Thursday, December 21, 2023

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - ८५

 २००२ मध्ये तत्कालीन सेना प्रमुखाने  लष्कराकडून दहशतवाद संपविण्ययाची कामगिरी यशस्वीरित्या पार पाडली असल्याने कायदा  व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांवरच सोपविली पाहिजे, त्यासाठी लष्कराचा वापर करू नये अशी सूचना केली होती. ती सूचना  खऱ्या अर्थाने मनमोहन सरकारने अंमलात आणली. नागरी निदर्शने काबूत आणण्यासाठी लष्कराची कुमक पाठविण्याची राज्य सरकारची मागणी त्यांनी फेटाळली.
-----------------------------------------------------------------------------------


२००८च्या अमरनाथ जमीन विवाद प्रकरण आणि २००९ च्या दोन तरुण महिलांच्या अपहरण,बलात्कार आणि खुनाच्या आरोपाने पसरलेल्या अशांततेतून काश्मीर सावरत आले असतांना २०१० साली पुन्हा एका घटनेने काश्मीरमध्ये असंतोष उफाळून आला. याची तीव्रता २००९ पेक्षा अधिक होती. ३० एप्रिल २०१० रोजी तीन तरुणांना गोळ्या घालून ठार करण्यात आले होते. याबाबत सेनादला तर्फे दावा करण्यात आला होता की हे तीन तरुण घातपाती कारवाया करण्यासाठी सीमा ओलांडून भारतात आले असताना त्यांना गोळ्या घालून ठार करण्यात आले. आठवडाभरात या घटनेबद्दल जी तथ्ये समोर आलीत त्याने काश्मीर हादरले. ज्या तीन तरुणांना गोळ्या घालून ठार करण्यात आले होते ते पाकिस्तानी नव्हते किंवा पाकिस्तानातून सीमा ओलांडून आलेले नव्हते. ठार झालेले शहजाद अहमद खान,रियाज अहमद लोन आणि मुहम्मद शफी लोन हे तिन्ही तरुण बारामुल्लाचे रहिवासी होते. त्यांना कुपवाडा भागात सेनेसाठी मालवाहतुकीचे काम देण्याचे आमिष दाखवून सेनेच्या कॅम्प मध्ये बोलावले होते आणि तेथे त्यांना गोळ्या घालून चकमकीचे बनावट दृश्य तयार केल्याचा आरोप झाला. दहशतवाद्यांना ठार करणाऱ्या अशा चकमकीत सामील जवानांना व अधिकाऱ्यांना पदक आणि बक्षीस म्हणून रोख रक्कम देण्याची पद्धत आहे. पदक आणि बक्षिसाची रक्कम मिळविण्यासाठी दहशतवादी नसलेल्या तरुणांना दहशतवादी दाखवून ठार केल्याचा आरोप पुढे सैन्याच्या कोर्ट मार्शल मध्ये सिद्धही झाला. निरपराध तरुणांना ठार करण्यात आल्याचे समोर आल्यानंतर त्या विरुद्ध निदर्शनांना ११ जून २०१० रोजी कुपवाडा आणि श्रीनगर मधून सुरुवात झाली. श्रीनगरमध्ये घटनेचा निषेध करण्यासाठी जमलेल्या तरुणांच्या जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला. अश्रुधुराचा एक गोळा १७ वर्षीय तुफैल अहमद याच्या डोक्यावर आदळून फुटल्याने त्यात त्याचा मृत्यू झाला. या मृत्यूने आगीत तेल ओतल्या गेले. ठिकठिकाणी निदर्शने होवू लागले. निदर्शक व पोलिसांच्या झडपा आणि यात निदर्शकांचा मृत्यू झाला की पुन्हा वाढत्या संख्येने निदर्शने या प्रकाराने संपूर्ण काश्मीर खोरे अशांत बनले. १९८०-९० च्या पिढी नंतरची नवी पिढी प्रामुख्याने निदर्शनात सामील होती. १९८०-१९९० च्या पिढीतील बऱ्याच तरुणांनी रायफल हाती घेतली होती. पण या नव्या पिढीच्या हातात रायफल नव्हती तर दगड होते. पोलीस व सुरक्षादलांनी निदर्शाकाला अडवले किंवा बळाचा वापर केला की त्याचे उत्तर पोलीस आणि सुरक्षादलावर दगडफेक करून दिले जायचे. या दगडफेकीला उत्तर म्हणून बंदूक आणि स्फोटकाचा वापर सुरक्षादलाकडून होत होता. तीन महिन्यापेक्षा अधिक काळ नागरिक आणि पोलीस यांच्यात अशा प्रकारच्या झडपा होत होत्या. यात ११२ नागरिक ठार झाल्याचा सरकारी आकडा आहे तर गैरसरकारी आकडा १६० चा आहे. शिवाय जखमींचे प्रमाणही मोठे राहिले. जखमीत नागरिकांपेक्षा सुरक्षादलांच्या जवानांची संख्या मोठी होती. 

सुरक्षादलाच्या जवानांनी तीन तरुणांना ठार केल्याच्या घटने विरुद्ध उग्र निदर्शने सुरु असतानाच अमेरिकेत कुराण जाळल्याची घटना घडली. या घटनेने काश्मिरातील निदर्शने अधिक उग्र आणि हिंसक बनली. चर्च आणि ख्रिस्ती शाळा निदर्शकांच्या निशाण्यावर आल्या. काही चर्च आणि शाळा जाळण्यात आल्या तर काहींवर दगडफेक झाली.  या घटनेने जम्मूतील मुस्लीमबहुल भागातही निदर्शनांचे लोण पोचले.तरी निदर्शकांची प्रमुख मागणी सैन्य मागे घेण्याची व सशस्त्र बल (विशेष शक्ती) अधिनियम मागे घेण्याची होती. या अधिनियमामुळे सशस्त्र बलाने अन्याय अत्याचार केले तरी त्यांना शिक्षा होत नाही, संरक्षण मिळते अशी व्यापक धारणा असल्याने निदर्शकाचीच नाही तर काश्मिरातील सर्वच राजकीय पक्षांची व हुरियत कॉन्फरन्स सारख्या संघटनांची ही मागणी राहिली आहे.  पण या कायद्याचा दुरुपयोग होवू न देण्याचा सेनादलाचा आणि सरकारचा निर्धार असेल तर दोषींना शिक्षा होवू शकते हे या प्रकरणातच दिसून आले. दहशतवादी असल्याचे भासवून स्वत:च्या फायद्यासाठी तीन निरपराध तरुणांची बनावट चकमकीत हत्या करणाऱ्या जवानांना व अधिकाऱ्यांना सेनेच्या न्यायालयात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. २०१४ मध्ये ही शिक्षा सुनावण्यात आली.  सेना मागे घेण्याची किंवा सशस्त्र बल विशेष शक्ती अधिनियम मागे घेण्याच्या मागणीत इतरांसोबत  सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्स सामील असताना त्या पक्षाचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला मात्र निदर्शने काबूत आणण्यासाठी सेनादलाची मदत मागत घेते. मात्र केंद्राकडून अब्दुल्लांना या बाबतीत ठाम नकार कळविण्यात आला. जम्मू-काश्मीर पोलिसांनी सेनेवर विसंबून न राहता केंद्रीय राखीव दलाच्या मदतीने कायदा व सुव्यवस्था सांभाळली पाहिजे असे ओमर अब्दुल्लांना सांगण्यात आले. २००२ मध्ये तत्कालीन सेना प्रमुखाने  लष्कराकडून दहशतवाद संपविण्ययाची कामगिरी यशस्वीरित्या पार पाडली असल्याने कायदा  व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांवरच सोपविली पाहिजे अशी सूचना केली होती. ती सूचना  खऱ्या अर्थाने मनमोहन सरकारने अंमलात आणली. परिस्थिती शांत करण्यासाठी त्यांनी सर्व पक्षांची मदत घेतली.

पंतप्रधानांनी श्रीनगर येथे १५ सप्टेंबर रोजी सर्वपक्षीय बैठक बोलावली. हिंसाचारात लिप्त नसलेल्या कोणत्याही गटासोबत बोलण्याची त्यांनी तयारी दाखविली. या बैठकीला हुरियत कॉन्फरन्सच्या दोन्ही गटाच्या नेत्या सोबतच जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटच्या यासीन मलिकलाही निमंत्रण पाठविण्यात आले होते. या बैठकीशिवाय मनमोहनसिंग यांनी गृहमंत्री चिदंबरम यांच्या नेतृत्वाखाली सर्वदलीय शिष्टमंडळ नवी दिल्लीहून श्रीनगरला पाठविले.या सर्वपक्षीय शिष्टमंडळात संसदीय कामकाज मंत्री पवन बन्सल, भारतीय जनता पक्षाचे अरुण जेटली आणि सुषमा स्वराज, सीपीएमचे वासुदेव आचार्य, सीपीआयचे गुरुदास दासगुप्ता, समाजवादी पक्षाचे मुलायमसिंग यादव, लोक जनशक्ती पक्षाचे रामविलास पासवान यांचेसह विविध राजकीय पक्षाचे ३९ नेते या शिष्टमंडळात सामील होते. या शिष्टमंडळाने विविध गटांची भेट घेवून चर्चा केली. याचवेळी सरकारकडून विविध उपायांची घोषणा करण्यात आली. यात अटक करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची सुटका, शाळा-कॉलेज सुरु करण्याची घोषणा, सुरक्षादलाची संख्या कमी करण्यासाठी चर्चेची तयारी या शिवाय निदर्शनामध्ये ठार झालेल्या कुटुंबियांना आर्थिक मदत अशा विविध घोषणा करण्यात आल्या. या सगळ्या गोष्टीचा परिणाम तणाव कमी होवून वातावरण निवळण्यात झाला. ज्या पद्धतीने पोलीस व निमलष्करी दलाने परिस्थिती हाताळली व बळाचा जास्त वापर केला त्याबद्दल मनमोहनसिंग यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. पण पोलीस आणि निमलष्करी दलाला शस्त्र हाती नसलेल्या जमावाला कसे नियंत्रित करायचे याचे प्रशिक्षणच नसल्याने त्यांच्याकडून बळाचा अधिक वापर झाला. १९९० मध्ये सुरु झालेल्या दहशतवादाने काश्मीर मिलिटरी स्टेट बनले होते. मनमोहनसिंग यांचे काळात दहशतवादी घटनांचे प्रमाण कमी झाल्याने त्यांनी काश्मिरात सैन्याचा वापर कमी केला. मनमोहन काळात काश्मीर मिलिटरी स्टेट राहिले नाही पण ते पोलीस स्टेट बनले. म्हणजे दहशतवाद वाढता असतांना तो काबूत आणण्यासाठी सैन्याने बळाचा जसा वापर केला तसाच वापर दहशतवाद नसतांना सर्वसामान्य जनतेची निदर्शने काबूत आणण्यासाठी पोलीस आणि निमलष्करी दलाने केला. बळाचा कमी वापर करून जमावाला नियंत्रित करण्यासाठी नव्या आयुधांचा वापर करण्याचे निर्देश पंतप्रधानांनी सुरक्षादलास दिले. त्यानुसार पॅलेटगनचा वापर करण्याचा निर्णय झाला. पण हे हत्यार पुढे विनाशकारी ठरले. 

                                                          (क्रमशः)

------------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि. यवतमाळ 
मोबाईल : ९४२२१६८१५८ 

Wednesday, December 13, 2023

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - ८४

 २९-३० मे च्या रात्री झालेल्या दोन तरुण महिलांच्या गूढ मृत्यूने काश्मीरघाटीत अशांतता पसरली. या महिलांच्या मृत्यूप्रकरणी सुरक्षादलावर आरोप झालेत. सीबीआय तपासात आरोपात तथ्य नसल्याचे समोर आले पण तोपर्यंत बंद, कर्फ्यू, पोलीस-निदर्शक यांच्यातील झडपाने काश्मीरचे जनजीवन ४७ दिवस पूर्णपणे विस्कळीत झाले होते. 
---------------------------------------------------------------------------------


२९ जानेवारी २००९ ची ही घटना आहे. निलोफर जान आणि असिया जान या तरुण नणंद-भावजया शोपियन मधील बोनगम गांवाजवळील आपल्या ऑर्केड बागेतून घरी परतताना बेपत्ता झाल्या. ३० जानेवारी २००९ रोजी त्यांचे मृतदेह सापडले. त्यांच्या परिवाराने या दोन्ही महिलांचे सुरक्षादलातील व्यक्तींनी अपहरण केले आणि बलात्कार करून त्यांचा खून केल्याचा आरोप केला. सदर घटना आणि घटनेतील महिलांच्या परिवाराने केलेल्या आरोपाने काश्मीरमध्ये संतापाची लाट उसळली. सय्यद अली  गिलाणी यांच्या नेतृत्वाखालील हुरियत कॉन्फरन्सच्या गटाने घटनेविरुद्ध बंदचे आवाहन केले. बंद दरम्यान हिंसक घटना घडल्याने कर्फ्यू लावण्यात आला. ३० मे रोजी पोलिसांनी काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात पोस्टमार्टेम मध्ये मृतक महिलांच्या शरीरावर कोणत्याही जखमा आढळल्या नाहीत वा बलात्कार झाल्याचा पुरावा मिळाला नसल्याचे स्पष्ट करण्या आले. बलात्कार किंवा खुनाच्या गुन्ह्या ऐवजी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पण पोलिसांच्या दाव्यावर विश्वास ठेवायला कोणी तयार नव्हते. त्यामुळे घटने विरोधात निदर्शने सुरूच राहिली. शेवटी पोलिसांनी बलात्कार व खुनाचा गुन्हा तब्बल एक आठवड्या नंतर दाखल केला. या दरम्यान मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी जनक्षोभ शांत करण्यासाठी घटनेची न्यायिक चौकशी करण्याचा आदेश दिला. राज्य सरकारने निवृत्त न्यायमूर्ती मुजफ्फर जान यांची एक सदस्यीय चौकशी समिती नेमली. समितीने एक महिन्याच्या आत अहवाल द्यावा असे समितीला सांगण्यात आले. जम्मू-काश्मीर हायकोर्टाच्या बार असोसिएशनने या चौकशी समितीला विरोध करून निवृत्त न्यायमूर्ती ऐवजी कार्यरत न्यायमुर्तीकडून चौकशीची मागणी केली. मागणी पूर्ण न झाल्याने बार असोसिएशनने स्वत:ची स्वतंत्र समिती नेमली.

न्यायिक चौकशीच्या घोषणे नंतरही काश्मीरघाटीत ठिकठिकाणी विरोध प्रदर्शने सुरूच राहिली. पोलीस आणि सुरक्षादलावर जमावाकडून दगडफेक तर सुरक्षादलाकडून अश्रुधुराची नळकांडी आणि लाठीमार असे सार्वत्रिक चित्र दिसत होते. घटने विरोधातील उग्र असंतोष पाहून हुरियतच्या गिलानी गटाने आणखी दोन दिवस काश्मीर बंदचे आवाहन केले. पण जवळपास पूर्ण जून महिना काश्मीर बंद राहिले. या दरम्यान निदर्शकांच्या दगडफेकीत पोलीस तर पोलिसांच्या लाठीमारात अनेक निदर्शक जखमी झाले. घटने विरोधात आंदोलन करणाऱ्या संघटनांनी 'चलो शोपियन' मार्च काढण्याचा प्रयत्न केला. ठिकठिकाणाहून असे मार्च काढण्याचे प्रयत्न सुरक्षादलानी बलप्रयोग करून हाणून पाडले. शोपियन भागात निदर्शनाची तीव्रता अधिक राहिल्याने सुरक्षादलाला गोळीबार करावा लागला  या भागात घटना घडल्यापासूनच अघोषित कर्फ्यू होता. हुरियत कॉन्फरन्सच्या दोन्ही गटाचे नेते सय्यद अली गिलानी व मीरवायज उमर फारूक तसेच जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचे यासीन मलिक, शब्बीर शाह यांचेसह विविध पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना स्थानबद्ध करावे लागले. जवळपास दीड महिना संपूर्ण काश्मीरघाटीतील व्यवहार ठप्प होते व कर्फ्यूसदृश्य परिस्थिती होती. दरम्यान घटनेची तीन स्तरावर चौकशी सुरु होती. राज्यसरकारने नेमलेला न्यायिक आयोग चौकशी करीत होताच. शिवाय हायकोर्ट बार असोसिएशनने वकिलांची स्वतंत्र चौकशी समिती नेमली होती. या शिवाय जम्मू-काश्मीर पोलीस प्रमुखाने तीन पोलीस अधिकाऱ्यांची समिती घटनेच्या सर्वंकष चौकशीसाठी एस आय टी नेमली. तिन्ही चौकशी समितीचे निष्कर्ष जवळपास सारखेच होते. दोन्ही महिलांचा बलात्कार व खून झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. सरकारने नेमलेल्या न्यायिक चौकशी समितीच्या अहवालाच्या आधारे कर्तव्यात कसूर केल्याबद्दल अनेक पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई केली गेली. चौकशीचे निष्कर्ष प्रामुख्याने दुसऱ्या पोस्टमोर्टेम अहवालाच्या आधारे काढण्यात आला  पहिल्या पोस्टमोर्टेमच्या वेळी मोठा जमाव जमला होता. मृतकांचे शरीर कडक झाल्याने स्थानिक डॉक्टरांना अडचणी येत होत्या. त्यात जमावाने दगडफेक सुरु केल्याने काम पूर्ण न करताच डॉक्टर निघून गेले. शेवटी तज्ज्ञ डॉक्टरांकरवी पोस्टमोर्टेम करण्याचा निर्णय झाला. चौकशी समितीच्या निष्कर्षाचा आधार याच पोस्टमोर्टेमचा अहवाल होता. दुसऱ्या पोस्टमोर्टेम अहवालात बलात्काराला दुजोरा दिला असला तरी मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नव्हते. या अहवालाशिवाय  बलत्कार, खून आणि त्यात सुरक्षादलाच्या जवानांचे सहभागी असण्याचे  इतर कोणतेही पुरावे समोर आणण्यात कोणत्याच चौकशी समितीला यश आले नाही. त्यामुळे हे प्रकरण ऑगस्ट २००९ मध्ये सखोल चौकशीसाठी सीबीआयकडे सोपविण्यात आले. संबंधितांचे फोन टॅप करण्याची परवानगीही ओमर अब्दुल्ला सरकारने सीबीआयला दिली.


सीबीआयने केलेल्या चौकशीत वेगळेच आणि धक्कादायक तथ्य समोर आले. दुसरा पोस्टमोर्टेम अहवाल जाणूनबुजून चुकीचा तयार करण्यात आल्याच्या निष्कर्षाप्रत सीबीआय पोचली. हा निष्कर्ष काढण्याआधी सीबीआयने अनेकांचे फोनवर झालेले संभाषण ऐकले. शिवाय या दोन्ही महिलांची प्रेते थडग्यातून बाहेर काढून एम्सच्या डॉक्टरांकरवी पुन्हा पोस्टमोर्टेम करण्यात आले. या पोस्टमोर्टेम अहवालाच्या आधारे सीबीआय या निष्कर्षाप्रत आली की दोन्ही महिलांचा मृत्यू पाण्यात बुडून झाला . त्यांचा बलत्कार आणि खून झाला नाही. त्या रस्त्याने नेहमी जाणे येणे करणाऱ्या महिला पाणी कमी असतांना बुडाल्या कशा याचा मात्र खुलासा झाला नाही. सुरक्षादलाला लक्ष्य करण्यासाठी व जनतेत असंतोष निर्माण करण्यासाठीच्या कटातून आधीचा पोस्टमोर्टेम अहवाल तयार करण्यात आला असे सीबीआय तपासातून बाहेर आले. काही वकिलांनी साक्षीदारांवर दबाव आणून खोटी साक्ष देण्यास भाग पाडल्याचा सीबीआयने दावा केला.. सीबीआयने टॅप केलेल्या फोनच्या आधारे या कटात या दोन महिलांच्या बलत्कार व खुनावरून सुरु झालेल्या निदर्शनाचे नेतृत्व करणाऱ्या मजलिस मशावरत या संघटनेचा हात असल्याचे समोर आले. या संघटनेचा उपाध्यक्ष मोहम्मद शफी खान आणि पोस्टमोर्टेम केलेल्या डॉक्टरांच्या संभाषणातून सीबीआयने हा निष्कर्ष काढला. सीबीआयने चौकशी करून या कारस्थानात सामील १३ व्यक्तींविरुद्ध, ज्यात दोन डॉक्टरांचा समावेश आहे, डिसेंबर २००९ मध्ये आरोपपत्र दाखल केले. या डॉक्टरांना ओमर अब्दुल्ला सरकारने नंतर निलंबित केले होते. पुढे जून २०२३ मध्ये जम्मू-काश्मीर सरकारने या दोन डॉक्टरांना सेवेतून काढून टाकले. दुसरे पोस्टमोर्टेम करून हेतुपुरस्पर चुकीचा अहवाल देणारे हे डॉक्टर होते डॉ.बिलाल अहमद दलाल आणि डॉ.निघट शाहीन चील्लू.   ३० मे २००९ ते २००९ च्या डिसेंबर अखेर पर्यंत या घटनेने काश्मीर धगधगते ठेवले होते. या काळात विविध गटांनी मिळून ४२ वेळा बंदचे आवाहन केले होते. निदर्शक व पोलिसात ज्या झडपा झाल्यात त्यात ७ नागरिकांनी आपला जीव गमावला तर १०३ नागरिक जखमी झालेत. पोलीस आणि सुरक्षादलाचे ३५ जवान या काळात जमावाच्या दगडफेकीत जखमी झाले होते.या काळात घडलेल्या लहानमोठ्या ६००च्या वर घटनांच्या आधारे विविध पोलीसठाण्यात अडीचशेच्या वर एफ आय आर नोंदविल्या गेलेत. नुकतीच सत्ता हाती घेतलेल्या ओमर अब्दुल्ला सरकारपुढे या घटनेने मोठे आव्हान उभे केले होते. 

                                                                  (क्रमशः)

---------------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि. यवतमाळ 
मोबाईल - ९४२२१६८१५८ 

 




Thursday, December 7, 2023

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - ८३

 अमरनाथ जमीन हस्तांतरण  विवादाने जम्मू आणि काश्मीर हे दोन्ही भाग अशांत झाले असतांना राज्यात निवडणूक घेण्याचा धाडसी निर्णय केंद्रातील मनमोहनसिंग सरकारने घेतला. परिस्थिती सुरळीत करण्याचा एक मार्ग स्थानिक नेतृत्वाच्या हाती सत्ता सोपविण्याचा होता. तोच मार्ग मनमोहनसिंग सरकारने स्वीकारला. 
----------------------------------------------------------------------------------


२००८च्या जमीन विवादातून मार्ग काढण्यासाठी स्वत: पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी काश्मीरला ६ ऑक्टोबर २००८ साली भेट दिली होती. दिल्लीत बसून काश्मीरचे राजकारण आणि प्रश्न हाताळण्याचा शिरस्ता मनमोहनसिंग यांनी मोडीत काढला होता. तिथल्या जनतेशी संवाद साधत पुढे जाण्याचा प्रयत्न मनमोहनसिंग यांनी केला. सुरक्षा दलाच्या कारवाईने सर्वसामान्य जनतेला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो याबद्दल त्यांनी अनेकदा खेद प्रकट केला पण कारवाईची अपरिहार्यताही पटवून देण्याचा प्रयत्न करीत असत. जमीन विवादातून उफाळलेल्या हिंसाचारामुळे अनेक ठिकाणी कर्फ्यू लावणे भाग पडल्याचे त्यांनी या श्रीनगर भेटीत जनतेला उद्देशून बोलताना सांगितले.जीवितहानी व वित्तहानी रोखण्यासाठी कर्फ्यू लावणे भाग असल्याचे त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले. राज्यपाल व्होरा आणि जम्मू-काश्मिरातील स्वयंसेवी संघटनांच्या प्रयत्नाने पुढे जमीन विवाद निवळला पण या विवादाने गुलाम नबी आझाद यांच्या सरकारचा बळी गेला. मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी जम्मू व काश्मीर या दोन विभागातील तणाव दूर करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. विकासकामांना त्यांनी गती दिली होती. या काळात सैन्य देखील बराकीत गेले होते. सुरक्षादलाच्या अनेक ठिकाणच्या चेकपोस्ट काढून टाकण्यात आल्याने या चेकपोस्टचा दैनदिन होणारा त्रास कमी झाला होता. या सगळ्या सकारात्मक घडामोडींवर अमरनाथ जमीन हस्तांतर विवादाचा विपरीत परिणाम झाला. जम्मू आणि काश्मीर या दोन विभागातील तेढ या विवादामुळे वाढली. गुलाम नबी आझाद सरकारचा पाठींबा मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या पिपल्स डेमोक्रॅटिक पार्टीने काढून घेतला तेव्हा विधानसभेची मुदत संपायला २-३ महिन्याचाच अवधी होता. अमरनाथ जमीन विवादाने जम्मू आणि काश्मीर हे दोन्ही भाग अशांत झाले असतांना राज्यात निवडणूक घेण्याचा धाडसी निर्णय केंद्रातील मनमोहनसिंग सरकारने घेतला. परिस्थिती सुरळीत करण्याचा एक मार्ग स्थानिक नेतृत्वाच्या हाती सत्ता सोपविण्याचा होता. तोच मार्ग मनमोहनसिंग सरकारने स्वीकारला. एरवी सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये होणार असलेल्या निवडणुका फार विलंब न करता नोव्हेंबर-डिसेंबर २००८ मध्ये घेण्याचे घोषित करण्यात आले. १७ नोव्हेंबर ते २४ डिसेंबर २००८ दरम्यान ७ टप्प्यात या निवडणुका पार पडल्या. 

या निवडणुकीचे पहिल्या दोन टप्प्याचे मतदान पार पडल्यानंतर २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत सर्वात मोठा आणि भयंकर असा दहशतवादी हल्ला झाला. लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेने पाकिस्तानी गुप्तचर संघटना आय एस आय च्या मदतीने हा हल्ला केला होता. जम्मू-काश्मीर राज्यात सुरळीतपणे सुरु असलेल्या निवडणुकात अडथळा निर्माण करणे हे या हल्ल्यामागे उद्दिष्ट होतेच शिवाय भारतात अस्थिरता निर्माण करण्याचा हेतूही हल्ल्यामागे होता. परंतु हा हल्ला झाल्यानंतरही जम्मू-काश्मीरमधील निवडणुका सुरळीत व नियोजित कार्यक्रमानुसार पार पडल्या. मुंबईतील दहशतवादी हल्ल्यानंतर या निवडणुकीत मतदान करण्यासाठी मतदार मोठ्या संख्येने बाहेर पडले. अमरनाथ जमीन हस्तांतरण विवादाने जम्मू आणि काश्मीर जवळपास महिनाभर पेटलेले असताना आणि बरेच दिवस कर्फ्यू मुळे प्रशासन व जनजीवन विस्कळीत झाल्याच्या पार्श्वभूमीवर झालेल्या विधानसभा निवडणुकीत सरासरी ६१ टक्के मतदान होणे हे मोठे यश होते. हुरियत सारख्या फुटीरतावादी गटाने निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे केलेले आवाहन झुगारून काश्मीरघाटीतील नागरिकांनी मतदान केले.                                                                                                           

या निवडणुकीला अमरनाथ विवादाची पार्श्वभूमी असल्याने धार्मिक धृविकरणाचा फायदा जम्मूत भारतीय जनता पक्षाला तर काश्मीरघाटीत सईद यांच्या पिपल्स डेमोक्रॅटिक पार्टीचा झाला. २००२च्य निवडणुकीत अवघी १ जागा जिंकणाऱ्या भाजपने या निवडणुकीत ११ जागी यश मिळविले होते. तर मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या पीडीपीने २००२च्य निवडणुकीत जिंकलेल्या १६ जागात २००८ साली ५ जागांची भर टाकली. अमरनाथ जमीन विवाद प्रकरणात या दोन पक्षांचा असा फायदा झाला. त्यांच्या  केवळ जागा वाढल्यात असे नाही तर मतदानाची टक्केवारीही वाढली. भाजपला आधीच्या निवडणुकीपेक्षा ४ टक्के मते अधिक मिळालीत तर पीडीपीला ६ टक्क्याच्या वर अधिक मते मिळालीत. अमरनाथ विवाद आणि निवडणुकी दरम्यान झालेला मुंबईतील दहशतवादी हल्ला याच्या परिणामी २००२च्या निवडणुकीच्या तुलनेत कॉंग्रेसच्या जागाही कमी झाल्यात व मतांची टक्केवारीही कमी झाली. कॉंग्रेसशी युती करण्याचा फटका नॅशनल कॉन्फरन्सलाही बसला. नॅशनल कॉन्फरन्सच्या जागांमध्ये घट झाली नाही पण त्या पक्षाची मतांची टक्केवारी मात्र घटली. २००२च्या जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सला २८  तर कॉंग्रेसला २० जागा मिळाल्या होत्या. २००८ च्या निवडणुकीतही नॅशनल कॉन्फरंसने मागच्या निवडणुकीपेक्षा ५ टक्के मते कमी मिळवूनही मागच्या इतक्याच म्हणजे २८ जागी यश मिळविले. कॉंग्रेसला मात्र पूर्वीच्या २० ऐवजी या निवडणुकीत १७ जागा मिळाल्या व मतांच्या टक्केवारीतही साडेपाच टक्क्यापेक्षा अधिकची घट झाली. तरीही अब्दुल्लांची नॅशनल कॉन्फरन्स व भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या युतीला या निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाले. या आधी राजीव गांधी पंतप्रधान असताना या दोन पक्षांनी युती करून विधानसभा निवडणूक लढविली होती. 

नॅशनल कॉन्फरंस - कॉंग्रेस युतीच्या सरकारचे मुख्यमंत्री म्हणून फारुख अब्दुल्ला यांचे पुत्र ओमर अब्दुल्ला यांनी शपथ घेतली. ते राज्याचे सर्वात तरुण मुख्यमंत्री ठरले. ते शिक्षण आणि बहुराष्ट्रीय कंपनीत काम करण्याच्या निमित्ताने बराच काळ काश्मीर बाहेर होते. राजकारणात आल्यावरही खासदार म्हणून दिल्लीत राहिले आणि अटलबिहारी यांच्या सरकारात परराष्ट्र राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम केले. तरुण आणि विचाराने आधुनिक असल्याने व मंत्रीपदाचा अनुभवही असल्याने प्रशासन चुस्त करून ते चांगले बदल घडवून आणतील अशी अपेक्षा निर्माण झाली होती. काश्मीरमध्ये स्थायी शांततेसाठी त्यांनी पाकिस्तान सोबतच काश्मिरातील विरोधक व फुटीरतावादी गट यांच्याशी चर्चा केली पाहिजे यासाठी आग्रह धरला. हुरियत किंवा जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंट सारखे गट आजवर राज्यसरकारशी चर्चा करायला तयार नव्हते. काश्मीर प्रश्नाचा संबंध केंद्र सरकारशी असून राज्य सरकारशी चर्चा व्यर्थ आहे असे त्यांचे मत होते. मात्र ओमर अब्दुल्ला मुख्यमंत्री झाल्यानंतर या गटांनी राज्य सरकारशी चर्चा करण्याची तयारी दर्शविली होती. पण अशी चर्चा होण्या आधीच एका घटनेने काश्मीर पुन्हा पेटले . शोपियन भागात २ तरुण महिलांच्या अपहरणाचा, बलात्काराचा व हत्येचा आरोप सुरक्षादलावर झाला. या आरोपांमुळे पुन्हा निदर्शने, बंद, कर्फ्यू व सुरक्षादलाच्या कारवाईचे सत्र सुरु झाले. फुटीरतावादी तत्वांना भारताविरुद्ध असंतोष निर्माण करण्यासाठी या आरोपाने निमीत्त मिळाले. २००८च्य जमीन हस्तांतरण विवाद घटनेनंतर या घटनेने काश्मीर मधील जनजीवन व प्रशासन पुन्हा विस्कळीत झाले.

                                                           (क्रमशः)

----------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव
पांढरकवडा जि.यवतमाळ
मोबाईल : ९४२२१६८१५८ .

Friday, December 1, 2023

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - ८२

 कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारने अमरनाथ न्यासाला जमीन हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला तेव्हा सरकारात सामील पीडीपीचा निर्णयाला पाठींबा होता. काश्मीरघाटीत निर्णयाविरोधात मोठी निदर्शने होवू लागल्यावर पीडीपीने सरकारचा पाठींबा काढून घेतला. अल्पमतात आल्याने मुख्यमंत्री  गुलाम नबी आझाद यांनी आपल्या सरकारचा राजीनामा राज्यपालाकडे सादर केला.
----------------------------------------------------------------------------------------
 

अमरनाथ यात्रा काश्मिरातील हिंदू-मुस्लीम सौहार्दाचे प्रतिक राहिली आहे. लाखोच्या संख्येने हिंदू श्रद्धाळू यात्रेसाठी येत असतात आणि आजूबाजूच्या खेड्यातील शेकडो मुस्लीम यात्रेकरूना सुविधा पुरवीत असतात. यातून यात्रेप्रसंगी मोठी आर्थिक उलाढाल होते व स्थानिकांना रोजगार उपलब्ध होतो. यात्रेकरूंच्या सोयींसाठी १०० एकर जमीन घेवून तिथे सुविधा उभारण्याचा सरकारचा निर्णय म्हणजे परंपरेने स्थानिक ज्या सुविधा देतात त्याची गरज उरणार नाही आणि यात्रे दरम्यान जो मोठ्याप्रमाणावर रोजगार उपलब्ध होतो तो बाहेरचे येवून हिरावतील असा समजही अमरनाथ न्यासाला जमीन देण्याच्या निर्णयाने पसरलेल्या असंतोषा मागे होता. काश्मिरात मुसलमानांना अल्पसंख्य बनविण्याचा प्रयत्न आणि काश्मिरी जनतेचा परंपरागत रोजगार हिरावून घेण्याचा प्रयत्न असा या निर्णयाचा अर्थ लावल्याने निर्माण झालेल्या असंतोषाचे रुपांतर निर्णया विरुद्ध उग्र आंदोलनात झाले. बंद, निदर्शने आणि त्याविरोधात सुरक्षादलाच्या कारवाईने काश्मीर ढवळून निघाले. काही ठिकाणी निदर्शनांनी हिंसक वळण घेतले. निर्णयाचा विरोध करण्यासाठी श्रीनगरमध्ये ५ लाख काश्मिरी नागरिक जमले होते. काश्मिरातील हे सर्वात मोठे जनप्रदर्शन होते. श्रीनगर मध्ये सुरक्षादलाच्या गोळीबारात सहा निदर्शकांचा मृत्यू झाला. अनेक ठिकाणी कर्फ्यू लावावा लागला. निर्णयाविरुद्ध बंद आणि निदर्शनाचे आवाहन करणाऱ्या हुरियत कॉन्फरन्सच्या दोन्ही गटाच्या नेत्यांना घरीच स्थानबद्ध करण्यात आले होते. निर्णयाविरुद्ध तीव्र नाराजी लक्षात घेवून सरकारचा भाग असलेल्या मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीने सरकारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. अमरनाथ न्यासाला जमीन हस्तांतरित करण्याचा निर्णय न्यासाचे पदसिद्ध अध्यक्ष असलेल्या राज्यपालाने पदाची मुदत संपता संपता घेतला होता आणि त्याला गुलामनबी आझाद सरकारने मान्यता दिली होती. या निर्णयावर पीडीपीच्या वनमंत्री व कायदामंत्र्याने सही देखील केली होती. तरी या मुद्द्यावर सरकारातून बाहेर पडण्याचा पीडीपीने निर्णय घेतला होता. पीडीपीच्या निर्णयानंतर राज्यसरकारने जमीन हस्तांतरणाचा निर्णय रद्द केला . तरीही पीडीपीने सरकारचा पाठींबा काढून घेण्याचा निर्णय कायम ठेवला. २६ मे २००८ रोजी घेतलेल्या जमीन हस्तांतराच्या निर्णयाने जम्मू-काश्मिरातील कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकार पीडीपीच्या निर्णयाने अल्पमतात आले आणि मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी आपल्या सरकारचा राजीनामा ७ जुलै २००८ रोजी राज्यपालाकडे दिला. ११ जुलैला राज्यात काश्मीरच्या राज्यघटनेनुसार राज्यपाल राजवट लागू करण्यात आली. दरम्यान राज्यपाल एस.के. सिन्हा यांच्या जागी एन.एन.व्होरा यांची नियुक्ती झाली होती. 

अमरनाथ न्यासाला जमीन हस्तांतरित करण्याच्या निर्णयाला काश्मीरघाटीत विरोध वाढायला लागला तसा राज्याची हिवाळी राजधानी असलेल्या हिंदुबहुल जम्मूत लोक जमीन हस्तांतराच्या निर्णयाच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरायला लागले होते. जम्मू-काश्मीर सरकारचा भाग असलेल्या पीडीपीने निर्णया विरुद्ध भूमिका घेतल्याने जम्मूतील जनतेचा राग पीडीपीवर निघाला. जम्मूतील पीडीपीच्या कार्यालयावर हिंसक जमावाने हल्ला केला होता. जम्मूतील मुसलमानांच्या मुस्लीम फेडरेशनचा व गुज्जर समाजाचा जमीन हस्तांतरणाला पाठींबा होता. तरीही जम्मूतील आंदोलकांनी त्यांच्या वस्तीत जाळपोळ केली होती. जमीन हस्तांतरणाचा निर्णय रद्द होताच जम्मूत असंतोष उफाळून आला. निर्णय रद्द केल्याने काश्मीर हळू हळू शांत होवू लागले होते पण जम्मूत मात्र निदर्शनांनी जोर पकडला होता. जम्मूतील अमरनाथ संघर्ष समितीने काश्मीरला जाणारा हाय वे अडथळे उभारून बंद करण्याचा निर्णय घेतला. हाय वे वर अडथळे उभे करणाऱ्या जम्मूतील निदर्शकांविरुद्ध सुरक्षादलाच्या कारवाईत तिघांचा मृत्यू झाला तर अनेक जखमी झाले होते. काश्मीरघाटीला रसद पुरविणारा हा एकमेव मार्ग असल्याने जम्मूतील आंदोलकांनी उभारलेल्या अडथळ्यांमुळे वाहतुकीवर विपरीत परिणाम झाला. परिणामी काश्मीरघाटीत जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कमी होवून टंचाई निर्माण झाली.                                                                   

जमीन हस्तांतरण रद्द झाल्याने शांत होत चाललेली काश्मीरघाटी हाय वे वरील अडथळ्याने अस्वस्थ झाली. हाय वे वरून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होणार नसेल तर आम्ही नियंत्रण रेषा पार करून पाकव्याप्त काश्मीरमधून वस्तूंची खरेदी करू अशी भूमिका काश्मिरातील संघटनांनी घेतली. दुसरीकडे फळ विक्री थांबल्याने काश्मीर मधील बागायतदार व व्यापारी यांनी विक्रीसाठी भारताच्या इतर भागात फळे जावू दिली नाही तर नियंत्रण रेषेवरून व वाघा सीमेवरून फळे विक्रीसाठी पाकिस्तानात पाठवण्याची घोषणा केली. याचा फायदा घेत हुरियतने व इतर संघटनांनी नियंत्रण रेषा ओलांडून पाकव्याप्त काश्मीरातील मुजफ्फराबाद पर्यंत मार्च काढण्याची घोषणा केली. सरकारने कर्फ्यू लावला तरी ११ ऑगस्ट २००८ रोजी हजारोच्या संख्येने काश्मिरी निदर्शक नियंत्रण रेषा ओलांडण्यासाठी जमा झाले होते.यांना पांगविण्यासाठी पोलीस आणि निमलष्करी दलाने गोळीबार केला. या गोळीबारात १५ ठार आणि शंभरच्या वर जखमी झालेत. ठार झालेल्यात हुरियत कॉन्फरन्सच्या मवाळ गटाचा नेता शेख अब्दुल अझीझ याचा समावेश होता. जमावाच्या दगडफेकीत पोलीस व निमलष्करी जवानही जखमी झाले. हुरियत नेता शेख अब्दुल अझीझ यांचा गोळीबारात मृत्यू झाल्याने त्या विरोधात अनेक ठिकाणी निदर्शने झाली. १२ ऑगस्ट या एकाच दिवशी निदर्शकांना पांगविण्यासाठी गोळीबाराच्या १२ घटना घडल्या.श्रीनगर आणि परिसरात १० निदर्शकांचा मृत्यू झाला यात दोन महिलांचा समावेश होता. तर परीबल येथे झालेल्या गोळीबारात तीन निदर्शाकाचा मृत्यू झाला ज्यात एका महिलेचा समावेश होता. अनंतनाग मध्ये एक आणि किश्तवार मध्ये दोन निदर्शकाचा मृत्यू झाला यातील एकाचे वय १२ वर्ष होते.                                                                           

जम्मूमध्ये १४ ऑगस्ट रोजी बलवंत शर्मा यांनी आपली सर्व संपत्ती अमरनाथ न्यासाला दान करून आत्महत्या केल्याने जम्मूतील तणावही वाढला. २० ऑगस्ट रोजी जम्मूत मोठे निदर्शन झाले ज्यात दोन लाख लोक सहभागी झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. निदर्शकात महिला व मुलांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. जम्मूतील निदर्शने हिंसक न बनल्याने गोळीबाराचा प्रसंग उद्भवला नाही.  आधीच जम्मू आणि काश्मीर या दोन विभागात असलेला तणाव जमीन हाय वे माल वाहतुकीसाठी बंद करण्याचा प्रयत्न झाल्याने कित्येक पटीने वाढला. मात्र श्रीनगरला जाणाऱ्या हाय वे वर असे अडथळे नसल्याचे व वाहतूक सुरु असल्याचा दावा केंद्र सरकारने केला. भारतीय जनता पक्षानेही त्याची री ओढली. हुरियत व काश्मीरघाटीतील विभाजनवादी गट असा अपप्रचार करून लोकांना चिथावत असल्याचे आणि पाकिस्तानची गुप्तचर संस्था आगीत तेल ओतत असल्याचा दावा करण्यात आला. नवनियुक्त राज्यपाल यांनी परिस्थिती सुरळीत होण्यासाठी आणि जम्मू आणि काश्मीर यांच्यातील वैर कमी करण्यासाठी दोन्ही भागात अनेक बैठका घेतल्या. जम्मू आणि काश्मीर मधील अनेक स्वयंसेवी संस्थांनी व संघटनांनी परिस्थिती सुरळीत करण्यासाठी राज्यपाल व्होरा यांची साथ दिली.जमीन हस्तांतरणाने निर्माण झालेल्या परिस्थितीवर पंतप्रधान मनमोहनसिंग लक्ष ठेवून होते.  नवी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलावून त्यांनी जम्मू-काश्मिरात उद्भवलेल्या परिस्थितीची माहिती देवून काय तोडगा काढता येईल याची चर्चा केली. सर्व पक्षांना विश्वासात घेवून त्यांच्याशी चर्चा केल्याने या पेचप्रसंगात सर्व पक्षांची मदत घेण्यात मनमोहनसिंग यांना यश आले. मनमोहनसिंग यांच्या प्रयत्नामुळे सर्वपक्षीय शिष्टमंडळाने जम्मू व श्रीनगरला भेट देवून लोकांशी बोलणीही केली. सर्वपक्षीय शिष्टमंडळाला शांतता प्रस्थापित करण्यात यश आले नसले तरी राष्ट्रीय प्रश्नावर सर्वाना सोबत घेवून चालण्याची मनमोहन नीती या निमित्ताने अधोरेखित झाली. 

                                                                   (क्रमशः)

-----------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि. यवतमाळ 
मोबाईल : ९४२२१६८१५८ 

Friday, November 24, 2023

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - ८१

 घटनेत बदल किंवा सीमारेषेत बदल हा काश्मीर प्रश्न सोडविण्याचा मार्ग नसल्याची मनमोहनसिंग यांची ठाम भूमिका होती. काश्मीर प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी फार पुढे जाता आले नाही तरी तिथे शांतता नांदण्यावर आणि भारत-पाकिस्तान संबंधातील तणाव कमी करण्यावर त्यांचा भर होता.
--------------------------------------------------------------------------------------


पाकिस्तान बरोबरच्या बॅंक चॅनेल चर्चेसाठी मनमोहनसिंग यांनी जसा प्रतिनिधी नेमला तसा काश्मिरी नेते व जनता यांच्याशी चर्चा करण्यासाठी वेगळा प्रतिनिधी  नेमला नाही. या चर्चेची सूत्रे त्यांनी आपल्या हातात ठेवली. नरसिंहराव मंत्रीमंडळात अर्थमंत्री असल्यापासून काश्मीर प्रश्नाशी त्यांचा संबंध आला होता. त्यानंतर अटलबिहारी यांच्या कार्यकाळात काश्मीर विषयक भूमिका ठरविण्याची जबाबदारी कॉंग्रेस पक्षाने त्यांच्यावरच सोपविली होती. याकाळात पीडीपी व कॉंग्रेस यांच्या युतीतून बनलेल्या काश्मीर सरकारचे ते शिल्पकार होते. काश्मीर प्रश्नाशी त्यांच्या आलेल्या संबंधाने परिस्थिती सुधारण्यासाठी नेमके काय केले पाहिजे याबाबत ते स्पष्ट होते. पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष मुशर्रफ यांनी 'चिनाब फॉर्म्युला' पुढे आणला होता. चिनाब नदी ही नवी सीमारेषा ठरवून काश्मीर प्रश्न सोडवावा असे त्यांनी सुचविले होते. पण  घटनेत बदल किंवा सीमारेषेत बदल हा काश्मीर प्रश्न सोडविण्याचा मार्ग नसल्याची मनमोहनसिंग यांची ठाम भूमिका होती. काश्मीर प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी फार पुढे जाता आले नाही तरी तिथे शांतता नांदण्यावर आणि भारत-पाकिस्तान संबंधातील तणाव कमी करण्यावर त्यांचा भर होता.  काश्मीरला विभागणारी नियंत्रण रेषा तणावाचे कारण न बनता शांतता व सौहार्दाचे प्रतिक बनली पाहिजे यावर त्यांचा जोर होता. त्यामुळे काश्मीरच्या दोन्ही भागात लोकांना सहज येता जाता येईल व त्यांच्यात व्यापार सुरु होईल यावर त्यांचा भर होता. नया जम्मू-काश्मीर - लडाख हे त्यांचे घोष वाक्य होते. नव्या काश्मीरच्या निर्मितीसाठी संवाद आणि विकास ही त्यांची द्विसूत्री होती. हिंसकं कारवाया सोडून जे बोलायला पुढे येतील त्यांच्याशी संवाद साधण्याची मनमोहनसिंग यांची तयारी होती. नव्या काश्मीरसाठी नव्याने सुरुवात करण्याचे आवाहन त्यांनी सत्ता हाती घेतल्यानंतर २००४ साली काश्मीरला दिलेल्या पहिल्या भेटीत तेथील जनतेला केले. 

डॉ.मनमोहनसिंग यांनी २००४ साली जम्मू-काश्मीर राज्यासाठी विकासनिधी जाहीर करताना आणखी एक घोषणा केली होती. राज्यात आतंकवादी घटना कमी झाल्याने राज्यातील सुरक्षादलाच्या संख्येत घट करण्याचे त्यांनी जाहीर केले. मात्र आतंकवादी घटनात वाढ झाली तर संख्या पुन्हा वाढविण्यात येईल हे त्यांनी स्पष्ट केले. २००० साली जनरल सुंदरराजन पद्मनाभन भारताचे लष्कर प्रमुख झाल्यावर त्यांनी सैन्याने जम्मू-काश्मिरातील आतंकवाद जवळपास संपुष्टात आणल्याने नागरी भागातून सैन्य कमी केले पाहिजे अशी सूचना केली होती. जम्मू-काश्मीर पोलिसांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळली पाहिजे असे त्यांनी मत व्यक्त केले होते. अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारने त्यांच्या सूचनेकडे दुर्लक्ष केले होते. उलट त्यांना सांगण्यात आले की सैन्य मागे घेण्याचा निर्णय राजकीय असेल व अशा निर्णयाच्या बाबतीत सेना प्रमुखांनी न बोललेले बरे. जनरल पद्मनाभन २००२ साली पदावरून निवृत्त झाले होते. सत्तेत आल्यावर मनमोहनसिंग यांनी त्यांच्या सुचनेची अंशत: का होईना अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला . सतत लष्कराच्या छायेत वावरणाऱ्या जनतेलाही या निर्णयाने दिलासा मिळाला व चर्चेसाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले. काश्मिरातील राजकीय-सामाजिक प्रतिनिधींशी चर्चा करण्यासाठी मनमोहनसिंग यांनी श्रीनगरमध्ये गोलमेज परिषद घेतली. २५ फेब्रुवारी २००६ रोजी पार पडलेल्या या परिषदेत प्रतिनिधींनी केलेल्या मागणीला प्रतिसाद देताना ज्यांच्यावर हिंसाचाराचे गंभीर गुन्हे नाहीत त्यांच्या प्रकरणाची समीक्षा करून त्यांना तुरुंगातून मुक्त करण्यासाठी एक समिती नेमण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. ही गोलमेज परिषद म्हणजे काश्मीरमध्ये शांतता आणि समृद्धीची सुरुवात असल्याचे त्यांनी सांगितले. हुरियत कॉन्फरन्सने मात्र मनमोहनसिंग यांनी बोलावलेल्या या गोलमेज परिषदेवर बहिष्कार टाकला होता. २५ मे २००६ रोजी सिंग यांनी बोलावलेल्या दुसऱ्या गोलमेज परिषदेवरही हुरियत कॉन्फरन्सने बहिष्कार टाकला. मात्र पहिल्या आणि दुसऱ्या गोलमेज परिषदे दरम्यान सरकारची हुरियत नेत्यांशी अनौपचारिक चर्चा झाली होती. या चर्चेत काश्मीर संबंधी पुढे कसे जाता येईल या संबंधीचे आपले प्रस्ताव सरकार समोर ठेवण्याची तयारी हुरियतने दाखविल्याची माहिती पंतप्रधानांनी या परिषदेत देवून आपले जे काही प्रस्ताव आहेत ते गोलमेज परिषदेत सहभागी होवून सादर करावेत असे हुरियतला आवाहन केले. गंभीर आरोप नसलेल्या आरोपींची तुरुंगातून मुक्तता करण्याच्या प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी पंतप्रधान कार्यालयात एक कक्ष उघडण्याची घोषणा मनमोहनसिंग यांनी दुसऱ्या गोलमेज परिषदेत केली.

कॉंग्रेस-पीडीपी यांच्यात संयुक्त सरकार स्थापन करण्यासाठी झालेल्या करारानुसार पहिले ३ वर्षे मुख्यमंत्री राहिल्यावर पीडीपी प्रमुख मुफ्ती मोहम्मद सईद यांनी राजीनामा देवून कॉंग्रेसचा मुख्यमंत्री होण्यासाठी वाट करून दिली होती. कॉंग्रेसने गुलाम नबी आझाद यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपविले होते. मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाल्यावर मुफ्ती मोहम्मद सईद यांनी नागरी भागातून लष्कर काढून घेण्यासाठी मनमोहनसिंग सरकारवर दबाव वाढविला. सुरक्षेशी कोणतीही तडजोड न करता सुरक्षादलाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलविता येईल का याचा विचार करण्यासाठी ३० मार्च २००७ साली एक पॅनेल नेमण्यात आले. तर दुसरे पॅनेल सशस्त्र दल विशेष शक्ती कायदा (आफसा) काही भागातून मागे घेता येईल का याचा विचार करण्यासाठी स्थापन करण्यात आले. २४ मार्च २००७ रोजी झालेल्या तिसऱ्या गोलमेज परिषदेत पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी काश्मीरमधील सैन्य स्थिती व सुरक्षे विषयीच्या मुद्द्यांची चर्चा केली. आतंकवादी हल्ल्यांची सतत आशंका असल्याने सुरक्षा बंदोबस्त ठेवणे गरजेचे बनले आहे. मात्र याचा सर्वसामान्य नागरिकांना आपले दैनंदिन व्यवहार पार पाडण्यात त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचे आश्वासन पंतप्रधानांनी दिले. सुरक्षा दलाकडून मानवी हक्काचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेतली जाईल असेही त्यांनी परिषदेत सांगितले. दहशतवाद्यांच्या अमानवीय कृत्यांवर परिषदेत त्यांनी टीका केली. तिसरी गोलमेज परिषद सुरक्षा विषयक स्थिती आणि मानवी अधिकाराचे उल्लंघन यावर केंद्रित होती. गोलमेज परिषदांचा हा इतिहास लक्षात घेतला तर २००४ साली सत्तेत आल्यानंतर मनमोहनसिंग सतत काश्मिरी जनतेशी संवाद साधण्याचा, त्यांना चांगल्या भविष्याकडे नेण्याचा प्रयत्न करीत होते हे लक्षात येते. त्यांच्या या प्रयत्नात पहिला अडथळा आला तो २००८ साली. जम्मू-काश्मिरात कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारने २६ मे २००८ रोजी अमरनाथ  न्यासाला १०० एकर जंगल जमीन देण्याचा निर्णय घेतला. या निर्णया विरोधात काश्मीरमध्ये मोठे आंदोलन उभे राहिले. अमरनाथ यात्रेकरूंसाठी सुविधा निर्माण करण्याला काश्मिरी जनतेचा विरोध नव्हता. जमिनीची मालकी न्यासाला सोपविण्याला त्यांचा विरोध होता. अशी मालकी सोपविली तर तिथे लोकांना वसविले जाईल व मुस्लीम बहुल काश्मीरच्या लोकसंख्येत बदल करण्याचा प्रयत्न होईल हा मुख्य आक्षेप होता. त्यामुळे या निर्णया विरोधात काश्मिरी जनता रस्त्यावर उतरली. काश्मिरी जनतेच्या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून हिंदुबहुल जम्मूची जनताही रस्त्यावर उतरली. मनमोहन सरकारला चार वर्षे काश्मीरमध्ये शांतता ठेवण्यात यश आले होते. पण या निर्णयाने पुन्हा एकदा जम्मू-काश्मीर अशांत क्षेत्र बनले.

                                                                               (क्रमशः)

------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि.यवतमाळ 
मोबाईल : ९४२२१६८१५८ 

Thursday, November 16, 2023

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - ८०

 मनमोहनसिंग यांनी काश्मीरच्या स्वायत्तते संदर्भात नरसिंहराव यांनी केली तशी 'स्काय इज द लिमीट' सारखी घोषणा केली नाही की अटलबिहारी वाजपेयी सारखी संविधानापलीकडे मानवीयता, लोकतंत्र आणि काश्मिरियत अशी काश्मीर प्रश्न सोडविण्याच्या त्रिसूत्री सारखे एखादे सुत्र सांगितले नाही. आजच्या परिस्थितीत काश्मीर प्रश्नावर आपण कितपत पुढे जावू शकतो याचा विचार करून त्यांनी पुढची दिशा सांगितली. 
--------------------------------------------------------------------------------------------


अटलबिहारी वाजपेयी यांचे काश्मीर विषयक धोरण पुढे नेत असतानांच डॉ. मनमोहनसिंग यांनी त्याला आपल्या भूमिकेची जोड दिली. मनमोहनसिंग अर्थशास्त्री असल्याने काश्मीर समस्येच्या निराकरणासाठी आर्थिक अंगाने त्यांनी विचार केला. १९९० च्या दशकात काश्मीर दहशतवादाने ग्रस्त राहिल्याने विकासकामे जवळपास ठप्प झाली होती. त्याचा रोजगाराच्या उपलब्धतेवरही विपरीत परिणाम झाला. १९९०च्य दशकात दहशतवादी टोळ्यात सामील होणे हाच एक रोजगार सुलभ होता. मनमोहनसिंग यांनी सत्तेत येताच काश्मीरसाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर केले होते ज्यात मोठ्या प्रकल्पांसह शिक्षण, आरोग्य, वीज आणि पानी पुरवठा या सारख्या बाबींना प्राधान्य देण्यात आले होते. पर्यटनाला प्रोत्साहन मिळावे रस्ते आणि रेल्वे यावर भर देण्यात आला होता. २००४ साली जाहीर केलेल्या या योजनांवर ३७००० कोटी खर्च करण्यात आले. केवळ विविध प्रकल्पच सुरु करण्यात आले नाही तर त्या प्रकल्पात काम मिळण्यासाठी लागणारे कौशल्य विकसित करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले होते. मनमोहनसिंग यांनी विदेशात उच्चशिक्षण घेतले ते केवळ शिष्यवृत्तीच्या बळावर. त्यामुळे शिष्यवृत्तीचे महत्व ते जाणून होते. काश्मीरमध्ये शिक्षणाचा विस्तार आणि कौशल्य विकास यासाठी आर्थिक विषयावर पंतप्रधानांना सल्ला देणाऱ्या समितीचे अध्यक्ष सी.रंगराजन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती. समितीने २१०० कोटी रुपये खर्चाची शिष्यवृत्ती योजना काश्मीरच्या युवकांसाठी तयार केली ज्याला मनमोहनसिंग यांनी मंजुरी दिली. त्यामुळे काश्मीरमधील प्रकल्पात काश्मीरमधील युवकांना काम मिळण्याचा मार्ग प्रशस्त झाला. मनमोहन काळातील वेगवान आर्थिक घडामोडीमुळे काश्मिरातील युवक व जनता दहशतवादाकडे वळण्या ऐवजी विकास कामात सहभागी झाली. ९०च्या दशकातील दहशतवादाने पोळलेल्या जनतेला मनमोहनसिंग यांचा विकासमार्ग भावल्याने काश्मिरातील मोठ्या दहशतवादी घटनात बरीच  घट झाली होती.                                               

२००८ ते २०१० या काळात काश्मीरमध्ये जनतेची मोठी आंदोलने झालीत व आंदोलकांवर गोळीबाराच्या मोठ्या घटनाही घडल्यात. सुरक्षादलाच्या  गोळीबारात एकाच दिवशी सर्वाधिक मृत्यू होण्याची घटना मनमोहनसिंग यांच्या काळातच घडली होती. मनमोहन काळात मुंबईत घडली तशी भयावह दहशतवादी घटना काश्मिरात घडली नाही हे खरे पण दहशतवादी गटाशी चकमकी होतच होत्या. भारतीय जनता पक्षाचा व पंतप्रधान मोदींचा मनमोहन काळात दहशतवादा बद्दल मऊ धोरणाचा आरोप आकड्याच्या आधारावर टिकणारा नाही. मनमोहन काळात ४०००च्या वर दहशतवादी मारले गेले. अटलबिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदी यांच्या काळात मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांपेक्षा ही संख्या मोठी आहे. असे असले तरी मनमोहनसिंग यांचा काळ काश्मीरच्या आर्थिक विकासासाठी सुवर्णकाळ मानला जातो. या काळात वीज निर्मिती आणि वितरण वाढले. गांवागांवात वीज पोचली. रस्त्यांची कामे झालीत. रेल्वेच्या कामांना वेग येवून सर्व मोसमात चालेल अशी रेल्वेही सुरु झाली. पर्यटन उद्योगाला चांगले दिवस आले. पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी २००४ मध्ये जे पॅकेज घोषित केले होते ते २४००० कोटीचे होते. पुढे किंमती वाढल्याने ते ३७००० कोटीचे झाले. यात ६७ कामे निश्चित करण्यात आली होती आणि त्यातील बहुतेक कामे पूर्णही झालीत. या ६७ कामातील एक काम होते जम्मू मध्ये राहण्याची नीट सोय नसणाऱ्या निर्वासित काश्मिरी पंडितांसाठी पक्के बांधकाम.  मनमोहनसिंग काश्मीरला सर्वाधिक वेळा भेट देणारे पंतप्रधान होते तरी पूर्ण झालेल्या प्रकल्पांच्या उद्घाटनासाठी त्यांना वेळ मिळाला नाही. कदाचित काम पूर्ण होणे महत्वाचे ,उद्घाटन महत्वाचे नाही या धारणेतूनही त्यांनी उदघाटनाकडे दुर्लक्ष केले असेल. त्यांच्या काळात पूर्ण झालेले पण त्यांनी उदघाटन न केलेले महत्वाचे प्रकल्प होते कटरा लिंक प्रोजेक्ट,उरी-२ वीज प्रकल्प, श्रीनगर - लेह ट्रान्समिशन लाईन, निमो - बाझगो प्रकल्प. पुढे मनमोहन काळात पूर्ण झालेल्या काही प्रकल्पांचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. मनमोहन काळातील काश्मिरात घडलेल्या आर्थिक घडामोडीने भारतापासून काश्मीरला वेगळे करू पाहणाऱ्या शक्ती अस्वस्थ झाल्या होत्या. २०१३ साली रेल्वेच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान जेव्हा काश्मीरमध्ये गेले होते तेव्हा विभाजनवाद्यांनी त्यांचे स्वागत काश्मीर बंद करून केले. हा बंद पुकारण्यात हुरियतचे दोन्ही गट आणि जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचा पुढाकार होता. त्यांचे म्हणणे होते की पंतप्रधान मनमोहनसिंग काश्मीरमध्ये येतात ते एखाद्या विकासकामाच्या उदघाटनासाठी किंवा विकासकामाचा प्रारंभ करण्यासाठी. काश्मीर प्रश्नाची राजकीय उकल करण्यासाठी पंतप्रधान पुढाकार घेत नसल्याची या फुटीरतावादी गटांची तक्रार होती. त्यासाठी त्यांनी बंद पुकारला होता. फुटीरतावादी गटांच्या तक्रारीत फारसे तथ्य नव्हते.                                                         

पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी काश्मीरच्या आर्थिक विकासाकडे जेवढे लक्ष दिले तेवढेच लक्ष काश्मीर प्रश्नावर राजकीय तोडगा काढण्याकडेही दिले होते. फरक एवढाच होता की तोडगा काढण्याचा प्रयत्न ते पुढच्या दाराने करण्यापेक्षा मागच्या दाराने करीत होते ज्याला बॅंक डोअर  बॅंक चॅनेल डीप्लोमसी म्हणतात. नरसिंहराव पासून ते मोदी पर्यंत सर्व पंतप्रधानांनी पाकिस्तान सोबत चर्चेसाठी हा मार्ग अवलंबिला आहे. कारण भारतीय जनमत हे पाकिस्तान सोबत चर्चा करणाऱ्या सरकारला कमजोर समजते ! भारतीय जनतेच्या माहितीपासून व नजरेपासून दूर भारत-पाकिस्तान प्रतिनिधींच्या बैठका होत असतात. अशा बैठकांचे दुसरे कारण हे आहे की दोन्ही देशाच्या काश्मीरबाबत घोषित भूमिकेच्या विपरीत चर्चा करणे दोन्ही देशातील जनतेला रुचत नाही आणि पटत नाही. अशा प्रकारच्या चर्चा अनधिकृत असल्या तरी अधिकृत चर्चेत घ्यायच्या निर्णयासाठी या चर्चांची उपयुक्तता वादातीत आहे. अशा अनधिकृत व अनौपचारिक  चर्चांसाठी नियुक्त प्रतिनिधी मात्र अधिकृतपणे नियुक्त केलेले असतात ! अशा चर्चेसाठी जो अजेंडा असतो तो उच्च पातळीवर अधिकृतपणे तयार केलेला असतो. त्या त्या वेळच्या राष्ट्रप्रमुखाचा कल लक्षात घेवूनच या चर्चा होतात. मनमोहनसिंग यांनी काश्मीरच्या स्वायत्तते संदर्भात नरसिंहराव यांनी केली तशी 'स्काय इज द लिमीट' सारखी घोषणा केली नाही की अटलबिहारी वाजपेयी सारखी संविधानापलीकडे मानवीयता, लोकतंत्र आणि काश्मिरियत अशी काश्मीर प्रश्न सोडविण्याच्या त्रिसूत्री सारखे एखादे सुत्र सांगितले नाही. आजच्या परिस्थितीत काश्मीर प्रश्नावर आपण कितपत पुढे जावू शकतो याचा विचार करून त्यांनी पुढची दिशा सांगितली. काश्मीरला विभाजित करणारी रेषा आपण बदलू शकत नाही याचे भान ठेवून त्यांनी मार्ग सांगितला. नियंत्रण रेषा राहणार आहे पण ती कागदावर राहील यासाठी प्रयत्न करता येतील. व्यवहारा मध्ये काश्मीरच्या दोन्ही भागातील लोक एकमेकांकडे जावू येवू शकतील. आपसात व्यापार करू शकतील. व्यापार वाढवू शकतील. सांस्कृतिक देवाणघेवाण होवू शकेल. असे झाले तर आज नियंत्रण रेषेवर भारत-पाकिस्तानात जो तणाव आहे तो संपुष्टात येईल. असे होणे शक्य आहे मात्र त्यासाठी पाकिस्तानने आतंकवाद व आतंकवाद्यांना आश्रय देणे थांबविले तरच. यामुळे दोन्ही देशांना हवा तसा काश्मीर प्रश्न सुटणार नाही पण दोन्ही देशात काश्मीरवरून असलेला तणाव व शत्रुता कमी होईल अशी मनमोहनसिंग यांची धारणा होती. या दृष्टीने पाकिस्तान सोबत अनौपचारिक चर्चा करण्यासाठी त्यांनी आपले प्रतिनिधी म्हणून सतिंदर लांबा या मुत्सद्याची निवड केली होती. 

                                             (क्रमशः)

----------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि. यवतमाळ 
मोबाईल : ९४२२१६८१५८ 

Thursday, November 2, 2023

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - ७९

मनमोहनसिंग यांचा  नरसिंहराव काळापासून काश्मीर प्रश्नाशी त्यांचा संबंध आल्याने काय करण्याची गरज आहे याबाबत त्यांची स्पष्ट अशी भूमिका होती. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील नियंत्रण रेषेत फेरफार किंवा बदल शक्य नाही पण काश्मिरी जनतेला विभागणारी सीमारेषा बदलता येत नसली तरी ती निष्प्रभ ठरवता येईल असा त्यांचा विश्वास होता. सीमेवरून दळणवळण आणि व्यापार वाढला तर सीमा आपोआप पुसट होईल असे त्यांना वाटत होते.
---------------------------------------------------------------------------------------


 सर्वाधिक वेळा काश्मीरचा दौरा करणारे पंतप्रधान म्हणून मनमोहनसिंग यांची नोंद घ्यावी लागेल. आपल्या १० वर्षाच्या कारकिर्दीत मनमोहनसिंग यांनी तब्बल १६ वेळा काश्मीरला भेट दिली. या भेटी प्रामुख्याने विकास योजनांचा प्रारंभ करण्यासाठी किंवा काश्मीरमध्ये चिरकाल शांतता टिकावी यासाठी विविध पक्षाशी आणि गटांशी चर्चा करण्यासाठी आयोजिलेल्या असायच्या. पंतप्रधानाच्या एवढ्या भेटी आणि एवढ्या बैठका हा त्याकाळात काश्मीर मधील दहशतवादी गटांच्या कारवायांना बराच आळा बसला होता याचा पुरावा मानला जातो. काश्मीरमध्ये आतंकवादी कारवायांसाठी आधी सारखी अनुकूल परिस्थिती नसल्यानेच भारताला धक्का देण्यासाठी पाकिस्तानच्या मदतीने पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनांनी  मुंबईत २००८ साली मोठा आतंकवादी हल्ला घडवून आणला.  मनमोहनसिंग यांच्या कारकिर्दीतील पहिली चार वर्षे काश्मिरात बऱ्यापैकी शांतता असल्याने विविध विकासकामांना याकाळात चालना मिळाली. भारत - पाकिस्तान संबंध सुधारले तरच काश्मिरात शांतता नांदेल हे अटलबिहारी वाजपेयी यांनी ओळखले होते आणि म्हणून अनुकूल स्थिती नसतानाही त्यांनी पाकिस्तानशी विविध पातळीवर चर्चा आणि संवाद सुरु ठेवला होता. मनमोहनसिंग यांनी या चर्चेत आणि संवादात खंड पडू दिला नाही. सार्क बैठकीच्या वेळी अटलबिहारी आणि मुशर्रफ यांच्यात २००४ साली शेवटची बैठक झाली होती. त्यात मंत्री आणि अधिकारी पातळीवर बैठका घेवून संबंध सुरळीत करण्यावर भर दिला होता. ही प्रक्रिया मनमोहनसिंग यांनी पुढे नेली. अधिकृत चर्चेशिवाय नागरिक आणि निवृत्त अधिकारी पातळीवर अनौपचारिक चर्चेवरही मनमोहनसिंग यांनी भर दिला होता. नरसिंहराव काळापासून काश्मीर प्रश्नाशी त्यांचा संबंध आल्याने काय करण्याची गरज आहे याबाबत त्यांची स्पष्ट अशी भूमिका होती. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील नियंत्रण रेषेत फेरफार किंवा बदल शक्य नाही पण काश्मिरी जनतेला विभागणारी सीमारेषा बदलता येत नसली तरी ती निष्प्रभ ठरवता येईल असा त्यांचा विश्वास होता. सीमेवरून दळणवळण आणि व्यापार वाढला तर सीमा आपोआप पुसट होईल असे त्यांना वाटत होते व म्हणून त्यांनी त्या दिशेने पाउले उचलली. यातील पहिले महत्वाचे पाउल होते श्रीनगर ते मुजफर्राबाद बस सेवा सुरु करण्याचे .

२००४ साली पंतप्रधान बनल्यानंतर काही महिन्यातच युनोच्या आमसभेच्या प्रसंगी मनमोहनसिंग - मुशर्रफ भेट झाली होती. या भेटीत दोन देशातील विश्वास वृद्धिंगत करण्यासाठी वाजपेयी काळात ठरल्या प्रमाणे अधिकारी व मंत्री पातळीवरच्या बैठका पुढे चालू ठेवण्याचा निर्णय झाला. त्यानुसार दोन देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या झालेल्या बैठकीत श्रीनगर ते मुजफर्राबाद बससेवा सुरु करण्याचा निर्णय झाला. स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानने पश्तुनी टोळ्यांना शस्त्रसज्ज करून काश्मिरात घुसखोरी केली तेव्हापासून या दोन शहरा दरम्यान सुरु असलेली बससेवा खंडित झाली होती. ही बससेवा सुरु करण्यावर पहिल्यांदा १९९९-२००० साला दरम्यान वाजपेयी आणि नवाज शरीफ यांचे दरम्यान चर्चा झाली होती. नंतर २००२ मध्ये मुफ्ती मोहम्मद सईद जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री बनल्यानंतर  पंतप्रधान वाजपेयी यांचेकडे या बससेवेचा विषय काढला. वाजपेयी अनुकूल होते पण पाकिस्तानचा प्रतिसाद फारसा उत्साहवर्धक नसल्याने तो विषय मागे पडला. सीमापार दळणवळण आणि व्यापार सुरु करण्यात मनमोहनसिंग यांना विशेष रस असल्याने त्यांच्या सरकारने पाठपुरावा करून ही बससेवा सुरु करण्यास पाकिस्तानला तयार केले. दोन्ही देशातील आणि काश्मीरच्या दोन्ही भागातील संबंध सुरळीत होणारे हे पाउल असल्याने दहशतवादी संघटनांचा या बससेवेला विरोध होता. ६ एप्रिल २००५ रोजी श्रीनगरहून सुटणाऱ्या बसला पंतप्रधान हिरवी झेंडी दाखविणार होते. तो कार्यक्रम हाणून पडण्यासाठी दहशतवाद्यांनी बस जिथून सुरु होणार होती तिथे जाळपोळ केली होती. तरी सुद्धा ठरलेल्या वेळी बससेवा सुरु करण्याचा निर्णय झाला आणि बसला हिरवी झेंडी दाखविण्यासाठी पंतप्रधान मनमोहनसिंग श्रीनगरला आले. मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांची कन्या व पीडीपी पक्षाची अध्यक्षा महेबुबा मुफ्ती यांनी या पहिल्या बस मधून प्रवास केला. सीमापार बससेवा हा दोन देशातील विश्वास वाढविणारी  घटना होती. हुरियत कॉन्फरन्स, जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंट, आणि इतर विरोधी गटांना बससेवा प्रारंभ करण्याच्या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले होते पण त्यांनी कार्यक्रमावर बहिष्कार टाकणे पसंत केले. काश्मिरी जनतेने मात्र या ऐतिहासिक बससेवेचे स्वागत केले. 

वाजपेयींनी जेव्हा नवी दिल्ली - लाहोर बससेवा सुरु करण्याचा व पहिल्या बसने लाहोरला जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर त्या निर्णयाचा गाजावाजा आणि स्वागत झाले होते. दोन देशातील संबंध सुधारण्याच्या दृष्टीने त्या काळातील ते मोठे पाउल होते. तेवढा गाजावाजा श्रीनगर-मुजफर्राबाद बससेवेचा झाला नसला तरी प्रत्यक्ष काश्मिरात सर्वसामान्य जनतेने या बससेवेला डोक्यावर घेतले. अनेक विभागलेल्या कुटुंबाच्या भेटीगाठी या बससेवेने सुकर केल्या होत्या. ही बससेवा सुरु झाल्यानंतर १० दिवसांनी पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष मुशर्रफ हे भारत-पाक क्रिकेट सामना पाहण्याच्या निमित्ताने भारत भेटीवर आले होते. त्यावेळी झालेल्या मनमोहन-मुशर्रफ बैठकीत दोन्ही देशा दरम्यान रेल्वेसेवा सुरु करण्याचा निर्णय झाला. काश्मीरमधील आणखी काही शहरा दरम्यान बससेवा सुरु करण्याला अनुकुलता दाखविण्यात आली. सर्वात महत्वाचा निर्णय झाला तो काश्मीरमधील नियंत्रण रेषा व्यापारासाठी खुली करण्याचा. नियंत्रण रेषा किंवा सीमारेषा बदलता येणार नसली तरी ती निष्प्रभ ठरविण्याच्या मनमोहनसिंग यांच्या विचाराला व प्रयत्नाला मिळालेले हे मोठे यश होते. याचवर्षी पाकव्याप्त काश्मीरला उध्वस्त करणारा मोठा भूकंपाचा हादरा बसला. या भूकंपात ८० हजाराच्यावर लोक मृत्युमुखी पडले आणि तितकेच जखमी झालेत. जगभरातून मदतीचा ओघ सुरु झाला. ही मदत लवकर पोचण्यासाठी जम्मू नियंत्रण रेषेवरील मार्ग खुला करणे गरजेचे होते. भारताने तात्काळ मान्यता दिली. हा नवा मार्ग खुला केला तर पाकव्याप्त काश्मीर मधील काही शहरावर भारतीय प्रभाव वाढण्याची पाकिस्तानला भीती वाटत होती. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरून मदतीसाठी मार्ग खुला करण्याचा दबाव वाढल्यानंतर जम्मू नियंत्रण रेषेवरून पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाण्याचा मार्ग पाकिस्तानने खुला केला व भूकंपग्रस्तासाठी भारताने केलेली मदत स्वीकारली पण ती देखील मनाचा कोतेपणा दाखवून.  मदत भारतातून आली आहे याचे कोणतेही चिन्ह दिसणार नाही याची काळजी पाकिस्तानने घेतली. श्रीनगर - मुजफार्राबाद बसमुळे विभक्त परिवारांना मिळालेला दिलासा व निर्माण झालेले सौहार्द लक्षात घेवून पुढे २००६ साली पुछ्-रावळकोट बस सुरु करण्यास दोन्ही देशांनी मान्यता दिली. त्यावेळी पीडीपी-कॉंग्रेस करारानुसार  जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री पद कॉंग्रेसचे गुलाम नबी आझाद यांचेकडे आले होते. त्यांनीच या बसला हिरवी झेंडी दाखविली. दोन देशातील विश्वास आणि जनतेचे संबंध वाढविण्यासाठी मनमोहन काळात झालेला आणखी एक महत्वाचा निर्णय म्हणजे अमृतसरहून गुरु नानक यांचे जन्मस्थान असलेल्या पाकिस्तानातील नानकाना साहिब येथे जाण्यासाठी बससेवा सुरु करणे. पंज आब या नावाने ही बस सेवा सुरु झाली. २४ मार्च २००६ साली पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी या बसला हिरवी झेंडी दाखविली. पाकिस्तानने दोस्ती नावाने या मार्गावर बससेवा सुरु केली. मनमोहनसिंग यांनी दोन देशातील विश्वास वाढविण्यासाठी आणि जनतेचे संबंध वाढविण्यासाठी बस डीप्लोमसीचा यशस्वीरीत्या वापर केला. मनमोहनसिंग यांचे जन्मगांव पाकिस्तानात असूनही १० वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी एकदाही पाकिस्तानला भेट दिली नाही.

                                                          (क्रमशः)

----------------------------------------------------------------------------------  

सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि.यवतमाळ 
मोबाईल : ९४२२१६८१५८ 

Thursday, October 26, 2023

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - ७८

 वाजपेयी काळात मनमोहनसिंग काश्मीरवर लक्ष ठेवून होते आणि याची प्रचिती ते पंतप्रधान झाल्याबरोबर आली. वाजपेयी काळात सुरु झालेली प्रक्रिया पुढे नेण्यासाठी सरकारचा दूत म्हणून वाजपेयी यांनी काम करावे अशी विनंती पंतप्रधानाच्या वतीने वाजपेयी यांना करण्यात आली होती.
------------------------------------------------------------------------------------------
    

पंतप्रधान वाजपेयी यांच्या काळापर्यंत भारताच्या काश्मीर धोरणाचे एक वैशिष्ट्य राहिले आहे. ते म्हणजे एका पंतप्रधानाने आखलेले काश्मीर धोरण नंतर येणाऱ्या पंतप्रधानाने पुढे नेले नाही. याला अल्पकाळाचा अपवाद राहिला आहे तो नरसिंहराव यांचे नंतर पंतप्रधान झालेले देवेगौडा यांचा. दशकभर राज्यपाल व राष्ट्रपती राजवटीचा अंमल राहिलेल्या जम्मू-काश्मीर मध्ये लवकरात लवकर विधानसभा निवडणूक घेवून निर्वाचित सरकारच्या हाती तेथील कारभार सोपविण्याचा नरसिंहराव यांचा प्रयत्न व आग्रह होता. यासाठी भारतीय राज्यघटनेच्या चौकटीत देता येईल तितकी स्वायत्तता देण्याची त्यांची तयारी होती. नरसिंहराव यांचे हेच धोरण आपल्या ११ महिन्याच्या अल्प कार्यकाळात देवेगौडा यांनी पुढे नेले व विधानसभेच्या निवडणुका घेतल्या. स्वायत्ततेच्या बाबतीत नरसिंहराव यांचेच धोरण पुढे नेण्याची घोषणाही त्यांनी केली होती. काश्मीर विधानसभेने पारित केलेला भारतीय राज्यघटने अंतर्गत स्वायत्तता देण्याचा प्रस्ताव वाजपेयी सरकारने फेटाळून आधीच्या सरकारच्या धोरणाशी फारकत घेतली. काश्मीरच्या बाबतीत अशी फारकत पहिल्यांदाच घेतली गेली नव्हती. आपल्या शेवटच्या दिवसात पंडीत नेहरुंना शेख अब्दुल्लांना अटक ही चूक होती याची जाणीव झाली होती. शेख अब्दुल्लांना बाजूला सारून काश्मीर बाबत तोडगा काढता येणार नाही हेही त्यांच्या लक्षात आले होते. शेख अब्दुल्लांची मुक्तता करून काश्मीरप्रश्नी तोडगा काढण्याचे प्रयत्न त्यांनी सुरु केले. या कामी मदत करण्यासाठी त्यांनी आग्रहपूर्वक लालबहादूर शास्त्रींना दिल्लीला बोलावून मंत्रीमंडळात सामील करून घेतले व काश्मीरप्रश्नी वाटाघाटीची जबाबदारी सोपविली होती. पण पुढे काही प्रगती होण्या आधीच नेहरूंचे निधन झाले. त्यांच्या नंतर लालबहादूर शास्त्री पंतप्रधान झाले आणि शेवटच्या काळात नेहरूंनी काश्मीर प्रश्नावर तोडगा काढण्याचे सुरु केलेले प्रयत्न थांबविले. शास्त्रींच्याच काळात शेख अब्दुल्लांना पुन्हा अटक करण्यात आली होती.                                                                                                           

शास्त्री यांचे नंतर पंतप्रधान झालेल्या इंदिरा गांधीनी शास्त्रींच्या काळातील काश्मीर धोरण पुन्हा बदलले. त्यांनी शेख अब्दुल्लांची तुरुंगातून सुटका करून त्यांच्याशी वाटाघाटी सुरु केल्या. त्यांच्या सोबत करार करून त्यांचेकडे काश्मीरची सत्ताही सोपविली आणि आपल्याच कार्यकाळात शेख अब्दुल्ला नंतर सत्तेत आलेल्या फारूक अब्दुल्ला यांच्या सत्तेला आव्हान दिले. त्यांचे सरकार बडतर्फ करून व त्यांच्या पक्षात फुट पाडून नव्या सरकारच्या स्थापनेचा मार्ग प्रशस्त केला. इंदिरा गांधी यांचे नंतर सत्तेत आलेल्या राजीव गांधीनी पुन्हा इंदिरा गांधींच्या काश्मीर धोरणात बदल करून फारूक अब्दुल्लाशी जुळवून घेतले. काश्मीरच्या बाबतीत अशी धरसोड सातत्याने झाली आहे. आधीच्या कार्यकाळातील काही धोरणे स्विकारायची काही नाकारायची असेही घडले. नरसिंहराव यांचे स्वायत्ततेचे धोरण वाजपेयींनी फेटाळले पण काश्मिरातील पृथकतावादी आणि दहशतवादी गटांशी चर्चा करून त्यांना मुख्य धारेत आणण्याचे नरसिंहराव यांनी सुरु केलेले प्रयत्न मात्र वाजपेयींनी पुढे चालू ठेवले होते. वाजपेयी काळात आखलेले काश्मीर बाबतचे संपूर्ण धोरण आपल्या पहिल्या कार्यकाळात पुढे नेण्याचा प्रयत्न करणारे एकमेव पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग होते. पंतप्रधान बदलला की काश्मीर बाबतीत धोरणही बदलते यात खंड पडला. मात्र काश्मीर धोरणा संदर्भात सरकारच्या निर्णयाला विरोध करण्याच्या भारतीय जनता पक्षाच्या धोरणात खंड पडला नाही. काश्मीर संदर्भात वाजपेयींचे धोरण पुढे नेणाऱ्या पंतप्रधान मनमोहनसिंग यांना वाजपेयी यांचेकडूनच विरोध झाला. मनमोहनसिंग काश्मीर बाबतीत मऊ धोरण अवलंबित असल्याचा वाजपेयींनी आरोप केला होता. काश्मीरसह सर्व प्रश्नांवर सर्व पातळ्यावर चर्चा आणि सहकार्य हे वाजपेयींनी आखलेले धोरणच वाजपेयींच्या पराभवानंतर डॉ.मनमोहन सिंग यांनी पुढे नेले. याच्या परिणामी सिंग यांच्या २००४ ते २००९ या पहिल्या  कार्यकाळात २००८ चा अपवाद वगळता काश्मीर शांत राहिले. 

पंतप्रधान बनण्याच्या आधीपासून मनमोहनसिंग काश्मीर संबंधीच्या निर्णय प्रक्रियेत सामील होते. नरसिंहराव मंत्रीमंडळात मनमोहनसिंग अर्थमंत्री असले तरी नरसिंहराव यांनी काश्मीरच्या सल्लामसलतीत सिंग यांना सामील करून घेतले होते. राजेश पायलट यांचेकडे काश्मीरचा प्रभार असला तरी काश्मीर संबंधीचा कोणताही प्रस्ताव मनमोहनसिंग यांच्या चिकित्सेनंतरच नरसिंहराव यांच्या विचारार्थ जात असे. काश्मीर प्रश्नाशी सिंग यांचा आलेला संबंध वाजपेयी पंतप्रधान झाल्यावर त्यांच्याही उपयोगी आला. पाकिस्तान प्रेरित मोठमोठ्या आतंकवादी हल्ल्यानंतरही वाजपेयींनी पाकिस्तानशी चर्चेचा प्रयत्न चालू ठेवला होता यावर कॉंग्रेसचा आक्षेप होता व कॉंग्रेस सातत्याने वाजपेयी यांच्यावर टीका करत होती. अशी टीका देशहिताची नाही हे मनमोहनसिंग यांनीच कॉंग्रेसच्या धुरीणांना पटविले आणि काश्मीर बाबतीत वाजपेयींवर होणारी टीका सौम्य करायला कॉंग्रेसला भाग पाडले होते. याचा अर्थ वाजपेयी काळातही मनमोहनसिंग काश्मीरवर लक्ष ठेवून होते आणि याची प्रचिती ते पंतप्रधान झाल्याबरोबर आली. वाजपेयी काळात सुरु झालेली प्रक्रिया पुढे नेण्यासाठी सरकारचा दूत म्हणून वाजपेयी यांनी काम करावे अशी विनंती पंतप्रधानाच्या वतीने वाजपेयी यांना करण्यात आली होती.                                   

वाजपेयी यांनी हा प्रस्ताव स्वीकारला असता तर नवा इतिहास घडला असता. काश्मिरी जनतेच्या मनात वाजपेयी बद्दल आदर होता आणि पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष मुशर्रफ यांचाही वाजपेयींवर विश्वास होता. आग्रा शिखर परिषद वाजपेयी यांचेमुळे असफल झाली नसल्याची मुशर्रफ यांना खात्री होती. त्यामुळे मनमोहन सरकारचा दूत म्हणून वाजपेयींना त्यांच्या कार्यकाळात जे साध्य करता आले नाही ते साध्य करण्याची संधी चालून आली होती.पण भारतीय जनता पक्ष २००४ साली झालेल्या अनपेक्षित पराभवाच्या धक्क्यातून सावरला नव्हता. आपल्याला जे साधता आले नाही ते मनमोहन सरकारलाही साधता येवू नये अशी पक्षाची कोती भूमिका होती जी अडवाणी यांच्या वक्तव्यातून प्रकट झाली. पराभवानंतर भारत पाकिस्तान यांच्यात होवू घातलेल्या वाटाघाटीवर भाष्य करताना अडवाणी यांनी फक्त भारतीय जनता पक्षच पाकिस्तानला सवलत देवून संबंध सुरळीत करू शकतो कारण भारतीय जनता पक्ष पाकिस्तान धार्जिणा नाही यावर भारतीय जनतेचा विश्वास आहे असा दावा केला होता.  कॉंग्रेसची धोरणे पाकिस्तान व मुस्लीम धार्जिणी आहेत हा टीकेचा सूर आळवता यावा म्हणून भारतीय जनता पक्षाने वाजपेयींना मनमोहन सरकारचे दूत म्हणून काम करण्याची परवानगी दिली नाही. वाजपेयींच्या नकारा नंतरही मनमोहनसिंग यांनी काश्मीर आणि भारत-पाक संबंधांवर वाजपेयींशी सल्लामसलत सुरु ठेवली. मनमोहन पंतप्रधान झाल्यानंतर काही महिन्यातच युनोची आमसभा होणार होती व याप्रसंगी मनमोहन-मुशर्रफ यांची बैठक होणार होती. युनोच्या आमसभेला जाण्यापूर्वी मनमोहनसिंग यांनी वाजपेयींना भेटीसाठी बोलावले होते. त्यांच्यात आणि मुशर्रफ यांच्यात झालेली चर्चा, झालेले निर्णय त्यांनी वाजपेयी यांचेकडून समजून घेतले. या बैठकीच्या वेळी मनमोहन मंत्रिमंडळातील परराष्ट्रमंत्री नटवरसिंग आणि वाजपेयी मंत्रीमंडळात पारराष्ट्र मंत्री राहिलेले यशवंत सिन्हाही उपस्थित होते. काश्मीर आणि पाकिस्तान संबंधीच्या धोरणात सातत्य राखण्याचा हा पहिला प्रयत्न होता.

                                                          (क्रमशः)
-----------------------------------------------------------------------------

सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि. यवतमाळ 
मोबाईल - ९४२२१६८१५८ 

Wednesday, October 11, 2023

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - ७७

एप्रिल २००३ मध्ये श्रीनगरच्या सभेत पंतप्रधान वाजपेयींनी काश्मीर प्रश्न सोडविण्यासाठीची त्रिसूत्री मांडली. 'इन्सानियत , जम्हुरियत आणि काश्मिरियत' अशी ती त्रिसूत्री होती. केवळ जाहीर सभेत बोलून अटलबिहारी वाजपेयी थांबले नाहीत. त्यांनी लोकसभेत बोलताना देखील या त्रिसूत्रीवर भर दिला होता.  काश्मीरला जे काही द्यायचे ते संविधानाच्या मर्यादेतच या आजवरच्या धारणेला वाजपेयींच्या या त्रिसुत्रीने छेद देवून काश्मिरी जनतेच्या मनात नवी आशा निर्माण केली होती.
----------------------------------------------------------------------------------------------------

 
१९९८ ते २००४ हा पंतप्रधान वाजपेयी यांचा कार्यकाळ काश्मीर संदर्भातील भरगच्च घडामोडी आणि चांगल्या वाईट घटनांनी भरलेला होता. त्यांची राजवट जावून २० वर्षे झालीत पण त्यांचा कार्यकाळ आजही तिथली जनता विसरली नाही. ज्या पंतप्रधानाची काश्मिरात सर्वाधिक आठवण केली जाते ते पंतप्रधान वाजपेयीच आहेत. आज पन्नाशीच्या पुढचे जे लोक काश्मीरमध्ये आहेत त्यांचे एका बाबतीत एकमत आढळेल आणि ती बाब म्हणजे २००४ सालच्या सार्वत्रिक निवडणुकीत एन डी ए चा पराभव झाला नसता आणि वाजपेयी पुन्हा पंतप्रधान झाले असते तर काश्मीरचा गुंता सुटायला मोठी चालना मिळाली असती. काश्मीरच्या बाबतीत सर्वात मोठी घोषणा तर पंतप्रधान नरसिंहराव यांनी केली होती. संविधानाच्या चौकटीत काश्मीरची जनता जे मागेल ते देण्याची तयारी त्यांनी दाखविली होती. 'स्काय इज द लिमीट' हा शब्दप्रयोग त्यांनी केला होता. त्यानंतरच फारूक अब्दुल्ला यांनी काश्मीर विधानसभा निवडणुकीत सहभागी होण्याची तयारी दर्शविली आणि एक दशकानंतर तिथे निवडणुका होवू शकल्या. नरसिंहराव आणि देवेगौडा या पंतप्रधानांनी दिलेल्या आश्वासनानुसार संविधानाच्या चौकटीत काश्मीर विधानसभेने स्वायत्ततेची मागणी केली व तसा ठरावही केला. हा ठराव मंजुरीसाठी केंद्राकडे पाठविला तेव्हा पंतप्रधानपदी अटलबिहारी वाजपेयी होते. तो ठराव संविधानाच्या चौकटीत आहे हे वाजपेयी आणि अडवाणी दोघानाही मान्य होते. आणि तरीही इंदिरा गांधी यांनी जो तर्क दिला होता तोच तर्क - १९५२ ची स्थिती निर्माण करणे म्हणजे घड्याळाचे काटे मागे फिरविल्या सारखे होईल - देत वाजपेयी सरकारने जम्मू-काश्मीर विधानसभेचा स्वायत्तता विषयक ठराव नामंजूर केला होता. आणि तरीही काश्मीरची जनता वाजपेयींचीच आठवण करतात हे विशेष आहे. पाकिस्तानकडून भारताशी संबंध बिघडतील अशा कारवाया वेळोवेळी होवूनही पाकिस्तानशी संबंध सुधारण्याचा प्रयत्न वाजपेयींनी शेवटपर्यंत सोडला नाही हे एक महत्वाचे कारण त्यामागे होते.                                                           

पाकिस्तानच्या चिथावणीने १९९० च्या दशकात काश्मिरी जनतेला जे भोगावे लागले त्यामुळे जनतेचा दहशतवादाबाबत भ्रमनिरास झाला होता. काश्मिरात शांतता नांदायची असेल व दहशतवादी कारवाया थांबवायच्या असतील तर भारत-पाक संबंध सुरळीत होणे गरजेचे आहे या निष्कर्षाप्रत लोक आले होते आणि वाजपेयींनी त्यावरच जोर दिला होता. पाकिस्तानशी चर्चा करणे भारतीय जनतेला फारसे आवडत नाही. अशा चर्चेचा आधी जनसंघ व नंतरच्या भारतीय जनता पक्षाने कायम विरोध केला आहे. त्यामुळे भारत पाक चर्चा कायम पडद्याआड व लोकांच्या नजरेआड होत आली आहे. अगदी सध्याचे नरेंद्र मोदी सरकार सुद्धा दुसऱ्या देशाच्या भूमीवर पाकिस्तानशी चर्चा करत असते. पण कारगिल सारख्या घटनेनंतरही पाकिस्तानशी चर्चा करण्याची इच्छा आणि हिम्मत वाजपेयींनी दाखविली. २००४ साली तर लालकृष्ण अडवाणी यांनी जाहीरपणे म्हंटले होते की भारतीय जनता पक्षाच्या सरकारने पाकिस्तानला सवलती दिल्या तरी लोक त्याचा विरोध करणार नाही ! त्यांचे हे विधान अजिबात अतिशयोक्त नाही. कारगिल घडविणाऱ्या परवेज मुशर्रफ यांचे दिल्ली व आग्रा येथे झालेले जंगी स्वागत व आग्रा शिखर परिषद अडवाणी यांच्या विधानाची पुष्टी करते. कॉंग्रेसच्या राजवटीत कारगिल घडले असते आणि ते घडविणाऱ्याला कॉंग्रेस सरकारने आमंत्रित करून जंगी स्वागत केले असते तर देशभर काय आणि कशा प्रतिक्रिया उमटल्या असत्या याचा सहज अंदाज करता येईल. त्यामुळे पाकिस्तानशी संबंध सुधारून काश्मीर प्रश्न सोडवायला चालना देणे कॉंग्रेसला शक्य नाही. ते काम भारतीय जनता पक्षाचे अटलबिहारी सारखे नेतेच करू शकतात या निष्कर्षाप्रत काश्मिरी जनता आली होती आणि म्हणून काश्मिरी जनतेला वाजपेयी यांच्या बद्दल विशेष आस्था आणि प्रेम वाटत आले. भारतीय जनमताचा विचार न करता वाजपेयींनी त्यांच्या कार्यकाळात आणखी एक गोष्ट केली. हुरियतच्या झेंड्याखाली एकत्र आलेल्या पाकिस्तान धार्जिण्या विभाजनवादी नेत्यांशी काश्मीर प्रश्न कसा सोडविता येईल याची थेट चर्चा सुरु केली. यापूर्वीही नरसिंहराव सरकारने विभाजनवादी व दहशतवादी गटांशी चर्चा केली होती. पण ती चर्चा गाजावाजा न करता , लोकांच्या लक्षात येणार नाही अशा पद्धतीने केली होती. वाजपेयींनी चर्चेतून प्रश्न सोडविण्याचे जाहीर आवाहन करून उघडपणे चर्चा केली. काश्मीरच्या राजकारणात हुरियतच्या नेत्यांना पहिल्यांदाच महत्व मिळाले होते आणि ते नेते वाजपेयीवर जाम खुश होते. पण हाच प्रयोग मनमोहनसिंग सरकारने पुढे चालविण्याचा प्रयत्न केला तेव्हा मात्र भारतीय जनता पक्षाने आणि दस्तुरखुद्द वाजपेयींनी विरोध केला.  

अटलबिहारी वाजपेयींच्या काश्मीर जनतेमधील लोकप्रियतेचे सर्वात मोठे कारण ठरले ते काश्मिरी जनतेला भावलेले त्यांचे भावनिक आवाहन ! १८ एप्रिल २००३ रोजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींची श्रीनगरच्या क्रिकेट स्टेडियम मध्ये जाहीर सभा झाली. १९८७ नंतर काश्मिरात झालेली पंतप्रधानांची ही पहिली सभा होती. १९८७ साली राजीव गांधींची सभा झाली होती. या सभेपूर्वी वाजपेयींनी काश्मीरला तीनदा भेट दिली होती. सभा मात्र चवथ्यांदा आले तेव्हा घेतली. या सभेत त्यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानला चर्चेचे आवाहन केले. दहशतवाद्यांनी नवी दिल्लीत संसदेवर केलेल्या हल्ल्यानंतर राबविण्यात आलेल्या 'ऑपरेशन पराक्रम'च्या पार्श्वभूमीवर हे आवाहन करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी सभेत पुढे बोलताना १९९० च्या दशकात जे भोगावे लागले त्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली आणि काश्मीरचा प्रश्न संविधानाच्या मर्यादेत नव्हे तर मानवतेच्या दृष्टीकोनातून सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे वचन जनतेला दिले. काश्मीर प्रश्न सोडविण्यासाठीची त्रिसूत्रीच त्यांनी या सभेत मांडली. 'इन्सानियत , जम्हुरियत आणि काश्मिरियत' अशी ती त्रिसूत्री होती. केवळ जाहीर सभेत बोलून अटलबिहारी वाजपेयी थांबले नाहीत. त्यांनी लोकसभेत बोलताना देखील काश्मीर प्रश्न सोडविण्याची ही त्रिसूत्री मांडली होती. काश्मीरला जे काही द्यायचे ते संविधानाच्या मर्यादेतच या आजवरच्या धारणेला वाजपेयींच्या या त्रीसुत्रीने छेद देवून काश्मिरी जनतेच्या मनात नवी आशा निर्माण केली. काश्मीरचा प्रश्न सोडविण्याची जेव्हा जेव्हा चर्चा होते तेव्हा काश्मिरी जनतेकडून आजही वाजपेयींची आणि त्यांच्या या त्रिसूत्रीची आठवण करून देण्यात येते. १९५३ नंतर काश्मिरी जनतेचे मन जिंकणारे पंतप्रधान म्हणून वाजपेयींचा उल्लेख होत राहील. काश्मिरी जनतेचे मन जिंकणारे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू होते आणि त्यांच्यामुळेच काश्मीर भारताचा भाग बनला हे सत्य असले तरी काश्मिरी जनतेतील त्यांची लोकप्रियता १९५३ च्या शेख अब्दुल्लांच्या बडतर्फी व अटके नंतर उरली नाही. काश्मीरमध्ये आज नेहरूंचे नाही तर वाजपेयींचे नाव आदराने घेतले जाते.  

                                                      (क्रमशः)

------------------------------------------------------------------------------------

सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि.यवतमाळ 
मोबाईल - ९४२२१६८१५८ 

Thursday, October 5, 2023

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - ७६

 २००२ च्या काश्मीर विधानसभा निवडणुकी वेळी वाजपेयी सरकारची इच्छा दहशतवादी गटांनी व त्यांच्या नेत्यांनी दहशतवाद सोडून निवडणुक प्रक्रियेत सहभागी व्हावे अशी होती. तशी या गटांच्या प्रमुखाशी सरकारने बोलणीही केली. पण निवडणुकांचा पूर्वानुभव लक्षात घेता निवडणुका खुल्या वातावरणात होतील यावर विश्वास ठेवायला कोणी तयार नव्हते. प्रत्यक्षात निवडणुका झाल्या नंतर इंग्लंड-अमेरिकेसह अनेक राष्ट्रांनी निवडणुका मुक्त वातावरणात झाल्याची पावती दिली.
---------------------------------------------------------------------------------------------------


नवी दिल्लीत संसदेवर झालेल्या आतंकवादी हल्ल्यात पाकिस्तान स्थित आतंकवादी संघटनांचा हात असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी आखलेल्या 'ऑपरेशन पराक्रम' मोहिमेनंतर सीमेवर मोठ्या प्रमाणात सैन्याची जमवाजमव होवूनही युद्ध झाले नाही. काश्मिरातील नियंत्रण रेषेवर सैन्याच्या मोठ्या प्रमाणावर उपस्थितीचा एक फायदा झाला. त्यावेळी काश्मीरमध्ये निवडणुका होवू घातल्या होत्या. निवडणुका होवू नयेत असाच पाकिस्तान प्रेरित आणि प्रशिक्षित दहशतवाद्यांचा प्रयत्न असायचा. सीमेवरील सैन्याच्या मोठ्या उपस्थितीमुळे पाकिस्तानातून किंवा पाकव्याप्त काश्मीर मधून नियंत्रण रेषा पार करून निवडणुका उधळून लावण्यासाठी दहशतवादी कारवाया करणे नेहमीप्रमाणे सहजशक्य नव्हते. त्यामुळे दहशतवाद्यांच्या प्रभावापासून व कारवायापासून वाजपेयी काळात झालेल्या काश्मीर विधानसभेच्या निवडणुका बऱ्याच प्रमाणात मुक्त राहिल्या. तहरीक ए हुरियत या पाकिस्तानकडे झुकलेल्या संघटनेने निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन काश्मिरी जनतेला केले होते. बहिष्कारासाठी पाकिस्तानचा दबाव असतांनाही हुरियत कॉन्फरन्सने बहिष्काराचे आवाहन केले नाही. ४३ टक्क्यापेक्षा अधिक मतदारांनी या निवडणुकीत मतदान केले.  कॉंग्रेसमधून व्ही.पी. सिंग काळात जनता दलात गेलेल्या आणि नरसिंहराव काळात परत कॉंग्रेसमध्ये आलेल्या मुफ्ती मोहम्मद सईद यांनी या निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा कॉंग्रेसचा त्याग करून जम्मू आणि काश्मीर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) ची स्थापना केली. शेख अब्दुल्लांच्या मृत्यूनंतर काश्मीरचा मुख्यमंत्री बनण्याची महत्वाकांक्षा बाळगून असलेल्या मुफ्ती मोहम्मद सईद यांना मुख्यमंत्री होता आले नाही. कॉंग्रेसमध्ये राहून आपली मुख्यमंत्री होण्याची इच्छा पूर्ण होणार नाही या निष्कर्षाप्रत आलेल्या मुफ्तीने आपली महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी स्वत:चा पक्ष स्थापन केला होता. २००२ च्या निवडणुकीतील पीडीपीची कामगिरी फार चांगली राहिली असे म्हणता येणार नाही तरी मुख्यमंत्रीपदी आरूढ होण्यात ते यशस्वी झाले.
 

निवडणूक मुक्त वातावरणात आणि कोणत्याही हेराफेरीविना झाल्याचे जगाला दाखवण्याची वाजपेयी सरकारची इच्छा होती. त्यासाठी केंद्र सरकारने त्यावेळचे मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांच्या पुढे राज्यपाल राजवट लागू करून निवडणूक घेण्याचा प्रस्ताव ठेवला होता. फारूक अब्दुल्लांनी राज्याच्या राजकारणात न राहता उपराष्ट्रपती व्हावे असाही प्रस्ताव देण्यात आला होता. दोन्ही प्रस्तावास फारूक अब्दुल्लाने मान्यताही दिली होती. पुढे उपराष्ट्रपती पदाचा प्रस्ताव बारगळल्या नंतर फारूक अब्दुल्लांनी निवडणुकीपूर्वी राज्यपाल राजवट लावण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव अमान्य केला. तरीही २००२ साली झालेल्या निवडणुका तुलनेने शांत परिस्थितीत झाल्या आणि मुख्य म्हणजे या निवडणुका हेराफेरी मुक्त झाल्याचे मानण्यात येते. इंग्लंड-अमेरिकेसह अनेक देशांनी निवडणुका मुक्त वातावरणात झाल्याचे मान्य करून केंद्र व राज्य सरकारचे कौतुक केले. वाजपेयी सरकारची इच्छा दहशतवादी गटांनी व त्यांच्या नेत्यांनी दहशतवाद सोडून निवडणुक प्रक्रियेत सहभागी व्हावे अशी होती. तशी या गटांच्या प्रमुखाशी सरकारने बोलणीही केली. पण निवडणुकांचा पूर्वानुभव लक्षात घेता निवडणुका खुल्या वातावरणात होतील यावर विश्वास ठेवायला कोणी तयार नव्हते. या गटांच्या मते केंद्र सरकारला फारूक अब्दुल्ला किंवा उमर अब्दुल्ला यांनाच मुख्यमंत्री करायचे असल्याने निवडणुकांचे निकाल तसेच लागतील. आपल्या सहभागाने हे निकाल बदलणार नाहीत असा पक्का विश्वास असल्याने दहशतवादी गटांच्या म्होरक्यांनी निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यास नकार दिला होता. या गटांनी व्यक्त केलेला अंदाज सपशेल खोटा ठरला यावरूनही निवडणुकीत हेराफेरी करून एखाद्या पक्षाला निवडून आणण्याचा प्रयत्न झाला नाही हे स्पष्ट झाले. ही निवडणूक मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला व त्यांच्या पक्षासाठी कठीण गेली. १९९६ ला स्वायत्ततेचा मुद्दा पुढे करून फारूक अब्दुल्लाने यश मिळविले होते. निवडून आल्यावर त्यांनी स्वायात्तते संबंधीचा प्रस्ताव विधानसभेत मंजूर करून घेतलाही होता. पण त्यांचा पक्ष सहभागी असलेल्या एन डी ए सरकारने तो प्रस्ताव नामंजूर केला. प्रस्ताव नामंजूर झाल्यावर एन डी ए न सोडणे फारूक अब्दुल्ला व त्यांच्या पक्षाला महागात पडले. फारूक अब्दुल्ला व नॅशनल कॉन्फरन्स स्वायात्तते बद्दल गंभीर नाही असा समज पसरला व त्याचा फटका २००२ च्या निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सला बसला.


स्वायत्ततेचा मुद्दा पुढे करून १९९६ साली ८७ पैकी ५७ जागा मिळविणाऱ्या नॅशनल कॉन्फरन्सला २००२ च्या निवडणुकीत फक्त २८ जागांवर समाधान मानावे लागले. बहुमतापासून दूर राहूनही पहिल्या क्रमांकाच्या जागा मिळविणारा पक्ष हे स्थान नॅशनल कॉन्फरन्सला टिकविता आले. कॉंग्रेसने आश्चर्यकारकरित्या २० जागा मिळवून दुसरे स्थान पटकावले. नवा पक्ष स्थापन करून पहिल्यांदा निवडणुकीला सामोरे गेलेल्या मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या पीडीपी पक्षाला १६ जागा मिळविता आल्या. केंद्रातील वाजपेयी सरकार पाठीशी असूनही दुसऱ्या पक्षात फुट पाडून सरकार बनविण्याचा प्रयत्न नॅशनल कॉन्फरन्स कडून झाला नाही. त्यामुळे सरकार बनण्यातही पारदर्शकता राहिली. काश्मीर सारख्या अशांत प्रदेशात स्थिर सरकारची गरज लक्षात घेवून पंतप्रधान वाजपेयींची नॅशनल कॉन्फरन्स व कॉंग्रेसने एकत्र येवून सरकार बनवावे अशी इच्छा होती. पण ते शक्य झाले नाही. कॉंग्रेस व मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या पीडीपी पक्षात सरकार बनविण्यावर सहमती झाली. पहिली तीन वर्षे पीडीपीचा मुख्यमंत्री तर नंतरची तीन वर्षे कॉंग्रेसचा मुख्यमंत्री राहील असे ठरले व त्याप्रमाणे पीडीपीचे मुफ्ती मोहम्मद सईद मुख्यमंत्रीपदी आरूढ झाले. केंद्रात सत्तेत असूनही भारतीय जनता पक्षाला या निवडणुकीत फटका बसला. ही बाब २००२ च्या निवडणुकीत केंद्र सरकारच्या यंत्रणेने हस्तक्षेप करून निवडणूक निकाल फिरविले नाहीत हे सिद्ध करणारी आहे. १९९६ च्या निवडणुकीत भीमसिंग यांच्या पँथर पार्टी सोबत युती करून ८ जागा भाजपने जिंकल्या होत्या. त्यावेळी भीमसिंग यांच्या पक्षाला एक जागा मिळाली होती. २००२ च्या निवडणुकीत मात्र भाजपला एकाच जागेवर विजय मिळविता आला तर भीमसिंग यांची पँथर पार्टी ४ जागी विजयी झाली. केंद्रात सत्तेत असताना इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी काश्मीर मध्ये नॅशनल कॉन्फरन्सने कॉंग्रेस सोबत युती केली पाहिजे असा आग्रह धरला होता. तसा आग्रह पंतप्रधान वाजपेयी यांनी केला नाही. त्यामुळे निवडणुका मुक्त वातावरणात होवू शकल्या. दिल्ली ते लाहोर बस सुरु करणे आणि पाकिस्तान सोबतचे संबंध सुधारण्याच्या वाजपेयींच्या प्रयत्नाने काश्मिरात वाजपेयींची लोकप्रियता वाढूनही निवडणुकीत त्याचा भारतीय जनता पक्षाला फायदा झाला नाही. याचा अर्थ काश्मीरमध्ये पंतप्रधान वाजपेयी व्यक्ती म्हणून लोकप्रिय होते पण भारतीय जनता पक्षा बद्दलचे काश्मिरी जनतेचे मत अनुकूल नव्हते. २००२ च्या निवडणुकीत सपाटून मार खाणाऱ्या पक्षाचे नेते वाजपेयी यांच्या काश्मिरी जनतेतील लोकप्रियतेचे रहस्य काय असा प्रश्न पडतो.

                                                             (क्रमशः)

---------------------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि.यवतमाळ 
मोबाईल - ९४२२१६८१५८ 





Thursday, September 28, 2023

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - ७५

आग्रा परिषदे नंतर तीन पाकिस्तानी  दहशतवाद्यांनी १ ऑक्टो.२००१  रोजी काश्मीर विधानसभेवर   
हल्ला केला. या हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैन्य घुसवून पाकिस्तान चालवीत असलेली आतंकवादी प्रशिक्षण केंद्रे उध्वस्त करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली होती. काश्मीर विधानसभेवरील हल्ल्यानंतर दोनच महिन्यात नवी दिल्ली येथे दहशतवाद्यांनी भारतीय संसदेवर हल्ला केला. --------------------------------------------------------------------------------------


विसाव्या शतकाचा शेवट भारतासाठी वाईट झाला. दहशतवाद्यांच्या मागण्यांपुढे झुकून तीन दहशतवाद्यांना सोडावे लागले. नव्या सहस्त्रकाचा प्रारंभही चांगला झाला नाही. काश्मीर मधील शांततेच्या आशा वाजपेयी आणि मुशर्रफ यांच्यातील आग्रा परिषदेवर केंद्रित झालेल्या होत्या. पण त्या परिषदेतून काहीच निष्पन्न न झाल्याने सर्वांचीच निराशा झाली. सर्वाधिक निराशा काश्मिरी जनतेची झाली. दशकभर हिंसाचाराच्या झळा सोसलेल्या काश्मिरी जनतेला शांतता हवी होती. आग्रा परिषद असफल होण्याचा सर्वाधिक फटका काश्मिरी जनतेलाच बसणार होता. परिषद असफल होणे म्हणजे काश्मीर मध्ये पुन्हा दहशतवादी कारवाया वाढण्याची भीती होती. ही भीती खोटी नव्हती हे आग्रा शिखर परिषदे नंतर दोन महिन्यातच दिसून आले. काश्मीर विधानसभेवर पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी १ ऑक्टोबर २००१ रोजी हल्ला केला. हा आत्मघाती दहशतवादी हल्ला होता ज्यात तीन दहशतवादी सामील होते. त्यांच्यापैकी एकाने स्फोटकाने भरलेली टाटासुमो गाडीने विधानसभेच्या प्रवेशद्वारावर धडकविली. सुरक्षा रक्षक व विधानसभेचे कर्मचारी असे ८ लोक जागीच ठार झाले तर तेथून जाणाऱ्या शाळकरी मुलीचा या बळी गेला. हा आत्मघाती हल्ला होता. स्फोट झाल्या नंतर अन्य दहशतवादी विधानसभेच्या इमारतीत घुसले आणि त्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात ३० लोक दगावले तर ६० च्यावर गंभीर जखमी झाले. हल्ल्याच्या एक तास आधीच विधानसभेची बैठक स्थगित झाल्याने आमदारांपैकी तिथे कोणी नव्हते. सभापती,कर्मचारी आणि सुरक्षा रक्षक तेवढे होते. सुरक्षादलाने सभापतींना सुरक्षित स्थळी हलविल्याने त्यांचे प्राण वाचले. पाकिस्तान स्थित जैश ए मोहम्मद संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. या हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैन्य घुसवून पाकिस्तान चालवीत असलेली आतंकवादी प्रशिक्षण केंद्रे उध्वस्त करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली होती. काश्मीर विधानसभेवरील हल्ल्यानंतर दोनच महिन्यात नवी दिल्ली येथे दहशतवाद्यांनी भारतीय संसदेवर हल्ला केला.

१३ डिसेंबर २००१ रोजी बनावट स्टीकर लावलेल्या गाडीतून ५ दहशतवाद्यांनी संसदेच्या आवारात प्रवेश मिळविला. हल्ल्याच्या ४० मिनिटे आधीच संसदेचे कामकाज स्थगित झाले होते. त्यामुळे बहुतांश खासदार आणि मंत्री आपापल्या निवासस्थानात आणि कार्यालयात परतले होते. तरीही राज्यसभेचे अध्यक्ष तत्कालीन उपराष्ट्रपती कृष्णकांत आणि गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांचे सहित १०० च्या वर राजकीय नेते आणि अधिकारी संसद भवनात उपस्थित होते. संसदेच्या आवारात गाडी घेवून शिरलेल्या दहशतवाद्यांनी तिथे उभी असलेल्या उपराष्ट्रपती कृष्णकांत यांच्या गाडीला ठोस दिली आणि गाडीच्या खाली उतरून अंदाधुंद गोळीबार सुरु केला. पाचही अतिरेकी एके ४७ रायफल,ग्रेनेड आणि ग्रेनेड लौंचरने सज्ज होते. उपराष्ट्रपतीच्या सुरक्षा रक्षकांनी आणि तिथे असलेल्या इतर सुरक्षा रक्षकांनी गोळीबाराला प्रत्युत्तर दिले. एका अतिरेक्याच्या कंबरेला बांधलेल्या स्फोटकाला गोळी लागल्याने स्फोट होवून त्याच्या चिंधड्या उडाल्या. इतर चार अतिरेकीही सुरक्षा रक्षकांच्या गोळीबारात ठार झाले. संसद भवन आवारातील या चकमकीत सुरक्षा रक्षकांसह ९ जण ठार झालेत तर १७ जखमी झालेत. त्यावेळी संसद भवनात उपस्थित उपराष्ट्रपती, गृहमंत्री , अन्य खासदार व मंत्री यापैकी कोणीही जखमी झाले नाहीत. सुरक्षा रक्षकांनी त्या सर्वाना सुखरूप बाहेर काढले. या आधी काश्मीर विधानसभेवर झालेल्या हल्ल्यानंतर वाजपेयी सरकारने कडक शब्दात पाकिस्तानची निर्भत्सना केली होती व आमच्या सहनशक्तीचा अंत पाहू नका असा इशारा पाकिस्तानला दिला होता. ३८ जणांचा बळी गेलेल्या त्या घटनेचा बदला घेण्यासाठी पाकव्याप्त काश्मीर मधील अतिरेक्यांचे अड्डे उध्वस्त करण्याच्या तत्कालीन मुख्यमंत्री फारूक अब्दुल्लाच्या मागणीकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष केले आणि त्यानंतर भारतीय संसदेवर हल्ला झाला. या हल्ल्यानंतर मात्र वाजपेयी सरकारने कडक पाऊले उचलण्यास सुरुवात केली. संसदेवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना ठार करण्यात आल्या नंतर काही तासातच पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी राष्ट्राला संबोधन करून संसदेवरील हल्ल्याची माहिती दिली. आतंकवादा विरुद्धची लढाई आता निर्णायक वळणावर आली असून आतंकवाद संपविल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही अशी घोषणा त्यांनी केली. संसदे वरील हल्ल्यात आणि त्यापूर्वी काश्मीर विधानसभेवर करण्यात आलेल्या हल्ल्यात जैश ए मोहम्मद या पाकिस्तान स्थित आतंकवादी संघटनेचा सहभाग होता. विमान अपहरण प्रकरणात ज्याची सुटका करावी लागली होती त्या मौलाना मसूद अजहर याने सुटकेनंतर ही संघटना बनविली होती.

संसदेवरील हल्ल्यानंतर मात्र पाकिस्तानला धडा शिकविण्याचा विचार उच्च पातळीवर सुरु झाला. अतिरेक्यांची ठिकाणे उद्ध्वस्त करण्यात यावी असा दबाव वाजपेयी सरकारवर वाढला होता. पाकिस्तानवर दबाव वाढविण्याची आणि राजकीय प्रत्युत्तर देण्याची गरज असल्याचे पंतप्रधान वाजपेयींना पटले होते मात्र युद्धासाठी ते अनुकूल नव्हते. त्याऐवजी युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण करून हेतू साध्य करावा असा त्यांचा विचार होता. त्यातून ऑपरेशन पराक्रम या मोहिमेचा जन्म झाला. या अंतर्गत भारताने जवळपास पाच लाख सैन्य युद्ध सामुग्रीसह सीमेवर आणून ठेवले होते. भारताची सैन्य सज्जता पाहून पाकिस्तानने सुद्धा सीमेवर सैन्य आणून ठेवले. केव्हाही युद्धाची ठिणगी पडेल असे चित्र होते. शेवटी अमेरिकेने पाकिस्तानवर दबाव आणून परिस्थिती निवळावी यासाठी पुढाकार घेतला. अमेरिकेच्या दबावात पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांना पाकिस्तान रेडीओ व टेलीव्हिजन वर जाहीरपणे सांगावे लागले की भारता विरुद्ध आतंकवादी कारवाया करण्यासाठी पाकिस्तानच्या भूमीचा वापर करू दिला जाणार नाही. २००२ साली मुशर्रफ यांनी अशी जाहीर घोषणा केल्या नंतरच भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धाची संभावना संपुष्टात आली. त्यानंतर सहा महिन्यांनी वाजपेयी सरकारने सीमेवर पाठवलेली अतिरिक्त फौज मागे घेतली. युद्ध टळले तरी दोन्ही बाजूनी तैनात सेनेत अधूनमधून होणाऱ्या गोळीबारात दोन्हीकडचे सैनिक बळी गेलेच. तत्कालीन संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडीस यांनी संसदेत दिलेल्या माहितीनुसार ऑपरेशन पराक्रम दरम्यान सीमेवरील गोळीबारात आणि अपघातात मिळून १८७४ भारतीय जवान शहीद झाले. पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांनी भारताने सीमेवर सैन्याची जमवाजमव केल्यानंतर भारताविरुद्ध आतंकवादी कारवाया करण्यासाठी पाकिस्तानी भूमीचा वापर करू न देण्याची भूमिका जाहीर केली. ही भूमिका त्यांनी आग्रा शिखर परिषदेत घेतली असती तर कदाचित काश्मीरवर त्यांनी सुचविलेला तोडगा मान्य होवून आग्रा शिखर परिषद यशस्वी झाली असती.

(क्रमशः)

-------------------------------------------------------------------------------------------------- सुधाकर जाधव पांढरकवडा जि.यवतमाळ मोबाईल : ९४२२१६८१५८


Thursday, September 21, 2023

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - ७४

आग्रा करार का होवू शकला नाही याची दोन्ही देशातर्फे वेगवेगळी कारणे देण्यात आली होती. परवेज मुशर्रफ यांनी आपल्या आत्मकथेत म्हंटले आहे की स्वाक्षरी न करण्याचे जे अधिकृत कारण सांगितले गेले ते होते भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने या कराराला सहमती दिली नाही ! पुढे मुशर्रफ यांनी असेही लिहिले की या कराराला मोडता लालकृष्ण अडवाणी यांनी घातला ! 
--------------------------------------------------------------------------------------------


आग्रा शिखर परिषदेसाठी आलेल्या परवेज मुशर्रफ यांचे दिल्लीत जोरदार स्वागत झाले तरी दौऱ्याची सुरुवात फार चांगली झाली असे म्हणता येत नाही. याचे कारण ठरले नवी दिल्लीतील पाकिस्तान दुतावासाने ठेवलेला चहापान कार्यक्रम. परवेज मुशर्रफ यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमासाठी काश्मिरातील पाकिस्तान धार्जिण्या हुरियत कॉन्फरन्सच्या नेत्यांना आमंत्रित करण्यात आले होते. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने या कार्यक्रमा बद्दल आणि मुशर्रफ यांनी हुरियतच्या नेत्यांची भेट घेण्यावर आक्षेप घेणारे पत्रक जारी केले. याची दखल न घेता पाकिस्तान दूतावासातील चहापान कार्यक्रम ठरल्याप्रमाणे पार पडला. दुसऱ्या दिवशी आग्रा येथे शिखर बैठक सुरु होण्यापूर्वी भारताच्या तत्कालीन मंत्री सुषमा स्वराज यांची पत्रकार परिषद झाली. त्यांनी पत्रकार परिषदेत शिखर बैठकीत कोणत्या मुद्द्यावर चर्चा होणार याची माहिती दिली. त्यात त्यांनी काश्मीरवर चर्चा होणार याचा उल्लेखच केला नाही. त्यामुळे पाकिस्तानचे प्रतिनिधी मंडळ नाराज झाले. परवेज मुशर्रफ यांनी भारतात येण्यापुर्वीच जाहीर केले होते की ते इतर मुद्दे आणि काश्मीरची चर्चा करण्यासाठी भारतात जात नसून काश्मीर व इतर मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी जात आहे. त्यांच्यासाठी काश्मीर प्रमुख मुद्दा होता व इतर मुद्दे त्यानंतरचे होते. परिषदेच्या विषय पत्रिकेत काश्मीर असताना त्याचा उल्लेख का केला नाही या बद्दल खुलासा करताना सुषमा स्वराज यांनी म्हंटले की काश्मीरवर चर्चा होणार हे उघड होते. त्यामुळे त्याचा उल्लेख केला नाही. या गोष्टींचा परिणाम होवू न देता वाजपेयी व मुशर्रफ यांच्यात ठरल्याप्रमाणे काश्मीर व भारत पाक संबंधाना प्रभावित करणाऱ्या इतर विषयांवर ९० मिनिटे चर्चा झाली. ही चर्चा दोन्ही देशाच्या प्रतिनिधी मंडळात नाही तर दोन्ही देशाच्या राष्ट्राप्रमुखातच झाली.चर्चा सकारात्मक झाल्याचे दोन्ही देशांकडून जाहीर करण्यात आल्याने परिषदेतून चांगले निष्पन्न होईल ही भावना बळावली होती. या चर्चेनंतर दोन्ही देशाच्या परराष्ट्र मंत्र्यात शिखर परिषदेत स्वाक्षरी करण्यासाठीच्या करारावर सहमती झाल्याची चर्चा होती. शिखर बैठकीच्या पहिल्या दिवसाने निर्माण केलेल्या आशेवर पाणी फिरवणारा दुसरा आणि शेवटचा दिवस ठरला. 


दुसऱ्या दिवशी सकाळी मुशर्रफ यांनी प्रमुख भारतीय संपादकांना नाश्त्यासाठी आमंत्रित केले होते. त्यावेळी संपादकांशी ते प्रामुख्याने काश्मीर प्रश्नावर बोलले. तो प्रश्न सुटल्याशिवाय दोन्ही देशातील संबंध सुरळीत होणार नाही असा त्यांच्या बोलण्याचा रोख होता. या सगळ्या चर्चेचे त्यांनी व्हिडीओ रेकॉर्डिंग केले जे जगभरात प्रसारित झाले. आपण काश्मीर प्रश्नावर भारताशी रोखठोक बोलत आहोत हा संदेश व्हिडीओ रेकॉर्डिंगद्वारे  पाकिस्तानी जनतेपर्यंत त्यांना पोचवायचा होता. भारताची स्थिती या उलट होती. भारत सरकारला काश्मीर हा चर्चेचा मध्यवर्ती मुद्दा आहे हे लोकांपर्यंत पोचू द्यायचे नव्हते. त्यामुळे भारतीय नेत्यांना संपादकांसोबतची बोलणी रेकॉर्डिंग करून जगाला ऐकवण्याचा प्रकार आवडला नाही. काश्मीर प्रश्नावर चर्चा झाली त्या चर्चेत भारताने काश्मिरातील आतंकवादी कारवायांना पाकिस्तानची होत असलेली मदत आक्षेपार्ह असल्याचे चर्चेत भारताकडून जोरकसपणे मांडल्या गेल्याचे सांगण्यात आले. परिणामी पहिल्या दिवसाच्या चर्चेनंतर परिषदेतून ठोस निष्पन्न होईल व काश्मीर प्रश्नावर तोडगा दृष्टीपथात आहे असा जो आशावाद निर्माण झाला होता त्यावर दुसऱ्या दिवशी पाणी फेरले गेले. त्या परिषदे नंतर जी माहिती समोर आली त्यानुसार काश्मीर प्रश्नावरच्या तोडग्यावर वाजपेयी आणि मुशर्रफ तत्वश: सहमत झाले होते. त्या संबंधीचे निवेदन तयार करण्याची जबाबदारी दोन्ही देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांवर सोपविण्यात आली आणि त्यांनी सहमतीने निवेदन देखील तयार केले होते याचेही पुरावे नंतर प्रकाशित झाले होते. मुळात जो तोडगा निघाल्याचे बोलले जात होते तो मुशर्रफ यांनीच सुचविला होता. त्यामुळे ऐनवेळी त्यांनी माघार घेण्याचे कारण नव्हते. सहमतीच्या निवेदनावर स्वाक्षरी करण्यास नकार भारतातर्फे दिला गेला. वाजपेयींनी ऐनवेळी माघार का घेतली किंवा करार का होवू शकला नाही याची दोन्ही देशातर्फे वेगवेगळी कारणे देण्यात आली होती. परवेज मुशर्रफ यांनी आपल्या आत्मकथेत म्हंटले आहे की स्वाक्षरी न करण्याचे जे अधिकृत कारण सांगितले गेले ते होते भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने या कराराला सहमती दिली नाही ! पुढे मुशर्रफ यांनी असेही लिहिले की या कराराला मोडता लालकृष्ण अडवाणी यांनी घातला ! अडवाणी यांनी याचा इन्कार करताना आपल्याच सूचनेवरून वाजपेयींनी मुशर्रफ यांना चर्चेसाठी आमंत्रित केल्याचा दावा केला होता. 

कोणत्या करारावर स्वाक्षऱ्या होणार होत्या हे आजतागायत अधिकृतपणे सांगितले गेलेले नाही. ज्याअर्थी मंत्रीमंडळाने कराराचा मसुदा नाकारला त्याअर्थी असा मसुदा तयार झाला होता हे उघड आहे. मात्र काश्मीर प्रश्नावर मुशर्रफ यांनी समोर ठेवलेला तोडगा मात्र जगजाहीर आहे. अंतिम मसुद्यात हा तोडगा जशाच्यातसा स्वीकारण्यात आला की त्यात काही फेरबदल करण्यात आले होते हे कळायला मार्ग नाही. काश्मीरच्या बाबतीत १९४७ पासून जे काही घडले त्यात गोपनीय म्हणाव्या अशा दोनच बाबी आहेत ज्याचा खुलासा आजवर झाला नाही. पहिली बाब म्हणजे मृत्युच्या काही दिवस आधी पंडित नेहरूंनी काश्मीर प्रश्नावर काही तोडगे सुचविले होते ज्याची चर्चा करण्यासाठी शेख अब्दुल्लांना पाकिस्तानात पाठविले होते. शेख अब्दुल्ला त्या कामगिरीवर पाकिस्तानात असतांना इकडे नेहरूंचा मृत्यू झाला होता. गुलदस्त्यात असलेली दुसरी बाब म्हणजे आग्रा शिखर परिषदेत वाजपेयी-मुशर्रफ यांच्या स्वाक्षरीसाठी तयार करण्यात आलेला मसुदा. मुशर्रफ यांच्या ज्या तोडग्याची चर्चा होत आली आहे त्यावरून मसुद्यात काय असेल त्याचा अंदाज तेवढा बांधता येतो. जाहीर झालेला मुशर्रफ यांचा चारसूत्री तोडगा असा होता : एक, भारत आणि पाकिस्तान यांनी मान्य केलेली आंतरराष्ट्रीय नियंत्रण रेषा आहे तशी कायम ठेवावी. दोन, या नियंत्रण रेषेवरून दोन्ही देशांनी आपले सैन्य टप्प्याटप्प्याने मागे घ्यावे. तीन, नियंत्रण रेषा काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीर मधील काश्मीरींसाठी खुली ठेवावी आणि चार, काश्मीरच्या दोन्ही भागांना स्वातंत्र्य मिळणार नाही मात्र स्वशासनाचा अधिकार मिळेल. देखरेखीसाठी भारत, पाकिस्तान आणि काश्मिरी जनतेचे प्रतिनिधी अशी संयुक्त समिती असेल. या तोडग्याच्या आसपास आग्रा मसुदा तयार करण्यात आल्याचे मानल्या जाते. मात्र भारत आणि पाकिस्तानातच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्या आग्रा परिषदेने आशा निर्माण केल्या होत्या ती परिषद कोणतीही घोषणा न करता, कशावरही स्वाक्षरी न करता व दोन्ही राष्ट्रप्रमुखाची संयुक्त पत्रकार परिषद न होताच संपली. 

                                                  (क्रमशः)

------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि.यवतमाळ 
मोबाईल : ९४२२१६८१५८ 


Thursday, September 14, 2023

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - ७३

सुटका होवून पाकिस्तानात परतल्या नंतर या दहशतवाद्यांनी भारतात अनेक दहशतवादी कारवाया घडवून आणल्या.अपहरण केलेले विमान अमृतसरला असताना वेळीच कारवाईकरण्याची मोठी किंमत भारताला चुकवावी लागली. -------------------------------------------------------------------------------------- 


अपहरण केलेले इंडियन एअरलाईन्सचे प्रवासी विमान अमृतसर विमानतळावर इंधन भरण्यासाठी थांबले असताना अमृतसर स्थित सैन्याच्या तुकडीने सेनादलातील वरिष्ठांच्या सूचनेनुसार विमानतळाला घेरण्याची तयारी केली होती. ३ रणगाड्यासह सैन्याची तुकडी विमानतळाजवळ पोचली होतीविमानात प्रवासी असल्याने दिल्लीच्या आदेशाशिवाय कृती करण्याची कोणाची तयारी नव्हती. इंधन भरण्यास मुद्दाम उशीर करण्यात येत आहे हे लक्षात आल्यावर अपहरणकर्त्यांनी एका प्रवाशास भोसकलेविमान पुन्हा लाहोरकडे नेण्यास वैमानिकास बाध्य केले. विमान उडू देवू नका असा दिल्लीचा आदेश नसल्याने कोणी उड्डाण रोखले नाही. नंतर विमान लाहोरला इंधन भरून दुबईला गेले तेव्हा भारत सरकारने प्रवाशांच्या सुटकेसाठी एन एस जी कमांडो मार्फत कारवाई करण्याची परवानगी मागितली. दुबईने तशी परवानगी दिली नाही. अमृतसरला ज्या प्रवाशाला भोसकले होते तो दुबईला पोहचेपर्यंत मृत्यू पावला होता. तो मृतदेह आणि आणखी २७ प्रवाशांची दुबई विमानतळावर सुटका करून अपहरणकर्त्यांनी विमान अफगाणिस्थान मधील कंधार येथे नेण्यास भाग पाडले. कंधार विमानतळावर विमान उतरल्यावरही भारताने आपल्या कमांडो मार्फत कारवाई करू देण्याची परवानगी मागितली. तालिबान सरकारने ती नाकारली. एवढेच नाही तर भारताकडून अशी कोणती कारवाई होवू नये यासाठी अफगाणिस्तानच्या तालेबानी सैनिकांनी विमानाला वेढा दिला होता. त्यामुळे अपहरणकार्त्यांशी वाटाघाटी करण्याशिवाय पर्याय उरला नाही. मोदी सरकारने नियुक्त केलेले सध्याचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल त्यावेळी आय बी प्रमुख होते ते कंधारच्या वाटाघाटीत सामील होते. शेवटी भारताला आपल्या तुरुंगात असलेल्या अहमद ओमर सईद शेख, मसूद अझहर आणि मुश्ताक अहमद झरगर या तीन कुख्यात दहशतवाद्यांची सुटका करण्याचे मान्य करावे लागले. दुबई आणि कंधार विमानतळावर कारवाईची तयारी दर्शविणाऱ्या भारत सरकारने अमृतसरला विमान असताना कारवाई न केल्याने ही स्थिती उद्भवली होती. ज्यांची सुटका करायची त्या तीन पैकी दोन दहशतवादी जम्मू-काश्मीर मधील तुरुंगात होते. ओमर शेख तिहार तुरुंगात होता व त्याची सुटका केंद्राच्या आदेशाने होणार होती. मसूद अजहर हा जम्मूच्या जेल मध्ये होता तर मुश्ताक झरगर श्रीनगरच्या तुरुंगात होता. त्यांच्या सुटकेसाठी राज्यसरकारची परवानगी आवश्यक होती. त्यावेळी फारूक अब्दुल्ला मुख्यमंत्री होते व त्यांचा पक्ष केंद्रातील एनडीए सरकारमध्ये सामील असला तरी दहशतवाद्यांची तुरुंगातून सुटका करण्यास त्यांचा विरोध होता.

रुबिया सईद हिचे अपहरण झाले होते तेव्हाही फारूक अब्दुल्ला मुख्यमंत्री होते व त्यांनी त्यावेळीही सुटकेच्या बदल्यात अपहरणकर्त्याच्या मागण्या मान्य करण्यास विरोध केला होता. अपहरणकर्त्यांपुढे झुकून दहशतवाद्यांची मुक्तता केली तर काश्मीरमध्ये दहशतवाद बोकाळेल हे त्यांनी त्यावेळी सांगितले होते. त्यांची भविष्यवाणी त्यावेळी तंतोतंत खरी ठरली होती.विमान अपहरणकर्त्याच्या मागण्यांच्या बाबतीत त्यांनी हीच भूमिका मांडली. केंद्र सरकारकडून दबाव वाढल्यावर तीन पैकी पाकिस्तानी नागरिक असलेल्या दोघांना सोडण्याची तयारी दर्शवली. मात्र मुश्ताक अहमद झरगर हा काश्मिरी दहशतवादी काश्मीर मधील अनेकांच्या विशेषत: काश्मिरी पंडितांच्या हत्येस जबाबदार असल्याने त्याला सोडण्यास नकार दिला. त्यावेळी टी. एन. शेषन हे केंद्रीय मंत्रीमंडळ सचिव होते. त्यांनी राज्य सचिवाला फोन करून केंद्र म्हणेल ते ऐकायला सांगितले. नाही तर राज्य सरकार बरखास्त करावे लागेल ही धमकी शेषन यांच्या निरोपात निहित होती. दहशतवाद्यांना सोडण्यापेक्षा आपण राजीनामा देणे पसंत करू असे म्हणत फारूक अब्दुल्ला राज्यपाल सक्सेना यांचेकडे गेले देखील. मात्र सक्सेना यांनी राजीनामा न देण्यासाठी व तीन दहशतवाद्यांच्या सुटकेसाठी फारूक अब्दुल्लाचे मन वळविले. या दहशतवाद्यांना सोबत घेवून भारताचे तत्कालीन परराष्ट्रमंत्री जसवंतसिंह विमानाने कंधार विमानतळावर पोचले. तालीबाण्याच्या ताब्यात त्यांना दिल्यावरच प्रवाशांची अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका झाली. तालिबानी सैनिकांनी त्यांना सुरक्षा देवून पाकिस्तानच्या सीमेवर सोडले. सुटका होवून पाकिस्तानात परतल्या नंतर या दहशतवाद्यांनी भारतात अनेक दहशतवादी कारवाया घडवून आणल्या.अपहरण केलेले विमान अमृतसरला असताना वेळीच कारवाईकरण्याची मोठी किंमत भारताला चुकवावी लागली. 


कारगिल युद्ध त्यावेळचे पाकिस्तानचे लष्कर प्रमुख परवेझ मुशर्रफ यांच्या दु:साहसातून घडले होते. त्यानंतरच्या विमान अपहरण घटनेवेळी निवडून आलेल्या पंतप्रधानाला पदच्युत करून मुशर्रफ राष्ट्रप्रमुख बनले होते. पाकिस्तानी गुप्तचर संस्थेची विमान अपहरणकर्त्यांना झालेली मदत लक्षात घेता विमान अपहरणातही परवेज मुशर्रफ यांची मूकसंमती असल्याचे मानले जाते. त्यामुळे परवेज मुशर्रफ यांनी पाकिस्तानची सत्ता हाती घेतल्यावर भारत पाकिस्तान संबंधात मोठा तणाव निर्माण झाला होता. याच दरम्यान गुजरातमध्ये मोठा भूकंप होवून जीवित व वित्त हानी झाली होती. भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांनी या घटनेचा उपयोग करून घेतला. घटनेबद्दल केवळ दु:खच व्यक्त केले नाही तर औषधी आदि साहित्य पाठवून त्यांनी मदतीचा व मैत्रीचा हात पुढे केला. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी देखील त्यांच्या कृतीला प्रतिसाद परवेज मुशर्रफ यांना भारत भेटीचे निमंत्रण दिले. अपयशी ठरूनही ऐतिहासिक समजल्या गेलेली आग्रा शिखर परिषद या निमंत्रणातून आकाराला आली. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निमंत्रणावरून परवेज मुशर्रफ १४ जुलै २००१ रोजी तीन भारत दौऱ्यासाठी दिल्लीत दाखल झाले. २१ तोफांची सलामी त्यांना देण्यात आली. पहिला दिवस दिल्लीत औपचारिक गाठीभेटी साठी राखून ठेवण्यात आला होता तर पुढचे दोन दिवस आग्रा येथे भारताचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांच्यातील शिखर परिषदेसाठी राखीव होते. १९७१ च्या भारत पाकिस्तान युद्धानंतर सिमला येथे भारत आणि पाकिस्तानच्या पंतप्रधानांची शिखर परिषद पार पडली होती. बऱ्याच कालावधी नंतर आग्रा येथे दुसरी शिखर परिषद झाली. सिमला ते आग्रा या दोन शिखर परिषदांच्या दरम्यान काश्मीर मध्ये पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद हळू हळू वाढत जावून १९९० च्या दशकात काश्मीरमध्ये दहशतवादाद चरमसीमेवर पोचला होता. दहशतवादाच्या दशकानंतर कारगिल युद्ध व विमान अपहरणाच्या घटनेनंतर ताणल्या गेलेल्या भारत पाक संबंधामुळे आग्रा शिखर परिषदेला विशेष महत्व प्राप्त झाले होते. (क्रमशः) -------------------------------------------------------------------------------- सुधाकर जाधव पांढरकवडा जि. यवतमाळ मोबाईल - ९४२२१६८१५८