Thursday, August 29, 2024

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - १०६

 जम्मू-काश्मीरच्या रहिवाशी व्याख्ये संबंधी असलेल्या आक्षेपाच्या मर्यादेत बदल झाले असते तर राज्याबाहेरच्याना काश्मीरचे रहिवाशी बनता आले नसते. विशिष्ट काळ काश्मीर मध्ये राहिले तर कोणालाही रहिवाशी म्हणून मान्यता मिळेल या नव्या तरतुदीमुळे भविष्यात मूळ काश्मिरी लोकांची तीच अवस्था होईल जी मुंबईत मराठी माणसाची झाली आहे.
-------------------------------------------------------------------------------------------


विधानसभा मतदार संघांची पुनर्रचना करून जसे जम्मू प्रदेशातील मतदार संघ वाढवून मुस्लीम बहुल काश्मीर घाटीच्या राजकीय वर्चस्वाला धक्का देण्याचा प्रयत्न झाला आहे तसेच जम्मू-काश्मीरची राजा हरीसिंग यांच्या काळापासून चालत आलेली कायम रहिवाशी व्याख्येत बदल करून जम्मू-काश्मीर बाहेरचे लोक तेथे येवून विशिष्ट काळ राहिले तर त्यांना रहिवाशी प्रमाणपत्र देवून बाहेरचे मतदार जम्मू-काश्मीरच्या मतदार यादीत सामील करण्याची व्यवस्था करण्यात आली. कलम ३५ अ अंमलात असताना तसे करता येणे शक्य नव्हते. राज्य सरकारच्या नोकरीत कोणाला सामावून घेता येईल यासाठी जम्म काश्मीरच्या रहिवाशी व्याख्येत बदल करण्यात आला. कोणतीही व्यक्ती जी १५ वर्षापासून जम्मू-काश्मीर मध्ये राहात आहे किंवा राज्यात ७ वर्षे शिक्षण घेत राज्यातील १० वी किंवा १२ वी ची परीक्षा दिली असेल  किंवा केंद्र सरकारच्या ज्या कर्मचाऱ्यांनीराज्यात १० वर्षे सेवा दिली असेल ते कर्मचारी व त्यांची मुले जम्मू-काश्मीरचे रहिवाशी मानले जातील. या शिवाय कामासाठी स्थलांतरित म्हणून जम्मू-काश्मीर मध्ये असलेले लोक रहिवाशी दर्जा मिळावा म्हणून अर्ज करू शकतील. ३५ अ कलमान्वये मिळालेल्या अधिकारात जम्मू-काश्मीर संविधान सभेने रहिवाशाची जी व्याख्या केली होती त्या व्याख्येत यांच्यापैकी कोणी बसत नव्हते.                                                                                                                                 

घटनेतील ३५ अ कलमाच्या बाबतीत तीन आक्षेप होते. पहिला, प.पाकिस्तानातून निर्वासित म्हणून आलेल्यांना रहिवाशाचा दर्जा मिळालेला नाही, दुसरा, १९५७ मध्ये पंजाब मधून ज्या सफाई कामगारांना काश्मीर मध्ये बोलावण्यात आले त्यांना रहिवाशी म्हणून मिळणाऱ्या सवलती पासून वंचित ठेवण्यात आलेआले. आणि तिसरा राज्यातील स्त्रीने पर राज्यातील पुरुषाशी विवाह केला तर ती काश्मीरच्या रहिवाशी दर्जाला आणि रहिवाशी म्हणून मिळणाऱ्या सवलती पासून वंचित व्हावे लागेल. पुरुषाने पर राज्यातील स्त्रीशी विवाह केला तर त्याचे अधिकार मात्र अबाधित ठेवण्यात आले होते. जम्मू-काश्मिरातील स्त्रियांवर अन्याय आणि भेदभाव होत असल्याचा आक्षेप होता. मूळ तरतुदीनुसार हे आक्षेप बरोबर म्हणता येतील. पण नंतर झालेले बदल लक्षात न घेता अपप्रचार केला गेला. वाल्मिकी समाजाला सफाई कामासाठी काश्मीर मध्ये आणले गेले होते. त्यांच्या बाबतीत नंतर एक महत्वाचा बदल असा करण्यात आला की त्यांना जम्मू-काश्मीर मध्ये मालमत्ता खरेदी करण्याची व विक्री करण्याची सूट देण्यात आली होती. स्त्रियांच्या बाबतीतील मूळ तरतुदीवर न्यायालयात आक्षेप घेण्यात आला होता. यावर निर्णय देतांना जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाने पर राज्यातील पुरुषाशी विवाह केला म्हणून तिच्या रहिवाशी दर्जात व रहिवाशी म्हणून असलेल्या अधिकारात बदल होणार नाही असा निर्णय दिला होता. कलम ३५ अ रद्द होई पर्यंत हा निर्णय कायम होता. जम्मू-काश्मीरच्या रहिवाशी व्याख्ये संबंधी असलेल्या आक्षेपाच्या मर्यादेत बदल झाले असते तर राज्याबाहेरच्याना काश्मीरचे रहिवाशी बनता आले नसते. विशिष्ट काळ काश्मीर मध्ये राहिले तर कोणालाही रहिवाशी म्हणून मान्यता मिळेल या नव्या तरतुदीमुळे भविष्यात मूळ काश्मिरी लोकांची तीच अवस्था होईल जी मुंबईत मराठी माणसाची झाली आहे.

काश्मीरच्या बाबतीत मान्य करण्यात आलेल्या तरतुदी भेदभाव करणाऱ्या होत्या हा सर्रास आक्षेप घेण्यात येतो. खरे तर तरतुदी भेदभाव करणाऱ्या आहेत हे मान्य करूनच घटनेत सामील करण्यात आल्याने तसा या आक्षेपाला काही अर्थ उरत नाही. संविधानात भेदभाव करणाऱ्या तरतुदी फक्त काश्मीरच्या बाबतीत नाहीत. इतरही अनेक राज्याच्या बाबतीत आहेत. त्या त्या प्रदेशाचे रहिवाशी म्हणून काही लाभ नसतील तर कोणालाच डोमेसाइल -अधिवास- प्रमाणपत्राची गरज पडली नसती. कोणाला कोठेही जाता येणे , राहता येणे, मालमत्ता खरेदी करता येणे हे हक्क आपल्या राज्यघटनेने दिले आहेत. तरीही महाराष्ट्रात महाराष्ट्राचे रहिवाशी असले तरी आदिवासींची जामीन खरेदी करता येत नाही. महाराष्ट्रा सारखीच तरतूद गुजरात, झारखंड , छत्तीसगड सारख्या राज्यात आहेत.  देशात अशी अनेक राज्ये आहेत जेथे पर प्रांतातील नागरिकांना जमिनी खरेदी करण्यावर प्रतिबंध घालण्यात आले आहेत. घटनेत कलम ३७० नंतर जे कलम ३७१ आहे ते काय आहे ? कलम ३७१ अ एका राज्यासाठी, ब दुसऱ्या राज्यासाठी क तिसऱ्या राज्यासाठी ड चौथ्या ...असे निरनिराळ्या राज्यांसाठी आहे. याद्वारे कोणत्या न कोणत्या बाबतीत नागरिकांच्या घटनात्मक अधिकारावर प्रतिबंध किंवा मर्यादा आली आहे. कलम ३७१ अ जे नागालैंड राज्यासाठी आहे ते जम्मू-काश्मीर साठीच्या ३५-अ कलमा सारखेच आहे. तिथली जमीन, तिथले रोजगार सगळे काही स्थानिक रहिवाशांसाठी राखीव आहेत. काश्मीर साठीची कलम ३७० ची जी तरतूद होती तशी तरतूद या प्रदेशासाठी कलम ३७१ अ मध्ये करण्यात आली. राज्य विधिमंडळाच्या मंजुरी शिवाय कोणताही केंद्रीय कायदा या प्रदेशात लागू होवू शकत नाही.                                                                                                                                       

काश्मीरसाठी कलम ३५ अ अंतर्गत ज्या तरतुदी आहेत जवळपास त्या सगळ्या तरतुदी सिक्कीमसाठी लागू असलेल्या कलम ३७१ फ मध्ये आहेत. काही बाबतीत तर तिथे सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकाराला मर्यादा घातल्या आहेत. मणिपूरसाठी लागू असलेले कलम ३७१ सी आणि अरुणाचल प्रदेशात लागू असलेले कलम ३७१ एच तेथील लोकांचे जमीन आणि इतर संसाधनावरील अधिकार सुरक्षित ठेवणारे आहे. उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात देखील परप्रांतीयांना जमिनी खरेदी करता येत नाही. शेतकरी नसाल तर शेत जमीन अनेक राज्यात खरेदी करता येत नाही. अनेक राज्यात गोहत्या प्रतिबंधक कायदा आहे तर अनेक राज्यात गोवंश कत्तलीची खुली सूट आहे. कुठे आहे एक देश एक कायदा ? एक देश एक कायद्याची आठवण आम्हाला फक्त काश्मीरच्या बाबतीत येते. वेगवेगळ्या ठिकाणी स्थानिक परिस्थिती व भावना , स्थानिकांच्या परंपरा लक्षात घेवून वेगवेगळ्या तरतुदी करण्यात काहीच गैर नाही. इतर राज्यांच्या बाबतीत ज्या गोष्टी आक्षेपार्ह वाटत नाही त्या काश्मीरच्या बाबतीत आक्षेपार्ह वाटणे चुकीचे आहे. संसदेत जेव्हा कलम ३७० रद्द करण्याबाबत चर्चा चालली होती तेव्हा अनेक सदस्यांनी कलम ३७१ देखील रद्द होवू शकते अशी भीती व्यक्त केली. त्यावर बोलताना गृहमंत्री अमित शाह यांनी कलम ३७० व कलम ३७१ ची तुलना होवू शकत नाही असे सांगितले. मुद्दा बरोबर आहे. कलम ३७० घटनेत समाविष्ट करण्याची परिस्थिती आणि कलम ३७१ सामील करण्यामागची परिस्थिती आणि विचार वेगळे आहेत. पण कलम ३५ अ आणि कलम ३७१ मध्ये विलक्षण साम्य आहे हे ना शाह यांनी विचारात घेतले ना प्रश्नकर्त्यांनी त्यांच्या ध्यानात आणून दिले. सरन्यायाधीश, प्रधानमंत्री,गृहमंत्री आणि एकूण सारा देशच कलम ३५ अ भेदभाव करणारे आहे असे मानतो. तसे ते आहेच. पण देशातील इतर राज्यांसाठी कलम ३७१ चालते पण काश्मीरसाठी कलम ३५ अ चालत नाही हा देखील काश्मिरी जनतेच्या बाबतीत आमच्या मनात समभाव नसून त्यांच्या बाबतीत भेदभाव करीत असल्याचा पुरावा आहे. 

                                             {क्रमशः}

------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि. यवतमाळ 
मोबाईल : ९४२२१६८१५८ 

Thursday, August 22, 2024

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - १०५

 जम्मू-काश्मीर हे एकमेव मुस्लीम बहुल राज्य आहे आणि त्यात बदल होणार नाही हे ३५ अ कलमातील तरतुदी मधून सुनिश्चित करण्यात आले होते. मुस्लीम बहुल राज्याला हिंदुबहुल राष्ट्राकडून मिळालेले ते अभय होते. हे अभय काढून घेण्यात आल्यामुळे जम्मू-काश्मिरातील मुस्लिमांनी भयभीत होणे स्वाभाविक आहे. कलम ३७० आणि कलम ३५ अ रद्द केल्यानंतर मोदी सरकारने जी पाउले उचलली त्यातून राज्याची राजकीय आणि सामाजिक वीण बदलण्याचा प्रयत्न दिसून येत असल्याने काश्मीर घाटीतील जनतेत अस्वस्थता वाढली आहे. 
---------------------------------------------------------------------------------------------


भारतीय संविधानात ३५ अ कलम १९५२ च्या नेहरू अब्दुल्ला करारानुसार राष्ट्रपतीच्या आदेशाने सामील करण्यात आले तेव्हा शेख अब्दुल्ला तुरुंगात होते. जम्मू-काश्मीरच्या पंतप्रधानपदी बक्षी गुलाम मोहमद यांना बसविण्यात आले होते. त्यावेळी निवडून आलेल्या जम्मू-काश्मीरच्या संविधान सभेचे जम्मू-काश्मीरची राज्यघटना तयार करण्याचे काम सुरूच होते.  भारतीय राज्यघटनेतील कलम ३५ अ नूसार मिळालेल्या अधिकाराचा वापर करून जम्मू-काश्मीरच्या घटना समितीने काश्मीरच्या नागरिकत्वाचे व कायम रहिवाशाचे निकष १७ नोव्हेंबर १९५६ रोजी निश्चित केले. १४ मे १९५४ रोजी  आधीच्या व्यवस्थेनुसार जे  नागरिक स्टेट सब्जेक्ट होते ते जम्मू-काश्मीरचे कायम रहिवासी मानले जातील असे निश्चित केले गेले. या शिवाय १४ मे १९५४ च्या आधी जे १० वर्षापासून काश्मीरमध्ये राहात होते आणि ज्यांनी कायदेशीररीत्या अचल संपत्ती मिळविली त्यानाही जम्मू-काश्मीरचे कायम रहिवाशी नागरिक म्हणून मान्यता देण्यात आली. या व्याख्येत काही बदल करायचा झाल्यास किंवा कायम रहिवाशी म्हणून मिळत असलेल्या सवलतींमध्ये बदल करायचा झाल्यास  तो दोन तृतीयांश बहुमताने जम्मू-काश्मीर विधानसभेला करता येतील हे तिथल्या घटना समितीने निश्चित केले. जम्मू-काश्मीरच्या विधानसभेची निवडणूक लढविण्यासाठी आणि विधानसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी कायम रहिवाशीच पात्र असेल. जे जम्मू-काश्मीर मध्ये राहतात पण राज्याच्या कायम रहिवाशी व्याख्येत बसत नाहीत अशा नागरिकांना विधानसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी अपात्र मानण्यात आले पण त्यांना लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार देण्यात आला. सरकारी पदांसाठी, आरोग्य विषयक किंवा शैक्षणिक सवलतींसाठी राज्याचे कायम रहिवाशीच पात्र राहतील अशी तरतूद संविधान सभेने केली.                                                               

याच्या परिणामी जम्मू-काश्मीरचा कायम रहिवाशी व्याख्येत बसत नसलेल्या व्यक्तीस जमीन खरेदी करण्यास, सरकारी नोकरी मिळविण्यास, शैक्षणिक तसेच आरोग्य विषयक सवलती मिळविण्यास आणि  विधानसभा निवडणुकीत भाग घेण्यास अपात्र ठरला. कोणत्याही विशिष्ट समुदायास पात्र किंवा अपात्र ठरविणाऱ्या या तरतुदी नव्हत्या. बाहेरचे लोक येवून जमिनी बळकावतील, नोकऱ्या काबीज करतील आणि पुढेमागे आपल्यावर राज्यही करतील अशी भीती काश्मिरी नेतृत्वाला वाटत होती. जम्मू-काश्मीर हे एकमेव मुस्लीम बहुल राज्य आहे आणि त्यात बदल होणार नाही हे अशा तरतुदी मधून सुनिश्चित करण्यात आले होते. मुस्लीम बहुल राज्याला हिंदुबहुल राष्ट्राकडून मिळालेले ते अभय होते. हे अभय काढून घेण्यात आल्यामुळे जम्मू-काश्मिरातील मुस्लिमांना असुरक्षित वाटणे स्वाभाविक आहे. कलम ३७० आणि कलम ३५ अ रद्द केल्यानंतर मोदी सरकारने जी पाउले उचलली त्यातून राज्याची राजकीय आणि सामाजिक वीण बदलण्याचा प्रयत्न दिसून येत असल्याने काश्मीर घाटीतील जनतेत अस्वस्थता वाढली आहे. ३५ अ रद्द केल्याने आपल्या जमिनी धनदांडगे बळकावतील ही भीती काश्मीर घाटीतील जनते सोबत जम्मू आणि लडाख भागातील जनतेलाही वाटत आहे पण याशिवायच्या दोन गोष्टीने काश्मीर घाटीतील जनता अस्वस्थ आहे.                         

जम्मू-काश्मीरच्या रहिवाशी व्याख्येत बदल करून काश्मीर घाटीत मुस्लिमांना अल्पसंख्य बनविण्याचा खेळ मोदी सरकार खेळत असल्याची भावना आहे आणि काश्मीर घाटी बाहेर जम्मू प्रदेशात विधानसभेच्या जागा वाढवून काश्मीर घाटीच्या आजवरच्या राजकीय वर्चस्वाला जाणीवपूर्वक सुरुंग लावत असल्याचे काश्मीर घाटीतील जनतेला व राजकीय पक्षांना वाटत आहे. ही भीती अनाठायी किंवा अकारण आहे असे नाही. मार्च २०२० जम्मू-काश्मीरच्या विधानसभा मतदारसंघाचे परिसीमन [डीलिमिटेशन] करण्यासाठी परिसीमन आयोगाची स्थापना करण्यात आली होती. जनगणनेनुसार लोकसंख्या वाढ लक्षात घेवून ठराविक कालावधी नंतर विधानसभा व लोकसभा क्षेत्राचे पुनर्गठन करण्याची तरतूद संविधानात आहे. या तरतुदीच्या आधारे राष्ट्रपतींनी केंद्र सरकारच्या सल्ल्यानुसार निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या नेतृत्वाखाली जम्मू-काश्मीर परिसीमन आयोग नेमला होता. न्या.देसाई व्यतिरिक्त राष्ट्रीय व राज्याचे निवडणूक आयुक्त असे दोन सदस्य या आयोगात सामील होते. या आयोगाने नव्याने परिसीमन करून जम्मू-काश्मीर विधानसभेच्या ७ जागा वाढविल्या आहेत. या पैकी ६ जागा हिंदुबहुल जम्मू क्षेत्रातील वाढल्या आहेत तर मुस्लीमबहुल काश्मीर घाटीत विधानसभेची फक्त एक जागा वाढली आहे ! हिंदू बहुल जम्मू प्रदेशातील जागा ३७ होत्या त्या ४३ झाल्यात आणि मुस्लीमबहुल काश्मीर घाटीतील जागा ४६ होत्या त्या ४७ झाल्या. लोकसंख्या वाढीनुसार या जागा वाढल्या आहेत. परिसीमन आयोगाने आपले काम चोख बजावले असे मानले तर निष्कर्ष असा निघतो की मुस्लीमबहुल काश्मीरघाटीच्या तुलनेत हिंदूबहुल जम्मू क्षेत्राची लोकसंख्या वाढ बरीच जास्त आहे. एक तर आयोगाने चुकीचे आकडे घेतले असले पाहिजे किंवा मुस्लीम जनसंख्या वाढत असल्याचा जो बागुलबोवा दाखविला जातो त्यापेक्षा जमिनीवरची परिस्थिती वेगळी आहे हे मान्य केले पाहिजे. इथे मुद्दा लोकसंख्या वाढीचा नाही. जम्मू आणि काश्मीर या दोन प्रदेशात विधानसभा मतदार संघ संख्येत जी विषम वाढ झाली आहे त्यामुळे जुनी राजकीय घडी बदलण्याचा प्रयत्न म्हणून काश्मीरघाटीतील जनता आणि राजकीय पक्ष विधानसभा क्षेत्राच्या पुनर्रचनेकडे संशयाने बघत आहेत.                                                                                                       

परिसीमन आयोगाने दोन क्षेत्रातील विधानसभा मतदारसंघात ४ चे अंतर ठेवले होते ते केंद्राने उपराज्यपालांना विधानसभेत ३ सदस्यांची नियुक्ती करण्याचे अधिकार देवून पार कमी केले आहे. भारतीय जनता पक्षाच्या पूर्ण बहुमताच्या १० वर्षाच्या राजवटीत काश्मीरघाटीत पंडितांचे पुनर्वसन करणे जमले नाही. सगळा दोष कलम ३७० ला देणाऱ्या भारतीय जनता पार्टीने कलम ३७० रद्द झाल्याला ५ वर्षे पूर्ण झाले तरी आणि उपराज्यपाल यांचे मार्फत जम्मू-काश्मीरचा कारभार केंद्र सरकार पहात असताना सुद्धा  पंडितांचे पुनर्वसन न करता येणे हे  मोठे अपयश आहे. त्यावर पांघरून घालण्यासाठी  विधानसभेतील दोन जागा पंडीत समुदायातून नियुक्तीने भरण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. हा निर्णय एकीकडे पंडीत समुदायाला खुश करण्याचा प्रयत्न समजला जातो तर दुसरीकडे काश्मीर घाटीचे राजकीय प्रभुत्व संपविण्याचे उचललेले पाउल म्हणून या निर्णयाकडे पाहिले जात आहे. फाळणी आणि युद्धामुळे पाकव्याप्त काश्मीर मधून आलेल्या निर्वासित समुदायातून एकाची नियुक्ती जम्मू-काश्मीर विधानसभेत सदस्य म्हणून करण्याचे अधिकार उपराज्यपालांना देण्यात आला आहे. राजकीय समीकरणे आपल्या बाजूने करण्याच्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या या प्रयत्नांनी काश्मीर घाटीतील जनतेत असहाय्यतेची व अस्वस्थतेची भावना निर्माण केली आहे. 

                                           [क्रमशः]

-----------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि. यवतमाळ 
मोबाईल - ९४२२१६८१५८ 

Wednesday, August 14, 2024

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - १०४

 संघ - जनसंघाने  त्यांना काश्मीर कसे हवे याची चुणूक तेव्हा दाखविली होती आणि पुढे मागे ही मंडळी सत्तेत आली तरी भारतात सामील होताना काश्मीर जसे होते तसेच राहील त्यात यांना आपल्या मर्जीप्रमाणे बदल करता येणार नाहीत  याची घटनात्मक तरतूद आणि त्या तरतुदीला घटनेचे संरक्षण कलम ३५ अ च्या माध्यमातून त्यावेळच्या सरकारने दिले होते. ती दूरदृष्टी सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेने निकामी ठरली. 
-----------------------------------------------------------------------------------------


राष्ट्रपतीच्या आदेशाने कलम ३५ अ घटनेत समाविष्ट करण्याआधी १९५२ च्या करारा संदर्भात  तत्कालीन पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू लोकसभेत स्पष्टीकरण देतांना म्हणाले होते की," १९५२ च्या करारानुसार भारतीय नागरिकत्वाचा विस्तार जम्मू-कास्श्मीर राज्यात झाला आहे. पण आपल्या काश्मिरी मित्रांना काही बाबतीत शंका आणि भीती वाटते आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून जम्मू काश्मीरमध्ये नागरिकत्वा संबंधीचे काही नियम लागू आहेत. तिथले रहिवाशी हे जम्मू-काश्मीर संस्थानांचे स्टेट सब्जेक्ट मानले जात. जे स्टेट सब्जेक्ट आहेत त्यांनाच संस्थानाने विशेष अधिकार दिले होते. यापैकी महत्वाचा अधिकार म्हणजे जामीनजुमला बाळगण्याचा आणि जमीन खरेदी करण्याचा होता. हा अधिकार राज्याबाहेरच्या लोकांना देण्याच्या विरोधात संस्थानिक राजा हरीसिंग व त्याची प्रजा होती. काश्मीरचे वातावरण व निसर्ग सौंदर्य याला भाळून इंग्रज आणि पैसेवाले लोक जमिनी विकत घेवून इथे स्थायिक होतील व मूळचे लोक विस्थापित होतील अशी भीती वाटत असल्याने तसे नियम व कायदे लागू करण्यात आले. नोकरी आणि शिक्षणा संदर्भातही तिथल्या रहिवाशांना संरक्षण देण्यात आले होते. इंग्रजांनी तिथल्या राजाचे आणि राज्याचे अधिकार काळाच्या ओघात कमी केले पण राजाने आणि प्रजेने या अधिकाराला हात लावू दिला नव्हता.  तीच व्यवस्था नव्या स्वरुपात आणि नव्या कायद्याच्या रुपात कायम राहावी अशी काश्मिरी नेत्यांची इच्छा आहे. पैसेवाले लोक काश्मीर मध्ये येवून जमीनजुमला खरेदी करतील ही त्यांची भीती चुकीची आहे असे म्हणता येत नाही. बाहेरच्या पैसेवाल्यांनी काश्मीरचा ताबा घेणे त्यांना नको आहे. त्यामुळे याबाबतीत स्पष्ट असा निर्णय झाला आहे. राजा हरीसिंग यांच्या काळापासून जे अधिकार तिथल्या रहिवाशांना मिळाले आहेत आणि जे अधिकार बाहेरच्यांना नाकारण्यात आले आहेत ती व्यवस्था नव्या स्वरुपात कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जो पर्यंत नवे कायदे परिभाषित होवून लागू होत नाहीत तोपर्यंत महाराजा हरीसिंग यांच्या काळातील नियम कायदे लागू राहतील. राज्य विधानसभेला राज्याचे कायम रहिवासी, त्यांचे अधिकार आणि विशेष अधिकार याचे नियम , व्याख्या व त्यानुसार कायदे बनविण्याचा अधिकार असणार आहे." 

१९५२ च्या नेहरू-अब्दुल्ला करारानुसार  राज्य विधानसभेला हा अधिकार प्रदान करणारे भारतीय राज्यघटनेतील कलम ३५ अ आहे. या कलमात हेही स्पष्ट करण्यात आले होते की, भारतीय राज्यघटनेतील तरतुदी, जम्मू-काश्मीर राज्यात सध्या अस्तित्वात असलेले कायदे किंवा नंतर विधानसभेकडून पारित होणारे कायदे यामुळे या अधिकारावर मर्यादा येणार नाही किंवा असे कायदे विसंगत आहेत या आधारावर किंवा अशा कायद्यामुळे इतर नागरिकांचे अधिकार कमी होत आहेत या आधारावर हे कायदे निरर्थक ठरविता येणार नाही. म्हणजे जम्मू-काश्मीर विधानसभेने यासंबंधी बनविलेले नियम किंवा कायदे भेदभाव करणारे आहेत म्हणून रद्द करता येणार नाहीत हे संरक्षणही कलम ३५ अ मुळे मिळाले होते. यावर काय आक्षेप येवू शकतात त्यावर तेव्हा विचार झाला होता आणि अशा आक्षेपाच्या आधारे जम्मू-काश्मीरच्या कायम रहिवाशांना मिळालेले संरक्षण काढून घेता येणार नाही याची हमी देण्यात आली होती. कलम ३७० व कलम ३५ अ रद्द करण्याला आव्हान देणाऱ्या याचिकांच्या सुनावणी दरम्यान कलम ३५ अ वर मत व्यक्त करताना सरन्यायधीश आणि घटनापीठाचे प्रमुख जस्टीस चंद्रचूड यांनी कलम ३५ अ मुळे जम्मू-काश्मीरच्या कायम रहिवाशांना विशेष अधिकार मिळालेत आणि या अधिकारापासून कायम रहिवाशाच्या व्याख्येत न बसणारे नागरिक वंचित राहिले आहेत. हे  विशेष अधिकार न्यायिक पुनरावलोकनाच्या कक्षेबाहेर ठेवण्यात आल्याचे चंद्रचूड म्हणाले. याचीच री ओढताना आणि मोदी सरकारची भूमिका मांडताना सॉलीसीटर जनरल तुषार मेहता यांनी कायम रहिवाशी हा वर्ग कृत्रिमरीत्या तयार करण्यात आल्याचे सांगितले.कलम ३५ अ ने या विशेषाधिकारामुळे कुठल्याही प्रकारच्या मुलभूत अधिकाराचा किंवा या अधिकारांच्या संदर्भातील कलम १४ ते कलम २१ चा भंग होतो असे मानले जाणार नाही असे कलम ३५ अ मध्ये नमूद करण्यात आल्याचे सांगत हा प्रकार घटनात्मक लोकशाहीशी विसंगत असूनही ही चूक वर्षानुवर्षे चालत राहिल्या बद्दल आश्चर्य व्यक्त केले. मोदी सरकारने ही चूक कलम ३७० व त्यातून आलेले कलम ३५ अ रद्द करून दुरुस्त केल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.  सरन्यायाधीश आणि सॉलीसीटर जनरल जे बोलले ते घटनेत नमूद मुलभूत अधिकारा संदर्भात जसे चुकीचे नाही तसेच हे कलम घटनेत चुकून किंवा चुकीने समाविष्ट करून घेण्यात आलेले नाही. हे कलम एकंदरीत घटनेच्या चौकटीशी विसंगत आहे, यामुळे काहीना विशेष अधिकार मिळणार आहेत आणि काही त्या अधिकारापासून वंचित राहणार आहेत याची पूर्ण जाणीव हे कलम घटनेत सामील करताना त्यावेळच्या सरकारला होती. अपवाद म्हणून या कलमाला मान्यता देण्यात आली होती.                                                               

 त्यावेळी हे कलम का सामील केले आणि केवळ सामील केले नाही तर त्याला रद्द करता येणार नाही किंवा त्याला कोणत्याही कारणाने धक्का लागणार एवढी तटबंदी त्या कलमा भोवती उभी करण्याचे कारण सरन्यायधीश आणि सॉलीसीटर जनरल यांनी विचारात घेतले नाही. सरन्यायधीशांनी तर आधीच घोषित केले होते की सरकार आणि संसदेला हा कायदा रद्द करण्याचा घटनात्मक अधिकार आहे की नाही या मर्यादेतच घटनापीठ विचार करील. हे ते कलम ३७० संदर्भात बोलले असले तरी कलम ३५ अ संदर्भात न्यायालयाची अशीच भूमिका होती. इतिहासात काय करारमदार झालेत, काय वचन आणि हमी दिली गेली याच्याशी न्यायालयाला घेणेदेणे नसल्याची ही भूमिका होती. करार, वचन हमी या बाबी सॉलीसीटर जनरल यांनी मांडायला हव्या होत्या आणि त्या प्रकाशात घटनेतील कलमे रद्द करणे उचित की अनुचित हे सांगायला हवे होते. पण त्यांनी जे मांडले ते १९५२ पासूनची संघ-जनसंघाची भूमिका मांडली. सरन्यायधीश चंद्रचूड यांनी त्यांना तुम्ही केंद्र सरकारचे प्रतिनिधित्व करत आहात आणि १९५४ साली घटनेत ३५ अ कलम समाविष्ट करण्याच्या निर्णयापासून तुम्ही स्वत:ला वेगळे करू शकत नाही याची जाणीव करून दिल्या नंतरही ते हेच म्हणत राहिले की ती चूक होती आणि या सरकारने ती चूक २०१९ साली दुरूस्त केली. खरे सांगायचे तर संघ - जनसंघाने  त्यांना काश्मीर कसे हवे याची चुणूक तेव्हा दाखविली होती आणि पुढे मागे ही मंडळी सत्तेत आली तरी भारतात सामील होताना काश्मीर जसे होते तसेच राहील त्यात यांना आपल्या मर्जीप्रमाणे बदल करता येणार नाहीत  याची घटनात्मक तरतूद आणि त्या तरतुदीला घटनेचे संरक्षण कलम ३५ अ च्या माध्यमातून त्यावेळच्या सरकारने दिले. न्यायालयाने फक्त तांत्रिक आणि तांत्रिक विचार करून सरकारची साथ दिल्याने ते कलम रद्द झाले. तांत्रिक अंगाने विचार न करता  विवेकबुद्धी  वापरून त्या कलमाचा विचार झाला असता तर कदाचित सर्वोच्च न्यायालयाचा वेगळा निर्णय आला असता. कलम ३५ अ रद्द झाल्याने काय फरक पडू शकतो किंवा प्रत्यक्षात पडत आहे  हे लक्षात घेतले तर काश्मिरी नागरिकांना वाटणारी भीती चुकीची नसल्याचे लक्षात येईल. त्यासाठी कलम ३५ अ रद्द झाल्याने काश्मिरी जनतेने नेमके काय गमावले हे समजून घ्यावे लागेल. 

                                                     [क्रमशः]

----------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि. यवतमाळ 
मोबाईल : ९४२२१६८१५८ 

Thursday, August 8, 2024

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - १०३

 कलम ३७० रद्द झाल्याने काश्मिरी मुसलमानात भावनिक असुरक्षिता तेवढी निर्माण झाली. काश्मीरच्या बाबतीत काश्मिरी जनतेला भयभीत करणारा बदल कोणता असेल तर घटनेचे कलम ३५ अ रद्द करणे होय. कलम ३७० वेगळ्या संदर्भात घटनेत समाविष्ट करण्यात आले होते आणि कलम ३५ अ चा संदर्भ वेगळा आहे.
---------------------------------------------------------------------------------------


कलम ३७० चा आत्मा केंद्रातील राजवटीने केव्हाच काढून घेतला होता. कलम ३७० रद्द करण्याने त्या जखमेवर मीठ तेवढे चोळले गेले. पण तेवढेच काम मोदी सरकारने केले नाही. या सरकारनेही जम्मू-काश्मीरच्या जनतेला नव्या जखमा देण्याचे केले. फार पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या राज्याची फाळणी करून राज्याचा दर्जा काढून घेत जम्मू-काश्मीर आणि लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश तयार केले. पूर्वीच्या जम्मू-काश्मीर राज्यात जम्मू आणि लडाखला मुस्लीम राज्यकर्त्याचे नेतृत्व स्वीकारणे भाग असायचे. प्रदेश केंद्रशासित केल्याने त्यापासून सुटका झाल्याचा प्राथमिक आनंद जम्मू आणि लडाखच्या जनतेला झाला. हा झाला भावनिक मुद्दा. यापेक्षा महत्वाचा दुसरा मुद्दा होता.  सरकारचे नेतृत्व काश्मीर घाटीतील नेत्यांकडे राहात आल्याने सरकारी विकास योजनांच्या बाबतीत , राजकीय अधिकारांच्या बाबतीत घाटीला झुकते माप दिले जाते आणि जम्मू व लडाख या प्रदेशांना डावलले जाते अशी भावना आधीपासून असल्याने प्रारंभी राज्याच्या विभाजनाचे आणि त्याला केंद्रशासित करण्याच्या निर्णयाचे जम्मू आणि लडाख मधील जनतेने स्वागत केले होते. जम्मू-काश्मीरच्या तुलनेत लडाख हा राजकीयदृष्ट्या दुबळाच असल्याने लडाखकडे पुरेसे लक्ष दिल्या जात नव्हते हे खरेच आहे. त्यामुळे लडाखच्या जनतेने आपला स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश झाल्याचे जल्लोषात स्वागत केले होते. पाच वर्षानंतर मात्र जम्मू व लडाखच्या जनतेचा आनंद पूर्णपणे ओसरला आहे. आपला राज्याचा दर्जा हिरावून घेतल्याची भावना जम्मूतील जनतेत वाढू लागली आहे तर आपण जम्मू-काश्मीर पासून वेगळे झालो तरी आपल्या हातात काहीच नाही हे लडाखच्या जनतेच्या लक्षात आले. आपल्या मागण्यासाठी लडाखची जनता रस्त्यावर उतरली पण केंद्राने दखल घेतली नाही. पूर्वीचीच स्थिती यापेक्षा बरी होती असे म्हणायची पाळी लडाखच्या जनतेवर आली आहे.                                                                 

राज्याचे विभाजन आणि प्रदेश केंद्रशासित केल्याने घाटीतील नेतृत्वाची चांगली जिरली ही भावना जावून जम्मू, काश्मीर आणि लडाख हे तिन्ही विभाग आज राज्याचा दर्जा गमावून बसल्याने समान दु:खी आहेत. ही नवी जखम मोदी सरकारने जम्मू-काश्मीरच्या जनतेला दिली आहे. आता सर्वोच्च न्यायालयानेही जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा लवकर देण्याचे निर्देश दिले आहेत. पण कालमर्यादा न घातल्याने केंद्र सरकार घाईने राज्याचा दर्जा बहाल करील ही शक्यता कमीच आहे. कारण आता जसा उपराज्यपालाच्या माध्यमातून सरळ हस्तक्षेप करता येतो तसा हस्तक्षेप करण्यास जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा दिल्यावर मर्यादा येतील. सप्टेंबर अखेर पर्यंत निवडणुका घेण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने निवडणुका होतील. पण निवडणुका नंतरही निर्वाचित लोकप्रतिनिधीच्या हातात फारसी सत्ता राहणार नाही याची तरतूद मोदी सरकारने करून ठेवली आहे. राज्यातील नेमणुकाचे अधिकार निर्वाचित सरकारला राहणार नसून ते उपराज्यपाल यांचेकडे असतील असा नवा आदेश केंद्र सरकारने काढला आहे. जम्मू-काश्मिरातील राजकीय नेतृत्वाचे पंख छातण्याचा हा प्रकार असल्याने निवडणुका झाल्या तरी परिस्थिती फारसी बदलणार नाही. 

कलम ३७० रद्द केल्याने जमिनीवरील परिस्थिती बदलणार नाही हे मोदी सरकारलाही  माहित होते. कलम रद्द करा म्हणणारे आणि रद्द करू नका म्हणणारे दोन्हींसाठी हा प्रश्न भावनिक होता. मोदी सरकारने काश्मिरेतर भारतीयांची व प्रामुख्याने त्यांच्या संघ परिवाराची भावनापूर्ती केली. कलम ३७० अंतर्गत अपेक्षित स्वायत्तता अस्तित्वात नव्हती तरी काश्मिरी नेतृत्वाला ते कलम तिथल्या जनतेचे समाधान करण्यासाठी हवे होते. हिंदूबहुल राष्ट्रात कलम ३७० मुळे मुस्लीम आणि मुस्लीम बहुल राज्य सुरक्षित आणि सन्मानाने राहू शकेल असे सुरुवातीपासून आतापर्यंत काश्मिरी नेतृत्व काश्मिरी जनतेला सांगत आले, पटवत आले. कलम ३७० ही अशी त्यांची भावनिक गरज होती. कलम ३७० रद्द झाल्याने काश्मिरी मुसलमानात भावनिक असुरक्षिता तेवढी निर्माण केली. काश्मीरच्या बाबतीत काश्मिरी जनतेला भयभीत करणारा बदल कोणता असेल तर घटनेचे कलम ३५ अ रद्द करणे होय. कलम ३७० वेगळ्या संदर्भात घटनेत समाविष्ट करण्यात आले होते आणि ३५ अ चा संदर्भ वेगळा आहे. केंद्राचे कायदे किंवा घटनेची कलमे काश्मीरमध्ये लागू करण्याचा राजमार्ग कलम ३७० असल्याने कलम ३७० नूसार राष्ट्रपतींना मिळालेल्या अधिकारान्वये ३५ अ हे घटनेचे कलम जम्मू-काश्मीर मध्ये लागू झाले एवढाच काय तो कलम ३७० व कलम ३५ अ चा संबंध आहे. १९५२ मध्ये जो नेहरू-अब्दुल्ला करार झाला त्यानुसार या कलमाचा घटनेत १९५४ साली समावेश झाला.                                                                                                                             

 कलम ३५ अ संदर्भात गृहमंत्री अमित शाह म्हणाले होते की हे कलम संसदेची मान्यता घेवून समाविष्ट करण्यात आले नव्हते तर राष्ट्रपतींनी काढलेल्या अधिसूचने द्वारे समाविष्ट करण्यात आले होते. अमित शाह खरेच बोलले पण जम्मू-काश्मीर राज्यात लागू झालेले केंद्रीय कायदे आणि घटनेची कलमे याच पद्धतीने लागू झालीत. घटनेत कलम ३७० अंतर्गत तसे नमूद करण्यात आले असल्याने त्या पद्धतीवर आक्षेप चुकीचा ठरतो. कलमातील तरतुदीला विरोध किंवा आक्षेप असू शकतो. तेव्हा दोन गोष्टी नीट समजून घेतल्या पाहिजेत. कलम ३७० चा भाग म्हणून घटनेत ३५ अ समाविष्ट झाले नाही आणि वैध पद्धतीनेच ते कलम जम्मू-काश्मीरमध्ये लागू झाले. कलम ३७० रद्द झाले म्हणून ३५ अ रद्द झालेले नाही. ३५ अ हे वेगळे रद्द करावे लागले. कलम ३७० लागू असताना कलम ३५ अ ला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टापुढे प्रलंबित होतीच. पण कोर्टाचा निर्णय येण्या आधीच सरकार व संसदेच्या निर्णयाने ते कलम रद्द झाले. मोदी सरकारने कलम ३७० समोर करून खरा गेम केला तो कलम ३५ अ चा . कलम ३७० रद्द केल्याने निर्माण झालेल्या उन्मादात काही काळ तर ३५ अ रद्द झाल्याने त्याचा आपल्यावर काय परिणाम होईल याचा विचार देखील जम्मू आणि लडाख प्रदेशातील नागरिकांनी केला नाही. कलम ३७० पेक्षाही अधिक खोलवर कलम ३५ अ रद्द केल्याचा परिणाम होवू शकतो. त्यासाठी कलम ३५ अ समजून घेतले पाहिजे. 

भारतीय संविधानात नागरिकत्वा विषयी कलम ३५ आहे. या कलम अंतर्गत राष्ट्रपतीच्या अधिसूचनेनुसार कलम ३५ अ जोडण्यात आले. कलम ३५ अ मुळे जम्मू-काश्मीर राज्याला राज्याचे स्थायी रहिवासी किंवा स्थायी नागरिक कोण हे ठरविण्याचा अधिकार तेथील विधानसभेला देण्यात आला. स्थायी रहिवाशाना विशेष अधिकार देण्याचा अधिकारही या कलमामुळे जम्मू-काश्मीर विधानसभेला मिळाला. त्यानुसार जम्मू-काश्मीरच्या स्थायी रहिवासी कोण असतील हे निश्चित करण्यात आले. याच रहिवाशांना किंवा जम्मू-काश्मीरच्या नागरिकांना सरकारी नोकऱ्यात स्थान असेल, त्यांनाच मालमत्ता खरेदी करण्याचा अधिकार असेल. राज्य सरकारी योजनेत स्कॉलरशिप, इतर अनुदान यासाठी हेच नागरिक पात्र असतील. एकूणच राज्याच्या संसाधानातील वाटेकरी तेथील हे रहिवाशी असतील. या नागरिकांव्यतिरिक्त जम्मू-काश्मीरच्या बाहेरून येणाऱ्या भारतीय नागरिकांना राज्याच्या प्रशासकीय नोकऱ्यात स्थान मिळणार नाही. त्यांना जामीन जुमला खरेदी करता येणार नाही. जम्मू-काश्मीरच्या विधानसभेसाठी किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मतदान करता येणार नाही. कायम रहिवाशी म्हणून मान्यता नसलेल्या पण जम्मू-काश्मीर राज्यात राहणाऱ्या नागरिकांना लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याची मुभा देण्यात आली होती. घटनेमध्ये हे कलम नव्याने परिभाषित करून १९५४ साली समाविष्ट करण्यात आले असले तरी अशा प्रकारची व्यवस्था आणि तरतूद जम्मू-काश्मीर संस्थानात १९२७ पासूनच लागू होती. स्थानिकांनाच नोकऱ्या आणि स्थानिकांनाच जमिनी खरेदीचे अधिकार असावेत ही त्यावेळी काश्मिरी पंडितांनी मागणी केली होती. त्या मागणीपूर्तीसाठी राजा हरीसिंग यांनी हा आदेश काढला होता. या आदेशाचे सार म्हणजे घटनेत समाविष्ट करण्यात आलेले कलम ३५ अ होते. 

                                          [क्रमशः]

--------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि. यवतमाळ 
मोबाईल- ९४२२१६८१५८