रद्द करण्याची कोणतीही प्रक्रिया दिलेली नाही. हीच गोष्ट कलम ३७० आणि कलम ३७१ मधील फरक स्पष्ट करणारी आहे. कलम ३७० चे वेगळेपण ध्वनित करणारी आहे. कलम ३७१ रद्द करण्याची वेगळी प्रक्रिया दिली नाही याचा अर्थ एखादे कलम वगळण्याची किंवा एखादे कलम नव्याने समाविष्ट करण्याची जी तरतूद संविधानात करण्यात आली आहे त्या सर्वसाधारण तरतुदी अंतर्गत कलम ३७१ मध्ये संसदेला बदल करता येईल किंवा ते रद्द करता येईल. कलम ३७० बाबत असा अधिकार संसदेला नव्हता. भारतीय संविधान सभेने कलम ३७० ची रचना करताना यात संसदेची काहीच भूमिका ठेवली नाही हे कलम ३७० च्या वाचनातून लक्षात येईल.                                           

कलम ३७० मध्ये उल्लेख आहे तो राष्ट्रपतीचा, राज्यशासनाचा आणि काश्मीरच्या संविधान सभेचा ! यातही निहित हेच होते की राष्ट्रपती कलम ३७० अंतर्गत जी काही कृती करेल ती राज्यसरकार, राज्य विधान सभा किंवा राज्याची संविधान सभा यांच्या सूचनेने किंवा संमतीने. राज्याची संविधान सभा गठीत होण्यापूर्वी राज्यसरकारच्या सल्ल्याने व संमतीने राष्ट्रपतींनी काश्मीर बाबत जे निर्णय घेतले असतील ते निर्णय देखील स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा अधिकार राज्याच्या संविधान सभेला होता. म्हणजे भारताचे राष्ट्रपती, राज्याचे सरकार किंवा विधानसभा आणि राज्याची संविधान सभा यांच्या काश्मीर बाबतच्या अधिकारात अंतिम अधिकार हे संविधान सभेचे होते. म्हणून भारतीय संविधान सभेने कलम ३७० रद्द करायचे की नाही याचा अंतिम निर्णय काश्मीरच्या संविधान सभेकडे सोपवला होता. भारताचे राष्ट्रपती ही स्थायी संस्था होती किंवा राज्याचे निर्वाचित सरकार ही देखील स्थायी संस्था म्हणता येईल. राज्याची संविधान सभा ही काही स्थायी संस्था नव्हती. संविधान बनविण्याचे काम पूर्ण झाले की तिचे प्रयोजन संपणार होते. भारतीय संविधान सभे समोर ही बाब स्पष्ट असताना संविधान सभेने कलम ३७० चा अंतिम निर्णय राज्याच्या संविधान सभे वर सोपवला होता. कलम ३७० बाबत निर्णय न घेताच काश्मीरची संविधान सभा विसर्जित झाल्याने राष्ट्रपतींना कलम ३७० रद्द करण्यासाठी काश्मीरच्या संविधान सभेच्या शिफारसीची गरज उरली नाही हा सर्वोच्च न्यायालयाने काढलेला अर्थ भारतीय संविधान सभेच्या निर्णयाशी विसंगत आहे. काश्मीरच्या संविधान सभेने कलम ३७० बाबत निर्णय घेतला नाही हे सर्वोच्च न्यायालयाचे प्रतिपादन चुकीचे आहे. काश्मीरच्या संविधान सभेने कलम ३७० मध्ये एक दुरुस्ती सुचविली होती आणि भारताच्या राष्ट्रपतींनी कलम ३७० मधील दुरुस्तीची अधिसूचना देखील जारी केली होती. याचा अर्थच त्या दुरुस्तीसह कलम ३७० कायम ठेवण्याचा निर्णय तिथल्या संविधान सभेने घेतला होता. कलम ३७१ मध्ये ते कलम सुरु ठेवण्याची किंवा रद्द करण्याची अशी कोणतीही निहित प्रक्रिया नाही.  हे मोठे आणि महत्वाचे वेगळेपण या दोन कलमात आहे. इतर राज्यांसाठी जशा तात्पुरत्या विशेष तरतुदी केल्यात तशाच जम्मू-काश्मीर राज्यांसाठी तात्पुरत्या विशेष तरतुदी करण्यात आल्या या सर्वोच्च न्यायालयाच्या प्रतिपादनाने कलम ३७० चे मोठे आणि महत्वाचे वेगळेपण झाकोळले गेले आहे.                                                                                                                                 

याचा असा अर्थ नाही की कलम ३७० मध्ये निहित वेगळेपण असामान्य आहे आणि आणि कलम ३७१ अंतर्गत काही राज्यांना देण्यात आलेले वेगळे अधिकार सामान्य श्रेणीतील आहेत. कलम ३७० लागू असताना काश्मीरला देखील असे विशेष अधिकार नव्हते जे कलम ३७१ अंतर्गत काही राज्यांना विशेष अधिकार मिळाले आहेत. काश्मीर बाबत जशी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाची धारणा होती की देशात 'एक विधान ,एक निशाण आणि एक प्रधान' याच्या आड कलम ३७० येते अगदी तसेच कलम ३७१ अंतर्गत काही राज्यांना जे विशेष अधिकार मिळाले आहेत ते भारतीय जनता पक्षाच्या धारणेच्या आड येणारे आहेत. कलम ३७० रद्द करण्याचा ठराव संसदेत मांडल्या नंतर काही सदस्यांनी कलम ३७० सारखेच कलम ३७१ असताना ते रद्द करण्याचा निर्णय सरकार का घेत नाही असा प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देतांना गृहमंत्री अमित शाह यांनी कलम ३७० ची तुलना कलम ३७१ शी होवू शकत नाही असे सांगितले होते. पण कलम ३७० संपूर्ण राज्यघटना लागू करण्यातील अडथळा असल्याचे भारतीय जनता पक्षाच्या सरकारचे मत होते आणि वेगळ्या शब्दात सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात या मताला दुजोरा दिला आहे. कलम ३७१ अंतर्गत काही राज्यांसाठी केलेल्या तरतुदी या राज्यघटनेचा पूर्ण अंमल होण्यात अडथळा ठरणाऱ्या आहेत की नाहीत यावर सर्वोच्च न्यायालयाने भाष्य केले नसले तरी गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत सरकारच्या वतीने जे भाष्य केले त्यावरून कलम ३७१ हे एक विधान,एक निशाण आणि एक प्रधान याच्या आड न येणारे निरुपद्रवी कलम वाटते. पण काही राज्यासाठी करण्यात आलेल्या काही तरतुदी तसे दर्शवत नाही. कलम ३७० व कलम ३७१ एका पारड्यात तोलू नका म्हणत केंद्र सरकारने काश्मीरला लक्ष्य  केले तर या उलट कलम ३७१ मध्ये काही राज्यांसाठी जशा विशेष तरतुदी आहेत तशाच तरतुदी काश्मीरसाठी कलम ३७० अंतर्गत करण्यात आल्या असे मानणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाकडून बळी गेल्या त्या कलम ३७० अंतर्गत करण्यात आलेल्या तरतुदी. 

---------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि. यवतमाळ 
मोबाईल : ९४२२१६८१५८ 

Friday, May 30, 2025

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - १३०

जम्मू-काश्मीरची राज्यघटना जागतिक पातळीवर भारताचा काश्मीरवरील ताबा व दावा ही जबरदस्तीची कृती नसून ती विधीसंमत असल्याचे दर्शविणारा महत्वाचा दस्तावेज होता. . जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य भाग असल्याचे या राज्यघटनेत नमूद करण्यात आले होते. ती राज्यघटनाच सर्वोच्च न्यायालयाने निरस्त केली.
----------------------------------------------------------------------------------------


सर्वोच्च न्यायालयाने कलम ३७० प्रकरणी सुनावणी करताना आणि निर्णय देतांना अनेक असे मुद्दे पुढे आणलेत जे या प्रकरणातील अर्जदार आणि प्रतिवादी या दोहोनीही उचलले नव्हते किंवा त्यावर बाजूही मांडली नव्हती. सर्वोच्च न्यायालयाने उचललेल्या अनाहूत मुद्द्यावर मुख्यत: घटनापीठाचे प्रमुख चंद्रचूड यांनी बाजू मांडली आणि त्यावर वादी-प्रतिवादी यांचे म्हणणे ऐकून न घेताच निर्णय दिला. अशा मुद्द्यांमध्ये एक प्रमुख मुद्दा होता जम्मू-काश्मीरची राज्यघटना. संसदेच्या शिफारशी वरून राष्ट्रपतींनी कलम ३७० रद्द करण्या संदर्भात जे घटनात्मक आदेश क्रमांक २७२ आणि २७३ काढले होते त्यात कुठेही असे म्हंटले नव्हते की जम्मू-काश्मीर मध्ये पूर्ण राज्यघटना लागू झाल्याने जम्मू-काश्मीरची राज्यघटना अस्तित्वात राहण्याचे कारण उरलेले नाही. उलट जून २०१९ मध्ये राष्ट्रपतींनी कलम ३७० रद्द करण्या संबंधी काढलेल्या आदेशानंतर या बाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय होईपर्यंत म्हणजे तब्बल ५ वर्षे कलम ३७० अस्तित्वात नसताना जम्मू-काश्मीरची राज्यघटना अस्तित्वात होती. संघपरिवार आणि पूर्वीचा जनसंघ व आताचा भारतीय जनता पक्ष यांची जम्मू-काश्मीर संदर्भात सातत्याने आवडती घोषणा राहिली आहे, "देश मे दो प्रधान, दो निशाण और दो विधान नही चलेंगे" ! तरीही भारतीय जनता पक्षाच्या सरकारने कलम ३७० रद्द करण्या संदर्भात काढलेल्या आदेशात जम्मू-काश्मीरची राज्यघटना निष्क्रिय किंवा रद्द झाल्याचे म्हंटले नव्हते. जम्मू-काश्मीरची राज्यघटना सर्वोच्च न्यायालयाने निष्क्रिय केली. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर काश्मीर संदर्भात भारताची बाजू मांडताना भारतीय शिष्टमंडळानी वेळोवेळी जम्मू-काश्मीरच्या राज्यघटनेचा आधार घेतला आहे.  जम्मू-काश्मीरची राज्यघटना जागतिक पातळीवर भारताचा काश्मीरवरील ताबा व दावा ही जबरदस्तीची कृती नसून ती विधीसंमत असल्याचे दर्शविणारा महत्वाचा दस्तावेज होता. . जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य भाग असल्याचे या राज्यघटनेत नमूद करण्यात आले होते.  जम्मू-काश्मीरच्या निर्वाचित घटनासमितीने तिथल्या राज्यघटनेत हे नमूद करतानाच कलम ३७० चे अस्तित्व कायम राखले होते. याचा अर्थ स्पष्ट आहे कलम ३७० चे अस्तित्व, जम्मू-काश्मीरची राज्यघटना अस्तित्वात असणे आणि जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य भाग असणे यात कोणताही अंतर्विरोध नव्हता, या बाबी एकमेकांच्या विरोधात नव्हत्या तर परस्पर पूरक अशा होत्या.                           


 कोणाचीही मागणी नसताना जम्मू-काश्मीरची राज्यघटना निरस्त किंवा निष्क्रिय करताना सर्वोच्च न्यायालयाने असा तर्क दिला आहे की कलम ३७० मुळे जम्मू-काश्मीरची राज्यघटना अस्तित्वात आली. आता कलम ३७०च अस्तित्वात नसल्याने जम्मू-काश्मीरची राज्यघटना अस्तित्वात राहण्याचे कारण उरलेले नाही. इथे पुन्हा सर्वोच्च न्यायालयाने घटनेच्या पलीकडे जावून इतिहासातील घडामोडीचा चुकीचा किंवा सोयीचा अर्थ काढला आहे. कलम ३७० चा उपयोग या संबंधी आदेश काढण्यासाठी झालेला आहे. कलम ३७० अस्तित्वात आले तेव्हा हे गृहीत होते की जम्मू-काश्मीरचा राज्यकारभार तिथल्या अस्तित्वात असलेल्या कायदेशीर तरतुदीनूसार चालणार. काश्मीरसाठीच नाही तर सर्व संस्थाना पुढे सामिलीकरणाच्या वेळी दोन पर्याय ठेवण्यात आले होते. एक तर तयार होत असलेली भारतीय राज्यघटना स्वीकारा व त्याप्रमाणे कारभार करा किंवा निर्वाचित प्रतिनिधीकडून राज्यासाठी नवी लोकशाही प्रधान राज्यघटना तयार करा व त्याप्रमाणे कारभार करा. चार-पाच संस्थानांनी दुसरा पर्याय निवडून घटना तयार करण्याचे काम प्रारंभ केले होते पण मधेच ते सोडून त्यांनी भारतीय राज्यघटनेचा स्वीकार केला. जम्मू आणि काश्मीर एकमेव राज्य होते ज्याने दुसरा पर्याय निवडून स्वत:ची राज्यघटना तयार केली व त्याप्रमाणे राज्यकारभार केला. राज्याच्या पर्यायी राज्यघटनेचा मुद्दा कलम ३७० अस्तित्वात येण्याच्या आधी चर्चिला गेला होता व त्याला मान्यता दिली गेली होती. त्यामुळे कलम ३७० च्या कुशीतून काश्मीरच्या राज्यघटनेचा जन्म झाला असे म्हणण्याला ऐतिहासिक आधार नाही. हा सर्वोच्च न्यायालयाचा कुतर्क आहे. काश्मीरमध्ये जे काही घडले आणि घडत आहे ते केवळ कलम ३७० मुळे हा प्रचार सत्ताधारी भाजपाकडून सतत केला गेला. कलम ३७० आहे म्हणून काश्मीरची राज्यघटना आहे हा प्रचार त्यांचाच.                                                                                                                                 

काश्मीरच्या राज्यघटनेचा वेगळा संदर्भ सर्वोच्च न्यायालयाने लक्षात घेतला नाही. जम्मू-काश्मीरने वेगळ्या राज्यघटनेचा आग्रह कायम राखला म्हणून कलम ३७० आले असे म्हणता येवू शकते पण कलम ३७० आले म्हणून जमू-काश्मीरची राज्यघटना अस्तित्वात आली असे म्हणणे सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य निष्कर्षाच्या विरोधात जाते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा डोलाराच मुळी भारतीय राज्यघटना काश्मीरमध्ये लागू करण्यासाठी भारतीय राज्यघटनेत कलम ३७० समाविष्ट करण्यात आले यावर उभा आहे. निर्णयाचा हा पायाच कसा भुसभुशीत आहे हे पुढे पाहू पण सध्या एवढेच ध्यानात घ्यायचे आहे की कलम ३७० मुळे जम्मू-काश्मीरची राज्यघटना अस्तित्वात आली आणि भारतीय राज्यघटनेचा विस्तार करण्यासाठी कलम ३७० भारतीय राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आले हे सर्वोच्च न्यायालयाने काढलेले दोन निष्कर्ष परस्पर विरोधी आहेत. भारत हे संघराज्य आहे आणि संघ राज्यात राज्याच्या व केंद्राची राज्यघटनेचे सहअस्तित्व असणे ही जगन्मान्य गोष्ट आहे. भारतीय जनता पक्षाला ते मान्य नसेलही पण भारतीय जनता पक्षाला काय हवे काय नको हे पाहणे सर्वोच्च न्यायालयाचे काम नव्हते. राज्यांना - संस्थानांना- वेगळ्या राज्यघटना बनविण्याची अनुमती देतांना हे गृहीतच होते की सर्वसाधारणपणे संघराज्याची घटना व राज्यांची घटना परस्पर विरोधी असणार नाही पण राज्यातील परिस्थितीनुसार राज्याच्या घटनेचे संघराज्याच्या घटनेपेक्षा वेगळेपण असणार आहे. तसे वेगळेपण भारतीय राज्य घटना व जम्मू-काश्मीर राज्यघटना यात पाहायला मिळते. त्यामुळे भारतीय राज्यघटना जम्मू-काश्मीर मध्ये लागू झाली म्हणून कलम ३७० च्या अस्तित्वाला आणि परिणामी जम्मू-काश्मीरच्या वेगळ्या राज्यघटनेच्या अस्तित्वाला अर्थ उरत नाही हा सर्वोच्च न्यायालयाचा निष्कर्ष चुकीचा ठरतो. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात जम्मू-काश्मीरची वेगळी राज्यघटना भारत एकात्म होण्यात अडथळा असल्याचा वास येतो. या बाबतीत भारतीय जनता पक्षाच्या अपप्रचारात आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात विलक्षण साम्य आढळते. 

---------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि. यवतमाळ 
मोबाईल - ९४२२१६८१५८