Thursday, April 27, 2023

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - ५३

काश्मीरघाटीत १९८१ च्या जनगणनेनुसार पंडीत आणि इतर हिंदूंच्या खालोखाल शीख जनसंख्या होती. हिंदू सव्वालाख तर शीख एक लाख अशी जनसंख्या होती. पण १९९० च्या हिंसाचाराच्या दशकात शिखांविरुद्ध आतंकवादी हिंसा फारसी झाली नव्हती. त्यामुळे पंडितांसमवेत घाटी सोडणारे कुटुंब संख्येने जास्त नव्हते. शिखांविरुद्ध हिंसाचाराची मोठी घटना घडली २० मार्च २००० रोजी. 
----------------------------------------------------------------------------------- 
 
 
 
पंडीत कुटुंबियांचे लोंढे १९ जानेवारी १९९० नंतर काही महिने बाहेर पडणे सुरु होते तरी त्याही परिस्थितीत तिथेच राहण्याचा निर्णय घेणाऱ्या पंडीत कुटुंबियांची संख्या कमी नव्हती. सैन्याला बोलावण्यात आल्यामुळे लवकर आतंकवादआतंकवाद्यांवर सैन्य नियंत्रण मिळवीलपरिस्थितीतील दाहकता कमी होईल ही जशी आशा त्यांना होती तशीच मुस्लीम शेजारी आपल्याला इजा पोचविणार नाही ही भावना देखील होती. पण सैन्यदलाला आतंकवादावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवायला दोन वर्षापेक्षा अधिक काळ लागला. निवृत्त जनरल वीज यांनी १९९३ पर्यंत काश्मीर घाटीतील परिस्थिती सेनादलाने  नियंत्रणात आणल्याचे लिहिले आहे. या काळात आतंकवाद्या सोबत सुरक्षादलाच्या चकमकी नित्याचा भाग बनल्या होत्या. सतत कर्फ्युत राहावे लागायचे. आणि याकाळातही पंडितांना निवडून निवडून मारण्याचे आतंकवाद्यांनी सुरूच ठेवल्याने मागे राहिलेली कुटुंबे काश्मीर घाटीतून बाहेर पडत राहिली. १९९२ पर्यंत काश्मीर घाटीत साडेचार ते पाच हजार पंडीत कुटुंबे उरली होती तर ही संख्या १९९८  पर्यंत साडेतीन हजार कुटुंबीया पर्यंत आली. मागे राहिलेली कुटुंबे ही गांवागांवातून विखुरलेली होती. त्यांच्या शेजाऱ्यांनी किंवा गांवातल्या सामान्य मुस्लिमांनी त्यांना हाकलून द्यायचे ठरविले असते तर पंडीत कुटुंबासाठी थांबणे शक्य झाले नसते. गांवात पंडितांच्या सामुहिक हत्या करून भयभीत करण्याचा प्रयोग आतंकवाद्यांनी १९९७ मध्ये केला. १९९७ ते २००३ याकाळात चार ठिकाणी सामुहिक हत्याकांड आतंकवाद्यांनी घडवून आणली. यातील तीन पंडीत समुदायांशी संबंधित होते तर एक शीख समुदायाशी संबंधित होते. काश्मीरघाटीत  थांबण्याचा निर्णय घेतलेल्या अनेक कुटुंबांनी या काळात बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. या काळात केंद्रात  वाजपेयी यांचे सरकार होते. सरकारी पातळीवर विस्थापित पंडीत कुटुंबांचे परत काश्मीरघाटीत पुनर्वसन करण्याचा विचार सुरु झाला होता त्याला अशा सामुहिक हत्याकांडाने खीळ बसली. या हत्याकांडा नंतरही घाटीत ८०० च्या वर पंडीत कुटुंब आहेत. २०१९ नंतर पुन्हा पंडितांना निवडून मारण्याचे सत्र आतंकवाद्यानी सुरु केल्याने या ८०० पैकी काही कुटुंबांनी मागच्या २-३ वर्षात काश्मीरघाटी सोडली आहे 
 
 

काश्मीरघाटीत १९८१ च्या जनगणनेनुसार पंडीत आणि इतर हिंदूंच्या खालोखाल शीख जनसंख्या होती. हिंदू सव्वालाख तर शीख एक लाख अशी जनसंख्या होती. पण १९९० च्या हिंसाचाराच्या दशकात शिखांविरुद्ध आतंकवादी हिंसा फारसी झाली नव्हती. त्यामुळे पंडितांसमवेत घाटी सोडणारे कुटुंब संख्येने जास्त नव्हते. शिखांविरुद्ध हिंसाचाराची मोठी घटना घडली २० मार्च २००० रोजी. अनंतनाग जिल्ह्यातील छत्तिसिंगपुरा येथे ३६ शिखांना रांगेत उभे करून गोळ्या घालून ठार करण्यात आले. २० आतंकवादी भारतीय सैन्याच्या वेशात आले होते. आपण भारतीय सैनिकच आहोत हे दर्शविण्यासाठी ते जय हिंद च्या घोषणाही देत होते. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बील क्लिंटन भारत भेटीवर येण्याच्या आदल्या दिवशी हे हत्याकांड घडविल्या गेले. सेनादलाने आपल्या स्तरावर या घटनेची चौकशी करून केंद्र सरकारला अहवाल दिला होता. या चौकशीत सामील असलेले लेफ्टनंट जनरल के.एस. गिल यांनी सदर घटनेत सेनेच्या खालच्या अधिकाऱ्यांचा हात असल्याचा गंभीर आरोप केला होता. घटनेच्या चौकशीचा अहवाल तत्कालीन गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांना देण्यात आला होता पण काहीच कारवाई झाली नसल्याचेही गिल यांनी म्हंटले आहे. सैन्याच्या कारवाईतून निर्माण झालेल्या दबावामुळे १९९२ नंतर अनेक दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण केले होते. या दहशतवाद्यांचा उपयोग सेनेने दहशतवाद्यान्विरुद्ध केल्याचे सर्वश्रुत आहे. शिखांच्या शिरकाणात सामील आत्मसमर्पण केलेले दहशतवादीच होते असा दावा गिल यांनी केला आहे. नंतर या हत्याकांडात सामीलदहशतवाद्यांना मारल्याचा दावा करण्यात आला पण चौकशीअंती तो खोटा निघाला. घटनेशी संबंध नसलेल्या पाच युवकांची हत्या करण्यात आली होती आणि या संदर्भात राष्ट्रीय रायफल्सच्याजवानांना दोषी धरण्यात आले होते. काश्मीरप्रश्नाची आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा व्हावी, दखल घेतली जावी या हेतूने दहशतवाद्यांनी बील क्लिंटन यांच्या आगमन प्रसंगी शिखांचे हत्याकांड घडवून आणल्याचा दावा तत्कालीन वाजपेयी सरकारने केला होता. मात्र या घटनेसाठी कोणता आतंकवादी गट जबाबदार होता हे आजतागायत स्पष्ट झालेले नाही. मात्र या घटनेनंतर बरीच शीख कुटुंब काश्मीरघाटी बाहेर पडलीत. तरीही आज घाटीत ४० हजाराच्या आसपास शीख समुदाय आहे. १९९० पूर्वी घाटीत हिंदू जनसंख्या दुसऱ्या क्रमांकावर होती. आता दुसऱ्या क्रमांकावर शीख समुदाय आहे 
 
 

या हत्याकांडाच्या आधी १९९७ पासून दहशतवाद्यांनी सामुहिक हत्याकांड घडवून आणण्याचे तंत्र अवलंबिले होते. बुड्गाम जिल्ह्यातील संग्रामपोरा गांवात २१ मार्च १९९७ लाकाश्मिरी पंडितांची हत्या केली. नंतर वंधामा गांवात शिरून दहशतवाद्यांनी २५ जानेवारी १९९८ रोजी २३ काश्मिरी पंडितांची हत्या केली होती. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला या हत्या करून प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात विघ्ने आणण्याचा दहशतवाद्यांचा हेतू होताच शिवाय राहिलेल्या पंडितांना घाटी सोडण्याचा हा इशारा होता. याच वर्षी १७ एप्रिलला प्राणकोट येथे २९ पंडीत आणि इतर हिंदूंची हत्या करण्यात आली. हत्येनंतर त्यांची घरे देखील जाळण्यात आली. याच वर्षी १९ जूनला चापनरी गांवात २५ पंडितांची हत्या दहशतवाद्यांनी केली. . यानंतर काश्मीर घाटीत  पंडितांची सामुहिक हत्या करण्यात आली ती २००३ साली. नदीमार्ग गांवात दहशतवाद्यांनी २४ मार्च रोजी २४ पंडितांना गोळ्या घातल्या. अतिरेक्यांनी पहिले मुस्लीम सामुहिक हत्याकांड घडवून आणले ते २००४ साली. तेली काठा गांवात ग्राम सुरक्षा दलाच्या सदस्यांवर अतिरेक्यांनी हल्ला चढवूनसदस्यत्यांचीमुले यांची हत्या केली. १० जखमी झालेत ज्यात निम्म्या महिला होत्या. ग्राम सुरक्षा दलाच्या अन्य सदस्यांनी अतिरेक्यांवर गोळीबार करून पळवून लावले. त्यामुळे अधिकची प्राणहानी टळली. सामुहिक हत्याकांड घडविताना अतिरेक्यांचा नागरिकांनी केलेला हा पहिला प्रतिकार होता. या हल्ल्यात मारल्या गेलेले आणि प्रतिकार करणारे सर्वच्यासर्व मुस्लीम होते. यानंतर सामुहिक हत्याकांड थांबले ते थेट २०१७ पर्यंत. ज्याला नरसंहाराच्या घटना म्हणता येतील अशा या घटनाआहेत. या घटनांमध्ये अमरनाथ यात्रेंवरील हल्ले आणि जम्मूत झालेले आतंकवादी हल्ले यांचा समावेश नाही.
 
                                                        (क्रमशः) 
------------------------------------------------------------------------------- 
सुधाकर जाधव  
पांढरकवडा जि. यवतमाळ  
मोबाईल : ९४२२१६८१५८