Thursday, February 24, 2022

सिंगापूर पंतप्रधानाच्या भाषणाने अस्वस्थ मोदी सरकार !

 चिरंतन मूल्यांना तिलांजली आणि टाकाऊ मूल्यांचे स्वागत हा बदल मोदी राजवटीत ठळकपणे जाणवतो. ली यांनी भारताचे उदाहरण देवून जगभरच असा बदल होतो आहे आणि त्यातून लोकशाहीचा ऱ्हास होत असल्याचे आपल्या भाषणात मांडल्यानेच मोदी सरकारचा तिळपापड झाला आहे.
------------------------------------------------------------------------

 
गेल्या आठवड्यात सिंगापुरचे पंतप्रधान ली यांचे एका ठरावावर सिंगापूरच्या संसदेत भाषण झाले. त्या भाषणात भारताचा ओझरता उल्लेख झाला नसता आणि त्या संदर्भात क्रोधित होवून भारताच्या परराष्ट मंत्रालयाने सिंगापूरच्या राजदूताला बोलावून आपला निषेध आणि आक्षेप नोंदविला नसता तर सिंगापूरच्या पंतप्रधानाच्या प्रगल्भतापूर्ण सर्वांग सुंदर भाषण दुर्लक्षित राहिले असते. या भाषणाकडे भारताचेच नव्हे तर जगभरचे लक्ष त्यामुळे वेधले गेले. ली यांचे भाषण जगभरच्या संसदेत झालेल्या सर्वोत्तम भाषणापैकी एक गणले जाण्याच्या योग्यतेचे भाषण असल्याचे संपूर्ण भाषण वाचणाऱ्याच्या लक्षात आल्या शिवाय राहणार नाही. अशा भाषणावर भारताने का आक्षेप घ्यावा असा प्रश्न पडतो. सिंगापूरच्या पंतप्रधानांनी भारताची अर्धी संसद गुन्हेगारांनी भरली असल्याचा उल्लेख केला आणि गुन्हेही साधेसुधे नाहीत तर बलात्कार व खुनासारखे असल्याचे सांगितल्याने भारताच्या संसदेचा अपमान झाला आणि भारताची प्रतिमा आंतरराष्ट्रीय पातळीवर डागाळली म्हणून निषेध नोंदविल्याचे सांगितले जाते. याला भारत सरकारने भारताच्या अंतर्गत विषयात नाक खुपसणे किंवा हस्तक्षेप करणे मानले आहे. त्यांचे भाषण निव्वळ भारताच्या संदर्भात असते तर निश्चितच त्यावर आक्षेप नोंदविणे समर्थनीय ठरले असते. त्यांचे भाषण त्यांच्या देशातील घडामोडी संदर्भात होता आणि त्यात उदाहरण म्हणून भारताचा ओघाने ओझरता उल्लेख होता. केवळ भारताचाच नाही तर अमेरिका,ब्रिटन आणि इस्त्रायलच्या संसदेत काय चालले आहे याचाही त्यांनी उल्लेख केला. पण भारत वगळता या देशांनी सिंगापूरच्या पंतप्रधानाचे भाषण देशाच्या अंतर्गत विषयात हस्तक्षेप मानले नाही. अंतर्गत विषयात हस्तक्षेप म्हणावं तर प्रधानमंत्री मोदींना त्याचे वावडे नाही हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे वारे वाहू लागल्यावर ट्रंपला भारतात बोलावून अहमदाबादेत मोठा मेळा भरवला आणि त्यात त्यांनी ट्रंपचे समर्थन करत 'अब की बार ट्रंप सरकार' अशी घोषणा केली होती. हा सरळ अमेरिकेच्या निवडणुकीत हस्तक्षेप होता जो मुत्सद्देगिरीला व नैतिकतेला धरून नव्हता. स्वत: मोदींनी परदेशात जावून विरोधी नेत्यांवर टीका केली आहे. आपल्याकडे जे परदेशी नेते येतात ते कधीही त्यांच्या विरोधकावर घसरल्याचे आपण पाहिले वा ऐकलेले नाही. त्यामुळे मोदी सरकारने भारताच्या सिंगापूर संसदेतील उल्लेखावर आक्षेप घेणे हास्यास्पद ठरते.

 
संसदेत गुन्हेगारांच्या प्रवेशाला २०१४ साली स्वत: मोदींचा ठाम विरोध होता. २०१४ च्या प्रत्येक निवडणूक प्रचारसभेत मोदीजी सांगायचे की ते जर निवडून आले तर एक वर्षाच्या आत संसदेतील गुन्हेगार सदस्य संसदेत नाही तर तुरुंगात गेलेले असतील. त्यांच्या या विधानावर सभेत 'मोदी मोदी मोदी ...' असे चित्कार उठायचे. हे सगळे वृत्तांत परदेशी वर्तमानपत्रात छापून आले आहेत. मोदींच्या तोंडूनच ही माहिती जगभर गेली आहे. त्यामुळे सिंगापूरच्या पंतप्रधानांनी नवे असे जगाला काही सांगितलेले नाही. फार तर मोदी सरकारने ली यांचे म्हणणे खोडून काढतांना भारतीय संसदेत निम्मे नाही तर ४३ टक्के सदस्यांवर गंभीर गुन्ह्याचे खटले असल्याचे दाखवून द्यायला हवे होते आणि भारताबद्दल बोलायचे तर खरी आकडेवारी सांगत जा असा दम द्यायला हवा होता ! संसदेतील गुन्हेगारांना एक वर्षाच्या आत खडी फोडायला पाठविण्याची घोषणा केवळ हवेतच विरली असे नाही तर संसदेत गंभीर गुन्हे असलेल्यांना प्रवेशाचे समर्थन होवू लागले. उदाहरणार्थ साध्वी प्रज्ञा. असे अनेक नांवे सांगता येतील. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या सदस्यांना थेट गृहखात्याचे मंत्री करून सन्मान दिला जावू लागला. गुन्हेगार सदस्यांना खडी पाठवायला पाठवू या घोषणेवर मोदी मोदी चीत्कारणारे आता गुन्हेगारी आरोप असलेल्या सदस्यांचे टाळ्या पिटून स्वागत करू लागले आहेत ! चिरंतन मूल्यांना तिलांजली आणि टाकाऊ मूल्यांचे स्वागत हा बदल मोदी राजवटीत ठळकपणे जाणवतो. ली यांनी भारताचे उदाहरण देवून जगभरच असा बदल होतो आहे आणि त्यातून लोकशाहीचा ऱ्हास होत असल्याचे आपल्या भाषणात मांडल्यानेच मोदी सरकारचा तिळपापड झाला आहे ! ली यांनी आपल्या भाषणात मोदी किंवा त्यांच्या राजवटीचा अजिबात उल्लेख केला नाही. केला उल्लेख तो नेहरूजीचा आणि हेच मोदी आणि त्यांच्या सरकारला खटकले असणार. 

ली यांनी भाषणात दोनच नेत्यांचा आदराने उल्लेख केला असला तरी तो उल्लेख उदाहरण म्हणून आलेला आहे. ते संसदीय लोकशाहीच्या भवितव्यावर बोलत असल्याने नेहरूंचा उल्लेख येणे अपरिहार्य होते. कारण भारतासारख्या देशात संसदीय लोकशाही रुजविण्यात त्यांचे योगदान महत्वाचे आणि मोलाचे आहे. मोदी तसे मानत नाहीत यामुळे वस्तुस्थिती बदलत नाही. ली यांचे प्रतिपादन होते की नेहरू सारख्या राष्ट्र निर्मात्याने मोठमोठ्या मूल्याने भारावून नव्या राष्ट्राची पायाभरणी केली. त्यासाठी कष्ट घेतले. लोकशाहीच्या बळकटीसाठी विविध संस्थांचे जाळे उभे केले. जी मुल्ये त्यांनी जोपासली, उराशी बाळगली त्याचा नंतरच्या पिढ्यांमध्ये ऱ्हास होत चालला आहे.नेहरू काळात स्वातंत्र्यसैनिकांनी भरलेली संसद आता गुन्हेगारांचे आश्रयस्थान बनली आहे हे सांगण्यातून त्यांना मुल्यांचा हा ऱ्हास दाखवून द्यायचा होता. लोकशाही मुल्ये बळकट करण्यासाठी ज्या संस्था उभारण्यात आल्या त्यांची अधोगती हा चिंतेचा विषय असल्याचे त्यांनी मांडले. त्यांचा हा उल्लेख भारतीय संदर्भात पहायचा झाल्यास देशाचे सुप्रीम कोर्ट, कॅग सारखी संस्था, निवडणूक आयोग आणि   वृत्तपत्रे वृत्तवाहिन्याचे पक्षपाती सरकार धार्जिणे वर्तन पाहता येईल . भारताच्या परिस्थितीवर फारसे न बोलताही भारतीयांना आपल्या अधोगतीचा आरसा दाखविणारे ली यांचे भाषण होते. ली यांच्या भाषणात जागतिक स्तरावर लोकशाहीचा होत असलेला ऱ्हास या बद्दल चिंता आहे आणि अमेरिकेचे उदाहरण देत मोठ्या संख्येने ट्रंप समर्थक मतदारात बिडेन नाही तर ट्रंपच जिंकले अशी भावना निर्माण होणे लोकशाहीसाठी धोक्याचे असल्याचे त्यांनी मांडले. तेव्हा भारताने आपलीच बदनामी झाली असे समजण्याचे कारण नव्हते. पण मोदी सरकारची अपराध भावना या भाषणाने चेतविली गेली. सिंगापूरच्या पंतप्रधानांनी लोकशाही बद्दलची चिंता किती समर्थपणे व्यक्त केली हे यावरून लक्षात येईल. तसे त्यांच्या भाषणाचे निमित्त आणि संदर्भ स्थानिक असला तरी त्यांचे भाषण जागतिक स्तरावर अभ्यासावे असे आहे. नेहरू काळात आपल्याही संसदेत अशी आशयगर्भ , संवेदनशील भाषणे होत होती. ती परंपरा लोप पावणे हे देखील लोकशाही मूल्याचा ऱ्हास दर्शविणारे आहे. संसदेत धडधडीत खोटे बोलण्या पर्यंत आपला प्रवास झाला आहे. आणि सिंगापूरच्या पंतप्रधानाच्या भाषणाचे निमित्तच खोटे बोलणाऱ्या सिंगापूरच्या तीन संसदसदस्यांना का शिक्षा झाली पाहिजे हे सांगण्याचे होते ! असे भाषण मोदी आणि त्यांच्या सरकारला झोंबले नसते तरच नवल.मात्र प्रत्येक लोकशाहीप्रेमी नागरिकांनी वाचावे, अभ्यासावे आणि अंमलात आणावे असे चिमुकल्या सिंगापूर देशाच्या पंतप्रधानाचे भाषण आहे .
---------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि. यवतमाळ 
मोबाईल : ९४२२१६८१५८ 

  

1 comment:

  1. Babyliss Pro nano titanium – 0.8 oz - TITanium-arts.com
    Babyliss Pro titanium apple watch band nano titanium is an titanium scissors adjustable titanium white blade that has rainbow titanium a top notch grip ford fusion titanium for sale for a thicker grip.

    ReplyDelete