Thursday, June 28, 2012

म्हातारी कॉंग्रेस , पोरकट भाजप आणि भाबडी जनता


ज्या मनमोहनसिंहाच्या नेतृत्वाने  सरकारच नाही तर देशाच्या आर्थिक व राजकीय संस्था धोक्यात आल्या आहेत त्या मनमोहनसिंहाना पुढील निवडणुकी पर्यंत पंतप्रधान पदी  कायम ठेवण्याचा जुगार खेळण्याची हिम्मत  कॉंग्रेस नेतृत्वाने केली ती निव्वळ या देशातील लोकांना नि:स्वार्थी पणाचे व स्वच्छ चारित्र्याचे वेड म्हणता येईल इतके आकर्षण असल्यामुळेच ! म्हणूनच एरवी सचोटी , नि:स्वार्थीपणा आणि स्वच्छ चारित्र्य हे गुण भारतीय संदर्भात धडकी भरावी असे भितीदायक दुर्गुण बनले आहेत. राष्ट्रपती पदासाठी कोण अधिक योग्य आहे या चर्चेने आणि चर्चे मागील भावनेने केवळ आमचे राजकीय अडाणीपण समोर आणले नाहीत तर या दुर्गुणावर झगझगीत प्रकाश टाकला आहे.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
राष्ट्रपती पदासाठी उमेदवार निवडताना राजकीय पक्षांचा उडालेला गोंधळ आणि गोंधळ घालण्यात झालेली त्याची परिणती बघितली कि दोन प्रश्न पडतात.  पाहिला प्रश्न पडतो तो लोकशाही मध्ये आवश्यक असलेला संवाद साधण्याची मुलभूत बाब सारेच राजकीय पक्ष विसरत चालले आहेत का ?  दुसरा प्रश्न जास्त महत्वाचा आहे आणि तो म्हणजे सव्वाशे कोटीच्या देशात चटकन नजरेत भरेल आणि सर्वसंमती होईल अशी एक ही योग्य व्यक्ती नाही का ? गेल्या दोन वर्षात देशाच्या राजकीय पटलावर जो गोंधळ सुरु आहे ते लक्षात घेता पहिल्या प्रश्नाचे उत्तर काय आहे ते राजकीय समज नसलेल्यानाही कळायला अवघड नाही. संवादाची कला सर्वच राजकीय पक्ष विसरत चालले आहेत या बाबत दुमत होण्यासारखी परिस्थिती नाही. देशातील प्रमुख राजकीय पक्ष म्हणून आणि सत्ताधारी पक्ष म्हणून देखील अशा संवादात पुढाकार घेण्याची जबाबदारी कॉंग्रेस पक्षाची आणि त्याला प्रतिसाद देण्याची जबाबदारी प्रमुख विरोधी पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षावर येते. पण राष्ट्रपती पदाच्या बाबतीतच नव्हे तर देशासमोरील कोणत्याच प्रश्नाच्या बाबतीत ही जबाबदारी या दोन्ही पक्षांनी पार पाडलेली नाही. इतर पक्ष आपापल्या सोयीनुसार राजकीय विसंवादाच्या या प्रक्रियेत सामील होत आले आहेत. देशाच्या सर्वोच्च पदावर बसण्या साठी एक ही सर्वसंमत लायक व्यक्ती नाही असे म्हणणे या साठी संयुक्तिक होणार नाही कि त्या पदावर कसा व्यक्ती असला पाहिजे या बाबत इतक्या वर्षानंतर ही राजकीय व बिगर राजकीय वर्तुळात स्पष्टता नाही. ही स्पष्टता नसल्याने अशी व्यक्ती शोधताना अपरिहार्यपणे योग्यतेऐवजी सोयीवर भर दिल्या जातो. आज या पेक्षा वेगळे काही घडलेले नाही. पण यानिमित्ताने सत्ताधारी पक्षातील असमंजस पणाची स्थिती व योग्य निर्णय घेण्याची प्रकट झालेली अक्षमता आणि प्रमुख विरोधी पक्षाने दाखविलेला बालीशपणा हा राष्ट्रपती पदासाठी उमेदवाराच्या निवडीपेक्षाही जास्त चिंतेचा विषय आहे. 

                                          कॉंग्रेसने संधी गमावली 

गेल्या वर्ष-दोन वर्षा पासून कॉंग्रेस पक्ष आणि केंद्रातील कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकार जनतेच्या रोषास पात्र ठरले आहे. पक्षावर आणि सरकारवर चौफेर हल्ले होत आहेत. या हल्ल्यांना तोंड देण्याचे धैर्य ना पक्ष नेतृत्वाने दाखविले आहे ना सरकारचे नेतृत्व करणाऱ्यांनी दाखविले आहे. पक्ष आणि सरकारचे नेतृत्व हल्ल्याने भांबावून खंदकात जावून बसले . पक्ष किंवा सरकारातील दुसऱ्या फळीतील दिग्विजयसिंह , कपील सिब्बल किंवा पक्ष प्रवक्त्यांनी होणाऱ्या हल्ल्याचा प्रतिकार करण्यासाठी जेव्हा जेव्हा तोंड उघडले तेव्हा तेव्हा त्यांनी पक्षाला व सरकारला तोंडघशीच पाडले. राजकारणात आरोप-प्रत्यारोप काही नवीन नाहीत. राजकीय आरोप म्हणजे खऱ्या-खोट्याचे बेमालूम मिश्रण असते आणि तेवढ्याच खऱ्या-खोट्या माहितीच्या आधारे प्रत्युत्तर देण्याची परंपरा आहे. या प्रकाराला   जनताही कधी मनोरंजना पलीकडे महत्व देत नाही. पण सरकारवर झालेले आरोप महाभ्रष्टाचाराचे होते आणि या आरोपांना पक्ष व सरकारच्या नेत्यांनी महामौनाने त्याचे उत्तर दिले. परिणामी जनमानसात कॉंग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराने बरबटलेला पक्ष आणि सरकारातील लोक भ्रष्टाचारा शिवाय दुसरे काहीच करीत नाहीत हा समज दृढ होत गेला. सरकारची प्रत्येक कृती लोकांच्या विशेषत: संख्या आणि ताकद या दोहोंनी वाढत चाललेल्या मध्यमवर्गीयांच्या दृष्टीने संशयाच्या भोवऱ्यात यायला लागली. याच्या परिणामी शासन आणि प्रशासन निष्क्रिय होत गेले. कसाबसा एखादा निर्णय घेतला आणि त्यावर होहल्ला झाला कि सरकार शेपूट घालू लागले. स्पेक्ट्रम संबंधी असो कि कोळशा संबंधी असो सरकारच्या  सर्वच धोरणात्मक निर्णयालाच सर्वत्र भ्रष्टाचार म्हणून समजल्या गेल्यानंतरही पक्ष व सरकारचे महामौन सुटले नाही. धोरण विषयक निर्णयाचे समर्थन करण्या ऐवजी सरकारने धोरण विषयक निर्णयच घेणे बंद केले. जगभरची अर्थव्यवस्था मंदीच्या संकटात सापडली असल्याने अतिशय दक्ष राहून कठोर निर्णय घेण्याची गरज असताना सरकार हातपाय गाळून बसल्याने देशातील अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला. सरकारचे सल्लागार देखील सरकारला धोरण लकवा झाल्याचे खुलेआम मान्य करू लागलेत. कधी नव्हे ते सारे उद्योग, व्यापार आणि कृषी जगत सरकारच्या धोरण विषयक लकव्यावर प्रहार करू लागलेत. या सर्व प्रकाराला मनमोहनसिंह यांचे दुबळे आणि मुख दुर्बळ नेतृत्व कारणीभूत असण्यावर जवळपास देशभरात  एकमत आहे. आज देश अनेक बाबतीत अनेक प्रश्नावर विभागला आहे. राजकीय आणि आर्थिक पंडिताचे एकमत होणे ही दुर्मिळ गोष्ट मानली जाते. पण मनमोहनसिंह यांच्या दुबळ्या नेतृत्वावर आज या सर्वांचे एकमत आहे. सरकारचा चेहरा मोहरा बदलला नाही तर पुढच्या निवडणुकीत कॉंग्रेसला भवितव्य नाही याबाबत राजकीय वर्तुळात दुमत नाही. उत्तर प्रदेशात गांधी कुटुंबाच्या परंपरागत मतदार संघातील निवडणूक कौलाने याची पुष्ठीच केली आहे. पण सरकारच्या बाबतीत मनमोहनसिंह जसे अनिर्णयाच्या गर्तेत सापडले आहे त्याच प्रकाराची पुनरावृत्ती पक्षाच्या बाबतीत सोनिया गांधी कडून होवू लागली आहे. पक्ष नेतृत्वाने एक तर लढाईच्या आधीच हत्यार टाकले आहे किंवा पक्ष आणि त्याचे नेतृत्व आता एवढे जक्ख म्हातारे झाले आहे कि त्यांना आपले भवितव्य दिसेनासे किंवा कळेनासे झाले असावे असा निष्कर्ष  त्यांनी राष्ट्रपती पदासाठी केलेल्या उमेदवार निवडीवरून काढता येतो. ज्यांच्यामुळे सरकार निष्क्रिय व निष्प्रभ झाले, सरकारला अनिर्णयाने ग्रासले आणि ज्यांना गेल्या दोन वर्षात सरकारच्या कोणत्याच निर्णयाचे समर्थन करता आले नाही त्या मनमोहनसिंह यांना सन्मानाने राष्ट्रपती भवनात पाठवून सरकारचा चेहरा मोहरा बदलून नवी प्रतिमा निर्माण करण्याची चालून आलेली संधी कॉंग्रेसने गमावली आहे. स्वत:वर आरोप झाले कि पटकन तोंड उघडून खुलासा करण्याच्या सवयीचा अपवाद सोडला तर मनमोहनसिंह सारखा स्थितप्रज्ञ व्यक्ती शोधून सापडणार नाही. देशातील सर्व शक्तिमान असे सर्वात महत्वाचे पंतप्रधान पद मनमोहनसिंह यांनी शोभेचे पद बनवून टाकले आहे. तेव्हा या पदाचे अधिक अवमूल्यन टाळणे आणि मनमोहनसिंह यांच्या सारख्या प्रामाणिक राजकीय व्यक्तीला  पद देवून पंतप्रधान व राष्ट्रपती या दोन्ही पदाची प्रतिष्ठा कॉंग्रेस नेतृत्वाला वाढविता आली असती. . मनमोहनसिंह यांचा सर्वात मोठा दोष म्हणजे सहकारी मंत्र्याच्या खात्यात काय चालले हे त्यांनी कधी जाणून न घेतल्याने सरकारवर काहीही पकड नसणे हा आहे. हा दोष दुर करण्यासाठी प्रणव मुखर्जी यांच्या सारखा नेता पंतप्रधान पदी बसविण्याचा उत्तम पर्याय कॉंग्रेसकडे होता. पण प्रणव मुखर्जी सरकारात असताना राहुल गांधीना पंतप्रधानपदी बसविण्याची कॉंग्रेस नेतृत्वाला लाज वाटत असावी. म्हणूनच त्यांनी प्रणव मुखर्जींना सक्रीय राजकारणातून मुक्त केले असावे. इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्यावर राष्ट्रपती पद दुय्यम दर्जाच्या  व सुमार क्षमता आणि समज असलेल्या  व्यक्तीना बहाल करण्याची परंपरा प्रणव मुखर्जी यांच्या निवडीने  संपुष्टात आली ही बाब चांगली असली तरी प्रणव मुखर्जी सारखा मुरलेला मुत्सद्दी आणि राजकारणी आपली सक्रियता आवरण्यात कितपत यशस्वी होईल हे सांगणे कठीण आहे. कदाचित आपला पक्ष आगामी निवडणुकीत विजय मिळवून सत्तेवर येण्याची शक्यता धुसर वाटल्याने कॉंग्रेस नेतृत्वाने विरोधी पक्षाचे सरकार मुठीत ठेवण्याची क्षमता असलेले प्रणव मुखर्जी यांची निवड केली असणे तर्कसंगत आहे. पण देशातील सर्वच स्वायत्त वैधानिक संस्था आपल्या सक्रियतेने सरकारच्या डोईजड झालेल्या  असताना देशाचे सर्वोच्च वैधानिक पद डोईजड होवू शकेल अशा व्यक्तीच्या हाती देवून कॉंग्रेस नेतृत्वाने विचार करण्याची क्षमता गमावली आहे असेच म्हणावे लागेल. कॉंग्रेस मरण पंथाला लागल्याचे हे लक्षणं आहे.



                                          अपरिपक्व बीजेपी 
                                         
एखादा पक्ष त्याच्या करणीने मरण पंथाला लागला असेल तर त्याची चिंता करण्याचे कारण नसायला पाहिजे. पण कॉंग्रेसचा पर्याय बनू पाहणाऱ्या प्रमुख  विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाची परिस्थिती कॉंग्रेस पेक्षा जास्त चिंताजनक आहे. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपची  विरोधी पक्ष म्हणजे सरकारच्या प्रत्येक कृतीला आणि धोरणाला विरोध करणारा पक्ष अशी बाळबोध धारणा असल्यागत या पक्षाचे वर्तन राहिले आहे. संसदेत एखाद्या प्रश्नावर धोरणात्मक चर्चा घडवून सरकारची धोरणे चुकीची असल्याचे दाखवून देण्याचे कर्तव्य या पक्षाने कधीच पार पाडले नाही. चर्चे ऐवजी गोंधळ घालून संसदेचे कामकाज बंद पाडणे हीच काय ती भाजप ची व्रात्य आणि उनाड पोरा सारखी करतुत राहिली आहे. संसदेचे अवमूल्यन करण्यात भाजप देखील सरकार आणि अण्णा-बाबांच्या आंदोलना पेक्षाही आघाडीवर असण्यामागे त्याचे संसदेतील बेजबाबदार वर्तन कारणीभूत आहे. पण सरकारला व संसदेला काम करू द्यायचे नाही हा विरोधी पक्ष म्हणून एक कलमी कार्यक्रम स्वीकारल्यानंतर शासनाच्या कारभाराकडे डोळसपणे पाहण्याचे कारण उरत नाही. राष्ट्रपतीपदा बाबतही भाजपने विरोधासाठी विरोधाची परंपरा कायम ठेवली आहे. पण अभ्यास करून सरकारला कोंडीत पकडण्याची सवय नसलेल्या भाजपने राष्ट्रपती पदा साठीचा उमेदवार निवडताना  पुरेसे होमवर्क न करून आपली फजिती करून घेतली आहे.  जगभर हा रोष कोणत्या न कोणत्या निमित्ताने प्रकट होत आला आहे. पण भारतात सत्ताधारी पक्षा इतकाच विरोधी पक्षा बद्दल खदखदणारा रोष ही प्रमुख विरोधी पक्ष या नात्याने भाजपच्या कर्माची आणि कामगिरीची फळे आहेत. दुसऱ्यांनी निर्माण केलेल्या असंतोषाची फळे आपल्यालाच चाखायला मिळतील या कल्पनेनेच भाजप नेत्यांच्या तोंडाला पाणी सुटले आहे. यामुळेच बाबा आंदोलना बाबत सरकारी हडेलहप्पी मुळे घडलेल्या दुख:द प्रकाराबद्दल राजघाटावर दु:ख प्रकट करण्या ऐवजी आनंदोत्सव साजरा करून आपल्या पोरकटपणाचे दर्शन भाजपने साऱ्या देशाला घडविले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांच्या पद्धती प्रमाणे अण्णा-बाबा आंदोलनात शिरकाव करून ते आंदोलन वाढविण्यात भूमिका बजावली असली तरी भाजप नेते मात्र आयत्या बिळावर नागोबा बनून कब्जा करण्यासाठी आतुर आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हे अपत्य कमालीचे आळशी असल्याची ही झलक राष्ट्रपती पदाच्या उमेदवार निवडीतही दिसून आली. भाजप सारख्या विरोधी पक्षाला  राष्ट्रपती पदावर बसण्या योग्य उमेदवार समोर करता आला नाही ही या पक्षाची दयनीय स्थिती दर्शविते. माजी लोकसभा सभापती श्री संगमा भाजपच्या मदतीला धावून आले नसते तर या पक्षाचे जगभर हसे झाले असते.  कॉंग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षाकडे कमालीचे कल्पना दारिद्र्य आहे हे राष्ट्रपती पदा साठी उमेदवार निवडताना दिसून आले आहे. 

                                   जनतेचा भाबडेपणा 

भाजपला विरोधी पक्षाची भूमिका पार पाडण्यात अपयश आल्याने ती भूमिका त्यांच्याकडून अण्णा आंदोलनाने हिसकावून घेतली . तसाच प्रकार व प्रयत्न राष्ट्रपती पदा साठीच्या उमेदवार निवडी बाबत घडला ! या बाबतीत राजकीय पक्षांनी घातलेला घोळ लक्षात घेवून या पदासाठी कोण उमेदवार योग्य राहील हे सांगण्याचा जनतेच्या पातळीवर प्रयत्न झाला. माध्यमांनी अनेक जनमत कौल घेतलेत. फेसबुक, ट्विटर सारखी सामाजिक माध्यमे तर उमेदवार निवडीच्या चर्चेत आघाडीवर होती. राजकारणापासून दुर राहणे पसंत करणारी व त्याचा अभिमान बाळगणारी मंडळी राजकीय दृष्ट्या जागृत होवून राजकीय प्रक्रियेत सामील होत असतील तर देशाच्या शासन आणि प्रशासनाच्या सुधारणेकडे नेणारे आणि लोकशाही बळकट करणारे ते पाऊल ठरेल. पण या बाबतची झालेली सर्व चर्चा राजकीय अपरिपक्वतेची निदर्शक ठरली. राजकीय प्रक्रियेला पूर्णत: अराजकीय बनविण्याचा अट्टाहास चक्रावून टाकणारा आहे. राष्ट्रपती पदावर सचोटीचा माणूस बसावा हा आग्रह चुकीचा नाही . पण त्या पदावर बसण्यासाठी राजकीय दृष्टी आणि समज हीच महत्वाची आहे ही समज या चर्चेत कुठेच आढळून आली नाही. म्हणूनच लोक चर्चेत पूर्व राष्ट्रपती कलाम यांचे नाव सातत्याने आघाडीवर राहिले. सचोटी हा सर्वच क्षेत्रात आवश्यक असा गुण विशेष असला पाहिजे. पण ती असली म्हणजे झाले हे मानण्याची घातक प्रवृत्ती आपल्या देशात किती खोलवर रुजली आहे हे या चर्चेच्या निमित्ताने पुढे आले आहे. राजकीय आणि आर्थिक क्षेत्रात नेतृत्वाची हीच एकमेव अट असली तर काय घडू शकते याचे पंतप्रधान मनमोहनसिंह  हे उत्तम उदाहरण आहे. सचोटी व्यतिरिक्त त्यापदावर बसण्यासाठी आवश्यक गुणविशेष नसतील तर देशाचे किती नुकसान होवू शकते हे मनमोहनसिंहांनी दाखवून दिले आहे. सचोटीच्या व्यक्तींनी उचलले पाऊल चांगलेच असते आणि त्यांनी दाखविलेली दिशा चुकीची असू शकत नाही या एकमेव धारणेने  अण्णा हजारेच्या नेतृत्वाखालील आंदोलनाला बळ दिले. अशा  आंदोलनाच्या सामाजिक, राजकीय व आर्थिक परिणामा विषयी बेफिकिरी येते. अण्णा हजारेंचे या वयात हे सगळे करण्या मागे काहीच स्वार्थ नाही हे पाहिले कि डोळे झाकून त्यांच्या मागे जाण्यात कोणालाच गैर वाटत नाही. अशा नेत्याला आर्थिक आणि राजकीय समज नसली तर देशाचे किती नुकसान होवू शकते हे अण्णांचा लोकपाल अस्तित्वात आला असता तर सिद्ध झाले असते. एखाद्या आंदोलनाला राजकीय - आर्थिक पाया आणि दृष्टी नसली तर त्याचे देशाच्या राजकारणावर आणि अर्थकारणावर किती भयानक परिणाम होवू शकतात याची झलक अण्णा - बाबा आंदोलनाने दाखवून दिली आहे. या आंदोलनाने शासन - प्रशासन लुळे पांगळे करून अर्थव्यवस्थेला घसरणीवर आणून ठेवण्यात महत्वाची भूमिका निभावली आहे. पण त्यांचा काय स्वार्थ, त्यांना तर फक्त देश हिताची काळजी या भावनेने होणाऱ्या अनर्थाकडे आमची डोळेझाक होते. अप्रामाणिकपणा देशासाठी जितका घातक तितकाच केवल राजकीय,सामाजिक व आर्थिक समज नसलेला स्वच्छ चारित्र्याचा नेता देशासाठी घातक ठरू शकतो हे मनमोहनसिंह आणि अण्णा हजारे या दोघानीही दाखवून दिले आहे. पण आमच्या 'स्वच्छ' चारित्र्याच्या वेडावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही हेच लोक चर्चेतून पुढे आलेल्या कलाम यांच्या नावावरून दिसून येते. कलाम हे सज्जन आहेत , स्वच्छ चारित्र्याचे आहेत , एक वैज्ञानिक म्हणून ते नावाजलेले आहेत पण राजकीय क्षेत्रातील त्यांचे योगदान काय आहे हा प्रश्न कोणालाच पडला नाही. कलामांना राष्ट्रपती पद म्हणजे सचिन तेंडुलकरने सर्वाधिक धावा काढल्या म्हणून त्याला 'भारत रत्न' पदवी देण्यासारखे आहे. इतर 'भारत रत्नां' च्या तुलनेत सचिन कुठे आहे याचा कोणी विचार करीत नाही. सचिनचा गौरव हा ' खेल रत्न ' म्हणूनच झाला पाहिजे हे विसरल्या जाते. तशीच कलामांची जागा अतिशय वरची पण वेगळी आहे याचा आम्हाला विसर पडतो. हा विसर पडण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे स्वच्छ चारित्र्याचे आणि नि:स्वार्थी पणाचे आमच्या समाजाला असलेले वेड आहे. या गोष्टींचा आग्रह धरणे चुकीचे नाही पण या गुणांनी युक्त व्यक्ती कोणत्याही पदावर बसण्यासाठी पात्र असल्याची समजूत निव्वळ भाबडीच नाही तर  चुकीची आणि घातकही आहे. ज्या मनमोहनसिंहाच्या नेतृत्वाने  सरकारच नाही तर देशाच्या आर्थिक व राजकीय संस्था धोक्यात आल्या आहेत त्या मनमोहनसिंहाना पुढील निवडणुकी पर्यंत पंतप्रधान पदी  कायम ठेवण्याचा जुगार खेळण्याची हिम्मत  कॉंग्रेस नेतृत्वाने केली ती निव्वळ या देशातील लोकांना नि:स्वार्थी पणाचे व स्वच्छ चारित्र्याचे वेड म्हणता येईल इतके आकर्षण असल्यामुळेच ! म्हणूनच एरवी सचोटी , नि:स्वार्थीपणा आणि स्वच्छ चारित्र्य हे गुण भारतीय संदर्भात धडकी भरावी असे भितीदायक दुर्गुण बनले आहेत. राष्ट्रपती पदासाठी कोण अधिक योग्य आहे या चर्चेने आणि चर्चे मागील भावनेने केवळ आमचे राजकीय अडाणीपण समोर आणले नाहीत तर या दुर्गुणावर झगझगीत प्रकाश टाकला आहे. सामाजिक , आर्थिक आणि राजकीय समज वाढविणे हाच या दुर्गुणावर मात करण्याचा एकमेव उपाय आहे. पण सध्यातरी देशाची  म्हातारी कॉंग्रेस , पोरकट भाजप आणि भाबडी जनता यांच्या कात्रीतून सुटका नाही. 

                                                   (संपुर्ण)

सुधाकर जाधव 
मोबाईल-९४२२१६८१५८ 
पांढरकवडा ,
जि. यवतमाळ 

Thursday, June 21, 2012

आठवण आणिबाणीची


पहिली संधी मिळताच जनतेने उत्स्फूर्त पणे आणीबाणीचे जोखड झुगारून दिले होते. पण आजची पिढी या पासून काही शिकायला तयार नाही. कारण आजची जास्त शिकली सवरलेली ही पिढी पूर्णत: राजकीय निरक्षर आहे. वाढलेला भ्रष्टाचार नव्हे तर वाढलेली राजकीय निरक्षरता हीच  लोकशाहीवरील टांगती तलवार आहे. राजकीय साक्षरता वाढविण्यासाठी अण्णा-बाबांच्या अराजकीय आंदोलनाची नाही तर १९७४ च्या  जयप्रकाश आंदोलना सारख्या राजकीय आंदोलनाची देशाला गरज आहे. 
--------------------------------------------------------------------------------------------------------------------

येत्या २६ जून ला तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी देशावर लादलेल्या आणीबाणी पर्वाला ३७ वर्षे पूर्ण होतील. भारतीय राज्य घटनेत आणिबाणीची तरतूद असली तरी  लोकशाही गृहित धरलेल्या आपल्या देशात आणिबाणी ही अगदीच अनपेक्षित व अकल्पित घटना ठरली. मुरलेले राजकारणी असोत , घटना पंडीत असोत, नावाजलेले राजकीय पंडीत असोत  किंवा सर्वद्न्य समजणारे वा समजली जाणारी संपादक मंडळी असोत या सर्वांनाच आणिबाणी काय असते हे कळायला किमान ४८ तास लागले होते. एवढ्या मोठया देशात बोलणाऱ्याच्या मुसक्या आणि लिहिणाऱ्याचे हात बांधायला इंदिराजींना जितका वेळ लागला तितकाच वेळ आणिबाणी काय असते हे कळायला लागला होता. देशात घटनात्मक तरतुदींवर आणि लोकशाहीवर अनंत वेळा अनंत चर्चा झडल्या असतील पण आणिबाणी लादली जाण्यापूर्वी या विषयीची चर्चा फक्त घटना समितीतच झाली होती आणि तेथील चर्चेलाही संदर्भ राष्ट्रीय सुरक्षेचा होता. त्यामुळे एखादे नागरी आंदोलन , जन आंदोलन किंवा सरकार विरोधी आंदोलन चिरडण्यासाठी आणिबाणी लादून लोकशाही स्वातंत्र्याचा संकोच केला जावू शकतो हे कोणाच्या ध्यानीमनीही नव्हते. ज्या आंदोलनामुळे आणिबाणी लादली गेली त्या आंदोलनाचे नेते असलेले लोकनायक जयप्रकाश नारायण यांनी आणीबाणीच्या काळात तुरुंगात लिहिलेल्या रोजनिशीत याची कबुली दिली आहे. एक शांततामय लोकशाही चळवळ मोडून काढायला जगातील सर्वात मोठया लोकशाही देशाचे पंतप्रधान सर्वसाधारण आणि असाधारण कायद्याचा मार्ग स्विकारतील , पण कुठल्याही परिस्थितीत लोकशाहीचाच विध्वंश करून हुकुमशाही आणणार नाहीत हे आपण गृहित धरण्यात चूक केल्याची कबुली त्यांनी या रोजनिशीत प्रारंभीच दिली आहे. जसे जयप्रकाशांनी हे गृहित धरले तसेच इंदिराजी आणि त्यांचे निवडक सल्लागार सोडले तर सर्वांचेच हे गृहीतक होते ज्याला इंदिराजींनी आणीबाणीच्या रुपाने जोरदार तडाखा दिला होता. आणिबाणी अनुभवलेली आणि भोगलेली पिढी देशाच्या राजकीय, सामाजिक पटला वरून काहीशी बाजूला पडली आहे. आणीबाणीचे अपत्य असलेले आणि नंतर सत्तेचे अमृत प्यालेले लालू, नितीश किंवा सुशील मोदी वा नरेंद्र मोदी सारखे नेते राजकारणात महत्वाची भूमिका निभावत असले तरी आणीबाणीची ऐतिहासिक घटना इतिहास बनून विस्मरणात गेली आहे. लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली १९७४-७५ साली झालेले भ्रष्टाचार विरोधी आंदोलन स्वातंत्र्य लढ्याची आठवण करून देणारे पहिले सर्वात मोठे आंदोलन असून ही आजच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाला त्या  आंदोलनाचा विसर पडला यात नवल वाटण्या सारखे काही नाही. अनेक प्रकारचे उपचार घेवूनही रोग बरा नाही झाला तर रोगी कोणतेही उपचार करून घ्यायला तयार होतो तसेच आजच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाचे झाले आहे. ओसरलेल्या आंदोलनाला उभारी देण्याच्या प्रयत्नांना यश येत नाही हे बघून त्यासाठी निरनिराळे नुस्खे आजमाविल्या जाण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून आजच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाच्या नेत्यांना जयप्रकाश नारायण आणि त्यांच्या चळवळीची आत्ता-आत्ता आठवण झाली आहे. जयप्रकाश आंदोलनाची आठवण होण्या मागे आणखीही एक गंमतीशीर कारण आहे. बाबा रामदेव यांनी नव्याने सुरु केलेल्या आंदोलनात जयप्रकाशजींच्या प्रतिमेचा आवर्जून वापर केला. आपण बाबांच्या पुढे आहोत हे दाखविण्यासाठी मग टीम अण्णाने  यात्रेचा घाट घातला. या आंदोलनाच्या नेत्यांनी जयप्रकाशजींच्या जन्म गावा पासून एक जन जागरण यात्रा गेल्या ५ जून पासून सुरु केली आहे. यातून अण्णा आणि बाबांचे आंदोलन जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनाचे पुढचे पाऊल आहे असा समज आणि संभ्रम  निर्माण  झाला आहे जो सत्याला धरून नाही.
                            दोन आंदोलनातील फरक 

 आज आणीबाणीचे दिवस आठवण्याचे एक कारण त्याकाळी जे सोसावे लागले ते असले तरी त्यापेक्षा महत्वाचे कारण आजच्या आंदोलनाच्या नेत्यांच्या लोकशाही बद्दलची अनास्था हे आहे. आंदोलनाचे मुद्दे आणि आंदोलनाची तीव्रता आणि पद्धती सारखी भासत असली तरी जयप्रकाश आंदोलन आणि अण्णा-बाबा आंदोलन यांना वेगळे करणारी रेषा लोकशाहीची आहे हे आणिबाणी दिनाच्या निमित्ताने समजून घेतले पाहिजे. लोकशाहीला काही पर्याय असूच शकत नाही असे  गृहित धरण्याची चूक त्याकाळी भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाच्या नेत्यांनी केली आणि आजच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाच्या नेते  लोकशाही हीच  भ्रष्टाचाराची जननी आहे असा समज पसरविण्याची चूक करीत आहेत. जयप्रकाश  आंदोलनाचा लोकशाही व्यवस्थेवरचा अतिविश्वास त्या आंदोलनाच्या नेत्यांना बेसावध बनवून गेल्याने आणिबाणी आली आणि आजचे नेते लोकशाही बद्दल दाखवीत असलेली अनास्था देशाला केवळ आणीबाणीच्या दिशेने  ढकलीत नसून त्याही पुढे जावून  निर्वाचित व्यवस्थेवर अविश्वास दाखवून हुकूमशाहीसाठी पायघड्या टाकण्याचे काम करीत आहे. दोन आंदोलनातील हा मुलभूत आणि महत्वाचा फरक आहे. लोकशाहीच्या मुद्द्यावर सरकार आणि आंदोलक यांच्या भूमिका देखील बदलल्या आहेत. जयप्रकाश आंदोलनाची लोकशाहीवर अढळ निष्ठा होती. पण त्यावेळी सरकारच्या नेतृत्व स्थानी असलेल्या इंदिरा गांधी यांनी जनतेचा बुद्धिभेद करण्यासाठी लोकशाही राष्ट्राचा पुरस्कार करण्या ऐवजी लोकशाही पेक्षा राष्ट्र मोठे असा प्रचार करून लोकशाहीला गौण मानले. आजचे भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाची नेते मंडळी लोकशाही पेक्षा भ्रष्टाचार निर्मुलन महत्वाचे आहे आणि त्यासाठी लोकशाही निर्मुलन झाले तरी चालेल किंवा लोकशाही व्यवस्थाच भ्रष्टाचाराची जननी असल्याचा आभास निर्माण करीत आहेत . अण्णा-बाबा आंदोलनाने संसदेचे अवमूल्यन  करण्याची जी मोहीम चालविली आहे त्यामागची हीच धारणा आहे. तर दुसरीकडे विश्वासार्हता गमावलेले सरकार संसदेच्या श्रेष्ठत्वाची महती गात आहे. जयप्रकाशांच्या आंदोलन काळात इंदिरा सरकारने संसदेचे अवमूल्यन करून आणिबाणी लादली होती. जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाने आणिबाणी हटवून लोकशाहीच्या पुनर्स्थापनेत मोलाची भूमिका निभावली होती. पण आजचे भ्रष्टाचार विरोधी आंदोलनच संसदेचे अवमूल्यन करण्यात धन्यता मानीत आहे. आज सरकार लोकशाहीचे गोडवे गात असले तरी संसदीय व्यवस्थेचे अवमूल्यन करण्यात अण्णा-बाबा आंदोलनाच्या चार पावले पुढेच आहे. आज संसद किंवा सरकार व आंदोलक एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले वाटत असले तरी दोघांच्याही कृतीतून एकच समान गोष्ठ घडत आहे आणि ती गोष्ठ म्हणजे लोकांचा  लोकशाही वरील विश्वास उडत चालला आहे. पूर्वी लोकांच्या इच्छेविरुद्ध आणिबाणीच्या रुपाने हुकुमशाही लादल्या गेली होती आणि आज हुकुमशाहीचे स्वागत करण्यासाठी लोकांची मानसिकता तयार करण्यात येत आहे. सारखी भासणारी जयप्रकाश आंदोलन आणि अण्णा आंदोलन  परिणामाच्या दृष्टीने वेगळी असण्यामागे आंदोलनाच्या राजकीय आणि अराजकीय नेतृत्वाचा मोठा वाटा आहे.   प्रगल्भ राजकीय नेतृत्व अपरिहार्यपणे लोकशाहीचा पुरस्कार करते तर अराजकीय नेतृत्व नेहमीच लोकशाही व्यवस्थेकडे शंका आणि संकट म्हणून पाहात आले आहे. याला गांधी-विनोबा सारखे दिग्गजही अपवाद नव्हते हे लक्षात घेतले पाहिजे. अण्णा आंदोलनापासून जयप्रकाश आंदोलनातील कार्यकर्ते दुर का आहेत याचे उत्तर या दोन आंदोलनातील वेगळेपणात सापडते. 
                            लोकशाहीची महत्ता 

आणिबाणी नंतरच्या कालखंडात अराजकीय नेतृत्व पुढे येण्यामागे राजकीय नेतृत्वाने लोकांना कमालीचे निराश केले हे कारण आहेच. पण त्याही पेक्षा महत्वाचे कारण आज समाजाच्या सर्वच  क्षेत्रात वावरत असलेली पिढी ही आणिबाणी नंतरच्या कालखंडातील आहे. या पिढीला आणीबाणीच्या संघर्षाचा स्पर्शही झालेला नाही. स्वातंत्र्य आंदोलनाच्या परिणामापासून तर ही पिढी कोसो दुर आहे. बापजाद्याची दौलत वाटयाला यावी तशी  लोकशाही या पिढीच्या वाटयाला आली आहे. उदारीकरणाने आणि जागतिकीकरणाने निर्माण झालेल्या संपत्तीची वाटेकरी झालेली ही पहिलीच पिढी आहे. संपत्ती निर्माण करण्यासाठीचे पूर्वी असलेले सरकार वरचे अवलंबित्व कमी झाल्यामुळे सरकार नावाच्या व्यवस्थेचे या पिढीला अप्रूप राहिलेले नाही. उलट सरकार काही न करता या संपत्तीतले वाटेकरी होत असल्याची चीड या पिढीत आहे. ही चीड राजकीय घृणेत रुपांतरीत होण्यात अण्णा-बाबा सारख्या अराजकीय नेतृत्वाखालील आंदोलनाने महत्वाची भूमिका बजावली. राजकीय संस्कारा पासून दुर असलेली ही पिढी अण्णा-बाबा यांच्या आंदोलनाची ताकद बनली आहे. पण समाजाच्या सर्व क्षेत्रात प्रभावशाली असलेल्या आजच्या तरुण पिढीच्या प्रगतीत लोकशाही व्यवस्थेची निर्णायक भूमिका राहिली आहे याचा विसर या पिढीला पडला आहे. जगाला विकासाचा मोठा टप्पा गाठून देण्यात लोकशाही राष्ट्रांचा सिंहाचा वाटा असणे हा योगायोग नाही तर ते स्वातंत्र्याचे गोमटे  फळ आहे. जगात लोकशाही व्यवस्थेचा जसजसा विकास झाला तसतशी समाजाची आर्थिक क्षेत्रासह सर्वच क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती झाली आहे. लोकशाही आणि विकास यांचे असे अतूट नाते आहे. लोकशाहीच्या झाडालाच विकासाची फळे येतात. निसर्ग नियमाने यातील अनेक फळे किडकी निघतात. पण यावर उपाय त्या झाडाचे नीट संगोपन करणे हाच आहे . किडकी फळे लागतात म्हणून झाडच छाटून टाकण्याचा विचार आज बलवत्तर होत चालला आहे. आणीबाणीच्या काळात सगळी कामे शिस्तीत आणि वेळेवर होत असल्याचा प्रचार झाला. संप, हरताळ यांना पूर्णविराम मिळाला. लोकांच्या भल्यासाठी कार्यक्रमांची मोठी जंत्री बनविल्या गेली. आणि असे असतानाही पहिली संधी मिळताच जनतेने उत्स्फूर्त पणे आणीबाणीचे जोखड झुगारून दिले होते. पण आजची पिढी या पासून काही शिकायला तयार नाही. कारण आजची जास्त शिकली सवरलेली ही पिढी पूर्णत: राजकीय निरक्षर आहे. वाढलेला भ्रष्टाचार नव्हे तर वाढलेली राजकीय निरक्षरता हीच  लोकशाहीवरील टांगती तलवार आहे. राजकीय साक्षरता वाढविण्यासाठी अण्णा-बाबांच्या अराजकीय आंदोलनाची नाही तर १९७४ च्या  जयप्रकाश आंदोलना सारख्या राजकीय आंदोलनाची देशाला गरज आहे. 

                          (संपुर्ण)

सुधाकर जाधव 
मोबाईल-९४२२१६८१५८ 
पांढरकवडा,
जि.यवतमाळ  

Thursday, June 14, 2012

अण्णा विरुद्ध टीमअण्णा


 अण्णांनी यापूर्वीच व्हि.के.सिंग यांना निमंत्रण दिले आहे. पण अण्णा आंदोलनात सामील व्हायचे तर लष्करातून साधे वाहन चालक म्हणून निवृत्त झालेल्या अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली लष्कर प्रमुख पदावरून निवृत्त झालेल्या सिंग यांना काम करावे लागेल! लष्कर प्रमुखपदी राहिलेल्या व्यक्तीकडे आंदोलनाची सूत्रेही देता येत नाहीत . कारण अण्णांना दुसऱ्याच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्याची सवय नाही ! हा तिढा सोडविण्याचा मार्ग म्हणून टीमअण्णाने आंदोलनातून बाहेर पडण्याचा दरवाजा अण्णा साठी उघडून ठेवला आहे !
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

देशात अभूतपूर्व असे भ्रष्टाचार विरोधी आंदोलन ज्या वेगाने उभे राहिले त्या वेगानेच ओसरले . त्यामुळे  आंदोलनाच्या नेतृत्वस्थानी असलेल्या घटकांना धक्का बसने , मोठया प्रमाणावर नैराश्य येणे यात अस्वाभाविक असे काहीच नाही. रामलीला मैदान आंदोलनाची चव चाखलेल्याना पुन्हा तसेच आंदोलन उभा करण्यासाठी धडपडणे अगदी स्वाभाविक आहे. रामलीला मैदानातील अण्णांचे उपोषण आंदोलन ऐतिहासिक होते यात वाद नाही. पण  रामलीला मैदान आंदोलन हा इतिहास होता ही बाब आंदोलनाच्या नेत्यांनी मान्य केली तर ते एक प्रकारे पराभव मान्य करण्या सारखे झाले असते. असा पराभव मान्य करण्यासाठी सामाजिक, आर्थिक व राजकीय परिस्थितीची गुंतागुंत याची जाण आणि प्रांजळपणा असावा लागतो. टीम अण्णाकडे या दोन्ही गोष्टीचा अभाव असल्याचे वर्षभरात अनेकवेळा दिसून आले आहे. तसे नसते तर लोकपाल  हाती न येताच  एवढे मोठे आंदोलन का ओसरले यावर अण्णा व त्यांच्या टीमने चिंतन आणि मनन केले असते. पुन्हा 'रामलीला' चा उदघोष करण्या ऐवजी आंदोलन पुढे नेण्याचा नवा मार्ग चोखाळला असता. पण रामलीला मैदान आंदोलनाच्या नशेने देशभर जो उन्माद निर्माण झाला होता तसाच उन्माद पुन्हा निर्माण करण्याच्या नशेत अजूनही टीम अण्णा आहे हे त्यांच्या ताज्या लीलांवरून स्पष्ट होते. आणखीही एक गोष्ट स्पष्ट होते . ती म्हणजे टीम अण्णा अजूनही रामलीला मैदान आंदोलनाच्या नशेत वावरत असली तरी या टीमचे आणि भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाचे नेते  अण्णा हजारे मात्र त्यांच्या टीम सारखे नशेत नाहीत. ते पूर्णपणे होश मध्ये आहेत आणि आपल्या परीने आंदोलन पुढे नेण्याचा मार्ग शोधीत आहेत. अनुभव आणि उद्दिष्टे याप्रती असलेल्या प्रामाणिकपणातील फरक आपल्याला अण्णा आणि टीम अण्णा यांच्यात दिसून येत आहे. दोघांची वाट वेगळी होण्याचा हा प्रारंभ बिंदू तर नाही ना अशी शंका येण्यासारखी परिस्थिती ताज्या घडामोडीतून निर्माण झाली आहे. 

                               टीम अण्णाचा वेगळा मार्ग 

महाराष्ट्रात लोकायुक्त व लोकपाल यासाठी जनसमर्थन उभे करून सरकारवर दबाव आणण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून अण्णा हजारे उन्हातान्हात महाराष्ट्रभर सभा घेत जनजागृती करण्यात गुंतले असताना तिकडे दिल्लीत टीम अण्णाच्या म्होरक्यांचे वेगळेच नियोजन सुरु होते. टीम अण्णा म्हंटले कि  अर्थातच अरविंद केजरीवाल, किरण बेदी , प्रशांत भूषण आणि मनिष शिसोदिया या मोजक्या लोकांचाच समावेश होतो हे आता साऱ्या देशालाच माहित आहे. या टीमने अण्णा हजारे यांच्याशी विचारविमर्श न करता किंवा त्यांची संमती न घेताच दिल्लीत नवीच सनसनाटी निर्माण केली . या टीमने चक्क पंतप्रधान मनमोहनसिंह हे स्वत:च भ्रष्टाचारात लिप्त असल्याचा खळबळजनक आरोप केला. पंतप्रधान शिखंडी आहेत , धृतराष्ट्र आहेत असे कमरेच्या खाली वार करणारे वक्तव्य टीम अण्णाने केले.  अण्णा आंदोलनामुळे अख्खे केंद्रीय मंत्रिमंडळ भ्रष्टाचारी आहे असे वातावरण देशात निर्माण झालेले असताना टीम अण्णाने मात्र निवडक १३ मंत्र्यावर भ्रष्टाचाराचा आरोप ठेवला ! कोणताही ठोस पुरावा न देता माध्यमांच्या मदतीने कोणावरही भ्रष्टाचारी म्हणून शिक्कामोर्तब करण्याची सोय आणि परंपरा आपल्या देशात असल्याने टीम अण्णाने पंतप्रधान मनमोहनसिंह यांच्या मंत्रीमंडळातील १३ मंत्र्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करणे यात कोणाला काही वावगे वाटण्याचा प्रश्नच नव्हता. पण अशा वातावरणात सुद्धा पंतप्रधान मनमोहनसिंह यांच्यावर प्रत्यक्ष भ्रष्टाचाराचा ठेवलेला ठपका आणि देशाच्या पंतप्रधाना विषयी वापरलेली भाषा मात्र बोटावर मोजण्या इतके सत्तातुर भाजप नेते सोडले तर कोणाच्याच पचनी पडली नाही. पंतप्रधाना वरील आरोपाने अनेकजन थक्क झाले पण अण्णा आंदोलनाने निर्माण झालेल्या वातावरणात कोणी भ्रष्ट नाही असे सांगणे सोपे नसल्याने अनेकांनी गप्प बसणे पसंद केले. पण ही कोंडी फोडली ती दस्तुरखुद्द अण्णा हजारे यांनी. दिल्लीत टीम अण्णाने गाजावाजा करून पंतप्रधानावर केलेले आरोप अण्णा हजारे यांनी खोडून काढले. पंतप्रधान साधे, सरळ आणि स्वच्छ असल्याची पावती त्यांनी दिली. अण्णा आणि टीम अण्णा यांच्यातील मतभेद जगजाहीर झाल्यावर टीम अण्णाने अण्णांना दिल्लीत पाचारण करून त्यांना वेढा घातला आणि पंतप्रधानावर देखील आपला विश्वास नाही असे त्यांच्याकडून वदवून घेतले. अण्णाना इंग्रजी समजत नसल्याने त्यांनी आधीची प्रतिक्रिया दिली अशी मखलाशी प्रशांत भूषण आणि टीम अण्णाने केली. पण दिल्लीत टीम अण्णाच्या उपस्थितीत पंतप्रधानावर देखील आपला विश्वास उरला नसल्याचे सांगणारे अण्णा हजारे महाराष्ट्रात परतल्यावर पुन्हा पंतप्रधानांना स्वच्छतेची पावती देवू लागले आहेत. या घटनेने अण्णा आणि टीम अण्णा यांच्यातील फरक अधोरेखित केला असला तरी तेवढ्या मर्यादित अर्थाने या घटनेकडे पाहून चालणार नाही. या घटनेचे इतरही अर्थ आहेत आणि आंदोलनाचे भवितव्य आणि आंदोलनाची दिशा स्पष्ट करणारे ते अर्थ असल्याने त्याच्या संभाव्य परिणामाची चिकित्सा करणे गरजेचे आहे.

                         अण्णांना बाजूला सारण्याचे षड्यंत्र 

टीम अण्णाने दिल्लीत पंतप्रधानावर भ्रष्टाचाराचाचे आरोप करणे आणि अण्णा हजारे यांनी महाराष्ट्रातून लगोलग त्या आरोपाचा इन्कार करणे हा प्रकार पंतप्रधान भ्रष्ट आहेत कि नाहीत अशा प्रकारच्या वादाचा नाही.  अण्णा हजारे यांना अंधारात ठेवून किंवा त्यांच्या शिवाय आंदोलन पुढे नेण्याचा टीम अन्नाचा हा सुनियोजित प्रयत्न म्हणूनच याकडे बघावे लागेल. कारण यापूर्वी कधी असे घडले नाही. टीम अण्णा पैकी कोणी काही दिल्लीत किंवा इतरत्र बोलले आणि अण्णांना ते पसंद पडले नाही तर आख्खी टीम अण्णा केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली राळेगणसिद्धी येथे येवून अण्णाच्या पायाशी बसून खुलासा द्यायची. ही पहिली वेळ आहे कि टीम अण्णाचे वक्तव्य अण्णांना अजिबात मान्य नसताना देखील टीमने खुलाशासाठी अण्णाकडे धाव घेतली नाही . अण्णांना दिल्लीला जावून टीम अण्णाच्या हो मध्ये हो मिळवावा लागला आहे. अण्णा आणि टीमअण्णा यांच्यातील संबंधाबाबत महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकार आणि अण्णांच्या ब्लॉगचे भूतपूर्व लेखनिक राजू परुळेकर यांनी जी 'आंखोदेखी' सांगितली होती त्याची पुष्ठी आणि प्रचिती आणून देणारी ही घटना आहे. अण्णांचा वापर करून स्वत:ची प्रतिमा देशवासीयांसमोर  प्रतिष्ठीत केल्यावर टीमअण्णाला आता अण्णा हे ओझे वाटू लागल्याचे किंवा आपल्या उद्दिष्ट पूर्तीत अडथळा वाटत असल्याचे संकेत या घटनेतून मिळतात. टीमअण्णाला अण्णांना बाजूला करण्याची घाई का झाली असावी याचा अंदाज बांधणे फारसे कठीण नाही. अण्णांना आपल्या  आंदोलनाचे स्वरूप  अराजकीय ठेवायचे आहे . पण टीमअण्णा मधील सदस्यांना कॉंग्रेस विरोधी प्रचार करण्यात विशेष रस आहे. हे त्यांनी हिसार व नंतर उ.प्र. सहित काही राज्याच्या निवडणुकीत कॉंग्रेस विरोधी प्रचार करून दाखवून दिले आहे. वर्षा-दिड वर्षा नंतर होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत सोयीची भूमिका घेण्यासाठी टीमअण्णाला अण्णा हे अडथळा ठरतील अशी भिती वाटणे अनाठायी नाही. अण्णांना बाजूला सारण्यामागे आणखी एक  महत्वाचे  कारण असू शकते.  बाबा रामदेव यांनी काळ्या पैशाच्या विरोधात पुन्हा आंदोलन सुरु केले असून पूर्वी पेक्षा अधिक तयारीनिशी ते आंदोलनात उतरले आहेत. बाबा निरनिराळ्या लोकांचे व गटाचे समर्थन मिळविण्यासाठी आटापिटा करीत आहेत. अण्णा आंदोलनाचा पर्याय म्हणून पुढे येण्याचा बाबांचा प्रयत्न आहे. अशा प्रकारे भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाचे दोन धृवात विभाजन होत असताना कोणाचे पारडे जड होणार या बाबत नुकतेच लष्कर प्रमुख पदावरून निवृत्त झालेले व्हि.के. सिंह यांची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. लष्कर प्रमुखपदी कार्यरत असताना व्हि.के.सिंह यांनी नागरी आंदोलनात दाखविलेली रुची आणि त्या पदावर आणखी एक वर्ष राहण्याची त्यांची इच्छा धुळीस मिळाल्या नंतर सरकार बद्दल खदखदत असणारा राग शांत करण्यासाठी ते आज ना उद्या सरकार विरोधी आंदोलनात सामील होतील हे सांगायला कोण्या जोतीषाची गरज नाही. ते अण्णाच्या गोटात जातील कि बाबाच्या गोटात शिरतील हाच खरा कळीचा प्रश्न आहे. अण्णांनी यापूर्वीच व्हि.के.सिंग यांना निमंत्रण दिले आहे. पण अण्णा आंदोलनात सामील व्हायचे तर लष्करातून साधे वाहन चालक म्हणून निवृत्त झालेल्या अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली लष्कर प्रमुख पदावरून निवृत्त झालेल्या सिंग यांना काम करावे लागेल! लष्कर प्रमुखपदी राहिलेल्या व्यक्तीकडे आंदोलनाची सूत्रेही देता येत नाहीत . कारण अण्णांना दुसऱ्याच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्याची सवय नाही ! लष्करातील अधिकाराच्या चढत्या पायऱ्या व त्या तशाच टिकवून ठेवून त्यानुसार वागण्याचा लष्करी शिरस्ता लक्षात घेतला तर व्हि.के.सिंग यांना हे मानावण्या सारखे नाही व मान्य होणे तर त्याहून कठीण. या उलट कितीही मोठया पदावर व्यक्ती असला तरी भगव्या किंवा पांढऱ्या शुभ्र वस्त्रातील बाबांच्या चरणी बसायला त्याला अजिबात लाज वाटत नाही, उलट धन्य आणि कृतकृत्य वाटते. या न्यायाने माजी लष्कर प्रमुख व्हि.के.सिंग हे   बाबा रामदेव यांच्या छावणीत  दाखल होण्याची अधिक शक्यता आहे. केजरीवाल आणि प्रशांत भूषण सारख्या त्यांच्या सहकाऱ्यांचा बाबा रामदेव यांना असलेला विरोध लपून राहिलेला नाही. माजी लष्कर प्रमुख सिंग जर बाबांच्या गोटात दाखल झाले तर बाबांचे पारडे जड होणार हे ते जाणून आहेत. म्हणूनच टीम अण्णांना व्हि.के.सिंग यांना आपल्याकडे खेचायचे आहे. त्यात अण्णा यांचा अडथळा होवू शकतो. सिंग यांचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी टीमअण्णा अण्णाला बाजूला सारण्याच्या तयारीत असल्याची पुष्टीच ताज्या घडामोडीतून होत आहे. टीमअण्णाने पंतप्रधान मनमोहनसिंह यांच्यावर बेताल आरोप करून आणि पंतप्रधान व त्यांच्या सहकाऱ्याच्या भ्रष्टाचार विरोधात उपोषणाची घोषणा करून एका दगडात दोन नव्हे तर अनेक पक्षी मारले आहेत. बाबा रामदेव यांच्या आंदोलनावर केंद्रित होत असलेला प्रकाशझोत सनसनाटी आरोप करून आपल्याकडे वळविण्यात काही प्रमाणात यश मिळविले. निर्णय प्रक्रियेत अण्णा हजारे यांना महत्वाचे स्थान नाही किंवा स्थानच नाही आणि आंदोलनाचे नेतृत्व अण्णा कडे नसून 'टीम अण्णा'च्या हाती असल्याचा संकेत माजी लष्कर प्रमुखाना आणि देशवासियांना दिला आहे. स्वाभिमानी अण्णांनी स्वत:हून बाहेर पडावे यासाठी उद्युक्त करणारी ही खेळी आहे. अण्णांनी हे आंदोलन मोठया उंचीवर नेले होते. आता ती उंची गाठणे अण्णांना देखील शक्य नाही हे वास्तव टीम अण्णा जाणून आहे. अस्तंगत होत चाललेल्या आंदोलनाला अण्णांचा उपयोग नाही , पण माजी लष्कर प्रमुख सामील झाले तर देशात नवा उन्माद निर्माण होवू शकतो हे हेरून टीमअण्णाने आंदोलनातून बाहेर पडण्याचा दरवाजा अण्णा साठी उघडला आहे. पंतप्रधानावरील आरोपा बाबत टीमअण्णा गंभीर असती तर टीमने पंतप्रधानाचा राजीनामा मागितला असता. पंतप्रधान निष्क्रिय आहेत, अकार्यक्षम आहेत , निर्णय घेण्याचा त्यांचा अवयव निकामी झाला आहे , मंत्रिमंडळ व देशावरील त्यांची पकड सैल झाल्याने अराजक सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे असे अनेक वस्तुस्थिती निदर्शक आरोप करून पंतप्रधानाच्या राजीनाम्याची मागणी समर्थनीय ठरू शकते. पण टीमअण्णाने तसे काही न करता भ्रष्टाचाराचा धूर निर्माण करून आपला छुपा हेतू साध्य करण्याची खेळी चतुराईने खेळली आहे. परिणामाची मात्र काही दिवस वाट बघावी लागेल.

                                 (समाप्त)

सुधाकर जाधव 
मोबाईल-९४२२१६८१५८ 
पांढरकवडा,
जि. यवतमाळ 

Friday, June 8, 2012

विकासाच्या वाटेवर स्वयंसेवी काटे


-------------------------------------------------------------------------------------------------
 जागतिकीकरणाचा प्रारंभ झाल्या नंतर तर चळवळी कालबाह्य झाल्या सारख्या अस्तंगत होत गेल्या.  स्वयंसेवी संस्थांचे पीक फोफावणे आणि जागतिकीकरण याचा असा हा संबंध आहे. जागतिकीकरणाने आणखी एक गोष्ट घडली. परकीय पैसा देशात येण्यावरची बंधने सैल झाली . याचे सर्वात मोठे लाभार्थी ठरले ते स्वयंसेवी संस्थांचे जग !  

------------------------------------------------------------------------------------------------                                                                                                                -      -                                
गेल्या वर्षभरात अण्णा आंदोलन , तामिळनाडू प्रांतातील कुडमकुलन येथील अणुउर्जा प्रकल्प विरोधी आंदोलन   आणि सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय सल्लागार परिषदेचे  निर्णय या तिन्ही संदर्भात स्वयंसेवी संस्थांनी बजावलेल्या भूमिकेमुळे गैरसरकारी स्वयंसेवी संस्था हा चर्चेचा विषय बनल्या आहेत. अण्णा आंदोलन सुरु होई पर्यंत स्वयंसेवी संस्थाकडे पैशाचा निचरा करणाऱ्या संस्था म्हणून सर्रास पाहिल्या जायचे. पण अण्णा आंदोलन उभे करण्यात केजरीवाल-बेदी-शिसोदिया या संस्थाधिपतीनी बजावलेल्या निर्णायक भूमिकेने भोळी भाबडी जनता अशा संस्थांकडे आदर मिश्रीत कुतूहलाने पाहू लागली आहेत. पूर्वी हा आदर आणि कुतूहल फक्त मोजक्या संस्थांच्या वाटयाला यायचा आणि तो सुद्धा ठराविक वर्गाकडून. मध्यम आणि उच्चमध्यम वर्गीय  समाजात अशा संस्थांचे चाहते मोठया प्रमाणात दिसायचे. स्वत:च्या आत्मकेंद्रित समाज व अर्थकारणाची बोचणारी सल अशा संस्थाना मदत करून कमी करण्याचे प्रयत्न या वर्गाकडून नेहमीच होत आला आहे. याचे ठळक उदाहरण म्हणजे बाबा आमटे यांनी स्थापन केलेले आनंदवन आहे. पण जिथे पैसे न देता फक्त कौतुक करून अपराधी भावना कमी होत असेल तर अशा संस्था या वर्गाच्या विशेष लाडक्या बनतात. याचेही आपल्याकडील उदाहरण द्यायचे झाले तर डॉ. राणी आणि अभय बंग यांच्या 'सर्च' संस्थेचे देता येईल. पण आपल्या कार्य आणि कर्तृत्वाने काही संस्थांनी कमावलेला आदर अण्णा आंदोलनाने बराच व्यापक केला.  अगदी चोरट्या संस्थाना देखील यामुळे लाभ झाला. किरण बेदींची संस्था याचे ठळक उदाहरण आहे. पण स्वयंसेवी संस्था सध्या प्रकाशझोतात आहेत  याचे कारण त्यांचे सत्कार्य वा कुकार्य हे नसून त्यांनी विकास , प्रशासन आणि शासन या क्षेत्रात पाय पसरायला सुरुवात करून सरकारचे निर्णय प्रभावित करण्याची घेतलेली  भूमिका हे त्यामागचे कारण आहे. पूर्वी स्वयंसेवी संस्था सरकारवर प्रभाव पाडीत नसत असे नाही. अनेक बाबतीत सरकारच त्यांची मदत घ्यायचे. त्यांच्या सल्ल्याने धोरण ठरवायचे. परस्पर सौहार्द आणि विश्वासातून अशी धोरणे निश्चित होत. रोजगार हमी योजना , माहिती अधिकार किंवा ग्राहक संरक्षण कायदा ही सरकार व स्वयंसेवी संस्था आणि संघटना यांच्यातील परस्पर संवाद आणि सौहार्द याचेच फळ मानता येईल. गेल्या काही वर्षात  मात्र स्वयंसेवी संस्था आणि सरकार यांच्यातील मधुचंद्र संपुष्टात आल्याचे चित्र आहे. याचे महत्वाचे कारण म्हणजे सरकार आपले अधिकार सोडायला तयार नाही आणि स्वयंसेवी संस्थांमध्ये अधिकार गाजविण्याची लालसा निर्माण झाली आहे. केवळ लालसाच निर्माण झाली नसून ती लालसा पूर्ण करून घेण्याची ताकद देखील या संस्थांमध्ये आली आहे. गेल्या तीन दशकातील आर्थिक , राजकीय घडामोडीचे हे फलित आहे. 

                           स्वयंसेवी संस्थांचा प्रवास 

७० च्या दशका पर्यंत उपजीविकेसाठीच्या कामाकडे दुर्लक्ष करून जे लोक समाजकार्यात उत्साहाने सहभागी व्हायचे त्यांची त्या कामाचा  मोबदला मिळावा अशी अपेक्षा नसायची. किंबहुना असा मोबदला घेणे त्यांना अनुचित आणि अप्रतिष्ठा करणारे वाटायचे. समाजासाठी आपण काम करतो तेव्हा समाज आपल्याला वाऱ्यावर सोडणार नाही अशी बेफिकिरी वृत्ती असायची. आपली संस्था , संघटना सरकार दरबारी रजिस्टर करायला देखील विरोध असायचा. सरकारी जाळ्यात आपण अडकू आणि करायचे ते काम होणार नाही ही भावना होती. उद्योगपती किंवा सरकारची मदत नकोच असल्याने संस्था नोंदणी न केल्याने विशेष फरक पडत नसे. विदेशी पैसा तर त्यांच्यासाठी अस्पृश्य असायचा. त्यांचा भर प्रत्यक्ष विकासकामे करण्या पेक्षा प्रबोधन आणि त्यातून संघटन व संघर्ष यावर असायचा. म्हणूनच सामाजिक कार्यकर्ते आणि चळवळी यांचे अतूट नाते असायचे. पण ही स्थिती पुढे दोन कारणांनी बदलली. पहिले कारण चळवळीने निराश करणे किंवा चळवळीतून आलेली निराशा हे होते. दुसरे या पेक्षाही महत्वाचे कारण होते जागतिकीकरणाचा भारताने केलेला स्विकार.  उपजीविकेचे कौशल्य प्राप्त करण्याच्या वयात चळवळीवर भर दिल्याने चळवळ थंडावल्यावर किंवा संपल्यावर काय करायचे हा प्रश्न स्वयंसेवी संस्था स्थापन करून सुटू लागला. पूर्वीच्या संस्था -संघटना कामासाठी , चळवळीसाठी असल्याने त्याचे स्वरूप वेगळे होते. पण नंतरच्या संस्था-संघटना निर्मितीत समाजकारणां पेक्षाही उपजीविका महत्वाची बनली .  जागतिकीकरणाचा प्रारंभ झाल्या नंतर तर चळवळी कालबाह्य झाल्या सारख्या अस्तंगत होत गेल्या.  स्वयंसेवी संस्थांचे पीक फोफावणे आणि जागतिकीकरण याचा असा हा संबंध आहे. जागतिकीकरणाने आणखी एक गोष्ट घडली. परकीय पैसा देशात येण्यावरची बंधने सैल झाली . याचे सर्वात मोठे लाभार्थी ठरले ते स्वयंसेवी संस्थांचे जग ! आज भारतात सुमारे साडेतीन कोटी नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था असून त्यांची आर्थिक उलाढाल अरबो डॉलर्सच्या घरात आहे. यामुळे कार्यकर्ता व स्वयंसेवी संस्था यांचे चरित्रच बदलून गेले आहे. आरक्षण न करता रेल्वेने प्रवास करणारा कार्यकर्ता जीवघेण्या गर्दीत पेपर अंथरून झोपी जायचा . रेल्वे स्टेशन वर असाच झोपी गेलेला अरविंद केजरीवाल यांचा फोटो अण्णा आंदोलनाच्या काळात लोकचर्चेचा आणि कौतुकाचा विषय झाला होता. पण याच अरविंद केजरीवाल यांनी संस्थांच्या पैशावर किती वेळा विमान प्रवास केला याचा कोणी शोध घेतला तर त्याचे डोळे पांढरे झाल्याशिवाय राहणार नाहीत. सरकारी आणि परकीय पैशाचा ओघ ज्या संस्थांकडे वळला त्या संस्थांच्या व्यवहारात आणि उद्योगजगताच्या (कॉर्पोरेट जगत)व्यवहारात आपल्याला विलक्षण साम्य आढळेल. बिचाऱ्या उद्योगपतीच्या स्वत:च्या नावावर काहीच नसते. जे काही असते ते कंपनीचे असते. ते फक्त उपभोगाचे मानकरी असतात.  तसेच स्वयंसेवी संस्थातील संस्थापक समाज सेवकाचे असते. त्यांच्या नावावर काहीच नसते . जे काही असते ते संस्थेचे ! पण उद्योगपतींना भागधारकाच्या पैशाचा लाभ घेण्यासाठी स्वत:ची गुंतवणूक अपरिहार्य असते . पण स्वयंसेवी संस्थांच्या बाबतीत तसे बंधन नसते. उलट पैशाला शिवायला देखील स्वयंसेवी साधक तयार नसतात. किरण बेदीनी विमान प्रवासाचा पैसा अनेक संस्थांकडून उकळला , पण कधीतरी त्यांनी त्या पैशाला हात लावला का ? कधीच नाही. ते पैसे त्यांच्या संस्थेच्या खात्यात गेले. भांडवलदाराचे उत्पन्न जसे कंपनीचे असते तसा हा प्रकार आहे. भांडवलदार आपल्या संपत्तीच्या जोरावर सरकारी धोरणे प्रभावित करतो तोच प्रकार ज्या संस्थांकडे जगभरातून पैशाचा ओघ सुरु आहे त्या संस्था देखील सरकारी धोरणे प्रभावित करण्याचा प्रयत्न करू लागल्याची उदाहरणे समोर येवू लागली आहेत. जागतिकीकरणापूर्वी देशात प्रामुख्याने रशिया आणि अमेरिका या दोन राष्ट्राकडून मोजक्या संस्था आणि संघटनांना पैसा मिळायचा. आपले हित जोपासण्यात मदत व्हावी हा त्या मागचा उघड हेतू होता. रशिया कडून पैसा घेणाऱ्या कम्युनिस्टांनी काय केले किंवा अमेरिकन पैशाच्या बळावर जगणाऱ्या संस्थांनी काय केले हे लपून राहिलेले नाही. जागतिकीकरणा नंतर अनेक राष्ट्रांनी स्वयंसेवी संस्थांसाठी पैशाच्या थैल्या खुल्या केल्या आहेत. आपले हितसंबंध जोपासण्यासाठीच ते स्वयंसेवी संस्थाना पैसे पुरवीत असावेत अशी रास्त  शंका  कुडनकुलम प्रकरणावरून येते. 

                               संशयाच्या भोवऱ्यात स्वयंसेवी संस्था 

तामिळनाडूतील कुडनकुलम येथील अणुउर्जा प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण होत आला असताना एका स्वयंसेवी संस्थेने तेथे दीर्घकाळ विरोध प्रदर्शन आयोजित केले होते. या विरोध प्रदर्शनासाठी या संस्थेला परराष्ट्राकडून पैसा मिळाल्याचा गंभीर आरोप दस्तुरखुद्द पंतप्रधानांनी केला आहे. प्रकल्पासाठीची यंत्र सामुग्री रशिया कडून घेतली म्हणून अमेरिकेतील हितसंबंधी कंपन्यांनी स्वयंसेवी संस्थाना पैसा पुरवून हा प्रकल्प बंद पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप रशियाने देखील केला आहे. अमेरिकन सरकारने देखील या आरोपांचा स्पष्ट शब्दात इन्कार न करता चौकशीचे गोलमोल आश्वासन दिले आहे. ज्याअर्थी तीन मोठया राष्ट्रांचे जबाबदार प्रतिनिधी या प्रकरणी जाहीरपणे बोलत आहेत त्याअर्थी पाणी कोठे तरी मुरते आहे हे उघड आहे. स्वयंसेवी संस्थांकडून परकीय पैशाच्या दुरुपयोगा बद्दल तीन देशाच्या सरकारच्या पातळीवर झालेली ही पहिलीच चर्चा असली तरी असे आरोप पूर्वीही झाले आहेत. दशकभर 'नर्मदा बचाव' आंदोलन चालविणाऱ्या मेधा पाटकर यांच्यावर देखील असे जाहीर आरोप अनेकदा झाले आहेत. पण त्या बाबतीत समाधानकारक खुलासा अद्याप पर्यंत मेधा पाटकर किंवा त्यांच्या आंदोलनाकडून देण्यात आलेला नाही. लवासा प्रकल्पाच्या प्रवर्तकाकडून या संदर्भात करण्यात आलेल्या ताज्या जाहीर आरोपानंतरही मेधा पाटकर किंवा नर्मदा बचाव आंदोलनाची चुप्पी बुचकळ्यात टाकणारी आहे.   देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात कोणताही प्रकल्प सुरु होण्याची घोषणा होण्याचा अवकाश कि त्याप्रकल्पाला विरोध करायला मेधा पाटकर आणि त्यांचे सहकारी हजर झाले नाहीत वा त्यांनी तेथे आंदोलन उभे केले नाही असे कधी घडलेच नाही. त्यांच्या या महान कार्यासाठी पैसा कोठून येतो आणि किती येतो हे एक गौडबंगालच आहे. केजरीवाल - शिसोदिया यांच्या संस्थेला अमेरिकेतील फोर्ड फौंडेशन कडून मोठया प्रमाणावर मदत मिळणे आणि भारत सरकारलाच लुळे करणारे अण्णा आंदोलन उभे राहणे हा कावळा बसणे व फांदी तुटणे असा योगायोग आहे कि आणखी काही आहे  हे सांगणे कठीण आहे. भारत सरकारने एवढ्यात अनेक स्वयंसेवी संस्थाना परकीय पैसा घेण्यावर बंदी घालून त्यांची चौकशी सुरु केल्याने स्वयंसेवी संस्थांवरील संशयाचे धुके गडद झाले एवढे नक्की. परकीय पैशाच्या बळावर किंवा परकीय राष्ट्राच्या इशाऱ्यावर संबंधित स्वयंसेवी संस्था काम करतात कि नाही हा वादाचा मुद्दा बाजूला ठेवला तरी प्रत्येक विकास प्रकल्पाला विरोधच करणे हा एकसूत्री कार्यक्रम देशातील प्रभावी स्वयंसेवी संस्था राबवीत असल्याचे अमान्य करता येणार नाही. देशाची गाडी विकासाच्या रस्त्यावर अडखळू लागण्या मागे जसे सरकारची निर्णय घेण्याची क्षमता लयाला जाणे हे कारण आहे तितकेच महत्वाचे कारण स्वयंसेवी संस्थांनी  विकास विरोधी उघडलेली आघाडी आहे. विकासाच्या वाटेवर तत्परतेने काटे पेरणे हेच भारतातील प्रमुख आणि प्रभावी स्वयंसेवी संस्थांचा एककलमी कार्यक्रम बनला आहे. ठिकठिकाणी अनेक स्वयंसेवी संस्था राजकीय आकांक्षा न बाळगता विधायक व रचनात्मक कार्यात गुंतल्या आहेत हे खरे. पण त्यांचे कार्य स्वयंसेवी संस्था या विकासविरोधी आहेत हा डाग पुसण्यास पुरेसे  नाही. 

                          स्वयंसेवी संस्थांचे राजकारण 

 प्रभावी स्वयंसेवी संस्थाना आता राजकीय महत्वकांक्षाचे धुमारे फुटू लागले आहेत. पण निवडणूक लढणे त्यांना कमीपणाचे वाटते. निवडणुकीविना त्यांना निर्णय प्रक्रियेत स्थान हवे आहे. केवळ अण्णा आंदोलनानेच हे दाखवून दिले नाही तर सोनिया गांधींच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय सल्लागार समितीने देखील हेच सिद्ध केले आहे. यूपीए सरकारच्या या सल्लागार समितीत स्वयंसेवी संस्था सामील असून ही सल्लागार समिती आपले निर्णय निर्वाचित सरकारवर लादण्यास नेहमीच उत्सुक राहिली आहे. केंद्र सरकारचे अनेक निर्णय रेंगाळत पडण्या मागे स्वयंसेवी संस्थांचा प्रभाव असलेली ही सल्लागार समिती देखील कारणीभूत आहे. केंद्र सरकारने काही स्वयंसेवी संस्थाना महत्व देवून सल्लागार समितीत सामील करून प्रतिस्पर्धी स्वयंसेवी संस्थांची नाराजी ओढवून घेतली आहे. केंद्र सरकारने केजरीवाल यांना आधीच सल्लागार समितीत सामील करून घेतले असते तर केंद्र सरकारला खच्ची करणारे अण्णा आंदोलन उभेच राहिले नसते. अण्णा आंदोलन उभे राहण्यामागे स्वयंसेवी संस्थामधील प्रतिस्पर्धा हे कारण नक्कीच नगण्य नाही. स्पर्धा आणि राजकीय आकांक्षा असणे वाईट नाही. पण मागच्या दाराने सत्तेच्या दालनात प्रवेश करणे नक्कीच चुकीचे आहे. नवा राजकीय पर्याय उभा करण्यात या संस्थांनी शक्ती पणाला लावली तर त्यांची महत्वकांक्षाही पूर्ण होईल आणि विकास विरोध सुद्धा पुसट होईल. 

                          (समाप्त)

सुधाकर जाधव 
मोबाईल-९४२२१६८१५८ 
पांढरकवडा,
जि. यवतमाळ 

Thursday, May 31, 2012

शेतकरी आंदोलनाला बी टी चा अपघात

-------------------------------------------------
शेतकरी आंदोलनाची सर्व शक्ती शेती क्षेत्रा समोरील आव्हानाचा मुकाबला करण्यावर केंद्रित झाली पाहिजे. शेतमालाच्या किफायतशीर भावाचा प्रश्न , शेतकऱ्याला पाहिजे असलेले बाजार स्वातंत्र्य , शेती टिकविण्यासाठी आवश्यक असलेले तंत्रज्ञान आणि भांडवल , शेतीवर अवलंबून असलेल्या लोकसंख्येचा भार नियोजनपूर्वक कमी करणे या सारखे मुलभूत ,किचकट आणि गंभीर प्रश्न शेतीक्षेत्रासमोर उभे आहेत. शेतकरी चळवळ मात्र आव्हानांचा हा सागर पार करण्याऐवजी बीटी च्या डबक्यात उड्या मारून स्वत:च्या अंगावर चिखल उडवून घेत आहे.  
-------------------------------------------------


   बी टी बियाणाचे वाण भारतात रुजून १० वर्षे झालीत. हे वाण भारतात येण्या आधीपासून याच्या बऱ्या-वाईट परिणामावर घनघोर चर्चा सुरु आहे  बीटी बियानांमुळे भारतीय शेतीचे आणि पर्यावरणाचे न भरून येणारी हानी होईल या टोका  पासून ते  बीटी शिवाय भारतीय शेती तग धरणार नाही या टोकापर्यंत चर्चेच्या व वादाच्या फेऱ्या झडत राहिल्या. शेतकऱ्यांनी मात्र या वादाकडे  अधिक परिपक्वतेने पाहिले.  जुन्या वाणाचा अनुभव पाठीशी असल्याने आणि त्यातून आता अधिक मिळकतीची आशा उरली नसल्याने नव्या वाणाचा अवलंब करण्याशिवाय अधिक चांगला आणि व्यावहारिक पर्याय त्याच्याकडे नव्हता. हरित क्रांतीचा अनुभव घेवून झाला होता. हरित क्रांतीने देशाची अन्न धान्याची गरज भागविली पण शेतकऱ्याच्या आणि त्याच्या कुटुंबियाच्या कोणत्याच गरजा हरित क्रांतीने पूर्ण झाल्या नाहीत. जास्त पीक घेण्याच्या प्रयत्नात रासायनिक खते आणि कीटकनाशके व पाणी याचा अति वापर झाल्याने शेतीच्या उत्पादकतेवर व शेतकऱ्याच्या आर्थिक स्थितीवर विपरीत परिणाम झाल्याने नवे काही तरी केले पाहिजे ही प्रेरणा बलवत्तर होत गेली. अशा परिस्थितीत बीटी कापसाच्या बियाणांचा शेतकऱ्यांनी अविलंब व हातोहात स्विकार केला. शेतकऱ्याची जी परिस्थिती होती त्यात अधिक वाईट व्हायला काही वावच नव्हता. त्यामुळे आणखी वाईटाची भिती नव्हती. झालीच तर कीटकनाशकाच्या वाढत्या आणि खर्चिक फवारण्यापासून सुटका होण्याची शक्यता होती. बीटी वाणाच्या विरोधाचा शेतकऱ्यावर परिणाम झाला नाही तो याच मुळे. जुन्या सर्व बियाणांचे उच्चाटन करून कापसाच्या बीटी बियाणांनी  कापूस शेतीवर कब्जा केला. बीटीतून देखील फारसे हाती लागतं नाही हा अनुभव घेवून शेतकरी पुन्हा नव्याच्या शोधात आहे.  पण बीटी बियाणांचा भारत प्रवेश होण्या आधीपासून सुरु झालेली चर्चा मात्र अजूनही त्याच त्याच मुद्द्यांवर सुरु आहे. बीटी बियाणांच्या समर्थकांच्या  आणि विरोधकांच्या कुस्तीचे फड अजूनही रंगतात. वास्तविक १० वर्षाच्या अनुभवानंतर बीटी बियाण्याच्या उपयोगितेवर  आणि उणीवांवर चर्चेची गरज असताना चर्चे ऐवजी वादच झडत आहेत. या वादाला प्रारंभी तात्विक संघर्षाचा आणि बियाणे व कीटकनाशकांचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांच्या हितसंबंधातील संघर्षाचे कंगोरे होते. नंतर या वादाला संघटनात्मक स्वरूप आले. संघटनांना एकमेकांना कमी लेखण्यासाठी किंवा संपविण्यासाठी बीटी बियाणांचे निमित्त मिळाले. आधीपासूनच बहुराष्ट्रीय कंपन्याच्या विरोधात असणाऱ्या गटांनी देखील या वादात हात धुवून घेतले. आता तर शेती निरक्षर असलेली प्रसारमाध्यमे देखील आपल्या स्वार्थासाठी या वादात उतरली आहेत. किंबहुना बीटी बियाण्या संबंधी महिनाभरापुर्वी जो ताजा वाद रंगला त्यामागे देशातील  दोन मोठया आणि प्रतिष्ठीत अशा वृत्तपत्र समूहामधील स्पर्धा कारणीभूत ठरली आहे. महिनाभरा पूर्वी डाव्या पक्षाचे खासदार वासुदेव आचार्य यांच्या नेतृत्वाखालील संसदीय समितीने यवतमाळ जिल्ह्यातील विशिष्ठ गावांना ठरवून भेट दिली त्यामागे हिंदू आणि टाईम्स ऑफ इंडिया या दोन वृत्तपत्रातील स्पर्धा आणि संघर्ष कारणीभूत होता याची फारंच थोड्या लोकांना कल्पना असेल. अशाप्रकारे विशिष्ठ हेतूने बीटी बियाणाच्या वादाला खतपाणी घालून दोन्ही बाजू आपापला जो निष्कर्ष शेतकऱ्यांच्या समोर मांडू पाहात आहेत ते  बघता  शेती आणि शेतकऱ्यांच्या हलाखी बाबत अतिशय तकलादू , वरवरची आणि चुकीची कारण मीमांसा केली जात असल्याची पुष्ठी होते. यातून शेतकऱ्यांची दिशाभूल होण्याचा धोका तर आहेच पण त्यापेक्षाही गंभीर धोका शेतकरी चळवळ दिशाहीन होण्याचा आणि भरकटण्याचा आहे. किंबहुना या दोन वृत्तपत्र समूहामधील वादाचा झेंडा आपल्या खांद्यावर घेवून शेतकरी चळवळीतील कार्यकर्ते व नेते यांनी जी भूमिका हिरीरीनेच नव्हे तर अरेरावीने मांडली त्यावरून शेतकरी चळवळ भरकटत चालल्याची पुष्ठीच होते असे विधान केले तर ते अतिशयोक्तीपूर्ण ठरणार नाही. 
                                    वाद आणि त्याचा निष्कर्ष 

बीटी बियाण्या संबंधीचा ताजा वाद ' टाईम्स ऑफ इंडिया' चे नाक कापण्यासाठी 'हिंदू' दैनिकाने उकरून काढला आहे. २००८ साली बीटी कॉटन बियाणे उत्पादक कंपनीने नागपूरच्या पत्रकारांना बीटी कॉटनची शेती दाखविण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील काही गावांचे दर्शन घडविले. त्यावर आधारित एक वृत्तांत तेव्हा 'टाईम्स ऑफ इंडिया'त प्रकाशित झाला होता. हा वृत्तांत कंपनीला अनुकूल असल्याने पुन्हा छापून आणण्यासाठी जाहिरातीचा मार्ग निवडला. जाहिरात म्हणून हाच मजकूर कंपनीने सलग दोन वर्षे दोनदा छापून आणला. मूळ जो वृत्तांत होता त्यात बीटी मुळे कापसाचा उत्पादन खर्च कमी होवून शेतकऱ्याचे उत्पन्न वाढल्याचा दावा करण्यात आला होता. त्यात १-२ गांवाचा उल्लेख करून तेथे शेतकरी आत्महत्या न झाल्याचे श्रेय बीटी कॉटनला देण्यात आले होते. एखाद्या गावावरून असा निष्कर्ष काढणे चुकीचे, दिशाभूल करणारे व अवैज्ञानिक असल्याने हा मजकूर प्रसिद्ध झाला तेव्हाच त्यावर आक्षेप घ्यायला हवा होता. पण २००८ साली कोणत्याही शेतकरी नेत्याला वा शेतकऱ्याच्या संघटनेला त्यात काही आक्षेपार्ह वाटले नाही. पण हाच मजकूर जाहिरात म्हणून प्रसिद्ध झाल्यावर 'हिंदू' दैनिकाचे लक्ष गेले आणि मग जाहिरातच नव्हे तर मूळ मजकूर देखील प्रायोजित असल्याचे दाखविण्याचा खटाटोप झाला. त्यासाठी काही शेतकरी नेत्यांना व संघटनांना हाताशी धरून टाईम्स मधील त्याच मजकुराच्या अगदी विपरीत असे चित्र उभे करण्यात आले. ज्या गावांचा जाहिरातीत उल्लेख होता त्या गांवात बीटी कॉटन मुळे शेतकरी कसा देशोधडीला लागला हे तक्रारीच्या रुपात मांडण्यात आले. कृषी विषयक संसदीय समितीने बीटीग्रस्त भागाची पाहणी करावी असा आग्रह झाला. यातून खासदारांच्या उपसमितीचा यवतमाळ दौरा आयोजित झाला. ( प्रायोजित केला असे जर कोणी म्हंटले तर तो संसदेचा अवमान होईल!) या समितीने जिल्ह्यातील कोणत्याही गांवाला भेट दिली असती तरी शेती आणि शेतकरी यांच्या विदारक स्थितीचे दर्शन  खासदारांना झाले असते. पण 'टाईम्स' च्या मजकुरात उल्लेखित गावातच त्यांना आग्रहपूर्वक नेले गेले. हीच बाब खासदारांचा दौरा हा दोन धनदांडग्या वृत्तपत्र समूहाच्या संघर्षाची परिणती असल्याचे सिद्ध करते. बीटी कॉटन मुळे शेतकरी कंगाल व कर्जबाजारी झाला असून त्यातून आत्महत्येचे प्रमाण वाढले हे दर्शविण्याचा योजनाबद्ध खटाटोप करण्यात आला. यात शरद जोशींचे कट्टर विरोधक श्री विजय जावंधिया आणि विदर्भ जन आंदोलन समितीच्या किशोर तिवारींनी मोलाचे योगदान दिले.  आपल्या बियाणांविरुद्धचा प्रचार खोडून काढण्यासाठी मग कंपनीने सुद्धा शेतकरी नेत्यांचे दौरे प्रायोजित केले ! बीटी बियाणांचे सर्वात मोठे समर्थक असलेले शेतकरी नेते श्री शरद जोशी यांच्या उपस्थितीत प्रगतीशील शेतकऱ्यांच्या पंचतारांकित मेळाव्यात बीटी बियाणे शेतकऱ्यांच्या हिताचे असल्याची द्वाही फिरविण्यात आली. या निमित्ताने शेतकरी संघटना मधील वाद आणि मतभेद तर चव्हाट्यावर आलेच , पण शेतकऱ्याचे सर्वात मोठे अहित बीटी बियाणांनी केले किंवा बीटी मुळेच शेतकऱ्याचे हित साधणार आहे असे दोन टोकाचे आणि तद्दन चुकीचे निष्कर्ष समोर मांडण्यात आले. शेतकरी चळवळीतील परस्पर  विरोधी  मतप्रवाह एका मुद्द्यावर सहमत दिसतात . आणि तो मुद्दा म्हणजे बियाणांचा ! शेतकऱ्यांच्या चांगल्या किंवा वाईटा साठी बियाणेच कारणीभूत असल्याचा हा निष्कर्ष आहे . काहीजण बीटी मुळे शेतकरी देशोधडीला लागणार म्हणून चिंतीत आहेत , तर काहीना बीटी मुळे शेतकरी मालामाल होईल असे वाटते. तात्पर्य , शेती आणि शेतकऱ्यांसाठी बियाणे हा कळीचा मुद्दा आहे ! 

                             शेतकरी आंदोलन भरकटले 

शेतकरी चळवळीचे नेते आणि कार्यकर्ते बियाणांचा वाद ज्या पद्धतीने चालवीत आणि वाढवीत आहेत त्यातून निघणारा वरील निष्कर्ष म्हणजे शेतकरी आंदोलनामागील तत्वज्ञान नाकारणारा आहे. बियाणे चांगले कि वाईट हे शेवटी शेतकऱ्याच्या अनुभवावरून ठरणार आहे. एखादी संघटना किंवा चळवळ बियाण्याच्या बाबतीत न्यायाधीशाची भूमिका घेवू शकत नाही. बियाणाच्या प्रश्नाकडे चांगल्या किंवा वाईट या भूमिकेतून न पाहता या प्रश्नाकडे शेतकरी स्वातंत्र्याच्या दृष्टीने पाहिले गेले पाहिजे. बीटी बियाणे वापरण्याचे शेतकऱ्यांना स्वातंत्र्य हवे या शरद जोशींच्या भूमिकेशी सहमत होता येईल. पण शेतकऱ्यांनी बीटी बियाणेच  वापरले पाहिजे असा प्रचार ते कंपनीच्या प्रायोजकत्वाखाली करू लागलेत तर ते त्यांच्या स्वातंत्र्याच्या मूळ भूमिकेशी विसंगत ठरते.   शेतकऱ्याला जे बियाणे  -मग ते बीटी बियाणे असो कि परंपरागत बियाणे असो - हवे ते उपलब्ध झाले पाहिजे इतका हा साधा प्रश्न आहे. शेतकरी कोणाचे ऐकून या बाबतीत निर्णय घेतो असे कोणी मानीत असेल तर ते नक्कीच मूर्खाच्या नंदनवनात वावरत आहेत असेच म्हणावे लागेल. शेतकऱ्यांचे निर्णय हे अनुभवातून आणि जिवंत राहण्याच्या धडपडीतून होत असतात. बीटी कॉटनला विरोध होत असतानाही त्याला शेतकऱ्यांनी जुमानले नाही आणि आता त्याचा बीटी पासून भ्रमनिरास होत आहे आणि बीटीचे लागवडीचे क्षेत्र कमी होत आहे ते शेतकऱ्याच्या अनुभवाने. पण इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे कि बीटीचा अनुभव घेवून त्याकडे पाठ फिराविनारा शेतकरी कापसाच्या जुन्या वाणाकडे वळलेला नाही. कापूस लागवडीचे क्षेत्र कमी होण्यामागे सरकारचे निर्याती संबंधीचे धोरण जसे कारणीभूत आहे तसेच बीटी वाणातील कमतरता कारणीभूत आहे. याचा अर्थ एकच होतो कि शेती क्षेत्रात शेतकऱ्याचा अनुभव लक्षात घेवून नवनव्या संशोधनाची गरज आहे. शेतकऱ्याला मागे नाही पुढेच जायचे आहे. नव्या किंवा जुन्या वाणाचा प्रचार करीत बसण्यापेक्षा गरजेनुसार संशोधन आणि अनुकूल तंत्रज्ञान विकसित होणे शेती टिकण्यासाठी गरजेचे आहे. हवामान बदलाच्या या कालखंडात तर याची विशेष गरज आहे. हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाणारे डॉ.स्वामीनाथन यांनी शेतीत आधुनिक तंत्रज्ञान आणणे गरजेचे असल्याचा गेल्याच आठवड्यात पुनरुच्चार केला आहे. केवल संसदेत अन्न सुरक्षा विधेयक पारित करून उपयोगाचे नाही . कारण उच्च दर्जाच्या  तंत्रज्ञानाशिवाय देशाच्या अन्नधान्याच्या गरजा पूर्ण होणार नाहीत याची त्यांनी स्पष्ट शब्दात जाणीव करून दिली आहे. बियाणाच्या प्रश्नावर शेतकरी चळवळीने डोकेफोड करणे हा चळवळीचा कपाळमोक्ष करण्यासारखे आहे. शेतकरी आंदोलनाची सर्व शक्ती शेती क्षेत्रा समोरील आव्हानाचा मुकाबला करण्यावर केंद्रित झाली पाहिजे. शेतमालाच्या किफायतशीर भावाचा प्रश्न , शेतकऱ्याला पाहिजे असलेले बाजार स्वातंत्र्य , शेती टिकविण्यासाठी आवश्यक असलेले तंत्रज्ञान आणि भांडवल , शेतीवर अवलंबून असलेल्या लोकसंख्येचा भार नियोजनपूर्वक कमी करणे या सारखे मुलभूत ,किचकट आणि गंभीर प्रश्न शेतीक्षेत्रासमोर उभे आहेत. शेतकरी चळवळ मात्र आव्हानांचा हा सागर पार करण्याऐवजी बीटी च्या डबक्यात उड्या मारून स्वत:च्या अंगावर चिखल उडवून घेत आहे. 
                                           
                          (समाप्त)

सुधाकर जाधव 
मोबाईल-९४२२१६८१५८ 
पांढरकवडा ,
जि. यवतमाळ      

        


                  

Thursday, May 24, 2012

दुबळे सरकार आवडे सर्वांना !


----------------------------------------------------------------------------------------------------
देशापुढील समस्या मार्गी लावायच्या असतील तर केंद्रात विश्वासार्ह, खंबीर आणि निर्णयक्षम सरकार असणे गरजेचे आहे. मनमोहन सरकार जाणे यातच सर्वात मोठे देशहित आहे.  त्यासाठी २०१४ सालची वाट पाहात बसल्याने अनेकांचा अनेक प्रकारे फायदा होईल . भारतीय जनता पक्ष विनासायास नंबर एकचा पक्ष बनेल, डाव्यांना उभे राहण्यासाठी जमीन मिळेल , अण्णा हजारेंची 'महात्मा' म्हणून बढती होईल ,  पण देशाचे मात्र कधीच  भरून न येणारे नुकसान होईल. 
----------------------------------------------------------------------------------------------------

कृषी क्षेत्राची समज असणारे देशात बोटावर मोजण्या इतके पत्रकार आहेत त्यात पी.साईनाथ यांचे स्थान बरेच वरचे आहे. त्यांनी एक अभ्यासपूर्ण पुस्तक लिहिले आहे. मराठीत अनुवादित या पुस्तकाचे नांव आहे 'दुष्काळ आवडे सर्वांना' . दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली कि ग्रामीण जनतेला त्याचे किती भीषण चटके बसतात हे आपण आजही महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील परिस्थिती पाहून लक्षात येते. पण असा दुष्काळ हा मंत्री, राजकीय नेते , नोकरशाही , स्थानिक नेतृत्व , कंत्राटदार आणि दलाल यांच्यासाठी मोठी पर्वणी असते. दुष्काळ निवारणासाठी मोठया प्रमाणावर पैसा येतो आणि मोसमी पाऊस येईपर्यंत या सर्व मंडळीना पैशाच्या प्रवाहात हात धुवून घेतात. प्रत्यक्ष दुष्काळग्रस्त भागाला दुष्काळ निवारण कार्याचा किती फायदा होतो हा शोधाचा विषय आहे , पण या मंडळीचा फायदा साध्या नजरेने टिपता येतो.  दुष्काळ हे संकट न वाटता संधी वाटते . म्हणूनच दुष्काळ आणि दुर्भिक्ष्य  सर्वांचा आवडता विषय  असल्याचे प्रतिपादन पी. साईनाथ यांनी या पुस्तकात केला आहे. महाराष्ट्रातील दुष्काळ हे या पुस्तकाची आठवण येण्याचे कारण नसून केंद्र स्थानी असलेल्या मनमोहन सरकारच्या निर्णयाच्या व कृतीच्या भीषण दुष्काळातून निर्माण झालेल्या परिस्थितीने त्या पुस्तकाची आठवण झाली आहे. केंद्रातील कॉंग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारने नुकतीच तीन वर्षे पूर्ण केली आहेत. सर्वसाधारणपणे सरकारांच्या कामगिरी बद्दल सामान्य जनतेपासून ते राजकीय पंडिता पर्यंत कोणाचेच आणि कधीच एकमत होत नसते हा आजवरचा अनुभव आहे. आज सत्तेत असणाऱ्या केंद्र सरकारने हा समज खोटा ठरविला आहे. नसलेली कामगिरी जनतेपुढे हिरीरीने मांडणारे पक्षाचे किंवा सरकारचे प्रवक्ते सोडले तर सरकारच्या कामगिरीवर आणि निर्णय क्षमतेच्या बाबतीत  देशात सर्वदूर एकमत आढळते. स्वातंत्र्यानंतरचे काम न करणारे , निर्णय क्षमतेला लकवा मारलेले सर्वाधिक भ्रष्ट सरकार अशी गेल्या तीन वर्षातील कार्यकलापाने केंद्रातील मनमोहन सरकारची प्रतिमा बनली आहे. विरोधी पक्षाचे सरकारवर असे आरोप करण्याचे कामच असते. पण सरकार बद्दलचा असा सूर विरोधी पक्षांपेक्षा अधिक मुखरतेने सरकार मधील जबाबदार लोक जेव्हा आळवतात तेव्हा हा सरकार बद्दलचा अपप्रचार नसून भयावह अशी वस्तुस्थिती आहे याची खात्री पटायला अडचण जात नाही. शरद पवार यांचे पासून ममता बैनर्जी पर्यंत या सरकारातील भागीदारांनी सरकारच्या कामगिरी व कार्यपद्धती बद्दल वेळोवेळी नाराजी दर्शविली आहे. सरकारच्या आर्थिक सल्लागाराने तर आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पुढच्या सार्वत्रिक निवडणुकी नंतर नवीन सरकार सत्तारूढ होईपर्यंत धोरणात्मक निर्णय या सरकारकडून होने शक्य नसल्याची कबुली दिली आहे. खुद्द सरकारचे प्रमुख असलेले पंतप्रधान मनमोहनसिंह धोरणात्मक निर्णय घेण्यात अडचणी असल्याची कबुली देत आहेत. सरकार पक्ष , विरोधी पक्ष , सामाजिक - आर्थिक - राजकीय संस्था आणि संघटना , वृत्तपत्र जगत आणि बातम्या देणाऱ्या चैनेल वरून ज्यांच्या आवाजाला आणि मताला  महत्व दिले जाते ते देशातील अभिजन या सर्वांचे सरकार निष्क्रिय आणि दुर्बळ असण्या बद्दल  एकमत आहे. असे एकमत अभूतपूर्व आहे. पण आश्चर्याची बाब असे एकमत आहे ही नाही. सर्वात मोठे आश्चर्य आहे ते हे कि असे सरकार गेले पाहिजे , मनमोहन सरकारने राजीनामा दिला पाहिजे अशी कोणीही मागणी करीत नाही. देशातील सर्व प्रभावी गट आणि घटक यांना आपली स्थिती अधिक मजबूत , अधिक चांगली बनविण्याची शक्यता व संधी या दुर्बळ सरकारमुळे  मिळत आहे . आणि म्हणून हे सरकार गेले पाहिजे असे कोणालाच वाटत नाही. उठसुठ या ना त्या मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी करीत राहणाऱ्या प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाने कधीही सरकारच्या राजीनाम्याची गंभीरपणे मागणी केली नाही. सरकारच्या कामगिरीवर सातत्याने नाराजी व्यक्त करणाऱ्या डाव्या आघाडीने देखील सरकारने काम केले पाहिजे किंवा गेले पाहिजे अशी रोखठोक भूमिका कधीच घेतली नाही. केंद्राचे दुबळेपण ही तर प्रादेशिक पक्षांसाठी स्वत:चा प्रभाव वाढविण्याची पर्वणीच असल्याने त्यांच्याकडून केंद्र सरकारच्या राजीनाम्याच्या मागणीची अपेक्षाच करता येत नाही. केंद्र सरकारचा दुबळेपणा हा विरोधात असलेल्या सर्व पक्षांच्या  आणि प्रादेशिक पक्षांच्या पथ्यावर पडत असल्यानेच कोणत्याही पक्षाकडून निष्क्रिय व अकार्यक्षम सरकारच्या राजीनाम्याची मागणी होताना दिसत नाही. सर्व पक्षांना नालायक ठरवून सरकार विरुद्ध सर्वात मोठे आंदोलन उभे करणाऱ्या अण्णा हजारे यांची स्थितीही काही वेगळी नाही. सरकारच्या नकारात्मक कामगिरी विरुद्ध प्रचंड जनमत हजारे आंदोलनाने तयार केले . पण या आंदोलनाने देखील कधी हे सरकार गेले पाहिजे अशी भूमिका घेतली नाही. असे दुर्बळ सरकार असले कि आंदोलन उभे राहण्यात व ते प्रभावी होण्यात मोठी मदत मिळते आणि आंदोलनाच्या नेत्यांना विनासायास मोठेपण मिळते. त्यामुळे असे दुबळे सरकार त्यांना स्वत:ला प्रस्थापित व प्रतिष्ठीत करण्याची पर्वणी वाटली तर नवल वाटण्याचे कारण नाही. एकूणच केंद्रसरकारच्या गैरकारभाराने सर्वसामान्य जनता दु:खी असली तरी देशातील प्रभावी घटकाचा स्वार्थ दुबळे सरकार राहिले तर जास्त गतीने व जास्त प्रमाणात पूर्ण होणार असल्याने हे सरकार त्यांना आवडू लागले असल्याचे चित्र आज दिसत आहे. आजच्या सरकार मुळेच एका रात्रीतून अण्णा हजारे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे व्यक्तिमत्व बनले. नेत्यांच्या लाथाळ्यांनी आणि सवता सुभा उभा करणाऱ्या सुभेदारांनी पोखरून दयनीय स्थितीत असलेल्या भारतीय जनता पक्ष हे सत्य लोकांपासून लपवू शकला ते याच सरकारमुळे. डाव्यांना उभे राहायला देखील जमीन नाही हे वास्तव लोकांच्या नजरेतून सुटले ते याच सरकार मुळे. शरद पवार सारख्या नेत्यांना कमी शक्तीच्या बदल्यात जास्त किंमत अशाच सरकार कडून वसूल करता येते. आपली हडेलहप्पी चालविण्यासाठी ममता बैनर्जीना एवढे सोयीचे दुसरे सरकार असू शकत नाही. मनमोहन सरकार आहे म्हणूनच मोदी , नितीश कुमार किंवा जयललिता यांना कोणत्याही बाबतीत केंद्र सरकारला ठेंगा दाखविता येतो.  सरकारचा दुबळेपणा आणि निर्नायकी याच्यापुढे दुसऱ्या सर्व बाबी गौण बनल्या. देशाला संकटाच्या खाईकडे नेणारे सरकार सर्वांच्या आवडीचे बनण्यामागचे हे रहस्य आहे !   २०१४ मध्ये हे सरकार पराभूत करू अशा वल्गना करणाऱ्यांना हे चांगले माहित आहे कि सरकारला पराभूत करायचे असेल तर ते २०१४ पर्यंत टिकविले पाहिजे ! सरकार टिकून राहणे हीच पुढील निवडणुकीत त्यांच्या जाण्याचा व स्वत: प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सत्तेत येण्याचा परवाना असल्याचे सर्व सरकार विरोधी शक्तींना वाटत असल्याने सरकार गेले पाहिजे ही मागणी कोणीच करीत नाही. पण असे दुबळे आणि निर्णय घेवू न शकणारे सरकार आणखी दोन वर्षे सत्तेत राहिले तर देशासाठी किती घातक ठरू शकते याचा मात्र विचार होताना दिसत नाही. अन्यथा अशा  सरकारने तीन वर्षे पूर्ण केल्याच्या निमित्ताने त्याच्यावर टीकेची फुले वाहण्या ऐवजी सरकार गेले पाहिजे म्हणून मोठया आंदोलनाची मुहूर्तमेढ रोवली गेली असती. 

                                                दुबळ्या सरकारचे घातक परिणाम 

केंद्र सरकारच्या दुबळेपणाचा व अनिर्णयाचा फटका सर्व क्षेत्राला बसू लागला आहे. सरकारच्या दुबळेपणाचा सर्वात घातक परिणाम म्हणजे देशाचा कारभार सुरळीत चालावा आणि अशा कारभाऱ्याचा परस्परावर अंकुश राहावा म्हणून संविधानाने त्यांच्यात संतुलन कायम राहील अशी जी व्यवस्था निर्माण केली होती त्यात असंतुलन निर्माण झाले हा आहे. संविधानाने निर्माण केलेल्या संतुलनाच्या केंद्रस्थानी केंद्रसरकार आणि त्याला पूरक तसेच त्याच्या कारभारावर नव्हे तर गैरकारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी अन्य संवैधानिक संस्था अशी रचना होती. देशाच्या बाबतीत सर्वच बाबतीत धोरणात्मक निर्णय घेण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे आणि अशा निर्णयाच्या बाबतीत ते फक्त संसदेला जबाबदार आहे. अन्य संवैधानिक संस्था कोणतेही धोरणात्मक निर्णय घेवू शकत नाही किंवा कोणता सल्ला देखील सरकारला देवू शकत नाही ही संवैधानिक स्थिती आहे. पण संवैधानिक संतुलनाचे केंद्र दुबळे असल्याने आणि आपली निर्णय क्षमता गमावून बसल्याने देशाच्या कारभाराचे सगळे संतुलनच बिघडवून गेले आहे. याचा परिणाम फक्त प्रशासन विस्कळीत होवून अनागोंदी वाढण्यातच झाला नसून देशाच्या विकासावर आणि संरक्षण सिद्धतेवर अत्यंत वाईट परिणाम आता दिसू लागले आहे. कॅग सारखी संविधानिक संस्था आपल्या मर्यादा सोडून सरकारला धोरणात्मक सल्ला देण्याचा आगाऊपणा करू लागली आहे. हा आगाऊपणाचा सल्ला केंद्र सरकारने मानावा म्हणून सर्वोच्च न्यायालया सारखी प्रतिष्ठीत अशी दुसरी संविधानिक संस्था स्वत:च्या अधिकाराचा दुरुपयोग करून असा सल्ला मानायला बाध्य करीत आहे. दुय्यम संस्थांनी सरकारवर कुरघोडी चालविली आहे. लोकांनी निवडून दिलेल्या सरकारनेच धोरणात्मक निर्णय घेतले पाहिजेत ही लोकशाही व्यवस्थेला अपेक्षित तरतूद भारतीय संविधानात असताना निवडून आलेले सरकार दुबळे निघाल्याने निर्णय घेण्याची ताकद निवडून न आलेल्या व्यक्ती व संस्था यांच्या हाती एकवटत चालल्या आहेत . यामुळे लोकशाही व्यवस्था तर मोडकळीस आलीच  आहे पण अर्थव्यवस्था देखील खिळखिळी झाली आहे. कॅगचे २ जी स्पेक्ट्रम संबंधीचे मत आणि त्या मताच्या आधारे सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णयाने अर्थव्यवस्थेवर अत्यंत विपरीत परिणाम होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. भारत देशात सरकारचा निर्णय अंतिम नसतो त्यावर कॅग सारख्या संस्थातील नोकरशहा आणि न्यायालय सहज कुरघोडी करू शकतात असे चित्र जगासमोर उभे राहिले  आहे. सरकारचे सर्वोच्च न्यायालया पुढे काही चालत नसेल तर अशा सरकारशी वाटाघाटी कशा करायच्या हा परकीय गुंतवणूकदारापुढे पडलेला रास्त प्रश्न आहे. अर्थव्यवस्था एकाएकी घसरली म्हणून आज रुपयाची घसरण होत नाही आहे. रुपयाची घसरण होते आहे ती केंद्रसरकारच्या निर्णय घेण्याच्या स्थानात घसरण झाल्याने हे समजून घेतले पाहिजे. सरकारच्या अनिर्णयाचा आणि दुबळेपणाचा सर्वात मोठा फटका शेतीक्षेत्राला बसत आहे. शेतीक्षेत्राची अधोगती थांबवायची असेल तर या क्षेत्रात मोठी गुंतवणूक आणि नव्या तंत्रज्ञानाची गरज आहे. आणि या दोन्ही गोष्टीसाठी परकीय मदतीची गरज आहे . पण अशी मदत खेचून आणण्याची क्षमता आणि विश्वासार्हता या सरकारने गमावली असल्याने शेतीक्षेत्राची घसरण वेग घेईल आणि ग्रामीण जनतेच्या हलाखीत भरच पडणार आहे. सरकारच्या भ्रष्टाचारा बद्दल असे काही वातावरण निर्माण झाले आहे कि ज्यात मोठी आर्थिक रक्कम गुंतली आहे असा निर्णय घ्यायला सरकारातले कोणीच तयार होत नाही. निर्णय झाला कि कॅगला त्यात घोटाळा दिसणार आणि मग सुब्रमण्यमस्वामी सारखी तोंडाळ माणसे न्यायालयात धाव घेणार आणि न्यायालय त्यांच्या म्हणण्याला मान देणार हा घटनाक्रम सरकारातील व्यक्तींना तोंडपाठ झाल्याने काहीही न करता व कोणतेही निर्णय न घेता सत्ता आणि पगार व भत्ते याचा उपभोग घेत राहण्याची प्रवृत्ती वाढीला लागली आहे. यातून संरक्षणासारखे संवेदशीलक्षेत्र देखील सुटलेले नाही. या खात्याचे मंत्री खरोखरीच स्वच्छ आहेत , कारण त्यांचा सर्व वेळ आणि शक्ती आपल्या अंगावर कोणतेही शिंतोडे उडणार नाहीत याची खबरदारी घेण्यात जातो. पण त्यामुळे आवश्यक अशा संरक्षण साहित्याची खरेदी लांबणीवर पडते. एवढेच नाही तर असा भित्रा माणूस संरक्षण मंत्री असल्याचा फायदा घेवून व्हि.के.सिंह सारखे धूर्त लष्कर प्रमुख सरकारवर डोळे वटारण्याची व सरकारशी संघर्ष करण्याची हिम्मत करतात. शिस्ती साठी प्रसिद्ध असलेले भारतीय लष्कर आज बेशिस्त बनत चालले आहे ते व्हि.के. सिंह सारख्या लष्कर प्रमुखाची बेशिस्त आणि मुजोरी सहन करणाऱ्या केंद्र सरकारमुळेच. 

                                                                           नवा धोका 

केंद्रसरकारची विश्वासार्हता शून्याच्याही खाली गेली आहे. त्यामुळे या सरकार विरुद्ध जो कोणी तोंड उघडेल त्याचा प्रत्येक शब्द लोकांना खरा वाटू लागला आहे. कॅग प्रमुख विनोद राय लोकांना पंतप्रधानापेक्षा जास्त विश्वासार्ह वाटायला लागला ते याच मुळे. उघड उघड घटनेची चौकट ओलांडून अधिकारात नसलेले सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय लोकांना भावतात ते याच मुळे. वय प्रकरणी लष्कर प्रमुखाची भूमिका चुकीची आणि खोटारडी असतानाही लोकांना सरकारच त्यांच्यावर अन्याय करीत होते असे वाटते ते सरकारने गमावलेल्या विश्वासार्हतेमुळे. ज्या व्यक्तीवर दोन वर्ष पर्यंत लष्कराच्या सज्जतेची जबाबदारी होती ती व्यक्ती निवृत्त होता होता लष्कर सुसज्ज नसल्याचे सांगते आणि लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात. सरकारने विश्वासार्हता गमावल्यामुळे सरकार विरोधी या एकाच निकषावर खोटारडी , कपटी आणि मतलबी माणसे प्रतिष्ठीत होत आहेत. किरण बेदी, केजरीवाल पासून ते विनोद राय आणि व्हि.के. सिंह याची उत्तम उदाहरणे आहेत. यांच्यामुळे भारताची वाटचाल प्रभावित होणार असेल तर ते आजच्या सरकार पेक्षाही जास्त धोकादायक ठरणार आहे. आणि अशा धोक्याचे संकेत हजारे वाणीतून मिळाले देखील आहे. आपल्या कृतीचे काय परिणाम होवू शकतात हे पारखण्याची कुवत नसेल तर काय होवू शकते याची चुणूक अण्णा हजारे यांनी लष्कर प्रमुख व्हि.के. सिंह यांना निवृत्ती नंतर आपल्या आंदोलनात सामील होण्याचे निमंत्रण देवून दिले आहे. असे झाले तर लष्कराचा मागील दाराने नागरी क्षेत्रात हस्तक्षेप व लुडबुड करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. लष्कर प्रमुख पदावर काम केलेला माणूस निवृत्त झाला तरी लष्करावरील प्रभाव आणि लष्करी अधिकाऱ्याशी संपर्क काही प्रमाणात तरी कायम असतो. परिणामी स्वत: लष्कर प्रमुखपदी असताना व्हि.के. सिंह यांनी अण्णा आंदोलनाला पाठींबा देवून जो मर्यादा भंग केला होता असा मर्यादा भंग लष्करातील अधिकाऱ्याकडून होण्याचा धोका वाढेल. यातून लष्करात दुफळी व बेदिली माजू शकते .
अण्णा हजारे असोत कि बाबा रामदेव असोत त्यांचे हेतू कितीही चांगले असले तरी देशापुढील प्रश्न सोडवायला त्यांची बुद्धी कुचकामाची आहे. लष्कर प्रमुखाला आंदोलनात सामील होण्याचे निमंत्रण देवून त्यांनी आपल्या बुद्धीची मर्यादा दाखवून दिली आहे. सरकारने आपल्याला मुदतवाढ दिली नाही याचा राग लष्कर प्रमुखाच्या मनात खदखदत असल्याने ते अण्णांचे निमंत्रण आनंदाने स्विकारतील यात शंकाच नाही. यातून भारतीय राजकारणाची वाटचाल पाकिस्तानी राजकारणाच्या दिशेने होण्याचा मोठा धोका वेळीच ओळखला पाहिजे. हा धोका टाळून देशापुढील समस्या मार्गी लावायच्या असतील तर केंद्रात विश्वासार्ह, खंबीर आणि निर्णयक्षम सरकार असणे गरजेचे आहे. मनमोहन सरकार जाणे यातच सर्वात मोठे देश हित आहे.  त्यासाठी २०१४ सालची वाट पाहात बसल्याने अनेकांचा अनेक प्रकारे विनासायास फायदा होईल . भारतीय जनता पक्ष विनासायास नंबर एकचा पक्ष बनेल, डाव्यांना उभे राहण्यासाठी जमीन मिळेल , अण्णा हजारेंची 'महात्मा' म्हणून बढती होईल ,  पण देशाचे मात्र न भरून येणारे नुकसान होईल.
                                                     (समाप्त)

सुधाकर जाधव 
मोबाईल-९४२२१६८१५८ 
पांढरकवडा ,
जि. यवतमाळ 

Thursday, May 17, 2012

लोकशाहीला झुंडशाहीचे ग्रहण


--------------------------------------------------------------------------------------------------
अण्णा आंदोलनाच्या काळात निर्माण झालेल्या वातावरणात अण्णा आंदोलनाची चिकित्सा करणे जितके अवघड होते तितके किंवा त्यापेक्षा अवघड काम कार्टूनची चिकित्सा करणे बनले आहे. अण्णा आंदोलकांनी त्यांच्या आंदोलनाच्या टीकाकाराला नेहमी सरकारचा हस्तक म्हणून पाहिले , तसेच कार्टूनच्या समर्थन करणाऱ्याची आधी जात पाहिल्या जाते आणि काढल्या जाते ! निकोप आणि निरोगी चर्चेसाठी असे वातावरण घातक आहे. 
-------------------------------------------------------------------------------------------------

वयाची साठी गाठणे एवढे एक कारण समारंभ साजरा करायला पुरेसे असते. इतके वर्ष जिवंत राहिल्याचा आनंद आणि समाधान जाहीरपणे व्यक्त होत असताना आत कुठे तरी आता जगायचे फार दिवस राहिले नाहीत याची जाणीव समारंभ साजरा करणाऱ्यांना जास्त तीव्रतेने होत असते. म्हणून अशा समारंभात फार उणे-दुणे काढले जात नाही. याच धर्तीवर संसदेने भारतीय संसदेच्या निर्मितीचा हिरक महोत्सव नुकताच साजरा केला. भारतीय संसद साठ वर्षाची झाली ही खरेच मोठी आणि ऐतिहासिक घटना आहे. देशासाठी ती मोठी उपलब्धी आणि गौरवाची बाब आहे. स्वातंत्र्य मिळाल्यावर देशात धार्मिक  दंगलीच्या निमित्ताने स्वातंत्र्य आणि लोकशाहीला मारक अशा असहिष्णुतेचे तांडव सुरु असताना तशा वातावरणात निर्माण झालेली संसद किती वर्षे टिकेल  हा प्रश्न जगभर चर्चिला गेला होता आणि इंग्लंडचे पंतप्रधान राहिलेल्या चर्चिलनेच ही चर्चा सुरु केली होती. प्रत्येक बाबतीत विविधता जास्त आणि एकता कमी , दारिद्र्य आणि अज्ञानाचे साम्राज्य या पार्श्वभूमीवर इथे लोकशाही काय टिकणार असा प्रश्न विचारणारे आज जिवंत असते तर त्यानीही तोंडात बोटे घालून विस्फारित नजरेने या ऐतिहासिक घटनेकडे पाहिले असते. या ६० वर्षात देशा समोर अनेक आव्हाने उभी राहिलीत , अनेक वादळे आलीत, अनेक आर्थिक ,सामाजिक आणि राजकीय प्रश्न निर्माण झालेत पण एक प्रश्न या साठ वर्षात कधीच निर्माण झाला नव्हता आणि तो म्हणजे संसदीय लोकशाहीच्या अस्तित्वाचा . गरीब, निरक्षर किंवा अल्प शिक्षित अशा नागरिकांच्या मतावर चालणाऱ्या लोकशाही व्यवस्थेला देशातील अभिजनांनी  नेहमीच नाके मुरडली असली तरी कधीच कोणाच्या मनात संसदीय लोकशाहीच्या अस्तित्वाला काही धोका असल्याची भिती निर्माण झाली नव्हती. पण माणसाची एकसष्ठी साजरी करताना जशी आता हा माणूस फार वर्षाचा सोबती नाही अशी सुप्त भावना मनात असते नेमकी अशीच भावना आणि चिंता संसदेला साठ वर्षे पूर्ण होत असताना संसदे बद्दल वाटू लागली आहे. संसदेच्या ६० व्या वर्षात संसदेची सर्वोच्चता आणि प्रतिष्ठा या दोहोंनाही धोका निर्माण झाल्याचे वातावरण हा देशापुढील चिंतेचा व चिंतनाचा विषय ठरला आहे. संसदेने आपली साठी साजरी  करण्यासाठी जो समारंभ घडवून आणला त्यातही ही चिंता दिसली , पण चिंतन मात्र अभावानेच आढळले.  संसदेचे अस्तित्व राहील कि नाही , लोकशाही टिकेल कि नाही हा प्रश्न संसद निर्मितीच्या ६० वर्षानंतर उपस्थित होत असेल तर उघड आहे कि लोकशाहीला कर्करोग झाला आहे आणि या रोगाचा प्रभाव आता दिसू लागला आहे. लोकशाहीला झालेल्या कर्करोगाला भ्रष्टाचार , कुशासन ,दारिद्र्य वगैरे असे ठराविक साच्याचे नाव मी देणार नाहीत. हे रोग तर आहेतच आणि याने लोकशाही दुर्बलही झाली आहे. पण लोकशाहीला पोखरून टाकणारा जो रोग जडला आहे तो आमच्या आत्ममग्नतेचा , आत्मतुस्ठीचा आहे. आम्ही असे गृहित धरून चाललो होतो आणि आहोत कि लोकशाही व्यवस्था चालतच राहणार आहे . ती टिकविण्यासाठी आम्हाला काहीच करायची गरज नाही. आम्ही फक्त समाधान मानत राहिलो कि शेजारच्या राष्ट्रात लोकशाहीचे धिंडवडे निघाले पण आमच्या देशात आणिबाणी सारखा भीषण वार होवूनही आमची लोकशाही शाबूत राहिली. लोकशाही व्यवस्था संपुष्ठात आलेल्या देशाची गिनती करून आमच्या लोकशाहीकडे अभिमानाने पाहण्यातच आम्ही धन्यता मानली. लोकशाही टिकविण्यासाठी हवी असलेली जागरुकता आणि जबाबदारीच्या अभावाने आम्ही कोठे पोचलो आहोत? वर्षानुवर्षे हुकूमशाहीच्या जोखडात राहिलेली अरब देशातील जनता लाठ्या गोळ्या खाऊन , प्राणाची आहुती देवून लोकशाहीच्या स्थापनेसाठी लढत होती तेव्हा आमच्या देशातील अभिजन चौका चौकात जमून लोकशाहीचे प्रतिक असलेल्या संसदे विरुद्ध गरळ ओकत होता. दिल्लीच्या रामलीला मैदानात जमून संसदेला धक्का देण्याच्या तयारीत होता. जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र म्हणून बिरूद मिरविणाऱ्या देशावर अरब राष्ट्रातील तरुणाकडून धडे घेण्याची  वेळ आली आहे. जी पाकिस्तानची लोकशाही आमच्या साठी हसण्याचा विषय झाली होती तिथला पंतप्रधान राज्यघटनेच्या रक्षणासाठी तुरुंगात जायची तयारी दाखवितो आहे. इकडे आमचे पंतप्रधान आणि त्यांचे सरकार राज्यघटनेचे वस्त्रहरण करण्यात गुंतले आहेत. कोणत्याही प्रकारच्या झुंडशाहीला वाव देणे , स्थान देणे , खपवून घेणे हे राज्यघटनेचे , कायद्याच्या राज्याचे आणि लोकशाहीचे वस्त्रहरण आहे. भारतात हे वस्त्रहरण फक्त रस्त्यावरील झुंडीनेच होते असे नाही , तर झुंडशाहीची उरली सुरली कसर संसद सदस्य संसदेत बसून भरून काढतात! एकीकडे संसदेची साठी साजरी करण्याची तयारी चालू असताना कार्टून प्रकरणी संसदेत जो गोंधळ घातल्या गेला आणि जसे निर्णय घेतले गेले त्यामुळे लोकशाही वरील संकट किती गडद आहे याची प्रचिती येते. या निमित्ताने सर्वात महत्वाचे जे दर्शन घडले ते हे आहे कि लोकशाहीचे , संसदेचे मारेकरी रस्त्यावर झुंडीची ताकद दाखविणारे नेतेच नाहीत तर संसदेची  सर्वोच्चता आणि प्रतिष्ठा अबाधित राखण्याची ज्यांच्यावर जबाबदारी आहे ते संसद सदस्य देखील आहेत. 

                                                    कार्टूनने केले रोगाचे निदान  

शब्दांच्या जंजाळात न अडकता निव्वळ काही रेषांच्या सहाय्याने एखादी गोष्ट मनोरंजक पद्धतीने पण तितक्याच भेदकतेने आणि सूचकतेने नेमका अर्थ फक्त कार्टूनद्वारेच व्यक्त होतो. पण ज्या कार्टूनवर विवाद झाला आणि गदारोळ माजला ते कार्टून नेमका अर्थ सांगण्यास असमर्थ तरी ठरले किंवा कार्टून बद्दलची समाजातील निरक्षरता कायमच नाही तर वाढली आहे असाही अर्थ ध्वनित होतो. पण या कार्टूनने आमच्या लोकशाहीला , संसदेला कोणता रोग जडला आहे याचे मात्र अचूक निदान केले. समाजातील आणि संसदेतील झुंडशाहीने लोकशाही धोक्यात आणली आहे आणि संसदेची प्रतिष्ठा कमी केली आहे हे कार्टून वरील वादाने स्पष्ट झाले आहे. बुद्धीने विचार करणे , विवेक आणि संयम बाळगणे आणि भावनेच्या आहारी न जाणे या तीन लोकशाहीसाठी अपरिहार्य असलेल्या गुणांच्या अभावातून झुंडशाहीचा जन्म होतो. या कार्टूनवर संसदे बाहेर झालेल्या चर्चे पेक्षा संसदेत झालेल्या चर्चेने आणि निर्णयाने लोकशाहीवर जास्त आघात केला आहे. मुळात संसद हे आता एखाद्या प्रश्नावर खोलात जावून गंभीर चर्चा करण्याचे ठिकाणच राहिले नाही याच्यावर कार्टून चर्चेने  शिक्कामोर्तब केले आहे. कोणत्याही प्रश्नावर खोलात आणि चौफेर विचार न करता संसदेत घोषणांच्या गदारोळात निर्णय व्हायला लागलेत तर संसद संसदेतील संसद सदस्यांचा जमाव आणि रामलीला मैदानातील अण्णा टोपी वाल्यांचा जमाव यात गुणात्मक असा कोणताच फरक राहात नाही.ज्यांच्यावर देशासाठी कायदे बनविण्याची जबाबदारी आहे तेच   संसदेतील चर्चेचे आणि वागण्याचे नियम आणि संकेत पाळत नसतील तर त्यांना कायदा बनविण्याचा नैतिक अधिकार उरत नाही आणि अशा लोकांनी बनविलेल्या कायद्यांचा समाजात मानही राहात नाही. ज्याला कुठला इतिहास भूगोल नाही असे केजरीवाल सारखी माणसे संसदेला आव्हान देण्याचे धाडस करतात याचे कारण संसदेत बसणाऱ्यांच्या अशा वर्तनात दडलेले आहे. संसदे बाहेरच्या झुंडशाहीचे संसदेत प्रतिबिंब दिसते कि आपल्या निर्वाचित प्रतिनिधींच्या झुंडशाही पासून प्रेरणा घेवून बाहेर झुंडशाही होते हा वाद घालणे आधी कोंबडी कि आधी अंडे या वादा इतका निरर्थक आहे. संसदेत काय वाटेल ती चर्चा करा पण आम्ही म्हणतो तसाच लोकपाल कायदा झाला पाहिजे या अण्णा आंदोलनाच्या  झुंडशाहीच्या पुढची पायरी कार्टून विवादाच्या निमित्ताने गाठल्या गेली आहे. इथे तर कार्टून वर सांगोपांग चर्चा न करताच संबंधित कार्टून मागे घेण्यात आले आहे. अण्णा आंदोलनाच्या काळात निर्माण झालेल्या वातावरणात अण्णा आंदोलनाची चिकित्सा करणे जितके अवघड होते तितके किंवा त्यापेक्षा अवघड काम कार्टूनची चिकित्सा करणे बनले आहे. अण्णा आंदोलकांनी त्यांच्या आंदोलनाच्या टीकाकाराला नेहमी सरकारचा हस्तक म्हणून पाहिले , तसेच कार्टूनच्या समर्थन करणाऱ्याची आधी जात पाहिल्या जाते आणि काढल्या जाते ! निकोप आणि निरोगी चर्चेसाठी असे वातावरण घातक आहे. अण्णा मंडळी कधीच लोकशाहीचे भक्त किंवा समर्थक म्हणून ओळखली जात नव्हती आणि नाहीत . त्यांना लोकशाही व्यवस्थेत सगळे दोषच दिसतात. त्यामुळे त्यांच्या आंदोलनातून लोकशाहीला मारक वातावरण निर्माण झाले तर त्यात नवल वाटण्याचे कारण नाही. पण ज्यांची लोकशाही आणि राज्यघटना यावर निष्ठा आहे आणि या देशात लोकशाही व्यवस्था निर्माण करण्याचे मोठे श्रेय जाते त्या बाबासाहेबांचे नेतृत्व मानतात त्यांच्या कृतीने लोकशाहीला मारक वातावरण निर्माण होत असेल तर हा मोठया चिंतेचा विषय ठरणे स्वाभाविक आहे . याचा फक्त एकच अर्थ होतो कि आम्हाला आता लोकशाहीचा 
कंटाळा आला आहे. संसदेतील कायद्याचे ना संसद सदस्यांना महत्व आहे ना जनतेला . 'प्रत्येकाला हम करे सो कायदा ' हवा आहे. चर्चा आणि चिकित्सा याचे सगळ्यांना वावडे आहे. पण अशा चर्चे आणि चिकित्से अभावी या देशात हजारो वर्षे मनुस्मृतीचा अंमल राहिला. हजारो वर्षे कोट्यावधी लोक गुलामीत राहिले. स्वातंत्र्य मिळेपर्यंत चातुर्वण्याचा बोलबाला राहिला. फुले - आंबेडकरांनी त्याची चिकित्सा करण्याचे धाडस केले नसते तर गुलामीही दुर झाली नसती आणि लोकशाहीचे दर्शनसुद्धा घडले नसते. चर्चा आणि चिकित्सा यातून लोकशाही बळकट होते . पण त्याच्या अभावानेच आज लोकशाहीचे सर्वोच्च प्रतिक असलेली संसद शोभेची बाहुली बनली आहे. ज्या सरकारवर संसदेची प्रतिष्ठा टिकविण्याची जबाबदारी आहे त्याचीच काही प्रतिष्ठा उरलेली नाही. कार्टून वादाच्या निमित्ताने पुन्हा एकदा दिसून आले कि या सरकारला खरोखरच निर्णय घेता येत नाही. कोणी डोळे वटारले कि शेपूट घालणारे सरकार लोकशाहीचे काय रक्षण करणार! किंबहुना लोकशाहीला आणि संसदेच्या सर्वोच्चतेला आणि प्रतिष्ठेला सर्वात मोठा धोका केंद्रस्थानी असलेल्या दुबळ्या सरकार पासून आहे. कार्टून विवादाने हेच सत्य आणखी नागड्या स्वरुपात दाखवून दिले आहे आणि हे ही दाखवून दिले आहे कि भारतात लोकशाहीचा मार्ग काट्याकुट्यांनी भरलेला आहे. 
                                                           
                                                  (समाप्त)
                                                            
सुधाकर जाधव 
मोबाईल-९४२२१६८१५८ 
पांढरकवडा ,
जि.यवतमाळ 

Thursday, May 10, 2012

अराजकीय अराजकाची तीन वर्षे


---------------------------------------------------------------------------------------------------------
अर्थपंडीत असलेल्या मनमोहनसिंह यांची शेतीक्षेत्रा विषयीची समज तोकडी असल्याने शेतीचे जागतिकीकरण रखडले आणि विकासही थांबला. शेतीक्षेत्राची समज असलेले आणि समाजवादी परिकथांचा प्रभाव नसलेले राजकीय नेतृत्व पुढे आल्याशिवाय विकासाची थांबलेली गाडी सुरु होणार नाही हेच या सरकारचा तीन वर्षाचा कार्यकाळ सांगतो आहे. 

----------------------------------------------------------------------------------------------------------

मनमोहनसिंह यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील ३ वर्षे १३ मे रोजी पूर्ण होत आहे.  तीन वर्षे कशी निघून गेलीत याचा विचार आणि विश्लेषण करण्या ऐवजी विचारकच नव्हे तर देशातील सर्वसामान्य नागरिकांना या सरकारची आणखी २ वर्षे कशी निभतील या चिंतेने भेडसावे हेच मनमोहन सरकारच्या तीन वर्षाच्या कारकीर्दीचे फलित आहे. देशाने कमी संख्याबळाचे समर्थन लाभलेली आघाडींची सरकारे पाहिली आहेत. त्यांच्या कारभारातून निर्माण झालेली अस्थिरता आणि अर्थव्यवस्थेचा झालेला बट्ट्याबोळ अनुभवला आहे. अशा सरकारांच्या कारभारावर लोकांनी मतपेटीतून आपला संताप देखील व्यक्त केला आहे. देशाची अर्थव्यवस्था रसातळाला जावूनही  तेव्हा जनतेला कधी देशाच्या भवितव्याच्या चिंतेने ग्रासले नव्हते. त्या परिस्थितीत लोक सरकारवर नाराज होते , पण निराश नव्हते. डबघाईला आलेल्या अर्थव्यवस्थेला आणि राजकीय अस्थिरतेला कलाटणी देण्याची किमया पंतप्रधान नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखाली अर्थमंत्री म्हणून काम करताना मनमोहनसिंह यांनी केली होती. अर्थमंत्री म्हणून यशस्वी झालेले मनमोहनसिंह पंतप्रधान म्हणून केवळ अपयशीच ठरले नाहीत , तर पंतप्रधान पदा सारख्या देशातील सर्वाधिक महत्वाच्या आणि जबाबदारीच्या पदावर बसण्यास ते लायक नाहीत एवढी एकच गोष्ट केंद्रातील मनमोहन सरकारच्या तीन वर्षाच्या कार्यकाळाने अधोरेखित केली आहे. कोणत्याही सरकारवर देशाच्या जबाबदारीचे मोठे ओझे असते. पण देशातील स्वातंत्र्योत्तर काळातील हे पहिले सरकार आहे जे देशावरचे सर्वात मोठे  ओझे ठरले आहे. वास्तविक या सरकारचा दुसरा कार्यकाळ पहिल्या कार्यकाळा पेक्षा जास्त उत्साहाने सुरु झाला होता . देशातील जनतेने मनमोहन सरकारला मतपेटीतून जास्त बळ आणि विश्वास दिला होता. पण मनमोहन सरकारने आपल्या कर्माने म्हणण्यापेक्षा आपल्या अकर्मन्यतेने जनतेने दिलेल्या बळाचे आणि विश्वासाचे मातेरे केले आहे. लोकांना सरकार विषयी आशा किंवा निराशा वाटणे हा लोकशाही राज्यव्यवस्थेचाच एक भाग आहे आणि त्याबद्दल चिंता करावी असेही काही नाही. लोकांची निराशा मनमोहन सरकार पुरती मर्यादित असती तर चिंता करण्याचे कारणच नव्हते. हे सरकार आज ना उद्या बदलता आले असते. पण मनमोहन सरकारच्या तीन वर्षाच्या कार्यकाळातील सर्वात काळी बाजू कोणती असेल तर ही आहे की देशातील लोकशाही राज्यव्यवस्थे वरील लोकांचा विश्वासच डळमळीत झाला आहे. मोरारजी, व्हि.पी.सिंह , चंद्रशेखर यांची सरकारे तर मनमोहन सरकार पेक्षा जास्त निकम्मी होती. पण त्या सरकारांनी देखील देशातील राजकीय प्रक्रिये वरचा लोकांचा विश्वास कधी ढळला नव्हता. लोकांच्या विश्वासाची ही घसरण रोखण्यात मनमोहन सरकारला आलेले अपयश हेच या सरकारचे सर्वात मोठे अपयश आहे.

                                                                    राजकीय अपयश 

गेल्या तीन वर्षात असा काही चमत्कार घडला आहे की पहिल्या कार्यकाळातील कामगिरीच्या आधारे अधिक शक्ती घेवून सत्तेवर आलेले सरकार त्या कार्यकाळातील कर्तुतीनेच कोमात गेले आहे ! सरकार टिकविण्यासाठी खासदारांना लाच दिल्याचा आरोप पाठीशी घेवून निवडणुकीला सामोरे गेलेल्या या सरकारवरचा आरोप धुडकावून लागणारी जनताच या सरकार विरुद्ध भ्रष्टाचाराचा कोणताही आरोप झाला की त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू लागली आहे. एवढी पत गमावण्या लायक गेल्या तीन वर्षात या सरकारने काय केले हा प्रश्न कोणालाही पडेल. आणि या प्रश्नाचे प्रामाणिक उत्तर द्यायचे झाले तर हेच द्यावे लागेल की या सरकारने काहीही केले नाही ! अगदी स्वत:च्या बचावासाठी सुद्धा या सरकारने काहीही केले नाही! राजकीय , सामाजिक, आर्थिक , सांस्कृतिक अशा कोणत्याही आघाडीवर काहीही न करणारे सरकार अशी स्वत:ची ठसठशीत प्रतिमा निर्माण करण्याची आज पर्यंत कोणत्याही सरकारला न जमलेली किमया आणि कामगिरी मनमोहन सरकारच्या नावावर जमा आहे.  भ्रष्टाचाराच्या आरोपाने घेरल्या गेल्यामुळे मनमोहन सरकारला पंगुत्व आले ही सर्वसाधारण मान्यता काही खोटी नाही. पण भ्रष्टाचार केला म्हणून हे पंगुत्व आलेले नाही तर भ्रष्टाचाराच्या या सर्व चर्चेला राजकीय पातळीवर प्रत्युत्तर देण्यात सरकार आणि त्याच्या पक्षाला आलेले अपयश आहे. याचे सर्वात उत्तम उदाहरण २ जी स्पेक्ट्रमचे आहे. आजही देशातील सामान्य मध्यम वर्गीयाचा हा ठाम समज आहे की २ जी स्पेक्ट्रम च्या वाटपात १. ७६ लाख कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाला आहे ! वस्तुस्थिती फार वेगळी आहे. स्पेक्ट्रम वाटपात सरकारच्या खजिन्यातून १ पैसा ही न जाता यातून उभ्या राहिलेल्या दूरसंचार व्यवस्थेतून कर रुपाने सरकारची तिजोरी भरली जात असताना स्पेक्ट्रम वाटप हा या देशातील सर्वात मोठा घोटाळा ठरला आहे. या बाबत ठाम आणि स्पष्ट भूमिका घेण्या मांडण्या ऐवजी भ्रष्टाचाराच्या या चिखलफेकीत आपल्या अंगावर चिखल उडून आपली प्रतिमा मलीन होवू नये याचीच मनमोहनसिंह यांनी जास्त काळजी घेवून सरकारला चिखलात सोडून स्वत: नामानिराळे होण्याचा प्रयत्न केला. नोकरशहाचे एक वैशिष्ठ्य असते. तो कधीच कोणती जबाबदारी घेत नसतो. पंतप्रधानपदी बसलेली ही व्यक्ती नोकरशहाच आहे याची प्रचिती देणारी सरकारची ही तीन वर्षाची कारकीर्द आहे. पंतप्रधानांना राजकीय समज नसली किंवा राजकीय समज तोकडी असली की देशाचे कसे वाटोळे होवू शकते याचा धडा या सरकारने लोकांना दिला आहे. परिणामाचा विचार न करता निर्णय घेण्याची धडाडी  असणे हे राजकीय व्यक्तीचे व्यवच्छेदक लक्षणं असते तर परीनामाचाच विचार करीत बसून निर्णय न घेणे ही नोकरशहांची खासियत असते. देश आज अनिर्णयाच्या गर्तेत का सापडला याचे उत्तर इथे सापडते. भ्रष्टाचाराच्या सर्व चर्चेला ठाम राजकीय भूमिकेतून उत्तर देण्याचा प्रयत्न झाला असता तर देशात अण्णा आंदोलन उभे राहिले नसते आणि निराशेचे वातावरण निर्माण झाले नसते. सरकारच्या भ्रष्टाचाराविरुद्ध एवढे मोठे आंदोलन उभे करणारे अण्णा ज्यांच्या भ्रष्टाचारावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले त्या विलासराव देशमुखांच्या हातून रस प्राशन करून उपवास सोडतात ही राजकीय किमया आहे. अशा राजकीय किमायागिरी अभावी अर्थशास्त्रज्ञ म्हणून अर्थव्यवस्थेला दलदलीतून बाहेर काढणारे मनमोहनसिंह यांनी पंतप्रधान म्हणून देशालाच दलदलीच्या खाईत लोटले आहे. 

                                  ते सरकार आणि हे सरकार                                   

पहिल्या कार्यकाळात मनमोहनसिंह पंतप्रधान होते आणि दुसऱ्या कार्यकाळातही मनमोहनसिंह पंतप्रधान आहेत . पण तरीही दोन कार्यकाळात एवढा फरक का हा प्रश्न विचार करण्यासारखे आहे. पहिल्या कार्यकाळात डाव्यांच्या पाठिंब्यावर टिकून असलेल्या सरकारचा डाव्यांशी असलेला धोरण विषयक संघर्ष राजकीय स्वरूपाचा होता. या काळात मनमोहनसिंह यांच्यातील नोकरशहाला डोके वर काढण्याची संधीच मिळाली नाही. पहिल्या कार्यकाळा नंतरच्या निवडणुकीतील यश हे पंतप्रधान म्हणून मनमोहनसिंह यांनी डाव्या पक्षाविरुद्ध पुकारलेल्या राजकीय लढाईला आलेले यश होते. त्यावेळी श्रीमती सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालील सल्लागार समितीवर राजकीय नेतृत्वाचा प्रभाव होता. पण दुसऱ्या कार्यकाळातील सल्लागार समिती बिगर राजकीय लोकांच्या ताब्यात गेली. पुस्तकी अर्थपंडीत आणि  विकासाच्या स्वयंसेवी कल्पनांचा गोंधळ घालणारे स्वयंसेवी गोंधळी यांचा सोनिया गांधीवरील वाढत्या प्रभावाने सोनिया गांधी मधील राजकारणी मागे पडला. त्यामुळे सोनिया गांधी यांच्या सल्लागार समितीच्या अव्यवहार्य कल्पना आणि सरकारला करावी लागणारी व्यावहारिक कसरत यात संघर्ष निर्माण होवून सरकारची निर्णय प्रक्रियाच ठप्प झाली.  दुसरी कडे जागतिकीकरणातून आलेले विकासपर्व एका टप्प्यावर येवून थांबले. शेती क्षेत्र जागतिकीकरणासाठी खुले केल्याशिवाय विकासाला वेग येणे  संभव नव्हते. पण अर्थपंडीत असलेल्या मनमोहनसिंह यांची शेतीक्षेत्रा विषयीची समज तोकडी असल्याने शेतीचे जागतिकीकरण रखडले आणि विकासही थांबला. शेतीक्षेत्राची समज असलेले आणि समाजवादी परिकथांचा प्रभाव नसलेले राजकीय नेतृत्व पुढे आल्याशिवाय विकासाची थांबलेली गाडी सुरु होणार नाही हेच या सरकारचा तीन वर्षाचा कार्यकाळ सांगतो आहे. मनमोहनसिंह हे स्वयंप्रकाशित नाहीत. अर्थमंत्री म्हणून त्यांची कामगिरी सरस झाली ती नरसिंहराव यांआजकीची राजकीय समज त्यांच्या मदतीला होती म्हणून. पंतप्रधान म्हणून त्यांचा कार्यकाळ चांगला गेला तो सल्लागार परिषदेची राजकीय समज त्यांच्या मदतीला होती म्हणून. आज मात्र सर्व थरातील राजकीय नेतृत्व मागे पडून अराजकीय नेतृत्वाने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. अराजकीय नेतृत्व हे मुळातच कल्पना विश्वात रममाण होणारे नेतृत्व असते. व्यवहार आणि सत्य याच्याशी त्याचा संबंध नसतो. समस्त भारत वर्षाला अराजकीय नेतृत्वाचे ग्रहण लागले आहे. हे ग्रहण फक्त अण्णा-बाबांच्या आंदोलनाच्या रुपाने किंवा कॅग अथवा सर्वोच्च न्यायालयाच्या रुपाने लागले असते तर त्यापासून खंबीर राजकीय नेतृत्व देशाला त्या ग्रहणाच्या छायेतून सोडवू शकले असते. पण देशाचे सर्वोच्च राजकीय नेतृत्वच अराजकीय असेल तर ? तर अराजकाचे राज्य अपरिहार्य ठरते. मनमोहन सरकारच्या ३ वर्षाच्या कार्यकाळाने देशाला अराजकाच्या उंबरठयावर आणून उभे केले आहे. या सरकारच्या हाती  आणखी दोन वर्ष देश ठेवणे म्हणजे अराजकाला निमंत्रण देणे ठरणार आहे। 
                                                                   (संपुर्ण)

सुधाकर जाधव 
मोबाईल- ९४२२१६८१५८ 
पांढरकवडा ,
जि-यवतमाळ