Thursday, October 23, 2025

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - १४८

नेहरूंनी आपल्या काश्मीर विषयक धोरणातील चूक दुरुस्त करण्यास मदत करण्यासाठी शास्त्रीजींना बोलावले खरे पण पंतप्रधान झाल्यावर शास्त्रीजींनी नेहरुंना आपल्या धोरणात चूक झाली असे वाटत होते ती चुकीची धोरणेच त्वेषाने राबविली.
----------------------------------------------------------------------------------------------

आयुष्याच्या शेवटी काश्मीर धोरणातील चूक पंडीत नेहरूंच्या लक्षात आली होती. चूक दुरुस्त करण्याची सुरुवात म्हणून त्यांनी शेख अब्दुल्लांची तुरुंगातून बिनशर्त सुटका केली होती. काश्मीर प्रश्नावर शेख अब्दुल्लंचा नेहरू सोबत आणि इतर भारतीय व पाकिस्तानी नेत्यांसोबत विचारविनिमय सुरु असतानाच नेहरुंना मृत्यूने गाठले आणि काश्मीर प्रश्नावर तोडगा काढण्याची प्रक्रिया तिथेच थंडावली. कोणकोणत्या पर्यायाचा विचार झाला हे अधिकृतपणे कधीच समोर आले नाही. काश्मीर प्रश्नाचे मूळ मात्र लक्षात आले होते. काश्मीरच्या स्वायत्ततेचा संकोच व काश्मीरच्या जनतेची तयारी झालेली नसताना भारतीय संविधान लादण्याच्या चुकीतून काश्मीर प्रश्न तयार झाला हे नेहरुंना पुरतेपणी उमगले होते. नेहरूंनी जी चूक केली ती सुधारण्याची संधी नेहरुंना नियतीने दिली नाही पण त्यांच्या नंतर पंतप्रधानपदी येणाऱ्यानी ती चूक दुरुस्त करणे अपेक्षित होते. त्यांच्या नंतर पंतप्रधानपदी आरूढ झालेल्या लाल बहादूर शास्त्री यांना नेहरूंच्या बदललेल्या काश्मीर विषयक धोरणाची स्पष्ट कल्पना होती व ते धोरण अंमलात आणण्यासाठी कॉंग्रेसमध्ये शास्त्रीजी समर्थ असल्याचा पंडीत नेहरूंचा विश्वास होता. शेख अब्दुल्ला यांची सुटका करून दिल्लीत आमंत्रित करताना नेहरूंनी आणखी एक निर्णय घेतला होता. कामराज योजनेमुळे नेहरू मंत्रीमंडळातून बाहेर पडलेल्या मंत्र्यात लाल बहादूर शास्तींचा समावेश होता. मंत्रिमंडळातून बाहेर पडल्या नंतर शास्त्रीजी आपल्या राज्यात परतले होते. शेख अब्दुल्लांना दिल्लीत बोलावताना नेहरूंनी कॉंग्रेस पक्षाला विशेष विनंती करून शास्त्रीजींना दिल्लीत परत बोलावले होते. काश्मीरप्रश्नावर तोडगा काढायला शेख अब्दुल्लांना मदत करण्यासाठी मुद्दामहून लाल बहादूर शास्त्रींना दिल्लीत बोलावले होते. यातून नेहरूंचा शास्त्रीजी वरील विश्वास व्यक्त झाला होता आणि नेहरूंचा उत्तराधिकारी म्हणून शास्त्रीजीची निवड होण्यामागे हा विश्वासच कारणीभूत ठरला. नेहरूंनी आपल्या काश्मीर विषयक धोरणातील चूक दुरुस्त करण्यास मदत करण्यासाठी शास्त्रीजींना बोलावले खरे पण पंतप्रधान झाल्यावर शास्त्रीजींनी नेहरुंना आपल्या धोरणात चूक झाली असे वाटत होते ती चुकीची धोरणेच पुढे राबविली. 

पंडीत नेहरूंच्या कार्यकाळात भारतीय संविधानाची जवळपास सर्वच महत्वाची कलमे काश्मीर मध्ये लागू झाली तरी तुलनेने त्यांच्या कार्यकाळात काश्मीर शांत ठेवण्यात ते यशस्वी राहिले. शेख अब्दुल्लांच्या अटकेनंतर झालेली विरोध प्रदर्शने आणि हजरत बाल चोरीला जाण्यावरून झालेले प्रखर आंदोलन वगळता नेहरू काळात काश्मिरात शांतता नांदत होती. कोणत्याही काश्मिरी संघटनेने या काळात पाकिस्तान मध्ये सामील होण्याची मागणी किंवा त्यासाठी आंदोलन केले नाही. सार्वमताची मागणी मात्र या काळात होवू लागली. ही मागणीही शेख अब्दुल्लांच्या अटकेमुळे पुढे आली आणि शेख अब्दुल्लांच्या समर्थकांनीच ही मागणी लावून धरली. सार्वमताची मागणी म्हणजे पाकिस्तानात सामील होण्याची मागणी असा चुकीचा अर्थ राजकीय सोयीसाठी काढण्यात आला तरी जनतेकडून अशी मागणी झाली नव्हती. शेख अब्दुल्लांची सुटका आणि शेख अब्दुल्लांना हवी असलेली स्वायत्तता नवी दिल्लीने द्यावी यासाठीची दबावनिती म्हणून सार्वमताची मागणी होत होती. काश्मीरमधील असंतोषाचे उद्रेकात रुपांतर न होण्या मागचे एक महत्वाचे कारण हे होते की नवी दिल्लीला हवी असलेली धोरणे काश्मिरात राबविणारे सर्व काश्मिरीच होते. काश्मीरमध्ये बाहेरचे म्हणता येईल असे लष्कर होते पण ते बराकीत होते आणि सामिलनाम्यातील अटी-शर्तीनुसार ते काश्मिरात असल्याने त्यावर कोणाचा आक्षेप नव्हता. नेहरू काळात भारतीय संविधानाच्या बहुतांश तरतुदी काश्मिरात लागू झाल्या असल्या तरी काश्मीरच्या प्रशासकीय यंत्रणेत काश्मीर बाहेरचे कोणीही नव्हते. नवी दिल्लीचा हस्तक्षेप उघड नव्हता तर पडद्याआडून होता. त्यामुळे काश्मिरी जनतेची नाराजी शेख अब्दुल्लांना बाजूला सारून सत्तेत येणाऱ्या काश्मिरी नेतृत्वाविरुद्ध नवी दिल्लीपेक्षा अधिक होती. भारतापासून फुटून निघण्याचे फुटीरतावादी आंदोलन नेहरू काळात मूळ धरू शकले नाही ते या कारणाने. काश्मिरातील सत्तेतून आणि सरकारातून शेख अब्दुल्ला समर्थकांना वगळले असले तरी जनमत मात्र शेख अब्दुल्लांच्या पाठीशी होते. उशिरा का होईना नेहरूंच्या हे लक्षात आले आणि तोडग्यासाठी शेख अब्दुल्लांना पुढे केले.                                     

अनुभवाअंती काश्मीर विषयक नेहरू नीतीत झालेला बदल नेहरू नंतर येणाऱ्या पंतप्रधानांनी लक्षात न घेता जुनी धोरणे पुढे रेटून काश्मीर प्रश्न अधिक तीव्र आणि गुंतागुंतीचा केला. शेख अब्दुल्लांच्या सहकार्याने काश्मीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मदतनीसाच्या भूमिकेत काम करण्यासाठी नेहरूंनी शास्त्रीजींना दिल्लीत बोलावले पण दोन महिन्याच्या आतच पंडीतजीचा मृत्यू झाला आणि शास्त्री पंतप्रधान बनले. पंतप्रधान बनल्या नंतर शास्त्रींनी नव्या नेहरू मताला किंवा नीतीला तिलांजली देत आधीची नेहरू नीती जोरकसपणे अंमलात आणली. स्वायत्त काश्मीर ऐवजी भारतातील इतर राज्या सारखेच काश्मीर एक राज्य बनले पाहिजे या दिशेने पाउले उचलली. शेख अब्दुल्ला यात अडथळा ठरणार हे गृहीत धरून शास्त्रीजींनी शेख अब्दुल्लांना जुन्याच केस मध्ये पुन्हा तुरुंगात पाठवले. भारतीय संविधान काश्मीर मध्ये लागू करताना पडद्याआड राहण्याचे जे पथ्य नेहरूंनी पाळले होते ते पाळण्याची शास्त्रींना गरज वाटली नाही. केंद्राच्या उघड हस्तक्षेपाच्या दिशेने त्यांची पाउले पडली. त्यांनी जम्मू-काश्मीर सरकारला राज्याची घटना दुरुस्ती करायला भाग पाडून इतर राज्यापेक्षा वेगळे असलेले मुख्यमंत्री ऐवजी पंतप्रधानपद आणि राज्यपाल ऐवजी असलेले सदर ए रियासत पद रद्द करण्याची शिफारस राष्ट्रपतींना करायला भाग पाडले. काश्मीरचे सदर ए रियासत हे इतर राज्याच्या राज्याच्या समकक्ष पद मानले जात असले तरी त्यात एक महत्वाचा फरक होता. सदर ए रियासत या पदावरील व्यक्ती निवडणुकीच्या मार्गाने राज्याची विधानसभा निवडत असे. या दुरुस्तीने केंद्राला राज्यपाल म्हणून आपला प्रतिनिधी राज्यात तैनात करण्याचा मार्ग मोकळा झाला. 
----------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि. यवतमाळ 
मोबाईल : ९४२२१६८१५८ 

Friday, October 10, 2025

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर -१४७

 
हजरत बाल मशिदीत ठेवलेला पैगंबराचा पवित्र केस चोरी जाण्याच्या घटनेच्या निमित्ताने काश्मिरात उद्रेक झाला आणि जनता रस्त्यावर उतरली. निमित्त धार्मिक होते पण उद्रेक राजकीय होता. या घटनेने नेहरुंना काश्मीर विषयक आपल्या धोरणाचा फोलपणा लक्षात आला. आपण ज्या मार्गाने चाललो त्यामार्गाने काश्मीरला आपलेसे करता येणार नाही याची जाणीव नेहरुंना तीव्रतेने झाली.
------------------------------------------------------------------------------------


भारतात राहण्यासाठी काश्मिरी जनतेला आपणच तयार करू शकतो पण स्वायत्तता मिळाल्याशिवाय काश्मिरी जनता मानणार नाही हे शेख अब्दुल्लाने स्पष्ट केले. जम्मू-काश्मीरच्या जनतेच्या इच्छे विरुद्ध स्वायत्ततेचा संकोच केला तर पाकिस्तानचे समर्थन वाढून पाकिस्तानचा फायदा होईल असा इशारा त्यांनी दिला. त्यांच्या या इशाऱ्याचा अर्थ ते भारतापासून वेगळे होवून काश्मीरला पाकिस्तानात सामील करण्यास तयार असल्याचे लावण्यात आला आणि देशद्रोहाच्या आरोपाखाली पुन्हा त्यांना अटक करण्यात आली. जानेवारी १९५८ मध्ये त्यांची सुटका करण्यात आली होती आणि ३ महिन्या नंतर एप्रिल १९५८ मध्ये त्यांना पुन्हा अटक करण्यात आली. यातून काश्मीरचा वाघमाणूस आणि काश्मीरच्या वेगळ्या ओळखीसाठी आणि हितासाठी लढणारा नेता ही त्यांची प्रतिमा अधिकच उजळून निघाली. पंडीत नेहरू आणि शेख अब्दुल्ला यांच्यातील संघर्ष रेषा अधिक स्पष्ट झाली. नेहरुंना हवे होते इतर राज्यांप्रमाणे काश्मीरचे भारतात विलीनीकरण तर स्वायत्त काश्मिरच भारतीय संघराज्याचा घटक बनेल ही शेख अब्दुल्लांची आग्रही भूमिका होती. नेहरुंना जे हवे होते त्या दिशेने म्हणजे भारतीय राज्यघटनेची अधिकाधिक कलमे काश्मिरात लागू करण्याच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरु राहिली. केंद्रसरकारला काश्मीरची स्वायत्तता मान्य नसल्याने शेख अब्दुल्ला समर्थकांनी सार्वमताची मागणी लावून धरली. नेहरू काळात काश्मीरचे विलीनीकरण विरुद्ध काश्मीरची स्वायत्तता असा संघर्ष रस्त्यावर दिसला नाही. याचे एक कारण शेख अब्दुल्लाचे तुरुंगात असणे हे होतेच शिवाय शेख अब्दुल्लांची नॅशनल कॉन्फरन्स मोडकळीस आणण्याची नेहरूनीती यशस्वी झाली होती.                                                                                                                       

 काश्मिरात  नेहरूनीती राबविणारे काश्मीरचेच प्रतिनिधी होते . त्यामुळे जनतेचा रोष नेहरू कृपेने सत्तेवर आलेले काश्मिरी नेतृत्व व केंद्र सरकार असे विभागल्या गेल्याने या रोषाची झळ नेहरू आणि केंद्र सरकार यांना जाणवली नाही. त्यामुळे काश्मिरात भारतीय संविधान लागू करण्याचा एक कलमी कार्यक्रम सुरु राहिला. २६ जानेवारी १९५० रोजी भारतात संविधान लागू झाले त्या दिवशीच काश्मिरात भारतीय संविधानाची सुमारे १०० कलमे लागू झाली होती. काश्मीरच्या सामिलनाम्यानूसार काश्मीरने जे विषय भारतीय संघराज्याकडे सोपविले होते त्या संदर्भातील ही कलमे असल्याने यावर कोणाचा आक्षेप नव्हता. या व्यतिरिक्त संविधानाची इतर कलमे लागू करण्याचा सपाटा नेहरू राजवटीने लावला तो वादाचा मुद्दा बनला. सामिलीकरणाच्या विषया बाहेरची कलमे काश्मिरात लागू करण्याची सुरुवात नेहरू काळात १९५४ च्या राष्ट्रपतीच्या आदेशाने झाली. १९५४ चा राष्ट्रपतींचा आदेश १९५२ मध्ये नेहरू-अब्दुल्ला यांच्यात झालेल्या दिल्ली करारावर आधारित होता हे खरे पण याच कराराच्या अंमलबजावणी वरून नेहरू -अब्दुल्ला यांच्यात मतभेद झाले होते आणि अब्दुल्लांची बडतर्फी व अटक झाली होती. या बाबीची पर्वा न करता नेहरूंनी राष्ट्रपतीच्या १९५४ च्या आदेशान्वये १९५२ चा करार अंमलात आणला. भारतीय संविधान काश्मिरात लागू करण्याचा कार्यक्रम वादग्रस्त बनला तो इथूनच. काश्मिरात केंद्र सरकारचे बाहुले असलेले सरकार स्थापित करण्यात नेहरुंना यश आल्याने आणि काश्मिरातील या सरकारने काश्मीर संविधान सभेचे निर्णय प्रभावित करण्यात यश मिळविल्याने नेहरू काळातच भारतीय संविधानाची जवळपास सर्व महत्वाची कलमे काश्मिरात लागू करण्यात यश मिळविले.                                                                 

मुलभूत अधिकारा संदर्भातील कलम १२ ते कलम ३५ पर्यंतची कलमे कलम ३७० मधील तरतुदीचा [गैर]वापर करून याच काळात लागू झालीत. सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात काश्मीर याच काळात आले. राज्याच्या धोरणा संबंधी घटनेचा चौथा भाग काश्मीरला लागू झाला.अर्थव्यवहार व व्यापार संबंधीच्या अनेक तरतुदी लागू झाल्यात. अंतर्गत व बाह्य कारणांसाठी  आणीबाणी लागू करण्याची तरतूद याच काळात लागू झाली. भारतीय सनदी सेवेच्या तरतुदीही लागू करण्यात आल्या. या सगळ्या गोष्टी लागू करताना संविधानात कलम ३५ अ ची तरतूद समाविष्ट करून काश्मीरचे नागरिकत्व ठरविण्याचे निकष आणि काश्मिरी नागरिकांचे अधिकार निश्चित करण्याचे अधिकार काश्मीर सरकारला बहाल करून काही प्रमाणात स्वायत्तता शिल्लक ठेवण्याची घटनात्मक तरतूद हा एकमेव दिलासा नेहरू काळात काश्मिरी जनतेला मिळाला. सगळी घटनात्मक पाउले कलम ३७० च्या आधारे उचलली गेलीत. संविधान सभेने काश्मीरच्या भवितव्याचा निर्णय काश्मिरी जनतेने घ्यावा यासाठी कलम ३७० ची तरतूद केली होती. या तरतुदी मागील भावना व आशयाचा अनादर करत याच तरतुदीच्या आधारे भारतीय संविधानाचा काश्मीरपर्यंत विस्तार करण्यात आला. भारतीय संविधान कुठल्याही चर्चेविना काश्मिरात लागू करण्यासाठी उपयुक्त असल्याने त्याला हात लावू नये हे नेहरू काळातील गृहमंत्री नंदा यांनी लोकसभेत सांगितले होते. हाच धागा पकडून सर्वोच्च न्यायालयाच्या संविधान पीठाने भारतीय संविधान काश्मिरात लागू करण्यासाठीच कलम ३७० ची तरतूद होती असा अफलातून निर्णय दिला . हीच धारणा काश्मीर प्रश्नाच्या मुळाशी आहे.                                                   

नेहरू काळात विकास कामासाठी धन पुरवठा मुबलक प्रमाणात करण्यात आला. यामुळे तरी भारतात विलीन होण्याची मानसिकता काश्मिरात तयार होईल अशी नेहरूंची धारणा होती. जनतेच्या समर्थनावर नाही तर केंद्र सरकारच्या कुबड्यावर चालणाऱ्या काश्मिरातील सरकारने काश्मिरातील परिस्थिती बाबत नेहरुंना अंधारात ठेवले. पण हजरत बाल मशिदीत ठेवलेला पैगंबराचा पवित्र केस चोरी जाण्याच्या घटनेच्या निमित्ताने काश्मिरात उद्रेक झाला आणि जनता रस्त्यावर उतरली. निमित्त धार्मिक होते पण उद्रेक राजकीय होता. या घटनेने नेहरुंना काश्मीर विषयक आपल्या धोरणाचा फोलपणा लक्षात आला. आपण ज्या मार्गाने चाललो त्यामार्गाने काश्मीरला आपलेसे करता येणार नाही याची जाणीव नेहरुंना तीव्रतेने झाली. १९५८ मधील अल्पसुटकेच्या काळात शेख अब्दुल्ला यांनी भारत सरकार व काश्मिरी जनता यामधील दुवा आपणच बनू शकतो व काश्मीरला भारतात राहण्यास तयार करू शकतो असा दावा केला होता त्यातील तथ्य या घटनेनंतर नेहरुंना प्रकर्षाने जाणवले आणि त्यांनी काश्मीरवर तोडगा काढण्याच्या हेतूने ८ एप्रिल १९६४ रोजी शेख अब्दुल्ला यांची तुरुंगातून मुक्तता करून त्यांना दिल्लीला आमंत्रित केले. १९५३ ते १९६४ इतका प्रदीर्घ काळ देशद्रोहाच्या आरोपावरून ज्यांना तुरुंगात ठेवले होते ते शेख अब्दुल्ला पंतप्रधानांचे पाहुणे म्हणून सुटकेनंतर काही दिवस पंतप्रधानांच्या निवासस्थानीच राहिले. शेख अब्दुल्ला यांचेवरील देशद्रोहाचा आरोप किती तकलादू होता हे यावरून स्पष्ट होते. पंडीत नेहरुंना आपली चूक लक्षात आली आणि शेख अब्दुल्लांची सुटका करून त्यांनी ती दुरुस्त देखील केली पण त्याला खूप उशीर झाला होता. शेख अब्दुल्लांच्या सुटकेनंतर अवघ्या दोन महिन्याच्या आतच पंडीत नेहरूंचा मृत्यू झाला. शेख अब्दुल्लांच्या मदतीने काश्मीर प्रश्नावर कायमचा तोडगा काढण्याची त्यांची इच्छा पूर्ण झाली नाही. 

--------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि. यवतमाळ 
मोबाईल - ९४२२१६८१५८ 

Friday, October 3, 2025

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - १४६

शेख अब्दुल्लांना ५ वर्षे अटकेत ठेवल्या नंतर त्यांच्या भूमिकेत काही बदल झाला का हे आजमाविण्यासाठी १९५८ मध्ये त्यांची सुटका करण्यात आली. अटकेच्या परिणामी त्यांची भूमिका सौम्य बनण्या ऐवजी अधिक ताठर बनली. स्वायत्तता द्या किंवा सार्वमत घ्या अशी मागणी सुटकेनंतर जाहीर सभांमधून केली.
---------------------------------------------------------------------------------------------


शेख अब्दुल्लांना काश्मीरच्या पंतप्रधान पदावरून बडतर्फ करण्यासाठी जे कारण दिले होते ते होते जमू-काश्मीर मंत्रीमंडळाचा त्यांच्यावर विश्वास उरला नाही ! यासाठी त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांना त्यांच्यापासून फोडून त्यांच्याकडून अविश्वासाची पत्रे घेण्यात आली होती. मंत्रीमंडळाची बैठक न बोलावताच त्यांच्यावर मंत्रीमंडळाचा विश्वास उरलेला नाही हे मान्य करून शेख अब्दुल्ला यांचेवर बडतर्फीची कारवाई झाली. दिल्ली सांगेल ते ऐकणारे मंत्रिमंडळ काश्मिरात स्थापन करण्यात आले. काश्मीरची जनता शेख अब्दुल्लाच्या पाठीशी असल्याने शेख अब्दुल्लाच्या बडतर्फी व अटके विरुद्ध उग्र निदर्शने झाली. पण नवी दिल्लीचा शेख अब्दुल्ला विरहित नव्या मंत्रीमंडळाला पाठींबा असल्याने जनतेचा विरोध मोडून काढण्यात आला. जनतेचा पाठींबा नसलेले आणि नवी दिल्लीच्या कुबड्यावर चालणारे सरकार स्थापन करून काश्मीरचा गाडा हाकण्याचा प्रयत्न झाला. केवळ शेख अब्दुल्लानाच बेदखल करण्यात आले नाही तर त्यांनी स्थापन केलेल्या नॅशनल कॉन्फरन्सचे अस्तित्व मिटविण्याचा प्रयत्न झाला. या सगळ्या पाउलांमुळे शेख अब्दुल्लाच नाही तर काश्मिरातील जनतेत भारताबद्दलच्या संशयाची व दुराव्याची भावना वाढीस लागली. तिथल्या जनतेला गृहीत धरण्यातून आणि दूर लोटण्यातून काश्मीर प्रश्न निर्माण झाला. संशय आणि दुरावा केवळ शेख अब्दुल्लांच्या अटकेतून निर्माण झाला नाही तर काश्मिरात दिल्लीच्या तालावर नाचणारे स्थापन करून एका पाठोपाठ एक राष्ट्रपतीचे आदेश काढून भारतीय राज्यघटनेचा विस्तार करण्याचा सपाटा लावला. अर्थात त्यासाठी जनतेचा पाठींबा गमावलेल्या सरकारची व तिथल्या संविधान सभेची संमती घेण्यात आली होती जी कलम ३७० नूसार अनिवार्य होती.                                                                     

देशात राज्यघटना लागू झाली त्याच दिवशी राष्ट्रपतींनी आदेश काढून जवळपास राज्यघटनेची १०० कलमे जम्मू-काश्मिरात लागू केली होती. शेख अब्दुल्लाच्या नेतृत्वाखालील तत्कालीन सरकारच्या मान्यतेने ही कलमे लागू झालीत व त्याबद्दल वाद किंवा नाराजी नव्हती. कारण समिलनाम्याच्या अटी-शर्तीनुसार ही कलमे लागू झाली होती. तेव्हा इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की शेख अब्दुल्ला किंवा तत्कालीन काश्मिरी नेतृत्वाचा जम्मू-काश्मीर भारतात सामील होण्याला विरोध नव्हता किंबहुना त्यांच्या इच्छेनेच सामीलीकरण सिद्धीस गेले व घटनेच्या कलम १ प्रमाणे काश्मीर भारतीय संघ राज्याचा भाग बनला. शेख अब्दुल्लांच्या अटके पर्यंत काश्मीरचे भारतात सामीलीकरण हा वादाचा मुद्दाच नव्हता. सामिलीकरणाच्या अटी-शर्तीच्या चौकटीत भारतात राहणे काश्मीरच्या कसे हिताचे आहे हे शेख अब्दुल्लाच काश्मीरच्या जनतेला पटवून देत होते. या चौकटीच्या बाहेर जावून भारतीय राज्यघटनेचा विस्तार होवू देण्याचीही त्यांची तयारी होती म्हणून तर त्यांनी १९५२ च्या दिल्ली करारावर सही केली होती. वादाचा मुद्दा एवढाच होता की भारतीय राज्यघटनेची आणखी किती कलमे जम्मू-काश्मिरात लागू करायची. या बाबतच्या सक्तीतून काश्मीर प्रश्न निर्माण झाला . या बाबतचा दबाव वाढू लागताच शेख अब्दुल्लाच्या भारतस्नेही भूमिकेत बदल झाला. भारतात झालेल्या सामीलनाम्यावर जनतेच्या सार्वमताच्या शिक्कामोर्तबाची गरज नसल्याचे प्रतिपादन करणारे शेख अब्दुल्ला काश्मीरचे भवितव्य जनतेच्या सार्वमताने ठरवू द्या अशी मागणी करू लागले. त्यांच्या अटकेने या मागणी बाबत ते अधिक आग्रही बनले. 

शेख अब्दुल्लांना ५ वर्षे अटकेत ठेवल्या नंतर त्यांच्या भूमिकेत काही बदल झाला का हे आजमाविण्यासाठी १९५८ मध्ये त्यांची सुटका करण्यात आली. अटकेच्या परिणामी त्यांची भूमिका सौम्य बनण्या ऐवजी अधिक ताठर बनली. सुटकेनंतर त्यांनी घेतलेल्या सभा आणि जनतेशी साधलेल्या संवादातून काश्मिरी जनतेच्या मनावर आपण नवी दिल्ली पुढे झुकलो नाही आणि झुकणार नसल्याचे बिम्बविण्याचा प्रयत्न केला. काश्मीरचे भवितव्य सार्वमताने ठरविण्याच्या मागणीवर ठाम असल्याचे प्रतिपादन सभांमधून त्यांनी केले. १९४७ चे काश्मीरचे भारतात झालेले सामीलीकरण तात्पुरते होते आणि अंतिम निर्णय सार्वमताने घेण्यास भारताची संमती होती. भारताने दिलेल्या आश्वासनाची व हमीची पूर्तता केली पाहिजे असे प्रतिपादन ते आपल्या भाषणातून करू लागले. कलम ३७० द्वारे जम्मू-काश्मीरच्या स्वायत्ततेची जी घटनात्मक हमी भारताने दिली होती त्याचे उल्लंघन करून काश्मीरच्या स्वायत्ततेचा भारत सरकार संकोच करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. १९५३ साली आपल्याला बडतर्फ करून तुरुंगात डांबण्याची कृती बेकायदेशीर होती असाही आरोप ते सभांमधून करू लागले. काश्मीरची ओळख टिकविण्यासाठी नॅशनल कॉन्फरन्सच्या झेंड्याखाली एकत्र येवून संघर्ष करण्याचे ते आवाहन करू लागले.आपले राजकीय भवितव्य निश्चित करण्याचा व स्वशासनाचा आपला अधिकार असल्याचे ठामपणे जनतेला सांगत असतानाच केंद्र सरकारशी आपल्या अटीवर चर्चेची व तडजोडीची तयारीही ते दाखवीत होते. आपण विभाजनवादी नसल्याचे व आपण आणि काश्मिरी जनता स्वेच्छेने भारतात राहायला तयार आहोत पण काही अटीवरच असा संकेत आणि संदेश नवी दिल्लीला दिला. त्यासाठी त्यांच्या दोन प्राथमिक अटी होत्या. आपल्या अटके आधीची स्वायत्तता पुनर्स्थापित करणे आणि काश्मीरच्या वेगळ्या ओळखीचा आदर राखला पाहिजे या त्या अटी होत्या. सार्वमताचा आग्रह न धरता स्वायत्तता अबाधित ठेवण्याची त्यांची मागणी होती. आपल्याला तुरुंगात ठेवून किंवा बळाचा वापर करून मार्ग निघणार नाही. काश्मिरी जनता आणि भारत सरकार यांच्यात संवादसेतू बनण्यास आपण तयार असल्याचे सांगत असतानाच आपल्याशिवाय मार्ग निघणार नाही असा इशारा त्यांनी भारत सरकारला दिला होता. 


------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि. यवतमाळ 
मोबाईल : ९४२२१६८१५८ 

Friday, September 26, 2025

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - १४५

पंडीत नेहरुंना काश्मीर भावनिक आणि धोरणात्मक दृष्ट्या भारतात आले पाहिजे असे वाटत होते. स्वत: काश्मिरी पंडीत असणे हा त्यातला भावनिक भाग होता तर काश्मीर भारतात समाविष्ट झाला नाही तर उत्तरेकडील सर्व सीमाच असुरक्षित राहील हा धोरणात्मक विचार होता. 
----------------------------------------------------------------------------------

              
१९५२ च्या दिल्ली कराराच्या अंमलबजावणीच्या मुद्द्यावरून शेख अब्दुल्लाच्या बडतर्फीचे आणि अटकेचे महाभारत घडले तो करार अंमलात कधी आला तर १९५४ मध्ये. जम्मू-काश्मीरच्या संविधान सभेने मान्यता दिल्या नंतरच १९५४ मध्ये राष्ट्रपतींनी या संबंधीची अधिसूचना जारी केली. १९५२ चा करार करण्याची घाई न करता भारता बरोबरचे संबंध कसे राहतील हे तिथल्या संविधान सभेला ठरवू दिले असते तर शेख अब्दुल्लांना अटक करण्याची अप्रिय घटना टळली असती. भारता बरोबरचे संबंध ठरविण्याचा जम्मू-काश्मीर संविधान सभेचा घटनात्मक आणि नैतिक अधिकार केंद्र सरकारने मान्य केला होताच. शेवटी संविधान सभेने भारतासोबत राहण्याचा निर्णय घेतला पण त्यावेळी काश्मीरचे सर्वोच्च नेते शेख अब्दुल्ला या निर्णयात सहभागी नव्हते. ते तुरुंगात होते. हाच निर्णय शेख अब्दुल्लाच्या उपस्थितीत झाला असता तर पुढचा घटनाक्रम वेगळा राहिला असता. केंद्र सरकारला शेख अब्दुल्लाच्या निर्णयाविषयी खात्री नसल्याने अटकेचे आततायी पाउल उचलले गेले. काश्मीरला भारतासोबत भारताचा भाग बनून राहायचे की नाही याचा निर्णय घेण्याचा सर्वस्वी अधिकार तिथल्या जनतेचा हे भारत सरकारने वचन दिले होते आणि कलम ३७० द्वारे त्या वचनाची वैधानिक पुष्टी केली होती तरी त्यांचा निर्णय स्वीकारण्याची मनापासून तयारी नव्हती हेच शेख अब्दुल्लाच्या अटकेतून ध्वनित होते. पंडीत नेहरुंना काश्मीर भावनिक आणि धोरणात्मक दृष्ट्या भारतात आले पाहिजे असे वाटत होते. स्वत: काश्मिरी पंडीत असणे हा त्यातला भावनिक भाग होता तर काश्मीर भारतात समाविष्ट झाला नाही तर उत्तरेकडील सर्व सीमाच असुरक्षित राहील हा धोरणात्मक विचार होता.               

काश्मीरला भारतासोबत जोडण्यासाठी शेख अब्दुल्लाच मुख्य भूमिका निभावू शकतात याची त्यांना जाणीव असल्याने स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीपासूनच त्यांनी व भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसने शेख अब्दुल्ला व त्यांच्या पक्षाशी जवळीक साधली होती. याचे फळ देखील भारताच्या पदरात पडले. काश्मीरला भारतात सामील करण्यासाठी स्वत: शेख अब्दुल्लांनी पुढाकार घेतला. पण हा पुढाकार घेताना शेख अब्दुल्लाची भूमिका स्पष्ट होती. भारतीय संघराज्यात आम्ही सामील होवू पण सामिलनाम्यात ज्या विषयावर भारताला निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत ते वगळता जम्मू-काश्मीर संबंधीचे सगळे निर्णय आम्ही घेवू. अशा प्रकारच्या स्वायत्त काश्मीरची त्यांची स्पष्ट भूमिका होती. जम्मू-काश्मीरच्या संविधान सभेत केलेल्या पहिल्या भाषणात त्यांनी याच भूमिकेचा स्पष्ट शब्दात पुनरुच्चार केला होता. काश्मीरला आपले स्वातंत्र्य व आपली लोकशाही टिकवायची असेल , आपल्या स्वप्नातील काश्मीर घडवायचा असेल तर भारतासारख्या लोकशाही राष्ट्राच्या पाठबळाची गरज आहे. भारतातच आपण स्वतंत्र राहू शकतो. भारताबाहेर राहिलो तर पाकिस्तान सारखे देश आपला घास घेतील हे त्यांनी मांडून भारतात सामील होण्याच्या निर्णयाचे त्यांनी समर्थन केले होते. भारताच्या संविधान सभेने आणि भारत सरकारने ही भूमिका मान्य केली हाच कलम ३७० घटनेत सामील केल्याचा अर्थ होता. ही भूमिका देशातील व जम्मूतील राष्ट्रीय स्वयंसेवक प्रणीत हिंदुत्ववादी संघटना व पक्षांना मान्य नव्हती म्हणून त्यांनी १९५२ च्या दिल्ली करारा विरुद्ध काहूर उठविले आणि भारतात सामील होण्याचा आपला निर्णय चुकला तर नाही ना हा संभ्रम शेख अब्दुल्लाच्या मनात निर्माण केला. अशावेळी भारत सरकारचे प्रमुख म्हणून पंडीत नेहरूंनी शेख अब्दुल्लांच्या पाठीशी उभे राहून त्यांच्या मनातील संभ्रम दूर करण्याची गरज होती. पण पंडितजी स्वत: सामिलनाम्या व्यतिरिक्त आणखी संवैधानिक तरतुदी लागू करण्याबाबत आग्रही व उतावीळ बनल्याने शेख अब्दुल्लाचा संभ्रम वाढला.

 भारतीय संघराज्य निर्मितीत आणि उभारणीत हिंदुत्ववादी संघटना व पक्षांचा कोणताच सहभाग नव्हता उलट संघराज्य निर्मितीत आणता येईल तेवढे अडथळे त्यांनी आणल्याचा इतिहास आहे. अनेक संस्थानांना भारतात सामील न होता स्वतंत्र राहण्यासाठी त्यांनी चिथावणी दिल्याचे पुरावे उपलब्ध आहेत. अगदी काश्मीरच्या बाबतीत देखील त्यांनी हेच केले होते. राजा हरीसिंग यांनी भारतात सामील न होता स्वतंत्र राहावेत यासाठी प्रयत्न झालेत. राजा हरीसिंगलाही तेच हवे होते पण पाकिस्तानी घुसखोरांनी त्यांच्या मनसुब्यावर पाणी फिरविले व काश्मीर भारतात सामील होण्याचा मार्ग मोकळा झाला. पाकिस्तानी घुसखोरांविरुद्ध राजाचे सैनिक किंवा हिंदुत्ववादी लढले नाहीत तर भारतीय सैनिकाची साथ आणि मदत केली ती शेख अब्दुल्लाचे नेतृत्व मानणाऱ्या जनतेने. खरेतर हिंदुत्ववादी संघटनांनी आणि विशेषत: जम्मूतील हिंदुत्ववाद्यांनी शेख अब्दुल्लांचे ऋणी असायला हवे होते की त्यांच्यामुळे पाकिस्तान सारख्या धर्मांध देशात आपल्याला जावे लागले नाही. पण त्यांना लोकशाही मार्गाने राज्य करणारा मुस्लीम नेता नको होता. त्यांच्या कारवाया शेख अब्दुल्लांना भारतापासून दूर लोटण्यात यशस्वी झाल्या. काश्मीर भारतात राहण्यासाठी शेख अब्दुल्ला भारताच्या बाजूने राहणे अपरिहार्य आहे हे  पंडीत नेहरुंना माहित असताना हिंदुत्ववादी संघटनांना रोखून शेख अब्दुल्लांना जवळ आणण्याचा प्रयत्न करण्या ऐवजी त्यांनी शेख अब्दुल्लांना अटक करून आणखी दूर लोटले. तांत्रिकदृष्ट्या शेख अब्दुल्लांच्या अटकेशी नेहरूंचा संबंध नाही. जम्मू-काश्मीरचे राजप्रमुख असलेले डॉ. करणसिंग यांच्या आदेशाने शेख अब्दुल्लाना पंतप्रधान पदावरून बडतर्फ करण्यात आले व अटक करण्यात आली असली तरी नेहरूंच्या संमती शिवाय हे घडणे शक्य नव्हते. १९३० पासूनच शेख अब्दुल्ला राजा हरीसिंग विरुद्ध लढत आले होते त्यामुळे राजप्रमुख पदास व त्या पदावर राजघराण्यातील राजकुमारास बसविण्यास शेख अब्दुल्लांचा विरोध होता. पण जम्मूतील हिंदुना आणि काश्मिरातील पंडीत समुदायांना सुरक्षित वाटेल म्हणून राजपुत्र करणसिंग यांना त्या पदावर राहू द्यावे असा नेहरूंनी आग्रह धरला आणि शेख अब्दुल्लांनी नेहरूंचा आग्रह मानला. पुढे नेहरूंचा हाच आग्रह त्यांच्यासाठी गळफास बनला. 

------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि. यवतमाळ 
मोबाईल : ९४२२१६८१५८ 

Thursday, September 18, 2025

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - १४४

 पंडीत नेहरू हयात असताना आणि पदावर असतांना जम्मू-काश्मीरच्या स्वायत्ततेला आणि स्वायत्ततेचे अभिवचन देणाऱ्या कलम ३७० ला विरोध होत असेल तर नेहरू नंतर काय होईल असा प्रश्न त्यावेळी शेख अब्दुल्ला यांनी विचारला होता. पण नेहरू नंतर जे घडण्याची आशंका त्यांना वाटत होती ते नेहरू राजवटीतच घडले ! 
--------------------------------------------------------------------------------------------


नेहरू काळात शेख अब्दुल्लांना झालेल्या अटकेच्या आधी राजा हरीसिंग यांनी शेख अब्दुल्लांना १९४६ साली राजद्रोहाच्या आरोपावरून अटक केली होती. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील 'भारत छोडो' हे महत्वाचे आंदोलन होते. त्यापासून प्रेरणा घेवून शेख अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखाली  काश्मिरात राजा हरीसिंग यांच्या विरुद्ध 'काश्मीर छोडो' आंदोलन सुरु करण्याची परिणती अब्दुल्लांच्या अटकेत झाली होती. काश्मिरात राजेशाही समाप्त करून लोकतांत्रिक सरकार स्थापन करण्याच्या उद्देश्याने 'काश्मीर छोडो' चळवळ सुरु झाली होती. भारताने या चळवळीला पाठींबा दिला होता. भारताने शेख अब्दुल्ला यांच्या अटकेचा तीव्र निषेध आणि विरोध नोंदवून त्यांच्या सुटकेची मागणी केली होती. केवळ मागणी करून न थांबता पंडीत नेहरूंनी शेख अब्दुल्लांच्या सुटकेसाठी आणि काश्मीरच्या लोकलढ्याला सक्रीय पाठींबा देण्यासाठी काश्मिरात जाण्याचा निर्णय घेतला. काश्मीर प्रवेशावर राजाने घातलेली बंदी मोडून नेहरू काश्मीरला गेले. तिथे त्यांना अटक करण्यात आली. भारतात त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटल्याने राजा हरीसिंग यांनी नेहरूंची तत्काळ सुटका केली. या घटनेने शेख अब्दुल्ला व काश्मिरी जनता भारताच्या अधिक जवळ आली होती. भारताप्रती आधीपासून असलेला विश्वास या घटनेमुळे अधिक वृद्धिंगत झाला होता. काश्मीरला भारताशी जोडण्याच्या बाजूने वजन टाकण्याची शेख अब्दुल्लांची जी अनेक कारणे होती त्यापैकी राजेशाहीच्या विरोधात लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी सुरु केलेल्या आंदोलनास भारताने दिलेला पाठींबा हे एक महत्वाचे कारण होते.
 

भारतात राहिल्याने काश्मिरातील धर्मनिरपेक्ष लोकशाही समाजवादाचे स्वप्न साकार होईल , पाकिस्तान त्यासाठी अनुकूल नाही या शेख अब्दुल्लांच्या मताला या घटनेने पुष्टी मिळाली होती. नवनिर्मित पाकिस्तानचा शेख अब्दुल्लांच्या समाजवादी व धर्मनिरपेक्ष लोकशाही मताला विरोध होता आणि राजा हरीसिंग यांना पाठींबा होता. राजा हरीसिंग यांनी शेख अब्दुल्लांना केलेल्या अटकेमुळे शेख अब्दुल्ला व काश्मिरी जनता भारताच्या जितक्या जवळ आली होती ती नेहरू काळात शेख अब्दुल्लांना झालेल्या अटकेमुळे तितकीच दूर गेली. विश्वासाचे रुपांतर अविश्वासात झाले. नेहरू काळात शेख अब्दुल्लांना अटक होईपर्यंत काश्मिरात सार्वमत घेण्याची शेख अब्दुल्लांनी कधीच मागणी केली नव्हती. सार्वमताचा प्रस्ताव भारताचा होता आणि सार्वमताची मागणी पाकिस्तानची होती. शेख अब्दुल्लांच्या १९५३ साली झालेल्या अटकेनंतर चित्र बदलले. शेख अब्दुल्ला सोबत अटक झालेल्या त्यांच्या सहकाऱ्यांनी 'जम्मू-काश्मीर सार्वमत आघाडी'ची स्थापना केली. अधिकृतपणे या आघाडीत शेख अब्दुल्ला कधीच सामील झाले नाहीत तरी या आघाडीच्या स्थापनेमागे त्यांची प्रेरणा व बळ होते हे कोणीही अमान्य करू शकत नव्हते. तुरुंगा बाहेर असलेल्या शेख अब्दुल्ला समर्थक व त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सार्वमत घेण्याचा विचार जनतेत रुजवायला सुरुवात केली. सार्वमताच्या विचारासोबत भारताबद्दलची अविश्वासाची भावनाही रुजायला आणि वाढायला लागली. नेहरू काळात शेख अब्दुल्लांना झालेल्या अटकेतून काश्मीर समस्येचे बीज अशाप्रकारे पेरले गेले. 

शेख अब्दुल्लांच्या अटकेआधी जम्मू-काश्मीर भारतात सामील होणार की नाही असा मुद्दाच नव्हता. काश्मीरचे भवितव्य निश्चित करण्यासाठी सार्वमत घेण्याचा मार्ग स्वत: शेख अब्दुल्ला यांनी फेटाळला होता. सामिलीकरणा बाबत त्यांच्या मनात संभ्रम किंवा अनिच्छा असती तर जेव्हा पहिल्यांदा भारतीय राज्यघटनेची काही कलमे लागू करण्याचा अध्यक्षीय आदेश निघाला तेव्हाच शेख अब्दुल्लांनी विरोध केला असता. घटनेच्या कलम ३७० प्रमाणे असा आदेश काढण्यासाठी जम्म-काश्मीर सरकारची संमती आवश्यक होती आणि त्यावेळेस जम्मू-काश्मीरचे पंतप्रधान शेख अब्दुल्लाच होते. त्यांनी संमती दिली म्हणून घटनेची काही कलमे जम्मू-काश्मीरला लागू करण्याचा आदेश भारताच्या राष्ट्रपतीच्या सहीने निघू शकला. २६ जानेवारी १९५० ला भारतीय राज्यघटनेचा अंमल सुरु झाला त्याच दिवशी जम्मू-काश्मीर सरकारच्या सहमतीने राष्ट्रपतींनी त्यावेळी अस्तित्वात असलेल्या राज्यघटनेच्या ३९५ कलमांपैकी ९८ कलमे जम्मू-काश्मिरात लागू करण्याचा आदेश काढला. या आदेशाला जम्मू-काश्मीर मधून कोणी विरोध केल्याची नोंद नाही. जम्मू-काश्मीरचे राजा हरीसिंग यांनी आपले संस्थान भारतात सामील करण्याच्या ज्या सामीलनाम्यावर स्वाक्षरी केली होती त्याच्याशी सुसंगत असाच राज्यघटनेतील ९८ कलमे जम्मू-काश्मीर मध्ये लागू करण्याचा राष्ट्रपतीचा आदेश होता. सामीलनाम्यानुसार संरक्षण,दळणवळण आणि परराष्ट्र धोरण या तीन विषयात जम्मू-काश्मीरच्या वतीने निर्णय घेण्याचे , त्यासंदर्भात अस्तित्वात असलेली कायदे लागू करण्याचे आणि त्या विषया संदर्भात नवे कायदे करण्याचा अधिकार भारत सरकारला होता. सामिलनाम्यानुसार राज्यघटनेची कलमे लागू झालीत यावर आक्षेप नव्हताच. यापुढे जावून भारतीय राज्यघटनेची इतर कलमे जम्मू-काश्मिरात लागू करण्याची जी घाई झाली त्यातून काश्मीरबाबत अनर्थकारी घटनांची मालिका सुरु झाली.             


यातील पहिली घटना म्हणजे शेख अब्दुल्ला यांना जम्मू-काश्मीरच्या पंतप्रधान पदावरून बडतर्फ करून अटक करण्याची होती. राज्यघटनेचा जम्मू-काश्मीरमध्ये विस्तार करण्यासाठी करण्यात आलेला १९५२ चा दिल्ली करारही शेख अब्दुल्लांनी मान्य केला होताच. पण या कराराला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघसंलग्न संघटना आणि पक्षांनी केलेला तीव्र आणि हिंसक विरोध यामुळे शेख अब्दुल्ला विचलीत झाले आणि राज्यघटनेची अन्य कलमे काश्मिरात लागू करण्याबाबत पुनर्विचार करू लागलेत. अशावेळी पंतप्रधान नेहरू आणि केंद्र सरकारने कोणी कितीही विरोध केला तरी समिलनाम्याच्या वेळी दिलेल्या आश्वासनाचे पालन होईल याबाबत शेख अब्दुल्लांना आश्वस्त करण्याची गरज होती. संघ आणि संघप्रणीत संस्था संघटनांचा विरोध चुकीचा आहे हे सांगण्या ऐवजी आणि तो विरोध मोडून काढण्यासाठी त्यांचेवर कायदेशीर करण्याऐवजी केंद्र सरकारने बेकायदेशीर निर्णय घेत शेख अब्दुल्लानाच त्यांच्या पदावरून बडतर्फ करून अटक केली. पंडीत नेहरू हयात असताना आणि पदावर असतांना जम्मू-काश्मीरच्या स्वायत्ततेला आणि स्वायत्ततेचे अभिवचन देणाऱ्या कलम ३७० ला विरोध होत असेल तर नेहरू नंतर काय होईल असा प्रश्न त्यावेळी शेख अब्दुल्ला यांनी विचारला होता. पण नेहरू नंतर जे घडण्याची आशंका त्यांना वाटत होती ते नेहरू राजवटीतच घडले ! राज्यघटनेतील कलमांचा दुरुपयोग करत निर्वाचित सरकारांना बडतर्फ करण्याची अनैतिक परंपरा काश्मीर पासून सुरु झाली. पण आपल्याकडे मान्यता अशी आहे की अशी सुरुवात केरळ पासून झाली. काश्मीरमध्ये नेहरूंनी जे केले ते योग्यच होते अशी आमची धारणा आहे. 'राष्ट्रवादा'च्या आड काय काय चालून जाते याचे हे उत्तम उदाहरण आहे.

---------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि. यवतमाळ 
मोबाईल - ९४२२१६८१५८ 

Friday, September 5, 2025

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - १४३

 भारतीय संविधानाची कलमे काश्मिरात लागू करण्याच्या घाईतून काश्मीर प्रश्न निर्माण झाला. या घाईने भारताच्या हेतूबद्दल शेख अब्दुल्लाच्या मनात संशय निर्माण झाला आणि त्यांनी त्याला विरोध केला. परिणामी त्यांना अटक करण्यात आली. अटके नंतर सार्वमताचे भूत बाटली बाहेर आले ! 
------------------------------------------------------------------------------------


जम्मू-काश्मीरचे नेते शेख अब्दुल्ला यांना झालेली अटक काश्मीर प्रश्नाचा प्रारंभ बिंदू आहे आणि केंद्र बिंदूही आहे. इथे एका व्यक्तीला झालेली अटक महत्वाची नाही. या मागचे नेमके कारण महत्वाचे आहे आणि ते समजले तरच काश्मीर प्रश्न समजेल. ज्यांना काश्मीर प्रश्न कळलाच नाही तेच कलम ३७० कडे बोट दाखवतात. कलम ३५ अ कडे अंगुली निर्देश करतात. नेहरूंनी हा प्रश्न संयुक्त राष्ट्र संघटनेत नेवून घोडचूक केली म्हणतात. काश्मीर पटेलांनी हाताळले  असते तर कोणताच प्रश्न निर्माण झाला नसता वगैरे वगैरे. या सगळ्या निरर्थक व अज्ञानमूलक गोष्टी आहे. काश्मीर बाबत भारतीय नेतृत्व व त्यावेळचे काश्मीरचे नेतृत्व यांच्या धारणा आणि स्वप्न भिन्न होती. काश्मीर प्रश्न म्हणजे या भिन्न धारणा आणि भिन्न स्वप्न यातील संघर्षातून निर्माण झाला आहे. काश्मीर बाबतची भारताची अधिकृत भूमिका आणि या भूमिकेच्या विपरीत काश्मीर बाबतची धोरणे अंमलात आणण्याची घाईच काश्मीर बाबत नडली आहे. काश्मीर बाबत भारताची अधिकृत भूमिका म्हणजे स्वीकारलेला सामीलनामा आणि सामीलनाम्यातील अटीशर्तीना कलम ३७० नूसार दिलेली संवैधानिक मान्यता आहे. तत्कालीन सर्वपक्षीय सरकारचा आणि संविधान सभेचा हा एकमुखी निर्णय होता. या निर्णयाचे सार एकच होते आणि ते म्हणजे काश्मीर बाबत निर्णय घेण्याचा प्रथम आणि अंतिम अधिकार जम्मू-काश्मीरच्या जनतेचा आहे. ही बाब तत्त्वतः मान्य करून व्यवहारात मात्र वेगळी पाउले उचलण्याची घाई केली गेली. भारताची काश्मीर बाबतची भूमिका जशी कलम ३७० मधून स्पष्ट होते तशी काश्मीर नेतृत्वाची काश्मीर बाबतची भूमिका काश्मीरच्या निर्वाचित संविधान सभेत शेख अब्दुल्ला यांनी केलेल्या पहिल्या भाषणातून स्पष्ट होते.                                                                                                                             

भारतीय संघराज्यात इतर संस्थानांचे जसे बिनशर्त विलीनीकरण झाले तसे काश्मीरचे झाले नाही ही बाब शेख अब्दुल्लांच्या या भाषणातून [आणि कलम ३७० मधून देखील } स्पष्ट होते. ५ नोव्हेंबर १९५१ रोजी जम्मू-काश्मीरच्या संविधान सभेचे कामकाज सुरु झाले त्यावेळी त्या दिवशी केलेल्या भाषणात शेख अब्दुल्ला यांनी म्हंटले होते की काश्मीरचे भारतात सामीलीकरण सशर्त झालेले आहे. सामीलीकरण सशर्त असले तरी आपण विचाराने भारताशी जोडले गेलेलो आहे. धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही हा काश्मीर आणि भारतातील समान दुवा आहे. धर्माधारित पाकिस्तान हे जम्मू-काश्मीरच्या विविधतेने नटलेल्या सांस्कृतिक व आपण जतन केलेल्या मूल्यांशी  विसंगत असल्याने आपण भारताची निवड केली आहे. याचा अर्थ आपण भारताचे प्रभुत्व स्वीकारले असा होत नाही.  काश्मीरच्या स्वायत्ततेच्या हमी आधारित समानतेच्या पायावर आपले हे संबंध असणार आहेत. या भाषणात पुढे त्यांनी नि:संदिग्ध शब्दात स्पष्ट केले होते की, जम्मू-काश्मीर राज्याने संरक्षण, विदेशनीती व दळणवळण हे तीन विषय केंद्र सरकारच्या अधीन ठेवण्याचे मान्य केले आहे आणि बाकी विषया संदर्भात निर्णय घेण्यास काश्मीर पूर्णत: स्वायत्त असणार आहे. तीन विषय वगळता बाकी विषयावर निर्णय घेण्याचा अधिकार अबाधित राखण्यावर या भाषणात त्यांनी जोर दिला होता. भारत आणि काश्मीर यांचे संबंध कलम ३७० नूसार असतील. पूर्ण विली नाही तर भारता अंतर्गत स्वायत्त काश्मीर ही शेख अब्दुल्लांची अवधारणा होती. काश्मीर बाबत भारतीय नेतृत्वाच्या मनात काहीही असले तरी शेख अब्दुल्लांनी व्यक्त केलेल्या मताशी सहमती व्यक्त केली होती . जम्मू-काश्मीरच्या स्वायत्ततेबाबत केवळ सहमतीच नव्हती तर कलम ३७० अन्वये तशी हमी देण्यात आली होती. 


याच भाषणात त्यांनी भारताच्या अनुकूल काही गोष्टी स्पष्ट केल्या होत्या. काश्मीरवर पाकिस्तानचा दावा निराधार आहे. पाकिस्तान टोळीवाल्यांना पाकिस्तानात घुसवून हिंसाचार माजविण्यास जबाबदार आहे. पाकिस्तानने बळजबरीने ताब्यात ठेवलेल्या काश्मीरमधून सैन्य मागे घेण्याची अट न पाळल्याने संयुक्तराष्ट्र संघाच्या निर्देशानुसार सार्वमत घेणे शक्य नाही. काश्मीरच्या जनतेने निवडून दिलेली संविधान सभाच काश्मीर बाबत निर्णय घेवू शकते आणि तसा निर्णय घेण्यासाठी काश्मीरच्या संविधान सभेच्या कामकाजाला प्रारंभ होत असल्याचे त्यांनी भाषणात सांगितले होते. अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार काश्मीरच्या संविधान सभेचा असल्याचे भारत सरकार तर्फे नेहरूंनी जाहीरपणे मान्य देखील केले होते. संविधान सभेच्या निवडून आलेल्या सदस्यांचा शेख अब्दुल्ला यांच्या नेतृत्वावर विश्वास असल्याने त्यांनी भाषणात ज्या बाबी स्पष्ट केल्या होत्या त्यावर शिक्कामोर्तब केले असते. भारतापासून वेगळे होण्याचा निर्णय होण्याची सुतराम शक्यता नव्हती. तेव्हा काश्मीरच्या संविधान सभेच्या निर्णयाची वाट बघणे संयुक्तिक असताना १९५२ चा करार करण्याची घाई करण्यात आली. या घाईमागे फाळणीने नाजूक बनलेले हिंदू-मुस्लीम संबंध काश्मीर प्रश्नावरून अधिक बिघडू देण्याची संधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व संघप्रणीत पक्ष संघटनांना मिळू नये हेच कारण सकृतदर्शनी दिसते.                                                                   

या कराराच्या अंमलबजावणी वरून निर्माण झालेल्या तणावातून शेख अब्दुल्लांना अटक झाली. हा करार न करता संविधान सभेच्या निर्णयाची वाट बघितली असती तर परिस्थिती वेगळी राहिली असती. देशांतर्गत राजकारणाला विपरीत वळण मिळू नये म्हणून भारतीय संविधानाची कलमे काश्मिरात लागू करण्याच्या घाईतून काश्मीर प्रश्न निर्माण झाला. या घाईने भारताच्या हेतूबद्दल शेख अब्दुल्लाच्या मनात संशय निर्माण झाला आणि त्यांनी त्याला विरोध केला. परिणामी त्यांना अटक करण्यात आली. अटके नंतर सार्वमताचे भूत बाटली बाहेर आले ! शेख अब्दुल्लांना अटक करून काश्मीरच्या राजकारणापासून अलग पाडल्यामुळे त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांनी जम्मू-काश्मीर सार्वमत आघाडी स्थापन केली. स्वत: शेख अब्दुल्ला या आघाडीपासून दूर राहिले तरी त्यांच्या प्रेरणेशिवाय व आशीर्वादाशिवाय त्यांच्या जवळच्या नेत्यांनी सार्वमत आघाडीची स्थापना करणे पटणारे नाही. अटकेत राहिल्याने शेख अब्दुल्लाच्या भूमिकेत काही बदल झाला का हे जाणून घेण्यासाठी त्यांची १९५८ साली तुरुंगातून सुटका करण्यात आली. सुटकेनंतर त्यांनी काश्मिरी जनते समोर केलेल्या भाषणात काश्मीरचे भवितव्य काश्मीरच्या जनतेला सार्वमता द्वारे ठरवू देण्याची मागणी केल्याने पुन्हा त्यांना अटक करण्यात आली. पाकिस्तानच्या भूमिकेमुळे काश्मिरात सार्वमत शक्य नाही आणि त्याची गरजही नाही असे म्हणणाऱ्या आणि मानणाऱ्या शेख अब्दुल्लांना सार्वमताच्या मागणीकडे वळविण्यास भारत सरकारची धोरणेच कारणीभूत ठरली. 

---------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि. यवतमाळ 
मोबाईल : ९४२२१६८१५८ 


Friday, August 29, 2025

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - १४२

 जागतिक व्यासपीठावर भारत सरकार काश्मिरी जनतेचा स्वयंनिर्णयाचा हक्क मान्य करीत होते आणि संयुक्त राष्ट्रसंघाची सुरक्षा परिषद सार्वमत घेण्याचा निर्देश देत होती त्यावेळी काश्मिरातील जनतेने आधीच भारताच्या बाजूने कौल दिला आहे त्यामुळे नव्याने सार्वमत घेण्याची गरज नाही हे ठामपणे सांगणारे एकमेव नेते शेख अब्दुल्ला होते.
--------------------------------------------------------------------------------------------


पंडीत नेहरूंची देशाला आणि जगाला जी ओळख आहे त्याच्या विपरीत त्यांचे वर्तन काश्मीर आणि शेख अब्दुल्लांच्या बाबतीत घडले. काश्मीरच्या बाबतीत वारंवार ज्या भूमिकेचा पुनरुच्चार नेहरू १९४७ ते १९५२ या काळात करीत आलेत त्या भूमिकेलाच छेद देणारी कृती त्यांनी १९५३ मध्ये केली. शेख अब्दुल्लांची अटक भारताच्या काश्मीर विषयक घोषित भूमिकेला छेद देणारी होती. अटकेचे कारण फार दुबळे आणि हास्यास्पद होते. शेख अब्दुल्ला पाकिस्तानशी संगनमत करून भारतापासून काश्मीरला वेगळे करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करण्यात आला. हा आरोप त्या शेख अब्दुल्लावर करण्यात आला ज्यांनी फाळणीच्या वेळी पाकिस्तान ऐवजी भारताची निवड केली. धर्मांध व सरंजामशाही असलेल्या पाकिस्तान ऐवजी त्यांना लोकशाही समाजवादी भारत जवळचा वाटला. काश्मीरला लोकशाहीवादी आणि धर्मनिरपेक्ष समाजवादी बनवायचे असेल तर पाकिस्तानात राहून ते शक्य होणार नाही. त्यासाठी भारतासोबत राहणेच योग्य असल्याचे त्यांचे ठाम मत होते. जसे भारताने वेळोवेळी काश्मिरी जनतेचा स्वयंनिर्णयाचा हक्क जाहीरपणे मान्य केला होता तसेच शेख अब्दुल्लांनी आपल्या स्वप्नातील काश्मीर भारतात राहूनच साकार होईल हे वेळोवेळी सांगितले होते. पाकिस्तान बरोबर जायचे नाही यावर ठाम असल्याने त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी भारतीय सैन्याला पाकिस्तानी घूसखोरा विरुद्ध मदत केली होती. सैन्याच्या खांद्याला खांदा लावून शेख अब्दुल्ला समर्थक पाकिस्तानी घुसखोरांविरुद्ध लढल्याचा इतिहास आहे. १९५२ पर्यंत , अगदी १९५२ चा दिल्ली करार होईपर्यंत, भारत सरकार व शेख अब्दुल्लांचे सरकार यांच्यामध्ये मतभेद नव्हते. काश्मीरच्या बाबतीत जागतिक व्यासपीठावर भारत अनुकूल भूमिका घेण्यात शेख अब्दुल्ला भारताच्याही पुढे एक पाउल होते. जागतिक व्यासपीठावर भारत सरकार काश्मिरी जनतेचा स्वयंनिर्णयाचा हक्क मान्य करीत होते आणि संयुक्त राष्ट्रसंघाची सुरक्षा परिषद सार्वमत घेण्याचा निर्देश देत होती त्यावेळी काश्मिरातील जनतेने आधीच भारताच्या बाजूने कौल दिला आहे त्यामुळे नव्याने सार्वमत घेण्याची गरज नाही हे ठामपणे सांगणारे एकमेव नेते शेख अब्दुल्ला होते. त्यावेळी संयुक्त राष्ट्र संघाच्या व्यासपीठावर शेख अब्दुल्ला यांनी आणखी एक महत्वाची गोष्ट सांगितली होती की पाकिस्तानचा काश्मीरशी काही संबंधच नसल्याने काश्मीरने भारतात राहायचे की पाकिस्तानात यावर सार्वमत घेण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. १९५२ पर्यंत अशा भूमिकेवर ठाम असणाऱ्या शेख अब्दुल्लांना १९५३ मध्ये अटक करून भारत सरकारने काश्मीर समस्येचा पाया घातला. 

१९५२चा दिल्ली करार ते १९५३ मधील शेख अब्दुल्लांची अटक या दरम्यान शेख अब्दुल्लांची भूमिका बदलली का की आणखी काही वेगळी परिस्थिती निर्माण झाली का की ज्यामुळे शेख अब्दुल्लांना अटक करणे भाग पडले या प्रश्नाचे सरळ उत्तर सापडत नाही. पण १९५२ चा दिल्ली करार निमित्त ठरला भारत सरकार आणि शेख अब्दुल्ला यांचे मार्ग वेगळे करण्यासाठी. विशेष म्हणजे हा करार दोहोंच्या पूर्ण संमतीने झाला होता. हा असा करार होता ज्याची खरे तर काहीच आवश्यकता नव्हती. हा करार झाला तेव्हा काश्मीरची संविधान सभा गठीत होवून तिचे कामकाज सुरु झाले होते. भारत आणि काश्मीर यांच्यातील संबंध स्पष्ट आणि निश्चित करणारी सर्वोच्च आधिकारिक संस्था संविधान सभाच असल्याचे भारत सरकार आणि शेख अब्दुल्लाचे एकमत होते. अशावेळी जे काही ठरवायचे ते संविधान सभेला ठरवू द्यावे, संविधान सभेच्या विचारार्थ काही प्रस्ताव द्यायचे असतील तर ते द्यावेत हा मार्ग उपलब्ध असताना भारत सरकार व शेख अब्दुल्लाचे सरकार यांना तातडीने एखादा करार करण्याची काय आवश्यकता होती हा प्रश्न पडतो. अर्थात यात शेख अब्दुल्लांना दोष देता येणार नाही. करार नेहरूंच्या पुढाकाराने झाला. काश्मीरच्या संविधान सभेचे कामकाज सुरु झाल्या नंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणीत संघटनांनी काश्मीर वेगळे होणार असा प्रचार करून देशातील उरल्यासुरल्या धार्मिक सौहार्दाला सुरुंग लावण्याच्या प्रयत्न चालविला होता. त्याला आळा घालण्यासाठी आणि काश्मीर भारतापासून वेगळे होणार नाही हे दाखविण्याच्या उद्देशाशिवाय या कराराची कोणतीही निकड होती असे दिसत नाही. वास्तविक जम्मू-काश्मीरच्या संविधान सभेचे कामकाज सुरु झाले त्यावेळी केलेल्या भाषणात जम्मू-काश्मीरने भारतात राहणे त्याच्या हिताचे आणि गरजेचे असल्याचे प्रतिपादन शेख अब्दुल्लाने करून संविधान सभेच्या कामकाजाची दिशा स्पष्ट केली होती. त्यामुळे वेगळा करार करून हीच गोष्ट पुन्हा दाखवून देण्याची गरज नव्हती.                                                                                                       

संविधान सभेतील शेख अब्दुल्लांच्या प्रतिपादनावर संघप्रणीत संघटनांचा विश्वास नव्हता तो अशा कराराने बसेल असे मानणेच व्यर्थ होते. काश्मीरचा शासक म्हणून शेख अब्दुल्ला असणे त्यांना मान्य होण्यासारखे नव्हते. त्यामुळे काश्मीरच्या सामीलीकरण कराराबाबत आणि त्यावेळी दिलेल्या आश्वासना बाबत जनतेला पूर्ण आणि स्पष्ट माहिती देवून काश्मीरच्या बाबतीत गोंधळ निर्माण करणाऱ्या संघटना व पक्षांचा बंदोबस्त करण्याची गरज होती. ते न करता नेहरूंनी शेख अब्दुल्लाना अटक करून नवे प्रश्न निर्माण केलेत. १९५२ चा करार नेहरूंनी काश्मीरचे नेतृत्व भारतीय राज्यघटना लागू करण्याच्या विरोधी नाही हे विरोधकांना दाखवून देण्यासाठीच केला हे पूर्ण सत्य नाही. नेहरुंना कोणत्याही परिस्थितीत काश्मीर भारताचा अभिन्न हिस्सा असला पाहिजे असे वाटत होते.  याबाबत कोणत्याच शंकेला जागा नको असे वाटण्यातून हा करार जन्माला आला. एकीकडे हा करार अंमलात आणण्याची नेहरुंना झालेली घाई व त्यासाठी त्यांनी वाढविलेला दबावही शेख अब्दुल्लांना असुरक्षित वाटण्यास कारणीभूत ठरला. या असुरक्षिततेतून शेख अब्दुल्लांची नेहरुशी असहकार्याची भूमिका घेतली. या असहाकारातून दोन नेत्यात अविश्वास निर्माण झाला आणि याची परिणती शेख अब्दुल्लांच्या बडतर्फी व अटकेत झाली. अवेळी अनावश्यक करार करण्याची घाई ही नेहरूंची पहिली चूक आणि या कराराची अंमलबजावणी शेख अब्दुल्ला करायला तयार नाहीत म्हणून त्यांना अटक करण्याचे टोकाचे पाउल उचलून दुसरी चूक केली. वास्तविक ज्या परिस्थितीत व ज्या विश्वासाने शेख अब्दुल्ला यांनी भारताची निवड केली ते लक्षात घेता आपण शेख अब्दुल्लांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत हे जगाला आणि देशांतर्गत विरोधकांना दाखविण्याची गरज होती त्यावेळी अटक झाल्याने काश्मीरचे चित्रच पालटले. 
--------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि. यवतमाळ 
मोबाईल : ९४२२१६८१५८ 

Thursday, August 21, 2025

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - १४१

१९५२ च्या दिल्ली कराराद्वारे  देशाचे सार्वभौमत्व व काश्मीरची स्वायत्तता यात सुवर्णमध्य साधण्याचा नेहरूंनी प्रयत्न केला पण घडले उलटेच. या करारालाच स्वायत्ततेचा विरोध करणाऱ्यांनी विरोधाचा मुद्दा बनविला. या विरोधाने शेख अब्दुल्ला विचलीत झाले व कराराच्या पालना बद्दल त्यांच्या द्विधा मन:स्थितीमुळे त्यांचे नेहरू सोबतचे संबंध ताणले गेले. 
----------------------------------------------------------------------------------------  

१९५२ चा दिल्ली करार काश्मीर बाबतीत मैलाचा दगड ठरण्या ऐवजी समस्या निर्मितीचा प्रारंभ ठरला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची राजनीतिक शाखा म्हणून २१ ऑक्टोबर १९५१ रोजी स्थापन झालेल्या जनसंघ पक्षाला या कराराने एक कोलीत आणि कार्यक्रम मिळाला. जनसंघ स्थापन करण्यात श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी पुढाकार घेतला व या कामी त्यांना संघ प्रचारक असलेल्या बलराज मधोक व दीनदयाळ उपाध्याय यांची मदत झाली. जनसंघ स्थापन होण्याच्या आधी बलराज मधोक यांनी जम्मूत प्रजा परिषद नावाची राजकीय संघटना स्थापन केली होती. जम्मू-काश्मीरचे राजा हरीसिंग यांना बळ देण्यासाठी ही संघटना होती. राजा हरीसिंग यांनी भारत किंवा पाकिस्तानात सामील न होता जम्मु आणि काश्मीर स्वतंत्र ठेवून त्यावर राज्य करावे अशी प्रजा परिषदेची इच्छा होती. पण पाकिस्तानने काश्मीर बळकाविण्याच्या इराद्याने पश्तुनी कबाईली काश्मीर मध्ये घुसविल्याने राजा हरीसिंग यांना भारताकडे मदत मागावी लागली व त्यासाठी भारतात सामील होण्याच्या सामीलनाम्यावर स्वाक्षरी करावी लागली. राजा हरीसिंग यांना स्वतंत्र राहता आले नाही तरी काश्मीरवर शेख अब्दुल्लांचे वर्चस्व राहता कामा नये यासाठी बलराज मधोक यांच्या प्रजा परिषदेने कंबर कसली होती. प्रजा परिषदेच्या स्थापनेच्या आधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेने व राजा हरीसिंग यांच्या मदतीने डोग्रा हिंदूंची {राजा हरीसिंग डोग्रा हिंदू होते.} जम्मू-काश्मीर राज्य हिंदू सभा जम्मूत सक्रीय होती. आरेसेसचे जम्मू प्रमुख असलेले प्रेम नाथ डोग्रा जम्मू-काश्मीर हिंदू सभेचे प्रमुख नेते होते. जनसंघ, प्रजा परिषद आणि हिंदू सभा यांचा समान कार्यक्रम म्हणजे कलम ३७० व जम्मू-काश्मीर राज्याच्या स्वायत्ततेला विरोध हा होता.                                                                                                                     

जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी भारताच्या घटना समितीचे सदस्य होते . त्यांनी घटना समितीत कलम ३७० चा अजिबात विरोध केला नव्हता. पण जनसंघाची स्थापना केल्यावर मात्र पक्षाचा कलम ३७० ला विरोध हा मुख्य कार्यक्रम बनला. कलम ३७० मुळे जमू-काश्मीरला स्वायत्तता मिळाली नव्हती. स्वायत्ततेचे मूळ होते राजा हरीसिंग यांनी स्वाक्षरी केलेला सामीलनामा. या सामिलनाम्याचा घटनात्मक स्वीकार कलम ३७० अन्वये करण्यात आला. सामीलनाम्या नंतरच्या घटनांनी स्पष्ट झाले होते की राजा नामधारी असणार आणि राज्याची सारी सूत्रे राज्याचे लोकप्रिय नेते शेख अब्दुल्ला यांच्या हाती असणार. संघ, जनसंघ ,हिंदुसभा आणि प्रजा परिषद यांना हेच नको होते. राजा हरीसिंग यांच्या अधिपत्या खाली स्वतंत्र जमू-काश्मीर राष्ट्र त्यांना चालणार होते पण शेख अब्दुल्लाच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ राज्याचा स्वायत्त घटक असलेले जम्मू-काश्मीर राज्य त्यांना नको होते. त्यामुळे हे सगळे समूह राजा हरीसिंग यांचे समर्थक असताना राजा हरीसिंग यांनी ज्या अटी-शर्तीनिशी भारतात काश्मीर सामील केले त्या अटी -शर्तीचा हे समूह विरोध करू लागले होते. फाळणीमुळे हिंदू-मुस्लीम तणावाच्या पार्श्वभूमीवर शेख अब्दुल्लांना निशाणा बनविणे या समूहासाठी सोपे आणि सोयीचे होते. सामीलनाम्यात निहित स्वायत्तता कायम राहावी यासाठी शेख अब्दुल्ला कमालीचे आग्रही होते. १९५२ च्या दिल्ली कराराने राजा हरीसिंग यांनी केलेल्या सामीलनाम्याचा करार , जो हिंदुत्ववादी संघटनांसाठी गैरसोयीचा व अडचणीचा होता तो बाजूला पडला आणि त्या सामीलनाम्यामुळे नाही तर पंडीत नेहरूंनी हा जो करार केला त्यामुळे काश्मीरचे इतर राज्या पेक्षा वेगळे असे स्थान निर्माण झाल्याचे फसवे चित्र संघ ,जनसंघ, जम्मू-काश्मीर हिंदू सभा आणि प्रजा परिषद यांना निर्माण करता आले. अर्थात हा करार होण्याच्या आधीपासूनच या संघटनांनी व पक्षांनी कलम ३७० व जम्मू-काश्मीरच्या स्वयात्तते विरोधात रान पेटविले होते. याविरुद्ध जम्मूत हिंसक आंदोलनेही झालीत.                                                                               

हा विरोध शमविण्याचा एक भाग म्हणून नेहरूंनी काश्मीरच्या प्रतिनिधीना दिल्लीत बोलावून त्यांच्याशी चर्चा करून हा करार घडवून आणला होता.  काय होईल हा त्यांना प्रश्न पडला. परिणामी त्यांनी १९५२ चा करार अंमलात आणण्यास टाळाभारताचे सार्वभौमत्व व काश्मीरची स्वायत्तता यात सुवर्णमध्य साधण्याचा या कराराद्वारे नेहरूंनी प्रयत्न केला पण घडले उलटेच. या करारालाच स्वायत्ततेचा विरोध करणाऱ्यांनी विरोधाचा मुद्दा बनविला. या विरोधाने शेख अब्दुल्ला विचलीत झाले.  पंडीत नेहरू स्वतंत्र भारताचे सर्वोच्च व सर्वाधिक लोकप्रिय नेते असताना त्यांनी केलेल्या कराराला व काश्मीरच्या स्वायत्ततेला विरोध होत असेल तर नेहरू नंतरटाळ सुरु केली. यातून नेहरू आणि शेख अब्दुल्ला यांचे संबंध ताणले गेले. नेहरूंचे म्हणणे होते की काश्मीरच्या नेत्यांनी जे मागितले ते आम्ही दिले. मग त्या करारात आम्हाला अपेक्षित असलेल्या बाबींची शेख अब्दुल्लाने पूर्ती करायला हवी. वास्तविक या करारामुळे जम्मू-काश्मीरला काहीही वेगळे मिळाले नव्हते. यात शेख अब्दुल्लांच्या इच्छे प्रमाणे एकच गोष्ट झाली. राज्याचे प्रमुख राजा-महाराजा असू नयेत तर विधानसभेने निवडलेला व्यक्ती त्या जागी असावा आणि त्याला महाराजा ऐवजी सादर- ए - रियासत हे नामाभिधान असावे या त्यांच्या म्हणण्याला करारात मान्यता देण्यात आली.


काश्मीरमध्ये आधीपासूनच पंतप्रधान पद होते. त्यामुळे या करारामुळे काश्मीरच्या मुख्यमंत्र्याचे नामाभिधान पंतप्रधान झाले असे म्हणणे चुकीचे आहे. तीच बाब काश्मीरच्या ध्वजाची आहे. काश्मीरचे पंतप्रधानपद किंवा काश्मीरचा ध्वज सामिलीकरणाच्या अटी व शर्तीनुसार कायम राहणार होता. १९५२ च्या कराराने या गोष्टी त्यांना मिळाल्या हा मोठा गैरसमज आहे. उलट या कराराने जम्मू-काश्मीर मध्ये जिथे जिथे राज्याचा ध्वज तिथे तिथे भारतीय राष्ट्रध्वज फडकणे अनिर्वाय झाले. काश्मीरचे सदर ए रियासत पद , पंतप्रधानपद आणि काश्मीरमध्ये काश्मीरचा ध्वज या करारामुळे मिळाला असा अपप्रचार करत त्याविरुद्ध उपरोक्त संघटनांनी काहूर उठवले. ज्यांना शांत करण्यासाठी नेहरूंनी हा करार करण्याची घाई केली तेच या कराराने अधिक चेकाळले. या करारा विरुद्धच्या आंदोलनाचा भाग म्हणून जनसंघ प्रमुख श्यामाप्रसाद मुखर्जी बंदीहुकूम मोडून जम्मू-काश्मीर राज्यात गेले .तिथे त्यांना अटक झाली. अटकेत असताना त्यांचा आजार बळावला व त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे परिस्थिती अधिकच चिघळली. दुसरीकडे हिंदुत्ववाद्यांच्या विरोधामुळे  १९५२ चा करार शेख अब्दुल्ला अंमलात आणण्यास इच्छुक आणि उत्सुक नसल्याने पक्षांतर्गत नेहरू यांचेवर दबाव वाढला. जो पर्यंत नेहरू आणि शेख अब्दुल्लात सख्य होते तो पर्यंत अब्दुल्लांच्या विरोधात उघडपणे कॉंग्रेसनेते बोलत नव्हते. कॉंग्रेसमध्येही असे अनेक नेते होते ज्यांच्यावर हिंदुत्वाचा पगडा होता. नेहरू-अब्दुल्ला संबंधात तणाव निर्माण झाल्यावर त्यांनी दिल्लीत शेख अब्दुल्ला विरुद्ध वातावरण तयार केले. शेख अब्दुल्लाना पदावरून बडतर्फ करण्यात आले आणि त्यांना स्थानबद्ध करण्यात आले. काश्मीर समस्येची ही सुरुवात आहे ज्याचे अपश्रेय अशाप्रकारे पंडीत नेहरूंकडे जाते. 

 -----------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव
पांढरकवडा जि. यवतमाळ
मोबाईल : ९४२२१६८१५८ 

Thursday, August 14, 2025

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - १४०

 काश्मीर भारताचा भाग बनला या परिस्थितीत बदल होण्याची सुतराम शक्यता नाही हे स्पष्ट असताना देशात काश्मीरच्या सामिलीकरणाला वादग्रस्त बनविण्याचे काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ , जनसंघ आणि जम्मू-काश्मीरची प्रजा परिषद यांनी केले.
----------------------------------------------------------------------------------------


फाळणीची अधिकृत घोषणा होण्याच्या आधीपासून पंडीत नेहरूंची नजर काश्मीरवर होती. फाळणी आधीच काश्मीर बाबत लॉर्ड माउंटबॅटन यांचेशी नेहरूंची चर्चा झाल्याच्या नोंदी आहेत. फाळणीची रेषा आखताना मुस्लीम बहुल गुरुदासपूर भारतात आले हा योगायोग नव्हता. गुरुदासपूर भारताकडे आलें नसते तर काश्मीरशी भारताचा संबंध तेव्हाच तुटला असता. काश्मीर मध्ये पाकिस्तानने कबाइली आणि कबाइलीच्या वेषात आपले सैन्य घुसविल्यामुळे तळ्यात मळ्यात करणाऱ्या राजा हरीसिंग यांना भारताकडे मदतीची याचना करावी लागली व मदत मिळविण्यासाठी सामीलनाम्यावर सही करावी लागली. हे सगळे घाईगडबडीत झाल्याने सामीलनामा अंतिम मानण्यात येवू नये व काश्मीरचे भवितव्य सार्वमताने ठरवावे अशी भूमिका लॉर्ड माउंटबॅटन यांनी घेतली व ती त्यावेळच्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या गळी उतरविली आणि काश्मीरचे भारतात सामीलीकरण स्विकारताना काश्मिरातील परिस्थिती सामान्य झाल्यावर तिथली जनता सार्वमताने काश्मीरचे भवितव्य निश्चित करील असे पत्र राजा हरीसिंग यांना दिले. हे पत्र काश्मीर समस्येच्या मुळाशी आहे असा भ्रम आहे. युनोच्या ठरावातील अटींचे पालन करून सार्वमत शक्य होते पण पाकिस्तानने त्यातून काढता पाय घेतला व सार्वमताचा प्रश्न मागे पडला. नेहरू जाहीरपणे सार्वमताशी बांधिलकी व्यक्त करत होते तरी पाकिस्तानने जी परिस्थिती निर्माण केली त्यात सार्वमत शक्य नाही या निष्कर्षाप्रत नेहरू आले होते.                                                                                               

काश्मीरचे भवितव्य निश्चित करण्या संबंधीचे जे टिपण नेहरूंनी २५ ऑगस्ट १९५२ रोजी शेख अब्दुल्लांना पाठविले त्यात त्यांनी हा निष्कर्ष स्पष्टपणे मांडला होता. शेख अब्दुल्ला तर त्याच्याही पुढे एक पाउल होते. १९५१ साली जम्मू-काश्मीर राज्यात निवडणूक होवून राज्याची घटना समिती बनली त्या समितीच्या उदघाटन भाषणात शेख अब्दुल्लांनी स्पष्टपणे सांगितले होते की काश्मिरात सार्वमत घेण्याची गरजच नाही.ही जी निवडून आलेली घटना समिती आहे त्यातून लोकेच्छा प्रकट झाली आहे व ही घटना समितीच काश्मीरचे भवितव्य ठरविण्यास अधिकार पात्र आहे. जम्मू-काश्मीरची घटना समिती जो निर्णय घेईल तो मान्य करण्यास भारत बांधील असल्याचे नेहरूंनीही १९५२ च्या शेख अब्दुल्लांना पाठविलेल्या टिपणात नमूद केले होते. शेख अब्दुल्लाच्या जम्मू-काश्मीर घटना समिती समोर केलेल्या भाषणात आणि नेहरूंच्या टिपणात आणखी एक महत्वाचे साम्य आहे.शेख अब्दुल्लांनी म्हंटले होते की आम्ही भारताची निवड केली आहे आणि भारता अंतर्गत काश्मीर राहील पण ते स्वायत्त असेल. भारतीय राज्यघटनेतील कलम ३७० नूसार भारत आणि काश्मीरचे संबंध असतील. या संविधान सभेचे पहिले काम काश्मीरच्या भारता सोबतच्या झालेल्या सामीलीकरण करारावर शिक्कामोर्तब करणे असणार आहे. पंडीत नेहरूंनी देखील आपल्या टिपणात भारता अंतर्गत काश्मीर स्वायत्त राज्य असेल हे नमूद केले होते. त्यामुळे १९५२ पर्यंत काश्मीरच्या भवितव्या बद्दल आणि भारताशी काश्मीरचे संबंध कसे असतील याबाबत पंडीत नेहरू आणि शेख अब्दुल्ला यांच्यात एकवाक्यता होती.                                                                                                           

१९५० साली राज्यघटना देशात लागू झाली तेव्हा कलम ३७० मुळे भारताच्या राष्ट्रापतीचे अधिकार क्षेत्र काश्मीर पर्यंत विस्तारले होते आणि कलम ३७० च्या माध्यमातून घटनेच्या कलम १ मध्ये नमूद संघराज्याच्या यादीत जम्मु आणि काश्मीर राज्याचा समावेश झाला होता. सार्वमत घेण्यासारखी परिस्थिती नव्हती, शेख अब्दुल्लांचाही सार्वमताचा आग्रह नव्हता ,उलट विरोधच होता आणि जम्मू-काश्मीर राज्याची घटना समिती सामीलीकरण करारावर शिक्कामोर्तब करणार हे निश्चित होते . काश्मीर भारताचा भाग बनला या परिस्थितीत बदल होण्याची सुतराम शक्यता नाही हे स्पष्ट असताना देशात काश्मीरच्या सामिलीकरणाला वादग्रस्त बनविण्याचे काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ , जनसंघ आणि जम्मू-काश्मीरची प्रजा परिषद यांनी केले. हिंदुत्ववादी संघटनांनी आधी काश्मीरने भारतात सामील न होता राजा हरीसिंग यांनी स्वतंत्र काश्मीर राज्याची घोषणा करावी यासाठी प्रयत्न केला होता. पाकिस्तानच्या आक्रमणाने तो प्रयत्न फसला आणि राजा हरीसिंग यांना काश्मीर भारतात सामील करणे भाग पडले. काश्मीर भारतात सामील झाल्याने राजा हरीसिंग नामधारी बनले आणि जनतेचे नेते म्हणून काश्मीरची सारी सूत्रे शेख अब्दुल्ला यांचेकडे आली. या परिस्थितीशी जुळवून घेणे जम्मूतील अनेक वर्षे राज्यकर्ता राहिलेल्या डोग्रा हिंदुना आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शक्य नव्हते. त्यात शेख अब्दुल्लांनी जमीन सुधारणा कायद्याची जमीन मालकांना कोणताही मोबदला न देता कडक अंमलबजावणी केली.                                                                       

जमीनदारात बहुसंख्य डोग्रा समाजाचा समावेश असल्याने त्यांना शेख अब्दुल्लाचा निर्णय रुचला आणि पचला नाही. म्हणून ते शेख अब्दुल्लाच्या विरोधात उभे राहिले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला प्रिय असलेले राजा हरीसिंग यांचे शेख अब्दुल्ला हे कट्टर विरोधक होते. शेख अब्दुल्लांचे महत्व स्वीकारणे संघाला जड जात होते. शेख अब्दुल्लांनी जम्मू-काश्मीर घटना समिती समोर केलेल्या पहिल्या भाषणात भविष्यातील काश्मीर धर्मनिरपेक्ष, समाजवादी आणि लोकशाहीवादी असणार असल्याचे स्पष्ट केले होते. संघाला मान्य नसलेल्या या मुल्यांचा पुरस्कार दिल्लीतील सत्ताधारीही करत होते. दिल्ली आणि श्रीनगर मधील सत्ताधाऱ्याना अडचणीत आणण्यासाठी काश्मीरच्या स्वायत्ततेच्या मुद्द्याला वादग्रस्त बनविण्याचा चंग आरेसेसने बांधला. शेख अब्दुल्लांना स्वतंत्र निर्णय घेता येवू नये यासाठी त्यांचा काश्मीरच्या स्वायत्ततेला विरोध होता. हिंदुत्ववादी संघटनांनी राष्ट्रपतीला निवेदन देवून जम्मू-काश्मीरच्या स्वायत्ततेला विरोध दर्शविला. स्वायत्तता विरोधी वातावरण निर्मिती सुरु केली. दुसरीकडे कॉंग्रेसमध्ये देखील काश्मीरच्या स्वायत्त दर्जाला विरोध करणारे अनेक नेते होते. त्यांचाही दबाव नेहरूंवर होता. तत्व म्हणून काश्मीरचे भवितव्य काश्मीरच्या जनतेने आणि पर्यायाने जनतेने निवडलेल्या घटना समितीने ठरवायला त्यांची मान्यता असली तरी आंतरराष्ट्रीय राजकारण लक्षात घेता काश्मीर भारतासाठी महत्वाचे असल्याने तेथील जनतेने नाराज होवून दूर जाण्याचा विचार करता कामा नये असे नेहरुंना वाटत होते. स्वायत्ततेच्या विरोधकांना व स्वायत्ततेच्या समर्थकांना शांत करण्यासाठी पंडीत नेहरूंनी काश्मीरच्या प्रतिनिधी सोबत एक करार केला. हा करार १९५२ चा दिल्ली करार म्हणून ओळखला जातो. या करारानंतर काश्मीर मुद्दा शांत होण्या ऐवजी जास्त तीव्र बनला. कराराचा उद्देश्य काश्मीरचे विलीनीकरण व काश्मीरची स्वायत्तता यात संतुलन राखण्याचा होता. चांगल्या उद्देश्याने केलेला हा करार काश्मीर समस्येच्या निर्मितीला निमित्त ठरला. 

------------------------------------------------------------------------------ 

सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि. यवतमाळ 
मोबाईल : ९४२२१६८१५८ 

Friday, August 8, 2025

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - १३९

 सार्वमताला अनुकुलते पासून सुरु झालेला काश्मीरचा धोरणात्मक प्रवास सार्वमताच्या प्रतिकुलतेत रुपांतरीत होण्यास आमची धोरणेच कारणीभूत ठरली आहे. याची सुरुवात नेहरू काळापासून झाली आणि ती खुद्द पंडीत नेहरूंनी केली. 
------------------------------------------------------------------------------------------


युनो मध्ये काश्मीर विषय नेल्याने आपले कोणतेही नुकसान झालेले नाही. त्यावेळी युनोने केलेला ठराव पाकिस्तानला प्रतिकूल वाटल्याने पाकिस्तानने ठरावाची अंमलबजावणी करण्याचे टाळल्याने सार्वमताची पहाट उजाडली नाही. त्यावेळी काश्मिरी जनतेचे लोकप्रिय नेते शेख अब्दुल्ला भारता सोबत असल्याने भारताला काश्मीर प्रश्नावर सार्वमत घेतले तर आपलीच सरशी होईल असा विश्वास होता. पाकिस्तानला सार्वमत जिंकण्याचा विश्वास नसल्याने युनोच्या ठरावानुसार सार्वमत घेण्यासाठी युनोच्या ठरावातील पूर्वअटींची पूर्तता पाकिस्तानने केली नाही. सार्वमतात खोडा कोणी घातला असेल तर पाकिस्तानने. आज भारत सरकारने काश्मीरमध्ये सार्वमत घेण्याची मागणी देशद्रोही ठरविली आहे. वास्तविक त्याची गरज नव्हती. काश्मीरमध्ये सार्वमत होवू शकले नाही याला सर्वस्वी पाकिस्तान जबाबदार आहे ही वस्तुस्थिती काश्मिरी जनतेच्या नंतरच्या पिढीला पटवून देण्यात कमी पडल्याने सार्वमताच्या मागणीला देशद्रोह ठरविण्याची पाळी आली. काश्मीर भारतात सामील झाल्यानंतर ५ वर्षेपर्यंत देशात आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर सार्वमताने काश्मीरचे भवितव्य ठरविण्याचा वेळोवेळी पुनरुच्चार केला होता. आज मात्र काश्मीरमधून सार्वमत घेण्याची मागणी आमच्यासाठी अडचणीची ठरली आणि अशी मागणी देशद्रोही ठरविण्याची पाळी आमच्यावर आली.         

सार्वमताला अनुकुलते पासून सुरु झालेला काश्मीरचा धोरणात्मक प्रवास सार्वमताच्या प्रतिकुलतेत रुपांतरीत होण्यास आमची धोरणेच कारणीभूत ठरली आहे. याची सुरुवात नेहरू काळापासून झाली आणि ती खुद्द पंडीत नेहरूंनी केली. काश्मीरच्या भारतात सामिलीकरणाने आम्हाला आनंद झाला. सामिलीकरणाच्या अटी आणि शर्ती आम्ही मान्यही केल्या आणि देशांतर्गत राजकारणाच्या परिणामी त्या अटी व शर्ती आम्हाला नकोशा झाल्यात आणि त्याच्या उल्लंघनाची सुरुवात आम्हीच केली. मोदी सरकारचा कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय आणि त्यावर सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब हे त्यावेळच्या अटी आणि शर्तीचे उघडे नागडे उल्लंघन वाटत असले तरी हे निर्णय शवपेटी वर ठोकलेल्या शेवटच्या खिळ्या सारखे आहे. सामिलीकरणाच्या अटी व शर्तीची शवपेटिका तयार करण्याचे काम नेहरू काळात सुरु झाले आणि ही शवपेटिका तयार करतानाचा पहिला खिळा पहिले पंतप्रधान पंडीत नेहरूंनी ठोकला. नंतरच्या सर्व पंतप्रधानांनी आपापले योगदान देत शवपेटिकेचे काम पूर्ण केले आणि पंतप्रधान मोदींनी या शवपेटिकेवर शेवटचा खिळा ठोकला. 

सामिलीकरणाच्या वेळी जे ठरले त्याचे पालन न करण्यातून काश्मीर प्रश्न निर्माण झाला हे जनतेला समजत नाही आणि राज्यकर्त्यांना समजत असले तरी मान्य करण्याचे व मांडण्याचे धाडस त्यांचेकडे नाही. भौगोलिक आणि लोकसंख्येचे निकष हे काश्मीर भारतात सामील होण्यास प्रतिकूल असतानाही काश्मीर भारतात सामील झाले ते पंडीत नेहरू आणि शेख अब्दुल्लाची तशी इच्छा होती म्हणून. दोघांची इच्छा फार मोठा संघर्ष न करता  पूर्ण झाली ती पाकिस्तानने केलेल्या आगळीकीमुळे. काश्मीरचा राजा हरीसिंग यांची तर स्वतंत्र राहण्याची इच्छा होती आणि या इच्छेला सावरकर आणि आरेसेस यांनी खतपाणी घातले होते. पाकिस्तानने आक्रमण केल्याने राजा हरीसिंग यांना हतबल होवून भारताची मदत मागावी लागली. पाकिस्तानने आक्रमण केल्यानंतरही त्यांची इच्छा स्वतंत्र राहण्याचीच होती पण भारतात सामील झाल्याशिवाय भारत सैनिकी मदत करणार नाही हे स्पष्ट झाल्यावर राजा हरीसिंग यांनी सामिलीकरणाच्या दस्तावेजावर हस्ताक्षर केले. राजापासून स्वातंत्र्य मिळविण्याच्या चळवळीचे नेते म्हणून शेख अब्दुल्ला ओळखले जात. त्यांना सुद्धा काश्मीर स्वत:च्या कल्पनेप्रमाणे घडवायचा होता. गांधी-नेहरूच्या विचाराने ते प्रभावित होते आणि म्हणून त्यांचा कल भारताकडे होता. या मागे दोन कारणे होती. ज्या प्रकारचा काश्मीर शेख अब्दुल्लांना घडवायचा होता ते भारतात राहूनच शक्य होते. भारतातील मुस्लीम सरंजामदार व जमिनदारांनी पाकिस्तान पसंत केले होते आणि ज्या जामीन सुधारणा शेख अब्दुल्लांना राबवायच्या होत्या त्याला पाकिस्तानात विरोध झाला असता. भारतात सामील झालो नाही तर पाकिस्तान आपला घास घेईल ही भीती असल्याने शेख अब्दुल्लांचा कल भारतात सामील होण्याकडे होता.                                                                                         

काश्मीर स्वतंत्र राहणे व्यावहारिक नसल्याने शेख अब्दुल्लाने स्वतंत्र काश्मीरचा पुरस्कार केला नाही पण भारता अंतर्गत त्यांना पूर्ण स्वायत्तता हवी होती. सामिलीकरणाच्या अटी व शर्ती लक्षात घेता त्यांना हवी असलेली स्वायत्तता भारतात मिळण्याची शाश्वती होती आणि पंतप्रधान नेहरू यांचेवर पूर्ण विश्वास असल्याने शेख अब्दुल्लाने काश्मीरचे सामीलीकरण पाकिस्तान ऐवजी भारतात होण्यासाठी पुढाकार घेतला. भारतात इतर राज्यासारखे एक राज्य म्हणून काश्मीर राहील हे कधीच त्यांच्या मनात नव्हते. भारता अंतर्गत अधिकतम स्वायत्तता हीच त्यांची इच्छा आणि लक्ष्य होते. काश्मिरी जनतेला आपल्या इच्छेप्रमाणे निर्णय घेण्याचा अधिकार त्यावेळी मान्य करण्यात आला. सामिलीकरणा सोबत विलीनीकरणाचा आग्रह इतर राज्यांच्या बाबतीत धरला होता तसा काश्मीर बाबतीत भारताने धरला नाही आणि तसा आग्रह धरण्याची परिस्थिती देखील नव्हती.   

 हा प्रश्न सर्वस्वी काश्मिरी जनतेच्या इच्छेवर सोडण्यात आला आणि त्यामुळेच भारतात सामील होण्याला काश्मिरी जनतेचा विशेषत्वाने काश्मिरी मुसलमानांचा विरोध झाला नाही. काश्मीरचे भवितव्य तेथील जनता ठरवील या भारताने दिलेल्या वचनाची घटनात्मक अभिव्यक्ती म्हणून घटनेत कलम ३७० आले. असे अभिवचन देतांना नेहरू आणि इतर भारतीय नेत्यांना मात्र मनापासून काश्मीर इतर राज्या सारखाच भारताचा भाग बनावा ही इच्छा होती व कालांतराने तसे होईल ही खात्रीही होती. भारतीय नेत्यांची ही इच्छा आणि भारता अंतर्गत स्वायत्त राहण्याचा काश्मिरी जनतेचे नेते शेख अब्दुल्ला यांचा आग्रह यातून काश्मीर प्रश्नाची निर्मिती झाली. शेख अब्दुल्लांना काश्मीरच्या संविधानानुसार काश्मीरचा राज्यकारभार करायचा होता तर भारताला विशेषत: नेहरुंना भारतीय संविधान काश्मीर मध्ये लागू करण्याची घाई झाली होती. पूर्ण संविधान नाही पण किमान महत्वाच्या तरतुदी लागू व्हाव्यात यासाठी भारत सरकारचे प्रतिनिधी आणि काश्मीर सरकारचे प्रतिनिधी यांच्यात चर्चा होवून १९५२ चा नवी दिल्ली करार मान्य करण्यात आला. भारताच्या सोयीच्या आणि हिताच्या या कराराला भारतातातील हिंदुत्ववाद्यांनी केलेल्या तीव्र विरोधाचा परिणाम शेख अब्दुल्ला यांच्या बिथरण्यात झाला.  

-------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि.यवतमाळ 
मोबाईल : ९४२२१६८१५८ 

Friday, August 1, 2025

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - १३८

 पंडीत नेहरू यांच्या प्रयत्नाने काश्मीर भारतात सामील झाला हे जितके सत्य आहे तितकेच हेही सत्य आहे की स्वातंत्र्यापासून ज्या काश्मीर समस्येने भारताचा पिच्छा सोडला नाही त्या काश्मीर समस्येचा पाया पंडीत नेहरूंनीच घातला.
------------------------------------------------------------------------------------

 
कलम ३७० रद्द केल्याने काश्मीर प्रश्न संपला किंवा सुटला हा काश्मिरेतर भारतीयांचा भ्रम पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याने बऱ्याच अंशी दूर झाला पण असा दहशतवादी हल्ला प्रश्न संपला की नाही याचा मापदंड असू शकत नाही. हा हल्ला कलम ३७० शी निगडीत नाही. कधीही आणि कोणत्याही दहशतवादी गटाने किंवा संघटनेने कलम ३७० च्या पुनर्स्थापनेची मागणी केलेली नाही. काश्मीरखोऱ्यातील जनतेची ती मागणी आहे आणि त्यांनी विधानसभेसाठी झालेल्या निवडणुकीतून प्रकट केली आहे. स्वातंत्र्यानंतर काश्मिरातील घडामोडीचा जो आढावा इथे घेतला आहे त्यातून एक गोष्ट स्पष्ट होते की कलम ३७० मधील नमूद प्रक्रियेचा उपयोग करून पंडीत नेहरू पासून नरेंद्र मोदी पर्यंतच्या केंद्रातील सरकारने स्वत: मान्य केलेल्या काश्मीरच्या स्वायत्ततेचा गळा घोटण्यातून काश्मीर प्रश्न निर्माण झाला. पंडीत नेहरू यांच्या प्रयत्नाने काश्मीर भारतात सामील झाला हे जितके सत्य आहे तितकेच हेही सत्य आहे की स्वातंत्र्यापासून ज्या काश्मीर समस्येने भारताचा पिच्छा सोडला नाही त्या काश्मीर समस्येचा पाया पंडीत नेहरूंनीच घातला. काश्मीर बाबत ज्या करणासाठी संघ,जनसंघ किंवा भारतीय जनता पार्टी नेहरुंना सातत्याने दोष देत आली त्या बाबतीत पंडीत नेहरू पूर्णपणे निर्दोष आहेत. नेहरूंनी काश्मीरचे भवितव्य निश्चित करण्यासाठी सार्वमताला मान्यता दिली, काश्मीरचा प्रश्न संयुक्त राष्ट्र संघात नेला , पाकव्याप्त काश्मीर न घेताच शस्त्रसंधी केली आणि कलम ३७० चे निर्माता नेहरू आहेत आणि यातून काश्मीरचा प्रश्न निर्माण झाला आणि याला सर्वस्वी नेहरू जबाबदार ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व त्याच्या राजकीय शाखेचे म्हणजे जनसंघ-भारतीय जनता पार्टीचे मत. १९५२ पासून ते वर्तमान काळापर्यंत हिरीरीने आणि चिकाटीने ही मंडळी असे मत मांडत आली आहे. याला प्रत्युत्तर देण्याच्या भानगडीत कॉंग्रेस मागे राहिल्याने सर्वसामान्य जनताही या मताची बनत गेली. नेहरू संघ परिवार म्हणतो त्या कोणत्याही बाबतीत दोषी नाहीत आणि तरीही त्यांनी काश्मीर समस्येचा पाया घातला तो कसा हे नीट समजून घेतले तर काश्मीरची नेमकी समस्या आपल्या लक्षात येईल.                                                   

काश्मीर प्रश्न संयुक्त राष्ट्रात नेण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय असला तरी त्यात प्रमुख भूमिका नेहरूंची होती हे खरे. काश्मीरवर व पर्यायाने भारतावर पाकिस्तानने आक्रमण केले आहे आणि त्या बाबतीत पाकिस्तानला दोषी ठरवून आपल्या हद्दीत परत जाण्याचा आदेश द्या अशी तक्रारवजा मागणी भारताने संयुक्त राष्ट्राकडे केली. भारताने संयुक्त राष्ट्राकडे न जाता पाकिस्तानने ताब्यात घेतलेला भाग जिंकून घ्यायला हवा होता असा संघ परिवाराने निर्माण केलेला मतप्रवाह आहे. असे म्हणण्यामागे भारताने युद्ध थांबवून संयुक्त राष्ट्राकडे धाव घेतली असा समज या मागे आहे जो खरा नाही. भारत संयुक्त राष्ट्रात गेला तरी काश्मिरात युद्ध चालूच होते. राजा हरीसिंग यांनी काश्मीर भारतात सामील करण्याच्या सामीलनाम्यावर सही करेपर्यंत [२६ ऑक्टोबर १९४७] पाकिस्तानी घुसखोर श्रीनगरच्या सीमेजवळ पोचले होते. भारतीय सैन्य दुसऱ्या दिवशी श्रीनगरला उतरले आणि घूसखोरा विरुद्ध लढाई सुरु केली. ही लढाई सुरु असताना भारताने १ जानेवारी १९४८ रोजी पाकिस्तानी आक्रमणा विरुद्ध तक्रार नोंदविली. तक्रार नोंदविल्या नंतरही युद्ध सुरूच ठेवले. भारताच्या तक्रारीवर संयुक्त राष्ट्र संघाने ४ महिन्या नंतर निर्णय घेत ठराव केला. या ठरावात तेच होते ज्याची मागणी भारताने केली होती. संयुक्त राष्ट्र संघाने पाकिस्तानला सर्व घुसखोरांना व आपल्या सैन्याला परत घ्यायला सांगितले तर भारताने गरजेपुरते सैन्य काश्मीरमध्ये ठेवून अतिरिक्त सैन्य परत घ्यायला सांगितले. याचा अर्थ स्पष्ट आहे संयुक्त राष्ट्रसंघाने भारताची तक्रार खरी मानून पाकिस्तानला आक्रमक ठरवले आणि परत जायला सांगितले. ठरावातला दुसरा मुद्दा होता काश्मीरच्या जनतेला भारतात राहायचे की पाकिस्तानात याचा निर्णय घेण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाच्या देखरेखीखाली सार्वमत घेण्याचा. भारताने तर सामिलीकरणाच्या वेळीच सार्वमत घेण्याचे मान्य केले होते त्यामुळे या मुद्द्यावरही भारताच्या म्हणण्यानुसार निर्णय झाला. मग संयुक्त राष्ट्र संघात भारता विरोधात कोणताच निर्णय झाला नसताना संयुक्त राष्ट्रसंघात जाण्याची चूक झाली असे कसे म्हणता येईल.                                                                                                                   
भारत संयुक्त राष्ट्र संघात जाण्याआधी दोन महिने युद्ध सुरु होते, संयुक्त राष्ट्र संघाचा ठराव ४ महिन्यानंतर झाला तेव्हाही युद्ध चालूच होते आणि हा ठराव झाल्या नंतरही तब्बल ९ महिने युद्ध चालू होते! श्रीनगर पर्यंत आलेल्या पाकिस्तानी घुसखोर आणि सैनिकांना मागे ढकलत भारतीय सेनेने दोन तृतीयांश भागावर कब्जा मिळविला. मोठा भूभाग पाकिस्तानच्या ताब्यातून परत मिळविल्या नंतर हवामान व भौगोलिक परिस्थितीमुळे पुढे जाण्यात अडथळा निर्माण झाला होता. दोन दिवस नेहरूंनी युद्धविराम टाळला असता तर पाकव्याप्त काश्मीर भारताच्या ताब्यात आला असता हा निव्वळ अपप्रचार आहे. पाकिस्तान विरूद्धचे १९६५ चे युद्ध १७ दिवस आणि १९७१ चे युद्ध १३ दिवस चालले हे लक्षात घेतले तर अत्यल्प संसाधने असताना १५ महिने युद्ध चालल्याने त्यावेळच्या परिस्थितीत किती ताण आला असेल याची कल्पना येईल. संयुक्त राष्ट्र संघाने ऑगस्ट १९४८ मध्ये आपल्या मूळ ठरावाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने भारत आणि पाकिस्तानशी चर्चा केली. दोन्ही देशांनी सार्वमत घेवून काश्मीर प्रश्न सोडवायला मान्यता दिल्याने युद्ध चालू ठेवणे शहाणपणाचे नव्हते म्हणून भारताने शस्त्रसंधी स्वीकारली. पुढे पाकिस्ताननेच सैन्य मागे घेण्यास नकार दिल्याने सार्वमत घेता आले नाही. या सगळ्या प्रकरणात भारताची कोणती चूक झाली असेल तर ती ही होती की संयुक्त राष्ट्र संघाचा तो ठराव अंमलात यावा यासाठी भारताकडून विशेष प्रयत्न झाले नाहीत. संयुक्त राष्ट्र संघात अमेरिका व इंग्लंडची त्यावेळची दादागिरी बघून पंडीत नेहरूंचा संयुक्त राष्ट्र संघा बद्दल मोह्भंग झाला व आपण उगीच संयुक्त राष्ट्राचे दार ठोठावले अशी त्यांची भावना झाली होती. असे असले तरी  संयुक्त राष्ट्र संघात गेल्यामुळे कुठलाही आपल्या हिताच्या विपरीत निर्णय आपल्याला मान्य करावा लागलेला नाही. उलट आपल्याला पाहिजे तसा ठराव संयुक्त राष्ट्र संघाने केला .आधी त्या ठरावाला पाकिस्तानने मान्यता दिली पण नंतर अंमलबजावणी करण्याचे टाळले. त्यामुळे संयुक्त राष्ट्र संघात जाण्याचा भारताला फारसा फायदा झाला नाही असे म्हणता येईल. पण गेल्याने तोटा झाला असे म्हणायला काहीच आधार नाही. संयुक्त राष्ट संघात जाणे हे पाकिस्तानला आक्रमक ठरवून त्याला मागे जाण्याचा आदेश देण्याच्या मर्यादे पर्यंत होते. ज्याला काश्मीर प्रश्न म्हणतो तो सोडविण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाला मध्यस्थी करण्यास तेव्हा किंवा नंतर कधीही भारताकडून सांगण्यात आले नाही किंवा मध्यस्थी स्वीकारण्यात आली नाही. संयुक्त राष्ट्र संघात जाण्याने आपला कोणताही तोटा झाला नसताना नेहरुंना दुषणे देणे चुकीचे आहे. पण नंतर जे नेहरूंनी केले त्यातून काश्मीर प्रश्न निर्माण झाला. 


------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि. यवतमाळ 
मोबाईल - ९४२२१६८१५८ 

Friday, July 25, 2025

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - १३७

 

काश्मीर समस्येचे मूळ कलम ३७० मध्ये नसून काश्मीर समस्येचे समाधान कलम ३७० मध्ये आहे हे जो पर्यंत आपण समजून घेत नाही तो पर्यंत काश्मीर प्रश्न आपल्याला चकवा देत राहणार आहे. 
----------------------------------------------------------------------------------------


केंद्र सरकार कलम ३७० रद्द करून काश्मीर प्रश्न सोडविल्याचा दावा आणि कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयाचे काश्मिरी जनतेने स्वागत केल्याचा किंवा तो निर्णय स्वीकारल्याचा केलेला दावा काश्मीर खोऱ्यातील परिस्थितीशी मेळ खाणारा नसल्याचे आपण बघितले. काश्मीर समस्येच्या मुळाशी कलम ३७० आहे आणि ते का एकदा रद्द केले की समस्या संपेल ही धारणा जनसंघ, संघ आणि भारतीय जनता पक्ष यांची प्रारंभापासून राहिली आहे. त्यामुळे त्यांच्या दृष्टीने जी समस्या होती ती त्यांनी निकालात काढली आणि त्यांच्या दृष्टीने त्यांनी काश्मीर प्रश्न संपविला. हे फक्त त्यांचेच म्हणणे आहे असे नाही. काश्मिरेतर भारतीय जनतेचे सर्वसाधारणपणे तेच मानणे आणि म्हणणे आहे. कारण भारतीय जनता स्वातंत्र्य मिळाले तेव्हापासून काश्मीर बाबत जो प्रचार करत आली त्याचा बळी ठरली आहे. त्या प्रचाराला कधी कोणी समर्थपणे आणि सातत्याने उत्तर न दिल्याने संघपरिवाराचा एकतर्फी प्रचार खोलवर बिंबला गेल्याचा हा परिणाम आहे. सर्वसामान्यच नाही तर अभिजनही या प्रचाराला बळी पडले आहेत. याचा अस्सल पुरावा म्हणजे कलम ३७० रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयाची सर्वोच्च न्यायालयाने केलेली पाठराखण आहे. १९४७ पासून संघपरिवाराचा असा प्रचार एकीकडे आणि दुसरीकडे  १९४७ पासून देशात जी सरकारे आली त्यांनी काश्मीर प्रश्न सोडविण्याचा केलेला प्रयत्न बघितला तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार वगळता कोणत्याही सरकारने कलम ३७० ला काश्मीर समस्येचे मूळ मानले नव्हते हे लक्षात येईल. ही फक्त कॉंग्रेसचीच सरकारे नव्हती तर कॉंग्रेसेतर मोरारजी देसाई यांचे सरकार , चंद्रशेखर, देवेगौडा पासून व्हि.पी. सिंगचे सरकार आणि दस्तुरखुद्द अटलबिहारी बाजपेयी यांचे सरकार यांची भूमिका कधीच कलम ३७० च्या विरोधी राहिली नाही . यातील  प्रत्येक कॉंग्रेसेतर सरकारला संघपरिवाराचा आतून किंवा बाहेरून पाठींबा राहिलेला आहे.                                       

कॉंग्रेस किंवा कॉंग्रेसेतर सरकारांना काश्मीरचे नेमके दुखणे काय याची जाणीव होती. या दुखण्यावरचे औषध त्यांना माहित नव्हते असेही नाही. या औषधाने काश्मीरचे दुखणे थांबलेही असते पण या औषधाची काश्मिरेतर भारतीय जनतेवर तीव्र प्रतिक्रिया उमटेल ही भीती प्रत्येक सरकारला वाटत होती. त्यामुळे रोगाचे निर्मुलन करणारे औषध देण्याऐवजी रोग काबूत राहील अशी औषधे देण्याचा प्रयत्न झाला. याचाही फायदा उठवत संघ-भाजपने असा प्रचार केला की आजवर सगळय सरकारने वाटाघाटी, बोलणी करण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. खरी गोष्ट अशी आहे की समस्येच्या मुळाशी भिडण्याचा एकतर प्रयत्नच झाला नाही किंवा ज्या पंतप्रधानांनी समस्येच्या मुळाशी भिडण्याचा प्रयत्न केला त्यांनी तो मधेच सोडून दिला. याचा भारतीय जनतेच्या मानसिकतेवर असा परिणाम झाला की इतर कोणतेही उपाय प्रभावी सिद्ध झाला नाही. कलम ३७० रद्द करणे हाच उपाय यावरचा असू शकतो. त्यामुळे कलम ३७० रद्द करण्याचा मोदी सरकारचा निर्णय जनतेला आवडला. आता कलम ३७० रद्द झाले. कलम ३७० रद्द होवून ६ वर्षे झालीत आणि सरकारच्या त्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब करून वर्ष झालं पण कलम ३७० रद्द करण्यापूर्वी आम्ही जिथे होतो तिथेच उभे असल्याचे हळूहळू जनतेच्या लक्षात येवू लागले आहे. काश्मीर समस्येचे मूळ कलम ३७० मध्ये नसून काश्मीर समस्येचे समाधान कलम ३७० मध्ये आहे हे जो पर्यंत आपण समजून घेत नाही तो पर्यंत काश्मीर प्रश्न आपल्याला चकवा देत राहणार आहे. 

आपल्या संविधानकारांनी कलम ३७० ची जी रचना केली आहे ती नीट समजून घेतली तर नरेंद्र मोदी सरकारची कृती आणि त्या कृतीवर शिक्कामोर्तब करणारा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय त्या रचनेची प्रतारणा करणारा असल्याचे लक्षात येईल. कलम ३७० मधील शब्द न शब्द नीट समजून घेतला तर आपल्या लक्षात येईल की काश्मीर संबंधी कोणताही निर्णय भारत सरकार व भारताची संसद घेवू शकत नाही. काश्मीर संबंधी जो काही निर्णय होईल तो काश्मिरी जनतेच्या इच्छेने आणि संमतीनेच होईल. कलम ३७० ची अशी रचना करताना आणि ती स्वीकृत करताना संविधान सभेचे सर्व सदस्य अनुकूल होते असे नाही. पण काश्मीरच्या जनतेशी केलेला करार , भारतात काश्मीरला सामील करून घेताना दिलेला शब्द पाळला गेला पाहिजे या बाबतीत त्यांचे एकमत होते. म्हणून इतर राज्यासारखाच काश्मीर देखील भारताचा भाग असला पाहिजे असे मनोमन वाटत असताना संविधान सभेने आपली इच्छा काश्मिरी जनतेवर लादली नाहीच शिवाय कलम ३७० द्वारे अशी तरतूद केली की केंद्रात येणाऱ्या सरकारांनाही त्यांची इच्छा काश्मिरी जनतेवर लादता येणार नाही.                                                           

भारताच्या संविधान सभेने काश्मिरी जनतेच्या इच्छेचे व काश्मिरी जनतेच्या मताचे प्रकटीकरणाचे माध्यम म्हणून जम्मू-काश्मीरच्या सरकारला नव्हे तर जम्मू-काश्मीरच्या निर्वाचित संविधान सभेला मान्यता दिली होती. कलम ३७० स्वीकृत झाले तेव्हा जम्मू-काश्मीरची संविधान सभा अस्तित्वात नव्हती. म्हणून संविधान सभा अस्तित्वात येईपर्यंत जम्मू-काश्मीरचे सरकार व केंद्र सरकार यांच्यात जे काही करार होतील किंवा जम्मू-काश्मीर संबंधी जे निर्णय होतील त्याला जम्मू-काश्मीरच्या संविधान सभेने मान्यता दिली तरच ते अंतिम समजण्यात येतील असे ठरले होते. त्यावेळचे अंतरिम भारत सरकार व काश्मीरचे प्रतिनिधी यांच्यातील वाटाघाटीतून कलम ३७० आकाराला आले असले तरी त्या कलमा संबंधी अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार भारतीय संविधान सभेने जम्मू-काश्मीर संविधान सभेला बहाल केला होता. वैधानिक दृष्ट्या जम्मू-काश्मीरचे भवितव्य निश्चित करणारी अंतिम संविधानिक संस्था ही जम्मू-काश्मीरची संविधान सभा होती. भारतीय संविधान सभेने हा अधिकार ना आपल्याकडे ठेवला ना भारत सरकारला बहाल केला ना जम्मू-काश्मीर सरकारला दिला. त्यामुळे जम्मू-काश्मीर संविधान सभेने स्वत:ला विसर्जित करण्याच्या क्षणापर्यंत जे काही निर्णय जम्मू-काश्मीर संबंधी घेतलेत ते अंतिम ठरतात. तेव्हा केंद्र सरकारने व भारतीय संसदेने कलम ३७० बाबत जो निर्णय घेतला तो भारतीय संविधान सभेच्या निर्णयाच्या विरुद्ध आणि विपरीत आहे.  भारतीय संविधान सभेने काश्मीरचे भवितव्य ठरविण्याचा अधिकार काश्मिरी जनतेला दिला असताना काश्मीर संबंधी कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय कोणी घेतला तर उर्वरित भारतीय जनतेच्या प्रतिनिधींनी ! एक प्रकारे हा निर्णय काश्मिरी जनतेवर लादण्यात आला आहे. संविधान सभेच्या निर्णयाचा आणि भावनेचा आदर ना सरकारने केला ना सर्वोच्च न्यायालयाने. सध्याच्या सरकारने व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने काश्मीर समस्या सुटलेली नसून समस्या अधिक गुंतागुंतीची बनली आहे. 

----------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि. यवतमाळ 
मोबाईल - ९४२२१६८१५८ 

Friday, July 18, 2025

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - १३६

 लोकांच्या मनातील आणीबाणी विरोध रस्त्यावर प्रकट होवू शकला नाही पण संधी मिळताच मतपेटीतून तो व्यक्त झाला. काश्मीरमध्येही तेच घडले. जेव्हा मतदान करण्याची संधी मिळाली तेव्हा काश्मिरी जनतेने कलम ३७० चे समर्थन करणाऱ्या व त्या कलमाची पुनर्स्थापना करण्यासाठी लढण्याची तयारी असलेल्या पक्षाचे समर्थन करून कलम ३७० रद्द करण्याला असलेला विरोध व्यक्त केला. 
-----------------------------------------------------------------------------------


कलम ३७० रद्द करण्यावेळी काश्मीर खोऱ्यातील परिस्थिती आणि १९७५ साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पुकारलेल्या आणीबाणी नंतरची परिस्थिती याची तुलना आणखी एका मुद्द्याच्या बाबतीत केली तर कलम ३७० रद्द केल्यानंतर खोऱ्यात जनतेचा उठाव का झाला नाही हे लक्षात येईल. आणीबाणी पुकारल्यानंतर देशभरात जी धरपकड झाली त्याचे निश्चित असे निकष होते. पहिला निकष होता जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनात सक्रीय राजकीय पक्ष आणि संघटना यांच्याशी संबंधित कार्यकर्ते, दुसरे ज्यांना अटक झाली ते होते आनंदमार्गी आणि काळाबाजार करणारे लोक. एखाददुसरा अपवाद वगळता अटकेच्या बाबतीत हे निकष पाळले गेले आणि हे सगळे काम स्थानिक पोलिसांनीच केले. काश्मीरमध्ये कलम ३७० रद्द करताना झालेल्या धरपकडीला असे कोणतेच निकष नव्हते. तेथील राजकीयदृष्ट्या सक्रीय नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना पकडलेच पण ज्यांचा राजकारणाशी संबंध नसलेल्या अनेक प्रतिष्ठीत व्यावसायिकांना अटक केली गेली. आणीबाणी काळात ज्यांना अटका झाल्यात त्यांना कोणत्या तुरुंगात ठेवणार याची कुटुंबियांना माहिती असायची. अटक केल्यानंतर गरजेचे समान घरून घेण्यासाठी अटक करणाऱ्याला पोलीस त्याच्या घरी न्यायचे. काश्मीरखोऱ्यात कधी कोणाला पोलीसठाण्यात बोलावले जाईल याचा नेम नसायचा. अंगावरच्या कपड्यांखेरीज ज्यांना अटक होईल त्यांच्याकडे समान नसायचे. कोठे ठेवण्यात आले याची कुटुंबियांना माहिती नसायची. कोठे ठेवण्यात आले हे कळायलाच काही दिवस लागायचे. त्यावेळी ज्यांना अटक झाली त्यापैकी अनेकांना काश्मीर बाहेरच्या तुरुंगात ठेवण्यात आले होते. तेथे जावून भेटणे अजिबात सोपे नव्हते. आणीबाणीत निकष पळून केलेल्या अटकांमुळे किती दहशत पसरली होती हे तो काळ अनुभवणाऱ्या लोकांकडून कळेल.                                                                                                                     


आणीबाणीपूर्वी लाखांच्या सभा आणि लाखांचे मोर्चे ही नित्य बाब बनली होती. पण आणीबाणी जाहीर झाली आणि त्या आणीबाणीचा विरोध करण्यासाठी ना सभा झाल्या ना मोर्चे निघाले. जे लाखो लोक मोर्चात सामील व्हायचे, सभेला आवर्जून हजर राहून टाळ्या वाजवायचे त्या सर्वाना तर अटक नव्हती झाली पण त्यांच्या पैकी कोणी आणीबाणीचा विरोध करायला रस्त्यावर आले नाहीत. त्यावेळी तर सैन्यही रस्त्यावर नव्हते. कोणी रस्त्यावर आले नाही , आंदोलन केले नाही याचा अर्थ लोकांनी आणीबाणीचे स्वागत केले असा होत नाही. सरकारी दूरदर्शन व आकाशवाणीने मात्र त्यावेळी तसा प्रचार केला होता. आणीबाणी विरोधात त्यावेळी स्वयंस्फूर्त उठाव झाला नाही. आणीबाणीला विरोध करण्यासाठी पहिल्या सहा महिन्यात प्रयत्नपूर्वक सत्याग्रह झालेत ज्यात सामील होणाऱ्याची  संख्या अत्यल्प होती. त्यानंतर तसे सत्याग्रहही बंद झाले होते. याचा अर्थ लोकांनी आणीबाणी स्वीकारली होती असा नव्हता. पण प्राप्त परिस्थितीत आपण काहीही करू शकत नाही ही अगतिकता, हतबलता आणि निराशा सर्वव्यापी होती. कलम ३७० रद्द करण्यावेळी उचलण्यात आलेली पाउले आणीबाणी पेक्षा कठोर आणि कायद्याची तमा न बाळगणारी होती. शिवाय पावलोपावली सुरक्षादलाचे जवान तैनात होते. आणीबाणीच्या तुलनेत काश्मीर मध्ये अधिक विपरीत परिस्थितीचा सामना तेथील जनतेला करावा लागला .त्यामुळे कलम ३७० रद्द झाले तेव्हा विरोधाच्या स्वयंस्फूर्त अशा तुरळक घटना वगळता जनता मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरू शकली नाही. त्यामुळे आणीबाणी काळा सारखाच सगळ काही सुरळीत असल्याचा प्रचार झाला. लोक रस्त्यावर उतरले नाही याचा अर्थ कलम ३७० रद्द करणे त्यांनी मान्य केले एवढेच नाही तर स्वागत केले असा प्रचार आपण ऐकला आहे. लोकांच्या मनातील आणीबाणी विरोध रस्त्यावर प्रकट होवू शकला नाही पण संधी मिळताच मतपेटीतून तो व्यक्त झाला. काश्मीरमध्येही तेच घडले. जेव्हा मतदान करण्याची संधी मिळाली तेव्हा काश्मिरी जनतेने कलम ३७० चे समर्थन करणाऱ्या व त्या कलमाची पुनर्स्थापना करण्यासाठी लढण्याची तयारी असलेल्या पक्षाचे समर्थन करून कलम ३७० रद्द करण्याला असलेला विरोध व्यक्त केला. 

जम्मू-काश्मीर राज्य एकसंघ असताना लडाख मधील जनतेला सरकार आपले ऐकत नाही किंवा आपल्या हिताकडे लक्ष देत नाही असे वाटत होते. जम्मू आणि काश्मीरपासून आपल्याला वेगळे करण्यात यावे ही त्यांची आधीपासूनची भावना होती. त्यामुळे त्यानाही कलम ३७० नको होते. जेव्हा कलम ३७० रद्द करण्याची घोषणा झाली तेव्हा त्याचे व्यापक स्वागत लडाख मध्ये झाले होते. जम्मू-काश्मीर राज्यापासून वेगळे झाल्याचा त्यात आनंद अधिक होता. कलम ३७० मुळे लडाखचे वेगळेपण कायम राखण्यासाठी घटनेचे सहावे शेड्युल लागू करता येत नव्हते हे त्यांचे कलम ३७० ला विरोध असण्याचे मुख्य कारण होते. जम्मू-काश्मीर विधानसभेत कमी लोकसंख्येमुळे लडाखचे प्रतिनिधित्व कमी असल्याने लडाखकडे सतत दुर्लक्ष होत आले हे विरोधाचे दुसरे कारण होते. पण कलम ३७० रद्द झाल्या नंतरच्या ५ वर्षाच्या काळात लडाख मधील जनतेचा पूर्ण भ्रमनिरास झाला. आजच्यापेक्षा कलम ३७० लागू होते तेव्हाची परिस्थिती चांगली होती म्हणण्याची पाळी लडाखमधील जनतेवर आली. कारण कलम ३७० लागू असताना संपूर्ण जम्मू-काश्मीर राज्यात कलम ३५ अ चा अंमल होता. त्यामुळे बाहेरचे लोक येवून जमिनी खरेदी करण्याची भीती नव्हती. बाहेरच्याना नोकरी मिळणे शक्य नव्हते. कलम ३७० रद्द करण्यासोबत हे संरक्षण गेल्याने लडाख मधील जनता असुरक्षित बनली. घटनेचे सहावे शेड्युल लागू करण्याची मागणीने त्यातून जोर पकडला. कलम ३७० रद्द झाल्यानंतर सर्वात मोठे जनआंदोलन कुठे उभे राहिले असेल तर ते लडाख मध्ये राहिले. सोनम  वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली हजारो लडाखी स्त्री-पुरुष रस्त्यावर उतरले. तापमान शून्याच्या खाली असताना सोनम वांगचुक यांनी २४ दिवस उपोषण केले. हजारो महिला साखळी उपोषणात सामील झाल्या. हा लढा कलम ३७० च्या पुनर्स्थापनेसाठी नव्हता हे खरे पण कलम ३७० लागू असताना जम्मू-काश्मीर बाहेरच्या लोकांपासून जे संरक्षण होत होते तशाच प्रकारच्या संरक्षणाची व स्वशासनाची मागणी आंदोलनकर्त्याची होती आणि आहे. ज्या लडाखमध्ये कलम ३७० रद्द करण्याचे उघड स्वागत झाले होते त्या लडाख मध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकात आघाडी कोणी घेतली तर ती कलम ३७० चे समर्थन करणाऱ्या व त्या कलमाची पुनर्स्थापना झाली पाहिजे अशी आग्रही मागणी करणाऱ्या नँशनल कॉन्फरन्सने ! लडाख मध्ये झाले तसे आंदोलन जम्मू विभागात झाले नाही पण त्या विभागातील लोकांची देखील बाहेरच्यांना नोकरीत घेण्यात येवू नये व मालमत्ता खरेदी करता येवू नये अशी मागणी जाहीरपणे केलेली आहे. कलम ३७० रद्द करायला विरोध नाही पण कलम ३७० अंतर्गत या विभागांना मिळणारे संरक्षण मात्र कायम राहिले पाहिजे अशी जम्मू व लडाख मधील जनतेची भावना आहे. काश्मीर खोऱ्यातील मुस्लीम बहुल जनतेचे सोडा पण कलम ३७० रद्द करण्याच्या संघ-भाजपच्या मागणीला पाठींबा देणाऱ्या गटांनाही कलम ३७० चे महत्व नव्याने लक्षात येवू लागले आहे भलेही ते कलम ३७० रद्द करणे चुकीचे होते असे म्हणत नसतील. 

-------------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि. यवतमाळ 
मोबाईल : ९४२२१६८१५८