Wednesday, April 20, 2011

भूदान - एक फसलेले आन्दोलन

"...या देशात शेतीक्षेत्रा बद्दल तर्कसंगत  व
शास्त्रीय विचार कधी झालाच नाही.दारिद्र्याच्या वाटपातच   राज्यकर्त्याना सिंहासनाची व 
खाजिन्याची चावी मिळाल्याने असा विचार करण्याची गरजही  नव्हती.यातच विनोबाजीन्च्या 
भूदान आन्दोलनाने सरकारच्या शेती विषयक चुकीच्या धोरणाला सामाजिक मान्यता 
व नैतिक अधिस्टान  मिळवून दिले.विनोबांच्या दिव्य स्वप्नाची शेती क्षेत्राने चुकविलेली 
ही किंमत आहे!"




                        भूदान - एक फसलेले   आन्दोलन  

          गेल्या १८ एप्रिल रोजी भूदान आंदोलनाच्या प्रारम्भाला ६० वर्ष पूर्ण झाली.१८ एप्रिल १९५१ रोजी तेलंगनातील पोचमपल्ली गावात रामचंद्र रेड्डी नावाच्या जमीनदाराने 
आचार्य विनोबा भावे याना गावातील भुमीहिनाना वाटण्यासाठी आपल्या मालकीची 
१०० एकर जमीन दान करून भूदान या अभिनव संकल्पनेची  मुहूर्तमेढ़   रोवली होती.
देश नुकताच स्वतंत्र झाला होता.औद्योगिकरनाची गती व विस्तार अत्यल्प असल्याने 
सर्वसाधारणपणे   शेती हेच उत्पन्नाचे व पोट भरण्याचे एकमेव साधन होते.हे साधन 
प्रत्येक ठिकाणी मुठभर  लोकांच्या हाती केन्द्रित असल्याने देशभरात जमिनीच्या 
फेर वाटपाच्या मागणीने जोर धरला होता.तेलंगनात तर डाव्यांच्या नेतृत्वाखाली हिंसक 
आन्दोलन सुरु झाले होते.विनोबाजीना सर्वोदय संमेलनासाठी  त्याच अशांत भागात 
जायचे होते.गांधीजींच्या पाउलावर पाउल ठेवून विनोबाजी  त्या क्षेत्रात शांतता स्थापन 
करण्याच्या हेतूने पदयात्रेने निघाले होते. भूदान वगैरे अशी कोणतीही कल्पना किंवा 
संकल्पना त्यांच्या मनात नव्हती.पण पोचमपल्ली गावात भुमिहिनानी विनोबाकडे पोट 
भरण्यासाठी जमिनीची मागणी केली आणि या मागणीला त्याच गावातील एका जमीन 
मालकाने विनोबांच्या उपस्थितीत १०० एकर जमीन देण्याची घोषणा करून प्रतिसाद 
दिला.अशा प्रकारे  विनोबांच्या ध्यानी-मनी नसताना भूदान संकल्पना उदयाला आली 
आणि  त्यानंतर सुमारे एक तप भूदान संकल्पनेने स्थितप्रद्न्य विनोबाना आणि सर्वच 
गांधीवादी कार्यकर्त्याना आन्दोलीत केले.देशभर पदयात्रा करून विनोबा आणि इतर सर्व 
कर्यकर्त्यानी भूदानाचा झांझावात निर्माण केला.जयप्रकाश   नारायण यांच्या सारखे 
स्वातंत्र्य लढ्यातील व स्वातंत्र्योत्तर कालातील मोठे नेतृत्व भूदान आंदोलनात सामील 
झाल्याने तर भूदानाचे तुफानात रूपान्तर झाले.लोकांच्या-जमीन मालकांच्या-उदंड 
प्रतिसादाने देशभरातुन  तब्बल साडे सत्तेचालीस लाख एकर इतके विक्रमी भूदान प्राप्त 
झाले.यातील काही दात्यानी खडकाळ,डोंगराळ  अशी वहिवाटीस योग्य अशी जमीन 
दानात देवून 'पुण्य'  कमावले असले तरी बहुतांश जमीन शेती योग्य होती.दान देवून
माघार घेणारांची संख्या फारच  कमी होती.अशा प्रकारे जवळपास  ४७ लाख एकर
जमीन भूदानाने वाटपा साठी उपलब्ध करून दिली होती.भूदानाच्या समान्तर सीलिंग 
कायद्या द्वारे जमीन ताब्यात घेवुन तिचे भुमीहिनात वाटप करण्याची धड़क मोहीम 
सरकारने हाती घेतली होती.पण कायदा दिमतीला असतानाही सरकारला भूदानात 
प्राप्त जमीनी इतकीही जमीन मिळवता आली नव्हती हे खरे असले तरी जमीनीच्या 
या विक्रमी प्राप्तीतुन काय साध्य झाले या प्रश्नाचे उत्तर देने अवघड आहे.

                          भोंगळ कल्पना   

           
              ज्या पोचमपल्ली गावात पाहिले भूदान मिळाले त्या गावात दोन हजारच्या वर 
भुमीहीन होते.१०० एकरात यांचे कसे भागणार हा प्रश्न  विनोबाना पडला नाही.तसा तो न 
पडण्याचे कारणही होते.या पदयात्रे पूर्वी  विनोबाजीनी बिना बैलाच्या शेतीचा प्रयोग केला 
होता!विनोबा गणिती असले तरी संत होते.संताने श्रम आणि मिळकत या इहलोकीच्या
कल्पनांची सांगड़ घालायची नसतेच.फ़क्त श्रम करताना परमेश्वराशी एकरूप झाल्याचा 
आभासी आनंद लाभला की संतांचे  श्रम सार्थकी  लागतात.बिनाबैलाच्या शेती करण्यातुन , 
ज्याला त्यानी रूषीशेती नाव दिले होते,काय मिळकत  होते याचा जरी त्यानी हिशेब केला 
नसला तरी हात ,हाताची बोटे आणि बोटाची नखे (प्रसंगी खुरपे!) वापरून एक माणूस किती 
चौरस फुट शेती करू शकतो याचा त्याना अंदाज आला असणारच!पण इहलोकातील देवभीरु 
माणूसही शेतीत श्रम करतो ते तो मानत असलेल्या देवाशी एकरूप  होण्या साठी नव्हे तर 
आपल्या कुटुम्बीयांचे पोट भरन्या साठी .छोट्या तुकडयात  शेती करने किती अव्यावहारिक 
व तोट्याचे असते हे अक्षरशत्रु शेतकऱ्यालाही कळते.अर्थात विनोबा प्रमाणेच भुमीहीन 
मजुरासही  याचा अनुभव नसल्याने  त्याने कृतकृत्य झाल्याच्या समाधानाने भूदानाच्या 
जमिनीचा तुकडा उत्साहाने कसायला घेतला.देव आठवन्यासाठी अशी शेती कसन्या सारखा 
दूसरा चांगला मार्ग नाही हे भूदान जमिनीची मालकी मिळालेल्या नव्या भू-मालकास 
समजायला वेळ लागला नाही.जमिनीचा तुकडा कसन्या साठी बैल जोडी पोसता येत नाही 
किंवा वखर-नांगर अशी औजारे बाळगने परवडत नाहीत हे अनुभवाने त्याला कळले.मजूरी 
करीत असताना उधार-उसनवारी  तर त्याच्या पाचवीला पुजलेलीच होती,शेत मालक झाल्याने 
त्यात तर बदल झालाच नाही उलट बी-बियाने अशा नव्या गरजा पूर्ण करण्यासाठी सावकारी 
पाशात तो अडकला.शेवटी कर्जाचा बोजा डोक्यावर घेवुन जमिनीचा तुकडा दुसऱ्याच्या 
घशात घालून पुन्हा मजूरी कड़े वळने   त्याला भाग पडले.भूदानाची जमीन मिळालेल्या 
जवळपास प्रत्येकाची हीच रडकथा आहे.पण फ़क्त भूदानाचीच ही कहाणी नाही.ज्याना सीलिंग 
कायद्याने जमीनी मिळाल्या त्यांची गतही अशीच झाली.विनोबांचे सोडा ,ते तर संतच होते.पण 
सीलिंग कायदा करणारे तर लौकीकार्थाने विद्वान् होते. तरी त्यानी कशी माती खाल्ली? याचे 
एक कारण तर हे आहे की ,औद्योगिकरना अभावी उपजिविकेचा दूसरा मार्ग उपलब्ध 
नसल्याने गावा-गावातून जमीन वाटपाची मागणी होने अपरिहार्य आणि स्वाभाविक होते.
नवे रोजगार लवकर आणि पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देने सोपे नव्हते.त्यापेक्षा 
कायदा करून जमीन वाटपाची मागणी पूर्ण करने सोपे होते.या लोकानुनयाचा मोठा 
फ़ायदा निवडनुकीत होणार हे पक्के असल्याने सीलिंगचा निर्णय व्हायला वेळ लागला नाही.
जमीन वाटपाला चालना मिळन्याचे दुसरे महत्वाचे कारण म्हणजे लोकशाहीच्या सर्व 
स्तम्भांची शेतीक्षेत्रा प्रती  असलेली अनास्था व अद्न्यान हे होते.शेती क्षेत्रातील उत्पादकता 
वाढून रोजगार वृद्धी साठी जमीनीचे वाटप गरजेचे होते.पण त्या दृष्टी ने विचार न होता 
समाजवादी विचाराच्या आहारी जावून आणि राजकीय लाभावर नजर ठेवून वाटप झाले.
यातून ना उत्पादकता वाढली ना रोजगार वाढले.वाढ झाली ती शेतीवरच्या बोज्यात आणि 
जीवघेण्या दारिद्र्यात!अगदी ज्या तर्काने सीलिंगची मर्यादा निश्चीत केली ,तोच तर्क वाटपा 
साठी वापरला असता तर -म्हणजे सीलिंग कायद्यानुसार जेवढी जमीन शेतमालक स्वत:
जवळ ठेवू शकत होता ,तितके एकर जमीन एका भुमिहिनाला दिली असती तर -किमान 
ग्रामीण दारिद्र्यातील वाढ टाळता  आली असती.पण या देशात शेतीक्षेत्रा बद्दल तर्कसंगत  व 
शास्त्रीय विचार कधी झालाच नाही.दारिद्र्याच्या वाटपातच   राज्यकर्त्याना सिंहासनाची व 
खाजिन्याची चावी मिळाल्याने असा विचार करण्याची गरजही  नव्हती.यातच विनोबाजीन्च्या 
भूदान आन्दोलनाने सरकारच्या शेती विषयक चुकीच्या धोरणाला सामाजिक मान्यता 
व नैतिक अधिस्टान  मिळवून दिले.विनोबांच्या दिव्य स्वप्नाची शेती क्षेत्राने चुकविलेली 
ही किंमत आहे!

                        भोंगळ कारभार

                  भूदानाचे कार्य अव्याहत एक तप चालल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह व शक्ती   
ओसरने स्वाभाविक असले तरी त्याचे दोन विपरीत परिणाम झालेत.एक तर भूदान जमीन   
वाटपाचे काम रेंगाळले .आज ही लाखो एकर जमीन वाटपा विना पडून आहे.एक तर ही  
जमीन तशीच पडून आहे किंवा कोणीतरी त्यावर अवैध ताबा मिळवून बसले आहे.
वाटप न झाल्याने भूमीहीन कर्जाच्या विळख्यातुन वाचला असे मानून समाधान करून 
घेता येइल .पण सरकारी बाबूंच्या व साहेबांच्या आशिर्वादाने या जमिनीची जी विल्हेवाट 
लावली जात आहे तो नक्कीच चिंतेचा विषय आहे.साधारणपणे सर्वोदयी कार्यकर्ता सरळ
मार्गी व समोरच्यावर चटकन  विश्वास ठेवणारा असल्याने त्याने भूदान जमिनीच्या  
नोंदी ठेवण्याची तसदी घेतली नाही किंवा घेतलेल्या नोंदी सुरक्षित ठेवल्या नाहीत.या   
सर्वोदयी भोंगळ पनाने या जमीनींचे भ्रष्ट व्यवहार मोठ्या प्रमाणात होवू लागले आहेत. 
महाराष्ट्रात सर्वाधिक भूदान मिळालेल्या यवतमाळ जिल्ह्यात पद्धतशीरपणे
भूदानाच्या नोंदी असलेले दफ्तरच  गायब करून मोठे घोटाले करण्यात आले आहे.
अनेक अपात्रान्च्या पदरी भूदानाचे दान देण्यातही हाच जिल्हा आघाडीवर आहे!
भूदान वाटपात झालेल्या विलंबाने इतरही जिल्ह्यात आणि राज्यात कमी अधिक
फरकाने अशीच स्थिती आहे.कोणालाही आश्चर्य वाटेल पण याला बिहार अपवाद
ठरू पाहात आहे.तेथील राज्य सरकारने भूदान जमीनीच्या वाटपा साठी मेहनत घेनाऱ्या 
कार्यकर्त्याना सहकार्य केल्याने गेल्या दोन वर्षात मोठ्या प्रमाणावर भूदान जमीनीचे 
सत्पात्री दान झाले आहे.अर्थात याने जमीन मिळालेल्या भुमीहीनाचे हालच होणार आहेत 
यात शंका नाही ,पण किमान तेथे वाटपातील भ्रस्टाचारास काहीसा प्रतिबन्ध झाला आहे.
मात्र याच्या उलट काही ठिकाणी भू-माफियांची आणि प्रभावी लोकांची नजर भूदान जमिनीवर 
पडल्याने मोठा अनर्थ घडू पाहात आहे.शहरा लगतच्या आणि लाखो रुपये किमतीचे सागवान 
असलेल्या जमिनीवर यांची नजर गेली आहे.सत्प्रवृत्तिच्या व सरळमार्गी कार्यकर्त्याना 
पैशाचा लोभ दाखवून हेराफेरीचे प्रयत्न अनेक ठिकाणी सुरु आहेत.भूदानाची ही परिणिती 
भयचकित करणारी आहे.
भूदानात एक तप भर झालेल्या शक्तीपाताचा दूसरा परिणाम समस्त शेती क्षेत्राला भोगावा 
लागत आहे.भूदान जमीन कसने व त्यावर पोट भरने व्यवहार्य नाही याची जाणीव उशिरा
का होईना विनोबाना झाली असावी आणि म्हनुनच त्यानी नंतर भूदाना ऐवजी ग्रामदानाची  
कल्पना उचलून धरली.यात भूदाना सारखे वाटप करण्या ऐवजी गावाच्या जमीनीचे एकत्रीकरण 
   करण्यावर भर दिला होता.अशा प्रकारे जमीनीचे प्रत्यक्ष एकत्रीकरण करून पिकांचे
नियोजन केले गेले असते तर शेती क्षेत्राचे चित्र बदलण्याची शक्यता निर्माण झाली
असती  .सबै भूमी गोपाल की म्हणत असतानाच वैयक्तिक मालकीला स्थान देनाऱ्या
आणि वैयक्तिक अभिक्रमाला वाव देनाऱ्या ग्रामदानाचा प्रत्यक्ष प्रयोग कदाचित शेती
क्षेत्राला नवी दिशा देवू शकला असता.पण विनोबानी कल्पकतेने भूदानाची चुक
ग्रामदानाच्या रुपाने दुरुस्त केली असली तरी  भूदानात काही चुकले याची कबुली त्यानी 
कधीच न दिल्याने कार्यकर्त्यासाठी  ग्रामदान हां फ़क्त एक नवा कार्यक्रम ठरला.भूदान हे
एका अर्थाने पारलौकीक कार्य असल्याने विनोबाना त्यात रस होता.पण ग्रामदान हे
इहलौकीक कार्य असल्याने विनोबाना त्यात रस असण्याचे कारण नव्हते.म्हनुनच त्यानी 
भूदानाची हानी ग्रामदानात भरून काढन्याची जबाबदारी  कार्यकर्त्यावर सोपवून स्वत:
क्षेत्रसंन्यास घेतला.शरीराने ,मनाने आणि विचाराने थकलेल्या कार्यकर्त्याना ही जबाबदारी
पेलने शक्यच नव्हते.परिणामी विनोबाजींच्या अलौकीक अशा पारलौकीक  भूदानाने शेती
क्षेत्राचे झालेले नुकसान कधीच  भरून  निघाले नाही!                  (समाप्त) 


सुधाकर जाधव
मोबाइल:९४२२१६८१५८
पांढरकवडा,जि.यवतमाळ

9 comments:

  1. किती नेमके पृथक्करण-विश्लेषण केले आहे तुम्ही, सुधाकरजी. आपण ज्या गोष्टींना आपल्या तारुण्यात पूज्य मानले त्यांची शास्त्रीय पध्दतीने चिकित्सा करणे हे फार महत्त्वाचे ठरते.

    ReplyDelete
  2. It's a fantastic analytical article.

    ReplyDelete
  3. It is a well analysed article. However, two more point need to be considered for analysing the bhudaan land. A) quality of land which was 'donated' B)How many hectares of land holding of which quality will make it productive and profitable C) Would giving land to individuals or for group of farmers as shareholders of a farm company be a better option. In fact, some genuine bhudaan experiments have considered several aspects on which as a whole the program failed to have much impact.

    ReplyDelete
  4. subhash lode to me


    Sudhakar,
    Thanks for analysing and posting this article
    ह्या सगळ्या परिस्तिथी ला आपल्या लोकांची (off course we have some exceptions) ऐत खावु वृत्ति जबाबदार आहे.

    ReplyDelete
  5. Kishor Mahabal to me



    I am not much convinced about your criticism. Please read three volumes on Bhoodan Movement written by Dr.Parag Cholkar. There is hardly anything new in this criticism. What are your suggestions and which such movement you are going to start to avoid the mistakes committed by Vinoba.?
    dr.kishor mahabal

    ReplyDelete
  6. Daniel Mazgaonkar to me




    प्रिय सुधाकर,
    आम्ही मुर्खपना केला आहे. कारण काहीच विचार ना करता भूदानांत कोलेज सोडून पडलो. आणि सर्व काही फुकट गेले. जमीन वाटली ती ही फारच ख़राब होती, त्यांत काहीच पिकत नव्हते. उगाच गरीब शेतकर्यां वर बोजा तकला, त्यांना जमीन वाटुन.
    पण ते जाऊदे.
    समाजात काही मूर्ख असले म्हणजे शान्यांची कीमत वाढते.

    ReplyDelete
  7. milind murugkar to me:

    Dear Sudhakar,
    I tried to post this comment on your blog site but couldnt.
    Here is my response:

    Swatantratawad has done more harm to agriculture than Bhudan

    Small sized agriculture (family farms) with required infrastructure like irrigation,technology,institutional credit , can prove extremely efficient and dynamic. This is obvious from the examples in the horticulture and vegetable cultivation.These farms employ primarily family labour.Michael Lipton's recent book on the experience of world wide land reforms demonstrate this convincingly. (The book , unfortunately is very expensive to buy.) Bhudan could have played a big role in making effective dent on poverty if these conditions were fulfilled. If bhudan movement were accomanied by creation of the required infrastructure the story would have been different. But will the author criticise the government for failing to do so? I suspect his ideology of 'swatantratawad'(read anti-state) will not allow him to do so. More than Bhudan, it is this ideology which has done great harm to the Indian agriculture.

    ReplyDelete