Friday, July 25, 2025

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - १३७

 

काश्मीर समस्येचे मूळ कलम ३७० मध्ये नसून काश्मीर समस्येचे समाधान कलम ३७० मध्ये आहे हे जो पर्यंत आपण समजून घेत नाही तो पर्यंत काश्मीर प्रश्न आपल्याला चकवा देत राहणार आहे. 
----------------------------------------------------------------------------------------


केंद्र सरकार कलम ३७० रद्द करून काश्मीर प्रश्न सोडविल्याचा दावा आणि कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयाचे काश्मिरी जनतेने स्वागत केल्याचा किंवा तो निर्णय स्वीकारल्याचा केलेला दावा काश्मीर खोऱ्यातील परिस्थितीशी मेळ खाणारा नसल्याचे आपण बघितले. काश्मीर समस्येच्या मुळाशी कलम ३७० आहे आणि ते का एकदा रद्द केले की समस्या संपेल ही धारणा जनसंघ, संघ आणि भारतीय जनता पक्ष यांची प्रारंभापासून राहिली आहे. त्यामुळे त्यांच्या दृष्टीने जी समस्या होती ती त्यांनी निकालात काढली आणि त्यांच्या दृष्टीने त्यांनी काश्मीर प्रश्न संपविला. हे फक्त त्यांचेच म्हणणे आहे असे नाही. काश्मिरेतर भारतीय जनतेचे सर्वसाधारणपणे तेच मानणे आणि म्हणणे आहे. कारण भारतीय जनता स्वातंत्र्य मिळाले तेव्हापासून काश्मीर बाबत जो प्रचार करत आली त्याचा बळी ठरली आहे. त्या प्रचाराला कधी कोणी समर्थपणे आणि सातत्याने उत्तर न दिल्याने संघपरिवाराचा एकतर्फी प्रचार खोलवर बिंबला गेल्याचा हा परिणाम आहे. सर्वसामान्यच नाही तर अभिजनही या प्रचाराला बळी पडले आहेत. याचा अस्सल पुरावा म्हणजे कलम ३७० रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयाची सर्वोच्च न्यायालयाने केलेली पाठराखण आहे. १९४७ पासून संघपरिवाराचा असा प्रचार एकीकडे आणि दुसरीकडे  १९४७ पासून देशात जी सरकारे आली त्यांनी काश्मीर प्रश्न सोडविण्याचा केलेला प्रयत्न बघितला तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार वगळता कोणत्याही सरकारने कलम ३७० ला काश्मीर समस्येचे मूळ मानले नव्हते हे लक्षात येईल. ही फक्त कॉंग्रेसचीच सरकारे नव्हती तर कॉंग्रेसेतर मोरारजी देसाई यांचे सरकार , चंद्रशेखर, देवेगौडा पासून व्हि.पी. सिंगचे सरकार आणि दस्तुरखुद्द अटलबिहारी बाजपेयी यांचे सरकार यांची भूमिका कधीच कलम ३७० च्या विरोधी राहिली नाही . यातील  प्रत्येक कॉंग्रेसेतर सरकारला संघपरिवाराचा आतून किंवा बाहेरून पाठींबा राहिलेला आहे.                                       

कॉंग्रेस किंवा कॉंग्रेसेतर सरकारांना काश्मीरचे नेमके दुखणे काय याची जाणीव होती. या दुखण्यावरचे औषध त्यांना माहित नव्हते असेही नाही. या औषधाने काश्मीरचे दुखणे थांबलेही असते पण या औषधाची काश्मिरेतर भारतीय जनतेवर तीव्र प्रतिक्रिया उमटेल ही भीती प्रत्येक सरकारला वाटत होती. त्यामुळे रोगाचे निर्मुलन करणारे औषध देण्याऐवजी रोग काबूत राहील अशी औषधे देण्याचा प्रयत्न झाला. याचाही फायदा उठवत संघ-भाजपने असा प्रचार केला की आजवर सगळय सरकारने वाटाघाटी, बोलणी करण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. खरी गोष्ट अशी आहे की समस्येच्या मुळाशी भिडण्याचा एकतर प्रयत्नच झाला नाही किंवा ज्या पंतप्रधानांनी समस्येच्या मुळाशी भिडण्याचा प्रयत्न केला त्यांनी तो मधेच सोडून दिला. याचा भारतीय जनतेच्या मानसिकतेवर असा परिणाम झाला की इतर कोणतेही उपाय प्रभावी सिद्ध झाला नाही. कलम ३७० रद्द करणे हाच उपाय यावरचा असू शकतो. त्यामुळे कलम ३७० रद्द करण्याचा मोदी सरकारचा निर्णय जनतेला आवडला. आता कलम ३७० रद्द झाले. कलम ३७० रद्द होवून ६ वर्षे झालीत आणि सरकारच्या त्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब करून वर्ष झालं पण कलम ३७० रद्द करण्यापूर्वी आम्ही जिथे होतो तिथेच उभे असल्याचे हळूहळू जनतेच्या लक्षात येवू लागले आहे. काश्मीर समस्येचे मूळ कलम ३७० मध्ये नसून काश्मीर समस्येचे समाधान कलम ३७० मध्ये आहे हे जो पर्यंत आपण समजून घेत नाही तो पर्यंत काश्मीर प्रश्न आपल्याला चकवा देत राहणार आहे. 

आपल्या संविधानकारांनी कलम ३७० ची जी रचना केली आहे ती नीट समजून घेतली तर नरेंद्र मोदी सरकारची कृती आणि त्या कृतीवर शिक्कामोर्तब करणारा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय त्या रचनेची प्रतारणा करणारा असल्याचे लक्षात येईल. कलम ३७० मधील शब्द न शब्द नीट समजून घेतला तर आपल्या लक्षात येईल की काश्मीर संबंधी कोणताही निर्णय भारत सरकार व भारताची संसद घेवू शकत नाही. काश्मीर संबंधी जो काही निर्णय होईल तो काश्मिरी जनतेच्या इच्छेने आणि संमतीनेच होईल. कलम ३७० ची अशी रचना करताना आणि ती स्वीकृत करताना संविधान सभेचे सर्व सदस्य अनुकूल होते असे नाही. पण काश्मीरच्या जनतेशी केलेला करार , भारतात काश्मीरला सामील करून घेताना दिलेला शब्द पाळला गेला पाहिजे या बाबतीत त्यांचे एकमत होते. म्हणून इतर राज्यासारखाच काश्मीर देखील भारताचा भाग असला पाहिजे असे मनोमन वाटत असताना संविधान सभेने आपली इच्छा काश्मिरी जनतेवर लादली नाहीच शिवाय कलम ३७० द्वारे अशी तरतूद केली की केंद्रात येणाऱ्या सरकारांनाही त्यांची इच्छा काश्मिरी जनतेवर लादता येणार नाही.                                                           

भारताच्या संविधान सभेने काश्मिरी जनतेच्या इच्छेचे व काश्मिरी जनतेच्या मताचे प्रकटीकरणाचे माध्यम म्हणून जम्मू-काश्मीरच्या सरकारला नव्हे तर जम्मू-काश्मीरच्या निर्वाचित संविधान सभेला मान्यता दिली होती. कलम ३७० स्वीकृत झाले तेव्हा जम्मू-काश्मीरची संविधान सभा अस्तित्वात नव्हती. म्हणून संविधान सभा अस्तित्वात येईपर्यंत जम्मू-काश्मीरचे सरकार व केंद्र सरकार यांच्यात जे काही करार होतील किंवा जम्मू-काश्मीर संबंधी जे निर्णय होतील त्याला जम्मू-काश्मीरच्या संविधान सभेने मान्यता दिली तरच ते अंतिम समजण्यात येतील असे ठरले होते. त्यावेळचे अंतरिम भारत सरकार व काश्मीरचे प्रतिनिधी यांच्यातील वाटाघाटीतून कलम ३७० आकाराला आले असले तरी त्या कलमा संबंधी अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार भारतीय संविधान सभेने जम्मू-काश्मीर संविधान सभेला बहाल केला होता. वैधानिक दृष्ट्या जम्मू-काश्मीरचे भवितव्य निश्चित करणारी अंतिम संविधानिक संस्था ही जम्मू-काश्मीरची संविधान सभा होती. भारतीय संविधान सभेने हा अधिकार ना आपल्याकडे ठेवला ना भारत सरकारला बहाल केला ना जम्मू-काश्मीर सरकारला दिला. त्यामुळे जम्मू-काश्मीर संविधान सभेने स्वत:ला विसर्जित करण्याच्या क्षणापर्यंत जे काही निर्णय जम्मू-काश्मीर संबंधी घेतलेत ते अंतिम ठरतात. तेव्हा केंद्र सरकारने व भारतीय संसदेने कलम ३७० बाबत जो निर्णय घेतला तो भारतीय संविधान सभेच्या निर्णयाच्या विरुद्ध आणि विपरीत आहे.  भारतीय संविधान सभेने काश्मीरचे भवितव्य ठरविण्याचा अधिकार काश्मिरी जनतेला दिला असताना काश्मीर संबंधी कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय कोणी घेतला तर उर्वरित भारतीय जनतेच्या प्रतिनिधींनी ! एक प्रकारे हा निर्णय काश्मिरी जनतेवर लादण्यात आला आहे. संविधान सभेच्या निर्णयाचा आणि भावनेचा आदर ना सरकारने केला ना सर्वोच्च न्यायालयाने. सध्याच्या सरकारने व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने काश्मीर समस्या सुटलेली नसून समस्या अधिक गुंतागुंतीची बनली आहे. 

----------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि. यवतमाळ 
मोबाईल - ९४२२१६८१५८ 

Friday, July 18, 2025

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - १३६

 लोकांच्या मनातील आणीबाणी विरोध रस्त्यावर प्रकट होवू शकला नाही पण संधी मिळताच मतपेटीतून तो व्यक्त झाला. काश्मीरमध्येही तेच घडले. जेव्हा मतदान करण्याची संधी मिळाली तेव्हा काश्मिरी जनतेने कलम ३७० चे समर्थन करणाऱ्या व त्या कलमाची पुनर्स्थापना करण्यासाठी लढण्याची तयारी असलेल्या पक्षाचे समर्थन करून कलम ३७० रद्द करण्याला असलेला विरोध व्यक्त केला. 
-----------------------------------------------------------------------------------


कलम ३७० रद्द करण्यावेळी काश्मीर खोऱ्यातील परिस्थिती आणि १९७५ साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पुकारलेल्या आणीबाणी नंतरची परिस्थिती याची तुलना आणखी एका मुद्द्याच्या बाबतीत केली तर कलम ३७० रद्द केल्यानंतर खोऱ्यात जनतेचा उठाव का झाला नाही हे लक्षात येईल. आणीबाणी पुकारल्यानंतर देशभरात जी धरपकड झाली त्याचे निश्चित असे निकष होते. पहिला निकष होता जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनात सक्रीय राजकीय पक्ष आणि संघटना यांच्याशी संबंधित कार्यकर्ते, दुसरे ज्यांना अटक झाली ते होते आनंदमार्गी आणि काळाबाजार करणारे लोक. एखाददुसरा अपवाद वगळता अटकेच्या बाबतीत हे निकष पाळले गेले आणि हे सगळे काम स्थानिक पोलिसांनीच केले. काश्मीरमध्ये कलम ३७० रद्द करताना झालेल्या धरपकडीला असे कोणतेच निकष नव्हते. तेथील राजकीयदृष्ट्या सक्रीय नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना पकडलेच पण ज्यांचा राजकारणाशी संबंध नसलेल्या अनेक प्रतिष्ठीत व्यावसायिकांना अटक केली गेली. आणीबाणी काळात ज्यांना अटका झाल्यात त्यांना कोणत्या तुरुंगात ठेवणार याची कुटुंबियांना माहिती असायची. अटक केल्यानंतर गरजेचे समान घरून घेण्यासाठी अटक करणाऱ्याला पोलीस त्याच्या घरी न्यायचे. काश्मीरखोऱ्यात कधी कोणाला पोलीसठाण्यात बोलावले जाईल याचा नेम नसायचा. अंगावरच्या कपड्यांखेरीज ज्यांना अटक होईल त्यांच्याकडे समान नसायचे. कोठे ठेवण्यात आले याची कुटुंबियांना माहिती नसायची. कोठे ठेवण्यात आले हे कळायलाच काही दिवस लागायचे. त्यावेळी ज्यांना अटक झाली त्यापैकी अनेकांना काश्मीर बाहेरच्या तुरुंगात ठेवण्यात आले होते. तेथे जावून भेटणे अजिबात सोपे नव्हते. आणीबाणीत निकष पळून केलेल्या अटकांमुळे किती दहशत पसरली होती हे तो काळ अनुभवणाऱ्या लोकांकडून कळेल.                                                                                                                     


आणीबाणीपूर्वी लाखांच्या सभा आणि लाखांचे मोर्चे ही नित्य बाब बनली होती. पण आणीबाणी जाहीर झाली आणि त्या आणीबाणीचा विरोध करण्यासाठी ना सभा झाल्या ना मोर्चे निघाले. जे लाखो लोक मोर्चात सामील व्हायचे, सभेला आवर्जून हजर राहून टाळ्या वाजवायचे त्या सर्वाना तर अटक नव्हती झाली पण त्यांच्या पैकी कोणी आणीबाणीचा विरोध करायला रस्त्यावर आले नाहीत. त्यावेळी तर सैन्यही रस्त्यावर नव्हते. कोणी रस्त्यावर आले नाही , आंदोलन केले नाही याचा अर्थ लोकांनी आणीबाणीचे स्वागत केले असा होत नाही. सरकारी दूरदर्शन व आकाशवाणीने मात्र त्यावेळी तसा प्रचार केला होता. आणीबाणी विरोधात त्यावेळी स्वयंस्फूर्त उठाव झाला नाही. आणीबाणीला विरोध करण्यासाठी पहिल्या सहा महिन्यात प्रयत्नपूर्वक सत्याग्रह झालेत ज्यात सामील होणाऱ्याची  संख्या अत्यल्प होती. त्यानंतर तसे सत्याग्रहही बंद झाले होते. याचा अर्थ लोकांनी आणीबाणी स्वीकारली होती असा नव्हता. पण प्राप्त परिस्थितीत आपण काहीही करू शकत नाही ही अगतिकता, हतबलता आणि निराशा सर्वव्यापी होती. कलम ३७० रद्द करण्यावेळी उचलण्यात आलेली पाउले आणीबाणी पेक्षा कठोर आणि कायद्याची तमा न बाळगणारी होती. शिवाय पावलोपावली सुरक्षादलाचे जवान तैनात होते. आणीबाणीच्या तुलनेत काश्मीर मध्ये अधिक विपरीत परिस्थितीचा सामना तेथील जनतेला करावा लागला .त्यामुळे कलम ३७० रद्द झाले तेव्हा विरोधाच्या स्वयंस्फूर्त अशा तुरळक घटना वगळता जनता मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरू शकली नाही. त्यामुळे आणीबाणी काळा सारखाच सगळ काही सुरळीत असल्याचा प्रचार झाला. लोक रस्त्यावर उतरले नाही याचा अर्थ कलम ३७० रद्द करणे त्यांनी मान्य केले एवढेच नाही तर स्वागत केले असा प्रचार आपण ऐकला आहे. लोकांच्या मनातील आणीबाणी विरोध रस्त्यावर प्रकट होवू शकला नाही पण संधी मिळताच मतपेटीतून तो व्यक्त झाला. काश्मीरमध्येही तेच घडले. जेव्हा मतदान करण्याची संधी मिळाली तेव्हा काश्मिरी जनतेने कलम ३७० चे समर्थन करणाऱ्या व त्या कलमाची पुनर्स्थापना करण्यासाठी लढण्याची तयारी असलेल्या पक्षाचे समर्थन करून कलम ३७० रद्द करण्याला असलेला विरोध व्यक्त केला. 

जम्मू-काश्मीर राज्य एकसंघ असताना लडाख मधील जनतेला सरकार आपले ऐकत नाही किंवा आपल्या हिताकडे लक्ष देत नाही असे वाटत होते. जम्मू आणि काश्मीरपासून आपल्याला वेगळे करण्यात यावे ही त्यांची आधीपासूनची भावना होती. त्यामुळे त्यानाही कलम ३७० नको होते. जेव्हा कलम ३७० रद्द करण्याची घोषणा झाली तेव्हा त्याचे व्यापक स्वागत लडाख मध्ये झाले होते. जम्मू-काश्मीर राज्यापासून वेगळे झाल्याचा त्यात आनंद अधिक होता. कलम ३७० मुळे लडाखचे वेगळेपण कायम राखण्यासाठी घटनेचे सहावे शेड्युल लागू करता येत नव्हते हे त्यांचे कलम ३७० ला विरोध असण्याचे मुख्य कारण होते. जम्मू-काश्मीर विधानसभेत कमी लोकसंख्येमुळे लडाखचे प्रतिनिधित्व कमी असल्याने लडाखकडे सतत दुर्लक्ष होत आले हे विरोधाचे दुसरे कारण होते. पण कलम ३७० रद्द झाल्या नंतरच्या ५ वर्षाच्या काळात लडाख मधील जनतेचा पूर्ण भ्रमनिरास झाला. आजच्यापेक्षा कलम ३७० लागू होते तेव्हाची परिस्थिती चांगली होती म्हणण्याची पाळी लडाखमधील जनतेवर आली. कारण कलम ३७० लागू असताना संपूर्ण जम्मू-काश्मीर राज्यात कलम ३५ अ चा अंमल होता. त्यामुळे बाहेरचे लोक येवून जमिनी खरेदी करण्याची भीती नव्हती. बाहेरच्याना नोकरी मिळणे शक्य नव्हते. कलम ३७० रद्द करण्यासोबत हे संरक्षण गेल्याने लडाख मधील जनता असुरक्षित बनली. घटनेचे सहावे शेड्युल लागू करण्याची मागणीने त्यातून जोर पकडला. कलम ३७० रद्द झाल्यानंतर सर्वात मोठे जनआंदोलन कुठे उभे राहिले असेल तर ते लडाख मध्ये राहिले. सोनम  वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली हजारो लडाखी स्त्री-पुरुष रस्त्यावर उतरले. तापमान शून्याच्या खाली असताना सोनम वांगचुक यांनी २४ दिवस उपोषण केले. हजारो महिला साखळी उपोषणात सामील झाल्या. हा लढा कलम ३७० च्या पुनर्स्थापनेसाठी नव्हता हे खरे पण कलम ३७० लागू असताना जम्मू-काश्मीर बाहेरच्या लोकांपासून जे संरक्षण होत होते तशाच प्रकारच्या संरक्षणाची व स्वशासनाची मागणी आंदोलनकर्त्याची होती आणि आहे. ज्या लडाखमध्ये कलम ३७० रद्द करण्याचे उघड स्वागत झाले होते त्या लडाख मध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकात आघाडी कोणी घेतली तर ती कलम ३७० चे समर्थन करणाऱ्या व त्या कलमाची पुनर्स्थापना झाली पाहिजे अशी आग्रही मागणी करणाऱ्या नँशनल कॉन्फरन्सने ! लडाख मध्ये झाले तसे आंदोलन जम्मू विभागात झाले नाही पण त्या विभागातील लोकांची देखील बाहेरच्यांना नोकरीत घेण्यात येवू नये व मालमत्ता खरेदी करता येवू नये अशी मागणी जाहीरपणे केलेली आहे. कलम ३७० रद्द करायला विरोध नाही पण कलम ३७० अंतर्गत या विभागांना मिळणारे संरक्षण मात्र कायम राहिले पाहिजे अशी जम्मू व लडाख मधील जनतेची भावना आहे. काश्मीर खोऱ्यातील मुस्लीम बहुल जनतेचे सोडा पण कलम ३७० रद्द करण्याच्या संघ-भाजपच्या मागणीला पाठींबा देणाऱ्या गटांनाही कलम ३७० चे महत्व नव्याने लक्षात येवू लागले आहे भलेही ते कलम ३७० रद्द करणे चुकीचे होते असे म्हणत नसतील. 

-------------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि. यवतमाळ 
मोबाईल : ९४२२१६८१५८  

Friday, July 11, 2025

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - १३५

 इंदिराजींच्या आणीबाणी काळात विश्वसनीय बातम्यांसाठी सुजाण लोक बीबीसी ऐकायचे. कलम ३७० रद्द झाल्या नंतर काश्मीर मध्ये काय प्रतिक्रिया उमटली हे जाणून घेण्यासाठी पुन्हा एकदा विदेशी प्रसिद्धी माध्यमांवर अवलंबून राहण्याची पाळी आली.
--------------------------------------------------------------------------------------------


कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय घोषित करण्याआधी केंद्र सरकारने केवळ काश्मिरातील जनतेला काश्मिरात कुठे काय चालले हे कळणार नाही याचीच व्यवस्था केली नव्हती तर देशातल्या इतर भागात व परदेशातही कलम ३७० रद्द झाल्या नंतर काश्मीरमधील जनतेची प्रतिक्रिया कळणार नाही याची व्यवस्था केली होती. मोदी सरकारवर अघोषित व असंवैधानिक आणीबाणी देशात लादल्याचा आरोप होत असतो. कलम ३७० रद्द झाल्या नंतरचे काही महिने काश्मिरात केंद्र सरकारने ज्या उपाययोजना अंमलात आणल्या त्याच्यावर दृष्टीक्षेप टाकला तरी अघोषित व असंवैधानिक आणीबाणी काय असते हे कळेल. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना १९७५ मध्ये आणीबाणी लादून जी पाउले उचलली होती त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक जाचक पाउले मोदी सरकारने कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय घेताना काश्मीरमध्ये उचलली होती. मी श्रीमती इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणीचा भुक्तभोगी असल्याने या दोन परिस्थितीची वस्तुनिष्ठ तुलना करू शकतो. इंदिरा गांधी यांच्या घोषित आणीबाणीत प्रसारमाध्यमावर सेन्सॉरशिप लादण्यात आली होती. प्रसिद्धीविभागाच्या अधिकाऱ्यांनी नजरेखालून घातलेला आणि मंजूर केलेला मजकूरच वृत्तपत्रांना प्रकाशित करावा लागत असे. एरव्ही प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींवर कुठलीही बंधने नसायची. ते कुठेही जावून बातमी मिळवू शकत होते. कलम ३७० रद्द करताना मोदी सरकारने ज्या उपाययोजना काश्मिरात केल्या त्यात आणीबाणी काळा सारखी घोषित सेन्सॉरशिप नव्हती. पण वृत्तपत्र व वृत्तवाहिन्याच्या  प्रतिनिधीना बातमी मिळविणेच शक्य होणार नाही अशाप्रकारची व्यवस्था करण्यात आली होती. टेलिफोन, मोबाईल आणि इंटरनेट बंद केल्याने आजूबाजूला व दूरवर काय चालले हे कळण्याचा मार्ग बंद झाला होता. नाही म्हणायला पत्रकारांना कर्फ्यू पास देण्यात आले होते. पण या पास वर फिरणे सोयीचे आणि सोपे नव्हते. प्रत्येक १०० मीटरवर सुरक्षा सैनिक अडवून तुमची चौकशी करणार असेल तर त्या पासचा काहीच उपयोग नसतो. पास दाखविला आणि सुरक्षा सैनिकांनी जावू दिले असे अजिबात घडत नव्हते. बऱ्याचदा सुरक्षा सैनिकाकडून अपमानास्पद वागणूक मिळायची आणि अनेकदा तर पास असूनही पुढे जायला नकार दिला जायचा. त्यामुळे त्या काळात कुठे काय चालले या संबंधीच्या बातम्या मिळविणे महाकठीण काम होते.                                                                                 

एवढे सगळे अडथळे पार करून बातमी मिळविली तरी आपल्या कार्यालया पर्यंत कशी पोचवायची हा मोठा प्रश्न होता. काश्मीर बाहेर जाणाऱ्या प्रवाशांच्या हातून अशा बातम्या पाठविल्या जायच्या पण बऱ्याचदा त्या बातम्या इप्सितस्थळी पोचायच्याच नाही. बातम्या बाहेर पोचल्या तरी त्या देशी माध्यमात प्रकाशित होतील याची खात्री नव्हती. विदेशी माध्यमात मात्र त्या प्रकाशित होत. इंदिराजीच्या आणीबाणीत दूरदर्शन हेच दृकश्राव्य मध्यम होते व जे सरकारी नियंत्रणात होते. मोदीकाळात सरकारी दूरदर्शन मागे पडून असंख्य खाजगी वृत्तवाहिन्या अस्तित्वात असल्या तरी सरकारी बाजू मांडणे हेच त्यांचे काम बनल्याने काश्मिरातील परिस्थिती देशवासियांना कळत नव्हती. अशा वृत्तवाहिन्यांसाठी आणि बाहेरच्या वृत्तपत्रांसाठी रोज प्रसिद्धी विभागाकडून बातम्यांचे ब्रीफिंग केले जायचे. त्यातून काश्मिरात सर्वत्र शांतता आहे आणि कलम ३७० रद्द करण्याला कोणीच विरोध केला नाही असाच समज निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. इंदिराजींच्या आणीबाणी काळात विश्वसनीय बातम्यांसाठी सुजाण लोक बीबीसी ऐकायचे. कलम ३७० रद्द झाल्या नंतर काश्मीर मध्ये काय प्रतिक्रिया उमटली हे जाणून घेण्यासाठी पुन्हा एकदा विदेशी प्रसिद्धी माध्यमांवर अवलंबून राहण्याची पाळी आली. कलम ३७० रद्द केल्याची घोषणा झाल्या नंतर श्रीनगर शहरात पावलोपावली सुरक्षा सैनिक तैनात असताना श्रीनगरच्या सौरा भागातील पार्कमध्ये या निर्णयाच्या विरोधात शेकडो लोक प्रदर्शन करीत होते अशी बातमी १० ऑगस्ट २०१९ रोजी बी बी सी ने प्रसारित केली जी कोणत्याच भारतीय प्रसिद्धी माध्यमाने दिली नव्हती. या निदर्शकांवर सुरक्षादलाने अश्रुधुराचा मारा केला आणि गोळीबार केल्याचा दावा बीबीसीने आपल्या प्रसारणात केला होता. अलजझीरा या वृत्तवाहिनीने सुरक्षादलाने रबरकोटेड स्टील बुलेटचा मारा केल्याचे आपल्या प्रसारणात नमूद केले. अर्थात सरकारने याचा इन्कार केला. काश्मीरमध्ये तर वृत्तपत्र प्रकाशित करणेच अशक्यप्राय असल्याने अशा बातम्या तिथे प्रकाशित आणि प्रसारित होणे शक्य नव्हते. अशा प्रकारच्या प्रदर्शनात कोणी जखमी झाले तर पोलीस त्यांना इस्पितळात भारती करतात आणि या बाबतची माहिती इस्पितळाकडून मिळत असते. पण मोदी सरकारने सगळ्याच आघाड्यावर चोख बंदोबस्त ठेवला होता. अशी कोणतीही माहिती देण्यावर इस्पितळ प्रशासनावर बंदी घालण्यात आली होती.                                     

इंदिराजीच्या आणीबाणी काळात सरकारच्या परवानगीनेच बातम्या प्रकाशित करायचे बंधन होते तसे बंधन मोदी सरकारने घातले नव्हते हे खरे पण काश्मीर संबंधी सरकारला अडचणीच्या वाटणाऱ्या किंवा सरकारच्या नेरेटीवला छेद देणाऱ्या बातम्या प्रकाशित व प्रसारित झाल्या तर अशा बातम्या देणाऱ्या काश्मिरातील प्रतिनिधीना अनेक अडचणींचा आणि सरकारी दडपशाहीचा सामना करावा लागल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे काश्मिरातील सगळ्याच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधित अत्यंत भीतीची, असुरक्षिततेची आणि आपले काम नीट करता येत नसल्याने निराशेची व अगतिकतेची भावना होती. प्रसिद्धी माध्यमात काम करणारे लोक एवढे अगतिक असतील तर सर्वसामान्य लोकांची काय स्थिती असेल याचा अंदाज करता येईल. सरकारशी अघोषित आणि अनियोजित असहकार हेच एक अस्त्र लोकांच्या हाती होते आणि त्यांनी ते वापरल्याचेही दिसून येते. कलम ३७० रद्द केल्या नंतर पाकिस्तानने भारत काश्मिरात दडपशाही करीत असल्याच्या आंतरराष्ट्रीय प्रचाराला उत्तर देण्याची गरज भारताला वाटू लागली तेव्हा भारत सरकारने काश्मिरातील बंधने शिथिल करायला सुरुवात केली . परराष्ट्रीय प्रतिनिधीना काश्मिरातील परिस्थिती सामान्य असल्याचे दाखविण्यासाठी काश्मिरात आणण्याच्या आधी दुकाने उघडी रहावीत असा प्रयत्न करण्यात आला. पण दुकानदारांनी फारसा प्रतिसाद दिला नाही. यातून कलम ३७० रद्द करण्यातून निर्माण झालेली काश्मिरातील लोकभावना प्रकट होते. हे खरे आहे की कलम ३७० रद्द करण्या विरुद्ध मोठा लोक उद्रेक टाळण्यात सरकारला यश आले पण याचा अर्थ कलम ३७० रद्द करण्याचा सरकारचा निर्णय काश्मीर खोऱ्यातील जनतेने स्वीकारला असा होत नाही. इंदिराजीच्या आणीबाणीतही लोक शांत होते. विरोध करीत नव्हते. भीतीची भावना लोकात होती. कलम ३७० रद्द झाल्यानंतरची काश्मीरखोऱ्यातील परिस्थिती अशीच होती. देशातील जनतेने आपला आणीबाणी विरोध प्रदर्शन व निदर्शन करून व्यक्त न करता मतदानातून प्रकट केला होता. कलम ३७० रद्द केल्याचा विरोध काश्मीरखोऱ्यातील जनतेनेही मतदानातून व्यक्त केला आहे. कलम ३७० रद्द करण्याला विरोध करणाऱ्या व या कलमाची पुनर्स्थापना करण्याची प्रतिज्ञा करणाऱ्या पक्षाला काश्मीर खोऱ्यातील जनतेने निवडून देवून कलम ३७० बाबत काश्मीर खोऱ्यातील जनतेची काय भूमिका आहे हे दाखवून दिले आहे. 

---------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि. यवतमाळ 
मोबाईल : ९४२२१६८१५८ 

Friday, July 4, 2025

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - १३४

 ५ ऑगस्ट २०१९ ला कलम ३७० रद्द करण्याच्या घोषणेनंतर महिनाभराने जेव्हा काही प्रमाणात बंधने शिथिल करण्यात आली तेव्हाच सरकारच्या निर्णयाविरुद्ध अनेक ठिकाणी उत्स्फूर्त विरोध प्रदर्शन झाल्याची माहिती बाहेर येवू शकली. ही माहितीही भारतीय प्रसारमाध्यमांपेक्षा विदेशी प्रसारमाध्यमातून कळू शकली. 
----------------------------------------------------------------------------------------------


बाकी काही जमो की न जमो प्रचाराच्या बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार प्रचाराच्या बाबतीत जगात नंबर एक आहे. २०१६ पासून नोटबंदी नंतर काश्मिरातील आतंकवादाचे कंबरडे मोडले असा प्रचार करीत राहिले. दरम्यान दहशतवादाच्या मोठ्या घटना घडतच राहिल्या. ५ ऑगस्ट २०१९ नंतर कलम ३७० रद्द केल्यामुळे काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद संपुष्टात आल्याचा प्रचार केला गेला. कलम ३७० रद्द केल्यानंतर दहशतवाद संपुष्टात आला असेल तर नोटबंदीनंतर दहशतवादाचे कंबरडे मोडले हा प्रचार आपोआप खोटा ठरतो. कलम ३७० रद्द केल्या नंतरही दहशतवादाच्या अनेक घटना घडूनही दहशतवाद संपल्याचा प्रचार कायम राहिला. सरकारी प्रचार खरा असल्याचा मानणाऱ्याना काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद संपला नसल्याची जाणीव नुकत्याच घडून गेलेल्या भीषण अशा पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर झाली. मोदी सरकारच्या काळात दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवादी आणि त्यांना रसद पुरविणाऱ्या पाकिस्तानवर तीन सर्जिकल स्ट्राईक करण्यात आलेत. प्रत्येक स्ट्राईक नंतर असाच प्रचार करण्यात आला की दहशतवाद्यांना आणि पाकिस्तानला धडा शिकविला. ज्या तीन सर्जिकल स्ट्राईकचा सरकारने आपली प्रतिमा उजळण्यासाठी उपयोग करून घेतला तेच सर्जिकल स्ट्राईक काश्मीर खोऱ्यात दहशतवादी कारवाया सुरु असल्याचा पुरावा आहे. ५ ऑगस्ट २०१९ नंतर काश्मीर खोऱ्यातील जनतेने कलम ३७० रद्द करण्याला विरोध केला नाही , विरोध प्रदर्शन झाले नाही, लोक रस्त्यावर उतरले नाहीत असा प्रचार धडाक्यात करण्यात आला. स्थिती नियंत्रणात व सुरळीत असल्याचा प्रचार करण्यात आला. भारतीय प्रसार माध्यमांनीही सरकारच्या या प्रचाराला हातभार लावला. तशी या प्रचारात अंशतः का होईना सत्यता होती. काश्मिरातील शहरांमध्ये आणि विशेषतः श्रीनगर मध्ये कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णया विरोधात जनता रस्त्यावर आली नव्हती. पाउला पाऊलावर सुरक्षा सैनिक तैनात असल्याने घराच्या बाहेर पडणे शहरात तरी कठीण होते. सगळीकडे कर्फ्यूसदृश्य परिस्थिती होती. एका कानाचे दुसऱ्या कानाला कळणार नाही याची दक्षता घेतली गेली होती.                                                                                                                                                       

वृत्तपत्रांवर सेन्सॉरशिप लादण्यात आली नव्हती पण इंटरनेट बंद करण्यात आले होते. मोबाईल आणि टेलिफोन सेवा सुरु नव्हती. प्रत्यक्ष रस्त्यावर फिरून परिस्थिती पाहता येत नव्हती. कोविड काळात देशात जसा लॉकडाऊन होता त्याची सुरुवात काश्मीरपासून कलम ३७० रद्द केल्यानंतर झाली होती. रस्त्यावर दिसत होते ते फक्त सुरक्षासैनिक आणि दूरदर्शनचे कॅमेरे ! त्यामुळे कलम ३७० रद्द करण्यात आल्यानंतर काश्मीरमधील परिस्थिती बाबत जे कळत होते ते ते फक्त दूरदर्शन आणि आकाशवाणी वरून. एक महिन्यानंतर जेव्हा काही प्रमाणात बंधने शिथिल करण्यात आली तेव्हाच सरकारच्या निर्णयाविरुद्ध अनेक ठिकाणी उत्स्फूर्त विरोध प्रदर्शन झाल्याची माहिती बाहेर येवू शकली. ही माहितीही भारतीय प्रसारमाध्यमांपेक्षा विदेशी प्रसारमाध्यमातून कळू शकली. झालेली विरोध प्रदर्शने ही अगदीच स्थानिक पातळीवरची आणि उत्स्फूर्त अशी होती. कारण  कलम ३७० रद्द करण्याची घोषणा होण्या पूर्वीच ४ ऑगस्टच्या रात्री सर्व प्रमुख राजकीय नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली होती. त्यामुळे संघटीत व राज्यव्यापी विरोध प्रदर्शन शक्य नव्हते. याचा अर्थ कलम ३७० बद्दलचा केंद्रसरकारचा निर्णय जनतेला मान्य होता असा होत नाही. स्थानिक पातळीवर जनतेने आपला विरोध तरी नोंदविला. दहशतवाद्यांनी मात्र या निर्णयाविरुद्ध एक गोळीही चालविली नाही आणि त्यामुळे सरकारलाही गोळी चालवावी लागली नाही. काश्मिरातील दहशतवादी आणि सर्वसामान्य जनता यातील फरक अधोरेखित करणारी ही बाब आहे. काश्मीरमधील सर्वसामान्य नागरिकांना भारतात राहण्यासाठी कलम ३७० च्या संरक्षणाची गरज वाटतेय तर कलम ३७० असले काय आणि नसले काय याच्याशी दहशतवादी गटांना काही देणेघेणे नाही. त्यांना तर काश्मीर भारतापासून वेगळा करायचा आहे. कलम ३७० मुळे काश्मिरात दहशतवाद आहे हा प्रचार दिशाभूल करणारा असल्याचे यातून अधोरेखित होते. 

संचारबंदीसदृश्य परीस्थिती, टेलिफोन,मोबाईल , इंटरनेट बंद या स्थितीत काश्मीरमध्ये काय चालू आहे हे काश्मिरातील जनतेलाच कळत नव्हते तर काश्मीर बाहेर काय कळणार. मात्र या काळात सरकारचा काश्मीरमध्ये सर्वकाही सुरळीत आहे आणि सरकारच्या निर्णयावर जनता खुष आहे हे दर्शविण्याचा जो आटापिटा चालला होता तो शंकास्पद होता. कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयानंतर भारत सरकारचे सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना श्रीनगरच्या रस्त्यावर फिरताना दाखविण्यात आले. वक्फ बोर्डाच्या सदस्यांना पकडून आणून रस्त्याच्या कडेला डोभल यांचे सोबत बिर्याणी खाताना दाखविण्यात आले. परिस्थिती शांत आणि सुरळीत असल्याचे भासविण्याचा केंद्र सरकारचा तो उथळ आणि केविलवाणा प्रयत्न असल्याचे स्पष्ट दिसत होते. काश्मीर प्रश्नाचे आंतरराष्ट्रीयकरण केल्याबद्दल भारतीय जनता पक्ष कायम नेहरूंच्या नावाने खडे फोडत आला आहे. कलम ३७० रद्द केल्यानंतर या पक्षाच्या सरकारने युरोपियन युनियन आणि अमेरिकन शिष्टमंडळाना आमंत्रित करून कलम ३७० रद्द केल्यानंतर काश्मीर मधील परिस्थिती सुरळीत असल्याचे पटविण्याचा प्रयत्न केला. या शिष्टमंडळातील सदस्य कोण असावेत हे सरकारनेच निश्चित केल्यामुळे या शिष्टमंडळांना काश्मीरमधील परिस्थिती सामान्य वाटल्याचे कोणाला आश्चर्य वाटले नाही. अमेरिकेतील डेमोक्रॅटिक पक्षाच्या एका प्रभावशाली खासदाराने आपल्याला काश्मिरातील परिस्थिती पाहू देण्याची विनंती मोदी सरकारला केली ती मात्र फेटाळण्यात आली ! परदेशी शिष्टमंडळाना काश्मीरमधील परिस्थिती पाहण्यासाठी उत्साहाने आमंत्रित करणाऱ्या भारत सरकारने भारतातील राजकीय नेत्यांच्या काश्मीरमधील प्रवेशावर मात्र बंदी घातली होती. काश्मीरच्या उपराज्यपालांनी आपण कोणालाही भेटण्यासाठी तयार असल्याचे सांगितल्यावर राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ उपराज्यपाल यांना भेटण्यासाठी व काश्मीरमधील लोकांच्या गाठीभेटी घेण्यासाठी विमानाने श्रीनगरला आले तेव्हा त्या शिष्टमंडळास विमानतळाबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली व नवी दिल्लीला परत पाठविण्यात आले. काश्मिरी असलेल्या गुलाम नबी आझाद यानाही सरकारने काश्मिरात प्रवेश करण्यास मनाई केली होती. काश्मिरात येण्यासाठी त्यांना सर्वोच्च न्यायालयाकडे परवानगी मागावी लागली होती. काश्मिरातील परिस्थितीवर भाष्य करायचे नाही या अटीवरच त्यांना आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरींना सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली होती. यावरून सरकारला कलम ३७० रद्द झाल्यानंतरच्या काश्मीर मधील परिस्थिती बाबत लपवायचे होते हे सिद्ध होते. 

-------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि. यवतमाळ 
मोबाईल : ९४२२१६८१५८