Friday, February 10, 2017

मनरेगा - शेतीतील दारिद्र्याचा आरसा

  रोजगार हमी योजना गौरवशाली नसून ग्रामीण दारिद्र्याचा आरसा आहे. शेती विषयक चुकीच्या धोरणातून हे दारिद्र्य आलेले आहे. रोजगार हमी योजनेवरील मजुरांची वाढती संख्या आणि वाढता खर्च ग्रामीण भागातील दारिद्र्य वाढत चालल्याचा पुरावा आहे. काँग्रेस आणि  भाजपचे रोजगार  हमीवरील एकमत शेतीधोरणावरीलही एकमत ठरत असल्याने शेतीक्षेत्राचे दैन्य संपण्याची शक्यता नाही.
------------------------------------------------------------------------------------------


नुकत्याच सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी शेतीविषयक आणि ग्रामीण विकासाच्या तरतुदी घोषित करताना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेसाठी ४८००० कोटीची तरतूद विक्रमी असल्याचे सांगितले. गेल्यावर्षीपेक्षा राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या तरतुदीत आपण भरीव वाढ केल्याचे सांगताना याबाबतीत आपण काँग्रेसवर मात केल्याचा अभिमान आणि आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. काँग्रेस राजवटीत रोजगार हमीवर तरतुदीपेक्षा खर्च कमी होत होता आणि आपल्या सरकारच्या राजवटीत तरतुदीपेक्षा अधिक खर्च होत असल्याचे लोकसभेतील काँग्रेस सदस्यांच्या बाकाकडे कटाक्ष करीत , काँग्रेसजनांना खिजवत सांगितले. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमीची संवैधानिक तरतूद काँग्रेस राजवटीत झाली होती . ही तरतूद म्हणजे आपल्या राजवटीची मोठी उपलब्धी आहे असे म्हणत रोजगार हमीला मानाचा तुरा समजत काँग्रेस पक्ष मिरवत असल्याने भाजपच्या अर्थमंत्र्याने काँग्रेसला खिजवणे समजण्यासारखे आहे. गेल्या वर्षी राष्ट्रीय स्तरावर रोजगाराची संवैधानिक हमी देणाऱ्या या योजनेला १० वर्षे पूर्ण झाली तेव्हा योजनेचे श्रेय घेताना काँग्रेसने भाजप सरकार योजनेच्या गळ्याला नख लावीत असल्याचा आरोप केला होता. भाजपने त्यावेळी काँग्रेस राजवटीपेक्षा आपल्या राजवटीत ही योजना अधिक कार्यक्षमपणे राबवित असल्याचा दावा करीत योजनेच्या अंमलबजावणीसाठी पैसा कमी पडू दिला जाणार नाही याची हमी दिली होती. मागेल त्याला वर्षभरात १०० दिवस काम करण्याची संवैधानिक हमीच असल्याने तरतूद किती हजार कोटीची करतो हा मुद्दा तसा गौण ठरतो. यावर्षी ४८००० कोटीची तरतूद आहे आणि अपेक्षेपेक्षा अधिक लोकांनी योजने अंतर्गत काम मागितले तर तरतुदीपेक्षा जास्त खर्च करणे सरकारला भाग आहे. तरतूद संपली की काम संपले असे या योजनेच्या बाबतीत करता येत नसल्याने पैशाची तरतूद ही बाब औपचारिक आणि तांत्रिक ठरते. तरतुदीचा आकडा फक्त ग्रामीणांची असलेली काळजी मिरविण्यासाठी असते. काँग्रेसने आपल्या राजवटीत तेच केले आणि भाजप आपल्या राजवटीत यापेक्षा काही वेगळे करीत नाही. २००६ साली २०० जिल्ह्यापासून सुरु झालेली ही योजना २००८ सालापर्यंत देशातील सर्वच्यासर्व ५९३ जिल्ह्यात लागू झाली. तेव्हापासून दरवर्षी योजनेसाठी अधिक खर्चाची तरतूद करावी लागत असल्याने प्रत्येक वर्षीची तरतूद विक्रमी राहात आली आहे. जगातील सर्वात मोठी सामाजिक सुरक्षा योजना असा गौरव या योजनेचा केला जात असला तरी खरोखरच गौरवास्पद ही योजना आहे कि लांच्छनास्पद याचा विचार न करता आधी काँग्रेस आणि आता भाजप या योजनेचा अभिमान बाळगत आहे.

काँग्रेसला पराभूत करून सत्तेत आलेल्या प्रधानमंत्री मोदी यांनी आपल्या पहिल्याच अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोकसभेत राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेवर बोलताना ही योजना म्हणजे काँग्रेस राजवटीच्या अपयशाचे मूर्तिमंत उदाहरण असल्याचे म्हंटले  होते. ही योजना आपण बंद न करता केवळ काँग्रेसच्या अपयशाचे स्मारक म्हणून चालू ठेवू असे घोषित केले होते. इतकी वर्षे सत्तेत राहून तुम्ही गरिबांना पोट भरण्यासाठी खड्डेच खोदायला भाग पाडले हे त्यांचे काँग्रेसला उद्देशून काढलेले त्यावेळचे उद्गार होते आणि ते चूक होते असे म्हणता येत नाही. केंद्र सरकारची रोजगार हमी योजना ही महाराष्ट्र सरकारने १९७२ साली लागू केलेल्या रोजगार हमीच्या धर्तीवर बेतलेली आहे. ७२ साली पडलेल्या दुष्काळात लोकांना काम देण्यासाठी महाराष्ट्रात या योजनेची सुरुवात झाली. मुख्यतः: खडी फोडणे आणि शेतजमिनीची बांध-बंदिस्ती अशा स्वरूपाची कामे त्यावेळी हाती घेण्यात आली होती. याचा अर्थ ही योजना एक आपदधर्म म्हणून आली आणि पुढे चालू राहिली. त्यानंतर तब्बल ३३ वर्षानंतर अशी योजना देशभर लागू करण्याची वेळ यावी हे आपले अर्थकारण कुठेतरी चुकत असल्याचे द्योतकच होते. पण अर्थकारणातील चूक लक्षात न घेता ही योजना म्हणजे मानाचा तुरा म्हणून कोणी मिरवीत असेल तर ती दिवाळखोरीच म्हंटली पाहिजे. प्रधानमंत्री मोदींनी योग्य शब्दात काँग्रेसची दिवाळखोरी उघडपणे मांडली . योजना एकाएकी बंद करणे व्यवहार्य नव्हते हे समजण्यासारखे आहे. पण योजनेत कालानुरूप बदल होतील आणि अकुशल मजुरांसाठी असलेल्या योजनेचे रूपांतर कुशल मजुरीत होईल आणि त्यामुळे गरिबाला कसेबसे पोट भरण्यासाठी खड्डे खोदण्या ऐवजी कुशल रोजगार मिळेल अशी आशा प्रधानमंत्री मोदी यांच्या उद्गारातून निर्माण झाली होती. मोदी सरकारला आता ३ वर्षे पूर्ण होत आहेत पण त्या दिशेने एक पाऊलही पुढे पडले नाही. उलट काँग्रेसच्या पाऊलावर पाऊल टाकत भाजपच्या सरकारने वेग वाढविला आहे. योजने अंतर्गत ५ लाख शेततळे झाल्याचे मोठ्या अभिमानाने मोदी सरकारच्या अर्थमंत्र्याने सांगितले. या वर्षी अधिक शेततळे खोदली जातील हे सांगायला ते विसरले नाहीत. शेवटी मोदी सरकारही गरिबांना पोट भरण्यासाठी खड्डे खोदायलाच भाग पाडीत आहे. काँग्रेसवर घणाघाती हल्ला करण्यासाठी प्रधानमंत्री मोदी यांनी योजनेचे सत्य तर लोकांसमोर मांडले पण ते बदलण्यासाठी काडीचेही काम केले नाही हेच अर्थमंत्र्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणातून स्पष्ट होते. काँग्रेसला या योजनेचा जसा आणि जितका अभिमान वाटत आला आहे तेच भाजपलाही वाटते हे दोन्ही पक्षाच्या भूमिकेतून दिसून येते. या बाबतीत दोन्हीही पक्ष सारखीच दिवाळखोर आहेत आणि कोण अधिक दिवाळखोर हे दाखविण्याची त्यांच्यात चढाओढ सुरु असल्याचे रोजगार हमी योजनेवरून लक्षात येते.

राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना मागच्या पानावरून पुढे तशीच का चालू ठेवावी लागते याचा गंभीरपणे कोणी विचार करीत नाही. उलट योजनेला काळाची गरज , पुरोगामी वगैरे वगैरे विशेषणे लावून गौरविण्यात येते आणि अशा योजनेला विरोध करणारा गरीबाचा शत्रू मानला जातो. गरीबाच्या विरोधी नाही हे दाखविण्यासाठी या योजनेचा हिरीरीने पुरस्कार करण्यात येतो. योजनेचे सत्य लक्षात घेतले तर शेतीविरोधी अर्थकारणाच्या गाडी वेगवान करण्यासाठी ही योजना म्हणजे एक वंगण आहे. दानधर्म करून लोक दुआ घेतात तसे सरकार रोजगार हमी चालू ठेवून गरिबांचा दुआ मताच्या रूपात घेत असते. रोजगार हमी ही केवळ राजकारणाची नाहीच  तर शेतीविरोधी अर्थकारणाचीही गरज आहे. हे लक्षात घेतले तर मोदी सरकार काँग्रेस सारख्याच उत्साहाने ही योजना का अंमलात आणीत आहे यावर प्रकाश  पडेल. मुळात ही गरिबी निर्मूलनाची योजना नाही. गरिबांना कसेबसे जीवंत ठेवणारी ही योजना आहे. देखावा मात्र गरिबी निर्मूलनाचा केला जातो. सरकारी योजनांनी गरिबी दूर होते असा सरकारचा दावा आहे तर मग दरवर्षी जास्त संख्येने लोक या योजनेत कसे येतात आणि दरवर्षी योजनेचा खर्च कसा वाढतो याचे उत्तर सरकारने दिले पाहिजे. ज्या अर्थी रोजगार हमीत काम करणाऱ्या मजुरांच्या संख्येत भर पडत आहे आणि त्यासाठी वाढीव खर्च करावा लागत आहे त्या अर्थी सरकार आणि जागतिक बँक काहीही दावा करोत देशात गरिबी वाढत आहे. ग्रामीण रोजगार योजनेत मजूर वाढत आहेत याचा सरळ संबंध शेतीशी आहे. या देशातील गरिबीचे मूळ शेतीत आहे. शहरी आणि सभ्य समाजासाठी शेतकरी भलेही अन्नधान्य पिकवीत असेल , स्वत:साठी मात्र दारिद्र्याचे वाढते पीक घेत असतो. दारिद्र्याच्या या पिकात रोजगार हमीच्या भरभरभराटीची कारणे दडली आहेत. मोठ्याचा मध्यम , मध्यमचा छोटा, छोट्याचा अल्पभूधारक  आणि अल्पभूधारकाचा मजूर होणे हे चक्र शेतीत सतत सुरु आहे. १० हेक्टरच्या वरचा मोठा (?) शेतकरी देशात १ टक्का पण उरलेला नाही. २०१०-११ च्या शेती गणनेनुसार अशा शेतकऱ्याचे प्रमाण अवघे ०.७ टक्के होते तर अल्पभूधारक शेतकरी ६७ टक्क्याच्या वर होते. गेल्या ५-६ वर्षातील शेतीची वाढती दुर्दशा लक्षात घेतली तर मोठ्या शेतकऱ्यांचे प्रमाण आणखी घटले असेल आणि अल्पभूधारकांची संख्या बरीच वाढली असणार हे उघड आहे. अल्पभूधारक वाढत्या संख्येने मजूर बनत आहेत याचा पुरावा म्हणजे रोजगार हमीच्या कामावरील मजुरांची वाढती संख्या आणि वाढता खर्च. रोजगार हमीच्या कामावर शहरातून तर कोणी येत नाही आणि नियमानुसार येऊही शकत नाही. याचा अर्थच दरवर्षी शेतकऱ्यांचे रूपांतर शेतमजुरात मोठ्या प्रमाणावर होत आहे. शहरी भागात मजुरीसाठी जाणारा वाढता लोंढा आणि रोजगार हमीवरील मजुरांची वाढती संख्या हा शेती संबंधीच्या चुकीच्या धोरणाचा परिपाक आहे. त्यामुळे पोट भरण्यासाठी खडी फोडायला लावणारी आणि खड्डे खोदायला लावणारी रोजगार हमी योजना ही गौरवाची बाब असू शकत नाही. चुकीच्या आर्थिक धोरणाचा परिणाम दाखविणारा आरसा म्हणून या योजनेकडे पाहिले तरच यात बदल करण्याचा विचार मनाला शिवू शकतो. बदलाचे हे काम सोपे नाही. शेतीसंबंधी धोरणात बदल करूनच रोजगार हमीचे अपयश धुवून निघेल. शेती फायद्यात झाल्याशिवाय ग्रामीण रोजगार हमीची  गरज संपणार नाही. शेती फायद्याची करायची असेल तर शेती क्षेत्रावरील जनसंख्येचा भार दुसऱ्या उद्योगात सामावून घेण्याची योजना आखून अंमलात आणावी लागेल. त्यासाठी ग्रामीण भागात कौशल्य प्रशिक्षणाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर राबवावा लागेल. थातुरमातुर उपायांनी शेतीक्षेत्रातील दारिद्र्य संपणार नाही आणि रोजगार हमी योजनेची गरज देखील संपणार नाही.
--------------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव , पांढरकवडा , जि . यवतमाळ
मोबाईल - ९४२२१६८१५८
-------------------------------------------------------------------------------------- 

Friday, February 3, 2017

बुडत्याला कॅशलेसचा आधार !

 सरकारच्याच आर्थिक सर्वेक्षणाच्या निष्कर्षांचा  उल्लेख आणि स्वीकार अर्थसंकल्पात कुठे दिसत नाही. समस्येचा स्वीकारच केला नाही तर त्यावरील उपाययोजनांचा विचारच होणार नाही. अर्थसंकल्पात नेमके हेच घडले आहे. आर्थिक सर्वेक्षण एका ग्रहावरचे आणि अर्थसंकल्प दुसऱ्या ग्रहावरचा वाटावा असे अर्थसंकल्पाचे सादरीकरण आहे !
------------------------------------------------------------------------------------------------------

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे त्यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पा संदर्भात दोन कारणासाठी अभिनंदन केले पाहिजे . पहिले कारण प्रधानमंत्री मोदी यांच्या भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या अशा उत्तर प्रदेश सहित काही राज्याच्या विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर अर्थसंकल्प सादर करताना लोकप्रिय घोषणाची  राजकीय आतिषबाजी टाळली आहे. एक राजकारणी म्हणून त्यांना निवडणुकांचे भान होते हे सादर अर्थसंकल्पावरून दिसतेच , पण हे राजकीय भान त्यांनी आर्थिक बाबीवर हावी होणार नाही याचे सुरुवातीपासून शेवट पर्यंत भान ठेवले. आर्थिक उलथापालथ होणार नाही याचे भान ठेवत त्यांनी सरकारची राजकीय प्रतिमा उजळेल असा प्रयत्न केला आहे, पण त्यात आक्षेप घ्यावा असे काही नाही. सत्तेत असणाऱ्या प्रत्येक राजकीय पक्षाची ती गरज असते. मध्यमवर्गीयांना कर सवलत देताना अतिउच्च उत्पन्न गटावर अधिभार लावून आपले सरकार श्रीमंतांच्या बाजूचे नाही असे दर्शविण्याचा मुत्सद्दीपणा त्यांनी दाखविला असेल आणि त्यातून सरकारची प्रतिमा उजळविण्याचा प्रयत्न केला असेल तर त्यात काही चुकीचे नाही. त्यांचे अभिनंदन करावे असे दुसरे कारण म्हणजे चलन रद्द करण्याच्या यातनातून जात असलेल्या देशवासियांना अर्थसंकल्पातून अधिक यातना होणार नाही याची त्यांनी पुरेपूर काळजी घेतली आहे. झालेल्या यातनांवर पुरेशी नसली तरी थोडीशी मलमपट्टी करण्याचा त्यांच्या परीने प्रयत्न केला आहे. मग या अर्थसंकल्पाला चांगले म्हणायचे का तर त्याचे उत्तर हो किंवा नाही असे देता येणार नाही. सरकार पक्ष चांगले म्हणणार आणि विरोधी पक्ष वाईट ठरविणार ही तर रीतच आहे. पण असे चांगले - वाईट नसते. दोन्हीही असतात , फक्त चांगले अधिक आहे की वाईट हेच पाहायचे असते. या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्याने हुशारीच अशी केली आहे कि, चांगले -वाईट ठरविण्याच्या कसोट्याच ठेवल्या नाहीत ! अर्थसंकल्पात टीका करावा असा मुद्दा अभावानेच आढळेल, ऐकल्या क्षणी काही मुद्द्यांचे कौतुक करावे अशी इच्छाही होईल पण देशासमोरील आव्हानांचा या आधारे मुकाबला करता येईल का असा प्रश्न विचारला तर याचे होकारार्थी उत्तर मिळणे कठीण आहे. कारण फारशा समस्याच नाहीत , तीन वर्षाच्या काळात पुष्कळ समस्यांवर काबू मिळविला असल्याने भरभराट होत आहे आणि भारतीय अर्थव्यवस्था चमकू लागली आहे या गृहितकावर किंवा समजुतीवर या अर्थसंकल्पाचा डोलारा उभा आहे. त्यामुळे देशापुढे काही समस्या आहेत आणि त्या सोडविण्याच्या उपाययोजना दिल्या आहेत असे आढळत नाही. उपाययोजना नाहीत असे नाही. उपाययोजना आहेत आणि सकृतदर्शनी त्या चांगल्या सुद्धा वाटतात पण लोक सामना करीत असलेल्या समस्यांशी त्याचे फारसे देणेघेणे नाही. अर्थमंत्र्यांच्या कल्पकतेने तयार झालेला हा चांगला अर्थसंकल्प असला तरी तो कल्पनेच्या जगातील आहे. वास्तवाशी त्याचा संबंध नाही. किंबहुना वास्तवाशी सामना करण्याचे टाळून लोकांच्या मनात अटलबिहारी यांच्या काळातील 'फील गुड' किंवा 'इंडिया शायनिंग'ची छाप लोकांच्या मनावर पडेल असा अर्थमंत्र्यांनी प्रयत्न केला आहे.

अर्थमंत्र्यांनी वास्तवाचा सामना करण्याचे टाळले हा राजकीय आरोप नाही तर ती वस्तुस्थिती आहे. याचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे चलन रद्द करण्याच्या निर्णयाचे अर्थसंकल्पात दिसून येणारे धूसर प्रतिबिंब. चलन रद्द करण्याचा मोदी सरकारच्या कार्यकाळातीलच नाही तर जागतिकीकरणाच्या स्वीकारा नंतरचा सर्वात मोठा निर्णय होता. निर्णयामागचे राजकीय हेतू काहीही असू देत , पण निर्णय आर्थिक होता आणि त्याचे आर्थिक परिणाम झालेले स्पष्ट दिसत असताना अर्थमंत्र्याने परिणामांकडे कानाडोळा करून अर्थसंकल्प मांडल्याने जमिनीवरील समस्यांना भिडणारा अर्थसंकल्प राहिला नाही. काही गोष्टी तर सरकारी पातळीवर मान्य झाल्या असताना त्याची दखल घेण्याचे अर्थमंत्र्याने टाळले आहे. उदाहरणार्थ, अर्थसंकल्प सादर करण्याच्या एक दिवस आधी नेहमीच्या प्रथेप्रमाणे देशाच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेणारे आर्थिक सर्वेक्षण जाहीर करण्यात आले होते. त्यात चलन रद्द करण्याच्या निर्णयाचे कोणत्या घटकांवर कसे परिणाम झालेत आणि एकूणच अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम झाला याचे स्पष्ट संकेत दिल्या गेले होते. अर्थव्यवस्थेपुढील नेहमीच्या आव्हानांशिवाय चलन रद्द करण्याने नवीन आव्हाने उभी राहिली आहेत हे वास्तव सरकारच्याच आर्थिक सल्लागाराने आणि सरकारी यंत्रणेने केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे मांडले असतांना देखील अर्थमंत्र्याने चलन रद्द करण्याच्या निर्णयाने उभ्या राहिलेल्या आव्हानांना टाळून किंबहुना अशी कुठली आव्हानेच उभी राहिली नसल्याच्या थाटात चलन रद्द करण्याच्या निर्णयाचे गुणगान अर्थसंकल्पात केले आहे. चलन रद्द करण्याच्या निर्णयाने बँकेत ज्या रकमा जमा झाल्यात तिकडे अंगुली निर्देश करीत जास्त संख्येने लोक कराच्या जाळ्यात येतील हे त्यांनी मांडले. एकीकडे काळ्या पैशा संबंधी अभय योजना जारी असताना आणि बँकेत जमा केलेली रक्कम सरकारच्या नजरेत येणारच हे पक्के माहित असताना ही रक्कम जमा झाली आहे. तेव्हा बहुतेकांकडे ही रक्कम कुठून कशी आली याची कारणे असतीलच. चलन रद्द करण्याच्या निर्णयाने कॅशलेस व्यवहारांना चालना मिळाली असे अर्थमंत्र्याने सांगितले यात तथ्य आहे. कॅशलेस व्यवहाराच्या दिशेने पुढे जाण्याचा जो उत्साह अर्थमंत्र्याने दाखविला तो वाखाणण्यासारखा असला तरी चलन निर्णयामुळे बुडत चाललेल्या अर्थव्यवस्थेला कॅशलेसच्या काडीचा आधार मिळाला इतकेच यात तथ्य आहे. बुडणारा माणूस हातात येईल ते जसे घट्ट पकडून ठेवतो तसे बुडणाऱ्या अर्थव्यवस्थेला वाचविण्यासाठी अर्थमंत्र्याने कॅशलेसचा तिनका हातात घट्ट पकडून ठेवल्याचे अर्थसंकल्पातून दिसून येते. कॅशलेस व्यवहार ही निश्चितच प्रगती आहे. पण कुठलेही व्यवहार होण्यासाठी अर्थव्यवस्था सुरळीत आणि गतिमान होणे ही प्राथमिक गरज असते. इकडेच अर्थमंत्र्याने दुर्लक्ष केले आहे. चलन रद्द करण्याने अर्थव्यवस्थेची विस्कटलेली घडी ठीक करण्याच्या ठोस उपाययोजना अर्थसंकल्पात अभावानेच आढळतात. अशा उपाययोजना मांडल्या तर ते चलन रद्द करण्याच्या निर्णयाचे अपयश दर्शविल ही भीती त्यामागे असू शकते आणि उत्तरप्रदेश सारख्या महत्वाच्या निवडणुकांच्या तोंडावर सरकारला या निर्णयाचे अपयश मान्य करणे शक्य झाले नसणार. पण त्यामुळे समस्यांपासून पळणारा आभासी अर्थसंकल्प ठरला आहे. याचे तात्पुरते राजकीय लाभ मिळू शकतात पण अर्थव्यवस्थेची मात्र हानीच होईल.

हा अर्थसंकल्प आभासी बनण्याचे कारण आर्थिक सर्वेक्षणातून जे वास्तव समोर आले त्या वास्तवाला भिडण्याचे अर्थमंत्र्यांनी टाळले आहे. आर्थिक सर्वेक्षणाचा सर्वात मोठा निष्कर्ष आहे तो चलन रद्द करण्याच्या निर्णयाचा सर्वाधिक फटका कृषी क्षेत्राला बसला. कृषी क्षेत्राइतकाच फटका असंघटित कामगार वर्गाला बसला आहे. प्रामुख्याने रोखीचा व्यवहार करणारे लघु आणि मध्यम उद्योग या निर्णयाने भरडल्या गेलेत. रोजगार बुडाला , उत्पादन कमी झाले , मागणी कमी झाली आणि परिणामी अर्थव्यवस्थेची व विकासाची गती मंदावली. याचा परिणाम मोठ्या उद्योगावर देखील झाला आहे. उत्पादन-वितरण , मागणी-पुरवठा याची साखळीच खंडित झाली आहे. सरकारच्याच आर्थिक सर्वेक्षणाचे हे निष्कर्ष असताना त्याचा उल्लेख आणि स्वीकार अर्थसंकल्पात कुठे दिसत नाही. समस्येचा स्वीकारच केला नाही तर त्यावरील उपाययोजनांचा विचारच होणार नाही. अर्थसंकल्पात नेमके हेच घडले आहे. आर्थिक सर्वेक्षण एका ग्रहावरचे आणि अर्थसंकल्प दुसऱ्या ग्रहावरचा वाटावा असे अर्थसंकल्पाचे सादरीकरण आहे. चलन रद्द करण्याचा परिणाम म्हणून कॅशलेस व्यवहार पुढे रेटण्यासाठी सरकार जे प्रयत्न करीत आहे आणि प्रोत्साहन देत आहे तसेच प्रयत्न आणि प्रोत्साहन उत्पादन साखळीचे विखंडन सांधण्यावर देण्याची गरज होती . किंबहुना कॅशलेस पेक्षा याबाबीकडे विशेष लक्ष देण्याची गरज होती. उद्योगजगताला प्रोत्साहन आणि कामगार जगताला दिलासा देणाऱ्या मोठ्या उपाययोजनांची गरज होती. आर्थिक सर्वेक्षणात अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्यासाठी लवकरात लवकर चलन पुरवठा सुरळीत करण्यावर जोर देण्यात आला होता. अर्थमंत्र्यांनी या संबंधीचे भाष्य टाळून कॅशलेसचे तुणतुणे तेवढे  वाजविले. चलन पुरवठ्या संबंधी ठोस काही सांगितले असते तर त्याबाबतची अनिश्चितता दूर होऊन अस्थिर अर्थव्यवस्था स्थिर होण्यास मदत झाली असती. पण एकीकडे कॅशलेस व्यवहाराचे घोडे दामटायचे आणि दुसरीकडे चलन पुरवठ्याची स्थिती सुधारण्या बद्दल सांगणे विसंगत वाटल्याने अर्थमंत्र्याने या महत्वाच्या मुद्द्यावर मौन बाळगणे पसंत केले असावे. नाही म्हणायला अर्थमंत्र्यांनी छोट्या आणि मध्यम उद्योगांना कंपनी करात सवलत देऊन आणि कनिष्ठ मध्यमवर्गीयांना कर सवलत देऊन चलन रद्द करण्याच्या निर्णयाने झालेल्या जखमांवर मलमपट्टी करण्याचा , फुंकर घालण्याचा प्रयत्न केला आहे. पण यांच्यापेक्षाही जास्त फटका बसलेले शेतकरी , शेतमजूर आणि असंघटित कामगार याना जेटलींनी वाऱ्यावर सोडले आहे. मध्यंतरी चलन रद्द करण्याच्या परिणामी जितके दिवस टोल वसुली बंद होती त्याची नुकसानभरपाई सरकार देणार असल्याची बातमी होती. त्यांच्यापेक्षा जास्त आणि उध्वस्त होतील इतके नुकसान शेतकरी , रोज कमावून पोट भरणारे स्वयंरोजगार, रोजनदारीवर काम करणारे मजूर,छोटे-मोठे व्यापारी  यांचे झाले आहे. त्यांना प्राधान्यक्रमाने नुकसानभरपाई देण्याची नैतिक जबाबदारी सरकारची होती. पण असे कोणते नुकसान झाले नाही तेव्हा भरपाईचा प्रश्न नाही असा शहामृगी पवित्रा सरकारचा आहे.

अर्थसंकल्पात जशी लघु व मध्यम उद्योजकांना कर सवलत देण्यात आली आहे तसे शेती व्यवसायासाठी विशेष अशी कोणती सवलत शेती व्यवसायासाठी आहे हे शोधले तर निराशाच पदरी येते. हा व्यवसाय तोट्यात चालत असल्याने कर नाही , मग कर सवलत कसली. अन्न , वस्त्र , निवारा या मूलभूत गरजा मानून गृह निर्माण क्षेत्राला पायाभूत क्षेत्राचा दर्जा या अर्थसंकल्पात दिला आहे ती स्वागतार्ह बाब आहे , पण मग असा दर्जा शेती क्षेत्राला द्यायला काय हरकत आणि अडचण होती हे सरकारच जाणो. करार शेती संबंधी कायद्याची गरज आहे आणि सरकार त्याला प्राधान्यक्रम देत आहे याचे कारण कंपन्यांना शेती क्षेत्रात मुक्त वावर करण्यासाठी तो आवश्यक आहे. पण शेतकऱ्यांची अडवणूक आणि नाडवणूक करणाऱ्या कायद्यांना हात घालण्याची सरकारची तयारी नाही. कंपन्यांच्या सोयी साठी करार शेतीचा कायदा करण्या ऐवजी सरळ सिलिंग कायदा आणि शेतीत शेतकऱ्याशिवाय इतरांनी येण्यावर असणारी बंधने हटविण्यावर विचार होणे गरजेचे आहे. येत्या दशकात शेतकरी समुदाय अल्पभूधारक होणार आहे आणि अल्पभूधारक होणे याचा अर्थ अधिक दरिद्री होणे असा आहे. रोजगार हमीवर दरवर्षी करावी लागणारी वाढीव तरतूद अल्पभूधारक आणि भूमिहीनांची संख्या वाढत असल्याचा पुरावा आहे. पण या सगळ्या गोष्टी सरकारच्या समजण्याच्या पलीकडच्या आहेत असे वाटण्यासारखा हा अर्थसंकल्प आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे शेती मध्ये शेतकऱ्यांना डांबून ठेवण्यासाठी ज्या उपाययोजना अंमलात येत आहेत त्याच पुढे चालू ठेवण्यात आल्या आहेत. नुसत्या आकड्याचा खेळ करून शेती आणि ग्रामीण भागासाठी फार काही करत असल्याचा भास यावर्षीही निर्माण केला आहे. शेतीचा विकासदर किंचित वाढला तो निसर्गाच्या कृपेने आणि शेतकऱ्यांच्या परिश्रमाने . त्यात सरकारी धोरणांचा वाटा शून्य आहे. शेतीतील उत्पादन वाढूनही शेतकरी देशोधडीला लागतो याचे श्रेय मात्र सरकारी धोरणाचाच आहे आणि या धोरणात कोणताच बदल नाही हे या अर्थसंकल्पाने स्पष्ट केले आहे. १० लाख कोटींचा शेती क्षेत्रासाठी कर्जपुरवठा हा ऐकायला आकडा मोठा आहे. प्रत्यक्षात कर्ज परत फेडण्याची ऐपत नसल्याने कर्ज जुन्याचे नवे तेवढे होते. प्रत्यक्षात फार कमी शेतकऱ्यांना कर्जपुरवठा होतो. विम्यासाठी ९००० कोटीची तरतूद अशीच भव्य वाटते. पण प्रत्यक्ष शेतकऱ्यांना किती विमा भरपाई मिळाली आणि कंपन्यांच्या घशात किती पैसे गेलेत हे पाहिले कि अशा योजनांचा फोलपणा लक्षात  येतो.८००० कोटीची डेअरी उद्योगाची तरतूद चांगली असली तरी त्यासाठी समग्र पशुपालन धोरणाची गरज आहे. जनावरे पाळण्याची क्षमताच नाही आणि त्यांच्या चरण्यासाठी गायरानच नाही तर डेअरी उद्योग विकसित कसा होणार. त्यामुळे शेती आणि ग्रामीण भागासाठी मोठे आकडे अर्थसंकल्पात असले तरी ते पोकळ आहेत. शेतीक्षेत्र आणि ग्रामीण विकासासाठी पावणे दोन लाख कोटीपेक्षा थोडी अधिक तरतूद आहे. पण २१ लाख कोटींच्यावर खर्चाच्या अर्थसंकल्पात निव्वळ शेतीसाठीच्या तरतुदीचा विचार केला तर ती ५२ हजार कोटीच्या आसपास आहे . प्रत्येक क्षेत्रासाठी निव्वळ गेल्यावर्षी पेक्षा थोडी जास्त तरतूद करून विकास गतिमान करण्याचा भास तेवढा अर्थमंत्र्यांनी निर्माण केला आहे.
-----------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव , पांढरकवडा , जि . यवतमाळ
मोबाईल- ९४२२१६८१५८
-------------------------------------------------------------------------------

Wednesday, January 25, 2017

जल्लिकट्टूचा सूंभ आणि दंभ

बैलाविरुद्धची क्रूरता थांबवायची असेल तर शेतीतूनच त्याची सुटका करावी लागेल. पण शर्यतीला विरोध असणाऱ्यांचा शेती यंत्राधारित नाही तर बैलाधारित व्हावी असा आग्रह असतो ! सर्वोच्च न्यायालयाने याचसाठी तर गोवंश हत्याबंदी कायदा वैध ठरविला आहे . बैलाचा जन्मच शेतीतील यातना सहन करण्यासाठी आहे असे ज्यांना वाटते त्यांनी जल्लीकट्टू किंवा बैलगाडीच्या शर्यतीत बैलांना होणाऱ्या त्रासावर अश्रू ढाळावेत हेच दांभिक आहे.
-------------------------------------------------------------------------------------------------------


 
महाराष्ट्राच्या  भागात बैलगाडीच्या शर्यती होतात तसाच बैलाला उधळायला लावून त्याच्यावर काबू मिळविण्याच्या शर्यतीचा प्रकार तामिळनाडूत लोकप्रिय आहे. यालाच जल्लीकट्टू  म्हणतात. जल्लीकट्टूचा  अर्थच बैलाच्या शिंगाला कापडात गुंडाळून बांधलेले बक्षीस त्या बैलावर काबू करून मिळवायचे. शर्यतीचा हा प्रकार शेकडो वर्षांपासून सुरु होता. कधी कधी या शर्यतीत बैलाला काबूत आणताना माणूस गंभीर जखमी होतो किंवा त्याचा मृत्यूही ओढवत असल्याने इंग्रजांच्या काळात काही जिल्हा कलेक्टरने बंदी घातल्याच्या नोंदी आहेत. पण त्या बैलाच्या नव्हे तर माणसाच्या सुरक्षिततेसाठी . शर्यतीचा हा प्रकार बैलांसाठी त्रासदायक, तापदायक आणि त्यांचा छळ करण्याचा प्रकार असल्याचे सांगत भूतदयावादी आणि प्राणीप्रेमी व्यक्ती व संघटनांनी यावर बंदी घालण्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून लावून धरली होती. तामिळनाडू सरकारने बंदी न घालता या शर्यतीचे नियमन करणारा कायदा केला. या कायद्याला प्राणीप्रेमी स्वयंसेवी संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. तामिळनाडूचा कायदा रद्द करून सर्वोच्च न्यायालयाने २०१४ मध्ये त्यावर बंदी घातली. जल्लीकट्टू सोबत महाराष्ट्र-कर्नाटकात होणाऱ्या बैलगाडी शर्यती आणि इतर प्रांतात याच धर्तीवर आयोजित शर्यतींना सर्वोच्च न्यायालयाने सरसकट बंदी घातली. या सगळ्या शर्यती शेतीकारणाशी , शेतीच्या अर्थकारणाशी निगडित असल्याने यावरील बंदी उठविली जावी ही  शेतकऱ्यांची मागणी होती. मात्र यासाठी शेतकऱ्यांनी कुठेही संघटितरित्या प्रयत्न वा आंदोलन केले नाही. अगदी तामिळनाडूतील ताज्या आंदोलनात शेतकऱ्यांचा फारसा सहभाग नाहीच. जल्लीकट्टू  वरील बंदी उठविण्यासाठी शेतकरी समूहापेक्षा भद्र आणि शहरी समाजाने सुरु केलेले हे आंदोलन होते आणि आहे. जल्लीकुट्टी ही शर्यत शेती आणि शेतकऱ्याशी संबंधित. मात्र बंदी घालताना त्याला कोणी विचारले नाही आणि बंदी उठविण्याची मागणी करतानाही त्याला कोणी विचारात घेत नाही. बंदी घालणारे आणि बंदीला विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरणारे दोघेही भद्र समाजातील. या दोघांची ही शेती आणि शेतीच्या अर्थकारणा विषयी अज्ञान आणि अनास्था सारखीच आहे.


असे असताना शेतकऱ्याशी निगडित या शर्यतीसाठी तामिळनाडूत आंदोलन झाले . यामागे शेतीचे अर्थकारण नसून तामिळनाडूचे राजकारण आहे. जयललिता यांच्या निधनाने निर्माण झालेल्या  राजकीय पोकळीतील अधीकाधिक हिस्सा आपण भरून काढावा यासाठी केंद्रात सत्तेत असलेल्या पण तामिळनाडूत फारसे स्थान नसलेल्या भारतीय जनता पक्षासहित सर्वच राजकीय पक्षात चुरस आहे.  जल्लीकट्टूशी  निगडित तामिळ भावनेला खतपाणी घालून ती फुलविण्याचा प्रत्येक राजकीय पक्षाच्या प्रयत्नांमागे हीच मनीषा आहे. शेतीशी संबंध नसलेले किंवा शेतीत परत जाण्याचा विचारही ज्यांच्या मनाला शिवत नाही असे विद्यार्थी व तरुण या आंदोलनात अग्रभागी आहेत. त्यामुळे शेतीच्या अर्थकारणाशी जल्लीकट्टू निगडित आहे आणि म्हणून त्याचे रक्षण झाले पाहिजे अशी तळमळ कुठेही नाही. उलट परंपरेची मळमळ मात्र बाहेर पडत आहे.  द्रविडी पक्षांचा प्रयत्न या निमित्ताने तामिळी अस्मितेला फुंकर घालण्याचा आहे तर भाजप सारख्या पक्षाचा प्रयत्न परंपरांचा बडेजाव प्रस्थापित करण्याचा आहे. वास्तविक या शर्यतीचा तामिळ अस्मितेशी वा धार्मिक परंपरेशी काहीही संबंध नाही. पिके हाती आल्याच्या आनंदा प्रित्यर्थ असे उत्सव वेगवेगळ्या पद्धतीने आणि वेगवेगळ्या नावाने वेगवेगळ्या प्रांतात साजरे होत असतात. अशा उत्सवांच्या समर्थकांत जशी शेतीची जाण नाही तीच बाब अशा उत्सवांचा विरोध करणाऱ्याच्या बाबतीत देखील खरी आहे. सर्वोच्च न्यायालयाकडे ज्या कारणांसाठी बंदीची मागणी करण्यात आली आणि न्यायालयाने ती मंजूर केली ते सगळेच हास्यास्पद आहे. अशा शर्यतीतून बैलांना ज्या यातना होतात त्यापेक्षा जास्त यातना प्रत्यक्ष शेतीच्या कामात होत असतात. शेतीत बैलाने नांगर ओढणे अपेक्षित आहे. ८-१० क्विंटलचे ओझे असलेली बैलबंडी ओढणे हे काय कमी यातनादायी आहे का. आरीने टोचणे , चाबकाने मारणे हे तर शेतीत चालूच असते. शेतीकामाच्या यातना स्वत:सहन करीत असलेला शेतकरी आपला त्रागा अनेकदा बैलावर काढतो. बैलावर प्रेम असूनही हे घडते. बैलाविरुद्धची क्रूरता थांबवायची असेल तर शेतीतूनच त्याची सुटका करावी लागेल. पण शर्यतीला विरोध असणाऱ्यांचा शेती यंत्राधारित नाही तर बैलाधारित व्हावी असा आग्रह असतो ! सर्वोच्च न्यायालयाने याचसाठी तर गोवंश हत्याबंदी कायदा वैध ठरविला आहे . बैलाचा जन्मच शेतीतील यातना सहन करण्यासाठी आहे असे ज्यांना वाटते त्यांनी जल्लीकट्टू किंवा बैलगाडीच्या शर्यतीत बैलांना होणाऱ्या त्रासावर अश्रू ढाळावेत हेच दांभिक आहे. धर्मवादाला खतपाणी घालण्याच्या राजकीय हेतूने केंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यावर राज्या-राज्यातील भाजपा सरकारांनी गोहत्याबंदी ऐवजी गोवंश हत्याबंदी कायदा आणला. शेतीत बैलाचा वापर कमी झाला असताना बैल सांभाळण्याची जबाबदारी शेतकऱ्यांवर टाकून भाजपने राजकीय सोय पाहिली . गोहत्या बंदी कायद्याच्या बाबतीत गोवंशाचे उतू जाणारे प्रेम भाजपने दाखविले. आणि आता तामिळनाडूत राजकीय सोय म्हणून मोदी सरकारने प्राण्यांविरुद्ध क्रूरता रोखणारा जो कायदा अस्तित्वात आहे त्यातून बैलाला वगळले आहे. यातून बैल वगळला जाऊ शकतो तर गोवंश हत्याबंदी कायद्यातून बैलांना वगळण्यास हरकत असण्याचे कारण नव्हते. शेतकरी हिताचा विचारच होत नसल्याने सरकार , न्यायालय आणि भद्र समाज व संघटना अशा कसरती करतात.


जल्लीकट्टू किंवा बैलगाडी शर्यत किंवा प्राण्यांच्या इतर शर्यतीवरील बंदी अतार्किक आणि अर्थहीन असली तरी या शर्यती चालू राहिल्या तर शेतकऱ्यांचा फार मोठा फायदा होईल या भ्रमात शेतकऱ्यांनी राहण्याचे टाळले पाहिजे. अशा शर्यतीतून चांगले ब्रीड जोपासले जाते हे खरे आहे. पण ते जोपासण्याचा खर्च अशा शर्यतीतून मिळणाऱ्या बक्षीसातुन निघणे कठीण आहे. अशा बैलांचा शेतीत किंवा वाहतुकीसाठी उपयोग नसेल तर त्याला बाजारात किंमत मिळू शकत नाही. गोवंश हत्याबंदी कायदा अस्तित्वात असताना तर नाहीच नाही. बैलांचा शेतीतील वापर दिवसेंदिवस कमी होत चालला आहे आणि त्यात वावगे मानण्याचे कारण नाही. बैलाला शेतीत राबविणे म्हणजे बैलासारखेच शेतकऱ्यालाही राबावे लागणे असते. शेतकऱ्यांची मुले शेतीत अशा प्रकारे राबू इच्छित नाहीत. त्यामुळे यंत्राधारित  शेती हेच भविष्य आहे. अशा स्थितीत जल्लीकट्टूसाठी  बैल जोपासण्याचा आग्रह शेतकऱ्याने धरणे म्हणजे सूंभ जळाला तरी पीळ कायम हे दाखविण्याचा प्रकार ठरेल. मात्र पशूपालन हा स्वतंत्र  व्यवसाय म्हणून उदयाला येऊ शकतो ,वाढू शकतो. केवळ शेतीत पोट भरत नाही म्हणून चार जनावरे जवळ बाळगणे ही  आपली पशुपालनाची कल्पना त्यागून एक स्वतंत्र व्यवसाय म्हणून त्याचे गणित मांडता आणि साधता आले पाहिजे. असे झाले तर चांगल्या जनावरांच्या पैदाशीला अनुकूल वातावरण तयार होईल. त्यासाठी जल्लीकट्टू किंवा बैलगाडी शर्यती सारख्या शर्यतीची गरज राहणार नाही. पण आपल्याकडे पशुपालनाचा व्यवसाय स्वतंत्रपणे उभा राहवा चालावा असे धोरणच नाही. आपल्याकडे पशुवर शेतीचा भार असतो किंवा शेतीवर पशूचा भार असतो. परिणामी दोन्हीपासूनही शेतकऱ्यांना फायदा होत नाही. आपल्याकडे पशुविषयक धोरण आहे ते जंगली पशूंबाबत . शेतकऱ्यांबद्दल कळवळा नाही , पण जंगली पशुबद्दल मात्र फार कळवळा. अरण्या जवळच्या शेतीत यांनी कितीही धुमाकूळ घातला , पिकांची नासाडी केली तर चालते. या प्राण्यांना आज जे संरक्षण मिळते , जंगलात त्यांच्या सोयीसाठी विशेष सुविधा निर्माण केल्या जातात तेवढी आत्मीयता पशुपालना बाबत दाखविली जात नाही. शेतकऱ्यांना सुचेल , जमेल त्यामार्गाने पशुपैदास वाढविण्याचा प्रयत्न केला तर अमुक बंदी , तमुक प्रतिबंध यामार्गाने त्याचा हिरमोड केला जातो. सगळे नियम कायदे हे शेतकऱ्यांसाठी अडचणीचे ठरत आले आहेत. शेतीशी संबंधित कायदे बनविताना शेतीबाह्य घटक शेतीबाह्य घटकांच्या हिताचा विचार करून कायदे बनवीत असतो. सिलिंग पासून गोवंश हत्याबंदीच्या कायद्यांपर्यंत सगळे कायदे असेच बनले आहेत. भद्र समाजातील स्वयंसेवी संस्था , न्यायालय आणि सरकार यांनी शेतकऱ्यांवर वेगवेगळे निर्बंध लादण्याचा  आपला उद्योग आटोपता घेतला नाही तर ते अराजकाला निमंत्रण ठरेल. जल्लीकट्टू आंदोलनात ती झलक दिसली आहे.
--------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव , पांढरकवडा , जि . यवतमाळ
मोबाईल - ९४२२१६८१५८
-----------------------------------------------------------------------



Thursday, January 19, 2017

मोदी चरखा !

प्रधानमंत्री मोदी ज्या चरख्या मागे बसले आहेत तो शेतकऱ्यांच्या शोषणाला विरोध करणारा गांधी चरखा नाही. शेतकऱ्यांसोबत चरखा चालविणारांचेही शोषण करणारा तो मोदी चरखा आहे. कारण आज हा चरखा चालवून पुरेसा मोबदला मिळत नाही. मोदींच्या चरखा छायाचित्राला विरोध या मुद्द्यावर व्हायला हवा.
---------------------------------------------------------------------------------------------------


चरख्या सोबतचे गांधीजींचे एक छायाचित्र जगप्रसिद्ध आहे. अगदी त्याच धर्तीवर प्रधानमंत्री मोदी यांचे छायाचित्र खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने आपल्या दिनदर्शिकेवर प्रकाशित करून एका विवादाला जन्म दिला आहे. याला गांधींची जागा घेण्याचा मोदींचा प्रयत्न  समजून गांधीप्रेमी आणि गांधीवादी कार्यकर्त्यांनी नापसंती व्यक्त करून आपला विरोध नोंदविला. खादी ग्रामोद्योग आयोगा अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आणि कारागिरांनीही एक दिवसाचा उपवास करून सदर छायाचित्राला विरोध केला. दुसऱ्या बाजूने खादी ग्रामोद्योग आयोगाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि मोदी समर्थकांनी या कृतीचे जोरदार समर्थन केले आहे. विरोध आणि समर्थनाचे दोन्ही बाजूचे म्हणणे आपापल्या जागी रास्त असू शकेल. विरोध आणि समर्थन करीत असताना एक गोष्ट अधोरेखित झाली ती म्हणजे चरख्याचे महत्व ! विरोधक आणि समर्थक यांनी जे मुद्दे मांडलेत त्यावरून त्यांना चरखा आज प्रासंगिक वाटतो हे स्पष्ट होते. पण या सगळ्या वादात चरख्याच्या आजच्या प्रासंगिकतेवर फारसे बोलले गेले नाही. आजच्या संदर्भात चरख्याची प्रासंगिकता तपासण्यासाठी या वादातील दोन्ही बाजूचे म्हणणे समजून घेणे उपयुक्त ठरेल.

मोदींच्या अशा छायाचित्राला विरोध करण्यामागे एक मोठे आणि महत्वाचे जे कारण सांगितले जाते ते छायाचित्राच्या घटनेशीच निगडित आहे असे नाही. ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पाठिंब्याने प्रधानमंत्री मोदी यांनी सत्ता मिळविली आहे त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आधुनिक भारताची जडणघडण करणाऱ्या बहुतांश महापुरुषांना, त्यांच्या कार्याला आणि विचारधारेला विरोध राहिला आहे. अशा महापुरुषात फुले , गांधी, आंबेडकर , नेहरू , सुभाषचंद्र बोस , सरदार पटेल यांचा समावेश आहे. हे सगळेच महापुरुष भारतीय जनतेला वंदनीय आहेत. ज्यांना आजवर विरोध केला त्यांना आपल्या द्वेषावर आधारित विचारसरणीच्या प्रसारासाठी आणि या विचारसरणीला लोकमान्यता मिळविण्यासाठी आपल्या दावणीला बांधण्याचा संघाचा प्रयत्न असल्याचा संघ विरोधकांचा आरोप आहे. मोदींचा गांधी-आंबेडकरांना जवळ करण्याचा प्रयत्न संघाच्या या व्यापक हेतूपूर्तीचा प्रयत्न म्हणून पाहिला जातो. या दृष्टिकोनातून त्या छायाचित्राकडे पाहिल्या गेल्याने त्याच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटली. विरोधाचे दुसरे कारण गांधींची हुबेहूब नक्कल करणारे छायाचित्र लोकांपुढे आणून मोदी स्वतःला या महापुरुषांच्या रांगेत प्रतिष्ठित करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा समज होऊन या छायाचित्राला विरोध झाला. या कारणात तथ्य आहे असे मानले तरी मोदी विरोधाची ही दोन्ही कारणे छायाचित्र प्रसिद्ध होण्या आधीपासूनच अस्तित्वात होती. चरख्यावरील छायाचित्राने त्याला उजाळा तेवढा मिळाला. १० लाखाचा कोट घालणारा आणि एक दीड लाखाचा पेन वापरणारा व्यक्ती सादगीचे प्रतीक असलेला चरखा चालवितो हे दांभिकपणाचे आहे असे वाटून या छायाचित्राला विरोध झाला आहे. चरख्या मागची गांधींची आर्थिक विचारसरणी आणि मोदींची आर्थिक विचारसरणी परस्पर विरोधी असल्याने अशा छायाचित्राला विरोध याला फारतर विरोधामागचे प्रासंगिक कारण म्हणता येईल. चरख्याचा प्रसार आणि खादीचा वापर ही आजची गरज असेल तर देशाचा प्रधानमंत्री त्याचा पुरस्कार करतो ही तर स्वागतयोग्य घटना वाटायला हवी होती. पण तसे झाले नाही. चरखा आणि खादी पेक्षा मोदी विरोध प्रबळ ठरला.
                                                                                                                                                                                                                                  छायाचित्रात गांधींची जागा घेण्याची मोदींची कृती आक्षेपार्ह आहे हे पटण्याजोगे कारण कोणी दिले असेल तर ते मोदी समर्थकांनी दिले आहे. हरियाणा राज्याचे मंत्री श्री.वीज यांनी खादी आणि चरख्याच्या प्रसारासाठी गांधींपेक्षा मोदी हे अधिक योग्य असल्याचे प्रतिपादन करून अशाप्रकारच्या छायाचित्रमागची खरी भूमिका मांडली ! मोदींना गांधींच्या रांगेतच नाही तर गांधी पेक्षा वरचे स्थान देण्याचा मोदी समर्थकांचा प्रयत्न हा निश्चितच हिणकस आणि आक्षेपार्ह आहे. मोदी समर्थक राजकारण्यांनी त्यांची हुजरेगिरी करावी हे समजण्या सारखे आहे. पण ज्या चरख्याचा आणि खादीचा गांधीजींशी अन्योन्य संबंध आहे त्याच्या प्रचार आणि प्रसारासाठी स्थापित खादी ग्रामोद्योग आयोगाच्या पदाधिकाऱ्यांनी सत्ताधाऱ्यांची अशी हुजरेगिरी करावी हे त्यापेक्षा जास्त आक्षेपार्ह आणि धोकादायक आहे. ज्या संस्था आणि व्यक्तींनी आपला कणा आणि मान ताठ ठेवण्याचा आदर्श समाजासमोर ठेवायला हवा त्यांनी लाचारीचे उदाहरण समाजासमोर ठेवावे हा खरे तर या प्रकरणी सर्व गांधीजनांनाच नाही तर लोकशाहीवर प्रेम असणाऱ्या प्रत्येकाला आक्षेपार्ह वाटायला हवे होते. सत्तेच्या लांगूलचालनाची समाजात पसरत चाललेल्या किडीने गांधीवादी संस्था देखील पोखरल्या आहेत हे मोदींनी चरखा पळविण्यापेक्षा जास्त गंभीर आहे.

खरेतर हा वाद विचाराच्या अंगाने पुढे आणण्याची गरज होती. जेव्हा देशाचा प्रधानमंत्री चरख्यामागे बसतो तेव्हा तो चरख्याचे महत्व लोकमनावर बिंबवीत असतो. पण प्रधानमंत्री जे महत्व बिंबवीत आहेत ते कोणते - वर्तमानातील की ऐतिहासिक ? वर्तमानात चरखा उपयुक्त असल्याचे चरख्या सोबत मोदींच्या छायाचित्राला विरोध करणारे आणि त्या छायाचित्राकडे भक्तिभावाने पाहणारे हे दोघेही सांगतात पण त्यात खरेच तथ्य आहे का ? एखाद्या महापुरुषाने काळानुरूप केलेली गोष्ट चिरस्थायी मानण्याची आमच्या समाजाला बिमारीच जडली आहे. त्यातलाच हा प्रकार .  त्यावेळी परकीय सत्ता असताना त्या सत्तेच्या मदतीशिवाय लोकांच्या हाती देता येईल असे सुलभ तंत्रज्ञान म्हणजे चरखा. त्याकाळी चरखा वाढला , विस्तारला , विकसित झाला तो स्वयंपूर्णतेकडे वाटचाल म्हणून. तरीही त्याकाळी लोकांच्या वस्त्राची गरज चरखा पूर्ण करू शकला नव्हता. लोकांची वस्त्राची गरज पूर्ण झाली ती विकसित झालेल्या नवीन तंत्रज्ञानाने. त्याकाळातही चरखा लोकांच्या हाताला काम देणारे , लोकांना रोजगार देणारे साधन म्हणून  नव्हताच. आमच्या इथला कापूस स्वस्तात नेवून महागडे कापड आमच्या माथी मारत स्वत:ची आर्थिक भरभराट करणाऱ्या इंग्रजांच्या धोरणाला विरोध म्हणून त्याकाळी चरख्याचे महत्व होते. त्या काळाप्रमाणे आजही चरखा लोकांची वस्त्राची आणि रोजगाराची गरज पूर्ण करण्यासाठी उपयुक्त नाहीच पण ज्या आर्थिक साम्राज्यवादाच्या विरोधाचे चरखा हे प्रतीक होते , आजही चरख्यामागील ते तत्वज्ञान तितकेच उपयुक्त आणि लागू आहे. कारण शेतकऱ्याचा कापूस आजही स्वस्तात लुबाडण्याची व्यवस्था कायम आहे. या लुबाडणुकीला विरोध ही चरख्या मागची भूमिका होती. आज उत्पादनासाठी चरखा प्रासंगिक नाही , शेतकऱ्यांच्या लुबाडणुकीला विरोधाचे प्रतीक म्हणूनच चरख्याकडे पाहावे लागेल. मग या लुबाडणुकीला विरोध म्हणून मोदी चरखा समोर करीत आहेत का हा खरा प्रश्न आहे. मोदी सरकारची आर्थिक धोरणे ही शेतकऱ्यांना मातीत घालणारी ठरली आहेत. ज्या चरख्याला हात लावून मोदीजी बसले आहेत त्या चरख्या मागील तत्वज्ञानाला मोदी  सरकारची  शेतीविषयक धोरणे पायदळी तुडवीत आहेत. शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचे दाम मिळणार नाहीत अशी धोरणे राबवीत असल्याने प्रधानमंत्री मोदींना चरख्यामागे बसण्याचा किंवा चरख्याचा पुरस्कार करण्याचा कोणताही नैतिक हक्क नाही. मोदी ज्या चरख्या मागे बसले आहेत तो शेतकऱ्यांच्या शोषणाला विरोध करणारा गांधी चरखाच नाही. शेतकऱ्यांसोबत चरखा चालविणारांचेही शोषण करणारा तो मोदी चरखा आहे. कारण आज हा चरखा चालवून पुरेसा मोबदला मिळत नाही. मोदींच्या चरखा छायाचित्राला विरोध या मुद्द्यावर व्हायला हवा. 
-------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव , पांढरकवडा , जि . यवतमाळ
मोबाईल - ९४२२१६८१५८
---------------------------------------------------------------------------------

Thursday, January 12, 2017

काळ्या पैशा विरुद्ध दिशाहीन लढाई

नोटाबंदीच्या  निर्णयामुळे अधिक लोक कॅशलेस व्यवहाराकडे वळतील , आयकर चुकविणारे आयकर भरायला लागतील असे काही फायदे निश्चितच होतील. पण नोटबंदीचा निर्णय असे फायदे मिळविण्यासाठी होता का आणि नोटाबंदी शिवाय हे फायदे मिळू शकले नसते का हा प्रश्न प्रत्येकाने स्वत:ला विचारला पाहिजे. याच्या उत्तरातून नोटाबंदीचे यश-अपयश लक्षात येईल.
----------------------------------------------------------------------------------------


मोदी सरकारने ८ नोव्हेंबर रोजी काळ्या पैशाविरुद्ध रणशिंग फुंकले. प्रधानमंत्र्यांनी या लढाईत सामान्य जनतेची साथ मागितली आणि जनतेने सर्वप्रकारचे कष्ट सहन करून साथ दिली. मागच्या दोन महिन्यात बँकेच्या रांगेत हाती स्लिप घेऊन उभा असलेला प्रत्येक माणूस हाती काळ्या पैशा विरुद्ध लढायची तलवार आहे असेच समजत होता. महिनाभर तर अतिउत्साहात सामान्य माणूस या लढाईत उतरला होता. नंतर कुरकुरत का होईना सामान्य माणसाने सरकारची साथच दिली. पण ज्या सरकारने देशातील समस्त जनतेला या लढाईत उतरविले ते सरकार या लढाईसाठी कितपत तयार होते , सरकारकडे विजयाची काही व्यूहरचना होती की नाही असे अनेक प्रश्न या काळात उपस्थित झालेत. असे प्रश्न उपस्थित करणारे काळ्या पैशावाल्यांचे साथीदार आहेत , देशद्रोहीं आहेत असा उलट आरोप करून ते प्रश्न बाजूला सारण्यात आले. तरीही परिस्थितीने त्या प्रश्नांची उत्तरे मागच्या दोन महिन्याच्या काळात स्पष्ट केली आहेत .



घोषित केलेल्या लढाईतून काय साध्य करायचे आहे याचीच पुरेशी स्पष्टता सरकारकडे नव्हती किंवा जे साध्य करायचे होते ते मृगजळ होते आणि या मृगजळा मागे सरकारने साऱ्या देशाला धावायला लावले असे सकृतदर्शनी वाटावे अशी आजची परिस्थिती आहे. लढाई सुरु करताना लढाईचा सेनापती कोण हे ठरविणे महत्वाचे असते. प्रधानमंत्री मोदीच या लढाईचे सेनापती आहेत असे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे बिंबविण्यात आले. लढाईत विजय मिळत नाही हे लक्षात आल्यावर मात्र लढाईचे सेनापती भारतीय रिझर्व्ह बँक असल्याचे सांगण्यात आले. कालौघात हे देखील स्पष्ट झाले कि  रिझर्व्ह बँक ही केवळ नामधारी सेनापती आहे. प्रधानमंत्री , अर्थमंत्री आणि त्यांचे  मंत्रालय  व रिझर्व्ह बँक असे तीन ठिकाणाहून या काळात निर्णय होत असल्याने निर्णयात कोणताच ताळमेळ नव्हता. प्रधानमंत्र्यांनी जनतेला एक सांगायचे आणि निर्णय मात्र नेमका त्याच्या उलट व्हायचा असे एका पेक्षा अधिकवेळा घडल्याचे आपण पाहिले आहे. जो कोणी निर्णय घ्यायचा तो तरी कितपत विचारपूर्वक असायचा या बाबत या काळात अनेकदा प्रश्न पडले आहेत. कारण आज घेतलेले निर्णय काही तासातच फिरविले जायचे. दोन महिने उलटून गेल्यावरही या परिस्थितीत फरक पडलेला नाही यावरून वरच्या पातळीवर असलेल्या गोंधळाची कल्पना येईल. प्रधानमंत्र्यांनी आणि अर्थमंत्र्यांनी अनेकदा सांगितले होते कि ज्यांना ३० डिसेम्बर पर्यंत पैसे जमा करता आले नाहीत ते स्पष्टीकरणासह ३१ मार्च पर्यंत जुन्या रद्द झालेल्या नोटा जमा करू शकतील. शिवाय नव्या अभय योजने अंतर्गत अघोषित संपत्ती घोषित करण्याची मुदत ३१ मार्च पर्यंत आहे. असे असताना सरकारने जुन्या चलनी नोटा जवळ बाळगणे हा गुन्हा ठरविणारा वटहुकूम जारी केला आहे. या वटहुकूमाचा अंमल ३१ मार्च नंतर करणे तर्कसंगत ठरले असते. पण एकूणच काळ्या पैशा विरुद्धची ही लढाईच अतार्किक असल्याने असा गोंधळ टाळता येत नसावा.


निर्णयाच्या अंमलबजावणीचे एक निर्णय केंद्र न राहता एका पेक्षा अधिक राहिली याचे कारण निर्णयाचा राजकीय फायदा मिळण्यावर अधिक लक्ष केंद्रित झाले हे आहे. परिणामाची सगळी जबाबदारी घेऊन राजकीय फायदा उचलला असता तर ते क्षम्य मानता आले असते.अंगलट येतील त्या गोष्टीसाठी  रिझर्व्ह बँक हक्काचा बळीचा बकरा ठरली.. अर्थकारणाचा विचार न होता राजकारणाचा अधिक विचार झाला आणि त्यामुळे आर्थिक दृष्टीने या निर्णयाचे अपेक्षित परिणाम साधता आले नाहीत असे प्राथमिक निष्कर्ष काढता येण्यासारखे तथ्य समोर आले आहेत. त्या तथ्यावर नजर टाकण्या आधी १९७८ साली झालेल्या अशाच प्रयोगाच्या वेळी काय घडले याच्यावर नजर टाकली तर राजकीय श्रेयाच्या मुद्द्यावर अधिक प्रकाश पडेल. मोरारजी सरकारने १९७८ साली मोठ्या मूल्याच्या चलनी नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला तेव्हा सरकारने अंमलबजावणीची सूत्रे रिझर्व्ह बँकेकडे सोपविली होती. या निर्णया मागे प्रधानमंत्री आहेत असे कोणतेही चित्र उभे करण्यात आले नव्हते. निर्णयाची घोषणा सुद्धा प्रधानमंत्र्यांनी न करता अर्थमंत्र्यांनी केली होती. 'कोणालाही काळ्याचे पांढरे करण्याची संधी मिळू नये यासाठी मोदीजींनी बँक व्यवहार बंद झाल्यावर घोषणा केली' असे आताच्या निर्णया बद्दल सांगितल्या गेले. मात्र त्यावेळी अर्थमंत्री पटेल यांनी बँक व्यवहार सुरु होण्याआधी सकाळी ९ वाजता या निर्णयाची घोषणा करून दिवसभराचे बँक व्यवहार बंद झाल्या नंतर मोठ्या मूल्याच्या चलनी नोटा चलनातून बाद होतील असे जाहीर केले होते. म्हणजे म्हंटले तर दिवसभरात काळ्याचे पांढरे करण्याची  सोय त्यावेळच्या निर्णयात होती. आणि तरीही त्यावेळी २५ ते ३० टक्के रद्द झालेले मोठ्या मूल्याचे चलन रिझर्व्ह बँकेकडे परत आले नव्हते. २५ ते ३० टक्के काळ्या पैशाच्या रूपातील रक्कम बँकेत जमा न होणे हे त्यावेळच्या निर्णयातील मोठे यश होते आणि कोणत्याही गोंधळाविना ते यश मिळाले. याचे महत्वाचे कारण राजकीय लाभासाठी तो निर्णय घेण्यात आला नव्हता . आर्थिक निर्णय म्हणूनच परिणामकारक अंमलबजावणी केल्याने त्यावेळी त्याचे लाभ पदरात पडले होते. यावेळी असे घडले नाही त्यामागे राजकीय श्रेय पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न तर कारणीभूत नव्हता ना या अंगाने या निर्णयाचे विश्लेषण करण्याची गरज आहे. रिझर्व्ह बँकेने  यावेळी किती रक्कम जमा झाली हे अधिकृतपणे अद्याप जाहीर केले नसले तरी बाहेर झिरपलेल्या माहितीनुसार ३० डिसेंबर पर्यंत रद्द झालेले ९० ते ९५ टक्के चलन रिझर्व्ह बँकेकडे जमा झाले आहे. यात देशभरातील सहकारी बँकांकडे त्यांच्यावर जुन्या चलनाचा व्यवहार करण्यावर बंदी घालण्या आधी जमा झालेल्या जुन्या चलनाचा समावेश नाही. शिवाय जुने चलन थेट रिझर्व्ह बँकेकडे जमा करण्याची मुदत ३१ मार्च पर्यंत असल्याने रद्द झालेले जवळपास १०० टक्के चलन रिझर्व्ह बँकेकडे जमा होईल असा अंदाज व्यक्त होत आहे.


याच स्तंभात ४ डिसेंबर रोजी प्रकाशित लेखात (साहस की दु:साहस) मोदी सरकारचा निर्णय यशस्वी की  अयशस्वी हे पाहण्याच्या दोन कसोट्या सांगितल्या होत्या . एक , हा सगळा  खटाटोप करण्यासाठी लागलेला खर्च बाहेर आलेल्या काळ्या पैशाच्या तुलनेत कमी आहे की जास्त. दोन, सरकार आणि नीती आयोगाच्या मते अर्थव्यवस्थेत ४ लाख कोटींचा काळा पैसे आहे आणि तो बँकेत जमा होणार नाही असा त्यांचा अंदाज होता. असे झाले तर मोदींची ही खेळी यशस्वी मानावी . पण या दोन्ही कसोट्यांवर मोदी सरकारचा निर्णय सपशेल अपयशी ठरला आहे. लोकांना झालेला त्रास आणि अर्थव्यवस्थेवर झालेला आघात हे आणखी वेगळे मुद्दे आहेत. पण हा तात्कालिक परिणाम म्हणून इकडे दुर्लक्ष करता येईल. काळा पैसा अर्थव्यवस्थेच्या बाहेर का पडला नाही यावर गंभीर मंथन झाले पाहिजे. असे गंभीर मंथन झाले तरच सरकारी निर्णय प्रक्रियेतील दोष आणि त्रुटी लक्षात येतील आणि त्यात सुधारणा करता येतील. ढोबळमानाने जे लक्षात येते त्यानुसार निर्णयाचा आर्थिक अंगाने फारसा विचारच झाला नाही. रिझर्व्ह बँकेने कोणतीही तयारी केली नसताना निर्णय लादण्यात आला . त्यामुळे जनता , रिझर्व्ह बँक व इतर बँका आणि स्वत:सरकार या सर्वांची फरफट झाली. अर्थव्यवस्थेच्या फायद्याच्या नावावर राजकीय फायदा बघितला गेला. काळ्या पैशाविरुद्धच्या लढाईचा आव तर आणल्या गेला , प्रत्यक्षात निर्णय मात्र उलट झाले. पूर्वतयारीचा अभाव असल्याने टोल ,पेट्रोल पंप , औषधी दुकाने , दूरसंचार कंपन्या , रेल्वे अशा अनेक ठिकाणी जुन्या नोटा वापरण्याची परवानगी द्यावी लागली. अशी परवानगी म्हणजे काळ्याचे पांढरे करण्याचे परवाने ठरले. ८ नोव्हेंबरच्या मोदीजींच्या नोटाबंदीच्या घोषणे नंतर सोने खरेदी साठी देशभर झुंबड उडाली . देशभरातील सगळी सोन्याचांदीची दुकाने घोषणा झाल्या पासून २४ तास उघडी होती. कित्येक टन सोन्याची विक्री ८ नोव्हेंबरच्या रात्रीपासून १-२ दिवसात झाली आणि अनेकांना काळ्याचे पांढरे करण्याची सुवर्णसंधी मिळाली. सोन्या मध्ये काळा पैसा गुंतला हे उघड असताना सरकारने उदारपणे घरटी १-२ किलो सोने बाळगण्याची परवानगी दिली ! हे सोने कसे विकत घेतले हे सांगण्याचे बंधन सुद्धा काढून टाकले ! स्वत:हून काळा पैसा घोषित करण्याची अभय योजना ३० सप्टेंबर पर्यंत सुरु होती. तीला फारसा प्रतिसाद लाभला नव्हता. यासाठी मुदतवाढ तेव्हाच देता आली असती. नोटाबंदी लागू केल्यानंतर नव्याने काळ्या पैसे वाल्यासाठी अभय योजना सुरु करणे याला काळ्या पैशा विरुद्धची लढाई कशी म्हणता येईल . ही तर त्यांना सरकारने केलेली मदत म्हणावी लागेल. 


देशात काळा पैसा तयार होण्याचा सर्वात मोठा कारखाना कोणता असेल तर तो म्हणजे पंचायती पासून लोकसभे पर्यंत होणाऱ्या निवडणुका . या निवडणुकांसाठी राजकीय पक्ष जो पैसे वापरतात तो अधिकांश काळा पैसा असतो हे जगजाहीर आहे. उद्योगपती , आयातदार , निर्यातदार , मोठमोठे व्यापारी , कंत्राटदार यांचेकडून हा पैसा राजकीय पक्षांकडे  येतो. बदल्यात या सर्वाना जनतेच्या संसाधनांवर हात मारण्याची सवलत मिळत असते. देशातील भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाचा खरा उगम आणि वाढ इथून होते. या बाबतीत सरकारने काय केले ? तर राजकीय पक्षांना पक्षनिधी म्हणून मिळालेल्या ५००-१००० च्या कितीही नोटा बँकेत जमा करण्याची परवानगी दिली ! म्हणजे प्रचंड प्रमाणात काळा पैसा बाळगून असणाऱ्यांना अभय आणि रोजच्या व्यवहारात थोडा फार काळा पैसा बाळगून असणाऱ्या भुरट्याच्या मुसक्या आवळून काळ्या पैशा विरुद्ध लढाई लढत असल्याचा भास तेवढा सरकारने निर्माण केला आहे. काळ्या पैशा विरुद्धच्या लढाई विषयी स्वत: प्रधानमंत्री आणि त्यांचा पक्ष किती गंभीर आहे हे याच काळात झालेल्या प्रधानमंत्र्याच्या उ.प्र . निवडणुकी साठीच्या लखनौ येथे झालेल्या प्रचारसभे वरून लक्षात येईल. ही सभाच आपल्याला उ.प्र . निवडणुकीत काळ्या पैशाचा कसा महापूर येणार याचा अंदाज देऊन जाते. प्रधानमंत्री मोदी यांची काळ्या पैशा विरुद्धची लढाई ही  मुळावर घाव घालणारी नसून निव्वळ फांद्या छाटणारी आहे हे यावरून लक्षात येईल. फांद्या छाटल्या की नव्या फांद्या किती जोमाने वाढतात हे आपल्याला माहित आहे. मुळावर घाव न घातल्याने काळा पैसा निर्माण होणे थांबणार नाही. किंबहुना नोटाबंदीच्या या प्रक्रियेतच कितीतरी काळा पैसा निर्माण झाल्याचे आपण पाहिले आहे. या निर्णयामुळे अधिक लोक कॅशलेस व्यवहाराकडे वळतील , आयकर चुकविणारे बरेच लोक आयकर भरायला लागतील असे काही फायदे निश्चितच होतील. पण नोटबंदीचा निर्णय असे फायदे मिळविण्यासाठी होता का आणि नोटाबंदी शिवाय हे फायदे मिळू शकत नव्हते का हा प्रश्न प्रत्येकाने स्वत:ला विचारला पाहिजे. याच्या उत्तरातून नोटाबंदीचे यश-अपयश लक्षात येईल.
----------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव, पांढरकवडा , जि . यवतमाळ 
मोबाईल - ९४२२१६८१५८
----------------------------------------------------------------------------- 

Friday, January 6, 2017

कॅशलेस व्यवहारातील अडचणी आणि अडथळे


प्रधानमंत्री मोदी यांनी वर्षभरापूर्वी मोठा गाजावाजा करत ‘डिजिटल इंडिया’ची घोषणा केली होती. ग्रामीण भागात डिजिटल (कॅशलेस) व्यवहारातील अडचणी लक्षात घेतल्या तर डिजिटल इंडिया योजनेच्या घोषणे पलीकडे काही काम झाले नसल्याचे लक्षात येते. कॅशलेस इंडिया ही देखील अशीच घोषणा ठरणार आहे कारण त्यासाठी आवश्यक संरचना , नियम , कायदे तयार करण्याकडे सरकारचे लक्षच नाही.
-----------------------------------------------------------------------------


सध्या कॅशलेस व्यवहाराचा बोलबाला आहे. म्हणजे सध्या बोलाच्याच पातळीवर हे व्यवहार आहेत. कॅशलेस व्यवहार सार्वत्रिक होण्यात अनेक अडचणी आणि अडथळे आहेत. नोटाबंदी नंतर कॅशलेस व्यवहार वाढलेत हे खरे आहे. जे आधीपासून काही बाबतीत हे व्यवहार करीत होते ते आता अधिक प्रमाणात करू लागले आहेत. मॉल मध्ये कॅशलेस व्यवहाराची सुविधा होती तेव्हा तिथले अधिकांश व्यवहार कॅशलेस म्हणजे डेबिट कार्ड क्रेडीट कार्ड याच्या सहाय्याने होत. नाणे टंचाईने अनेक दुकानदारांना ही सुविधा उपलब्ध करून द्यावी लागली आणि त्यामुळे हे व्यवहार वाढले. वीज आणि इन्टरनेट याची अखंड सुविधा आधीपासून उपलब्ध आहेत त्या भागात हे व्यवहार वाढले आहेत. अशा व्यवहारासाठीच्या मुलभूत सुविधा वाढल्या तर व्यवहार आपोआप वाढतात. त्यासाठी विशेष प्रचार आणि जाहिरातीची गरज पडत नाही. मुलभूत सोयीच उपलब्ध नसतील तर कितीही जाहिरात आणि प्रचार केला तर त्याचा काही उपयोग होणार नाही. सोयी उपलब्ध करून देण्याऐवजी सरकार जाहिरातबाजीवर शक्ती वाया घालवीत असल्याने कॅशलेस व्यवहारातील अडचणी आणि अडथळे दूर होत नाहीत. अडचणी आणि अडथळे दूर होतील त्याप्रमाणात असे व्यवहार वाढीस लागतील. कॅशलेस व्यवहार हा आर्थिक व्यवहार करण्याचा पुढचा किंवा प्रगतीशील टप्पा आहे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीतून अशा गोष्टी सहज साध्य होतात. २००० साली आपल्याकडे मोबाईल ही नवलाईची आणि महागडी गोष्ट होती. अवघ्या १०-१५ वर्षाच्या काळात मोबाईल गरिबाला परवडू लागला आणि गरीबाच्या हाती आला. घरोघर आला. मोबाईल-टीव्ही यावर गाणी बातम्या ऐकू येवू लागल्या तसे रेडीओ-टेपरेकॉर्डर इतिहास जमा झालेत. ते इतिहासजमा करण्यासाठी कोणाला काहीच करावे लागले नाही. लोक सोयीच्या गोष्टी सोयीचे व्यवहार आपलेसे करून पुढे जात असतात. कॅशलेस व्यवहाराच्या बाबतीत अगदी तसेच आहे. ज्यांना हा व्यवहार सोयीचा आणि शक्य वाटला त्यांनी तो नोटाबंदीच्या आधीच सुरु केला होता. प्रगतीशील राष्ट्रे आहेत तिथे अधिक प्रमाणात कॅशलेस व्यवहार होतात. आपल्या देशात मुंबई दिल्ली बंगलोर अशी जी अनेक प्रगत बेटे तयार झाली आहेत तिथेही असे व्यवहार अधिक प्रमाणात होतात. म्हणजे कॅशलेस व्यवहाराचा मुद्दा तुमच्या आर्थिक आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीशी जोडल्या गेला आहे. प्रत्येक प्रकारच्या चलन व्यवहाराचे जसे फायदे -तोटे असतात तसेच या व्यवहाराचेही आहे. हा व्यवहार अंगिकारला म्हणजे अर्थव्यवहाराशी निगडीत समस्या भ्रष्टाचार ,काळाबाजार सगळे संपेल आतंकवाद संपेल हा भाबडा आशावाद आहे. ज्या देशात मोठ्या प्रमाणावर कॅशलेस आर्थिक व्यवहार होतात त्यादेशातही आर्थिक घोटाळे आणि भ्रष्टाचार सुरूच असतो. तेव्हा कॅशलेसच्या मुद्द्याकडे व्यावहारिक दृष्टीने पाहण्याची गरज आहे. कॅशलेस व्यवस्थेचे फायदे तोटे लक्षात घेवून त्याचा डोळसपणे अंगीकार केला पाहिजे. 



 तुमच्या जवळ मोबाईल असेल तर तुम्हाला वेळ बघण्यासाठी वेगळे घड्याळ जवळ बाळगण्याची गरज नाही. त्याचप्रमाणे तुमचा मोबाईल नंबर बँक खात्याशी जोडून मोबाईल बटवा(वैलेट) तयार केला किंवा जवळ रूपे किंवा इतर कार्ड ठेवले तर वेगळे पैशाचे पाकीट ठेवावे लागणार नाही आणि ते सांभळत बसावे लागणार नाही ही सोय कॅशलेस व्यवहारात होते. खिशात किंवा घरी पैसे ठेवायची गरज पडली नाही तर दरोडेचोऱ्या लुटमार टळेल. आपल्याकडे हे कितपत होईल सांगता येत नाही. कॅशलेस झालो तरी सोन्याचा मोह सुटणार नाही आणि ते चोर - दरोडेखोर यांना आमंत्रणच ठरणार आहे. शिवाय मोदी सरकारची नजर सोन्यावर केव्हाही पडू शकते या भीतीने लोक लॉकर मधील सोनेही घरी आणून ठेवतील त्यामुळे कॅशलेस झाले कि चोऱ्या,दरोडे थांबतील असे म्हणता येणे कठीण आहे. पण कॅशलेस होण्याने देशाचा काही बाबतीत फायदा होईल. आज आपला चलन छपाई खराब नोटा बदलणे चलन लोकांपर्यंत पोचविणे याचा रिझर्व बँकेला दरवर्षी २१००० कोटीचा खर्च येतो. या खर्चात मोठी बचत शक्य आहे. दुकानंदारासाठी असा व्यवहार सक्तीचा केला तर बरीच करचोरी वाचेल आणि काळा पैसा कमी होईल. त्याच बरोबर अशा व्यवहारात मोठे धोके आहेत हे देखील लक्षात घेतले पाहिजे. चोरी-दरोडे कमी झाले तरी सायबर गुन्हे वाढणार आहे. तुमच्या खात्यातून तुमचे पैसे परस्पर लंपास करणारे सायबर चाचे नवे चोर असतील. पुढच्या दोन वर्षात स्वीडन हा देश जगातील पहिला कॅशलेस आर्थिक व्यवहार करणारा देश बनणार आहे. या देशाचे बऱ्याच काळापासून अधिकांश आर्थिक व्यवहार कॅशलेस होत आहे. तिथे गुन्हे आणि गुन्हेगार कसे बदलले हे पाहिले की मुद्दा आणि त्याचे गांभीर्य लक्षात येईल. 


स्वीडनमध्ये २००८ साली  ११० बँक दरोड्याच्या घटनाची नोंद झाली होती. कॅशलेस व्यवहार वाढल्याने २०१५ पर्यंत दरोड्याच्या संख्येत घट होऊन ती ५ पर्यन्त खाली आली. पण दुसरीकडे इलेक्ट्रॉनिक अफरातफरीमध्येच्या घटनांमध्ये तिथे प्रचंड वाढ झाली आहे. खात्यातून परस्पर पैसे लांबविण्याच्या २०१४ मध्ये १ लाख ४० हजार घटनांची नोंद झाली . ही संख्या तिथे मागच्या दशकात घडलेल्या अशा घटनांच्या जवळपास दुप्पट आहे. २०१५ मध्ये ही संख्या १ लाख ८५ हजार इतकी होती. अवघ्या १ कोटीची लोकसंख्या असलेल्या या छोट्या देशात अशा घटनांचे प्रमाण मोठे आहे. पण तिथले तंत्रज्ञान प्रगत आहे आणि अशा घटनांचा पाठपुरावा करून गुन्हेगारापर्यंत पोचण्यास सक्षम आहे. तिथले सायबर कायदे कडक आहेत. स्वीडनपेक्षा सव्वाशे पट अधिक असलेल्या जनसंख्येच्या देशात जिथे तंत्रज्ञान पुरेसे प्रगत नाहीत , सायबर सुरक्षेचे कायदे नाहीत काय होईल याची आपल्याला कल्पना करता येईल. काही महिन्यापूर्वी अनेक बँकाच्या ३२ लाख डेबिट/क्रेडीट कार्डचा डाटा सायबर गुन्हेगाराने चोरला होता. या घटनेत कोणाच्या खात्यातून पैसे गेल्याची नोंद नाही . पण बँकांना हे कार्ड रद्द करून नवीन कार्ड त्या ग्राहकांना द्यावी लागली आणि त्यात एक महिना गेला. कार्ड धारकांना एक महिना व्यवहार करता आला नाही. सरकार मोबाईल वैलेटची जोरदार वकिली करीत असतांना आणि यासाठीची प्रसिद्ध कंपनी पेटीएमला रिझर्व बँकेने परवानगी दिली असताना भारतीय स्टेट बँकेने सुरक्षेच्या कारणास्तव आपल्या ग्राहकाच्या खात्यातून या कंपनीकडे पैसे वर्ग करायला नकार दिला आहे. अनेक परकीय संस्था आणि या क्षेत्रातील तज्ज्ञांनी भारतात मोबाईल वैलेट साठी वापरले जाणारे तंत्रज्ञान आधुनिक नसल्याने धोकादायक असल्याचे मत व्यक्त केले आहे. यावरून सरकार , रिझर्व बँक आणि इतर बँका यांच्यातच एकवाक्यता नाही. सरकार आणि रिझर्व बँकेला ग्राहकाच्या सुरक्षेचा विचार न करता कॅशलेस व्यवहार करण्याची घाई झाली आहे आणि अशी घाई सर्वसामान्य जनतेसाठी फार महाग पडू शकते. कारण सायबर गुन्हेगाराने एखाद्याच्या खात्यातून पैसे लांबविले तर त्याची जबाबदारी कोणाची या संबंधीचा काहीच कायदा किंवा दिशानिर्देश आपल्याकडे नाही. अशा अफरातफरीत ग्राहकाचा संबंध नसेल तर त्याच्या खात्यातून पैसे जाण्यास त्याला जबाबदार धरू नये असा नियम करण्याची सूचना रिझर्व बँकेने केली आहे . सरकार मात्र ढिम्म आहे. अप्रगत तंत्रज्ञान आणि सुरक्षेसंबंधी नियम नसणे किंवा अपुरे नियम हा कॅशलेस व्यवहाराचा प्रसार होण्यातील मुख्य अडथळा आहे.

कार्ड आधारित व्यवहार करण्यात असलेल्या अडचणीकडे दुर्लक्ष करून सरकार कॅशलेस व्यवहाराचा आग्रह करीत आहे. अशा व्यवहारासाठी देशातील सर्व कुटुंबे बँकेशी जोडल्या जाणे गरजेचे आहे. अजूनही ४० ते ४५ टक्के कुटुंब बँक व्यवहाराशी जोडल्या गेलेले नाहीत. २००० पेक्षा कमी लोकवस्तीचे चार लाख ९० हजार खेडी अद्यापही बँक सुविधांपासून वंचित आहे. जगात बँकेशी संलग्न नसलेली जेवढी लोकसंख्या आहे त्यातील २१ टक्के लोकसंख्या एकट्या भारतातील आहे. जनधन खात्यात दुसऱ्या लोकांचा काळा पैसा जमा झाल्याचा आरोप होत असतांना ८ नोव्हेंबर ते ३० डिसेम्बर या कालावधीत २३ टक्के जनधन खात्यात कोणतेच व्यवहार झाले नाहीत इकडे मात्र लक्ष नाही. या २३ टक्के खात्यात खाते उघड्ल्यापासुनच कोणतेच व्यवहार झालेले नाहीत. ज्यांचे पोट रोजच्या मजुरीवर अवलंबून आहे त्यांना बँक व्यवहार परवडणारे व उपयोगाचे नाहीत हे सिद्ध करायला हा आकडा पुरेसा आहे. अशा लोकांची मजुरी बँकेत जमा झाली तर पटकन पैसे काढण्यासाठी एटीएमची पण सोय ग्रामीण भागात नाही. देशातील विस्ताराच्या दृष्टीने सर्वात मोठा प्रांत असलेल्या राजस्थानात एटीएम केंद्राची संख्या दिल्ली महानगरात असलेल्या एटीएम पेक्षा कमी आहे. आधार कार्डच्या आधारे डिजिटल व्यवहार होवू शकतील व त्यासाठी ग्राहकाकडे इंटरनेट असण्याची गरज असणार नाही असे सांगितले जात आहे. पण ज्या दुकानात जावून तो व्यवहार करील तिथे तर इंटरनेट लागेल हे सोयीस्करपणे विसरल्या जात आहे. असे व्यवहार करण्याची क्षमता असलेल्या गतीचे इंटरनेट किती गावात उपलब्ध आहे याचा विचार केला तर एटीएम पेक्षा काही वेगळे चित्र दिसणार नाही. आज तर बँकाकडे दुकानदारांना डिजिटल व्यवहार करण्यासाठी आवश्यक यंत्र देखील पुरविता येत नाही. जेवढी मागणी आहे त्याच्या २ टक्के पुरवठा नसल्याचे बँकांचे म्हणणे आहे. अशी यंत्रेच नसतील तर डिजिटल व्यवहार होतीलच कशी ? प्रधानमंत्रीम मोदी यांनी वर्षभरापूर्वी डिजिटल इंडिया योजनेची गाजावाजा करीत घोषणा केली होती. ती घोषणाच ठरली हे आता डिजिटल व्यवहारात येणाऱ्या अडचणी व अडथळ्यावरून लक्षात येईल. कॅशलेस व्यवहाराच्या घोषणेचे यापेक्षा वेगळे भवितव्य दिसत नाही. सरकारी अकार्यक्षमता आणि अदूरदर्शीपणातून निर्माण नोटांच्या टंचाईतून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी सरकारकडून आवश्यक सुविधा निर्माण न करताच कॅशलेसचा गाजावाजा होत आहे.  नोटांची टंचाई दूर झाली की सरकारच कॅशलेस विसरून जाईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नववर्षाच्या पूर्वसंध्येला केलेल्या भाषणात कॅशलेस व्यवहारावर जोर दिला नाही हे त्याचेच संकेत आहेत.  जनतेने मात्र कॅशलेस व्यवहार विसरता कामा नये. कॅशलेस व्यवहार हा प्रगत आणि आधुनिक अर्थव्यवहार तुलनेने अधिक सोयीचा असल्याने त्याचा शक्य तितक्या लवकर अवलंब केला पाहिजे आणि या व्यवहारातील अडथळे – अडचणी दूर करण्यासाठी सरकारवर दबाव आणला पाहिजे.

---------------------------------------------------------------
सुधाकर जाधव , पांढरकवडा , जि. यवतमाळ

मोबाईल – ९४२२१६८१५८
------------------------------------------------------------------
 

Friday, December 30, 2016

कॅशलेस व्यवहाराचे न्यूटन आणि आर्किमिडीज !

. नोटाबंदी नंतर नव्या नोटा पुरविण्यात आलेल्या अपयशातून नोटांची जागा घेण्यासाठी कॅशलेसची कल्पना सुचली हे उघड सत्य आहे. पण नोटाबंदी पूर्ण विचारा अभावी , पूर्व तयारी आणि नियोजना अभावी केल्याने जवळपास फसल्यात जमा आहे , नेमकी तीच चूक कॅशलेस व्यवहाराच्या बाबतीत होत आहे. विचार , नियोजन आणि तयारी या तिन्ही स्तरावर कोणतेच काम न करता कॅशलेसचे घोडे दामटण्याचा जो प्रयत्न होत आहे त्यातून नोटाबंदीमुळे जी फरफट जनतेची - विशेषत: ग्रामीण जनतेची आणि अर्थव्यवस्थेची झाली त्याचीच पुनरावृत्ती कॅशलेस व्यवहाराच्या बाबतीत झाल्याशिवाय राहणार नाही.  

--------------------------------------------------------------------------------------



करता रहा सो क्यों रहा , अब करी क्यों पछताए
बोया पेड बबुल का , अमुआ कहा से पाए

 आज नोटाबंदीतून निर्माण झालेल्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी सरकार कॅशलेस व्यवहाराचे जे गाजर जनतेसमोर ठेवत आहे यावर चपखल भाष्य ठरावे असा हा संत कबीरांचा दोहा आहे. आपल्याला आंबे खायचे असतील तर आंब्याचेच झाड लावावे लागेल. बाभळीच्या झाडाला आंबे लागत नसतात. हा या दोह्याचा साधा सरळ अर्थ. जगातील इंडोनेशिया नंतरची दुसऱ्या क्रमांकाची रोखीवर आधारित असलेल्या अर्थव्यवस्थेचे रोखशून्य अर्थव्यवस्थेत रुपांतर होण्याचे स्वप्न बघणे हे बाभळीच्या झाडाला आंबे लागण्याची वाट पाहण्यासारखे आहे. बिगर रोखीची अर्थव्यवस्था निश्चितपणे वांछनीय आहे आणि तिकडे वाटचाल म्हणजे प्रगतीकडे वाटचालच ठरणार आहे. पण ज्या प्रकारची आपली अर्थव्यवस्था आहे त्यातून नोटाशून्य व्यवहाराकडे जाण्याचा मार्ग अनेक खाचखळग्यानी भरलेला आहे. खाचखळगे आणि अडथळे दूर करण्या आधी जनतेला या रस्त्यावरून धावायला सांगणे म्हणजे राजधानी दिल्लीहून देवगिरीला आणण्याचा  प्रयोग करण्यासारखे आहे. इतिहासकाळात राजधानी बदलाचा प्रयोग झाला तेव्हा तंत्रज्ञान प्रगत नव्हते . त्यामुळे पायी चालताना लोकांचे हालहाल झालेत ,पण आता तसे होणार नाही असा दावा करता येईल. यात काहीअंशी तथ्यही आहेच. पण आज राजधानी दिल्ली आहे आणि उद्यापासून ती देवगिरीला आणायची असेल तर दिल्लीची संरचना देवगीरीत निर्माण करण्यासाठी कितीतरी वर्षे आधी काम सुरु करावे लागते. आज आपल्या अर्थव्यवस्थेचा आधारच रोखीने होणारे व्यवहार आहे. बिगर रोखीने व्यवहार व्हायचे असेल तर त्यासाठी आधी बिगर रोखव्यवहारासाठी नवी संरचना निर्माण करून ती लोकांच्या अंगवळणी पडेल यासाठी नियोजनबद्ध प्रयासाची गरज आहे. एका चलन व्यवस्थेतून दुसऱ्या चलन व्यवस्थेत जाणे हे मोठे स्थित्यंतर आहे. उडी मारून आपल्याला एका व्यवस्थेतून दुसऱ्या व्यवस्थेत जाता येत नाही. माणसाला तर माकडा सारखे एका झाडावरून दुसऱ्या झाडावरही उडी मारता येत नाही ही त्याची मर्यादा लक्षात न घेता उडी मारायला लावली तर काय होईल याचा आपल्याला सहज अंदाज करता येईल. त्याच सोबत हेही सत्य आहे की, माणसाला एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उडी मारता येत नसली तरी सातासमुद्रा पलीकडे झेप घेता येते आणि परग्रहावरही जाता येते . पण त्यासाठी आवश्यक असते विमान आणि यान ! तंत्रज्ञानाने अनेक गोष्टी सहजसाध्य करता येतील पण त्यासाठी तंत्रज्ञान जागेवर हवे. त्याशिवाय झेप घेण्याच्या गोष्टी माकडउड्या ठरतात आणि भारत सरकारची  सध्या कॅशलेस व्यवहाराच्या दिशेने उडी मारण्याचा प्रयत्न तसाच म्हंटला पाहिजे.

शाळेत विज्ञान शिकतांना दोन शास्त्रज्ञांच्या दोन गोष्टी हमखास सांगितल्या जातात. असे सांगतात की न्यूटन सफरचंदाच्या झाडाखाली बसला असताना त्याच्या डोक्यावर सफरचंद पडले आणि त्याला गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला ! दुसरी गोष्ट आर्किमिडीजची सांगितली जाते. पाण्याने भरलेल्या टबमध्ये आंघोळ करण्यासाठी तो बसला आणि पाणी बाजूला सारल्यागेलेले पाहून त्याच्या डोक्यात वैज्ञानिक सिद्धांत चमकला आणि तसाच तो 'युरेका-युरेका म्हणजे सापडले सापडले असे ओरडत बाहेर पळाल्याची कथा आहे. जगभर या दोन्ही कथा चर्चिल्या जातात. मात्र असेच घडले याबाबत एकवाक्यता नाही हा भाग अलाहिदा. कॅशलेस व्यवहाराची एकाएकी जी हाकाटी सुरु झाली आहे त्यावरून या कथा आठवल्या. नोटाबंदीच्या निर्णयाने निर्माण झालेल्या चलनटंचाईमुळे सुरु झालेल्या टीकेच्या (भडी)मारातून प्रधानमंत्री मोदी आणि अर्थमंत्री जेटली यांना ही कल्पना अचानक सुचली असे मानण्यास जागा असल्याने वरील दोन कथांशी कॅशलेस व्यवहाराच्या हाकाटीशी साधर्म्य नक्कीच आहे. लोकसभा निवडणूक प्रचार सभेतील भाषणापासून ते नोटाबंदी निर्णयाची घोषणा करणारे ८ नोव्हेंबर २०१६ च्या ऐतिहासिक भाषणा पर्यंतचे प्रधानमंत्री मोदी यांचे प्रत्येक भाषण तपासून पाहा त्यात तुम्हाला कॅशलेस अर्थव्यवस्थेचा मागमुगूसही आढळणार नाही. प्रधानमंत्री झाल्यावर ज्या देशात कॅशलेस व्यवहार अधिक होतात त्या देशात केलेल्या भाषणातही त्याचा उल्लेख तुम्हाला आढळणार नाही. अर्थमंत्री जेटली यांनी आजवर तीन अर्थसंकल्प सादर केलेत. त्यात त्यांनी कुठेही कॅशलेस व्यवहाराची आवश्यकता प्रतिपादिली होती हे आढळणार नाही. मग त्यादिशेने जाण्यासाठी करावयाच्या उपाययोजना आणि प्रोत्साहन योजना यांचा अर्थसंकल्पात समावेश वा दिशादर्शन असण्याचा मुद्दा हा फार दूरचा झाला. नियोजन आयोगाची जागा नीती आयोगाने घेतली तेव्हा पासून नीती आयोगाची नीती तपासून बघा . कुठेही आपल्या अर्थव्यवस्थेला रोखीच्या व्यवहारापासून मुक्ती देण्याचे नियोजन तुम्हाला आढळणार नाही. आणि ८ नोव्हेंबर नंतर निर्माण झालेल्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी प्रधानमंत्री , अर्थमंत्री आणि नीतीआयोग एखादा सफरचंद डोक्यावर पडून साक्षात्कार व्हावा तशी कॅशलेस अर्थव्यवस्थेची आरती एका सुरात गाऊ लागले होते. नोटाबंदी नंतर नोटा पुरविण्यात आलेल्या अपयशातून नोटांची जागा घेण्यासाठी कॅशलेसची कल्पना सुचली हे उघड सत्य आहे. पण नोटाबंदी पूर्ण विचारा अभावी , पूर्व तयारी आणि नियोजना अभावी केल्याने जवळपास फसल्यात जमा आहे , नेमकी तीच चूक कॅशलेस व्यवहाराच्या बाबतीत होत आहे. विचार , नियोजन आणि तयारी या तिन्ही स्तरावर कोणतेच काम न करता कॅशलेसचे घोडे दामटण्याचा जो प्रयत्न होत आहे त्यातून नोटाबंदीमुळे जी फरफट जनतेची - विशेषत: ग्रामीण जनतेची आणि अर्थव्यवस्थेची झाली त्याचीच पुनरावृत्ती कॅशलेस व्यवहाराच्या बाबतीत झाल्याशिवाय राहणार नाही. कॅशलेस व्यवहार अंमलात येण्या आधीच त्याबाबत नाराजी आणि अहित झाले तर भविष्यातील प्रगतीला ते मारक ठरेल . या संधीचा उपयोग कॅशलेस व्यवहाराची बीजे रुजविण्यासाठी जरूर करावा. पण नोटा पुरविता येत नाही म्हणून कॅशलेस व्यवहाराकडे लोकांना फरफटत आणणे म्हणजे राज्यकर्त्यांच्या अपयशाची लोकांना शिक्षा देण्यासारखे आहे. लोकांची फरफट झाली तर कॅशलेस व्यवहारा बद्दलची कायम भीती आणि अढी निर्माण होण्याचा धोका आहे. तो टाळण्याची खबरदारी राज्यकर्त्यांनी घेवून नियोजनबद्धरीत्या कॅशलेस अर्थव्यवस्थेकडे जाण्याचा प्रयत्न झाला पाहिजे.

कोणाला तरी रात्री स्वप्न पडते अमुक ठिकाणी देव आहे आणि मग लगेच तिथे मंदिर उभारले जाते तितके कॅशलेस व्यवहार निर्माण करण्याचे काम सोपे नाही. स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यासाठी नियोजन आणि परिश्रम लागतात. लॉटरी सारखा जुगार खेळायला लावून कॅशलेस व्यवस्था निर्माण होत नसते. स्वीडन सारख्या देशाने आपले ९० टक्के व्यवहार कॅशलेस झाल्यानंतर २०१४ मध्ये ५ वर्षांनी देश संपूर्ण कॅशलेस होईल अशी घोषणा केली. मुंबई पेक्षा कमी जनसंख्या असलेल्या या देशाला ९० टक्के व्यवहार कॅशलेस झाल्यावर एका रात्रीतून कॅशलेस होता आले नसते का ? लोकांची फरफट होवू नये , नव्या व्यवस्थेशी जुळवून घेण्यास पुरेसा वेळ मिळावा हे त्यामागचे कारण. अतिप्रगत स्वीडनला कॅशलेस होण्यास जेवढा अवधी लागत आहे तो लक्षात घेतला तर भारतात एका झटक्यात होण्यासारखे हे काम नाही हे आपल्या लक्षात येईल. इंग्लंड हा देश देखील कॅशलेस व्यवहारात आघाडीवर आहे. या देशात लंडन मधील बस प्रवासासाठी कार्ड वापरले जाते. तरीही २००० सालापर्यंत २५ टक्के प्रवासी रोख पैसे देवून तिकीट काढीत. २०१४ पर्यंत हे प्रमाण १ टक्क्यावर आले. त्यानंतर सरकारने घोषणा केली होती की, २०१६ पासून लंडन मधील बस प्रवासासाठी फक्त कार्ड चालेल. आपल्याकडे स्थिती अगदी उलटी आहे. फक्त २ ते ५ टक्के व्यवहार कॅशलेस होतात. आणि आपण एका रात्रीतून निव्वळ जाहिरातबाजी आणि लालूच दाखवून कॅशलेस अर्थव्यवहाराचे दिवास्वप्न पाहात आहोत. विकसित देशाच्या सोडा , विकासाच्या मार्गावर असलेल्या आपल्या सारख्या देशाच्या तुलनेत कॅशलेस व्यवस्थेसाठीच्या संरचनेत आपण मागे आहोत. ही संरचना उभी करण्याचे आव्हान आधी सरकारने स्वीकारले पाहिजे आणि त्यानंतर लोकांना कॅशलेस व्यवहार करण्याचे आवाहन केले तर त्याला काही अर्थ आहे. अर्थव्यवस्थेच्या बाबतीत राजकीय घोषणा निरुपयोगी असतात हे 'गरिबी हटाव' घोषणेने दाखवून दिले आहे.

सरकारने महानगरे आणि त्यातील पैसा खिशात खुळखुळणारा वर्ग डोळ्यासमोर ठेवून धोरणे आखणे आधी बंद केले पाहिजे. कॅशलेस अर्थव्यवहारासाठी शहरे आणि महानगरात आवश्यक संरचना अस्तित्वात असेल , पण ग्रामीण भागात ती नाही हे लक्षात घेतले पाहिजे. ज्या गावात रात्री १२ ला वीज येते आणि सकाळी ६ ला गायब होते अशा गावात कोणती कॅशलेस संरचना उभी राहील याची ग्रामीण जनतेशी नाळ तुटलेल्या शहरी टोळभैरवाना जाणीव नसेल , पण सरकारला ते भान सोडून कसे चालेल. कॅशलेस आर्थिक व्यवहारासाठी प्रत्येक गावात २४ तास वीज उपलब्ध राहणे गरजेचे आहे. चांगल्या दर्जाचे इंटरनेट सतत उपलब्ध असणे ही दुसरी गरज आहे. नेपाळ सारख्या देशात आपल्यापेक्षा अधिक वेगवान इंटरनेट उपलब्ध असल्याची माहिती नुकतीच पुढे आली आहे. या दोन्ही गोष्टी असतील तर कॅशलेस व्यवहाराला अनुकूल वातावरण राहील. आज आपल्याकडे फक्त २६ टक्के लोक इंटरनेट वापरतात . बाकीच्यांना ते परवडत नाही किंवा उपलब्ध नाही. कॅशलेस व्यवहारासाठी सर्वात महत्वाची गरज बँक खात्याची आहे आणि अजूनही देशातील ४० टक्क्यांच्या वर कुटुंबे बँक खात्याशी जोडली गेलेली नाही. जी ५८ टक्के कुटुंबे बँकेशी जोडल्या गली आहेत त्यातीलही २० टक्क्याच्या वर कुटुंबाचे बँक व्यवहार नाहीत . कारण असे व्यवहार करण्या इतपत त्यांची कमाई नाही. कॅशलेस व्यवहारातील हा सर्वात मोठा अडथळा आहे ! लोकांच्या खिशात पैसा खुळखुळू द्या आणि मग चमत्कार पाहा. खिशात पैसा असला की, स्मार्ट मोबाईल येतोच आणि एटीएम वापरा की पेटीएम वापरा ही हुशारी शिकविण्याची गरज पडत नाही. ग्रामीण भागात पैसा नाही म्हणून ग्रामीण भागात बँका नाहीत की एटीएम नाहीत. ग्रामीण भागात पैसा नसण्याचे मुख्य कारण शेती फायद्याची नाही . शेती फायद्याची नसल्याने पूरकधंदे नाहीत , उद्योग नाहीत. ताज्या आर्थिकगणनेच्या आकड्यानुसार ७३ टक्के जनता ग्रामीण भागात राहते आणि त्यातील फक्त अशा परिस्थितीत देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी ७३ टक्के जनता राहात आहे. शाश्वत उत्पन्न असणारांची संख्या ग्रामीणभागात कमी आहे. लॉटरी काढण्यापेक्षा ही परिस्थिती बदलण्याची नीती नीती आयोगाने बनविली तर कॅशलेस व्यवहाराची गाडी धावण्यासाठी रस्ता तयार होईल. याचा विचार न करता कॅशलेस व्यवहाराचा विचार म्हणजे आडात नसताना पोहऱ्यात पाणी आणण्याचा व्यर्थ खटाटोप आहे.  संपन्नता वाढली की लोक कॅशलेस व्यवहाराकडे वळतात ही जगरहाटी आहे. नाही तर संपन्न राष्ट्रेच कॅशलेस व्यवहारात आघाडीवर नसती. कॅशलेस व्यवहारातून संपन्नता हा भ्रम आहे. या भ्रमातून बाहेर पडणे हे वास्तववादी आर्थिक धोरणासाठी आवश्यक आहे.
------------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव , पांढरकवडा , जि. यवतमाळ
मोबाईल - ९४२२१६८१५८
------------------------------------------------------------------------------------   

Friday, December 23, 2016

नोटाबंदीतही भारत - इंडिया भेद !

बँक आणि एटीएमच्या रांगेत उभे असलेले लोक सरकारसह सर्व प्रकारच्या माध्यमांच्या चर्चेचा आणि चिंतेचा विषय ठरले आहेत.  मोठी रांग 'इंडिया'ची समृद्धीच दर्शविते. ज्याला रांगेत उभे राहण्याचे भाग्य लाभलेले नाही असा मोठा जनसमुदाय देशात अस्तित्वात आहे याचा विसर सगळ्यांना पडला आहे. चलनबंदीचा सर्वात जास्त फटका बसूनही सर्वात कमी विचार ज्याचा केला जातो असा हा 'भारता'तील समूह आहे. चलनबंदीने 'भारत-इंडिया' भेदाचे आणि 'भारता' विषयीच्या सरकारी अनास्थेचे विदारक दर्शन घडत आहे.
----------------------------------------------------------------------------------

                                                                                                                             १००० आणि ५०० च्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर देशभरात लोकात आणि माध्यमांमध्ये जी चर्चा चालली ती बरीचशी रांग केंद्रित चर्चा आहे. पैशासाठी लागणाऱ्या मोठमोठ्या रांगा , आपल्याच हक्काचे पैसे मिळण्यासाठी सामन्यांची होणारी परवड , सरकारने घालून दिलेल्या मर्यादे इतकेही पैसे देण्यास बँकांची असमर्थता या सगळ्याच गोष्टी अभूतपूर्व असल्याने त्याची चर्चा होणे स्वाभाविकही आहे. पण या सगळ्या चर्चेतून एका अभागी घटकाकडे कोणाचेच लक्ष गेले नाही. हा घटक म्हणजे ज्याचे लांब लांब लागलेल्या रांगेत देखील स्थान नाही अशी भारतातील शेतीवर अवलंबून असणारी प्रजा. भारताच्या अर्थकारणात जे क्षेत्र एकूण कामगारांपैकी ७० टक्के लोकांना काम पुरविते आणि देशाच्या सकल उत्पन्नात निम्मी भर घालते त्या क्षेत्राचे पैशासाठी लागणाऱ्या रांगेत देखील स्थान नसणे हा या घटकाप्रती असलेल्या सरकारी अनास्थेचा सज्जड पुरावा आहे. नोटाबंदीचा निर्णय घेताना सरकारने निर्णयामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीचा नीट विचार केला होता की नव्हता हा मोठ्या वादाचा आणि चर्चेचा विषय ठरला आहे. सरकारला परिस्थितीचा अजिबात अंदाज आला नाही आणि गृहपाठ न करताच निर्णयाची घाई केली असे विरोधकांचे म्हणणे आहे . अर्थव्यवस्थेच्या साफसफाईचा हा मोठा निर्णय असल्याने त्रास हा होणारच आणि देशाच्या भलाई साठी एवढा त्रास सहन केला पाहिजे असे सरकारचे म्हणणे. सरकारने निर्णय घेताना विचार केला होता की नव्हता हे कालांतराने बाहेर येईल. याचे भलेबुरे राजकीय परिणाम चर्चेतील दोन्ही बाजूना चाखायला मिळतील. ही सारी चर्चाच मध्यमवर्गीयांना समोर ठेवून होत आहे. खरा चर्चेचा मुद्दा बँक आणि एटीएम समोर लागणाऱ्या रांगा नाही तर ज्यांचे दैनदिन व्यवहार रोखीने चालतात , रोखीवर ज्याचे अर्थचक्र चालते त्या घटकाचा विचार बाजारातून रोकड काढून घेताना सरकारने केला होता की नाही हा असायला हवा होता. सगळ्या ग्रामीण भागाचे अर्थकारण रोखीने चालते. ग्रामीण भागात बँक खातेदारांची संख्या वाढलेली आहे हे खरे. पण या खात्यांचा उपयोग पैशाचा भरणा करण्यासाठी कधीच होत नाही. शेतमाल विकून आलेल्या रकमेचा चेक जमा करण्यासाठी किंवा सरकारी अनुदान जमा होण्यासाठी ही खाती आहेत. हे पैसे बँकेतून काढून सगळे व्यवहार रोखीने करावे लागतात. मजुरांची खाती आहेत ती रोजगार हमीचे चेक जमा करण्यापुरते. बँक व्यवहारात लोकांचा समावेश व्हावा यासाठी गेल्या ५-१० वर्षात सरकारने विशेष मोहीम राबवून कोट्यावधी नवी खाती उघडलीत तरी ग्रामीण भागातील व्यवहार हे रोखीनेच चालतात . याचे कारण जो काही पैसा उपलब्ध होतो त्यात दैनदिन गरजा पूर्ण होणे कठीण जाते. बचत होत नाही. बचत नाही म्हणून बँक व्यवहार नाहीत . रोखी शिवाय पर्याय नसलेल्या घटकाचे काय होईल याचा विचार निर्णय घेताना झाला की नाही हा प्रश्नही अनेकांना पडत नाही. निर्णय जाहीर करण्यापूर्वी सरकारने काय आणि कसा विचार केला हे बाहेर आले नसल्याने त्यावर डोकेफोड करणे व्यर्थच आहे. पण निर्णयाची अंमलबजावणी सुरु झाल्या नंतर सरकारचे ग्रामीण भागाकडे लक्ष गेले की नाही आणि त्या क्षेत्राची परिस्थिती डोळ्यासमोर ठेवून काही निर्णय झालेत की नाही यावर नक्कीच चर्चा होवू शकते. पण तशी चर्चा देखील होताना दिसत नाही.

ज्या क्षेत्राचे सगळे व्यवहारच रोखीवर चालतात त्यांचे सगळे व्यवहार रोख नसेल तर ठप्प होणार हे लक्षात घेवून सरकारने काही उपाययोजना केली का या प्रश्नाचे उत्तरच नकारार्थी मिळते. ८ नोव्हेंबर नंतर आजवर सरकारने ६० च्या वर आदेश काढले आहेत. आणि या सगळ्या आदेशात ग्रामीण भागातील शेती आणि छोट्या उद्योगांना दिलासा देणारा एकही निर्णय तुम्हाला दिसणार नाही. सरकारचे सगळे निर्णय हे 'इंडिया' केंद्रित आहेत . सरकारचा सगळा प्रयत्न 'इंडिया'तील बँकांना पैसा पुरवून 'इंडिया'तील लोकांचा त्रास कमी कसा होईल यावर केंद्रित आहे. जे अर्थकारण निव्वळ रोखीवर सुरु असते त्याला बसलेली खीळ दूर करणारा कोणताच निर्णय या काळात सरकारने घेतला नाही. प्रधानमंत्री जेव्हा ५० दिवस कळ सोसा म्हणतात तेव्हाही हा घटक त्यांच्या नजरेसमोर नसतो. या घटकाचा विचार केला असता तर ५० दिवसाची भाषा त्यांनी उच्चारली नसती. बँक आणि एटीएमच्या रांगेत उभे असणाऱ्या मध्यमवर्गीयांचा त्रास त्यांना पाहवला गेला नाही त्यातून आलेले ते उद्गार होते. ५० दिवस शेतीत टमाटे, कांदे , बटाटे तसेच ठेवता येत नाहीत. अगदी कापसा सारखी नाशवंत नसलेले उत्पादन घरात ठेवणेही परवडत नाही त्यांना जर प्रधानमंत्री ५० दिवस थांबायला सांगत असतील तर ही बाब त्यांची ग्रामीण अर्थकारणा बद्दलची अनास्था आणि अज्ञान दर्शविणारी ठरते. देशभराच्या मंडई मधून होणारे सगळे व्यवहार रोखीनेच होतात. बाजारात रोकड नसेल तर हे व्यवहार ठप्प होणार याची जाणीव सरकारला नसेल असे कसे म्हणता येईल. कोणी किती दिवसात किती रक्कम काढू शकतो याचा रोज बारकाईने विचार करणारे सरकार मंडईत पैसा कसा उपलब्ध होईल याचा काहीच कसा विचार करीत नाही हा खरा प्रश्न आहे. सरकारने चलन रद्द केल्या पासून आजवर ग्रामीण अर्थकारणाच्या हिताचा एकही निर्णय न घेतल्याने त्याचा सर्वात जास्त फटका शेतीवर अवलंबून असलेल्या सर्व घटकांना बसला. केवळ भाजीपाला , फळे आणि धान्याची बाजारपेठच उध्वस्त झाली नाही तर जनावरांचा व्यापार ठप्प झाला. शेळी, बोकड आणि कोंबड्या विकनेही अवघड होवून बसले. नोटाबंदीच्या पहिल्या १५ दिवसात तर शेतकऱ्यांना नाशवंत माल बाजारात आणणे देखील परवडण्यासारखे नव्हते. ज्यांनी आणला त्यांना उलट्या पट्टीचा अनुभव घ्यावा लागला. कापसा सारख्या मालाच्या बाबतीत शेतकऱ्याला आतबट्ट्याचा व्यवहार करावा लागला. बँकेत पैशाचा खडखडाट लक्षात घेवून जिनिंग मध्ये कापूस विकून चेक घेण्यापेक्षा बाहेर परस्पर विकणे अनेकांना भाग पडले. या सगळ्या व्यवहारात क्विंटल मागे जवळपास १००० रुपयाचा फटका सहन करावा लागला. जास्त भाव पाहिजे असेल तर जुन्या रद्द झालेल्या नोटा घेण्याचा पर्याय शेतकऱ्या समोर होता. शेतीमालाच्या खरेदी विक्रीसाठी रोकड उपलब्ध करून द्यायला हवी हा विचार देखील सरकारच्या डोक्यात आला नाही ही बाब सर्वाधिक खटकणारी आहे. 'इंडिया'तील लोकांना दिलासा देण्याचा या काळात सरकारने आपल्या परीने खूप प्रयत्न केलेत. तरी देखील त्यांना फारसा दिलासा मिळाला नाही ही वस्तुस्थिती आहे. सरकारने 'भारता'चा विचार करून दिलासा देणारे निर्णय घेतले असते तर दिलासा मिळाला असताच असे नाही. पण सरकार आपल्या सुख-दु:खाचा विचार करते एवढे तरी समाधान मिळाले असते. हे समाधानही सरकारने मिळू दिले नाही. शेतकरी आणि शेतीवर अवलंबून असलेली जनता सरकारी धोरणाचा भाग नाही हे जळजळीत सत्य नोटाबंदीच्या निर्णयाने समोर आणले आहे. 

बहुसंख्य शेतकऱ्यांची खाती सहकारी बँकात असताना या काळात सहकारी बँकावर जुन्या नोटा संबंधी व्यवहार करण्यावर आणलेली बंदी हा तर एकूणच सहकाराप्रती दुस्वास आणि शेतकऱ्याप्रती अनास्थेचा पुरावा आहे. सहकारी बँका भ्रष्ट नेत्यांच्या ताब्यात असल्याने त्यात भ्रष्ट व्यवहार होतील या भीतीने ही बंदी घातल्याचे सांगितले जाते. पण या काळात जिथे लोकांना २००० रुपये मिळण्याची मारामार तिथे अनेकांकडे लाखोचे नव्हे तर कोटी कोटीचे सापडलेले नवे चलन काय दर्शविते ? सहकारी बँकावर बंदी असताना हे भ्रष्ट व्यवहार कोठून कसे झाले याचे उत्तर सरकारने दिले पाहिजे . कोट्यावधीचे सापडलेले नवे चलन हे सरकार नियंत्रित बँक आणि खुद्द रिझर्व बँक यातून येण्याशिवाय दुसरा मार्गच नाही. आणि तरीही ठपका फक्त शेतकऱ्यांचे व्यवहार असलेल्या बँकावर . सहकारी बँकांनी भ्रष्ट नेत्यांना लाखोची कर्जे वाटलीत हे खरे. पण सरकारी बँकांनी तर भ्रष्ट उद्योगपतींना कधीही परत न मिळणारी हजारो कोटींची कर्जे वाटली त्या बँका मात्र साहू ! सहकारी बँका तेवढ्या चोर. शेतीवर जगणारी माणसे राज्यकर्त्यांच्या आणि धोरणकर्त्यांच्या खिजगणतीतही नसली की असे उफराटे निर्णय होतात. ग्रामीण भागातही मजुरी २०० ते ५०० पर्यंत मिळत असल्याने ५०० आणि १००० च्या नोटा ग्रामीण भागातील मुख्य चलन होते. ग्रामीण भागातील जनते जवळ असलेले हे चलन बदलून देण्याची सुद्धा विशेष सोय केली गेली नाही. उलट हाती असलेले चलन बदलण्यासाठी सर्वाधिक त्रास आणि तोटा ग्रामीण जनतेला सहन करावा लागला. आधी चार हजार पर्यंतचे चलन रांगेत उभे राहून बदलून मिळत होते. पण ८-१० दिवसात तो निर्णय रद्द केला. बँकेत किंवा पोस्टात खाते असेल तिथे चलन बदलून मिळेल असा नवा फतवा निघाला. सहकारी बँकांना जुने चलन बदलून देण्यावर बंदी. मग ज्यांची खाती त्या बँकेत आहेत त्यांनी कुठून हाती असलेले जुने चलन बदलून घ्यायचे याचा विचार देखील सरकारला करावासा वाटला नाही. देशात फक्त ५५ टक्के कुटुंबाची बँक खाती आहेत. जवळपास ४५ टक्के कुटुंबाचे बँक व्यवहार नाहीत. यातील बहुसंख्य लोक ग्रामीण भागातील आहेत किंवा कामधंद्याच्या शोधात शहरात स्थलांतरित झालेले ग्रामीण आहेत. या ४५ टक्के कुटुंबा समोर नोटा बदलण्याचा एकच मार्ग होता. दलाला मार्फत नोटा बदलून घेण्याचा. ५०० च्या जुन्या नोटेच्या बदल्यात ४०० घेणे ! यात भरडली गेली ती गोरगरीब ग्रामीण जनता. अशा लोकांना दिलासा देणारा एकही निर्णय या काळात झाला नाही. त्यांच्या अडचणी वाढविणारे निर्णय मात्र अनेक झालेत. एवढे सगळे सहन करून सरकारच्या या नोटाबंदीच्या निर्णयाने ग्रामीण भागातील शेतीवर अवलंबून असलेल्या जनतेच्या पदरी काय पडणार आहे याचा देखील कोणी विचार केलेला नाही. मात्र या निर्णयाच्या समर्थनार्थ भारतीय जनता पक्षाने पुणे शहरात लावलेली काही फलके बोलकी आहेत. चलन रद्द करण्याच्या प्रधानमंत्री मोदींच्या धाडशी निर्णयामुळे अन्नधान्य स्वस्त होईल , जमिनी स्वस्तात मिळतील त्यामुळे घर स्वस्तात मिळेल ! निर्णयाच्या अंमलबजावणीत सर्वाधिक यातना सहन कराव्या लागत असलेल्या 'भारता'ला भविष्यात निर्णयाच्या परिणामी काय भोगावे लागेल याची पुरेशी झलक यातून मिळते. चलनबंदीच्या निर्णयाचे समर्थन करणारे ढोल 'इंडिया'त बडविले जात आहेत ते उगीच नाही . निर्णयाची कारणे कोणतीही असो परिणाम मात्र 'इंडिया-भारत' यांच्यातील दरी रुंदावण्यात होणार आहे !
---------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव , पांढरकवडा , जि. यवतमाळ
मोबाईल - ९४२२१६८१५८
-------------------------------------------------------------------------------

Thursday, December 1, 2016

साहस की दु:साहस ?



चलन रद्द करण्याचा मोदी सरकारचा  निर्णय आर्थिक आहे. अर्थात या निर्णयाचे व्यापक राजकीय परिणामही आहेत आणि अंतस्थ राजकीय हेतूही . असे हेतू असणे यात गैर नाही. कारण सत्तेत असणाऱ्या पक्षाला पुन्हा निवडणूक लढवायची असते. तसे असले तरी मोदी सरकारच्या आजवरच्या निर्णयापेक्षा हा निर्णय वेगळा आहे. हा निर्णय चूक की बरोबर हे अंकगणिताने सिद्ध होणार आहे . 
---------------------------------------------------------------------------------------------------


  प्रधानमंत्र्यांनी ८ नोव्हेंबर रोजी घोषित केलेल्या निर्णयावर सुरु असलेली चर्चा आणि वाद थांबण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. उलट चर्चा आणि वादाची तीव्रता दिवसागणिक वाढत आहे. देशाची सूत्रे हाती घेतल्या पासून प्रधानमंत्री मोदी यांची निर्णय घेण्याचे निकष आणि घोषित करण्याची जी पद्धत राहिली आहे त्या परंपरेतील हा सर्वात मोठा निर्णय आहे. आजवरचे त्यांचे सर्व मोठे निर्णय पाहिले तर आपल्या लक्षात येईल की प्रत्येक निर्णयात भव्यता असते. स्वच्छ भारत अभियाना पासून ते जनधन योजने पर्यंतचे निर्णय याचे साक्षी आहेत. असे निर्णय घोषित झाले की मोदी समर्थक आणि सरकार समर्थक माध्यमातून या निर्णयाला तात्काळ मोठे समर्थन मिळते. इतिहासात असा निर्णय कधी झाला नव्हता , या निर्णयाने देश बदलणार आहे वगैरे वगैरे असे सूर ऐकायला मिळतात. मोदी सरकारचा प्रत्येक निर्णय किती परिणाम कारक ठरला हा वेगळ्या विश्लेषणाचा विषय आहे. पण त्यांचा प्रत्येक निर्णय ही एक मोठी घटना ठरावी आणि एखाद्या उत्सवा सारखे त्याचे जल्लोषात स्वागत व्हावे असे कुशल प्रबंधन हे मोदी सरकारचे वैशिष्ट्य राहिले आहे. याची प्रतिक्रिया म्हणून यापूर्वीही असे निर्णय झाल्याची जंत्री विरोधकाकडून दिली जाते. यातून नवे काहीच साध्य होणार नाही असा विरोधकांचा विरोधी सूर ऐकायला मिळत असतो. कोणत्याही निर्णयाचा नीट अभ्यास न करता त्याचे टोकाचे समर्थन आणि टोकाचा विरोध  या अडीच वर्षात पाहायला मिळाला आहे. पूर्वी सरकारने कोणताही आणि कसाही निर्णय घेतला की सत्तापक्षाचे आंधळे समर्थन आणि विरोधी पक्षाचा आंधळा विरोध अशी परंपरा होती. ती आजही कायम आहे पण यात जनसमूहाची भर पडली आहे. पूर्वीही लोक सरकारच्या महत्वाच्या निर्णयावर चर्चा करायचे. पण ती चर्चा फारसा वाद आणि भांडण न होता व्हायची . सामोपचाराने अशी चर्चा होण्याचे मुख्य कारण अशी चर्चा करणारे एकमेकांना ओळखणारे , रोज भेटणारे असत. इंटरनेट क्रांतीने परंपरागत मध्यमा इतकाच सोशल मेडिया प्रभावी झाला आहे. सोशल मेडियामुळे एकमेकांशी ओळख नसलेले लोक आणि समूह सरकारच्या प्रत्येक निर्णयावर चर्चा करू लागले आहेत. ओळखीचे पण परस्पर विरोधी मत असणारे लोक चर्चा करतात तेव्हा ती चर्चा सौजन्यपूर्ण होते. सोशल मेडियावरही एकमेकांना ओळखणारे लोक प्रतिक्रिया देतात तेव्हा ती सौजन्यपूर्णच असते. पण न ओळखणारे लोक एकमेकाशी बोलताना , चर्चा करताना भाषेच्या , विचार व्यक्त करण्याच्या पद्धतीच्या कोणत्याच मर्यादा पाळत नाहीत. परिणामी आज प्रत्येक विषयावर मोदी समर्थक आणि मोदी विरोधक अशी विभागणी होवून टोकाची कडवट चर्चा होते. विषयाचे कंगोरे तपासण्यापेक्षा आरोपप्रत्यारोप असे चर्चेला स्वरूप येते. देशातील प्रचंड संख्येने वाढलेल्या मध्यमवर्गावर इलेक्ट्रोनिक मेडिया आणि सोशल मेडियाचा प्रभाव पडत असल्याने सरकार समर्थक आणि सरकार विरोधक यांच्यातील युद्ध रंगत असते. पण या युद्धात विषय बाजूला पडून आभासी हाणामारी तेवढी होते आणि कडवटपणा वाढतो. यातून विश्लेषणात्मक आणि तर्कसंगत चर्चा होण्याऐवजी आरोप-प्रत्यारोपाचा गदारोळ तेवढा उडतो. या गदारोळात सत्य काय याचा थांगपत्ता सर्वसामान्यांना लागत नाही. देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने हा अत्यंत महत्वाचा आणि चांगल्या किंवा वाईट या दोन्ही अर्थाने दूरगामी परिणाम करणारा निर्णय असल्याने यावर विवेकपूर्ण आणि वस्तुस्थितीवर आधारित चर्चा झाली पाहिजे.


मोदी सरकारचा हा निर्णय आर्थिक आहे. अर्थात या निर्णयाचे व्यापक राजकीय परिणामही आहेत आणि अंतस्थ राजकीय हेतूही . असे हेतू असणे यात गैर नाही. कारण सत्तेत असणाऱ्या पक्षाला पुन्हा निवडणूक लढवायची असते. तसे असले तरी मोदी सरकारच्या आजवरच्या निर्णयापेक्षा हा निर्णय वेगळा आहे. हा निर्णय चूक की बरोबर हे अंकगणिताने सिद्ध होणार आहे यासाठी फारकाळ वाट पाहण्याची गरज असणार नाही. निर्णयाने काय साध्य झाले याचे चित्र साधारणपणे ३१ डिसेंबर पर्यंत स्पष्ट होईल. तेव्हा विरोधक आणि समर्थक यांनी आत्ताच .हातघाईवर येण्याचे आणि निष्कर्षाप्रत पोचण्याची गरज नाही. काही गोष्टी तर लगेच स्पष्ट झाल्या आहेत. नोटा चलनातून बाद करताना प्रधानमंत्री मोदी यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात निर्णयाचे तीन हेतू विषद केले होते. एक. भ्रष्टाचार आणि काळा पैसा खूप वाढला आहे. त्यावर या निर्णयाने कुठाराघात होईल. दोन, अर्थव्यवस्थेतील काळा पैसा बाद होईल. तीन वैध चलनात मोठ्या प्रमाणावर मिसळलेल्या बनावट नोटा चलनातून बाद होतील. या तीन उद्दिष्टांपैकी बनावट नोटा चलनातून बाद होण्याचे तिसरे उद्दिष्ट या कारवाईने पूर्ण झाले आहे याबाबत दुमत असू नये. अर्थव्यवस्थेतून काळा पैसा बाजूला पडेल या दुसऱ्या उद्दिष्टाला संमिश्र यश येईल असे आजचे चित्र आहे. कारण सरकार काळ्याचे पांढरे करणाऱ्यांना रोज कडक इशारे देवू लागले आहे याचा अर्थ ज्यांच्याकडे काळा पैसा आहे ते विविध मार्गाने पांढरा करीत आहेत. माध्यमातही याची मोठी चर्चा आहे. त्यामुळे ज्यांनी भ्रष्टाचारातून आजवर काळा पैसा कमावला त्यांच्या हातातील किती पैसा निष्प्रभ होवून अर्थव्यवस्थेच्या बाहेर पडेल याचा अंदाज  साधारणपणे ३१ डिसेंबर २०१६पर्यंत स्पष्ट होईल. अंतिम चित्र ३१ मार्च नंतरच समोर येईल. चलनातून ज्या हजार आणि पाचशेच्या नोटा बाद झाल्या आहेत त्याचे एकूण मूल्य १५.४४ आहे. या पैकी किमान ४ लाख कोटी काळा पैसा असल्याचा भारत सरकारच्या नीती आयोगाचा अंदाज आहे. आता चलनातून बाद झालेल्या १५.४४ लाख कोटी पैकी बँकांना आपल्याकडे असलेल्या ठेवीची सुरक्षितता म्हणून विशिष्ट प्रमाणात रिझर्व बँकेकडे रक्कम जमा करावी लागते. रिझर्व बँकेकडे अशी ४ लाख कोटीची रक्कम जीला तांत्रिक भाषेत सी आर आर म्हणतात जमा होती. एकूण चलनाच्या  किमान ५ ते ७  टक्के रक्कम दुसऱ्या दिवशीच्या व्यवहारासाठी सर्व बँकांच्या आणि रिझर्व बँकेच्या ताब्यात होती. ही अंदाजित रक्कम ५० हजार ते ७० हजार कोटीच्या आसपास असली पाहिजे. याचा अर्थ नोटा रद्द झाल्या त्या दिवशी जनतेकडे रद्द झालेल्या चलनापैकी साधारणपणे ११ लाख कोटी होते असे मानता येईल. तीन आठवड्यात बँकेत जमा झालेली रक्कम ९ लाख कोटीच्या घरात आहे . याचा अर्थ बँकेकडे अजून २ लाख कोटी येणे बाकी आहे आणि त्यासाठी पूर्ण डिसेंबर महिना देखील बाकी आहे.                                

                                   
आता यातील अडीच लाखाच्या आतील प्रत्येक खात्यात किती जमा झाली आणि अडीच लाखावर किती खात्यात किती रक्कम जमा झाली याचा हिशेब यायचा आहे. २.५० लाखाच्यावर जमा करण्यात आलेल्या सगळ्या रकमा काळ्या पैशाच्या आहेत असे सरसकट म्हणता येणार नाही. आयकर विभागाच्या तपासणी नंतरच यातील बेहिशेबी किंवा ज्याला काळा पैसा म्हणता येईल अशी रक्कम समोर येईल. खात्यात जमा पण आयकर विभागाच्या दृष्टीने बेहिशेबी रक्कम आणि बँकेत जमाच झाली नाही अशी सगळी रक्कम काळा पैसा समजली जाईल. नीती आयोगाच्या हिशेबानुसार अर्थव्यवस्थेत असलेल्या ४ लाख कोटीच्या काळ्या पैशाचा हिशेब जुळला तर या निर्णयामागचे दुसरे उद्दिष्ट देखील पूर्ण झाले असे म्हणता येईल. १९७८ साली मोरारजी सरकारने जेव्हा याच पद्धतीने मोठ्या मूल्याच्या नोटा रद्द केल्या होत्या तेव्हा चलनात असलेल्या या नोटापैकी फक्त ८० टक्के नोटाच बँकेत जमा झाल्या होत्या. २० टक्के नोटा काळ्या पैशाच्या स्वरुपात होत्या आणि तो पैसा बँकेकडे आला नाही .पूर्वी पेक्षा भ्रष्टाचार खूप वाढला आणि त्यामुळे काळापैसा खूप वाढला यावर सर्वांचे एकमत आहे. याचा अर्थ १९७८ साली रद्द केलेल्या चलनातून २० टक्के काळा पैसा बँकेकडे जमा न होता बाद झाला असेल तर आज किमान ३० टक्के रक्कम बँकेत जमा न होता बाहेर राहून बाद व्हायला पाहिजे. अशी ३० टक्के रक्कम आणि नीती आयोगाचा अंदाज मिळता जुळता आहे. त्यामुळे असे ३० टक्के चलन बँकेकडे परत आले नाही तर चलनाच्या स्वरूपातील काळा पैसा बाहेर काढण्यात सरकारला यश आले असे मानता येईल. एवढा मोठा म्हणजे सुमारे ४ लाख कोटीच्या नव्या नोटा सरकारला छापता येतील आणि तो पैसा विकासाच्या कामी वापरता येईल. काळ्या पैशाच्या रुपात किंवा काळ्या पैशावरील कराच्या रुपात सरकारला ४ लाख कोटी वापरायला मिळाले तर मोदी सरकारचा निर्णय अर्थव्यवस्थेसाठी फायदेशीर ठरला असे म्हणता येईल.  अंदाजित ४ लाख कोटीच्या काळ्या पैशा पैकी ७५ टक्के रक्कम जरी अर्थव्यवस्थेतून बाद झाली तरी या निर्णयाचे ते यश मानता येईल. पण आपण वर जे आकड्याचे गणित मांडले आहे ते लक्षात घेता एवढा काळा पैसा तर दिसत नाही ! मग कशासाठी हा अट्टाहास केला असा प्रश्न पडू शकतो. पण आत्ताच कोणत्या निष्कर्षावर पोचण्याची घाई करू नये. सरकारने दिलेली मुदत संपल्यावर पुन्हा आकडे मोड करून निष्कर्ष काढता येईल.

                                                                                                                          आणखी एका आर्थिक निकषावर हा निर्णय तपासता येईल. निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी झालेला खर्च आणि बाहेर आलेला किंवा बाद झालेला काळा पैसा याचे काय प्रमाण आहे. जुन्या नोटा चलनातून काढून घेण्याचा आणि नव्या नोटा चलनात आणण्याचा सरकार व बँकांना येत असलेला खर्च, लोकांना चलन जमा करण्यासाठी आणि काढण्यासाठी खर्च करावा लागलेला वेळ, चलन नसल्याने थंडावलेला व्यापार - उद्योग , बुडालेला रोजगार याचा एका आर्थिक संस्थेने काढलेला अंदाज १ लाख २८ हजार कोटीचा आहे. यात शेतीमालाचे भाव घसरल्याने शेतकऱ्यांना बसलेला फटका लक्षात घेतलेला नाही. तो यात जोडला तर या निर्णयाचा या आर्थिक वर्षातील खर्च २ लाख कोटीच्या वर जाणार आहे. शिवाय अर्थव्यवस्थेची गाडी पूर्वपदावर यायला लागणारा वेळ लक्षात घेतला तर खर्चाच्या बाजूचे आकडे वाढतील. त्यामुळे हा व्यवहार आर्थिक दृष्ट्या फायद्याचा राहिला कि तोट्याचा याचा अंदाज ३१ मार्च पर्यंत येईल. तोपर्यंत समर्थकांनी आणि विरोधकांनी सध्याच्या काळ्या पैशावर डोकेफोड करण्याचे कारण नाही. समजा या व्यवहारात सध्या मोठा आर्थिक तोटा झाला , पण पुढे भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाची निर्मिती बंद झाली तर याचे दूरगामी परिणाम चांगले होवू शकतात. तसे होईल का हाच खरा कळीचा प्रश्न आहे . अंतिमत: या प्रश्नाच्या उत्तरावर प्रधानमंत्र्याचा चलन रद्द करण्याचा निर्णय साहस आहे की दु:साहस आहे हे ठरणार आहे. 


 आज एक गमतीशीर विरोधाभास दिसत आहे. आपला काळा पैसा निर्मितीमधील वाटा विसरून लोक प्रधानमंत्री मोदींच्या निर्णयाला पाठींबा देत आहेत. मोठ्या लोकांकडेच सगळा काळा पैसा दडला आहे आणि प्रधानमंत्र्याने एका फटक्यात काळ्या पैशावाल्याना भिकारी बनविले , त्यांचा माज उतरविला ही लोकभावना आहे. एकूण आर्थिक गुंतागुंतीचा आणि काळ्या पैशाची निर्मिती कशी होते हे लक्षात न घेता लोक या निर्णयाला साहसपूर्ण निर्णय म्हणून पाठींबा देत आहेत. आता कोणाचा किती पैसा बाद होतो हे वर सांगितल्या प्रमाणे दिसून पडेलच. पण काळ्या पैशाची निर्मिती थांबणे मोदी सरकारच्या निर्णयामुळे नाही तर स्वतःच्या निर्णयामुळे थांबणार आहे हे कोणीच लक्षात घेत नाही. लोक स्वत: काळ्या पैशाची निर्मिती थांबविणार नसतील तर कोणतेही सरकार आणि कोणतीही सरकारी यंत्रणा कधीच काळ्या पैशाची निर्मिती थांबवू शकत नाही. काळा आणि बेहिशेबी पैसा म्हणजे बँकेच्या बाहेर लोकाजवळ असलेली जमापुंजी नाही. ज्या उत्पन्नावर आपण कर भरीत नाही ते उत्पन्न म्हणजे काळा पैसा . भ्रष्टाचार करून मिळविलेला पैसा म्हणजे काळा पैसा. अशा पैशाच्या निर्मितीत आपला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध असतो. आता बाजारात आपण खरेदी केलेल्या किती वस्तूंचे पक्के बील घेतो याचा विचार करा. फक्त ज्या वस्तूंची वारंटी आहे अशाच वस्तूचे बील घेण्याकडे आपला कल असतो. औषधा सारख्या महत्वाच्या वस्तूचे बील आपण घेत नाही मग किराणा सामानाचे कुठून घेणार . कच्च्या चिट्ठीवर लिहून दिले की आम्ही समाधानी असतो. घरटी प्रत्येक मुलगा अगदी पहिली पासून शिकवणीला जातो. प्रत्येक महिन्याला आम्ही न चुकता पैसे देतो. शिकवणीच्या पैशाची पावती आपण घेतच नाही. तुम्हाला कोर्टात काम पडते. वकिलाला पैसे देता . डॉक्टरकडे जाता पैसे देता. याची कधी पावती मागितली किंवा तुम्हाला दिल्या गेली असे झाले का आठवून पाहा. आपण हॉटेल मध्ये खातो पितो. भरपूर बील झाले तरी त्याची पावती कधी घेत नाही. आपला ८० टक्के व्यापार आणि सेवा बिन पावतीने चालतात. हा सगळाच पैसा बिनहिशेबी ठरत नाही. संबंधित लोक उत्पन्न दडवून शक्य तितका कमी कर भारतात. तुमचा माझा व्यापार व्यवसाय असेल तर आपणही असेच करतो. अशा प्रकारे दैनदिन व्यवहारात रोज काळ्या पैशाची निर्मिती होत असते. हंगामात शेतकऱ्यांना बियाणे - खाते-औषधी यासाठी किंमती पेक्षा जास्त पैसा मोजावा लागतो. तुमच्या कष्टातून निर्माण झालेला पांढरा पैसा असा काळा बनतो. मुलाला शिक्षक , प्राध्यापक किंवा इतर कोणतीही सरकारी नोकरी मिळविण्यासाठी लाखो रुपये द्यावे लागतात. हे दिलेले लाखो रुपये म्हणजे पांढऱ्याचे काळे पैसे बनतात. याचा हिशेब देता येत नाही की दाखविता येत नाही. जमिनीचे खरेदी विक्री व्यवहार मोठ्या प्रमाणावर होतात. यात प्रत्यक्ष सौदा आणि कागदावर दाखविलेला सौदा यात किती अंतर असते याची माहिती आपल्यापैकी प्रत्येकाला आहे. दोन्ही मधले जे अंतर असते ते म्हणजे काळा पैसा. हा झाला सर्वसामान्य जनतेने आपल्या व्यवहारातून निर्माण केलेला काळा पैसा. पोलीस रस्त्यावर उभे राहून वसुली करतात. अगदी शहरात सुद्धा बिना पावतीने दंड वसूल करतात. ज्या पोलिसांनी बेकायदेशीर कामांना प्रतिबंध घालावा अशी अपेक्षा असते तेच काळा पैसा निर्मितीचे साधन बनतात. पोलिसच काय खालपासून वरपर्यंत सगळ्या सरकारी यंत्रणेबद्दल असेच म्हणावे लागेल.

                                                                                                                              अशा पैशाची बेरीज केली तर प्रचंड होईल. हे सगळे लक्षात न घेता आपण भाबडेपणाने मानतो की सरकारच्या या निर्णयाने काळा पैसा नष्ट होणार आहे. समाजातील असे व्यवहार बंद होणार नसतील तर काळा पैसा कसा नष्ट होईल याचा आम्ही विचार करीत नाही. जेव्हा आपण असे मानतो तेव्हा आपल्या समोर राजकारणी , उद्योगपती , आयात-निर्यात व्यवसायात गुंतलेले व्यावसायिक, सोने आणि हिऱ्यांचे व्यापारी , रस्ते-पूल याचे मोठमोठे कंत्राट घेणारे कंत्राटदार असतात. एकावेळी , एका दिवशी मोठ्या प्रमाणावर काळा पैसा निर्मिती करण्याची यांची क्षमता मोठी आहे हे खरे. यांचा पैसा या निर्णयामुळे बाहेर येईल अशी आमची भाबडी आशा आहे. आपल्या समोर भुजबळ यांचे उदाहरण आहे. त्यांच्याकडे जेवढी बेहिशेबी संपत्ती सापडली त्यात चलनी नोटांचे प्रमाण नगण्य आहे. अनेक उद्योग-व्यावसायिकांचा पैसाच तर हवाला किंवा इतर मार्गाने परदेशी बँकात जात असतो. या निर्णयाने यांचेकडे जे काही सापडेल ते हिमनगाचे वरचे टोक असणार आहे. देशांतर्गत देखील साचलेला काळा पैसा कमीच असतो. जमीन किंवा सोन्यात तो गुंतविला जातो किंवा नवे नवे सौदे करण्यापुरता रोख पैसा साठवलेला असतो. अशाच साठवलेल्या पैशावर या निर्णयाचा परिणाम होणार आहे. सरकारने या दरम्यान सोन्याला आणि लॉकरला हात लावणार नाही असे अभय पत्रक काढून दिले आहे. प्रत्येक निवडणुकीत राजकीय पक्ष आणि त्यांचे उमेदवार मोठ्या प्रमाणावर बेहिशेबी पैशाचा वापर करतात. मागची लोकसभा निवडणूक सर्व निवडणुकांमध्ये जास्त खर्चिक ठरली . ज्या पद्धतीने आणि ज्या प्रकारचा डोळे दिपविणारा प्रचार मोदींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने केला त्याचा खर्चही तेवढाच डोळे दिपविणारा होता. कॉंग्रेससह इतर पक्षांनी भरपूर बेहिशेबी पैसा वापरलाच पण यात भाजपने आघाडी घेतली होती. आता हाच पैसा चलनातून बाहेर फेकण्याचा प्रयत्न मोदीजी करीत आहेत ते स्वागतार्ह आहे. पण पुढच्या निवडणुकीत अशा खर्चाची पुनरावृत्ती होणार नाही याची खात्री आणि दिलासा चलन रद्द करण्याच्या निर्णयातून मिळत असेल तर या निर्णयाने देशातील काळा पैसा नक्की संपेल  चलन रद्द केल्यानंतर नोटांची टंचाई असताना आपल्याकडे झालेल्या विधान परिषद आणि नगरपालिका निवडणुकीत काय झाले यावर नजर टाकली तर भविष्याचा अंदाज सहज येईल .
--------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव , पांढरकवडा , जि. यवतमाळ
मोबाईल - ९४२२१६८१५८
--------------------------------------------------------------------------