Thursday, May 17, 2018

कानडी संदेश : राहुलसाठी अवघड पण मोदींसाठीही सोपे नाही -- १


अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या माध्यमांनी , कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी राजकारणाचा अक्षरशः शेअर बाजार केला आहे. कुठल्या तरी बातमीने शेअरबाजार वर चढतो किंवा खाली घसरतो. राजकारणाचेही तसेच झाले आहे. निव्वळ बातम्यातून राजकीय मनोबल वरखाली होते. जमिनीवरील वास्तवाशी त्याचा फारसा संबंध नसतो हे कर्नाटक निवडणूक निकालावरील प्रतिक्रिया दर्शवितात.
--------------------------------------------------------------------------------

 कर्नाटक विधानसभेची निवडणूक आगामी लोकसभा निवडणुकांची पहिली सेमीफायनल समजली जात असल्याने या निवडणुकीकडे देशभरच्या राजकीय जाणकारांचे आणि राजकीय नेते-कार्यकर्ते यांचे लक्ष लागलेले होते. फायनलमध्ये म्हणजे लोकसभे मध्ये प्रवेश करण्यासाठी ही निवडणूक जिंकणे महत्वाची असल्याने अटीतटीने लढली जाणार होती आणि तशी ती लढल्या गेली. गेल्या चार वर्षातील मोदी सरकारची सर्वात मोठी उपलब्धी कोणती असेल तर ती भाजपला निवडणूक जिंकून देण्याची आहे. राज्यकारभाराच्या आघाडीवर अपयशांची मालिका सुरु असताना निवडणुकांच्या मालिकांमध्ये मात्र यशाचा झरा वाहता ठेवण्यात प्रधानमंत्री मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शाह यांनी कमालीचे यश मिळविले आहे. जिथे निवडणुकीत यश मिळाले नाही तिथे केंद्रसत्तेच्या बळावर सत्ता मिळवून आपल्याला अपयश आलेच नाही हे दाखविण्यात मोदी - शाह यशस्वी झाल्याने अपयशाचा डाग त्यांना चिकटला नाही. मणीपूर, मेघालय सारखी राज्य याकडे देशाचे फारसे लक्ष नसल्याने तेथील भाजपचा पराभव कोणाच्या ध्यानी आला नाही. ध्यानी आले ते बघा ही राज्य पण आम्ही म्हणजे भाजपने काबीज केली आहेत. त्यामानाने गोवा राज्य छोटे असले तरी तिथे जे काही घडते ते देशाच्या चटकन लक्षात येते. पण त्याठिकाणचे टोचणारे , बोचणारे अपयश देखील सत्ता काबीज करून झाकण्यात मोदी – शाह यांना यश आले. एवढेच नाही तर जास्त जागा मिळवून सत्तेच्या अगदी जवळ आलेल्या कॉंग्रेसला सत्ता हस्तगत करता आली नाही म्हणून देशात हास्यास्पद ठरविले. अर्थात तिथे दिल्लीहून सत्ता स्थापनेसाठी पाठविलेल्या सरंजामी वृत्तीच्या काँग्रेसी नेत्यांनी माती खाल्ल्याने बहुमत नसतांना सत्ता मिळविली हा कलंक ठरण्या ऐवजी मोदी – शाह यांच्यासाठी यशाचा तुरा ठरला होता. चार वर्षात या विजयी घोडदौडीला खरा तडाखा बसला होता तो गुजरातेत. गुजरात हे मोदी-शाह यांचे गृहराज्यच नाही तर त्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. देशात सर्वत्र विजयी घोडदौड होत असतांना गुजरात मध्ये मोदी-शाह यांची विजयासाठी मोठी दमछाक झाली. गुजरातने मोदी-शाह यांची दमछाकच केली नाही तर जी उंची गाठण्यासाठी कॉंग्रेस नेते राहुल गांधी संघर्ष करीत होते ती उंची आणि नवा आत्मविश्वास राहुल गांधीना दिला. गुजरात मध्ये काठावर का होईना सत्ता राखण्यात मिळालेले यश आणि अपयश झाकण्यासाठी सतत युद्ध पातळीवर कार्यरत मोदींची प्रचार यंत्रणा यामुळे पुन्हा त्यांचे अपयश उठून दिसण्या ऐवजी बघा इतक्या वर्षापासूनची सत्ता कायम राखली म्हणून गुजरात आणखी एक मानाचा तुरा ठरला. नंतरच्या त्रिपुरा विजयाने तर लोकपटला वरून गुजरातची पीछेहाट पुसली गेली. यामुळे गुजरातने राहुल गांधीना दिलेल्या नव्या ओळखीवर मात्र विपरीत परिणाम झाला नाही. कारण त्रिपुराची लढत मुख्यत: भाजप आणि कम्युनिस्ट यांच्यातील होती. या पार्श्वभूमीवर कर्नाटकची सेमीफायनल झाली आणि रंगली देखील.

ही राजकीय पक्ष एकमेकाविरुद्ध निवडणूक लढवीत आहेत की क्रिकेट खेळत आहेत असा संभ्रम निर्माण व्हावा इतका उथळ प्रचार या निवडणुकीत झाला. याला प्रचार म्हणण्या ऐवजी फटकेबाजी म्हणणेच अधिक योग्य ठरेल. राज्यापुढील , देशापुढील समस्या आणि आव्हानाची चर्चा होण्या ऐवजी दोन्ही बाजूनी नुसती टोलवाटोलवी चालली. षटकारांची बरसात दोन्ही बाजूनी झाली. कॉंग्रेसच्या टीमचे कप्तान राहुल गांधी असले तरी टीम तर्फे षटकारांची बरसात माजी मुख्यमंत्री सिद्धरमय्या करीत होते. भाजपचे कप्तान अर्थातच मोदीजी होते आणि षटकारांची बरसातही त्यांनीच केली. मोदीजी आणि सिद्धरमय्या यांच्या षटकारात एक फरक होता. मोदींचे षटकार उत्तुंग होते आणि त्यांचा प्रत्येक चेंडू मैदाना बाहेर जायचा. सिद्धरमय्याने चेंडू चांगले टोलवले तरी ते प्रेक्षकातच पडायचे. त्यामुळे प्रेक्षकाकडून त्यांच्या षटकाराचे कौतुक होण्या ऐवजी मैदानाबाहेर जाणाऱ्या मोदींच्या षटकारांचे अधिक कौतुक होणे स्वाभाविक होते आणि तसे ते झाले. यामध्ये कॉंग्रेसचे कप्तान राहुल गांधी हे गावसकर सारखे खेळले. एकेरी – दुहेरी धावा आणि अधून मधून चौकार. फटक्यांच्या आतषबाजीत लोकांचे राहुल गांधींच्या खेळाकडे लोकांचे लक्ष जाणे किंवा त्यांचे कौतुक होणे शक्यच नव्हते. क्रिकेटचे हे उदाहरण कर्नाटकच्या निवडणूकीला तंतोतंत लागू पडते. सामना अनिर्णीत राहिला हे मोदींच्या फटकेबाजी समोर आणि त्या फटकेबाजीवर ढोल बडवीणारी प्रचंड मोठ्या यंत्रणेच्या गोंगाटात लोक विसरून गेले आणखी आणखी एक यशाचा तुरा मोदींच्या शीरपेचात आला ! हा सामना क्रिकेट सारखा झाला. मोदींच्या फटकेबाजीने त्यांना हिरो केले आणि या खेळात राहुल गांधींचा प्रभाव जाणवला नाही हे या खेळाचे सार असले तरी या खेळाचा स्कोअर क्रिकेट सारखा नाही तर टेनिसमध्ये स्कोअर मोजतात तसा मोजण्यासारखा शेवट झाला. सामना अनिर्णीत राहिल्याने दोघांना समान गुण मिळाले असले तरी टेनिस मध्ये जिंकण्यासाठी समान गुण झाल्यावर ज्याची सर्व्हिस असते त्याला अॅडव्हांटेज म्हणतात तसे अॅडव्हांटेज मोदी आणि भाजपला कर्नाटक निवडणुकीने मिळवून दिले आहे.

कर्नाटकातील भाजप विजय निर्विवाद नसला तरी कर्नाटकातील कामगिरी लोकसभेसाठी अनुकूल वातावरण निर्मितीसाठी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह आणि मनोबल वाढविण्यासाठी उपयोगी ठरली आहे. दुसऱ्या बाजूने हा निकाल कॉंग्रेसचा अपेक्षाभंग करणारा आणि गुजरात विधानसभा निवडणुकीने राहुल गांधी उंचीच्या ज्या दोन पायऱ्या चढले होते त्या पायऱ्या वरून ते पुन्हा खाली उतरले आहेत. गुजरात निवडणुकीने त्यांच्या नेतृत्वावर कॉंग्रेस कार्यकर्ते आणि नेते यांचा वाढत चाललेला विश्वास पुन्हा डळमळीत होण्यास कर्नाटक निवडणुकीचे निकाल कारणीभूत ठरले आहे. मनोबल वाढणे आणि मनोबल खचणे या मानसिक पातळीवरच्या गोष्टी आहेत आणि त्याचा जमिनीवरील परिस्थितीशी संबंध असतोच असा नाही. आणि कर्नाटकची जमिनीवरील परिस्थिती खरे तर भाजपचे मनोबल वाढावे किंवा कॉंग्रेसचे खच्ची व्हावे अशी नाही. अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या माध्यमांनी , कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी राजकारणाचा अक्षरशः शेअर बाजार केला आहे. कुठल्या तरी बातमीने शेअरबाजार वर चढतो किंवा खाली घसरतो. कंपनीची परिस्थिती आहे तशीच असते पण निव्वळ बातम्यांनी त्या कंपनीचे शेअर्सचे भाव वर खाली होतात. राजकारणाचेही तसेच झाले आहे. निव्वळ बातम्यातून मनोबल वरखाली होते. अगदी कर्नाटक निकालाचे बघा. मतमोजणी सुरु असताना कार्यकर्ते आणि नेते यांच्या मनाचे हिंदोळे मतमोजणी प्रमाणे वरखाली होत होते. दुपारपर्यंत उन्मादाची पातळी गाठणारे भाजप कार्यकर्ते कॉंग्रेस आणि जेडीएस एकत्र येत आहेत या बातमीनेच धाराशायी झाले होते. याचा अर्थ आपल्यावरील विश्वास, आपल्या कामावरील विश्वास आणि लोकांवरील विश्वास याचा राजकारणात प्रचंड अभाव आहे. परिस्थितीचे नीट आकलन नाही आणि आकलन करून घेण्याची क्षमता आणि इच्छाही लोप पावत चालली आहे. त्यामुळे बरेचसे राजकारण मनोव्यापारावर चालले आहे आणि हा मनोव्यापार आपल्या बाजूने झुकविण्याचे कसब मोदी आणि त्यांच्या प्रचारयंत्रणेने मिळविल्याने आज आपल्याला मोदी आणि भाजप वरचढ वाटतात. पण प्रत्यक्ष परिस्थितीचे निरीक्षण आणि विश्लेषण केले तर परिस्थिती त्यांच्यासाठी देखील तितकीच आव्हानात्मक आहे जितकी कॉंग्रेस साठी आहे. दुर्दैवाने ही परिस्थिती समजून घेण्याची क्षमता कॉंग्रेसमध्ये सुद्धा लयाला गेली असल्याने कसे होणार या चिंतेने त्यांना ग्रासले आहे.

कर्नाटकचे जमिनीवरील वास्तव काय आहे हे समजून घेतले तर मी मांडत असलेला मुद्दा लक्षात येण्यास मदत होईल. कर्नाटक मध्ये निवडणुकीनंतर दुसऱ्यांदा सत्ता हस्तगत करण्याचा शेवटचा मान १९७८ साली देवराज अर्स या मुख्यमंत्र्याने मिळविला होता. त्यानंतर प्रत्येक विधानसभा निवडणुकीत सत्ताबदल झाला तसा या निवडणुकीतही झाला. मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांनी यावेळी ही परंपरा मोडीत काढून सत्ता परत मिळवू असे वातावरण निर्माण केले होते. त्यांनी निर्माण केलेले वातावरण भ्रामक नव्हते हे राज्यात कॉंग्रेसला मिळालेल्या सर्वाधिक मतावरून स्पष्टही होते. पराभूत होवूनही कॉंग्रेसला भाजपपेक्षा २ टक्के मते अधिक मिळाली आहेत. मते अधिक मिळूनही त्याचे विजयात रुपांतर करता आले नाही याचे कारण सिद्धरमय्या यांचे चुकलेले राजकीय निर्णय असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. लिंगायत हा स्वतंत्र धर्म म्हणून मान्य व्हावा या मागणीला मान्यता आणि प्रोत्साहन देण्याची त्यांची खेळी कॉंग्रेसच्या अंगलट आली. लिंगायत समाज आपल्या बाजूने उभा राहील हा त्यांचा अंदाज सपशेल चुकून ते तोंडावर आपटले. उलट कॉंग्रेस हिंदुत फुट पाडून हिंदुना कमजोर करीत असल्याच्या भाजप प्रचाराला बळ मिळाले आणि लिंगायत व लिंगायतेतर हिंदू एकवटल्याने भाजपचे बळ वाढले. वेगळ्या लिंगायत धर्माची चळवळ चालविणारे सिद्धरमय्या मंत्रीमंडळातील मंत्री लिंगायत बहुल मतदार संघात पराभूत झाले यावरून ही खेळी किती अंगलट आली याचा अंदाज येतो. लिंगायत समाज तिथे १४ टक्के इतक्या लक्षणीय संख्येत आहे. जसे लिंगायत समाजाच्या बाबतीत झाले तसेच देवेगौडा ज्या समाजातील आहेत त्या व्होकालिंग समाजालाही सिद्धरमय्या यांनी दुखावले. या समाजाच्या मंत्र्याला मंत्रीमंडळातून काढणे, देवेगौडा यांचा कार्यालयातील फोटो काढणे अशा गोष्टीमुळे सिद्धरमय्या आपल्या समाजा विरुद्ध आहे अशी भावना पसरण्यास मदत झाली. प्रधानमंत्री मोदी यांनी या भावनेला हवा देण्याचे तेवढे काम केले. हा समाज ११ टक्के आहे. मोठी संख्या असलेल्या दोन्ही समाजाला दुखावूनही कॉंग्रेसला निवडणुकीत सर्वाधिक मते पडणे हा कॉंग्रेसचा जनाधार दर्शविणारे आहे. सर्वाधिक मताचा विधानसभा निवडणुकीत परिणाम दिसला नाही तरी तो ५-६ विधानसभा मतदार संघ मिळून बनलेल्या लोकसभा मतदारसंघात नक्कीच दिसू शकतो. निवडणूक निकाला नंतरच्या परिस्थितीने कॉंग्रेस-जेडीएस हे पक्ष एकत्र आल्याने तर परिस्थिती आमुलाग्र बदलली आहे. त्यांची ही युती लोकसभा निवडणुकीपर्यंत टिकली तर आज जास्त आमदार निवडून आलेल्या आणि त्या बळावर सत्ता काबीज केलेल्या भाजपला लोकसभा निवडणुकीत मर्यादित यश मिळेल. विधानसभा निवडणुकीतील अपयश कॉंग्रेससाठी लोकसभा निवडणुकीत पथ्यावर पडण्याची शक्यता निर्माण झाल्याने कॉंग्रेसच्या आशा पल्लवीत व्हायला हव्यात पण तशा त्या होताना दिसत नाही. मोदी नाही तर कॉंग्रेसची पराभूत मानसिकताच लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेससाठी मारक ठरू शकते. प्रधानमंत्री मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शाह यांचे कर्नाटकातील नेमके यश कोणते आणि त्याचा पुढच्या लोकसभा निवडणुकीवर काय परिणाम होवू शकतो याचा आढावा लेखाच्या दुसऱ्या भागात घेवू.
 
----------------------------------------------------
सुधाकर जाधव , पांढरकवडा , जि. यवतमाळ
मोबाईल – ९४२२१६८१५८
---------------------------------------------------   

No comments:

Post a Comment