Wednesday, November 16, 2022

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - ३०

 १९६५ ते ७१ दरम्यानचा दहशतवाद आणि १९८० नंतरचा दहशतवाद यातील फरक लक्षात घेतला पाहिजे. आधीचा दहशतवाद हा स्वतंत्र राष्ट्र निर्मितीच्या प्रेरणेतून उभा राहिला. याला अजिबात धार्मिक रंग नव्हता. किंबहुना धर्मनिरपेक्ष जम्मू-काश्मीर राष्ट्र अशीच त्यांची संकल्पना होती. त्याकाळात या दहशतवादी संघटनांकडून हिंदू किंवा काश्मिरी पंडिता विरुद्ध हिंसा झाली नाही.
--------------------------------------------------------------------------


१९६५ ते १९७१ दरम्यान काश्मिरात विघ्वंसक कारवाया करण्याच्या हेतूने स्थापन झालेल्या अल फतेह आणि नॅशनल लिबरेशन फ्रंट या दोन्हीही संघटना काश्मीरच्या पाकिस्तानात विलीनीकरण होण्याच्या विरोधी होत्या. स्वतंत्र जम्मू-काश्मीर राष्ट्र त्यांना हवे होते. या बाबतीत नॅशनल लिबरेशन फ्रंटने जेवढी जाहीर ठाम भूमिका घेतली तेवढी अल फतेह संघटनेने घेतली नव्हती. अल फतेहचे पहिले उद्दिष्ट पाकिस्तानची मदत घेवून भारतीय काश्मीर मुक्त करण्याची होती. त्यामुळे अल फतेह संघटनेला प्रशिक्षित करण्यात व मदत करण्यात पाकिस्तानने दाखविलेला उत्साह लिबरेशन फ्रंटच्या बाबतीत दाखविला नाही. लिबरेशन फ्रंटला प्रामुख्याने पाकव्याप्त काश्मीर मधून मदत व प्रशिक्षण मिळाले. त्याकाळी पाकिस्तानने अल फतेहचे केडर प्रशिक्षित केले असले तरी शस्त्रास्त्रे व आर्थिक मदत देण्याबाबत हात आखडता घेतला होता. स्वतंत्र काश्मीर राष्ट्राचे उद्दिष्ट असणाऱ्या संघटना ऐवजी पाकिस्तानात काश्मीरचे विलीनीकरण करण्यास तयार असणारी संघटना बनवून तिला भारतीय काश्मीर मध्ये घुसविण्याची पाकिस्तानची योजना होती. अशा संघटनेला अल फतेहची मदत होवू शकते हा हेतू या संघटनेला प्रशिक्षित करण्यामागे होता. प्रशिक्षित लोकांसाठी शस्त्रे मागितली तेव्हा लढा सुरु करण्याची वेळ आली नसल्याचे सांगत पाकिस्तानने शस्त्रे व आर्थिक मदत देण्याचे टाळले तेव्हा अल फतेहने भारतीय काश्मीर मध्ये येवून शस्त्रास्त्रे व पैसे लुटण्याच्या घटना घडविल्या. त्यासाठी हत्या करायला मागेपुढे पाहिले नाही. मकबूल भटच्या नेतृत्वाखाली नॅशनल लिबरेशन फ्रंटने याचीच पुनरावृत्ती केली. या प्रयत्नात काश्मीर पोलिसांकडून या दोन्ही संघटनांचे म्होरके पकडल्या गेलेत आणि त्यांचे जाळे उध्वस्त करण्यात पोलिसांना यश मिळाले. 

१९६५ ते ७१ दरम्यानचा दहशतवाद आणि १९८० नंतरचा दहशतवाद यातील फरक लक्षात घेतला पाहिजे. आधीचा दहशतवाद हा स्वतंत्र राष्ट्र निर्मितीच्या प्रेरणेतून उभा राहिला. याला अजिबात धार्मिक रंग नव्हता. किंबहुना धर्मनिरपेक्ष जम्मू-काश्मीर राष्ट्र अशीच त्यांची संकल्पना होती. त्याकाळात या दहशतवादी संघटनांकडून हिंदू किंवा काश्मिरी पंडिता विरुद्ध हिंसा झाली नाही. अमेरिकेचा व्हिएतनाम मधील पराभव व फिलीस्तिनी संघटनांचा इस्त्रायल विरोधी लढा हे त्यांचे प्रेरणास्थान होते. व्हिएतनाम आणि फिलीस्तिनी जे करू शकतात ते आपणही करू शकतो हा त्यांचा स्वप्नाळू आशावाद त्यांची अपरिपक्वता दर्शविनाराच होता. त्या आशावादातून   सशस्त्र संघर्षासाठी केडर उभे करण्यासाठी त्यांनी स्वतंत्रपणे धडपड केली. या संघटनांनी ज्या दहशतवादी कारवाया केल्या त्यात किंवा यांच्या केडरमध्ये पाकिस्तानी नागरिक सामील नव्हते. भारतीय काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीर यातूनच यांचे केडर उभे राहिले. पाकव्याप्त काश्मीर वर पाकिस्तानचे प्रभुत्व राहावे यासाठी पाकिस्तान सरकारने १९७० साली आझाद काश्मीर अॅक्ट आणला तेव्हा त्याला तीव्र विरोध केला तो पाकव्याप्त काश्मीर मधील प्लेबिसाईट फ्रंट आणि नॅशनल लिबरेशन फ्रंटने. पाकिस्तानने हा विरोध चिरडून टाकण्यासाठी शेकडो लोकांची धरपकड केली त्यात फ्रंटचे नेते आणि सदस्यांचा समावेश होता.  १९८० नंतरचा काश्मीरमधील दहशतवाद हा यापेक्षा फार वेगळ्या स्वरूपाचा राहिला आहे. १९८० नंतरचा दहशतवाद हा पाकिस्तानच्या प्रेरणेने, पाकिस्तानच्या आर्थिक आणि शस्त्रास्त्रांच्या मदतीने तर उभा राहिलाच शिवाय भारतीय काश्मिरात विघ्वंसक कारवाया करण्यासाठी पाकिस्तानी युवकाना आणि नागरिकांना मोठ्या प्रमाणात तयार करून भारतीय काश्मीर मध्ये पाठविले जे आजतागायत सुरु आहे. १९८० नंतरच्या बहुतांश दहशत गटांची प्रेरणा धार्मिक राहिली आहे आणि बहुतेक गट पाकिस्तानचे समर्थन करणारे आहेत.                                                                                                                               

 आरंभीच्या दहशतवादाचे म्होरके यांचा संबंध कधीनाकधी नॅशनल कॉन्फरंस व मिर्झा अफझल बेगने स्थापित केलेल्या प्लेबिसाईट फ्रंटशी राहिलेला आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये प्लेबिसाईट फ्रंटची स्थापना करणारा अब्दुल खालिक अन्सारी हा १९४७ पूर्वी नॅशनल कॉन्फरंस मध्ये सक्रीय होता. त्याने जमीन सुधारणा चळवळीत आणि शेख अब्दुल्लाने राजा हरीसिंग विरुद्ध भारत छोडो आंदोलनाच्या धर्तीवर सुरु केलेल्या काश्मीर छोडो आंदोलनात सहभागी झाला होता. पण त्याचे मिरपूर शहर पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेल्याने तो पाकिस्तानात गेला. मकबूल भट पाकिस्तानात पलायन करण्यापूर्वी मिर्झा अफझल बेगच्या प्लेबिसाईट फ्रंटच्या विद्यार्थी आघाडीत कार्यरत होता. अल फतेहचा मोठा गट प्लेबिसाईट फ्रंट किंवा नॅशनल कॉन्फरंसशी निगडीत होता. मुळात या सर्वांमध्ये स्वयंनिर्णयाचा अधिकार किंवा सार्वमताची मागणी नॅशनल कॉन्फरंस व प्लेबिसाईट फ्रंटमुळेच खोलवर रुजली होती. पण अब्दुल्लांचा पक्ष व मिर्झा अफझल बेगची फ्रंट या संदर्भात पुढे येवून काहीच कार्यक्रम देत नसल्याने या सगळ्यांनी त्यांच्यापासून दूर जात हा वेगळा मार्ग स्वीकारला. हा मार्ग स्वीकारण्यास नॅशनल कॉन्फरंस किंवा प्लेबिसाईट फ्रंटने प्रोत्साहन दिले किंवा प्रवृत्त केले नसले तरी अशा गटांबद्दल ते सहानुभूती बाळगून होते यात शंका नाही.                                                                                                                                                         

अल फतेह गट पकडल्या गेला तेव्हा कोर्टात त्यांची बाजू मांडण्यात मिर्झा अफझल बेग आघाडीवर होते. अशा गटांकडून दबाव वाढला तर भारत सरकार आपल्याशी चर्चा व वाटाघाटीसाठी तयार होण्यास मदत होईल असे मिर्झा अफझल बेग व नॅशनल कॉन्फरंसच्या इतर नेत्यांची भावना असावी. कारण पाकिस्तान समर्थकांचा बागुलबोवा नवी दिल्लीला दाखवून काश्मीरच्या राजकारणातील आपले स्थान बळकट करण्याची परंपरा नेहरू काळापासून चालत आली होती.  शेख अब्दुल्ला सत्तेत आल्यानंतर अल फतेहच्या दहशतवाद्यांवरील खटले मागे घेवून त्यांचे पुनर्वसन केले. यातील एखादा अपवाद सोडता बाकीच्यांनी पुन्हा दहशतवादी कारवायात भाग घेतला नाही. इंदिरा गांधी - शेख अब्दुल्ला कराराचा काश्मिरात विरोध होवू लागला तेव्हा अल फतेहचा मोठा गट या कराराच्या समर्थनात पुढे आला होता. कराराचे समर्थन हा अल फतेहचा शेवटचा कार्यक्रम ठरून ती संघटना निष्क्रिय झाली. तिकडे पाकव्याप्त काश्मिरातील प्लेबिसाईट फ्रंट व नॅशनल लिबरेशन फ्रंट (जी जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंट - जे के एल एफ या नावाने ओळखली जावू लागली होती.) यांनी आझाद काश्मीर कायद्याविरुद्ध पाकिस्तानात निदर्शने केलीत तेव्हा पाकिस्तानने यांच्या विरुद्ध कडक कारवाई केल्याने हे गटही विस्कळीत व निष्क्रिय झाले होते. १९६५ मध्ये सुरु झालेल्या दहशतवादाने  १९७१ मध्ये नांगी टाकली होती.. याचे बरेचसे श्रेय इंदिरा गांधीच्या दहशतवादा विरुद्धच्या कठोर धोरणाला आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या दक्षतेला व कार्यक्षमतेला द्यावे लागेल. त्यावेळी तर कुठूनही सीमा पार करणे सोपे असण्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीर पोलिसांची कामगिरी उठून दिसते. 

-------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि.यवतमाळ 
मोबाईल - ९४२२१६८१५८ 


No comments:

Post a Comment