Wednesday, January 4, 2023

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - ३७

१९८३च्या जम्मू-काश्मीर विधानसभा  निवडणुकीत मतदारांचे हिंदू-मुस्लीम असे मोठ्या प्रमाणावर ध्रुवीकरण होवूनही जम्मूत भाजपला तर काश्मीर घाटीत जमात-ए-इस्लामीला खाते उघडता आले नाही हे या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हंटले पाहिजे.
----------------------------------------------------------------------------------------

काश्मीर विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसच्या वतीने प्रचाराची कमान दस्तुरखुद्द प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी आपल्या हाती घेतली होती. केंद्रातील सत्ताधारी पक्ष व राज्यातील सत्ताधारी पक्ष एकमेकांविरुद्ध लढत असलेली ही दुसरी निवडणूक होती. १९७७ सालची काश्मिरातील निवडणूक शेख अब्दुल्ला विरुद्ध इतर सर्व अशी लढवली गेली होती. त्यापूर्वी जम्मू-काश्मिरात झालेल्या निवडणुकांमध्ये केंद्रीय सत्ता आणि राज्यातील सत्ता यांची उघड किंवा छुपी हातमिळवणी झालेली असायची. काश्मीरी जनतेच्या  स्वयंनिर्णयाच्या अधिकाराची मागणी करणारे पक्ष व गट निवडणुकीत विजयी होणार नाहीत याची काळजी या हातमिळवणीतून घेतली जायची. १९७७ पूर्वीच्या निवडणुका मुक्त आणि निष्पक्ष झाल्या यावर विविध देश विश्वास ठेवायला तयार नव्हते. मात्र १९७७ ची काश्मीर विधानसभेची निवडणूक मुक्त वातावरणात झाली याबाबतीत देश-विदेशात मतभेद नव्हते. अर्थात याला पाकिस्तान अपवाद होताच. मुक्त वातावरणात निवडणूक झाली हे मान्य केले तर निवडणूक निकालाने काश्मीरवरचा पाकिस्तानचा दावा कमजोर असल्याचे सिद्ध झाले असते. १९७७च्या निवडणुकी प्रमाणेच १९८३ची निवडणूक लढविली गेली. राज्यातील सत्ताधारी पक्ष आणि केंद्रातील सत्ताधारी पक्ष एकमेकांच्या विरुद्ध निवडणूक लढवीत असल्याने हेराफेरीला फारसा वाव नव्हता. तरीही १९८३च्या निवडणुकीची एक काळी बाजू होती. या निवडणुकीत काश्मिरात पहिल्यांदा धार्मिक ध्रुवीकरण होवून मतदान झाले. धार्मिक ध्रुवीकरण घडवून आणण्यात भाजप मागे होता अशातला भाग नाही पण या निवडणुकीत धृविकरणाच्या बाबतीत इंदिरा गांधीनी भारतीय जनता पक्षावर देखील मात केली. 'ते आणि आपण' ही भाजपची छुपी टॅगलाईन इंदिरा गांधीनी उघडपणे वापरली. सेटलमेंट बिलामुळे जम्मू पुन्हा मुस्लीमबहुल होण्याचा बागुलबोवा दाखविला. इंदिरा गांधींच्या प्रचार पद्धतीचा फायदा जसा कॉंग्रेसला झाला तसा फारूक अब्दुल्लांनाही झाला. मिरवायज फारूकशी युती केल्यामुळे धार्मिक मुसलमान आधीच युतीकडे वळला होता. बाकीचे काम इंदिरा गांधींच्या प्रचाराने केले. जे मुस्लीम मतदार कॉंग्रेसला अनुकूल होते तेही फारूक युतीकडे वळले. मात्र भाजपकडे जाणारा हिंदू मतदार आपल्याकडे वळविण्यात इंदिरा गांधी यशस्वी झाल्या. कॉंग्रेसला जम्मूत ३० टक्क्यापेक्षा अधिक मते मिळून २६ जागा मिळाल्या. काश्मीर घाटीत मात्र कॉंग्रेसच्या हाती काही लागले नाही. फारूक अब्दुल्लांच्या नॅशनल कॉन्फरंसने काश्मीर घाटी सोबत जम्मूतही आपली स्थिती आधीपेक्षा मजबूत केली. भीमसिंह यांच्या पार्टीला जम्मूत एक जागा मिळाली तर अब्दुल गनी लोन यांच्या पीपल्स कॉंग्रेसला काश्मीर घाटीत एक जागा मिळाली. या निवडणुकीत मतदारांचे हिंदू-मुस्लीम असे मोठ्या प्रमाणावर ध्रुवीकरण होवूनही जम्मूत भाजपला तर काश्मीर घाटीत जमात-ए-इस्लामीला खाते उघडता आले नाही हे या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हंटले पाहिजे. फारूक अब्दुल्ला सोबत युतीत असलेल्या मिरवायज फारूक यांच्या गटाला ५ जागा मिळाल्या. या निवडणुकीत ४६ जागा जिंकून फारूक अब्दुल्लाने स्पष्ट बहुमत मिळवत सरकार स्थापन केले.

निवडणुकी पूर्वीच फारूक अब्दुल्ला आणि कॉंग्रेसमध्ये तेढ निर्माण झाली होती. कटू प्रचाराने ती आणखी वाढली. विरोधकांबद्दल मृदु भूमिका घेणे, उदारता दाखविणे हे इंदिराजींच्या स्वभावाशी काहीसे विसंगत होते. त्यांना एकप्रकारे आव्हान देवून फारूक अब्दुल्लाने सरकार बनविल्याने फारूक सरकार त्यांच्या रोषाला बळी पडेल किंवा किमानपक्षी सरकार अस्थिर करतील हा अंदाज सर्वांनाच आला होता. त्यासाठी इंदिराजी एखादे वर्ष तरी थांबतील ही राजकीय विश्लेषकांची आशा मात्र फोल ठरली. निवडणुका नंतर लगेच काश्मीर सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न सुरु झालेत. इंदिरा गांधींच्या कार्यालयात आणि सल्लागारात काश्मिरी पंडितांचा भरणा होता. त्यांच्यापैकी अरुण नेहरू आणि माखनलाल फोतेदार यांचेवर फारूक सरकार पाडण्याची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांच्या मदतीला मुख्यमंत्री बनण्यास उतावीळ असलेले मुफ्ती मोहम्मद सईद होते. काश्मिरात आपल्या विजयाने उत्साहित झालेल्या फारूक अब्दुल्लाने देशपातळीवर इंदिरा गांधीना विरोध करण्याची तयारी चालविली. त्याचाच एक भाग म्हणून फारूक अब्दुल्लाने १७ पक्षांच्या प्रतिनिधीना श्रीनगरला आमंत्रित करून केंद्र-राज्य संबंधावर विचारविनिमय करण्यासाठी राष्ट्रीय संमेलन आयोजित केले. संमेलनात केंद्रावर आणि पर्यायाने इंदिरा गांधी यांचेवर टीका होणे जितके स्वाभाविक होते तितकेच अशा प्रकारच्या संमेलनाने इंदिराजींचे डिवचले जाणे स्वाभाविक होती. कॉंग्रेस समर्थकांना हे संमेलन फारूक अब्दुल्लांची आगळीक वाटली. राजकीय निरीक्षकानाही काश्मीरच्या प्रशासनाची घडी नीट बसविण्यावर लक्ष केंद्रित करण्या ऐवजी इंदिरा गांधीना विरोध करण्याची खेळी घाईची व अपरिपक्व वाटत होती. केंद्रीय सत्तेला व इंदिरा गांधी सारख्या नेत्याला आव्हान देणारा मुख्यमंत्री म्हणून फारूक अब्दुल्लाच्या लोकप्रियतेत काश्मिरात वाढ झाली होती. पण फारूक अब्दुल्लांकडे प्रशासन कौशल्य नव्हते व दैनदिन प्रशासनात त्यांना रसही नव्हता. त्यामुळे प्रशासन ढेपाळले, भ्रष्टाचार वाढला तशी फारूक अब्दुल्लांच्या लोकप्रियतेला ओहोटी लागली. त्यात एक अशी घटना घडली ज्यामुळे फारूक अब्दुल्लांची काश्मिरातच नाही तर देशभर नाचक्की झाली. 

श्रीनगरमध्ये नवे क्रिकेट स्टेडियम बांधण्यात आले होते. त्याचे उदघाटन भारत दौऱ्यावर आलेल्या वेस्ट इंडीज  व भारतीय संघातील क्रिकेट लढतीने होणार होते. पाच एकदिवसीय सामन्याच्या मालिकेतील पहिला सामना १२ ऑक्टोबर १९८३ रोजी श्रीनगरला आयोजित करण्यात आला होता.  भारताने वेस्ट इंडीजला हरवून इंग्लंडमध्ये विश्वचषक जिंकल्यानंतर लगेचच वेस्ट इंडीजचा भारत दौरा आयोजित करण्यात आला होता. त्या पराजयाचा बदला घेण्याच्या जिद्दीने वेस्ट इंडीज संघ श्रीनगरच्या मैदानावर उतरला होता. भारताने नुकताच विश्वकप जिंकल्याने भारतभर भारताच्या कामगिरी बद्दल उत्सुकता होती. नव्या स्टेडीअममध्ये गर्दी झाली होती. युवक मोठ्या संख्येने हजर होते. यात जमात-ए-इस्लामी संघटनेची युवा आघाडी असलेल्या जमात-ए-तुलबा संघटनेचे विद्यार्थीही होते. क्रिकेट सामन्यात गोंधळ घालण्याच्या तयारीनेच जमात-ए-तुलबाचे युवक आले होते. सामना सुरु झाल्यावर काही वेळातच या युवकांनी भारतीय खेळाडूना त्रास द्यायला सुरुवात केली. त्यांच्यावर चपला जोडे फेकायला सुरुवात केली. सामना दूरदर्शनवर दाखविला जात होता. त्यामुळे श्रीनगर स्टेडीअममध्ये काय सुरु आहे हे सामना पाहणाराना दिसत होते. जमात-ए-इस्लामीचे झेंडे फडकावले गेले. घोषणाबाजी झाली. जमातचा झेंडा आणि पाकिस्तानचा झेंडा यात बरेच साम्य असल्याने पाकिस्तानी झेंडे फडकवल्या गेल्याची देशभर चर्चा झाली. या सगळ्या प्रकाराने भारतीय खेळाडू परेशान आणि नाराज झालेत. ते मधेच खेळ सोडून देवू इच्छित होते. तेथे उपस्थित असलेल्या मुख्यमंत्री फारूक अब्दुल्लाने झाल्या प्रकाराबद्दल खेळाडूंची माफी मागितली आणि मधेच खेळ न सोडण्यासाठी त्यांना मनवले. त्यानंतर सामना पूर्ण झाला. मुठभर लोकांच्या कृतीने संपूर्ण काश्मीर पाकिस्तान धार्जिणे असल्याचा व फारूक अब्दुल्ला हतबल मुख्यमंत्री असल्याचा समज पसरला. काश्मिरात अराजक असल्याचा आरोप झाला. फारूक सरकार बडतर्फ करण्याची मागणीही झाली. कॉंग्रेस आणि इंदिरा गांधी यांनी या घटनेचे निमित्त करून फारूक अब्दुल्ला यांना मुख्यमंत्रीपदावरून दूर करण्यासाठी राज्यपालावर दबाव आणला. मात्र राज्यपाल बि.के.नेहरू दबावाला बळी पडले नाहीत व फारूक सरकारला तात्पुरते जीवनदान मिळाले.
---------------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि.यवतमाळ 
मोबाईल : ९४२२१६८१५८ 

No comments:

Post a Comment