Thursday, June 29, 2017

राजा उदार झाला , हाती कर्जमुक्तीचा भोपळा दिला !

आकड्यांचा घोळ करून सरकारने 'सरसकट' कर्ज दिलासा ३४००० कोटीचा जाहीर केला आहे. हे सगळे करताना सरकारने ज्या तारखेपर्यंतच्या कर्जात दिलासा देण्याची घोषणा केली आहे त्यामुळे तर सर्वाना 'सरसकट' सूट ऐवजी कर्जाच्या दिलाशातून सरकारने सर्व शेतकऱ्यांना 'सरसकट' वगळले असे म्हणणे वस्तुस्थितीला धरून होणार आहे. कारण सरकार २०१६-१७ या आर्थिक वर्षात घेतलेल्या कर्जावर कोणालाही कोणतीही सूट देणार नाही !
-----------------------------------------------------------------------------------------------------


उत्तर प्रदेश नंतर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जात मोठा दिलासा देण्याची घोषणा फडणवीस सरकारने केली आहे. उत्तर प्रदेशात शेतकऱ्यांची संख्या महाराष्ट्रापेक्षा बरीच जास्त असल्याने आंशिक कर्जमुक्तीचा तिथला आकडा मोठा असणारच. उत्तर प्रदेशने १ लाखापर्यंत कर्जात दिलासा दिला आहे तर महाराष्ट्र सरकारने १ लाख ५० हजार रुपया पर्यंत दिलासा देण्याची घोषणा करून उत्तर प्रदेशचा आकडा गाठण्याचा प्रयत्न केला आहे. उत्तर प्रदेशच्या कर्जमुक्तीचा आकडा ३६ हजार कोटीचा आहे तर महाराष्ट्राचा ३४ हजार कोटीचा . महारष्ट्रातील शेतकरी संख्या लक्षात घेता आकडा किंचित कमी दिसत असला तरी कर्जातील दिलासा उत्तर प्रदेश पेक्षा सकृतदर्शनी मोठा आहे. कर्नाटक , पंजाब , आंध्र , तेलंगाना या राज्यांमध्ये देखील शेतकऱ्यांना कर्जात दिलासा देण्याचा प्रयत्न झाला आहे. पंजाब मध्ये प्रत्येकी २ लाखापर्यंत दिलासा देण्याची घोषणा झाली असली तरी तिथल्या कर्जमुक्तीचा एकूण आकडा महाराष्ट्राच्या बराच मागे आहे. त्यामुळे कर्जात दिलासा देणाऱ्या आकड्याच्या बाबतीत तरी महाराष्ट्र राज्याने सध्या आघाडी घेतली आहे असे म्हणता येईल. मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर प्रदेशच्या घोषणेनंतर महाराष्ट्रात होणारी मागणी टाळण्याचा बराच प्रयत्न केला होता. कर्जमुक्तीतून फारसे काही निष्पन्न होणार नाही असा घोषा त्यांनी लावला होता. कर्जमुक्ती न देता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्याने त्याची राजकीय निकडही त्यांना भासत नव्हती. पण विरोधी पक्षांच्या शेतकरी यात्रेने आणि विरोधी पक्षांच्या यात्रेत सामील न होता खा.राजू शेट्टी आणि आ.बच्चू कडू यांनी काढलेल्या यात्रानी कर्जमुक्तीसाठी जमीन तयार झाली होती. विरोधी पक्षांची साथ न घेता अनपेक्षितपणे उभ्या राहिलेल्या शेतकरी आंदोलनाने कर्जमुक्तीची अपरिहार्यता मुख्यमंत्री व त्यांच्या सरकारच्या लक्षात आल्याने पाहू , बघू , अभ्यास करून ठरवू अशी उडवाउडवी करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना तातडीने निर्णय घेणे भाग पडले. याचे श्रेय विरोधी पक्षांना किंवा शेतकऱ्यांच्या संघटनांना मिळू नये यासाठी त्यांनी मध्यरात्री वाटाघाटी करून आंदोलनात फुट पाडण्याचा आणि आंदोलन संपविण्याचा प्रयत्न करतांना ५ एकर पर्यंत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ३० हजार कोटीची कर्जमुक्ती जाहीर केली. त्यांचा हा प्रयत्न अंगलट येवून शेतकरी आंदोलन अधिक भडकल्याने त्यांना शेतकरी नेत्यांशी पुन्हा वाटाघाटी करणे भाग पडले. नंतर विरोधी पक्षांशी सल्लामसलत करून नव्याने ३४ हजार कोटी रुपयाचा कर्जात दिलासा देण्याची घोषणा केली. कर्जमुक्तीच्या आकड्याच्या बाबतीत त्यांनी देशात आघाडी घेतली आणि फार तर कर्जात १ लाखा पर्यंतची सूट मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत असताना फडणवीस यांनी 'सरसकट' १ लाख ५० हजार रुपया पर्यंतची कर्ज सवलत जाहीर करून टाळ्या घेतल्या. अभ्यासात वेळ घेतला तरी आपण चांगले गुण घेवून ही कठीण परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या अविर्भावात पेढे वाटल्यासारखे राज्यभर पोस्टर लावून स्वत:ची पाठ थोपटून घेतली. पण त्यांनी जाहीर केलेला कर्जमुक्तीचा आकडा आणि लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांची जाहीर केलेली संख्या आणि वरून सरसकट दीड लाखाचा दिलासा देण्याचा दावा याचा कुठेच ताळमेळ बसत नाही. फडणवीस गणितात कच्चे आहेत की शेतकऱ्यांना गणित काय कळते असे वाटून त्यांनी बेधडकपणे चुकीचे गणित मांडले हे कळायला मार्ग नाही. अभ्यास करण्याच्या नावावर त्यांनी घेतलेला वेळ हा प्रामाणिकपणे अभ्यास करून परीक्षा देण्यासाठी होता की बनवाबनवी करून उत्तीर्ण होण्याचे १०० मार्ग असे एखादे पुस्तक अभ्यासण्यासाठी त्यांनी वेळ घेतला असा प्रश्न पडण्यासारखी फडणवीसांची कर्जमुक्तीची योजना आहे.


१ जून पासून शेतकऱ्यांचा संप सुरु झाल्यानंतर दोन दिवसातच रात्रीच्या अंधारात वाटाघाटी करून जी घोषणा फडणवीसांनी केली होती त्यानुसार ५ एकरची मर्यादा घालून त्यांचा ७/१२ कोरा करण्यासाठी ३० हजार कोटी रकमेची कर्जमुक्ती जाहीर केली होती. याचा ४० लाख अल्प आणि छोट्या भू-धारकांना फायदा होणार असल्याचा दावा करण्यात आला होता. शेतकरी आंदोलकांनी सरकारचा हा निर्णय फेटाळून सरसकट सर्व शेतकऱ्यांना कर्जातून सूट मिळण्यासाठी आंदोलन चालू ठेवल्याने सरकारला पुन्हा वाटाघाटी करून 'सरसकट' कर्जात सवलत देण्यास 'तत्वश:' मान्यता देण्यात आली. अंतिम घोषणा करतांना मात्र 'तत्व' गुंडाळून 'सरसकट' दीड लाखापर्यंत कर्जात सूट देण्यासाठी ३४ हजार कोटी रुपयाच्या तरतुदीची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. अशी घोषणा करताना ८९ लाख शेतकऱ्यांना दीड लाखा पर्यंतची सूट मिळेल आणि यातील ४० लाख शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा होईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. याशिवाय ज्यांनी कर्जाचा आधीच भरणा केला त्यांना जास्तीतजास्त २५ हजार रुपया पर्यंतचे अनुदान देण्याची घोषणा देखील त्यांनी केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या आधी ३० हजार कोटी रुपयाची कर्जमुक्ती ५ एकर पर्यंतची जमीन असलेल्या ४० लाख शेतकऱ्यांसाठी जाहीर केली होती. नव्या घोषणेत दिलासा मिळणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ४९ लाखाने वाढून ८९ लाख झाली आहे. म्हणजे आधीच्या संख्येत ४९ लाख शेतकऱ्यांची भर आणि आधीच्या आकड्यात फक्त ४००० कोटीची भर लक्षात घेतली तर फार खोलात न शिरता फडणवीस सरकारची बनवाबनवी उघड होते. खोलात शिरले तर सगळीच पोलखोल होते. निर्णयाच्या घोषणे नंतर सरकारने वृत्तपत्रातून दिलेली जाहिरात काळजी पूर्वक वाचली तर जाहिरातीनुसार ४० लाख छोट्या शेतकऱ्यावरील कर्ज दीड लाख किंवा त्याच्या आत असल्याने त्यांचा संपूर्ण ७/१२ कोरा होईल. उरलेल्या ४९ लाख शेतकऱ्यांवरील कर्ज दीड लाख रुपयापेक्षा अधिक असल्याने त्यांचा ७/१२ कोरा होणार नाही , पण दीड लाखाची सूट मिळेल. पण अशी दीड लाखाची सूट ४९ लाख शेतकऱ्यांना द्यायची झाली तर केवळ त्यासाठी ७३ हजार कोटी पेक्षा अधिक रक्कम लागेल. मग ३४ हजार कोटी रुपयात ४० लाख शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा होवून ४९ लाख शेतकऱ्यांना दीड लाख पर्यंतची सूट मिळणे आणि यांच्याशिवाय कर्जभरणा केलेल्या शेतकऱ्यांना २५ हजारचे अनुदान याचा मेळ बसूच शकत नाही. सरकारचा दुसरा दावा असा आहे कि कर्जसवलतीतून सरकारी कर्मचारी, निर्वाचित लोकप्रतिनिधी, मोठे व्यापारी आणि इतर आयकरदाते अशा फक्त १० टक्के लोकांना वगळले आहे. राज्यातील एकूण शेतकऱ्यांची संख्या १ कोटी ३६ लाख आहे. सरकारचा अधिकृत दावा ८९ लाख शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा आहे. याचा अर्थ ३० टक्क्यापेक्षा अधिक शेतकरी कर्जसवलतीच्या बाहेर आहेत. हे ३० टक्क्यापेक्षा अधिक असलेले शेतकरी असे असतील ज्यांनी कर्ज घेतले नाही किंवा बँकेने ज्यांना कर्जासाठी अपात्र समजून कर्ज दिलेले नाही. तेव्हा असा सगळा आकड्यांचा घोळ करून सरकारने 'सरसकट' कर्ज दिलासा ३४००० कोटीचा जाहीर केला आहे. हे सगळे करताना सरकारने ज्या तारखेपर्यंतच्या कर्जात दिलासा देण्याची घोषणा केली आहे त्यामुळे तर सर्वाना 'सरसकट' सूट ऐवजी कर्जाच्या दिलाशातून सरकारने सर्व शेतकऱ्यांना 'सरसकट' वगळले असे म्हणणे वस्तुस्थितीला धरून होणार आहे. कारण सरकार २०१६-१७ या आर्थिक वर्षात घेतलेल्या कर्जावर कोणालाही कोणतीही सूट देणार नाही !


गेल्यावर्षी पाउसपाणी चांगला झाल्याने पिके उत्तम आल्याने त्यावर्षीच्या कर्जात सूट देण्याची गरज नसल्याचे राज्यसरकारकडून सांगण्यात येत आहे. पण याच वर्षात नोटबंदी आणि चांगले पीक या दोन गोष्टीचा शेतकऱ्यांना दुष्काळी वर्षापेक्षा जास्त फटका बसला आहे. फटका नेहमीच बसतो पण हा फटका सहन करण्या सारखा नसल्यानेच शेतकरी रस्त्यावर उतरला होता. दुष्काळी वर्षात ११००० रुपये क्विंटल भावाने विकली गेलेली तूर सुगीच्या वर्षात ३ ते ४००० रुपये क्विंटलने विकावी लागली. कमी अधिक फरकाने सर्व शेतमालाच्या बाबतीत असेच घडले. दुध , फळे , भाजीपाला असे काहीही न सुटल्याने सर्व स्तरातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. एवढा मोठा फटका बसल्यानंतर त्याची कर्जफेडीची क्षमता उरली नसणार हे जर राज्यसरकारला कळत नसेल तर त्याला शेती आणि शेतकऱ्यांबद्दल काही कळत नाही किंवा त्यांना शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी दिलासा देण्याचे नाटक तेवढे करायचे आहे असेच म्हणावे लागेल. मागच्या वर्षाच्या कर्जातून सुटका होणार नसेल तर मग कोणाला सरकारी योजनेचा लाभ होणार आहे आणि कोणाचा ७/१२ कोरा होणार या प्रश्नाचे काय उत्तर असू शकते ?  ५ एकरच्या आतले फार कमी कोरडवाहू शेतकरी मध्यममुदतीचे कर्ज घेतात आणि मागितले तरी बँका त्यांना देत नाही. त्यांना मिळते ते पीककर्ज आणि दुसऱ्या हंगामासाठी कर्ज घ्यायचे तर आधीचे फेडावे लागते किंवा जुन्याचे नवे करावे लागते. २५-३० टक्के अल्पभूधारकांना हेही शक्य होत नाही आणि ते नव्या कर्जापासून वंचित थकबाकीदार राहतात. याचा अर्थ ७५ टक्के कोरडवाहू अल्पभूधारकांना सरकारच्या कर्जसवलतीचा अजिबात लाभ मिळणार नाही. २०१६ साली कर्ज न मिळालेले २०१५ चे थकबाकीदार तेवढे सवलतीस पात्र ठरतील. म्हणजे सरकारच्या अटीचा सर्वाधिक फटका अल्पभूधारक कोरडवाहू शेतकऱ्याला बसणार आहे. ओलिताच्या आणि फळबागांच्या शेतीसाठी साधारणपणे मध्यममुदतीचे कर्ज दिल्या किंवा घेतल्या जाते. या शेतकऱ्यांपैकी ज्यांनी आपले मध्यममुदतीचे कर्ज २०१५ मध्ये फेडून २०१६ मध्ये नवे कर्ज घेतले त्यांनाही घोषित कर्ज सवलतीचा लाभ मिळणार नाही. २०१६ मध्ये कर्ज न भेटलेल्या २०१५ पर्यंतच्या थकबाकीदारांचा ७/१२ तेवढा कोरा होणार आहे. जुने थकबाकीदार शेतकरी ३० टक्क्या पेक्षा जास्त असू शकत नाही. कारण कर्ज घेतल्याशिवाय शेती करता येत नाही आणि कर्ज दरवर्षीच घ्यावे लागत असल्याने थकबाकीदार राहून चालत नाही. म्हणजे फारतर २५ ते ३० टक्के थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्ज सवलतीचा लाभ मिळेल. यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांचा बोजा तर सरासरीने दरडोई ५० हजार किंवा त्यापेक्षा कमीच असणार. याचा दुसरा अर्थ दीड लाख रुपयाची सूट मिळविणारे शेतकरी १० टक्के पेक्षा जास्त असणार नाहीत . त्यांच्याही बाबतीत ही दीड लाखाची सवलत मिळवायची असेल तर उरलेले कर्ज आधी भरले पाहिजे या जाचक अटीने त्यातील किमान निम्मे शेतकरी दीड लाखापासून वंचित राहण्याचीच अधिक शक्यता आहे. अशाप्रकारे सरकारच्या घोषित पद्धतीने कर्जाची सवलत मिळणार असेल तर त्यासाठी ३४००० कोटी रुपये लागणार नाहीत. १०-१५००० कोटी खर्चून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसून मोकळे होण्याचा सरकारचा हा डाव आहे. मागे मनमोहन सरकारने जी ७२००० कोटीची कर्ज सवलत जाहीर केली होती त्यातील प्रत्यक्षात ५२००० कोटीचेच वाटप झाले होते हे लक्षात घेतले तर फडणवीस सरकारने घातलेल्या अटी आणि शर्तीमुळे ३४००० कोटी पैकी फार कमी रकमेची कर्ज सवलत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या वाट्याला येईल असेच आजचे चित्र आहे.

हे चित्र बदलायचे असेल तर घोषित रकमेची कर्जसवलत शेतकऱ्यांना मिळेल या पद्धतीने अंमलबजावणी करण्यासाठी सरकारवर दबाव आणण्याची गरज आहे. मूळ योजनेत दोन घटकांवर अन्याय झाला आहे. सरकारी पाहणी अहवाल असे अधिकृतपणे नमूद करतात कि , तीन पैकी एक म्हणजे १/३ अल्पभूधारक शेतकरी असे आहेत ज्यांची कर्जफेडीची क्षमता तपासून बँका त्यांना कर्जच देत नाहीत. अशा शेतकऱ्यांना सावकाराकडून कर्ज घ्यावे लागते किंवा नातेवाईकांकडून उधार-उसनवारीने पैसे घेवून शेती करावी लागते. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यात याच गटातील शेतकरी अधिक आहेत आणि याच गटाला कर्जसवलतीच्या घोषित रकमेपैकी एक छदामही मिळणार नाही. अन्याय झालेला दुसरा घटक आहे ज्याने कर्जाचा भरणा केला तो. त्याची क्षमता आहे म्हणून कर्ज भरणा केला असे सरकार मानत असेल तर मग इतर शेतकरी का भरू शकत नाही असा प्रश्न उपस्थित होईल. मुळात जे शेतकरी भरणा करतात तो प्रामुख्याने जुन्याचे नवे करणे असते किंवा मग अधिक रकमेचे नवे कर्ज मिळावे म्हणून किडूकमिडूक विकून किंवा उधार - उसनवारी करून पैसे भरीत असतात. त्यामुळे असे कर्जभरणा केलेले शेतकरीही सरकारने घोषित केलेल्या दीड लाखा पर्यंतच्या सवलतीचे हकदार आहेत. त्यांची २५ हजार रुपये अनुदान देवून बोळवण करणे हा त्या शेतकऱ्यावर अन्याय आहे. कर्जभरणा करण्याची अशी शिक्षा मिळत असेल तर भविष्यात कर्जभरणा करणारांची संख्या कमी होईल. तेव्हा या दोन्ही घटकांना कर्जसवलतीच्या योजनेत स्थान मिळायलाच हवे. आणखी दोन घटक उरतात. ज्यांनी स्वेच्छेने कर्ज घेतले नाही आणि ज्यांनी कर्ज घेतले पण आयकर धारक असल्याने त्यांना कर्ज सवलतीतून वगळले आहे. सरकारने हे दोन्ही घटक विचारात घेतले नाहीत कारण आपण कशासाठी कर्ज सवलत देत आहोत याबाबत सरकारचा गोंधळ आहे. शेतकऱ्याना वारंवार कर्ज सवलत द्यावी लागते , कमी पिकले तरी आणि जास्त पिकले तरी त्यांच्यात कर्जफेडीची क्षमता निर्माण होत नाही कारण बाजारात शेतीमालाला किफायतशीर भाव मिळत नाही. शेतीचा तोटा शेती करणाऱ्या सर्व घटकांना कमी अधिक प्रमाणात सहन करावा लागत असेल तर कर्ज सवलतीचे हकदार सर्वच शेतकरी आहेत. त्याचमुळे सरकारने आणि समाजाने कर्ज सवलतीवर होणारा खर्च हा शेतीमालाला किफायतशीर भाव मिळत नसल्याने देण्यात येणारे अनुदान समजले पाहिजे. कर्ज सवलत म्हणजे भाव मिळत नाही म्हणून दिले जाणारे अनुदान आहे हे एकदा मान्य केले की या अनुदानावर जे जे शेतीत पिकवतात त्या त्या सर्वांचा अधिकार आहे हे मान्य व्हायला अडचण जाणार नाही. याचे दोन फायदे आहेत. जे अल्पभूधारक आहेत ज्यांना कर्ज मिळतच नाही , त्यांना अनुदान मिळाले तर ते या अनुदानातून शेती शिवाय वेगळा व्यवसाय करू शकतील आणि आत्महत्येची पाळी त्यांचेवर येणार नाही. आयकरदात्याला देखील शेतीतील नुकसानभरपाई मिळाली तर त्याचा शेतीत गुंतवणूक वाढण्याकडे कल वाढून त्याचा शेतीव्यवसायाला फायदाच होईल. म्हणून सरकारने जाहीर केलेल्या कर्ज सवलतीच्या ३४००० कोटीकडे भाव न मिळाल्याच्या भरपाईपोटी आंशिक अनुदान म्हणून पाहिले पाहिजे आणि या अनुदानाचे कर्ज घेतलेल्या न घेतलेल्या सर्व शेतकऱ्यात न्याय वाटप झाले पाहिजे. ३४००० कोटीची घोषणा प्रत्यक्षात दहा-पंधरा हजार कोटीत गुंडाळण्याचा सरकारचा डाव हाणून पाडण्यासाठी असे करणे गरजेचे आहे. यापुढे शेतकरी संघटनांनी कर्जमुक्तीसाठी आंदोलन करण्या ऐवजी सरळ किफायतशीर भाव आणि खर्च यातील फरक मिळविण्यासाठीच आंदोलन केले पाहिजे. म्हणजे कर्जमुक्तीवर सरकार , रिझर्व्ह बँक , इतर बँका , माध्यमे आणि उच्चभ्रू समाज यांचे उपदेशाचे डोस पिण्याची वेळ शेतकऱ्यावर येणार नाही.


----------------------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव , पांढरकवडा , जि. यवतमाळ

मोबाईल - ९४२२१६८१५८
--------------------------------------------------------------------------------------------

Friday, June 23, 2017

आणीबाणी नाही तरीही ... !


आणीबाणीने घटनेतील मुलभूत अधिकाराचे १९ वे कलम निष्प्रभ ठरविले होते आणि आताचे सरकार ते कलम निष्प्रभ ठरविण्यासाठी नव्या क्लुप्त्या वापरत आहे. जनावराच्या व्यापारावर सरसकट घालण्यात आलेले निर्बंध हे त्याचे ठळक उदाहरण आहे.
-------------------------------------------------------------------------

४२ वर्षापूर्वी आजच्या दिवशी म्हणजे २५ जून १९७५ च्या रात्री तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या सल्ला व शिफारशी वरून तत्कालीन राष्ट्रपती फख्रुद्दिनअली अहमद यांनी देशात आणीबाणी घोषित करण्याच्या दस्तावेजावर सही केली होती. त्याच रात्री लोकनायक जयप्रकाश नारायण यांचेसह जवळपास सर्वच विरोधीपक्ष नेत्यांना अटक करून स्थानबद्ध करण्यात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांचाही त्यात समावेश होता. आजचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अटक टाळण्यासाठी भूमिगत झाल्याचे सांगितले जाते. पण भूमिगत राहून त्यांनी काय केले हे मात्र अजून गुलदस्त्यातच आहे. या शिवाय विरोधी पक्षांचे तसेच सर्वोदयी आणि संघाचे असंख्य कार्यकर्ते यांची त्या रात्री सुरु झालेली धरपकड पुढे अनेक दिवस सुरु होती. देशांतर्गत घडामोडीमुळे आणीबाणी लागू करण्याची ही पहिलीच वेळ असली तरी चीन आणि पाकिस्तानच्या आक्रमणाच्या वेळी देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती. आणि आधी दोनदा लागू केलेली आणीबाणी दीर्घकाळ राहूनही लोकांच्या लक्षात राहणार नाही इतकी निरुपद्रवी होती. चीनी आक्रमणाच्या वेळी १९६२ मध्ये लागू करण्यात आलेली आणीबाणी १९६८ मध्ये उठविण्यात आली होती. त्यामुळे १९६५ च्या पाकिस्तान विरुद्धच्या युद्धात वेगळी आणीबाणी जाहीर करावी लागली नव्हती. १९७१ च्या युद्धाच्या वेळी मात्र पुन्हा आणीबाणी जाहीर करण्यात आली होती. त्यावेळी घोषित केलेली आणीबाणी सुरु असतानाच इंदिराजींनी १९७५ मध्ये देशांतर्गत उपद्रवाचे कारण पुढे करीत अंतर्गत आणीबाणीची घोषणा केली. आणीबाणी बाह्य कारणासाठी असो कि अंतर्गत कारणासाठी त्यामुळे केंद्राला व्यापक अधिकार मिळतात व्यक्तीचे आणि घटक राज्याचे घटनात्मक अधिकार निलंबित असतात. एक मात्र खरे कि १९६२ ते ६८ आणि १९७१ ते ७५ अशी १० वर्षे देशात आणीबाणी लागू असताना राजकीय सामाजिक कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनता यांना आणीबाणीचा अर्थ कळला तो इंदिराजींनी १९७५ मध्ये आणीबाणी जाहीर केल्या नंतरच्या २४ तासात !

     आणीबाणीचा सोप्या शब्दात अर्थ सांगायचा तर आणीबाणी काळात घटनेने दिलेले मुलभूत अधिकार समाप्त होतात. घटनेच्या कलम १९ 
२० आणि २१ प्रमाणे नागरिकांना मिळालेले अधिकार त्या काळापुरते समाप्त होतात. आणीबाणीच्या समाप्ती नंतर घटनेच्या ४४ व्या दुरुस्तीनुसार यात थोडा बदल झाला आहे. पण त्यावेळी मात्र नागरिकांचे मुलभूत अधिकार समाप्त झाले होते आणि अटके विरुद्ध सुद्धा कोर्टात दाद मागण्याची सोय नव्हती.  ज्यांनी आणीबाणीची दाहकता अनुभवली असे संघटन आणि पक्ष आज सत्तेत आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्ष आणि त्या पक्षाचे पालकत्व ज्याच्याकडे जाते त्या संघाकडून आणीबाणी सारखी परिस्थिती निर्माण होणार नाही अशी अपेक्षा असणे गैर ठरणार नाही. आणीबाणीच्या बसलेल्या चटक्यामुळे घटनेने दिलेल्या मुलभूत अधिकारांच्या संरक्षणासाठी हे सरकार कॉंग्रेस राजवटीपेक्षा जास्त सजग असणे अपेक्षित होते. ही अपेक्षापूर्ती मोदी सरकारकडून होते की नाही हे पाहणे आजच्या दिवशी औचित्यपूर्ण ठरेल.


पुष्कळ काळ लोटल्यामुळे अनेकांना आणीबाणीची कारणे आणि परिणाम आठवत नाहीत. त्याच्या फार खोलात जाण्याची गरज नाही. २५ जून १९७५ रोजी काय घडले यावर नजर टाकली तरी त्याचा अंदाज येईल. १९७४ पासून लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली महागाई, भ्रष्टाचार , कुशासन आदि प्रश्नावर आंदोलन सुरु होते आणि आंदोलन प्रामुख्याने बिहार प्रांतात सुरु असले तरी देशव्यापी पाठींबा आंदोलनाला होता. आंदोलनाचा रोख केंद्रसरकार विरुद्ध होता. त्यातच तांत्रिक कारणाने अलाहाबाद हायकोर्टाने इंदिराजीची लोकसभेवरील निवड अवैध ठरविल्याने इंदिराजींच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली होती. २५ जून १९७५ रोजी रामलीला मैदानावर जयप्रकाश नारायण यांची विराट सभा झाली होती. त्यासभेत जयप्रकाशांनी इंदिराजींच्या राजीनाम्यासाठी देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली होती. आंदोलनाची घोषणा करताना त्यांनी पोलीस आणि सैन्यदलाने सरकारचे कोणतेही चुकीचे आदेश न मानता घटना आणि पोलीस आणि सैन्यदलाच्या नियमावलीनुसार काम करण्याचे आवाहन केले होते. आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न होईल या आशंकेने त्यांनी हे आवाहन केले होते. नेमके सैन्य आणि पोलीस दलाला बेकायदेशीर न वागता घटनेप्रमाणे वागण्याचे केलेले आवाहनच आंदोलन चिरडण्यासाठी आणि आणीबाणी लागू करण्यासाठी इंदिराजींनी पुढे केले.

               आकाशवाणीवरून आणीबाणीची घोषणा करताना काही व्यक्ती सैन्य आणि पोलीस दलाला सरकारचे आदेश न पाळण्याचे सांगत असल्याने उद्भवू शकणारी परिस्थिती टाळण्यासाठी हे पाउल उचलत असल्याचे सांगितले. सैन्य आणि पोलीस दलाने नियमाप्रमाणे काम करावे आणि चुकीचे आदेश मानू नयेत हे जयप्रकाशजींचे त्यावेळचे आवाहन आजच्या संघ आणि भाजपच्या राज्यकर्त्यांना मान्य होते. इंदिरा सरकारला मात्र हेच कृत्य त्यावेळी देशद्रोहाचे वाटले होते . आज काश्मीरच्या काही घटनांचा संदर्भात तिथे तैनात असलेल्या पोलीस आणि सैन्यदलाला त्यांनी नियमाप्रमाणे काम करावे, लोकांच्या अधिकाराचे हनन करू नये असे कोणी म्हंटले तर तो आजच्या राजवटीत देखील देशद्रोह ठरत असेल तर मग इंदिराजीने जे केले ते कसे चुकीचे ठरते असा प्रश्न आजच्या राज्यकर्त्यांना विचारला तर काय आणि कोणत्या तोंडाने ते उत्तर देतील. सैन्याला नीतीनियमांची आठवण करून दिली म्हणून आणीबाणी लादली गेली आणि अशा आणीबाणी विरुद्ध लढलेले नेते , त्यांचा पक्ष , त्यांच्या मागे असलेली संघटना आज नेमके तेच करीत आहेत. सैन्याला नीती-नियमांची आठवण करून देणाऱ्यांना देशद्रोही ठरवून आजचे राज्यकर्ते आणि त्यांचे पाठीराखे मोकळे होत आहेत. फक्त इंदिराजीच्या त्यावेळच्या भूमिकेत आणि आजच्या राज्यकर्त्यांच्या भूमिकेत तांत्रिक फरक आहे. इंदिराजींनी कायद्याच्या आणि घटनात्मक मुद्द्याचा आधार घेत पोलिसांच्या मदतीने असे आवाहन करणाऱ्यांचा आवाज बंद केला तर आजचे राज्यकर्ते घटना – कायदा याला हात न लावता समर्थकांच्या मदतीने असे आवाहन करणाऱ्यांना देशद्रोही ठरवून आवाज बंद करण्याचा प्रयत्न करीत आहेत. कृती सारखीच पद्धत तेवढी वेगळी.

आणीबाणीत कायदा आणि पोलिसांच्या मदतीने , मदतीने म्हणण्या पेक्षा पोलीसांचा अतिरेकी वापर करून , सरकारच्या धोरणाशी असहमत लोकांचा बंदोबस्त करण्यात आला होता. आजचे सरकार मात्र पोलिसांचा अतिरेकी वापर सोडा कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा वापरच करीत नाही. आणीबाणी ज्यांनी भोगली त्यांना पोलीस आणि आणीबाणीचा संबंध चांगलाच माहित आहे. पण पोलिसांचा वापर न करता आणीबाणीची परिस्थिती निर्माण करता येते हे आजच्या राज्यकर्त्यांचे राज्यशास्त्राला नवे योगदान म्हणता येईल. गुजरातमध्ये मृत जनावरांची कातडी काढण्याचा पारंपारिक व्यवसाय करणाऱ्या काही दलित तरुणांना गाय मारल्याच्या संशयावरून जीपला बांधून जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या शहरात फिरविले जाते , फटके दिले जातात आणि अशा कायदा आणि माणुसकीच्या मौतीच्या मिरवणुकीत पोलीस बघे म्हणून सामील होतात. १९७५ ची आणीबाणी पोलिसांचा वापर करून अंमलात आली आणि आज पोलिसांना हातावर हात धरायला लावून आणीबाणी सदृश्य परिस्थिती निर्माण केली जात आहे. कारण गुजरात मधील ज्या घटनेचा उल्लेख केला ती काही अपवादाने घडणारी घटना नाही. गाय मारल्याच्या संशयावरून किंवा गायीचे मांस बाळगल्याच्या संशयावरून कोणी कोणाला कुठेही मारू शकते आणि तेही पोलिसांच्या उपस्थितीत. नुकतेच गोव्यात हिंदुत्ववाद्यांचे संमेलन झाले. त्यात खुलेआम धर्मनिरपेक्ष लोकांना मारण्याचे आवाहन मंचावरून केले गेले. इथेही पोलिसांची बघ्यांची भूमिकाच होती. पोलीस फक्त घटनेची आणि घटनेत मृताची उत्तरक्रिया तेवढी पार पाडतात. ही परिस्थिती बघितली म्हणजे पोलीस आणि सैन्यदलाने राज्यकर्त्यांना काय हवे हे न बघता किंवा त्यांना काय हवे तसे करण्याचा प्रयत्न न करता नियमानुसार आणि कायद्यानुसार कृती करावी हे तेव्हा जयप्रकाश नारायण यांनी केलेले आवाहन किती उचित होते हेच मोदी सरकार आपल्या कृतीतून सिद्ध करीत आहे.


आणीबाणीने घटनेतील मुलभूत अधिकाराचे १९ वे कलम निष्प्रभ ठरविले आणि आताचे सरकार ते कलम निष्प्रभ ठरविण्यासाठी नव्या क्लुप्त्या वापरत आहे. जनावराच्या व्यापारावर सरसकट घालण्यात आलेले निर्बंध हे त्याचे ठळक उदाहरण आहे. शेतकऱ्यांच्या संकटात भर घालणाऱ्या या निर्बंधाने घटनेच्या १९ व्या कलमाप्रमाणे असलेले व्यवसाय स्वातंत्र्य धोक्यात आणले आहे. जनावरांचे संगोपन आणि कत्तल हा राज्याच्या अखत्यारीतील विषय आहे. गाय ,गोऱ्हे आणि बैल यांच्या कत्तलीवर घटनेतील निर्देशानुसार राज्यांनीच कायदे केले आहेत आणि ते कायदे वैधही आहेत. गोहत्याबंदी कायद्याच्या परिणामांबाबत आणि हेतुंबाबत आक्षेप आहेत पण कायदेशीर वैधते बाबत कोणाचे आक्षेप नाही. पण जनावरांच्या व्यापारावर निर्बंध आणणारा केंद्रसरकारचा नवा कायदा घटनेतील १९ व्या कलमानुसार प्राप्त मुलभूत अधिकार हिरावून घेतो आणि राज्याच्या अधिकारावर आक्रमण करतो. घटनेचे १९ वे कलम आणि राज्याचे अधिकार फक्त विधीवत आणीबाणी घोषित करूनच निष्प्रभ करता येतात. पण मोदी सरकार विधिवत आणीबाणी न लावताच आणीबाणीने मिळणारे अधिकार वापरण्याचा प्रयत्न करीत आहे. हा कायदा न्यायालयात निष्प्रभ होईलही पण त्यामुळे सरकारचा उघडा पडलेला हेतू झाकल्या जाणार नाही किंवा बदलणार नाही. संघ आणि भाजपला देशभरात पाय पसरविण्यासाठी १९७५ च्या आणीबाणी विरुद्ध लढण्याचा फार मोठा उपयोग झाला. त्या आणीबाणीने देशावर राज्य करण्याचे स्वप्न साकार झाल्याने भाजपला आणीबाणी विषयी प्रेम तर वाटायला लागले नाही ना असे जाणवण्या सारखी वर्तमान परिस्थिती आहे.

--------------------------------------------------------------
सुधाकर जाधव , पांढरकवडा , जि. यवतमाळ
मोबाईल – ९४२२१६८१५८
------------------------------------------------------------------
                 

Thursday, June 15, 2017

चतुर सरकार उथळ नेते

वेतन आयोग देताना कोण श्रीमंत कोण गरीब , कोण लहाना कोण मोठा , कोण भ्रष्ट कोण निर्मल , कोण गरजवंत कोण गरजवंत नाही असा कधी विचार होतो का. तेव्हा कोणी का म्हणत नाही अमुक यालाच वेतन आयोगाचा लाभ मिळाला पाहिजे , तमुक घटकाला मिळता कामा नये. तेव्हा सरसकट सगळ्यांना लाभ देताना आयकर दात्यांच्या पैशाचा चुराडा होत नाही . मग शेतकऱ्यांना काही द्यायचे म्हंटले तर असा भेद करण्याचे कारण काय असा रोखठोक सवाल विचारण्या ऐवजी शेतकरी नेतेच भेदभावाला मान्यता देत असतील तर त्यांना 'कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ' असेच म्हणावे लागेल.
---------------------------------------------------------------------------------------------


गेल्या आठवड्यात याच स्तंभात शेतकऱ्यांमध्ये भेदाभेद न करता कर्जमुक्ती का झाली पाहिजे याचे विश्लेषण केले होते. संपूर्ण कर्जमुक्ती शक्य नसेल तर विशिष्ट रकमेपर्यंत सर्व शेतकऱ्यांना कर्जसुटीचा लाभ मिळाला पाहिजे असे म्हंटले होते. शेतकऱ्यांच्या सुकाणू समितीचे नेते आणि मुख्यमंत्र्यांनी नेमलेल्या मंत्री गटातील चर्चेत सर्वसाधारणपणे असाच समझौता झाल्याचे मंत्रीगटाचे प्रमुख चंद्रकांत पाटील आणि सुकाणू समिती तर्फे खासदार राजू शेट्टी यांनी जाहीर केले. दोन्ही नेत्यांनी सारखेच मतप्रदर्शन केल्याने हा आंदोलनाचा विजय मानला जावून त्याचे स्वागत झाले. मात्र सरसकट सर्वाना कर्जसूट देण्याचे घोषित करतांना चंद्रकांत यांनी "तत्वश" शब्दाची जोडच दिली नाही तर त्या शब्दावर जोर दिला. याचा सरळ अर्थ असा होतो कि कर्जसूट सर्वच शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे हे सरकारलाही वाटते पण त्यात काही अडचणी आहेत. महाराष्ट्र राज्याची जी आर्थिकस्थिती आहे त्यात सर्वाना लाभ देणे शक्य नाही असे त्यांनी म्हंटले असते तर ते समजण्यासारखे होते. पण त्यांनी तसे म्हंटले नाही. "तत्वश: सरसकट" कर्जसुटीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी कर्ज फेडण्यासाठी केंद्र सरकार महाराष्ट्राला कोणतीही आर्थिक मदत देणार नाही असे जाहीर केले. त्यावर राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शेतकऱ्यांचे कर्ज फेडण्यासाठी राज्यसरकार समर्थ असल्याचे स्पष्ट केले आहे. याचा अर्थ सर्व शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यात किंवा कर्जात सूट देण्यात राज्याची आर्थिक स्थिती हा अडसर नाही. मग तत्वश: न जोडता सरसकट असे का म्हंटले नाही याचा खुलासा मुख्यमंत्र्याच्या आणि चर्चेसाठी गेलेल्या शेतकरी नेत्यांच्या बोलण्यातून होतो. मुख्यमंत्री सभ्य शब्द वापरून श्रीमंत शेतकऱ्यांना लाभ मिळता कामा नये असे सांगतात. स्वत: शेतकरी नेते मात्र तेवढा सभ्यपणा न पाळता धनदांडग्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार नाही याची आम्ही काळजी घेवू असे जाहीरपणे सांगतात. शेती तोट्याची आहे त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होतो आणि कर्जाची परतफेड करता येत नाही या आधारावर आमची लढाई असेल तर मग शेतीच्या तोट्यातून हा "धनदांडगा" शेतकरी कसा पैदा होतो याचे उत्तर देण्याची जबाबदारी असे म्हणणाऱ्या शेतकरी नेत्यांवर येवून पडते. आमच्या चित्रपटात , कथा-कादंबऱ्यात ग्रामीण भागाचे जे अवास्तव चित्रण रंगविण्यात येते त्यात तथ्य असल्याचा शेतीशी संबंध नसलेला संभ्रांत वर्ग मानतो तसे शेतकरी नेतेही मानत नसतील तर ते अपघाताने नेते झाले आहेत , शेतीचे अर्थकारण त्यानाही समजले नाही असेच म्हणावे लागेल. हाताची पाच बोटे सारखी नसतात तसाच शेतकऱ्यात फरक आहे , त्यांच्याकडील जमीन धारणेत आणि काहीसा राहणीमानात देखील फरक आहे हे खरे. पण या फरकाने शेतीच्या उत्पादनावर , उत्पन्नावर आणि एकूणच शेतीच्या अर्थशास्त्रात काहीही फरक पडत नाही. निसर्गाच्या लहरीपणाने आणि सरकारच्या धोरणाने आणि कायद्याने जेवढा आपण शेतीत पैसा ओततो तेवढा पीक आल्यानंतर हाती पडत नाही हेच दुखणे असेल तर ते सर्व शेतकऱ्यांचे आहे. ५ एकर वाल्याचे आहे आणि ५० एकर वाल्याचेही आहे. आणि तर्कसंगत विचार केला तर छोटा शेतकऱ्याचा तोटा छोटा आणि मोठ्या शेतकऱ्याचा तोटा मोठा असणारच. त्याचे कर्ज मोठे आणि कर्जबाजारीपणा मोठा हे ओघाने आलेच. फक्त जास्त जमीनधारणा असलेल्या शेतकऱ्याला आपल्याकडील जमिनीचा तुकडा विकण्याची संधी असते , छोट्या शेतकऱ्यांना तशी संधी नसते. दोघांच्या जीवनमानात फरक पडतो तो या संधीमुळे , शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नामुळे नव्हे. ही संधी देखील सतत मिळत नसते. कारण शेतजमीन किती बाळगायची याला कायदेशीर मर्यादा आहे. त्यामुळे आज तुकडा विकून पोट भरणारा आणि मुला-बाळांना चांगले शिक्षण देवू शकणारा शेतकरी उद्या छोटा शेतकरी बनणार आहे. यातून त्याची सुटका नाही.

जमीन विकून शिक्षण घेतलेले , नोकरीला लागलेले मुले - मुली जर गावाकडे पैसा पाठवू लागले तरच त्या घरच्या शेतकऱ्याचे जीवनमान तुलनेने बरे असू शकते आणि शेतीत तग धरू शकतो. पण यामुळे शेतीव्यवसाय काही फायद्याचा होत नाही. मग मुले कमावतात आणि पैसे पाठवितात म्हणून त्या शेतकऱ्याचे कर्ज तुम्ही माफ करणार नाही हा कुठला तर्क. वस्तुस्थिती तर अशी आहे कि. १-२ टक्क्याचा अपवाद वगळता शहरात जावून कमवायला लागलेली मुले ना आईबापाकडे ढुंकून पाहात ना शेतीकडे. मग ते अपघाताने शेतकरी कुटुंबात जन्मून आयकरदाते झालेत म्हणून त्या घरच्या शेतकऱ्यांना कर्जसवलत नाही हे म्हणणेच दिवाळखोरीचे आहे . असा शेतकरी कर्जसवलतीच्या तत्वात बसत नसेल तर ते तत्वच तत्वश:च नाही तर सरसकट चूक आहे. सरकारला कमी खर्चात शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसायची आहेत तेव्हा ते असे कुतर्क देणारच. मुलांकडून मिळणाऱ्या भिकेवर आम्ही शेतीव्यवसाय तगवून धरणार आहोत कि शेती फायद्याची करून याचा विचार शेतकरी नेते करू शकत नसतील तर ते फक्त नेतेच बनण्याच्या लायकीचे आहेत, शेतकरी नेते बनण्याच्या फंदात पडून शेती आणि शेतकऱ्यांचे नुकसान करू नये. शेतकऱ्यांचे नुकसान करण्यासाठी सरकार आणि निसर्ग समर्थ आहेत त्यात या नव्या नेत्यांची भर नको.सुकाणू समितीतील एका प्रमुख नेत्याने मोठ्या वर्तमानपत्रात लेख लिहून सांगितले कि, बोगस कर्जदार, नोकरदार ,मोठे व्यापारी , करदाते यांना कर्जमाफी मिळणार नाही याची काळजी घेवू. कर्जमाफीसाठी करदात्यांचा पैसा वापरला जाणार असल्याने आम्ही त्याचा दुरुपयोग होवू देणार नाही. हे ऐकायला फार भारी वाटते. खरेच असे झाले पाहिजे अशी आपली पहिली प्रतिक्रिया होते. आता यातील बोगस कर्जदार हा शेतकरी आंदोलनाशी संबंधित मुद्दा नाही. तो कर्ज देणारे ,घेणारे आणि प्रशासन यांच्यातील मुद्दा आहे. आपल्याला विचार शेतीशी संबंधित कर्जाचा करायचा आहे. नोकरदारांकडे , व्यापाऱ्यांकडे आणि करदात्याकडे शेती आहे आणि शेतीसाठी घेतलेले कर्ज निसर्गाच्या फटक्याने किंवा सरकारी धोरणाने बुडाले असेल तर त्याच्या शेतीवरचे कर्ज माफ होवू नये हे म्हणण्याला काय आधार आहे? एका व्यवसायात असणाऱ्याला दुसरा व्यवसाय करू नये असे काही बंधन नसेल तर दोन व्यवसाय एकमेकांशी जोडण्याची गल्लत करता येणार नाही. नोकरी, व्यापार -उद्योग , किंवा कोणत्याही व्यवसायात गुंतलेला माणूस त्या त्या व्यवसायाचे नियम पाळण्यासाठी बांधील असतो. शेतीवर आयकर नाही ही त्याची शेती करण्याची प्रेरणा आहे हे मान्य केले तरी त्यात वाईट काय आहे ? आयकर भरणाऱ्या व्यक्तीला शेतीउत्पन्न आयकर विवरणात दाखवावे लागते आणि शेतीत होणारा तोटा दुसरीकडे होणाऱ्या नफ्यातून वजा होत नाही. शेतीतील तोटा दुसऱ्या व्यवसायातील मिळणाऱ्या नफ्यातून वजा करून करसवलत घेता येत नसेल तर मग कर्जमाफीतून शेतीतील तोटा वजा करायला हरकत असण्याचे काहीच कारण नाही. खरे तर दुसऱ्या व्यवसायातून कमावून त्याचा शेतीत भांडवल म्हणून वापर करणाऱ्या लोकांची शेतीक्षेत्राला उर्जितावस्था आणण्यासाठी खूप गरज आहे. पण व्यापार-उद्योगाकडे पाहण्याचा आमचा दृष्टीकोनच चुकीचा आहे. हे लोक चोर असतात हे समाजवादी विचारांनी आमच्या मनावर एवढे बिंबविलेले असते कि व्यावसायिक म्हणून त्यांच्याकडे पाहण्या ऐवजी चोर म्हणून पाहतो आणि मग अशा चोरांना कर्ज सवलत नको असे स्वाभाविकपणे वाटायला लागते. सर्वसाधारण शेतकऱ्यांची शेतीत भांडवल गुंतवायची , नव्या शेतीतंत्राचा अवलंब करण्याची आणि नवे तंत्रज्ञान आणण्याची आर्थिक ताकद नाही. ती अशा लोकात आहे. त्यांचे स्वागत करण्या ऐवजी त्यांना लाथ मारणे आपल्या पायावर धोंडा पाडून घेण्यासारखे आहे.
जे स्वत:ला आयकर दाते समजतात त्यांना शेतीतील लुट त्यांच्यासाठीच होते आणि शेतीतील तोटा त्यांच्यामुळे होतो याची जाणीव नसते. शेतीविषयक सरकारी धोरणे शेतकऱ्यांचे नाही तर त्यांचे हित लक्षात घेवून ठरत असल्याने शेतीक्षेत्राची आणि शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाली आहे. आमचा पैसा शेतीत फुकट जातो या त्यांच्या कांगाव्याला शेतकरी नेत्यांनी बळी पडण्याचे कारण नाही. त्यांना शेतीतून १०० रुपयाची लूट मिळत असेल तर कर्जमुक्तीसाठी १०-२० वर्षातून १० रुपये खर्च झाले तर ते शेतकऱ्यांवर उपकार करीत नाहीत. तेव्हा शेतकऱ्यांच्या नेत्यांनी आयकरदात्यांचा पैसा वाया जावू नये याची काळजी करत बसण्याचे कारण नाही. मुळात कर्जमुक्ती कशासाठी याचाच शेतकरी कार्यकर्त्याच्या आणि नेत्याच्या मनात गोंधळ आहे. म्हणून ते म्हणतात गरजवंतालाच मिळाली पाहिजे ! कर्जमुक्ती म्हणजे गरजवंतासाठी उघडलेले अन्नछत्र नाही कि सरकार जी अनेक कल्याणकारी कामे करते तसे एखादे कल्याणकारी काम नाही. प्रश्न तत्वाचा आहे. शेतीत जो पैसा घालतो त्याला तो परत मिळाला पाहिजे. शेतकऱ्याची चूक आहे म्हणून नाही तर सरकारी धोरणाने किंवा निसर्गाच्या फटक्याने पैसा  परत मिळत नाही. परत न मिळणाऱ्या पैशापैकी एक छोटासा हिस्सा कर्जमुक्तीच्या रूपाने मागत आहोत. शेतीत घातलेला ज्यांचा पैसा परत मिळाला नाही त्या त्या सर्वांचा परत मिळविण्याचा हक्क आहे. त्यात लहान-मोठा, कोरडवाहू-ओलीत , व्यापारी,उद्योजक आणि अगदी राजकारणी शेतकरी या सर्वांचाच हक्क आहे. यातील काही लोकांची शेतीबाह्य श्रीमंती असेल. ती वैध असेल तर आक्षेप घेण्याचे कारण नाही. अवैध असेल तर त्याचा जो स्त्रोत आहे तिथे कायद्यानुसार कारवाई व्हावी. पण शेतीक्षेत्राच्या मागण्यांच्या संदर्भात त्याचा विचारच अस्थानी आहे. हे सगळे भेद , भ्रष्टाचाराची कमाई याचा विचार शेतीक्षेत्राच्या मागण्या पुढे येतात तेव्हाच का होतो असा प्रश्न शेतकरी आणि शेतकरी नेत्यांनी विचारला पाहिजे. पण तेच अपराधी असल्यासारखे वागतात बोलतात. वेतन आयोग देताना कोण श्रीमंत कोण गरीब , कोण लहाना कोण मोठा , कोण भ्रष्ट कोण निर्मल , कोण गरजवंत कोण गरजवंत नाही असा कधी विचार होतो का. तेव्हा कोणी का म्हणत नाही अमुक यालाच वेतन आयोगाचा लाभ मिळाला पाहिजे , तमुक घटकाला मिळता कामा नये. तेव्हा सरसकट सगळ्यांना लाभ देताना आयकर दात्यांच्या पैशाचा चुराडा नाही का होत. जे शेतकरी नेते शेतकऱ्यात भेदाभेद करायला मान्यता देतात त्यांनी वेतन आयोग अमुक घटकांना लागू करायला नको असे कधी म्हंटले नाही. शेतकरी नेत्यांचा सरकारला वापर करून घ्यायचा असल्यानेच चतुराईने निर्णय लांबविला आहे. शेतकरी नेत्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून विरोधी पक्षांसोबतच 'शेतकरी तितुका एक' ची सरकारला शिकार करायची आहे. विरोधी पक्ष नेस्तनाबूत होण्यात सुकाणू समितीच्या काही नेत्यांना रस असणे समजण्यासारखे आहे. विरोधीपक्ष नेस्तनाबूत करण्याच्या लायकीचेही आहेत. तरीपण शेतकरी तितुका एक या संकल्पनेचा बळी देवून आणि शेतकरी आंदोलनाचा वापर करून हे करायला नको याचे भान ठेवणे आवश्यक आहे.

शेतकरी नेते सरकारच्या चतुराईला आणि व्यूहरचनेला बळी पडलेत असे मानायला आधार आहे. जे मुख्यमंत्री अत्यंत घाईने शेतकरी आंदोलनावर चर्चा करण्यासाठी आणि तोडगा काढण्यासाठी कोणाला तरी पकडून आणतात , त्यांच्या बरोबर रात्री ११ ते ४ असा गहन-गंभीर विचारविनिमय करून आंदोलन मागे घ्यायला लावतात त्या मुख्यमंत्र्याकडे आंदोलन अधिक भडकलेले असतांना अधिकृत नेत्यांशी चर्चा करायला वेळ नसतो हे कसे काय याचा शेतकरी नेत्यांना प्रश्न पडू नये हे नवलच म्हंटले पाहिजे. शेतकरी नेत्यांनी मुख्यमंत्र्याशी चर्चा करण्याचा आग्रह धरून प्रश्न निकाली काढायला हवा होता. किमान मंत्रीगटाला निर्णयाचे पूर्ण अधिकार असतील तर बोलणी करू असे म्हणायला हवे होते. पण मुख्यमंत्री मंत्रीगट नेमून मोकळे झाले आणि नेते उतावीळपणा दाखवत त्यांच्याशी बोलणी करायला धावले. बोलणी करायला गेलेच तर मग त्यांनी मुख्यमंत्र्याच्या बैठकीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून एकाच बैठकीत निकाल लावून टाकायला हवा होता. मुख्यमंत्री निर्णय घेवून मोकळे होतात आणि निर्णय जाहीर करण्यासाठी मंत्रीमंडळ बैठकीची त्यांना गरज वाटली नाही. आता मात्र जो काही निर्णय व्हायचा तो मंत्रीमंडळ बैठकीत होईल असे सांगितले गेले आहे. याचा अर्थच मुख्यमंत्र्यांना वेळ हवा आहे आणि त्यांनी तो पद्धतशीरपणे मिळविला आहे. हा वेळ शेतकऱ्यांना पैसे देण्यासाठी नको आहे. एकीकडे शिवसेना आणि इतर पक्षांना आपण भाव देत नाही हे दाखविण्यासाठी त्यांना सुकाणू समितीचा वापर करून घ्यायचा आहे. लाभार्थीची निवड शेतकरी नेत्यांवर सोपवून लोकांच्या शेतकऱ्यांच्या असंतोषापासून त्यांनी स्वत:चा बचावही केला आहे. प्रत्यक्षात काय पदरी पडेल हे काहीच माहित नसताना विजयोत्सव साजरा झाला. पण समाधानकारक निर्णय झाला नाही तर शेतकऱ्यांच्या रोषाला मुख्यमंत्री आणि त्यांचे सरकार नाही तर शेतकरी नेते बळी पडतील आणि नजीकच्या भविष्यात शेतकरी आंदोलन होवू शकणार नाही.

-------------------------------------------------------
सुधाकर जाधव , पांढरकवडा, जि. यवतमाळ
मोबाईल - ९४२२१६८१५८
--------------------------------------------------------

Thursday, June 8, 2017

शेतकऱ्यांचा उद्वेग आणि उद्रेक


सरकारने चुकीचा निकष वापरून कर्जमुक्ती जाहीर केली आहे. शेतकऱ्यात लहान-मोठा असा भेद गरीब-श्रीमंत अशा संदर्भात करणे चुकीचे आहे. संपूर्ण शेतकरी समाज दारिद्र्यात जगतो आणि फरक आहे तो कोण कमी गरीब आणि कोण जास्त गरीब इतकाच. त्यामुळे संपूर्ण नाही तरी कमी-अधिक प्रमाणात का होईना कर्जमुक्तीचा लाभ सर्व शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे.
------------------------------------------



मागच्या २-३ महिन्यापासून शेतकरी संपाची चर्चा होती. पुणतांबा गाव आणि परिसरातील शेतकरी संपावर जाणार अशी ती चर्चा होती. पुणतांबा ग्रामसभेने तसा ठराव देखील केला होता. महाराष्ट्रातील शेतकरी संपावर जाईल अशी चर्चा नव्हती आणि नियोजन तर अजिबात नव्हते. सुकाणू समिती बनली होती पण त्यात कोण लोक आहेत , त्यांच्या केव्हा बैठका झाल्या , मागण्या आणि आंदोलनाचे स्वरूप काय याबाबत महाराष्ट्र अंधारातच होता. केवळ १ जूनच्या संपाच्या बातम्या माध्यमात झळकत होत्या आणि त्या आधारे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी आंदोलनात उतरण्याची तयारी केली आणि आंदोलनात उतरले देखील. सरकारला देखील एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधावरून रस्त्यावर उतरतील अशी अपेक्षा नसावी. आंदोलनाचे स्वरूप आणि व्याप्ती पाहून एका दिवसातच सरकार खडबडून जागे झाले आणि दुसऱ्या दिवशी संप संपविण्याच्या गोपनीय हालचाली झाल्यात. एवढ्या लवकर सरकार वाटाघाटी करेल अशी अपेक्षाच नसल्याने आंदोलक शेतकरी बेसावध राहिलेत. त्यांच्या बेसावधपणाचा फायदा घेत सरकारने आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशीच्या रात्रीच वाटाघाटीचा जुगाड जमविला. आंदोलनात आणि आंदोलकांना माहित नसलेल्या सुकाणू समितीत संघ-भाजपचे जे कार्यकर्ते होते त्यांचा उपयोग करून घेत सरकारनी वाटाघाटीचा घाट घातला आणि आंदोलन मागे घेण्यास उपस्थितांना तयार केले. एवढेच नाही तर आंदोलन मागे घेतल्याची बातमी सकाळ पर्यंत सगळीकडे कळेल आणि पसरेल याची व्यवस्था सरकारने केली. आंदोलन सुरु काय होते आणि मागे काय घेतले जाते यामुळे संभ्रम आणि गोंधळाची स्थिती निर्माण झाली. संघ-भाजपच्या कार्यकर्त्यांना हाताशी धरून सरकारने आंदोलनाचा गेम केला अशा चर्चे सोबत फडणवीस आणि त्यांच्या सरकार बद्दलचा क्षोभ वाढला. या क्षोभामुळे सुरुवातीला आंदोलन संपविण्यात आणि नंतर आंदोलनात फुट पाडण्यात सरकार यशस्वी झाल्याची चर्चा फार काळ टिकली नाही आणि सरकारने बनाव केला त्याला उत्तर म्हणून अधिक त्वेषाने पुढे आंदोलन चालू राहिले. मात्र या सगळ्या गोंधळात एक बाब स्पष्ट झाली की आंदोलकात ताळमेळ. समन्वय आणि माहितीचा अभाव होता. १ जूनचा संप हे निमित्त होते. या निमित्ताने सरकारच्या शेतीविषयक धोरणा बद्दल साचलेल्या रागाला वाट मोकळी झाली. आधीच साचलेला राग आणि त्यात सरकार पक्षाच्या जबाबदार लोकांनी केलेल्या बेजबाबदार आणि हीनदर्जाच्या वक्तव्याने संतापाचा कडेलोट झाला. विरोधी पक्षात काही दम नाही याची खात्री असल्याने सत्तापक्ष उद्दामपणे कर्जमुक्ती बाबत टाळाटाळ करीत होता. उत्तर प्रदेशात कर्जमाफी आणि आपल्या तोंडाला मात्र पाने पुसण्यात येत असल्याच्या भावनेने अस्वस्थता होतीच. त्यातच तूर खरेदीचा जो फज्जा उडाला आणि अनेकांना हमीभावापेक्षा कमी किंमतीला तूर विकावी लागली किंवा खरेदीदारच मिळाला नाही यामुळे हमीभावाचा मुद्दा महत्वाचा बनला. त्यामुळे साहजिकच हमीभाव अधिक ५० टक्के नफा या मोदी आश्वासनाची शेतकऱ्यांना तीव्रतेने आठवण झाली. साहजिकच फार विचारविनिमय आणि चर्चा न होताच कर्जमुक्ती आणि स्वामिनाथन आयोग लागू करण्याची मागणी आंदोलनाची मागणी म्हणून समोर आली.

इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, ज्याप्रकारे संपाची चर्चा होती तसा हा संप झालेला नाही. आपल्या पुरते पिकवायचे आणि बाजारात न्यायचे नाही अशी संपाची कल्पना होती. रस्त्यावर न उतरता बांधावरूनच सरकारची कोंडी करायची आणि सरकारला झुकवायचे अशी ही कल्पना होती. शेतकऱ्यांनी असे केले तर निर्माण होणाऱ्या टंचाईचा अंदाज घेवून परप्रांतातून किंवा परदेशातून शेतीमाल मागविता येईल या भ्रमात सरकार होते आणि म्हणूनच सरकार पक्षाच्या प्रवक्त्याने उद्दामपणे शेतकऱ्यांनी संप केला तरी काही फरक पडणार नाही असे वक्तव्य केले होते. पण नियोजित संपा ऐवजी दुध, भाजीपाला आणि इतर शेतीमाल बाजारात पोचूच नये यासाठी आंदोलक शेतकरी रस्त्यावर उतरल्याने सरकार अडचणीत आले आणि येनकेनप्रकारे संप संपविण्यासाठी बाध्य झाले. मुख्यमंत्र्यांनी संप संपविण्यासाठी जे केले त्याबद्दल संताप व्यक्त होत असला तरी त्यात चुकीचे काहीच नव्हते. प्रत्येक आंदोलनात मध्यस्था करवी आंदोलकांना वाटाघाटीसाठी तयार करण्यात येतच असते. इथे तर त्यांच्या पक्षाचे आणि मातृसंघटनेचे लोकच सुकाणू समितीत असल्याने मुख्यमंत्र्यांनी त्यांना हाताशी धरून वाटाघाटी घडविल्या. आंदोलनाची सुकाणू समिती बनविताना सरकार धार्जिण्या लोकांना दूर ठेवण्याची जबाबदारी आंदोलकांची होती. अगदी संघाने लोक घुसविले हा आरोप मान्य केला तरी ती चूक सरकारची नसून आंदोलकाची आहे. ज्या बातम्या समोर आल्या आहेत त्यानुसार सरकार धार्जिण्या लोकांनीच सुकाणू समिती बनविण्यात पुढाकार घेतला आणि आंदोलकांनी तो घेवू दिला. यात आंदोलकाचा नवखेपणा आणि भाबडेपणा तेवढा समोर आला. नवख्या आणि भाबड्या आंदोलकांना वाटाघाटीत सरकारने गंडवले असेल तर त्यात आश्चर्य करण्यासारखे काही नाही. उलट मुख्यमंत्र्यांनी परिस्थिती हेरून आंदोलनाला प्रतिसाद दिला हा त्यांचा मुत्सद्दीपणा होता. शेतकऱ्यात व्याप्त प्रचंड असंतोषाची जाणीव नसल्याने आपल्या माणसा करवी हे आंदोलन संपविता येईल हा त्यांचा विचार मात्र चुकीचा आणि भाबडेपणाचा ठरला. आंदोलन संपविण्याचा त्यांचा प्रयत्न काहीसा अंगलट आला आणि आता ते आंदोलनास राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसची साथ आणि फूस असल्याचा आरोप करीत आहे. या पक्षांची आंदोलनास साथ किंवा फूस असण्यात गैर काहीच नाही. लोकांच्या समस्या सोडविण्यास सरकारला भाग पाडणे हे विरोधी पक्षांचे कर्तव्यच ठरते. स्वत: फडणवीस विरोधी पक्षात असताना आणि विरोधी पक्ष नेते असताना हेच करीत होते याचा त्यांना सत्ता मिळताच विसर पडलेला दिसतो. ज्यांनी सुकाणू समिती बनविली आणि ज्यांना हाताशी धरून वाटाघाटी झाल्यात ते तर संघ-भाजपचे असल्याचे उघड झाले. हे बघता कर्जमाफीचे श्रेय विरोधी पक्षांच्या यात्रांना मिळू नये यासाठीच संघ-भाजपच्या लोकांना घुसविण्यात आले असा आरोप कोणी केला तर तो खरा वाटेल . कारण मुख्यमंत्र्यांनीच आपल्या कृतीतून त्याचे पुरावे दिले आहेत.

प्रत्येकच आंदोलनात सरकार आणि विरोधीपक्ष एकमेकांवर आरोप करीत असतात .त्यात नवीन काही नाही. त्याकडे गंभीरपणे बघण्यापेक्षा आंदोलनाच्या मागण्यांकडे अधिक गंभीरपणे पाहण्याची गरज आहे. सरकार असो की विरोधी पक्ष या दोहोंच्या भूमिकांपेक्षा लोकांच्या नजरेस आला तो शेतकऱ्यांचा उद्वेग आणि उद्रेक. सरकारने जे देवू केले त्यापेक्षा आंदोलनाचे हे यश महत्वाचे आहे. त्यामुळे आता आंदोलन चालविण्यासाठी बनलेल्या नव्या सुकाणू समितीवर आंदोलनाला मिळालेले यश टिकवून अधिक मिळविण्याची मोठी जबाबदारी आहे. सुकाणू समितीत विविध विचारांची आणि मतांची आणि एकमेकांबद्दल आकस बाळगून असणारी कार्यकर्ते असल्याने त्यांच्यासाठी हे मोठे आव्हान आहे. आपसातील वाद आंदोलनावर हावी होवू द्यायचा नसेल तर एकमत असलेले मुद्दे विचारपूर्वक निश्चित करून तेच रेटले गेले पाहिजेत. प्राप्त परिस्थितीत शेतकऱ्यांवरील कर्ज ही गंभीर समस्या असून ती लवकर निकाली निघणे जरुरीचे आहे. हाच एक मुद्दा असा आहे यात दुमत होणार नाही. सरकारने नेहमीप्रमाणे छोटा शेतकरी-मोठा शेतकरी हा भेद समोर करून आपण गरिबांचे कैवारी असल्याचे दाखविण्याचा खटाटोप केला आहे. सरकारने कर्जमुक्तीची केलेली घोषणा फसवी आहे. रात्रीच्या अंधारात वाटाघाटी करण्यामागे आंदोलकांना फसविण्याचीच सरकारी नीती असल्याचे घोषणेवरून स्पष्ट होते. सरकारने आज जे शेतकरी थकबाकीदार आहेत त्यांचाच प्रामुख्याने विचार केला आणि त्यातही ५ एकरची मर्यादा घालून थकबाकीदाराची संख्या कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यांनी उसनवारी करून किंवा किडूकमिडूक विकून कर्जभरणा केला त्यानाही सरकारी घोषणेचा लाभ मिळणार नाही. म्हणजे सरकारी घोषणेचा लाभ ५ एकर खालील सगळ्या शेतकऱ्यांना देखील मिळणार नाही. एकरची मर्यादा टाकून कर्जमुक्ती देण्याचा एक मोठा तोटा असा आहे की त्यातून राज्यातील काही विभागावर अन्याय होतो. ओलीत अधिक असलेल्या प.महाराष्ट्रात जमीन धारणा कमी आहे आणि जास्त कोरडवाहू असलेल्या मराठवाडा आणि विदर्भात जमीन धारणा अधिक आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेचा लाभ प.महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना विदर्भ-मराठ्वाड्याच्या तुलनेत जास्त होईल. एकूणच मुख्यमंत्र्याची कर्जमुक्तीची घोषणा फसवी आणि अन्यायकारक आहे आणि म्हणून मान्य होण्यासारखी नाही. 


मुळात सरकारचा निकषच चुकीचा आहे. लहान-मोठा शेतकरी हा जो भेद आहे तो श्रीमंतीच्या संदर्भात नसून दारिद्र्याच्या संदर्भात आहे. शेतकऱ्यात गरीब-श्रीमंत अशी वर्गवारी करणे ही समाजवादी विकृती आहे. शेतकऱ्यात भेद असलाच तर तो कमी गरीब आणि अधिक गरीब असाच आहे. संपूर्ण समाजाचे जीवनमान खालावलेले आहे हे सत्य समाजमान्य होत नाही व त्याचाच लाभ सरकार घेत आहे. छोट्या शेतकऱ्यांना पुढे करून कर्जमुक्तीसाठी ५ एकर पर्यंतची जी मर्यादा घातली ती चुकीची आहे. शेतकऱ्यात दारिद्र्य जसे कमी जास्त आहे ते लक्षात घेवून देण्यात येणाऱ्या कर्जमुक्तीचा लाभ सगळ्याच शेतकऱ्यांना कमी-अधिक प्रमाणात झाला पाहिजे. असे व्हायचे असेल तर सरकारने एकरची अट टाकण्या ऐवजी कर्जमुक्तीची रक्कम निश्चित केली पाहिजे. समजा सरकारने सर्व शेतकऱ्यांचे १ लाखापर्यंतचे किंवा छोट्या शेतकऱ्यांवर सरासरी किती हजाराचे कर्ज आहे हे लक्षात घेवून ती रक्कम निश्चित करावी आणि कर्जातील तेवढी रक्कम सर्वच शेतकऱ्यांवरील बोज्यातून कमी केली तर छोटा शेतकरी संपूर्णपणे कर्जमुक्त होईल आणि तुलनेने कमी गरीब असलेल्या शेतकऱ्यांच्या डोक्यावरील ओझे देखील हलके होवून त्यालाही दिलासा मिळेल. खरे तर सगळ्या शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी न्याय्य आहे , पण सरकारला आपली आणि नोकरदार वर्गाची चैन सोडणे शक्य नसल्याने संपूर्ण कर्जमाफी न्याय्य असली तरी व्यावहारिक नाही हे लक्षात घेवून जास्तीतजास्त कर्जमुक्तीची रक्कम सरकार बरोबरच्या वाटाघाटीतून निश्चित करण्याची आणि सर्व शेतकऱ्यांवरील तेवढा कर्जाचा बोजा कमी होईल हे पाहण्या ची जबाबदारी आंदोलनाच्या नव्या सुकाणू समितीवर आहे.

शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. ते बिकट आणि गुंतागुंतीचे आहेत. एकाच आंदोलनातून ते सुटण्यासारखे नाहीत आणि काही तर कोणत्याही आंदोलनातून सुटण्यासारखे नाहीत. शेतीमालाला किफायतशीर किंमत हा शेतकऱ्यांचा सर्वात मोठा प्रश्न आंदोलनातून सुटण्यासारखा नाही. त्यासाठी स्वत: शेतकरी समूहाला बऱ्याच गोष्टी कराव्या लागतील आणि सरकारलाही. आज शेतकऱ्यांच्या विरोधात व्यापार शर्ती आहेत. त्या हटविण्यासाठी सरकारवर दबाव आणण्यात आंदोलनाचा उपयोग होईल.  एकदा का अन्यायकारक व्यापार शर्ती दूर झाल्या कि शेतकऱ्यांना स्वत: बाजारात उभे राहून आपल्या मालाची किंमत वसूल करावी लागणार आहे. हे लक्षात न घेतल्याने शेतकऱ्यात स्वामिनाथन आयोगाचे मोठे आकर्षण आहे. हमीभाव अधिक ५० टक्के नफा ही आयोगाची शिफारस आकर्षक असल्याने डोळे झाकून स्वामिनाथन आयोगाच्या अंमलबजावणीची मागणी होत आहे. स्वामिनाथन आयोग अभ्यासला म्हणजे आपल्या लक्षात येईल कि शिफारसीत नवीन असे काही नाही. या आयोगाच्या शिफारसी म्हणजे नव्या बाटलीत जुनीच दारू आहे. पूर्वी किफायतशीर किंमतीची मागणी व्हायची त्यात नफा गृहीतच होता. फक्त नफा ५० टक्के असावा असे सांगत ही मागणी आयोगाने नव्या वेष्टनात समोर केली आहे. आयोगाने १०० टक्के नफा मागितला असता तर मागणी जास्तच आकर्षक झाली असती. मुळात अशा प्रकारचा नफा बाजारात माल विकून कसा मिळवायचा याचे कोणतेही व्यावहारिक सूत्र आयोगाने दिले नाही. याचा अर्थ सरकारने एवढा नफा देवून माल विकत घेणे असा होतो . हे पूर्णत: अव्यावहारिक आहे. सरकारचा तूर खरेदीतील गोंधळ लक्षात घेतला तर सरकारच्या आवाक्याबाहेरची ही गोष्ट आहे. बाजारात माल पुरवठा नियंत्रित करूनच नफा शक्य आहे. शेतकरी संपाच्या कल्पनेत हे निहित आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनाच आपल्या व्यावसायिक संघटना उभ्या करून भाव ठरविण्याचा अधिकार स्वत:कडे घ्यावा लागेल. स्वामिनाथन आयोग मात्र शेतकऱ्यांचे सरकारवरील अवलंबन वाढविणारा आहे आणि सरकारवरील अवलंबन हे भ्रष्टाचाराला वाव देणारे आणि शेतकऱ्यांना लाचार करणारे ठरेल. शेतकऱ्यांकडची जमीन धारणा किफायतशीर शेतीसाठी मुळीच परवडणारी नाही याचा अनुभव आपण घेत आहोत. शेतीवर अवलंबून असलेल्या लोकसंख्येचा भार शेतीला सहन होत नाही हे सर्वमान्य असताना स्वामिनाथन आयोग पुन्हा सिलीगच्या अंमलबजावणीची आणि अधिक लोकांना शेतीचे तुकडे देण्याची शिफारस करतो. ज्या कारणाने शेतीचे वाटोळे झाले तेच करायला स्वामिनाथन आयोग सांगतो. तेव्हा शेतकऱ्यांनी आणि शेतकरी आंदोलनाने स्वामिनाथन आयोगाच्या भ्रमजालातून बाहेर येण्याची गरज आहे. त्यातून बाहेर आल्या शिवाय शेती मालाच्या किफायतशीर किंमतीचा प्रश्न सोडविण्याचा मार्ग सापडणार नाही.

--------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव , पांढरकवडा , जि. यवतमाळ

मोबाईल - ९४२२१६८१५८
---------------------------------------------------------------------------------

Wednesday, May 31, 2017

मोदी राजवटीत भ्रष्टाचार कमी झाला ?



मोदी सरकारच्या तीन वर्षाच्या काळात भ्रष्टाचाराचे कोणतेही मोठे प्रकरण बाहेर न आल्याने भ्रष्टाचार कमी झाल्याची चर्चा आहे. सरकारचा तर तसा दावा आहेच. मनमोहन सरकारच्या पहिल्या कार्यकाळात देखील असे भ्रष्टाचाराचे कोणतेच मोठे प्रकरण समोर आले नव्हते हे लक्षात घेतले तर भ्रष्टाचार कमी झाल्याचे प्रशस्तीपत्र देणे घाईचे ठरेल. गेल्या तीन वर्षात सरकारने भ्रष्टाचार खणून काढण्या पेक्षा त्यावर पांघरून घालण्याचाच अधिक प्रयत्न केला हे वास्तव लक्षात घेवून मोदी राजवटीतील भ्रष्टाचारावर मत प्रदर्शित केले पाहिजे.
--------------------------------------------------------------------------------



मोदी सरकारची सत्तेतील ३ वर्षे पूर्ण झाल्यावर मनमोहन सरकारच्या शेवटच्या तीन वर्षाच्या तुलनेत मोदी सरकारची पहिली तीन वर्षे काम करणाऱ्या सरकारची वाटतात असे याच स्तंभात लिहिले होते. तसे वाटण्याचे मुख्य कारण मोदींनी मनमोहन काळातील आर्थिक धोरणे आणि योजना मनमोहन सरकारपेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने आणि गतीने राबविल्या हे असल्याचे नमूद केले होते. पूर्ण बहुमत घेवून मोदीजी सत्तेत आलेले ते केवळ शेवटच्या काळात मनमोहन सरकार ठप्प झाले होते म्हणून नव्हे , तर मनमोहन सरकारच्या भ्रष्टाचाराची मोठ्या प्रमाणावर देशभरात झालेली चर्चा आणि भ्रष्टाचाराच्या संदर्भात समोर आणण्यात आलेले लाख कोटीचे आकडे हे जास्त महत्वाचे कारण होते. गेल्या तीन वर्षात भ्रष्टाचाराचे असे आकडे समोर आलेले नाही किंवा मोदी सरकारच्या भ्रष्टाचारा बाबत माध्यमात किंवा सार्वजनिक चर्चा होताना दिसत नाही. त्यामुळे भ्रष्टाचार कमी झाला असे वाटायला लागते आणि सरकार देखील तसा दावा करीत आहे. जिथपर्यंत लोकांचा सरकारी यंत्रणेशी आणि कार्यालयाशी संबंध येतो तेथील भ्रष्टाचारात फरक पडल्याचा अनुभव लोकांना येत नाही. नोटबंदीने देखील सरकारी यंत्रणेच्या खाबुगिरीवर फरक पडला असे दिसत नाही. पण भ्रष्टाचाराची आपण चर्चा करतो तेव्हा आपल्या मनात राज्यकर्त्याचा भ्रष्टाचार असतो. तशा भ्रष्टाचाराची चर्चा भाजप शासित राज्याच्या राज्यकर्त्यांबद्दल होत असली तरी केंद्रातील मोठा घोटाळा उघड झाला आणि त्यावर चर्चा झाली असे घडलेले नाही. मागच्या लेखात आपण मोदी सरकारची तुलना मनमोहन सरकारच्या शेवटच्या तीन वर्षाशी केली होती. आता हीच तुलना आपण मनमोहन सरकारच्या पहिल्या तीन वर्षाशी केली तर ? तर आपल्याला दिसून येईल कि आज मोदी सरकार बद्दल जी लोकभावना आहे तीच मनमोहन सरकार बद्दल होती . तेव्हा त्या सरकारचा कारभारही स्वच्छ वाटत होता आणि ते सरकारही काम करणारे वाटत होते ! याच्या परिणामी नंतरच्या सार्वत्रिक निवडणुकीत लोकांनी मनमोहन सरकारच्या कामगिरीवर आपल्या पसंतीची मोहोर उमटवत कॉंग्रेसला आधीच्या निवडणुकीपेक्षा जास्त मते आणि जास्त जागा दिल्या !


 मनमोहन सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात मात्र चित्र बदलले आणि शेवटच्या तीन वर्षात तर फक्त सरकारच्या भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचाराचीच चर्चा झाली . मनमोहन सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात या सरकारकडून भ्रष्टाचार झाला आणि म्हणून ते सरकार बदनाम झाले का ? तर वास्तव तसेही नाही. कोळसा खाणी सारखी राष्ट्रीय संपत्ती मोफत उधळून मनमोहन सरकारने सरकारी तिजोरीला कितीतरी लाख कोटीचा चुना लावला किंवा दुर्मिळ असे स्पेक्ट्रम कंपन्यांना मोफत देवून कितीतरी लाख कोटीचा भ्रष्टाचार केला असे म्हणत मतदारांनी दुसऱ्या कार्यकाळाच्या शेवटी मनमोहनसिंग आणि कॉंग्रेसला सत्तेतून हद्दपार केले. पण हे निर्णय मनमोहनसिंग यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील नव्हते . त्यांच्या पहिल्याच कार्यकाळातील हे निर्णय होते आणि त्याची अंमलबजावणीही पहिल्याच कार्यकाळात वेगाने सुरु झाली होती ! बरे हे काही लपूनछपून झाले होते का तर तसेही नाही. मोदी सरकारच्या प्रत्येक निर्णयाचा जसा गाजावाजा होतो तसा मनमोहन सरकारच्या निर्णयाचा होत नव्हता हे खरे , पण ज्याला भ्रष्टाचार म्हंटल गेलं त्या कोळसा खाण वाटपाची आणि स्पेक्ट्रम वाटपाची चर्चा संसदेत , संसदीय समितीत आणि माध्यमात झाली होती. मनमोहन सरकारच्या अशा निर्णयाने खुश होतच जनतेने मनमोहनसिंग आणि कॉंग्रेसला पुन्हा निवडून दिले होते. माझा मुद्दा लक्षात आला असेल. मोदी राजवटीत भ्रष्टाचार होत नाही किंवा तो कमी झाला असे प्रमाणपत्र आणि प्रशस्तीपत्र त्यांना देणे घाईचे ठरेल ! तीन वर्ष पूर्ण होतांनाच केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी आणि त्यांच्याच पक्षाचे उत्तराखंड मधील सरकार यांच्यातील जो वाद समोर आला आहे ते लक्षात घेता मोदी काळात भ्रष्टाचार कमी झाला ही समजूत समजूतच ठरण्याच्या शक्यतेला पुष्टी मिळते !


उत्तराखंड मध्ये राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७४ चे काम सुरु आहे. त्यात स्थानिक महसूल अधिकारी आणि राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी यांनी संगनमताने भ्रष्टाचार केल्याचा राज्य सरकारचा आरोप आहे आणि तसा गुन्हा देखील राज्यसरकारने दाखल केला आहे. राष्ट्रीय महामार्गाचे काम राज्याच्या नाही तर केंद्राच्या अखत्यारीत येत असल्याने राज्याच्या तपासकामाला मर्यादा येतात म्हणून या भाजप शासित राज्याच्या मुख्यमंत्र्याने सी बी आय तपासाची मागणी केली आहे. त्यांनी अशी मागणी करताच गडकरींनी त्यांना लेखी पत्र लिहून चौकशीची मागणी मागे घ्यायला सांगितले आहे. अशा चौकशीमुळे अधिकाऱ्यांच्या मनोधैर्यावर विपरीत परिणाम होतो आणि आज त्या महामार्गाचे काम त्यामुळेच ठप्प पडले असल्याचे गडकरी सांगतात. एवढे सांगून गडकरी थांबले नाहीत. तुमचा चौकशीचा आग्रह कायम राहिला तर तुमच्या राज्यातील इतर महामार्गाची कामे केंद्राला हाती घेता येणार नाही अशी सभ्य शब्दात धमकी देखील दिली. त्यानंतर दिल्लीत उत्तराखंडचे मुख्यमंत्री , गडकरी आणि त्यांच्या खात्याचे अधिकारी यांची संयुक्त बैठक होवून चौकशीची मागणी मागे घेण्यासाठी दबाव टाकण्यात आला. मुख्यमंत्र्यापुढे पेच निर्माण झाल्याने ते आता आपल्या राज्यात पुढे काय करायचे याचा कायदेशीर सल्ला घेत आहेत. त्यांना सल्ला मिळायचाच आहे, पण गडकरींचा कामाचा झपाटा मोठा असल्याने त्यांनी महामार्ग अधिकाऱ्यांना कामाला लावून महाअधिवाक्त्याकडून सल्ला मिळविला देखील. आता या सल्ल्याचा दाखला देवून राज्य सरकारच्या एफ आय आर मधून राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्याची नावे वगळण्यासाठी केंद्रीय अधिकारी राज्यावर दबाव आणीत आहेत . हे प्रकरण पुढे काय वळण घेईल माहित नाही , पण भ्रष्टाचाराची चौकशी आणि चर्चा होवू नये यासाठी केंद्र किती दक्ष आणि तत्पर आहे हे आपल्याला वरील उदाहरणावरून लक्षात येईल. फक्त गडकरीच चौकशी रोखतात असे नाही. केंद्र सरकारचेच तसे धोरण आहे असे वाटण्यासारखी परिस्थिती आहे. उच्चपदस्थांच्या भ्रष्टाचारावर लक्ष ठेवण्यासाठी असलेल्या केंद्रीय सतर्कता आयोगाची हीच तक्रार आहे. केंद्रीय सतर्कता आयोगाने भ्रष्टाचाराची जी प्रकरणे कारवाईसाठी केंद्राकडे पाठविली आहेत त्यावर केंद्र सरकार काहीच करत नसल्याचे आयोगाचे म्हणणे आहे.

२०१६ सालचा सतर्कता आयोगाचा अहवाल संसदेच्या पटलावर ठेवण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या कारभारावर पुरेसा प्रकाशझोत या अहवालातून पडतो. केंद्र सरकार दावा करीत आहे तसा भ्रष्टाचार कमी झालेला नसून वाढल्याचे हा अहवाल सांगतो. २०१५ मध्ये उच्चपदस्थाच्या भ्रष्टाचाराच्या २९८३८ तक्रारी सतर्कता आयोगाकडे आल्या होत्या. २०१६ मध्ये २०१५ पेक्षा ६७ टक्के अधिक तक्रारी म्हणजे ४९८४७ तक्रारी सतर्कता आयोगाकडे आल्याचे अहवाल सांगतो. केंद्र सरकारच्या जवळपास सर्वच महत्वाच्या विभागाविषयी या तक्रारी आहेत. याशिवाय भ्रष्टाचाराच्या ५० च्यावर मोठ्या प्रकरणात अधिकाऱ्यांना निलंबित करून चौकशी व कारवाईची आयोगाच्या मागणीवर केंद्र सरकार काहीच कारवाई करीत नसल्याचे आयोगाचे म्हणणे आहे. महाराष्ट्रातील समृद्धी महामार्गा संबंधीची अशीच एक गंभीर तक्रार थेट प्रधानमंत्री कार्यालयाकडे गेली आहे. ती तक्रार तशीच पडून आहे. मोदी सरकार सत्तेत आल्या नंतर सतर्कता आयोगाची नेमणूक करण्यातच विलंब झाला. या महत्वाच्या नियुक्तीला विलंब का लागला हे आता आपल्या लक्षात येईल. आयोग जागेवर असला तर भ्रष्टाचाराच्या तक्रारीवर कारवाईची मागणी होणार , त्याची सार्वजनिक चर्चा होणार आणि सरकारची बदनामी होणार . अण्णांच्या ज्या लोकपाल आंदोलनाने मोदींना खुर्ची मिळवून दिली त्या लोकपालच्या नियुक्ती बाबत गेल्या तीन वर्षात मोदी सरकारने काहीही केले नाही. एका छोट्या तांत्रिक अडचणीचे निमित्त पुढे करून मोदी सरकारने लोकपालची नियुक्ती टाळली आहे. पूर्ण बहुमत असलेल्या सरकारला लोकपाल कायद्यात छोटी दुरुस्ती करून लोकपाल नियुक्त करता आला असता. पण सरकारने काही केले नाही. शेवटी सर्वोच्च न्यायालयाने सरकारची ही अडचण दूर करून लोकपाल नियुक्त करायला सांगितला आहे. सरकार हलले असे अजूनही दिसत नाही. भ्रष्टाचारावर लक्ष ठेवणाऱ्या , कारवाई करणाऱ्या , सरकारला निर्देश देणाऱ्या संस्थाच नसतील तर भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर येणार नाहीत आणि चर्चा होणार नाही. आज नेमके तेच होत आहे. चौकशा होवूच द्यायच्या नाहीत आणि भ्रष्टाचारमुक्त सरकार असल्याचा टेंभा मिरवायचा . बरे तुमच्या काळातील भ्रष्टाचाराची नका चौकशी करू, पण कॉंग्रेस काळातील भ्रष्टाचार खणून काढण्यासाठी तरी लोकपालची नियुक्ती करायला काय हरकत होती. तीन वर्षा नंतर सरकारने काय केले तर लालू यादवच्या मुलीच्या आणि पी.चिदंबरम्च्या मुलाच्या प्रतिष्ठानावर धाडी टाकल्या. पण ज्या लाखो कोटी रुपयाच्या घोटाळ्याचा आरोप करून मोदीजी सत्तेत आले तो उघड करण्यासाठी का प्रयत्न होताना दिसत नाही याचे उत्तर सरकारने दिले पाहिजे. भ्रष्टाचार खणून काढणे दूरच, पण आमच्याकडे वाल्याचा वाल्मिकी होतो असे कोडगेपणाने सांगत मोदी सरकार भ्रष्टाचारावर पांघरून घालत आहे. जे सरकार दुसऱ्याच्या भ्रष्टाचारावर एवढ्या उघडपणे पांघरून घालत असेल ते सरकार आपल्या भ्रष्टाचारावर पांघरून घालत नसेल असे तुम्हाला वाटते का याचे प्रत्येकाने स्वत:लाच उत्तर दिले पाहिजे. हे उत्तरच मोदी काळात भ्रष्टाचार कमी झाला की नाही हे स्पष्ट करील.


--------------------------------------------------------------
सुधाकर जाधव , पांढरकवडा , जि. यवतमाळ.
मोबाईल - ९४२२१६८१५८
-----------------------------------------------------------------

Thursday, May 25, 2017

मनमोहन योजनांना नवी ओळख देणारी ३ वर्षे !


 मनमोहन सरकारच्या शेवटच्या तीन वर्षात सरकारमध्ये प्रचंड सुस्तपणा आणि प्रशासनात मरगळ आली होती. सरकारची पकड सुटली होती. अशा निर्जीव सरकारच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री मोदी यांनी सरकारवर आणि प्रशासनावर पकड निर्माण करून प्रशासन कामी लावण्यात यश मिळविले. स्वत:च्या योजनांबाबत मनमोहनसिंग यांना जी प्रगती साधता आली नाही ती प्रगती मोदी काळात घडली याचे कारणच प्रशासन सक्रीय करण्यात मोदींना आलेले यश आहे. मात्र मोदींची स्वत:ची धोरणे आणि कार्यक्रम यशस्वी होताना दिसत नाहीत.
-------------------------------------------------------------------------------------------------


निवडणुका होतात ती राज्यकर्ते बदलण्यासाठी. सरकार मात्र कायम असते. त्यात एक सातत्य असावे लागते. हे सातत्य घालवण्याचा प्रयत्न झाला तर त्याला उलथापालथ झाली असे समजण्यात येते. निवडणुकीतील उलथापालथ ही निकालाचा दिवस ते शपथ ग्रहणाचा दिवस या काळापुरती असते. या काळात आशा अपेक्षा उंचावतात . स्वर्ग अवतरेल असे वाटायला लागते. शपथग्रहणा नंतर मात्र राज्यकर्त्यांना आणि जनतेला वास्तवाचा सामना करावा लागतो. आणि मग अपेक्षाभंगाची सुरुवात होते. या अपेक्षाभंगाचे कारण नेहमीच्या आर्थिक आणि प्रशासकीय अडचणी नसतात . त्याची तर लोकांना सवय झालेली असते. निवडणूक प्रचारात उंचावलेल्या अपेक्षा हे अपेक्षाभंगाचे खरे कारण असते. याला अपेक्षाभंग असे म्हणण्या पेक्षा स्वप्नभंग म्हणणे उचित ठरेल. मोदी सरकारच्या ३ वर्षाच्या राजवटीकडे मागे वळून पाहिले तर त्यांनी निवडणूक प्रचारात दाखविलेली स्वप्ने भंगली आहेत. स्वप्न भंगली तरी त्या तुलनेत लोकांचा तितका अपेक्षाभंग झालेला आढळून येत नाही. याचे सगळ्यात महत्वाचे कारण प्रधानमंत्र्यांनी मागच्या ६० वर्षात काही झाले नाही म्हणत त्या काळातील - विशेषत: मनमोहन काळातील योजनांना आणि धोरणांना - नव्या ताकदीने पुढे नेले. मनमोहनसिंग यांची सत्तेतील शेवटची २-३ वर्षे लक्षात घेतली तर त्यांना देखील पुन्हा निवडून आले असते तर आपल्या धोरणांना , योजनांना आणि नियोजनाला एवढा न्याय देता आला नसता जेवढा प्रधानमंत्री मोदी यांनी दिला आहे.


मोदी सरकारचे यशापयश दोन अंगाने तपासता येईल. पूर्वीच्या सरकारशी तुलना करून आणि दोन पूर्वीच्या सरकारपेक्षा काही बाबतीत वेगळी धोरणे अंमलात आणली त्याचे काय परिणाम होत आहेत याचे मूल्यमापन करून तपासता येईल. मनमोहन सरकारची शेवटची तीन वर्षे आणि आणि मोदी सरकारची पहिली तीन वर्षे याची तुलना करू गेल्यास अजून मोदी सरकार बद्दल लोकांचा पूर्णतः अपेक्षाभंग का झाला नाही याचे उत्तर मिळेल. शेवटच्या तीन वर्षात मनमोहन सरकारची अवस्था लकवा मारल्या सारखी झाली होती. मनमोहनसिंग बोलत नव्हते असे नाही. पण लोकांशी त्यांना कधी संवाद साधता आला नाही. सरकारला जेव्हा लकवा आला तेव्हा लकवा मारणाऱ्या माणसाचे होते तसे मनमोहनसिंग यांचे झाले. त्यांचे कष्टाने बोलणे लोकांना कळत नव्हते. मोदी सरकारचे सरकार म्हणून वेगळे यश दाखविणे कठीण असले तरी प्रधानमंत्री म्हणून मोदींची पहिली तीन वर्षे लोकसंवादाची म्हणून ओळखली जातील. ३ वर्षाची सुरुवात काश्मिरात रेल्वेला हिरवी झेंडी दाखविण्यापासून झाली आणि शेवट देशातील सर्वात मोठा पूल देशाला अर्पण करण्याने झाला. मध्ये मंगळयान आणि जम्मूला काश्मीरशी जोडणारा बोगदा या सारख्या योजनांचे थाटात मोदीजीनी उद्घाटन केले. या सगळ्यांची सुरुवात आणि नियोजन मनमोहन काळातील असले तरी मोदींच्या वाटाव्या इतक्या आत्मीयतेने मोदीजीनी हे सगळे राष्ट्राला समर्पित केले. योजनांशी मनमोहन यांचे नाव जोडले जाण्याऐवजी मोदींचे नाव जोडले जाणे आणि तरीही ६० वर्षात काही झाले नाही हे लोकांना पटणे याला मोदींच्या संवाद कौशल्याचे यश मानावे लागेल. अगदी तीन वर्षापूर्वी ठराविक घरांचा अपवाद सोडला तर घराघरातून नेहरू-इंदिरा यांचे बद्दलचे प्रेम दिसून यायचे. आता त्यांच्या बद्दलचे प्रेम दाखविणे म्हणजे दुसऱ्या ग्रहावरचे रहिवाशी भासावे एवढे परिवर्तन तर नक्कीच झाले आहे. हे चांगले की वाईट असे न बघता मोदींच्या संवाद कौशल्याचे यश म्हणता येईल. भारत कॉंग्रेस मुक्त करणे सोपी गोष्ट नक्कीच नव्हती. पण राजकीय पटलावरून कॉंग्रेसचा होत चाललेला संकोच हे या तीन वर्षातील मोदींचे मोठे यश मानावे लागेल. यासाठी कॉंग्रेसनेही त्यांना चांगली साथ दिली !


 मनमोहन सरकारच्या शेवटच्या तीन वर्षात सरकारमध्ये प्रचंड सुस्तपणा आणि प्रशासनात मरगळ आली होती. सरकारची पकड सुटली होती. सरकारी किंवा स्वायत्त संस्था सरकारवरच डोळे वटारू लागल्या होत्या. अण्णा आंदोलनाने सरकारची प्रतिमा एवढी मलीन केली की, सरकारचा राज्य करण्याचा नैतिक अधिकारच संपुष्टात आला होता. अशा निर्जीव सरकारच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री मोदी यांनी सरकारवर आणि प्रशासनावर पकड निर्माण करून प्रशासन कामी लावण्यात यश मिळविले. स्वत:च्या योजनांबाबत मनमोहनसिंग यांना जी प्रगती साधता आली नाही ती प्रगती मोदी काळात घडली याचे कारणच प्रशासन सक्रीय करण्यात मोदींना आलेले यश आहे. या तीन वर्षाच्या काळातील सर्वात मोठे यश कोणते तर आधार कार्डचा पुरेपूर वापर मोदी सरकारने केला. स्वच्छतेच्या योजना मनमोहन काळातही होत्या पण त्याला राष्ट्रीय कार्यक्रम आणि चळवळीचे स्वरूप देण्यात मोदी यशस्वी झालेत. घरोघरी सिलेंडर पोचविणे मनमोहन काळात सुरु झाले होते , पण लाभार्थी आणि सरकार यांनाच त्याची माहिती होती. सरकारचा हा कार्यक्रम आहे हे देशाला मोदींमुळे समजले ! बँकिंग व्यवस्थेत लोकांचा सहभाग वाढविण्याचे प्रयत्न मनमोहन काळात सुरु झाले होते. मनमोहन सरकारने ३-४ वर्षात जेवढी खाती उघडलीत त्यापेक्षा दीडपट अधिक खाती योजनेला नवे नाव देवून मोदी काळात उघडली गेली. रोजगार हमीच्या योजना असोत की पीकविमा योजना यांना नवे रूप देवून तुलनेने बऱ्यापैकी अंमलबजावणीचे श्रेय मोदी आणि त्यांच्या सरकारला द्यावे लागेल. योजना कॉंग्रेस काळात सुरु झाल्या तरी चांगली अंमलबजावणी मोदी काळात होत आहे हे कॉंग्रेसने लक्षात घेतले पाहिजे. आमच्याच योजना मोदी राबवून श्रेय घेतात अशी कुरकुर निरर्थक आहे. गावोगावी आणि घरोघरी मोबाईल पोचवून मनमोहन काळात डिजिटल इंडियाची पायाभरणी झाली होती. त्याच्यावर डिजिटल इंडियाची इमारत उभी करण्याचा मोदींचा प्रयत्न आहे. शेवटी लोकांचे लक्ष इमारतीकडे जाणार , पायव्याकडे नाही हे कॉंग्रेसनेही समजून घेतले पाहिजे. पूर्वी सेझच्या रुपात 'मेक इन इंडिया'चा प्रयत्न मनमोहन काळात झाला त्याला फारसे यश आले नाही. मोदींचे 'मेक इन इंडिया' यशस्वी होते कि नाही हे आत्ताच सांगता येणार नाही. स्कील विकसित करण्याचा मनमोहन सरकारचा कार्यक्रम ज्या धीम्या गतीने चालला होता त्याला 'स्कील इंडिया' नाव देवूनही फार गती आलेली नाही. कारण तरुणांची मानसिकता स्कील विकसित करण्यापेक्षा सुखाच्या नोकरीकडे आहे. त्यात मनमोहन आणि मोदी काळात फरक पडला नाही. शेती विषयक चुकीची धोरणे मागील पानावरून पुढे चालू असल्याने घसरण सुरूच आहे असे नाही तर घसरणीचा वेग वाढला आहे. मोदी सरकारचे हे ठळक अपयश आहे.


नवे सरकार आल्यावर नवी धोरणे , नवे कार्यक्रम अपेक्षित असतेच. मोदी सरकारनेही ती घोषित करून अंमलात आणण्याचा प्रयत्न केला. नव्या धोरण आणि कार्यक्रमात तीन गोष्टींचा समावेश करता येईल. आक्रमक परराष्ट्र नीती , काश्मीर विषयक नवे धोरण आणि नोटबंदी. मोदींच्या परराष्ट्र दौऱ्यामुळे भारत चर्चेत राहिला. मात्र द्वीपक्षीय संबंध खूप दृढ झाले आणि भारताला फार मोठा फायदा झाला असे घडले नाही. सतत खोड्या काढणाऱ्या कांगावखोर पाकिस्तानला इतर राष्ट्राच्या मदतीने वेसन घालण्यात मोदींच्या परदेश दौऱ्याचा फार उपयोग झाला नाही. अमेरिकेच्या आम्ही जवळ गेलो , पण उद्या भारत-पाक युद्ध झाले तर अमेरिका दोघानाही शस्त्र पुरवून तटस्थ राहील. याकाळात आमचा जवळचा मित्र रशिया पाककडे झुकला हे परराष्ट्रनीतीतील ठळक अपयश आहे. शेजारच्या देशांना आपल्या बद्दल आधीच अविश्वास वाटत होता. मोदींच्या प्रयत्नांनी तो कमी होण्या ऐवजी वाढला. 'वन बेल्ट वन रोड' योजनेत चीनने आपल्याला एकटे पाडले त्याचे हेच कारण आहे. मोदीपूर्व काळात काश्मीर बाबत बळाचा वापर आणि चर्चा या गोष्टी सोबत चालायच्या. कॉंग्रेस सरकारने , कॉंग्रेसेतर सरकारने आणि अगदी वाजपेयी सरकारने हेच धोरण अंमलात आणले. त्यामुळे काश्मीरच्या बाबतीत दोन्ही बाजूनी तुटेपर्यंत कधी ताणल्या गेले नाही. पण मोदी सरकार सत्तेत आल्यापासून चर्चेवरील जोर संपून बळावर विसंबून राहण्याचे दिवस सुरु झालेत. परिणामी तणाव वाढताना दिसत आहे. आजवर क्षीण असलेला 'आझादी'चा आवाज वाढू लागला आहे. काश्मीरची जनता आणि उर्वरित भारताची जनता यांच्यात काहीच बंध शिल्लक नाहीत हे पहिल्यांदा घडत आहे. नोटबंदी हा तीन वर्षातील मोदी सरकारचा स्वत:चा म्हणता येईल असा एकमेव मोठा आर्थिक निर्णय . हा निर्णय जाहीर करताना प्रधानमंत्र्यांनी जी कारणे आणि उद्दिष्टे सांगितली होती त्यापैकी काहीच पूर्ण झाली नाहीत. ना बनावट चलनाची निर्मिती थांबली, ना आतंकवाद काबूत आला ना नक्षलवाद थंडावला. भ्रष्टाचाराचा तर सर्वांनाच रोज अनुभव येतोच. मुख्य म्हणजे  काळा पैसा हुडकण्यात काहीच यश आलेच नाहीत. कराच्या जाळ्यात जास्त लोक येणे आणि कॅशलेस व्यवहार वाढणे हे अनुषंगिक लाभ झालेत. पण हे काही नोटबंदीचे उद्दिष्ट नव्हते. लोकांना झालेला त्रास , शेतकऱ्यांचे निघालेले दिवाळे आणि छोटे व मध्यम उद्योगाची आणि स्वयंरोजगार असणाऱ्यांना झालेला तोटा असे नोटबंदीचे फटके आणि झटकेच बसले. योजना राबविण्यावर जो खर्च झाला तेवढाही काळा पैसा सापडला नाही. हा सगळा व्यवहार आतबट्ट्याचा ठरला. याचा अर्थ मोदी काळात मनमोहन योजना जास्त यशस्वी आणि परिणामकारक ठरल्या तर या सरकारचे स्वत:चे म्हणून जे निर्णय आणि धोरण राहिले ते मात्र यशस्वी होताना दिसत नाही.

--------------------------------------------------------------
सुधाकर जाधव , पांढरकवडा , जि. यवतमाळ
मोबाईल - ९४२२१६८१५८
----------------------------------------------------------------

Thursday, May 18, 2017

भारत - चीन तुलना

भारताचा विरोध असतानाही 'वन बेल्ट वन रोड' परियोजना पुढे नेण्यास चीन सज्ज झाला आहे. याचे कारण त्याचे सैन्य सामर्थ्य नसून आर्थिक सामर्थ्य आहे. १९७८ पर्यंत आर्थिक बाबतीत भारत -चीन एकाच पातळीवर असताना चीनने आर्थिक धोरणे बदलून सामर्थ्य कमावले. आर्थिक धोरणे बदलायला चीनपेक्षा १३ वर्षे उशीर झाला आणि चीनने आघाडी घेतली. पिछाडी भरून काढायची आपल्याला संधी आहे , पण त्यासाठी देशाच्या तरुणांनी नोकरशाहीत शिरकाव करण्याचे स्वप्न पाहण्या ऐवजी उद्योजक बनण्याचे स्वप्न पाहिले पाहिजे.
------------------------------------------------------------------------------


'वन बेल्ट वन रोड'(ओबोर) या चीनच्या जगाला कवेत घेण्याच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाने चीनचे आर्थिक सामर्थ्य पुन्हा एकदा जगापुढे आले आहे. नुकतीच या संदर्भात चीनने जागतिक परिषद आयोजित केली होती , ज्यावर भारताने बहिष्कार घातला. ६५ देशाचे प्रतिनिधी , ज्यात २९ देशाचे राष्ट्रप्रमुख होते , या परिषदेत सामील झाले होते. भारताच्या सगळ्या शेजारी देशांनी यात अहमिकेने भाग घेतला. यावरून जागतिक विकासाच्या संदर्भात चीनच्या या परीयोजनेचे महत्व अधोरेखित होते. पहिल्या क्रमांकाची जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेला देखील पेलवणार नाही एवढा खर्च चीन या दशकभरात या योजनेवर करणार आहे. सुमारे ६५ लाख कोटी रुपये दशकभरात खर्च करून चीन नवे खुष्की आणि सागरीमार्ग निर्माण करून जागतिक व्यापाराची नवी संरचना निर्माण करणार आहे. या संरचनेचा एक भाग म्हणून पाकव्याप्त काश्मीर मधून पाकिस्तानच्या एका बंदरा पर्यंत रस्ता तयार करण्याचे चीनने ठानले आहे. पाकव्याप्त काश्मीर मधून भारताच्या मान्यतेशिवाय हा रस्ता जात असल्याने त्याला भारताचा विरोध आहे आणि या विरोधातून भारताने चीनने आयोजित केलेल्या परिषदेवर बहिष्कार घातला. बहिष्काराचे कारण योग्य असले तरी त्यामुळे भारत एकाकी पडला . भारताने या संदर्भात काय करायला पाहिजे होते या बाबतीत भारतात आणि भारताबाहेरही वेगवेगळे मतप्रवाह आहे. या मतप्रवाहांची किंवा परिषदे बाबत आणि चीनच्या परियोजनेबाबत भारताने घेतलेल्या भूमिकेची या लेखात चर्चा करणार नाही. जागतिक महासत्तेची स्वप्ने पाहणारा भारत चीनच्या तुलनेत कुठे आहे आणि एकेकाळी भारताच्या बरोबरीचा असलेला चीन एवढा पुढे कसा गेला आणि पुन्हा भारताला त्याची बरोबरी करणे शक्य होणार आहे का याची या लेखात चर्चा करायची आहे.


भारत १९४७ साली स्वतंत्र झाला आणि चीन १९४९ साली. यावेळी दोहोंच्या आर्थिक स्थितीत फारसा फरक नव्हताच. दोन्ही देशाचे सकल राष्ट्रीय उत्पादन आणि प्रती व्यक्ती आय ही बरोबरीची किंवा आगेमागे होती. १९६७-६८ ला सुरु झालेल्या हरितक्रांतीने १९७८ सालापर्यंत चीनच्या तुलनेत भारताची स्थिती किंचित बरी म्हणता येईल अशीच होती. चीन आणि भारत यांच्यात फरक पडायला सुरुवात झाली ती १९७८ सालापासून. राजकीय विचारसरणीच्या दृष्टीने विचार केला तर चीन मध्ये कम्युनिस्ट विचारसरणीची एकपक्षीय हुकुमशाही होती आणि भारतात समाजवादाचा प्रभाव असलेली लोकशाही. दोन्ही देशांनी स्वातंत्र्यानंतर वेगळी राजकीय व्यवस्था स्वीकारली असली तरी १९७८ पर्यंतची आर्थिक प्रगती किंवा अधोगती समसमान राहिली. भारतात विविध विचारधारा असल्याने प्रगतीत अडथळा निर्माण होतो हे विधान स्वातंत्र्यापासून ते १९७८ पर्यंतची दोन्ही देशाची प्रगती लक्षात घेतली तर चुकीचे आहे असे आपल्या लक्षात येईल. १९७८ नंतर मात्र दोन्ही देशाच्या राजकीय विचारधारा जवळपास तशाच राहूनही दोन्ही देशाच्या आर्थिक प्रगतीत कमालीचा फरक पडला. हम भी कम नही असे बोलून आपल्याला आपले समाधान करून घेता येईल , पण प्रगतीच्या आरशात पाहिले तर चीन मैलोगणती आपल्या पुढे आहे हे दिसेल. राजकीय धारा बदलली म्हणून नाही तर आर्थिक धारा बदलली त्याचा हा परिणाम होता. कम्युनिस्ट राष्ट्र असूनही माओ नंतर येणाऱ्या राज्यकर्त्यांनी उदारीकरणाचा स्वीकार केला आणि चीनचे आर्थिक चित्रच बदलले. माओ नंतर चीनची सूत्रे हाती घेतलेल्या डेंगने आर्थिक सुधारणा राबविण्याचा चंग बांधला आणि त्यानंतर येणाऱ्या प्रत्येक राजवटीने या सुधारणा राबविल्या. डेंगने आर्थिक सुधारणा राबविताना शेती क्षेत्राकडे अधिक लक्ष दिले. खरे तर आपण हरित क्रांतीने आधीच शेती क्षेत्रात सुधारणा राबविल्या. पण आपल्या सुधारणा या उत्पादन वाढी पुरत्या मर्यादित राहिल्या. उत्पादन वाढीतून उत्पन्न वाढीसाठी आवश्यक संरचना निर्माण करण्यात आमची समाजवादी मानसिकता हा अडथळा ठरली. उत्पादन वाढीतून नवीन व्यवसायांना चालना देवून शेतीवरील भार कमी करण्या ऐवजी सिलिंग सारख्या कायद्यांनी शेतीवरील भार वाढवीत राहिलो . परिणामी शेती सुधारणामुळे भिक मागणे टळून आमच्यातील राष्ट्रवादाचा अहंकार तेवढा सुखावला पण त्यातून ना शेतकऱ्याचे भले झाले ना देशाची प्रगती. चीनने मात्र शेतीवरील भार कमी करत औद्योगिकरणाला चालना देत आजचा पल्ला गाठला आहे. आपण उदारीकरण स्वीकारले ते १९९१ साली . चीनपेक्षा १३ वर्षे उशिराने आम्ही उदारीकरण स्वीकारले आणि या १३ वर्षाच्या फरकाने चीनने भारतावर निर्णायक आघाडी घेतली. आम्ही फक्त महासत्ता बनण्याचे स्वप्नच बघत आहोत पण चीन दुसऱ्या क्रमांकाची महासत्ता बनली आणि पहिल्या क्रमांकावर असलेल्या अमेरिकाला लवकरच मागे टाकेल अशी घोडदौड सुरु आहे.

चीनने उदारीकरण आधी सुरु केले म्हणून केवळ आघाडी घेतली नाही हेही लक्षात घेणे गरजेचे आहे. उदार आर्थिक धोरणात विकासाची असलेली संभावना हेरून चीनने ते धोरण स्वीकारले. आपण मजबुरीत स्वीकारले आणि आजतागायत शेतीक्षेत्रात उदारीकरण शिरणार नाही याची काळजी घेत आलो आहोत. त्यामुळेच उदारीकरणाचे जे फायदे चीनला मिळत आहेत त्यापासून भारत वंचित आहे. चीन फक्त उदारीकरण स्वीकारून थांबला नाही तर नवनवीन कल्पनांची भर घालून उदारीकरणाला नवा आशय दिला. सेझची कल्पना चीनची आणि त्याचा फायदा चीनला झाला. आपण त्याची नक्कल करायला गेलो आणि फसलो. का फसलो त्याचे कारण लक्षात घेतले पाहिजे. चीनने सेझ कारखानदारीसाठी , वस्तू उत्पादनासाठी वापरले. आपण सेझचा उपयोग गृहबांधणी , पर्यन , हॉटेल अशा कामासाठी करू लागलो. खरा फरक पडतो तो इथे. कारखानदारीतील काम जास्त कष्टाचे, तुलनेने फायदा कमी म्हणून उद्योगपतीचा ओढा नाही आणि तरुणांचा तर अजिबातच ओढा नाही. ज्यात भारतीयांना रस नाही अशा क्षेत्रात चीनने जगात आघाडी घेतली आहे. चीन जगातील सर्व प्रकारच्या वस्तू निर्मितीचे केंद्र बनले आहे. अशा निर्मितीत चीनने पहिला क्रमांक पटकाविला आहे. निर्मितीचे हे क्षेत्रच चीनचे बलस्थान बनले आहे. चीनच्या या बलस्थानाला धक्का देण्याची संधी , संभावना आणि क्षमता भारताकडे आहे , मात्र तशी मानसिकता अजिबात नाही.

आपल्याला संधी यासाठी आहे की इथून पुढे परिश्रम करू शकतील अशा तरुणांची संख्या आपल्याकडे जास्त असणार आहे. चीनच्या एक अपत्य धोरणामुळे चीनचा काम करणारा समूह वार्धक्याकडे झुकू लागला आहे. त्यांची जागा घेवू शकेल अशा तरुणांची चीनला कमतरता जाणवणार आहे. या संधीचा उपयोग आपण करून घेतला तर चीनच्या पुढे जाता आले नाही तरी त्याची बरोबरी नक्कीच करता येणार आहे. पण मालक म्हणून, व्यवस्थापक म्हणून आणि श्रमिक म्हणून कारखानदारीत उतरण्याची आपल्याकडील तरुणाईला इच्छा आहे का खरा प्रश्न आहे. शेतीविषयक आमची धोरणे चुकीची असल्याने शेती कायम तोट्यात आहे. त्यामुळे शेतीत काही करण्याची तरुणांची मानसिकता नसणे हे समजू शकते. पण कारखानदारीत उतरण्याची त्याची मानसिकता नाही ,तयारी नाही ही खरी अडचण आहे. अशी तयारी नसण्या मागचे सगळ्यात मोठे कारण आपल्याकडील राजकारण आणि आपली नोकरशाही व्यवस्था. राजकारणात शिरलो तर फारसे स्किल हाती नसतांना कमी वेळात विना श्रम अधिक संपन्न होता येते हे आपल्याकडील तरुण पाहतो. त्याचे हेच आकर्षण त्याला राजकीय पक्षाचे शेपूट बनविते. योगी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनताच त्यांच्या 'हिंदू युवा वाहिनी'कडे युवकांचा लोंढा सुरु होतो हे त्याचेच उदाहरण आहे. मोदी सरकार येताच गोरक्षक म्हणवून घेणाऱ्या टोळ्या तयार होतात त्याचे हे कारण आहे. सगळ्या राजकीय पक्षाच्या युवा शाखाकडे तरुणांचा ओढा असतो. व्यवसाय करून राजकारण करण्या ऐवजी राजकारण हाच बिनगुंतवणुकीचा आणि प्रचंड बरकतीचा व्यवसाय बनला आहे. तरुण कारखानदारीकडे न वळण्याचे सर्वात मोठे आणि महत्वाचे कारण म्हणजे तरुणाईला असलेले नोकरशाहीचे आकर्षण. फारसे शिक्षण न घेता आलेले तरुण पोलीस किंवा सैन्य भरतीकडे वळतात आणि जास्त शिकलेले तरुण भरपूर पगाराच्या नोकरीमागे लागलेले असतात. आपल्याकडे नोकरी म्हणजे विनाजोखीम आणि फारसे काम न करता कमाई करण्याचे शाश्वत साधन बनले आहे. नोकरीशी अधिकार निगडीत असतील तर मग विचारायलाच नको . सगळ्याच सुशिक्षिताना एमपीएससी , युपीएससी परीक्षा उत्तीर्ण होवून अधिकारी बनायचे असते. त्यामुळे कुठले कौशल्य हस्तगत करून रोजगार मिळविण्याकडे किंवा रोजगार निर्मितीकडे वळण्याचा कल तरुणाईचा नाही. त्यामुळे नोकरशाहीचे अधिकार , त्यांना नोकरीची मिळणारी शाश्वती, गलेलट्ठ पगार आणि इतर मिळणाऱ्या सवलती काढून घेतल्याशिवाय तरुणांचा उत्पादन क्षेत्राकडे ओढा निर्माण होणार नाही. उत्पादक कौशल्य हस्तगत केल्या शिवाय स्पर्धा परीक्षा देखील देता येणार नाही अशी तरतूद केल्याशिवाय तरुणांचे कौशल्य हस्तगत करण्याकडे लक्ष जाणारच नाही. मनमोहन काळातील सेझ मधून निर्मिती न होण्याचे किंवा मोदीजीच्या 'मेक इन इंडिया'ला चांगला प्रतिसाद न मिळण्यामागे तरुणांची ही मानसिकता मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे. कौशल्य हस्तगत करून उत्पादन क्षेत्राकडे तरुण मोठ्या संख्येने वळण्याची आणि त्यांना सामावून घेण्या इतकी संरचना निर्माण करण्याची गरज आहे. कौशल्य नाही म्हणून कौशल्यावर आधारित उद्योग नाहीत आणि कौशल्यावर आधारित उद्योग नाहीत म्हणून कौशल्य हस्तगत करण्याकडे दुर्लक्ष अशा चक्रव्युहात आपण अडकलो आहोत . हा चक्रव्यूह भेदता आला तर अमेरिका - चीनच्या तोडीची महासत्ता बनण्या पासून आपल्याला कोणी रोखू शकणार नाही.


------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव , पांढरकवडा ,जि. यवतमाळ
मोबाईल - ९४२२१६८१५८
--------------------------------------------------------------------

Thursday, May 11, 2017

शेती समाजवादी पर्जन्य छायेत !

मोदी सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार आणि नीती आयोगाचे एक सदस्य या दोहोंनी "श्रीमंत" शेतकऱ्यावर आयकर आकारण्याची मागणी केली आहे. त्यांनी शेती उत्पन्नावर आयकर लावावा अशी मागणी केली म्हणून त्यांची वक्तव्ये निषेधार्ह नाहीत . पण अशा वक्तव्यातून शेतकऱ्यांचे उत्पन्न चांगले असताना सुद्धा ते आयकराच्या परिघा बाहेर आहे हा जाणारा असत्य संदेश आक्षेपार्ह आहे. आणि याही पेक्षा सरकारी धोरणे ठरविणे ज्यांच्या हातात आहे त्यांना जमिनीवरच्या परिस्थितीचे काही ज्ञानही नाही आणि भान सुद्धा नाही हे जास्त चिंताजनक आहे.
-------------------------------------------------------------------------------


नीती आयोगाचे सदस्य बिबेक देबरॉय यांनी शेती उत्पन्नावर आयकर लावण्याची सूचना केली. त्यामुळे सरकारी उत्पन्नात वाढ होईल असे त्यांचे म्हणणे. शेतकऱ्याला कर नाही , उलट त्यांच्यावर सबसिडीचा मारा करण्यात येतो अशी आधीपासूनच संभ्रांत समाजाची समजूत असल्याने अशी मागणी अधूनमधून डोके वर काढीत असते. उत्पन्नाच्या बाबतीत खडखडाट असल्याने ही मागणी आपल्या संदर्भात आहे असे कधी कोण्या शेतकऱ्यांना वाटले नाही.  त्यामुळे कर भरावा लागेल म्हणून कोण्या शेतकऱ्याने किंवा शेतकऱ्यांच्या संघटनांनी या मागणीला विरोध केला नाही. उलट कर भरण्याची चैन आपल्या वाट्याला कधी येईल याचाच विचार बरेच शेतकरी करतात आणि आपल्या हयातीत तो सुदिन येण्याची शक्यता दिसत नसल्याने दु:खीही होतात. बिबेक देबरॉय यांच्या सूचनेला शेतकऱ्यांचा विरोध होण्या आधीच अर्थमंत्री अरुण जेटली यांनी घाईघाईने शेती उत्पन्नावर कर लावण्याचा सरकारचा कोणताही विचार नसल्याचा खुलासा केला. मोदी सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रम्हण्यम यांनी शेतीवर आयकर लावण्याच्या समर्थनार्थ या चर्चेत उडी घेतली तेव्हा त्यांच्या निवेदनातून एक गोष्ट स्पष्ट झाली कि, शेती उत्पन्नावर आयकर लावण्याचा केंद्राला मुळी अधिकारच नाही. अधिकारच नसतांना जेटलींनी कर लावणार नसल्याचा खुलासा हास्यास्पद ठरतो. शेती विषयाचा अभ्यास किंवा शेती प्रश्नाचे गांभीर्य कोणत्याच स्तरावर आढळून येत नसल्याने अर्थमंत्र्याचा गोंधळ स्वाभाविक समजला पाहिजे. अर्थमंत्र्याचा गोंधळ उघड करणारे मुख्य आर्थिक सल्लागार शेती प्रश्नावर कमी गोंधळलेले नाहीत हे त्याच निवेदनातून स्पष्ट होते. शेती उत्पन्नावर कर लावण्याचा अधिकार राज्याला आहे असे सांगताना त्यांनी शेतकऱ्यांची गरीब आणि श्रीमंत अशी वर्गवारी करून राज्यांनी श्रीमंत शेतकऱ्यावर कर आकारला पाहिजे असे ते सांगतात. इतरांना आयकर जसा विशिष्ट उत्पन्नाच्या वर लागतो तसा शेतकऱ्यांनाही लावावा असे म्हणणे समजू शकते , पण शेतकऱ्यांची गरीब आणि श्रीमंत अशी वर्गवारी करून श्रीमंत शेतकऱ्यावर कर लावावा असे म्हणण्या मागे हेतू काय हा प्रश्न पडतो. एक तर , आयकराची आज जी उत्पन्नाची मर्यादा आहे त्या मर्यादे पर्यंत शेतकऱ्याचे उत्पन्न पोचण्याची शक्यता नसल्याने उत्पन्ना ऐवजी गरीब - श्रीमंत अशी वर्गवारी करायची आणि श्रीमंतावर आयकर आकारणी करायची असे त्यांचे म्हणणे असू शकते. मग गरीब - श्रीमंत ठरवायचा आधार काय तर कोणाजवळ किती एकर जमीन आहे ! जमिनी बद्दलची ही समाजवादी अवधारणा आजही प्रभावी आहे हेच मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रम्हण्यम यांचे वक्तव्य सिद्ध करते.




पंडित नेहरूंवर समाजवादाचा प्रभाव होता आणि त्यातून सिलिंग , आवश्यक वस्तूंचा कायदा (जमीन अधिग्रहण कायदा इंग्रजी राजवटीत होताच) आणि या गोष्टीना संरक्षण देणारे घटनेचे ९ वे परिशिष्ट आले असा आरोप होतो आणि या आरोपात तथ्यही आहे. नंतर येणाऱ्या राज्यकर्त्यावरचा समाजवादी प्रभाव ओसरल्यानंतरही शेती धोरणात बदल झालेला नाही. नरसिंहराव - मनमोहनसिंग जोडगोळीने भारतातील समाजवादाच्या शवपेटीकेवर शेवटचा खिळा ठोकला खरा पण समाजवादाचे भूत त्यांच्याकडून वा नंतर येणाऱ्या राज्यकर्त्याकडून गाडल्या गेले नाही . शेतीक्षेत्राच्या मानगुटीवर बसलेले हे भूत अजून उतरण्याचे नाव घेत नाही एवढेच सरकारच्या मुख्य आर्थिक सल्लागाराचे प्रतिपादन दर्शविते. मोदी, त्यांचे सरकार आणि एकूणच संघ भाजपच्या डीएनए मध्ये नेहरू विरोधाची आणि समाजवादी धारणा विरोधाची गुणसूत्रे प्रबळ आहेत. एवढे प्रबळ नेहरू विरोधी सत्तेत आले तरी शेती क्षेत्राच्या प्रगतीला घटनेच्या नवव्या शेड्युल मुळे निर्माण झालेली बाधा दूर करण्याचा कोणताही प्रयत्न त्यांच्याकडून होत नाही. उलट मोदी आणि त्यांची राज्यातील सरकारे शेतकरी विरोधी धोरणे अधिक आक्रमकपणे राबवीत आहेत. याचाच परिणाम म्हणजे मोदी सरकारच्या आर्थिक धोरणाला आकार देण्यात महत्वाची भूमिका निभावणाऱ्या देबरॉय आणि सुब्रम्हण्यम यांची वक्तव्य होय. त्यांनी शेती उत्पन्नावर आयकर लावावा अशी मागणी केली म्हणून त्यांची वक्तव्ये निषेधार्ह नाहीत . पण अशा वक्तव्यातून शेतकऱ्यांचे उत्पन्न चांगले असताना सुद्धा ते आयकराच्या परिघा बाहेर आहे हा जाणारा असत्य संदेश आक्षेपार्ह आहे. आणि याही पेक्षा आक्षेपार्ह बाब म्हणजे सरकारी धोरणे ठरविणे ज्यांच्या हातात आहे त्यांना जमिनीवरच्या परिस्थितीचे काही ज्ञानही नाही आणि भान सुद्धा नाही.


ज्या मोठ्या शेतकऱ्यांवर आयकर आकारणी करावी असे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणतात  ते शेतकरी कोण आणि किती आहेत ?  आजच्या परिस्थितीत १० ते १५ हेक्टर जमीन धारणा असलेला शेतकरीच मोठा समजला जावू शकतो . म्हणजे ठरवून दिलेल्या सिलिंग मर्यादे इतकी जमीनही ज्या शेतकऱ्याला टिकवून ठेवता आली नाही तो शेतकरी मोठा शेतकरी ठरतो. कृषी मंत्रालयाने शेतकऱ्यांकडील जमीन धारणेची जी गणना २०११ साली केली त्यानुसार फक्त ०.७ % एवढेच मोठे शेतकरी आहेत ज्यांच्याकडे १० ते १५ हेक्टर पर्यंतची जमीन आहे. हिशेबासाठी आपण मोठ्या शेतकऱ्याकडे ५० एकर जमीन आहे असे गृहीत धरू. त्याने यावर्षी तुरीचे पीक घेतले असे गृहीत धरले तर त्याला २०० क्विंटल तुरी होवू शकतात. एकरी ४ क्विंटल पेक्षा अधिक तुरी होवू शकत नाही असे सरकारच म्हणते. पण एवढ्या तुरी झाल्या तरी हमीभावात विकल्या जाण्याची मारामारी . हमीभाव म्हणजे तुमचा खर्च भरून निघेल याची फक्त हमी. म्हणजे १० लाख मिळूनही फायदा नाहीच. मग आयकर लावणार कोणावर आणि कशावर ? जमीन धारणा जास्त असल्याने शेतकरी मोठा होत नाही किंवा श्रीमंत होत नाही. महाराष्ट्रातील विविध विभागाचा तुलनात्मक विचार केला तर प.महाराष्ट्रा पेक्षा विदर्भातील शेतकऱ्याची जमीन धारणा अधिक आहे. मात्र उत्पन्नाच्या बाबतीत विदर्भातील शेतकरी मागे आहेत. तेव्हा श्रीमंती मोजण्याचे जमीन धारणेचे माप विश्वासार्ह ठरत नाही. मुळात किती जमीन धारणा असली म्हणजे नफा होईल असे शेतीत ठरवता आलेले नाही. अनुभवाचे आधारे एवढे मात्र नक्की सांगता येईल की जमीन धारणा अत्यल्प , अल्प , मध्यम किंवा आजच्या अर्थाने मोठी असू दे कुणालाही फायदा होत नाही. ज्या दिवशी शेतकऱ्याला आपल्या उत्पादनाचा भाव ठरविता येईल त्या दिवशी ढोबळमानाने शेती फायदेशीर ठरण्यासाठी किती जमीन धारणा आवश्यक आहे याचा अंदाज करता येईल आणि या अंदाजाच्या किमान चौपट जमीन धारणा असेल तरच ती फायद्याची ठरू शकते. बेभरवशाचे हवामान लक्षात घेता शेतकऱ्यांना एका पिकावर अवलंबून राहता येत नाही. वेगवेगळ्या हवामानात टिकणारी वाढणारी वेगवेगळी पिके घेता आली तरच चार पिकापैकी दोन पिके हाती लागतील . आज ज्या वेगाने शेतीचे तुकडे होत आहेत त्यात धड एखादे पीकही घेता येत नाही अशी स्थिती आहे. ज्यांच्याकडे १-२ पिके घेण्या इतकी जमीन धारणा आहे त्यांच्या उत्पादनाला भाव मिळण्याची खात्रीलायक व्यवस्था नाही. हे वास्तव जर केंद्र सरकारच्या मुख्य आर्थिक सल्लागाराला आणि नीती आयोगाच्या सदस्याला माहित नसेल तर शेती संबंधीची धोरणे कशी बदलतील हा चिंतेचा विषय आहे. शेतकऱ्यांना चिंता आहे ती धोरणाची , आयकर भरण्याची नव्हे.



खरे तर शेती उत्पन्नावर आयकर आकारावा आणि त्यासाठी मोठे शेतकरी शोधावेत अशी मागणी करण्याचीच गरज नव्हती. शेती उत्पन्न आयकर मुक्त असणार नाही एवढी घोषणा पुरेशी आहे. अशी घोषणा शेतकऱ्याच्या फायद्याचीच ठरणार आहे. त्यामुळे शेतकरी काळजीपूर्वक जमा - खर्च लिहायला लागेल. खरेदी-विक्रीची पावती घेईल. पावती न देता बियाणे, खते, कीटक नाशके त्याच्या  गळ्यात मारण्याचे प्रकार बंद होतील. मजुरी , औजारे आणि मशागतीचा खर्च लिहिला जाईल. उत्पादित माल बाजारात विकल्यावर जमा-खर्चाचा हिशेब करील तेव्हा त्याला लख्खपणे कळेल आपण कसे लुबाडले जात आहोत. हा सगळा जमा-खर्च त्याला सरकार आणि बँकापुढे ठेवून कर्जाची रक्कम कुठून कशी चुकती करायची हे विचारता येईल. कर्ज फेडता येत नाही म्हणून स्वत:ला अपराधी समजून होणाऱ्या आत्महत्या यामुळे टळू शकतात.  शेतीवर आयकर ही शेतकऱ्यासाठी इष्टापत्तीच ठरणार आहे. पण सरकार असे करणार नाही. कारण राजकारणातील  भ्रष्टाचाराचा पैसा दडविण्याचे शेती हे उत्तम साधन आहे. जे तथाकथित मोठे शेतकरी आहेत ते शेतीत बियाणे पेरत नाहीत , पैसे पेरतात आणि पैसे घेतात. सरकार त्यांच्या हितसंबंधाला  कधीच बाधा आणणार नाही. फक्त घोषणा तेवढी करत राहील. कारण अशा घोषणेमुळे छोटा शेतकरी खुश होईल आणि सरकार बाबत अनुकूल मत बनवील.   २-३ हेक्टर वाला छोटा आणि ५-१० हेक्टर वाला मोठा या भ्रामक सापळ्यात आपणहून अडकतो. असा भेद राज्यकर्त्यांच्या फार सोयीचा ठरतो. कारण आपणच म्हणतो मोठ्या शेतकऱ्याला कर्जमुक्ती नाही दिली तरी चालेल , छोट्या शेतकऱ्यांना तेवढी द्या. आपण हे विसरून जातो की १ हेक्टर मधील शेतकऱ्यांना ज्या कारणाने नुकसान होते त्याच कारणाने १० हेक्टर असलेल्या शेतकऱ्याचे देखील नुकसान होते आणि तुलनेने जास्त नुकसान होते. आपणच समाजवादी फंद्यात अडकतो आणि शेतीला गड्ड्यात घालणाऱ्या सरकारच्या समाजवादी नीतीला बळ देतो !

----------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव , पांढरकवडा , जि. यवतमाळ
मोबाईल - ९४२२१६८१५८
--------------------------------------------------------

Thursday, May 4, 2017

सोयीचा अभ्यास !

 एखाद्या गोष्टीत चालढकल करायची असली किंवा ती गोष्ट करायचीच नसली म्हणजे अभ्यासाचे नवे कारण मुख्यमंत्री पुढे करीत आहेत . घरामध्ये आई मुलांना एखादे काम करायला सांगते तेव्हा मुले आम्हाला अभ्यास करायचा बहाणा सांगून ते काम करायचे टाळतात तसा हा प्रकार आहे. फडणवीसांनी याचा राजकारणासाठी वापर करण्याची हुशारी दाखविली आहे. ही झाली निर्णय टाळण्यातील हुशारी. गरज आहे ती निर्णय घेण्यातील हुशारी दाखवायची.
------------------------------------------------------------------------------------


सरकारला एखाद्या गोष्टीबद्दल लगेच निर्णय घेणे अडचणीचे असले की समिती , आयोग वगैरे नेमण्याची घोषणा होते. त्यांच्याकडून विशिष्ट मुदतीत अहवाल मागविला जातो. आपली नेमणूक टाईमपास करण्यासाठी असल्याचे समिती किंवा आयोगाला चांगलेच माहित असते. त्यामुळे ते देखील आपल्या नेमणुकीचे सार्थक करतात. ते एवढा वेळ घेतात कि एखाद्या प्रश्नावर आयोग नेमले आहे हे जनता विसरून जाते. तीन महिन्याच्या आत अहवाल देण्यासाठी नेमलेल्या समितीने तीन वर्षे घेतले नाही तरच नवल. मग असे अहवाल आले की त्यावर कारवाईची गरज नसते. गरज असते ती अहवालावर नवा कृती अहवाल तयार करून कायदेमंडळात सादर करण्याची. या कामी आमची नोकरशाही हुशार. कागदे पांढऱ्याचे काळे करण्यात त्यांचे केस काळ्याचे पांढरे होत असतात. फक्त एकच कमिशन आहे जे कमीतकमी उशीर करून आपला अहवाल सादर करते. ते म्हणजे वेतन आयोग ! आणि हा एकच अहवाल आहे ज्याच्या सर्व शिफारसी जशाच्या तशा स्वीकारल्या जातात . बाकी अहवालाचे काय होते हे जनतेला आता चांगले माहित झाले आहे. त्यामुळे समिती किंवा आयोग नेमणे याचा अप्रत्यक्ष अर्थ मागण्याचे घोंगडे भिजत ठेवणे होतो हे लोक समजून चुकले आहेत. त्यामुळे असा फंडा वापरून लोकांची दिशाभूल करण्याला फारसा वाव नाही हे नव्या दमाच्या नव्या राज्यकर्त्यांनी ओळखले आहे. म्हणूनच समिती किंवा आयोग नेमण्याची भाषा बदलून अभ्यास करण्याची भाषा आता बोलली जात आहे. महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीवर वातावरण तापले तेव्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी अभ्यासाचा हा नवा फंडा सुरु केला. उत्तरप्रदेशात योगी सरकारने १ लाख रुपयापर्यंतचे कर्ज माफ केले , मग महाराष्ट्रात का नाही असा प्रश्न ऐरणीवर आला तेव्हा उत्तरप्रदेश सरकारला हे कसे शक्य झाले याचा अभ्यास करून निर्णय घेवू असे मुख्यमंत्री म्हणाले. जिथे योगीना आपला निर्णय घेण्याआधी अभ्यासाची गरज वाटली नाही त्या निर्णयाचा अभ्यास करण्याची गरज आमच्या मुख्यमंत्र्यांना वाटली. आठवड्यातून १-२ वेळा दिल्ली वारी करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना दिल्लीहून हाकेच्या अंतरावर असलेल्या उत्तर प्रदेशात जाण्याला मुहूर्त अजून सापडला नाही. तेव्हा एखाद्या गोष्टीत चालढकल करायची असली किंवा ती गोष्ट करायचीच नसली म्हणजे अभ्यासाचे नवे कारण पुढे करण्याची हुशारी आमच्या मुख्यमंत्र्यांनी दाखविली आहे. घरामध्ये आई मुलांना एखादे काम करायला सांगते तेव्हा मुले आम्हाला अभ्यास करायचा बहाणा सांगून ते काम करायचे टाळतात तसा हा प्रकार आहे. फडणवीसांनी याचा राजकारणासाठी वापर करण्याची हुशारी दाखविली आहे. ही झाली निर्णय टाळण्यातील हुशारी. गरज आहे ती निर्णय घेण्यातील हुशारी दाखवायची. ही हुशारी महाराष्ट्रात चौथी पास मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचेकडे होती. त्यांच्या नंतर ही हुशारी लयाला जाण्याची प्रक्रिया सुरु होवून पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात निच्चांकी निर्णय झालेत. उच्चशिक्षित पृथ्वीराजबाबांना अशीच अभ्यासात गोडी होती. अभ्यास करण्यातच त्यांनी सत्ता घालविली हे ताजे उदाहरण असताना फडणवीस त्याच मार्गाने जात आहेत. दोघात फरक काय एवढाच कि , कोणत्या गोष्टीत अभ्यासाला वेळ लावायचा आणि कोणत्या गोष्टीत झटपट अभ्यासाचे प्रदर्शन करायचे हे फडणवीसांना जास्त चांगले कळते. तूर खरेदी प्रकरणात याची चुणूक त्यांनी दाखवून दिली आहे.


महाराष्ट्रातील हजारो केंद्रावर केंद्र सरकार कडून झालेल्या तूर खरेदी घोटाळ्याचा अभ्यास केंद्राला भनक लागण्याच्या आधीच फडणवीस यांनी पूर्ण केला आणि ४०० कोटीचा घोटाळा झाल्याचे जाहीर देखील केले. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्याच्या नावावर तूर नाफेडला विकल्याचा हा घोटाळा आहे. व्यापाऱ्यांना हा घोटाळा करणे कशामुळे शक्य झाले याचा अभ्यास पुढे मांडण्यास मुख्यमंत्री सोयीस्करपणे विसरले. कधी बारदाने नाहीत म्हणून , कधी अधिकारी नाहीत म्हणून तर कधी हमालच नाही या सबबीखाली महाराष्ट्रातील बहुतेक खरेदी केंद्रात कित्येक दिवस खरेदीच बंद ठेवण्यात आली. केंद्रावर आणलेला माल तसाच ठेवणे किंवा परत घेवून जाणे बऱ्याच शेतकऱ्यांसाठी परवडणारे नसल्याने हमीभावापेक्षा हजार-दीड हजार कमी घेवून तूर व्यापाऱ्याला विकणे शेतकऱ्यांना भाग पडले. व्यापाऱ्यांचे हित बघणाऱ्या राजकीय व शासकीय यंत्रणेचा हा घोटाळा आहे. चौकशीविना असा घोटाळा आणि घोटाळ्याची रक्कम जाहीर करण्याचा हेतू घोटाळेबाज लोकांना शिक्षा व्हावी असा मुळी नव्हताच. कारण रीतसर चौकशी होवून पुरावे हाती आल्याशिवाय कोणाला शिक्षा होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. मुख्यमंत्र्यांनी चौकशी केली जाईल असे म्हंटले जरूर , पण जी बाब त्यांच्या अधिकार क्षेत्रातच नाही त्याची चौकशी करू म्हणणेच हास्यास्पद आहे. खरेदी केंद्र सरकारने केली , काही घोटाळा असेल तर केंद्र चौकशीचे आदेश देवू शकते. फार तर मुख्यमंत्री असा घोटाळा झाल्याची माहिती केंद्राला देवून चौकशी आणि कारवाईची मागणी करू शकतात. मग मुख्यमंत्र्यांनी हा अव्यापारेषु व्यापार कशासाठी केला तर केंद्राने खरेदी बंद केल्याने राज्याच्या तूर खरेदीत चालढकल आणि टाळाटाळ करण्यासाठी ! मुख्यमंत्र्याच्या झटपट अभ्यासाचा हेतू काय तर केंद्रात येईल तेवढा माल खरेदी करावा लागू नये. या हेतूची पुष्टी मुख्यमंत्र्याच्या दुसऱ्या अभ्यासातून होते. एकरी फक्त चार क्विंटल तूरीचे उत्पादन होवू शकते. यापेक्षा जास्त असेल तर ते विक्रीसाठी ग्राह्य धरल्या जाणार नाही. जणू काही ते जास्तीचे उत्पादन व्यापाऱ्याचे असेल किंवा चोरून आणलेले असेल ! आपल्याकडे उत्पादकता किती भिन्न असते हे मुख्यमंत्र्याला माहितच नाही का ? शेजारी-शेजारी असलेल्या शेतात एकसारखी उत्पादकता असत नाही. कुठे एकरी दोन , कुठे एकरी चार तर कुठे एकरी सहा क्विंटल असे उत्पादन होणे यात नवीन काही नाही. उत्पादन बरेचसे आपण कशाचा किती प्रमाणात वापर केला याचे वर अवलंबून असते. मुख्यमंत्र्याच्या अभ्यासाप्रमाणे मेहनत आणि खर्च करून जास्त उत्पादन घेणारे शेतकरी चोर ठरतात . शेतकऱ्याला चोर ठरविण्याचे हे धोरण कशासाठी तर त्याची तूर खरेदी करण्यास नकार देता यावा म्हणून. मुळात यावर्षी पाउस - पाण्याने आणि हवामानाने चांगली साथ दिल्याने यावर्षी तुरीचे मुबलक पीक हाती आले हे सर्वमान्य आहे. केवळ पेरा वाढल्यानेच जास्त पीक आले नाही तर एकरी उत्पादकताही वाढली आहे. अशावेळी एकरी फक्त चार क्विंटल तूर होवू शकते त्यापेक्षा जास्त नाही असे म्हणणे शेतीविषयक अज्ञान आणि अडाणीपण तरी दर्शविते किंवा मग तूर खरेदी न करण्यासाठी चालविलेला आडमुठेपणा तरी आहे. मुख्यमंत्र्याने आपण अभ्यास किती आधुनिक साधनांच्या सहाय्याने करू शकतो हे देखील या निमित्ताने दाखवून दिले. आपण राज्यात तुरीचा पेरा किती झाला हे अचूकपणे शोधण्यासाठी उपग्रहाचा उपयोग करून घेवू म्हणत अभ्यासाचा सिक्सर मारला. उपग्रहाद्वारे फोटो घेणे सोपे काम आहे हे खरे. पण नंतर काढलेल्या फोटोच्या आधारे कोणाचे क्षेत्र किती हे ठरविणे महाअवघड काम आहे. क्षेत्र निश्चित केले तरी उत्पादन कसे निश्चित करणार या प्रश्नाचे उत्तर उपग्रह देवू शकत नाही. मुळात महसूल विभागाकडे ही आकडेवारी उपलब्ध असतांना असा द्राविडी प्राणायाम करण्याची योजना मुख्यमंत्र्याच्या डोक्यात आलीच कशी असा प्रश्न उभा राहतो. या प्रश्नाचे उत्तर सोपे आहे. मुख्यमंत्र्याचा आपल्या महसूल विभागावर विश्वास नाही. शेतकरी महसूल विभागाशी हातमिळवणी करून सरकारला गंडवत आहेत असा मुख्यमंत्र्याचा ग्रह झाला असावा. शक्य तितकी तूर खरेदी करून मोकळे होण्या ऐवजी मुख्यमंत्री प्रतिदिन एक बहाणा शोधून काढत आहेत . शेवटी मुख्यमंत्र्याच्या अभ्यासाच्या गोडीने काय साधले तर उत्तरप्रदेशचा अभ्यास करण्यासाठी वेळ नाही म्हणून कर्जमुक्ती नाही आणि तुरीचा एवढ्या बारकाईने अभ्यास केला की तूर खरेदी करणे म्हणजे चोराला मदत करणे या निष्कर्षावर मुख्यमंत्री आले.

तूर प्रकरणावरून काही धडा घेण्या ऐवजी मुख्यमंत्री जे वक्तव्य करीत आहेत त्यावरून तूर मोठ्याप्रमाणावर घेण्यात शेतकऱ्याने खूप मोठा अपराध केला असाच बोध होतो. निसर्गाने साथ दिली पण सरकारच्या अक्षम्य बेपर्वाईने तूर उत्पादक शेतकऱ्याचे नुकसान आता ठरलेलेच आहे. ते टाळण्याची धडपड सरकार करू इच्छित नाही. केंद्र आणि राज्य सरकारला खरेदी करणे शक्य होत नाही एवढे उत्पन्न झाले तरी निर्यात बंदी कायम आहे. कारण सरकारला माहित आहे कि, तूर खरेदी करण्यात आपण कमी पडत असलो तरी देशाला डाळीची कमतरता भासणार आहे. केंद्रीय कृषीमंत्र्याने तशी जाहीर कबुली पण दिली आहे. म्हणून निर्यात बंद , आयात सुरु आहे. शेतकऱ्याने तुरी घरात ठेवाव्या किंवा व्यापाऱ्याला विकाव्यात. सरकारला त्याच्याशी देणेघेणे नाही. टंचाई निर्माण झाली की तूर बाहेर निघावी असे हे धोरण. यात शेतकऱ्याचे मरण ठरलेलेच. कारण तूर भरून ठेवण्याची आर्थिक क्षमता त्याच्यात नाही. मातीमोल भावाने विकणे एवढाच त्याच्या समोर पर्याय. यावर्षी तुरीच्या बाबतीत जो गोंधळ झाला तसा गोंधळ पुढच्या वर्षी अन्य पिकाच्या बाबतीत होवू शकतो ते टाळण्यासाठी काय करता येईल याचा विचार करायला सरकार तयार नाही आणि शेतकरी संघटना तसा विचार करायला सरकारला भाग पाडत नाही. तुरी जास्त झाल्याने मार खाल्ला म्हणून शेतकरी पुढच्या वर्षी सोयाबीन सारख्या पिकाकडे वळणार आणि त्याचे उत्पादन जास्त म्हणून पुन्हा मार खाणार. अशी परिस्थिती पुन्हा होणार नाही याचा आज आम्ही विचार करणार नसू तर शेतकऱ्याच्या मागची साडेसाती कधीच दूर होणार नाही. मुख्यमंत्र्यांना खरोखर अभ्यास करायचा असेल तर याचा करावा . सगळ्यात आधी हमीभाव घोषित करण्याची पद्धत काही काळापुरती कायम ठेवून शेतीमालाचा व्यापार नियंत्रण मुक्त करण्याची गरज आहे. युद्धसदृश्य परिस्थिती किंवा आपत्काळातच सरकारने आयात-निर्याती बाबत हस्तक्षेप करायची गरज वाटली तर करावी. देशांतर्गत शेतीमालाचे भाव पाडण्यासाठी आयात-निर्यातीचा हत्यार म्हणून वापर करण्याचा अधिकार सरकारला असता कामा नये. सरकारच्या सततच्या हस्तक्षेपाने आणि नियंत्रणाने शेतीमालाच्या व्यापारासाठी आवश्यक संरचना निर्माणच झाली नाही. तुरीच्या बाबतीत सरकारची झालेली फजिती लक्षात घेतली तर शेतमालाच्या व्यापारासाठी सरकार कुचकामी आहे हे लक्षात येईल. बाजारात सरकार एक खरेदीदार असायला हरकत नाही , पण त्याच्या तोडीचे दुसरेही खरेदीदार असणे गरजेचे आहे. आज शेतमालाचा व्यापार करणे म्हणजे एखादा अपराध करण्यासारखे झाले आहे. सरकारचे नियम आणि कायदेच असे आहेत की शेतीमालाचा व्यापारी हा साठेबाज आणि काळाबाजारी ठरावा. यामुळे शेतीमाल व्यापारात फार मोठी गुंतवणूक करायला कोणी धजत नाही. या निमित्ताने आवश्यक वस्तूचा जो कायदा आहे त्यावर मोठ्या प्रमाणावर चर्चा व्हायला हवी होती. पण तसे होताना कुठे दिसत नाही.  शेतीमाल व्यापार सुरळीत  होण्यातील सर्वात मोठा अडथळा आवश्यक वस्तूंचा कायदा आहे हे सरकार ध्यानी घेत नाही आणि त्याच्या ध्यानात आणून दिल्या जात नाही तोपर्यंत तुरीच्या बाबतीत जे घडले ते भरघोस उत्पादन झालेल्या कोणत्याही पिकाबद्दल घडतच राहणार आहे. प्रत्येकवेळेस तहान लागली की विहीर खोदण्याचे काम हाती घेण्या ऐवजी शेतीमालाच्या व्यापारा संबंधी दूरगामी विचार आणि उपाययोजना करण्याची गरज आहे. शेतीमालाच्या व्यापारासाठी आणि पर्यायाने शेतकऱ्याचा गळफास ठरलेल्या आवश्यक वस्तूच्या कायद्यावर सर्वांगीण सार्वत्रिक चर्चा हा दूरगामी उपाययोजना साठीचा प्रारंभ बिंदू ठरू शकतो. सरकार आणि विविध शेतकरी संघटनांनी यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.

---------------------------------------------------------
सुधाकर जाधव , पांढरकवडा , जि. यवतमाळ 

मोबाईल - ९४२२१६८१५८
---------------------------------------------------------