Thursday, June 8, 2023

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - ५९

 
आधीच्या पिढीने काश्मिरी पंडीत आणि काश्मिरी मुसलमान यांच्यातील सलोखा आणि सौहार्द अनुभवला तो नंतरच्या पिढीच्या वाट्याला आला नाही. दोन्ही समुदायातील तरुण संघर्ष वेगळा असला तरी त्यात होरपळले आहेत आणि त्यामुळे दोघांच्याही मनात एकमेकांच्या बाबतीत कटू भाव आहेत.
---------------------------------------------------------------------------------

१९९० च्या दशकातील काश्मीरमधील संघर्षाचा परिणाम तिथल्या युवकांवर झाला तसाच तो महिलांवरही झाला. रस्त्यावर कधी संघर्ष सुरु होईल याचा नेम नव्हता. जागोजाग सुरक्षा सैनिकांची तैनाती. त्यामुळे महिलांना घरातच राहणे भाग पडायचे. पण त्या घरात असल्या तरी संघर्षापासून अलिप्त राहू शकत नव्हत्या. कारण ज्या भागात दहशतवाद्यांकडून सुरक्षादलावर गोळीबार व्हायचा त्या भागाची नाकेबंदी करून सुरक्षादल दहशतवाद्यांना शोधायचे. घराघराची झडती घेतली जायची. अशा प्रसंगी सुरक्षादलाच्या आदेशानुसार मुले आणि पुरुष घराबाहेर येवून मोकळ्या जागेत जमायची. महिला व मुली घरातच असायच्या आणि त्यांच्या उपस्थितीत घराची झडती घेतली जायची. अशा प्रसंगी महिलांना अपमानास्पद वागणूक मिळाल्याच्या अनेक तक्रारी यायच्या. हा सगळा प्रकार वारंवार घडायचा. कारण निवासी भागातून सुरक्षादलावर गोळ्या चालविणे दहशतवाद्यांसाठी सोयीचे असायचे. असे झाले की घरांची झडती घेण्याशिवाय सुरक्षादलांकडे पर्याय नसायचा. या झडतीला तोंड देण्याचे काम महिलांना करावे लागले याचा वेगळाच परिणाम त्यांच्यावर झाला. सुरक्षादलाची भीती कमी झाली. पुरुषांच्या बाबतीत मात्र वेगळाच परिणाम दिसून आला. झडतीच्या वेळी महिलांच्या होणाऱ्या अपमानापासून आपण त्यांना वाचवू शकत नाहीत याचा एक न्यूनगंड त्यांच्यात आला. नंतरच्या काळात निदर्शनासाठी किंवा मोर्चासाठी महिला व मुली  रस्त्यावर मोठ्या संख्येने उतरू लागल्या .                                                                                         

काश्मिरातील आतंकवाद संपविण्यासाठी सुरक्षादालाचा जो वरवंटा फिरला त्यातून काश्मीर घाटीतील मुस्लीम महिलांची सक्रियता कशी वाढली याचे उदाहरण म्हणून परवीन अहंगर या महिलेचे कार्य पहिले की लक्षात येते. जावेद अहमद हा या महिलेचा मुलगा.ऑगस्ट १९९० पासून बेपत्ता आहे. सुरक्षा दलाने त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आणि त्यानंतर तो कोणाला दिसलाच नाही. सुरक्षा दलाच्या चौक्या, तुरुंग, हॉस्पिटल या सगळ्या ठिकाणी परवीनाने मुलाला शोधले पण तो सापडला नाही. आपल्या मुलाचा शोध घेत असतांना तिच्या लक्षात आले की आपल्या मुलासारखी गायब झालेली अनेक मुळे आहेत जी सुरक्षा दलांनी चौकशीसाठी ताब्यात घेतली पण नंतर दिसलीच नाही. आपल्याच नाही तर या सर्व मुलांच्या शोधासाठी १९९४ साली परवीनाने हरवलेल्या मुलांच्या पालकाचे संघटन तयार केले. पुढे परवीनाने आपल्या कार्याचा विस्तार केला. पुरुषसत्ताक व्यवस्थेचे भोग १९९०च्या दशकातील संघर्षात इथल्या स्त्रियांना ही भोगावे लागले. या काळातील अनेक बलात्कार पिडीताना त्यांच्या पतींनी तलाक देवून दुसरा निकाह केला अशा महिलांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचे काम परवीनाच्या संघटनेने केले. जशी काही महिलांची मुले गायब झालीत तसे अनेक महिलांचे पतीही या काळात बेपत्ता झालेत. अशा महिलांचे ना सासर राहिले ना माहेर. अशा महिलांना परवीनाच्या संघटनेने आधार दिला. परवीनाचे कार्य लक्षात घेवून २००५ साली त्यांचे नोबेल पुरस्कारासाठी नामांकन देखील झाले होते. १९९० च्या दशकात पाकिस्तानच्या मदतीने व प्रेरणेने काश्मीरचे इस्लामीकरण करण्याचा प्रयत्न जोरात झाला. जगातल्या ज्या ज्या भागात इस्लामी सत्ता स्थापण्याचा प्रयत्न झाला त्या त्या भागातील महिलांना बुरख्यात आणि घरात बंदिस्त राहावे लागले. काश्मीरमधील महिला मात्र बुरख्यात आणि घरात बंदिस्त झाल्या नाहीत. २०१० ते २०२० च्या दशकात काश्मीरमध्ये जी आंदोलने आणि निदर्शने झालीत त्यात पुरुषांपेक्षा महिला आणि मुलांचाच सहभाग अधिक राहिला आहे. 

१९९० च्या प्रारंभी सुरु झालेल्या दहशतवादी कारवायांवर सुरक्षादलाने तीन वर्षात नियंत्रण मिळविले पण या संघर्षाचे परिणाम नियंत्रित करणे अवघड होते आणि ते सुरक्षादलाचे काम नव्हते. ती वेगळी राजकीय सामाजिक जबाबदारी होती जी पार पाडल्या गेली नाही. काश्मीरमध्ये राहिलेल्या व काश्मीर बाहेर पडलेल्या काश्मिरींवर या  संघर्षाचा वेगवेगळा परिणाम झाला. काश्मीरमध्ये शांतता निर्माण करण्यासाठी सर्वशक्तीनिशी प्रयत्न झालेत तसे प्रयत्न काश्मीर प्रश्न सुटून शांतता नांदावी यासाठी न झाल्याने काश्मीर मधील मुस्लीम तरुण या संघर्षापासून अलिप्त राहून शिक्षणावर लक्ष केंद्रित करू शकला नाही. काश्मीरमधील मुस्लीम नोकरदार वर्गाची आणि श्रीमंत व राजकारणी वर्गाची मुले त्याकाळात अलीगड विद्यापीठात शिकायला गेलीत पण सर्वसामान्य नागरिकांच्या मुलांना संघर्ष काळात काश्मीरमध्येच मिळेल तसे शिक्षण घेणे भाग पडले. दुसरीकडे बाहेर पडलेल्या पंडीत समुदायाने सुरुवातीच्या खडतर परिस्थितीतही मुलांच्या शिक्षणात खंड पडणार नाही याची काळजी घेतली. निर्वासित म्हणून सुरुवातीला अव्यवस्थेला आणि तोकड्या सरकारी मदतीमुळे होणाऱ्या ओढातानीला तोंड द्यावे लागले पण काही वर्षांनी परिस्थिती सुधारत गेली. सरकारी मदत वाढली आणि शैक्षणिक सुविधा देखील वाढल्यात. महाराष्ट्रासह अनेक प्रांतांनी आपल्या शैक्षणिक संस्थात काश्मिरी पंडीत विद्यार्थ्यांसाठी राखीव जागा ठेवल्याने त्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे सोयीचे झाले. यातील अनेक शिक्षणासाठी आणि काम मिळाल्याने परदेशी जावू शकली.  

मनमोहनसिंग पंतप्रधान असताना काश्मिरातील नोकर भरतीत पंडीत समुदायाच्या तरुणांना स्थान देणारी योजना सुरु झाली ती आजही अस्तित्वात असल्याने अनेक काश्मिरी पंडीत तरुण काश्मीरमध्ये कार्यरत आहेत. मुळचे काश्मिरी असलेले आणि आज काश्मिरात नोकरी व व्यवसायानिमित्त परतलेले काश्मिरी पंडीत काश्मीरसाठी परकेच ठरलेले आहेत. याचे कारण जसे त्यांना समजू लागले तेव्हापासून ते काश्मीरच्या बाहेरच आहेत. काश्मिरी भाषा आणि संस्कृतीशी त्यांचा संबंध टिकू शकला नाही. आधीच्या पिढीने काश्मिरी पंडीत आणि काश्मिरी मुसलमान यांच्यातील सलोखा आणि सौहार्द अनुभवला तो या पिढीच्या वाट्याला आला नाही. हे काश्मीर बाहेर पडलेल्या तरुणांइतकेच काश्मीरमध्ये राहिलेल्या तरुणांच्या बाबतीतही तितकेच लागू आहे. दोन्हीकडचे तरुण संघर्ष वेगळा असला तरी त्यात होरपळले आहेत आणि त्यामुळे दोघांच्याही मनात एकमेकांच्या बाबतीत कटू भाव आहेत. जुन्या पिढीत असलेले सौहार्द नव्या पिढीत निर्माण होण्यासाठी जी पाउले सातत्याने उचलायला पाहिजे होती ती उचलल्या न गेल्याने पंडितांचे काश्मिरात परतणे मृगजळ बनले. काश्मीर प्रश्नावर राजकीय तोडगे काढण्याचे प्रयत्न १९९० च्या संघर्षपूर्ण दशकात आणि त्यानंतरही अनेक झालेत. पण दुरावलेले मानवी संबंध पुनर्स्थापित करण्याचे प्रयत्न झाले नाहीत. झाले असतील तर ते अगदीच तोकडे व परिणामशून्य राहिले आहेत. मुळात राजकीय तोडगा निघाला की मानवीय संबंध सुधारतील हे मानून चालण्यात चूक झाली आहे. काश्मिरी पंडीत आणि काश्मिरी मुसलमान यांचे संबंध पूर्ववत केल्याशिवाय राजकीय तोडगा निघू शकणार नाही हे मानून प्रयत्न झाले असते तर आज काश्मिरात वेगळी परिस्थिती दिसली असती. १९९० आणि त्यानंतरच्या घटनांनी जसे काश्मीर पंडितांचे जग आणि भावविश्व बदलले तसेच काश्मिरी मुसलमानांचे जग आणि भावविश्वही बदलले. या बदलातून त्यांचा एकमेकांकडे पाहण्याचा दृष्टीकोनही बदलत गेला. हा बदल , त्यामागची कारणे समजून घेण्याचा प्रयत्न होत नसल्याने काश्मीरचा प्रश्न १९९० च्या दशकातच अडकून पडला आहे. 

                                              (क्रमश:)

--------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि.यवतमाळ 
मोबाईल - ९४२२१६८१५८ 

Thursday, June 1, 2023

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - ५८

काश्मिरी पंडीत आणि काश्मिरी मुसलमान या दोन्ही समुदायाच्या मुलांना आणि महिलांना १९९० च्या दशकातील काश्मीरच्या संघर्षाची झळ विशेषत्वाने बसली. कारणे आणि परिणाम वेगळे असतील पण वेदना जवळपास सारख्याच होत्या.
------------------------------------------------------------------------------------

काश्मिरी पंडीत आणि काश्मिरी मुसलमान यांच्यातील संबंध आणि सलोख्याला तडा गेल्याचा परिणाम दोन्ही समूहांना भोगावा लागला आहे. आज काश्मिरी पंडितांवर झालेल्या अन्यायाबद्दल उरबडवेगिरी करणारांना देखील काश्मिरी पंडितांना ज्या दिव्यातून जावे लागले, भोगावे लागले याची काहीच कल्पना नाही त्यांना काश्मिरात पंडीत बाहेर पडल्यानंतर मुसलमानांना काय भोगावे लागले याची कल्पना कोठून असणार. जेव्हा पंडितांना मदतीचा हात देण्याची गरज होती, त्यांच्या दु:खावर फुंकर घालून आपलेसे करण्याची गरज होती तेव्हा त्यांना परके मानणारे आज आपले म्हणू लागले आहेत. आपले घरदार सोडून निर्वासित बनण्याच्या यातनातून सावरायला आणि नव्या परिस्थितीशी जुळवून घ्यायला त्यांना एक दशक तरी संघर्ष करावा लागला. आपल्याच भूमीत परके व पोरके म्हणून राहण्याची पाळी जशी पंडितांवर ज्या घटनांमुळे आली त्या घटनांचे परिणाम आपल्याच घरात राहणाऱ्या काश्मिरी मुसलमानांना देखील भोगावे लागले आहेत. दोन्ही समुदायाच्या मुलांना आणि महिलांना १९९० च्या दशकातील काश्मीरच्या संघर्षाची विशेष झळ बसली. कारणे आणि परिणाम वेगळे असतील पण वेदना जवळपास सारख्याच होत्या. दहशतवाद्यांपासून पंडितांना वाचविण्याचे कर्तव्य पार पाडण्यात चुकल्याची किंमत काश्मिरी मुसलमानांना देखील चुकवावी लागली आहे.                                   


निर्वासनामुळे शाळेत, महाविद्यालयात शिकणाऱ्या काश्मिरी पंडितांच्या  मुलामुलींच्या शैक्षणिक विश्वात मोठी उलथापालथ झाली. जम्मू , दिल्ली किंवा चंडीगड सारख्या ठिकाणी त्यांना शाळा-महाविद्यालयात प्रवेश तर मिळाला पण अभ्यासाचे वातावरण मिळाले नाही. काश्मीरघाटीत १२, २४ किंवा ४८ खिडक्याच्या घरात राहणाऱ्या कुटुंबाला अचानक एका किंवा फारतर दोन खोल्यांच्या घरात राहण्याची वेळ आली. अनेकांना तर बरेच दिवस तंबूत दिवस काढावे लागले. एवढ्या छोट्या जागेत कुठे बसणार , कुठे स्वयंपाक करणार आणि या दाटीवाटीत कुठे अभ्यास करणार. काश्मीरघाटीत बहुतेक मुलांना अभ्यासासाठी स्वतंत्र खोली असायची. पण घाटीच्या बाहेर पडावे लागल्यावर अभ्यासासाठी बसायला जागा मिळणे कठीण झाले होते. नवे ठिकाण , मित्र नसलेले नवे वातावरण याचेशी जुळवून घ्यायला पडणारे कष्ट याची कल्पना करता येईल. मुलींच्या बाबतीत १९९० पूर्वी कधीही न वाटणारी भीती व ताण नव्याने नव्या ठिकाणी नव्या वातावरणात कुटुंबाना जाणवू लागला होता. नव्या परिस्थितीत सर्वात जास्त समस्यांचा सामना करावा लागला तो कुटुंबातील महिलांना. जीवापाड जपलेल्या कुटुंबाची झालेली आणि होत असलेली परवड कुटुंबातील महिला सहन करू शकत नाही. यामुळे मनावर आलेला ताण आणि झालेले दु:ख पंडीत कुटुंबातील प्रत्येक महिलेला सहन करावे लागले. मुलांच्या शिक्षणाची काळजी, घर चालविण्याची चिंता आणि एवढ्याशा जागेत आंघोळीचा आणि शौचालयाचा प्रश्न कसा सोडवायचा याची विवंचना. या सगळ्या गोष्टींचा मानसिक व शारीरिक स्वास्थ्यावर विपरीत परिणाम झाला. याच्या परिणाम महिलांना अनेक शारीरिक व मानसिक व्याधींचा सामना करावा लागला. तर या परिस्थितीत आपण काहीच करू शकत नाही अशी निराशेची , हतबलतेची भावना कुटुंब प्रमुखात होती. या परिस्थितीमुळे आपण काश्मीर सोडून चूक केली असे अनेक कुटुंबाना वाटू लागले होते. बाहेर एवढ्या समस्या आणि ताणतणावांचा सामना करावा लागतोय त्यापेक्षा तिथेच बंदुकीच्या गोळ्यांनी मेलो असतो तर बरे असे वाटाण्यासारख्या परिस्थितीत पंडीत कुटुंबियांना अनेक वर्ष राहावे लागले. काश्मीरघाटीत परतण्या सारखी परिस्थिती नसल्याने सगळे सहन करण्याशिवाय पर्याय नव्हता. 

ज्या शैक्षणिक खेळखंडोब्याचा सामना काश्मीरघाटीतून बाहेर पडलेल्यांना करावा लागला काश्मीरघाटीत काही वेगळी परिस्थिती नव्हती. १९९० पासून काश्मिरात सुरु झालेल्या संघर्षाची तीव्रता पुढे तीन वर्ष कायम होती. नंतर संघर्षाची तीव्रता कमी होत गेली पण संघर्ष चालूच होता. या काळात निदर्शने, मोर्चे , त्यावर सुरक्षादलाचा गोळीबार आणि गोळीबार झाला म्हणून पुन्हा निदर्शने आणि मोर्चे याची शृंखलाच काश्मिरात सुरु होती. एक तर लोकांनी पुकारलेला बंद असायचा किंवा मग सुरक्षादलांनी पुकारलेली संचारबंदी असे चक्र सुरु होते. असे काही झाले की याचा पहिला परिणाम शाळा-कॉलेज बंद होणे हा असायचा. याचा विपरीत परिणाम तिथल्या मुलामुलींच्या शिक्षणावर झाला. शाळा-कॉलेजातून मिळणाऱ्या धड्या ऐवजी त्यांना रस्त्यावर दुसरेच धडे मिळत होते. शाळेत शिकविल्या जाणाऱ्या शब्दांऐवजी लहान वयातच त्यांच्या कानी आणि तोंडी कर्फ्यू, क्रॅकडाऊन , कॉरडन, फायर ,कस्टडी, कस्टडी किलिंग, अटक , तुरुंग असे संघर्षातील शब्द येवू लागले होते. हे फक्त त्यांच्यासाठी नवे शब्द नव्हते. अशा घटनाही त्यांच्या डोळ्यासमोर घडत होत्या. मोठ्या संख्येने बाहेरून आलेल्या सुरक्षादलाला राहण्यासाठी शाळांच्या इमारतीशिवाय दुसरा चांगला पर्याय नव्हता. त्यामुळे शाळेच्या अर्ध्या भागात सुरक्षादलाचा निवास तर कर्फ्यू किंवा बंद नसेल तेव्हा अर्ध्या भागात शाळा भरायची. शाळेत निवास असलेल्या सुरक्षा सैनिकावर शाळा सुरु असतांना काही वेळा आतंकवादी हल्ले झालेत. त्याप्रसंगी झडलेल्या गोळीबाराचे आवाज ऐकत मुले शिकत होती. त्याकाळात शिकणाऱ्या मुलांच्या मनावर पुस्तकांचा परिणाम झाला असेल की त्यांच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचा याचा सहज अंदाज करता येईल. तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेली मुले घरात रमण्यापेक्षा रस्त्यावर अधिक रमतात. काश्मिरात ही मुले रस्त्यावर आले की पदोपदी त्यांचा सामना रस्त्यावर तैनात सुरक्षादलाशी होत असे. ओळखपत्र दाखविण्याची सक्ती, अनेक प्रसंगी झडतीला सामोरे जाणे , काही वेळा सुरक्षादलाकडून अपमान सहन करावा लागणे या गोष्टी त्याकाळात नित्याच्या बनल्या होत्या. सुरक्षादलाकडून होणारा अपमान सहन न झाल्याने त्याकाळी अनेक तरुणांनी दहशतवादाचा मार्ग स्वीकारल्याची अनेक उदाहरणे आहेत. आपल्याकडे लहानमुले जसा चोर-पोलीस खेळ खेळतात त्या धर्तीवर त्याकाळी काश्मिरातील मुले दहशतवादी-सुरक्षादल असा खेळ खेळायचे. अशा मानसिकतेत तिथली पिढी तरुण होत होती. फक्त ज्यांची परिस्थिती मुलांना शिक्षणासाठी बाहेर पाठविण्याची होती अशा कुटुंबातील मुलेच १९९० च्या दशकात खंड पडू न देता शिकू शकली. शिक्षण नाही, उद्योग-व्यवसाय बंद म्हणून हाताला काम नाही , नोकरी मिळण्याचा तर प्रश्नच नव्हता. अशा परिस्थितीत सापडलेल्या अनेक तरुणांनी त्याकाळी दहशतवादाचा मार्ग स्वीकारला. 

                                                                     (क्रमशः)

--------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि.यवतमाळ 
 मोबाईल - ९४२२१६८१५८                                                         

Wednesday, May 24, 2023

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - ५७

१९९० पर्यंत काश्मिरी पंडीत आणि काश्मिरी मुसलमान हेच एकमेकांची साथ निभावत होते. हे वेगळेपणच काश्मिरियत म्हणून ओळखले जाते. स्वातंत्र्यानंतर भारतात अनेक धार्मिक दंगली झाल्यात पण काश्मिरी पंडीत आणि काश्मिरी मुसलमान यांच्यातील दृढ संबंधामुळे  काश्मीरमध्ये तसे काही घडले नाही.
---------------------------------------------------------------------------------------------- 


जम्मूमध्ये आपल्याच देशात निर्वासित बनून राहावे लागलेल्या काश्मिरी पंडीत कुटुंबियांना तिथल्या हिंदू समुदायाकडून परकेपणाची वागणूक मिळण्यामागे काश्मिरी पंडीत आणि इतर हिंदू यांच्यातील सांस्कृतिक तफावत हे महत्वाचे कारण राहिले आहे. पंडीतांचे काश्मीर आणि नवी दिल्लीतील प्रशासनात असलेले स्थान इतर हिंदुना हेवा वाटावा असेच होते. स्वातंत्र्यापूर्वी जम्मू-काश्मिरात डोग्रा राजाची सत्ता होती पण प्रशासनात प्रभुत्व डोग्रा ऐवजी काश्मिरी पंडितांचे राहिले. स्वतंत्र भारतातही इंदिरा राजवटी पर्यंत पंतप्रधान कार्यालयात काश्मिरी पंडितांचा दबदबा राहिला आहे आणि जो पर्यंत बाहेरचे अधिकारी जम्मू-काश्मीरमध्ये नेमण्याची वैधानिक तरतूद नव्हती तोपर्यंत राज्याच्या प्रशासनातही पंडितांचाच वरचष्मा होता. तेव्हा आपण इतर हिंदूपेक्षा वेगळे आहोत, वरचढ आहोत अशी भावना होणे क्रमप्राप्त होते. त्यामुळे १९९० पर्यंत स्वत:ला हिंदू म्हणवून घेण्यापेक्षा काश्मिरी पंडीत असण्याचा अभिमान होता.  जनगणनेत सुद्धा काश्मिरी पंडीत ही आपली वेगळी ओळख त्यांनी टिकवून ठेवली होती. अनपेक्षितपणे काश्मीरघाटी सोडून बाहेर निर्वासित म्हणून राहण्याची पाळी आली तेव्हा इतर हिंदुनी त्यांचा अभिमान पायदळी तुडविण्याची संधी सोडली नाही. जम्मूमध्ये त्यांची झालेली उपेक्षा आणि शोषण याचीच परिणती होती. सण आणि ते साजरी करण्याची पद्धत यावरूनही सांस्कृतिक फरक लक्षात येतो. भारतात शिवरात्र सगळीकडे साजरी होत असली तरी अनेक सणांपैकी तो एक सण असतो. काश्मिरी पंडितांचा मुख्य सण शिवरात्री असतो ज्याला ते हिरथ म्हणतात. सगळे कुटुंबीय एकत्र येवून तीन दिवस हा सण साजरा करतात. भारतभर महादेवाच्या मंदिरात रोषणाई आणि गर्दी असते. काश्मिरात सर्वच मंदिरात या तीन दिवसात पूजाअर्चा होते. तीन दिवसाच्या या हिरथ सणाचा दुसरा दिवस 'सलाम' म्हणून ओळखला जातो. या दिवशी काश्मिरातील मुस्लीम हिंदुना भेटून घरी जावून शुभेच्छा देतात. १९९० पर्यंत या प्रथेत खंड पडला नाही.                                                         

१९९० पर्यंत काश्मिरातील पंडीत आणि मुस्लीम हेच एकमेकांच्या सुख-दु:खातील साथीदार होते. त्यांच्यात फरकांचे अनेक मुद्दे होते आणि काही मुद्दे तर तेढ वाढेल इतके तीव्र होते. प्रशासनात जनसंख्येच्या तुलनेत पंडीत समुदायाचा मोठा हिस्सा मुस्लिमांची नाराजी वाढवत होता तर मुस्लीमामध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढल्यावर त्यांचे प्रशासनातील भरतीचे प्रमाण वाढले व आपल्याला कमी संधी मिळते म्हणून पंडितांची मुस्लीमाप्रती नाराजी होती. दोघातील दुराव्याचे दुसरे कारण राजकीय होते. शेख अब्दुल्लांनी पाकिस्तान ऐवजी आपले वजन भारताच्या पारड्यात टाकल्याने प्रारंभी पंडीत समुदायाला शेख अब्दुल्लाचे नेतृत्व मान्य होते. नंतरच्या घडामोडींनी आणि नेहरूंच्या निधना नंतर जनसंघाने पंडीत समुदायात शिरकाव करायला सुरुवात केली तेव्हा पंडितांचा मोठा गट शेख अब्दुल्लांच्या विरोधी बनला. जनसंघा प्रमाणेच या गटानेही शेख अब्दुल्लांच्या सुटकेचा विरोध केला होता. अशा गोष्टीवरून दोन समुदायात मानसिक तणाव बऱ्याच वर्षापासून होता  तरी १९९० पर्यंत काश्मिरी पंडीत आणि काश्मिरी मुसलमान यांच्यातील सौहार्दाला तडा गेला नव्हता.  आणखी लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे जो सांस्कृतिक फरक काश्मीरी पंडीत आणि इतर हिंदू समुदायामध्ये होता तसाच फरक काश्मिरी मुसलमान आणि भारतातील इतर मुसलमानांमध्येही होता. भारतातील मुसलमानांची दु:खे काश्मिरी मुसलमानांना कधी आपली वाटली नाहीत आणि काश्मिरी मुसलमानांची दु:खे आणि आकांक्षा याच्यापासून काश्मिरेतर भारतीय मुसलमान कटाक्षाने दूर राहिला. परदेशी मुस्लिमांनी काश्मिरी मुसलमानांच्या राजकीय आकांक्षांचे समर्थन केले पण अशा समर्थनापासून भारतातील इतर भागातील मुस्लीम दुरच राहिलेत. स्वायत्ततेची किंवा स्वातंत्र्याची काश्मिरी मुसलमानांची मागणीमुळे आपण अडचणीत येवू अशी भिती काश्मिरेतर मुसलमानांना सतत वाटत असल्याने ना त्यांनी काश्मिरी मुसलमानांच्या कुठल्या आंदोलनात सहभाग नोंदवला ना त्यांच्या समर्थनासाठी कधी रस्त्यावर उतरलेत.                                                                                                                                               

 १९९० पर्यंत काश्मिरी पंडीत आणि काश्मिरी मुसलमान हेच एकमेकांची साथ निभावत होते. हे वेगळेपणच काश्मिरियत म्हणून ओळखले जाते. स्वातंत्र्यानंतर भारतात अनेक धार्मिक दंगली झाल्यात पण काश्मिरी पंडीत आणि काश्मिरी मुसलमान यांच्यातील दृढ संबंधामुळे  काश्मीरमध्ये तसे काही घडले नाही. १९९० मध्ये आणि त्यानंतर जे घडले त्याला धार्मिक दंगली म्हणता येणार नाही. १९९० मध्ये काश्मिरात टोकाचे धार्मिक ध्रुवीकरण होवूनही धार्मिक दंगली झाल्या नाहीत. चुकीच्या पद्धतीने लढवला गेलेला तो राजकीय लढा होता. स्वातंत्र्यानंतर दंगलीची एकमेव नोंद काश्मिरातील अनंतनाग जिल्ह्यातील आहे ज्यात हिंदूंच्या मालमत्तेला आणि मंदिरांना जमावाने लक्ष्य केले होते. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी राम मंदिराचे कुलूप उघडल्याचे निमित्त करून ही दंगल झाली असली तरी ही दंगल धार्मिक नव्हती . राजकीय कारणासाठी मुफ्ती मोहम्मद सईद यांनी घडविल्याचा त्यावेळी आरोप झाला होता. ही कथित दंगल झाल्या नंतर मुस्लीमानीच वर्गणी करून मंदिरांची दुरुस्ती केली होती. १९९० नंतर काश्मिरात जो संघर्ष उभा राहिला त्यात काही मंदिरांचे नुकसान झाले. पण ते नुकसान जमावाने हल्ला करून तोडफोड, जाळपोळ केली अशा कारणाने झाले नाही. सुरक्षादल आणि दहशतवादी यांच्या लढाईत असे नुकसान प्रामुख्याने झाले. एखाद्या धर्मांध माथेफिरूने रात्रीच्या अंधारात एखाद्या मंदिराची तोडफोड किंवा जाळपोळ केली नसेलच असे सांगता येत नाही. पण जमावाने हल्ला करण्याची घटना नाही. सुरक्षा दलाच्या दहशतवाद्या बरोबरच्या चकमकीत जसे मंदिराचे काही ठिकाणी नुकसान झाले तसेच नुकसान मस्जीदीचे देखील झाले आहे. सुरक्षादलाच्या कारवाई पासून सुरक्षित राहण्यासाठी धार्मिक स्थळात आसरा दहशतवादी घेत असल्याने असे नुकसान अपरिहार्य होते. याचमुळे श्रीनगरमधील एक ऐतिहासिक मस्जीद जळून खाक झाली होती. बाबरी मस्जीद पाडल्या नंतर भारतीय जनता पक्षावर टीका होवू लागली तेव्हा अडवाणी व इतर भाजपा नेत्यांनी काश्मीरमध्ये मंदिरांच्या झालेल्या तोडफोडीला मुद्दा बनवला. पक्षाचा प्रत्येक नेता मनाला येईल ती संख्या सांगत होता. नरसिंहराव यांच्या काळात काश्मिरातील धार्मिक स्थळांच्या तोडफोडी बद्दल दिलेल्या माहितीनुसार ३८ धार्मिक स्थळांना नुकसान पोचल्याचे सांगण्यात आले ज्यात १६ मस्जीदींचा समावेश आहे. बाकी हिंदू मंदिर आहेत पण ती सगळी १९९० नंतर क्षतिग्रस्त झालेली नाहीत.  त्यात १९८६ साली अनंतनाग जिल्ह्यात मंदिरांची जी तोडफोड झाली होती त्याचाही समावेश आहे. ज्या मंदिरांची तोडफोड झाल्याचा दावा भारतीय जनता पक्षाने केला होता त्या दाव्यातील सत्यता तपासण्यासाठी इंडिया टुडे नियतकालिकाने आपला प्रतिनिधी १९९३च्या सुरुवातीला काश्मिरात पाठविला होता. या प्रतिनिधीने हानी झालेल्या मंदिराची जी सूची  भाजपाने जाहीर केली होतील त्यातील २३ मंदिराची पाहणी केली. त्या प्रतिनिधीला २३ पैकी फक्त २ मंदिरे क्षतिग्रस्त झाल्याचे दिसले. या संबंधीचा सविस्तर वृत्तांत २८ फेब्रुवारी १९९३ च्या इंडिया टुडे मध्ये प्रकाशित करण्यात आला होता. १९९० नंतर काश्मीरमध्ये अनेक हत्या झाल्या आणि त्यात जीव गेला तो काश्मीरला ज्याचा अभिमान होता त्या काश्मिरियतचा. त्यामुळेच अपप्रचार करणारांचे फावले. याची किंमत काश्मिरी पंडीत आणि काश्मिरी मुसलमानांनाही मोजावी लागली.
-----------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि. यवतमाळ 
मोबाईल - ९४२२१६८१५८ 

Thursday, May 18, 2023

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - ५६

आम्हाला पंडितांच्या दु:खावर फुंकर घालायची नाही तर त्याची जखम ताजी राहावी म्हणून जखमे वरच्या खपल्या काढीत राहणे हा आमचा राष्ट्रीय उद्योग बनला आहे. आज आम्ही पंडितांना जे भोगावे लागले त्याबद्दल खूप अश्रू ढाळतो पण जेव्हा पंडीत घाटी बाहेर पडून निर्वासितांचे जीवन जगायला सुरुवात केली तेव्हा त्यांची स्थिती आगीतून फुफाट्यात पडावी अशी झाली होती.
------------------------------------------------------------------------------------


 पंडीत समुदायाला त्याच्या इच्छेविरुद्ध काश्मीरघाटीतून बाहेर पडून निर्वासिताचे जीवन जगायला भाग पडण्याची सुरुवात ३३ वर्षापूर्वी झाली पण आजही त्या घटनेवर तेव्हा इतकाच किंबहुना तेव्हा पेक्षा अधिकच संताप आज व्यक्त होत असतो. काळाच्या ओघात अशा घटनांची वेदना व तीव्रता कमी होत असते पण पंडितांच्या निर्वासना बद्दल तसे होताना दिसत नाही. या घटनेचा उपयोग काश्मीर घाटीतील मुसलमानांना आणि त्या निमित्ताने सर्वच मुसलमानांना खलनायक म्हणून रंगविण्यासाठी केला जातो. पंडितांना काश्मीरघाटी बाहेर पडावे लागणे हा काश्मिरी समज व संस्कृतीवर कलंक आहे आणि हा कलंक दूर करण्याचा एकमेव मार्ग पंडीत समुदायाचे सन्मानाने काश्मीरघाटीत पुनर्वसन करणे हाच आहे. पाकिस्तान प्रशिक्षित व प्रेरित अतिरेकी सोडले तर घाटीतील सर्वच राजकीय पक्ष आणि संघटना पंडीत समुदायाने परत आले पाहिजे, त्यांच्या शिवाय काश्मीरचा समाज आणि संस्कृती अधुरी आहे असे अनेक वर्षापासून सांगत आहे. तेव्हाच्या परिस्थितीत बाहेर पडण्यापासून पंडितांना आपण रोखले नाही किंवा रोखता आले नाही अशी अपराधीपणाची भावना तिथल्या जुन्या जाणत्या मंडळीत आहे. पण काश्मिरेतर भारतात या भावना कधी आमच्या पर्यंत पोचतच नाहीत. १९९० च्या दशकात जे काही घडले आणि त्या व्यतिरिक्त जे काही प्रचारित केले गेले गेले त्यामुळे या भावना आमच्या पर्यंत पोचल्या नाहीत किंवा आम्ही त्याची दखल घेतली नाही. आम्हाला पंडितांच्या काश्मीर मधील पुनर्वसनापेक्षा त्या घटनेचा बदला तेवढा घेण्याची इच्छा आहे. सरकारी आणि प्रशासनिक स्तरावर बदल्याची कारवाई संपूर्ण १९९०च्या दशकभर सुरु राहिली तरी त्याने आमचे समाधान झालेले नाही. बदल्याची ही भावना पेटती ठेवायची असेल तर काश्मिरी पंडितांचे निर्वासित म्हणून जगणे आम्हाला हवे आहे. इतक्या वर्षात काश्मिरी पंडितांना घाटीत परत आणण्याचा एकदाही संघटीत प्रयत्न का झाला नाही याचे हे उत्तर आहे. आम्हाला पंडितांच्या दु:खावर फुंकर घालायची नाही तर त्याची जखम ताजी राहावी म्हणून जखमे वरच्या खपल्या काढीत राहणे हा आमचा राष्ट्रीय उद्योग बनला आहे. आज आम्ही पंडितांना जे भोगावे लागले त्याबद्दल खूप अश्रू ढाळतो पण जेव्हा पंडीत घाटी बाहेर पडून निर्वासितांचे जीवन जगायला सुरुवात केली तेव्हा त्यांची स्थिती आगीतून फुफाट्यात पडावी अशी झाली होती. निर्वासित म्हणून जम्मूत त्यांच्या वाट्याला जे भोग आलेत त्याची आम्ही कधी चर्चाही करीत नाही आणि त्याबद्दल भारतीय समाजाला कधी खंतही वाटली नाही. 

काश्मिरी पंडीत निर्वासित म्हणून जम्मूत आलेत तेव्हा त्यांच्याकडे फारसे आपलेपणाने पहिले गेले नाही. त्यांना जम्मूच्या बाहेर-बाहेरच्या भागातच डेरा टाकावा लागला. अमरनाथ यात्रेसाठी तंबूची सोय असते ती पंडितांना उपलब्ध करून देण्यात आली आणि काही नवे तंबू टाकण्यात आले. आंघोळ आणि शौचालयाच्या सुविधे बद्दल चांगले बोलता येईल असे काही नव्हते. काश्मीरघाटीत २-३ मजली घर आणि विस्तीर्ण अंगण व फळझाडे असलेली घरे सोडून आलेल्या पंडितांना या स्थितीत दिवस काढावे लागलेत. ज्यांना नोकरी नव्हती पण घाटीत त्यांचा व्यवसाय किंवा शेती होती त्यांच्यासाठी दिवस जास्त खडतर होते. उत्पन्नाची साधने मागे टाकून यावे लागले होते. दैनंदिन खर्च भागविण्यासाठी उत्पन्नच नसल्याने तुटपुंज्या सरकारी सोयीवर अवलंबून राहण्याशिवाय पर्याय नव्हता. पण जे नोकरी करीत होते आणि घाटी सोडून जम्मूत आलेत तरी त्यांच्या उत्पन्नात खंड पडला नाही अशांचेही जम्मूतील जीवन  अजिबात सुखात गेले नाही. काश्मीरमध्ये १९९० च्या दशकात जे भोगावे लागले त्यावर बरेच लिखाण सापडते. जम्मूत आल्यावर जे भोगावे लागले त्याबद्दलही काहींनी लिहिले आहे. असे लिहिणाऱ्या पैकी राहुल पंडीत हे एक आहेत. जे भाडे देवून राहू शकतात अशा काश्मिरी पंडितांसाठी जम्मूतील घरमालकांनी तातडीने खोल्या तयार केल्या. अव्वाच्यासव्वा भाडे आकारले शिवाय अनेक बंधने घातली. पाहुण्यांच्या राहण्यावर बंदी, मर्यादित पाणी, शिवाय घरमालकाची पडतील ती कामे करावी लागायची ती वेगळीच. त्यांच्या परिस्थितीचा मोठ्या प्रमाणात गैरफायदा घेण्यात आला. अपवाद वगळता अत्यंत तुच्छतेची वागणूक पंडीत कुटुंबियांना मिळायची. १९९० पर्यंत मुली आणि महिलांसाठी सुरक्षित असलेली घाटी अचानक असुरक्षित बनल्याने अनेक पंडीत कुटुंबीयांनी घाटी सोडण्याचा निर्णय घेतला होता. जम्मू मध्ये आल्यावरही मुली आणि महिलांच्या सुरक्षिततेची चिंता दूर झाली नाही यावरून जम्मूत पंडीत कुटुंबियांना मिळणाऱ्या वागणुकीचा आणि समस्यांचा अंदाज येवू शकतो.                     


१९९० साली भयभीत पंडीत काश्मीरघाटी सोडून जावू लागले तेव्हा तुरळक प्रकार वगळता त्यांचे सामान किंवा घरे बळकावण्यात आली नव्हती. अनेक पंडीत कुटुंबीयांनी त्याही स्थितीत  मोठ्या विश्वासाने आपल्या घराच्या किल्ल्या मुस्लीम शेजाऱ्यांकडे देवून ठेवल्या होत्या. फार कमी विश्वासघाताच्या घटना घडल्या . पंडीत कुटुंबीय घाटी सोडून गेलेत म्हणून त्यांची घरे बळकावण्यात आली नाहीत. अशा घटना बोटावर मोजता येतील इतक्याच घडल्या असतील. परतण्याची शक्यता दृष्टीपथात येत नव्हती तेव्हा आर्थिक गरज म्हणून अनेक कुटुंबियांना आपली घरे, शेती विकावी लागली. ती मात्र किमत पाडून खरीदली गेली. हे आर्थिक शोषण वगळता घाटीतील सर्वसामान्य मुस्लीम नागरिकाकडून पंडितांचे आर्थिक शोषण झाले नाही. १९९७ मध्ये तर घाटी सोडून गेलेल्या परिवारांच्या संपत्तीच्या रक्षणाचा कायदा पण आला. हतबल पंडितांच्या स्थितीचा गैरफायदा घाटीतील मुसलमानापेक्षा पंडीत कुटुंबीय निर्वासित म्हणून जम्मू व इतरत्र गेले तिथे अधिक घेतला गेला ही वस्तुस्थिती आहे. जशी काश्मीरघाटीतील पाक प्रशिक्षित दहशतवादी धार्मिक आधारावर मुसलमानांची माथी पंडीत समुदाया विरुद्ध भडकावीत होती तोच प्रकार हिंदुत्ववादी संघटना निर्वासित पंडीत तरुणांची माथी मुसलमानांविरुद्ध भडकावीत होती. यातून काश्मीरघाटीत पंडिताच्या बाबतीत भयंकर घडले. जम्मूत देखील मानहानी होण्याचा प्रसंग पंडीत समुदायावर आला होता. हिंदुत्ववादी संघटनेने निर्वासित पंडीत तरुणांना हाताशी धरून जम्मूतील शाळेत बॉम्बस्फोट घडविण्याचा प्रयत्न केला. यात बॉम्बस्फोट घडविणाऱ्या दोघापैकी एकाचा मृत्यू झाला तर दुसरा जखमी झाला. काश्मीरमधून परीक्षा देण्यासाठी आलेल्या मुस्लीम विद्यार्थ्यांना मारण्याची योजना होती. पण त्या शाळेत मोठ्या संख्येत डोग्रा आणि इतर हिंदूंची मुले होती. या मुलांचे पालक या प्रकाराने संतप्त होवून निर्वासित पंडीत समुदाया विरुद्ध रस्त्यावर उतरले होते. अनेक पंडितांना मारहाण देखील झाली होती. त्याआधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जम्मू कार्यालयात बॉम्बची जुळणी करताना स्फोट होवून दोघांचा मृत्यू झाला होता. बाबरी मस्जीद पाडण्यात आल्यानंतर जेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्यात आली होती त्याच्या कारणात जम्मूतील या दोन बॉम्बस्फोटाचा उल्लेख करण्यात आला होता.  
-------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि.यवतमाळ 
मोबाईल : ९४२२१६८१५८ 

Thursday, May 11, 2023

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - ५५

 मोर्चा ,त्यावर गोळीबार आणि या गोळीबाराच्या निषेधार्थ पुन्हा मोर्चा असे दुष्टचक्र १९९० पासून सुरु राहिल्याने काश्मीर मधील हिंसाचारात मुस्लीम नागरिकांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले. सगळे मुस्लीम सुरक्षादलाकडून मारले गेलेत असेही नाही. दहशतवादी संघटनांनी मारलेल्या मुस्लिमांची संख्या कमी नाही.
-------------------------------------------------------------------------------------------------
        
हिंसाचार आणि त्यात बळी पडलेल्यांची आधी दिलेली आकडेवारी १९९० ते १९९३ या तीन वर्षाची होती.  १९९० मध्ये सुरु झालेला काश्मीर मधील हिंसाचार १९९३ पर्यंत मोठ्या प्रमाणात होता. नंतरही हिंसाचार सातत्याने सुरु राहिला. या हिंसाचाराची २०००  पर्यंतची आकडेवारी लक्षात घेतली तर त्याच्या भयावह स्वरुपाची कल्पना येईल. १९  जानेवारी १९९० ते २०००  या कालावधीत जम्मू-काश्मीर मध्ये हिसाचाराच्या ५६००० घटना घडल्याची नोंद आहे. यात दहशतवाद्यांनी केलेला हिंसाचार आणि सुरक्षादलांनी विविध प्रसंगी केलेल्या गोळीबाराचा समावेश आहे. या हिंसाचारात सरकारी आकड्यानुसार १६००० दहशतवादी आणि ४६०० सुरक्षा दलाचे जवान मारल्या गेले. यात धक्कादायक आकडा आहे तो दहशतवादी कारवायाशी संबंध नसलेले  १३५०० नागरिक मारल्या जाण्याचा. या नागरिकांमध्ये मारल्या गेलेल्या पंडितांचा आकडा ३१९ सांगितला जातो तो कमीच आहे. किती पंडीत मारल्या गेलेत या बाबत पंडीत समुदायात मतभेद आहेत. काश्मीर बाहेर पडलेल्या पंडितांची संघटना हा आकडा ३ ते ४००० असल्याचा दावा करते तर काश्मीर न सोडणाऱ्या पंडिताच्या संघटनेकडून ६५० पंडीत मारल्या गेल्याचा दावा केला गेला आहे.  काश्मीर घाटीतील पंडीत समुदाया व्यतिरिक्त अमरनाथ देशभरातून अमरनाथ यात्रेसाठी आलेल्या हिंदू यात्रेकरूवर झालेल्या आतंकवादी हल्ल्यात आणि जम्मू भागात आतंकवादी हल्ल्यात मृत्यमुखी पडलेले हिंदू लक्षात घेता हा आकडा १००० च्या घरात जातो हा निष्कर्ष मागच्या प्रकरणात काढला होता त्याची या आकड्यातून पुष्टीच होते. आतंकवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या पंडितांच्या जास्त संख्येचा दावा ग्राह्य धरला तरी काश्मीर मध्ये झालेल्या हिंसाचारात कितीतरी अधिक काश्मिरी मुसलमान मारले गेलेत हे नाकारता येणार नाही. जास्त काश्मिरी मुस्लीम कसे मारले गेले हे एका उदाहरणावरून लक्षात येईल. हे उदाहरण यासाठी महत्वाचे आहे की साऱ्या जगातून काश्मीर प्रश्न हाताळणीवर टीका झाली तशीच टीका भारतीय प्रसिद्धी माध्यमातूनही झाली. हा पहिलाच प्रसंग आहे ज्यावर भारतीय प्रसार माध्यमांनी चुकीची कृती असल्याचे म्हंटले आणि याच प्रसंगामुळे जगमोहन यांना काश्मीरच्या राज्यपाल पदावरून दूर करण्यात आले.                                                                                       

हा प्रसंग होता मीरवायज मौलवी मोहम्मद फारूक यांच्या अंत्ययात्रेवर झालेल्या अंदाधुंद गोळीबाराचा. मीरवायज म्हणजे मुख्य धर्मोपदेशक. काश्मिरी मुसलमानांना आदरणीय असलेली ही वेगळ्या प्रकारची धार्मिक संस्था आहे जी इतर ठिकाणच्या मुसलमानात आढळत नाही. मीरवायज हे पद वंशपरंपरेने चालत आले आहे. या पदावर त्यावेळी मौलाना मोहम्मद फारुक होते. यांनी रुबिया सईदचे अपहरण झाले तेव्हा दहशतवाद्यांची ही कृती गैर इस्लामिक असल्याची भूमिका घेत तिच्या सुटकेची मागणी केली होती. हा प्रसंग आणि मौलाना फारुक यांनी भारत सरकारशी हातमिळवणी केल्याचा संशय यामुळे आतंकवाद्यांनी त्यांची हत्या केली. त्यांचा मृतदेह शेरेकाश्मीर वैद्यकीय संस्थानातून त्यांच्या घरी आणताना  मिरवणुकीत हजारो नागरिक सामील झाले होते. नागरिकांचा रोष आतंकवादी संघटनांवर व्यक्त होत होता. पण ही मिरवणूक जेव्हा मौलवीच्या घराजवळ एका अरुंद गल्लीत आली तेव्हा सुरक्षादलाने जमावावर गोळीबार केला. या गोळीबारात किमान ४७ व कमाल १०० नागरिक ठार झाल्याचे सांगितले जाते. मौलवीच्या प्रेताला सुद्धा काही गोळ्या लागल्या होत्या. या घटनेमुळे या हत्येचा दहशतवादी संघटनेवर असलेला रोष सरकारकडे वळला. देशात आणि परदेशात गोळीबाराच्या या घटनेवर जबर टीका झाली. त्यावेळचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बुश यांनी आपला खास दूत दिल्लीला पाठवला व सुरक्षादलाच्या कारवाईवर नाराजी व्यक्त केली. या घटनेनंतर केंद्र सरकारने जगमोहन यांना राज्यपाल पदावरून दूर केले. ही घटना घडली होती २१ में १९९० रोजी. त्या आधीही जमावावर गोळीबार करण्याच्या घटना घडल्या होत्या. मोर्चा ,त्यावर गोळीबार आणि या गोळीबाराच्या निषेधार्थ पुन्हा मोर्चा असे दुष्टचक्र १९९० पासून सुरु राहिल्याने काश्मीर मधील हिंसाचारात मुस्लीम नागरिकांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले. सगळे मुस्लीम सुरक्षादलाकडून मारले गेलेत असेही नाही. आतंकवादी संघटनांनी मारलेल्या मुस्लिमांची संख्या कमी नाही. जानेवारी-फेब्रुवारी किंवा त्या आधीच्या महिन्यात दहशतवाद्यांनी पंडीतानाच आपले लक्ष्य केले होते. नंतर मात्र पंडितांसोबत मुस्लीम नागरिकही त्यांच्या निशाण्यावर आलेत. शिवाय दहशतवादी संघटनांच्या वर्चस्वाच्या लढाईतही दहशतवाद्यांसह मुस्लीम नागरिक मारले गेलेत.


 मुस्लीम दहशतवादी मारल्या गेलेत त्याचा विचार करण्याची इथे गरज नाही. ते मेलेत त्यांच्या कर्माने असे म्हणता येईल. पण अन्य नागरिकांबाबत असा दृष्टीकोन बाळगणे अनुचित आहे. निरपराध पंडितांच्या निर्घृण हत्येबद्दल दु:ख होणे जितके स्वाभाविक आहे तितकेच दु:ख निरपराध काश्मिरी मुसलमानांबद्दलही वाटायला हवे पण तसे होताना दिसत नाही. आणखी एका वास्तवाची दखल घेतल्या जात नाही.  कर्फ्यू, सुरक्षा दलाकडून नित्याची तलाशी आणि तलाशी दरम्यान बसणारे दंडे व होणारा अपमान याला कंटाळून २० हजार काश्मिरी मुसलमान कुटुंबांनी  काश्मीर घाटी सोडून पाकव्याप्त काश्मीर मध्ये आश्रय घेतला.  १९९० ते १९९३ या काळात भारतीय काश्मीर मधील ४८००० कुटुंबाना  शरणार्थी म्हणून आश्रय दिल्याचा पाकिस्तानचा दावा होता.  हा दावा अतिरंजित असला तरी पंडिता प्रमाणे त्या काळात हजारो मुस्लीमही  घाटी सोडून गेले होते हे सत्य आहे. अर्थात पंडितांच्या काश्मीर घाटी सोडण्याची तुलना काश्मिरी मुसलमानांना पाकव्याप्त काश्मीर मध्ये आश्रय घ्यावा लागण्याशी होवू शकत नाही. हिंसाचार कमी झाला तसा पाकव्याप्त काश्मीर मध्ये गेलेल्या मुस्लिमांसाठी परतीचा मार्ग मोकळा होता. काश्मिरी पंडितांना मात्र परतण्यासारखी स्थिती नव्हती. एवढेच नाही तर जम्मू आणि इतर भागातील ज्या वातावरणाशी काश्मिरी पंडितांना जुळवून घ्यावे लागले ते त्यांच्यासाठी फार यातनादायक होते. काश्मीर घाटीतील वातावरण आणि पाकव्याप्त काश्मीरमधील वातावरण यात फारसा फरक नव्हता. सांस्कृतिक फरकही नव्हता. जम्मूत आणि भारतातील इतर ठिकाणी काश्मिरी पंडीत राहिले त्यांच्यासाठी वातावरणा प्रमाणेच  सांस्कृतिक फरक फार मोठा होता. काश्मिरी पंडितांचा जास्त संबंध काश्मिरी मुसलमानांशीच राहिला. काश्मीर बाहेरच्या हिंदूंशी फार संबंध नसल्याने अनोळख्या लोकात येवून पडल्या सारखी त्यांची अवस्था होती. 

                                                                        (क्रमशः)
-------------------------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि.यवतमाळ 
मोबाईल : ९४२२१६८१५८ 

 

Wednesday, May 3, 2023

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - ५४

 १९९० ते १९९३ या काळात दहशतवादी कारवाया मोठ्या प्रमाणात झाल्या आणि दहशतवादी व सुरक्षादलात  मोठ्या प्रमाणावर चकमकी झडत  होत्या. संपूर्ण अराजकाचा हा काळ होता. पीटीआय या प्रमुख भारतीय वृत्तसंस्थेने सरकारचा हवाल्याने या काळात एकूण ८१०० व्यक्ती ठार झाल्याचे वृत्त दिले होते. ठार झालेल्यात काश्मिरी पंडीत, काश्मिरी मुसलमान, पाक प्रशिक्षित दहशतवादी आणि सुरक्षादलाचे जवान यांचा समावेश होता.
------------------------------------------------------------------------------


अमरनाथ यात्रा दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आली ती २००० साली.ऑगस्ट २००० मध्ये अमरनाथ यात्रेकरुंवर  हल्ला चढवून मोठे हत्याकांड केले. या हल्ल्यात सरकारी आकड्यानुसार ८९ तर वृत्तसंस्थांच्या आकड्यानुसार १०५ यात्रेकरू आणि सुरक्षाकर्मीचा मृत्यू झाला तर २०० यात्रेकरू जखमी झाले होते. यानंतरही अमरनाथ यात्रेवर दहशतवाद्यांनी हल्ले केलेत पण हा हल्ला भीषण स्वरूपाचा होता. जुलै २००१ मध्ये दहशतवाद्यांनी अमरनाथ यात्रेकरूंच्या कॅम्प वर ग्रेनेड फेकले.गोळीबारही केला. ज्यात १३ यात्रेकरूंचा मृत्यू झाला तर १७ यात्रेकरू जखमी झाले होते.  ६ ऑगस्ट २००२ ला अमरनाथ यात्रेकरूंच्या बेस कॅम्प वर हल्ला केला ज्यात ९ यात्रेकरूंचा मृत्यू झाला तर २७ यात्रेकरू जखमी झाले होते. ३० जून २००४ ला पहलगाम येथील अमरनाथ यात्रेकरूंच्या कॅम्प वर हल्ला करण्यात आला ज्यात दोन यात्रेकरूंचा मृत्यू झाला. २००६ मध्ये राजस्थान मधून आलेल्या अमरनाथ यात्रेकरुंच्या बस वर ग्रेनेड फेकण्यात आलेत ज्यात पाच यात्रेकरूंचा मृत्यू झाला. या नंतर अमरनाथ यात्रेवर हल्ला झाला तो २०१७ साली. अमरनाथ यात्रा आटोपून परतणाऱ्या बसवर अनंतनाग येथे दहशतवाद्यांनी हल्ला चढविला ज्यात ७ यात्रेकरूंचा मृत्यू झाला तर २९ यात्रेकरू जखमी झाले होते. दहशतवाद्यांनी अमरनाथ यात्रेवर जसे हल्ले चढवले तशा प्रकारचे दोन हल्ले जम्मूतील १५० वर्षे जुन्या  प्रसिद्ध रघुनाथ मंदिरावर चढवले होते. ३० मार्च २००२ आणि २४ नोव्हेंबर २००२ रोजी अतिरेक्यांनी मंदिरावर ग्रेनेड फेकले. गोळीबारही केला. या दोन्ही हल्ल्यात मिळून २० भाविक व मंदिराचे सुरक्षारक्षक ठार झालेत तर ४० भाविक जखमी झाले होते. या हल्ल्याच्या दरम्यान १३ जुलै २००२ रोजी जम्मू जवळ २९ मजुरांची हत्या दहशतवाद्यांनी केली. ज्याला सामुहिक हत्या किंवा नरसंहार म्हणता येईल त्या घटनांचा हा तपशील आहे. ही सगळी हत्याकांडे दहशतवादी गटांनी नियोजनपूर्वक घडवून आणलेली होती. सामान्य हिंदू नागरिकांचे सामुहिक हत्याकांड घडवून आणण्याचा हा नृशंस प्रकार १९९७ पासून सुरु झाला. पंडीत समुदायाने मोठ्या संख्येने काश्मीरघाटी सोडली ती १९९० साली. त्यानंतर ७ वर्षांनी अशी सामुहिक हत्याकांडे अतिरेक्यांनी घडवून आणायला सुरुवात केली. एका पंडिताची हत्या करायची म्हणजे परिसरातील हजार तरी पंडीत घाटी सोडतील हे १९९७ पर्यंत अवलंबिलेले तंत्र सोडून दहशतवादी सामुहिक हत्येकडे वळले.              

१९९० मध्ये मोठ्या संख्येने काश्मिरी पंडीत काश्मीरघाटी बाहेर पडले तरी काही हजार कुटुंबानी घाटी न सोडण्याचा निर्णय घेवून ते घाटीतच थांबले होते. थांबलेल्या कुटुंबांचा सुरक्षादल परिस्थिती नियंत्रणात आणेल आणि मुस्लीम शेजारी साथ देतील असा दुहेरी विश्वास होता. दोन जमातीतील दुराव्याच्या परिस्थितीतही शेजाऱ्यांवर विश्वास होता कारण मुस्लीम जमावाने पंडितांच्या किंवा इतर हिंदूंच्या घरावर हल्ले केले नव्हते. सुरक्षादलाच्या कारवाईने क्षुब्ध झालेला जमाव संतप्त घोषणा देत रस्त्यावर फिरत होता, काही दिवसात आपण 'आझाद' होणार हा विश्वास त्या जमावाला वाटत होता आणि घाटीतील हिंदू 'आझादीचे समर्थक नाहीत हेही त्यांना माहित होते तरी पंडितांच्या घरासमोरून जाणाऱ्या जमावाने पंडितांच्या घरावर हल्ले केले नाहीत ही बाब फार मोठी असूनही काश्मिरेतर भारतीयांनी कधीच लक्षात घेतली नाही. पंडितांवर हल्ले करण्यात आले, हजारोंची हत्या झाली , रक्ताचे पाट वाहिले अशा दुष्प्रचाराला आम्ही बळी पडलो. पंडीत आणि इतर हिंदू आझादी विरोधात असल्याने गेलेले चांगले ही भावना घाटीतील बहुसंख्य मुसलमानांची होती यात वादच नाही. म्हणून अनेक गांवातून हिंदू कुटुंबीय बाहेर पडले तेव्हा स्थानिकांनी त्यांना रोखले नाही. पण अशीही बरीच गांवे होती जिथे शेजाऱ्यांनी पंडीत कुटुंबियांना जाण्यापासून परावृत्त केले. १९९० नंतर पंडीत कुटुंबे घाटीत थांबलीत याचे हे मुख्य कारण होते. १९९० च्या पूर्ण दशकभर पंडीत कुटुंबीय बाहेर पडत राहिलेत याच्या मागे दहशतवाद्यांनी हत्यासत्र सुरु ठेवणे हे जसे कारण होते तसेच दुसरेही महत्वाचे कारण होते. ते म्हणजे सततची अशांतता, सततचा कर्फ्यू आणि त्यामुळे व्यवसाय ठप्प, शिक्षणसंस्था बंद त्यामुळे मुलांचे शिक्षण ठप्प. अशा स्थितीत मुस्लीम शेजाऱ्यांची साथ असूनही  काश्मीर घाटी सोडणे हाच एक मागे राहिलेल्या पंडितापुढे होता. त्यातही मुलांना बाहेर पाठवले पण स्वत: घाटीतच थांबलेले कुटुंबीय पाहायला मिळतील.             

१९९० ते १९९३ या काळात दहशतवादी कारवाया मोठ्या प्रमाणात झाल्या आणि दहशतवादी व सुरक्षादलात  मोठ्या प्रमाणावर चकमकी झडत  होत्या. संपूर्ण अराजकाचा हा काळ होता. पीटीआय या प्रमुख भारतीय वृत्तसंस्थेने सरकारचा हवाला देवून काश्मीर घाटीत ठार झालेल्यांची संख्या सांगणारे वृत्त ५ जानेवारी १९९४ रोजी दिले होते. या वृत्तानुसार या काळात अतिरेक्यांच्या हल्ल्यात , सुरक्षादलाच्या गोळीबारात ठार झालेल्यांची एकूण संख्या होती ८१००. या ८१०० मध्ये ठार झालेल्या पंडितांची संख्या होती ३५०. या ८१०० संख्येत निम्मी संख्या सुरक्षा दलाने मारलेल्या अतिरेक्यांची आहे. या अतिरेक्या खालोखाल मारल्या गेलेत ते घाटीतील मुस्लीम रहिवाशी. मुस्लीम रहिवाशी जसे सुरक्षादलाच्या गोळीबारात बळी पडले तसेच आतंकवाद्यांकडून देखील मारल्या गेलेत. भारत समर्थक आहेत म्हणून, पंडितांना संरक्षण देतात या कारणाने आणि पोलिसांचे व सुरक्षादलाचे खबरी  असल्याच्या संशयावरून आतंकवाद्यांनी अनेक मुस्लिमांना कंठस्नान घातले. काश्मीर बाहेरच्या भारतीयांचा विश्वास बसणार नाही इतक्या संख्येने अतिरेक्यांनी मुस्लिमांना मारले. सुरक्षादलाकडून या काळात जे मुस्लीम मारले गेलेत ते प्रामुख्याने त्यांच्या मोर्चा व आंदोलनावर सुरक्षादलाने केलेल्या गोळीबारात मारले गेले. या काळात अचानक कुठेही सुरक्षादलात व अतिरेक्यात गोळीबार सुरु व्हायचा आणि या गोळीबारात सापडून मरणाऱ्यात मुस्लिमच असायचे त्यामुळेही याकाळात ठार झालेल्यात मुस्लीम नागरिकांची संख्या अधिक होती. याकाळातच ३५० पंडीत नागरिकांची हत्या झाली असेल तर ९० च्या दशकात ही संख्या वाढली असणार. सरकारी आकडा ५०० च्या आत असला तरी नंतर झालेले पंडीत समुदाया व्यतिरिक्त इतर हिंदूंचे हत्याकांड लक्षात घेतले तर ही संख्या हजाराचा आकडा गाठते. दहशतवादी आपले उद्दिष्ट साध्य करण्यात अपयशी राहिल्याने आलेल्या नैराश्यातून त्यांनी मोठी हत्याकांड घडविली आणि त्यामुळे हा आकडा वाढला. सुरक्षादलांनी दहशतवादी गटांच्या नाड्या आवळल्या व आझादीचे स्वप्न पाहणारा सामान्य मुसलमान नागरिकही दहशतवाद्यांपासून दूर गेल्याने काश्मिर घाटीतील गांवात हल्ले करण्या सारखी स्थिती राहिली नव्हती. त्यामुळे दहशतवादी गटांनी अमरनाथ यात्रेला व जम्मूला लक्ष्य केले.

                                                                    (क्रमशः)
----------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि.यवतमाळ 
मोबाईल - ९४२२१६८१५८ 


Thursday, April 27, 2023

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - ५३

काश्मीरघाटीत १९८१ च्या जनगणनेनुसार पंडीत आणि इतर हिंदूंच्या खालोखाल शीख जनसंख्या होती. हिंदू सव्वालाख तर शीख एक लाख अशी जनसंख्या होती. पण १९९० च्या हिंसाचाराच्या दशकात शिखांविरुद्ध आतंकवादी हिंसा फारसी झाली नव्हती. त्यामुळे पंडितांसमवेत घाटी सोडणारे कुटुंब संख्येने जास्त नव्हते. शिखांविरुद्ध हिंसाचाराची मोठी घटना घडली २० मार्च २००० रोजी. 
----------------------------------------------------------------------------------- 
 
 
 
पंडीत कुटुंबियांचे लोंढे १९ जानेवारी १९९० नंतर काही महिने बाहेर पडणे सुरु होते तरी त्याही परिस्थितीत तिथेच राहण्याचा निर्णय घेणाऱ्या पंडीत कुटुंबियांची संख्या कमी नव्हती. सैन्याला बोलावण्यात आल्यामुळे लवकर आतंकवादआतंकवाद्यांवर सैन्य नियंत्रण मिळवीलपरिस्थितीतील दाहकता कमी होईल ही जशी आशा त्यांना होती तशीच मुस्लीम शेजारी आपल्याला इजा पोचविणार नाही ही भावना देखील होती. पण सैन्यदलाला आतंकवादावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवायला दोन वर्षापेक्षा अधिक काळ लागला. निवृत्त जनरल वीज यांनी १९९३ पर्यंत काश्मीर घाटीतील परिस्थिती सेनादलाने  नियंत्रणात आणल्याचे लिहिले आहे. या काळात आतंकवाद्या सोबत सुरक्षादलाच्या चकमकी नित्याचा भाग बनल्या होत्या. सतत कर्फ्युत राहावे लागायचे. आणि याकाळातही पंडितांना निवडून निवडून मारण्याचे आतंकवाद्यांनी सुरूच ठेवल्याने मागे राहिलेली कुटुंबे काश्मीर घाटीतून बाहेर पडत राहिली. १९९२ पर्यंत काश्मीर घाटीत साडेचार ते पाच हजार पंडीत कुटुंबे उरली होती तर ही संख्या १९९८  पर्यंत साडेतीन हजार कुटुंबीया पर्यंत आली. मागे राहिलेली कुटुंबे ही गांवागांवातून विखुरलेली होती. त्यांच्या शेजाऱ्यांनी किंवा गांवातल्या सामान्य मुस्लिमांनी त्यांना हाकलून द्यायचे ठरविले असते तर पंडीत कुटुंबासाठी थांबणे शक्य झाले नसते. गांवात पंडितांच्या सामुहिक हत्या करून भयभीत करण्याचा प्रयोग आतंकवाद्यांनी १९९७ मध्ये केला. १९९७ ते २००३ याकाळात चार ठिकाणी सामुहिक हत्याकांड आतंकवाद्यांनी घडवून आणली. यातील तीन पंडीत समुदायांशी संबंधित होते तर एक शीख समुदायाशी संबंधित होते. काश्मीरघाटीत  थांबण्याचा निर्णय घेतलेल्या अनेक कुटुंबांनी या काळात बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. या काळात केंद्रात  वाजपेयी यांचे सरकार होते. सरकारी पातळीवर विस्थापित पंडीत कुटुंबांचे परत काश्मीरघाटीत पुनर्वसन करण्याचा विचार सुरु झाला होता त्याला अशा सामुहिक हत्याकांडाने खीळ बसली. या हत्याकांडा नंतरही घाटीत ८०० च्या वर पंडीत कुटुंब आहेत. २०१९ नंतर पुन्हा पंडितांना निवडून मारण्याचे सत्र आतंकवाद्यानी सुरु केल्याने या ८०० पैकी काही कुटुंबांनी मागच्या २-३ वर्षात काश्मीरघाटी सोडली आहे 
 
 

काश्मीरघाटीत १९८१ च्या जनगणनेनुसार पंडीत आणि इतर हिंदूंच्या खालोखाल शीख जनसंख्या होती. हिंदू सव्वालाख तर शीख एक लाख अशी जनसंख्या होती. पण १९९० च्या हिंसाचाराच्या दशकात शिखांविरुद्ध आतंकवादी हिंसा फारसी झाली नव्हती. त्यामुळे पंडितांसमवेत घाटी सोडणारे कुटुंब संख्येने जास्त नव्हते. शिखांविरुद्ध हिंसाचाराची मोठी घटना घडली २० मार्च २००० रोजी. अनंतनाग जिल्ह्यातील छत्तिसिंगपुरा येथे ३६ शिखांना रांगेत उभे करून गोळ्या घालून ठार करण्यात आले. २० आतंकवादी भारतीय सैन्याच्या वेशात आले होते. आपण भारतीय सैनिकच आहोत हे दर्शविण्यासाठी ते जय हिंद च्या घोषणाही देत होते. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बील क्लिंटन भारत भेटीवर येण्याच्या आदल्या दिवशी हे हत्याकांड घडविल्या गेले. सेनादलाने आपल्या स्तरावर या घटनेची चौकशी करून केंद्र सरकारला अहवाल दिला होता. या चौकशीत सामील असलेले लेफ्टनंट जनरल के.एस. गिल यांनी सदर घटनेत सेनेच्या खालच्या अधिकाऱ्यांचा हात असल्याचा गंभीर आरोप केला होता. घटनेच्या चौकशीचा अहवाल तत्कालीन गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांना देण्यात आला होता पण काहीच कारवाई झाली नसल्याचेही गिल यांनी म्हंटले आहे. सैन्याच्या कारवाईतून निर्माण झालेल्या दबावामुळे १९९२ नंतर अनेक दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण केले होते. या दहशतवाद्यांचा उपयोग सेनेने दहशतवाद्यान्विरुद्ध केल्याचे सर्वश्रुत आहे. शिखांच्या शिरकाणात सामील आत्मसमर्पण केलेले दहशतवादीच होते असा दावा गिल यांनी केला आहे. नंतर या हत्याकांडात सामीलदहशतवाद्यांना मारल्याचा दावा करण्यात आला पण चौकशीअंती तो खोटा निघाला. घटनेशी संबंध नसलेल्या पाच युवकांची हत्या करण्यात आली होती आणि या संदर्भात राष्ट्रीय रायफल्सच्याजवानांना दोषी धरण्यात आले होते. काश्मीरप्रश्नाची आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा व्हावी, दखल