Thursday, January 17, 2013

स्त्री प्रश्न - उडदामाजी काळे गोरे !


 जगभरात स्त्रियांसाठी सर्वाधिक वाईट समजल्या जाणाऱ्या देशात भारत चौथ्या क्रमांकावर आहे ही शरमेची बाब असली तरी सत्य आहे. पण याचा अर्थ स्त्रियांच्या बाबतीत इतर देशात सारे आलबेल आहे असे नाही. जगाच्या कानाकोपऱ्यात स्त्रियांची गुलामी रूढ करण्याचा अधर्म धर्म नावाच्या संस्थेने केला आहे.जगभरातील स्त्रियांनी एकत्र येवून त्यांच्यावरील अन्याय आणि अत्त्याचार विरोधात चळवळ उभी करण्याची गरज आहे.या संघर्षात स्त्रीला तिच्या साखळदंडा शिवाय गमावण्या सारखे काहीच नाही. 
------------------------------------------------------------------------------------------------------------

दिल्ली बलात्कार घटनेला एक महिना उलटून गेला आहे. या महिनाभरात लोकक्षोभ ओसरला आहे. दरम्यान अनेक ठिकाणी नव्याने बलत्काराच्या घटना घडून गेल्यात. त्या फक्त माध्यमांच्या नोंदीचा विषय ठरल्या. त्या विरुद्ध नव्याने आंदोलने उभी राहात नसली तरी दिल्ली प्रकरणी स्त्रियांवरील अत्त्याचार विरोधी जे वातावरण तयार झाले त्याच्या परिणामी अशा तक्रारी घेवून पुढे येण्यातील संकोच कमी झाला आणि पोलीस प्रशासन अशा प्रकरणी सजग आणि तत्पर झाल्याचे दिसत आहे. जगभर ज्या घटनेची दखल घेतली गेली , चर्चा झाली त्याचा एवढाच परिणाम होणार असेल तर स्त्री विरोधी मानसिकता बदलण्यासाठी त्याचा फार उपयोग होणार नाही. ही मानसिकता खोलवर रुजलेली आहे आणि हा काही एकट्या भारताचा प्रश्न नसून जगभर अशीच मानसिकता कमी अधिक प्रमाणात आढळून येते. दिल्ली घटनेची देशात आणि जगभर घेतली गेलेली दखल ही स्त्री अत्त्याचार विरोधी जागतिक चळवळीची नांदी ठरायला हवी. भारतात स्त्री अत्त्याचाराच्या घटना मोठया संख्येने घडतात हे खरे आहे. जगभरात स्त्रियांसाठी सर्वाधिक वाईट समजल्या जाणाऱ्या देशात भारत चौथ्या क्रमांकावर आहे, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्या खालोखाल भारतात स्त्रियांची दुर्दशा आहे ही शरमेची बाब असली तरी सत्य आहे.  जी-२० या पुढारलेल्या देशांमधील भारत हे एकमेव राष्ट्र स्त्रियांसाठी असुरक्षित मानल्या जाते हे सत्य देखील नाकारता येण्या सारखे नाही. पण याचा अर्थ स्त्रियांच्या बाबतीत इतर देशात सारे आलबेल आहे असे नाही. जगभरच स्त्रियांवर अत्त्याचार होतात,  जगातील सगळ्याच राष्ट्रात सगळ्याच क्षेत्रात स्त्रियांसोबत भेदभाव केला जातो आणि मागासलेले देश सोडा , पुढारलेले देश असा अन्याय आणि भेदभाव करण्यात पुढे आहेत हे या निमित्ताने पुढे येणे आवश्यक आहे. जगभरातील स्त्रियांनी एकत्र येवून त्यांच्यावरील अन्याय आणि अत्त्याचार विरोधात चळवळ उभी करण्याची गरज आहे. जगभरातील स्त्रियांचे प्रश्न जवळपास सारखेच आहेत. पुरुषप्रधान समाजात त्यांची सर्वत्र ससेहोलपट होत आहे . पाकिस्तान-अफगाणिस्तान सारख्या देशात स्त्री शिक्षणाचा प्रश्न बिकट आहे यात शंकाच नाही. अमेरिके सारख्या राष्ट्रात स्त्री शिक्षणाचा प्रश्न सुटला असेल . पण शिक्षणानंतरच्या संधीत स्त्रियांना डावलण्याचे प्रमाण  अमेरिका ,अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यात सारखेच आहे. भारतात स्त्री म्हणून काम मिळण्यात भेदभाव केल्या जात असल्याच्या तक्रारी मोठया प्रमाणात समोर आलेल्या नाहीत हे मान्य. पण भारतातील ज्या महिला स्वत:च्या कर्तबगारीवर समोर आल्या आहेत त्या महिलांचे घरातील स्थान ज्या महिलांशी कामाची संधी देण्याबाबत भेदभाव झाला आहे त्या महिलेच्या घरातील स्थाना सारखेच दुय्यम आहे. याचा अर्थ आपल्या देशात किंवा इतर देशांमध्ये महिला कुठे शिक्षणात मागे असतील किंवा पुढे असतील , घराबाहेरच्या कामात महिलांचा सहभाग कमी जास्त असेल असा कोणताही फरक असला तरी घरी आणि दारी सर्वच महिला सारख्याच उपेक्षित , दुय्यम आणि असुरक्षित आहेत हे सत्य दुर्लक्षित करता येणार नाही. भारताची   अमेरिका -ब्रिटन या सारख्या पुढारलेल्या देशाशी स्त्री अत्त्याचाराच्या आकड्याची तुलना केली तर लोकसंख्येच्या प्रमाणात हे आकडे बघितले तर पुढारलेली राष्ट्रे अत्त्याचारा बाबतीत मागे आहेत असे चित्र नाही. भारतात कायदे कडक नाहीत , शिक्षा कठोर नाहीत ही ओरड खरी आहे. पण ब्रिटन - अमेरिकेच्या बाबतीत तेही कारण नाही. बलात्काराच्या बाबतीत तर भारत आणि अमेरिका एकाच पातळीवर आहेत. समोर आलेल्या आकड्याच्या बाबतीत नव्हे तर , समोर येत नसलेल्या प्रकरणाच्या बाबतीत देखील ! अमेरिकेच्या न्याय विभागाने ऑगस्ट मध्ये जो पाहणी अहवाल जाहीर केला त्यानुसार जवळपास ३३ टक्के प्रकरणी तक्रारीच दाखल होत नसल्याचे उघड केले आहे. बलात्कार हाच मुळात क्रूर प्रकार आणि असा हा क्रूर प्रकार करण्यातील क्रूरता देखील सारखीच. अमेरिकेच्या ओहिओ राज्यातील छोट्या शहरातील एका शाळेच्या फुटबॉल टीमच्या मुलांचे जे सामुहिक बलत्कार प्रकरण समोर आले आहे ते दिल्ली सारखेच ओशाळवाणे आहे. अमेरिके सारख्या खुल्या समाजात लैंगिक उपासमार होणे शक्य नाही. पण तेथे अशा घटना होतात तेव्हा त्या हेच दर्शवितात की बलात्कार हे लैंगिक भूक भागविण्यासाठी होतात असे नाही . ते स्त्री ही भोगवस्तू आहे आणि ती भोगण्याचा पुरुषांना अधिकार आहे या मानसिकतेतून होते. बलात्काराच्या बाबतीत स्त्रीला जबाबदार धरण्याची मानसिकता देखील सगळीकडे सारखी आहे. कॅनडा सारख्या प्रगत राष्ट्राच्या पोलीस प्रमुखाने गेल्या वर्षी स्त्रियांच्या कपड्या बाबत केलेले मतप्रदर्शन  जगभरची  मानसिकता उघड करते .  प्रगत पश्चिमी राष्ट्रात अशा घटना घडत असल्या तरी एक महत्वाचा फरक लक्षात घेतला पाहिजे. कॅनडा पोलीस प्रमुखाच्या उदगारानंतर कॅनडा व अमेरिकेतील स्त्रिया रस्त्यावर उतरल्या होत्या. आपाल्याकडे मात्र असे उदगार काढणारे कसे बरोबर आहेत हे सांगण्याची , समर्थन करण्याची स्पर्धा लागते. बलात्कार पश्चिमी राष्ट्रातही होत असले तरी त्याच्या भीतीने स्त्री घरात बसत नाही किंवा तिचे कुटुंबीय तीला घरात बसायला सांगत नाहीत.  जगभर  स्त्री विरोधी मानसिकता अनंतकाळापासून अस्तित्वात असूनही पश्चिमी राष्ट्रात आणि इतर राष्ट्रात स्त्रियांच्या परिस्थितीत जो फरक दिसतो तो याचमुळे.  टोळीसत्ताक राज्यापासून ते प्रजासत्ताक राज्य स्थापन होईपर्यंतच्या प्रदिर्घ काळात जगभर स्त्री विरोधी  मानसिकता रुजली आणि वाढली आहे. आजच्या इतके जग जवळ आलेले नसताना, संपर्काची फारसी साधने नसताना जगात सर्वत्र एकच गोष्ठ सारखेपणाने आणि बिनबोभाट सुरु होती ती म्हणजे स्त्रियांची गुलामी. निग्रो आणि तत्सम जमातीचा गुलाम म्हणून वापर होण्याच्या कितीतरी आधीपासून स्त्रियांची गुलामी रूढ झाली होती. जगाच्या कानाकोपऱ्यात स्त्रियांची गुलामी रूढ करण्याचा अधर्म धर्म नावाच्या संस्थेने केला आहे. संपूर्ण जगाला आपल्या कवेत घेणारा एकही धर्म झाला नाही. निरनिराळ्या भूभागात निरनिराळ्या धर्मानी आपले अधिराज्य कायम केले आणि गाजविले. निरनिराळ्या भूभागात , निरनिराळ्या काळात स्थापन झालेल्या  निरनिराळ्या धर्मात एका गोष्टीबाबत कमालीचे साम्य आणि एकवाक्यता होती.  ती म्हणजे स्त्रियांचे समाजातील स्थान आणि भूमिका या बाबत. भारतात ही मानसिकता हिंदू धर्माने तयार केली असेल , पाकिस्तान-अफगाणिस्तानात इस्लाम धर्मामुळे तयार झाली असेल आणि अमेरिका -ब्रिटन मध्ये ख्रिस्ती धर्मामुळे निर्माण झाली असेल. स्त्रियांची जगभर जी परवड झाली आणि होत आहे त्यामागे धर्माचा हात आणि वाटा सर्वत्र मोठा,महत्वाचा आणि सारखा आहे. स्त्री समस्येचे हे मूळ समजून घेवून मूळावरच घाव घालण्याचा प्रयत्न आजतागायत न झाल्याने कमी अधिक फरकाने जगभर स्त्री प्रश्न कायम राहिला आहे.  

                             धर्मसत्तेचा ऱ्हास पण धर्माचा प्रभाव कायम 

कार्ल मार्क्सने धर्म ही अफूची गोळी आहे असे म्हंटले होते. त्याचे हे विधान स्त्रियांच्या संदर्भात तंतोतंत लागू होते. धर्माचा अफू पाजून धर्माचार्यांनी स्त्रीला ग्लानीत नेले आणि त्यांच्यावर गुलामी लादली. दोन हजार वर्षापेक्षा अधिक काळापासून  पुरुष तर स्त्रीला गुलाम समजतच नाही तर गुलाम म्हणून वागवत आलेत. धर्माच्या अफुच्या अंमलाखाली स्त्रिया देखील स्वत:ला गुलाम समजत आल्या आहेत. स्त्रियांच्या गुलामीचा प्रारंभ भारतापासून झाल्याने भारतीय स्त्री सर्वाधिक काळ गुलामीत राहिली आणि त्यामुळे गुलामीचे संस्कार तिच्यावर खोलवर रुजले. मनुस्मृती हा स्त्रियांच्या युगा-युगाच्या दु:खाचा आरंभ बिंदू मानला जातो. मनुस्मृतीच्या आधीच्या काळात स्त्रिया शिक्षण घेवू शकत होत्या , धार्मिक कार्यात पुरुषाच्या बरोबरीने सहभागी होवू शकत होत्या. मनुस्मृतीचा अंमल सुरु झाल्यापासून परिस्थिती बदलली. इंग्रज आपले राज्य स्थापन करे पर्यंत जनमानसावर मनुस्मृतीचा पगडा कायम होता. या तुलनेत इतर भूभागात दुसऱ्या धर्माचा उदय उशिरा झाला आणि त्यांच्या धर्म संहितेचा अंमल त्याहून उशिरा झाला. स्त्रियांनी घर सांभाळले पाहिजे , चूल आणि मुल हेच तिचे कार्यक्षेत्र आहे  या गोष्ठी मनुस्मृतीची देन आहे.  स्त्री आणि पुरुषांना वेगवेगळे नियम आणि मापदंड लावून स्त्रीचे स्थान पुरुष निर्भर करण्यात मनुस्मृतीची भूमिका महत्वाची ठरली. भारत प्रजासत्ताक राज्य बनून नवीन संविधान लागू झाले तरी मनुस्मृतीने रुजविलेले संस्कार आजही भारतीय जनमानसाचा ताबा घेवून आहेत . संविधानाने स्त्रीला दिलेले स्वातंत्र्य आणि समानता तीला उपभोगता येत नाही त्याचे हे कारण आहे. मनुस्मृतीने निर्माण केलेल्या वर्णव्यवस्थेला प्रबळ आव्हान देण्याचे काम बौद्ध धर्माने केले. समाजात कनिष्ठ मानल्या गेलेल्या समाजाला सन्मानाचे स्थान बौद्ध धर्माने दिले. पण स्त्रियांच्या बाबतीत गौतम बुद्धाची भूमिका समतेची  नसल्याने स्त्रियांच्या परिस्थिती बौद्ध धर्मामुळे फारसा फरक पडलेला आढळून येत नाही. बुद्धाने स्त्रियांना संन्यासाची परवानगी देवून भिक्षुणीसंघ स्थापन केला. बुद्धाचे हे कार्य ऐतिहासिक आहे. पण अशी परवानगी देतांना घालण्यात आलेल्या अटीमुळे बौद्ध धर्मातही स्त्री दुय्यमच राहिली. स्त्रीच्या दुर्दशे बद्दल स्वामी विवेकानंदानी हिंदू धर्मा सोबत बौद्ध धर्माला देखील जबाबदार मानले होते.  स्त्री स्वतंत्र आणि समान मानली जात नसेल तर तिच्यावर अन्याय आणि अत्त्याचार होणारच आणि आज तेच होत आहे. जगाच्या ज्या भूभागात मनुस्मृती पोचली नाही तिथे दुसऱ्या धर्मानी तिची जागा घेतलेली आढळते.  भारतात मनुस्मृतीचा अंमल सुरु झाल्यानंतर बऱ्याच काळाने जगाच्या दुसऱ्या भागात ख्रिस्ती धर्माचा उदय झाला. या धर्माचा संस्थापक येशू याच्या शिकवणीतून आणि आचारातून स्त्री-पुरुषात भेद केला गेला असे दिसत नाही. पण नंतर लागू झालेले चर्चचे नियम याने ख्रिस्तीधर्मीय स्त्रीची अवस्था मनुस्मृती पेक्षाही वाईट करून टाकली होती.  स्त्रीला माणूस मानण्यास देखील चर्च तयार नव्हते.यानंतर स्थापन झालेल्या इस्लाम धर्माने शेवटचा प्रेषिताच्या काळात खूप वाईट स्थितीत जीवन जगत असलेल्या स्त्रीला किंचित दिलासा देण्याचे काम केले. स्त्री आणि पुरुषाच्या गुन्ह्याबद्दल समान शिक्षा आणि विधवांना पुनर्विवाह करण्यास परवानगी देण्यात आली होती. अशी परवानगी ख्रिस्ती धर्मानेही दिली होती. पण इस्लाम किंवा ख्रिस्ती या धर्मानी स्त्रीला कधीच पुरुषाच्या समान दर्जा दिला नाही. तिचे अधिकार आणि स्थान नेहमीच दुय्यम ठेवण्यात आले. इस्लाम काळात स्त्री पडद्यात गेल्याचे पाहायला मिळते. सर्व धर्मानी स्त्रीला पुरुषाच्या ईश्वरप्राप्तीच्या किंवा मोक्षप्राप्तीच्या मार्गातील अडथळा मानून तिच्यावर बंधने लादली.  आज लोकशाही प्रजासत्ताक देश मोठया संख्येने उदयाला आलेले पहावयास मिळत असले तरी तेथील जनमानसावर धर्माचा पगडा कायम असल्याने अगदी प्रगत राष्ट्रात देखील स्त्रीचे स्थान दुय्यम राहिले आहे. धर्माने निर्माण केलेली स्त्री-पुरुष विषमता ही स्त्रियांच्या मार्गातील सर्वात मोठी धोंड असून जगाच्या पाठीवरील एकही राष्ट्र याला अपवाद नाही.
                                      जागतिक चळवळ 

सर्वत्र परिस्थिती सारखी , कारणही सारखे पण तरीही जगातील स्त्रिया कधी एक झाल्या नाहीत की त्यांनी एकत्र लढा पुकारला नाही. विखुरलेल्या छोट्या-मोठया लढाईने स्त्रियांचे जीवन काहीसे सुसह्य झाले असेल पण मूळ प्रश्न कायम आहे. इंग्लंड-अमेरिकेत स्त्रियांनी अधिकारासाठी केलेल्या आंदोलनाचा मोठा लाभ जगभरच्या स्त्रियांना आपसूक मिळाला. त्यामुळे संविधानात जगभरात स्त्री-पुरुष समतेला स्थान मिळाले. तरीही धर्माचा आधार घेवून स्त्रीला डावलण्याचे प्रयत्न थांबलेले नाहीत. मध्यंतरी पाकिस्तानात तत्कालीन सेना व राष्ट्र प्रमुख झिया उल हक यांनी एक धार्मिक समिती नेमून तिच्या करवी स्त्रीला राष्ट्राध्यक्ष बनता येणार नाही असा फतवा काढला होता. भारतातही स्त्रीने काय करावे काय करू नये याचे फतवे निघत असतातच. देश राज्यघटनेनुसार चालतो पण समाज धार्मिक नियमांचे पालन करतो या कात्रीत सगळा स्त्री समाज सापडला आहे. पुरुषांना संविधान आणि धर्म या दोन्हीचे फायदे मिळतात . पण स्त्रीला संविधानाचा लाभ मिळत नाही पण धर्माचा तोटा मात्र सहन करावा लागतो. धर्माच्या अफुच्या ग्लानीतून फक्त स्त्रियांनी मुक्त होवून चालणार नाही. समाजालाही मुक्त करावे लागेल. धार्मिक नियम पुरुषांना अनुकूल असल्याने सहजासहजी ते त्यांचा त्याग करणार नाहीत. धर्मग्रंथांचा जनमानसावरील प्रभाव संपवायचा असेल तर समाजात संविधाना बद्दलची आस्था वाढविली पाहिजे. संविधानाच्या  सन्माना शिवाय  स्त्रियांचा सन्मान शक्य नाही.  त्यासाठी स्त्रियांनाच पुढाकार घ्यावा लागेल. जगभरात या बाबतीत सारखीच परिस्थिती असल्याने स्त्री चळवळी कडून जगातील स्त्रियानो एक व्हा असे आवाहन करण्याची गरज आहे. या संघर्षात स्त्रीला तिच्या साखळदंडा शिवाय गमावण्या सारखे काहीच नाही.
                          (समाप्त)
सुधाकर जाधव
मोबाईल-९४२२१६८१५८
पांढरकवडा,
जि.यवतमाळ  

2 comments:

  1. स्त्रियांच्या उच्च स्थानाची इतर धर्मातील अनेक उदाहरणे देता येतील, अगदी वैदिक धर्मातील देखील. प्रश्न हा आहे की गौतम बुद्ध यांची स्त्रियांविषयी मते सुरवातीला चांगली नव्हती, आणि त्यांना ती नंतर मनापासून नव्हे तर नाईलाजाने बदलावी लागली. आपापल्या धर्म स्त्रियांच्या बाबतीत किती उदार आहे हे सांगण्याअगोदर वेगवेगळ्या धर्मातील स्त्रियांच्या स्थानाविषयी तुलनात्मक अभ्यास केला पाहिजे. तसेच सध्या वेगवेगळ्या धर्मात स्त्रियांचे स्थान काय आहे याचाही तुलनात्मक अभ्यास केला पाहिजे. तुलनात्मक अभ्यास करूनच निष्कर्ष काढले पाहिजेत.(शिक्षणाचे प्रमाण, आर्थिक स्वातंत्र्य, कौटुंबिक निर्णयातील सहभाग वगैरे). आमचे गाव महान आहे की नाही ते कळण्यासाठी इतर गावे पण बघितली पाहिजेत. ज्यांना आपले गाव सोडून इतर गावे माहीत नाहीत, त्याना आपल्या गावाहून चांगली आणि वाइटही गावे आहेत हे कसे कळेल?

    ReplyDelete
  2. स्त्रियों से जुड़े अपराधों की जड़ है- धर्म -- swami Balendu , Vrandavan.
    ---------------------------
    कल के जन्मदिन के बाद, मैं वापस उसी मुद्दे की ओर लौटना चाहूंगा जिस पर मैंने इस हफ़्ते बातचीत शुरू की है – भारत में बलात्कार और यौन-उत्पीड़न के दुखद लेकिन महत्वपूर्ण मुद्दे पर। दिल्ली में हुई बर्बर सामूहिक-बलात्कार की घटना के बाद विरोध-प्रदर्शनों और जनसामान्य के बीच बहसों की वजह से इस विषय को लेकर एक सामान्य जागरुकता फैलती दिख रही है जिसके बाद आवश्यक बदलाव की उम्मीद-सी दिख रही है। कई लोगों ने कारणों-निवारणों पर अपने सुझाव दिए हैं और कई लोगों ने बलात्कारियों के लिए मृत्युदंड की मांग भी की है। लेकिन क्या आपको वास्तव में यह लगता है कि बलात्कार क़ानून-व्यवस्था की समस्या है? या क्या आपको लगता है कि कड़ी सज़ा के प्रावधान से, मृत्युदंड से, आप इस अपराध को रोक लेंगे? मुझे नहीं लगता कि मौत की सज़ा इसका इलाज है। आपको समस्या की जड़ में जाना होगा – और मेरे हिसाब से वो जड़ धर्म व संस्कृति है। आइए आज धर्म पर चर्चा करते हैं।
    समस्या की जड़ धर्म द्वारा पुरुषों को स्त्रियों के बारे में मिलने वाली सीखें हैं। यह एक सत्य है कि धर्म स्त्रियों को अशुभ बताता है, उन्हें भोग की जाने वाले वस्तु, दोयम दर्जे के इंसान के रूप में वर्णित करता है जिस पर पुरुषों का स्वामित्व है और जिन्हें पुरुषों की आज्ञाकारिनी बनकर रहना चाहिए। यह सिर्फ़ हिन्दुत्व की समस्या नहीं है। यह धर्म की ही समस्या है। मैंने क़ुरान में कहीं पढ़ा था, “तुम्हारी औरतें तुम्हारी खेतियां हैं लिहाज़ा अपनी खेती में जब और जिस तरह चाहो जोत सकते हो।” अन्य धर्मों में भी ऐसे उदाहरणों की भरमार है, जो कहते हैं कि स्त्रियों को पीटा जा सकता है, उनका इस्तेमाल किया जा सकता है और यहां तक कि उन्हें दान स्वरूप किसी को दिया जा सकता है। भारत में धर्म और संस्कृति के ठेकेदारों को शर्म आनी चाहिए – आपके इन्हीं तथाकथित सिद्धांतों के कारण, हमारे देश की हालत इस हद तक गिरी हुई है। आप और आपका धर्म औरतों को इंसान की श्रेणी में रखता ही नहीं।
    धर्म ने स्त्रियों के लिए एक अजीब किस्म के व्यवहार की परंपरा को जन्म दिया है और यही समस्या का असली जड़ है। पुराने रिपोर्टों के अनुसार, पिछले दस वर्षों में साठ लाख कन्या भ्रुण हत्याएं हुई हैं, कारण केवल उनका बेटी होना था। वैसे मां-बाप जो लिंग पता नहीं कर पाते थे, वे बेटी होने पर भारी मन से उसे स्वीकार करते थे। कई बार तो मैंने बहुत से परिवारों को तब तक बच्चा पैदा करते देखा है जब तक कि एक बेटा न हो जाए! क्यों? क्यूंकि आपका क्रिया-कर्म बेटे के हाथों ही होगा क्यूंकि वंश बढ़ाने का काम बेटा ही कर सकता है, क्यूंकि हिन्दू धर्म लोगों को कहता है कि आप स्वर्ग तभी जा सकते हैं जब आपके पास एक बेटा होगा। कितनी बार मैंने देखा है कि एक लड़की को जन्म देने वाली मां को इस बात के लिए ताने सुनने पड़ते हैं कि उसने बेटे को जन्म क्यूं नहीं दिया!
    क्या आप इससे ज़्यादा ठोस उदाहरण चाहिए कि धर्म स्त्रियों को लेकर एक ग़लत रवैये को जन्म देता है? बलात्कार हिन्दु धर्म ग्रंथों के लिए कोई दुर्लभ घटना नहीं है लेकिन इसकी भर्त्सना होने की बजाय देवता ही ऐसा करते हुए दिखते हैं! हिन्दु धर्मग्रंथ आपको स्वर्ग के राजा इंद्र और विष्णु जैसे देवता की पूजा करने को कहता है, जिसने वृंदा को यौन संबंध बनाने के लिए झांसे में लिया था। तो एक बलात्कारी देवता की पूजा होनी चाहिए क्योंकि वह महान है, बड़ा और शक्तिशाली है! इंद्र जिस स्त्री अहिल्या का बलात्कार करता है, उसे उसका पति शाप देकर पत्थर में बदल देता है। इंद्र को खुद भी शाप मिलता है: उसके शरीर में एक हज़ार योनी होने का! शायद यह कहानी के लेखक की कुंठा होगी जो एक साथ हज़ार योनी देखना चाहता हो। लेकिन ग़ौर करने वाली बात ये है कि योनी का होना अपने-आप में एक अभिशाप है! धर्म यही सिखाता है!
    धर्म कहता है “जहां नारी होती है, वहां देवता का वास होता है”। यही धर्म ये भी कहता है कि स्त्रियां नर्क का द्वार होती हैं। हिन्दुत्व का एक पंथ यह भी मानता है कि स्त्रियों का चेहरा देखना एक पाप है और अगर आप ऐसा करते हैं तो आपको पश्चाताप करना होगा।...
    एक समाज जिसमें धर्म मज़बूती से मौजूद हो वहां पुरुषों का राज करना और स्त्रियों का कमज़ोर होना लाज़िमी है।... धर्म स्त्रियों को दोयम दर्जे का नागरिक बनाता है और इस बात की वकालत करके कि स्त्रियों को अपने पति, पिता, भाई या बेटे के नियंत्रण में रहना होगा, उन्हें कमज़ोर बनाता है। धर्म समानता लाना नहीं चाहता, धर्म नहीं चाहता कि स्त्री और मर्द, दलित और सवर्ण, ग़रीब और अमीर एक पायदान पर खड़ा हो सकें। धर्म ने स्त्रियों को देवी का दर्जा तो दिया है लेकिन पुरुष के बराबर अधिकार देकर इंसान बनाने से वंचित रखा है।....

    ReplyDelete