Thursday, June 20, 2024

महाराष्ट्रातील मतदारांची राजकीय क्रांती

 महाराष्ट्रात हमखास निवडून येण्यासाठी ज्या ज्या गोष्टी भाजप नेतृत्वाने केल्या त्याच त्यांचेवर उलटून त्यांना महाराष्ट्रात दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. मी केवळ परत आलो नाही तर दोन पक्ष फोडून परत आल्याची देवेंद्र फडणवीस यांची गर्वोक्ती भाजपला महागात पडली आणि पक्षाचे पुरते गर्वहरणच नाही तर वस्त्रहरणही झाले. 
---------------------------------------------------------------------------------------------


नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांना कोणता पक्ष जिंकला कोणता पक्ष हरला, कोणाला किती जागा मिळाल्या यापेक्षा अधिक व्यापक आणि खोल अर्थ आहे. लोकसभा निवडणूक निकालाला अनेक कंगोरे आहेत.  निकालाचा अर्थ व परिणाम समजून घेण्यासाठी प्रांतागणिक वेगवेगळी फुटपट्टी वापरावी लागली तरी या निवडणुकीने राष्ट्रीय पातळीवर एक संदेश दिला आहे. तो म्हणजे राजकीय पक्षांना मतदारांना गृहीत धरता येणार नाही. सत्ताधारी व राजकीय पक्षांना वेसण घालण्याची ताकद मतदारांमध्ये आहे. धार्मिक प्रश्नावर किंवा जाती-जातीत भांडणे लावून उन्माद निर्माण केला की आपसूक फायदा होतो हे गृहीतक मतदारांनी देशभर मोडीत काढल्याने ज्या गतीने विघटनाचे व दुहीचे राजकारण पुढे जात होते त्याला चाप बसला आहे. असा चाप बसविण्यात उत्तर प्रदेश व महाराष्ट्राच्या मतदारांची विशेष भूमिका राहिली आहे. उत्तर प्रदेशच्या मतदारांनी धर्माधारित राजकारणाला चाप लावला तर महाराष्ट्रातील मतदारांनी राजकारणात फोफावत चाललेल्या खोके संस्कृती , अनैतिकता आणि सत्तेचा दुरुपयोग करून विरोधकांना सम्पाविणाऱ्या प्रवृत्ती विरोधात कौल दिला. ई डी चा वापर करून पक्ष नेते आणि पक्ष फोडणे तसेच निवडणूक आयोगा मार्फत फोडलेल्या पक्षाला अधिकृत पक्ष घोषित करणे यामुळे जनमत विरोधात आणि क्रोधित असल्याची जाणीव शिवसेनेत फुट पाडल्यानंतर केंद्रातील सात्ताधारी नेत्यांना झाली होती. यावर त्यांनी उपाय शोधला तो उरलेसुरले पक्ष संपविण्याचा. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची शक्ती संपविली की मतदार आपल्याच मागे येणार हे त्यांनी गृहीत धरले. म्हणून शिवसेने नंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस फोडली आणि कॉंग्रेसचे नेतेही पळविले. पण जनता स्वत:च पक्ष बनून समोर येईल किंवा कारस्थानातून कमजोर करण्यात आलेल्या पक्षांना ताकद देईल याची कल्पनाच केंद्रातील सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी केली नाही. त्यामुळे हमखास निवडून येण्यासाठी ज्या ज्या गोष्टी भाजप नेतृत्वाने केल्या त्याच त्यांचेवर उलटून त्यांना महाराष्ट्रात दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. मी केवळ परत आलो नाही तर दोन पक्ष फोडून परत आल्याची देवेंद्र फडणवीस यांची गर्वोक्ती भाजपला महागात पडली आणि पक्षाचे पुरते गर्वहरणच नाही तर वस्त्रहरणही झाले. 

जनतेने दिलेला कौल हा केवळ सत्ताधाऱ्यांच्या गर्वहरणाचा किंवा वस्त्रहरणाचा नाही. एक प्रकारची राजकीय क्रांतीच मतदारांनी घडवून आणली जीची तुलना १९७७ साली आणीबाणीत झालेल्या निवडणुकीशी करता येईल.  ही निवडणूक जशी लोकांनी आपल्या हाती घेतली होती तशीच १९७७ ची निवडणूक लोकांनी आपल्या हाती घेवून लढविली होती. त्या निवडणुकीत विरोधी पक्षाचे नाममात्र अस्तित्व होते तशीच स्थिती या निवडणुकीत विरोधी पक्षांची होती. त्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांचा दारूण पराभव करून विरोधकांच्या हाती सत्ता दिली होती. यावेळी विरोधकांच्या हाती सत्ता येता येता राहिली हाच काय तो फरक. या निवडणूक निकालाने काय चमत्कार घडविला याचे आकलन ज्यांना नाही ते पक्ष,जात ,धर्म याच्या मर्यादेत विश्लेषण करून निष्कर्ष समोर ठेवतात. सत्ता मिळालेला पक्ष किंवा आघाडी निवडणूक निकालाने निराश झाली तर सत्ता न मिळालेले पक्ष किंवा आघाडी निवडणूक निकालाने आनंदी झाली यावरून या निवडणुकीत सत्तेपेक्षा अधिक महत्वाच्या मुद्द्यावर मतदारांनी हा कौल दिल्याचे स्पष्ट आहे. अनियंत्रित सत्ता की जबाबदार सत्ता यावर हा कौल होता. सत्ता मिळूनही दु:ख आणि सत्ता न मिळूनही आनंद होण्याचे कारण या कौलात दडले आहे. पारंपारिक निकष निवडणूक निकाल समजून घेण्यास अपुरे ठरतील.  त्यामुळे अमुक गटांनी तमुक अपप्रचार केला म्हणून असा निकाल लागला असे म्हणणे हे बौद्धिक दिवाळखोरीचे लक्षण आहे. मतदारांच्या विवेकबुद्धीवर विश्वास नसणारेच निवडणूक निकालावर असे भाष्य करू शकतात. अपप्रचाराचाच मुद्दा महत्वाचा असेल तर कोणी अपप्रचार केला हे सर्वांनी आपल्या कानांनी ऐकले आहे. दस्तुरखुद्द पंतप्रधानाचे निवडणूक प्रचारातील असे एकही भाषण आढळणार नाही ज्यात त्यांनी विरोधकाबद्दल मतदारांचे चुकीचे समज होतील असा प्रचार केला नाही. कॉंग्रेस निवडून आली तर तुमची संपत्ती काढून घेतील आणि ती अल्पसंख्यांक समुदायाला देतील असा प्रचार त्यांनी माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांचा हवाला देवून केला. वास्तविक मनमोहनसिंग यांचे ते भाषण सर्वत्र उपलब्ध आहे ज्यात त्यांनी पंतप्रधान दावा करतात तसे काही म्हंटले नव्हते. कॉंग्रेसच्या नेतृत्वाखाली सरकार आले तर महिलांचे मंगळसूत्र काढून घेतील , दोन म्हशी असतील तर एक म्हैस काढून घेतील असा अपप्रचार पंतप्रधानांनी केला. पंतप्रधानांनी केलेल्या अपप्रचाराला व्यापक प्रसिद्धी मिळूनही मतदारावर त्याचा परिणाम झाला नाही हे निवडणूक निकालच सांगतात. विरोधकांनी घटना बदलण्याचा अपप्रचार केला असा भाजप आघाडीचा आरोप आहे. विरोधकांच्या प्रचारात हा मुद्दा होताच. विरोधकांना हा मुद्दा कोणी दिला असेल तर तो भाजपच्या नेत्यांनीच दिला. संविधान बदलाची गरज भाजप नेते बोलून दाखवीत होते आणि त्यासाठी ४०० पेक्षा अधिक जागा हव्यात असेही ते बोलत होते. अयोध्येतील भाजपच्या पराभवाची देशभर चर्चा आहे त्या भाजपच्या उमेदवाराने घटना बदलण्यासाठी ४०० पार पाहिजे असे विधान केले होते. त्यामुळे विरोधकांनी हा मुद्दा जनतेसमोर ठेवला तर तो अपप्रचार नक्कीच ठरत नाही. 


 या निवडणुकीवर प्रभाव पडणारे जे घटक होते त्यातील शेतकरी हा घटक महत्वाचा होता. ही पहिली निवडणूक असावी ज्यात शेतकऱ्यांनी शेतीच्या मुद्द्यावर मतदान केले. एरवी शेतकऱ्यांना देशातील इतर मुद्द्यांची फार चिंता असायची आणि या चिंतेत त्याची शेती विषयक मुख्य चिंता बाजूलाच राहून जायची. पण हा  निवडणूक निकाल शेती प्रश्नाने प्रभावित केला आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या निकालावर भाष्य करताना याची कबुली दिली आहे. उत्तर आणि दक्षिण महाराष्ट्रात कांद्याच्या प्रश्नावर निर्माण झालेला असंतोष भोवल्याचे त्यांनी सांगितले. या प्रश्नावर बोलण्याची संधी पंतप्रधानांना मिळाली होती. भर सभेत एका मतदाराने कांद्याचा प्रश्न उपस्थित केला होता. पण पंतप्रधानाचे त्यावर उत्तर होते 'जय श्रीराम' ! लोकांच्या सर्व प्रश्नांवर त्यांचेकडे असलेले उत्तर हेच होते. जय श्रीराम घोषणेतून निर्माण होणाऱ्या उन्मादात लोकांचे खरे प्रश्न बाजूला पडतील आणि लोक आपले समर्थन करतील असा ठाम विश्वास बाळगून पंतप्रधान व त्यांचा पक्ष निवडणुकीला सामोरा गेला होता. 'जय श्रीराम'चा उत्तर प्रदेशात तर विशेष प्रभाव पडणार हे त्यांनी पक्के गृहीत धरले होते. तेवढा प्रभाव महाराष्ट्रात पडणार नाही म्हणून इथे त्यांनी पक्षफोडीचे उद्योग केले. तशी उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष फोडण्याची गरज त्यांना वाटली नाही. धार्मिक मुद्द्यावर निवडणूक जिंकण्याची खेळी आणि जिथे धार्मिक मुद्दा चालणार नाही तिथे सत्तेचा वापर करून विरोधक संपविण्याची खेळी करून निवडणूक जिंकण्याचाच नाही तर पाशवी बहुमत मिळविण्याचा डाव खेळला गेला. हा डावच मोदी आणि भारतीय जनता पक्षावर उलटला आहे. धार्मिक उन्माद निर्माण करून मतदारांना मूर्ख बनविता येणार नाही हा जसा संदेश उत्तर प्रदेशातील मतदारांनी दिला त्याच प्रमाणे सत्तेचा दुरुपयोग करून पैशाचा खेळ करून विरोधक संपविले तर मतदार स्वत: निवडणूक हातात घेवून चमत्कार घडवू शकतो हा संदेश महाराष्ट्रातील मतदारांनी सत्ताधाऱ्याना आणि देशाला दिला आहे. 

---------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि. यवतमाळ 
मोबाईल : ९४२२१६८१५८ 


Thursday, June 13, 2024

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जाग आली !

 मोदींनी अमित शाहच्या मदतीने जसे भारतीय जनता पक्षाला गुंडाळून ठेवले तसेच संघालाही गुंडाळले आणि त्यातून आलेल्या हतबलतेने मोदींच्या मागे फरफटत जाणे एवढाच पर्याय गेली १० वर्षे संघप्रमुख भागवता समोर असावा. या निवडणुकीत मतदारांनी सुज्ञपणे मोदींच्या एकहाती सत्तेला सुरुंग लावल्यानंतरच भागवतांची मोदी विरोधात बोलण्याची हिम्मत झाली. 
-----------------------------------------------------------------------------------

                                                                                                                              
मागच्या लेखात मी लिहिले होते की मोदी,मोदी सरकार आणि भारतीय जनता पक्ष यांचे मागच्या १० वर्षातील वर्तन हे कुठलाही आणि कशाचाही विधिनिषेध बाळगणारे नसतानाही भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपली नापसंती आणि आक्षेप नोंदविला नाही. यानंतर १-२ दिवसातच संघप्रमुख मोहन भागवत यांनी जाहीरपणे मोदींना लक्ष्य केले आणि कानपिचक्या दिल्या. जाहीरपणे कठोर शब्दात मोहन भागवत यांनी मोदींना सुनावले याचा अर्थ संघ आणि भाजपचे सरकार यांच्यात सुसंवाद सोडा साधा संवाद देखील नाही. यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. कोणाशी संवाद साधने ही मोदींची वृत्ती नाही. प्रश्न फक्त एवढाच आहे की मोदींच्या ज्या वर्तनावर भागवतांनी टीका केली ते वर्तन काही मागच्या १-२ महिन्यातले नाही किंवा १-२ वर्षातले नाही. सत्ता हाती आल्यापासून मोदी असेच वागत आले आहे. दरम्यानच्या काळात काही प्रसंगी मोदी आणि भागवत एकत्र आलेले होते. तेव्हा त्यांना मोदींच्या व त्यांच्या सरकारच्या कार्यपद्धती बद्दल चर्चा करता आली असती. ती सुधारण्याचा सल्ला देता आला असता. संघाने मोदींना पंतप्रधान बनविण्यासाठी जे कष्ट घेतले ते लक्षात घेता भागवतांना मोदींना सल्ला देण्याचा पूर्ण अधिकार होता. पण हा अधिकार त्यांनी मागच्या १० वर्षात कधी वापरल्याचे ऐकिवात नाही. याचे अधिकृत कारण कळले नसले तरी मोदी आणि भागवत यांच्या भेटीतील भागवतांची देहबोली सारे काही सांगून जाते. दोन प्रसंगात सार्वजनिकरीत्या मोदी आणि भागवत एकत्र आल्याचे साऱ्या देशाने पाहिले. ते प्रसंग होते राममंदिरांच्या भूमिपूजनाचे आणि रामलल्लाच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनाचे. या दोन्ही प्रसंगी भागवत मोदींच्या शेजारी असले तरी कार्यक्रमात सगळे महत्व मोदींना होते. मम म्हणण्यापुरती मोहन भागवतांची भूमिका होती. या दोन्ही प्रसंगात प्रसंगानुरूप काही गोष्टी भागवतांना अधिकार वाणीने सांगता आल्या असत्या. मोदींच्या हस्ते राममंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम ठरला तेव्हा भागवतांना आठवण करून देता आली असती की भूमिपूजन तर राजीव गांधी पंतप्रधान असताना त्यांच्या सरकारच्या परवानगीने विश्व हिंदू परिषदेने तेव्हाच केले होते. ते देखील एका दलित व्यक्तीच्या हस्ते. असे असताना पुन्हा भूमिपूजनाचा घाट कशासाठी हे त्यांना सांगता आले असते. पुन्हा बांधकाम अपूर्ण असलेल्या मंदिरात राममूर्तीच्या प्रतिष्ठापणेवर शंकराचार्य व काही धर्माचार्याने आक्षेप घेतला होता तेव्हाही भागवतांना सबुरीचा सल्ला मोदींना देता आला असता. पण राममंदिर निर्मितीचा फायदा घेण्याची मोदींना जितकी घाई झाली होती तशीच घाई संघालाही झाल्याचे भागवतांच्या कार्यक्रमातील उपस्थितीने देशाला दिसले.                                                                                                                                    

वर्षभरापासून धुमसत असलेल्या मणिपूर बद्दल संघप्रमुख आता बोलले. विरोधी पक्ष व अन्य अराजकीय संघटना मणिपूर बद्दल सतत चिंता व्यक्त करीत आलेत. पंतप्रधानांनी मणिपूरकडे लक्ष द्यावे , तिथे जावून लोकांना भेटावे, शांतता प्रस्थापित करण्याचा मार्ग सुकर करावा असा आग्रह धरत आलेत. पण पंतप्रधान आपल्या गुर्मीतच राहिले आणि संघ गुळणीधरून बसला होता. संघ नुसताच गुळणीधरून बसला नव्हता तर  मणिपूर पेटलेले असताना राममंदिरावर राजकीय पोळी भाजून घेण्याच्या मोदींच्या प्रयत्नात संघ सहभागी झाला होता. वर्षभर मणीपूर जळत होते, महिलांची विटंबना होत होती. तेव्हा संघ चूप होता आणि निवडणूक निकालानंतर भागवत त्यावर बोलू लागलेत याचा अर्थ गेली १० वर्षे मोदींनी संघाला बंधक बनवून ठेवले होते असाही अर्थ काढता येईल. मोदींनी अमित शाहच्या मदतीने जसे भारतीय जनता पक्षाला गुंडाळून ठेवले तसेच संघालाही गुंडाळले आणि त्यातून आलेल्या हतबलतेने मोदींच्या मागे फरफटत जाणे एवढाच पर्याय भागवता समोर असावा. या निवडणुकीत मतदारांनी सुज्ञपणे मोदींच्या एकहाती सत्तेला सुरुंग लावल्यानंतरच भागवतांची मोदी विरोधात बोलण्याची हिम्मत झाली असावी. मोदींनी विरोधी पक्षाच्या बाबतीत जे केले तेच संघाच्या बाबतीतही केले. तुम्ही आमच्याकडे या, आमचे समर्थन करा आणि बदल्यात सत्तेची पदे घ्या आणि ऐश करा हा मोदींचा विरोधी पक्षांना संदेश होता. मोदींनी अशीच खिरापत संघाच्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कार्यकर्त्यातही वाटली. वर्षानुवर्षे संघाचे निष्ठेने काम केलेले संघ स्वयंसेवक मोदी मंत्रीमंडळात मंत्री झालेत, राज्यपाल झालेत , मोठमोठ्या विद्यापीठाचे कुलगुरू झालेत, सत्तेचे असे कोणते क्षेत्र नव्हते जिथे संघ स्वयंसेवकांना स्थान नव्हते. संघ संस्कार काय असतात हे दाखवून देण्याची नामी संधी असताना या सगळ्या मंडळीनी मोदींना चुकीच्या वागण्यापासून परावृत्त करण्या ऐवजी प्रोत्साहनच दिले. आणि आताही संघ प्रमुखाने जेव्हा मोदी आणि मोदी सरकारच्या चुकीच्या वर्तनावर बोट ठेवले त्याचे उघड समर्थन सत्तेत असलेला एकही स्वयंसेवक पुढे येवून करणार नाही की सत्तेपासून वेगळे होणार नाही.                                               

मोदींनी संघ प्रमुखांना झेड दर्जाच्या सुरक्षा व्यवस्थेची खिरापत दिली ती संघ प्रमुखांनी तरी कुठे नाकारली. कॉंग्रेस राजवटीत अशा सुरक्षेविना राहणाऱ्या संघ प्रमुखाच्या जीवाला मोदी राजवटीतच असा काय धोका निर्माण झाला की झेड दर्जाची सुरक्षा व्यवस्था स्वीकारावी लागली. तेव्हाच बाणेदारपणे संघ प्रमुखांनी सुरक्षा नाकारली असती तर संघ आणि संघ प्रमुखांना गृहीत धरण्याची कृती मोदींच्या हातून घडली नसती. त्यामुळे आज संघ प्रमुख बरोबर बोलत असले तरी त्यांचे ऐकणारे कोण आहेत असा प्रश्न पडतो. निवडणूक प्रचार काळात याच स्तंभात मी लिहिले होते की निवडणुका हे मोदींसाठी युद्ध आहे आणि युद्धात सर्वप्रकारचे अतिरेक क्षम्य असतात हे गृहीत धरून  विरोधी पक्षांना शत्रू समजून ते निवडणुका लढवतात. या मुद्द्यावरही संघप्रमुख भागवत यांनी मोदींना कानपिचक्या दिल्या. विरोधक म्हणजे शत्रू नसतात असा हितोपदेश केला. पण हा उपदेश बैल गेला नि झोपा केला या थाटाचा आहे. गेल्या १० वर्षात विरोधकांशी मोदींचे वर्तन शत्रुत्वाचे होते तेव्हा संघ प्रमुखाने तोंडातून एक अक्षर काढले नाही. मोदींचे भक्त सोडले तर मोदींबद्दल सर्वाना सर्वात जास्त खटकणारी गोष्ट त्यांचा अहंकार राहिला आहे. आज भागवत जेव्हा मोदींच्या अहंकाराबद्दल बोलले तेव्हा हा अहंकार त्यानाही जाणवला हे उघड आहे. समाजा-समाजात फुट पाडणे निषिद्ध असल्याचे सांगणारे संघ प्रमुख या बाबतीत मोदींना सोडा सध्या संघ स्वयंसेवकांना अशा गोष्टीपासून परावृत्त करू शकले नाहीत. संघ प्रमुख अनेकदा बोलले की हिंदू आणि मुस्लिमांचा डी एन ए एकच आहे. मुसलमानाशिवाय आपण या देशाची कल्पना करू शकत नाही. आणि तरीही या देशात मुस्लीम द्वेष पसरविण्यात कोण आघाडीवर आहे हे संघ प्रमुखाला माहित नाही यावर विश्वास ठेवणे अवघड आहे. १० वर्षात संघ स्वयंसेवकांचे लक्ष संघ प्रमुख काय म्हणतात तिकडे न राहता मोदी काय म्हणतात याकडे राहिले आहे. याकाळात संघ प्रमुख मोदींना उपदेश करणारे काही बोलले असते तर मोदींना विरोध करणाऱ्या शंकराचार्याची जी गत मोदी समर्थकांनी केली तीच अवस्था मोहन भागवतांची केली असती. मोहन भागवतांनी तोंड उघडले ते मोदींची सत्तेवरील पकड सैल झाल्यावर. उशिरा का होईना भागवत बोलले , कठोर बोलले आणि मुख्य म्हणजे खरे बोलले याचे महत्व आहेच. मोदींना बाहेरचा अहेर रोजच मिळतो. त्याने त्यांच्यात काही बदल होत नाही. भागवतांनी त्यांना घरचा अहेर दिला आहे.  भाजप अध्यक्षांनी आम्हाला संघाची गरज नाही आम्ही आमचे बघून घेण्यास समर्थ आहोत असे म्हंटले होते. त्यानंतर  भागवत बोलल्याने त्यांच्या बोलण्याचा संदर्भ भाजपा अध्यक्षाच्या या विधानाशी जोडल्या गेला तर भागवतांच्या बोलण्यातील परिणामकारकता कमी होईल. भाजपा अध्यक्षाच्या विधानाने संघ दुखावला हे खरे असले तरी संघ प्रमुख या विधानावर नाही तर मोदींच्या १० वर्षाच्या कारभारावर बोलले हे लक्षात घेतले पाहिजे. 

---------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा, जि. यवतमाळ 
मोबाईल - ९४२२१६८१५८ 

Thursday, June 6, 2024

मोदी हरले लोकशाही जिंकली !

१० वर्षात मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने काय केले हे एका वाक्यात सांगायचे झाले तर सांगता येईल की,  कसलाच विधिनिषेध न बाळगणारी आणि  विधिनिषेधशून्यतेचा अभिमान बाळगणारी एक पिढी आणि संस्कृती  या दहा वर्षाच्या काळात तयार केली . याला विरोध करणारा एकही नेता सत्ताधारी पक्षात निघाला नाही. या सरकारवर वरदहस्त ठेवणाऱ्या व स्वत:ला संस्कृती रक्षक म्हणवून घेणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या विरोधात चकार शब्द कधी काढला नाही.
---------------------------------------------------------------------------------


हा लेख वाचकांसमोर येईल तेव्हा नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा शपथ घेतलेली असेल. पण यावेळी 'अब की बार मोदी सरकार' ही घोषणा निवडणूक निकालापासून गायब झाली आहे. यापूर्वी भाजपचे नेते भाजपचे बहुमत असताना भाजप सरकार म्हणायला कचरत होते. केंद्रातील सरकारला भाजप किंवा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार म्हणण्या ऐवजी मोदी सरकार म्हणण्याचा प्रघात पडला होता. भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी ही नावे गेल्या १० वर्षापासून अडगळीत गेली होती. गेल्या अडीच महिन्यापासून मोदींची निवडणूक प्रचाराची भाषणे सुरु होती. यातील एकाही भाषणात मोदींनी गेल्या १० वर्षात केंद्रातील भाजप किंवा राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सरकारने काय केले आणि निवडून आल्यावर काय करणार हे सांगितले नाही. त्यांची भाषा होती 'मैने ये किया और आगे भी ये मै करुंगा. आणि जोर देवून सांगत होते 'ये मोदी की गॅरंटी है' ! भाजप नेते सुद्धा पक्षाचे नाव घेवून बोलत नव्हते. मोदींनी हे केले ते केले आणि ही मोदींची गॅरंटी आहे असेच सांगत होते. मोदी तर जाहीरपणे स्वत:ची फुशारकी मारत होतेच शिवाय  सगळेजण सगळ्या गोष्टी मोदींनी केल्याचे सांगत होते. शेवटी शेवटी तर मोदींना हा भास व्हायला लागला की सरकार चालविण्यासाठी लोकांनी नव्हे तर ईश्वराने त्यांना भूतलावर पाठविले आहे.  मोदींनी भाषणात भाजपचे नाव सुद्धा घेतले नाही आणि घेतले असेल तर तो अपवाद असेल. पण त्यांनी आपल्या भाषणात मोदी-मोदी किमान ५-१० वेळा घेतल्याचे दिसेल. प्रचारातील मोदींच्या भाषणांचे सर्व व्हिडीओ उपलब्ध आहेत आणि ते ऐकून खात्री करून घेवू शकता. सरकारची सामुहिक जबाबदारी, पक्ष पद्धती, लोकशाही कार्यपद्धती हे सगळे बाजूला सारून गेली १० वर्षे मोदी कल्ट म्हणजे मोदींची प्रतिमा मोठी करण्याचा प्रयत्न झाला. अशी प्रतिमा निर्मिती लोकशाहीला धरून नाही किंबहुना लोकशाही विरोधी आहे.                         

मोदी निवडून आलेत पण त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांची जी प्रतिमा तयार केली होती त्या प्रतिमेचा पराभव झाला आहे. हा पराभव करून सुजाण मतदारांनी लोकशाहीवरचे गंडांतर टाळले आहे. ईश्वराने पाठविलेल्या या स्वघोषित प्रेषिताला आपल्या पक्षाला देखील विजयाप्रत नेता आले नाही त्यामुळे मोदींचे स्वत:बद्दलचे आणि इतरांचे मोदी बद्दलचे भ्रम आणि भास दूर व्हायला मदत होणार आहे. भ्रम आणि भास दूर होवू लागल्याची प्रचीती येवुही लागली आहे. आता निवडणूक निकालाचे वर्णन मोदींचा विजय म्हणून नाही तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा विजय म्हणून होवू लागला आहे आणि असा उल्लेख स्वत:मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना करावा लागणे याला मी सैतानाच्या तोंडी बायबल असे म्हणणार नाही पण ज्ञानेश्वराने रेड्याच्या तोंडून वेद वदवून घेतले म्हणतात तसे मतदाराने मोदी व त्यांच्या अति उत्साही समर्थकाच्या तोंडून लोकशाही वरील निष्ठा वदवून घेतली असे नक्कीच म्हणता येईल. 

अमर्याद सत्ता किती भ्रष्ट करू शकते हे केंद्रातील मागच्या १० वर्षाच्या राजवटीने दाखवून दिले आहे. भ्रष्टाचार फक्त आर्थिक असतो असे नाही तो अनेक प्रकारचा असतो त्यातही नैतिक घसरण आपल्याकडे मोठा भ्रष्टाचार समजला जातो. पण इथे अनैतिक आचरण ही अभिमानाने सांगायची गोष्ट बनली. बलात्कारी लोकांची पूजा होवू शकते , सत्कार होवू शकतो याची कधी कोणी कल्पना केली नसेल ते या १० वर्षाच्या काळात प्रत्यक्षात घडले. ज्या खेळाडूंनी पराक्रम गाजवून देशाचे नाव जगात उंच केले त्यांच्याशी शारीरिक गैरवर्तन करणारा आपल्या पक्षाचा खासदार आहे म्हणून त्याच्या विरुद्ध कारवाईत चालढकल केली जाते. पोक्सो कायद्याचे कलम निघावे म्हणून तक्रारदारावर दबाव आणण्यासाठी वेळ दिला जातो. अटक टाळण्यासाठी हे आवश्यक होते. न्याय मागणाऱ्या महिला खेळाडूंची सत्ताधारी पक्षातले गुंडपुंड जाहीर अवहेलना करीत होते पण कोणी त्यांना थांबविले नाही. पोलीसानीही न्याय मागणाऱ्या खेळाडूना झोडपून काढले. १० वर्षातील अशा घटनांची यादी करतो म्हंटले तर खूप मोठी होईल. दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलनात ७०० लोक मेलेत. याबद्दल मोदी किंवा सत्ताधारी पक्षातील एकानेही खंत किंवा खेद व्यक्त केला नाही. शेतकरी आंदोलकांची संभावना खलिस्तानी म्हणून केली गेली. विरोधातील सगळ्या राजकीय पक्षाचे खच्चीकरण करण्यासाठी सत्तेचा आणि सरकारी यंत्रणांचा करता येईल तितका गैरवापर केला.   जो जो सरकार विरोधात बोलेल त्याला देशद्रोही ठरविणारी मोठी यंत्रणा या सरकारने कार्यान्वित केली. विरोध मोडून काढण्याचे सर्व मार्ग अवलंबिले गेले. सगळ्या सरकारी यंत्रणा आपण म्हणू तेच करतील इतक्या वाकविण्यात आल्या.                                                                                                                                                 

करोडो रुपये खर्च करून सरकार पाडणे, पक्ष फोडणे अशा अनैतिक आणि विकृत कामांना गेल्या १० वर्षात प्रतिष्ठा मिळाली. एवढी प्रतिष्ठा की देवेंद्र फडणवीस सारखा मुख्यमंत्री राहिलेला माणूस मी दोन पक्ष फोडून सत्तेत परत आलो हे अभिमानाने छाती फुगवून सांगतो. अतिशय बेशरमपणे वाहिन्या आणि वृत्तपत्रे ऑपरेशन कमळच्या ठळक बातम्या द्यायचे आणि सत्ताधारी नेते हसून त्याचा स्वीकार करायचे. ऑपरेशन कमळ म्हणजे आमदारांना खोके द्यायचे, मंत्रीपदाची लालूच दाखवायची आणि विरोधी पक्षाचे सरकार पाडून आपल्या पक्षाचे सरकार स्थापन करायचे ! सरकार आणि पक्ष ज्यांच्या मुठीत त्या मोदी आणि शाह यांच्या संमतीने घडायचे ! या कामासाठीची सगळी रसद दिल्लीतून अमित शाह पुरवत होते हे लपून राहिलेले नव्हते. पण कसलाच विधिनिषेध बाळगायचा नाही आणि उलट विधिनिषेधशून्यतेचा अभिमान बाळगणारी एक संस्कृती आणि एक पिढी या दहा वर्षाच्या काळात तयार केली गेली.  अशा दुष्कर्माना विरोध करणारा एकही नेता सत्ताधारी पक्षात निघाला नाही. या सरकारवर वरदहस्त ठेवणाऱ्या व स्वत:ला संस्कृती रक्षक म्हणवून घेणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या विरोधात चकार शब्द कधी काढला नाही. समाजात अशा विकृतींना धरबंद राहिला नाही तर ईश्वर अवतार घेवून त्याचे निर्दालन करतो असे आपण पुराण कथात वाचत आलो आहोत. मोदींनी स्वत:ला अवतार घोषित केले असले तरी हा अवतार या सर्व विकृतींना आशीर्वाद, आश्रय आणि पाठबळ देणारा आहे.  असे पाठबळ देण्यासाठी  यांना पाशवी बहुमत पाहिजे होते. ते मिळविण्यासाठी या निवडणुकीत सर्व प्रकारची हत्यारे त्यांनी वापरली. त्यांच्या हत्यारांपुढे त्यांच्या विरोधात उभ्या ठाकलेल्या राजकीय पक्षांचा निभाव लागणार नाही अशी परिस्थिती होती. हे बघून  शेवटी मतदारांनाच अवतार घेवून समोर यावे लागले आणि निवडणूक आपल्या हाती घ्यावी लागली.  सरकारी आशीर्वादाने जे जे वाईट घडत आहे त्याला पायबंद बसेल असा निर्णय मतपेटीतून दिला आहे ! 

------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि. यवतमाळ 
मोबाईल - ९४२२१६८१५८