Thursday, October 23, 2025

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - १४८

नेहरूंनी आपल्या काश्मीर विषयक धोरणातील चूक दुरुस्त करण्यास मदत करण्यासाठी शास्त्रीजींना बोलावले खरे पण पंतप्रधान झाल्यावर शास्त्रीजींनी नेहरुंना आपल्या धोरणात चूक झाली असे वाटत होते ती चुकीची धोरणेच त्वेषाने राबविली.
----------------------------------------------------------------------------------------------

आयुष्याच्या शेवटी काश्मीर धोरणातील चूक पंडीत नेहरूंच्या लक्षात आली होती. चूक दुरुस्त करण्याची सुरुवात म्हणून त्यांनी शेख अब्दुल्लांची तुरुंगातून बिनशर्त सुटका केली होती. काश्मीर प्रश्नावर शेख अब्दुल्लंचा नेहरू सोबत आणि इतर भारतीय व पाकिस्तानी नेत्यांसोबत विचारविनिमय सुरु असतानाच नेहरुंना मृत्यूने गाठले आणि काश्मीर प्रश्नावर तोडगा काढण्याची प्रक्रिया तिथेच थंडावली. कोणकोणत्या पर्यायाचा विचार झाला हे अधिकृतपणे कधीच समोर आले नाही. काश्मीर प्रश्नाचे मूळ मात्र लक्षात आले होते. काश्मीरच्या स्वायत्ततेचा संकोच व काश्मीरच्या जनतेची तयारी झालेली नसताना भारतीय संविधान लादण्याच्या चुकीतून काश्मीर प्रश्न तयार झाला हे नेहरुंना पुरतेपणी उमगले होते. नेहरूंनी जी चूक केली ती सुधारण्याची संधी नेहरुंना नियतीने दिली नाही पण त्यांच्या नंतर पंतप्रधानपदी येणाऱ्यानी ती चूक दुरुस्त करणे अपेक्षित होते. त्यांच्या नंतर पंतप्रधानपदी आरूढ झालेल्या लाल बहादूर शास्त्री यांना नेहरूंच्या बदललेल्या काश्मीर विषयक धोरणाची स्पष्ट कल्पना होती व ते धोरण अंमलात आणण्यासाठी कॉंग्रेसमध्ये शास्त्रीजी समर्थ असल्याचा पंडीत नेहरूंचा विश्वास होता. शेख अब्दुल्ला यांची सुटका करून दिल्लीत आमंत्रित करताना नेहरूंनी आणखी एक निर्णय घेतला होता. कामराज योजनेमुळे नेहरू मंत्रीमंडळातून बाहेर पडलेल्या मंत्र्यात लाल बहादूर शास्तींचा समावेश होता. मंत्रिमंडळातून बाहेर पडल्या नंतर शास्त्रीजी आपल्या राज्यात परतले होते. शेख अब्दुल्लांना दिल्लीत बोलावताना नेहरूंनी कॉंग्रेस पक्षाला विशेष विनंती करून शास्त्रीजींना दिल्लीत परत बोलावले होते. काश्मीरप्रश्नावर तोडगा काढायला शेख अब्दुल्लांना मदत करण्यासाठी मुद्दामहून लाल बहादूर शास्त्रींना दिल्लीत बोलावले होते. यातून नेहरूंचा शास्त्रीजी वरील विश्वास व्यक्त झाला होता आणि नेहरूंचा उत्तराधिकारी म्हणून शास्त्रीजीची निवड होण्यामागे हा विश्वासच कारणीभूत ठरला. नेहरूंनी आपल्या काश्मीर विषयक धोरणातील चूक दुरुस्त करण्यास मदत करण्यासाठी शास्त्रीजींना बोलावले खरे पण पंतप्रधान झाल्यावर शास्त्रीजींनी नेहरुंना आपल्या धोरणात चूक झाली असे वाटत होते ती चुकीची धोरणेच पुढे राबविली. 

पंडीत नेहरूंच्या कार्यकाळात भारतीय संविधानाची जवळपास सर्वच महत्वाची कलमे काश्मीर मध्ये लागू झाली तरी तुलनेने त्यांच्या कार्यकाळात काश्मीर शांत ठेवण्यात ते यशस्वी राहिले. शेख अब्दुल्लांच्या अटकेनंतर झालेली विरोध प्रदर्शने आणि हजरत बाल चोरीला जाण्यावरून झालेले प्रखर आंदोलन वगळता नेहरू काळात काश्मिरात शांतता नांदत होती. कोणत्याही काश्मिरी संघटनेने या काळात पाकिस्तान मध्ये सामील होण्याची मागणी किंवा त्यासाठी आंदोलन केले नाही. सार्वमताची मागणी मात्र या काळात होवू लागली. ही मागणीही शेख अब्दुल्लांच्या अटकेमुळे पुढे आली आणि शेख अब्दुल्लांच्या समर्थकांनीच ही मागणी लावून धरली. सार्वमताची मागणी म्हणजे पाकिस्तानात सामील होण्याची मागणी असा चुकीचा अर्थ राजकीय सोयीसाठी काढण्यात आला तरी जनतेकडून अशी मागणी झाली नव्हती. शेख अब्दुल्लांची सुटका आणि शेख अब्दुल्लांना हवी असलेली स्वायत्तता नवी दिल्लीने द्यावी यासाठीची दबावनिती म्हणून सार्वमताची मागणी होत होती. काश्मीरमधील असंतोषाचे उद्रेकात रुपांतर न होण्या मागचे एक महत्वाचे कारण हे होते की नवी दिल्लीला हवी असलेली धोरणे काश्मिरात राबविणारे सर्व काश्मिरीच होते. काश्मीरमध्ये बाहेरचे म्हणता येईल असे लष्कर होते पण ते बराकीत होते आणि सामिलनाम्यातील अटी-शर्तीनुसार ते काश्मिरात असल्याने त्यावर कोणाचा आक्षेप नव्हता. नेहरू काळात भारतीय संविधानाच्या बहुतांश तरतुदी काश्मिरात लागू झाल्या असल्या तरी काश्मीरच्या प्रशासकीय यंत्रणेत काश्मीर बाहेरचे कोणीही नव्हते. नवी दिल्लीचा हस्तक्षेप उघड नव्हता तर पडद्याआडून होता. त्यामुळे काश्मिरी जनतेची नाराजी शेख अब्दुल्लांना बाजूला सारून सत्तेत येणाऱ्या काश्मिरी नेतृत्वाविरुद्ध नवी दिल्लीपेक्षा अधिक होती. भारतापासून फुटून निघण्याचे फुटीरतावादी आंदोलन नेहरू काळात मूळ धरू शकले नाही ते या कारणाने. काश्मिरातील सत्तेतून आणि सरकारातून शेख अब्दुल्ला समर्थकांना वगळले असले तरी जनमत मात्र शेख अब्दुल्लांच्या पाठीशी होते. उशिरा का होईना नेहरूंच्या हे लक्षात आले आणि तोडग्यासाठी शेख अब्दुल्लांना पुढे केले.                                     

अनुभवाअंती काश्मीर विषयक नेहरू नीतीत झालेला बदल नेहरू नंतर येणाऱ्या पंतप्रधानांनी लक्षात न घेता जुनी धोरणे पुढे रेटून काश्मीर प्रश्न अधिक तीव्र आणि गुंतागुंतीचा केला. शेख अब्दुल्लांच्या सहकार्याने काश्मीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मदतनीसाच्या भूमिकेत काम करण्यासाठी नेहरूंनी शास्त्रीजींना दिल्लीत बोलावले पण दोन महिन्याच्या आतच पंडीतजीचा मृत्यू झाला आणि शास्त्री पंतप्रधान बनले. पंतप्रधान बनल्या नंतर शास्त्रींनी नव्या नेहरू मताला किंवा नीतीला तिलांजली देत आधीची नेहरू नीती जोरकसपणे अंमलात आणली. स्वायत्त काश्मीर ऐवजी भारतातील इतर राज्या सारखेच काश्मीर एक राज्य बनले पाहिजे या दिशेने पाउले उचलली. शेख अब्दुल्ला यात अडथळा ठरणार हे गृहीत धरून शास्त्रीजींनी शेख अब्दुल्लांना जुन्याच केस मध्ये पुन्हा तुरुंगात पाठवले. भारतीय संविधान काश्मीर मध्ये लागू करताना पडद्याआड राहण्याचे जे पथ्य नेहरूंनी पाळले होते ते पाळण्याची शास्त्रींना गरज वाटली नाही. केंद्राच्या उघड हस्तक्षेपाच्या दिशेने त्यांची पाउले पडली. त्यांनी जम्मू-काश्मीर सरकारला राज्याची घटना दुरुस्ती करायला भाग पाडून इतर राज्यापेक्षा वेगळे असलेले मुख्यमंत्री ऐवजी पंतप्रधानपद आणि राज्यपाल ऐवजी असलेले सदर ए रियासत पद रद्द करण्याची शिफारस राष्ट्रपतींना करायला भाग पाडले. काश्मीरचे सदर ए रियासत हे इतर राज्याच्या राज्याच्या समकक्ष पद मानले जात असले तरी त्यात एक महत्वाचा फरक होता. सदर ए रियासत या पदावरील व्यक्ती निवडणुकीच्या मार्गाने राज्याची विधानसभा निवडत असे. या दुरुस्तीने केंद्राला राज्यपाल म्हणून आपला प्रतिनिधी राज्यात तैनात करण्याचा मार्ग मोकळा झाला. 
----------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि. यवतमाळ 
मोबाईल : ९४२२१६८१५८ 

Friday, October 10, 2025

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर -१४७

 
हजरत बाल मशिदीत ठेवलेला पैगंबराचा पवित्र केस चोरी जाण्याच्या घटनेच्या निमित्ताने काश्मिरात उद्रेक झाला आणि जनता रस्त्यावर उतरली. निमित्त धार्मिक होते पण उद्रेक राजकीय होता. या घटनेने नेहरुंना काश्मीर विषयक आपल्या धोरणाचा फोलपणा लक्षात आला. आपण ज्या मार्गाने चाललो त्यामार्गाने काश्मीरला आपलेसे करता येणार नाही याची जाणीव नेहरुंना तीव्रतेने झाली.
------------------------------------------------------------------------------------


भारतात राहण्यासाठी काश्मिरी जनतेला आपणच तयार करू शकतो पण स्वायत्तता मिळाल्याशिवाय काश्मिरी जनता मानणार नाही हे शेख अब्दुल्लाने स्पष्ट केले. जम्मू-काश्मीरच्या जनतेच्या इच्छे विरुद्ध स्वायत्ततेचा संकोच केला तर पाकिस्तानचे समर्थन वाढून पाकिस्तानचा फायदा होईल असा इशारा त्यांनी दिला. त्यांच्या या इशाऱ्याचा अर्थ ते भारतापासून वेगळे होवून काश्मीरला पाकिस्तानात सामील करण्यास तयार असल्याचे लावण्यात आला आणि देशद्रोहाच्या आरोपाखाली पुन्हा त्यांना अटक करण्यात आली. जानेवारी १९५८ मध्ये त्यांची सुटका करण्यात आली होती आणि ३ महिन्या नंतर एप्रिल १९५८ मध्ये त्यांना पुन्हा अटक करण्यात आली. यातून काश्मीरचा वाघमाणूस आणि काश्मीरच्या वेगळ्या ओळखीसाठी आणि हितासाठी लढणारा नेता ही त्यांची प्रतिमा अधिकच उजळून निघाली. पंडीत नेहरू आणि शेख अब्दुल्ला यांच्यातील संघर्ष रेषा अधिक स्पष्ट झाली. नेहरुंना हवे होते इतर राज्यांप्रमाणे काश्मीरचे भारतात विलीनीकरण तर स्वायत्त काश्मिरच भारतीय संघराज्याचा घटक बनेल ही शेख अब्दुल्लांची आग्रही भूमिका होती. नेहरुंना जे हवे होते त्या दिशेने म्हणजे भारतीय राज्यघटनेची अधिकाधिक कलमे काश्मिरात लागू करण्याच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरु राहिली. केंद्रसरकारला काश्मीरची स्वायत्तता मान्य नसल्याने शेख अब्दुल्ला समर्थकांनी सार्वमताची मागणी लावून धरली. नेहरू काळात काश्मीरचे विलीनीकरण विरुद्ध काश्मीरची स्वायत्तता असा संघर्ष रस्त्यावर दिसला नाही. याचे एक कारण शेख अब्दुल्लाचे तुरुंगात असणे हे होतेच शिवाय शेख अब्दुल्लांची नॅशनल कॉन्फरन्स मोडकळीस आणण्याची नेहरूनीती यशस्वी झाली होती.                                                                                                                       

 काश्मिरात  नेहरूनीती राबविणारे काश्मीरचेच प्रतिनिधी होते . त्यामुळे जनतेचा रोष नेहरू कृपेने सत्तेवर आलेले काश्मिरी नेतृत्व व केंद्र सरकार असे विभागल्या गेल्याने या रोषाची झळ नेहरू आणि केंद्र सरकार यांना जाणवली नाही. त्यामुळे काश्मिरात भारतीय संविधान लागू करण्याचा एक कलमी कार्यक्रम सुरु राहिला. २६ जानेवारी १९५० रोजी भारतात संविधान लागू झाले त्या दिवशीच काश्मिरात भारतीय संविधानाची सुमारे १०० कलमे लागू झाली होती. काश्मीरच्या सामिलनाम्यानूसार काश्मीरने जे विषय भारतीय संघराज्याकडे सोपविले होते त्या संदर्भातील ही कलमे असल्याने यावर कोणाचा आक्षेप नव्हता. या व्यतिरिक्त संविधानाची इतर कलमे लागू करण्याचा सपाटा नेहरू राजवटीने लावला तो वादाचा मुद्दा बनला. सामिलीकरणाच्या विषया बाहेरची कलमे काश्मिरात लागू करण्याची सुरुवात नेहरू काळात १९५४ च्या राष्ट्रपतीच्या आदेशाने झाली. १९५४ चा राष्ट्रपतींचा आदेश १९५२ मध्ये नेहरू-अब्दुल्ला यांच्यात झालेल्या दिल्ली करारावर आधारित होता हे खरे पण याच कराराच्या अंमलबजावणी वरून नेहरू -अब्दुल्ला यांच्यात मतभेद झाले होते आणि अब्दुल्लांची बडतर्फी व अटक झाली होती. या बाबीची पर्वा न करता नेहरूंनी राष्ट्रपतीच्या १९५४ च्या आदेशान्वये १९५२ चा करार अंमलात आणला. भारतीय संविधान काश्मिरात लागू करण्याचा कार्यक्रम वादग्रस्त बनला तो इथूनच. काश्मिरात केंद्र सरकारचे बाहुले असलेले सरकार स्थापित करण्यात नेहरुंना यश आल्याने आणि काश्मिरातील या सरकारने काश्मीर संविधान सभेचे निर्णय प्रभावित करण्यात यश मिळविल्याने नेहरू काळातच भारतीय संविधानाची जवळपास सर्व महत्वाची कलमे काश्मिरात लागू करण्यात यश मिळविले.                                                                 

मुलभूत अधिकारा संदर्भातील कलम १२ ते कलम ३५ पर्यंतची कलमे कलम ३७० मधील तरतुदीचा [गैर]वापर करून याच काळात लागू झालीत. सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात काश्मीर याच काळात आले. राज्याच्या धोरणा संबंधी घटनेचा चौथा भाग काश्मीरला लागू झाला.अर्थव्यवहार व व्यापार संबंधीच्या अनेक तरतुदी लागू झाल्यात. अंतर्गत व बाह्य कारणांसाठी  आणीबाणी लागू करण्याची तरतूद याच काळात लागू झाली. भारतीय सनदी सेवेच्या तरतुदीही लागू करण्यात आल्या. या सगळ्या गोष्टी लागू करताना संविधानात कलम ३५ अ ची तरतूद समाविष्ट करून काश्मीरचे नागरिकत्व ठरविण्याचे निकष आणि काश्मिरी नागरिकांचे अधिकार निश्चित करण्याचे अधिकार काश्मीर सरकारला बहाल करून काही प्रमाणात स्वायत्तता शिल्लक ठेवण्याची घटनात्मक तरतूद हा एकमेव दिलासा नेहरू काळात काश्मिरी जनतेला मिळाला. सगळी घटनात्मक पाउले कलम ३७० च्या आधारे उचलली गेलीत. संविधान सभेने काश्मीरच्या भवितव्याचा निर्णय काश्मिरी जनतेने घ्यावा यासाठी कलम ३७० ची तरतूद केली होती. या तरतुदी मागील भावना व आशयाचा अनादर करत याच तरतुदीच्या आधारे भारतीय संविधानाचा काश्मीरपर्यंत विस्तार करण्यात आला. भारतीय संविधान कुठल्याही चर्चेविना काश्मिरात लागू करण्यासाठी उपयुक्त असल्याने त्याला हात लावू नये हे नेहरू काळातील गृहमंत्री नंदा यांनी लोकसभेत सांगितले होते. हाच धागा पकडून सर्वोच्च न्यायालयाच्या संविधान पीठाने भारतीय संविधान काश्मिरात लागू करण्यासाठीच कलम ३७० ची तरतूद होती असा अफलातून निर्णय दिला . हीच धारणा काश्मीर प्रश्नाच्या मुळाशी आहे.                                                   

नेहरू काळात विकास कामासाठी धन पुरवठा मुबलक प्रमाणात करण्यात आला. यामुळे तरी भारतात विलीन होण्याची मानसिकता काश्मिरात तयार होईल अशी नेहरूंची धारणा होती. जनतेच्या समर्थनावर नाही तर केंद्र सरकारच्या कुबड्यावर चालणाऱ्या काश्मिरातील सरकारने काश्मिरातील परिस्थिती बाबत नेहरुंना अंधारात ठेवले. पण हजरत बाल मशिदीत ठेवलेला पैगंबराचा पवित्र केस चोरी जाण्याच्या घटनेच्या निमित्ताने काश्मिरात उद्रेक झाला आणि जनता रस्त्यावर उतरली. निमित्त धार्मिक होते पण उद्रेक राजकीय होता. या घटनेने नेहरुंना काश्मीर विषयक आपल्या धोरणाचा फोलपणा लक्षात आला. आपण ज्या मार्गाने चाललो त्यामार्गाने काश्मीरला आपलेसे करता येणार नाही याची जाणीव नेहरुंना तीव्रतेने झाली. १९५८ मधील अल्पसुटकेच्या काळात शेख अब्दुल्ला यांनी भारत सरकार व काश्मिरी जनता यामधील दुवा आपणच बनू शकतो व काश्मीरला भारतात राहण्यास तयार करू शकतो असा दावा केला होता त्यातील तथ्य या घटनेनंतर नेहरुंना प्रकर्षाने जाणवले आणि त्यांनी काश्मीरवर तोडगा काढण्याच्या हेतूने ८ एप्रिल १९६४ रोजी शेख अब्दुल्ला यांची तुरुंगातून मुक्तता करून त्यांना दिल्लीला आमंत्रित केले. १९५३ ते १९६४ इतका प्रदीर्घ काळ देशद्रोहाच्या आरोपावरून ज्यांना तुरुंगात ठेवले होते ते शेख अब्दुल्ला पंतप्रधानांचे पाहुणे म्हणून सुटकेनंतर काही दिवस पंतप्रधानांच्या निवासस्थानीच राहिले. शेख अब्दुल्ला यांचेवरील देशद्रोहाचा आरोप किती तकलादू होता हे यावरून स्पष्ट होते. पंडीत नेहरुंना आपली चूक लक्षात आली आणि शेख अब्दुल्लांची सुटका करून त्यांनी ती दुरुस्त देखील केली पण त्याला खूप उशीर झाला होता. शेख अब्दुल्लांच्या सुटकेनंतर अवघ्या दोन महिन्याच्या आतच पंडीत नेहरूंचा मृत्यू झाला. शेख अब्दुल्लांच्या मदतीने काश्मीर प्रश्नावर कायमचा तोडगा काढण्याची त्यांची इच्छा पूर्ण झाली नाही. 

--------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि. यवतमाळ 
मोबाईल - ९४२२१६८१५८ 

Friday, October 3, 2025

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - १४६

शेख अब्दुल्लांना ५ वर्षे अटकेत ठेवल्या नंतर त्यांच्या भूमिकेत काही बदल झाला का हे आजमाविण्यासाठी १९५८ मध्ये त्यांची सुटका करण्यात आली. अटकेच्या परिणामी त्यांची भूमिका सौम्य बनण्या ऐवजी अधिक ताठर बनली. स्वायत्तता द्या किंवा सार्वमत घ्या अशी मागणी सुटकेनंतर जाहीर सभांमधून केली.
---------------------------------------------------------------------------------------------


शेख अब्दुल्लांना काश्मीरच्या पंतप्रधान पदावरून बडतर्फ करण्यासाठी जे कारण दिले होते ते होते जमू-काश्मीर मंत्रीमंडळाचा त्यांच्यावर विश्वास उरला नाही ! यासाठी त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांना त्यांच्यापासून फोडून त्यांच्याकडून अविश्वासाची पत्रे घेण्यात आली होती. मंत्रीमंडळाची बैठक न बोलावताच त्यांच्यावर मंत्रीमंडळाचा विश्वास उरलेला नाही हे मान्य करून शेख अब्दुल्ला यांचेवर बडतर्फीची कारवाई झाली. दिल्ली सांगेल ते ऐकणारे मंत्रिमंडळ काश्मिरात स्थापन करण्यात आले. काश्मीरची जनता शेख अब्दुल्लाच्या पाठीशी असल्याने शेख अब्दुल्लाच्या बडतर्फी व अटके विरुद्ध उग्र निदर्शने झाली. पण नवी दिल्लीचा शेख अब्दुल्ला विरहित नव्या मंत्रीमंडळाला पाठींबा असल्याने जनतेचा विरोध मोडून काढण्यात आला. जनतेचा पाठींबा नसलेले आणि नवी दिल्लीच्या कुबड्यावर चालणारे सरकार स्थापन करून काश्मीरचा गाडा हाकण्याचा प्रयत्न झाला. केवळ शेख अब्दुल्लानाच बेदखल करण्यात आले नाही तर त्यांनी स्थापन केलेल्या नॅशनल कॉन्फरन्सचे अस्तित्व मिटविण्याचा प्रयत्न झाला. या सगळ्या पाउलांमुळे शेख अब्दुल्लाच नाही तर काश्मिरातील जनतेत भारताबद्दलच्या संशयाची व दुराव्याची भावना वाढीस लागली. तिथल्या जनतेला गृहीत धरण्यातून आणि दूर लोटण्यातून काश्मीर प्रश्न निर्माण झाला. संशय आणि दुरावा केवळ शेख अब्दुल्लांच्या अटकेतून निर्माण झाला नाही तर काश्मिरात दिल्लीच्या तालावर नाचणारे स्थापन करून एका पाठोपाठ एक राष्ट्रपतीचे आदेश काढून भारतीय राज्यघटनेचा विस्तार करण्याचा सपाटा लावला. अर्थात त्यासाठी जनतेचा पाठींबा गमावलेल्या सरकारची व तिथल्या संविधान सभेची संमती घेण्यात आली होती जी कलम ३७० नूसार अनिवार्य होती.                                                                     

देशात राज्यघटना लागू झाली त्याच दिवशी राष्ट्रपतींनी आदेश काढून जवळपास राज्यघटनेची १०० कलमे जम्मू-काश्मिरात लागू केली होती. शेख अब्दुल्लाच्या नेतृत्वाखालील तत्कालीन सरकारच्या मान्यतेने ही कलमे लागू झालीत व त्याबद्दल वाद किंवा नाराजी नव्हती. कारण समिलनाम्याच्या अटी-शर्तीनुसार ही कलमे लागू झाली होती. तेव्हा इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की शेख अब्दुल्ला किंवा तत्कालीन काश्मिरी नेतृत्वाचा जम्मू-काश्मीर भारतात सामील होण्याला विरोध नव्हता किंबहुना त्यांच्या इच्छेनेच सामीलीकरण सिद्धीस गेले व घटनेच्या कलम १ प्रमाणे काश्मीर भारतीय संघ राज्याचा भाग बनला. शेख अब्दुल्लांच्या अटके पर्यंत काश्मीरचे भारतात सामीलीकरण हा वादाचा मुद्दाच नव्हता. सामिलीकरणाच्या अटी-शर्तीच्या चौकटीत भारतात राहणे काश्मीरच्या कसे हिताचे आहे हे शेख अब्दुल्लाच काश्मीरच्या जनतेला पटवून देत होते. या चौकटीच्या बाहेर जावून भारतीय राज्यघटनेचा विस्तार होवू देण्याचीही त्यांची तयारी होती म्हणून तर त्यांनी १९५२ च्या दिल्ली करारावर सही केली होती. वादाचा मुद्दा एवढाच होता की भारतीय राज्यघटनेची आणखी किती कलमे जम्मू-काश्मिरात लागू करायची. या बाबतच्या सक्तीतून काश्मीर प्रश्न निर्माण झाला . या बाबतचा दबाव वाढू लागताच शेख अब्दुल्लाच्या भारतस्नेही भूमिकेत बदल झाला. भारतात झालेल्या सामीलनाम्यावर जनतेच्या सार्वमताच्या शिक्कामोर्तबाची गरज नसल्याचे प्रतिपादन करणारे शेख अब्दुल्ला काश्मीरचे भवितव्य जनतेच्या सार्वमताने ठरवू द्या अशी मागणी करू लागले. त्यांच्या अटकेने या मागणी बाबत ते अधिक आग्रही बनले. 

शेख अब्दुल्लांना ५ वर्षे अटकेत ठेवल्या नंतर त्यांच्या भूमिकेत काही बदल झाला का हे आजमाविण्यासाठी १९५८ मध्ये त्यांची सुटका करण्यात आली. अटकेच्या परिणामी त्यांची भूमिका सौम्य बनण्या ऐवजी अधिक ताठर बनली. सुटकेनंतर त्यांनी घेतलेल्या सभा आणि जनतेशी साधलेल्या संवादातून काश्मिरी जनतेच्या मनावर आपण नवी दिल्ली पुढे झुकलो नाही आणि झुकणार नसल्याचे बिम्बविण्याचा प्रयत्न केला. काश्मीरचे भवितव्य सार्वमताने ठरविण्याच्या मागणीवर ठाम असल्याचे प्रतिपादन सभांमधून त्यांनी केले. १९४७ चे काश्मीरचे भारतात झालेले सामीलीकरण तात्पुरते होते आणि अंतिम निर्णय सार्वमताने घेण्यास भारताची संमती होती. भारताने दिलेल्या आश्वासनाची व हमीची पूर्तता केली पाहिजे असे प्रतिपादन ते आपल्या भाषणातून करू लागले. कलम ३७० द्वारे जम्मू-काश्मीरच्या स्वायत्ततेची जी घटनात्मक हमी भारताने दिली होती त्याचे उल्लंघन करून काश्मीरच्या स्वायत्ततेचा भारत सरकार संकोच करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. १९५३ साली आपल्याला बडतर्फ करून तुरुंगात डांबण्याची कृती बेकायदेशीर होती असाही आरोप ते सभांमधून करू लागले. काश्मीरची ओळख टिकविण्यासाठी नॅशनल कॉन्फरन्सच्या झेंड्याखाली एकत्र येवून संघर्ष करण्याचे ते आवाहन करू लागले.आपले राजकीय भवितव्य निश्चित करण्याचा व स्वशासनाचा आपला अधिकार असल्याचे ठामपणे जनतेला सांगत असतानाच केंद्र सरकारशी आपल्या अटीवर चर्चेची व तडजोडीची तयारीही ते दाखवीत होते. आपण विभाजनवादी नसल्याचे व आपण आणि काश्मिरी जनता स्वेच्छेने भारतात राहायला तयार आहोत पण काही अटीवरच असा संकेत आणि संदेश नवी दिल्लीला दिला. त्यासाठी त्यांच्या दोन प्राथमिक अटी होत्या. आपल्या अटके आधीची स्वायत्तता पुनर्स्थापित करणे आणि काश्मीरच्या वेगळ्या ओळखीचा आदर राखला पाहिजे या त्या अटी होत्या. सार्वमताचा आग्रह न धरता स्वायत्तता अबाधित ठेवण्याची त्यांची मागणी होती. आपल्याला तुरुंगात ठेवून किंवा बळाचा वापर करून मार्ग निघणार नाही. काश्मिरी जनता आणि भारत सरकार यांच्यात संवादसेतू बनण्यास आपण तयार असल्याचे सांगत असतानाच आपल्याशिवाय मार्ग निघणार नाही असा इशारा त्यांनी भारत सरकारला दिला होता. 


------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि. यवतमाळ 
मोबाईल : ९४२२१६८१५८