Thursday, January 25, 2024

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - ८९

 भाजपला प्रथमच जम्मू-काश्मीर राज्य सरकारात सामील होण्याची संधी मिळाली होती ती या पक्षाला सोडायची नव्हती. तर पीडीपीचे सर्वेसर्वा मुफ्ती मोहम्मद सईद यांना टप्प्यात आलेले मुख्यमंत्रीपद हातचे जावू द्यायचे नव्हते. त्यामुळे जम्मू-काश्मीरची सध्याची घटनात्मक स्थितीत कोणताही बदल न करण्याचा सोपा मार्ग सरकार बनविण्यासाठी दोन्ही पक्षांनी निवडला.
-----------------------------------------------------------------------------


जम्मू-काश्मीर विधानसभेच्या निवडणुकीत सगळेच पक्ष बहुमतापासून दूर असल्याने सरकार बनविणे मोठे आव्हानात्मक काम होते. जास्त जागा मिळविणारे क्रमांक एक, दोन आणि तीन या स्थानावर असलेले पक्ष होते जम्मू-काश्मीर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी, भारतीय जनता पक्ष आणि नॅशनल कॉन्फरंस. पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी आणि नॅशनल कॉन्फरंस हे पक्ष जमू-काश्मीरच्या राजकारणात एकमेकांचे हाडवैरी तर काश्मीरच्या स्वायत्ततेच्या मुद्द्यावर भाजप हा दोन्ही पक्षाचा शत्रू. चौथ्या क्रमांकाच्या जागा मिळविलेल्या कॉंग्रेस पक्षाने यापूर्वी पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरंस सोबत सरकार बनविले होते. पीडीपी, नॅशनल कॉन्फरंस व कॉंग्रेस अशी युती झाली असती तर सरकार बनवता आले असते. नॅशनल कॉन्फरंसने पीडीपी पुढे युतीचा प्रस्ताव ठेवलाही होता. पण पीडीपीने तो फेटाळला. त्या आधी नॅशनल कॉन्फरंसने भाजप सोबत युती करण्याची तयारी दाखविली होती. या प्रस्तावाला नॅशनल कॉन्फरंस मधून विरोध झाला. पक्षात बंड होते की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. शेवटी भाजपनेच अशी युती नैतिकदृष्ट्या योग्य होणार नाही असे म्हणत नॅशनल कॉन्फरंस सोबत युती करायला नकार दिला. त्यामुळे सरकार बनविण्याची एकच शक्यता उरली होती आणि ती म्हणजे पीडीपी-भाजप युतीचे सरकार. अशा युतीची शक्यता भाजपने नाकारली नाही आणि नैतिकतेचा प्रश्नही उपस्थित केला नाही. निवडणूक निकालानंतर पीडीपीचे मुफ्ती मोहम्मद सईद यांनी निवडणुकीतील वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीसाठी हुरियत आणि पाकिस्तानला श्रेय दिले होते. हुरियत व पाकिस्तानने हिंसाचाराला प्रोत्साहन न दिल्याने लोकांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी होता आले असे त्यांचे म्हणणे होते. वास्तविक पाकिस्तानने निवडणुकांना विरोध केला होता आणि हुरियतने तर निवडणुकावर बहिष्कार टाकण्याचे जाहीर आवाहन केले होते. तरीही हुरियत समर्थकांनी पीडीपीला मतदान केल्याचा नॅशनल कॉन्फरंसचा आरोप होता. मुफ्ती मोहम्मद सईद यांची हुरियत बद्दलची मऊ भूमिका त्यातून आल्याची चर्चा होती. एक मात्र खरे की मनमोहन काळात तरुणांनी ज्या भागात मोठ्या संख्येने रस्त्यावर येवून दगड हाती घेतले होते त्या भागात पीडीपीला मोठे समर्थन लाभले व त्यामुळेच पीडीपी नंबर एकचा पक्ष म्हणून समोर आला. सरकार बनविण्यासाठी या सगळ्या बाबींकडे भारतीय जनता पक्षाच्या जम्मूतील व दिल्लीतील नेतृत्वाने दुर्लक्ष केले व पीडीपी सोबत सरकार बनविण्यासाठी चाचपणी व चर्चा सुरु केली.                                       

सरकार बनविण्यात मुख्य अडसर होता तो कलम ३७० बद्दलच्या परस्पर विरोधी भूमिकेचा. दुसरी अडचण होती ती सशस्त्र दल विशेष अधिकार कायद्याची. जम्मू-काश्मीर मधून हा कायदा हटवावा अशी पीडीपीची मागणी होती तर भाजपचा त्याला विरोध होता. पण भाजपला प्रथमच जम्मू-काश्मीर राज्य सरकारात सामील होण्याची संधी मिळाली होती ती या पक्षाला सोडायची नव्हती. तर पीडीपीचे सर्वेसर्वा मुफ्ती मोहम्मद सईद यांना टप्प्यात आलेले मुख्यमंत्रीपद हातचे जावू द्यायचे नव्हते. त्यामुळे जम्मू-काश्मीरची सध्याची घटनात्मक स्थितीत कोणताही बदल न करण्याचा सोपा मार्ग सरकार बनविण्यासाठी दोन्ही पक्षांनी निवडला.. नॅशनल कॉन्फरंस व पीडीपी हे जम्मू-काश्मीर मधील दोन्ही प्रमुख पक्ष भाजप सोबत सरकार बनवायला तयार असण्याचे एक कारण होते जम्मू-काश्मीर मधील हुरियत कॉन्फरन्स सारख्या फुटीरतावाद्यांची पसंत कॉंग्रेस पेक्षा भाजप होती. नेहरूंमुळे काश्मीर भारतात राहिले आणि कॉंग्रेसने एकेक करत जवळपास राज्यघटनेची सगळीच कलमे लागू करून काश्मीरच्या स्वायत्ततेवर आघात केला हे जसे कॉंग्रेस नापसंत असण्याचे कारण होते तसे दुसरे कारण काश्मीर प्रश्न सोडवायची हिम्मत कॉंग्रेस पेक्षा भाजपा मध्ये अधिक असल्याची धारणा काश्मीरमध्ये तयार झाली होती. विशेषत: संविधान बाजूला ठेवून ,इंसानियात,जम्हुरीयत व काश्मिरीयत' या आधारे काश्मीर प्रश्न सोडविण्याची अटलबिहारी वाजपेयी यांची घोषणा काश्मिरी जनतेला भावली होती. नरेंद्र मोदी यांनी निवडणूक प्रचारात आणि पंतप्रधान झाल्यावरही अटलबिहारी वाजपेयी यांच्या घोषणेच्या आधारेच काश्मीर प्रश्नावर तोडगा काढण्यात येईल याचा पुनरुच्चार केल्याने केंद्रात भाजपचे सरकार आल्याचे काश्मिरात स्वागतच झाले होते. भाजपशी हातमिळवणी केली तर काश्मिरी जनता आपल्या विरोधात जाईल ही भीती पीडीपी किंवा नॅशनल कॉन्फरंस या दोन्ही पक्षांना सुरुवातीला तरी नव्हती. पीडीपीचे मुफ्ती मोहम्मद सईद यांची भूमिका काश्मीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी हुरियत आणि पाकिस्तानशी चर्चा अपरिहार्य असल्याची होती. त्यामुळे पीडीपी-बीजेपी युतीची घोषणा झाली तेव्हा त्याचे काश्मिरात स्वागतच झाले. ही घोषणा होण्याची निवडणुकीनंतर दोन महिने वाट बघावी लागली. निवडणुकाचे निकाल २३ डिसेंबर २०१५ला जाहीर झालेत आणि पीडीपी-बीजेपी युतीची घोषणा २४ फेब्रवारी २०१५ला करण्यात आली. या दोन महिन्यात पीडीपी व बीजेपी दरम्यान चर्चेच्या अनेक फेऱ्या होवून संयुक्त सरकारचा 'किमान समान कार्यक्रम' तयार करण्यात आला. 'आघाडीची कार्यसूची'(अजेंडा ऑफ अलायन्स) असे त्याला नांव देण्यात आले. 


जम्मू-काश्मीर आणि उर्वरित भारतात सामंजस्य निर्माण करण्यासाठी आघाडी असल्याची घोषणा दोन्ही पक्षांनी केली. स्थिर आणि प्रातिनिधिक सरकार देण्यासाठी ही आघाडी होत असल्याचा दावा करण्यात आला. या दाव्यात मात्र तथ्य होते. आजवरच्या सरकारात काश्मीरघाटीचेच प्राबल्य राहात आले होते आणि त्यामुळे सतत आपल्याकडे दुर्लक्ष झाल्याची जम्मूतील भावना होती. प्रथमच जम्मूला सरकारात बरोबरीचा वाटा मिळण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. प्रांताच्या सर्व विभागाचा समतोल विकास करण्याचे आणि भ्रष्टाचार मुक्त पारदर्शी सरकार देण्याचे आश्वासन देण्यात आले. आजवरची सरकारे सर्वाधिक भ्रष्ट् होती असे म्हणताना स्वत: मुफ्ती मोहम्मद सईद अटलबिहारी राजवटीत जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री होते याचा त्यांना विसर पडला की काय असे वाटण्यासारखा हा दावा होता ! व्यवसायाला आणि खाजगी क्षेत्राला विकासात सहभागी करून घेण्यासाठी या आघाडीने आपली प्रतिबद्धता जाहीर केली होती. वीज निर्मिती, कृषी आणि फळबागांच्या विकासासाठी,शिक्षण आणि पर्यटन अशा सगळ्या क्षेत्रांच्या  राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील आर्थिक सहकार्याने विकास साधण्याची घोषणा करण्यात आली. राज्य कारभारातील पारदर्शकता टिकून राहण्यासाठी राज्यकारभारावर लक्ष ठेवणाऱ्या संस्थांची स्वायत्तता टिकवून त्यांना मजबूत करण्याचे आश्वासन देण्यात आले. सतर्कता आयोगाचे नामकरण पारदर्शकता आयोग करण्याचे जाहीर करण्यात आले. माहिती अधिकार संस्था अधिक बळकट करण्याचे वचन देण्यात आले. राज्यातील काही जमातींना अनुसूचित जमातीचा दर्जा देणे व पंडितांच्या काश्मीर घाटीतील वापसीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करण्यासाठी सरकारची प्रतिबद्धता राहील असे जाहीर करण्यात आले. या सगळ्या मुद्द्यांवर मतभेद होण्याचे कारण नव्हते. मतभेदाचे मुद्दे आघाडी करताना दोन्ही पक्षांनी कसे हाताळले आणि कोणी काय रेटले कोणी काय सोडले हे पाहणे जास्त औत्सुक्यपूर्ण आहे.

                                               (क्रमशः)

---------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि.यवतमाळ 
मोबाईल : ९४२२१६८१५८ 


Thursday, January 18, 2024

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - ८८

केंद्रात सत्तेत आल्या नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक प्रचारात आपण अटलबिहारी वाजपेयी यांनी काश्मीर प्रश्न सोडविण्यासाठी सुचविलेल्या मार्गावरून जाण्यासाठी बांधील असल्याचे जम्मू-काश्मीर मधील जनतेला सांगितले. इन्सानियत, जम्हुरीयत व काश्मिरियत हा अटलबिहारी वाजपेयी यांनी सुचविलेला मार्ग होता.
---------------------------------------------------------------------------------


२०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने मिळविलेल्या मोठ्या विजयाने देशाचे राजकारण बदलले तसे जम्मू-काश्मीरच्या राजकारणालाही कलाटणी मिळाली. नरेंद्र मोदी यांची प्रारंभीची भूमिका बरीच सावध होती. पक्षाच्या जाहीरनाम्यातील नेहमीची तीन वचने २०१४ च्या निवडणूक जाहीरनाम्यात टाकणे टाळावे असे त्यांचे मत होते. कलम ३७० , समान नागरी कायदा आणि राम मंदीर या संबंधीची ती वचने असायची. मुरली मनोहर जोशी सारख्या ज्येष्ठ नेत्याला ते मान्य नसल्याने २०१४च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी भाजपचा जाहीरनामा यायला विलंब झाला होता. त्या तीन कलमांच्या समावेशानंतरच तो जाहीरनामा निवडणुकीच्या पहिल्या फेजचे मतदान सुरु झाले त्या दिवशी उशिरा बाहेर आला. तसा मोदींनी निवडणूक प्रचार निवडणुका जाहीर होण्याच्या बऱ्याच आधी सुरु केला होता. नोव्हेंबर २०१३ च्या शेवटी २०१४च्या निवडणूक प्रचाराचा भाग म्हणून त्यांनी जम्मूत पार्टीच्या ललकार सभेला संबोधित केले होते. त्या सभेत त्यांनी जम्मू-काश्मीर बाबत पक्षाचीच भूमिका मांडली पण सत्तेत आल्यावर कलम ३७० रद्द केले जाईल हे बोलायचे त्यांनी टाळले. त्याऐवजी त्यांनी कलम ३७० मुळे जम्मू-काश्मीरच्या जनतेचे कितपत भले झाले याची चर्चा तर करा असे आग्रहाने मांडले. ही चर्चाच होत नसल्याबद्दल व होवू दिल्या जात नसल्याबद्दल त्यांनी सभेत नाराजी व्यक्त केली. कलम रद्द झाले पाहिजे अशी मागणी न करताही त्यांनी या कलमाचे दुष्परिणाम बोलून दाखविले. भारतातील अनुसूचित जाती व जमाती आणि भटक्यांना जे अधिकार मिळतात त्यापासून जम्मू-काश्मीरची ही जमात वंचित असल्याचा मुख्य मुद्दा त्यांनी मांडला. पुरुषांना जे अधिकार आहेत ते सर्व अधिकार स्त्रियांना मिळत नसल्याच्या मुद्द्यावरही त्यांनी जोर दिला. जम्मू-काश्मीर मधील मुलीनी राज्याबाहेरच्या नागरिकाशी लग्न केले तर त्यांना संपत्तीचा अधिकार मिळत नसल्या बद्दलचे हे वक्तव्य होते. कलम ३७० च्या मुद्द्यावर संविधान तज्ञांनी विचार व चर्चा केली पाहिजे ही त्यांनी मागणी केली मात्र राजकीय अंगाने या कलमाची चर्चा करण्याचे त्यांनी टाळले होते. बाकी त्यांचे भाषण काश्मीर घाटीला अलग पाडून लडाख व जम्मूतील नागरिकांच्या काश्मीर घाटीतील राज्यकर्त्यांच्या नाराजीला हवा देणारे होते. शिया-सुन्नी वादाला हवा देणारेही होते.                                                                                                                                   

लडाख आणि जम्मूतील नागरिकांच्या बाबतीत घाटीतील राजकीय नेतृत्व भेदभाव करते असे सरळ त्यांना मांडता आले असते. पण तसे न करता लडाख मधील शिया नागरिक विकासापासून वंचित आहेत असे त्यांनी मांडले. जम्मूतील बाकरवाल व गुर्जर समुदायावर अन्याय होत असल्याचे मांडले. जम्मूतील हिंदुना खुश करण्यासाठी राजा हरिसिंग निर्णय प्रक्रियेत सामील असते तर असे घडले नसते हे सांगायला ते विसरले नाहीत. जम्मू-काश्मीरच्या आपल्या पहिल्याच प्रचारसभेत त्यांनी काश्मीर घाटीतील मुस्लीम नेतृत्वाविरुद्ध अशी मोर्चे बांधणी केली होती. आपण हिंदू-मुसलमान करायला इथे आलो नाही म्हणत त्यांनी अशी मोर्चेबांधणी केली. याच सभेत त्यांनी अटलबिहारी वाजपेयींच्या काश्मीरप्रश्न सोडविण्यासाठी सांगितलेल्या त्रिसूत्रीचा उल्लेख केला. अटलबिहारी बद्दल काश्मिरी जनतेत आदर आहे कारण ते सत्तेत येण्यापूर्वी १४ वर्षे काश्मीरमध्ये येण्याचे धाडस कोणत्याही पंतप्रधानाने केले नव्हते. अर्थात ही माहिती चुकीची होती. अटलबिहारी पूर्वी सत्तेत आलेले देवेगौडा आणि इंद्रकुमार गुजराल या दोन्ही पंतप्रधानांनी जम्मू-काश्मीरला भेट दिली होती. जम्मू-काश्मीरच्या जनतेला अटलबिहारी वाजपेयी यांच्या बद्दल वाटणारा आदर त्यांनी दिलेल्या त्रिसूत्री मुळे होता. संविधानाच्या चौकटी बाहेर इन्सानियत,जम्हुरीयत व काश्मिरियत याच्या आधारे काश्मीर प्रश्न सोडविण्याचे वचन वाजपेयींनी दिले होते. आपण वाजपेयींच्या या त्रिसूत्रीच्या आधारेच पुढे जावू असे आश्वासन त्यांनी या सभेत जम्मू-काश्मीरच्या जनतेला दिले. हे आश्वासन दिले तेव्हा केंद्रातील सत्ता हाती येईल की नाही याबद्दल खात्रीलायक सांगण्यासारखी स्थिती नव्हती. या निवडणुकीत ते केवळ सत्तेत आले नाहीत तर पूर्ण बहुमताने सत्तेत आले. त्यानंतर हळू हळू त्यांची वाटचाल पक्षाच्या काश्मीर संबंधीच्या मूळ भूमिकेकडे होवू लागली. मूळ भुमिके पर्यंत जायला त्यांना पाच वर्षे लागली.


पंतप्रधानपदी आरूढ झाल्यानंतर दोन महिन्यांनी त्यांचा जम्मू-काश्मीरचा पहिला दौरा झाला. जुलै २०१४ मध्ये झालेला हा दौरा प्रामुख्याने मनमोहन काळात तयार झालेल्या दोन प्रकल्पाच्या उदघाटनासाठी होता. कटरा उधमपूर मार्गे दिल्लीला रेल्वेने जोडल्या गेले त्याचे उदघाटन मोदी यांनी केले. वैष्णोदेवीला जाण्यासाठी रेल्वेने कटरा पर्यंत जाण्याची यामुळे सोय झाली. जम्मू-काश्मीर उर्वरित देशाशी रेल्वेने जोडण्याचा ११५० कोटीचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे ज्याचे बरेचसे काम मनमोहनसिंग प्रधानमंत्री असताना झाले. उरी येथील जलविद्युत प्रकल्पाचा दुसरा टप्पाही मनमोहन काळात पूर्ण झाला होता याचेही उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दौऱ्यात केले. या दौऱ्याच्या वेळी श्रीनगरमध्ये मोदींच्या स्वागताची मोठमोठी होर्डींग्स लावण्यात आली मात्र या दौऱ्यावेळी श्रीनगरमध्ये 'बंद'ने मोदींचे स्वागत झाले होते. ४ महिन्यानंतर जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणूक प्रचारासाठी मोदींनी जम्मू आणि श्रीनगर मध्ये सभा घेतल्या. जम्मुसारखा प्रतिसाद त्यांना काश्मीरमध्ये मिळाला नाही. काश्मीर प्रश्न सोडविण्यासाठी अटलबिहारी वाजपेयी यांनी सांगितलेल्या इंसानियत,जम्हुरीयत आणि काश्मिरियत या त्रिसुत्रीशी आपण बांधील असल्याचा पुनरुच्चार मोदींनी निवडणूक प्रचारसभेत केला. या प्रचारातील धक्कादायक बाब म्हणजे पंतप्रधान मोदींनी श्रीनगर येथील प्रचारसभेतील भाषण संपविताना भारत माता की जय आणि वंदेमातरम् या घोषणा देणे टाळले. काश्मीर घाटीत भाजपचे खाते उघडावे म्हणून या घोषणा त्यांनी देणे टाळल्याचे मानले जाते. तरीही भाजपला काश्मीर घाटीत विधानसभा निवडणुकीत खाते उघडता आले नाही. विधानसभा निवडणुकीत भाजपला लडाख मध्येही खाते उघडता आले नाही. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत तयार झालेली मोदी लाट विधानसभा निवडणुकीत  जम्मू विभागा पुरती मर्यादित राहिली. जम्मूत भाजपला मोठे यश मिळाले. जम्मू विभागातील ३७ पैकी २५ जागा मिळवून भाजप जम्मू-काश्मीर राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनला. २००८च्या विधानसभा निवडणुकीत या पक्षाला जम्मू विभागात ११ जागा मिळाल्या होत्या. त्यात या निवडणुकीने १४ जागांची भर घातली. असे असले तरी ७-८ महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने जम्मू-काश्मीर मध्ये ३२ टक्के मते मिळविली होती. विधानसभा निवडणुकीत यात ९ टक्क्याने घट झाली.या निवडणुकीत सर्वात मोठा फटका अब्दुल्लांच्या नॅशनल कॉन्फरन्सला बसला. आधीच्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत पक्षाच्या जागा आणि मतदानाची टक्केवारी या दोहोतही घट झाली. मागच्या निवडणुकीत कॉंग्रेस बरोबर युतीत २८ जागा मिळवून सत्तेत आलेल्या या पक्षाला या निवडणुकीत अवघ्या १५ जागा मिळाल्या. मताच्या टक्केवारीत २ टक्क्यापेक्षा थोडी अधिक घट झाली. जागा मात्र १३ ने घटल्या. कॉंग्रेसने युती न करता स्वतंत्रपणे निवडणूक लढवून १२ जागा मिळविल्या. कॉंग्रेसची मागच्या निवडणुकीपेक्षा अर्ध्या टक्क्याने मते वाढली पण जागात मात्र ५ ने घट झाली.या निवडणुकीत २००८ मधील निवडणुकीपेक्षा साडेसात टक्के अधिक मते आणि ७ जागा अधिक जिंकून मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या पीडीपीने सर्वाधिक जागा जिंकण्याचा मान मिळविला. पीडीपीला २८ जागा मिळाल्या. स्वबळावर सरकार बनविण्याच्या स्थितीत कोणताच पक्ष नव्हता. निवडणुकी नंतर युती करून सरकार बनविण्यात विलंब होवू लागल्याने काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्यात आली.

                                                                  (क्रमशः)

--------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि. यवतमाळ 
मोबाईल - ९४२२१६८१५८ 

Thursday, January 11, 2024

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - ८७

 पंडितांचा काश्मीर मध्ये परतण्याचा व्यावहारिक मार्ग म्हणून पंडीत समुदायातील तरुणांना काश्मीर खोऱ्यात सरकारी नोकऱ्यात सामावून घेण्याची योजना मनमोहनसिंग यांनी तयार केली. या अंतर्गत पंडीत समुदायाच्या ६००० तरुणांना काश्मीर खोऱ्यात नोकऱ्या देण्याचा निर्णय घेण्यात आला. जे तरुण काश्मीरमध्ये नोकरीसाठी येतील त्यांच्या राहण्यासाठी तात्पुरत्या निवासाची सोय राज्य सरकारने केली. ठराविक काळानंतर तिथे राहणाऱ्या व्यक्तीने दुसरीकडे घर बांधून आपल्या कुटुंबियासह राहणे अपेक्षित होते.  पंडितांच्या काश्मीरमधील वापसीचा हा व्यावहारिक मार्ग मनमोहनसिंग यांनी आखला होता.
-------------------------------------------------------------------------------


काश्मीरच्या बाबतीत समग्र धोरण, धोरणातील सातत्य आणि सतत पाठपुरावा हे मनमोहनसिंग यांच्या कारकिर्दीतील काश्मीर धोरणाचे वैशिष्ट्य होते. त्यांनी नवा काश्मीर निर्माण करण्याची घोषणाच केली नाही तर त्यासाठी झपाटल्यागत काम केले. प्रसिद्धीला फार महत्व न देता शांतपणे काम करण्याची त्यांची पद्धत असल्याने त्यांनी काय केले हे फारसे पुढे आले नाही. जो जो शब्द त्यांनी काश्मिरी जनतेला दिला त्या प्रत्येक बाबतीत काही ना काही काम झाल्याचे दिसून येते. काश्मीर प्रश्न सोडविण्याचे ओझे त्यांनी कधी आपल्या डोक्यावर घेतले नाही. सामंजस्याची परिस्थिती निर्माण झाल्या शिवाय प्रश्नाची गाठ सुटणार नाही ही त्यांची पक्की धारणा असल्याने सामंजस्य निर्माण करण्यावर त्यांचा भर राहिला. यासाठी त्यांनी अनेक स्तरावर काम केले. कायम शांततेसाठी काय करता येईल याची चाचपणी करण्यासाठी त्यांनी पाकिस्तानशी मुत्सद्दी पातळीवर प्रसिद्धीच्या झोतात न येणारी चर्चा चालू ठेवली. काश्मिरात जे जे गट शस्त्र खाली ठेवून चर्चा करायला तयार त्यांच्याशी त्यांनी चर्चा केली. हुरियत कॉन्फरन्सच्या दोन्ही गटाशी चर्चेची सतत तयारी ठेवली. हुरियत अटलबिहारी यांचे काळात सरकारशी चर्चा करायला जेवढे उत्सुक होते तेवढे मनमोहन सरकारशी चर्चा करायला उत्सुक नव्हते. तरीही मनमोहनसिंग यांनी सातत्याने त्यांना चर्चेसाठी आमंत्रित केले. काश्मिरातील दशकभराच्या दहशतवादी कारवायांनी होरपळलेल्या जनतेच्या समस्या जाणून घेवून त्यावर उपाययोजना करण्यावर त्यांनी भर दिला. ९० च्या दशकात काश्मिरी पंडितांना काश्मीर खोऱ्यातून बाहेर पडून ज्या परिस्थितीत राहावे लागले त्याची दखल त्यांनी घेतली. २००४ साली सत्तेत आल्यानंतर मनमोहनसिंग यांनी आपल्याच देशात निर्वासितांचे जगणे वाट्याला आलेल्या जम्मूतील पंडितांच्या छावणीला भेट दिली. निर्वासितांच्या छावणीला भेट देणारे ते पहिले पंतप्रधान होते. पंडितांची परिस्थिती पाहून त्यांच्यासाठी दोन खोल्यांची का होईना पक्की घरे बांधण्याचा आदेश दिला. जेव्हा ही घरे बांधून पूर्ण झाली तेव्हा ती पंडितांना सुपूर्त करण्याच्या कार्यक्रमास त्यांनी स्वत: हजेरी लावली. या कार्यक्रमात बोलताना जम्मूच्या प्रचंड गर्मीत पंडितांना दिवस काढावे लागत असल्या बद्दल खंत व्यक्त करून त्यांना लवकरात लवकर काश्मीर मध्ये परतता येईल यासाठी प्रयत्न करण्याचे त्यांनी आश्वासन दिले. निर्वासित पंडितासाठी त्यांनी १६०० कोटीची मदत जाहीर केली. ज्यांनी आपली काश्मीर मधील मालमत्ता विपरीत परिस्थितीमुळे विकली त्यांना काश्मीरमध्ये नव्या जागेत घर बांधण्यासाठी या रकमेतून प्रत्येकी साडे सात लाख देण्यात येतील हे त्यांनी जाहीर केले. परत येवू इच्छिणाऱ्या पंडीतासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे आदेश त्यांनी दिले.

सगळी मालमत्ता विकून बाहेर पडलेले पंडीत तिथे घर बांधून तरी काय करतील हा प्रश्न होता. त्यामुळे घर बांधण्यासाठी जागा आणि पैसे उपलब्ध करून देणे पुरेसे नव्हते याची जाणीव मनमोहनसिंग यांना होती. पंडितांचा काश्मीर मध्ये परतण्याचा व्यावहारिक मार्ग म्हणून पंडीत समुदायातील तरुणांना काश्मीर खोऱ्यात सरकारी नोकऱ्यात सामावून घेण्याची त्यांनी योजना तयार केली. या अंतर्गत पंडीत समुदायाच्या ६००० तरुणांना काश्मीर खोऱ्यात नोकऱ्या देण्याचा निर्णय घेण्यात आला. जे तरुण काश्मीरमध्ये नोकरीसाठी येतील त्यांच्या राहण्यासाठी तात्पुरत्या निवासाची सोय राज्य सरकारने केली. ठराविक काळानंतर तिथे राहणाऱ्या व्यक्तीने दुसरीकडे घर बांधून आपल्या कुटुंबियासह राहणे अपेक्षित होते.  पंडितांच्या काश्मीरमधील वापसीचा हा व्यावहारिक मार्ग मनमोहनसिंग यांनी आखला होता. या योजने अंतर्गत मनमोहन काळात साडेतीन हजार पेक्षा जास्त तरुणांनी नोकरी स्वीकारून काश्मीरमध्ये राहायला सुरुवातही केली. पण फारच कमी लोकांनी आपल्या कुटुंबाला काश्मीर खोऱ्यात परत आणले. पंडीत नोकरदारांसाठी ठराविक काळ राहण्याची जी सोय उपलब्ध करून देण्यात आली होती तिथली मुदत संपल्यावर स्वत:चे घर बांधून राहण्या ऐवजी बहुतांश नोकरदार पंडितांनी भाड्याचे घर घेवून राहणे पसंत केले. त्यामुळे पंडितांच्या वापसीचा मनमोहनसिंग यांनी आखलेला व्यावहारिक मार्ग पंडितांच्या वापसीसाठी फार उपयोगी ठरला नाही. तरीही १९९० नंतर जी थोडी काश्मिरी पंडितांची कुटुंबे काश्मीरखोऱ्यात परतली ती या काळात आणि या योजने अंतर्गतच. ही योजना पंडीत कुटुंबे काश्मिरात परतण्याचा हमरस्ता बनली नाहीत याचे एक कारण पंडीत समुदाय काश्मीर खोऱ्यातून बाहेर पडल्यानंतर तब्बल २० वर्षांनी असा प्रयत्न झाला. या वीस वर्षात पंडीत कुटुंबे देशाच्या निरनिराळ्या भागात स्थिर झाली होती. मुलांची शिक्षणे अर्धवट सोडून, किंवा नोकरीला लागलेल्या मुलांना सोडून पुन्हा काश्मिरात परतणे गैरसोयीचे होते. दहशतवादी घटना कमी झाल्या असल्या तरी २००८,२००९ व २०१० साली वेगवेगळ्या कारणाने लोक रस्त्यावर उतरली व पोलिसांशी आणि सुरक्षादलाशी त्यांच्या चकमकी झाल्याने परिस्थिती सामान्य झाली म्हणण्यासारखी स्थिती नव्हती. त्यामुळे जास्त कुटुंबे परतली नाहीत तरी पंडितांना काश्मीर घाटीत परत आणण्याचा प्रयत्न मनमोहनसिंग यांच्या काळात त्यांच्याच पुढाकाराने झाला याची इतिहासाला नोंद घ्यावी लागेल. मनमोहन काळातील आणखी एका गोष्टीची नोंद घेतली पाहिजे. या कालखंडात दहशतवादी गटाकडून पंडितांवर हल्ले झाले नाहीत. २००४ साली मनमोहनसिंग सत्तेत आले तेव्हा एक पंडीत मारल्या गेल्याची नोंद आहे पण त्यानंतर असे घडले नाही. नोकरीच्या निमित्ताने काश्मिरात परतलेले काश्मिरी पंडीत व काही कुटुंब यांचेवर या काळात हल्ले झाले नाहीत. मनमोहनसिंग यांचे काळात सुरक्षादल आणि पोलीस यांच्या कारवाईत बळी पडलेल्या मुस्लीम नागरिकांची संख्या मोठी होती. विविध कारणाने लोक रस्त्यावर उतरल्याने व सुरक्षादलाशी संघर्ष झाल्याने ही संख्या वाढली.. मनमोहनसिंग यांचे काळात काश्मीर बाहेर झालेल्या आतंकवादी हल्ल्यात मात्र अनेक हिंदू मारले गेलेत. 

२०११ नंतर देश पातळीवर मनमोहनसिंग सरकारवरील भ्रष्टाचाराच्या आरोपावरून वातावरण तापले होते , अण्णा हजारे यांचे आंदोलन सुरु झाले होते. मनमोहनसिंग यांना निर्णय घेणे अवघड बनले होते. याही परिस्थितीत त्यांनी काश्मीरवरील आपले लक्ष ढळू दिले नाही. सत्ता जाण्याच्या १० महिने आधी  त्यांनी काश्मीरला भेट दिली व त्यापूर्वी तिथे सुरु असलेल्या विकास योजनांचा आढावा घेतला. काश्मीरची आर्थिक घडी नीट बसावी व तिथल्या तरुणांना रोजगार मिळावा यासाठी त्यांनी सत्तेत आल्यानंतर २४००० कोटींच्या योजना जाहीर केल्या होत्या. त्याचा खर्च वाढून ३७००० कोटी झाला. या अंतर्गत एकूण ६७ प्रकल्प हाती घेण्यात आले होते. त्यापैकी २०१३ पर्यंत ३४ प्रकल्प पूर्ण झाले होते तर २८ प्रकल्पांचे काम सुरु होते. वीज, रेल्वे,रस्ते, शाळा महाविद्यालये आणि आयटीआय निर्मिती असे विविधअंगी प्रकल्प हाती घेवून ते पूर्णत्वाला नेले. मनमोहनसिंग यांचे नंतर मोदी सत्तेत आले तेव्हा यातील अनेक प्रकल्पांचे त्यांनी उद्घाटन केले. अटलबिहारी काळात पाकिस्तानशी सुरु झालेली बोलणी पुढे नेण्याचा प्रयत्न मनमोहनसिंग यांनी केला पण या प्रयत्नांना सर्वाधिक विरोध भारतीय जनता पक्षाकडून झाला. मुत्सद्दी पातळीवर बॅंक चॅनेल चर्चा सुरु होती ती मात्र चालू राहिली. या चर्चेतून काश्मीरमध्ये कायम शांती नांदेल असे प्रस्ताव समोर आलेत. पण पाकिस्तानात सत्तापालट झाल्याने त्या प्रस्तावावर पुढे जाण्यात अडथळा निर्माण झाला. सत्ता सोडण्यापूर्वी झालेल्या शेवटच्या पत्रकार परिषदेत काश्मीर प्रश्न सोडविण्याच्या बरेच जवळ आलो होतो याचा त्यांनी उल्लेख केला होता. बॅंक चॅनेल चर्चेची जी काही निष्पत्ती होती ती सीलबंद करून नव्या पंतप्रधानांच्या हाती सोपविण्याचा आदेश मनमोहनसिंग यांनी दिला. या चर्चेसाठी मनमोहनसिंग यांनी ज्या मुत्सद्द्याला नेमले होते त्या सतिंदर लांबा यांना नवे पंतप्रधान मोदी यांनी भेटीसाठी बोलावले देखील होते. पाकिस्तानशी झालेल्या चर्चेच्या प्रारूपा विषयी गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांशी सतिंदर लांबा यांनी चर्चाही केली होती. या प्रारुपात काही बदल करण्याची गरज आहे का हे लांबा यांनी विचारले तेव्हा तशी गरज नसल्याचे लांबा यांना सांगण्यात आले. या आधारेच चर्चा पुढे नेण्याचा विचार गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्याने बोलून दाखविला. नंतर मात्र हे प्रारूप काय होते आणि त्याचे पुढे काय झाले हे कोणाला कळले नाही. या सोबतच मनमोहनसिंग यांचा काश्मीर अध्याय फाईलबंद झाला.

                                             (क्रमशः)

-----------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि.यवतमाळ 
मोबाईल -९४२२१६८१५८ 

Thursday, January 4, 2024

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - ८६

 पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष मुशर्रफ यांनी भारताविरुद्ध लढणाऱ्या गटांना शस्त्र टाकून देवून लढण्याचा पॅलेस्टीनी मार्ग सुचविला होता..शस्त्र हाती घेवून इस्त्रायल विरोधात लढणाऱ्या पॅलेस्टीनी गटांना फारसे यश येत नसल्याचे पाहून तेथील लोकांनी निराशेतून दगड हाती घेतले होते. तेच २०१० साली काश्मीरमध्ये घडत होते. पुढची पाच वर्षे काश्मीरच्या तरुणांच्या हातातील दगड सुरक्षदलासाठी मोठी डोकेदुखी ठरली.
-------------------------------------------------------------------------------------------


२००८ आणि २००९ प्रमाणे २०१० चे विरोध प्रदर्शन थांबविण्यात केंद्रातील मनमोहन सरकारला आणि जम्मू-काश्मीर सरकारला यश आले तरी या जनप्रदर्शनाने पहिल्यांदाच मुख्यमंत्री बनलेल्या तरुण ओमर अब्दुल्लाच्या प्रतिमेवर विपरीत परिणाम झाला. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तेव्हा काश्मिरी तरुणांना आपल्या समस्या समजून घेवून निर्णय घेतले जातील असे वाटू लागले होते. पण २००८ च्या जन प्रदर्शनानंतर सत्तेत आलेल्या ओमर अब्दुल्लांना स्थिरता लाभलीच नाही. २००९ आणि २०१० या दोन्ही वर्षात घडलेल्या घटनांनी लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. अनियंत्रित जमावावर काबु मिळविण्यासाठी सेनेला बोलावण्याची झालेली मागणी त्यांच्या विरोधात गेली. सैन्य कमी करण्याची आणि नागरी भागातून सैन्य हलविण्याची तिथल्या जनतेची जुनी मागणी होती. दहशतवादी कारवाया कमी झाल्यामुळे मनमोहन सरकारने जनतेची मागणी लक्षात घेवून नागरी भागातून सैन्य काढून घ्यायला सुरुवात केली होती. सैन्यदलाने ज्या सरकारी इमारती आणि शाळा आपल्या उपयोगासाठी ताब्यात घेतल्या होत्या त्या खाली केल्या होत्या. दहशतवाद्यांशी कसा मुकाबला करायचा याचे प्रशिक्षण जम्मू-काश्मीर पोलीसदलास देण्यास सेनादलाने सुरुवात देखील केली होती.  २०१० ला लोक पुन्हा रस्त्यावर उतरल्याने काश्मीर मधील कायदा व सुव्यवस्था काश्मीर पोलिसांकडे देण्याची व काश्मीर पोलिसांना सैन्या ऐवजी केंद्रीय राखीव दलांची मदत देण्याच्या घेतलेल्या निर्णयात अडथळा आला. हलवलेले सैन्य पुन्हा काही ठिकाणी परत बोलवावे लागले. २०१० मध्ये सगळ्यात महत्वाचा व नाजूक प्रश्न बनला होता तो सुरक्षादलावर आणि पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या जमावाला उत्तर कसे द्यायचे. २०१० मध्ये रस्त्यावर उतरून दगडफेक करणारा जमाव प्रामुख्याने विद्यार्थी व तरुणांचा होता. काश्मिरात दहशतवाद शिगेला पोचला होता त्या १९९० च्या दशकात जन्मलेली ही पिढी होती. हिंसाचारात जन्मलेली व हिंसाचारात वाढलेली ही पिढी आपल्या भविष्याबद्दल निराश होती. हुरियत कॉफरंसच्या गिलानी गटाने २०१० मध्ये या तरुण पिढीलाच रस्त्यावर उतरविले होते. २०१० चा लोकांचा उठाव होण्याआधी सत्तेत असताना पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष मुशर्रफ यांनी भारताविरुद्ध लढणाऱ्या गटांना शस्त्र टाकून देवून लढण्याचा पॅलेस्टीनी मार्ग सुचविला होता..शस्त्र हाती घेवून इस्त्रायल विरोधात लढणाऱ्या पॅलेस्टीनी गटांना फारसे यश येत नसल्याचे पाहून तेथील लोकांनी निराशेतून दगड हाती घेतले होते. तेच २०१० साली काश्मीरमध्ये घडत होते. पुढची पाच वर्षे काश्मीरच्या तरुणांच्या हातातील दगड सुरक्षदलासाठी मोठी डोकेदुखी ठरली.

ज्या हुरियतने चिथावणी देवून काश्मीरमधील विध्यार्थ्यांना व तरुणांना सुरक्षादलाच्या विरोधात रस्त्यावर उतरविले त्यांचेही विद्यार्थ्यांवर नियंत्रण राहिले नाही. दगडफेकीला हुरियतच्या गिलानीने विरोध केला.  दगडफेक न करण्याचे पत्रक काढून आवाहन केले पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही. गीलानीच्या हुरियत गटात सामील असलेल्या मसरत आलम याने विरोध प्रदर्शन व दगडफेक चालू राहील याचे नियोजन केले होते. या आलमने पाकिस्तान समर्थक मुस्लीम लीगची स्थापना काश्मिरात केली होती. जमावाकडून होणाऱ्या दगड्फेकीवर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली. काश्मिरातील तेव्हाचा प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या पीडीपीच्या नेत्या महबुबा मुफ्ती यांनी बैठकीवर बहिष्कार टाकला. सुरक्षादलाकडून दगडफेक करणाऱ्यावर अटकेची कारवाई होत होती त्याचा मेहबूबा मुफ्ती विरोध करीत होत्या पण दगडफेकी बद्दल मात्र मौन बाळगून होत्या. दगडफेकीच्या जास्त घटना दक्षिण काश्मीर मधील पीडीपी पक्षाच्या प्रभाव क्षेत्रात झाल्या होत्या.  या प्रकाराने ओमर अब्दुल्लाचे सरकार अडचणीत येत असेल तर ते त्यांना हवेच होते. याचा फायदा पुढच्या २०१४ च्या विधानसभा  निवडणुकीत त्यांना झालाही. जिथे जास्त दगडफेक झाली त्या क्षेत्रात पीडीपीचे जास्त उमेदवार निवडून आले होते. भारतीय जनता पक्षा बरोबर संयुक्त सरकार बनवून महबुबा मुफ्ती मुख्यमंत्री बनल्या तेव्हा त्यांच्या काळात सुरक्षादलाला दगडफेकीचा जास्त सामना करावा लागला. राजकीय पक्ष साथ देत नाहीत हे पाहून मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दगडफेकीच्या घटना थांबविण्यासाठी स्वयंसेवी संस्था व निवृत्त नोकरशहांची मदत घेतली. त्यांनी अटक केलेल्या विद्यार्थ्यांची सुटका आणि अल्पवयीन विद्यार्थ्यांना तुरुंगात न पाठवता बाल सुधार गृहा सारख्या संस्थात ठेवावे अशी सूचना केली. त्यामुळे विरोध प्रदर्शनात सामील लोकांशी बोलणी करणे सोपे जाईल असे त्यांचे म्हणणे होते. सुरक्षादलावर होणारी दगडफेक तीव्र झालेली असताना सध्या मोदी मंत्रीमंडळात मंत्री असलेले तत्कालीन सेना प्रमुख व्हि.के.सिंग यांनी राजकीय तोडगा हाच विरोध प्रदर्शन व दगडफेक थांबविण्याचा उपाय असल्याचे सांगितले. पुढे गृहमंत्री चिदंबरम यांनी अशा प्रकारच्या सूचना लक्षात घेवून ८ कलमी कृती आराखडा मांडला. त्यामुळे वातावरण निवळण्यास मदत झाली. जून ते सप्टेंबर २०१० च्या विरोध प्रदर्शनात दगडफेकीमुळे सुरक्षादलाने केलेल्या कारवाईत ११० तरुणांना आपला जीव गमवावा लागला.  तसेच ५३७ नागरिक जखमी झालेत. दगडफेकीमुळे जखमी झालेल्या पोलीस व सुरक्षादलाच्या जवानांची संख्या चार हजाराच्या जवळपास होती. 


गृहमंत्री चिदंबरम यांनी सादर केलेल्या आठ कलमी प्रस्तावात काश्मिरी जनतेशी , काश्मिरातील राजकीय पक्ष, राजकीय गट आणि संस्था, स्वयंसेवी गट , विद्यार्थी संघटना अशा सगळ्यांशी संवाद साधणारा संवादाकांचा एक गट तयार करण्याचा प्रस्ताव होता. जम्मू आणि लडाख या दोन क्षेत्रांच्या विकास विषयक गरजा लक्षात घेवून विकास आराखडा तयार करणारे दोन विभागासाठी दोन स्वतंत्र गट स्थापण्याची सूचना होती. २०१० च्या विरोध प्रदर्शनात विद्यार्थी व तरुण अग्रभागी असल्याने प्रामुख्याने त्यांचा विचार या आठ कलमी प्रस्तावात होता. तुरुंगात असलेल्या विद्यार्थी व तरुणांची सुटका करून त्यांच्या विरूद्धचे खटले मागे घेण्याची सूचना राज्य सरकारला करण्यात आली होती.तातडीने शाळा, कॉलेज, विद्यापीठे सुरु करणे, बुडालेला अभ्यास भरून काढण्यासाठी विशेष वर्ग घेणे व त्यांचे वर्ष वाया जावू नये यासाठी वेळेवर परीक्षा घेण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले होते. विरोध प्रदर्शनात मृत्यू झालेल्या तरुणाच्या कुटुंबियांना ५ लाखाची मदत देण्याचे जाहीर करण्यात आली. या सगळ्यासाठी राज्य सरकारला १०० कोटीची मदतही चिदंबरम यांनी जाहीर केली. या शिवाय राज्य सरकारला एक महत्वाची सूचना करण्यात आली होती.जिथे सुरक्षादलाच्या चेक पोस्ट व बंकरची गरज नाही ती नष्ट करावीत अशी ती सूचना होती. अशा चेक पोस्ट काढून टाकण्याचे व बंकर नष्ट करण्याचे काम गुलाम नबी आझाद यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात सुरु झाले होते. पण २००८ च्या जमीन विवादात त्यांचे सरकार गेले आणि ते काम ठप्प झाले होते.या सर्व सूचनांचा उपयोग विरोध प्रदर्शन थांबण्यात झाला. २००८ च्या अमरनाथ जमीन वादातून सुरु झालेले विरोध प्रदर्शन असो की २००९ साली दोन तरुण महिलांच्या बलात्कार व खुनाचा सुरक्षादलावर आरोप झाल्याने त्यातून उफाळलेला जन असंतोष असो किंवा बक्षीस व पदक मिळविण्याच्या आमिषाने तीन सामान्य नागरिकांना गोळी घालण्याच्या प्रकारातून सुरु झालेले २०१० चे विरोध प्रदर्शन असो ते दोन ते चार महिन्यात थांबविण्यात केंद्र सरकारला यश आले असले तरी जम्मू-काश्मीर मधील वातावरण दीर्घकाळ तणावपूर्ण राहिले. नव्या मुख्यमंत्र्याला प्रशासनावर पकड मिळविण्यासाठी उसंत मिळाली नाही. दहशतवादी घटना कमी होवूनही या तीन वर्षात प्रशासन व जनजीवन विस्कळीत झाले. परिणामी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी काश्मीरसाठी २४००० कोटीचे पॅकेज घोषित केले होते त्या अंतर्गतची कामे रखडली व खर्चही २४००० वरून ३७००० कोटी पर्यंत गेला. मात्र या तीन वर्षातील विरोध प्रदर्शनानी विकास कामात अडथळे आले तरी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी काश्मीर मधील आपल्या योजना पूर्णत्वाला नेण्याचे प्रयत्न सोडले नाहीत. 

                                                 (क्रमशः)

---------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि.यवतमाळ 
मोबाईल - ९४२२१६८१५८