Thursday, April 25, 2024

कॉंग्रेस भ्रष्टाचारी आणि भाजपा साव ? (उत्तरार्ध )

 भ्रष्टाचारासंबंधी  ज्या जुन्या कायद्याच्या आधारे कोळसा खाण वाटप प्रकरणी शिक्षा झाल्यात तो कायदाच आता मोदी सरकारने बदलला आहे.  राफेल प्रकरणात पैशाची देवघेव झाली असे सिद्ध होवू शकले नाही तरी सरकारने जास्त पैसे खर्च करून राफेल खरेदी केले एवढे जरी सिद्ध झाले असते तरी  या प्रकरणात मोदीना शिक्षा झाली असती. ती  होवू नये यासाठी भ्रष्टाचारा संबंधीचा जुना कायदाच  बदलण्यात आला. 
--------------------------------------------------------------------------------


नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सत्तेत येण्यात अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाचा मोठा हातभार लागला होता. स्पेक्ट्रम वाटप आणि कोळसा खाण वाटप या संबंधी तत्कालीन मनमोहनसिंग सरकारचे निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होता. कॅग या संवैधानिक संस्थेने सरकारच्या निर्णयामुळे सरकारी तिजोरीला हजारो कोटीचा फटका बसल्याचा निष्कर्ष काढला आणि या निष्कर्षाच्या आधारे सुप्रीम कोर्टाने स्पेक्ट्रम व कोळसा खाण वाटपा संबंधीचे मनमोहन सरकारचे धोरणात्मक निर्णय रद्द केले आणि स्पेक्ट्रम किंवा कोळसा खाणी सारख्या राष्ट्रीय संसाधनाचा सरकारच्या मर्जीनुसार नव्हे तर खुल्या लिलावा द्वारेच वाटप करण्याचा आदेश दिला. २०१२ साली सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला होता. साक्षी पुरावे नोंदवून रीतसर खटला चालवून कोर्टाचा निर्णय येण्या आधीच अण्णा हजारे, केजरीवाल , संघ-भाजपा यांनी या प्रकरणात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे लोकांच्या मनावर बिंबविण्यात यश मिळविले आणि कॉँग्रेसवर भ्रष्टाचाराचा शिक्का गडद केला. लोकपाल हाच भ्रष्टाचार निर्मूलनाचा जलीम उपाय असण्यावर सर्व राजकीय पक्षाचे आणि गैरसरकारी संस्था संघटनांचे एकमत झाले होते. या वातावरणात सत्ता परिवर्तन होवून नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे सरकार पूर्ण बहुमत मिळवून सत्तेत आल्यावर या प्रकरणी पुढे जे घडले त्यावरून एकच निष्कर्ष निघतो की मुद्दा भ्रष्टाचार निर्मूलणाचा नव्हताच. कॉँग्रेसला भ्रष्टाचारी ठरवून सत्ता परिवर्तन घडवून आणण्याचे ते कारस्थान होते. तसे ते कारस्थान नसते तर २०१४ साली नरेंद्र मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर पहिला निर्णय लोकपाल नियुक्तीचा झाला असता. दुसरी गोष्ट झाली असती ती स्पेक्ट्रम व कोळसा खाण वाटपात जो भ्रष्टाचार झाल्याची चर्चा होती त्याचे पुरावे गोळा करून संबंधितांना शिक्षा होईल यासाठी विशेष प्रयत्न केले गेले असते. पण असे घडल्याचे आढळून येत नाही. 

पूर्ण बहुमत असताना आणि विरोधीपक्षांचा लोकपालला विरोध नसताना नरेंद्र मोदी सरकारने लोकपाल नियुक्त करण्यात टाळाटाळ केली. या काळात अण्णा हजारे यांनी लोकपाल नियुक्तीची आठवण देणारे १०-१२ पत्रे पंतप्रधानाना लिहिलीत. पंतप्रधान मोदी यांनी एकाही पत्राला उत्तर दिले नाही ! उपोषण करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या अण्णा हजारे यांनी संसदेत लोकपाल कायदा मंजूर होवूनही नरेंद्र मोदी सरकारने लोकपाल नियुक्तीसाठी पाऊले उचलावी यासाठी उपोषण केले नाही ! शेवटी सुप्रीम कोर्टाला यासंबंधी निर्देश द्यावे लागले. तरी लोकपाल कधी नियुक्त झाला तर नरेंद्र मोदी यांनी सत्ता हाती घेतल्यानंतर जवळपास पांच वर्षानंतर ! लोकपाल नियुक्त केला नाही तर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत हा मुद्दा अडचणीचा ठरू शकतो हे लक्षात घेवून २०१९ च्या निवडणुका घोषित होण्याच्या काही दिवस आधी म्हणजे मार्च २०१९ मध्ये लोकपाल नियुक्त करण्यात आला. वास्तविक लोकपाल कायदा , लोकपाल निवड समिति व लोकपाल नियुक्तीची प्रक्रिया यासंबंधीचे नियम व कायदे मनमोहनसिंग यांच्या कार्यकाळातील शेवटच्या दिवसांमध्ये संसदेने पारित केले होते. निर्धारित प्रक्रियेनुसार लोकपाल नियुक्तीचे काम नरेंद्र मोदी सरकारला करायचे होते ज्यासाठी त्या सरकारने पांच वर्षे घेतली. हे झाले लोकपालचे. स्पेक्ट्रम खटल्याकडेही लक्ष दिले गेले नाही. जर यात भ्रष्टाचार झाला असे म्हणणे होते तर सीबीआयला या संबंधी पुरावे गोळा करून ते कोर्टात सादर करण्यास सांगण्याचे काम सरकारचे होते. स्पेक्ट्रमचा निकाल कोर्टाने २०१७ साली दिला. निकाल देताना कोर्टाने जे निरीक्षण नोंदविले ते महत्वाचे आहे. खटला सुरू झाल्यापासून आपण रोज १० ते ५ वाजेपर्यंत खटला चालविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे व पुराव्यांची वाट पाहात होतो. पण पुरावे देण्यास कोर्टाकडे कोणी फिरकले देखील नाही ! स्पेक्ट्रम वाटापात कोणताही घोटाळा किंवा भ्रष्टाचार झाला नसल्याचा निष्कर्ष आपल्या निकालात कोर्टाने काढला. द्रमुकच्या मंत्र्यावर व खसदारावर स्पेक्ट्रम वाटपात भ्रष्टाचार केल्याचा आरोप होता त्यातून कोर्टाने त्यांची निर्दोष मुक्तता केली. सरकारने या निर्णया विरुद्ध दिल्ली हायकोर्टात अपील केले पण अपील लवकर दखल करून घेण्यात यावे व लवकर सुनावणी व्हावी यासाठी काहीच प्रयत्न केले नाही. पुन्हा २०२४ च्या निवडणुकीच्या तोंडावर सरकारला जाग आली आणि तब्बल ५ वर्षानंतर हायकोर्टाने अपील दाखल करून घेतले ! ही जाग आता का आली तर भारतीय जनता पक्षाला तामिळनाडूत लोकसभेच्या काही जागा मिळाव्यात यासाठी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या द्रमुक पक्षाला अडचणीत आणण्यासाठी ! 

कोळसा खाण वाटप संदर्भात मात्र काही लोकाना शिक्षा झाल्या आहेत. पण हे लोक कोण आहेत ? प्रामुख्याने यात  तत्कालीन केंद्रीय कोळसा सचिव यांच्या सारख्या मोठ्या नोकरशहाचा व काही उद्योगपतींचा समावेश आहे. त्यावेळच्या सरकारमध्ये सामील असलेल्या कोंग्रेस किंवा अन्य पक्षाच्या मंत्र्याचा यात समावेश नाही. शिक्षा झालेले केंद्रीय कोळसा सचिव हे कार्यक्षम व इमानदार अधिकारी म्हणून ओळखले जातात. तरी यांना शिक्षा झाली टी का हे समजून घेतले पाहिजे. खाण वाटपात पैसे घेतल्याचे कोणतेही पुरावे किंवा तक्रार नसताना कोळसा खाण वाटप प्रकरणात शिक्षा झाली आहे. त्यावेळी भ्रष्टाचारा संबंधीचा जो कायदा होता त्यात शिक्षा होण्यासाठी पैशाची देवाणघेवाण सिद्ध होणे जरुरीचे नव्हते. त्यांच्या निर्णयामुळे सरकारचे नुकसान झाले एवढे सिद्ध होणे पुरेसे होते. कोळसा खाण वाटप प्रकरणात झालेल्या शिक्षा तर कोळसा खाण मिळविण्यासाठी संबंधितांनी सादर केलेली चुकीची व खोटी कागदपत्रे आणि संबंधित अधिकाऱ्यानी त्याची नीट पडताळणी न करता केलेले खाण वाटप या कारणासाठी शिक्षा झालेल्या आहेत. प्रत्यक्षात कोळसा खाणीचा ताबा कोणी घेतला नव्हता व वाटप झालेल्या खाणीतून एक किलो कोळसाही कोणी बाहेर नेला नव्हता. कॅगने सुद्धा स्पेक्ट्रम व कोळसा खाण वाटपाच्या सरकारच्या निर्णयाने सरकारला महसूल गमवावा लागल्याचा निष्कर्ष काढला होता. वास्तविक सरकारच्या निर्णया बद्दल बोलण्याचा कॅगला अधिकार नव्हता. सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या अंमलबाजवणीत काही चुकीचे घडले असेल तर त्यावर बोट ठेवणे एवढेच कॅगचे काम व जबाबदारी होती.                                               

भ्रष्टाचारासंबंधी  ज्या जुन्या कायद्याच्या आधारे कोळसा खाण वाटप प्रकरणी शिक्षा झाल्यात तो कायदाच आता मोदी सरकारने बदलला आहे. केव्हा आणि का बदलला हे लक्षात घेणे गरजेचे आहे. राफेल प्रकरणात भ्रष्टाचार व अनियमितता झाल्याचा आरोप झाला. प्रकरण सुप्रीम कोर्टातही गेले. राफेल प्रकरणात पैशाची देवघेव झाली असे सिद्ध होवू शकले नाही तरी सरकारने जास्त पैसे खर्च करून राफेल खरेदी केले एवढे जरी सिद्ध झाले असते तरी  या प्रकरणात मोदीना शिक्षा झाली असती. ती  होवू नये यासाठी भ्रष्टाचारा संबंधीचा जुना कायदा बदलण्यात आला. सरकारचा एखादा निर्णय चुकला व त्यामुळे सरकारी तिजोरीवर भार पडला तर शिक्षा होवू शकणारा कायदा बदलून शिक्षेसाठी आर्थिक देवाणघेवाण सिद्ध होणे आवश्यक करण्यात आले. म्हणजे ज्या कायद्यानुसार मनमोहनसिंग यांना शिक्षा होवू शकते तशी शिक्षा नरेंद्र मोदी यांना कायदा बदलल्यामुळे होणार नाही ! आणि आता नरेंद्र मोदी सरकारने आणखी एका बदलासाठी सुप्रीम कोर्टाला साकडे घातले आहे. सरकारने आपल्या अधिकारात किंवा आपल्या मर्जीने राष्ट्रीय संसाधनाचे वाटप न करता खुल्या व पारदर्शी लिलावानेच करण्याचे जे बंधन सुप्रीम कोर्टाने आपल्या २०१२ सालच्या निर्णयाने सरकारवर घातले होते ते बंधन हटविण्यासाठी मोदी सरकारने सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल केला आहे. मनमोहन सरकारला अडचणीत आणणारा निर्णय झाला तेव्हा या निर्णयाला भाजपासंहित सर्वानी डोक्यावर घेतले होते. आता तोच निर्णय मोदी सरकारला बदलून हवा आहे आणि परिस्थिती लक्षात घेवू संसाधनांचे वाटप करण्याचा अधिकार मोदी सरकारला हवा आहे. मनमोहन सरकारचे हेच म्हणणे होते पण तेव्हा भाजपने मनमोहन सरकारला भ्रष्टाचाराचे कुरण मोकळे हवे म्हणून ते तशी मागणी करतात असा आरोप केला होता. आता मोदी सरकार तीच मागणी सुप्रीम कोर्टाकडे करीत आहे. सुप्रीम कोर्ट त्यांचे ऐकणार नसेल तर घटनेत बदल करून मनासारखे निर्णय घेता यावेत यासाठी मोदीना आणि भाजपला ४०० च्या वर जागा हव्यात असा अर्थ यातून काढता येतो. तरी आमचा समज असाच आहे की कोंग्रेस भ्रष्ट आणि भाजपा मात्र साव !
------------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि. यवतमाळ 
मोबाईल - ९४२२१६८१५८ 

Tuesday, April 16, 2024

कॉंग्रेस भ्रष्टाचारी आणि भाजपा साव ? (पूर्वार्ध)

 

बोफोर्स प्रकरणात दलालीचा आरोप झाल्यानंतर राजीव गांधी स्वत:हून चौकशीला सामोरे गेले. ४०० च्यावर संसद सदस्य पाठीशी असताना बोफोर्सची चर्चा हाणून पाडली नाही.  राफेल विमान खरेदीत भ्रष्टाचार आणि अनियमितता झाल्याचे आरोप झाल्यानंतर मोदी सरकारने काय केले याची तुलना केली तर कोण भ्रष्टाचारी आणि कोण साव हे स्पष्ट होते. पण आम्ही पुरावे नाही तर इंग्रजीत ज्याला परसेप्शन (समज ) म्हणतो त्याच्या आधारे मत बनवतो. 
------------------------------------------------------------------------------------------


जनतेला वैयक्तिक गोष्टी खूप जुन्या आठवत असतील पण सार्वजनिक गोष्टी आणि घटना याबाबतची स्मरणशक्ति अगदीच अल्प असते. याचाच फायदा सत्तेत येणारा राजकीय पक्ष उचलत असतो. जसा कॉँग्रेसचा गरीबी हटाव नारा प्रत्येक निवडणुकीत असायचा. प्रत्येक निवडणुकीत त्यावर मतेही मिळायची. कोंग्रेस राजवट जावून भाजप राजवट १० वर्षाची झाली. आणि या १० वर्षात आपण एकच गोष्ट माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तोंडून ऐकतो आणि ती  म्हणजे कॉँग्रेसची राजवट भ्रष्टाचाराने बरबटलेली होती आणि आपण भ्रष्टाचाराचे कर्दनकाळ आहोत, भ्रष्टाचार करता येत नाही म्हणून कोंग्रेस आणि इतर पक्ष आपल्याला विरोध करतात ! त्यांचा हा दावा मान्य असणाऱ्यांची संख्या मोठी आहे. या १० वर्षात भ्रष्टाचार केलेल्या कोंग्रेसजनांवर मोठ्या प्रमाणात खटले दाखल झालेत, कोर्टात सूनवाई सुरू आहे आणि काही खटल्यांचे निकाल लागून संबंधितांना शिक्षाही झाल्यात अशी वस्तुस्थिती असेल तर मोदीजीचा  दावा मान्य करावाच लागला असता. वस्तुस्थिती मात्र अशी नाही. या १० वर्षात असे खटले दाखल झालेले, चाललेले आणि शिक्षा झाली असे काहीही घडलेले नाही. मात्र तरीही मोदींचा तोच दावा आणि मानणाऱ्यांची संख्याही मोठीच. असे होण्यामागे कॉँग्रेसची भ्रष्ट प्रतिमा तयार करण्याचे झालेले पद्धतशीर प्रयत्न आहेत आणि दीर्घकाळच्या सत्ता उपभोगाने सुस्त झालेल्या कॉँग्रेसने हे आरोप खोडण्याचे पाहिजे तसे प्रयत्न केले नाही. सरकारने आपल्या पातळीवर तसे प्रयत्न केलेत पण सरकारचे म्हणणे किंवा सरकारची बाजू जनतेपर्यंत पोचविण्यास पक्ष म्हणून कॉँग्रेस  सर्व पातळीवर अपयशी ठरला आणि कोंग्रेसवर भ्रष्टाचाराचा न पुसल्या जाणारा शिक्का बसला. कॉँग्रेसची राजवट असताना जसे कोंग्रेस पक्षाला आपल्या सरकारवरील भ्रष्टाचाराच्या आरोपाना पुसता आले नाही तसेच मोदीच्या नेतृत्वाखालील सरकार वरील भ्रष्टाचाराच्या आरोपाना ना जनतेच्या न्यायालयात नेता आले ना सत्ताधाऱ्याना उघडे पाडण्यात यश आले. भ्रष्टाचाराचा मुद्दा सतत लावून धरण्या ऐवजी निवंडणुकीपूरता वापरायचा आणि निवडणुकीत त्या मुद्द्याला प्रतिसाद मिळाला नाही तर सोडून द्यायचा असे कॉँग्रेसने केले.  भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर दोन्ही पक्षात फरक असेल तर उन्नईस-बीस म्हणता येईल एवढाच पण शिक्का मात्र कॉँग्रेसच्या पाठीवर. न पुसता येणारा शिक्का मारण्यासाठी भाजपने घेतलेले कष्ट, त्यात राखलेले सातत्य आणि नियोजनपूर्वक एकचएक गोष्ट चहुदिशेने सामन्यांच्या सतत कानी पडेल यासाठी केलेले प्रयत्न यातून कोंग्रेस पक्ष, पक्षाचे कार्यकर्ते व नेते काहीच न शिकल्याने या १० वर्षात नरेंद्र मोदीना त्यांच्या सरकारच्या भ्रष्टाचारावरुन घेरण्यास सपशेल अपयशी ठरली आणि त्यामुळे मोठ्या जनसंख्येला कॉंग्रेस भ्रष्टाचारी आणि भाजपा साव वाटली तर नवल नाही ! यात वरच्या न्यायालयांची नरेंद्र  मोदीना मदत झाली हे मान्य केले तरी कॉँग्रेसचे अपयश आणि तोकडे प्रयत्न झाकल्या जात नाही. बोफोर्स प्रकरणात राजीव गांधी आणि त्यांच्या सरकारला क्लीनचिट मिळून युग लोटले। आणि तरीही आज मोदी आणि भाजप बोफोर्स भ्रष्टाचाराचा ठपका राजीव गांधी आणि कोंग्रेसवर ठेवतात. राफेल विमान खरेदी बाबतीत मोदी सरकारला कोर्टाकडून क्लीनचिट मिळाली असली आणि अशी क्लीनचिट देणारे न्यायाधीश मोदी सरकारच्या कृपेने राज्यसभा सदस्य बनले असताना कॉँग्रेसने हा मुद्दा सोडून देण्याचे कारण नव्हते. कॉंग्रेस पक्षाच्या नेतृत्वाने हाताळलेले बोफोर्स प्रकरण आणि भाजप नेतृत्वाने हाताळलेले राफेल प्रकरण याची तुलना केली तर भ्रष्टाचाराच्या बाबतीत कोण अधिक संवेदनशील आहे हे कळू शकते. 

बोफोर्स तोफ सौदा होण्यापूर्वी संरक्षण विषयक बरेचशे सौदे दलालाकरवी व्हायचे. हे दलाल तिकडे विक्री ज्यांच्या हाती त्यांना आणि इकडे खरेदी ज्यांच्या हाती त्यांना आर्थिक प्रलोभने देवून प्रभावित करायचे आणि सौदे पक्के करायचे. शस्त्रास्त्राच्या किंमतीत दिलेल्या आर्थिक प्रलोभनाची आणि दलालांच्या कमिशनची भर पडून खरेदी किंमत वाढायची. जगभरात आजही शस्त्रास्त्र खरेदी याच पद्धतीने होते. पण राजीव गांधी सत्तेत आल्यानंतर त्यांनी निर्णय घेतला की संरक्षण खरेदीत कोणी दलाल असणार नाही. दलाल पद्धत बंद करण्याचा त्यांचा निर्णय हा बोफोर्स सौदयात त्यांच्यासाठी गळफास ठरला ! या सौदयात दलाल कार्यरत होते आणि त्यांनी दलाली घेतली आणि वाटलीही अशा बातम्या समोर आल्या. भारतात इंडियन एक्स्प्रेसने दररोज याविषयी बातम्या देवून मोठा गदारोळ उडवून दिला. हे प्रकरण समोर आल्यावर जेव्हा संसदेचे अधिवेशन सुरू झाले तेव्हा तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी सरकारपक्षातर्फे या सौदयात कोणी दलाली घेतल्याचा इन्कार करून संपूर्ण प्रकरणाची संसदीय समिति मार्फत चौकशी करण्याची घोषणा केली आणि या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी संसदीय समितीच्या मदतीला सीबीआयला  दिले. संसदीय समितीवर विरोधी पक्षानी बहिष्कार टाकला आणि संसदीय समितीचे निष्कर्ष मान्य केले नाहीत. या प्रकरणावरून कॉँग्रेसचा राजीनामा देणारे विश्वनाथ प्रताप सिंग बोफोर्सच्या चौकशीसाठी नेमलेल्या संसदीय समितीवर बहिष्कार टाकणाऱ्या पक्षाच्या मदतीने पंतप्रधान झालेत पण त्यांना त्यांच्या काळात बोफोर्स सौदयात दलाली संबंधीचे सत्य समोर आणता आले नाही. सीबीआयने प्रकरण कोर्टात दाखल केले. अटलबिहारी पंतप्रधान असताना कोर्टाने राजीव गांधीना दोषमुक्त केले. या निकालाला अटल बिहारी सरकारने आव्हान दिले नाही. मात्र भाजपकडून आजही बोफोर्स संदर्भात राजीव गांधी आणि कोंग्रेसवर आरोप होतच असतात. 

बोफोर्स प्रकरणात दलालीचा आरोप झाल्यानंतर राजीव गांधी स्वत:हून चौकशीला सामोरे गेले. ४०० च्यावर संसद सदस्य पाठीशी असताना बोफोर्सची चर्चा हाणून पाडली नाही.  राफेल विमान खरेदीत भ्रष्टाचार आणि अनियमितता झाल्याचे आरोप झाल्यानंतर मोदी सरकारने काय केले ? मोदी सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्यास ठाम नकार दिला. विरोधकांची राफेल भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी संसदीय समिति नेमण्याची मागणी फेटाळून लावली. सीबीआय चौकशीस नकार दिला. ज्या राफेल लढाऊ विमानाची किंमत मनमोहन सरकार वाटाघाटी करत असताना ४०० कोटी होती ती २ वर्षानंतर मोदी काळात १६०० कोटी कशी झाली याचे कोणतेही समर्पक उत्तर देण्यात आले नाही. या विमानात काही बदल केलेत ते जर सांगितले तर शत्रूला त्याची माहिती होईल असे सांगण्यात आले. जे लोक अशी माहिती सांगण्याचा आग्रह धरीत आहेत त्यांना शत्रूला मदत करायची आहे , ते देशद्रोही आहेत असे म्हणून विरोधकांचे तोंड बंद करण्याचा आणि त्या सौदयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न झाला. शत्रूला राफेलची वैशिष्ट्य कळू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टात देखील बंद लिफाफ्यात माहिती देण्यात आली. त्या बंद लिफाफ्यात दिलेल्या माहितीच्या आधारे व्यवहार नियमानुसार झाल्याचा निवाडा सुप्रीम कोर्टाने दिला. किंमती बाबतीत आम्ही तज्ञ नाही असे सांगत किंमतीचा विषय सुप्रीम कोर्टाने उडवून लावला. आणि जेव्हा राफेल विमाने भारतात आलीत तेव्हा राफेलची एकेक विशेषता ओरडून सांगण्याची चढाओढ माध्यमात लागली होती. शत्रूची दाणादाण उडविण्यासाठी या विमानात काय आहे याची रसभरीत वर्णने करण्यात आलीत आणि राफेल खरेदीचा निर्णय कसा गेमचेंजर आहे हे ठसविण्यात आले. पण ४०० कोटीची किंमत १६०० कोटीवर कशी पोचली याची माहिती दिली तर ती मात्र शत्रूला मदत करणारी होती ! ज्याच्या कंपनीला टाचणी बनविण्याचा अनुभव नव्हता त्या अनिल अंबानीला राफेलच्या देखभालीचे कंत्राट कसे दिले गेले याचेही उत्तर चुकीचे देण्यात आले. या कंत्राटाशी भारत सरकारचा संबंध नसून राफेल बनविणाऱ्या कंपनीने ते दिले असे भारत सरकारने सांगितले. मात्र फ्रांसच्या ज्या पंतप्रधाना सोबत नरेंद्र मोदी यांनी बोलणी करून राफेल खरेदी कराराला अंतिम रूप दिले त्या फ्रांसच्या  पंतप्रधानानी अनिल अंबानी यांना कंत्राट देण्याचा आग्रह भारतातर्फे करण्यात आल्याचा गौप्यस्फोट केला ! आपल्याकडे राफेलच्या भ्रष्टाचाराची चर्चा बंद आहे पण फ्रांसमध्ये मात्र या सौदयात दलाली दिल्याची चौकशी सुरू आहे. या चौकशीत भारत सरकार सहकार्य करत नसल्याचे वृत्त सहा महिन्यापूर्वी फ्रांसच्या प्रसारमध्यमात आले होते. बोफोर्स प्रकरणात राजीव गांधीनी स्वत:हून चौकशी सुरू केली आणि राफेल प्रकरणात चौकशी होवू नये असा प्रयत्न मोदी सरकारकडून झाला. तरीही आमची धारणा कोंग्रेस भ्रष्टाचारी आणि भाजपा साव अशी बनविण्यात नरेंद्र मोदी यशस्वी झालेत ! 

---------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि. यवतमाळ 
मोबाईल - ९४२२१६८१५८ 

Thursday, April 11, 2024

मतदारांची 'सती' जाण्याची प्रथा कधी बंद होणार ? (उत्तरार्ध)

 आपण निवडून आलो तर पक्ष म्हणून भेदभाव न करता सर्व पक्षाच्या भ्रष्ट आणि गुन्हेगारी प्रवृत्तीना अशी अद्दल घडवू  की अशा प्रवृत्तीची पुन्हा निवडणूक लढविण्याची हिम्मतच होणार नाही. कमी अधिक प्रमाणात २०१४ च्या लोकसभा निवडणूक प्रचारसभा मधून नरेंद्र मोदी यांनी हेच सांगितले होते. मग ज्यासाठी नरेंद्र मोदी यांनी सत्ता मागितली होती तो मुख्य उद्देश्य पूर्ण होण्याच्या दिशेने काय काम झाले हा प्रश्न विचारणे आणि त्याचे उत्तर मिळविणे हे मतदाराचे आद्य कर्तव्य ठरते. 
----------------------------------------------------------------------------------


२०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या आधीच भारतीय जनता पक्षाने नरेंद्र मोदी यांना  पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित केले होते. त्यावेळी त्यांनी पांच वर्षासाठी सत्ता मागितली होती. आणि ती  कशासाठी तर भ्रष्टाचाराने सडलेल्या भारतीय राजकारणाच्या शुद्धीकरणासाठी. भ्रष्ट आणि गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकप्रतिनिधिना वर्षभराच्या आत तुरुंगात पाठवून संसदेचे शुद्धीकरण करण्यात येईल हे त्यांनी अनेक सभांमधून सांगितले होते. २१ एप्रिल २०१४ रोजी हरदोई येथील सभेत तर त्यांनी राजकारणाच्या शुद्धीकरणासाठी मला पंतप्रधान व्हायचे आहे अशी घोषणाच त्यांनी केली. कोण म्हणतो राजकारणाचे शुद्धीकरण होवू शकत नाही असा प्रश्न विचारात त्यांनी एक वर्षाच्या आत संसद भ्रष्टाचारी आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांपासून मुक्त करण्याची ग्वाही त्यांनी दिली. आजच्या शब्दात सांगायचे तर ती 'मोदी गॅरंटी' होती ! २०१४ च्या निवडणुकीत निवडून आलेल्या लोकप्रतिनिधी विरुद्ध सुरू असलेल्या खटल्यांची समीक्षा करण्यासाठी आणि खटल्याना गती देण्यासाठी समिति नेमणे हे निवडून आल्यावर आपण करणार असल्याचे पहिले काम असेल आणि आपण सुप्रीम कोर्टाला देखील हे खटले एक वर्षाच्या आत निकाली काढण्यासाठी विनंती करू हे त्यांनी भर सभेत सांगितले होते. पक्ष म्हणून भेदभाव न करता सर्व पक्षाच्या भ्रष्ट आणि गुन्हेगारी प्रवृत्तीना निवडून आलो तर अशी अद्दल घडविन की अशा प्रवृत्तीची पुन्हा निवडणूक लढविण्याची हिम्मतच होणार नाही. कमी अधिक प्रमाणात २०१४ च्या लोकसभा निवडणूक प्रचारसभा मधून नरेंद्र मोदी यांनी हेच सांगितले होते. मग ज्यासाठी नरेंद्र मोदी यांनी सत्ता मागितली होती तो मुख्य उद्देश्य पूर्ण होण्याच्या दिशेने नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानकीच्या काळात काय काम झाले हा प्रश्न विचारणे आणि त्याचे उत्तर मिळविणे हे मतदाराचे आद्य कर्तव्य ठरते. 

भ्रष्ट आणि गुन्हेगार लोकप्रतिनिधी तुरुंगात असतील आणि संसद एक वर्षाच्या आत स्वच्छ करण्यास आपली सर्वोच्च प्राथमिकता असेल हे सांगणाऱ्या नरेंद्र मोदींनी या दिशेने कोणती  पाऊले उचलली ? त्यांनी संसदेतील आपल्या पहिल्या भाषणात राजकारणाच्या गुन्हेगारीकरणावर व भ्रष्टाचारावर हल्लाबोल केला. पण निवडणूक प्रचारात दिलेल्या गॅरंटी प्रमाणे ना समिती बनली ना सुप्रीम कोर्टाला खटले वेगाने चलविण्याची विनंती केली गेली.  एक वर्ष सोडा पण पहिल्या पांच वर्षाच्या कार्यकाळात एकही लोकप्रतिनधी खटल्याचा निका ल लागून तुरुंगात गेला असे झालेले नाही. २०१४ साली नरेंद्र मोदींच्या भारतीय जनता पक्षाला २८२ जागांवर विजय मिळाला होता. निवडून आलेल्या उमेदवारांपैकी ३५ टक्के भाजपा खासदार भ्रष्टाचार वा गुन्हेगारी प्रकरणात आरोपी होते. यापैकी २२ टक्के खासदारावर गंभीर स्वरूपाचे आरोप होते.   २०१४ च्या निवडणुकीत स्वपक्षातील कोणाला तिकिटे द्यायचे हे नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार असले तरी त्यांच्या हातात नव्हते हे खरे आहे. पण ज्यांच्यावर गंभीर आरोप आहेत त्यांना पक्षात व सरकारात पद आणि प्रतिष्ठा मिळणार नाही हे पक्षाचे नेते आणि पंतप्रधान म्हणून करू शकले असते ते देखील नरेंद्र मोदी यांनी केले नाही. उलट पंतप्रधान मोदीनी गंभीर आरोप असलेल्या स्वपक्षातील १३ खासदाराना आपल्या मंत्रीमंडळात मानाचे स्थान दिले !  ५ वर्षानी दुसरी सार्वत्रिक निवडणूक आली तेव्हा कोणाला तिकीट द्यायचे आणि कोणाला नाही हे मोदींच्या संमती शिवाय शक्य नव्हते. मग राजकारणाच्या शुद्धीकरणासाठी पंतप्रधान बनलेल्या नरेंद्र मोदीनी स्वपक्षातील भ्रष्ट आणि गुंडाना तरी तिकीटा पासून वंचित ठेवले का हा प्रश्न पडतो. याचे उत्तर २०१९ च्या नव्या लोकसभेत पाहायला मिळते. 


२०१४ ते २०१९ या पाच वर्षाच्या काळात नरेंद्र मोदी यांनी अमित शाह यांच्या मदतीने भाजपवर आणि भाजपातील निर्णय प्रक्रियेवर पूर्ण नियंत्रण मिळविले होते. कोणाला निवडणुकीत तिकीट द्यायचे आणि कोणाला नाही याचा निर्णय सर्वस्वी नरेंद्र मोदींच्या हातात होता. ज्या कारणासाठी सत्ता मागितली त्याची पूर्तता ते आपल्या पक्षाच्या बाबतीत करण्याच्या स्थितीत असताना घडले उलटेच. गुन्हेगारांची आणि भ्रष्टाचाऱ्यांची वर्षभरात अशी वाट लावतो की पुन्हा अशा लोकांच्या मनात निवडणुका लढण्याचा विचार देखील येणार नाही असे २०१४ च्या प्रचार संभातून सांगणाऱ्या मोदीनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत अशा लोकाना मुक्तहस्ते तिकिटाचे वाटप केले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत आपल्यावरील गुन्हेगारी स्वरूपाच्या खटल्याची माहिती आणि कबुली देणारे २३३ खासदार निवडून आलेत यात बीजेपीकडून निवडून येणारांची संख्या अधिक आहे. गुन्हेगारांचे लोकसभेत येण्याचे प्रमाण २०१४ च्या निवडणुकी पेक्षा २०१९ च्या निवडणुकीत अधिक राहिले आहे. २०१४ मध्ये निवडून येणाऱ्या लोकसभा सदस्यात आपल्यावरील गुन्हेगारी खटल्याची कबुली देणाऱ्या सदस्यांची संख्या १८५ होती. २०१४ पेक्षा २०१९ मध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या सदस्यांच्या संख्येत तब्बल ११ टक्क्याने वाढ झाल्याचे पाहायला मिळते. बलात्कार, खून, अपहरण आणि खंडणी सारख्या गंभीर गुन्ह्यात अडकलेल्या सदस्यांच्या संख्येतील वाढ चिंता वाढविणारी आहे. अशा गंभीर गुन्ह्यात अडकूनही लोकसभेत २०१४ साली २१ टक्के म्हणजे ११२ सदस्य निवडून आले होते. २०१९ मध्ये अशा गंभीर गुन्ह्यात अडकूनही लोकसभेत प्रवेश करण्यात यशस्वी झालेल्यांची संख्या होती १५९ ! ही सदस्य संख्या सर्वपक्षीय असली तरी गुन्हेगारांचा व भ्रष्टाचाराचा कर्दनकाळ अशी स्वत:ची प्रतिमा समोर करणाऱ्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भारतीय जनता पक्षाचा वाटा सिंहाचा राहिला आहे. २०१९ च्या निवडणुकीत दखल प्रतिज्ञापत्रात आपल्यावरील गुन्हेगारी स्वरूपाच्या खटल्याची माहिती देणाऱ्या सदस्यात जेडियू १३, कोंग्रेस २९,डीएमके १०, तृणमूल कोंग्रेस ९ तर भारतीय जनता पक्ष ११६ ! यात अतिगंभीर गुन्ह्यातही भारतीय जनता पक्षातर्फे निवडून आलेल्या सदस्यानी आघाडी घेतली आहे. २०१९ साली भारतीय जनता पक्षाचे लोकसभेत ३०१ सदस्य निवडून आले होते. यातील तब्बल ८७ सदस्यावर अतिगंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. राज्यसभेच्या बाबतीत काही वेगळी स्थिति आहे असेही नाही. राज्यसभेच्या सदस्याची निवड तर पूर्णत: पक्षनेत्याच्या हाती असते. पण तिथेही ३३ टक्के सदस्यानी प्रतिज्ञापत्रात आपल्यावरील गुन्हेगारी स्वरूपाच्या खटल्याची माहिती दिली आहे. यातील १८ टक्के सदस्यांवर खून, बलात्कार यासारखे गंभीर आरोप आहे. या सर्वपक्षीय सदस्यातही मोदींचा भाजप आघाडीवर आहे. 

या १० वर्षाच्या काळात मोदी सरकारने अमुक केले तमुक केले याचे निवडणुकीच्या तोंडावर जोरजोरात ढोल वाजविले जात आहेत आणि जातील. मोदींची मोठी उपलब्धी म्हणून राममंदिर आणि कलम ३७० मधील काही तरतुदी हटविण्याचा खास उल्लेख होईल. भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यात या गोष्टी पक्षाच्या स्थापणेपासून सामील आहेत आणि त्याची पूर्तता केल्याचे ते अभिमानाने सांगत असतील तर त्यात वावगे काही नाही. खरा प्रश्न आहे तो मोदीनी मतदाराना सत्ता कशासाठी मागितली होती आणि त्याच्या पूर्ततेच्या दिशेने त्यांनी काय पाऊले उचलली. मोदीनी राममंदीर बांधण्यासाठी सत्ता हाती द्या म्हंटले नव्हते की कलम ३७० रद्द करण्यासाठी सत्ता द्या म्हंटले नव्हते. तीन तलाक रद्द करण्यासाठीही सत्ता मागितलेली नव्हती. २०१४ सालच्या निवडणूक प्रचारात मोदीनी देशभरात १०० च्या जवळपास मोठ्या सभा घेतल्या. त्यापैकी एकाही सभेत या कोणत्याही विषयाचा त्यांनी उल्लेख केला नाही. मात्र भ्रष्टाचार मुक्त देश, गुन्हेगार मुक्त संसद हा त्यांच्या प्रत्येक भाषणातील मध्यवर्ती मुद्दा होता. राजकारणाची मैली गंगा साफ करण्याची मोदी गॅरंटी होती. या गॅरंटीचे काय झाले हा प्रश्न विचारण्याची ही वेळ आहे. भ्रष्टाचाऱ्याना सत्तेत सहभागी करून घेणे म्हणजे त्यांना अद्दल घडविणे किंवा तुरुंगात पाठविणे आहे का हा प्रश्न विचारला जावू नये म्हणून केलेल्या नी न केलेल्या गोष्टींचे जोरजोरात ढोल वाजविले जातील. सती जाताना ढोलाचा ,घोषणांचा गजर वाढायचा तसा हा निवडणुकांचा गजर आहे. प्रत्येक वेळी हा आवाज आपल्या विवेकाचा बळी घेत आला आहे. याही वेळेस आपण बळी जायचे की रोखठोक प्रश्न विचारून समाधान करून घेवून मतदान करायचे याचा निर्णय मतदाराने घ्यायचा आहे. प्रत्येक निवडणुकीत सती सारखे बळी जायचे नसेल तर डोक्यात प्रश्नांची गर्दी होणे आणि ते प्रश्न ओठावर येणे गरजेचे आहे. 

---------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि. यवतमाळ 
मोबाईल : ९४२२१६८१५८