Thursday, August 2, 2012

आले अण्णाजींच्या मना .......!

 रामलीला मैदानावरच्या यशस्वी उपोषणा नंतर अण्णानी सर्वात पहिली महत्वाची केलेली घोषणा होती आंदोलनात सामील युवकांचे व कार्यकर्त्याचे संघटन उभे करण्याची. त्याचे पुढे काहीच झाले नाही , कारण या चौकडीने अण्णाच्या कल्पनेला सुरुंग लावला! टीम मोठी आणि देशव्यापी होणे तर दूरच राहिले उलट त्यावेळी २६ लोकांची असलेली ही टीम आता १०-१५ लोकांची झाली आहे. एवढे अभूतपूर्व आंदोलन होवून , लाखोच्या संख्येने लोक रस्त्यावर येवूनही अण्णांची टीम छोटी होत गेली आणि या छोट्या होत गेलेल्या टीमचा अहंकार तेवढा वाढत गेला हे अण्णा आंदोलनाच्या आजच्या अवस्थे मागचे मुलभूत कारण आहे
------------------------------------------------------------------------------

देशात सध्या गोंधळाचे वातावरण आहे. केंद्र सरकार किंकर्तव्यविमूढ अवस्थेत आहे. ते या अवस्थेत का आहेत याची झलक केंद्रीय मंत्रिमंडळात नुकत्याच झालेल्या किरकोळ फेर बदला वरून येते. सुशीलकुमार शिंदे यांच्या उर्जा खात्याने अर्धा देश अंधारात बुडविला असताना त्या अंधारातच पंतप्रधानांनी सुशीलकुमार शिंदे यांना बढती देवून गृहमंत्री पदावर बसविले. बहुधा कॉंग्रेस नेतृत्व बढतीलाच शिक्षा समजत असले पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात विलासराव देशमुख यांना दोषी ठरवून त्यांच्यावर कडक ताशेरे ओढल्या नंतर त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्या ऐवजी त्यांची जास्त महत्वाचे पद देवून बढती देण्यात आल्याच्या घटनेला फार दिवस झालेले नाहीत. दोषी असणाऱ्यांना बढती देण्याच्या कॉंग्रेस परंपरे बद्दल अज्ञानी असलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या एका न्यायमूर्तींनी परंपरेला छेद देवून विलासरावांच्या बढती बद्दल जाहीर नापसंती व्यक्त केली होती. कॉंग्रेसच्या बढती देण्याच्या परंपरेला दुसरा अर्थ असू शकतो आणि हा अर्थ देशासाठी बढती पेक्षाही जास्त घातक ठरू शकतो. देशातील सर्वात जुना आणि सर्वात मोठा पक्ष असलेल्या कॉंग्रेस पक्षाजवळ देशाचे सरकार चालविण्यासाठी योग्य आणि कुशल मनुष्यबळाचा प्रचंड तुटवडा आहे हा या बढतीचा खरा अर्थ आहे. सरकार ठप्प असण्या मागचे हे गुपीत आहे. देशात  सरकारचे अस्तित्व जाणवत नसेल तर गोंधळाचे वातावरण निर्माण होने स्वाभाविक आहे आणि अशा वातावरणात मुठभरलोकही जास्तच गोंधळ घालून या वातावरणात भर घालू शकतात. आज टीम अण्णा नेमके हेच करीत आहे. टीम अण्णाच्या सध्याच्या जंतर मंतर वरील उपोषणाला गोंधळात गोंधळ असेच म्हणता येईल.

सरकार जितके गोंधळलेले आहे तितकाच गोंधळ 'सिविल सोसायटीचे स्वयंभू नेते असलेल्या टीम अण्णाचा  आणि सत्तेत पुनरागमनाकडे आशाळभूतपणे डोळे लावून बसलेल्या भारतीय जनता पक्षातही सुरु आहे. भारतीय जनता पक्ष तर या गोंधळात पूर्णपणे हरवून गेल्या सारखा वाटतो. प्रमुख विरोधी पक्षाची भूमिका तो पार पाडतो आहे असे कोठेच दिसत नाही. यामुळे टीम अण्णाचा गोंधळ आणखी वाढला आहे. टीम अण्णा एकाच वेळी सिविल सोसायटीची आणि प्रमुख विरोधी पक्षाची भूमिका निभावण्याचा प्रयत्न करीत असल्याने टीम अण्णाला नेमके काय पाहिजे हे लोकांनाही कळेनासे होवून कोणाची साथ द्यायची या बाबतीत लोकही गोंधळून गेले आहेत. याचा परिणाम टीम अण्णाचा गोंधळ वाढण्यातच झाला असे नाही तर त्यांचा रागाचा पारा वाढण्यातही झाला आहे. आम्हाला गर्दीची गरज नाही, आम्ही पाच लोक पुरे आहोत असे म्हणणे ही टीम अण्णात धुमसत असलेल्या रागाची परिणती आहे. गेल्या वर्षी रामलीला मैदानातील उपोषणाला लाभलेले जन समर्थन दिसत नसल्याने टीम अण्णाला आलेली निराशाच त्यांच्या अशा वक्तव्यातून दिसत आहे. त्यांची हौतात्म्य पत्करण्याची भाषा ही त्यांच्या रागाची आणि निराशेची अभिव्यक्तीच आहे. एकाएकी सुरु झालेली हौतात्म्याची भाषा आणि पुरेशी पूर्व तयारी न करताच आरपारच्या लढाईची भाषा टीम अण्णा शांत चित्ताने विचार करण्याच्या स्थितीत दिसत नाही हेच दर्शविते. शांतपणे विचार करण्याच्या स्थितीत असते तर हौतात्म्य पत्करण्याची घाई करण्या ऐवजी जनसमर्थन कसे विरले याचा विचार करून ते परत मिळविण्याची रणनीती त्यांनी आखली असती.रामलीला मैदानाच्या वेळी निर्माण झालेल्या वातावरणातून निर्माण झालेला अहंकार हाच टीम अण्णाचा मुख्य शत्रू बनला आहे असे दिसते. त्यामुळे त्यांच्या जेव्हा जे मनात येईल ते करीत सुटतात आणि आम्ही सगळे समाजाच्या भल्यासाठी करीत असल्याने लोकांनी आपल्या मागे आलेच पाहिजे असा त्यांचा आग्रहही असतो आणि अपेक्षाही असते. सध्या जंतर मंतर वरील उपोषण टीम अण्णाच्या विचार शून्य व तर्क हीन रणनीतीचे उत्तम उदाहरण आहे.

                                          जंतर मंतर चे उपोषण कशासाठी? 

टीम अण्णा मधील अण्णा हजारे यांच्या सहकाऱ्यांनी केंद्र सरकारातील १५ मंत्र्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावून या आरोपाच्या चौकशीच्या मागणी साठी सुरु केलेले उपोषण हा प्रामुख्याने भारतीय जनता पक्ष हा प्रमुख विरोधी पक्ष म्हणून अपेक्षित कामगिरी करीत नसल्याने ती जबाबदारी आपल्या शिरावर घेण्याचा प्रकार आहे. केंद्र सरकारातील पंतप्रधानासह अन्य मंत्र्यावर जे भ्रष्टाचाराचे आरोप टीम अण्णा कडून लावण्यात आले आहेत ते प्रामुख्याने धोरणात्मक निर्णयाच्या संदर्भात आहेत. या धोरणात्मक निर्णयावर संसदेत व्यापक चर्चा घडवून आणण्याची जबाबदारी प्रमुख विरोधी पक्ष या नात्याने भाजप ची होती. पण कोणत्याही वादग्रस्त मुद्द्यावर चर्चा करण्या ऐवजी संसदेचे कामकाज बंद करण्याकडे या पक्षाचा कल राहिला आहे. संसदेत उत्तर द्यावे न लागणे हे नेहमी सत्ताधाऱ्यांच्या पथ्यावर पडत आले आहे. असे कामकाज बंद पडल्याने १-२ दिवस माध्यमात त्याची चर्चा होवून प्रसिद्धी मिळते , पण वादग्रस्त मुद्दा तसाच कायम राहतो. आता तो मुद्दा टीम अण्णा हाती घेत आहे. धोरणात्मक मुद्द्यांची लोकसंसदेत चर्चा होणे चांगलेच आहे, पण ती चर्चा भडक आरोप करून सवंग प्रसिद्धी साठी नसली पाहिजे. पण प्रसिद्धीची सवय जडलेल्या टीम अण्णाला प्रसिद्धी शिवाय चैन पडत नाही. संसद बंद पाडून भाजप प्रसिद्धी मिळवीत आहे तर टीम अण्णा भडक आरोप करून तेच करीत आहे. प्रसिद्धी मिळाली नाही तर टीम किती बेचैन होते आणि जमावाला माध्यमांच्या प्रतिनिधीवर हल्ला करायला कसे प्रवृत्त करते हे जंतर मंतर वरचे चित्र साऱ्या देशाने पाहिले आहे. कायदे पंडिताची फौज जवळ बाळगणाऱ्या या टीम कडे भ्रष्टाचाराचा थोडाही पुरावा असता तर या टीम ने लगेच कोर्टात धाव घेतली असती. त्यांच्याही आधी सुब्रह्मण्यम स्वामीनी हे महत्कार्य पार पाडले असते. पण तो खरा मुद्दा भ्रष्टाचाराचा नाहीच. भ्रष्टाचाराचा सनसनाटी आरोप करून प्रसिद्धी मिळविण्याचा आहे . धोरणात्मक निर्णयावर आक्षेप घेतल्या जावू शकतात ,पण असे आक्षेप घेतले तर फारसी प्रसिद्धी मिळत नाही.  असे धोरणात्मक निर्णय घेण्यामागे स्वत:चे खिसे भरण्याचा हेतू असला पाहिजे असा टीम अण्णाचा संशय आहे. असे खिसे भरल्या गेल्याचा कोणताही पुरावा टीम अण्णा जवळ नाही. उदाहरणा दाखल पंतप्रधानावर टीम अण्णाने लावलेल्या आरोपाचा विचार केला तर हा मुद्दा स्पष्ट होईल. कंपन्यांना कोळसा खाणी स्वस्तात दिल्याने सरकारचा महाप्रचंड तोटा झाल्याचा निष्कर्ष काढल्याची अनधिकृत कुणकुण आहे. अर्थातच ही अनधिकृत बातमी महालेखापाल कार्यालयातून अनधिकृतपणे फोडण्यात आली आणि नंतर अधिकृतपणे असा खुलासाही त्या कार्यालयाकडून करण्यात आला की या संबंधी अंतिम निष्कर्ष काढण्यात आलेला नाही. सध्याच्या महालेखापालांच्या नुकसानीचे आकडे काढण्याचे वेड लक्षात घेता कदाचित अंतिम  निष्कर्ष टीम अण्णा म्हणते तसाच येईलही . पण आधीपासूनच कोळशाचे डाग पंतप्रधानाच्या शुभ्र कपड्यांना लावण्याचा प्रयत्न या उपोषनातून टीम अण्णाने चालविला आहे. बरे टीम अण्णाकडे पंतप्रधाना विरुद्ध बोलायला निमित्त काय आहे तर कोळसा खात्याच्या सचिवाने कमी किमतीला खाणी द्यायला विरोध केला होता हे ! पंतप्रधानाच्या अखत्यारीत असलेल्या या खात्याने सचिवाचे म्हणणे डावलून निर्णय घेतला म्हणून पंतप्रधानांनी भ्रष्टाचार केल्याचा टीम अण्णाचा  निष्कर्ष आहे. सध्या देशातील जनमत सुद्धा पंतप्रधानांना अनुकूल नाही . जनतेचा निष्कर्ष त्यांना सरकारचा येत असलेल्या अनुभवावर आहे. जनतेचा निष्कर्ष असा आहे की पंतप्रधान मनमोहनसिंह काहीही करायला अक्षम आहेत. म्हणजे ते भ्रष्टाचार करायला देखील सक्षम नाहीत ही जनतेची पक्की धारणा आहे. ही धारणा बदलण्याचा भारतीय जनता पक्षाने भरपूर प्रयत्न केला ,पण त्याच्या पदरी निराशाच आली. लोकांनी टीम अण्णाकडे पाठ फिरविली त्याचे कारण भारतीय जनता पक्षाचा अजेंडा टीम अण्णा राबवीत असल्याचे पंतप्रधानावरील आरोपामुळे लोकांची भावना झाली आहे. लोकांचा काही प्रमाणात अण्णा हजारे यांच्यावर विश्वास आहे पण ते देखील या बाबतीत स्पष्ट बोलत नाहीत. त्यांना दुरून स्पष्ट दिसते पण जवळून अंधुक दिसत असावे असे त्यांच्या वक्तव्यावरून वाटते. कारण महाराष्ट्रात असताना पंतप्रधान भ्रष्टाचारी नसल्याचे ते जाहीरपणे आणि स्पष्टपणे सांगतात आणि दिल्लीला टीम अण्णाच्या कोंडाळ्यात गेल्यावर पंतप्रधानावर देखील आपला विश्वास नसल्याचे ते सांगतात. एकूणच पंतप्रधानावर अविश्वासार्ह आरोप लावून रान पेटविण्याची टीम अण्णाची रणनिती अंगलट येवून त्यांचीच विश्वासार्हता कमी झाल्याचे जंतर मंतर चे उपोषण दर्शविते. यात अण्णाजीनी ऐन वेळी उपोषणात उतरून आणखीच संभ्रम निर्माण केला आहे. अण्णा उपोषण स्थळी हजर असतील पण उपोषण करणार नाहीत असे आधी जाहीर करण्यात आले होते. मग एकाएकी असे काय घडले की अण्णानी उपोषणाचा निर्णय घेतला आणि अमलात देखील आणला आहे हा प्रश्न पडतो. अण्णांच्या उपोषणाचे एक तात्कालिक कारण तर लक्षात येते. त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरु केलेल्या उपोषणाला जनते कडून थंड प्रतिसाद मिळाला तो वाढवा यासाठी अण्णांनी उपोषणात उडी घेतली. पण अशा फुसक्या कारणासाठी उपोषण करून अण्णानीच उपोषण अस्त्राची धार कमी केली आहे. जन लोकपाल साठी लढाई लढण्याचा अण्णांना हक्क आहे या बाबत दुमत होण्याचे कारण नाही. पण त्यासाठी पूर्व नियोजन व पूर्व घोषणा आवश्यक होती. अण्णांच्या कृतीने गमतीदार परिस्थिती निर्माण झाली आहे. केंद्रातील १५ मंत्र्याच्या भ्रष्टाचाराविरुद्ध सुरु झालेल्या उपोषण मंचावर अण्णांनी जन लोकपाल साठी उपोषण सुरु केले आहे! आणि त्यांच्या ज्या सहकाऱ्यांनी मंत्र्याच्या भ्रष्टाचारा विरुद्ध उपोषण सुरु केले होते ते सुद्धा उपोषण जन लोकपाल साठी असल्याचे वक्तव्य देत आहेत. याचा अर्थ मंत्र्याविरुद्ध भ्रष्टाचाराच्या आरोपा बद्दल ते पुरेसे गंभीर नाहीत असा होतो. जे स्वत:च या आरोपा बाबत गंभीर नसतील तर जनतेने त्यांच्या पाठीशी उभा न राहून काहीच चूक केली नाही   जनलोकपाल साठीच उपोषण करायचे होते तर आधी पासून तसे करायला हवे होते. यातून जो दुसरा निष्कर्ष निघतो त्याचा टीम अण्णा आणि त्यांच्या समर्थकांनी अंतर्मुख होवून विचार केला पाहिजे. यातून निघणारा दुसरा निष्कर्ष आहे की लढाईची कोणतीही योजना आणि दिशा टीम अण्णा जवळ नाही .

                           पुढे काय ? 

टीम अण्णाला स्वत:च्या लढाईचे महत्वच लक्षात आले नाही. जन लोकपाल येणे महत्वाचे नाही . जन लोकपाल या मुद्द्यावरची लोकभावना लक्षात घेता ही चळवळ जितकी दीर्घ काळ चालेल तितकी लोक जागृती होईल आणि भ्रष्टाचार विरोधी वातावरण दिवसेंदिवस तीव्र होईल.  जन लोकपाल आला तर लोकजागरण तर थांबेलच शिवाय नव्या यंत्रणेच्या संरक्षणा खाली मोठा भ्रष्टाचार सुरु होईल. या मुद्द्यावर चळवळ चालू राहिली तर अनेक गोष्ठी साध्य करता येवू शकतात. अण्णांनी नुकतीच राजकीय पर्याय देण्याची घोषणा केली होती. लोकपाल पेक्षा देशाला अशा पर्यायाची खूप गरज आहे. पण अशा गोष्ठी नुसत्या घोषणे पुरत्याच राहतात. केलेल्या घोषणेवर गंभीर विचार करून पुढची रणनिती आखण्या ऐवजी लहान मुलांना जशी मधूनच चॉकलेटची आठवण येते आणि त्यासाठी ते हट्ट धरून बसते तसे टीम अण्णाचे झाले आहे. इकडच्या तिकडच्या खूप गोष्ठी करायच्या आणि पुन्हा लोकपाल साठी हट्ट करायचा!अण्णांनी जंतर मंतर ला जे पहिले उपोषण केले त्यानंतर त्यांनी या पुढे आपण लोकप्रतीनिधीना परत बोलावण्याचा अधिकार मिळाला पाहिजे यासाठी काम करण्याचे जाहीर केले होते. नंतर इतरही निवडणूक सुधारणांबद्दल ते आणि त्यांची टीम बोलली होती. पण पुढे काहीच झाले नाही.राजकीय गटाराचे गंगेत रुपांतर करायचे असेल तर व्यापक निवडणूक सुधारणांची गरज आहे. अशा सुधारणा झाल्या नाही तर नवा राजकीय पर्याय उभा राहणे निव्वळ अशक्य आहे.या सुधारणांशिवाय निवडणूक मैदानात उतरले तर भाबड्या सर्वोदयवाद्याची सर्वोदायाची पंढरी समजल्या जाणाऱ्या वर्धा जिल्ह्यात लोक उमेदवाराच्या नावावर जी दुर्गती झाली त्या पेक्षा वेगळी स्थिती टीम अण्णाची होणार नाही. नवा पर्याय उभा करायचा तर देशातील विविध घटकांना टीम मध्ये स्थान द्यावे लागेल. अनेक विविध क्षेत्रातील मातब्बर लोकांना टीम मध्ये सामील करून घ्यावे लागेल. टीम जितकी मोठी होत जाईल तितके भूषण,केजरीवाल , बेदी आणि शिसोदिया छोटे आणि महत्वहीन होत जातील. या चौकडीला नेमके हेच नको आहे. लोकपालच्या नावावर लढाई करून यांनाच मोठे व्हायचे आहे. रामलीला मैदानावरच्या यशस्वी उपोषणा नंतर अण्णानी सर्वात पहिली महत्वाची केलेली घोषणा होती आंदोलनात सामील युवकांचे व कार्यकर्त्याचे संघटन उभे करण्याची. त्याचे पुढे काहीच झाले नाही , कारण या चौकडीने अण्णाच्या कल्पनेला सुरुंग लावला! टीम मोठी आणि देशव्यापी होणे तर दूरच राहिले उलट त्यावेळी २६ लोकांची असलेली ही टीम आता १०-१५ लोकांची झाली आहे. एवढे अभूतपूर्व आंदोलन होवून , लाखोच्या संख्येने लोक रस्त्यावर येवूनही अण्णांची टीम छोटी होत गेली आणि या छोट्या होत गेलेल्या टीमचा अहंकार तेवढा वाढत गेला हे अण्णा आंदोलनाच्या आजच्या अवस्थे मागचे मुलभूत कारण आहे. बाबा रामदेव सोबत आंदोलन करायला टीम मधील केजरीवाल आणि त्यांचे मित्र नाखुश असण्या मागचे रहस्य हेच आहे. अण्णा सोडले तर या टीमची किंमत शून्य आहे हे जंतर मंतरच्या ताज्या आंदोलना मुळे जगाला कळले. या निमित्ताने टीमच्या डोक्यात शिरलेली रामलीला मैदानाची गर्दी ओसरली असेल तर या सत्याचे भान टीमलाही आले असेल. कदाचित असे भान आल्यामुळेच लाज राखण्यासाठी टीम कडून हौतात्म्याची भाषा सुरु झाली आहे. पण परिवर्तनाच्या लढाईला हौतात्म्याची नाही तर मोठया लोक संघटनेची गरज असते . हे सत्य टीम अण्णाला कळत नाही आणि वळत नाही तो पर्यंत अण्णा आंदोलनाला भवितव्य नाही. 

ताजा कलम - हा लेख लिहून झाल्यावर  अण्णा आणि त्यांची  टीम उपोषण मागे घेणार असल्याचे  वृत्त आले आहे . या नव्या घडामोडीने लेखात व्यक्त केलेल्या मताची पुष्टीच झाली आहे. 

                                        (समाप्त)



सुधाकर जाधव 
मोबाईल-९४२२१६८१५८ 
पांढरकवडा ,
जि.यवतमाळ 

4 comments:

  1. Konatyaa aandolanaalaa bhavitavya aahe tey taree saangaa?

    ReplyDelete
  2. होय. तुम्ही म्हणता आहात ते खरे आहे.

    विद्याधर कुलकर्णी

    ReplyDelete
  3. Caste corruption,Dignity with livelihood and mass education on people's rights and responsilibities is key to keep movement going. From Gandhi to Phule and from Nehru to Ambedkar journey is necessary where all Marxist and Gandhiest have failed. It's not Anna but people like us have failed and waiting for Masiha to come and rescue which won't happen until Kayamat untill then we have to operate as one body doing different things for the same goal of Balirajya not ramrajya

    ReplyDelete
  4. अतिशय दांडगा अभ्यास तसेच अत्यंत जबाबदारीने लेख लिहिया आहे तुम्ही...सर .

    ReplyDelete