Thursday, October 7, 2021

कात टाकण्याची कॉंग्रेसी धडपड !

आव्हान देण्याची क्षमता नसलेल्या ग्रुपच्या मागणीला आव्हान समजावे लागले हे गांधी परिवाराची कॉंग्रेसवरील पकड कमी झाल्याचे लक्षण आहे. कॉंग्रेसला गांधी परीवाराशिवाय तरणोपाय नाही हे खरे पण निष्क्रिय किंवा अर्ध सक्रीय गांधी परिवार हा कॉंग्रेससाठी जास्त घातक आहे.  
------------------------------------------------------------------------------

२०१४ साली कॉंग्रेसचा दारूण पराभव झाला. त्या पराभवाचे विश्लेषण आणि चिंतन करण्याची गरज कॉंग्रेसला कधी वाटली नाही. गेलेली सत्ता परत मिळविण्यासाठी लोकांचे प्रश्न हाती घेवून सरकारशी संघर्ष केला पाहिजे याचीही गरज कॉंग्रेसला कधी वाटली नाही. चिंतन, विश्लेषण, संघर्ष हे शब्दच २०१४ साल येईपर्यंत कॉंग्रेसच्या शब्दकोशातून गायब झाले होते. आघाडी सरकारच्या अपयशामुळे कॉंग्रेसला पर्याय नाही हा भ्रम कॉंग्रेस नेत्यात आणि कार्यकर्त्यात दृढ झाला होता. २०१४ सालच्या सार्वत्रिक निवडणुकीतील पराभवाच्या जबरदस्त फटक्याने देखील काँग्रेसीचा हा भ्रम तुटला नाही. मोदी सरकारच्या ज्या ज्या निर्णयाने आणि धोरणाने जनतेला नागवले, अडचणीत टाकले त्या विरुद्ध कॉंग्रेसने पत्रकार परिषदेत आणि सोशल मेडीयावर विरोधाचे चार शब्द बोलण्या पलीकडे काहीही केले नाही. मोदींना निवडून देण्याचा मूर्खपणा जनतेने केला आहे तेव्हा भोगा आपल्या कर्माची फळे अशीच कॉंग्रेसजनांची भावना होती.                    

मोदी धोरणाने लोकांची ससेहोलपट वाढली की लोक जातील कुठे. कॉंग्रेसकडे येण्याशिवाय त्यांच्याकडे पर्यायच असणार नाही हा नवा भ्रम २०१४ नंतर पाचही वर्ष कॉंग्रेसजनानी जोपासला. त्यामुळे लोकात जाणे, नाही संघर्ष तर किमान लोकांशी चर्चा करणे, संवाद साधने आणि त्यातून लोकसंपर्क वाढविणे, संघटन मजबूत करणे यापैकी कॉंग्रेसने काहीही केले नाही. मोदींच्या धोरणांनी निराश होवून लोक आपल्याकडे परतण्याची वाट बघत बसले. कॉंग्रेस अस्तित्वात आहे कि नाही असा प्रश्न लोकांना पडावा अशी स्थिती काँग्रेसनी स्वत:ची करून घेतली. २०१४ साल उजाडेपर्यंत १५ वर्षे गुजरातचे मुख्यमंत्री राहिलेले नरेंद्र मोदी कधी भारतीय जनता पक्षाला पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी देखील योग्य वाटले नव्हते त्या मोदींना देशात पर्याय आहे कुठे असे वातावरण कॉंग्रेसजनांच्या सुस्तीने आणि निष्क्रियतेने निर्माण केले. प्रादेशिक पक्षांच्या नेत्याकडे पर्याय म्हणून पाहण्याची पाळी कॉंग्रेसने आपल्या वर्तनाने आणली. यात नेते आणि कार्यकर्ते सारखेच दोषी आहेत.                                                                

दीर्घकाळ सत्ता उपभोगल्याने आलेल्या आत्मतुष्टी आणि सुस्तीने समाजात आपल्याच आर्थिक धोरणाने होत असलेली स्थित्यंतरे आणि लोकांच्या बदललेल्या, वाढलेल्या आकांक्षा न कळण्या इतपत कॉंग्रेस बधीर झाली होती. ज्या आर्थिक धोरणाचा पाया नरसिंहराव प्रधानमंत्री आणि मनमोहनसिंग अर्थमंत्री असताना घातल्या गेला त्यावर मनमोहनसिंग यांच्या प्रधानमंत्री काळात भव्य इमारत उभी राहिली. मोठ्या संख्येने लोक गरीबीरेषा पार करून मध्यमवर्गीय, उच्चमध्यमवर्गीय बनले. तरुणांसाठी नवनवीन क्षेत्रे खुली झालीत. आणि हा सगळा मध्यम आणि उच्चमध्यम वर्ग आणि अख्खी तरुणाई २०१४ मध्ये मोदी आणि भाजपाच्या मागे उभी राहिली ! आपली उपलब्धी लोकांपुढे ठेवण्या इतके, हे साध्य करताना भ्रष्टाचाराचे, अनियमिततेचे जे आरोप झालेत त्याला उत्तर देण्याइतकेही चैतन्य कॉंग्रेसमध्ये न उरल्याचा हा परिणाम होता.        

लोक बदललेत, समाज बदलला आणि बऱ्याचअंशी यासाठी कॉंग्रेसची धोरणे कारणीभूत असणारी कॉंग्रेस मात्र अजिबात बदलली नाही. सरंजामी, आत्ममग्न, आत्मसंतुष्ट, विचारहीन आणि लोकांना चीड येईल अशी हायकमांड भोवती लाळघोटेपणा करणाऱ्या कॉंग्रेसचा लोकांना उबग आला आहे आणि हा उबग दूर करण्यासाठी आपल्याला बदलले पाहिजे हे कॉंग्रेसजनांच्या गांवीही नव्हते. हातची सत्ता गेल्यावर देखील कॉंग्रेस सुस्त आणि शांत होती. बदलाचा मागमुगुस कुठेच दिसला नाही. त्यामुळे २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत कॉंग्रेसला दुसरा दणका बसला ! या दणक्याने कॉंग्रेस अधिक विस्कळीत व निर्नायकी झाली. ही निर्नायकी संपली नाही तर कॉंग्रेस संपेल याचे भान आता कुठे कॉंग्रेसजनाना येवू लागल्याची लक्षणे दिसू लागली आहेत. अनेक वर्षे सत्तेची पदे उपभोगलेली आणि जी – २३ ग्रुप म्हणून पुढे आलेल्या कॉंग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडला प्रश्न विचारायचे नाहीत या काँग्रेसी परंपरेला सोडचिट्ठी देत कॉंग्रेसच्या आजच्या अवस्थेवर आणि हायकमांडच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करण्याचे धाडस करून कॉंग्रेस मधील बदलाची चर्चा सुरु केली आहे.

जी – २३ ग्रुपचे नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोणत्याही नेत्याने कॉंग्रेसचे नेतृत्व करण्याची क्षमता असल्याचे कार्य करून दाखविलेले नाही. त्यांच्यापैकी कोणामागे बहुसंख्य काँग्रेसजन उभे राहतील अशीही शक्यता नाही. यापैकी अनेकांचा आपल्या मतदारसंघा बाहेर फारसा प्रभाव नाही. काहींचा तर स्वत:चा म्हणावा असा मतदार संघही नाही. अनेक वर्षे सत्तेत असल्याने ते लोकांना माहित आहेत इतकेच. म्हणूनच ते जे म्हणतात त्याची कॉंग्रेसमध्ये  आणि कॉंग्रेस बाहेरही चर्चा होत आहे. पण तेवढ्याने जी – २३ ग्रुपच्या नेत्यांनी हायकमांडला आव्हान दिल्याचे जे चित्र रंगविले जात आहे ते तितकेसे खरे नाही. कारण तसे आव्हान देण्याच्या क्षमतेचा हा ग्रुप नाही. मात्र या ग्रुपने महत्वाचा मुद्दा उपस्थित करून कॉंग्रेस हायकमांड म्हणजे गांधी परिवाराला अडचणीत आणले आहे. कॉंग्रेसच्या आजच्या स्थितीत कॉंग्रेसला पूर्ण वेळ अध्यक्ष असू नये ही खरोखरच लाजिरवाणी स्थिती आहे. गांधी परिवारातील कोणी अध्यक्ष व्हायला या ग्रुपने विरोध केलेला नाही. पण तुमच्या पैकी कोणाला व्हायचे नसेल तर दुसऱ्याला होवू द्या पण कॉंग्रेस मधील निर्नायकी संपवा ही त्यांची सरळ मागणी आहे. आजवर या शब्दात गांधी परिवाराला सुनावण्याची कोणी हिम्मत केली नव्हती. म्हणून गांधी परिवार आणि त्यांचे समर्थक या मागणीला आव्हान समजू लागले आहेत.                                         

आव्हान देण्याची क्षमता नसलेल्या ग्रुपच्या मागणीला आव्हान समजावे लागले हे गांधी परिवाराची कॉंग्रेसवरील पकड कमी झाल्याचे लक्षण आहे. कॉंग्रेसला गांधी परीवाराशिवाय तरणोपाय नाही हे खरे पण निष्क्रिय गांधी परिवार हा कॉंग्रेससाठी जास्त घातक आहे. कॉंग्रेस वरील पकड कायम ठेवण्यासाठी अधिक सक्रीय झाले पाहिजे, आपला अधिकार दाखवून दिला पाहिजे हे आज गांधी परिवाराला वाटू लागले आहे याचे बरेचसे श्रेय या जी २३ ग्रुपला दिले पाहिजे. अधिकार दाखविण्याच्या निकडीतून पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांची हकालपट्टी झाली. आजवर गांधी परिवाराला कॉंग्रेस वरील आपल्या अधिकारा विषयी शंका नव्हती किंवा तो दाखवून देण्यासाठी एखाद्या कृतीची गरज वाटली नव्हती. आज ती वाटते आहे याचाच अर्थ आज गांधी परिवाराला आपल्या नेतृत्वाबद्दल असुरक्षितता वाटते आहे. आव्हान मिळाल्या सारखे वाटते आहे. त्यामुळे गांधी परिवाराला कॉंग्रेस मधील आपली अपरिहार्यता दाखवून देण्यासाठी कृतीशील व्हावे लागणार आहे. गांधी परिवार कृतीशील झाल्याशिवाय कॉंग्रेस कृतीशील होणार नाही हे कटू असले तरी सत्य आहे. आणि म्हणूनच राहुल गांधी आणि प्रियंका यांची आजची सक्रियता कॉंग्रेसला कात टाकण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.
-------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव
पांढरकवडा जि. यवतमाळ
मोबाईल – ९४२२१६८१५८

  

No comments:

Post a Comment