Friday, June 20, 2025

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - १३२

 घटनेत लिहिलेले शब्द आणि त्या शब्दांचा शब्दकोशातीलच नव्हे तर व्यावहारिक अर्थ लक्षात घेतला तरी कलम ३७० प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा घटनेवर चालविलेला बुलडोजर वाटतो. 
-------------------------------------------------------------------------------------------


कलम ३७० संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल अनपेक्षित नाही. गेल्या १० वर्षातील निकालांकडे दृष्टीक्षेप टाकला तर सर्वोच्च निकालामागचे एक सूत्र स्पष्ट होते. केंद्र सरकार अडचणीत येणार नाही एवढेच नव्हे तर सरकार अडचणीत येत असेल तर अडचणीतून त्याची सुटका करणे हे ते सूत्र. इथे कोणी म्हणेल की इलेक्टोरल बॉंड प्रकरणी नाही का सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला. इथे हे लक्षात घेतले पाहिजे की या निकालाने सरकारची कोणतीच अडचण होणार नव्हती. पार्टीसाठी पैसा मिळविण्याचे एक साधन तेवढे गेले पण इतर अनेक मार्ग उपलब्ध आहेत. सरकारची अडचणीतून सुटका करण्याची कृती कशी असते टी एका प्रकरणावरून तपासता येईल. सरकारला आपल्या मर्जीतल्या अधिकाऱ्याकडे सीबीआय कडील महत्वाची प्रकरणे सोपवायची होती. या अधिकाऱ्यामुळे सीबीआय प्रमुखाचे पद नामधारी ठरू लागले होते. याचा अर्थातच त्यावेळच्या सीबीआय प्रमुखाने विरोध केला. सरकारच्या मर्जीतील अधिकाऱ्यावर विविध गंभीर आरोप ठेवून त्याच्या चौकशीचे आदेश दिले. स्वत: पंतप्रधानांनी सीबीआय प्रमुखाला बोलावून दोन्ही अधिकाऱ्यात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. पण त्यावेळचे सीबीआय प्रमुख सरकारच्या मर्जीतील अधिकाऱ्याची चौकशी करण्यावर ठाम राहिले. सरकारने त्यांना तात्काळ बडतर्फ केले. प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. तातडीच्या प्रकरणात वेळ घेवून सर्वोच्च न्यायालयाने सीबीआय प्रमुखाच्या बडतर्फी विरुद्ध निकाल दिला. पण विषय तिथेच संपविला नाही. सीबीआय प्रमुखाची नियुक्ती करणारी जी समिती होती तिची बैठक घेण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला. हा मुद्दाच सर्वोच्च न्यायालया समोर नव्हता. सरकारनेही अशी मागणी केलीच नव्हती. पण सरकारने बडतर्फ केलेला सीबीआय प्रमुख त्याच पदावर कायम राहणे हे केवळ सरकारसाठी अप्रतिष्ठेचे नव्हते तर अडचणीचेही होते. सरकारने "अवैध" मार्गाने बडतर्फ केलेल्या सीबीआय प्रमुखाला "वैध"मार्गाने बडतर्फ करण्यासाठी सीबीआय प्रमुखाच्या नियुक्तीसाठी असलेली समितीची बैठक बोलावण्याचा आदेश देण्यात आला होता. घटनेचे पालन करतो असे दर्शविण्यासाठी निर्णय द्यावा लागला आणि त्यामुळे सरकारची अडचण होत असेल तर तशा निर्णया सोबत अडचणीतून सुटका करण्याचा मार्गही दाखवायचा ही गेल्या १० वर्षातील सर्वोच्च परंपरा राहिली आहे.                                                                     

कलम ३७० प्रकरणात मागे घडून गेलेले सीबीआय प्रमुखाच्या प्रकरणाचे स्मरण व्हावे असेच घडले. सर्वोच्च न्यायालया समोर कलम ३७० रद्द करण्याची सरकारची कृती वैध की अवैध एवढाच मुद्दा होता. सरकारने अवलंबलेली पद्धत घटनात्मकदृष्ट्या अवैध असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला. पण सर्वोच्च न्यायालय तिथेच थांबले नाही. सरकारने जरी चुकीच्या पद्धतीने कलम ३७० रद्द केले असले तरी कलम ३७० रद्द करण्याचा राष्ट्रपतींना अधिकार असल्याचा निर्णय दिला. राष्ट्रपतींना असा अधिकार असल्याचा दावा सरकारने केलाच नव्हता. सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रपतीला असा अधिकार "प्रदान" केला नसता तर सरळ सरळ कलम ३७० रद्द करण्याची सरकारची कृती अवैध ठरली असती. या प्रकरणात तर अशा अनेक गोष्टी सर्वोच्च न्यायालयाने केल्या ज्यावर निर्णय देण्याची मागणी कोणीच केली नव्हती अगदी सरकार पक्षाने देखील केली नव्हती. अशा प्रकारच्या निर्णयात महत्वाचा निर्णय होता जम्मू-काश्मीर राज्याची स्वतंत्र राज्यघटना रद्द करण्याचा निर्णय. कलम ३७० मधील तरतुदी रद्द करण्याची अधिसूचना काढताना राष्ट्रपतींनी राज्याच्या राज्यघटनेला हात लावला नव्हता. त्यामुळे ५ ऑगस्ट २०१९ ला कलम ३७० रद्द करण्याच्या निघालेल्या अधिसुचने नंतर तब्बल ४ वर्ष सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये देशाची राज्यघटना आणि राज्याची घटना याचे सहअस्तित्व होते. कोणाच्याही मागणीविना सर्वोच्च न्यायालयाने हे सहअस्तित्व संपविले. जशी कलम ३७० प्रकरणी सरकारची सरकारच्या अवैध कृतीतून न्यायालयाने सरकारची सुटका केली तशीच सुटका याच प्रकरणात विचाराधीन असलेल्या जम्मू-काश्मीर राज्य पुनार्रचना विधेयका बाबत केल्याचे आपण बघितले आहे. पूर्ण अधिकार असलेल्या राज्याचे रुपांतर केंद्रशासित प्रदेशात करण्याचा सरकारला व संसदेला अधिकार आहे का या मुद्द्यावर निर्णय न देवून सर्वोच्च न्यायालयाने सरकारची अडचण होवू दिली नव्हती.                                                                                                     

त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करणे अनपेक्षित नव्हते. अनपेक्षित होते ते या निर्णयाच्या समर्थनार्थ दिलेली कारणे आणि असा निर्णय देण्यासाठी घटनेची केलेली व्याख्या. घटनेत लिहिलेले शब्द आणि त्या शब्दांचा शब्दकोशातीलच नव्हे तर व्यावहारिक अर्थ लक्षात घेतला तरी कलम ३७० प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा घटनेवर चालविलेला बुलडोजर वाटतो. कलम ३७० चा व्यवहारातला प्रभाव सरकारने कलम ३७० रद्द करण्याच्या व सर्वोच्च न्यायालयाने सरकारच्या या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्याच्या पुष्कळ आधीच संपला होता. त्यामुळे व्यावहारिकदृष्ट्या या निर्णयाने परिस्थितीत काहीच फरक पडलेला नाही. कलम ३७० रद्द होण्याआधीची काश्मीरमध्ये असलेली स्थिती व लोकभावना आणि कलम ३७० रद्द केल्यानंतरची काश्मीरची स्थिती आणि लोकभावना यामध्ये फरक पडलेला नाही. फरक पडला हा सरकारचा प्रचार होता आणि या प्रचाराने तसा लोकभ्रम तयार करण्यात सरकारला यशही आले होते. सरकार करीत असलेला प्रचार खोटा आहे हे पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर लोकांना हळू हळू समजायला लागले आहे. खरे तर पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या आधीही कलम ३७० रद्द झाल्यानंतर कित्येक आतंकवादी हल्ले झाले होते. काश्मीर मधील आतंकवाद कलम ३७० मुळे आहे या मागच्या ७० वर्षाच्या संघपरिवाराच्या प्रचाराचा प्रभाव जनमानसावर एवढा होता की जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवादी घटना घडत असतानाही जम्मू-काश्मिरात कलम ३७० रद्द झाल्यानंतर शांतता नांदत असल्याच्या सरकारी प्रचारावर जनतेने डोळेझाकून विश्वास ठेवला. असे डोळे झाकल्यामुळे आम्हाला काश्मीरमध्ये असुरक्षित वाटते , जम्मू मध्ये काम द्या अशी तब्बल ३१० दिवस मागणी करत आंदोलन करणारे काश्मिरी पंडीत कर्मचारी जनतेला दिसले नाहीत ! 

-----------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि.यवतमाळ 
मोबाईल - ९४२२१६८१५८ 

Wednesday, June 11, 2025

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - १३१

भारतीय संविधान सभेने कलम ३७० ची रचना करताना यात संसदेची काहीच भूमिका ठेवली नाही हे कलम ३७० च्या वाचनातून लक्षात येईल. प्रत्यक्षातही ५ ऑगस्ट २०१९ पर्यंत भारतीय संसदेत काश्मीर राज्या विषयी कोणताही निर्णय घेतला गेला नव्हता. कलम ३७० मध्ये उल्लेख आहे तो राष्ट्रपतीचा, राज्यशासनाचा आणि काश्मीरच्या संविधान सभेचा ! निर्णयाची ही साखळी सर्वोच्च न्यायालयाने लक्षात घेतली नाही.
---------------------------------------------------------------------------------------

 
सोयीचे तर्क देत कलम ३७० वरील निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे. यामुळे निकाल अंतर्विरोधाने भरलेला आहे. जशा इतर अनेक राज्यांसाठी तात्पुरत्या व विशेष तरतुदी संविधानात केल्या आहेत तशीच कलम ३७० ची तरतूद काश्मीर बाबत करण्यात आल्याचे कोर्ट सांगते. हा तर्क मान्य केला तर इतर राज्यांसाठी ज्या विशेष तरतुदी आहेत त्या सुरु आहेत तशी कलम ३७० ची तरतूद सुरु राहिली असती तर काही फरक पडला नसता असा अर्थ होतो. मग कलम ३७० रद्द करण्याचा आटापिटा सरकारने व न्यायालयाने कशासाठी केला या प्रश्नाचे एकच उत्तर असू शकते आणि ते म्हणजे इतर राज्यांसाठीच्या तात्पुरत्या आणि विशेष तरतुदी आणि काश्मीरसाठीच्या तात्पुरत्या आणि विशेष तरतुदी यात फरक आहे. हा फरक आणखी एका गोष्टीतून अधोरेखित होतो. कलम ३७० वरील सुनावणी दरम्यान एक प्रश्न वारंवार उपस्थित करण्यात आला तो म्हणजे संविधानात तात्पुरते म्हणून उल्लेख करण्यात आलेले कलम ३७० इतक्या वर्षात कसे रद्द करण्यात आले नाही ! हा प्रश्न उपस्थित करणाऱ्यात अग्रणी होते न्यायमूर्ती चंद्रचूड. इतर राज्यांसाठी असलेल्या तात्पुरत्या आणि विशेष तरतुदी अजूनही कशा सुरु आहेत हा प्रश्न मात्र चंद्रचूड किंवा कलम ३७० च्या तात्पुरत्या उल्लेखाकडे अंगुलीनिर्देश करणाऱ्या कोणालाही पडला नाही. त्या सुरु राहिल्या तरी चालतात पण कलम ३७० राहिल्याने अनर्थ घडतो असे वाटण्यातच काश्मीरसाठी करण्यात आलेल्या तरतुदीचे वेगळेपण सिद्ध होते. कलम ३७० रद्द झाल्याने घटनात्मक एकीकरणाचा मार्ग मोकळा झाल्याचा जो उल्लेख सर्वोच्च न्यायालयाने केला त्यातूनही इतर राज्यांसाठीच्या विशेष तरतुदी आणि काश्मीरसाठीच्या विशेष तरतुदी यात फरक असल्याचे स्पष्ट होते. आणखी एका बाबीतून हा फरक स्पष्ट होतो. कलम ३७० हे फक्त काश्मीरसाठी होते तसेच कलम ३७१ हे इतर राज्यांसाठी आहे. ३७१ अबकड... अशा उपकलमाखाली इतर काही राज्यांचा समावेश करण्यात आला आहे. आता कलम ३७० मध्ये जशी ते कलम रद्द कसे करता येईल याची प्रक्रिया दिली होती तशी कलम ३७१ अंतर्गत काही राज्यांसाठी विशेष तरतुदी करताना ते कलम तात्पुरत्या सदरात मोडत असताना देखील ते कलम रद्द करण्याची कोणतीही प्रक्रिया दिलेली नाही. हीच गोष्ट कलम ३७० आणि कलम ३७१ मधील फरक स्पष्ट करणारी आहे. कलम ३७० चे वेगळेपण ध्वनित करणारी आहे. कलम ३७१ रद्द करण्याची वेगळी प्रक्रिया दिली नाही याचा अर्थ एखादे कलम वगळण्याची किंवा एखादे कलम नव्याने समाविष्ट करण्याची जी तरतूद संविधानात करण्यात आली आहे त्या सर्वसाधारण तरतुदी अंतर्गत कलम ३७१ मध्ये संसदेला बदल करता येईल किंवा ते रद्द करता येईल. कलम ३७० बाबत असा अधिकार संसदेला नव्हता. भारतीय संविधान सभेने कलम ३७० ची रचना करताना यात संसदेची काहीच भूमिका ठेवली नाही हे कलम ३७० च्या वाचनातून लक्षात येईल.                                           

कलम ३७० मध्ये उल्लेख आहे तो राष्ट्रपतीचा, राज्यशासनाचा आणि काश्मीरच्या संविधान सभेचा ! यातही निहित हेच होते की राष्ट्रपती कलम ३७० अंतर्गत जी काही कृती करेल ती राज्यसरकार, राज्य विधान सभा किंवा राज्याची संविधान सभा यांच्या सूचनेने किंवा संमतीने. राज्याची संविधान सभा गठीत होण्यापूर्वी राज्यसरकारच्या सल्ल्याने व संमतीने राष्ट्रपतींनी काश्मीर बाबत जे निर्णय घेतले असतील ते निर्णय देखील स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा अधिकार राज्याच्या संविधान सभेला होता. म्हणजे भारताचे राष्ट्रपती, राज्याचे सरकार किंवा विधानसभा आणि राज्याची संविधान सभा यांच्या काश्मीर बाबतच्या अधिकारात अंतिम अधिकार हे संविधान सभेचे होते. म्हणून भारतीय संविधान सभेने कलम ३७० रद्द करायचे की नाही याचा अंतिम निर्णय काश्मीरच्या संविधान सभेकडे सोपवला होता. भारताचे राष्ट्रपती ही स्थायी संस्था होती किंवा राज्याचे निर्वाचित सरकार ही देखील स्थायी संस्था म्हणता येईल. राज्याची संविधान सभा ही काही स्थायी संस्था नव्हती. संविधान बनविण्याचे काम पूर्ण झाले की तिचे प्रयोजन संपणार होते. भारतीय संविधान सभे समोर ही बाब स्पष्ट असताना संविधान सभेने कलम ३७० चा अंतिम निर्णय राज्याच्या संविधान सभे वर सोपवला होता. कलम ३७० बाबत निर्णय न घेताच काश्मीरची संविधान सभा विसर्जित झाल्याने राष्ट्रपतींना कलम ३७० रद्द करण्यासाठी काश्मीरच्या संविधान सभेच्या शिफारसीची गरज उरली नाही हा सर्वोच्च न्यायालयाने काढलेला अर्थ भारतीय संविधान सभेच्या निर्णयाशी विसंगत आहे. काश्मीरच्या संविधान सभेने कलम ३७० बाबत निर्णय घेतला नाही हे सर्वोच्च न्यायालयाचे प्रतिपादन चुकीचे आहे. काश्मीरच्या संविधान सभेने कलम ३७० मध्ये एक दुरुस्ती सुचविली होती आणि भारताच्या राष्ट्रपतींनी कलम ३७० मधील दुरुस्तीची अधिसूचना देखील जारी केली होती. याचा अर्थच त्या दुरुस्तीसह कलम ३७० कायम ठेवण्याचा निर्णय तिथल्या संविधान सभेने घेतला होता. कलम ३७१ मध्ये ते कलम सुरु ठेवण्याची किंवा रद्द करण्याची अशी कोणतीही निहित प्रक्रिया नाही.  हे मोठे आणि महत्वाचे वेगळेपण या दोन कलमात आहे. इतर राज्यांसाठी जशा तात्पुरत्या विशेष तरतुदी केल्यात तशाच जम्मू-काश्मीर राज्यांसाठी तात्पुरत्या विशेष तरतुदी करण्यात आल्या या सर्वोच्च न्यायालयाच्या प्रतिपादनाने कलम ३७० चे मोठे आणि महत्वाचे वेगळेपण झाकोळले गेले आहे.                                                                                                                                 

याचा असा अर्थ नाही की कलम ३७० मध्ये निहित वेगळेपण असामान्य आहे आणि आणि कलम ३७१ अंतर्गत काही राज्यांना देण्यात आलेले वेगळे अधिकार सामान्य श्रेणीतील आहेत. कलम ३७० लागू असताना काश्मीरला देखील असे विशेष अधिकार नव्हते जे कलम ३७१ अंतर्गत काही राज्यांना विशेष अधिकार मिळाले आहेत. काश्मीर बाबत जशी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाची धारणा होती की देशात 'एक विधान ,एक निशाण आणि एक प्रधान' याच्या आड कलम ३७० येते अगदी तसेच कलम ३७१ अंतर्गत काही राज्यांना जे विशेष अधिकार मिळाले आहेत ते भारतीय जनता पक्षाच्या धारणेच्या आड येणारे आहेत. कलम ३७० रद्द करण्याचा ठराव संसदेत मांडल्या नंतर काही सदस्यांनी कलम ३७० सारखेच कलम ३७१ असताना ते रद्द करण्याचा निर्णय सरकार का घेत नाही असा प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देतांना गृहमंत्री अमित शाह यांनी कलम ३७० ची तुलना कलम ३७१ शी होवू शकत नाही असे सांगितले होते. पण कलम ३७० संपूर्ण राज्यघटना लागू करण्यातील अडथळा असल्याचे भारतीय जनता पक्षाच्या सरकारचे मत होते आणि वेगळ्या शब्दात सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात या मताला दुजोरा दिला आहे. कलम ३७१ अंतर्गत काही राज्यांसाठी केलेल्या तरतुदी या राज्यघटनेचा पूर्ण अंमल होण्यात अडथळा ठरणाऱ्या आहेत की नाहीत यावर सर्वोच्च न्यायालयाने भाष्य केले नसले तरी गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत सरकारच्या वतीने जे भाष्य केले त्यावरून कलम ३७१ हे एक विधान,एक निशाण आणि एक प्रधान याच्या आड न येणारे निरुपद्रवी कलम वाटते. पण काही राज्यासाठी करण्यात आलेल्या काही तरतुदी तसे दर्शवत नाही. कलम ३७० व कलम ३७१ एका पारड्यात तोलू नका म्हणत केंद्र सरकारने काश्मीरला लक्ष्य  केले तर या उलट कलम ३७१ मध्ये काही राज्यांसाठी जशा विशेष तरतुदी आहेत तशाच तरतुदी काश्मीरसाठी कलम ३७० अंतर्गत करण्यात आल्या असे मानणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाकडून बळी गेल्या त्या कलम ३७० अंतर्गत करण्यात आलेल्या तरतुदी. 

---------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि. यवतमाळ 
मोबाईल : ९४२२१६८१५८ 

Friday, May 30, 2025

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - १३०

जम्मू-काश्मीरची राज्यघटना जागतिक पातळीवर भारताचा काश्मीरवरील ताबा व दावा ही जबरदस्तीची कृती नसून ती विधीसंमत असल्याचे दर्शविणारा महत्वाचा दस्तावेज होता. . जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य भाग असल्याचे या राज्यघटनेत नमूद करण्यात आले होते. ती राज्यघटनाच सर्वोच्च न्यायालयाने निरस्त केली.
----------------------------------------------------------------------------------------


सर्वोच्च न्यायालयाने कलम ३७० प्रकरणी सुनावणी करताना आणि निर्णय देतांना अनेक असे मुद्दे पुढे आणलेत जे या प्रकरणातील अर्जदार आणि प्रतिवादी या दोहोनीही उचलले नव्हते किंवा त्यावर बाजूही मांडली नव्हती. सर्वोच्च न्यायालयाने उचललेल्या अनाहूत मुद्द्यावर मुख्यत: घटनापीठाचे प्रमुख चंद्रचूड यांनी बाजू मांडली आणि त्यावर वादी-प्रतिवादी यांचे म्हणणे ऐकून न घेताच निर्णय दिला. अशा मुद्द्यांमध्ये एक प्रमुख मुद्दा होता जम्मू-काश्मीरची राज्यघटना. संसदेच्या शिफारशी वरून राष्ट्रपतींनी कलम ३७० रद्द करण्या संदर्भात जे घटनात्मक आदेश क्रमांक २७२ आणि २७३ काढले होते त्यात कुठेही असे म्हंटले नव्हते की जम्मू-काश्मीर मध्ये पूर्ण राज्यघटना लागू झाल्याने जम्मू-काश्मीरची राज्यघटना अस्तित्वात राहण्याचे कारण उरलेले नाही. उलट जून २०१९ मध्ये राष्ट्रपतींनी कलम ३७० रद्द करण्या संबंधी काढलेल्या आदेशानंतर या बाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय होईपर्यंत म्हणजे तब्बल ५ वर्षे कलम ३७० अस्तित्वात नसताना जम्मू-काश्मीरची राज्यघटना अस्तित्वात होती. संघपरिवार आणि पूर्वीचा जनसंघ व आताचा भारतीय जनता पक्ष यांची जम्मू-काश्मीर संदर्भात सातत्याने आवडती घोषणा राहिली आहे, "देश मे दो प्रधान, दो निशाण और दो विधान नही चलेंगे" ! तरीही भारतीय जनता पक्षाच्या सरकारने कलम ३७० रद्द करण्या संदर्भात काढलेल्या आदेशात जम्मू-काश्मीरची राज्यघटना निष्क्रिय किंवा रद्द झाल्याचे म्हंटले नव्हते. जम्मू-काश्मीरची राज्यघटना सर्वोच्च न्यायालयाने निष्क्रिय केली. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर काश्मीर संदर्भात भारताची बाजू मांडताना भारतीय शिष्टमंडळानी वेळोवेळी जम्मू-काश्मीरच्या राज्यघटनेचा आधार घेतला आहे.  जम्मू-काश्मीरची राज्यघटना जागतिक पातळीवर भारताचा काश्मीरवरील ताबा व दावा ही जबरदस्तीची कृती नसून ती विधीसंमत असल्याचे दर्शविणारा महत्वाचा दस्तावेज होता. . जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य भाग असल्याचे या राज्यघटनेत नमूद करण्यात आले होते.  जम्मू-काश्मीरच्या निर्वाचित घटनासमितीने तिथल्या राज्यघटनेत हे नमूद करतानाच कलम ३७० चे अस्तित्व कायम राखले होते. याचा अर्थ स्पष्ट आहे कलम ३७० चे अस्तित्व, जम्मू-काश्मीरची राज्यघटना अस्तित्वात असणे आणि जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य भाग असणे यात कोणताही अंतर्विरोध नव्हता, या बाबी एकमेकांच्या विरोधात नव्हत्या तर परस्पर पूरक अशा होत्या.                           


 कोणाचीही मागणी नसताना जम्मू-काश्मीरची राज्यघटना निरस्त किंवा निष्क्रिय करताना सर्वोच्च न्यायालयाने असा तर्क दिला आहे की कलम ३७० मुळे जम्मू-काश्मीरची राज्यघटना अस्तित्वात आली. आता कलम ३७०च अस्तित्वात नसल्याने जम्मू-काश्मीरची राज्यघटना अस्तित्वात राहण्याचे कारण उरलेले नाही. इथे पुन्हा सर्वोच्च न्यायालयाने घटनेच्या पलीकडे जावून इतिहासातील घडामोडीचा चुकीचा किंवा सोयीचा अर्थ काढला आहे. कलम ३७० चा उपयोग या संबंधी आदेश काढण्यासाठी झालेला आहे. कलम ३७० अस्तित्वात आले तेव्हा हे गृहीत होते की जम्मू-काश्मीरचा राज्यकारभार तिथल्या अस्तित्वात असलेल्या कायदेशीर तरतुदीनूसार चालणार. काश्मीरसाठीच नाही तर सर्व संस्थाना पुढे सामिलीकरणाच्या वेळी दोन पर्याय ठेवण्यात आले होते. एक तर तयार होत असलेली भारतीय राज्यघटना स्वीकारा व त्याप्रमाणे कारभार करा किंवा निर्वाचित प्रतिनिधीकडून राज्यासाठी नवी लोकशाही प्रधान राज्यघटना तयार करा व त्याप्रमाणे कारभार करा. चार-पाच संस्थानांनी दुसरा पर्याय निवडून घटना तयार करण्याचे काम प्रारंभ केले होते पण मधेच ते सोडून त्यांनी भारतीय राज्यघटनेचा स्वीकार केला. जम्मू आणि काश्मीर एकमेव राज्य होते ज्याने दुसरा पर्याय निवडून स्वत:ची राज्यघटना तयार केली व त्याप्रमाणे राज्यकारभार केला. राज्याच्या पर्यायी राज्यघटनेचा मुद्दा कलम ३७० अस्तित्वात येण्याच्या आधी चर्चिला गेला होता व त्याला मान्यता दिली गेली होती. त्यामुळे कलम ३७० च्या कुशीतून काश्मीरच्या राज्यघटनेचा जन्म झाला असे म्हणण्याला ऐतिहासिक आधार नाही. हा सर्वोच्च न्यायालयाचा कुतर्क आहे. काश्मीरमध्ये जे काही घडले आणि घडत आहे ते केवळ कलम ३७० मुळे हा प्रचार सत्ताधारी भाजपाकडून सतत केला गेला. कलम ३७० आहे म्हणून काश्मीरची राज्यघटना आहे हा प्रचार त्यांचाच.                                                                                                                                 

काश्मीरच्या राज्यघटनेचा वेगळा संदर्भ सर्वोच्च न्यायालयाने लक्षात घेतला नाही. जम्मू-काश्मीरने वेगळ्या राज्यघटनेचा आग्रह कायम राखला म्हणून कलम ३७० आले असे म्हणता येवू शकते पण कलम ३७० आले म्हणून जमू-काश्मीरची राज्यघटना अस्तित्वात आली असे म्हणणे सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य निष्कर्षाच्या विरोधात जाते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा डोलाराच मुळी भारतीय राज्यघटना काश्मीरमध्ये लागू करण्यासाठी भारतीय राज्यघटनेत कलम ३७० समाविष्ट करण्यात आले यावर उभा आहे. निर्णयाचा हा पायाच कसा भुसभुशीत आहे हे पुढे पाहू पण सध्या एवढेच ध्यानात घ्यायचे आहे की कलम ३७० मुळे जम्मू-काश्मीरची राज्यघटना अस्तित्वात आली आणि भारतीय राज्यघटनेचा विस्तार करण्यासाठी कलम ३७० भारतीय राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आले हे सर्वोच्च न्यायालयाने काढलेले दोन निष्कर्ष परस्पर विरोधी आहेत. भारत हे संघराज्य आहे आणि संघ राज्यात राज्याच्या व केंद्राची राज्यघटनेचे सहअस्तित्व असणे ही जगन्मान्य गोष्ट आहे. भारतीय जनता पक्षाला ते मान्य नसेलही पण भारतीय जनता पक्षाला काय हवे काय नको हे पाहणे सर्वोच्च न्यायालयाचे काम नव्हते. राज्यांना - संस्थानांना- वेगळ्या राज्यघटना बनविण्याची अनुमती देतांना हे गृहीतच होते की सर्वसाधारणपणे संघराज्याची घटना व राज्यांची घटना परस्पर विरोधी असणार नाही पण राज्यातील परिस्थितीनुसार राज्याच्या घटनेचे संघराज्याच्या घटनेपेक्षा वेगळेपण असणार आहे. तसे वेगळेपण भारतीय राज्य घटना व जम्मू-काश्मीर राज्यघटना यात पाहायला मिळते. त्यामुळे भारतीय राज्यघटना जम्मू-काश्मीर मध्ये लागू झाली म्हणून कलम ३७० च्या अस्तित्वाला आणि परिणामी जम्मू-काश्मीरच्या वेगळ्या राज्यघटनेच्या अस्तित्वाला अर्थ उरत नाही हा सर्वोच्च न्यायालयाचा निष्कर्ष चुकीचा ठरतो. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात जम्मू-काश्मीरची वेगळी राज्यघटना भारत एकात्म होण्यात अडथळा असल्याचा वास येतो. या बाबतीत भारतीय जनता पक्षाच्या अपप्रचारात आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात विलक्षण साम्य आढळते. 

---------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि. यवतमाळ 
मोबाईल - ९४२२१६८१५८   

Thursday, May 22, 2025

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - १२९

 सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने कलम ३६७ चा आधार घेत कलम ३७० मधील 'राज्याची घटनासमिती' ऐवजी 'राज्याची विधानसभा' हा केंद्र सरकारने केलेला बदल रद्द करणारा निर्णयच तेवढा घटनेला धरून होता. या व्यतिरिक्त कलम ३७० संदर्भातील निर्णय पूर्णत: राजकीय स्वरूपाचा आहे. 
--------------------------------------------------------------------------------------------


सगळे चुकतात तसे न्यायालयही चुकू शकते आणि हे कलम ३७० प्रकरणात निर्णय देण्यासाठी स्थापित घटनापीठाचे अध्यक्ष न्यायमूर्ती चंद्रचूड चांगलेच जाणून आहेत. आणीबाणी काळात जबलपूर एडीएम प्रकरणात त्यांच्या पिताश्रीने दिलेला निर्णय चुकीचा होता असा निर्णय देणाऱ्या घटनापीठाचे ते सदस्य होते. तो निर्णय कसा चुकीचा होता या निर्णयाचे लेखन त्यांनी स्वत: केले होते. त्यामुळे कलम ३७० च्या ऐतिहासिक आकलनात घटनापिठाची चूक झाली असेल तर ती बाब आक्षेपार्ह ठरत नाही. कलम ३७० प्रकरणी न्यायालयाचे आकलनच चुकले नाही तर न्यायालयाने घटनेच्या कलमाचे वाचन करण्यातच गडबड केली. उदाहरणार्थ २५ नोव्हेंबर १९४९ च्या युवराज करणसिंग यांनी काढलेली अधिसूचना वाचताना 'राज्यघटनेत काश्मीर संदर्भातील तरतुदी' हा वाक्यातील भाग वगळून  देशात राज्यघटना लागू झाल्यानंतर ती काश्मीरमध्ये लागू होईल असे सरळसोट वाचन केले. एकवेळ झाले तर चुकून नजरेआड झाले असेल असा संशयाचा फायदा देता आला असता. पण घटनेतील तरतुदी वाचनात घटनापीठाने एकापेक्षा अधिक वेळा चुका केल्या आहेत. घटनेतील कलम ३७० [१] च्या तरतुदीनूसार राष्ट्रपतींना भारतीय राज्यघटनेतील तरतुदी जम्मू-काश्मीर मध्ये लागू करण्याचा अधिकार आहे पण त्यासाठी तिथल्या राज्यसरकारची सहमती हवी. घटनापीठाने यातील राज्यसरकारच्या सहमतीला महत्व दिले नाही. घटनेच्या कलमातील या तरतुदीला महत्व न देण्याचे अतिशय हास्यास्पद कारण घटनापीठाने दिले. राज्यसरकारच्या सहमतीची तरतूद ही घटनात्मक अनिवार्यता नसून घटना समितीने काश्मिरी जनतेप्रती दाखविलेली सद्भावना असल्याचे घटनापीठाने म्हंटले.                                                                                                                 

अशीच गंभीर चूक घटनापीठाने कलम ३७० [३] बाबत केली आहे. कलम ३७० रद्द करण्याचा किंवा त्यात बदल करण्याचा राष्ट्रपतींना अधिकार आहे पण त्यासाठी राज्याच्या घटनासमितीची शिफारस किंवा संमती आवश्यक आहे. न्यायालयाने या वाक्यातील पहिला भाग लक्षात घेतला आणि दुसरा भाग न्यायालयाच्या दृष्टीने अर्थशून्य ठरला. वाक्याचा आत्मा असलेला भाग अर्थशून्य ठरवताना कोणताही घटनात्मक आधार न्यायालयाने दिला नाही. यासाठी दिलेले कारण पूर्णत: राजकीय होते. इथे पुन्हा एक गोष्ट नमूद केली पाहिजे की न्यायालयाने सुनावणी दरम्यान वारंवार सांगितले होते की कलम ३७० रद्द करण्याची सरकारची कृती घटनात्मक आहे की नाही याचा निर्णय घटनेच्या चौकटीतच घेवू. याचा दुसरा अर्थ असा होतो की काश्मीर कोणत्या परिस्थितीत आणि कोणत्या अटी व शर्तीनुसार भारतात सामील झाले ते आम्ही बघणार नाही. राष्ट्रपतींनी कलम ३७० रद्द करण्या संदर्भात काढलेले आदेश घटनेनूसार आहे की नाही हे बघूनच निर्णय देणार. पण प्रत्यक्षात सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने कलम ३६७ चा आधार घेत कलम ३७० मधील 'राज्याची घटनासमिती' ऐवजी 'राज्याची विधानसभा' हा केलेला बदल रद्द करणारा निर्णयच तेवढा घटनेला धरून होता. या व्यतिरिक्त कलम ३७० संदर्भातील निर्णय पूर्णत: राजकीय स्वरूपाचा आहे. 

कलम ३७०[३] मध्ये कलम ३७० मध्ये बदल किंवा ते कलम राष्ट्रपती रद्द करू शकतील पण त्यासाठी जम्मू-काश्मीर संविधान सभेची शिफारस किंवा संमती असेल तरच असे स्पष्ट लिहिलेले असताना आणि यापूर्वीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात संविधान सभेच्या शिफारशी शिवाय राष्ट्रपती कलम ३७० [३] अंतर्गत मिळालेले अधिकार वापरू शकत नाही हे नमूद असताना कलम ३७० प्रकरणी निकाल देतांना घटनापीठाने जम्मू-काश्मीर संविधान सभेची शिफारस राष्ट्रपतीवर बंधनकारक नसल्याचा निष्कर्ष काढला. या निष्कर्षासाठी जे कारण दिले ते घटनात्मक नसून राजकीय स्वरूपाचे आहे. संविधान सभेत कलम ३७० वर झालेल्या चर्चेचा शब्द न शब्द लिखित स्वरुपात उपलब्ध असल्याने संविधान सभेच्या सदस्यांनी वापरलेल्या शब्दांचा अर्थ लक्षात घेण्या ऐवजी शब्दामागील भावना शोधणे हे सर्वोच्च न्यायालयाचे काम नव्हते. कलम ३७० घटनेत समाविष्ट करण्याचा हेतू जम्मू-काश्मीर मध्ये भारतीय राज्यघटना लागू करणे हा होता असे न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठाने दावा केला आहे. भारताच्या घटना समितीत कलम ३७० प्रस्तावित करताना केलेल्या गोपालस्वामी अय्यंगार यांच्या भाषणात आणि कलम ३७० चा प्रस्तावावर घटनासमितीच्या सदस्यांनी जे विचार व्यक्त केलेत त्यात कोणीही असे म्हंटले नाही की कलम ३७० भारतीय राज्यघटना जम्मू-काश्मीरमध्ये लागू करण्यासाठी स्वीकारलेले आहे.                               

इतर राज्यांपेक्षा जम्मू-काश्मीरला वेगळा दर्जा देणारे किंवा जम्मू-काश्मीरचे वेगळे स्थान दर्शविणारे हे कलम आहे याबाबत घटनासमितीच्या कोणत्याच सदस्याच्या मनात शंका नव्हती. असे वेगळे स्थान देणे , मान्य करणे कितपत योग्य आहे याबाबतचा संभ्रम घटनासमितीच्या सदस्यांच्या बोलण्यातून व्यक्त झाला . पण घटना समितीतीतील कोणाचेही असे म्हणणे कधीच नव्हते की जम्मू-काश्मीर मध्ये भारतीय राज्यघटना लागू करण्यासाठी कलम ३७० चा घटनेत समाविष्ट करण्यात आले. कलम ३७० मुळे भारतीय राज्यघटनेचा विस्तार जम्मू-काश्मीरमध्ये करणे सोपे आणि सोयीचे झाले असा दावा संसदेत कलम ३७० रद्द करण्या संदर्भात झालेल्या चर्चेला उत्तर देतांना  तत्कालीन गृहमंत्री गुलझारीलाल नंदा यांनी केला होता. कलम ३७० ही भींत नसून काश्मिरात प्रवेश सुलभ करणारा बोगदा असल्याने कलम ३७० रद्द करणे हिताचे नसल्याचे ते बोलले होते. अगदी नेहरू काळापासून केंद्र सरकारने कलम ३७० चा उपयोग भारतीय राज्य घटनेची विविध कलमे लागू करण्यासाठी केला हे अगदी खरे आहे. पण घटना समितीचा कलम ३७० समाविष्ट करण्यामागे तो हेतू होता असे घटनासमितीतील चर्चेतून दुरान्वयानेही तसा अर्थ ध्वनित होत नाही. कलम ३७० च्या प्रत्येक उपकलमातून आणि प्रत्येक शब्दातून काय ध्वनित होत असेल तर ते हेच होते की भारताशी कसे संबंध ठेवायचे याचे संपूर्ण अधिकार जम्मू-काश्मीर राज्याला असतील. सामीलनाम्यात जम्मू-काश्मीर राज्याचे जे विषय भारताच्या सुपूर्द करण्यात आले ते विषय सोडले तर बाकी विषयावर निर्णय घेण्याचे सर्वाधिकार जम्मू-काश्मीरकडे असतील हे घटना समितीने मान्य केले आणि ते लक्षात घेवूनच कलम ३७० ची रचना करण्यात आली. त्यामुळे भारतीय राज्यघटना जम्मू-काश्मीरमध्ये लागू करण्याच्या हेतूनेच कलम ३७० स्वीकारले गेले हे सर्वोच्च न्यायालयाचे म्हणणे पूर्णत: निराधार आहे. कल्पित गोष्टीच्या आधारे घेतलेला निर्णय घटनात्मक असू शकत नाही. 
--------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि. यवतमाळ 
मोबाईल : ९४२२१६८१५८ 

Thursday, May 15, 2025

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - १२८

सर्वोच्च न्यायालय दावा करते तशी भारतीय राज्यघटना जम्मू-काश्मीर मध्ये युवराज करणसिंग यांच्या २५ नोव्हेंबर १९४९ च्या अधिसूचनेने लागू झाली नाही. ती लागू करण्यासाठी जम्मू-काश्मीरचे प्रवेशद्वार किलकिले झाले ते १९५२ साली पंडीत नेहरू आणि शेख अब्दुल्ला यांच्यात झालेल्या कराराने. या कराराने आंशिक स्वरुपात भारतीय राज्यघटना जम्मू-काश्मीर मध्ये लागू होण्याचा मार्ग मोकळा झाला हेच ऐतिहासिक सत्य आहे.
-------------------------------------------------------------------------------------------


राजा हरीसिंग यांनी आपले सर्व अधिकार युवराज करणसिंग यांचेकडे सुपूर्द केले असले तरी सामीलनाम्यावर सही करण्याआधी राजा हरीसिंग यांचेकडे जसे सर्वंकष,सर्वव्यापी व अंतिम अधिकार होते तशी स्थिती युवराज करणसिंग यांची नव्हती. ते जम्मू-काश्मिरातील अंतरिम सरकारचे प्रमुख होते व मंत्रीमंडळाच्या सल्ल्याने निर्णय घेण्याचे बंधन त्यांचेवर होते. त्यामुळे राजा हरीसिंग यांनी ज्या सामीलनाम्यावर राजा म्हणून स्वत:च्या अधिकारात स्वाक्षरी केली होती त्यात एकतर्फी बदल करण्याचा अधिकार युवराज करणसिंग यांना नव्हता. अंतरिम सरकार निर्णय घेईल त्याप्रमाणे आदेश काढणे हे त्यांचे काम होते. जसे केंद्र सरकारच्या निर्णयाची अधिसूचना राष्ट्रपतीच्या सहीने निघते किंवा राज्यसरकारच्या निर्णयाची अधिसूचना राज्यपालाच्या स्वाक्षरीने निघते अगदी अशाच प्रकारे युवराज करणसिंग यांच्या सहीने अधिसूचना निघत. त्यांचे स्थान सार्वभौम राजाचे नव्हते तर आज राज्यपालाचे जे स्थान आहे तसे त्याकाळी ते जम्मू-काश्मीरचे राजप्रमुख होते आणि अंतरिम सरकारच्या सल्ल्याने राज्यकारभार चालवीत होते. जम्मू-काश्मीर राज्याचे भारता सोबत कसे संबंध असतील याच्या वाटाघाटी त्याकाळी सुरु होत्या आणि या वाटाघाटीचे नेतृत्व जम्मू-काश्मीरच्या वतीने शेख अब्दुल्ला करीत होते. त्यावेळच्या केंद्र सरकारने राजा हरीसिंग यांनी जरी आपले सर्व अधिकार युवराज करणसिंग यांचेकडे सोपविलेले असले तरी केंद्र सरकार वाटाघाटी करीत होते ते शेख अब्दुल्ला यांचेशी. युवराज करणसिंग यांचे सोबत नव्हे. ही गोष्टच स्पष्ट करते की सामीलनामा अंमलात येण्या आधी राजा हरीसिंग जसे जम्मू-काश्मीरचे सार्वभौम राजे होते ते स्थान करणसिंग यांचे नव्हते.                 

करणसिंग यांचे तसे स्थान असते तर इतर संस्थानिकांनी सामीलनाम्या नंतर बिनशर्त विलीनीकरण करण्याच्या दस्तावेजावर त्यांच्या इच्छेनुसार स्वाक्षरी करू शकले असते. तशी स्वाक्षरी केली असती तर काश्मीरचे स्थान इतर राज्यापेक्षा वेगळे राहिलेच नसते. युवराज करणसिंग यांनी विलीनीकरणाच्या दस्तावेजावर स्वाक्षरी केलेली नसताना २५ नोव्हेंबर १९४९ ची अधिसूचना काढून त्यांनी राजा म्हणून जम्मू-काश्मीरच्या सामिलनाम्यातील राखून ठेवलेल्या अधिकारावर पाणी सोडले असे मानणे केवळ सोयीस्कर अर्थ काढणे नसून इतिहासाचे केलेले विकृतीकरण आहे. सर्वोच्च न्यायालयाचा कलम ३७० संदर्भातील निकाल इतिहासाच्या विकृतीकरणाचा नमुना म्हणता येईल असा आहे. युवराज करणसिंग यांना ना सामिलनाम्यात बदल करण्याचा सार्वभौम अधिकार होता ना सार्वभौम अधिकारात २५ नोव्हेंबर १९४९ ची अधिसूचना त्यांनी जारी केली. ज्या सरकारचे ते प्रमुख होते त्या सरकारच्या सल्ल्याने त्यांनी ही अधिसूचना जारी केली होती. ती अधिसूचनाही संपूर्ण भारतीय राज्यघटना काश्मीरमध्ये लागू करण्याची नव्हती तर काश्मीर संदर्भात जी कलमे राज्यघटनेत समाविष्ट असतील ती लागू करण्या संदर्भात होती. सर्वोच्च न्यायालयाने मात्र आपल्या निकालात ती अधिसूचना संपूर्ण राज्यघटना जम्मू-काश्मिरात लागू करणारी होती असे म्हंटले आहे. कोणत्या पार्श्वभूमीवर ती अधिसूचना काढण्यात आली आणि २६ जानेवारी १९५० रोजी भारतात राज्यघटनेचा अंमल सुरु झाला तेव्हा काश्मीर मध्ये राज्यघटना लागू झाली की नाही हे लक्षात घेतले तर सर्वोच्च न्यायालयाचा या संदर्भातील दावा फोल असल्याचे लक्षात येईल. 

युवराज करणसिंग यांनी २५ नोव्हेंबर १९४९ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेच्या आधी शेख अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखालील जम्मू-काश्मीरच्या प्रतिनिधी मंडळाच्या भारत आणि जम्मू-काश्मीर यांचे संबंध कसे असतील हे निश्चित करण्यासाठी भारत सरकार सोबत वाटाघाटी आणि चर्चा सुरु होती. या वाटाघाटीच्या परिणामी भारतीय घटना समितीच्या विचारार्थ आणि संमतीसाठी कलम ३०६ अ चा मसुदा ठेवण्यात आला . युवराज करणसिंग यांच्या मंत्रीमंडळातील पंतप्रधान शेख अब्दुल्ला यांनी भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू व गृहमंत्री सरदार पटेल यांच्याशी वाटाघाटी केल्या होत्या. या वाताघाटीतून कलम ३०६ अ चा जन्म झाला ज्याचे प्रारूप गोपालस्वामी अय्यंगार यांनी तयार केले व घटनासमितीत चर्चेसाठी व स्वीकृतीसाठी मांडले. हे कलम केवळ जम्मू-काश्मीरसाठी असू नये तर इतरही राज्यांना लागू व्हावे असा मुद्दा उत्तर प्रदेशातून घटनासमितीत आलेले हसरत मोवानी यांनी मांडला. पण चर्चेच्या शेवटी मतदानासाठी हे कलम आले तेव्हा जम्मू-काश्मीरसाठीचे हे विशेष कलम घटनासमितीत जवळपास सर्वसंमतीने स्वीकृत करण्यात आले. १७ ऑक्टोबर १९४९ रोजी कलम ३०६ अ हे अधिकृतपणे कलम ३७० म्हणून राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आले. हे कलम आणि सामीलनाम्यात संरक्षण ,परराष्ट्र धोरण आणि दळणवळण या संदर्भातील सर्वाधिकार भारताला प्रदान करण्यात आलेले असल्याने त्या संदर्भातील घटनेतील कलमे जम्मू-काश्मीरमध्ये लागू करण्यासाठी आपल्या मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार युवराज करणसिंग यांनी २५ नोव्हेंबर १९४९ रोजी अधिसूचना जारी केली. २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय राज्यघटना भारतात लागू झाली तेव्हा जम्मू-काश्मीरमध्ये फक्त भारतीय राज्यघटनेतील कलम ३७० लागू झाले आणि कलम ३७० मधील निहित प्रक्रियेचा अवलंब करत भारतीय राज्यघटनेचे कलम १ लागू झाले होते. युवराज करणसिंग यांनी काढलेली अधिसूचना ही संपूर्ण भारतीय राज्यघटना जम्मू-काश्मीरमध्ये लागू करण्यासाठी नव्हती तर भारतीय राज्यघटनेतील कलम ३७० व कलम १ लागू करण्यासाठी होते.                                                                     

कलम १ प्रमाणे भारत हा राज्याचा संघ आहे व कलम १ जम्मू-काश्मीरमध्ये लागू केल्याने जम्मू-काश्मीर भारतीय संघराज्याचा भाग बनले. जम्मू-काश्मीरने सामीलनाम्यानुसार भारतीय संघराज्याचा हिस्सा बनण्यास मान्यता दिली असली तरी भारत आणि जम्मू-काश्मीरचे संबंध सामीलनाम्यातील अटी व शर्तीनुसार असतील याला मान्यता देणारे कलम ३७० होते. याचाच अर्थ जम्मू-काश्मीर भारतीय संघराज्याचा हिस्सा बनला असला तरी घटनात्मक संबंध निश्चित करणारे कलम होते ३७०. या पलीकडे २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय राज्यघटनेचा अंमल जम्मू-काश्मीर मध्ये झालेला नव्हता. भारतीय राज्यघटना जम्मू-काश्मीर मध्ये लागू करण्यासाठी जम्मू-काश्मीरचे प्रवेशद्वार किलकिले झाले ते १९५२ साली पंडीत नेहरू आणि शेख अब्दुल्ला यांच्यात झालेल्या कराराने. या कराराने आंशिक स्वरुपात भारतीय राज्यघटना जम्मू-काश्मीर मध्ये लागू होण्याचा मार्ग मोकळा झाला असे म्हणता येईल. पण कराराच्या अंमलबजावणीत नेहरू - अब्दुल्ला यांच्यात झालेलेले मतभेद आणि होत असलेल्या विलंबाने अधीर झालेल्या नेहरूंनी शेख अब्दुल्ला यांना पदावरून काढून टाकण्याचा व अटक करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतरच या कराराला कायदेशीर स्वरूप देणारा १९५४ चा राष्ट्रपतीचा आदेश जारी होवू शकला आणि या आदेशानुसार राज्यघटनेची काही कलमे लागू झालीत. नंतर हळू हळू कलम ३७० मधील प्रक्रियेचा अवलंब करत राष्ट्रपतीच्या आदेशाने जम्मू-काश्मीर मध्ये भारतीय राज्यघटनेचा विस्तार होत गेला. पण जम्मू-काश्मीरमध्ये राज्यघटना लागू होण्याशी युवराज करणसिंग यांची २५ नोव्हेंबर १९४९ ची अधिसूचना कारण आणि निमित्त नसताना सर्वोच्च न्यायालयाने तसा निष्कर्ष काढला.  काश्मीर हे इतर राज्यांपेक्षा वेगळे नव्हते हे दाखवून देण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आटापिटा होता पण तथ्य न्यायालयाच्या निष्कर्ष व निर्णयाच्या विरोधात आहेत. 

------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि.यवतमाळ 
मोबाईल - ९४२२१६८१५८ 

Thursday, May 8, 2025

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - १२७

 २५ नोव्हेंबर १९४९ रोजी जम्मू-काश्मीरचे राजप्रमुख म्हणून करणसिंग यांनी काढलेल्या अधिसूचनेच्या अर्थाबद्दल कधीच संभ्रम नव्हता. भारताची संपूर्ण राज्यघटना जम्मू-काश्मीरमध्ये लागू करणारी ती अधिसूचना नव्हती तर सामिलनाम्याच्या तरतुदीच्या मर्यादेत भारतीय राज्य्गघटनेच्या तरतुदी जम्मू-काश्मीरमध्ये लागू करण्यासाठी ती अधिसूचना असल्याबद्दल सर्वांमध्ये पुरेपूर स्पष्टता होती. ७६ वर्षानंतर सर्वोच्च न्यायालयाला त्या अधिसुचने बद्दल वेगळाच साक्षात्कार झाला !
-----------------------------------------------------------------------------------------


काश्मीरचा राजा हरीसिंग यांनी भारतात सामील होण्याच्या सामीलनाम्यावर स्वाक्षरी केल्यानंतर काही काळ जम्मू-काश्मीरचे राजप्रमुख म्हणून काम पाहिले. हरीसिंग राजा असले तरी जनतेचे प्रतिनिधी म्हणून शेख अब्दुल्ला हे काश्मीरचे सर्वोच्च नेते होते. राजा हरीसिंग यांच्या राजेशाही विरुद्ध १९३२-३३ पासून त्यांचा संघर्ष सुरु होता. त्यामुळे दोघांचे संबंध ताणलेले होते. राज्याची कार्यकारी सत्ता शेख अब्दुल्ला यांचेकडे सोपविणे सुकर व्हावे यासाठी राजा हरीसिंग यांनी निवृत्त व्हावे व आपले सर्व अधिकार आपला मुलगा करणसिंग यांचेकडे सोपवावे यासाठी त्यांचे मन वळविण्यात आले. राजा हरीसिंग यांनी मार्च १९४८ मध्ये एक आदेश काढून करणसिंग यांचेकडे राजाचे सर्व अधिकार सोपविले. राजप्रमुख बनलेल्या करणसिंग यांच्या नेतृत्वाखाली एक अंतरिम सरकार स्थापन करण्यात आले ज्यात प्रभावी आणि प्रमुख भूमिका शेख अब्दुल्ला यांची होती. शेख अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखालील प्रतिनिधींनी भारत आणि जम्मू-काश्मीरचे संबंध कसे असतील याची भारत सरकारच्या प्रतिनिधी बरोबर चर्चा करून संबंधांची रूपरेषा ठरविली. अंतरिम सरकारच्या शिफारशी वरून किंवा मान्यतेने राजप्रमुख असलेले करणसिंग यांनी २५ नोव्हेंबर १९४९ रोजी एक अधिसूचना जारी केली होती. त्या अधिसूचनेत असे स्पष्ट करण्यात आले होते की लवकरच लागू होणाऱ्या भारतीय राज्यघटनेतील ज्या तरतुदी जम्मू-काश्मीर संदर्भात असतील त्या जम्मू-काश्मीरमध्ये लागू होतील आणि त्या आधारे भारत आणि जम्मू-काश्मीरचे वैधानिक संबंध निर्धारित होतील. सामीलनाम्यातील तरतुदींना वैधानिक मान्यता मिळविण्यासाठी ही अधिसूचना आवश्यक होती. कारण सामीलनाम्यातील तरतुदीनुसार संरक्षण,दळणवळण आणि परराष्ट्र धोरण विषयक भारतीय कायदे जम्मू-काश्मीरमध्ये लागू करायचे होते आणि या तीन विषया संदर्भात कायदे करण्याचे अधिकार भारत सरकारकडे असल्याची वैधानिक मान्यता जम्मू-काश्मीर सरकारकडून घेणे गरजेचे होते. तशी मान्यता देणारी ती अधिसूचना होती. ही अधिसूचना काढण्यात आली तेव्हा भारतीय राज्यघटना लागू व्हायची होती.                                                                                                   

भारतीय राज्यघटने प्रमाणे कलम ३७० व कलम १ ही दोनच कलमे काश्मीरला लागू होणार होती. बाकी भारतीय राज्यघटनेची कलमे लागू करायची झाल्यास ती कशी लागू होतील याची प्रक्रिया कलम ३७० मध्ये देण्यात आली होती. ही प्रक्रिया सुद्धा सामीलनाम्यातील अटी व शर्तीनुसार निर्धारित केली गेली होती. भारताची भावी राज्यघटना स्वीकारण्याचे बंधन राज्याच्या प्रमुखावर असणार नाही. सामीलनाम्यातील विषय वगळता अन्य विषयाच्या घटनात्मक तरतुदी स्वीकारण्याचा किंवा न स्वीकारण्याचा अधिकार राज्याच्या प्रमुखाकडे होता. हेच कलम ३७० मध्ये प्रतिबिंबित झालेले होते. बाकी सर्व संस्थानिकांनी सामीलनाम्या नंतर भारतात पूर्ण विलीन होण्याला व संपूर्ण भारतीय राज्यघटना आपल्या संस्थानात लागू करण्यास मान्यता दिल्याने तिकडे भारतीय राज्यघटना लागू होण्यात काही अडचण नव्हती. जम्मू-काश्मीरच्या राज्य प्रमुखाने विलीनीकरण करारावर स्वाक्षरी न केल्याने इथे सामीलनाम्यातील तरतुदीच्या मर्यादेतच भारतीय राज्यघटना लागू होणार होती. २५ नोव्हेंबर १९४९ ची करणसिंग यांनी राजप्रमुख म्हणून काढलेल्या अधिसूचनेने या मर्यादेत भारतीय राज्यघटना जम्मू-काश्मीर राज्यात लागू करण्याचा मार्ग मोकळा झाला. कलम ३७० संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा ताजा निकाल येईपर्यंत राष्ट्रपतीपासून ते सर्वोच्च न्यायालया पर्यंत आणि केंद्र सरकार पासून ते जम्मू-काश्मीरची संविधान समिती आणि राज्य सरकार यांच्यात २५ नोव्हेंबर १९४९ रोजी जम्मू-काश्मीरचे राजप्रमुख म्हणून काढलेल्या अधिसूचनेच्या अर्थाबद्दल कधीच संभ्रम नव्हता. भारताची संपूर्ण राज्यघटना जम्मू-काश्मीरमध्ये लागू करणारी ती अधिसूचना नव्हती तर सामिलनाम्याच्या तरतुदीच्या मर्यादेत भारतीय राज्य्गघटनेच्या तरतुदी जम्मू-काश्मीरमध्ये लागू करण्यासाठी ती अधिसूचना असल्या बद्दल या सर्वांमध्ये पुरेपूर स्पष्टता होती. अगदी मोदी सरकारचा सुद्धा असा दावा नव्हता की २५ नोव्हेंबर १९४९ च्या अधिसूचनेनुसार जम्मू-काश्मीर राज्यात २६ जानेवारी १९५० रोजीच भारतीय राज्यघटना लागू झालेली आहे. न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील घटनापीठाने ७६ वर्षानंतर त्या अधिसूचनेने २६ जानेवारी १९५० रोजीच संपूर्ण राज्यघटना जम्मू-काश्मीर राज्यात लागू झाल्याचा निष्कर्ष काढला.                                     

ती अधिसूचना काढणाऱ्याला देखील सर्वोच्च न्यायालयाचा ताजा निकाल येईपर्यंत माहित नव्हते की आपण भारतीय राज्यघटना संपूर्णपणे जम्मू-काश्मीर मध्ये लागू करण्यासाठी ती अधिसूचना काढली होती ! नेहरू सरकार पासून मोदी सरकार पर्यंत कोणालाच हे समजले नाही. ही गोष्ट समजली ती फक्त न्यायमूर्ती चंद्रचूड आणि घटनापीठावरील त्यांच्या सहकारी न्यायमूर्तीना ! सर्व ऐतिहासिक तथ्य आणि सत्य बाजूला सारून, १९५० नंतरचा जम्मू-काश्मीरचा घटनात्मक प्रवास नजरेआड करून असा अनैतिहासिक आणि असंवैधानिक निष्कर्ष सर्वोच्च न्यायालयाने काढून आपला कलम ३७० वरील निकाल किती अतार्किक आणि तर्कदुष्ट आहे हे स्वत:च दाखवून दिले आहे. अर्थात घटनापीठाचा हेतू आणि अट्टाहास काश्मीरचे इतर राज्यापेक्षा असलेले वेगळेपण नाकारण्यासाठी आहे. सर्वोच्च न्यायालयासमोर प्रश्न होता तो असा : सरकार पक्ष आणि सरकारने घेतलेल्या निर्णया विरुद्ध सर्वोच्च न्यायालयाकडे अपील करणारा पक्ष या दोहोंचेही एकमत या मुद्द्यावर होते की कलम ३७० मुळे काश्मीरचे वेगळेपण कायम आहे. सरकारपक्षाला हे वेगळेपण संपवायचे होते आणि अपीलकर्त्यांना हे वेगळेपण राखायचे होते. यावर सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने काश्मीरचे वेगळेपण अस्तित्वातच नव्हते अशी बाजू स्वत:च मांडली आणि आपल्याच बाजूने निर्णय दिला ! काश्मीरचे वेगळेपण कशामुळे होते तर काश्मीरने इतर संस्थाना सारखे विलीनीकरण मान्य केले नाही. इतर संस्थानांनी विलीनीकरण करारावर स्वाक्षरी केली तशी काश्मीरने केली नाही. सरसकट भारतीय संविधान लागू करण्यास इतर संस्थानांनी मान्यता दिली तशी काश्मीरने दिली नाही. काश्मीरचा संघर्ष हा या बाबीबद्दल आग्रही असणाऱ्यातील व या बाबींचा विरोध करण्याऱ्यामधील असल्याचे गेली ७५ वर्षे देश बघत आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने २५ नोव्हेंबर १९४९ रोजी करणसिंग यांनी काढलेल्या अधिसूचनेत अभिप्रेत नसलेला अर्थ काढून काश्मीरचे वेगळेपण त्या अधिसुचनेमुळे तेव्हाच संपल्याचा निष्कर्ष वास्तवाकडे सर्वोच्च न्यायालयाने पाठ फिरविली असल्याचे दाखवून देणारा आहे. जो निकाल द्यायचा त्या अनुषंगाने सोयीस्कर असे अन्य निष्कर्ष सर्वोच्च न्यायालयाने काढले आहेत. 
-------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि. यवतमाळ 
मोबाईल : ९४२२१६८१५८ 

Thursday, May 1, 2025

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - १२६

 राजा हरीसिंग यांनी सामीलनाम्यावर स्वाक्षरी केल्या नंतर काश्मीरचे सार्वभौमत्व शिल्लक राहिले का हा मुद्दा ना वादीने उचलला होता ना प्रतिवादीने. घटनापीठातर्फे न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी हा मुद्दा पुढे केला. निर्णयाला प्रभावित करणारा हा मुद्दा असल्यामुळे याबाबतीत स्पष्टता गरजेची असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या निकालात या मुद्द्यावर न्यायालयाने जे निष्कर्ष काढले त्यातून भारतीय घटनासमितीसह आजवरच्या सर्व सरकारांना अक्षरशः वेड्यात काढले.
-----------------------------------------------------------------------------------------


कलम ३७० प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने दिलेला निकाल धक्कादायक आणि वादग्रस्त आहे. प्रकरण सुनावणीसाठी घेतले तेव्हाच सर्वोच्च न्यायालयाने हा विषय गुंतागुंतीचा करून टाकला होता. कलम ३७० प्रकरणी सरकारने घेतलेल्या निर्णयाला जे आव्हान देण्यात आले होते त्यातील मुख्य मुद्दे असे होते : १. कलम ३७० मध्ये दुरुस्ती करून त्या कलमात उल्लेख असलेल्या जम्मू-काश्मीर घटना समिती ऐवजी जम्मू-काश्मीरची विधानसभा असा बदल करणे वैध आहे का ? आव्हानाचा दुसरा मुद्दा होता कलम ३७० मध्ये कलम ३७० रद्द करण्याची , कलम ३७० मध्ये बदल करण्याची निहित प्रक्रिया डावलून राष्ट्रपतींना कलम ३७० रद्द झाल्याचे घोषित करण्याचा एकतर्फी अधिकार आहे का. या दोन मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाला निकाल द्यायचा होता. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने आधीच घोषित केले होते की हा विषय आम्ही घटनेच्या चौकटीतच तपासणार आणि सरकारचा निर्णय घटनेला धरून आहे की नाही एवढेच बघणार. प्रत्यक्षात सर्वोच्च न्यायालयाने अपिलातील जे मुद्दे होते त्याला फाटे फोडले किंवा त्याचा विस्तार केला. विस्ताराचा एक मुद्दा होता राजा हरीसिंग यांनी भारतात सामील होण्याच्या सामीलनाम्यावर स्वाक्षरी केल्या नंतर जम्मू-काश्मीरचे वेगळे सार्वभौम अस्तित्व उरते का. आणि दुसरा मुद्दा होता कलम ३७० तात्पुरते होते की नाही. हे कलम तात्पुरते असल्याचा युक्तिवाद सरकार पक्षाकडून केला गेला पण सरकार पक्षाने असे कुठेही प्रतिपादन केले नव्हते की कलम तात्पुरते असल्याने ते आम्ही रद्द केले. मुळात हा मुद्दा जम्मू-काश्मीर उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय यांनी यापूर्वी दिलेल्या निकालातून निकाली निघाला होता. असे असताना हा मुद्दा नवा समजून विचारात घेण्याचे कारण नव्हते आणि वादी किंवा प्रतिवादिनी या मुद्द्यावर निर्णय मागितलाच नव्हता.                                                                                                                         

जेव्हा कपिल सिब्बल यांनी अपीलकर्त्याच्या वतीने बाजू मांडायला सुरुवात केली तेव्हा त्यांनी कलम ३७० च्या उपकलम ३ मध्ये निर्देशित केल्या प्रमाणे कलम ३७० रद्द करण्यासाठी जम्मू-काश्मीर घटना समितीची शिफारस किंवा मान्यता अनिवार्य असल्याचे दाखवून दिले. घटना समिती विसर्जित झाल्याने दुसऱ्या कोणाच्या शिफारसीने किंवा शिफारसी विना कलम ३७० रद्द करण्याचा राष्ट्रपतींना अधिकार नसल्याचे प्रतिपादन करताच घटनापीठाचे अध्यक्ष असलेले सरन्यायधीश चंद्रचूड यांनी हस्तक्षेप केला. न्या. चंद्रचूड यांनी कपिल सिब्बल यांना सांगितले की जम्मू-काश्मीर घटना समितीचे विसर्जन झाल्यानंतर कलम ३७० कायमस्वरूपी बनले हे स्वीकारले किंवा प्रस्थापित झाले तरच तुमचे म्हणणे मान्य करता येईल. न्या. चंद्रचूड यांचे हे विधान अतिशय धक्कादायक व आक्षेपार्ह असे होते. यावर पूर्वी विचार किंवा निर्णय झालाच नाही, तो आम्हाला आधी घ्यावा लागेल असे सुचविणारे हे विधान होते. एकापेक्षा अधिक प्रकरणात आणि एकापेक्षा अधिक वेळा सर्वोच्च न्यायालयाने हे स्पष्ट केले होते की कलम ३७० रद्द करण्यासाठी जम्मू-काश्मीर घटना समितीची शिफारस किंवा मान्यता अनिवार्य आहे आणि तशी शिफारस करण्यासाठी किंवा मान्यता देण्यासाठी घटना समिती अस्तित्वात नसल्याने घटनेत तात्पुरते म्हणून उल्लेख असलेले कलम ३७० आता भारतीय राज्यघटनेतील कायमस्वरूपी कलम बनले आहे. असे स्पष्टीकरण देण्यात यापूर्वी बनलेल्या घटनापिठाचा देखील समावेश आहे. एकदा दिलेला निर्णय बदलता येत नाही असे नाही. पण तो बदलण्याची एक पद्धत आहे. कलम ३७० कायमस्वरूपी झाल्याच्या आधीच्या निर्णयाची आम्हाला समीक्षा करायची आहे असे हे घात्नापीठ सांगू शकत होते. मग आधी याची समीक्षा करून नंतर मूळ अपील विचारात घेतले असते तर ते विधीसंमत झाले असते. पण यात एक अडचण होती . आधीचे निर्णय ५ सदस्यीय घटनापीठाकडून देण्यात आलेले होते. एका ५ सदस्यीय घटनापीठाचा निर्णय दुसरे पाच सदस्यीय घटनापीठ कसे घेवू शकते असा प्रश्न उपस्थित झाला असता. आधीच्या निर्णयावर पुनर्विचार न करता निर्णय झालेल्या मुद्द्यावर पुन्हा निर्णय देणे हे न्यायिक अनौचित्य ठरते. 

राजा हरीसिंग यांनी सामीलनाम्यावर स्वाक्षरी केल्या नंतर काश्मीरचे सार्वभौमत्व शिल्लक राहिले का हा मुद्दा ना वादीने उचलला होता ना प्रतिवादीने. घटनापीठातर्फे न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी हा मुद्दा पुढे केला. निर्णयाला प्रभावित करणारा हा मुद्दा असल्यामुळे याबाबतीत स्पष्टता गरजेची असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या निकालात या मुद्द्यावर न्यायालयाने जे निष्कर्ष काढले त्यातून भारतीय घटनासमिती सह आजवरच्या सर्व सरकारांना अक्षरशः वेड्यात काढले. निर्णय देतांना चंद्रचूड यांच्या चेहऱ्यावरील भाव कसे होते मी बघितले नाही, पण निकालपत्रात जे लिहिले त्यावरून वाटते की त्यांना जी गोष्ट कळली ती घटना समितीला व त्यानंतर केंद्रातील सर्व सरकारांना कशी कळली नाही असे आत्मगौरवाचे भाव चंद्रचूड यांच्या चेहऱ्यावर असले पाहिजे. मुळात सामीलनाम्यावर सही केल्यानंतर काश्मीरचे  सार्वभौमत्व शिल्लक राहिले का हा प्रश्नच मुळात चुकीचा आहे. सामीलनाम्यात परराष्ट्र,संरक्षण आणि दळणवळण या तीन बाबतीतले अधिकार भारताला देण्यात आले तेव्हाच काश्मीरने आपल्या सार्वभौमत्वावर पाणी सोडले होते. त्यानंतर काश्मीर हा सार्वभौम प्रदेश आहे असा दावा कोणीच केला नव्हता. दावा एवढाच होता की काश्मीर आणि भारताचे संबंध सामीलनाम्यातील अटी व शर्तीनूसार राहतील. सामीलनाम्यावर सह्या झाल्या तेव्हा भारताची राज्यघटना तयार व्हायचीच होती. भविष्यात भारतात लागू होणारी राज्यघटना काश्मीरमध्ये लागू करण्याचे बंधन काश्मीरवर असणार नाही. भारतीय राज्यघटना पूर्णत: किंवा अंशत: लागू करायची की नाही याचा निर्णय घेण्याचा अधिकार फक्त काश्मीरच्या राज्यप्रमुखाला असेल. कलम ३७० एवढेच दर्शविते की सामीलनाम्यातील अटी व शर्ती भारताला मान्य आहे ! सार्वभौम शब्दाच्या शब्दकोशातील अर्थानुसार काश्मीर सार्वभौम राहिले नाही पण भारताच्या सुपूर्द करण्यात आलेल्या विषयाखेरीज बाकी सर्व विषयावर निर्णय घेण्याचा अधिकार काश्मीरने आपल्याकडे ठेवला होता हे ऐतिहासिक सत्य नाकारण्यासाठी चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठाने राजाच्या अधिकारात काढण्यात आलेल्या एका अधिसूचनेचा आधार घेतला. या अधिसूचनेचा आपल्या मनमर्जीने अर्थ लावत राजाने आपले सर्व अधिकार त्या अधिसूचनेनुसार सोडल्याचा व भारताने राज्यघटना स्वीकारली तेव्हा ती काश्मीरमध्ये लागू झाल्याचा अफलातून निष्कर्ष कलम ३७० वर निकाल देतांना घटनापीठाने काढला. 

-------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि. यवतमाळ 
मोबाईल- ९४२२१६८१५८ 


Thursday, April 17, 2025

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - १२५

जम्मू-काश्मीरच्या राजाच्या अधिकारात करणसिंग यांनी २५ नोव्हेंबर १९४९ रोजी जारी केलेली अधिसूचना  म्हणजे सामिलनाम्यातील कलम ८ नूसार मिळालेल्या सार्वभौम अधिकारावर सार्वभौम राजाने पाणी सोडल्याचे द्योतक आहे. त्यामुळे २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय राज्यघटना लागू झाल्यानंतर काश्मीरचे सार्वभौमत्व समाप्त झाले  हा  निकालपत्रातील निष्कर्ष सर्वाधिक धक्कादायक आणि वादग्रस्त समजला जातो. 
-----------------------------------------------------------------------------------------


सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने कलम ३७० रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाच्या समर्थनार्थ तीन वेगवेगळी निकालपत्रे लिहिलीत. पहिले आणि मुख्य निकालपत्र न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी लिहिले ज्याच्याशी न्या.गवई आणि न्या. सुर्यकांत शब्दशः सहमत होते. दुसरे वेगळे निकालपत्र न्या. कौल यांनी लिहिले तर तिसरे निकालपत्र न्या. खन्ना यांनी लिहिले. या तिन्ही निकालपत्रात दोन गोष्टीवर पूर्ण सहमती होती. एक, कलम ३७० हे संक्रमणकाळासाठी तात्पुरत्या स्वरुपात घटनेत समाविष्ट करण्यात आले होते. दोन, हे कलम रद्द करण्याचा राष्ट्रपतींना पूर्ण अधिकार आहे आणि कलम रद्द करण्यासाठी जम्मू-काश्मीरची संविधान सभा किंवा अन्य कोणाच्या शिफारसीची गरज नाही. अशा कोणत्याही शिफारसी राष्ट्रापातीवर बंधनकारक नाही. या तीन निकालपत्रात न्या. कौल यांनी थोडा वेगळा सूर लावला. चंद्रचूड यांच्या निकालपत्रात काश्मीर कधी स्वायत्त नव्हतेच असा दावा आहे तर न्या. कौल यांनी काही प्रमाणात काश्मीर स्वायत्त होते हे मान्य केले. न्या.कौल यांनी आपल्या निकालपत्रात सामंजस्य निर्माण व्हावे यासाठी एक कमिशन स्थापन करण्याची सूचना केली. सुरक्षादल आणि दहशतवादी या दोहोकडून झालेल्या मानवाधिकाराच्या उल्लंघनाचा तपास या कमिशनने करावा आणि काश्मिरी तरुणात असलेला रोष व असंतोष कमी करण्यासाठी या कमिशनने पुढाकार घ्यावा असे न्या. कौल यांनी नमूद केले. अर्थात न्या. कौल किंवा न्या. खन्ना यांच्या निकालपत्राकडे त्यांचे मत म्हणून पहिले जाईल. कायद्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी केवळ या दोन निकालपत्राचा उपयोग आणि महत्व आहे. न्या. चंद्रचूड यांनी लिहिलेला बहुमताचा निकालच सर्वांवर बंधनकारक असणार आहे. हा निकाल ४७६ पानांचा असून त्यातील ठळक आणि निवडक बाबीचीच इथे नोंद घेवू.

कलम ३७० ची तरतूद ही तात्पुरत्या स्वरुपाचीच होती या मुद्द्यावर तिन्ही निकालपत्राचे एकमत आहे. त्यासाठी निकालपत्रात देण्यात आलेले एक कारण असे आहे की सदर कलमाचा समावेश घटनेच्या २१ व्या भागात करण्यात आला होता. संविधानाचा भाग २१ हा अस्थायी, संक्रमणकालीन  व विशेष तरतुदीचा समावेश असलेला भाग आहे. यातून संविधानकर्त्यांना हे कलम कायम राहावे असे वाटत नसल्याचे स्पष्ट होते असे न्यायमूर्तीनी नमूद केले आहे.स्वातंत्र्यापूर्वी राज्यकारभार १९३५ च्या भारत सरकार कायद्यानुसार चालत असे. १९३५ च्या कायदा व  नव्या राज्यघटनेच्या अंमलबजावणी या संक्रमण काळासाठी ही विशेष तरतूद घटनाकारांनी केल्याचा निष्कर्ष निकालपत्रात काढण्यात आला.  संविधानाचा भाग २१ हा अस्थायी, संक्रमनकालीन व विशेष तरतुदीचा समावेश असलेला भाग आहे.या कलमामुळे जम्मू-काश्मीर राज्याची संविधान सभा स्थापन होवून राज्याची राज्यघटना तयार होईपर्यंतच्या संक्रमणकाळासाठी ही तरतूद होती. राज्यात १९४७ साली झालेल्या टोळ्यांच्या आक्रमणातून निर्माण अस्थिर परिस्थितीत जम्मू-काश्मीर राज्याचे भारतात विलीनीकरण सुलभ व्हावे या हेतूने हे अस्थायी कलम संविधानात सामील करण्यात आल्याचा निष्कर्ष निकालपत्रात काढून कलम ३७० तात्पुरते होते असा निर्वाळा निकाल -पत्रातून देण्यात आला. कलम ३७० चा अर्थ जम्मू-काश्मीरचे भारतात झालेले विलीनीकरण तात्पुरते होते असा होत नसल्याचे निकालपत्रात नमूद करण्यात आले. 

भारतात सामील होण्याचा करार झाल्यानंतर काश्मीरची सार्वभौमिकता शिल्लक राहिली होती का या मुद्द्याचा न्या. चंद्रचूड यांनी आपल्या निकालपत्रात उहापोह केला. सामीलनाम्याच्या ८ व्या कलमात स्पष्ट नमूद करण्यात आले होते की,भारतात भविष्यात {त्यावेळी राज्यघटना तयार होत होती}लागू होणारी राज्यघटना स्वीकारण्याचे कोणतेही बंधन काश्मीरवर असणार नाही. काय स्वीकारायचे काय नाकारायचे हा अधिकार जम्मू-काश्मीर राज्याचा असेल.त्यामुळे सामीलनाम्यात ज्या विषयाचा उल्लेख आहे [संरक्षण,दळणवळण आणि परराष्ट्र संबंध] या विषयीचे कायदेच जम्मू-काश्मिरात लागू होतील. राज्यघटनेतील  इतर कलमे लागू करायची की नाही हे ठरविण्याचा अधिकार या कलमामुळे जम्मू-काश्मीरला मिळाला होता. उल्लेखित तीन विषय सोडले तर इतर सर्व बाबींचा निर्णय घेण्यास जम्मू-काश्मीर राज्य सार्वभौम होते. यावर निकालपत्रात असे नमूद करण्यात आले की, राजाचे सार्वभौम अधिकार असलेले व त्यावेळच्या काळजीवाहू किंवा अस्थायी सरकारचे प्रमुख असलेले करणसिंग यांनी २५ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय राज्यघटना जम्मू-काश्मीरमध्ये लागू करण्याची अधिसूचना जारी केली होती. या अधिसूचनेमुळे सामीलनाम्यातील कलम ८ निष्प्रभ ठरल्याचा निष्कर्ष निकालपत्रात काढण्यात आला. ही अधिसूचना म्हणजे सामिलनाम्यातील कलम ८ नूसार मिळालेल्या सार्वभौम अधिकारावर सार्वभौम राजाने पाणी सोडल्याचे द्योतक आहे. त्यामुळे २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय राज्यघटना लागू झाल्यानंतर काश्मीरचे सार्वभौमत्व समाप्त होवून इतर संस्थानासारखे संपूर्ण अर्थाने जम्मू-काश्मीरचे भारतात विलीनीकरण झाले. निकालपत्रातील हा निष्कर्ष सर्वाधिक धक्कादायक आणि वादग्रस्त समजला जातो. 

संसदेने कलम ३७० रद्द करण्याची केलेली शिफारस आणि जम्मू-काश्मीर राज्य केंद्रशासित प्रदेश करून लडाख वेगळा करण्याच्या घेतलेल्या निर्णयावर आधारित राष्ट्रपतींनी कलम ३७० अंतर्गत मिळालेल्या अधिकाराचा वापर करून संवैधानिक आदेश क्रमांक २७२ आणि २७३ काढलेत. याच आदेशांना सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले होते. २७२ क्रमांकाच्या आदेशात राष्ट्रपतींनी कलम ३६७ चा एखाद्या संदिग्ध कलमाचा अर्थ लावण्याचा अधिकार वापरून कलम ३७० मधील उल्लेखित संविधान सभाचा अर्थ विधानसभा समजण्यात यावा अशी दुरुस्ती केली होती. भारताची राज्यघटना काश्मीरमध्ये पूर्णपणे लागू करण्याचा निर्देश देण्यात आला होता. तर कलम ३७०[३] अन्वये मिळालेल्या अधिकारात  संवैधानिक आदेश २७३ जारी करून  कलम ३७० चे उपकलम १ वगळता कलम ३७० च्या सर्व तरतुदी निष्प्रभ करण्यात आल्या. याच आदेशात कलम ३७०[१] मध्ये दुरुस्ती करण्यात आली. भारतीय राज्यघटना जम्मू-काश्मीर मध्ये लागू झाल्याची या दुरुस्तीत म्हंटले आहे. या आदेशाबाबत निर्णय देतांना सर्वोच्च न्यायालयाने कलम ३६७ चा वापर करून कलम ३७० मध्ये संविधानसभा ऐवजी विधानसभा अशी राष्ट्रपतींनी केलेली दुरुस्ती सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने अवैध ठरवली.राज्यात राष्ट्रपती राजवट असल्याने संसदेलाच विधानसभेचे अधिकार मिळतात आणि या अधिकारा तहत संसदेने कलम ३७० रद्द करण्याची शिफारस राष्ट्रपतींना केली होती. अशी शिफारस आल्याने राष्ट्रपतींनी कलम ३७०[३] अंतर्गत मिळालेल्या अधिकाराचा वापर करून कलम ३७० रद्द केले होते. संवैधानिक आदेश २७२ मधील दुरुस्ती अवैध ठरवूनही सर्वोच्च न्यायालयाने कलम ३७० रद्द करण्याचा राष्ट्रपतीचा आदेश अवैध ठरविला नाही. कलम ३७०[३] नूसार मिळालेल्या अधिकारात कोणाच्याही शिफारसी विना कलम ३७० रद्द करण्याचा राष्ट्रपतींना अधिकार असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने देवून संवैधानिक आदेश २७३ वैध असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. 

-----------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि.यवतमाळ 
मोबाईल : ९४२२१६८१५८  

Tuesday, April 8, 2025

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - १२४

 कलम ३७० रद्द करण्यासाठी सरकारने वापरलेला मार्ग असंवैधानिक ठरवूनही सर्वोच्च न्यायालयाने अवांतर विषय महत्वाचे मानून त्यावर निर्णय देत केस सरकारच्या बाजूने फिरविली. खरे तर केस सरकारच्या बाजूने फिरविली म्हणण्यापेक्षा सरकारच्या बाजूने लढविली असे म्हणणे जास्त संयुक्तिक ठरेल. 
------------------------------------------------------------------------------------------------


कलम ३७० बाबत विचार करताना सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने दुसरा मुद्दा विचारात घेतला होता तो म्हणजे कलम ३७० रद्द करताना सरकारने कलम ३६७ चा घेतलेला आधार व केलेला वापर वैध होता का. घटनेच्या एखाद्या कलम बाबत स्पष्टता नसेल किंवा अर्थ लावण्याबाबत संभ्रमाची स्थिती असेल अशावेळी त्या कलमाचा अर्थ लावण्याचा किंवा स्पष्टीकरण करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना कलम ३६७ अन्वये मिळतो. कलम ३७० मध्ये कोणताही बदल करण्यासाठी किंवा ते रद्द करण्यासाठी जम्मू-काश्मीरच्या संविधान सभेची शिफारस अनिवार्य करण्यात आली होती. संविधान सभाच अस्तित्वात नसल्याने हे कलम रद्द करता येणार नाही हे यापूर्वीच्या सर्वच सरकारांनी प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष रित्या मान्य केले होते. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लोकसभेतच घोषणा केली होती की कलम ३७० रद्द करण्याची शिफारस करण्यासाठी जम्मू-काश्मीरची संविधान सभाच अस्तित्वात नसल्याने हे कलम आता कायम झाले आहे. हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचे अशा अर्थाचे सुस्पष्ट निर्णयही होते. यातून मार्ग काढण्यासाठी मोदी सरकारने कलम ३७० ची नव्याने व्याख्या करण्यासाठी कलम ३६७ चा आधार घेतला. कलम ३६७ अन्वये एखाद्या संदिग्ध कलमाचा अर्थ स्पष्ट करण्याचा मिळालेला अधिकार वापरून राष्ट्रपतींनी आदेश जारी केला की कलम ३७० मध्ये ज्या घटना समितीचा उल्लेख आहे त्याचा अर्थ राज्याची विधानसभा असा घेण्यात यावा !                   

हे करण्यामागे सरकारचा हेतू स्पष्ट होता. राज्यात राष्ट्रपती राजवट होती. राष्ट्रपती राजवट असताना राज्यासंबंधी निर्णय घेण्याचे अधिकार संसदेला असतात. संसदेत सत्ताधारी पक्षाचे बहुमत असल्याने विधानसभेचे अधिकार आपल्या हाती घेवून विधानसभेच्या नावाने कोणतीही शिफारस राष्ट्रपतींना करता येणे शक्य असते. याचाच उपयोग करून संसदेने कलम ३७० रद्द करण्याची शिफारस राष्ट्रपतींना केली आणि त्या शिफारसीच्या आधारे राष्ट्रपतींनी आदेश क्रमांक २७२ व २७३ काढून कलम ३७० निष्क्रिय केले.  वस्तुत: कलम ३७० किंवा कलम ३७० चे कोणतेही  उपकलम कोणत्याही अर्थाने अस्पष्ट किंवा संदिग्ध नव्हते. भारतीय घटना समितीने विधानसभा किंवा राज्यसरकार याच्या ऐवजी राज्याच्या घटनासमितीलाच कलम ३७० मध्ये बदल करण्याचा किंवा ते रद्द करण्याची शिफारस करण्याचा अधिकार दिलेला होता. असे असताना राष्ट्रपतीने कलम ३६७ चा वापर करून कलम ३७० मधील तरतुदीचा अर्थ लावण्याच्या नावाखाली अर्थच बदलून टाकला होता. त्यामुळे कलम ३६७ चा वापर करून कलम ३७० मध्ये बदल करणे व नंतर त्या बदलाचा आधार घेत ते रद्द करण्याची कृती वैध की अवैध हा खरा या सर्व घडामोडीतील मध्यवर्ती प्रश्न होता. त्यामुळे या प्रश्नाचा विचार करणे सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाला भाग होते. सर्वोच्च न्यायालयाने त्याचा विचार केला आणि त्यावर निर्णयही दिला.                                                                                                   


यावर कोर्टाने असा निर्णय दिला की की कलम ३६७ अन्वये मिळालेल्या अधिकाराचा वापर करून एखाद्या कलमाची , इथे कलम ३७०ची , व्याख्या करण्याच्या नावाखाली ते कलम बदलता येणार नाही. कलम ३७० मध्ये बदल करायचा असेल तर त्या कलमात निर्धारित बदलाच्या प्रक्रियेनुसार ते करता येईल. म्हणून कलम ३६७ वापरून कलम ३७० मध्ये केलेला बदल घटनेशी सुसंगत नसल्याचे सांगत सरकारची ती कृती अवैध ठरवली. कलम ३७० रद्द करण्याचा सरकारचा सगळा डोलारा कलम ३७० मध्ये केलेल्या बदलावर उभा होता. तो बदल अवैध ठरविल्यानंतर तो डोलारा कोसळणे अपेक्षित होते. पण सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने घटनापीठाचे प्रमुख न्या. चंद्रचूड यांच्या पुढाकाराने तो कोसळणारा डोलारा सावरला.अवांतर विषय महत्वाचे मानून त्यावर निर्णय देत सर्वोच्च न्यायालयाने केस सरकारच्या बाजूने फिरविली. खरे तर केस सरकारच्या बाजूने फिरविली म्हणण्यापेक्षा सरकारच्या बाजूने लढविली असे म्हणणे जास्त संयुक्तिक ठरेल. यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने विचारात घेतलेल्या तिसऱ्या मुद्द्याचा वापर केला. सर्वोच्च न्यायालयाने विचारात घेतलेला तिसरा मुद्दा होता जम्मू-काश्मीरच्या संविधान सभेच्या शिफारसी किंवा मंजुरी शिवाय कलम ३७० रद्द करता येते का . खरे तर सरकारी पक्षाचे सुद्धा असे म्हणणे नव्हते किंवा दावा नव्हता की संविधान सभेची शिफारस नसताना देखील राष्ट्रपतींना कलम ३७० रद्द करण्याचा अधिकार घटनेने दिला आहे !                                                               

सरकारी पक्षाला असे वाटले असते तर त्यांनी कलम ३६७ वापरून कलम ३७० मध्ये घटना समिती ऐवजी विधानसभा असा बदल केला नसता. संपूर्ण सुनावणीत सरकार पक्षाकडून राष्ट्रपतींना असे असिमित अधिकार असल्याचा दावा करण्यात आला नाही. याचिकाकर्त्यांचे तर म्हणणेच होते की राष्ट्रपतींना कलम ३७० मध्ये बदल करण्याचे अधिकार नाहीत. मग असा अमर्यादित अधिकार असल्याचा दावा कोण करीत होते तर सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाचे प्रमुख न्यायमूर्ती चंद्रचूड ! या संबंधीचा युक्तिवाद घटनापीठात बसून तेच करीत होते. सर्वोच्च न्यायालयाच्या यापूर्वीच्या अनेक निर्णयात कलम ३७० मध्ये बदल करण्याचे एकतर्फी अधिकार नसल्याचे स्पष्ट करण्यात आलेले आहे. असे असताना चंद्रचूड असा दावा करतात की राष्ट्रपतीना त्या कलमात बदल करण्यासाठी कोणाच्या शिफारशीची गरज नाही . घटनेनेच त्यांना तसे अधिकार दिले आहेत. संविधान पदावर एखाद्या व्यक्तीची नियुक्ती करताना राष्ट्रपतीच्या सहीचे जे नियुक्ती पत्र असते त्यात अमुक मुदतीपर्यंत किंवा राष्ट्रपतीचा विश्वास असे पर्यंत सदर व्यक्ती त्या पदावर राहील असे लिहिलेले असते. पण मग एखाद्या उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायधीशाला राष्ट्रपतीचा विश्वास गमावला म्हणून राष्ट्रपतीच्या आदेशाने काढून टाकता येते का ? तर याचे उत्तर नाही हेच आहे. मुदतीपूर्वी पदावरून काढून टाकायचे तर महाअभियोग चालवावा लागतो ज्याची प्रक्रिया संविधानात दिली आहे. तीच बाब कलम ३७० ला लागू होते. कलम ३७० मध्ये बदल किंवा रद्द करण्याची प्रक्रिया त्यात दिली आहे. ती प्रक्रिया पूर्ण करूनच राष्ट्रपतींना ते रद्द करता येईल. मनात आले आणि रद्द केले असे होवू शकत नाही. पण चंद्रचूड यांचे तसे म्हणणे आहे. या संबंधीचा युक्तिवाद त्यांनीच केला आणि त्यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठाने तो मान्य केला !

--------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि. यवतमाळ 
मोबाईल - ९४२२१६८१५८ 

Thursday, April 3, 2025

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - १२३

 भाजप जम्मू-काश्मीर सरकारात सामील असताना तिथल्या हायकोर्टाने कलम ३७० तात्पुरते राहिले नसून ते आता रद्द करता येणार नाही असा २०१५ मध्ये निकाल दिला. २०१७ साली वेगळ्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने असाच निकाल दिला होता. मात्र सरकारने हायकोर्टाच्या निकाला विरुद्ध याचिका दाखल केली नाही की सुप्रीम कोर्टाच्या निकाला विरुद्ध फेरविचार याचिका दाखल केली नाही.
-------------------------------------------------------------------------------------------------


कलम 'तात्पुरते' असल्याच्या संघ परिवाराच्या  प्रचाराच्या  प्रभावाखाली सामान्य जनते प्रमाणेच सर्वोच्च न्यायालयाचे घटनापीठ एवढे होते की सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी या संदर्भात दिलेला निर्णय देखील विसरले होते. २०१७-१८ साली सर्वोच्च न्यायालयानेच स्पष्ट केले होते की हे कलम तात्पुरते राहिले नसून ते कायम स्वरूपी बनले आहे. या निर्णयापूर्वी २०१५ साली जेव्हा पीडीपी व भाजपचे संयुक्त सरकार काश्मीरमध्ये सत्तारूढ होते तेव्हा जम्मू-काश्मीर हायकोर्टाने नि:संदिग्ध शब्दात कलम ३७० हे तात्पुरते राहिले नसून कायम बनले आहे. कारण जम्मू-काश्मीर राज्याच्या घटना समितीच्या शिफारसी शिवाय हे कलम रद्द करता येत नाही आणि तशी शिफारस करायला घटना समितीच अस्तित्वात नाही. त्यामुळे त्यात आता कोणताही बदल करणे शक्य नाही. जस्टीस मसुदी आणि जस्टीस जनक राज कोतवाल यांच्या खंडपीठाने आपल्या ६० पानी निकालपत्रात कलम ३७० मध्ये कोणताही बदल करता येणार नाही किंवा ते रद्दही करता येणार नसल्याचा निकाल दिला होता. इतर संस्थाना प्रमाणे जम्मू-काश्मीर भारतात विलीन झाले नव्हते आणि त्यामुळे मर्यादित स्वायत्तता काश्मीरच्या वाट्याला आली. या स्वयात्ततेचे संरक्षण करण्यासाठी कलम ३७० चा समावेश घटनेत करण्यात आला.                                     

 कलम ३७० [१] नूसार जम्मू-काश्मीर सरकारच्या संमतीने भारतीय राज्यघटनेतील अन्य कलमे लागू करण्याचा अधिकार राष्ट्रपतीला आहे. पण ३७० कलमात कोणताही बदल करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना नाही असा हायकोर्टाचा स्पष्ट निर्वाळा होता. कलम ३७० [३] नूसार राष्ट्रपती कलम ३७० मध्ये बदल करू शकत होते पण त्यासाठी जम्मू-काश्मीर संविधान सभेची तशी शिफारस किंवा संमती अनिवार्य होती. तशी शिफारस करणारी समितीच अस्तित्वात नसल्याने कलम ३७० मध्ये कुठलाही बदल करण्याचा किंवा ते रद्द करण्याचा राष्ट्रपतींना अधिकार उरलेला नसल्याचे या निकालात म्हंटले होते. हा निकाल आला तेव्हा जम्मू-काश्मीर सरकारात भाजप सामील होता. त्यावेळी भाजपने या निकालाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यासाठी राज्यसरकारकडे आग्रह धरला नाही. राज्य सरकार या निकालाला आव्हान देणार नसेल तर आम्ही सरकार बाहेर पडू अशीही भूमिका त्यावेळी भाजपने घेतली नव्हती. हा निकाल आल्यानंतर काही महिन्यांनी जम्मू-काश्मीरचे तत्कालीन मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांचे दु:खद निधन झाले व राज्यात राष्ट्रपती राजवट लागली. त्यावेळी ८८ दिवस जम्मू-काश्मीर मध्ये राष्ट्रपती राजवट होती आणि या काळात राज्यपालां मार्फत केंद्र सरकार जम्मू-काश्मीरचा कारभार पहात होते. या काळात या निकालाला सुप्रीम कोर्टात आव्हान देणे सहज शक्य असताना भारतीय जनता पक्ष आणि त्या पक्षाचे केंद्रातील सरकार गप्प बसून होते. नंतर सुप्रीम कोर्टाने दुसऱ्या एका प्रकरणात कलम ३७० बाबत २०१७-१८ साली असाच निर्णय दिला. 

कुमारी विजयालक्ष्मी झा यांनी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. या याचिकेत त्यांनी म्हंटले होते की,संविधानात कलम ३७० तात्पुरते म्हणून सामील केले होते. २५ जानेवारी १९५७ ला जम्मू-काश्मीरची संविधान समिती विसर्जित झाली त्याच वेळी कलम ३७० आपोआप बाद व्हायला हवे होते. आता तरी ते रद्द करण्यात यावे आणि जम्मू-काश्मीरचे वेगळे संविधान निरर्थक आणि निष्क्रिय घोषित करण्यात यावे अशी त्यांची मागणी होती.या प्रकरणी ३ एप्रिल २०१८ रोजी सुनावणी करताना जस्टीस नरीमन यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया विरुद्ध संतोष गुप्ता या प्रकरणात कलम ३७० चा मुद्दा निकालात काढल्याचे सांगितले. कलम ३७० हे कलम तात्पुरते राहिले नसून ते कायम स्वरूपी बनले आहे. त्या कलमात कोणताही बदल करता येणार नाही किंवा ते रद्द करता येणार नाही. याचे तेच कारण सुप्रीम कोर्टाने दिले जे जम्मू-काश्मीर हायकोर्टाने आपल्या निकालात दिले होते. ज्याअर्थी जम्मू-काश्मीरची संविधान समिती अस्तित्वात नाही त्याअर्थी कलम ३७० रद्द करण्याची शिफारस राष्ट्रपतींना करणारी समितीच अस्तित्वात नसल्याने हे कलम राष्ट्रपतींना रद्द करता येणार नाही. या निकालाने कलम ३७० चा मुद्दा कायमचा निकालात निघाल्याचा अभिप्राय २०१८ मध्ये सुप्रीम कोर्टाने दिला होता.  हायकोर्टाच्या निर्णया विरुद्ध सुप्रीम कोर्टात जसे अपील दाखल झाले नाही तसेच केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टाच्या निकाला विरुद्ध फेरविचार याचिका दाखल केली नाही. म्हणजे ५ ऑगस्ट २०१९ ला सरकारने संसदेत कलम ३७० रद्द करण्याचा प्रस्ताव पारित करून घेतला त्यावेळची घटनात्मक स्थिती ही होती की कोणत्याही परिस्थितीत कलम ३७० रद्द करता येणार नाही. 

 हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचा कलम ३७० तात्पुरते राहिले नसून ते कायमस्वरूपी बनले आहे असा निकाल असताना आणि या निकालाला आव्हान दिले गेले नसताना सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने कलम तात्पुरते असल्याचे मांडण्याची सरकारला मुभा कशी दिली आणि निकालात या मुद्द्याला महत्व कसे दिले. कलम ३७० च्या सुनावणी दरम्यान एक मुद्दा मांडण्यात आला की केंद्र सरकारने कलम ३७० रद्द करण्याच्या दुष्ट हेतूने राज्यात राष्ट्रपती राजवट लावली व नंतर पुढची पाउले उचलली. यावर घटनापीठाचे प्रमुख न्या.चंद्रचूड यांनी म्हंटले की राष्ट्रपती राजवटीला कोणी आव्हानच दिले नसल्याने आम्ही तो मुद्दा आता विचारात घेणार नाही. मग सुप्रीम कोर्टाने निकाल दिला होता हे कलम तात्पुरते राहिले नाही आणि या निकालाला आव्हान देण्यात आले नव्हते तर मग सुप्रीम कोर्टाने सरकारला का नाही सांगितले की कलम ३७० तात्पुरते आहे की नाही यावर आम्ही काही ऐकून घेणार नाही कारण त्या निकालाला तुम्ही आव्हानच दिले नव्हते. सर्वोच्च न्यायालयाचे घटनापीठ असे म्हणू शकत होते की कलम तात्पुरते आहे की नाही यावर आम्ही विचार करणार नाही. फक्त कलम रद्द करणे घटनात्मक आहे की नाही एवढेच बघू. पण स्वत: घटनापीठाचे प्रमुख न्या.चंद्रचूड हे सुप्रीम कोर्टाच्या निर्णया विरुद्ध सांगत होते की हे कलम तात्पुरते आहे ! तसे बघता हा मुद्दा महत्वाचा नव्हता पण यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाची पक्षपाती मानसिकता अधोरेखित झाली.

--------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि. यवतमाळ 
मोबाईल - ९४२२१६८१५८ 

Thursday, March 27, 2025

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - १२२

 कलम ३७० रद्द करून राज्याची पुनर्रचना केल्यानंतर तब्बल ४ वर्षानंतर या प्रकरणाची सुनावणीला मुहूर्त मिळाला. एका राज्याला आणि राज्यातील जनतेला अधिकारापासून वंचित करण्याचे प्रकरण गंभीर असूनही सुप्रीम कोर्टाला ते लवकर सुनावणी घेण्या योग्य वाटले नाही ही बाब न्यायव्यवस्था असंवेदनशील बनत चालल्याची द्योतक आहे.   
-------------------------------------------------------------------------------------

५ ऑगस्ट २०१९ ला संसदेत कलम ३७० रद्द करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. संसदेच्या दोन्ही सभागृहाने हे कलम रद्द करण्याची शिफारस राष्ट्रपतींना केली आणि ६ ऑगस्ट रोजी राष्ट्रपतींनी २७२ क्रमांकाच्या आदेशान्वये कलम ३७० रद्द केले. राष्ट्रपतीच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या अनेक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या. २८ ऑगस्ट २०१९ रोजी तत्कालीन सरन्यायधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील त्रिसदस्यीय पीठाने याचिकांची सुनावणी ५ सदस्यीय घटनापीठाकडे वर्ग केली. न्यायमूर्ती रमणा यांच्या नेतृत्वाखाली न्या.कौल, न्या.रेड्डी, न्या.गवई,आणि न्या.सुर्यकांत यांचे घटनापीठ स्थापन करण्यात आले. या घटनापीठाकडे जम्मू-काश्मीर राज्याच्या पुनर्रचनेला आव्हान देणाऱ्या याचिकाही सोपविण्यात आल्या. पण घटनापीठाने सुनावणी घेतलीच नाही. घटनापीठाचे अध्यक्ष न्या.रमणा सरन्यायधीश झाले तरी त्यांनी सुनावणी टाळली. घटनापीठावरील ते आणि इतरही काही न्यायमूर्ती सेवानिवृत्त झाल्याने नवे घटनापीठ स्थापन करावे लागले. तत्पूर्वी सरन्यायधीश गोगोई यांच्या खंडपीठाने ५ सदस्यीय घात्नापीठ बनविण्याचा जो आदेश दिला होता त्याला आव्हान देवून त्यापेक्षा मोठे घटनापीठ बनविण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु ती फेटाळण्यात आली. त्यानंतर न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखाली नवे ५ सदस्यीय घटनापीठ बनविण्यात आले. यात आधीच्या घटनापीठातील सेवानिवृत्त न्यायाधीशाच्या जागी न्या.चंद्रचूड व न्या. संजीव खन्ना यांचा समावेश करण्यात आला. ३ जुलै २०२३ रोजी हे प्रकरण सरन्यायधीश चंद्रचूड  यांच्या नेतृत्वाखालील नव्या घटनापीठाकडे सोपविण्यात आले. ११ जुलै २०२३ ला या प्रकरणाची सुनावणी २ ऑगस्ट २०२३ पासून घेण्याचा निर्णय घटनापीठाने घेतला. कलम ३७० रद्द करून राज्याची पुनर्रचना केल्यानंतर तब्बल ४ वर्षानंतर या प्रकरणाची सुनावणीला मुहूर्त मिळाला. एका राज्याला आणि राज्यातील जनतेला अधिकारापासून वंचित करण्याचे प्रकरण गंभीर असूनही सुप्रीम कोर्टाला ते लवकर सुनावणी घेण्या योग्य वाटले नाही ही बाब न्यायव्यवस्था असंवेदनशील बनत चालल्याची द्योतक आहे.                                                                                                            

कलम ३७० निरस्त करण्याच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने प्रामुख्याने तीन बाबींचा विचार करून निर्णय दिला. विचारात घेतलेला पहिला मुद्दा होता कलम ३७० घटनेत तात्पुरते सामील करण्यात आले होते का. सरकारचा दावा होता की घटनेतच हे कलम तात्पुरते असल्याचा स्पष्ट उल्लेख असल्याने इतक्या वर्षानंतर ते रद्द करण्यात काहीच चुकीचे नाही. सर्वोच्च न्यायालयाने विचारात घेतलेला दुसरा मुद्दा होता घटनेचे कलम ३६७ हे कलम ३७० मध्ये उल्लेख असलेल्या घटना समितीच्या जागी राज्याचे विधीमंडळ असा बदल करण्यासाठी वापरणे वैध आहे का. कलम ३७० मध्ये राष्ट्रपतींना कलम ३७० रद्द करता येईल पण त्यासाठी राज्याच्या संविधान सभेची शिफारस किंवा संमती आवश्यक असल्याचे नमूद आहे. संविधान सभा १९५७ मध्येच बरखास्त झाली आणि बरखास्ती पूर्वी कलम ३७० रद्द करण्याची शिफारस संविधान सभेने केली नव्हती. अशी शिफारस करणारी घटनेत नमूद संस्थाच अस्तित्वात नसल्याने आजवर कोणत्याही सरकारने कलम ३७० रद्द करण्याविषयी कोणतीही हालचाल केली नव्हती. यातून मार्ग काढण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने कलम ३६७ चा वापर करून राज्याच्या संविधान सभे ऐवजी राज्याचे विधीमंडळ अशी दुरुस्ती कलम ३७० मध्ये केली होती. या कृतीच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाला निर्णय द्यायचा होता म्हणून हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाने विचारात घेतला. कलम ३७० संदर्भात विचारात घेतलेला तिसरा मुद्दा होता जम्मू-काश्मीरच्या संविधान सभेच्या शिफारसी शिवाय कलम ३७० रद्द करण्याचा राष्ट्रपतीला अधिकार आहे का . कलम ३७० रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयाविरुद्ध ज्या याचिका दाखल करण्यात आल्या होत्या त्यात संविधान सभेच्या शिफारसी शिवाय कलम ३७० रद्द करण्याचा अधिकारच नसल्याचा मुद्दा प्रमुख होता. खर तर या पूर्ण प्रकरणात हाच कळीचा मुद्दा होता. 

कलम ३७० ची तरतूद तात्पुरती, संक्रमणकालिक आणि विशेष तरतूद असल्याचे म्हंटले आहे. पण ही ओळ आणि त्याखाली करण्यात आलेली कलम ३७० ची तरतूद व या कलमातील उपकलमे यात महत्वाचे काय असेल तर कलम आणि त्यातील तरतुदी. तात्पुरते , संक्रमणकालिक हे काही घटनेचे कुठले कलम नाही. तर ते शीर्षक आहे. आणि तात्पुरते म्हणताना त्याचा अवधी निश्चित केला नव्हता. शिर्षक आणि कलम याचे एकत्रित वाचन केले तर त्याचा अर्थ लक्षात येतो. जेव्हा कलम ३७० घटनेत समाविष्ट करण्यात आले तेव्हा जम्मू-काश्मीरची संविधान सभा निवडल्या गेली व स्थापित झालेली नव्हती. भारतीय संविधान सभेच्या दृष्टीने कलम ३७० तिथली संविधान सभा या कलमा संबंधी निर्णय घेई पर्यंतच तात्पुरत्या स्वरूपाचे होते. भारतीय संविधान सभेने हे कलम रद्द करण्याचे किंवा सुरु ठेवण्याचे सर्वाधिकार जम्मू-काश्मीरच्या घटना समितीला दिले होते. जम्मू-काश्मीरच्या घटना समितीने हे कलम रद्द करण्याची शिफारस राष्ट्रपतीला न पाठविल्याने कलम ३७० कायम स्वरूपी बनले. कारण ते कलम रद्द करण्यासाठी वा त्यात कोणतेही बदल करण्यासाठी ज्या घटनात्मक व्यवस्थेचा भारतीय संविधानात उल्लेख आहे ती व्यवस्था जम्मू-काश्मीरची घटना समिती विसर्जित झाल्यानंतर शिल्लक राहिलीच नाही. भारतीय  संविधान सभेतील संविधानकर्त्यांना जम्मू-काश्मीरची घटना समिती ही राज्याची घटना बनवून झाल्यावर विसर्जित होणार हे माहित असताना संविधान समितीने शिफारस केली नाही तर कलम ३७० रद्द करण्याच्या पर्यायी व्यवस्थेचे सुतोवाच केले नाही. याचा अर्थ भारतीय संविधान सभेने कलम ३७० रद्द करायचे की कायम ठेवायचे याचा निर्णय घेणारी एकमेव व्यवस्था म्हणून जम्मू-काश्मीर राज्याची संविधान समितीच असणार हे निश्चित केले होते. जम्मू-काश्मीरची संविधान सभा स्थापन होवून तीचा याबाबतचा निर्णय होई पर्यंतच्या काळासाठी कलम ३७० तात्पुरते होते. या काळालाच संक्रमण काळ म्हणता येईल. नंतरच्या काळात काहीसा असाच अर्थ वेगवेगळ्या निवाड्यात दस्तुरखुद्द सुप्रीम कोर्टाने लावल्याचे दिसून येते. या संदर्भातील दोन ताजे निर्णय २०१५ ते २०१८ या काळातील आहेत. 

--------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि. यवतमाळ 
मोबाईल - ९४२२१६८१५८ 


Friday, March 21, 2025

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - १२१

 सरकारने देशाची एकता आणि अखंडता राखण्याच्या नावाखाली केलेली कथित कृती संविधानाच्या चौकटीत बसणारी आहे की नाही हे पाहण्याचे काम सर्वोच्च न्यायालयाचे होते. सरकारच्या राजकीय निर्णयाचे समर्थन करताना देशाच्या घटनेच्या सर्वोच्च रखवालदारांना याचाच विसर निर्णय देतांना पडला. 
---------------------------------------------------------------------------------


लडाखला केंद्रशासित प्रदेश बनविणे वैध असेल तर मग जम्मू-काश्मीरला का नाही हा प्रश्न तुम्हाआम्हाला पडेल पण सर्वोच्च न्यायालयाला मात्र पडला नाही. घटना समितीच्या बुद्धीमत्तेवर प्रश्न उपस्थित करण्यासारखा एक निर्णय या प्रकरणात देण्यात आला आहे. संसदेने राज्य पुनर्रचना करण्याआधी राष्ट्रपतींनी त्या राज्याच्या विधिमंडळाने आपले मत देण्याची सूचना केली पाहिजे. राष्ट्रपतींनी विधीमंडळाला आपले मत देण्यासाठी जी मुदत दिली त्या मुदतीच्या आत संसदेला राज्याची पुनर्रचना करता येणार नाही असे घटनेत स्पष्ट शब्दात नमूद करण्यात आले आहे. जम्मू-काश्मीरची पुनर्रचना करताना विधिमंडळच अस्तित्वात नव्हते. पण सर्वोच्च न्यायालय घटनाकारा पेक्षा जास्त हुशार निघाले. याबाबतीत सर्वोच्च न्यायालयाने निकालात म्हंटले आहे की राज्य विधीमंडळाचे मत मान्य करणे संसदेला बंधनकारक नाही. हा अर्थ बरोबर आहे. जे बंधनकारक नाही मग ते झाले काय आणि न झाले काय याने काहीच फरक पडत नाही हा सर्वोच्च न्यायालयाने काढलेला अर्थ चुकीचा  आहे.  घटनाकारांनी केलेली तरतूद निरर्थक आहे असेच यातून सर्वोच्च न्यायालयाला सुचवायचे आहे. पण ते तसे नाही. भलेही राज्याच्या पुनर्रचने संबंधी राज्य विधीमंडळाचे मत मानण्याचे बंधन घटनाकारांनी संसदेला घातले नाही मात्र राज्य विधीमंडळाचे म्हणणे विचारात घेण्याचे बंधन या तरतुदीतून घातले आहे.                                                                                                                                 

राज्याचे तुकडे करण्याचे आणि तुकड्यांना केंद्रशासित प्रदेश करण्याचे संसदेचे आणि पर्यायाने केंद्राचे अधिकार मान्य करून देशाच्या संघराज्य संकल्पनेवर सर्वोच्च न्यायालयाने मोठा आघात केला आहे. निकाल देणाऱ्या घटनापीठाचे प्रमुख चंद्रचूड यांनी सुनावणी दरम्यान एक गोष्ट एका पेक्षा अधिक वेळा सांगितली आणि ती म्हणजे कलम ३७० आणि जम्मू-काश्मीर राज्याच्या पुनर्रचने संबंधीचा जो निर्णय केंद्राने घेतला तो संविधानानूसार चूक की बरोबर एवढेच आम्ही बघणार. निकाल मात्र घटनेच्या चौकटीत बसणारा नाही. राज्याला केंद्रशासित प्रदेश बनविणे घटनेनुसार आहे की नाही हा निर्णय का नाही दिला याचे उत्तर निकालातून मिळत नाही. उलट याबाबतीत सरकारची तळी उचलून धरताना घटनापीठाला आणि बहुमताचा निकाल लिहिणाऱ्या न्यायमूर्ती चंद्रचूड यांना घटना आठवण्या ऐवजी 'राष्ट्र-प्रथम' आठवले. चंद्रचूड यांनी राष्ट्रीय एकता आणि अखंडता यासाठी राज्याच्या अधिकारावर मर्यादा आल्या तर गैर ठरत नाही अशी भूमिका घेतली. केंद्र सरकारची पहिल्यापासूनची हीच भूमिका होती की काश्मीर बाबतीत आम्ही जे काही निर्णय घेतले ते राष्ट्रीय एकात्मता व अखंडता टिकविण्यासाठी. हे उघड उघड राजकीय निवेदन आहे. सर्वोच्च न्यायालयाचे काम या राजकीयदृष्ट्या दिलेल्या वक्तव्यावर शिक्कामोर्तब करणे हे नव्हते. सरकारने देशाची एकता आणि अखंडता राखण्यासाठी केलेली कथित कृती संविधानाच्या चौकटीत बसणारी आहे की नाही हे पाहण्याचे होते. कारण देशाची एकात्मता आणि अखंडता राखण्याचे काम देशाची राज्यघटनाच करते. घटनेच्या विपरीत केलेले कोणतेही काम अंतत: देशाला कमजोर करणारे ठरते. घटनापीठाच्या निर्णयाने संघराज्याची चौकटच खिळखिळी झाली असून भविष्यात राष्ट्रीय ऐक्याला ते सर्वात मोठे आव्हान ठरण्याचा धोका आहे. 

सर्वोच्च न्यायालयाचा कलम ३७० बाबतचा निर्णय तर आणखी अचंबित करणारा आहे. या निर्णयात ऐतिहासिक तथ्यां बद्दलचे अज्ञान म्हणा की तथ्याकडे जाणूनबुजून केलेले दुर्लक्ष म्हणा दिसून पडते. सोशल मिडीयावर विद्वान बनून तथ्यांची जी मोडतोड चालते तशी मोडतोड घटनापीठाच्या विद्वान न्यायमूर्तीनी केली आहे. आम्ही हा निर्णय घटनेच्या चौकटीत बसणारा आहे की नाही एवढेच बघू म्हणणाऱ्या न्यायमूर्तीनी कलम ३७० बाबत कॉंग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांनी रचलेल्या कथा सोयीस्करपणे उचलल्या. कॉंग्रेसच्या कथा संसदेपुरत्या मर्यादित होत्या. भाजपने आपल्या कथा लोकात पसरवून ते सत्य असल्याचे बिंबविले. जर सर्वोच्च पदावर बसलेले न्यायमूर्ती अशा कथाना बळी पडत असतील तर सर्वसामान्यांना या बाबतीत दोष देणे चुकीचे ठरते. कलम ३७० बाबत काँग्रेसी कथा काय आहे ती त्या पक्षाचे गृहमंत्री नंदा यांनी संसदेत एकापेक्षा अधिक वेळा सांगितली. त्यांच्या म्हणण्यानुसार कलम ३७० मुळे भारतीय राज्याघटनेची कलमे काश्मीरला लागू करणे सोपे झाले. ही कथा सन्माननीय न्यायमूर्तीनी आपल्या निकालपत्रात उपयोगात आणली. भाजपची कथा होती कलम ३७० मुळे काश्मिरात भारतीय संविधान लागू होण्यास अडथळा येतो. काश्मीर भारतापासून कलम ३७० मुळे वेगळे राहिले. राष्ट्रीय एकात्मता आणि अखंडता राखण्यासाठी कलम ३७० गेले पाहिजे. भाजपची ही कथाही न्यायमूर्तींनी आपल्या निकालपत्रात सांगितली. कलम ३७० बाबत घटनासमितीत काय चर्चा झाली, कोणत्या उद्देश्याने हे कलम समाविष्ट करण्यात आले हे मात्र सांगितले नाही.                                  

या घटनापीठाने घटना समितीला अक्षरशः मोडीत आणि वेड्यात काढले आहे. एवढेच नाही तर सरदार पटेलांनी संस्थानांच्या विलिनीकरणासाठी जे मसुदे तयार केलेत त्याचे महत्व नसल्याचे निकालपत्रात सूचित करण्यात आले. सर्व संस्थानिकांनी प्रारंभी सामीलीकरण व नंतर विलीनीकरण करारावर स्वाक्षरी केली होती. अपवाद काश्मीरचा होता. काश्मीरच्या राजाने विलीनीकरण करारावर स्वाक्षरी केली नव्हती. या बाबतीतही सुप्रीम कोर्टाने पळवाट शोधली आणि विलीनीकरण कराराची गरज अमान्य केली. कॉंग्रेस - भाजपच्या कथा मान्य केल्या पण केंद्र सरकारने काश्मीरशी केलेले लेखी करार दुर्लक्षिले. कलम ३७० तात्पुरते असल्याच्या मुद्द्याला उचलून धरले आणि त्याच्याच खाली लिहिलेल्या कलम ३७० रद्द करण्यासाठी जम्मू-काश्मीर संविधान सभेची संमती असणे अनिवार्य आहे तो मुद्दा सोयीस्करपणे उडवून लावला.  एवढे पुरेसे वाटले नाही म्हणून स्वत:च्या कथा या घटनापीठाने तयार केल्या. कलम ३७० समाविष्ट करण्यात आले कारण काश्मीरमध्ये युद्ध सुरु होते ही या घटनापिठाची कथा. कलम ३७० रद्द करण्यामागे वर्तमान सरकारचा दुषित दृष्टिकोन आणि अप्रामाणिक हेतू बद्दल दोषमुक्त समजता येईल कारण त्यांनी जे केले ते वर्षानुवर्षे बोलत आलेत आणि सरकार पक्षाने जनमत सुद्धा आपल्या बाजूने तयार करत निर्णय घेतला होता. पण प्रचंड जनमताचे समर्थन असलेला सरकारचा निर्णय घटनात्मक आहे का हे तपासण्याचे सुप्रीम कोर्टापुढे आव्हान होते. हे आव्हान स्वीकारण्या ऐवजी सुप्रीम कोर्टाने जनतेच्या आवाजात आपला आवाज मिळविणे पसंत केले. निकालाच्या विश्लेषणातून ही बाब स्पष्ट होईल. 

----------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि. यवतमाळ 
मोबाईल - ९४२२१६८१५८ 


Thursday, March 13, 2025

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - १२०

 जम्मू-काश्मीरचा राज्याचा दर्जा काढून केंद्रशासित प्रदेश बनविणे घटनात्मक आहे का यावर आम्ही भाष्य करणार नाही किंवा निर्णय देणार नाही असे एका वाक्यात सर्वोच्च न्यायालय सांगते तर दुसऱ्याच वाक्यात लडाखला केंद्रशासित प्रदेश घोषित करणे वैध असल्याचे सांगते. अशा विसंगतीने भरलेला हा सर्वोच्च निर्णय आहे. 
----------------------------------------------------------------------------------


राज्य पुनर्रचना आणि पूर्ण अधिकार असलेल्या राज्याचे केंद्र शासित प्रदेशात रुपांतर करणे या बाबत केंद्र सरकार कोणत्याही प्रकारे अडचणीत येणार नाही याची सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने - विशेषत: घटनापीठाचे अध्यक्ष असलेले तत्कालीन सरन्यायधीश चंद्रचूड यांनी - पुरेपूर काळजी घेतली. सरकार जे म्हणत गेले त्याला घटनापीठ मान डोलावत गेले. राज्याचे केंद्रशासित प्रदेशात रुपांतर करण्याचा संसदेला अधिकार आहे का या प्रश्नावर आम्ही निर्णय देणार नाही असे घटनापीठाच्या वतीने चंद्रचूड यांनी नमूद केले. हा निर्णय का देणार नाही तर सरकारने लवकरात लवकर जम्मू-काश्मीरला [लडाख वगळून ] पूर्ववत राज्याचा दर्जा देण्याचे मान्य केले आहे ! याची  तर जम्मू-काश्मीर राज्याचे केंद्रशासित प्रदेशात रुपांतर करताना केंद्र सरकारनेच संसदेला हमी दिली होती. जम्मू-काश्मीरची स्थिती सुरळीत झाली की पूर्ववत राज्याचा दर्जा दिला जाईल असे केंद्र सरकारच्या वतीने गृहमंत्री अमित शाह यांनी स्पष्ट केले होते. संसदेला जशी हमी दिली तशीच हमी तब्बल चार वर्षानंतर केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात दिली. मुळात सुप्रीम कोर्टा समोर ज्या याचिका होत्या त्या केंद्र सरकारच्या कृतीच्या  घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या होत्या. ज्यावेळी याचिका दाखल करण्यात आल्या त्यावेळी याचिकाकर्त्यांनी सरकारला व संसदेला असा निर्णय घेण्याचा अधिकार आहे की नाही याबाबत सर्वोच्च न्यायालय निर्णय देई पर्यंत सरकारच्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी केली होती. स्थगितीची मागणी फेटाळताना न्यायमूर्ती चंद्रचूड यांनीच स्पष्ट केले होते की सरकारची कृती घटनात्मक ठरली नाही तर सर्वोच्च न्यायालय सगळे पूर्ववत करण्याचा आदेश देईल. प्रत्यक्षात सरकारच्या कृतीची घटनात्माकता तपासण्याचे सर्वोच्च न्यायालयाने टाळले. केंद्र सरकारने लवकरच जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा देण्याचे मान्य केले असल्याचे कारण पुढे केले.                                                                                 

घटनापीठाने राज्याचा दर्जा देण्याचे वेळापत्रक केंद्राकडे मागितले. पण केंद्र सरकारने असे कोणतेही वेळापत्रक आत्ताच सादर करता येणार नाही असे स्पष्ट शब्दात सांगितले. वेळापत्रक का देवू शकत नाही याबद्दल न्यायालयाने कोणतेही प्रश्न विचारले नाहीत. जम्मू-काश्मीर राज्याची स्थिती सुरळीत झाली की राज्याचा दर्जा पूर्ववत कायम करता येईल हे सरकारचे वचन होते आणि राज्याची स्थिती कशी सुरळीत झाली आहे, कशी शांतता नांदत आहे हे सांगणारे केंद्र सरकारचे प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालया समोर होते. प्रत्यक्ष सुनावणीत  २०१८ मध्ये जम्मू-काश्मीर मध्ये इतके बंद पाळण्यात आले, दगडफेकीच्या एवढ्या घटना घडल्या याची आकडेवारी सरकार तर्फे सर्वोच्च न्यायालयात सादर केली आणि २०१९ नंतर एकही अशी घटना घडली नसल्याचे सरकारच्या वतीने सर्वोच्च न्यायालयाला सांगण्यात आले. २०१८ पूर्वी राज्यात जुजबी गुंतवणूक होत होती ती २०१९ नंतर मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आणि आणखी वाढावी यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत असे सर्वोच्च न्यायालयाला सांगण्यात आले. एवढेच नाही तर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था व विधानसभेच्या निवडणुका घेण्याची तयारी पूर्ण झाली असून त्या निवडणुका राज्यात केव्हाही होवू शकतात असेही सांगण्यात आले. हे सगळे जम्मू-काश्मीरला पूर्ववत राज्याचा दर्जा कधी देणार या सर्वोच्च न्यायालयाच्या विचारणेला उत्तर देतांना सांगण्यात आले. आता या उत्तराचाअसाअर्थ होतो की जम्मू-काश्मीर राज्यात सगळे काही सुरळीत असून कायदा व सुव्यवस्थेची स्थिती नियंत्रणात आहे. एवढे सगळे सुरळीत आहे तर मग लगेच राज्याचा दर्जा द्यायला काय अडचण आहे हा सरकारला अडचणीत आणणारा प्रश्न विचारायचे सर्वोच्च न्यायालयाने टाळले. उलट सरकारचे हे प्रयत्न राज्य दर्जा देण्यासाठी चालले आहेत अशी भलावण घटनापीठाचे प्रमुख चंद्रचूड यांनी केली.                                                     

घटनापीठाने जम्मू-काश्मीरला पूर्ववत राज्याचे अधिकार प्रदान करावेत या संबंधी कोणताही आदेश पारित केला नाही. मात्र निवडणुकाचा विषय सर्वोच्च न्यायालयाच्या विचारार्थ नसताना अमुक तारखेच्या आत निवडणुका घेण्याचा आदेश दिला. राज्यातील जनतेला लोकशाही अधिकार मिळाले पाहिजे म्हणून असे आदेश देत असल्याचे न्यायालयाने म्हंटले. केंद्रशासित प्रदेशात सगळे निर्णय केंद्राच्या मताप्रमाणे होतात राज्याच्या जनतेच्या मतानुसार नाही. मग निवडणुकीचे नाटक कशासाठी ?  निवडणुका केंद्रातील सत्ताधारी पक्षाला हव्या होत्या . राज्यातील पक्षांना मात्र आधी राज्याचा दर्जा आणि मग निवडणुका हव्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाने निवडणुकांचे आदेश देवून राज्यातील जनतेचे लोकशाही हक्क बहाल केले नाहीत तर केंद्रातील सत्तापक्षासाठी जे अनुकूल त्यावर शिक्कामोर्तब         केले. राज्यातील गुंतवणुकीचा आणि जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा देण्याशी अर्थाअर्थी संबंध नाही. राज्याच्या हाती कारभार सोपवला तर राज्यात गुंतवणूक होणार नाही असे केंद्रसरकारने सूचित केले आणि सर्वोच्च न्यायालयाने ते मान्य केले. असे असेल तर मग जम्मू-काश्मीर मध्ये निवडणुकीचा आग्रह सर्वोच्च न्यायालयाने का धरावा असा प्रश्न पडतो. सरकारचा कल लक्षात घ्यायचा, सरकारला काय हवे काय नको ते बघायचे आणि तसा निर्णय द्यायचा अशीच सर्वोच्च न्यायालयाच्या राज्यपुनर्रचने विषयक निर्णयाचा अर्थ होतो. हा निर्णय देतांना सर्वोच्च न्यायालयाने घटनेची केलेली मोडतोड संघात्मक  राज्यव्यवस्थेसाठी घातक ठरणारी आहे. जम्मू-काश्मीरचा राज्याचा दर्जा काढून केंद्रशासित प्रदेश बनविणे घटनात्मक आहे का यावर आम्ही भाष्य करणार नाही किंवा निर्णय देणार नाही असे एका वाक्यात सर्वोच्च न्यायालय सांगते तर दुसऱ्याच वाक्यात लडाखला केंद्रशासित प्रदेश घोषित करणे वैध असल्याचे सर्वोच्च न्यायालय सांगते. अशा विसंगतीने भरलेला हा सर्वोच्च निर्णय आहे.                                         

-----------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा , जि. यवतमाळ 
मोबाईल : ९४२२१६८१५८ 

Thursday, March 6, 2025

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - ११९

ज्या कारणासाठी जम्मू-काश्मीर राज्य केंद्रशासित करण्याची गरज वाटली होती तशी परिस्थिती उद्भवलीच नाही असे केंद्र सरकारच्या दाव्यावरून स्पष्ट होते. मग परिस्थिती नियंत्रणात असताना, केंद्राच्या निर्णयाचे राज्यातील जनतेने स्वागत केले असताना आणि सर्वत्र शांतता नांदत असताना जम्मू-काश्मीर केंद्रशासित करण्याचा निर्णय संसदेला आश्वासन दिल्या प्रमाणे वर्ष-सहा महिन्यातच मागे घ्यायला हवा होता.
---------------------------------------------------------------------------------------------


ऑगस्ट २०१९ मध्ये जेव्हा जम्मू-काश्मीर राज्याची पुनर्रचना करण्यात आली होती तेव्हा निर्णयाच्या स्थगितीसाठी अनेक अर्ज सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आले. त्यावेळी सुप्रीम कोर्टाने अर्जदारांना आश्वस्त केले होते की हा निर्णय असंवैधानिक ठरला तर सगळ पूर्ववत करता येईल. संसदेत जम्मू-काश्मीर राज्याच्या पुनर्रचनेचा प्रस्ताव मांडण्यात आला त्यावेळी सरकारतर्फे सांगण्यात आले की  कलम ३७० रद्द केल्यानंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी केंद्रशासित राज्याचा दर्जा गरजेचा होता. हा निर्णय तात्पुरता असून राज्यातील परिस्थिती सामान्य झाली की लडाख वगळता जम्मू आणि काश्मीरला पूर्ववत राज्याचा दर्जा दिला जाईल. राज्य पुनर्रचनेचा निर्णय अंमलात आल्या नंतर तब्बल ४ वर्षांनी या निर्णयाची वैधता तपासण्यासाठी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली होती. कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय झाला त्याच्या दुसऱ्या दिवसापासून केंद्र सरकार सांगत होते की केवळ जम्मू आणि लडाख मध्ये नाही तर काश्मीरखोऱ्यात देखील निर्णयाचे स्वागत झाले असून कोठेही विरोध झाला नाही. राज्य पुनर्रचनेचा आणि कलम ३७० रद्द करण्याचा ठराव मांडताना निर्णयाला काही घटकाकडून विरोध होण्याची जी भीती गृहमंत्र्यांनी व्यक्त केली होती आणि त्या स्थितीचा मुकाबला करण्यासाठी केंद्रशासित प्रदेश करण्याची गरज प्रतिपादिली होती तसे काही जम्मू-काश्मीर राज्यात घडलेच नाही. सगळे काही सुरळीत आहे आणि सगळेच लोक निर्णयाने खुश असल्याचे केंद्र सरकार वेळोवेळी सांगत आले होते.                                 

याचा अर्थ ज्या कारणासाठी जम्मू-काश्मीर राज्य केंद्रशासित करण्याची गरज वाटली होती तशी परिस्थिती उद्भवलीच नाही असे केंद्र सरकारच्या दाव्यावरून स्पष्ट होते. मग परिस्थिती नियंत्रणात असताना, केंद्राच्या निर्णयाचे राज्यातील जनतेने स्वागत केले असताना आणि सर्वत्र शांतता नांदत असताना जम्मू-काश्मीर केंद्रशासित करण्याचा निर्णय संसदेला आश्वासन दिल्या प्रमाणे वर्ष-सहा महिन्यातच मागे घ्यायला हवा होता. कलम ३७० रद्द झाल्याने खुष झालेली राज्यातील जनता राज्याला पुन्हा पूर्वीचा दर्जा दिला असता तर आणखी खुष झाली असती. पण तसे काही घडले नाही. राज्यातील परिस्थिती शांत, नियंत्रणात व सुरळीत असताना केंद्र सरकारने जम्मू-काश्मीर राज्याला पूर्ववत राज्याचा दर्जा दिलाच नाही. याचे दोनच अर्थ होतात. एक तर जम्मू-काश्मीर राज्यात शांतता असून परिस्थिती सामान्य असल्याचा दावा प्रचारकी किंवा खोटा असला पाहिजे किंवा परिस्थिती सामान्य असली तरी मुस्लीमबहुल जम्मू-काश्मीर राज्य केंद्र सरकारला आपल्या टाचे खाली ठेवायचे आहे. सुप्रीम कोर्टात कलम ३७० व राज्यपुनर्रचनेवर सुनावणी सुरु होण्याच्या आधी केंद्र सरकारने जे प्रतिज्ञापत्र दिले त्यावरून तरी असे दिसते की परिस्थिती सुरळीत असताना देखील केंद्राने राज्याला पूर्ण राज्याचे अधिकार बहाल केले नाहीत.

कलम ३७० रद्द झाल्यानंतर आणि राज्याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिल्याच्या ४ वर्षानंतर राज्यातील परिस्थिती बाबत केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात विस्तृत प्रतिज्ञापत्र सादर केले. हे प्रतिज्ञापत्र केंद्र सरकारने स्वेच्छेने सादर केले. राज्याच्या परिस्थिती विषयी सर्वोच्च न्यायालयाने ना सरकारकडे विचारणा केली होती ना त्याविषयी प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले होते. सर्वोच्च न्यायालया समोर जो विषय होता तो सरकारने उचललेले पाउल घटनात्मक आहे की नाही एवढ्या पुरता मर्यादित होता. राज्यातील परिस्थिती चांगली की वाईट यावरून न्यायालय निर्णय देणार नव्हते. केंद्राला आपल्या निर्णयाच्या घटनात्मक वैधते विषयी शंका असावी व सर्वोच्च न्यायालयाला केंद्राने घेतलेल्या निर्णयाने राज्य कसे सुजलाम सुफलाम बनत चालले हे दाखवून प्रभावित करण्याच्या हेतू शिवाय दुसरे कोणतेही कारण प्रतिज्ञापत्र सादर करण्यामागे दिसत नाही. २०१९ साली घेतलेल्या निर्णयाने २०२३ साली जम्मू-काश्मीरची परिस्थिती कशी आहे हे सांगताना केंद्र सरकारने जे मांडले ते असे होते. प्रतिज्ञापत्रातील पहिला मुद्दा होता सुरक्षा विषयक स्थितीचा. कलम ३७० रद्द केल्यानंतर राज्यातील सुरक्षा विषयक स्थितीत लक्षणीय सुधारणा झाल्याचा दावा केंद्र सरकारने केला. राज्यातील दहशतवाद व सैन्य आणि जनता यांच्यातील संघर्ष नियंत्रणात आला आहे. याबाबतीत पूर्वीसारखी परिस्थिती राहिलेली नाही.अशा घटना कमी झाल्याने मनुष्यहानीचे प्रमाण बरेच खाली आले आहे. सुरक्षादल व दहशतवादी यांच्यातील संघर्षाच्या घटना खूप कमी झाल्या आहेत.सुरक्षादलावर होणारी दगडफेक जवळपास बंद झाली आहे.प्रतिज्ञापत्रात दुसरा मुद्दा राजकीय स्थैर्याबाबत मांडण्यात आला. पूर्वीची राजकीय अस्थिरता राहिली नाही आणि तेथील नागरिकात परकेपणाची जी भावना होती ती राहिलेली नाही.आमच्या निर्णयामुळे लोकांच्या अधिकारात वाढ झाली असून राजकीय प्रक्रियेतील लोकांचा सहभाग वाढला आहे.                                                                                                                                   

तिसरा मुद्दा होता विकासाचा. राज्याच्या विशेष दर्जामुळे बाहेरचे उद्योग इथे येण्यास अनुत्सुक होते . आता परिस्थिती बदलली आहे. अनेक प्रकल्प राज्यात येवू घातली आहेत. चौथ्या मुद्यातून नागरिकांना शांतता आणि सामान्य नागरी जीवनाचा आनंद मिळू लागल्याचे सांगण्यात आले. प्रतिज्ञापत्राच्या शेवटी असे सांगण्यात आले की राज्यातील जनतेने कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयाचे उत्साहाने स्वागत केले. स्वागत करण्यात जम्मू आणि लडाखची जनता आघाडीवर आहे. यातून काश्मीरखोरे नाराज असल्याचे सूचित होत असले तरी एकूण राज्यातील सर्वच बाबतीत परिस्थिती सुधारली असून मजबूत सुरक्षा व्यवस्था, राजकीय स्थिरता आणि आर्थिक विकासात वृद्धी होत असल्याने राज्यात शांततामय वातावरण असल्याचे या प्रतिज्ञापत्रातून स्पष्ट होते. सरकारचे आधीचे दावे प्रचारकी असल्याचा ठपका ठेवता येईल पण थेट सर्वोच्च न्यायालयात न मागता सादर केलेले प्रतिज्ञापत्र खोटे कसे म्हणता येईल. हे प्रतिज्ञापत्र लक्षात घेतले तर जम्मू-काश्मीरला पूर्वीचा राज्याचा दर्जा देण्यात काहीच अडचण नसल्याचे स्पष्ट होते. प्रत्यक्ष सुनावणीत मात्र केंद्र सरकारने २०१९ साली संसदेत जी भूमिका घेतली तीच भूमिका २०२३ साली सर्वोच्च न्यायालयात घेतली ! सुरक्षा विषयक परिस्थितीमुळे राज्याला केंद्रशासित करावे लागले तरी हे पाउल तात्पुरते असून लवकरच राज्याला पूर्ण दर्जा देण्यास केंद्र सरकार प्रतिबद्ध आहे अशी ती भूमिका ! म्हणजे सुनावणीच्या वेळी केंद्र सरकारला जम्मू-काश्मीर मधील परिस्थिती बाबत सुनावणीच्या आधी दिलेल्या प्रतिज्ञापत्राचा पूर्ण विसर पडला. राजकीय सोय म्हणून केंद्राला असा विसर पडणे यात नवल वाटण्या सारखे काही नाही. पण सुनावणी दरम्यान राज्याला पूर्ण दर्जा देण्याबाबत मुद्दे उपस्थित करण्यात आले त्यावेळी सर्वोच्च न्यायालयालाही केंद्र सरकारने दिलेल्या प्रतिज्ञापत्राचा संपूर्ण विसर पडला !


------------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि. यवतमाळ 
मोबाईल - ९४२२१६८१५८  


Thursday, February 27, 2025

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - ११८

घटनात्मक दृष्ट्या बरोबर की चूक हे सांगण्या ऐवजी सापही मरेल आणि काठीही तुटणार नाही या पद्धतीने सर्वोच्च न्यायालयाने जम्मू-काश्मीर राज्याचे केंद्रशासित प्रदेशात  रुपांतर करण्याचा मुद्दा हाताळला आहे. जम्मू-काश्मीर राज्यातून लडाख प्रदेश वेगळा करून त्याचा केंद्रशासित प्रदेश बनविण्याचा केंद्र सरकारचा किंवा संसदेचा निर्णय सुप्रीम कोर्टाने वैध ठरविला. मात्र जम्मु आणि काश्मीरला केंद्रशासित करण्या बाबत मौन पाळले. 
------------------------------------------------------------------------------------------------


घटनेतील  कलम ३ मध्ये फक्त राज्य असा उल्लेख आहे. एका राज्याचे तुम्हाला दोन-तीन -चार राज्ये बनविता येतील पण ती पूर्ण अधिकार असलेली राज्येच असतील हे घटनेतील वाक्यरचनेवरून स्पष्ट होते. आजवर जी राज्यांची पुनर्रचना झाली ती अशीच झाली आहे. एखाद्या पूर्ण अधिकार असलेल्या राज्याचे केंद्रशासित प्रदेशात रुपांतर करण्याचा प्रकार पहिल्यांदाच घडला. जम्मू-काश्मीर राज्याच्या पुनर्रचने संबंधीचे विधेयक मांडताना गृहमंत्री अमित शाह यांनी कॉंग्रेसने राज्याच्या विधानसभेचा विरोध असताना देखील राज्याचे विभाजन केल्याचे उदाहरण दिले. उदाहरण बरोबर होते. आंध्रप्रदेश विधानसभेने राज्याच्या विभाजना विरोधात ठराव केल्यानंतरही मनमोहनसिंग सरकारने घटनेच्या कलम ३ नूसार मिळालेल्या अधिकारात राज्याचे विभाजन करून आंध्र मधून तेलंगाना राज्य वेगळे केले होते. एका राज्याचे दोन राज्यात रुपांतर करण्यात आले. राज्य म्हणून असलेले अधिकार व दर्जा कमी करून राज्याचे रुपांतर केंद्रशासित प्रदेशात केले नव्हते. त्यामुळे अमित शाह यांनी दिलेले उदाहरण बरोबर असले तरी या ठिकाणी अप्रस्तुत होते, लागू होणारे नव्हते. मूळ घटनेत केंद्रशासित प्रदेशाचा उल्लेख नव्हता. स्वातंत्र्यानंतर राज्यांची पुनर्रचना गरजेची बनल्याने राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना करण्यात आली होती. या आयोगाच्या शिफारसीनुसार केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्यात आले होते व ७ व्या घटनादुरुस्तीन्वये घटनेत केंद्रशासित प्रदेशाचा उल्लेख झाला. जो भूभाग राजकीय,सामाजिक,सांस्कृतिक दृष्ट्या एखाद्या राज्यात विलीन करणे उचित नसेल आणि राज्याचा दर्जा देण्याइतकी लोकसंख्या व क्षेत्रफळ नसेल तर अशी क्षेत्रे केंद्रशासित ठेवावीत अशी राज्य पुनर्रचना आयोगाची शिफारस होती. त्यानुसार त्यावेळेस केंद्रशासित प्रदेश निश्चित केले गेलेत आणि ७ व्या घटनादुरुस्तीने त्यांना संविधानात स्थान दिले गेले. पूर्ण अधिकार असलेल्या राज्याचे केंद्रशासित प्रदेशात करण्याचा विचार संघराज्य संकल्पनेला धक्का देणारा असल्याने ना राज्य पुनर्रचना आयोगाने त्याचा विचार केला किंवा ७ वी घटनादुरुस्ती झाली तेव्हा कलम ३ मध्ये दुरुस्ती करून राज्याचे रुपांतर केंद्रशासित प्रदेशात करण्याचा अधिकार संसदेला देण्यात आला. त्यामुळे जम्मू-काश्मीर राज्याचे केंद्रशासित प्रदेशात रुपांतर करायला घटनात्मक आधार नाही. केले गेले ते केंद्र सरकारची  मनमानी आणि ही मनमानी सहन करण्याची सर्वोच्च न्यायालयाची मजबुरी म्हणा की उदारता म्हणा त्यामुळे केंद्र सरकारला घटनेची ऐसीतैसी करणे शक्य झाले.                                   

राज्याचे केंद्रशासित प्रदेशात रुपांतर करण्या विरुद्ध अनेक याचिका सर्वोच्च न्यायालयासमोर प्रलंबित होत्या. सर्वोच्च न्यायालयाने त्यावर सुनावणी देखील घेतली पण निर्णय देण्याचे टाळले. फक्त राज्याचे विभाजन तेवढे वैध ठरवले आणि राज्याचे केंद्रशासित प्रदेशात रुपांतर करण्याचा केंद्र सरकारचा किंवा संसदेचा निर्णय घटनात्मक आहे का यावर भाष्य करण्याचे आणि  निर्णय देण्याचे टाळले. जसा कलम ३७० बद्दल सर्वोच्च न्यायालयाने मनमानी निर्णय [या निर्णयाची चिकित्सा पुढे करणार आहे ] दिला तसाच घटनात्मक तरतुदी विचारात न घेता राज्याचे केंद्रशासित प्रदेशात रुपांतर करण्याचा संसदेचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाने का मान्य केला नसावा याची दोन कारणे देता येतील. कलम ३७० बाबतच्या पक्षपाती निर्णयाने डागाळलेली प्रतिमा या निर्णयाने सुधारण्याचा प्रयत्न. आणि दुसरे कारण जम्मू-काश्मीर राज्याच्या पुनर्रचने संबंधीचा निर्णय फक्त त्या राज्यापुरता मर्यादित राहिला नसता. देशातील सगळी राज्ये त्यामुळे प्रभावित होवू शकत होती. महाराष्ट्राचे उदाहरण घेवून हा मुद्दा समजून घेवू. जम्मू-काश्मीरच्या बाबतीत जे केले ते घटनात्मक ठरविले असते तर हा प्रयोग अन्य राज्याच्या बाबतीत करणे शक्य झाले असते. मुंबईचे महाराष्ट्रात असणे कोणाला खटकते हे सारा महाराष्ट्र जाणतो. गुजरात मध्ये सामील करता येत नसेल तर किमान मुंबईला केंद्रशासित करावी ही अनेकांची इच्छा लपून राहिलेली नाही. जम्मू-काश्मीर राज्याचे केंद्रशासित प्रदेशात रुपांतर करण्यचा निर्णय घटनात्मक ठरविला असता तर महाराष्ट्रातून मुंबईला वेगळे करण्याचा आणि केंद्रशासित करण्याचा मार्गही मोकळा झाला असता. हे इतरही राज्यात घडले असते आणि सर्व राज्यात अशा निर्णयाने भीतीयुक्त अस्वस्थता पसरली असती. एका चुकीच्या निर्णयाने मणिपूर जळाले तसे राज्य पुनर्रचने बाबतच्या चुकीच्या निर्णयाने देश पेटण्याची शक्यता लक्षात घेवून सर्वोच्च न्यायालयाने निर्णय टाळला असावा. कलम ३७० च्या निर्णयाने काश्मीर पेटण्याची शक्यता होती पण तो जाळ काश्मीर पुरताच मर्यादित राहिला असता . कलम ३७० च्या निर्णयाने आपण देशात हिरो बनू याची कल्पना बेंचवरील प्रत्येक न्यायाधीशाला होती. त्यामुळे कलम ३७० बाबत निर्णय देणे जेवढे सोपे होते तेवढे सोपे राज्याचे केंद्रशासित प्रदेशात रुपांतर करण्याबाबत नव्हते. म्हणून सापही मरेल आणि काठीही तुटणार नाही या पद्धतीने सर्वोच्च न्यायालयाने जम्मू-काश्मीर राज्याचे केंद्रशासित प्रदेशात  रुपांतर करण्याचा मुद्दा हाताळला आहे. 


जम्मू-काश्मीर राज्यातून लडाख प्रदेश वेगळा करून त्याचा केंद्रशासित प्रदेश बनविण्याचा केंद्र सरकारचा किंवा संसदेचा निर्णय सुप्रीम कोर्टाने वैध ठरविला. मात्र जम्मु आणि काश्मीर बाबत मौन पाळले. अर्थात मौन फक्त वैध-अवैधते बद्दल. बाकी तोंडाच्या वाफा खूप दवडल्या. राज्याचे रुपांतर एक किंवा अनेक केंद्रशासित प्रदेशात करण्याने देशाच्या संघात्मक रचनेवर परिणाम तर होईलच शिवाय त्या राज्याची स्वायत्तता नष्ट होईल.प्रातिनिधिक लोकशाहीवर हा आघात ठरू शकतो असे त्यावेळचे सरन्यायधीश चंद्रचूड यांनी निकालपत्रात लिहिले. तर चंद्रचूड नंतर सरन्यायधीश बनलेल्या न्यायमूर्ती खन्ना यांनी चंद्रचूड यांच्या मताशी सहमती व्यक्त करत म्हंटले की, अशा कृतीचे गंभीर परिणाम होतील.नागरिकाला आपल्या राज्यात निर्वाचित सरकारला मुकावे लागेल.हा झाला शब्दबंबाळपणा. चिंता व्यक्त करून सर्वोच्च न्यायालय या बाबतीत केंद्र सरकारच्या सोयी प्रमाणे वागले हे खरे सत्य. तुम्ही चुकले की बरोबर हे काही न बोलता जम्मू-काश्मीरला लवकर राज्याचा दर्जा मिळाला पाहिजे अशी 'सर्वोच्च' इच्छा केंद्राकडे व्यक्त करण्यात आली. त्यासाठी केंद्राने कोर्टात आराखडा सादर करण्याची सूचना केली.  यावर सरकार तर्फे कोर्टाला सांगण्यात आले की लवकरच जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा देण्यात येईल. पण त्याबाबतीत वेळेचे कोणतेही बंधन सरकारने घालून घेतले नाही. विशेष म्हणजे कोर्टाने सुद्धा अमुक तारखेपर्यंत ते झाले पाहिजे असा आग्रह धरला नाही. सरकारने जम्मू-काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा देण्याचे मान्य केले असल्याने आम्ही यासंबंधीच्या याचिकांवर व ज्या प्रकारे राज्याची पुनर्रचना केली गेली त्याच्या घटनात्मक वैधतेवर निर्णय करणार नसल्याचे सुप्रीम कोर्टाने सांगितले. सरकार आणि सर्वोच्च न्यायालय हातात हात घालून कसे काम करते याचे हे उत्तम उदाहरण आहे. 

------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि. यवतमाळ 
मोबाईल - ९४२२१६८१५८