Sunday, April 27, 2014

'थंब रूल' च्या आधारे केलेले निवडणूक निकालाचे भाकीत

निवडणूक निकालाचे अंदाज बांधताना खालील गोष्टी लक्षात घेतल्या आहेत.

जमिनीवरील  वास्तव :
-------------------------
कॉंग्रेससाठी प्रतिकूल स्थिती , भाजपसाठी अनुकुलता आणि आम आदमी पार्टी बद्दल कुतूहल.
 
लाट आहे का? त्याचा भाजपला कितपत लाभ होईल ? :
-----------------------------------------------------------
कॉंग्रेस बद्दल नाराजीची लाट आहे. नव्या मतदारात - युवकात - मोदींची लाट आहे. गुजरात,राजस्थान , उत्तरप्रदेश ,बिहार मध्ये भाजपसाठी अनुकुलता वाढली आहे. इतर राज्यात जिथे भाजपची संघटनात्मक स्थिती चांगली आहे तिथे कॉंग्रेस विरोधी वातावरणाचा लाभ भाजपला मिळेल. दक्षिणेत आणि पूर्वोत्तर राज्यात भाजपच्या मताची टक्केवारी वाढली तरी जागांचा फार लाभ होणार नाही. भाजपला कॉंग्रेसच्या गडात मुसंडी मारणे जितके सोपे जाणार आहे , तितकेच अन्य पक्षांच्या बालेकिल्ल्यात मुसंडी मारणे कठीण जाणार आहे. तात्पर्य , देशभर मोदींची लाट नाही , पण अनुकूल परिस्थिती आहे.
आम आदमी पार्टी आणि प्रादेशिक पक्ष :
------------------------------------------

 आम आदमी पार्टी आणि भाजपने एकमेकांना यशस्वीपणे शह आणि काटशह दिला आहे. राजकीय पक्ष म्हणून आम आदमी पार्टीच्या विश्वासार्हतेवर मतदारांच्या मनात शंका-कुशंका निर्माण करण्यात भाजपचा प्रचार यशस्वी ठरला आहे. तर मोदींची देशव्यापी लाट निर्माण होवू न देण्यात आम आदमी पार्टी यशस्वी ठरली आहे. मोदींकडे जावू शकणारी मते आपल्याकडे थांबवून ठेवण्यात आम आदमी पार्टी यशस्वी ठरली आहे. बंगाल आणि दक्षिणेतील राज्यात तेथील प्रादेशिक पक्षांच्या स्थितीत आम आदमी पार्टी आणि भाजप यांच्यामुळे काहीही फरक पडणार नाही. भाजप समर्थित प्रादेशिक पक्षाला २-४ जागांचा लाभ मिळेल इतकेच.

उ.प्र. आणि बिहार :
---------------------
भाजप सत्तेत येण्यासाठी किंवा २०० चा आकडा पार करण्यासाठी या दोन राज्यावर अवलंबून  असल्याने ही राज्ये निर्णायक महत्वाची आहेत. या दोन्ही राज्यात भाजपला अनुकुलता वाढली असली तरी अपेक्षित यश मिळण्यासारखी परिस्थिती नाही. मायावती आणि मुलायमसिंग यांच्या पक्षांना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत प्रत्येकी किमान १५ ते २० जागा मिळू शकतात ही परिस्थिती बदलण्यात भाजपला यश आलेले नाही. मोदींच्या वाढत्या प्रभावाने अल्पसंख्यांकवर्गात निर्माण झालेल्या भीतीने मोदी विरोधी लाट आकार घेवू लागल्याने उ.प्र. व बिहार राज्यात भाजपच्या जागा वाढल्या तरी एकतर्फी विजयाची आशा मावळली आहे. उ.प्र. मध्ये कॉंग्रेस आणि समाजवादी पार्टीच्या जागेत घट झाली तरी बसपा, समाजवादी आणि कॉंग्रेस पक्ष मिळून
३० ते ४० जागा मिळविण्याच्या स्थिती आहेत.

बिहार मध्ये तर लालूप्रसाद यादव आणि कॉंग्रेसच्या युतीला अनुकूल वातावरण तयार झाले. मोदी आणि लालू यांच्यामध्ये नितीशकुमार भरडले जातील , पण याचा फायदा मोदिंपेक्षा लालुना अधिक होणार आहे. तिथेही भाजपला निम्म्या पेक्षा अधिक जागा मिळण्याची स्थिती नाही.

इतर राज्ये :
------------
आत्ताच ज्या चार राज्यात विधानसभा निवडणुका झाल्यात त्या राज्यातील ट्रेंड तसाच राहील. गुजरात मध्ये लाभात वाढ होईल. येडीयुरप्पा परतल्याने कर्नाटकात भाजप आपली स्थिती टिकवून ठेवेल. आंध्र, तेलंगाना, तामिळनाडू आणि प. बंगाल इथे अत्यल्प लाभ भाजपला मिळेल. २००९ च्या तुलनेत दिल्ली, पंजाब ,हरियाणा राज्यात भाजप चांगल्या स्थितीत राहील. पण 'आप'मुळे भरघोस लाभात कपात होणार आहे.
 
महाराष्ट्र :
-----------
उ.प्र. खालोखाल महारष्ट्रात लोकसभेच्या अधिक जागा असल्याने महाराष्ट्राचे विशेष महत्व आहे. इथे झालेल्या चुरशीच्या लढतीने भाजप आणि बुद्धिवंतांचा मोदीलाटेचा भ्रम तुटला. हा भ्रम तुटल्यानेच भाजपमध्ये अस्वस्थता वाढली आहे. इथून फार घबाड हाती लागण्याची भाजपची आशा मावळली असली तरी पूर्वीपेक्षा अधिक जागा भाजपला मिळणार आहे. महाराष्ट्रात भाजप-शिवसेना आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी समसमान जागा मिळवू शकण्याच्या स्थितीत आहे. राजू शेट्टीच्या दोन जागांची भाजपच्या बेरजेत भर पडू शकते. एकूणच महाराष्ट्रातील स्थिती उन्नीस-बीस म्हणतात तशी राहील.
या आधारे  भारतीय जनता पक्ष आणि त्याच्या मित्रपक्षाच्या  जागांचे गणित तयार होते ते असे :
----------------------------------------------------------------------------------------------

गोवा   १०० % जागा                                         = ०२
गुजरात, राजस्थान या दोन राज्यात ४/५ जागा  =   ४०
मध्यप्रदेश , छत्तीसगड      २/३ जागा            =    २६
उ.प्र.,बिहार , महाराष्ट्र ,झारखंड, ५० % जागा  =    ९२
दिल्ली, पंजाब ,हरियाणा ,हि.प्र. ५० %जागा       =  १७
दक्षिणेकडील राज्ये मिळून एकूण जागा             = २०
आसाम , बंगाल आणि पूर्वोत्तर राज्ये मिळून    =   १०
ओरिसा ,जम्मू , केंद्रशासित प्रदेश मिळून         =    ०५
इतर                                                                 =  ०५
------------------------------------------------------------
                                      total                     = 217
-------------------------------------------------------

भाजप +                                                  = २१७
adjust error   - १० % / + १० %                = २०५  ते २३०
-------------------------------------------------------------------
यातील अधिकतम आकडा धरला तरी भाजप आणि मित्र पक्ष  २३० जागा पटकावतील . आता हा आकडा क्रॉस चेक करण्यासाठी कॉंग्रेसला मिळणाऱ्या किंवा कमी होणाऱ्या
जागांचा विचार करू.कारण कॉंग्रेसच्या कमी होणाऱ्या बहुतांश जागा भाजपच्या झोळीत
पडणार आहेत.
 
कॉंग्रेसची स्थिती :
--------------------
 २००४ च्या तुलनेत २००९ साली कॉंग्रेसच्या जागांमध्ये शहरी भागातील यशाने वाढ झाली होती.
या निवडणुकीत असे ९० टक्के मतदार संघ कॉंग्रेसच्या हातून जातील . यातील ९० टक्के भाजपला तर १० टक्के 'आप'ला मिळतील. २००९ साली राजस्थान आणि आंध्रात मिळालेले यश धुवून जाईल. महाराष्ट्रासह बहुतेक राज्यात कॉंग्रेसच्या जागा कमी होतील. फक्त तेलंगाना आणि बिहार या दोनच राज्यात कॉंग्रेसची स्थिती सुधारणार आहे. २००९ साली कॉंग्रेसच्या जागा ६० ने वाढल्या होत्या. मध्यमवर्गीय मतदार कॉंग्रेसच्या सरसकट विरोधात गेल्याने यातील किमान ५० जागा कमी होणार आहेत. राजस्थान आणि आंध्र मिळूनच कॉंग्रेसच्या २५-३० जागा कमी होणार आहेत. इतर ठिकाणच्या थोड्या थोड्या कमी होणाऱ्या जागा लक्षात घेतल्या तर आणखी २० जागांचा कॉंग्रेसला फटका बसू शकतो.म्हणजे कॉंग्रेसला २००९ साली मिळालेल्या २०६ जागात ही सरळ सरळ १०० जागांची घट आहे. म्हणजे कॉंग्रेस जवळ शिल्लक राहतात १०६ जागा . यात बिहार आणि तेलंगणाची १० -१५ जागांची भर पडेल असे मानले तरी हा आकडा १२०च्यावर जात नाही. यात १० % प्लस -मायनस केले तर कॉंग्रेसला ११० ते १३० पर्यंत जागा मिळतील असा अंदाज बांधता येतो. भाजपच्या खात्यात कॉंग्रेसच्या सुमारे ७५ जागा जमा होणार आहेत.याशिवाय भाजप फक्त मुलायमसिंग व मायावती यांच्या काही जागा आपल्या पदरात पाडू शकते. म्हणजे आजच्या पेक्षा ९० ते १०० जागा भाजपला अधिक मिळून २१० च्या घरात भाजप जाईल. भाजपचे
मित्रपक्ष यात २० ची भर टाकतील. म्हणजे आधी भाजप आणि मित्रपक्ष यांना किती जागा मिळतील याच्या बांधलेल्या अंदाजाशी हा अंदाज जुळतो.
निष्कर्ष :
---------
लोकसभा त्रिशंकूच असणार आहे. मात्र कॉंग्रेसला सरकार बनविण्याची संधी मिळणार नाही. तिसऱ्या आघाडी पेक्षा भाजपचे सरकार बनण्याची शक्यता जास्त आहे. मात्र भाजपचे सरकार बनले तरी मोदी पंतप्रधान होतील कि नाही याचा निर्णय ममता आणि जयललिता घेतील !आम आदमी पार्टीची सरकार बनविण्यात कोणतीही भूमिका असणार नाही. या पक्षाला बोटावर मोजण्या इतक्याच जागा मिळतील पण मताच्या टक्केवारीत भाजप,कॉंग्रेस नंतर आम आदमी पार्टीचा क्रमांक लागेल आणि हा पक्ष मान्यताप्राप्त राष्ट्रीय पक्ष बनेल.
------------------------------------------
टीप : यात 'अल निनो' घटक  , जसे रामदेव बाबाचे दलितांना दुखाविणारे बयान, रामदास कदमांनी मुस्लिमांना घातलेली भीती ,गुजराती-मराठी वाद, याचा विचार केला नाही. रामदेवबाबाच्या वक्तव्याचा बिहार,उ.प्र. मध्ये भाजपला चांगलाच तोटा होवू शकतो. या शक्यता लक्षात घेतल्या तर वर केलेल्या अंदाजापेक्षा भाजपच्या जागा कमी होवू शकतात. त्यांच्या अंदाजित जागात वाढ करतील असे नवे घटक सध्यातरी दृष्टीपथात नाहीत. निकषाच्या आधारे आकडेमोड करण्यात माझी काही चूक झाली असेल तर त्यात वाचकांनी दुरुस्ती करून घ्यावी ! नजरचुकीने एखादा आकडा सुटला असेल तर तो मांडून गणित दुरुस्त करून घ्यावे !
-------------------------------------------------
sudhakar jadhav
-------------------------------------------------
 





 
 
 

 
 
 
 
 


 

No comments:

Post a Comment