Wednesday, October 19, 2016

पाकिस्तानचा सापळा

सैनिकी शक्तीत भारताचा मुकाबला करणे केवळ अशक्य आहे याची जाणीव झाल्याने पाकिस्तानने आतंकवाद्याना हाताशी धरून भारताला जेरीस आणण्याचा प्रयत्न चालविला आहे आणि त्याला आपले प्रयत्न यशस्वी होताना दिसू लागल्याने त्याचा हुरूप आणि त्या सोबतच आतंकवादी कारवाया वाढू लागल्या आहेत. पाकिस्तानचे हे प्रयत्न यशस्वी होत आहेत याचा अर्थ आपण कुठेतरी पाकिस्तानने रचलेल्या सापळ्यात अडकत आहोत आणि पाकिस्तानला अपेक्षित प्रतिक्रिया देत आहोत असा होतो. आणि असा अर्थ होणे ही भारतासाठी धोक्याची घंटा आहे !-----------------------------------------------------------------------------


उरी हल्ल्यानंतर देशात जे वातावरण तयार झाले आहे ते बघता आपण पाकिस्तानच्या सापळ्यात तर अडकत नाही ना जाणार अशी चिंता करण्यासारखी  परिस्थिती निर्माण झाली आहे. आपले प्रधानमंत्री आणि परराष्ट्रमंत्री या दोघांनीही जगापुढे भारत आणि पाकिस्तान या दोन देशातील फरक फार चांगल्या पद्धतीने समर्पक शब्दात अधोरेखित केला आहे. भारत आणि पाकिस्तान एकाचवेळी स्वतंत्र झालेत. स्वातंत्र्याच्या या ६५ वर्षात भारतातील लोकशाही तावून सुलाखून इथल्या लोकजीवनाचा भाग बनली. हिटलर विषयी प्रेम असणारी मंडळी देखील आपल्या देशात हुकुमशाहीचा पुरस्कार करीत नाही इतकी लोकशाही व्यवस्था आमच्या अंगवळणी पडली आहे. या उलट पाकिस्तानात लोकशाही रुजणे आणि अंगवळणी पडणे या स्वप्नवत गोष्टी आहेत. तिथे लोकशाही व्यवस्थे ऐवजी सैन्याची हुकुमशाही अधिक काळ चालली. त्यामुळे पाकिस्तानी जनतेच्या अंगवळणी सैनिकी शासनच पडले आहे. ते एवढे की लोकनियुक्त सरकार असले तरी तिथे खरी सत्ता लष्कराचीच चालते. अगदी आजच्या घडीला पाकिस्तानात अशीच अवस्था आहे. आमच्याकडे अत्यंत कमी संख्याबळ पाठीशी असलेल्या सरकारांना देखील लोकमान्यता असते. चंद्रशेखर यांचे सरकार याचे उत्तम उदाहरण आहे. पाकिस्तानला भारताच्या लोकशाहीधिष्टीत राज्यव्यवस्थे बाबत कायम असूया वाटत आली आहे. एक धर्मीय राष्ट्र असताना पाकिस्तानात सतत अनागोंदी राहिली आहे. एकाच धर्माच्या दोन पंथातील एकमेकांवरील हल्ल्याने पाकिस्तानला जर्जर केले आहे. भारतात तर विविध धर्म , भाषा , पंथ , जाती आणि आणखी भिन्नतेचे जे जे प्रकार जगात उपलब्ध आहेत ते सगळे भारतात आहेत आणि बऱ्याच प्रमाणात गुण्यागोविंदाने नांदतात. इथली जाती व्यवस्था आणि जाती संघर्ष हेच काय ते जगापुढे आमची मान खाली जाणारी बाब आहे. पण यात ही जातीय अस्मितेतून संघर्ष करणाऱ्यांपेक्षा या संघर्षाची लाज वाटणाऱ्या भारतीयांची संख्या लक्षणीय असल्याची जगाला जाणीव आहे. ६५ वर्षात लाभलेल्या स्थिरते मुळे सतत आमचा देश प्रगती पथावर राहिला आहे. या ६५ वर्षात मंगळावर यान पाठविण्या इतकी प्रगती भारताने केली आणि या ६५ वर्षात पाकिस्तानच्या नेतृत्वाने पाकिस्तानला रसातळाला नेले. एकेकाळचा भुकेला देश भुकेवर मात करून अन्नधान्याच्याच नव्हे तर अनेक वस्तूंची निर्यात करणारा आघाडीचा देश बनला. भारत तिसरी आर्थिक सत्ता म्हणून वर आला आहे. याच काळात पाकिस्तान मध्ये कशाची निर्मिती झाली असेल तर ती धार्मिक कट्टरतेची आणि कुठले पीक आले असेल तर ते आतंकवाद्यांचे. आता पाकिस्तानची ओळख कोणती असेल तर त्याच्या भूमीवर दिवसागणिक वाढणारे आतंकवादी आणि त्यांच्या संघटना हीच आहे. दोन देशातील हेच वेगळेपण मोदीजी आणि सुषमा स्वराज यांनी जगापुढे ठेवले आहे. जगाच्या पाठीवर भारताचे हे वेगळेपण कोणाला खटकत असेल तर ते पाकिस्तानला. त्यामुळे पाकिस्तानचा सततचा प्रयत्न भारताला अस्थिर करण्याचा , भारतीय जनतेतील ऐक्य संपुष्टात येईल अशा कारवाया करण्याचा व अशा कारवायांना खतपाणी घालण्याचा राहिला आहे. भारताचे प्रगती वरचे , विकासावरचे लक्ष उडावे , किमानपक्षी विचलित व्हावे आणि सतत आपल्याशी वाद घालायला लावून भारताचा शक्तीक्षय व्हावा असाच पाकिस्तानचा प्रयत्न राहिला आहे. भारतावर दोन युद्धे लादून आणि भारताच्या हातून अपमानजनक पराभव ओढवून घेवूनही पाकिस्तानने आपले प्रयत्न थांबविले नाहीत. सैनिकी शक्ती
त भारताचा मुकाबला करणे केवळ अशक्य आहे याची जाणीव झाल्याने पाकिस्तानने आतंकवाद्याना हाताशी धरून भारताला जेरीस आणण्याचा प्रयत्न चालविला आहे आणि त्याला आपले प्रयत्न यशस्वी होताना दिसू लागल्याने त्याचा हुरूप आणि त्या सोबतच आतंकवादी कारवाया वाढू लागल्या आहेत. पाकिस्तानचे हे प्रयत्न यशस्वी होत आहेत याचा अर्थ आपण कुठेतरी पाकिस्तानने रचलेल्या सापळ्यात अडकत आहोत आणि पाकिस्तानला अपेक्षित प्रतिक्रिया देत आहोत असा होतो. आणि असा अर्थ होणे ही भारतासाठी धोक्याची घंटा आहे.


उरीचा दहशतवादी हल्ला आणि त्याला उत्तर देणारे 'सर्जीकल स्ट्राईक' या दरम्यान देशात ज्या प्रतिक्रिया उमटत होत्या आणि 'सर्जीकल स्ट्राईक' नंतर ज्या प्रतिक्रिया आल्यात त्या विचार करायला लावणाऱ्या आहेत. उरीचा हल्ला झाल्या नंतर देशात युद्धोन्माद निर्माण करण्याचे प्रयत्न न्यूज चैनेल आणि सोशल मेडियावर झाला. युद्धोन्मादी चर्चेत अनेकांनी आपणही आतंकवादी पथके तयार करून त्या पथकांमार्फत पाकिस्तानात हल्ले घडवून आणण्याच्या सूचना केल्या. या मूर्खपणाच्या सूचनेला अनेक मूर्खांचे अनुमोदन लाभले नसते तर नवल. पाकिस्तानला हेच हवे आहे. भारत आमच्या सारखाच आहे हेच त्याला जगाला दाखवायचे आहे आणि आपण पाकिस्तानच्या सापळ्यात अलगद अडकत आहोत . आतंकवादी कट्टर धर्मांधतेतून निर्माण होत आहेत. आपल्याकडे त्यांचे पीक घ्यायचे तर तशीच कट्टर धर्मांधतेची पेरणी करावी लागेल. मग पाकिस्तान आणि आपल्यात काय फरक राहणार आहे. आज मोदीजी आतंकवादा विरुद्ध जी भूमिका घेत आहेत आणि काही प्रमाणात का होईना पाकिस्तान विरुद्ध आंतरारष्ट्रीय जनमत बनत आहे ते भारताने पाकिस्तान सारख्या उचापती केल्या तर बनणार नाही. उरी हल्ल्या नंतर सर्जिकल स्ट्राईक होई पर्यंत एवढा युद्धोन्माद निर्माण झाला होता की तो काबूत आणण्यासाठी मोदी सरकारला सर्जीकल स्ट्राईक केल्याची बातमी जाहीर करावी लागली. पाकिस्तानने आपली विश्वासार्हता गमावली असल्याने आंतरारष्ट्रीय जगात भारताच्या सर्जीकल स्ट्राईक बद्दल विपरीत प्रतिक्रिया आली नाही. असे निर्णय सरकार आणि सैन्याला घेवू द्यायचे असतात. त्या बाबतीत लोकांचा दबाव पडणे ही अनिष्ट परंपरा पडली असेच म्हणावे लागेल. भावनिक उन्मादात आपण काय करतो आहोत याचे अनेकांचे भान सुटले. भावनिक उन्माद पाकिस्तानच्या कलाकारांवर काढला आणि त्यांना देश सोडायला भाग पाडले. पाकिस्ताननेही भारताच्या चित्रपटांवर बंदी घातली. शांतपणे विचार केला तर कोणाचे काय नुकसान झाले हे कळेल. फायदा -तोटा कलाकार किंवा चित्रपट सृष्टीचा नाही तर देशाचा बघायला हवा. भारताचे चित्रपट पाकिस्तानात अतिशय लोकप्रिय आहेत. पाकिस्तान मध्ये पाठ्यपुस्तकातूनच भारता बद्दल चुकीची माहिती दिली जाते आणि घृणा निर्माण करण्याचा प्रयत्न होतो. अशा वातावरणात पाकिस्तानात भारतीय चित्रपट लोकप्रिय होणे ही सोपी आणि साधी गोष्ट नाही. भारतीय चित्रपट हे भारत आणि पाकिस्तानच्या जनतेतील दुवा ठरले आहेत. भारतीय चित्रपटाच्या झंझावाता पुढे पाकिस्तानी चित्रपट सृष्टी कोलमडत असताना आपल्या अविवेकी आणि नादानपणा मुळे पाकिस्तानच्या चित्रपट सृष्टीला जीवदान देवून आपण आपले नुकसान आणि पाकिस्तानचे भले केले आहे. अशा अविवेकी आणि विचारशून्य लोकांच्या दबावामुळे सरकारवर पाकिस्तानशी युद्ध करायची वेळ आली तर कोणाचे काय नुकसान होईल याचाही विचार करायला हवा. युद्ध झाले तर पाकिस्तानची हार निश्चित आहे आणि याची पाकिस्तानला चांगलीच जाणीव आहे. तरीही पाकिस्तानला भारताशी संघर्ष करण्याची खुमखुमी आहे. कारण पाकिस्तान जवळ गमावण्यासारखे काही नाही. आधीच अमेरिका-चीन सारख्या महासत्तेच्या कुबड्यावर पाकिस्तान उभा आहे. या युद्धामुळे त्याचे कितीही नुकसान झाले तरी पुन्हा उभे राहायला त्याला या कुबड्या मिळणार आहे. युद्धात विजय ठरलेला असूनही भारताला मात्र युद्धाच्या झळा जास्त बसतील. पाकिस्तान कधीच आर्थिक महासत्ता बनणार नाही , पण युद्ध झाले तर आपली आर्थिक महासत्ता बनण्याच्या मार्गात तो मोठा अडथळा ठरणार आहे. प्रगतीच्या आणि आर्थिक विकासाच्या रुळावरून भारताची गाडी घसरणार असेल तर पाकिस्तान युद्धातील पराभवाची नामुष्की पचवायला तयार असणार आहे. यापूर्वी दोनदा त्याने ती पचविलीच आहेत. चीन पाकिस्तानच्या बाजूने असण्याचे एक कारण त्याचे आर्थिक हितसंबंध आहे , पण दुसरे महत्वाचे कारण पाकिस्तानला बळ देवून भारताची आर्थिक घोडदौड रोखण्याचा हेतू देखील आहे. पाकिस्तान बरोबर युद्ध झाले आणि ते आपण जिंकणार असलो तरी आपली अर्थव्यवस्था १०-२० वर्षांनी मागे जाईल आणि जागतिक व्यापारात याचा सर्वात मोठा लाभ चीनला मिळेल. पाकिस्तान चीनच्या बाजूने झुकला आहे हे खरे असले तरी चीनने भारताच्या सर्जीकल स्ट्राईकचा निषेध केलेला नाही हे लक्षात घेतले पाहिजे. कारण अशा बाबतीत पाकिस्तानचे समर्थन करणे जगाचे नेतृत्व करण्याची आकांक्षा बाळगणाऱ्या चीनला परवडणारे नाही. तेव्हा भारतात चीन विरोधी वातावरण निर्माण करून चीनला पूर्णपणे पाकिस्तानच्या बाजूला उभे करण्याचा जनतेच्या पातळीवर सुरु असलेला नादानपणा तात्काळ थांबविला पाहिजे. तेव्हा पाकिस्तानने लादले तरच युद्धाला सामोरे गेले पाहिजे. युद्ध सुरु करणे आपल्या फायद्याचे नाही हे युद्धोन्माद पसरविणाऱ्यांनी लक्षात घेतले पाहिजे. भारताला पाकिस्तान बरोबरचे युद्ध विकत घ्यायचे नसल्याने सर्जीकल स्ट्राईकचे चित्रण प्रसारित न करण्याचा आणि चीनशी नवे व्यापार करार करीत संवाद कायम ठेवण्याचा भारत सरकारचा प्रयत्न स्तुत्य समजला पाहिजे.

याचा अर्थ पाकिस्तानच्या कुरापती आणि गमजा अशाच चालू द्याव्यात असे नाही. जगातील आपल्या स्थानाला आणि आपल्या वाटचालीला धोका निर्माण न होता पाकिस्तानला संकटात आणण्याचे अनेक उपाय भारताला योजता येतील. अनेक उपाय तर देशांतर्गतच करण्याची गरज आहे जेणेकरून पाकिस्तानची उपद्रव क्षमता कमी आणि क्षीण होईल. आधी तर आपल्याला आपले घर ठिक करण्याची गरज आहे. भारत-पाक सीमेवरून आणि विशेषत: काश्मिरातील नियंत्रण रेषेवरून भारतात येणाऱ्या आतंकवाद्यांना रोखणे सोपे नाही हे खरे. भारतात घुसणाऱ्या अशा आतंकवाद्यांनी गर्दीच्या किंवा सार्वजनिक ठिकाणी हल्ला केला तर तो रोखणे कठीण आहे हे पण मान्य. पण सुरक्षा दलाचे तळ आहेत अशा ठिकाणी घुसण्यापासून आपण आतंकवाद्यांना रोखू शकत नाही हे मान्य होण्यासारखे नाही. ज्या चार आतंकवाद्यांनी भारताला पाकिस्तानशी युद्ध करण्याच्या उंबरठ्यावर आणून ठेवले त्या आतंकवाद्यांना आपले काही नुकसान होण्या आधी मारणे अशक्य नव्हते. पण पठाणकोटच्या हल्ल्यानंतरही आपण गाफील राहिलो आणि हकनाक आमच्या १८ जवानांचा बळी गेला. पठाणकोट येथे वायुदलाच्या विमानतळ हे अतिशय सुरक्षित आणि संवेदनशील असे ठिकाण . अशा ठिकाणी आतंकवादी घुसतात ही आमच्या सुरक्षा व्यवस्थेतील कमजोरी आहे. आमची सुरक्षा व्यवस्था आम्ही चोख ठेवली तर पाकिस्तानच्या ५० टक्के पर्यंतच्या कुरापतीना सहज आळा घालता येण्या सारखा आहे. दुसरी आमची कमजोर नस काश्मीर आहे. जगात कोणतेही राष्ट्र - अगदी चीन सुद्धा - भारत-पाक विवादात उघडपणे पाकच्या बाजूने उभे राहण्याच्या स्थितीत नाही. कारण पाकिस्तानातील आतंकवादी भारतात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आणि पाकिस्तान त्यांना रोखत नाही हे जगाला दिसते. पण काश्मिर बाबतचा पाकिस्तानचा प्रचार इतर राष्ट्रांना भारताच्या बाजूने ठामपणे उभा राहू देत नाही. गेल्या ३ महिन्या पेक्षा अधिक काळापासून काश्मीर मध्ये संचारबंदी सुरु आहे आणि ही बाब आंतराराष्ट्रीय राजकारणात भारताच्या विरुद्ध जाणारी आहे. काश्मीरची कोंडी फोडण्याचा केंद्र आणि राज्य सरकारकडून गंभीरपणे प्रयत्न होत नसल्याने आपण पाकिस्तानच्या हाती आयते कोलीत देत आहोत. गरज पाकव्याप्त काश्मिर मधील जनतेला पाकिस्तान विरुद्ध उभे करण्याची असताना आपण आपल्याच नागरिकांना आपल्या विरुद्ध उठाव करण्याची संधी देत आहोत. काश्मिर मध्ये अशी टोकाची परिस्थिती या आधीही उद्भवली होती . पण त्या त्या वेळी सरकारने जनतेशी संवाद साधत , स्थानिक नेतृत्वाशी संवाद साधत परिस्थिती पूर्वपदावर आणली होती. आता मात्र संवादाऐवजी सैन्य बळावर परिस्थिती नियंत्रणात आणण्याला प्राधान्य दिल्या गेल्याने परिस्थिती पूर्वपदावर येण्यास अनुकूल वातावरण तयार होताना दिसत नाही. काश्मीरचे  जनजीवन सुरळीत करण्याला प्राधान्य दिले तर पाकिस्तानच्या प्रचारातील हवा निघून जाईल आणि बऱ्याच कुरापती थांबतील. भारत भूमीत आतंकवादी तयार होवू शकत नाही. इथल्या मातीत स्वातंत्र्यवादीच तयार होवू शकतात व इथली माती स्वातंत्र्यवादच जोपासू शकते . तेव्हा पाकिस्तानात आतंकवादी कारवायांना बळ देण्यापेक्षा स्वातंत्र्यवादी कारवायांना तन मन धनाने उघड समर्थन देणे ही भारतासाठी स्वाभाविक गोष्ट आहे. भारताने बलुची असो की इतर प्रांतातील स्वातंत्र्यवादी असोत त्यांना पाकिस्तान विरुद्ध आपली भूमी वापरू दिली पाहिजे. ज्या स्वातंत्र्यवादी नेत्यांना , विचारवंताना आणि कलाकारांना आश्रय पाहिजे त्यांना भारताने जाहीर आमंत्रण देवून आश्रय दिला पाहिजे. पाकिस्तान ही पाक भूमी नसून जगातला नरक कुठे असेल तर तो पाकिस्तान आहे हे जगाला दाखवून पाकिस्तानला खिळखिळे करण्याची प्रत्येक संधी भारताने शोधली पाहिजे.  अनेक सर्जिकल स्ट्राईक करण्याची यापुढेही गरज पडेल आणि ते होतीलही. पण पाकिस्तानच्या स्वातंत्र्यवादी चळवळींना बळ देवून पाकिस्तानची डोकेदुखी कायमची संपविण्याची लांबपल्ल्याची रणनिती तयार करण्याची या घडीला गरज आहे. पाकिस्तानने टाकलेल्या सापळ्यात न अडकता पाकिस्तानला कायमचा धडा याच मार्गाने शिकविता येणार आहे.
-----------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव , पांढरकवडा, जि. यवतमाळ 

मोबाईल - ९४२२१६८१५८
-------------------------------------------------------------------------