Thursday, December 21, 2023

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - ८५

 २००२ मध्ये तत्कालीन सेना प्रमुखाने  लष्कराकडून दहशतवाद संपविण्ययाची कामगिरी यशस्वीरित्या पार पाडली असल्याने कायदा  व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांवरच सोपविली पाहिजे, त्यासाठी लष्कराचा वापर करू नये अशी सूचना केली होती. ती सूचना  खऱ्या अर्थाने मनमोहन सरकारने अंमलात आणली. नागरी निदर्शने काबूत आणण्यासाठी लष्कराची कुमक पाठविण्याची राज्य सरकारची मागणी त्यांनी फेटाळली.
-----------------------------------------------------------------------------------


२००८च्या अमरनाथ जमीन विवाद प्रकरण आणि २००९ च्या दोन तरुण महिलांच्या अपहरण,बलात्कार आणि खुनाच्या आरोपाने पसरलेल्या अशांततेतून काश्मीर सावरत आले असतांना २०१० साली पुन्हा एका घटनेने काश्मीरमध्ये असंतोष उफाळून आला. याची तीव्रता २००९ पेक्षा अधिक होती. ३० एप्रिल २०१० रोजी तीन तरुणांना गोळ्या घालून ठार करण्यात आले होते. याबाबत सेनादला तर्फे दावा करण्यात आला होता की हे तीन तरुण घातपाती कारवाया करण्यासाठी सीमा ओलांडून भारतात आले असताना त्यांना गोळ्या घालून ठार करण्यात आले. आठवडाभरात या घटनेबद्दल जी तथ्ये समोर आलीत त्याने काश्मीर हादरले. ज्या तीन तरुणांना गोळ्या घालून ठार करण्यात आले होते ते पाकिस्तानी नव्हते किंवा पाकिस्तानातून सीमा ओलांडून आलेले नव्हते. ठार झालेले शहजाद अहमद खान,रियाज अहमद लोन आणि मुहम्मद शफी लोन हे तिन्ही तरुण बारामुल्लाचे रहिवासी होते. त्यांना कुपवाडा भागात सेनेसाठी मालवाहतुकीचे काम देण्याचे आमिष दाखवून सेनेच्या कॅम्प मध्ये बोलावले होते आणि तेथे त्यांना गोळ्या घालून चकमकीचे बनावट दृश्य तयार केल्याचा आरोप झाला. दहशतवाद्यांना ठार करणाऱ्या अशा चकमकीत सामील जवानांना व अधिकाऱ्यांना पदक आणि बक्षीस म्हणून रोख रक्कम देण्याची पद्धत आहे. पदक आणि बक्षिसाची रक्कम मिळविण्यासाठी दहशतवादी नसलेल्या तरुणांना दहशतवादी दाखवून ठार केल्याचा आरोप पुढे सैन्याच्या कोर्ट मार्शल मध्ये सिद्धही झाला. निरपराध तरुणांना ठार करण्यात आल्याचे समोर आल्यानंतर त्या विरुद्ध निदर्शनांना ११ जून २०१० रोजी कुपवाडा आणि श्रीनगर मधून सुरुवात झाली. श्रीनगरमध्ये घटनेचा निषेध करण्यासाठी जमलेल्या तरुणांच्या जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला. अश्रुधुराचा एक गोळा १७ वर्षीय तुफैल अहमद याच्या डोक्यावर आदळून फुटल्याने त्यात त्याचा मृत्यू झाला. या मृत्यूने आगीत तेल ओतल्या गेले. ठिकठिकाणी निदर्शने होवू लागले. निदर्शक व पोलिसांच्या झडपा आणि यात निदर्शकांचा मृत्यू झाला की पुन्हा वाढत्या संख्येने निदर्शने या प्रकाराने संपूर्ण काश्मीर खोरे अशांत बनले. १९८०-९० च्या पिढी नंतरची नवी पिढी प्रामुख्याने निदर्शनात सामील होती. १९८०-१९९० च्या पिढीतील बऱ्याच तरुणांनी रायफल हाती घेतली होती. पण या नव्या पिढीच्या हातात रायफल नव्हती तर दगड होते. पोलीस व सुरक्षादलांनी निदर्शाकाला अडवले किंवा बळाचा वापर केला की त्याचे उत्तर पोलीस आणि सुरक्षादलावर दगडफेक करून दिले जायचे. या दगडफेकीला उत्तर म्हणून बंदूक आणि स्फोटकाचा वापर सुरक्षादलाकडून होत होता. तीन महिन्यापेक्षा अधिक काळ नागरिक आणि पोलीस यांच्यात अशा प्रकारच्या झडपा होत होत्या. यात ११२ नागरिक ठार झाल्याचा सरकारी आकडा आहे तर गैरसरकारी आकडा १६० चा आहे. शिवाय जखमींचे प्रमाणही मोठे राहिले. जखमीत नागरिकांपेक्षा सुरक्षादलांच्या जवानांची संख्या मोठी होती. 

सुरक्षादलाच्या जवानांनी तीन तरुणांना ठार केल्याच्या घटने विरुद्ध उग्र निदर्शने सुरु असतानाच अमेरिकेत कुराण जाळल्याची घटना घडली. या घटनेने काश्मिरातील निदर्शने अधिक उग्र आणि हिंसक बनली. चर्च आणि ख्रिस्ती शाळा निदर्शकांच्या निशाण्यावर आल्या. काही चर्च आणि शाळा जाळण्यात आल्या तर काहींवर दगडफेक झाली.  या घटनेने जम्मूतील मुस्लीमबहुल भागातही निदर्शनांचे लोण पोचले.तरी निदर्शकांची प्रमुख मागणी सैन्य मागे घेण्याची व सशस्त्र बल (विशेष शक्ती) अधिनियम मागे घेण्याची होती. या अधिनियमामुळे सशस्त्र बलाने अन्याय अत्याचार केले तरी त्यांना शिक्षा होत नाही, संरक्षण मिळते अशी व्यापक धारणा असल्याने निदर्शकाचीच नाही तर काश्मिरातील सर्वच राजकीय पक्षांची व हुरियत कॉन्फरन्स सारख्या संघटनांची ही मागणी राहिली आहे.  पण या कायद्याचा दुरुपयोग होवू न देण्याचा सेनादलाचा आणि सरकारचा निर्धार असेल तर दोषींना शिक्षा होवू शकते हे या प्रकरणातच दिसून आले. दहशतवादी असल्याचे भासवून स्वत:च्या फायद्यासाठी तीन निरपराध तरुणांची बनावट चकमकीत हत्या करणाऱ्या जवानांना व अधिकाऱ्यांना सेनेच्या न्यायालयात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. २०१४ मध्ये ही शिक्षा सुनावण्यात आली.  सेना मागे घेण्याची किंवा सशस्त्र बल विशेष शक्ती अधिनियम मागे घेण्याच्या मागणीत इतरांसोबत  सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्स सामील असताना त्या पक्षाचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला मात्र निदर्शने काबूत आणण्यासाठी सेनादलाची मदत मागत घेते. मात्र केंद्राकडून अब्दुल्लांना या बाबतीत ठाम नकार कळविण्यात आला. जम्मू-काश्मीर पोलिसांनी सेनेवर विसंबून न राहता केंद्रीय राखीव दलाच्या मदतीने कायदा व सुव्यवस्था सांभाळली पाहिजे असे ओमर अब्दुल्लांना सांगण्यात आले. २००२ मध्ये तत्कालीन सेना प्रमुखाने  लष्कराकडून दहशतवाद संपविण्ययाची कामगिरी यशस्वीरित्या पार पाडली असल्याने कायदा  व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांवरच सोपविली पाहिजे अशी सूचना केली होती. ती सूचना  खऱ्या अर्थाने मनमोहन सरकारने अंमलात आणली. परिस्थिती शांत करण्यासाठी त्यांनी सर्व पक्षांची मदत घेतली.

पंतप्रधानांनी श्रीनगर येथे १५ सप्टेंबर रोजी सर्वपक्षीय बैठक बोलावली. हिंसाचारात लिप्त नसलेल्या कोणत्याही गटासोबत बोलण्याची त्यांनी तयारी दाखविली. या बैठकीला हुरियत कॉन्फरन्सच्या दोन्ही गटाच्या नेत्या सोबतच जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटच्या यासीन मलिकलाही निमंत्रण पाठविण्यात आले होते. या बैठकीशिवाय मनमोहनसिंग यांनी गृहमंत्री चिदंबरम यांच्या नेतृत्वाखाली सर्वदलीय शिष्टमंडळ नवी दिल्लीहून श्रीनगरला पाठविले.या सर्वपक्षीय शिष्टमंडळात संसदीय कामकाज मंत्री पवन बन्सल, भारतीय जनता पक्षाचे अरुण जेटली आणि सुषमा स्वराज, सीपीएमचे वासुदेव आचार्य, सीपीआयचे गुरुदास दासगुप्ता, समाजवादी पक्षाचे मुलायमसिंग यादव, लोक जनशक्ती पक्षाचे रामविलास पासवान यांचेसह विविध राजकीय पक्षाचे ३९ नेते या शिष्टमंडळात सामील होते. या शिष्टमंडळाने विविध गटांची भेट घेवून चर्चा केली. याचवेळी सरकारकडून विविध उपायांची घोषणा करण्यात आली. यात अटक करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची सुटका, शाळा-कॉलेज सुरु करण्याची घोषणा, सुरक्षादलाची संख्या कमी करण्यासाठी चर्चेची तयारी या शिवाय निदर्शनामध्ये ठार झालेल्या कुटुंबियांना आर्थिक मदत अशा विविध घोषणा करण्यात आल्या. या सगळ्या गोष्टीचा परिणाम तणाव कमी होवून वातावरण निवळण्यात झाला. ज्या पद्धतीने पोलीस व निमलष्करी दलाने परिस्थिती हाताळली व बळाचा जास्त वापर केला त्याबद्दल मनमोहनसिंग यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. पण पोलीस आणि निमलष्करी दलाला शस्त्र हाती नसलेल्या जमावाला कसे नियंत्रित करायचे याचे प्रशिक्षणच नसल्याने त्यांच्याकडून बळाचा अधिक वापर झाला. १९९० मध्ये सुरु झालेल्या दहशतवादाने काश्मीर मिलिटरी स्टेट बनले होते. मनमोहनसिंग यांचे काळात दहशतवादी घटनांचे प्रमाण कमी झाल्याने त्यांनी काश्मिरात सैन्याचा वापर कमी केला. मनमोहन काळात काश्मीर मिलिटरी स्टेट राहिले नाही पण ते पोलीस स्टेट बनले. म्हणजे दहशतवाद वाढता असतांना तो काबूत आणण्यासाठी सैन्याने बळाचा जसा वापर केला तसाच वापर दहशतवाद नसतांना सर्वसामान्य जनतेची निदर्शने काबूत आणण्यासाठी पोलीस आणि निमलष्करी दलाने केला. बळाचा कमी वापर करून जमावाला नियंत्रित करण्यासाठी नव्या आयुधांचा वापर करण्याचे निर्देश पंतप्रधानांनी सुरक्षादलास दिले. त्यानुसार पॅलेटगनचा वापर करण्याचा निर्णय झाला. पण हे हत्यार पुढे विनाशकारी ठरले. 

                                                          (क्रमशः)

------------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि. यवतमाळ 
मोबाईल : ९४२२१६८१५८ 

Wednesday, December 13, 2023

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - ८४

 २९-३० मे च्या रात्री झालेल्या दोन तरुण महिलांच्या गूढ मृत्यूने काश्मीरघाटीत अशांतता पसरली. या महिलांच्या मृत्यूप्रकरणी सुरक्षादलावर आरोप झालेत. सीबीआय तपासात आरोपात तथ्य नसल्याचे समोर आले पण तोपर्यंत बंद, कर्फ्यू, पोलीस-निदर्शक यांच्यातील झडपाने काश्मीरचे जनजीवन ४७ दिवस पूर्णपणे विस्कळीत झाले होते. 
---------------------------------------------------------------------------------


२९ जानेवारी २००९ ची ही घटना आहे. निलोफर जान आणि असिया जान या तरुण नणंद-भावजया शोपियन मधील बोनगम गांवाजवळील आपल्या ऑर्केड बागेतून घरी परतताना बेपत्ता झाल्या. ३० जानेवारी २००९ रोजी त्यांचे मृतदेह सापडले. त्यांच्या परिवाराने या दोन्ही महिलांचे सुरक्षादलातील व्यक्तींनी अपहरण केले आणि बलात्कार करून त्यांचा खून केल्याचा आरोप केला. सदर घटना आणि घटनेतील महिलांच्या परिवाराने केलेल्या आरोपाने काश्मीरमध्ये संतापाची लाट उसळली. सय्यद अली  गिलाणी यांच्या नेतृत्वाखालील हुरियत कॉन्फरन्सच्या गटाने घटनेविरुद्ध बंदचे आवाहन केले. बंद दरम्यान हिंसक घटना घडल्याने कर्फ्यू लावण्यात आला. ३० मे रोजी पोलिसांनी काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात पोस्टमार्टेम मध्ये मृतक महिलांच्या शरीरावर कोणत्याही जखमा आढळल्या नाहीत वा बलात्कार झाल्याचा पुरावा मिळाला नसल्याचे स्पष्ट करण्या आले. बलात्कार किंवा खुनाच्या गुन्ह्या ऐवजी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पण पोलिसांच्या दाव्यावर विश्वास ठेवायला कोणी तयार नव्हते. त्यामुळे घटने विरोधात निदर्शने सुरूच राहिली. शेवटी पोलिसांनी बलात्कार व खुनाचा गुन्हा तब्बल एक आठवड्या नंतर दाखल केला. या दरम्यान मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी जनक्षोभ शांत करण्यासाठी घटनेची न्यायिक चौकशी करण्याचा आदेश दिला. राज्य सरकारने निवृत्त न्यायमूर्ती मुजफ्फर जान यांची एक सदस्यीय चौकशी समिती नेमली. समितीने एक महिन्याच्या आत अहवाल द्यावा असे समितीला सांगण्यात आले. जम्मू-काश्मीर हायकोर्टाच्या बार असोसिएशनने या चौकशी समितीला विरोध करून निवृत्त न्यायमूर्ती ऐवजी कार्यरत न्यायमुर्तीकडून चौकशीची मागणी केली. मागणी पूर्ण न झाल्याने बार असोसिएशनने स्वत:ची स्वतंत्र समिती नेमली.

न्यायिक चौकशीच्या घोषणे नंतरही काश्मीरघाटीत ठिकठिकाणी विरोध प्रदर्शने सुरूच राहिली. पोलीस आणि सुरक्षादलावर जमावाकडून दगडफेक तर सुरक्षादलाकडून अश्रुधुराची नळकांडी आणि लाठीमार असे सार्वत्रिक चित्र दिसत होते. घटने विरोधातील उग्र असंतोष पाहून हुरियतच्या गिलानी गटाने आणखी दोन दिवस काश्मीर बंदचे आवाहन केले. पण जवळपास पूर्ण जून महिना काश्मीर बंद राहिले. या दरम्यान निदर्शकांच्या दगडफेकीत पोलीस तर पोलिसांच्या लाठीमारात अनेक निदर्शक जखमी झाले. घटने विरोधात आंदोलन करणाऱ्या संघटनांनी 'चलो शोपियन' मार्च काढण्याचा प्रयत्न केला. ठिकठिकाणाहून असे मार्च काढण्याचे प्रयत्न सुरक्षादलानी बलप्रयोग करून हाणून पाडले. शोपियन भागात निदर्शनाची तीव्रता अधिक राहिल्याने सुरक्षादलाला गोळीबार करावा लागला  या भागात घटना घडल्यापासूनच अघोषित कर्फ्यू होता. हुरियत कॉन्फरन्सच्या दोन्ही गटाचे नेते सय्यद अली गिलानी व मीरवायज उमर फारूक तसेच जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचे यासीन मलिक, शब्बीर शाह यांचेसह विविध पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना स्थानबद्ध करावे लागले. जवळपास दीड महिना संपूर्ण काश्मीरघाटीतील व्यवहार ठप्प होते व कर्फ्यूसदृश्य परिस्थिती होती. दरम्यान घटनेची तीन स्तरावर चौकशी सुरु होती. राज्यसरकारने नेमलेला न्यायिक आयोग चौकशी करीत होताच. शिवाय हायकोर्ट बार असोसिएशनने वकिलांची स्वतंत्र चौकशी समिती नेमली होती. या शिवाय जम्मू-काश्मीर पोलीस प्रमुखाने तीन पोलीस अधिकाऱ्यांची समिती घटनेच्या सर्वंकष चौकशीसाठी एस आय टी नेमली. तिन्ही चौकशी समितीचे निष्कर्ष जवळपास सारखेच होते. दोन्ही महिलांचा बलात्कार व खून झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. सरकारने नेमलेल्या न्यायिक चौकशी समितीच्या अहवालाच्या आधारे कर्तव्यात कसूर केल्याबद्दल अनेक पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई केली गेली. चौकशीचे निष्कर्ष प्रामुख्याने दुसऱ्या पोस्टमोर्टेम अहवालाच्या आधारे काढण्यात आला  पहिल्या पोस्टमोर्टेमच्या वेळी मोठा जमाव जमला होता. मृतकांचे शरीर कडक झाल्याने स्थानिक डॉक्टरांना अडचणी येत होत्या. त्यात जमावाने दगडफेक सुरु केल्याने काम पूर्ण न करताच डॉक्टर निघून गेले. शेवटी तज्ज्ञ डॉक्टरांकरवी पोस्टमोर्टेम करण्याचा निर्णय झाला. चौकशी समितीच्या निष्कर्षाचा आधार याच पोस्टमोर्टेमचा अहवाल होता. दुसऱ्या पोस्टमोर्टेम अहवालात बलात्काराला दुजोरा दिला असला तरी मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नव्हते. या अहवालाशिवाय  बलत्कार, खून आणि त्यात सुरक्षादलाच्या जवानांचे सहभागी असण्याचे  इतर कोणतेही पुरावे समोर आणण्यात कोणत्याच चौकशी समितीला यश आले नाही. त्यामुळे हे प्रकरण ऑगस्ट २००९ मध्ये सखोल चौकशीसाठी सीबीआयकडे सोपविण्यात आले. संबंधितांचे फोन टॅप करण्याची परवानगीही ओमर अब्दुल्ला सरकारने सीबीआयला दिली.


सीबीआयने केलेल्या चौकशीत वेगळेच आणि धक्कादायक तथ्य समोर आले. दुसरा पोस्टमोर्टेम अहवाल जाणूनबुजून चुकीचा तयार करण्यात आल्याच्या निष्कर्षाप्रत सीबीआय पोचली. हा निष्कर्ष काढण्याआधी सीबीआयने अनेकांचे फोनवर झालेले संभाषण ऐकले. शिवाय या दोन्ही महिलांची प्रेते थडग्यातून बाहेर काढून एम्सच्या डॉक्टरांकरवी पुन्हा पोस्टमोर्टेम करण्यात आले. या पोस्टमोर्टेम अहवालाच्या आधारे सीबीआय या निष्कर्षाप्रत आली की दोन्ही महिलांचा मृत्यू पाण्यात बुडून झाला . त्यांचा बलत्कार आणि खून झाला नाही. त्या रस्त्याने नेहमी जाणे येणे करणाऱ्या महिला पाणी कमी असतांना बुडाल्या कशा याचा मात्र खुलासा झाला नाही. सुरक्षादलाला लक्ष्य करण्यासाठी व जनतेत असंतोष निर्माण करण्यासाठीच्या कटातून आधीचा पोस्टमोर्टेम अहवाल तयार करण्यात आला असे सीबीआय तपासातून बाहेर आले. काही वकिलांनी साक्षीदारांवर दबाव आणून खोटी साक्ष देण्यास भाग पाडल्याचा सीबीआयने दावा केला.. सीबीआयने टॅप केलेल्या फोनच्या आधारे या कटात या दोन महिलांच्या बलत्कार व खुनावरून सुरु झालेल्या निदर्शनाचे नेतृत्व करणाऱ्या मजलिस मशावरत या संघटनेचा हात असल्याचे समोर आले. या संघटनेचा उपाध्यक्ष मोहम्मद शफी खान आणि पोस्टमोर्टेम केलेल्या डॉक्टरांच्या संभाषणातून सीबीआयने हा निष्कर्ष काढला. सीबीआयने चौकशी करून या कारस्थानात सामील १३ व्यक्तींविरुद्ध, ज्यात दोन डॉक्टरांचा समावेश आहे, डिसेंबर २००९ मध्ये आरोपपत्र दाखल केले. या डॉक्टरांना ओमर अब्दुल्ला सरकारने नंतर निलंबित केले होते. पुढे जून २०२३ मध्ये जम्मू-काश्मीर सरकारने या दोन डॉक्टरांना सेवेतून काढून टाकले. दुसरे पोस्टमोर्टेम करून हेतुपुरस्पर चुकीचा अहवाल देणारे हे डॉक्टर होते डॉ.बिलाल अहमद दलाल आणि डॉ.निघट शाहीन चील्लू.   ३० मे २००९ ते २००९ च्या डिसेंबर अखेर पर्यंत या घटनेने काश्मीर धगधगते ठेवले होते. या काळात विविध गटांनी मिळून ४२ वेळा बंदचे आवाहन केले होते. निदर्शक व पोलिसात ज्या झडपा झाल्यात त्यात ७ नागरिकांनी आपला जीव गमावला तर १०३ नागरिक जखमी झालेत. पोलीस आणि सुरक्षादलाचे ३५ जवान या काळात जमावाच्या दगडफेकीत जखमी झाले होते.या काळात घडलेल्या लहानमोठ्या ६००च्या वर घटनांच्या आधारे विविध पोलीसठाण्यात अडीचशेच्या वर एफ आय आर नोंदविल्या गेलेत. नुकतीच सत्ता हाती घेतलेल्या ओमर अब्दुल्ला सरकारपुढे या घटनेने मोठे आव्हान उभे केले होते. 

                                                                  (क्रमशः)

---------------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि. यवतमाळ 
मोबाईल - ९४२२१६८१५८ 

 




Thursday, December 7, 2023

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - ८३

 अमरनाथ जमीन हस्तांतरण  विवादाने जम्मू आणि काश्मीर हे दोन्ही भाग अशांत झाले असतांना राज्यात निवडणूक घेण्याचा धाडसी निर्णय केंद्रातील मनमोहनसिंग सरकारने घेतला. परिस्थिती सुरळीत करण्याचा एक मार्ग स्थानिक नेतृत्वाच्या हाती सत्ता सोपविण्याचा होता. तोच मार्ग मनमोहनसिंग सरकारने स्वीकारला. 
----------------------------------------------------------------------------------


२००८च्या जमीन विवादातून मार्ग काढण्यासाठी स्वत: पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी काश्मीरला ६ ऑक्टोबर २००८ साली भेट दिली होती. दिल्लीत बसून काश्मीरचे राजकारण आणि प्रश्न हाताळण्याचा शिरस्ता मनमोहनसिंग यांनी मोडीत काढला होता. तिथल्या जनतेशी संवाद साधत पुढे जाण्याचा प्रयत्न मनमोहनसिंग यांनी केला. सुरक्षा दलाच्या कारवाईने सर्वसामान्य जनतेला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो याबद्दल त्यांनी अनेकदा खेद प्रकट केला पण कारवाईची अपरिहार्यताही पटवून देण्याचा प्रयत्न करीत असत. जमीन विवादातून उफाळलेल्या हिंसाचारामुळे अनेक ठिकाणी कर्फ्यू लावणे भाग पडल्याचे त्यांनी या श्रीनगर भेटीत जनतेला उद्देशून बोलताना सांगितले.जीवितहानी व वित्तहानी रोखण्यासाठी कर्फ्यू लावणे भाग असल्याचे त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले. राज्यपाल व्होरा आणि जम्मू-काश्मिरातील स्वयंसेवी संघटनांच्या प्रयत्नाने पुढे जमीन विवाद निवळला पण या विवादाने गुलाम नबी आझाद यांच्या सरकारचा बळी गेला. मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी जम्मू व काश्मीर या दोन विभागातील तणाव दूर करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. विकासकामांना त्यांनी गती दिली होती. या काळात सैन्य देखील बराकीत गेले होते. सुरक्षादलाच्या अनेक ठिकाणच्या चेकपोस्ट काढून टाकण्यात आल्याने या चेकपोस्टचा दैनदिन होणारा त्रास कमी झाला होता. या सगळ्या सकारात्मक घडामोडींवर अमरनाथ जमीन हस्तांतर विवादाचा विपरीत परिणाम झाला. जम्मू आणि काश्मीर या दोन विभागातील तेढ या विवादामुळे वाढली. गुलाम नबी आझाद सरकारचा पाठींबा मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या पिपल्स डेमोक्रॅटिक पार्टीने काढून घेतला तेव्हा विधानसभेची मुदत संपायला २-३ महिन्याचाच अवधी होता. अमरनाथ जमीन विवादाने जम्मू आणि काश्मीर हे दोन्ही भाग अशांत झाले असतांना राज्यात निवडणूक घेण्याचा धाडसी निर्णय केंद्रातील मनमोहनसिंग सरकारने घेतला. परिस्थिती सुरळीत करण्याचा एक मार्ग स्थानिक नेतृत्वाच्या हाती सत्ता सोपविण्याचा होता. तोच मार्ग मनमोहनसिंग सरकारने स्वीकारला. एरवी सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये होणार असलेल्या निवडणुका फार विलंब न करता नोव्हेंबर-डिसेंबर २००८ मध्ये घेण्याचे घोषित करण्यात आले. १७ नोव्हेंबर ते २४ डिसेंबर २००८ दरम्यान ७ टप्प्यात या निवडणुका पार पडल्या. 

या निवडणुकीचे पहिल्या दोन टप्प्याचे मतदान पार पडल्यानंतर २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत सर्वात मोठा आणि भयंकर असा दहशतवादी हल्ला झाला. लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेने पाकिस्तानी गुप्तचर संघटना आय एस आय च्या मदतीने हा हल्ला केला होता. जम्मू-काश्मीर राज्यात सुरळीतपणे सुरु असलेल्या निवडणुकात अडथळा निर्माण करणे हे या हल्ल्यामागे उद्दिष्ट होतेच शिवाय भारतात अस्थिरता निर्माण करण्याचा हेतूही हल्ल्यामागे होता. परंतु हा हल्ला झाल्यानंतरही जम्मू-काश्मीरमधील निवडणुका सुरळीत व नियोजित कार्यक्रमानुसार पार पडल्या. मुंबईतील दहशतवादी हल्ल्यानंतर या निवडणुकीत मतदान करण्यासाठी मतदार मोठ्या संख्येने बाहेर पडले. अमरनाथ जमीन हस्तांतरण विवादाने जम्मू आणि काश्मीर जवळपास महिनाभर पेटलेले असताना आणि बरेच दिवस कर्फ्यू मुळे प्रशासन व जनजीवन विस्कळीत झाल्याच्या पार्श्वभूमीवर झालेल्या विधानसभा निवडणुकीत सरासरी ६१ टक्के मतदान होणे हे मोठे यश होते. हुरियत सारख्या फुटीरतावादी गटाने निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे केलेले आवाहन झुगारून काश्मीरघाटीतील नागरिकांनी मतदान केले.                                                                                                           

या निवडणुकीला अमरनाथ विवादाची पार्श्वभूमी असल्याने धार्मिक धृविकरणाचा फायदा जम्मूत भारतीय जनता पक्षाला तर काश्मीरघाटीत सईद यांच्या पिपल्स डेमोक्रॅटिक पार्टीचा झाला. २००२च्य निवडणुकीत अवघी १ जागा जिंकणाऱ्या भाजपने या निवडणुकीत ११ जागी यश मिळविले होते. तर मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या पीडीपीने २००२च्य निवडणुकीत जिंकलेल्या १६ जागात २००८ साली ५ जागांची भर टाकली. अमरनाथ जमीन विवाद प्रकरणात या दोन पक्षांचा असा फायदा झाला. त्यांच्या  केवळ जागा वाढल्यात असे नाही तर मतदानाची टक्केवारीही वाढली. भाजपला आधीच्या निवडणुकीपेक्षा ४ टक्के मते अधिक मिळालीत तर पीडीपीला ६ टक्क्याच्या वर अधिक मते मिळालीत. अमरनाथ विवाद आणि निवडणुकी दरम्यान झालेला मुंबईतील दहशतवादी हल्ला याच्या परिणामी २००२च्या निवडणुकीच्या तुलनेत कॉंग्रेसच्या जागाही कमी झाल्यात व मतांची टक्केवारीही कमी झाली. कॉंग्रेसशी युती करण्याचा फटका नॅशनल कॉन्फरन्सलाही बसला. नॅशनल कॉन्फरन्सच्या जागांमध्ये घट झाली नाही पण त्या पक्षाची मतांची टक्केवारी मात्र घटली. २००२च्या जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सला २८  तर कॉंग्रेसला २० जागा मिळाल्या होत्या. २००८ च्या निवडणुकीतही नॅशनल कॉन्फरंसने मागच्या निवडणुकीपेक्षा ५ टक्के मते कमी मिळवूनही मागच्या इतक्याच म्हणजे २८ जागी यश मिळविले. कॉंग्रेसला मात्र पूर्वीच्या २० ऐवजी या निवडणुकीत १७ जागा मिळाल्या व मतांच्या टक्केवारीतही साडेपाच टक्क्यापेक्षा अधिकची घट झाली. तरीही अब्दुल्लांची नॅशनल कॉन्फरन्स व भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या युतीला या निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाले. या आधी राजीव गांधी पंतप्रधान असताना या दोन पक्षांनी युती करून विधानसभा निवडणूक लढविली होती. 

नॅशनल कॉन्फरंस - कॉंग्रेस युतीच्या सरकारचे मुख्यमंत्री म्हणून फारुख अब्दुल्ला यांचे पुत्र ओमर अब्दुल्ला यांनी शपथ घेतली. ते राज्याचे सर्वात तरुण मुख्यमंत्री ठरले. ते शिक्षण आणि बहुराष्ट्रीय कंपनीत काम करण्याच्या निमित्ताने बराच काळ काश्मीर बाहेर होते. राजकारणात आल्यावरही खासदार म्हणून दिल्लीत राहिले आणि अटलबिहारी यांच्या सरकारात परराष्ट्र राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम केले. तरुण आणि विचाराने आधुनिक असल्याने व मंत्रीपदाचा अनुभवही असल्याने प्रशासन चुस्त करून ते चांगले बदल घडवून आणतील अशी अपेक्षा निर्माण झाली होती. काश्मीरमध्ये स्थायी शांततेसाठी त्यांनी पाकिस्तान सोबतच काश्मिरातील विरोधक व फुटीरतावादी गट यांच्याशी चर्चा केली पाहिजे यासाठी आग्रह धरला. हुरियत किंवा जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंट सारखे गट आजवर राज्यसरकारशी चर्चा करायला तयार नव्हते. काश्मीर प्रश्नाचा संबंध केंद्र सरकारशी असून राज्य सरकारशी चर्चा व्यर्थ आहे असे त्यांचे मत होते. मात्र ओमर अब्दुल्ला मुख्यमंत्री झाल्यानंतर या गटांनी राज्य सरकारशी चर्चा करण्याची तयारी दर्शविली होती. पण अशी चर्चा होण्या आधीच एका घटनेने काश्मीर पुन्हा पेटले . शोपियन भागात २ तरुण महिलांच्या अपहरणाचा, बलात्काराचा व हत्येचा आरोप सुरक्षादलावर झाला. या आरोपांमुळे पुन्हा निदर्शने, बंद, कर्फ्यू व सुरक्षादलाच्या कारवाईचे सत्र सुरु झाले. फुटीरतावादी तत्वांना भारताविरुद्ध असंतोष निर्माण करण्यासाठी या आरोपाने निमीत्त मिळाले. २००८च्य जमीन हस्तांतरण विवाद घटनेनंतर या घटनेने काश्मीर मधील जनजीवन व प्रशासन पुन्हा विस्कळीत झाले.

                                                           (क्रमशः)

----------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव
पांढरकवडा जि.यवतमाळ
मोबाईल : ९४२२१६८१५८ .

Friday, December 1, 2023

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - ८२

 कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारने अमरनाथ न्यासाला जमीन हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला तेव्हा सरकारात सामील पीडीपीचा निर्णयाला पाठींबा होता. काश्मीरघाटीत निर्णयाविरोधात मोठी निदर्शने होवू लागल्यावर पीडीपीने सरकारचा पाठींबा काढून घेतला. अल्पमतात आल्याने मुख्यमंत्री  गुलाम नबी आझाद यांनी आपल्या सरकारचा राजीनामा राज्यपालाकडे सादर केला.
----------------------------------------------------------------------------------------
 

अमरनाथ यात्रा काश्मिरातील हिंदू-मुस्लीम सौहार्दाचे प्रतिक राहिली आहे. लाखोच्या संख्येने हिंदू श्रद्धाळू यात्रेसाठी येत असतात आणि आजूबाजूच्या खेड्यातील शेकडो मुस्लीम यात्रेकरूना सुविधा पुरवीत असतात. यातून यात्रेप्रसंगी मोठी आर्थिक उलाढाल होते व स्थानिकांना रोजगार उपलब्ध होतो. यात्रेकरूंच्या सोयींसाठी १०० एकर जमीन घेवून तिथे सुविधा उभारण्याचा सरकारचा निर्णय म्हणजे परंपरेने स्थानिक ज्या सुविधा देतात त्याची गरज उरणार नाही आणि यात्रे दरम्यान जो मोठ्याप्रमाणावर रोजगार उपलब्ध होतो तो बाहेरचे येवून हिरावतील असा समजही अमरनाथ न्यासाला जमीन देण्याच्या निर्णयाने पसरलेल्या असंतोषा मागे होता. काश्मिरात मुसलमानांना अल्पसंख्य बनविण्याचा प्रयत्न आणि काश्मिरी जनतेचा परंपरागत रोजगार हिरावून घेण्याचा प्रयत्न असा या निर्णयाचा अर्थ लावल्याने निर्माण झालेल्या असंतोषाचे रुपांतर निर्णया विरुद्ध उग्र आंदोलनात झाले. बंद, निदर्शने आणि त्याविरोधात सुरक्षादलाच्या कारवाईने काश्मीर ढवळून निघाले. काही ठिकाणी निदर्शनांनी हिंसक वळण घेतले. निर्णयाचा विरोध करण्यासाठी श्रीनगरमध्ये ५ लाख काश्मिरी नागरिक जमले होते. काश्मिरातील हे सर्वात मोठे जनप्रदर्शन होते. श्रीनगर मध्ये सुरक्षादलाच्या गोळीबारात सहा निदर्शकांचा मृत्यू झाला. अनेक ठिकाणी कर्फ्यू लावावा लागला. निर्णयाविरुद्ध बंद आणि निदर्शनाचे आवाहन करणाऱ्या हुरियत कॉन्फरन्सच्या दोन्ही गटाच्या नेत्यांना घरीच स्थानबद्ध करण्यात आले होते. निर्णयाविरुद्ध तीव्र नाराजी लक्षात घेवून सरकारचा भाग असलेल्या मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीने सरकारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. अमरनाथ न्यासाला जमीन हस्तांतरित करण्याचा निर्णय न्यासाचे पदसिद्ध अध्यक्ष असलेल्या राज्यपालाने पदाची मुदत संपता संपता घेतला होता आणि त्याला गुलामनबी आझाद सरकारने मान्यता दिली होती. या निर्णयावर पीडीपीच्या वनमंत्री व कायदामंत्र्याने सही देखील केली होती. तरी या मुद्द्यावर सरकारातून बाहेर पडण्याचा पीडीपीने निर्णय घेतला होता. पीडीपीच्या निर्णयानंतर राज्यसरकारने जमीन हस्तांतरणाचा निर्णय रद्द केला . तरीही पीडीपीने सरकारचा पाठींबा काढून घेण्याचा निर्णय कायम ठेवला. २६ मे २००८ रोजी घेतलेल्या जमीन हस्तांतराच्या निर्णयाने जम्मू-काश्मिरातील कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकार पीडीपीच्या निर्णयाने अल्पमतात आले आणि मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी आपल्या सरकारचा राजीनामा ७ जुलै २००८ रोजी राज्यपालाकडे दिला. ११ जुलैला राज्यात काश्मीरच्या राज्यघटनेनुसार राज्यपाल राजवट लागू करण्यात आली. दरम्यान राज्यपाल एस.के. सिन्हा यांच्या जागी एन.एन.व्होरा यांची नियुक्ती झाली होती. 

अमरनाथ न्यासाला जमीन हस्तांतरित करण्याच्या निर्णयाला काश्मीरघाटीत विरोध वाढायला लागला तसा राज्याची हिवाळी राजधानी असलेल्या हिंदुबहुल जम्मूत लोक जमीन हस्तांतराच्या निर्णयाच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरायला लागले होते. जम्मू-काश्मीर सरकारचा भाग असलेल्या पीडीपीने निर्णया विरुद्ध भूमिका घेतल्याने जम्मूतील जनतेचा राग पीडीपीवर निघाला. जम्मूतील पीडीपीच्या कार्यालयावर हिंसक जमावाने हल्ला केला होता. जम्मूतील मुसलमानांच्या मुस्लीम फेडरेशनचा व गुज्जर समाजाचा जमीन हस्तांतरणाला पाठींबा होता. तरीही जम्मूतील आंदोलकांनी त्यांच्या वस्तीत जाळपोळ केली होती. जमीन हस्तांतरणाचा निर्णय रद्द होताच जम्मूत असंतोष उफाळून आला. निर्णय रद्द केल्याने काश्मीर हळू हळू शांत होवू लागले होते पण जम्मूत मात्र निदर्शनांनी जोर पकडला होता. जम्मूतील अमरनाथ संघर्ष समितीने काश्मीरला जाणारा हाय वे अडथळे उभारून बंद करण्याचा निर्णय घेतला. हाय वे वर अडथळे उभे करणाऱ्या जम्मूतील निदर्शकांविरुद्ध सुरक्षादलाच्या कारवाईत तिघांचा मृत्यू झाला तर अनेक जखमी झाले होते. काश्मीरघाटीला रसद पुरविणारा हा एकमेव मार्ग असल्याने जम्मूतील आंदोलकांनी उभारलेल्या अडथळ्यांमुळे वाहतुकीवर विपरीत परिणाम झाला. परिणामी काश्मीरघाटीत जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कमी होवून टंचाई निर्माण झाली.                                                                   

जमीन हस्तांतरण रद्द झाल्याने शांत होत चाललेली काश्मीरघाटी हाय वे वरील अडथळ्याने अस्वस्थ झाली. हाय वे वरून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होणार नसेल तर आम्ही नियंत्रण रेषा पार करून पाकव्याप्त काश्मीरमधून वस्तूंची खरेदी करू अशी भूमिका काश्मिरातील संघटनांनी घेतली. दुसरीकडे फळ विक्री थांबल्याने काश्मीर मधील बागायतदार व व्यापारी यांनी विक्रीसाठी भारताच्या इतर भागात फळे जावू दिली नाही तर नियंत्रण रेषेवरून व वाघा सीमेवरून फळे विक्रीसाठी पाकिस्तानात पाठवण्याची घोषणा केली. याचा फायदा घेत हुरियतने व इतर संघटनांनी नियंत्रण रेषा ओलांडून पाकव्याप्त काश्मीरातील मुजफ्फराबाद पर्यंत मार्च काढण्याची घोषणा केली. सरकारने कर्फ्यू लावला तरी ११ ऑगस्ट २००८ रोजी हजारोच्या संख्येने काश्मिरी निदर्शक नियंत्रण रेषा ओलांडण्यासाठी जमा झाले होते.यांना पांगविण्यासाठी पोलीस आणि निमलष्करी दलाने गोळीबार केला. या गोळीबारात १५ ठार आणि शंभरच्या वर जखमी झालेत. ठार झालेल्यात हुरियत कॉन्फरन्सच्या मवाळ गटाचा नेता शेख अब्दुल अझीझ याचा समावेश होता. जमावाच्या दगडफेकीत पोलीस व निमलष्करी जवानही जखमी झाले. हुरियत नेता शेख अब्दुल अझीझ यांचा गोळीबारात मृत्यू झाल्याने त्या विरोधात अनेक ठिकाणी निदर्शने झाली. १२ ऑगस्ट या एकाच दिवशी निदर्शकांना पांगविण्यासाठी गोळीबाराच्या १२ घटना घडल्या.श्रीनगर आणि परिसरात १० निदर्शकांचा मृत्यू झाला यात दोन महिलांचा समावेश होता. तर परीबल येथे झालेल्या गोळीबारात तीन निदर्शाकाचा मृत्यू झाला ज्यात एका महिलेचा समावेश होता. अनंतनाग मध्ये एक आणि किश्तवार मध्ये दोन निदर्शकाचा मृत्यू झाला यातील एकाचे वय १२ वर्ष होते.                                                                           

जम्मूमध्ये १४ ऑगस्ट रोजी बलवंत शर्मा यांनी आपली सर्व संपत्ती अमरनाथ न्यासाला दान करून आत्महत्या केल्याने जम्मूतील तणावही वाढला. २० ऑगस्ट रोजी जम्मूत मोठे निदर्शन झाले ज्यात दोन लाख लोक सहभागी झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. निदर्शकात महिला व मुलांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. जम्मूतील निदर्शने हिंसक न बनल्याने गोळीबाराचा प्रसंग उद्भवला नाही.  आधीच जम्मू आणि काश्मीर या दोन विभागात असलेला तणाव जमीन हाय वे माल वाहतुकीसाठी बंद करण्याचा प्रयत्न झाल्याने कित्येक पटीने वाढला. मात्र श्रीनगरला जाणाऱ्या हाय वे वर असे अडथळे नसल्याचे व वाहतूक सुरु असल्याचा दावा केंद्र सरकारने केला. भारतीय जनता पक्षानेही त्याची री ओढली. हुरियत व काश्मीरघाटीतील विभाजनवादी गट असा अपप्रचार करून लोकांना चिथावत असल्याचे आणि पाकिस्तानची गुप्तचर संस्था आगीत तेल ओतत असल्याचा दावा करण्यात आला. नवनियुक्त राज्यपाल यांनी परिस्थिती सुरळीत होण्यासाठी आणि जम्मू आणि काश्मीर यांच्यातील वैर कमी करण्यासाठी दोन्ही भागात अनेक बैठका घेतल्या. जम्मू आणि काश्मीर मधील अनेक स्वयंसेवी संस्थांनी व संघटनांनी परिस्थिती सुरळीत करण्यासाठी राज्यपाल व्होरा यांची साथ दिली.जमीन हस्तांतरणाने निर्माण झालेल्या परिस्थितीवर पंतप्रधान मनमोहनसिंग लक्ष ठेवून होते.  नवी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलावून त्यांनी जम्मू-काश्मिरात उद्भवलेल्या परिस्थितीची माहिती देवून काय तोडगा काढता येईल याची चर्चा केली. सर्व पक्षांना विश्वासात घेवून त्यांच्याशी चर्चा केल्याने या पेचप्रसंगात सर्व पक्षांची मदत घेण्यात मनमोहनसिंग यांना यश आले. मनमोहनसिंग यांच्या प्रयत्नामुळे सर्वपक्षीय शिष्टमंडळाने जम्मू व श्रीनगरला भेट देवून लोकांशी बोलणीही केली. सर्वपक्षीय शिष्टमंडळाला शांतता प्रस्थापित करण्यात यश आले नसले तरी राष्ट्रीय प्रश्नावर सर्वाना सोबत घेवून चालण्याची मनमोहन नीती या निमित्ताने अधोरेखित झाली. 

                                                                   (क्रमशः)

-----------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि. यवतमाळ 
मोबाईल : ९४२२१६८१५८