Wednesday, November 9, 2022

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - २९

  भारत सरकारला जेरीस आणण्याच्या हेतूने जम्मू-काश्मीर मध्ये विध्वंसक कारवाया करण्यासाठी गुलाम रसूल जहागीर याने  १९६७ मध्ये अल फतेह नावाची संघटना काढली. पाकिस्तानच्या मदतीने काश्मिरात विघ्वंसक आणि घातपाती कारवायासाठी स्थापन झालेली ही पहिली आतंकवादी संघटना मानली जाते. 
--------------------------------------------------------------------------------------------


श्रीमती इंदिरा गांधी १९६६ साली सत्तेत येण्याआधीच काश्मिरात पाकिस्तान पुरस्कृत आतंकवादी कारवाया सुरु झाल्या होत्या. शास्त्रीजींच्या काळात  १९६५ चे भारत-पाक युद्ध अधिकृतरीत्या सुरु होण्याआधी पाकिस्तानने ऑपरेशन जिब्राल्टर अंतर्गत मोठ्या संख्येने घुसखोर काश्मिरात पाठविले होते. लोकांना चिथावणी देवून उठाव घडवून आणायचा आणि नंतर आक्रमण करून काश्मीर बळकवायची ती योजना होती. यासाठी पाकिस्तानी गुप्तचर संस्थांनी एक मास्टर सेल तयार केला होता. नेहरूंनी १९६४ मध्ये शेख अब्दुल्लांची सुटका केली तेव्हा काश्मीरच्या स्वातंत्र्याबद्दल शेख अब्दुल्ला व त्यांच्या पक्षाने स्पष्ट भूमिका न घेतल्याने नाराज झालेले युवक या मास्टर सेलच्या गळाला लागले होते. पाकिस्तानला अपेक्षित उठावासाठी जनतेचे समर्थन मिळाले नाही पण मास्टर सेलच्या गळाला लागलेल्या युवकांनी युद्धजन्य परिस्थितीत श्रीनगरसह काही ठिकाणी विस्फोट घडवून आणले होते. पोलिसांनी या मास्टर सेलच्या कारवाया १९६६ मध्ये थांबविल्या. पोलिसांनी अटक केलेल्यात एक गुलाम रसूल जहागीर नावाचा युवक होता. २१ ऑक्टोबर १९६५ रोजी त्याला अटक झाली. पण पोलिसांना तो अगदीच सर्वसाधारण युवक वाटला आणि मास्टर सेलच्या कारवायात याची लक्षणीय भूमिका असू शकते यावर पोलिसांचाच विश्वास बसला नाही व त्याची जानेवारी १९६६ मध्ये पॅरोलवर सुटका झाली.  पॅरोलवरप सुटका झाल्यानंतर या युवकाने नियंत्रण रेखा पार करून पाकिस्तान गाठले. भारत सरकारला जेरीस आणण्याच्या हेतूने जम्मू-काश्मीर मध्ये विध्वंसक कारवाया करण्यासाठी गुलाम रसूल जहागीर याने  १९६७ मध्ये अल फतेह नावाची संघटना काढली. पाकिस्तानच्या मदतीने काश्मिरात विघ्वंसक आणि घातपाती कारवायासाठी स्थापन झालेली ही पहिली आतंकवादी संघटना मानली जाते. वरील दोन्ही घटना काश्मिरात धार्मिक ध्रुवीकरण  आणि आतंकवादाचा आरंभ दर्शविणाऱ्या आहेत. 

'अल फतेह' संघटनेच्या समांतर दुसरी एक संघटना पाकव्याप्त काश्मीरमध्ये आकाराला येत होती. पाकव्याप्त काश्मीर मधील मिरपूर निवासी अब्दुल खालिक अन्सारी याच्या पुढाकाराने १९६५ साली जम्मू-काश्मीर प्लेबिसाईट फ्रंटची स्थापना झाली. भारतीय काश्मीरमध्ये १९५५ साली मिर्झा अफझल बेग यांनी स्थापन केलेल्या प्लेबिसाईट फ्रंटशी या फ्रंटचा संबंध नव्हता. याच्याही आधी गिलगीट निवासी अमानुल्ला खान याने कराची शहरात स्वतंत्र जम्मू-काश्मीर राष्ट्राचा पुरस्कार करण्यासाठी एक समिती स्थापन केली होती.ही समिती जम्मू-काश्मीर प्लेबिसाईट फ्रंटमध्ये विसर्जित करून अमानुल्ला खान फ्रंटचा सेक्रेटरी बनला. अब्दुल खालिक अन्सारी हा अध्यक्ष होता. खान आणि अन्सारी दोघेही व्यवसायाने वकील होते. यांना भारतातून १९५८ साली पाकिस्तानात पळून गेलेला एक युवक सहकारी म्हणून लाभला. या युवकाचे नाव होते मकबूल भट. मकबूल भट हा श्रीनगर मध्ये शिकत असतांना मिर्झा अफझल बेगच्या प्लेबिसाईट फ्रंटच्या विद्यार्थी आघाडीचा प्रमुख होता.   काश्मीरची राज्यघटना तयार करण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर काश्मीरची घटना समिती विसर्जित झाली. अशा वेळी शेख अब्दुल्लांना मोकळे सोडले तर काय परिणाम होतील हे आजमावण्यासाठी शेख अब्दुल्लांची सुटका करण्यात आली होती. सुटकेनंतर त्यांना लाभलेले जनसमर्थन आणि सरकार विरोधात व्यक्त झालेला रोष बघून शेख अब्दुल्लांना पुन्हा अटक करण्यात आली. सरकार विरोधात निदर्शन करणाऱ्या कार्यकर्त्यांचे अटकसत्र सुरु झाले. अटके पासून वाचण्यासाठी  मकबूल भटने  नियंत्रण रेषा पार करून पाकिस्तानात १९५८ सालीच पलायन केले होते. . तिथेच त्याने आपले शिक्षण पूर्ण केले. पाकिस्तानात निवडणूक लढवून काश्मिरी विस्थापितासाठी असलेल्या राखीव जागेवर निवडूनही आला. पत्रकारिताही केली. याचमुळे त्याला पाकव्याप्त काश्मीरमधील प्लेबिसाईट फ्रंटचा प्रसिद्धी प्रमुख बनविण्यात आले.

अब्दुल खालिक अन्सारी, अमानुल्ला खान आणि मकबूल भट या त्रिकूटाचे स्वतंत्र जम्मू-काश्मीर राष्ट्राच्या निर्मितीवर एकमत होते पण हे उद्दिष्ट साध्य कसे करायचे यावर एकमत नव्हते. सनदशीर मार्गाने लढा दिला पाहिजे यावर अन्सारी ठाम होता. तर खान आणि भट मात्र सशस्त्र संघर्ष उभारावा या मताचे होते. अशी सशस्त्र आघाडी उघडण्याची परवानगी फ्रंटकडे त्यांनी मागितली पण फ्रंट मधून या कल्पनेला विरोध झाला. तेव्हा अमानुल्ला खान आणि मकबूल भट यांनी नॅशनल लिबरेशन फ्रंट नावाची भूमिगत संघटना सशस्त्र संघर्षासाठी तयार केली. याच संघटनेचे रुपांतर पुढे जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटमध्ये झाले. या संघटनेच्या माध्यमातून मकबूल भट याने याने भारतीय काश्मिरात काही आतंकवादी घटना घडवून आणल्या. १९६६ साली काश्मिरात प्रवेश करून भट याच्या नेतृत्वाखालील गटाने सीआयडी इन्स्पेक्टर अमरचंद याचे अपहरण केले. अमरचंदने सुटकेचा प्रयत्न केला तेव्हा गोळी घालून ठार करण्यात आले. यामुळे पोलीस सतर्क झाले आणि त्यांनी घटनेची पाळेमुळे शोधून काढत मकबूल भट आणि त्याच्या सहकाऱ्याला अटक करून नॅशनल लिबरेशन फ्रंटचे नेटवर्क उध्वस्त केले. या प्रकरणात मकबूल भट याला श्रीनगर कोर्टाने १९६८ साली फाशीची शिक्षा सुनावली. श्रीनगर तुरुंगात असतांना मकबूल भट याने आपल्या दोन सहकाऱ्यांच्या मदतीने  सुरुंग खोदून तो सहकाऱ्यासह फरार झाला आणि नियंत्रण रेषा पार करून पाकव्याप्त काश्मीर मध्ये गेला.                                                                                                                 

त्यानंतर त्याने काश्मीर प्रश्नाकडे जगाचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय विमानाचे अपहरण करण्याची योजना आखून ती अंमलात आणली. प्रत्यक्ष अपहरणात त्याचा सहभाग नसला तरी नियोजन त्याचेच होते. या अपहरणासाठी त्याने आपला एक सहकारी हाशीम कुरेशी याला तयार केले. पाकिस्तानी वायुदलाच्या निवृत्त वैमानिकाने अपहरण कसे करायचे याचे कुरेशीला  प्रशिक्षण दिले . हाशिम कुरेशी याने आपल्या एका नातेवाईकाच्या मदतीने श्रीनगरहून जम्मूकडे जाणाऱ्या गंगा नामक विमानाचे  ३० जानेवारी १९७१ रोजी अपहरण करून ते लाहोर विमानतळावर उतरायला भाग पाडले. त्यात ३५ प्रवासी होते. त्यावेळी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री असलेले झुल्फिकारअली भुट्टो यांनी अपहरणकार्त्याशी बोलणी केली.  विमान ताब्यात ठेवून प्रवासी व विमान कर्मचाऱ्यांना सोडून देण्यात आले. प्रवासी सोडण्यात पाकिस्तानने मदत केली असली तरी अपहरणकर्त्याचे पाकिस्तानात जोरदार स्वागत आणि कौतुक झाले होते. अपहरणकर्त्याने भारताच्या कैदेत असलेल्या नॅशनल लिबरेशन फ्रंटच्या ३६ कैद्याची सुटका करण्याची मागणी केली. इंदिरा गांधी सरकारने ती मागणी फेटाळून लावली. तेव्हा विमान धावपट्टीवरच जाळून टाकण्यात आले.     
या घटनेनंतर भारताने आपल्या हवाई हद्दीतून पाकिस्तानच्या विमान वाहतुकीवर बंदी घातली. तेव्हा मात्र आधी अपहरणकर्त्यांचे स्वागत करणाऱ्या पाकिस्तानने भारतानेच अपहरणाचा बनाव घडवून आणल्याचा कांगावा केला. अपहरणकरते आणि त्यामागे असलेल्या मकबूल भट सह  लिबरेशन फ्रंटच्या १५०च्या वर सदस्यांना पाकिस्तानने अटक केली. त्यातील फक्त ७ जणांवर खटला चालविला गेला व शिक्षा फक्त हाशिम कुरेशी या प्रमुख अपहरणकर्त्याला झाली.  भारतात आणि इंदिरा काळात घडलेली विमान अपहरणाची ही पहिली घटना होती. विमान अपहरणाचे दहशतवादी कृत्य इंदिरा गांधीनी कणखरपणे हाताळून पाकिस्तानची चांगलीच कोंडी केली.

-----------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि. यवतमाळ 
मोबाईल - ९४२२१६८१५८ 

No comments:

Post a Comment