Thursday, February 25, 2021

देशविरोधी कारस्थान की निरपराधाना देशद्रोही ठरविण्याचे कारस्थान ? -- २

देशद्रोही ठरवा आणि विरोध दडपून टाका ही नीती शेतकरी आंदोलनाच्या बाबतीत यशस्वी न झाल्याने हे आंदोलन सरकारसाठी अवघड जागी दुखणे ठरले आहे. तरी मोदींच्या प्रचार यंत्रणेने हार मानलेली नाही. ज्यात काहीही आक्षेपार्ह नाही अशा आभासी ‘टूलकीट’चा बागुलबोवा उभा करून शेतकरी आंदोलनाचे समर्थक आंतरराष्ट्रीय कटाचा भाग असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न सुरूच आहे.
----------------------------------------------------

मागच्या लेखात आपण पाहिले की प्रधानमंत्री मोदी आणि त्यांच्या सरकारची व पक्षाची प्रचार यंत्रणा व त्यांना साथ देणारे देशातील असंख्य प्रसारमाध्यमे केंद्र सरकारच्या चुकांवर पांघरूण घालून विरोधी आवाज दडपून टाकण्यासाठी आणि विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी दिवसरात्र काम करीत असतात. चीनच्या घुसखोरीवर पांघरूण घालण्या इतपत या प्रचार यंत्रणेची मजल गेली आहे. अपप्रचार आणि खोटे पसरविणे यात पारंगत या प्रचारयंत्रणेला मोदींच्या आजवरच्या  ७ वर्षाच्या कार्यकाळात केवळ दिल्ली सीमेवर आज सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाकडून आव्हान मिळाले आहे. प्रचार यंत्रणेकडून आंदोलनाची प्रचंड बदनामी करणे आणि मग या बदनाम झालेल्या आंदोलनाला पोलीसी बळ वापरून मोडून काढण्याची मोदी राजवटीत सुरु झालेली परंपरा शेतकरी आंदोलनाने खंडित केली. जे एन यु मधील विद्यार्थी नेत्यांना देशद्रोही ठरविणे आणि पोलीसी बळाचा गैरवापर यापूर्वी मोदी सरकारने यशस्वी करून दाखविला. तोच प्रकार अलीगडसह देशातील विविध विद्यापीठात करून युवाशक्ती सरकारच्या विरोधात उभी राहणार नाही याची व्यवस्था करण्यात मोदी सरकारने यश मिळविले. नव्या नागरिकता कायद्याविरुद्ध देशभर उभे राहिलेले आंदोलन याच पद्धतीने दडपण्यात मोदी सरकारला यश आले. देशद्रोही ठरवा आणि विरोध दडपून टाका ही नीती शेतकरी आंदोलनाच्या बाबतीत यशस्वी न झाल्याने हे आंदोलन सरकारसाठी अवघड जागी दुखणे ठरले आहे. तरी मोदींच्या प्रचार यंत्रणेने हार मानलेली नाही.                                   

प्रजासत्ताक दिनी लालकिल्ल्यावर घडलेल्या प्रसंगाचे निमित्त करून शेतकरी आंदोलना विरुद्ध जहरी प्रचार करून देशभरात आंदोलनाविरुद्ध जनमत तयार करण्याचे काम सुरु आहे. जो प्रसंग सगळ्या देशाने पाहिला त्याविषयी सरकारी व सरकार समर्थक प्रचार यंत्रणा आणि प्रसार माध्यमे कसा प्रचार करीत आहे हे लक्षात घेतले तर शेतकरी आंदोलना विरुद्ध सूक्ष्मपणे कशी विष पेरणी करण्यात येत आहे हे लक्षात येईल. 'लाल किल्ल्यावरील हिंसा' असे सरसकट या प्रसंगाचे वर्णन करण्यात येत आहे. मुळात आंदोलकांना लालकिल्ल्यात शिरण्यापासून आणि किल्ल्यावर चढण्यासाठी प्रतिबंध करायला पुरेसे सुरक्षाबळ नव्हतेच. जेवढे पोलीस उपस्थित होते त्यांच्या समवेत अगदी हसत खेळत धार्मिक झेंडा लावण्यात आल्याचे सर्वांनी बघितले. तोपर्यंत प्रत्यक्ष किल्ल्यावर कोणताही हिंसक प्रसंग घडला नव्हता. सरकारी यंत्रणेला हे सगळे घडू द्यायचे होते असे वाटण्यासारखी झेंडा लावण्या पर्यंतची परिस्थिती होती. नंतर जी माहिती पुढे आली ती याची पुष्टी करणारीच आहे.               


लालकिल्ल्यावरील झेंडा प्रकरणातील प्रमुख आरोपी लोकसभा निवडणुकीत भाजपचा प्रचार करणारा निघाला. एवढेच नाही तर त्याचे प्रधानमंत्री मोदी व गृहमंत्री अमित शाह यांचे बरोबरचे फोटो बरेच काही सांगून जातात. कोणीही कोणाबरोबर फोटो काढू शकतात असे सांगून पांघरूण घालण्या इतकी ही साधी घटना नाही. आज मोदी मंत्रीमंडळातील मंत्री देखील सहजपणे मोदींना भेटू शकत नाही तिथे लालकिल्ल्यावर झेंडा फडकविणारा व्यक्ती हसत खेळत मोदी सोबत फोटो काढतो ही घटना त्या व्यक्तीचे विशेष स्थान दर्शविणारी आहे. लाल किल्ल्यावर धार्मिक झेंडा फडकविण्याचे यशस्वी नियोजन करणारी व्यक्ती देशाच्या प्रधानमंत्री व गृहमंत्र्यासोबत काय करत होती हा प्रश्न देशाला पडायला पाहिजे होता आणि याचे उत्तर देण्यासाठी प्रधानमंत्री व गृहमंत्री यांनी पुढे यायला हवे होते. पण हे राहिले दूर आणि न झालेल्या तिरंग्याच्या अपमानाची हूल उठविण्यात सरकारी प्रचार यंत्रणा यशस्वी झाली.                                

 

लाल किल्ल्यावरची घटना म्हणजे शेतकरी आंदोलनाचा खलिस्तानी चळवळीशी संबंध असल्याचा पुरावा म्हणून समोर केल्या गेला. शेतकरी आंदोलनात कोण सामील होते याची कुंडली तपासणारी यंत्रणा त्या आंदोलनाकडे नाही. तशी ती कोणत्याच आंदोलनाकडे नसते. पण सरकारकडे ती यंत्रणा उपलब्ध आहे. प्रधानमंत्र्याच्या जवळ त्या यंत्रणेच्या नजरेखालून जाणारी व्यक्तीच जावू शकते. मग किल्ल्यावर झेंडा फडकविण्याचे नियोजन करणारी व्यक्तीचे खलिस्तानी कनेक्शन असेल तर अशा व्यक्तीचे प्रधानमंत्र्या समवेत कनेक्शन कसे हा प्रश्न देशाला आणि सर्व सरकारी सुरक्षा यंत्रणांना पडायला पाहिजे होता. पण हा गंभीर प्रश्न दडवून आंदोलनाचे खलिस्तानी कनेक्शन दाखविण्यावर सरकार समर्थक प्रसार माध्यमांचा आणि सरकारी प्रचार यंत्रणेचा भर आहे. त्यासाठी 'टूलकीट' नावाच्या आभासी औजाराचा उपयोग करण्याचा आकांत सरकारी यंत्रणा करीत आहेत. या प्रकाराने भारत सरकारचे जगभर हसे होत असले आणि भारताची बदनामी होत असली तरी सरकारला त्याची पर्वा नाही. जगातील लोक काय समजतात या पेक्षा भारतीय लोकांनी टूलकीटला देशद्रोहाचे औजार समजावे यावर सरकारचा भर आहे. सरकार स्वत:च्या अशा कृतीने जगात बदनाम होत असतांना शेतकरी आंदोलनाचे समर्थक देशाची बदनामी करीत आहेत असा प्रचार सुरु आहे आणि नेहमी प्रमाणे असे करणारे हे देशद्रोही आहेत हे ठसविण्याचे काम सध्या सुरु आहे. या टूलकीट प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दिशा नावाच्या २२ वर्षीय युवतीला जामीनावर सोडतांना सत्र न्यायालयाने जे म्हंटले आहे ते लक्षात घेतले तर मोदी सरकार आपल्या अजस्त्र प्रचार यंत्रणेच्या मदतीने निरपराधाना देशद्रोही ठरविण्याचे कारस्थान करीत असल्याचे स्पष्ट होईल. टूलकीट प्रकरण आणि या प्रकरणात दिशा रवि या पर्यावरण चळवळीत काम करणाऱ्या युवतीला जमीन मंजूर करताना कोर्टाने काय म्हंटले या विषयी पुढच्या लेखात.
---------------------------------------------------
सुधाकर जाधव
ssudhakarjadhav@gmail.com


Thursday, February 18, 2021

देशविरोधी कारस्थान की निरपराधाना देशद्रोही ठरविण्याचे कारस्थान ? – १

मोदी सरकारला विरोध करणारामोदी सरकार विरुद्ध आंदोलन करणारे  पाकिस्तान समर्थक किंवा चीन समर्थक देशद्रोही असतात खलिस्तानी असतात नक्षलवादी असतात हे सतत लोकांच्या मनावर ठसवत राहणे आणि आपल्या विरोधात कोणी बोलू नये उभा राहू नये याची काळजी घेणे हेच या सरकारचे प्रमुख कार्य बनले आहे. 

--------------------------------------------------------------------------------------


शेतकरी आंदोलनामुळे मोदी सरकारची कार्यपद्धती - इंग्रजीत ज्याला मोडस ऑपरेंडी म्हणतात - ती आता सर्वसामान्यांना कळावी इतकी स्पष्ट झाली आहे. तरी ती कळत नाही याचे कारण सर्वसामान्यांनी प्रश्न विचारणे सोडले आहे. मोदी सरकारला  प्रश्न विचारणे गुन्हा आहे अशी धारणा मोदींच्या प्रचार यंत्रणेने बनविण्यात यश मिळविल्याचा हा पुरावा आहे. परिणामी आपण जे डोळ्याने पाहतो आणि मोदी आणि त्यांचे सरकार जे सांगते यात जमीन अस्मानाचा फरक असला तरी मोदी सांगतात तेच खरे असे वातावरण सरकारी व भाजपच्या प्रचार यंत्रणेने आणि त्यांच्या दावणीला बांधलेल्या लोकशाहीच्या तथाकथित चौथ्या स्तंभाने म्हणजे प्रसार माध्यमे यांनी तयार केले आहे. खोटे रेटण्याबाबत मोदी आणि त्यांच्या सरकारचा आत्मविश्वास एवढा वाढला आहे की कोट्यावधी लोकांनी आपल्या डोळ्यांनी पाहिलेली घटना सुद्धा विपरीत आणि विकृत स्वरुपात मांडून तेच खरे असल्याचा आभास तयार करणे त्यांच्या हातचा मळ आहे !

प्रजासत्ताक दिनी लालकिल्ल्यावर काय घडले हे कोट्यावधी लोकांनी आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे. सध्या सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनातील एक गट ठरलेला मार्ग सोडून लालकिल्ल्याकडे गेला होता. लालकिल्ल्यात शिरून या गटाच्या नेत्यांनी शीख धर्माचा पवित्र ध्वज लालकिल्ल्यावर फडकावला. ठरलेला मार्ग सोडून लालकिल्ल्यावर जाणे , तिथे अशाप्रकारचा ध्वज लावणे हे समर्थनीय नाहीच. हा प्रकार करणारे लोक शेतकरी आंदोलनाचा भाग असले तरी त्यांची कृती आंदोलनाच्या पाठीत सुरा खुपसणारी होती हे मोदी सरकारने या घटनेचा उपयोग करून शेतकरी आंदोलनाबाबत जे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्यावरून स्पष्ट होते. सुतावरून स्वर्ग गाठण्यात मोदींची प्रचारयंत्रणा माहीर आहेच. देशभरात लाखो मुखातून तिरंग्याचा अवमान झाल्याची आरोळी ठोकली गेली. खलिस्तानचा झेंडा लालकिल्ल्यावर फडकविल्याच्या प्रचाराचा मारा चोहोबाजूंनी करण्यात आला. प्रचार एवढा जबरदस्त की लोकांनी आपल्या डोळ्यांनी जे पाहिले त्यावर अविश्वास दाखवून मोदी सरकार व भाजपच्या प्रचारावर विश्वास ठेवला !      

 

शीख धर्माचा पवित्र ध्वज फडकवताना कोणीही तिरंग्याला स्पर्श केला नव्हता. ध्वज देखील तिरंग्याच्या उंचीच्या खालीच होता. या कृतीला फार तर अनुचित म्हणता येईल. पण ही अनुचित कृती मोदींच्या प्रचारयंत्रणेला मिळालेले घबाड ठरले आणि शेतकरी आंदोलन खलिस्तानीवादी आहे असे चित्र रंगविल्या गेले. कुठल्याही मिरवणुकीत हिरवा ध्वज दिसला की त्या मिरवणुकीत पाकिस्तानचे ध्वज फडकावले गेलेत असा प्रचार करणारे मोदी सरकारचे यशस्वी कलाकार शीख धर्माचा ध्वज म्हणजे खलिस्तानचा ध्वज असा आभास तयार करण्यातही यशस्वी झाले. या प्रचारावर शिक्कामोर्तब करण्यासाठी मोदी सरकारने राष्ट्रपतीच्या अभिभाषणात तिरंग्याचा अपमान झाल्याबद्दल अश्रू ढाळले. असे खोटे अश्रू ढाळण्यात दस्तुरखुद्द प्रधानमंत्री मागे नव्हते. संसदेच्या व्यासपीठावर जे सरकार राष्ट्रपतीला खोटे सांगायला भाग पडून शेतकरी आंदोलनाची बदनामी करू शकते ते सरकार देशभरात आपल्या चेलेचपाट्याकडून काय प्रचार करून घेत असतील हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

                                             

या प्रसंगाचा उपयोग करून शेतकरी आंदोलनाला ठोकणारे तेच लोक आहेत ज्यांचे स्वप्न लालकिल्ल्यावर तिरंग्या शेजारी नव्हे तर तिरंग्या ऐवजी भगवा ध्वज फडकावण्याचे आहे ! अशाप्रकारचे जाहीर वक्तव्य मोदी सरकार आल्यानंतर अनेक मुखातून बाहेर पडले. असे वक्तव्य तिरंग्याचा अपमान आहे असे मात्र मोदी सरकारला वाटत नाही. लालकिल्ल्यावरचा प्रसंग घडल्यानंतर ज्या व्यक्तीचा या मागे हात होता त्याचे प्रधानमंत्री व गृहमंत्र्यासोबतचे फोटो प्रसिद्ध झालेत. ती व्यक्ती गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या प्रचारात आघाडीवर होती. असे असताना लालकिल्ल्याचे कारस्थान भाजपनेच रचले असू शकते असे वाटण्यासारखी परिस्थिती असताना हाच प्रसंग शेतकरी आंदोलनाचे मोदी सरकार विरुद्ध कारस्थान म्हणून रंगविण्यात मोदी सरकार आणि भाजप पुढे होते !  हा प्रसंग इथे विस्ताराने मांडण्याचे कारण ही घटना कोट्यावधी लोकांनी स्वत:च्या डोळ्यांनी पाहिली असूनही मोदी सरकार विकृत स्वरुपात देशासमोर ठेवत आहे याची जाणीव व्हावी आणि मोदी सरकारच्या  प्रचारयंत्रणा खऱ्याचे खोटे आणि खोट्याचे खरे करण्यात किती वाकबगार आणि समर्थ आहे हे जनसामान्यांच्या लक्षात यावे. 
 

सरकारची चूक झाकून दुसऱ्यांना दोषी ठरविण्यात मोदी सरकारची प्रचारयंत्रणा किती वाकबगार आहे याचे आणखी एक ताजे उदाहरण बघू. चीन लडाख मधून माघार घेत असल्याच्या वार्ता सध्या झळकत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री मोदींनी केलेले विधान आठवा. जगभरच्या माध्यमांनी गेल्या मे महिन्यात चीन लडाख मध्ये खोलवर आत आल्याच्या सचित्र वार्ता प्रसिद्ध झाल्यात. भारतीय माध्यमांनी सोयीस्कर मौन बाळगले. संरक्षण मंत्रालयाच्या वेबसाईटवर चीनच्या घुसखोरीची कबुली देण्यात आली होती. ती लगेच काढून टाकण्यात आली. त्यानंतर प्रधानमंत्र्यांनी 'कोई अंदर आया नही और किसीने कब्जा किया नही' असे वक्तव्य केले. कॉंग्रेस व राहुल गांधीनी यावर आक्षेप घेतला तेव्हा मोदी सरकारच्या प्रचारयंत्रणेत राहुल गांधीना देशद्रोही ठरविण्याची स्पर्धा लागली. प्रधानमंत्र्याच्या विधानाचे चीनकडून जोरदार स्वागत झाले. चीनी घुसखोरीच्या वार्ता आल्यापासून प्रधानमंत्र्याने आजवर एकदाही चीनचे नांव घेवून चीनवर टीका केली नाही तरी  प्रधानमंत्री चीनधार्जिणे ठरले नाहीत. चीन धार्जिणे ठरले ते राहुल गांधी कारण ते लोकांना चीनच्या घुसखोरीबद्दल माहिती देत होते ! 


चीनच्या घुसखोरी बद्दल बोलून राहुल गांधी भारतीय सैन्यावर अविश्वास दाखवून सैन्याचा अपमान करीत आहेत हे सांगताना १९६२ मध्ये चीनने भारताचा पराभव करून मोठ्या भूभागावर कब्जा मिळविल्याच्या कहाण्या मात्र रंगवून आणि आनंदाने सांगितल्या जातात तेव्हा मात्र भारतीय सैन्यदलाचा अपमान होत नसतो. आपल्याला अडचणीत आणणारे जो कोणी बोलेल त्याला देशद्रोही ठरविण्याची स्पर्धाच मोदी समर्थक व्यक्ती व माध्यमात लागलेली असते. कोणी आत आलेच नव्हते तर माघारी कसे चालले हा प्रश्न विचारण्याच्या आधीच समर्थकांचे 'चीन मोदीला घाबरला, माघारी फिरला' अशा प्रकारचे ढोल बडविणे सुरु आहे. यात मोदींनी देशाची दिशाभूल केली , देशाला अंधारात ठेवले या बाबी सोयीस्कर दडविल्या जातात.चीनच्या घुसखोरीवर पांघरून घालणारे महान देशभक्त ठरतात आणि घुसखोरी उजेडात आणणारे देशद्रोही ठरतात ही या सरकारच्या प्रचारयंत्रणेची करणी आणि कमाल आहे !                             

---------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
ssudhakarjadhav@gmail.com

Thursday, February 11, 2021

सरसंघचालक भागवतांचे गांधी भागवत --- ३

भारत हिंदुराष्ट्र आहे म्हणणारा आणि हिंदू हित जपण्याचा, हिंदूंना संघटित करण्याचा दावा करणारा संघ आज महात्मा गांधींना सर्वोच्च हिंदू राष्ट्रभक्त मानतो. मग या सर्वोच्च हिंदू राष्ट्रभक्ताच्या नेतृत्वात  'हिंदू राष्ट्राच्यास्वातंत्र्यासाठी लढाई सुरु होती त्या लढाईत संघ का उतरला नाही  याचे स्पष्टीकरण या निमित्ताने भागवतांनी द्यायला पाहिजे होते.
--------------------------------------------------------------------------


 महात्मा गांधींना सर्वोच्च हिंदू राष्ट्रभक्त म्हणत असतांना हिंदू हे राष्ट्रभक्तच असतात आणि ते कधीच देशद्रोह करत नाहीत अशी पुस्ती सरसंघचालक मोहन भागवत यांनी आपल्या भाषणात जोडली होती. सर्वसामान्य हिंदूंबद्दल मोहनजी भागवत यांचे विधान १०० टक्के खरे आहे. महात्माजी हे सर्वोच्च  राष्ट्रभक्त आहेत हे समजायला आणि मान्य करायला संघाला ९०-९५ वर्षे लागलीत पण सर्वसामान्य हिंदूंना हे कळायला फारसा वेळ लागला नाही. म्हणून तर ते आपले सर्वस्व पणाला लावून महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य संग्रामात सामील झाले होते. पण ज्यांना आपल्या हिंदू असण्याचा लाभ घ्यायचा आहे अशा हिंदूंबद्दल भागवतांचे हे विधान तितकेसे बरोबर नाही.  सर्वच शब्दकोषात देशभक्तीचे व्यवच्छेदक लक्षण म्हणून देशाप्रती निष्ठा सांगितली आहे. इतिहासात अनेक हिंदू महारथींनी देशनिष्ठेला तिलांजली देत परकीय सत्तेची मदत केली आहे. अर्थात दुसऱ्या धर्मातही निष्ठा विकून खाणारे मुबलक आहेत. पण भगवंतांनी अगदी च लावून हिंदू राष्ट्रभक्त असतात असे सांगितल्याने आपण त्यांचे म्हणणे तेवढे तपासू. गद्दार व्यक्ती पुष्कळ असतात. पण व्यक्तिगत पातळीवरील गद्दारी पेक्षा संस्था, संस्थाने आणि  संघटना यांनी केलेली गद्दारी देशासाठी नेहमीच घातक ठरत असते. सरसंघचालकांनी असे विधान केल्यामुळे त्यांना ममत्व वाटत असलेल्या व्यक्ती, संस्था आणि संस्थाने याचाच विचार केला तरी सत्य वेगळेच असल्याचे स्पष्ट होईल. 

१८५७ चा स्वातंत्र्य संग्राम देशासाठी महत्वाची घटना होती. देशी सेनानींनी इंग्रजा विरुद्ध पुकारलेला लढा यशस्वी न होण्यामागे महत्वाचे कारण अनेकांनी आपल्या निष्ठा देशा ऐवजी इंग्रजांच्या चरणी वाहिल्या हे होते. त्यात हिंदू राजांचाही समावेश होता. संघाला ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याबद्दल विशेष ममत्व आहे. १८५७ मध्ये ग्वाल्हेरच्या गादीवर बसलेल्या जियाजीरावांनी इंग्रजांशी हातमिळवणी करून १८५७ च्या स्वातंत्र्य सेनानी विरुद्ध युद्ध पुकारल्याचा इतिहास आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा १८५७ च्या स्वातंत्र्य युद्धातील पराक्रम आजही भारतीयांना स्फुरण देणारा आहे. शिंदेंच्या आणि इंग्रजांच्या संयुक्त फौजांशी लढताना झाशीची राणी मारल्या गेली. पुढे याच शिंदे घराण्याच्या सैनिक सचिवाचे पिस्तूल भागवत आज ज्यांना सर्वोच्च राष्ट्रभक्त हिंदू म्हणतात त्या गांधींना मारण्यासाठी वापरण्यात आले. संघाचे इतिहासावर प्रेम आहे आणि संघाला इतिहासात रममाण व्हायला आवडतेही. मग इतिहासाने नोंद करून ठेवलेल्या या घटनांना डावलून इतिहास सांगणे दिशाभूल करणारे आहे. मोगल इथे स्थिरावले आणि शेकडो वर्षे राज्य केले त्यांना मदत करणारे अनेक हिंदू सेनानी होते हे कसे विसरता येईल. इतिहासात न शिरता आधुनिक काळ डोळ्यासमोर ठेवून भागवतांनी विधान केले असेल असे मानले तरी आधुनिक काळात तशी उदाहरणे कमी नाहीत. काही उदाहरणे तर थेट संघाशी संबंध दर्शविणारी आहे. 

१८५७ नंतरचा दुसरा स्वातंत्र्य लढ्याचे महत्व केवळ स्वातंत्र्य मिळवून देण्यापुरते नाही. या स्वातंत्र्य लढ्यातून बलशाली भारताचा उदय झाला. संघ बलशाली भारताबद्दल सतत बोलत असतो. पण ज्या स्वातंत्र्य लढ्यातून बलशाली भारत  उभा राहात होता तेव्हाही अनेक हिंदू नेत्यांच्या आणि हिंदू संघटनांच्या निष्ठा इंग्रज चरणी वाहिलेल्या  होत्या. इंग्रजांना चलेजाव म्हणणाऱ्या स्वातंत्र्य लढ्याच्या निर्णायक पर्वात ज्यांनी 'चले जावं' चळवळीचा जाहीर आणि  सक्रिय विरोध केला ते तर संघाच्या जवळचे होते. आजच्या भारतीय जनता पक्षाचा पहिला अवतार असलेल्या जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी इंग्रजांच्या बाजूने चलेजाव चळवळ मोडून काढण्यासाठी मैदानात उतरले होते. त्यावेळी श्यामाप्रसाद मुखर्जी बंगाल मध्ये मुस्लिम लीगच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात मंत्री होते. मुस्लिम लीग आणि हिंदुमहासभाचे ते संयुक्त सरकार होते आणि हे दोन्ही घटक चलेजाव चळवळी विरुद्ध इंग्रजांना मदत करीत होते. मंत्रिमंडळात क्रमांक दोनचे मंत्री असलेले श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी बंगालच्या इंग्रज गव्हर्नरला पत्र लिहून १९४२ ची चलेजाव चळवळ मोडून काढण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे वचन दिले होते. नुसते वचनच दिले नव्हते तर बंगाल मध्ये त्यांच्या सरकारने स्वातंत्र्य सैनिकांविरुद्ध दडपशाहीचा वरवंटा फिरवला होता. सरसंघचालकाच्या विधानाला पुष्टी देणारा इतिहास नाही हे स्पष्ट आहे. 

भागवतांच्या शब्दातील 'सर्वोच्च हिंदू राष्ट्रभक्त गांधी  यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्यासाठी सर्वसामान्य हिंदू सोबत मुस्लिम ,ख्रिस्ती , पारशी लढले पण स्वत:ला हिंदूंचा कैवारी म्हणणारा संघ मात्र दूर राहिला. पूर्ण स्वातंत्र्य संग्रामात गांधींनी स्वत:चे हिंदू असणे याचा उपयोग सारा हिंदू समाज त्या लढाईत सामील व्हावा म्हणून केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हिंदुत्व हिंदूंना राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्यापासून दूर नेणारे राहिले आहे. राष्ट्रीय स्वातंत्र्य संग्रामातील गांधींची भूमिका आणि कार्य याने त्यांच्या देशभक्तीवर आपोआप शिक्कामोर्तब होते. स्वातंत्र्य संग्राम सुरु असताना संघाची स्थापना झाली, वाढ होऊ लागली त्या काळात संघ स्वातंत्र्य संग्रामापासून दूरच राहिला. हिंदू हित जपण्याचा, हिंदूंना संघटित करण्याचा दावा करणारा संघ आज ज्याला सर्वोच्च हिंदू राष्ट्रभक्त म्हणतो त्या महात्मा गांधींच्या नेतृत्वा खाली स्वातंत्र्यासाठी का लढला नाही याचे स्पष्टीकरण या निमित्ताने भागवतांनी द्यायला पाहिजे होते. गांधींची अहिंसक लढाई संघाला मान्य नव्हती म्हणून संघ त्या लढाईत सामील झाला नसेल तर ते समजून घेता येईल. भगतसिंगांच्या  सशस्त्र लढाईत सामील होऊन संग्रामाचा तो प्रवाह संघाने पुढे का नेला नाही हे कळायला मार्ग नाही. भगतसिंगांच्या लढाई वेळी संघ बाल्यावस्थेत होता हेही समजून घेता येईल. पण मग सुभाषचंद्र बोस यांनी ब्रिटिशांविरुद्ध  लढण्यासाठी आझाद हिंद फौजेची स्थापना केली त्या फौजेत सामील होणे, सुभाषचंद्र बोस याना बळ देणे हे काम संघाने आनंदाने आणि उत्साहाने करायला हवे होते. हिटलर , मुसोलिनी यांच्या बद्दल संघाला फार आकर्षण व आदर होता. सुभाषचंद्र बोस यांचा भारतीय स्वातंत्र्यासाठी हिटलर आणि मुसोलिनीची मदत घेण्याचा प्रयत्न होता . मग संघ आझाद हिंद सेनेत का सामील झाला नाही किंवा ती सेना उभी करण्यात का मदत केली नाही याचे उत्तर  मिळत नाही.                                                                                                                         

स्वातंत्र्य लढ्याचे जाऊ द्या. स्वातंत्र्यानंतर संघाने स्वातंत्र्य चळवळीचे प्रतीक बनलेल्या तिरंगा झेंड्या विरुद्ध भूमिका घेतली. ५० पेक्षा अधिक वर्षे आपल्या मुख्यालयावर तिरंगा फडकू दिला नाही. संघ तिरंगा फडकावत नाही म्हणून काही युवकांनी संघ मुख्यालयावर तिरंगा फडकावला तर  संघाने तक्रार करून त्यांना अटक करायला लावण्याच्या घटनेला अजून २० वर्षेही झाली नाहीत. सध्या सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनातील काही लोकांनी लालकिल्ल्यावर फडकणाऱ्या तिरंग्याला धक्का न लावता थोड्या दूर आपला झेंडा लावला तर तिरंग्याचा अपमान झाल्याचा कांगावा करणाऱ्या संघ परिवाराचे तिरंग्या बाबतचे वर्तन महाअवमानकारक राहिले आहे. तेव्हा हिंदू असणे म्हणजे राष्ट्रभक्त असणे हा संघाचा दावा संघाच्याच भूतकाळातील कृतीशी सुसंगत नाही. त्यामुळे आता संघाला गांधीजी सर्वोच्च हिंदू देशभक्त वाटत असतील तर संघाने गांधींची  उदार,सहिष्णू आणि सर्वसमावेशक हिंदू धर्माची व्याख्या स्वीकारली पाहिजे. राष्ट्रीय ऐक्यासाठी त्याची गरज आहे. राष्ट्राची गरज ओळखून कार्य करतो तोच खरा राष्ट्रभक्त. राष्ट्रभक्त हा निखळ राष्ट्रभक्तच असतो. तो हिंदू,मुसलमान किंवा ख्रिस्ती असत नाही.
---------------------------------------------------
सुधाकर जाधव 
ssudhakarjadhav@gmail.com 

Wednesday, February 3, 2021

सरसंघचालक भागवतांचे गांधी भागवत ! -- २

गांधींच्या हाती स्वातंत्र्यलढ्याची सूत्रे आलीत त्याच वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची निर्मिती झाली. या पार्श्वभूमीवर  'मेकिंग ऑफ अ हिंदू पेट्रिअट : बॅकग्राउंड ऑफ गांधीज हिंद स्वराजया भागवतांनी विमोचन केलेल्या पुस्तकाचे नाव 'मेकिंग ऑफ अ हिंदू पेट्रिअट : बॅकग्राउंड ऑफ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ' असे का नाही या प्रश्नाचे कटू पण खरे उत्तर संघाचा आणि स्वातंत्र्य संग्रामाचा संबंध नव्हता हेच आहे. 
--------------------------------------------------------------------


महात्मा गांधी यांच्यावरील एका पुस्तकाचे प्रकाशन करतांना गांधी हे सर्वोच्च राष्ट्रभक्त हिंदू होते असे विधान सरसंघचालक मोहन भागवत यांनी केल्याचा उल्लेख मागच्या लेखात केला होता. गांधींच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य संग्राम झाला. त्यावरून ते सर्वोच्च आणि सर्वोत्तम राष्ट्रभक्त सिद्ध झालेच आहेत. त्यांच्या राष्ट्रभक्तीवर पाकिस्तान धार्जिणे असल्याचा ठपका ठेवत शंका घेण्याचे काम आजवर करणाऱ्यात संघ परिवार आघाडीवर होता. आता त्या परिवाराच्या प्रमुखानेच गांधी सर्वोच्च राष्ट्रभक्त असल्याचे तोंडदेखले का होईना जाहीरपणे मान्य केले आहे. संघाने गांधींना आधीच प्रात:स्मरणीय मानले असताना हजारो स्वयंसेवक हजारो मुखांनी गांधींची टिंगल टवाळी व बदनामी करण्यात कसे आघाडीवर असतात हे मागच्या लेखात नमूद केले आहे. तोंडदेखले प्रात:स्मरणीय मानण्याचे हे द्योतक आहे. संघ ही एकचालकानुवर्ती संघटना आहे. वर जो निर्णय होतो त्याचे पालन सगळे स्वयंसेवक करतात असे मानले जाते. हीच तर त्यांची शिस्तप्रियता समजली जाते. संघात खालपासून वरपर्यंत एकाच भूमिकेची पोपटपंची ऐकायला मिळते. मग गांधींना प्रात:स्मरणीय ठरवतांना जो आदर अपेक्षित आहे तो खालचे स्वयंसेवक का दाखवत नाहीत या प्रश्नाचे उत्तर एकच आहे आणि ते म्हणजे मजबुरी म्हणून संघाने गांधींना प्रात:स्मरणीय मानले याची प्रत्येक स्वयंसेवकाला खात्री आहे. आता सरसंघचालकाने गांधींना सर्वोच्च राष्ट्रभक्त म्हंटले ते प्रात:स्मरणीय सारखे तोंडदेखले आहे की नाही हे स्वयंसेवक आपसात आणि लोकांशी गांधी बाबत काय बोलतात यावरून ठरेल. भागवतांनी देखील गांधींना सर्वोच्च राष्ट्रभक्त म्हणताना एक मेख मारून ठेवली आहे. निखळ सर्वोच्च राष्ट्रभक्त न म्हणता त्यांनी सर्वोच्च हिंदू राष्ट्रभक्त  म्हंटले आहे. सरसंघचालक महात्मा गांधींना हिंदू राष्ट्रभक्त मानतात तर मग एक हिंदू म्हणून ते जे बोलत होते , कृती करत होते ते संघाला मान्य आहे का असा प्रश्न मागच्या लेखाच्या शेवटी उपस्थित केला होता.

देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात महात्मा गांधींची राष्ट्रभक्ती तावून सुलाखून निघाली आहे. गांधींच्या हाती स्वातंत्र्यलढ्याची सूत्रे आलीत त्याच वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची निर्मिती झाली. या पार्श्वभूमीवर  'मेकिंग ऑफ अ हिंदू पेट्रिअट : बॅकग्राउंड ऑफ गांधीज हिंद स्वराज' या भागवतांनी विमोचन केलेल्या पुस्तकाचे नाव 'मेकिंग ऑफ अ हिंदू पेट्रिअट : बॅकग्राउंड ऑफ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ' असे का नाही असाही प्रश्न भागवतांच्या गांधी संबंधी उद्गारावर पडतो. एकाचवेळी गांधी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उदय होत असताना आणि दोघेही घोषित हिंदू असतांना त्यांची वाटचाल हातात हात घालून का झाली नाही याचे पटेल असे समर्थन या प्रसंगी भागवतांनी दिले असते तर त्यांच्या प्रतिपादनावर आज उपस्थित झालेत तेवढे प्रश्न उपस्थित झाले नव्हते. आरेसेसचा घोषित उद्देश्य देशातील हिंदू ऐक्याचा होता. स्वातंत्र्य संग्रामाच्या यशस्वीतेसाठी गांधी समोरही जनतेचे ऐक्य टिकवून ठेवण्याचे आव्हान होते. ८० टक्क्यापेक्षा अधिक जनता हिंदू असल्याने त्यांच्यातील ऐक्य गांधींसाठी महत्वाचे होते. अर्थात गांधींसाठी मुस्लिम आणि इतर धर्मीय सुद्धा महत्वाचे होते आणि त्यासाठी हिंदू-मुस्लिम ऐक्यावर त्यांचा भर होता. गांधी आणि संघातील हा फरक मान्य करूनही हिंदू ऐक्याचा पुरस्कार करणाऱ्या संघाने गांधींना देखील हवे असलेल्या हिंदू ऐक्यासाठी  का मदत किंवा सहकार्य केले नाही या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही. याचे तर्कसंगत उत्तर एकच आहे ते म्हणजे गांधीचे हिंदू असणे आणि संघाच्या दृष्टीतील हिंदू यात महद अंतर आहे. गांधीवरील ज्या पुस्तकाचे विमोचन भागवतांनी केले त्या पुस्तकातच एक उदाहरण देण्यात आले आहे ज्यातून संघांचे हिंदुत्व आणि गांधींचे हिंदू असणे यातील अंतर अधोरेखित होते. 

गोहत्या बंदी बाबत संघाचा जेवढा आग्रह आहे तेवढाच गांधींचाही राहिलेला आहे. याच्या सक्तीला मात्र गांधींचा विरोध होता. गोहत्या बंदीचा मुद्दा हिंदू-मुस्लिम-ख्रिस्ती यांच्या ऐक्याच्या आड येता कामा नये यावर गांधींचा कटाक्ष होता हे या पुस्तकात नमूद करण्यात आले आहे. गोहत्ये पेक्षा राष्ट्रीय ऐक्य गांधींच्या दृष्टीने महत्वाचे होते. जे गोमांस भक्षण करतात त्यांनी स्वेच्छेने त्याचा त्याग करावा आणि त्यासाठी प्रयत्न करावा हा गांधींचा आग्रह होता. गोहत्या बंदी पेक्षा गोवंश संवर्धनावर गांधींचा भर होता आणि ऐन स्वातंत्र्य संग्रामात त्यांनी गोरक्षा समिती स्थापन करून हे कार्य नेटाने पुढे नेले. त्यांच्या या भूमिकेचा हिंदू-मुस्लिम किंवा राष्ट्रीय ऐक्यावर अजिबात विपरीत परिणाम झाला नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गोहत्या बंदी संबंधीची दुराग्रही भूमिका मात्र राष्ट्रीय ऐक्य कमकुवत करीत आहे.  गोहत्या बंदीचा आग्रह धरूनही गांधींसोबत स्वातंत्र्यासाठी लढायला मुस्लिम आणि ख्रिस्ती लोक तयार झाले. याचे कारण गांधीं मानतात तो  हिंदू धर्म सहिष्णू आणि सर्वसमावेशक आहे . त्याचमुळे राष्ट्रीय स्वातंत्र्य संग्राम सर्वसमावेशक बनला. पुस्तक विमोचन करतांना भागवतांनी आणखी एक मुद्दा मांडला. प्रत्येक हिंदू हा राष्ट्रभक्त असतोच असा त्यांनी दावा केला. यातून त्यांना इतर धर्मियांच्या बाबतीत असा दावा करता येणार नाही असे सूचित करायचे असावे. त्यांना काय सूचित करायचे त्याकडे दुर्लक्ष करून प्रत्येक हिंदू राष्ट्रभक्त असतोच  हा त्यांचा दावा तपासण्यासाठी   स्वातंत्र्य लढ्यातील संघाची जरी भूमिका लक्षात घेतली तरी भागवतांच्या या दाव्याचा फोलपणा लक्षात येईल.                                                           

-------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
ssudhakarjadhav@gmail.com