Tuesday, February 21, 2012

कर्तबगारी उद्धवची , प्रकाशझोत राज वर !

----------------------------------------------------------------------------------------------
उद्धवच्या नेतृत्वाखाली शिवसेना लगेच धर्म निरपेक्ष होईल आणि जात , प्रांत याचा भेदभाव न मानता आर्थिक प्रश्नावर लक्ष केंद्रित करील असे मानने भाबडेपणाचे होईल. पण त्या दिशेने शिवसेनेला एक पाऊल पुढे नेण्याची ताकद या निवडणुकीने उद्धवला दिली आहे. या दिशेने पुढे जाण्याशिवाय उद्धव समोर पर्यायही नाही. उद्धवने शिवसेनेला परत पूर्वीच्या वळणावर न्यायचे ठरविले तर मात्र शिवसेनेला उद्धवच्या नाही तर राज च्या नेतृत्वाची गरज भासेल !
----------------------------------------------------------------------------------------------

महाराष्ट्रातील काना कोपऱ्यातील गावातील मतदारांनी निष्ठापूर्वक मतदान केलेल्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांचे परिणाम महानगरातील निष्ठापूर्वक मतदान न करणाऱ्या बहुसंख्य मतदारांची वस्ती असलेल्या महानगराच्या महापालिकेच्या निवडणूक परिणामा पुढे अक्षरश: झाकोळले गेलेत. इंडिया आणि भारत यांच्यातील दरी आणि भारताचे दुय्यमत्व या निमित्ताने माध्यमांनी अधोरेखित केले. इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी तर खाली एका पट्टीत बारीक अक्षरात आणि तेही उशिरा माहिती देवून पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकी बाबतचे आपले कर्तव्य पार पाडले. जणू काही या निवडणुका कुठल्यातरी दुर देशातील आहेत व त्यामुळे त्यांच्याशी काही देणे घेणे नाही या थाटात पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांचे वृत्त दिले गेले. रात्रंदिवस महानगरातील निवडणुकांचे वृत्त देण्यात व त्याचे विश्लेषण करीत बसण्यात माध्यमांनी धन्यता मानली. माध्यमांनी महानगर पालिका व जि.प.-पंचायत समित्या या बाबत कमालीचा भेदभाव दाखविला असला तरी मतदान करणाऱ्या मतदारांची मानसिकता दोन्ही ठिकाणी सारखीच होती आणि त्यात काडीचाही फरक नव्हता हेच महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीचे परिणाम दर्शवितात. मतदान करणाऱ्या शहरी आणि ग्रामीण भागातील मतदारांनी कोणत्याही राजकीय पक्षावर विश्वास व्यक्त न करता लोकशाही प्रक्रीये वरील विश्वास तेवढा व्यक्त केला आहे. मात्र सरसकट सर्वाना नाकारण्या ऐवजी त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत चांगले काम करून दाखविण्याची संधी देण्यासाठी फार उलटफेर न करण्याचा परिपक्व निर्णय मतदारांनी घेतल्याचे दिसून येते. जैसे थे स्थिती ठेवत असतानाच आपले असमाधान प्रकट होईल याची पुरेपूर दक्षता मतदारांनी घेतली आहे. म्हणूनच शहरी आणि ग्रामीण या दोन्ही भागातील मतदारांनी सर्व पक्षाच्या डोक्यावर टांगती तलवार ठेवून त्यांना अधिक जबाबदारीने वागण्याचा आणि लोकांच्या समस्या सोडविण्यावर भर देण्याचा इशारा मतदाना द्वारे दिला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी कॉंग्रेस पक्षावर जास्त विश्वास टाकला होता आणि त्या विश्वासास पात्र ठरण्या लायक कॉंग्रेसची कामगिरी नसल्याने स्वाभाविकपणे मतदार त्यांच्याशी थोडे कठोर वागले आहेत असे म्हणता येईल. सर्वच पक्षाची कामगिरी मतदारांना समाधानकारक वाटली नसली तरी मतदारांचा पूर्ण भ्रमनिरास झाला आहे अशी स्थिती नाही . अन्यथा मनसे सारख्या नवीन पर्यायाकडे मतदार मोठया प्रमाणात वळले असते. फुफाट्यातून आगीत पडणार नाही अशी सावधानता मतदारांनी घेतलेली दिसते. पण अन्य पक्ष सुधारणार नसतील तर मनसे सारख्या नवीन पक्षाला समर्थन द्यायला आम्ही मागे पुढे पाहणार नाही असा सूचक इशारा सर्वाना मिळण्या इतपत मतदारांनी मनसे चे समर्थन केले आहे , पण मनसे वर विश्वास टाकला नाही . याचा अर्थ मतदारांनी मतदान विचारपूर्वक,जाणीवपूर्वक आणि मुत्सद्दीपणे करून सर्वच राजकीय मुत्सद्द्याना धोबीपछाड दिली आहे. याचा दुसरा अर्थ असा आहे की मतदान पैशाने प्रभावित झालेले नाही. निवडणुकीत पैशाचा आणि दारूचा महापूर आला होता हे खरे , पण त्यामुळे मतदान प्रभावित झाले असे मानने सुद्न्य मतदारांचा अवमान आहे. दारू आणि पैशाने मतदान प्रभावित झाले असते तर मतदाराच्या निर्णयात दिसणारी एकसूत्रता आणि एक दिशा दिसली नसती. शहरी आणि ग्रामीण भागातील मतदाराच्या निर्णयात एकसूत्रता असण्याचे दुसरे महत्वाचे कारण म्हणजे दोन्ही भागातील उत्पादक शक्तींचा प्रामुख्याने असलेला मतदानातील सहभाग आणि उत्साह आहे. सरकारी किंवा निमसरकारी निर्णयाचा परिणाम आणि फटका ज्या वर्गाना बसतो त्या वर्गाचा मतदानात मोठा आणि महत्वाचा सहभाग असल्याने मतदारांनी व्यावहारिक निर्णय घेतला आहे. मतदारांचा निर्णय आदर्श सदरात मोडत नाही कारण त्याच्या समोर आदर्श पर्याय नाहीत. पण आदर्श पर्याय नाहीत म्हणून अतिशिक्षित, श्रीमंत आणि सुस्थितीत असलेल्या मतदारासारखे मतदान न करण्याचे लोकशाही द्रोही वर्तन सर्व सामान्य मतदारांनी केले नाही ही अभिमानाची बाब मानली पाहिजे. भद्र्लोकांच्या लोकशाही द्रोही वर्तनाबद्दल आणि या वर्तनाला वेसण घालण्याच्या उपाया बद्दल स्वतंत्रपणे दुसऱ्या लेखात विचार करू. या लेखात निवडणुकीनंतर निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीचा विचार करू.

नवा सितारा आणि तारा

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकीने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि त्या पक्षात उप मुख्यमंत्री अजित पवार यांना बळ दिले असले तरी हे निवडणुकीच्या रिंगणातील तरबेज खेळाडू आहे. त्यांनी इतरावर मात करण्यात काहीच नाविन्य नाही. उलट त्यांना असे यश मिळाले नसते तर तो चर्चेचा विषय राहिला असता. या विजयाचे काहीसे श्रेय राष्ट्रवादीच्या साधन संपन्नतेला जात असले तरी पक्षाचा नेता म्हणून अजित पवारांनी दाखविलेली आक्रमकता आणि कार्यकर्त्यांना कार्यप्रवण करण्याची त्यांची ताकद आणि जोडीला काम करणारा नेता अशी उभी करण्यात आलेली त्यांची प्रतिमा याला या विजयाचे अधिक श्रेय द्यावे लागेल. नेमके असेच गुण आणि अशीच प्रतिमा राज ठाकरे यांची असल्याने त्यांना स्वत:ला अपेक्षित असलेले यश मिळाले नसले तरी डोळ्यात भरण्याजोगे यश नक्कीच मिळाले आहे. राज ठाकरे हे माध्यमात प्रिय म्हणण्या पेक्षा माध्यमावर दरारा ठेवणारे व्यक्तिमत्व असल्याने त्यांच्या यशात माध्यमांचा वाटा नाकारणे हे माध्यमांच्या भित्रेपणाला नाकारण्या सारखे होईल! माध्यमांनी जसे अण्णा हजारे यांची प्रतिगांधी म्हणून लोकांमध्ये प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न केला तसाच प्रति शिवसेना प्रमुख म्हणून राज ठाकरे यांची प्रतिमा लोकांसमोर उभी करण्यात कोणतीच कसर ठेवली नाही. अन्यथा कोणतेही राजकीय तत्वज्ञान नसणारी आणि कोणताही आर्थिक, राजकीय किंवा सामाजिक कार्यक्रम नसणारी नवी संघटना सशक्त राजकीय पक्ष म्हणून समोर येणे कठीण होते. राजकीय तत्वज्ञान आणि पक्ष बांधणी नसताना एक शक्ती म्हणून मनसे पुढे येण्याचे दुसरे महत्वाचे कारण म्हणजे राज ठाकरे यांनी कायदा हाती घेण्याची वा मनात येईल तेव्हा कायदा मोडण्याची उचललेली शिवसेना शैली हे आहे. राज यांची नकलाकार म्हणून ख्याती आहे. शिवसेना प्रमुखाची हुबेहूब नक्कल करण्यात ते पारंगत आहेत. त्यांच्या लोकप्रिय भाषण शैलीचे हेच खरे भांडवल आहे. पण मनसे चे सामर्थ्य या नकलेत दडलेले नाही. कायदा हाती घेण्याची आणि कायदा मोडण्याची शिवसेनेची नक्कल हेच त्यांचे सामर्थ्य आहे. नकलेतील अक्कल हुशारी ही आहे. नक्कल करायला अक्कल लागते हा सार्थ अभिमान राज यांना वाटतो ते या नकलेतून उभा राहिलेल्या सामर्थ्याने! कायदा हाती घेण्याच्या जुन्या शिवसेना शैलीचे राज स्व बळावर पुनरुज्जीवन करू शकले असे मानणे मात्र भाबडे पणाचे ठरेल. या पुनरुज्जीवनाला बळ आणि अभय आबा पाटलांच्या मुंबई पोलिसांनी दिले शिवसेनेच्या खच्चीकरनासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या राज्यकर्त्यांनी कायदा मोडण्याचे राज उद्योग चालू देण्यात पोलीस अडथळा आणणार नाहीत याची पुरेपूर काळजी घेतली हे विसरून चालणार नाही. राज मनात येईल ते करू शकतात हा दबदबा आणि प्रतिमा निर्मितीचे श्रेय राज्य सरकार आणि माध्यमे यांना संयुक्तपणे जाते ते याच मुळे. या प्रतिमेचे बळ आणि फळ या निवडणुकीत राज यांना लाभून राज व त्यांची मनसे नवा सितारा म्हणून पुढे आले आहेत. एखाद्या सीताऱ्या जवळ जो तामझाम असतो तो राज जवळ असल्याने साहजिकच सगळा प्रकाश झोत आपल्यावर खेचण्यात राज यशस्वी झाले आहे. असे असले तरी या निवडणुकांच्या परिणामी खऱ्या अर्थाने यशस्वी तारा म्हणून उद्धव ठाकरे यांचा महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर उदय झाला हे मान्य करावे लागेल . पण माध्यमे एखाद्या व्यक्तीत ग्लैमर निर्माण करून त्या द्वारे आपला दर्शक वा वाचक वाढविण्याच्या खेळ खेळत असल्याने या उदयमान ताऱ्याकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नसावा. या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व तावून सलाखून दमदार बनले आहे इकडे माध्यमांनी दुर्लक्ष केले आहे. शिवसेना प्रमुखाचा वारसा उद्धव नाही तर राज चालवू शकतात हीच महाराष्ट्रातील आणि माध्यमातील सार्वत्रिक चर्चा व विश्वास होता.गेल्या विधानसभा निवडणूक निकालाने या चर्चेला बळ मिळाले होते. राज पुढे येण्याचे वातावरण या चर्चेतून तयार झाले होते. पुत्रप्रेमापोटी शिवसेना प्रमुखाने चुकीचा वारस निवडला असा ठपका देखील शिवसेना प्रमुखावर ठेवला गेला होता. मात्र या निवडणूक निकालाने प्रथमच शिवसेना प्रमुखाचा निर्णय चुकीचा नव्हता हे सिद्ध केले आहे. उद्धव यांच्यात नक्कल करण्याची अक्कल नसणे हेच उद्धवच्या आणि शिवसेनेच्या पथ्यावर पडलेले दिसते. शिवसेनेला राडा संस्कृतीतून बाहेर काढून खऱ्या अर्थाने लोकांच्या समस्या जाणणारा व सोडवणारा गंभीर राजकीय पक्ष बनविण्याच्या इराद्याने शिवसेना प्रमुखांनी राज ऐवजी उद्धव यांना वारस निवडला असावा . कारण राज यांनी मनसे ज्या पद्धतीने उभी केली आणि चालविली तो प्रकार शिवसेनेचा भूतकाळ पुनरुज्जीवित करणारा आहे. त्यानंतर पुलावरून बरेच पाणी वाहून गेले आहे. त्यामुळे आपली नक्कल करणारे नेतृत्व नको तर आपल्याही पुढे शिवसेनेला घेवून जाणारे नेतृत्व हवे असा विचार शिवसेना प्रमुखांनी केला असेल तर तो चुकीचा म्हणता येणार नाही. शिवसेना प्रमुखाने काय विचार केला या संबंधीचे तर्क बाजूला ठेवले तरी दलित विरोधी , पर प्रांतीय पर धर्मीय अशा द्वेषाच्या पायावर उभ्या असलेल्या शिवसेनेला उद्धवने सामंजस्याचा मंत्र देवून शिवसेनेला नवे रूप देण्याचा प्रयत्न केला हे मानावे लागेल. राडा संस्कृती अंगात भिनलेल्या शिवसेनेला प्रारंभी उद्धवचा सुसंस्कृत प्रयत्न न भावल्याने प्रारंभी शिवसेनेची पिछेहाट झाली. पण अशी पिछेहाट झाली म्हणून घाबरून व बावरून न जाता आणि माघारी न वळता शिवसेनेला व्यापक पायावर उभा करण्याचा प्रयत्न पुढे नेण्याची चिकाटी , जिद्द आणि धाडस उद्धवने दाखविले आणि बाळासाहेबांची निवड चुकली नसल्याचे दाखवून दिले आहे. शिवसेनेला पूर्वीही ग्रामीण आधार होता . पण त्या आधाराचा पाया मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरातून तयार झालेला सवर्णांचा दलित द्वेष होता. उद्धवने दलित द्वेषा ऐवजी शेतकऱ्यांच्या प्रश्नाशी शिवसेनेची नाळ जोडण्याचा प्रयत्न केला. शेतीत सर्वस्व गमावून मुंबईत दाखल होणारे शेतकऱ्यांचे लोंढे शिवसेनेला फायदेशीर ठरले असण्याची शक्यता म्हणूनच नाकारता येत नाही. राज चे लक्ष आणि लक्ष्य उत्तरेतील लोंढ्याकडे राहिले आहे ,पण उद्धव मुंबई बाहेर जास्त फिरल्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे लोंढे मुंबईत येतात याची जाण आल्याने बाहेरील लोंढ्या बाबत उद्धवची भूमिका सौम्य झाली आणि ती शिवसेनेला फायदेशीर राहिली याचे अनुमान मुंबईच्या निवडणूक निकाला वरून काढता येते. उद्धवची समजच नाही तर आत्मविश्वासही वाढल्याचे ताजा घटनाक्रम दर्शवितो. राज आणि उद्धव यांनी एकत्र यावे हे सेना प्रमुखांचे उदगार मुंबई पालिकेच्या निवडणुकीत त्यांचाही आत्म विश्वास डळमळीत झाल्याचे दर्शवितात. पण त्या परिस्थितीतही उद्धवने एकत्र येण्यास ठाम नकार देवून आपल्यातील आत्मविश्वासाचे दर्शन घडविले. विधानसभा निवडणुकीत भाजपच्या मागे पडण्याची नामुष्की पदरी पडलेल्या शिवसेनेला या निवडणुकीत उद्धवने पुन्हा भाजप च्या पुढे नेले आहे. महानगर पालिकेच्या निवडणुकीतील यशाचे मोठे श्रेय शिवसेना प्रमुखाकडे जात असले तरी जि.प.-पंचायत समितीतील शिवसेनेचे यश निखळ उद्धवचे आहे हे मान्य करावे लागेल. पण भारतातील हे यश इंडियाची माध्यमे मोजायलाच तयार नाहीत! उद्धवच्या नेतृत्वाखाली शिवसेना लगेच धर्म निरपेक्ष होईल आणि जात , प्रांत याचा भेदभाव न मानता आर्थिक प्रश्नावर लक्ष केंद्रित करील असे मानने भाबडेपणाचे होईल. पण त्या दिशेने शिवसेनेला एक पाऊल पुढे नेण्याची ताकद या निवडणुकीने उद्धवला दिली आहे. या दिशेने पुढे जाण्याशिवाय उद्धव समोर पर्यायही नाही. उद्धवने शिवसेनेला परत पूर्वीच्या वळणावर न्यायचे ठरविले तर मात्र शिवसेनेला उद्धवच्या नाही तर राज च्या नेतृत्वाची गरज भासेल ! शिवसेनेला अशा निर्णायक वळणावर या निवडणुकीने आणून सोडले आहे हेच या निवडणूक निकालाचे वैशिष्ठ्य आहे. या निवडणुकीने राज आणि उद्धव हे दोन नव्या दमाचे नेते महाराष्ट्राला दिले असले तरी कॉंग्रेस आणि भाजप या जुन्या पक्षांमध्ये मात्र नेतृत्वाचे मोठे संकट असल्याची जाणीवही करून दिली आहे. या संकटावर मात केल्या शिवाय पुढच्या निवडणुका जिंकणे कठीण असल्याचा इशारा मतदारांनी या पक्षांच्या जुन्या खोडांना दिला आहे. अण्णा आंदोलनाची पार्श्वभूमी लाभलेल्या या निवडणुकीमध्ये अण्णांच्या निशाण्यावर नंबर एकवर असलेल्या शरद पवारांच्या पक्षाला पंचायत समिती ,जिल्हा परिषद,नगर पालिका आणि महानगर पालिका या सर्व स्तरावर नंबर एक चा पक्ष म्हणून जनतेने शिक्का मोर्तब केले आहे तर महानगराधारित अण्णा आंदोलनाचा मुखर आणि प्रखर विरोध करणाऱ्या शिवसेनेचा झेंडा मुंबई-ठाणे सारख्या महानगरावर डौलाने फडकणार आहे ! अण्णा आंदोलनालाही मंथन आणि चिंतन करण्यास महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीने बाध्य केले आहे. मतदारांनी विचारपूर्वक मतदान करून सर्वांनाच विचार करायला भाग पाडले हीच मतदारांच्या परिपक्वतेची निशाणी आहे.

(समाप्त)

सुधाकर जाधव
मोबाईल-९४२२१६८१५८
पांढरकवडा ,
जि.यवतमाळ

No comments:

Post a Comment