Thursday, March 3, 2016

मोदी सरकारचा शेतीसंकल्प

अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी प्रधानमंत्री मोदी यांनी ही कठीण परीक्षा असून यात आपण उत्तीर्ण होवू असा आत्मविश्वास प्रकट केला होता. अर्थसंकल्पात देशासमोरील सर्वात मोठा प्रश्न शेतीचा आहे हे मांडून त्यांनी प्रश्नासाठीचे १०० टक्के गुण मिळविले हे खरे . पण अर्थसंकल्पात या प्रश्नाचे नवे उत्तर शोधण्या ऐवजी पूर्वीच्या धोरणाची नक्कल केल्याने त्यांचे उत्तर मात्र सपशेल चुकले. त्यामुळे प्रश्न आणि त्याचे उत्तर याची गोळाबेरीज शून्य आल्याने मोदी सरकार नापास झाले असाच निष्कर्ष निघतो.
---------------------------------------------------------


मोदी सरकारातील अर्थमंत्री अरुण जेटली यांनी संसदेत आपल्या सरकारचा अर्थसंकल्प सादर करण्याच्या एक दिवस आधी 'मन की बात' करताना सादर होणारा अर्थसंकल्प हा आपली परीक्षा असल्याचे आणि या परीक्षेत आपण उत्तीर्ण होवू हा आत्मविश्वास असल्याचे सांगितले होते. प्रश्न काय येतील माहित नसताना ते सोडविणे याला आपण परीक्षा समजतो. या उत्तराची तज्द्य परीक्षक तपासणी करून उत्तीर्ण-अनुत्तीर्ण ठरवीत असतात. अर्थसंकल्प ही परीक्षा मानली तर यात नेमके उलटे घडते. प्रश्न सोडवायला कोणते घ्यायचे हे तज्ज्ञ मंडळी ठरवितात आणि तेच त्यांच्या दृष्टीने आदर्श अशी उत्तरे लिहितात. आर्थिक बाबतीत अडाणी असलेल्यांनी ती प्रश्नोत्तरे पाहून पास-नापास ठरविणे अपेक्षित असते. असतो. इथे आर्थिक अडाणीजन फक्त उत्तराला गुण देत नाहीत . अर्थसंकल्पाच्या बाबतीत परीक्षा देणारानी प्रश्न कोणते निवडलेत हे देखील तितकेच महत्वाचे असते किंबहुना उत्तरापेक्षा प्रश्नच जास्त महत्वाचे असतात. देशापुढच्या प्रश्नाचे निदान झाले तर उत्तर सापडणे तुलनेने सोपे असते. आजारावर औषधी तर अनेक प्रकारची उपलब्ध असतात बाजारात पण ती घेण्या आधी आजाराचे निदान होणे गरजेचे असते तसेच हे आहे. त्यामुळे अर्थसंकल्पाच्या बाबतीत प्रश्न आणि त्याची मांडलेली उत्तरे याला समसमान गुण देवून तपासणी अपेक्षित असते. इथे तपासणाऱ्याला स्वत:चे प्रश्न माहित असतात आणि त्यामुळे माहित असलेले प्रश्न नेमके उचलले की नाही हे कळणे तसे अवघड जात नाही. देशाला  भेडसावणारे प्रश्न हेरून मांडण्याची कला अर्थसंकल्पात साधावी लागत असल्याने अर्थसंकल्पाला  अंदाजपत्रक हा पर्यायी शब्द चपखल वाटतो. अर्थमंत्र्यांनी आपले ताजे अंदाजपत्रक संसदेत सादर केले तेव्हा सर्वसाधारणपणे सर्वसामान्यांकडून सर्वमान्य अशा दोन प्रतिक्रिया समोर आल्यात .
पहिली प्रतिक्रिया होती अर्थमंत्र्याने प्रश्न तर अचूक हेरलेत ! आणि या प्रश्न निवडी बद्दल त्यांना पैकीच्या पैकी गुण द्यावेत याबाबत दुमत कोठे दिसले नाही. असे पैकीच्या पैकी गुण देतांना अनेकांना नवल मात्र वाटत होते. एखादा विद्यार्थी कोणत्या विषयात कच्चा आहे हे त्या विद्यार्थ्यांसोबत त्याच्या शिक्षकांना चांगले माहित असते. विद्यार्थ्याला कोणत्या विषयात रस आहे आणि कोणत्या विषयात रुची नाही हे सुद्धा शिक्षकांना चांगले माहित असते. त्यामुळे रस नसलेल्या किंवा कच्चा असलेल्या विषयात चांगले गुण मिळविले तर त्या विद्यार्थ्याचे नवल आणि  कौतुक वाटल्याशिवाय राहात नाही. या अर्थसंकल्पाच्या बाबतीत असेच नवल आणि कौतुक मोदी सरकारच्या वाट्याला आले आहे. सत्तेत आल्यापासून मोदी आणि त्यांच्या सरकारचा सगळा जोर उद्योगासाठीच्या योजना आखण्यावर आणि त्यासाठी लागणारे भांडवल उभे करण्यावर दिसत होता. मेक इन इंडिया , स्टार्ट अप इंडिया , डिजिटल इंडिया या सारख्या मोदी सरकारच्या भव्यदिव्य योजना इंडियातील उद्योगा भोवतीच फिरत होत्या आणि त्यावरच सरकारचा सर्व जोर दिसत होता. शेतीक्षेत्राकडे म्हणजेच भारताकडे सरकारचे काहीच लक्ष नाही हे दिसत होते आणि त्यामुळे आधीच डबघाईला आलेले शेतीक्षेत्र मोदी राजवटीत कोलमडून पडण्याच्या टोकावर आल्याचे दिसत होते. सरकारच्या आजवरच्या वर्तणुकीवरून सरकार शेतीक्षेत्राला फार गंभीरतेने घेईल असे वाटत नसताना मोदी सरकारकडून बराचसा शेती केंद्रित आणि नेहमी प्रमाणे इंडियाचे लाड न पुरविता भारत केंद्रित अर्थसंकल्प सादर करून आश्चर्याचा धक्का दिला . वर्षभर एखाद्या विषयाचा अभ्यास करावा आणि परीक्षेचा फॉर्म भरताना त्यात दुसराच विषय टाकून त्या विषयाच्या परीक्षेला सामोरे जावे तसा प्रकार मोदी सरकारने केला आहे . ज्या विषयात हे सरकार कच्चे आहे याची जनतेला खात्री पटली होती त्याच विषयाचे अधिक प्रश्न निवडण्याचे धाडस सरकारने केल्याने  नवल आणि कौतुक वाटणे स्वाभाविक आहे. त्यामुळे सरकारच्या परीक्षेचे प्रश्न आणि उत्तर हे दोन भाग मानून त्यांना गुण द्यायचे झाले तर पहिल्या भागाला म्हणजे निवडलेल्या प्रश्नांना अ श्रेणी द्यावी लागेल आणि त्याबद्दल सरकारचे अभिनंदनही केले पाहिजे. अर्थात हे अभिनंदन दुर्लक्षित आणि अवघड प्रश्न निवडल्या बद्दलच आहे. खरा प्रश्न आहे तो या निवडलेल्या प्रश्नांना सरकारच्या वतीने अर्थमंत्र्याने लिहिलेली उत्तरे कशी आहेत याचा. प्रश्नाच्या निवडीला पैकीच्यापैकी गुण देवूनही उत्तरे चुकली असतील तर गोळाबेरीज शून्य येईल आणि मोदी सरकारला भोपळाही फोडता आला नाही असे म्हणण्यासारखी परिस्थिती निर्माण होईल.

सामान्यजनांची इथे एक अडचण आहे. प्रश्न त्यांचेच असल्याने ते समजायला आणि त्याचे मूल्यमापन करायला जड जात नाही. या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी जी भाषा वापरली जाते आणि आकडेवारीची पेरणी केली जाते ती पार डोक्यावरून जाणारी असते. त्यामुळे उत्तरांना गुण देतांना संभ्रम निर्माण होण्याचा आणि या संभ्रमात कमी-जास्त गुण देण्याचा धोका असतो. म्हणून उत्तरे तपासताना विद्वानांच्या कसोट्या बाजूला ठेवून अडाण्यांचे आडाखे वापरले पाहिजेत. असे आडाखे वापरले तरच आपल्याला उत्तरात काही हेराफेरी केली का हे पकडता येईल. मोदी सरकारचे एक विशेष आहे. कोणतीही गोष्ट करायची तर त्याचा गाजावाजा करूनच ती केली पाहिजे हे या सरकारचे सुरुवातीपासूनचे धोरण राहिले आहे. हा गाजावाजा म्हणजे एखादी भेटवस्तू देतांना तिचे आकर्षक पैकिंग करण्यासारखा असतो. आतली वस्तू भिकार असली तरी आकर्षक पैकिंगच्या आवरणात कोणाच्या लक्षात येणार नाही याची सोय होते. अर्थसंकल्प सादर झाल्या नंतर शेती क्षेत्राकडे विशेष लक्ष देणारा अर्थसंकल्प म्हणून गाजावाजा होतो आहे. शेतीला अच्छे दिन येणार असे फुगे फुगवून ते हवेत सोडण्यात येत आहेत. या फुगे हवेने नाही तर मोठमोठ्या आकड्यांनी भरलेले आहेत. चलाखी करण्याचे सर्वात सोपे साधन कोणते असेल तर ते आकडे असतात. तेव्हा या आकड्यांना सावधपणे आपल्या आडाख्याने मापले तरच उत्तर अपुरे आहेत किंवा  चूक की बरोबर आहेत हे कळेल.

या पूर्वीच्या अर्थसंकल्पामध्ये उद्योगजगतावर सवलतीचा जो वर्षाव केला जायचा त्याला काही प्रमाणात बांध घालून ग्रामीण भाग आणि शेतीसाठी वाढीव तरतुदी केल्याने हा अर्थसंकल्प शेती केंद्रित असल्याचा समज निर्माण झाला आहे. काही बाबतीत तरतुदी वाढविल्याचे हातचलाखी करून दाखविले गेले आहे तर काही बाबतीत खरोखरच तरतुदी मध्ये लक्षणीय  वाढ करण्यात आली आहे. कृषी खात्यासाठी दुपटी पेक्षा अधिक तरतूद केल्याचे दाखविण्यात आले आहे. हा आकडा दुपटीपेक्षा अधिक दिसण्याचे कारण व्याजावर सबसिडी देण्याची अर्थ्मंत्रालयाच्या अधीन जबाबदारी कृषी खात्याकडे वर्ग करून कृषीखात्याचा आकडा फुगविण्यात आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तरतुदीत भरीव वाढ करण्यात आली हे खरे आहे. साधारण गरमपंचायतीला ७०-८० लाखापर्यंत रक्कम मिळू शकेल. पण ही रक्कम कशी खर्च करायची याची योजना नाही. रोजगार हमीसाठी वाढीव तरतूद आहे.  पण ती महत्वाची नाही. कारण योजनेच्या नियमानुसार कोणी रोजगार मागितला तर तो देणे बंधनकारक आहे. त्यामुळे त्याच्यासाठी किती तरतूद आहे याने फार फरक पडत नाही. खऱ्या अर्थाने ग्रामीण भागात थोडेफार बदल घडू शकतील अशा २-३ तरतुदी या अर्थसंकल्पामध्ये आहेत आणि त्यामुळेच अर्थसंकल्पाला ग्रामीण तोंडावळा प्राप्त झाला आहे. त्यापैकी एक म्हणजे सिंचन सुविधा वाढावी यासाठीची तरतूद आणि प्रधानमंत्री सडक योजने अंतर्गत गावे पक्क्या रस्त्याने जोडण्याची तरतूद महत्वाची आहे. अन्न प्रक्रिया उद्योगात १०० टक्के विदेशी गुंतवणुकीला मान्यता हे योग्य दिशेने पडलेले पाउल म्हणता येईल. गेली २ वर्षे प्रधानमंत्री उद्योगासाठी भांडवल मिळविण्यासाठी देशोदेशीची भ्रमंती करीत आले आहेत , पण त्यांनी शेतीसाठी गुंतवणूक मिळविण्याचा प्रयत्न केला नाही. आता अन्नप्रक्रिया उद्योगात विदेशी गुंतवणुकीला परवानगी देवून चुकीची दुरुस्ती केली आहे. ग्रामीण भागात मुलभूत संरचना उभी राहात नाही तो पर्यंत फार मोठी विदेशी गुंतवणूक येण्याची शक्यता नाही. उशिरा सुचलेले शहाणपण असल्याने याचे परिणाम उशिराच दिसतील .

कृषी आणि ग्रामीण क्षेत्रासंबंधीच्या या तरतुदी योग्य असल्या तरी कृषी क्षेत्रापुढील प्रचंड अशी आव्हाने पेलण्याची ताकद या तरतुदीमध्ये आहेत का याचा विचार होणे गरजेचे आहे. मुळात या सगळ्या तरतुदी थोड्या फार फरकाने मागच्या पानावरून पुढे चालू अशा स्वरूपाच्या आहेत. फरक असेल तो पैसा वाढविण्यातील आहे. अशा स्वरूपाच्या योजना आणि तरतुदी यांनी शेती आणि ग्रामीण भागाचे भले झाले नाही हा इतिहास आहे. शेतीचे दुखणे वाढत आहे आणि सरकारचा भर दु:खावर फुंकर घालत मलमपट्टी करण्यावर आहे. शेती आणि ग्रामीण क्षेत्रासाठी तरतुदींचा सुकाळ मानला तरी शेती क्षेत्रासमोरील खऱ्या आव्हानांना तोंड देवू शकेल अशी एकही तरतूद यात नाहीत. येत्या ५ वर्षात शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करण्याची भावना स्वागतार्ह आहे. त्यासाठी मलमपट्टी उपयोगाची नाही , गरज शस्त्रक्रियेची आहे आणि शस्त्रक्रियेचे औजार हाती घेण्याचे साहस तरी अर्थमंत्र्यात नाही किंवा त्यांची समज तेवढी नाही असाच निष्कर्ष हा अर्थसंकल्प पाहून निघतो. शेती क्षेत्रासमोरील काय आव्हाने आहेत याची यादी केली आणि त्याच्या प्रकाशात अर्थसंकल्पातील तरतुदी तपासल्या तर शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थे समोरील आव्हाने पेलण्यास हा अर्थसंकल्प कितपत उपयोगी आहे हे समजेल.

शेतीक्षेत्रापुढचे मोठे आव्हान तुकड्यातील कोरडवाहू शेतीचे आहे. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा शेतीसाठी वापर केला तरी मोठ्या प्रमाणावर शेती कोरडवाहूच राहणार आहे. कमी किंवा अनियमित पावसाच्या पाण्यावर शेती करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि संशोधन यांना चालना देणे गरजेचे आहे. यासाठीची कोणतीही योजना अर्थसंकल्पात नाही. हवामान बदलाचा मुकाबला कसा करायचा हे शेतीक्षेत्रासमोर उभे राहिलेले नवे आव्हान आहे. बदलत्या हवामानातील शेती बदल सोपे नाहीत . त्यासाठी संशोधन , तंत्रज्ञान आणि भांडवल मोठ्या प्रमाणात हवे. पीक विमा योजना सारख्या थातुरमातुर तरतुदी कुचकामी आहे. प्रत्येक व्यक्तीसाठी जसा विमा असतो तसा प्रत्येक शेतासाठी विमा काढण्याची तरतूद होत नाही तो पर्यंत हवामानामुळे होणाऱ्या हानी पासून शेतकऱ्याचा बचाव होवूच शकत नाही. सगळ्यात मोठे आव्हान भांडवलाचे आहे. भांडवल खावून शेती करणे हाच एक पर्याय असल्याने ग्रामीण भागाची दुर्दशा वाढत चालली आहे. नुसते कर्ज उपलब्ध करणाऱ्या तरतुदी करून उपयोगी नाही. कारण कर्जातून १०० टक्के गरज कधी भागल्या जात नाही. शेतीत टाकण्यासाठी शेतकऱ्याकडे काहीच नसल्याने कर्जाचा फायदा होण्या ऐवजी परिणाम शेतकरी अधिक कर्जबाजारी होण्यात होतो. त्यामुळे गेल्यावर्षी साडे आठ लाख कोटीची कर्जासाठीची तरतूद नऊ लाख केल्याने परिस्थितीत फरक पडेल हा भाबडेपणा झाला. शेतीसाठी भांडवल उभे करण्याच्या नव्या योजना , नवा विचार हवा. त्याचा या अर्थसंकल्पात संपूर्ण अभाव आहे. शेतीवरील लोकसंख्येचा भार कमी करण्याला प्राधान्य देणे गरजेचे असताना अर्थसंकल्पात त्याला स्पर्श देखील करण्यात आला नाही. त्यासाठी स्मार्ट शहरे उभारण्या ऐवजी ते भांडवल शेतकऱ्यांच्या मुलांसाठी नवी नगरे आणि नवे उद्योग उभारण्यासाठी वापरण्याची योजना आणि दृष्टी हवी. येत्या ५ वर्षात दरवर्षी १० टक्के लोकसंख्येला शेतीक्षेत्रातून बाहेर काढून दुसरीकडे रोजगार उपलब्ध करून दिला तरच शेतकऱ्याचे उत्पन्न ५ वर्षात दुप्पट होण्याची आशा आहे. शेतकऱ्याचे आजचे उत्पन्न लक्षात घेतले तर दुप्पट उत्पन्नाने शेतकरी सुखी होईल हाच एक मोठा भ्रम आहे. म्हणूनच हा शेतीकेंद्रित अर्थसंकल्प शेतकऱ्यांना अच्छे दिन दाखवील ही समजूत भ्रामक आहे.
-----------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव , पांढरकवडा , जि. यवतमाळ
मोबाईल - ९४२२१६८१५८
-----------------------------------------------------------------------

Thursday, February 25, 2016

दृकश्राव्य माध्यमांचा उन्माद

दृकश्राव्य माध्यमांनी जे एन यु प्रकरण ज्या पद्धतीने हाताळले ती पद्धत पत्रकारितेचे जगन्मान्य नीतीमूल्य पायदळी तुडविणारी होती. तटस्थपणे व संयतपणे वृत्त देण्या ऐवजी या माध्यमांनी आरोपकर्ते पोलीस , वकील आणि न्यायधीश या सर्व भूमिका बजावून लोकशाहीची खिल्ली उडविली आहे. त्यांच्या वर्तनाने ही माध्यमे लोकशाहीचा आधारस्तंभ आहेत की कर्दनकाळ आहेत असा प्रश्न उभा राहिला आहे .
-------------------------------------------------------------------------------

आपल्या देशात दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठावरून भावनांचा महापूर थैमान घालीत असताना याच्या समांतर अमेरिकेत तेथील एका न्यायालयाच्या आदेशावर गंभीर चर्चा सुरु आहे. अमेरिकेतील न्यायालयाने आय फोन बनविणाऱ्या एपल नावाच्या कंपनीला डझनभर अमेरिकन नागरिकाला ठार मारणाऱ्या आतंकवाद्याच्या आय फोन मधील माहिती उघड करण्यास तेथील पोलिसांना तांत्रिक सहाय्य करण्याचे आदेश दिले आहेत. कंपनी हा आदेश ग्राहक हिताचा नसल्याचे कारण देत न्यायालयाचा आदेश मानण्यास नकार देत आहे. या कंपनीच्या प्रतिस्पर्धी कंपन्यांनी देखील ऐपल कंपनीच्या भूमिकेची पाठराखण केली आहे. प्रश्न नाजूक आहे. डझनभर निरपराध नागरिकाचा आतंकवाद्यानी बळी घेतला आहे. आणखी अशा घटना घडू नयेत यासाठी या आतंकवाद्यांचे आणखी कोणी साथीदार तर नाहीत ना याचा तपास करणे गरजेचे आहे. असे कोणी असतील तर त्यांची माहिती आतंकवाद्याकडे सापडलेल्या फोन मध्ये असण्याची व सापडण्याची शक्यता आहे. तपास यंत्रणांना तो फोनच उघडता येत नसल्याने त्यांना फोन बनविणाऱ्या कंपनीची मदत हवी आहे. या प्रकरणात कंपनीने मदत केली तर त्याचा परिणाम ज्यांनी कोणी असे फोन खरेदी केलेत त्या सगळ्यांची गोपनीयता धोक्यात येईल आणि कंपनी वरचा विश्वास उडेल. दोन्ही बाजूनी तर्क पुढे येत आहेत. त्यावर चर्चा होत आहे. कदाचित हा प्रश्न वरच्या न्यायालयात जाईल आणि निकाली निघेल. मात्र आज या विषयावर जी चर्चा अमेरिकेत झडत आहे त्या चर्चेत कंपनीने फोन मधील माहिती उघड करण्यास मदत केली पाहिजे असे मानणारे आणि म्हणणारे त्या कंपनीला देशद्रोही ठरवीत नाही किंवा आतंकवाद्याची पाठराखण कंपनी करीत आहे असाही कोणी आरोप करीत नाही. या मुद्द्यावर कंपनीच्या कुठल्या कार्यालयावर कोणी मोर्चे नेले नाहीत कि हल्ले केले नाहीत. या पार्श्वभूमीवर विचार करा भारतात असे काही घडले असते तर काय झाले असते ? जमावाने ठिकठिकाणी कंपनीच्या कार्यालयावर हल्ले केले असते . कर्मचाऱ्यांना मारले असते. कंपनीला देशद्रोही ठरवून ती बंद करण्याची मागणी झाली असती. कंपनीच्या उत्पादनावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन झाले असते. देशभरात भावनिक हल्लकल्लोळ माजला असता. आज जे एन यु बद्दल जे घडतय ते सगळे अशा कंपनी बद्दल घडले असते. भारत आणि अमेरिका जगातील मोठी लोकशाही राष्ट्र आहेत . दोन राष्ट्रात जे घडतय त्यात टोकाचा विरोधाभास आहे. 

 असा विरोधाभास असण्यामागे आमचा भावनिक निर्देशांक धोक्याच्या पातळी पेक्षा बराच वर आहे. घडलेल्या - न घडलेल्या , अस्तित्वात असलेल्या - अस्तित्वात नसलेल्या कारणांसाठी इथे भावनांचा उबाळ निर्माण करता येणे सहज शक्य आहे. राजकारणी मंडळी लोकांच्या या भावनिक कमजोरीवर आजवर आपले उखळ पांढरे करीत आले आहेत. आता त्यांच्या जोडीला माध्यमांतील  नवा वर्ग लोकांच्या भावनांशी खेळून आपला दबदबा आणि प्रभाव वाढवून घटनांची निर्मिती करू लागला आहे. अण्णा आंदोलनात पहिल्यांदा त्याचे दर्शन घडले. एखाद्या घटनेचे नीती नियमाना अनुसरून  वृत्त देण्याचे माध्यमांचे असलेले व्रत बाजूला पडून घटनांचा कर्ता ही भूमिका आपल्याकडील माध्यमांनी घेतली. घटनेचे वृत्त द्यायचे झाले तरी स्वत:च्या भूमिकेचे अंगडे-टोपडे घालूनच ते देण्यात येवू लागले. एखाद्या विषयावर चर्चा घडवून आणायची तर ती चर्चा आपल्या भूमिकेच्या अंगाने नेण्याचा प्रयत्न प्रत्येकवेळी आणि एखादा अपवाद सोडला तर प्रत्येक चैनेल वर दिसायला लागला. अगदी हातात चाबूक घेतल्या सारखे चर्चेचे संयोजक चर्चेचे आयोजन करू लागले. जे एन यु प्रकरणात या सगळ्या गोष्टीनी टोक गाठल्याचे साऱ्या जगाला दिसले आहे. त्याचे दुष्परिणाम देखील दिसू लागले आहेत. आजवर नितीमत्ता नसलेल्या राजकारण्यांनी लोकांचे वाटोळे केले . राजकारणी कितीही नीतीहीन असले तरी त्यांना आपल्या प्रत्येक कृती बद्दल लोकांना जाब द्यावा लागेल ही भीती असते. भावनिक लाटेवर स्वार झालेला राजकारणी लाट ओसरल्यावर कुठे फेकला जातो हे कळत सुद्धा नाही. पण नीतीहीन माध्यमे कोणालाच जबाबदार असत नाही. मुद्रित माध्यमांनी अजून तरी पत्रकारितेचे सारे नीती नियम धाब्यावर बसविले नाहीत , पण नव्याने आलेल्या दृकश्राव्य माध्यमांनी पत्रकारितेचे सगळे नीती नियम धाब्यावर बसवून कामकाज सुरु केल्याने एकांगी जनमत आणि उन्मादी जनमत तयार होवू लागले आहे. भारत आणि अमेरिकेतील लोकशाही वर्तनात टोकाचा फरक असण्यात माध्यमांची भूमिका महत्वाची आहे. ज्याने लोकशाहीचे रक्षण आणि संवर्धन करायचे असते तीच माध्यमे आपल्या बेताल वृत्तांकनाने लोकशाहीला धोका निर्माण करू लागले आहेत. जे एन यु प्रकरणाने माध्यमांनी लोकशाही समोर निर्माण केलेल्या आव्हानाचा प्रश्न टोकदार बनून ठळकपणे पुढे आला आहे. याचा वेळीच विचार करून उपाययोजना केल्या नाहीत तर ही माध्यमे लोकशाहीसाठी भस्मासुर बनल्या शिवाय राहणार नाहीत. 

लोकशाही मध्ये मत-मतांतरे असतात . पटत नसली तरी ती ऐकून घेतली पाहिजे. त्याला समर्पक उत्तरही देता आले पाहिजे. जे एन यु मध्ये काय घडले , कोणत्या घोषणा झाल्यात याबाबत मत-मतांतरे आहेत. खरे तर सत्य काय आहे ते सांगण्याची , लोकांपुढे ठेवण्याची माध्यमांची जबाबदारी होती. जे एन यु प्रकरणी हे सांगताना माध्यमांनी अनैतिक वर्तन केले हे उघडकीस आले आहे. आता या घटने बाबत व्हिडिओ चा एवढा सुळसुळाट झाला आहे कि काय खरे काय खोटे याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे. संभ्रम दूर करण्याची ज्यांची जबाबदारी होती त्या माध्यमांनीच हा संभ्रम निर्माण केला आहे. झी न्यूजच्या ज्या निर्मात्याने जे एन यु घटनेचे चित्रण केले त्याने तोंड उघडले नसते तर माध्यमांच्या बदमाशीवर बोट ठेवणे कठीण गेले असते. तिथे कोणी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या नव्हत्या . पोलीस अहवालही हेच सांगतो. झी न्यूजने ती घोषणा टाकून हजार वेळा ऐकवून जनमत जे एन यु व तिथल्या विद्यार्थी नेत्यांविरुद्ध तापविले होते. इतर माध्यमांनी झी ने वाजविलेली कैसेट वाजवून जे एन यु विरुद्ध वातावरण तापविले होते. चैनेलच्या स्टुडीओत उन्मादी वातावरण निर्माण करून त्याचा फैलाव देशात होईल याची चोख व्यवस्था माध्यमांनी केली. या माध्यमांनी अण्णा आंदोलनाला कृत्रिम मार्गाने जितक्या उंचीवर नेवून ठेवले होते त्याच्या उलटे जे एन यु च्या बाबतीत करून आपण कोणत्या थराला जावून एखादे प्रकरण चिघळवू शकतो हे दाखवून दिले. कुठल्याही प्रकारचा उन्माद निर्माण न होणे , कोणाच्या जीविताला किंवा कोणाच्या भवितव्याला धोका निर्माण होणार नाही या पद्धतीने बातम्या देणे हे माध्यमांचे कर्तव्य होते आणि या कर्तव्याला हरताळ फासून माध्यमांनी अण्णा आंदोलनाच्या वेळेस निर्माण केली होती तशी अराजकसदृश्य परिस्थिती निर्माण केली. माध्यमांना आपल्या आसुरी शक्तीची जाणीव होणे आणि त्या शक्तीचा उपयोग करण्याची इच्छा होणे याला अनिष्टाची चाहूल समजले पाहिजे. जे काही वृत्त देवू त्यात सत्यता असली पाहिजे. वृत्त अचूक असले पाहिजे. वृत्त निष्पक्ष आणि वस्तुनिष्ठ असले पाहिजे हे वृत्त संकलन आणि वृत्त निवेदन करतानाचे मुलभूत पथ्य आहेत जी दृकश्राव्य माध्यमे बेदरकारपणे पायदळी तुडवीत आहेत. लोकशाहीला धोका मोदी आणि त्यांच्या सरकारपासून कमी आणि अशा बेजबाबदार माध्यमांपासून जास्त आहे. प्रत्येक सरकार आपल्या विरुद्धचा असंतोष चिरडण्यासाठी देशद्रोहाच्या कायद्याचा वापर करीत असते. मोदी सरकारने तेच केले आहे.

माध्यमांनी वर्णन केल्याप्रमाणे जे एन यु मध्ये सगळे घडले हे मान्य केले तरी लोकशाही राष्ट्रात काय होणे अपेक्षित आहे या अंगाने कोणीच विचार करीत नाही. घटना घडली तेव्हा पोलीस तिथे हजर असल्याचे दिसत होते. अगदी त्याक्षणी कारवाई करणे शक्य नव्हते हे मान्य केले तरी घोषणा देणारे कोण याची माहिती त्यांना नक्कीच मिळविता आली असती. विद्यापीठ प्रशासनाच्या मदतीने दोषी विद्यार्थ्यांना ताब्यात घेवून गुन्हे नोंदविता आले असते. पण सरकार , त्याचे पोलीस आणि माध्यमे या सर्वांचे वर्तन कायदेशीर कारवाई करण्यापेक्षा बेकायदेशीर कारवाईला प्रोत्साहन देणे , कायदा हातात घेण्यास प्रोत्साहन देणे अशा प्रकारचे होते. याचे परिणाम सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाची अवहेलना करण्यात झाली. कायद्याच्या राज्याला मिळालेले हे मोठे आव्हान आहे आणि असे आव्हान निर्माण करण्यात लोकशाहीचा आधारस्तंभ म्हणविल्या जाणाऱ्या माध्यमांचा मोठा वाटा आहे. लोकशाहीचे रक्षण करण्यात सरकार , पोलीस आणि माध्यमे असमर्थ ठरत आहेत अशी धोक्याची घंटा जे एन यु प्रकरणामुळे वाजली आहे. मात्र राष्ट्रवादाच्या बडविल्या जात असलेल्या ढोलताशांच्या आवाजात धोक्याची ही घंटा ऐकू येईनाशी झाली आहे.
-------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव , पांढरकवडा , जि. यवतमाळ
मोबाईल - ९४२२१६८१५८
----------------------------------------------------------------------------------

Thursday, February 18, 2016

राष्ट्रीय एकात्मतेच्या प्रतिकावर हल्लाबोल

संघ स्वयंसेवक चुकतो तेव्हा संघाचे मार्गदर्शक मा.गो. वैद्य यांचे मते संघ नाही तर संघ स्वयंसेवक तेवढा नापास ठरतो . जवाहरलाल नेहरू विद्यापीठा बद्दल मात्र संघाचे असे मत नाही. तिथल्या बोटावर मोजण्या इतक्या विद्यार्थ्यानी चूक केली तर ती त्या विद्यार्थ्यांची चूक नसते तर संपूर्ण विद्यापीठाची चूक असते आणि त्यासाठी ते विद्यापीठच बंद करण्याची मागणी संघ करतो. जेएनयु बद्दल असा दुटप्पी आणि टोकाचा विचार संघपरिवार का करतो ?
---------------------------------------------------------------

दिल्ली येथील आंतरारष्ट्रीय ख्याती प्राप्त जेएनयु या संक्षिप्त नावाने ओळखले जाणारे जवाहरलाल नेहरू केंद्रीय विद्यापीठ हे वादाच्या आणि वादळाच्या भोवऱ्यात सापडले आहे. या विद्यापीठाची ज्यांना ओळख आहे अशा प्रत्येक पालकांना आपल्या पाल्याला या विद्यापीठात प्रवेश मिळावा आणि या विद्यापीठातून शिकून तो बाहेर पडावा अशी इच्छा असते. या विद्यापीठाने देशाला चांगले राजकारणी , चांगले प्रशासक , कर्तव्यदक्ष अधिकारी , सिद्धहस्त लेखक - पत्रकार , कुशल संघटक आणि आंदोलक या देशाला दिले आहेत. प्रधानमंत्री मोदी सत्तेत आल्यानंतर परराष्ट्र धोरण , देशाची सुरक्षितता आणि आर्थिक धोरण ठरविण्याच्या मोक्याच्या जागी जेएनयु मध्ये शिकलेल्या अधिकाऱ्यांची निवड केली यावरूनही जेएनयुचे महत्व लक्षात येते. देशात घडणाऱ्या प्रत्येक घटनांचे प्रतिसाद जिथे उमटतात , त्यावर विचार आणि वाद-चर्चा होतात , प्रसंगी आंदोलनेही होतात असे हे देशातील एकमेव विद्यापीठ आहे. समाजकारण आणि राजकारण याचे धडे वर्गातून नव्हे तर इथल्या परिसरातून आणि परिसरात चाललेल्या विविध कृती कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना मिळत असतात. बाहेरच्या चर्चा , कार्यक्रम जेवढ्या गांभीर्याने होतात तितक्याच गांभीर्याने वर्गात अभ्यास विषयक चर्चा होतात. इथले विद्यार्थी - शिक्षक अभ्यासेतर कार्यक्रमातच आघाडीवर नसतात तर अभ्यासातही आघाडीवर असतात. त्यामुळे या विद्यापीठाला विद्यापीठाचे सर्वांगीण मुल्यांकन करणाऱ्या समितीकडून सर्वोच्च मानांकन प्राप्त होत आले आहे. माझा मुलगा आणि सून या विद्यापीठात शिकले असल्याने दशका पेक्षा अधिक काळ हे विद्यापीठ जवळून पाहता आले. या विद्यापीठातील चांगल्या घटना , चांगले प्रसंग शेकड्याने सांगता येतील.                                                                              

या पार्श्वभूमीवर जेएनयु मध्ये घडलेल्या दोन घटना या विद्यापीठाच्या सर्व चाहत्यांना व्यथित करणाऱ्या , धक्का देणाऱ्या ठरल्या आहेत. पुरावे नसते तर जेएनयु मध्ये असे घडू शकते यावर कोणाचाच विश्वास बसला नसता. निव्वळ अकल्पनीय अशा या घटना वाटतात. पहिली घटना साधारणत: दोन वर्षापूर्वी घडली. एका विद्यार्थ्याने एकतर्फी प्रेमातून म्हणा की प्रेमभंगातून म्हणा वर्गातच वर्ग मैत्रिणीवर हल्ला करून तीला गंभीर जखमी केले आणि स्वत: आत्महत्या केली. मुलामुलीतील मोकळेपणा , त्यांच्यातील समानतेची वागणूक हे या विद्यापीठाचे विशेष असे वैशिष्ट्य आहे. एवढी समानता आणि मोकळेपणा देशात कुठेही आढळणार नाही. मुलींसाठी हा विद्यापीठ परिसर म्हणजे देशातील एकमेव सुरक्षित परिसर आहे असे म्हंटले तर अतिशयोक्ती होणार नाही . झाडीनी व्यापलेल्या विद्यापीठ परिसरात एकटी मुलगी कुठेही आणि केव्हाही जावू शकते असे वातावरण असलेल्या या विद्यापीठात विद्यापीठाचाच एक विद्यार्थी आपल्याच वर्गमैत्रिणीवर हल्ला करतो ही जेएनयु वासियांसाठीच नव्हे तर जेएनयु माहित असलेल्या प्रत्येकासाठी प्रचंड धक्कादायक अशी बाब होती. आणि आता दुसरी अस्वस्थ करणारी घटना घडली आहे.

देशाची सामाजिक , आर्थिक आणि राजकीय रचना कशी असली पाहिजे याचा विद्यार्थी पातळीवर सखोल , चौफेर आणि गांभीर्याने कुठे विचार होत असेल तर तो जेएनयु मध्ये होतो असे नि:संदिग्धपणे सांगता येईल. इथे अनेक नव्हे तर देशाच्या कुठल्याही कोपऱ्यात आढळणारा प्रत्येक विचारप्रवाह जेएनयु मध्ये हमखास आढळेल. इतके विविध आणि व्यापक विचारप्रवाहांनी भरलेले आणि भारलेले हे विद्यापीठ आहे. डाव्यांची विचारधारा इथे प्रबळ आहेच , पण इतर सर्व विचारधारा कमकुवत किंवा दुर्लक्षणीय नाहीत. त्यामुळे देश कसा असावा या बाबत इथे विविध विचार व्यक्त होत असतात. पण जो काही विचार व्यक्त होतो तो देशाच्या भल्याचाच होतो. देशद्रोही विचाराला जेएनयु ने कधीच थारा दिला नाही. या पार्श्वभूमीवर तिथे भारत विरोधी घोषणा ऐकायला मिळणे अस्वस्थ करणारी बाब आहे. विद्यार्थ्याच्या एका अत्यल्प संख्येतील गटाने अशा घोषणा दिल्या असतील , काही बाहेरचे त्यात सामील झाले असतील हे खरे मानले तरी अशा घोषणांनी बसणारा धक्का कमी होत नाही. हा धक्का मोठा आहे कारण जेएनयु सारख्या ठिकाणी असे घडणे अपेक्षित नाही. वर वर्णन केलेली पहिली घटना जेएनयु साठी जितकी अनपेक्षित तितकीच अनपेक्षित आणि अविश्वसनीय वाटावी अशी ही घटना आहे. जेएनयु चा उज्वल इतिहास बघता या घटनेने संताप येणे स्वाभाविक आहे. पण जेएनयु सारख्या ठिकाणी असे घडणे हा संतापापेक्षा चिंतेचा आणि चिंतनाचा विषय ठरायला हवा. घटनेवर ज्या प्रतिक्रिया उमटत आहे त्यात चिंता आणि चिंतन कमी आणि हिशेब चुकते करण्याचे राजकारण अधिक होत आहे. घडलेली घटना जेवढी अतिरेकी आहे त्यावर उमटणाऱ्या प्रतिक्रिया त्यापेक्षा जास्त अतिरेकी आहेत. जे काही घडले ते जाहीरपणे घडले. त्याचे चित्रीकरणही झाले आहे. जे घडले ते गुन्हा या प्रकरणात मोडणारे आहेत आणि हा गुन्हा करणारे कोण आहेत हे शोधून त्यावर तत्परतेने कारवाई व्हायला हवी याबाबत दुमत असू शकत नाही. अशी कारवाई होत नसेल तर त्यासाठी आंदोलन करून दबाव आणायला हरकत नाही. पण गुन्हेगाराला पकडून न्यायालयात उभे करण्याची मागणी करण्या ऐवजी काही गट स्वत: न्यायधीश बनून निवाडा करू लागले आहेत आणि शिक्षाही करू लागले आहेत. गुन्हेगारांना पकडणे आणि त्यांच्यावर कारवाई करणे बाजूला राहिले आणि संघपरिवाराने घटनेचा फायदा उठवीत आपला अजेंडा राबविणे सुरु केले. स्वत:च्या कपाळावर देशभक्तीचा शिक्का स्वत:च्या हाताने मारून घ्यायचा आणि दुसऱ्याच्या पाठीवर देशद्रोहाचा शिक्का मारण्याचा सवंग  खेळ या लोकांनी सुरु केला आहे. यात संघपरिवार आघाडीवर आहे.  बोटावर मोजण्या इतक्या टाळक्यांच्या घोषणासाठी विद्यापीठातील प्रत्येक विद्यार्थी , शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्याला देशद्रोही ठरवून विद्यापीठच बंद करण्याची मागणी या परिवारातील लोक आणि संघटना करू लागल्या आहेत. हा केवळ आक्रस्ताळेपणा नाही . नियोजनबद्ध खेळी आहे. संघपरिवाराची ही खेळी वेळीच ओळखण्याची गरज या निमित्ताने निर्माण झाली आहे.

एखाद्या घरात एखाद्याने गुन्हा केला तर त्यासाठी संपूर्ण घराला जबाबदार धरल्या जात नाही. अनेक संस्थामधून गुन्हेगारी प्रकरणे घडत असतात तेव्हा गुन्हे करणारा बाजूला काढल्या जातो , त्यासाठी सर्व संस्थेला कधी जबाबदार धरल्या जात नाही. काही दिवसापूर्वी  पठाणकोट येथील वायुदलाच्या तळावर आतंकवादी हल्ला झाला त्यात पोलीस अधीक्षकांनीच आतंकवाद्यांना मदत केल्याचे सकृतदर्शनी पुरावे आहेत. जर ते खरे असेल तर काय आपण साऱ्या पोलीसदलाला देशद्रोही समजणार आहोत का ? खुद्द संघ परिवाराचे काय ? मध्यप्रदेशच्या व्यापम घोटाळ्यात संघ कार्यकर्त्याचा सहभाग उघड झाला आहे. काही कार्यकर्ते या घोटाळ्यात सामील आहेत म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाच भ्रष्टाचारी ठरविणे न्यायसंगत आणि विवेकसंगत ठरेल का ? मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपींना सहीसलामत बाहेर आणण्याची सिद्धता मोदीकाळात झाली असली तरी चुकून न्यायालयाने यातील आरोपींना शिक्षा केली तर सगळ्या संघपरिवारावर आतंकवादी असल्याचा शिक्का मारणे मुळीच न्यायोचित ठरणार नाही. मागे २-३ बेकायदेशीर प्रकरणात संघ स्वयंसेवक सापडले तेव्हा संघाचे मार्गदर्शक असलेले मा.गो. वैद्यची प्रतिक्रिया होती - संघस्वयंसेवक नापास झाला ! त्यांनी संपूर्ण संघाला नापास नव्हते केले . घोषणा देणारे ५-१० विद्यार्थी जेएनयु मध्ये आहे म्हणून जेएनयु देशद्रोही ठरत असेल तर मग याच तर्कटाने जेएनयु भारतात आहे म्हणून सारे भारतीय नागरिकच देशद्रोही नाही का ठरणार ! तेव्हा बोटावर मोजण्या इतक्या लोकांनी जेएनयु मध्ये देशविरोधी घोषणाबाजी केली तर जेएनयु मधील प्रत्येक विद्यार्थी , शिक्षक आणि कर्मचारी देशद्रोही कसा ठरतो याचा सामान्यजनानी शांतपणे विचार केला पाहिजे. संपूर्ण जेएनयु ला देशद्रोही समजून देशद्रोह्याचा हा अड्डा बंद झाला पाहिजे अशी मागणी कितपत न्यायोचित आहे याचा नागरिकांनी विचार केला पाहिजे. नागरिक असा विचार करतील तर त्यांना संघाचे या मागणी मागचे कारस्थान लक्षात यायला वेळ लागणार नाही. संघपरिवार  दोषींना शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी करण्या ऐवजी संपूर्ण जेएनयु ला दोषी ठरवून बंद करण्याची मागणी का करू लागला आहे हे देखील समजून घेतले पाहिजे. या मागणीचे मूळ आपल्याला संघाचे वैचारिक गुरु गोळवलकर गुरुजींच्या विचारधनात आढळेल. संघाचे जे काही विचारधन आहे ते गोळवलकर गुरुजींनी लिहून ठेवले तेवढेच आहे. मुसलमान आणि कम्युनिस्ट आपले शत्रू आहेत हे गुरुजींनी लिहून ठेवले आहे. जेएनयु मध्ये त्याच्या स्थापणेपासून आजतागायत कम्युनिस्ट विचाराच्या विद्यार्थी संघटनांचे वर्चस्व राहिले आहे. दिल्लीतील दिल्ली विद्यापीठात बऱ्यापैकी वर्चस्व राखून असलेल्या संघपरिवाराच्या विद्यार्थी परिषदेला जेएनयु मध्ये प्रयत्न करूनही वर्चस्व मिळविता आले नाही हे शल्य या परिवाराला सतत बोचत आले आहे. त्यांना वर्चस्व निर्माण करता आले नाही एवढेच दुखणे नाही. सातत्याने संघाच्या विचारधारेवर प्रहार येथून होत आल्याने या विद्यापीठाचे अस्तित्व संघपरिवाराच्या डोळ्यात खुपत आले आहे. प्रजासत्ताक दिन काळा दिवस म्हणून पाळणारी आणि तिरंग्याचा अवमान करणारी हिंदुमहासभा संघाला देशद्रोही वाटत नाही. यावर एका शब्दाने कोणी संघजन बोलत नाही आणि जेएनयु ला देशद्रोही ठरविण्यासाठी मात्र ही मंडळी गदारोळ करीत आहेत ते का हे समजून घेतले पाहिजे. ज्या कन्हैयाकुमारला या प्रकरणात देशद्रोहाच्या आरोपावरून अटक करण्यात आली त्याचे अटकेपूर्वीचे भाषण ऐकले तर जेएनयु परिसरात संघाचा किती पुरजोर विरोध होतो हे कळेल. घोषणा प्रकरणात गुंतलेल्या ५-१० आरोपींना शिक्षा होण्यात संघाला रस नाही. या निमित्ताने त्यांना हे विद्यापीठ लोकांच्या नजरेतून उतरवून बंद करण्यात विशेष रस का आहे हे वाचकाच्या लक्षात येईल.

नुसता संघाचा कावा ओळखून उपयोग नाही. जेएनयु काय आहे हे सुद्धा समजून घेतले पाहिजे. ते समजून घेतले तर लक्षात येईल कि जेएनयु हे राष्ट्रद्रोहाचे नाही तर राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक आहे. या विद्यापीठात देशाच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी येतात. देशाच्या मुख्यप्रवाहात नसलेल्या उत्तरपूर्वेतील आणि काश्मिर सारख्या प्रांतातील विद्यार्थी येथे येतात. खऱ्या अर्थाने राष्ट्रदर्शन जेएनयु मध्ये घडते. देशभरातील विद्यार्थी येथे येतात एवढेच नाही तर देशभरातील साऱ्या विचारधारा येथे गुण्यागोविंदाने नांदतात हे विशेष. तसे पाहिले तर उदारवादासाठी संघा इतकेच कम्युनिस्टजन देखील प्रतिकूल आहेत. पण जेएनयु मध्ये मात्र चित्र वेगळे आहे. कम्युनिस्टांच्या विद्यार्थी संघटना प्रबळ असताना देखील जेएनयु मध्ये उदारवादाचा प्रवाह अखंड वाहत असतो. हा प्रवाह अडविण्याचा प्रयत्न आणि हिम्मत तेथील कोणत्याच संघटनेने कधीच केली नाही. आज संघपरिवार जेएनयु ला संपविण्याची जी खेळी करत आहे त्या खेळीला जेएनयु मधील अभाविपच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देवून विरोध केला ही जेएनयु ची खरी ताकद आहे.  जेएनयु हे देशकल्याणाच्या प्रागतिक विचाराचे केंद्र आहे . उदारवादाचा स्त्रोत आहे. मुठभर विद्यार्थ्यांच्या आततायी आणि आत्मघातकी कृतीबद्दल त्यांना कायद्यानुसार शिक्षा झाली पाहिजे आणि तशी ती होईलही. खरी गरज आहे मुठभर विद्यार्थ्यांच्या चुकीचे निमित्त करून जेएनयु सारख्या आगळ्यावेगळ्या विद्यापिठावरून नांगर फिरवायला निघालेल्या संघजनाचा देशभक्तीच्या बुरख्याआड लपलेला हेतू ओळखण्याची.

-------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव , पांढरकवडा , जि. यवतमाळ

मोबाईल - ९४२२१६८१५८
--------------------------------------------------------------------------

Thursday, February 4, 2016

रोजगाराची निरर्थक हमी


रोजगार हमी योजनाच्या कामांसाठी मजूर मिळत नाहीत. तरीही कागदोपत्री दरवर्षी मजुरांच्या संख्येत आणि योजनेवरील खर्चात वाढ होताना दिसते. अशी वाढ झाल्याचे दाखविणे ही सरकारांसाठी अभिमानाची गोष्ट असते. या योजनेला कॉंग्रेसच्या अपयशाचे स्मारक समजणारे मोदी सरकारही योजनेचे मूल्यमापन न करता योजनेवर कॉंग्रेसपेक्षा अधिक खर्च करीत असल्याचे सांगण्यात धन्यता मानत आहे. ही योजना  राजकीय गरजेची बनल्याचे मोदी सरकारच्या भूमिकेने स्पष्ट झाले आहे.
---------------------------------------------------


महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेला नुकतीच १० वर्षे पूर्ण झालीत. मनमोहन काळात २००६ साली ग्रामीण भागात रोजगाराची हमी देणारी ही योजना राष्ट्रीय पातळीवर सुरु झाली. त्यापूर्वी सुमारे ३४ वर्षापासून महाराष्ट्र राज्यात रोजगार हमी योजना राबविण्यात येत होती. 'रोजगार हमी - अर्धे तुम्ही अर्धे आम्ही ' अशी खिल्ली या योजनेची उडविली जायची आणि आजही उडविली जाते. याचा अर्थ काम करायची गरज नाही. हजेरी पटावर सही करायची . निम्मे पैसे घ्यायचे आणि निम्मे पैसे सरकारी यंत्रणेला दक्षिणा म्हणून द्यायचे. महाराष्ट्रात असे प्रकार मोठ्या प्रमाणावर झाले हे खरे असले तरी दुष्काळा सारख्या विपरीत परिस्थितीत आणि रोजगारासाठी शहरी भागात जावू शकत नसणाऱ्या ग्रामिणांसाठी ही योजना वरदान ठरली होती हे अमान्य करता येणार नाही. ऐन १९७२ च्या दुष्काळात सुरु झालेल्या या योजनेने शेतकरी शेतमजुरांना तारले होते. नंतर बदललेली गरज आणि होणाऱ्या आर्थिक बदला सोबत रोजगार हमीच्या कामाचे स्वरूप बदलण्याची गरज लक्षात न घेता योजना चालू राहिल्याने निर्माण झालेल्या दोषांनी ही योजना पोखरून टाकली.  दुरून डोंगर साजरे दिसतात त्याप्रमाणे दुरून योजनेकडे पाहणाराना ही योजना क्रांतिकारी वाटली तर त्यात नवल नाही. जागतिक पातळीवर योजनेचे असेच कौतुक झाल्याने केंद्र सरकारला राष्ट्रीय पातळीवर ही योजना राबवावी वाटणे स्वाभाविक होते. योजना राष्ट्रीय पातळीवर गेली तसे योजनेवरील वादाचे स्वरूपही राष्ट्रीय झाले. गेल्याच वर्षी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय रोजगार हमीला कॉंग्रेसच्या अपयशाचे स्मारक म्हंटले होते. कॉंग्रेसला आपल्या अपयशाचे सतत दर्शन व्हावे यासाठी आपण ही योजना पुढे चालू ठेवणार आहोत असे त्यांनी म्हंटले होते. रोजगारासाठी आणि अर्थकारणासाठी ही योजना उपयुक्त नाही असाच अर्थ प्रधानमंत्र्याच्या विधानातून ध्वनित होतो. असे बोलल्या नंतर लगेचच काही दिवसांनी मोदी सरकारने राष्ट्रीय रोजगार हमी योजनेसाठी रक्कम वाढवून दिली होती. एवढेच नव्हे तर राष्ट्रीय रोजगार हमीच्या दशकपूर्ती निमित्त झालेल्या कार्यक्रमात मोदी सरकारच्या मंत्र्यांनी या योजनेची गोडवे गायली आहेत. दशकपूर्तीच्या निमित्ताने कॉंग्रेसने देखील कार्यक्रमाचे आयोजन करीत आपण सुरु केलेल्या या क्रांतिकारी योजनेचा गळा घोटण्याचे काम मोदी सरकार करीत असल्याचा आरोप केला आहे. या दोन्ही प्रमुख पक्षाचे एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोप पाहता आणि आमच्या काळात अधिक चांगल्या रीतीने योजना राबविली जात होती किंवा जात आहे असे दावे - प्रतिदावे लक्षात घेतले तर दोहोंचीही रोजगार हमी योजनेचे कठोर मूल्यमापन करण्याची तयारी नाही असे स्पष्ट दिसते. सरकारचा  गरीब प्रेमी पुरोगामी चेहरा दर्शविणारी ही योजना असल्याने कॉंग्रेसचे हे स्मारक चांगल्या स्थितीत ठेवणे ही योजनेवर टीका करणाऱ्या मोदींची राजकीय अपरिहार्यता बनली आहे. यामुळे ग्रामीण भागातील रोजगाराबाबत रोजगार हमी योजने पेक्षा वेगळा विचार करण्याची आणि तो अंमलात आणण्याची संधी मात्र मोदी आणि त्यांच्या सरकारने गमावली आहे. 


महाराष्ट्रात जेव्हा ही योजना सुरु झाली तेव्हाच्या आर्थिक परिस्थितीत आणि ग्रामीण रोजगाराच्या गरजपूर्तीत या योजनेने महत्वाची भूमिका बजावली. १९७० च्या दशकाच्या आरंभी सुरु झालेल्या या योजनेने महाराष्ट्रातील १९७२ च्या दुष्काळात शेतकरी व शेतमजूर या दोहोनाही मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून दिला. या रोजगाराचे दृश्य परिणाम देखील दिसले. खडीफोडीच्या कामामुळे ग्रामीण भागातील रस्ते तयार करण्यास गती आली. त्यानंतर योजने अंतर्गत मृदसंधारणाची कामे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात झालीत. गावतळे, पाझर तलाव यासारखी कामे झालीत. याचा फायदा शेतीला आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या सर्वाना झाला. अन्न-धान्याच्या टंचाईच्या काळात मजुरी म्हणून पैशासोबत धान्याचे कुपन्स मिळाल्याने उपासमार टळली. सुरुवातीच्या काळात या योजनेमुळे शेतकरी-शेतमजूर असा संघर्ष झाला नाही. कारण विपरीत परिस्थितीत दोघांच्या हिताची काळजी या योजनेने घेतली होती. पण पुढे परिस्थिती बदलली . हरितक्रांती आली. हरितक्रांतीने शेतीतील कामे वाढली. दुसरीकडे यांत्रिक क्रांतीही आली. त्यामुळे खोदकाम किंवा खडी फोडण्यासारखी कष्टाची कामे हाताने करणे हे कालापव्यय करणारे आणि आर्थिकदृष्ट्या न परवडणारी ठरली. अशा परिस्थितीत रोजगार हमीच्या कामात कालानुरूप बदल करून हरितक्रांतीशी सुसंगत रोजगाराची हमी गरजेची होती. तसे बदल झाले असते तर रोजगार हमी सुरुवातीच्या काळात जशी शेतकरी आणि शेतमजूर दोघानाही पूरक होती तशीच ती पुढेही राहिली असती. आर्थिक बदला सोबत योजनेत बदल न झाल्याने ही योजना शेतकऱ्यांच्या असंतोषाची धनी झाली आणि यातून सुमारे दशकभर महाराष्ट्रात शेतकरी-शेतमजूर संघर्ष झालेत. रोजगार हमीच्या पर्यायामुळे शेतीतील मजूर मजुरी वाढविण्याच्या मागणीसाठी संघटीत होवून संघर्ष करू लागले. शेतीतील तोट्यामुळे जास्त मजुरी देणे हे शेतकऱ्याच्या आवाक्या बाहेर होते. यातून हा संघर्ष पेटला होता. या संघर्षाना पूर्णविराम दिला तो शरद जोशींच्या नेतृत्वाखाली झालेल्या शेतकरी आंदोलनाने. या संघर्षाला कारण शेतीचे तोट्याचे अर्थकारण आहे हे शेतकरी व शेतमजुरांना पटवून देण्यात शेतकरी आंदोलन यशस्वी झाले होते. आता महाराष्ट्रात शेतकरी-शेतमजूर संघर्ष होत नाहीत. उस तोडणी कामगारांचा संघर्ष सुरु असतो पण तो साखर कारखान्याशी. शेतकरी-शेतमजूर असे संघर्ष थांबले असले तरी शेतकऱ्यांच्या मनात या योजनेविषयी कटू भाव आहेत. या योजनेमुळे आपल्याला न परवडणारी  मजुरी द्यावी लागते किंवा शेतीत कामासाठी मजूर मिळत नाहीत अशी शेतकरी समुदायाची भावना आहे. मात्र ही भावना वास्तवाला धरून नाही. कारण ज्या रोजगार हमी योजनेमुळे शेतीतील कामासाठी मजूर मिळत नाही असे त्यांना वाटते त्या रोजगार हमीच्या कामासाठी देखील मजूर मिळत नाहीत हे वास्तव आहे !


रोजगार हमीच्या कामासाठी मजूर मिळत नाहीत तरीही कागदोपत्री रोजगार हमीवर जाणाऱ्या मजुरांची संख्या दरवर्षी वाढताना दिसते. योजनेवर होणारा खर्च देखील वाढलेला असतो. असे होताना दिसते  याचे कारण भ्रष्टाचार ! मानवी प्रवृत्ती एवढेच या भ्रष्टाचाराचे कारण नाही. रोजगार हमीच्या कामाचे स्वरूप बदलण्यात आलेले अपयश हे त्यामागचे खरे कारण आहे. त्यामुळे रोजगार हमीची कामे मजुरांकडून करून घेण्या ऐवजी मजुरांच्या हाती थोडे पैसे देवून यंत्राने काम करून घेणे फायदेशीर ठरते. आता मजुरांचे संघर्ष होतात ते अशा न केलेल्या पण त्यांच्या नावावर झालेल्या कामाची मजुरी मिळविण्यासाठी ! सध्या मराठवाड्यात पडलेला दुष्काळ तीव्र या सदरात मोडणारा असूनही तिथे रोजगार हमीच्या कामाची मोठ्या प्रमाणावर मागणी होते आहे किंवा ७२ च्या दुष्काळात जशी सर्वत्र रोजगार हमीची कामे सुरु असलेली दिसायची तशी परिस्थिती यावेळच्या दुष्काळात आढळून येत नाही. तरीही आहे त्या स्वरुपात ही योजना राबविण्याचा अट्टाहास सुरु आहे. अगदीच दुर्गम समजल्या जाणाऱ्या भागात जिथे पर्यायी रोजगाराची संधीच नाही तिथे किंवा पर्यायी रोजगारासाठी गाव सोडून जावू शकत नाहीत अशांसाठी या योजनेची आजही उपयुक्तता असली तरी या मर्यादेत योजना चालविण्या ऐवजी त्याला राष्ट्रीय स्वरूप देणे अनावश्यक होते. आदर्श समजली जाणारी रोजगार हमी योजना राबविणाऱ्या महाराष्ट्राची ही स्थिती लक्षात न घेता त्याची नक्कल राष्ट्रीय पातळीवर करण्यात आली आहे. त्यामुळे योजनेचे महाराष्ट्रात जे चित्र आहे त्यापेक्षा वेगळे राष्ट्रीय पातळीवर असणार नाही हे उघड आहे. आज ग्रामीण भागात कायदेशीर रोजगार हमीची नाही तर प्रत्यक्षातील रोजगार शाश्वतीची गरज आहे. रोजगार हमीतील रोजगारापेक्षा अधिक उन्नत स्वरूपाच्या व अधिक मोबदला देणाऱ्या रोजगाराची गरज आहे. शेतीतल्या कामातून असा रोजगार मिळणे शक्य नाही. अशा रोजगाराची संभावना शेती उद्योगात आणि शेतीजन्य उत्पन्नाच्या व्यापारात आहे. ग्रामीण भागात कुशल मजूर तयार करून त्यांच्या कौशल्याला वाव देणाऱ्या रोजगाराची गरज आहे. रोजगार हमी ही एके काळी नितांत गरजेची आदर्श अशी योजना असली तरी आज तिची उपयुक्तता संपली आहे. प्रधानमंत्री मोदी म्हणतात त्या अर्थाने नव्हे तर चांगल्या अर्थाने ऐन गरजेच्या वेळी लाखो ग्रामीनांच्या कामी पडलेल्या या योजनेचे खरोखर स्मारक उभारण्याची गरज आहे. इतिहासात ज्यांनी ऐतिहासिक कामगिरी केली त्यांचेच स्मारक उभारले जातात. योजनेचे स्मारक बनविण्या ऐवजी ती सुरु ठेवली तर ते विकासाच्या गळ्यातील भ्रष्टाचाराने बरबटलेले लोढणे ठरणार आहे. हे लोढणे काढून टाकून देवून विकासाच्या मार्गावर वेगाने जाता येईल अशी पर्यायी योजना देण्याची ऐतिहासिक संधी मोदी सरकारने गमावली आहे. मुळात शेती क्षेत्रात व्यापक सुधारणा राबविण्याची अनिच्छाच आहे त्या स्वरुपात रोजगार हमी योजना चालू ठेवण्यामागे आहे आणि ही अनिच्छाच शेती आणि ग्रामीणभागातील दुखण्याचे मूळ आहे .


---------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव , पांढरकवडा , जि. यवतमाळ 

मोबाईल - ९४२२१६८१५८
-----------------------------------------------------------------------

Wednesday, January 27, 2016

मोदी सरकार आणि संघसंस्थात संघर्ष

मनमोहन सरकारच्या शेवटच्या काळात सरकार आणि संघटना यांच्यातील विसंवादाने सरकार ठप्प झाले होते. मोदी सरकारच्या सुरुवातीच्या काळातच तो धोका निर्माण झाला आहे. अर्थकारणाला गती देण्याचा प्रधानमंत्री मोदी यांचा प्रयत्न संघपरिवारातील संघटना धार्मिक मुद्दे पुढे करून असफल करीत असल्याने अर्थव्यवस्थेची घसरण सुरुच आहे.
----------------------------------------------------------------------------

मनमोहन सरकारच्या शेवटच्या २-३ वर्षात अनेक महत्वाच्या प्रश्नावर सरकार आणि पक्ष संघटना यांच्यातील मत भिन्नतेने अनिर्णयाची परिस्थिती उत्पन्न होवून सरकार जवळपास ठप्प झाल्याची , निष्क्रिय झाल्याची भावना निर्माण झाली होती. एकीकडे सरकारची बोचणारी निष्क्रियता आणि दुसरीकडे फक्त वाढत्या भ्रष्टाचाराची चर्चा यामुळे मनमोहन सरकारचे पतन होवून कॉंग्रेसचे पानिपत झाले होते. मनमोहन काळात संघटना म्हणजे सोनिया आणि राहुल असे चित्र होते. सोनिया-राहुल यांच्या समाजवादी आणि स्वयंसेवी संस्था छाप विकासाच्या कल्पना आणि मनमोहन सरकारची मुक्त अर्थव्यवस्थेला पूरक धोरणे असा तो संघर्ष होता. राजकीय व आर्थिक वर्तुळात या खिचातानीची चर्चा असली तरी एक अपवाद वगळता त्यांच्यातील मतभेद त्यांनी कधीच जाहीरपणे व्यक्त होवू दिले नव्हते. अपवाद होता तो सरकारचा एक अध्यादेश जाहीरपणे फाडण्याचा राहुल गांधी यांच्या पोरकट प्रयत्नाचा. एरव्ही कॉंग्रेस संघटना आणि सरकार यांच्यातील खिचातानी सामान्य जनतेच्या चर्चेचा विषय कधी राहिली नाही. तरी अशा खिचातानीतून किंवा सरकारला आपल्या दिशेने खेचण्याचा पक्षाचा व सरकार प्रमुखाचा प्रयत्नात सरकार ठप्प होत असते  हे उदाहरण समोर असताना नवे सरकार आणि त्याला समर्थन देणाऱ्या संघटना यापासून काही शिकल्या आहेत असे वाटत नाही. सरकार आणि त्याला समर्थन देणाऱ्या संघटना विरुद्ध दिशेने कार्य करीत असल्याचे चित्र मोदी सरकारच्या पहिल्या ६ महिन्यातच स्पष्ट झाले होते. भारतीय जनता पक्षाची संघटना खिशात टाकण्यात प्रधानमंत्री मोदी यशस्वी झाले असले तरी संघपरिवारातील विविध व्यक्ती आणि संघटना कायम प्रधानमंत्र्याची डोकेदुखी ठरत आल्या आहेत. प्रधानमंत्र्याच्या विकासा संबंधी नव्या योजनेची घोषणा झाली रे झाली की परिवारातील व्यक्ती किंवा संघटनेने प्रधानमंत्र्याच्या घोषणेचे स्वागत नव्या धार्मिक कार्यक्रम किंवा घोषणेने होण्याची परंपरा मोदी सरकार सत्तारूढ झाल्यापासून पाहायला मिळत आहे. परिणाम असा होतो कि विकासा संबंधी योजनेची चर्चा चार दिवसात विरून जाते आणि महिनोंमहिने या संघटनांच्या धार्मिक घोषणांची चर्चा होत असते. सरकारच्या कार्यक्रमा ऐवजी अशा संघटनांच्या कार्यक्रमाची चर्चा व्हायला लागली कि या संघटनांचा सरकारवर प्रभाव आहे किंवा संघटना सरकारच्या वरचढ आहेत अशी भावना निर्माण व्हायला लागते. मनमोहन सरकारच्या १० वर्षाच्या काळात शेवटच्या दोन वर्षात पक्ष नेतृत्व सरकारवर कुरघोडी करीत असल्याची भावना प्रबळ झाली होती . मोदी सरकारच्या पहिल्या दोन वर्षातच अशी भावना प्रबळ होवू लागली आहे.

प्रधानमंत्री मोदींनी जनधन योजना जाहीर केली त्यावेळी संघपरिवारातील संघटनांनी "घर वापसी"चा विवादास्पद कार्यक्रम हाती घेतला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ओबामा भारतात आले तेव्हा त्यांचे लक्ष जनधन योजनेने नाही तर घर वापसी कार्यक्रमाने वेधले आणि प्रोटोकॉल बाजूला ठेवून जाता जाता त्याबद्दल मोदी सरकारला कानपिचक्या देवून गेले. मोदींनी 'मेक इन इंडिया'ची घोषणा केली तर त्याच्या उत्तरात परिवाराने गोमांसाचा प्रश्न महत्वाचा बनवून त्यावर देशभर धुमाकूळ घातला. 'मेक इन इंडिया'च्या बाबतीत पुढे काय झाले , काय सुरु आहे याची लोकांना माहिती नाही. मात्र या संघटनांचा गोमांस उद्योग सर्वाना माहित आहे. अखलाख प्रकरणाने तर ती चर्चा अगदी जगभर झाली. असहिष्णुतेचा डाग लागला. आता मोदीजी स्टार्टअप इंडिया या नव्या महत्वाकांक्षी विकासाभिमुख योजनेच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न करू लागले आहेत तर दुसरीकडे त्याहीपेक्षा जोरात संघपरिवारातील संघटनांनी राममंदीर उभारण्याची तयारी चालविली आहे. मोदी योजनेतील नव्या उद्योगाची सुरुवात व्हायचीच आहे , पण तिकडे राममंदिरासाठी दगड येवू लागले आहेत ! हे दगड अयोध्येत येवून पडू लागले असले तरी प्रत्यक्षात मोदींच्या नवे उद्योग सुरु करण्याच्या योजनेवरच पडणार हे दिसू लागले आहे. धार्मिक उन्माद निर्माण झाला कि विकास आणि आर्थिक कार्यक्रम बाजूला पडतात हा आजवरचा अनुभव आहे. राममंदिर हा लोकभावनेशी जोडला गेलेला संवेदनशील प्रश्न असल्याने त्यावर वातावरण तापविण्याचा संघपरिवारातील संघटनांचा प्रयत्न हा देशासाठी महाग पडू शकतो. राममंदिराचे दगड हे मोदींच्या विकासमार्गातील दगड ठरणार असल्याने देशाच्या अर्थव्यवस्थेला याची मोठी किंमत चुकवावी लागेल. प्रधानमंत्री मोदी सत्तारूढ झाल्याच्या पहिल्या दिवसापासून उद्योगासाठी भांडवल आणि तंत्रज्ञान मिळविण्यासाठी परदेशवारी करीत आहेत. विविध देशाशी देशात उद्योग उभारणीसाठी आणि भांडवलासाठी मोठमोठे करार झाले आहेत , होत आहेत. चीनच्या अर्थव्यवस्थेची घोडदौड थांबल्या मुळे जगात लोकसंख्येच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारताकडे जगातील उद्योगपती आकर्षित झाले नाही तरच नवल. मोदींच्या या प्रयत्नांना त्यांच्याच पक्ष किंवा संघटनांची साथ नसल्याने याचा उपयोग होताना दिसत नाही. मोदींनी या दोन वर्षात इतर देशाशी केलेले आर्थिक करार अंमलात यायला सुरुवात झाली असती तर देशाच्या अर्थव्यवस्थेने उभारी घेतली असती. अर्थव्यवस्था उभारणी घेण्याऐवजी घसरणीला लागल्याचे प्रत्यक्षात चित्र आहे. धार्मिक मुद्दे हावी होवून देशात धार्मिक तणावाचे वातावरण असेल तर कोणताही परकीय गुंतवणूकदार आपल्या देशात पैसा गुंतवायची किंवा उद्योगउभारणीची जोखीम पत्करणार नाही. त्यामुळे मोदींच्या प्रयत्नांना यश येवून भारताच्या अर्थव्यवस्थेत गुंतवणूक करण्याचे अनेक करार झाले असले तरी संघपरिवाराच्या धार्मिक अजेन्ड्याच्या धसक्याने प्रत्यक्ष गुंतवणूक होण्यात अडथळा निर्माण झाला आहे. प्रत्यक्षात करार झाल्या प्रमाणे पैसा भारतात आला असता तर रुपयाची घसरण कधीच थांबली असती. प्रत्यक्षात रुपयाची घसरण रोज नवा उच्चांक प्रस्थापित करीत आहे. 

मोदी सरकार सत्तेत आल्यापासून आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमती घसरत आल्या आहेत. सध्या या किंमती निच्चांकी पातळीवर आहेत. भारताचे बहुतांश परकीय चलन या तेलाच्या आयातीवर खर्च व्हायचे. मोदी काळात त्यात प्रचंड बचत होवूनही आर्थिक तुटीत आणि एकूण अर्थकारणावर सकारात्मक परिणाम झालेला दिसत नाही. औद्योगिक उत्पादन मोठ्याप्रमाणावर घटत आहे , अर्थव्यवस्थेला गती देणाऱ्या रोजगाराभिमुख उद्योगांचा विकास थांबला आहे. निर्यातीत सातत्याने घट होत आहे.चलनवाढ होत आहे आणि परिणामी महागाई वाढत आहे. अर्थव्यवस्थेची ही घसरण थांबवायची असेल पायाभूत सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी मोठी भांडवली गुंतवणूक लागणार आहे. सरकार जवळ पैसा नसल्याने खाजगी आणि परकीय गुंतवणुकीशिवाय दुसरा पर्याय नाही. अशी गुंतवणूक यायची असेल तर देशांतर्गत विकासानुकुल स्थिर आणि शांत वातावरण हवे. आता पुन्हा एकदा राममंदिर प्रश्नावर वातावरण तापविण्यात संघपरिवारातील संघटना यशस्वी ठरल्या तर विकास आणि अर्थव्यवस्थेचे दिवाळे वाजणार आहे. राम मंदिराचा विषय सुप्रीम कोर्टापुढे आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय झाल्या शिवाय किंवा बाहेर तडजोड झाल्याशिवाय हा प्रश्न मार्गी लागणार नाही हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे. त्यामुळे राममंदिर उभारण्याचा प्रश्न मार्गी लावायचा असेल तर सुप्रीम कोर्टाने यावर रोज सुनावणी घेवून लवकर निकाल लागेल असा प्रयत्न व्हायला हवा किंवा कोर्टाबाहेर तडजोडीचे प्रयत्न गतिमान करायला हवेत. पण असे विधायक प्रयत्न राममंदिर उभारणीसाठी उतावीळ संघटनांना करायचे नाहीत. त्यांचा रस अयोध्येत दगड-विटा जमा करून तणाव निर्माण करण्यात आहे. कारण नसताना सभा-बैठका घेवून वातावरण तपाविण्यावर त्यांचा जोर आहे. राममंदिरासाठी कोर्टाच्या निर्णयाची वाट पाहत बसणार नाही अशा प्रक्षोभक घोषणा देवून उन्माद निर्माण करण्यात त्यांना जास्त रस आहे. येवू घातलेल्या उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत या पद्धतीने वातावरण निर्माण केले तरच यश मिळेल या धारणेतून हे सगळे सुरु असल्याने मोदी आणि त्यांचे सरकार त्यांच्याच संघटनाच्या प्रक्षोभक कारवायांकडे कानाडोळा करीत असावेत. विकासानुकुल वातावरणासाठी  संघपरिवारातील संघटनांना वेसन घालणे अत्यावश्यक आहे. मोदी पाकिस्तानशी बोलणी  करू शकतात पण आपल्याच परिवारातील संघटनाशी बोलणी करून त्यांना त्यांचे उपद्व्याप बंद करायला सांगण्याच्या बाबतीत मात्र हतबल असल्यासारखे वाटतात. त्यांनी अशी हतबलता दाखविली तर अर्थव्यवस्थेला गती देण्याचे त्यांचे सगळे प्रयत्न वाया जातील . त्यांची हीच हतबलता त्यांच्यावर अयशस्वी प्रधानमंत्री असा ठपका येण्यास कारणीभूत ठरू शकते हे ध्यानात घेवून संघपरिवारातील संघटनांना काबूत ठेवण्याच्या प्रयत्नांना प्रधानमंत्र्यांनी आपले परदेस दौरे थांबवून प्राधान्य दिले पाहिजे .
-----------------------------------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव , पांढरकवडा , जि. यवतमाळ
 मोबाईल - ९४२२१६८१५८ 

Thursday, January 21, 2016

जातीव्यवस्थेचे बळी

 आज दलित समाजाला सवर्ण समाजाच्या जाती आजाराशी काही घेणेदेणे नाही आणि दुसरीकडे सवर्णावर इलाज करणारा गांधीही नाही. त्यामुळे स्वातंत्र्योत्तर काळात सवर्ण-दलित अंतर कमी होताना दिसत नाही. जातीभेद निर्मुलन हा पूर्णत: सवर्णांशी संबंधित विषय आहे आणि सवर्णांना यातून बाहेर काढायचे असेल तर स्वातंत्र्यपूर्व काळात गांधीनी जे केले ते आता करण्याची गरज आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------------

हैदराबादच्या केंद्रीय विद्यापीठातील संशोधक विद्यार्थी रोहित वेमुला याच्या आत्महत्येवर सर्वत्र वादविवाद सुरु आहे.अशा घटनेवर मंथन होण्याऐवजी , आत्मपरीक्षण होण्याऐवजी वादाची बजबजपुरी माजावी आणि आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडाव्यात याचा अर्थ स्पष्ट आहे. रोहितने आत्महत्या केली आणि प्रतिक्रिये स्वरूप आम्ही आमच्यातील विवेकाची हत्या करू लागलो आहोत. अशा घटनांचा विवेकाने विचार केला तर अर्थ लक्षात येईल आणि अर्थ कळला तर काय उपाययोजना करायला हव्यात हे देखील लक्षात येईल. रोहित प्रकरणी गुन्हा तर घडला आहे. आणि वरकरणी गुन्हेगार कोण आहेत हे जगजाहीर आहे. त्यांच्यावर कायद्यानुसार गुन्हे देखील दाखल झाले आहेत. गुन्हा घडला आणि कायद्याने त्याची नोंद घेवून कारवाई सुरु केल्या नंतर सर्वसाधारणपणे सार्वजनिक चर्चा कमी कमी होत बंद होवून जाते. रोहित प्रकरणात तसे झाले नाही याचे कारण तांत्रिकदृष्ट्या २-४ व्यक्ती किंवा एखादा गट-समूह दोषी दिसत असला तरी खरा दोष समाजाचा आणि समाजव्यवस्थेचा आहे याची जाणीव सर्वाना असल्याने रोहित प्रकरणी गुन्हे दाखल झाल्यावरही चर्चा सुरु आहे. याला समाज मंथनाचे स्वरूप येणे गरजेचे असताना आरोप-प्रत्यारोपाचे स्वरूप आल्याने चर्चा भरकटत चालली आहे. चर्चेला योग्य दिशा मिळाली नाही तर सामाजिक वातावरण अधिक गढूळ होईल आणि रोहितची आत्महत्या व्यर्थ होईल.
या प्रकरणात एक गोष्ट नीट समजून घेण्याची गरज आहे . कॉंग्रेसची सत्ता जावून भारतीय जनता पक्षाची सत्ता आली म्हणून हा गुन्हा घडलेला नाही. राज्यात आणि केंद्रात कॉंग्रेसचे सरकार असताना त्याच विद्यापीठात रोहित सदृश्य प्रकरणे घडली आहेत. एक-दोन नाही तर या आधी तब्बल नऊ प्रकरणे घडल्याची नोंद आहे. त्यामुळे भाजपचे केंद्रात सरकार आल्याने जातीयवादी शक्ती बळावल्या आणि त्यामुळे अशा घटना घडत आहेत असा निष्कर्ष उथळ ठरेल. सरकार "आपले" आहे आणि परिणामापासून ते आपल्याला वाचवील या भावनेने जातीयवादी शक्तीत काहीसा उद्दामपणा वाढला असेल , पण या शक्ती सदैव उद्दामच होत्या हे विसरून चालणार नाही. या शक्तींना पक्षीय लेबल चिकटवून त्यांच्याशी लढण्याचा प्रयत्न केला तर जातीवादा विरुद्धची चळवळ पक्षीय राजकारणाचा मोहरा बनून जाईल. या प्रकरणात पक्षाचा आणि सरकारचा जो सहभाग आहे त्याने ते अडचणीत आलेच आहेत आणि या अडचणीतून बाहेर पाडण्यासाठी पाय मारण्याचा सरकार समर्थकाकडून जो प्रयत्न चालू आहे त्यामुळे ते अधिक उघडे पडू लागले आहेत. उत्तरप्रदेशातील अखलाक प्रकरणात भारतीय जनता पक्षाने आणि त्याच्या सरकारने जी चूक केली अगदी त्याचीच पुनरावृत्ती ते इथे करीत आहेत. गुन्हा घडला आहे आणि कायदा आपले काम करील या नरसिंहराववाणीचा पुनरुच्चार केला असता तर अखलाखच्या रक्ताचे डाग भाजप आणि त्याच्या सरकारवर पडले नसते. पण पक्ष आणि सरकारातील लोकांमध्ये त्या गुन्ह्याचे समर्थन करणाऱ्या कारणांचा शोध घेवून ते मांडण्याची स्पर्धा लागली होती. तशीच स्पर्धा रोहित प्रकरणात देखील लागली आहे. रोहित देशद्रोही होता, नक्सली विचाराचा होता , उग्र विचार आणि उग्र कार्यपद्धती होती  अशा विविध प्रकारची कारणे संघ आणि भाजप समर्थकाकडून पुढे करण्यात येवून विद्यापीठातील सरकारी हस्तक्षेपाचे निर्लज्ज समर्थन करण्यात येत आहे. असे करून ते आपल्याच पायावर धोंडा पाडून घेत आहेत. त्यामुळे इतरांनी त्यांना दगड मारण्याची गरजच नाही. तेव्हा या राजकीय साठमारीच्या वर उठून रोहितच्या आत्महत्येने उपस्थितीत केलेल्या मुलभूत प्रश्नाकडे लक्ष देण्याची गरज आहे.

काय आहेत ते मुलभूत प्रश्न ? गेल्या ६५ वर्षात काहीच झाले नाही असे जे विधान कॉंग्रेसवर दोषारोपण करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी करीत असतात त्या विधानात कोणते तथ्य असेल तर हेच आहे की, गेल्या ६५ वर्षात दलिताकडे पाहण्याचा सर्वसाधारण समाजाचा दृष्टीकोन बदलला नाही. स्वातंत्र्यानंतर लागू झालेल्या संविधानाने दलित प्रगतीचा आणि मुक्तीचा मार्ग प्रशस्त केल्याने ते स्वीकारण्या वाचून पर्याय नव्हता. त्यामुळे समाजाच्या मानसिकतेत मात्र बदल झाला नाही. आरक्षण स्वीकारावे लागले , दलित अधिकाऱ्याच्या हाताखाली , दलित मंत्री, मुख्यमंत्री , मुख्य न्यायधीश , सरन्यायाधीश यांच्या हाताखाली काम करण्यावाचून पर्याय नसल्याने तेवढे स्वीकारल्या गेले. सार्वजनिक ठिकाणी एकत्र येणे , एकत्र प्रवास करणे , एकत्र काम करणे हे सगळे अपरिहार्यता म्हणून स्वीकारल्या गेले आणि या आधारावरच आता कुठे आहे अस्पृश्यता असे प्रश्न विचारल्या जावू लागलेत. आता कुठेय जातीभेद असे भ्रामक प्रश्न विचारले जावू लागलेत. असे भ्रम निर्माण झाल्याने जातिव्यवस्थे बद्दलची मानसिकता बदलण्याचे काम मागे पडले. एकीकडे जातिगत मानसिकता कायम आणि दुसरीकडे संविधानाने दिलेल्या स्वातंत्र्याने दलित समाज पुढे आला. संविधानाने अधिकार-स्वातंत्र्य दिले असले तरी पुढे येण्यासाठी , प्रगती साधण्यासाठी त्यांना कष्ट घ्यावे लागले. या अर्थाने हा समाज कोणाच्या दयेने नाही तर स्व-पराक्रमाने पुढे आला. आमच्या समाजाची मानसिकता अशी आहे की, खालचा मानला गेलेल्या माणसावर दया ,मदत केल्याने तो पुढे आला तर त्याचे कौतुक वाटते. स्वपराक्रमाने पुढे आला की ते मात्र खटकायला लागते. समाजाची जातिगत मानसिकता बदलण्याचे कार्य स्वातंत्र्योत्तर काळात ठप्प झाल्याने जातीभिमानी मानसिकतेला दलित प्रगती खटकायला लागली आहे. संविधानाने दिलेल्या आरक्षणामुळे ते पुढे गेले आणि आम्ही मागे पडत चाललो अशी भावना वाढीस लागली. आपण आपल्या सरंजामी मानसिकतेमुळे मागे पडलो हे सोयीस्करपणे विसरून आरक्षणा बद्दल आकसाची भावना निर्माण झाली. दलित समाजाने आपल्या पायातील बेड्या केव्हाच तोडून टाकल्या आणि उच्चजातीचे लोक मात्र आपल्या जातीच्या बेडीकडे दागिना म्हणून पाहत बसले आणि मागे पडले. मागे पडल्याचा दोष आपल्या मानसिकतेत असताना जबाबदार मात्र दलितांना आणि आरक्षणाला धरले जावू लागले. त्यामुळे उच्चशिक्षण घेणाऱ्या , उच्चअधिकारी बनणाऱ्या दलितांबद्दल आकसाची , इर्षेची व्यापक भावना अस्तित्वात आहे. ही भावना फक्त संघविचाराच्या प्रभावात असलेल्या विद्यार्थी परिषद या विद्यार्थ्याच्या संघटनेत आहे असे मानणे चूक आहे. रोहितच्या आत्महत्येच्या बाबतीत या संघटनेचे नाव घेण्यात येत असले तरी खरी कारणीभूत समाजात व्याप्त दलितांच्या प्रती आकसाची , इर्षेची भावना आहे. अन्यथा अशा प्रकारच्या घटना जिथे विद्यार्थी परिषदे सारख्या संघटना नाहीत अशा आय आय टी , एम्स सारख्या संस्थामध्ये घडल्या नसत्या. दलित समाजाची मानसिकता बदलली आणि सवर्ण समाजाची जातिगत मानसिकता तशीच कायम हे या समस्येचे मूळ आहे.

सवर्ण समाजाची मानसिकता का बदलली नाही याचे कारण आहे अशी मानसिकता बदलण्याचा प्रयत्न करणारा गांधी स्वातंत्र्योत्तर काळात नव्हता. ही गोष्ट दलित समाजातील तरुणांनी समजून घेणे तितकेच महत्वाचे आहे. गांधीजींचे अस्पृश्यता निवारणाचे कार्य सवर्ण समाजाची मानसिकता बदलण्याचेच कार्य होते आणि बाबासाहेबांनी जातीव्यवस्थेच्या चक्रात भरडलेल्या समाजाला जागृत करून लढा उभारण्याचे जे महत्कार्य केले त्याच्या इतकेच महत्वाचे काम गांधीनी सवर्णांची मानसिकता बदलण्याचे केले . पण गांधींच्या या योगदानाची दखल घ्यायला , त्यांच्या कामाचे महत्व समजून घ्यायला दलित तरुण आणि एकूणच दलित समाज तयार नाही. गांधींचा दृष्टीकोन आणि कार्य समजून घेता आले असते तर दलितांना सवर्ण समाज आपला शत्रू आहे असे वाटण्या ऐवजी सवर्ण समाजाला जाती अहंकाराचा आजार झालेला आजारी आहे असे वाटून आजारी समाजाचा आजार दूर करणे हे देखील आपलेच कार्य आहे असे वाटले असते. आज दलित समाजाला सवर्ण समाजाच्या आजाराशी काही घेणेदेणे नाही आणि दुसरीकडे सवर्णावर इलाज करणारा गांधीही नाही. त्यामुळे स्वातंत्र्योत्तर काळात सवर्ण-दलित अंतर कमी होताना दिसत नाही. जातीभेद निर्मुलन हा पूर्णत: सवर्णांशी संबंधित विषय आहे आणि सवर्णांना यातून बाहेर काढायचे असेल तर स्वातंत्र्यपूर्व काळात गांधीनी जे केले ते आता करण्याची गरज आहे. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, सवर्णांची मानसिकता बदलण्याचे कार्य करताना गांधीनी बाबासाहेबांच्या जातीनिर्मूलनाच्या लढ्याला कधीच विरोध केला नाही. केवळ पुणे करारावरून गांधींचे मूल्यमापन करणे चुकीचे आहे आणि या कारणाने त्यांचे योगदान नाकारणे जास्त चुकीचे आहे. ज्यांना ज्यांना या देशातून जातीचे उच्चाटन व्हावे असे वाटते त्यांना हे समजून घ्यावे लागेल की यासाठी सवर्णांची मानसिकता बदलण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. स्वातंत्र्योत्तर काळात जातीभेद संपले नाहीत याचे कारण सवर्णांची मानसिकता बदलण्याचे कार्य गांधी नंतर कोणीच हाती घेतले नाही. समता , स्वातंत्र्य आणि बंधुता यावर आधारित आधुनिक संविधान बाबासाहेबांनी देशाला दिले हे अगदी खरे आहे. संविधान सभेत या संविधानाला मान्यता देणारे लोक कोण होते याचाही त्या सोबत विचार करायला हवा. बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाला मान्यता देणाऱ्या संविधान सभेत ९० टक्के सभासद गांधींचे अनुयायी होते , गांधीला आपला नेता मानणारे होते. बाबासाहेबांनी दिलेले संविधान मान्य झाले त्यात गांधी अनुयायांची भूमिका निर्णायक होती .  गांधी आणि आंबेडकर यांची भूमिका आणि कार्य नेहमीच परस्पर पूरक राहिले आहे. स्वातंत्र्योत्तर काळात अशी परस्पर पूरकता न राहिल्याने जातीयतेने थैमान मांडले आहे. रोहित आणि त्याच्यासारखे अनेक या थैमानाचे बळी ठरले आहेत. गेल्या ६५ वर्षात थांबलेले कार्य पुन्हा सुरु केले नाही तर अशा अनेक रोहीतांचा बळी ही व्यवस्था घेत राहील.

---------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव , पांढरकवडा , जि.यवतमाळ

मोबाईल - ९४२२१६८१५८
----------------------------------------------------------------------------

Thursday, January 14, 2016

स्त्री मुक्तीचा सत्यार्थ

परंपरा म्हणून मंदिरात स्त्रियांच्या प्रवेशबंदीचे समर्थन केले जात आहे. अशी परंपरा रूढ करण्यामागे स्त्री ही 'अस्पृश्य' आहे ही धारणा असल्याचे सोयीस्करपणे विसरले जात आहे. परंपरेच्या नावावर अशा प्रकारच्या अस्पृश्यतेला स्थान देणे गैर आणि घटनाबाह्य आहे.
----------------------------------------------------------------------

शनी शिंगणापूर येथे एका महिलेने शनीच्या चौथऱ्यावर चढण्याचे धाडस केल्यानंतर स्त्रियांच्या मंदीर प्रवेशाचा प्रश्न पुन्हा चर्चेला आला आहे. या मुद्द्याचा आस्तिकता-नास्तिकता याचेशी काहीही संबंध नाही. हा प्रश्न सरळ सरळ स्त्रियांवर समाजात असलेल्या बंधनाशी आणि समाजातील तिच्या स्थानाशी निगडीत आहे. परंपरेच्या नावाखाली हा मुद्दा दडपून टाकण्याचा प्रयत्न होत आहे. परंपरा म्हणून प्रवेश नाही की स्त्री "अस्पृश्य" आहे म्हणून प्रवेश नाही याचे स्पष्ट आणि सरळ उत्तर द्यायला कोणी तयार नाही. स्त्रियांनी शनिदेवाच्या चौथऱ्यावर न चढण्याची फक्त परंपरा असती तर एक स्त्री चौथऱ्यावर चढल्या नंतर अशा प्रकाराची पुनरावृत्ती होवू नये यासाठी विचारविनिमय होवून उपाययोजना केल्या गेल्या असत्या. स्त्री चौथऱ्यावर चढल्या नंतरची नाराजी ही परंपरा किंवा नियम तोडण्या विषयी असायला हवी होती. खरी नाराजी या विषयी नव्हतीच. स्त्री जवळ गेल्याने देव बाटला , विटाळ झाला हा खरा मुद्दा होता .  त्याचमुळे तर देवाचे शुद्धीकरण करण्याचा घाट घातल्या गेला. महार, चांभार आणि तत्सम जातीच्या मंदीर प्रवेशाने जसा देव बाटला जाण्याची समजूत होती तशीच समजूत स्त्रीच्या मंदिर प्रवेशा बद्दलही आहे. मंदिरात स्त्रियांच्या प्रवेशाला बंदी ही केवळ परंपरा म्हणून पुढे चालविल्यान्यांकडून पोकळ समर्थन होत असले तरी स्त्री ही अस्पृश्य आहे हे तशी परंपरा रूढ करण्या मागचे खरे कारण आहे. परंपरेच्या नावावर स्त्री अस्पृश्य असल्याच्या धारणेवर पांघरून घालून तिचे अस्पृश्य स्थान कायम ठेवण्याचा प्रयत्न सध्या सुरु आहे.

केरळ मधील साबरीमाला मंदिरात १० ते ५० या वयोगटातील स्त्रियांच्या प्रवेशावर बंदी आहे. या वयात मासिक पाळी येत असल्याने पाळी असलेली स्त्री मंदिरात गेल्याने देव बाटेल या खुळचट धारणेने अशी बंदी लादण्यात आली आहे. एखाद्या समूहावर अन्याय करणाऱ्या अशा धारणा , अंधश्रद्धा दूर करणे हे सरकारचे घटनादत्त कर्तव्य असताना सरकारेच अशा धारणांचे संरक्षण करताना दिसतात. साबरीमाला मंदीरातील स्त्रियांच्या प्रवेशावर असलेल्या बंदी प्रकरणावर सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. केरळ सरकारने सर्वोच्च न्यायालयात या संबंधी जे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे त्यात धार्मिक परंपरा असल्याने ती चालू ठेवण्याची भूमिका घेतली आहे. साक्षरता आणि शिक्षणात देशात पहिल्या क्रमांकावर असलेल्या केरळ मध्ये तर कायदा करून अशा बंदीचे समर्थन केले आहे. केरळ मधील हिंदू मंदिरांच्या प्रवेशा संबंधीचा कायदा १९६५ मध्ये पारित करण्यात आला आणि या कायद्यातील एका कलमानुसार साबरीमाला मंदिरातील स्त्री-प्रवेश निर्बंधाला मान्यता देण्यात आली. मुख्य म्हणजे स्त्री आणि पुरुषात भेदभाव करणाऱ्या या कायद्याला १९९१ साली केरळ हायकोर्टाने वैधता प्रदान केली. स्त्री-पुरुषांना सर्वच बाबतीत समानता प्रदान केलेल्या राज्यघटनेच्या रक्षणाची आणि अंमलबजावणी करण्याची जबाबदारी असलेली न्यायालये आणि सरकारे धर्माच्या , धर्मस्वातंत्र्याच्या नावाखाली स्त्रियांच्या अस्पृश्यतेला मान्यता देत असतील तर तो गंभीर प्रकार मानला पाहिजे. धर्मस्वातंत्र्याच्या नावाखाली अर्ध्या लोकसंख्येचे धर्मस्वातंत्र्य हिरावले जाते याचा काय अर्थ होतो ? याचा एकच अर्थ होतो. स्त्रियांना मत आणि मान नाही. घटनेने धार्मिक स्वातंत्र्य व्यक्तीला दिले आहे , पुरुषाला नाही. ज्या अर्थी स्त्रीला धार्मिक स्वातंत्र्य नाकारल्या जात आहे त्या अर्थी स्त्रीला आम्ही अजूनही व्यक्ती समजायला तयार नाही आहोत. स्त्री ही पुरुषा सारखी व्यक्ती नाहीच , तुलसीदासाने म्हंटल्या प्रमाणे ती जनावरासमान आहे हीच धारणा कायम असल्याचे या परंपरा दर्शवितात. शतकानुशतके याच धारणेचा मारा स्त्रियांवर केला गेल्याने आणि त्यासाठी धर्माचा वापर हत्यार म्हणून केला गेल्याने स्त्रियांना देखील त्यात आक्षेपार्ह असे काही वाटत नाही.

राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा पालवे यांच्या महिलांचे कार्यक्षेत्र चूल आणि मुल हेच असल्याच्या विधानातून आपणास याची प्रचीती आली आहे. शनी शिंगणापूरला शनिदेवाच्या चौथऱ्यावर चढण्याचा वाद निर्माण झाल्यानंतर पहिल्यांदाच दोन स्त्रियांची मंदिराच्या विश्वस्त मंडळात वर्णी लागली . एवढेच नाही तर विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी देखील महिला निवडल्या गेली. विश्वस्त मंडळाच्या नवनिर्वाचित अध्यक्षा अनिता शेटे यांनी निवड झाल्या नंतर पहिली कोणती घोषणा केली असेल तर स्त्रियांना चौथऱ्यावर चढू न देण्याची परंपरा कायम ठेवण्याची ! पंकजा पालवे मुंडे काय किंवा अनिता शेटे काय याच खऱ्या अर्थाने देशातील "मुक्त"स्त्रीचे प्रातिनिधिक रूप आहे. पंकजाताई पुरुषांच्या सभेत बोलतात , त्यांचे नेतृत्व करतात , निवडून येतात , मंत्री होतात याला आम्ही स्त्रियांना स्वातंत्र्य मिळाले असे समजतो आणि इथेच फसगत होते. पंकजाताईचे स्त्री असूनही नेतृत्व स्वीकारले जाते याचे कारणच त्या स्त्री-मुक्तीची गरज मानत नाहीत हे आहे. पुरुषांचे प्राबल्य असलेल्या शनी शिंगणापूर देवस्थानच्या विश्वस्त मंडळात एका स्त्रीला अध्यक्ष केले जाते ते हे सांगण्यासाठीच की स्त्रीला चौथऱ्यावर न चढण्याच्या परंपरेचे पालन झाले पाहिजे. पंकजा पालवे आणि अनिता शेटे जशा पुढे आल्यात तशा अनेक स्त्रिया अनेक क्षेत्रात पुढे आलेल्या दिसतात. यातील लढून , संघर्ष करून पुढे आलेल्या स्त्रिया कमी आणि घरातील पुरुषांच्या पाठबळावर पुढे आलेल्या स्त्रिया अधिक आहेत. जोपर्यंत स्त्रिया पुरुषांच्या मर्जीने भरारी मारतात तोपर्यंत पुरुषाला स्त्रियांच्या भरारी मारण्यावर आक्षेप नाही. एखादा कठपुतलीकार जसा आनंदाने आणि अभिमानाने आपल्या कठपुतली नाचवतो तेच स्त्रियांच्या बाबतीत आहे. स्त्रियांना पुढे करण्याचे आणि पुढे आणण्याचे निर्णय पुरुष घेतात आणि या पद्धतीने पुढे आलेल्या स्त्रियांकडे पाहून स्त्री स्वातंत्र्याची द्वाही फिरविली जाते.भारतातील स्त्री स्वातंत्र्याचे खरे रूप पंकजाताई आणि अनिताताई यांनी दाखवून दिल्याबद्दल त्यांच्यावर टीका करण्या ऐवजी त्यांचे आभारच मानले पाहिजे. त्यांनी स्त्रियांना आणि समाजाला स्त्री मुक्तीचा आरसा दाखविण्याचे काम केले आहे.  

महात्मा गांधीच्या नेतृत्वाखालील स्वातंत्र्य लढ्यात आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील समतेच्या लढ्यात स्त्रियांची भूमिका आणि कामगिरी लक्षणीय होती. त्यांच्या पराक्रमामुळेच राज्यघटनेत त्यांना समान अधिकार मिळालेत. राज्यघटनेने तीला बंधमुक्त केले. स्वातंत्र्यानंतर मात्र स्त्रियांची लढून काही मिळविण्याची परंपरा खंडित झाली. दुसऱ्या देशातील स्त्रियांना प्रदीर्घकाळ लढून जे मिळवावे लागले ते इथे आपसूक मिळत गेले. मिळालेले अधिकार वापरण्यात एकप्रकारची यांत्रिकता आली. मतदानाचा अधिकार मिळाला आणि स्त्रियांनी उत्साहाने मतदान केलेही. पण राजकीय निर्णय प्रक्रियेत मात्र ती माघारली. शिक्षणाचा अधिकार मिळाला, स्त्री-शिक्षणाचे प्रमाण वाढले , पण शिक्षणाने निर्णय घेण्याची क्षमता मात्र आली नाही. स्त्रियांनी सगळी क्षेत्रे पादाक्रांत केली - निर्णयाचे क्षेत्र सोडून. याचे कारण घर आहे. घरात स्त्रियांना सगळे काही मिळते , मिळत नाही ते निर्णय स्वातंत्र्य. घरात सगळे निर्णय पुरुष घेतो आणि स्त्री विनातक्रार मान्य करून त्याची अंमलबजावणी करते. कुटुंबात जे घडते तेच पुढे समाजात वावरताना होते. समाजातील निर्णय सुद्धा पुरुषांचे असतात. पंकजाताई किंवा अनिताताई यांच्या मुखातून पुरुषी निर्णय बाहेर पडण्याचे हेच कारण आहे. पुरुषाच्या चौकटीत वावरणारी स्त्री कोणत्याही क्षेत्रात कोणत्याही पदावर जायला पुरुषांची हरकत नसते. पुरुषांच्या या ना-हरकत प्रमाणपत्राला स्त्री-मुक्ती समजण्याची गल्लत आम्ही करीत असल्याने भारतातील स्त्री - स्वातंत्र्य आभासीच राहिले आहे. स्त्रियांनी पुरुषरसात स्वत:ला एकरूप करून घ्यायला "स्त्री-पुरुष समरसता" म्हणता येईल , स्त्रीमुक्ती नव्हे !
-------------------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव , पांढरकवडा , जि. यवतमाळ
मोबाईल - ९४२२१६८१५८
---------------------------------------------------------------------------------------------

Thursday, December 31, 2015

कॉंग्रेसचे पतन कोण थांबविणार ?

१३० वर्षाची कॉंग्रेस शून्यावस्थेत आली ती इंदिरा वाटेवर चालल्यामुळे. धर्मनिरपेक्षतेशी तडजोड आणि हायकमांड संस्कृती हे या वाटेवरचे मोठे खड्डे आहेत. याच खड्ड्यात कॉंग्रेस पडली आहे. या खड्ड्यातून कॉंग्रेसला वर येवून पुढे जायचे असेल तर नेहरू वाटेतील समाजवाद बाजूला सारून नेहरू वाटेवर चालण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.
------------------------------------------------------------------------

 
डिसेंबर महिन्याच्या २८ तारखेला कॉंग्रेस १३० वर्षाची झाली. यातील जवळपास निम्मी वर्षे कॉंग्रेसने देशाच्या स्वातंत्र्यासाठी खर्च केलीत आणि जवळपास तितकीच वर्षे सत्तेत राहून खर्च केलेल्या वर्षाचा मोबदला घेतला . दुसऱ्या पद्धतीने असेही म्हणता येईल की पहिली ६५ वर्षे स्वातंत्र्यासाठी झिजून कमावलेली पुण्याई ६५ वर्षे सत्तेत राहण्यासाठी खर्च केली. या दोन्ही पैकी कोणतीही गोष्ट ग्राह्य मानली तरी कॉंग्रेसच्या दृष्टीने शिल्लक उरते ते शून्य . आज कॉंग्रेसच्या अवस्थेकडे पाहिले तर कॉंग्रेस खरोखरच शून्यावस्थेत असल्याचे दिसून येते. याचा दुसरा अर्थ असा होतो की, कॉंग्रेस १३० वर्षाची झाली असली तरी तीला आता नव्याने उभे राहावे लागणार आहे. जुनी पुण्याई उधळून टाकल्याने नवी पुण्याई कमवावी लागणार आहे. जुनी कात टाकून देवून नव्या रुपात लोकांना सामोरे जाण्याची गरज आहे. हे नवे रूप जसे संघटनेच्या पातळीवर दिसले पाहिजे तसेच विचारधारेत देखील ते दिसण्याची गरज आहे. गेल्या १०-२० वर्षात बदललेला भारत आणि त्यापूर्वीच भारत याच्यात जमीन-अस्मानाचे अंतर आहे. त्यामुळे २० वर्षापूर्वीची संघटन पद्धती आणि विचारधारा आज कुचकामी आहे. त्यावेळच्या भौतिक परिस्थितीत आणि जीवन पद्धतीत ती विचारधारा उपयोगी ठरली असेल , पण आजच्या परिस्थितीत आमुलाग्र बदलाची गरज आहे. परिस्थितीशी जुळवून घेत जो बदलतो तोच टिकतो हा सृष्टीचा नियम आहे. मोदी आणि भाजपने कॉंग्रेसचा दारूण पराभव केला म्हणून कॉंग्रेसची शून्यावस्था झाली असे मानणे चूक आहे. बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेत बदलण्याची गरज कॉंग्रेसला वाटली नाही , ओळखता आली नाही तिथेच कॉंग्रेसने आपल्या नाशाची बीजे पेरून ठेवली होती. या बीजाना खतपाणी देवून त्याचे पीक तेवढे मोदी आणि भाजपने घेतले. खऱ्या अर्थाने सामंती संघटन आणि सामंती आचार-विचाराने  कॉंग्रेसनेच आपला पराभव आणि विनाश ओढवून घेतला आहे.

तशी तर कॉंग्रेसची विचारधारा किंवा विचारावर आधारित कॉंग्रेस नेहरूंसोबतच संपली होती. शास्त्रीजींची अल्प कारकीर्द सोडली तर नेहरुनंतर ध्येयवाद संपून सुरु झाला सत्तेचा उघडा नागडा खेळ. सत्तेसाठी काही पण हेच इंदिराकाळात कॉंग्रेसचे धोरण राहिले. सत्तेसाठी धर्मनिरपेक्षता पणाला लावण्याचे युग सुरु झाले ते इंदिरा काळापासून . मुस्लिमांसाठी 'बिग ब्रदर'ची जाहीर भूमिका आणि आम्ही तुमचेच आहोत हा संदेश हिंदुत्ववाद्यांना मिळत राहील या पद्धतीचे आचरण सुरु झाले. प्रधानमंत्र्याचे मंदिरात जाणे, शंकराचार्याच्या मठात जाणे हा त्याचाच भाग होता. परिणामी हिंदुत्ववादी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला राजकारणात शिरून त्यावर प्रभाव पाडण्यासाठी फट मिळाली. नेहरूंनी उभा केलेला धर्मनिरपेक्षतेचा चिरेबंदी वाडा कोसळण्याची ही सुरुवात होती. आणीबाणीत अक्खा संघ इंदिराजींनी तुरुंगात डांबला असला तरी संघाचे इंदिराप्रेम कमी झाले नाही हे त्याकाळी संघ प्रमुखांनी इंदिराजींना लिहिलेल्या पत्रावरून स्पष्ट होते. याचे कारणच इंदिराकाळात हिंदुत्वाबद्दल कॉंग्रेसची मऊ भूमिका ! इंदिराजी चांगल्याच मुत्सद्दी असल्याने उघडपणे त्यांनी कधीच संघाशी हातमिळवणी केली नाही. तरीही संघ इंदिराजी नंतर राजीव गांधींच्या पाठीशी सर्वशक्तीनिशी उभा राहिला. इंदिरा गांधीची मुत्सद्देगिरी राजीव गांधीत नसल्याने त्यांनी उघडपणे , खरे तर बावळटपणे, हिंदू आणि मुस्लीम धर्मवाद्यांना खुश करण्याचा प्रयत्न केला. एकीकडे शहाबानो प्रकरणात कोर्टाचा निर्णय फिरवून मुस्लीम मुलतत्ववाद्यांना खुश केले तर दुसरीकडे कथित रामजन्मभूमी वरील मंदिराचे कुलूप उघडून हिंदुत्ववाद्यांना खुश केले. धर्मनिरपेक्ष राजकारणाचा प्रभाव ओसरून  राजकारणात धर्माचा प्रभाव आणि लुडबुड वाढत जाण्याची ही सुरुवात होती. याचा परिणाम नरसिंहराव यांचे काळात बाबरीचा ढांचा ध्वस्त करण्यात झाला आणि राजकारणाची दशा आणि दिशाच बदलली. धर्मनिरपेक्षता हीच कॉंग्रेसची ताकद होती. त्यामुळे धर्मनिरपेक्षतेचा प्रभाव ओसरल्याने कॉंग्रेसचा प्रभाव उरण्याचे कारणच राहिले नाही.

नरसिंहराव काळातच  भारतीय राजकारण , समाजकारण आणि अर्थकारण  याच्यावर खोलवर परिणाम करून या सर्वांची दशा आणि दिशा बदलणारी आणखी एक ऐतिहासिक महत्वाची घटना घडली. जागतिकीकरणाचा स्वीकार करण्यावाचून पर्याय उरला नाही. ओठात समाजवाद आणि पोटात भांडवलवाद असे कॉंग्रेसचे नवे स्वरूप लोकांपुढे आले. लोकांनी जागतिकीकरण स्वीकारले आणि त्याचे चांगले परिणाम त्यांच्या जीवनावर झाल्याचा अनुभव त्यांना येवू लागला. जागतिकीकरणाने देशातील तरुणाईचे रंगरूपच बदलून गेले. राजकारणात , समाजकारणात आणि अर्थकारणात तरुणाई कर्ती बनली. कॉंग्रेसने जागतिकीकरण आणले हे खरे असले तरी त्या पक्षाने मनापासून त्याचा कधी स्वीकार केला नाही. बदललेल्या परिस्थितीसोबत बदलायला नकार देणाऱ्या कॉंग्रेसला बदललेल्या परिस्थितीच्या परिणामाचे आणि तरुणाईच्या बदललेल्या रूपाचे भानच आले नाही. त्याचा परिणाम असा झाला की कॉंग्रेस पक्षाकडे राहुल गांधीच्या रूपाने तरुण नेतृत्व असूनही हे नेतृत्व आणि तरुणाई यांच्यातील अंतर इतर कोणत्याही नेत्यापेक्षा जास्त आहे. कॉंग्रेसचे तरुण नेतृत्व जुन्या विचाराची पोपटपंची करण्यात गुंतल्याचा हा परिणाम आहे. देश २१ व्या शतकात आणि कॉंग्रेस मात्र ७० च्या दशकात इंदिरा गांधीनी विकसित केलेल्या कार्यपद्धतीत आणि भाषेत अडकून पडली आहे. याच्या पुढे जाण्याची क्षमता सोनिया गांधी यांच्यात कधीच नव्हती. त्यांनी इमाने इतबारे इंदिरा गांधीची गादी चालवत पक्ष कसाबसा जिवंत आणि एकसंघ ठेवला. राजकारणातील इंदिरा पद्धत पुढे चालविण्याच्या प्रयत्नातच सत्ता गेली हे कॉंग्रेसने समजून घेण्याची गरज आहे. इंदिराजींनी राबविलेली आर्थिक धोरणे कालबाह्य आहेत हे न उमगल्याने मनमोहनसिंग काळात सरकारला हवे तसे निर्णय घेवू देण्यात कॉंग्रेस नेतृत्वाने आडकाठी आणली आणि सरकार व पक्ष यांच्या विरुद्ध दिशांमुळे दोघांचीही गाडी पुढे सरकू शकली नाही. याचा परिणाम सरकार जाण्यात आणि पक्ष खिळखिळा होण्यात झाला आहे. सोनिया गांधी जशा इंदिरा गांधीच्या प्रभावातून बाहेर पडल्या नाहीत त्याच प्रमाणे राहुल गांधी सोनिया गांधीच्या प्रभावातून बाहेर पडले नाहीत. हे कॉंग्रेसचे खरे संकट आहे . 

बदलती परिस्थिती , बदलत्या जनआकांक्षा याच्याशी पक्षाचा मेळ घालण्यात कॉंग्रेस नेतृत्व अपयशी ठरल्याने सगळी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. इंदिरा पद्धतीने पक्ष चालत असल्याने गांधी घराण्याच्या पलीकडे कॉंग्रेसमध्ये कोणाकडे कणा नाही. त्यामुळे कॉंग्रेसजनांसमोर गांधी घराण्यातील नेतृत्वाशिवाय पर्याय नाही. गांधी घराण्यातील सोनिया गांधीच्या नेतृत्वाचा अस्त होत असताना राहुल गांधीचे नेतृत्व काँग्रेसजनांना आश्वासक वाटत नाही यामुळे कॉंग्रेस भांबावली आहे. राहुल गांधीच्या मागे जाण्यात उत्साह वाटत नाही आणि नेतृत्व बदलाची मागणी करण्याची शक्ती आणि हिम्मत कॉंग्रेसजनात नाही. अशा परिस्थितीत पक्षात चैतन्य निर्माण करण्याची क्षमता प्रियांका गांधीत आहे की नाही हे आजमावून पाहणे एवढेच काँग्रेसजनांच्या हाती आहे. त्यातही दोन अडथळे आहेत. पहिला अडथळा पुरुष प्रधान संस्कृतीचा आहे. सोनिया गांधीनी प्रियांकाला पुढे करण्याची इंदिराजींची इच्छा डावलून राहुल गांधीना पुढे करण्यामागे ही पुरुष प्रधान संस्कृतीच कारणीभूत आहे. दुसरा अडथळा प्रियांकाच्या पतीचा - रॉबर्ट वडेराचा - आहे. त्याच्याभोवती वाद निर्माण करून प्रियांकाला नामोहरण करण्याचा प्रयत्न झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे कॉंग्रेसने जावयाचा बचाव करण्या ऐवजी चौकशी आणि दोषी असेल तर खुशाल शिक्षा करा अशी मागणी केल्याशिवाय प्रियांका गांधीचे नेतृत्व पुढे येण्याची शक्यता नाही. राहुल गांधी युवक प्रिय आणि लोकप्रिय होण्याची शक्यता नाही. प्रियांका गांधीत मात्र ती शक्यता दिसते. राहुल गांधीचा उपयोग संघटनेच्या पातळीवर तर लोकांच्या पातळीवर प्रियांका गांधीचा उपयोग असा प्रयोग करण्याशिवाय कॉंग्रेसपुढे तरणोपाय नाही. कॉंग्रेसच्या हायकमांड संस्कृतीने १३० वर्षाच्या कॉंग्रेस समोर नेतृत्वाचा एवढा मर्यादित पर्याय शिल्लक ठेवला आहे याची जाणीव ठेवून कॉंग्रेसजणांनी हायकमांड संस्कृती नाकारण्याची हिम्मत दाखविली पाहिजे. एक गोष्ट मात्र नक्की . कॉंग्रेसला जिवंत राहायचे असेल , पुनरागमन करायचे असेल तर इंदिरा वाट सोडावी लागेल. खऱ्याखुऱ्या धर्मनिरपेक्षतेची कास धरून आणि समाजवादी अर्थकारणाच्या मर्यादा लक्षात घेवून नव्या आर्थिकधोरणांचा मनमोकळा पुरस्कार केला तरच भाजपचा पर्याय म्हणून लोक कॉंग्रेसला स्वीकारतील. या वाटेवर कॉंग्रेसला नेण्याची क्षमता असणारे  नेतृत्व कॉंग्रेसला हवे आहे. नेहरू वाट उणे समाजवाद हेच कॉंग्रेसच्या पुनरुज्जीवनाचे सूत्र असणार आहे.

----------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव , पांढरकवडा , जि.यवतमाळ
मोबाईल - ९४२२१६८१५८
---------------------------------------------------------------------------

Thursday, December 24, 2015

जंगली न्याय !

निर्भया प्रकरणातील अल्पवयीन आरोपीने दाखविलेली क्रूरता नि:संशयपणे घृणास्पद होती. त्याविरुद्धचा संताप कितीही समर्थनीय असला तरी संतापाच्या भरात एखादा कायदा तयार करणे किंवा पारित करणे तितकेच असमर्थनीय आहे. केलेला कायदा बदल हे संतापात भान हरपते हेच दर्शविणारा आहे. ----------------------------------------------------------------------------------


एखाद्या प्रश्नावर भावनात्मक उन्माद निर्माण करणे देशासाठी नवी गोष्ट नाही. गायी पासून चाऱ्या पर्यंत कोणत्याही प्रश्नावर भावनिक उन्माद इथे निर्माण करता येतो हे खरे असले तरी अशा उन्मादाचे निर्माते नेहमीच उच्चवर्णीय किंवा उच्चवर्गीय असतात. त्यामुळे त्यांच्या डोळ्याला जे खुपेल त्यावरच उन्माद निर्माण होतो. निर्भया प्रकरणात उन्माद निर्माण होतो आणि खैरलांजी सारख्या प्रकरणात आळीमिळी गुपचिळी का असते याचे उत्तर यात दडले आहे. अशा भावनात्मक उन्मादाच्या दडपणाखाली जेव्हा निर्णय घेण्यास भाग पाडले जाते तेव्हा तिथे विवेकाचा वापर न होता लोकानुनय करण्यात धन्यता मानली जाते. निर्भया प्रकरणातील कायद्याच्या दृष्टीने अल्पवयीन आरोपीची सुटका होण्याच्या प्रसंगी असाच उन्माद निर्माण करण्यात आला आणि पिडीतेला न्याय देण्याच्या नावाखाली अल्पवयीन गुन्हेगाराचे वय घटविण्याचा दूरगामी परिणाम करणारा निर्णय घाईघाईने घेण्यात आला. निर्भया प्रकरणातील अल्पवयीन आरोपीने दाखविलेली क्रूरता नि:संशयपणे घृणास्पद होती. त्याविरुद्धचा संताप देखील समर्थनीय आहे. संताप कितीही समर्थनीय असला तरी संतापाच्या भरात एखादा कायदा तयार करणे किंवा पारित करणे तितकेच असमर्थनीय आहे. कायदा नेहमी सर्वांगाने विचार करून शांत चित्ताने घेतला तरच अपेक्षित परिणाम साध्य करायला कायद्याचा उपयोग होवू शकतो. निर्भया प्रकरण घडले त्यावेळी देखील प्रकरणातील आरोपींना भर चौकात फाशी दिली पाहिजे अशी मागणी झाली होती. अण्णा हजारे , सुषमा स्वराज सारखे लोक अशी अविचारी मागणी करण्यात आघाडीवर होते. काही गुन्हे असे असतात की जे पाहून विचारशक्ती कुंठीत होते. त्यामुळे निर्भया प्रकरणातील आरोपीच्या बाबतीत अशी मागणी होणे अस्वाभाविक नव्हते. मुळात आपण अशाप्रकारची जंगली समजली जाणारी मध्ययुगीन न्यायपद्धती आणि शिक्षा देण्याच्या क्रूर पद्धती मागे टाकून बरेच पुढे आलो असलो तरी मध्ययुगीन मानसिकतेतून पूर्णपणे बाहेर येणे अद्यापही शक्य झाले नसल्याने मध्ययुगीन न्याय आम्हाला खुणावत असतो. 

अल्पवयीन गुन्हेगाराला सुधारण्याची संधी दिली पाहिजे यावर जागतिक पातळीवर एकमत आहे. त्यासाठी बाल सुधार गृहे आदि व्यवस्था निर्माण झाल्या आहेत. दुर्दैवाने ही सुधारगृहे सुधारण्या ऐवजी मुलांना बिघडविण्यास जास्त कारणीभूत ठरत असल्याने मुले अट्टल गुन्हेगार बनूनच या सुधारगृहातून बाहेर पडत असतात. त्यामुळे अल्पवयीन आरोपी सुधारतात यावरील लोकांचा विश्वास ढळला आहे. त्यामुळेही सुधारणेची मागणी होण्या ऐवजी कठोर शिक्षेची मागणी होत असते. खरे तर आमचा राग ज्या पद्धतीने सुधारगृहे चालविले जातात त्यावर कधीच व्यक्त होत नाही. सुधारणा गृहे सुधारली पाहिजेत यासाठी कधीच जनमताचा रेटा तयार होत नाही. चुकीच्या लोकांच्या हाती सुधारणा गृहे आहेत व ती चुकीच्या पद्धतीने चालविली जातात हे संकट आहे. ते सुधारण्यासाठी प्रयत्न करणे सोपे नाही , त्यापेक्षा अल्पवयीन आरोपी कधीच सुधारणार नाहीत यावर विश्वास ठेवणे जास्त सोपे असते. अशा विश्वासातूनच निर्भया प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या सुटके विरुद्ध काहूर उठले.  अल्पवयीन आरोपी बलात्काराला प्रवृत्त होतो आणि अतिशय निंदनीय असे क्रूर वर्तन करतो याचा संताप होणे अपरिहार्य असले तरी संतापापेक्षा या गोष्टीची आम्हाला चिंता अधिक वाटायला हवी होती. आम्हाला तशी चिंता वाटली असती तर नक्कीच आमची प्रतिक्रिया संयत आणि संतुलित राहिली असती. अशा प्रकरणाने माणसे पेटून उठलीच पाहिजेत , पण ती आरोपींना पेटून देण्यासाठी नव्हे तर समाजात पुन्हा अशा घटना घडू नयेत यासाठी पेटून उठायला हवे. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झाली की समाधान मानायचे आणि आपले कर्तव्य विसरून जायचे असे चालत आल्याने बलात्कारा सारख्या घृणित आणि गंभीर गुन्ह्याला आळा घालणे शक्य होत नाही याचा आम्हाला विसर पडला आहे. 

निर्भया प्रकरणातील कायद्याच्या दृष्टीने अल्पवयीन आरोपीच्या सुटके विरुद्ध उन्माद निर्माण करून अल्पवयीन आरोपीची वयोमर्यादा घटविणे हा प्रकार अतिशय उथळ आहे. उद्या १६ वर्षे वयाच्या आरोपीने बलात्काराचे घृणित कृत्य केले तर पुन्हा अल्पवयीन आरोपीची वयोमर्यादा घटविण्याची मागणी झाल्याशिवाय राहणार नाही. मग अल्पवयीन आरोपीची १८ असलेली वयोमर्यादा १६ वर आणली तशी १६ ची वयोमर्यादा १४ वर आणणार का हा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. असे झाले तर कायद्याचे गांभीर्य नष्ट करणारा पोरखेळ ठरेल. राज्यसभेत हा प्रश्न चर्चेला आला तेव्हा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे खासदार सीताराम येल्चुरी यांनी हा मुद्दा उपस्थित करून कायदा बदलण्याची घाई न करता चिकित्सा समितीकडे प्रकरण सोपविण्याची मागणी केली होती. पण निर्भयाच्या बाजूने उभे आहे हे दाखविण्याच्या भाजप आणि कॉंग्रेसच्या स्पर्धेत ही विवेकी मागणी विचारात घेतली गेली नाही. कायद्यातील या बदलामुळे निर्भया प्रकरणातील अल्पवयीन आरोपीची चिंता करण्याचे आपल्याला काही कारण नाही. चिंता वाटण्याचा मुद्दा वेगळाच आहे. म्हातारी मेल्याचे दु:ख नाही , काळ सोकावतो याची चिंता आहे. निर्भया प्रकरणासारख्या टोकाच्या घृणित घटना कधी कधी घडतात. अशा एखाद्या घटनेला धरून कायद्यात बदल करणे योग्य नाही. या बदलामुळे निर्भया प्रकरणातील आरोपीच्या शिक्षेत वाढ होईल , त्याला कठोर शिक्षा मिळेल पण त्यामुळे सर्वसाधारण अल्पवयीन आरोपीच्या सुधारणेचा मार्ग अवरुद्ध होण्याचा धोका आहे. त्याहीपेक्षा मोठा धोका म्हणजे निर्भया सारखी प्रकरणे घडू नयेत यासाठी कौटुंबिक आणि सामाजिक स्तरावर करावयाच्या प्रयत्नाकडे दुर्लक्ष होण्याचा आहे. 

अशा प्रकारच्या कायदा बदलाचे कट्टर समर्थक कोण आहेत याकडे बारकाईने पाहिले तर आपल्या असे लक्षात येईल की, स्त्रियांचे 'अवेळी' बाहेर पडणे खटकणारी मंडळी अशा बदलाच्या बाबतीत जास्त उत्साही आहेत. मुली तोकडे कपडे घालतात त्यामुळे बलात्कार होतात असे मानणाऱ्या मंडळीचे अशा कठोर कायद्याला मोठे समर्थन आहे. आपल्या कुटुंबात मुलगा आणि मुलगी यासाठी वागण्याचे वेगळे नियम बनविणाऱ्या आणि ते कठोरपणे अंमलात आणणाऱ्या मंडळीना असा कठोर कायदा व्हावा असे वाटते. लैंगिक शिक्षणाने बलात्कारा सारख्या विकृतीवर बराच आळा बसण्याची शक्यता असताना लैंगिक शिक्षणाला ठाम विरोध असणाऱ्या मंडळींचा अशा प्रकारे कायदा बदलावर विश्वास असण्या मागचे इंगित नेमके काय आहे हे समजून घेतले तर अशा कायदा बदलाची व्यर्थता लक्षात येईल. बलात्कार ही स्त्रीला भोगवस्तू मानणाऱ्या पुरुषप्रधान संस्कृतीची देन आहे. ही पुरुषप्रधान कुटुंबव्यवस्था कुठेही मोडकळीस न येता आपण बलात्कारा विरुद्ध उपाययोजना करण्या विषयी गंभीर आहोत हे दाखविण्याचा केविलवाणा आणि ढोंगी प्रयत्न म्हणजे अशा कायदा बदलासाठी उन्माद निर्माण करणे होय. अशा उन्मादातून बदललेल्या कायद्याने एखाद्या अल्पवयीन आरोपीच्या फाशीच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होईलही , पण बलात्कारापासून स्त्री कधीच सुरक्षित होणार नाही. बलात्कारापासून स्त्रीला सुरक्षित करण्याचा मार्ग कायदा बदलातून नव्हे तर पुरुषी वर्चस्वातून आणि पुरुषी जोखडातून कुटुंब व्यवस्था मुक्त केल्याने होणाऱ्या बदलातून निघणार आहे. संसदेने आणि महिला आयोगाने कायदा बदलाचा उत्साह दाखवून स्त्रियांवर अन्याय करणाऱ्या कुटुंब व्यवस्थेतील बदलावरून समाजाचे ध्यान हटविले आहे. प्रधानमंत्री मोदी यांनी लालकिल्ल्यावरील आपल्या पहिल्या भाषणात मुलीच्या स्वातंत्र्यावर बंधने घालण्या ऐवजी मुलांना चार गोष्टी समजाविण्याची आणि स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही हे त्याला घरातच शिकविण्याची गरज प्रतिपादिली होती. त्याच्या अंमलबजावणीसाठी शासकीय आणि अशासकीय पातळीवर गांभीर्याने प्रयत्न झाले असते तर अशा कायदा बदलाची गरजच वाटली नसती. कुटुंबव्यवस्थेतील बदलाचा गंभीर प्रयत्न करण्या ऐवजी कठोर कायदा करण्याचे सोंग करून स्त्रियांच्या बाजूने असल्याचे ढोंग तेवढे केले आहे. अशा ढोंगातून स्त्री सुरक्षित झाली नाही तर पुरुषी वर्चस्वाची बलात्काराला जन्म देणारी कुटुंबव्यवस्था सुरक्षित झाली आहे हे स्त्रियांनी लक्षात घेतले तरच बलात्कारातून मुक्तीची आशा करता येईल. 

-----------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव , पांढरकवडा , जि.यवतमाळ
मोबाईल - ९४२२१६८१५८
------------------------------------------------------------------------------------

Thursday, December 17, 2015

शांत वादळाचा अंत

देशातील दारिद्र्याचा आणि शेतीमालाच्या भावाचा सरळ संबंध प्रस्थापित आणि सिद्ध करणारा विचारवंत म्हणून शरद जोशींचे स्थान अढळ असणार आहे. शेतीमालाला  बाजारात  भाव मिळू नये म्हणून कायदे आणि अन्य मार्गाने सरकारने जे अडथळे उभे केले आहेत ते दूर करण्यावर शरद जोशींचा भर होता. या दिशेने शेतकरी आंदोलन पुढे नेणे हीच शरद जोशींना खरी आदरांजली ठरेल.
--------------------------------------------------------------------------

वादळाचे अनेक प्रकार असतात आणि अनेक नावाने ते ओळखले जाते. आपल्या डोळ्यासमोर शरद जोशी यांच्या रूपाने त्यात नवी भर पडली. एक शांत वादळ ज्याने सर्व शेतकऱ्यांना आपल्या कवेत घेतले ते त्यांना उध्वस्त करण्यासाठी नव्हे तर सुस्थापित करण्यासाठी. म्हणूनच या वादळाच्या झांझावताने वरकरणी काहीच कोलमडून पडलेले दिसत नाही. या वादळाने आंदोलित केले ते शेतकऱ्यांचे मन जे निव्वळ थिजून गेले होते. लौकिकार्थाने जीवनमृत्युच्या फेऱ्यात या वादळाचा अंत झाल्याचे म्हणता येत असले तरी वस्तुस्थिती अशी आहे की, हे वादळ शेतकऱ्यांच्या अणुरेणूत कधीच सामावून गेले होते आणि शेतीच्या शोषणावर आधारित या व्यवस्थेला आव्हान देणाऱ्या शेतकऱ्यांच्या रुपात ते यापुढेही अनुभवले जाणार आहे. त्यांच्या मृत्युनंतर त्यांनी स्थापन केलेली शेतकरी संघटना जीवंत राहिली नाही तरी हे वादळ अनुभवले जाणार आहे. मुळात शेतीमालाला भाव मिळवून देण्या इतपत शरद जोशी आणि शेतकरी संघटनेचा विचार मर्यादित कधीच नव्हता.जे याच चौकटीत शरद जोशी यांचे मूल्यमापन करू पाहतात त्यांना ना शरद जोशींचा विचार कळला ना शेतकरी संघटनेच्या ऐतिहासिक आंदोलनाचा अर्थ कळला असेच म्हणावे लागेल.
शेतकरी संघटना आणि आंदोलनाच्या विस्ताराच्या प्रक्रियेत आणि शरद जोशींचे नेतृत्व प्रस्तापित होण्याच्या प्रक्रियेत मला सामील होण्याची संधी मिळाल्याने शेतकऱ्यांचे नेते म्हणून प्रसिद्ध झालेले शरद जोशी आणि त्या आधीच्या वर्ष-दोन वर्षातील शरद जोशी यांच्यात कधीच अंतर आढळून आले नाही हे मी ठामपणे सांगू शकतो. चांगल्या वक्तृत्वामुळे, किंवा भुरळ घालणाऱ्या व्यक्तिमत्वामुळे शरद जोशी नेते बनले नाहीत. किंबहुना या दोन्ही बाबी त्यांचे नेतृत्व प्रस्थापित होण्यातील अडसर ठराव्यात अशाच होत्या ! त्यांचे वक्तृत्व म्हणजे बोलताना कुठलाही चढउतार नसलेले संथ लयीतील प्रमाण भाषेत बोलणे होते. त्याकाळी धोतर टोपी असाच सर्वसाधारण पेहराव असलेल्या शेतकऱ्यांच्या समोर हा माणूस जीनची पैंट आणि सुती शर्ट घालून उभे राहायचे. नेतृत्व आणि खादीचे वस्त्र ही समजूत मोडीत काढणारा पहिला व्यक्ती म्हणून शरद जोशीकडे पाहता येईल. जातीचा पगडा घट्ट असलेल्या शेतकरी समाजा पुढे 'जोशी' नावाचा हा माणूस उभा राहणे आणि या माणसाचे संथ आणि कंटाळवाणे वाटावे असे भाषण शेतकऱ्यांनी शांतपणे ऐकणे हे विपरीतच म्हंटले पाहिजे. त्यांचे हे शांतपणे ऐकून घेतले जाणारे संथ भाषण शेतकऱ्यांच्या मनात अंगार निर्माण करीत होते जो नंतरच्या आंदोलनात पाहायला मिळाला. हा अंगार फुलविण्याची ताकद त्यांनी मांडलेल्या विचाराची होती.
शरद जोशी काय नवीन सांगत होते ? शेतकऱ्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांचा आणि दैनंदिन जीवनात त्याला जे भोग भोगावे लागतात त्याचा अर्थ साध्या सरळ भाषेत समजावून सांगत होते. आलीया भोगाशी असावे सादर अशी मनाची समजूत काढून जगण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकरी समाजाला हे नशिबाचे आणि निसर्गामुळे मिळालेले भोग नसून जाणीवपूर्वक हे भोग त्यांना भोगावे लागतील अशी व्यवस्थाच निर्माण करण्यात आल्याचे सत्य शरद जोशीनी मांडले तेव्हा त्या धक्क्याने शेतकरी समाज खडबडून जागा झाला. हा धक्का फक्त शेतकरी समाजालाच बसला असे समजणे चूक आहे. आजच्या अन्याय्य व्यवस्थेत बदल झाला पाहिजे या उद्देश्याने त्याकाळी कार्यरत माझ्यासारख्या शेकडो कार्यकर्त्यांना बसलेला धक्का तर त्यापेक्षाही मोठा होता. ज्या विचारसरणीच्या आधारावर आम्ही उभे होतो तो आधारच शरद जोशींच्या मांडणीने काढून घेतल्याने आमच्या सारख्यांचे पाय जमिनीला लागले ! समाज परिवर्तनाच्या विचाराला नवे आयाम , नवे परिमाण देणारी शरद जोशींची मांडणी होती . शेती आणि शेतकरी याकडे पाहण्याचा समाजाचा , शासनाचा दृष्टीकोन बदलण्याचे श्रेय जाते ते शरद जोशींच्या वैचारिक मांडणीला, या विचारामागे त्यांनी उभ्या केलेल्या संघटनेला आणि आंदोलनाला.


शरद जोशी आणि त्यांच्या आंदोलनाच्या आधीही पुष्कळ शेतकरी आंदोलने झालीत. शेकडो वर्षापासून शेतकरी आंदोलने होत आली आहेत. शेतीमालाच्या भावाचा प्रश्न शेतकरी कामगार पक्षाने देखील उचलला होता. या सगळ्याच्या परिणामी शेतकऱ्यांचे काही तात्कालिक प्रश्न सुटलेत हेही खरे , पण बदलला नाही तो शेती आणि शेतकऱ्यांकडे पाहण्याचा दृष्टीकोन . हा दृष्टीकोन संपूर्णपणे बदलण्याचे श्रेय जाते ते शरद जोशी आणि त्यांनी उभ्या केलेल्या शेतकरी संघटनेच्या शेतकरी आंदोलनाला. शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेल्या , त्या कुटुंबातील आहे म्हणून चटके बसलेल्या , सोसावे लागलेल्या माझ्या सारख्या आपल्या जाणीवा जागृत आणि उन्नत असण्याच्या भ्रमात त्याकाळी वावरणाऱ्या माझ्या सारख्या कार्यकर्त्यांची शेतकरी शोषक असल्या बद्दलची समाजवादी  खात्री होती. शेतकरी शेतमजुरांवर फार अन्याय करतो , त्याचे शोषण करतो आणि त्याच्या जीवावर चैन करतो या सारख्या धादांत खोट्या धारणेचे आम्हीच नाही तर सर्व विचारक , पत्रपंडित , नागरी समाज बळी होतो. तुरळक शेतकरी त्याकाळी दुध किंवा भाज्या घेवून फटफटीवर यायचे ते देखील नागरी समाजाच्या डोळ्यात कुसळा सारखे खुपयाचे. थोडीशी तिरकी टोपी घालून फटफटीवर दिसणारा शेतकरी नागरी आणि मध्यमवर्गीय समाजाला माजल्या सारखा वाटायचा. त्याचे स्वच्छ धुतलेले बिगर इस्तरीच्या  कपड्यांचा  देखील नागरी समाजाच्या डोळ्याला त्रास व्हायचा. विचाराकांच्या , पुरोगामी म्हणविणाऱ्याच्या दृष्टीने तर छोटा शेतकरी , मोठा शेतकरी किंवा कोरडवाहू शेतकरी , बागायती शेतकरी किंवा शेतकरी-शेतमजूर हे भेद त्यांच्या चळवळीसाठी महत्वाचे असायचे. शेतकरी तितुका एक हे सांगणारा आणि प्रभावीपणे मांडणारा महात्मा फुले यांच्या नंतरचा दृष्टा पुरुष म्हणजे शरद जोशी होय.


नागरी समाजाचा आणि समाजवादी विचारकाचा शेती आणि शेतकऱ्यांबद्दलचा हा विकृत आणि चुकीचा दृष्टीकोन धुवून टाकण्याचे श्रेय शरद जोशींच्या विचाराचे आणि चळवळीचे आहे. शेतकरी शोषक नसून सर्व प्रकारच्या - कोरडवाहू , बागायती , छोट्या , मोठ्या , भूमिहीन - शेतकऱ्यांचे शोषण होते , किंबहुना शेतीच्या शोषणावरच आजच्या तथाकथित प्रगत आणि औद्योगिक व्यवस्थेचा डोलारा उभा आहे हे त्यांनी गणिताने सिद्ध केले. संपूर्ण शेतकरी समाजाचे शोषण होते आणि संपूर्ण शेतकरी समाजाने एक होवून या शोषणा विरुद्ध लढाई दिली पाहिजे या त्यांच्या मान्यतेला नंतर सर्व गटानी , सर्व पक्षांनी आणि सर्व विचारधारांनी, मान्यता दिली. आजवर शेतकऱ्यांची अनेक मार्गांनी लुट झाली आणि आजच्या आधुनिक काळात ती भाव ठरविण्याच्या पद्धती आणि प्रक्रियेतून होते हे पहिल्यांदा सर्वमान्य करण्याचे श्रेय शरद जोशी आणि त्यांनी उभारलेल्या आंदोलनांना जाते. शेती मालाला भाव मिळाला नसेल आणि सरकारने तो द्यावा ही अपेक्षा देखील चूकच आहे , पण शेती मालाला भाव मिळत नाही हे सत्य तर आज कोणी नाकारू शकत नाही. देशातील दारिद्र्याचा आणि शेतीमालाच्या भावाचा सरळ संबंध प्रस्थापित आणि सिद्ध करणारा विचारवंत म्हणून शरद जोशींचे स्थान अढळ असणार आहे. मुळात शेतीमालाला भाव सरकारने देणे हे व्यावहारिक नसून शेती व्यवस्थेतील आमुलाग्र बदलातून आणि बाजारातून तो मिळवावा लागणार आहे हा विचार मांडण्याचे आणि रेटण्याचे धाडस शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शरद जोशी यांनी केले . बाजारात असा भाव मिळू नये म्हणून कायदे आणि अन्य मार्गाने सरकारने जे अडथळे उभे केले आहेत ते दूर करण्यावर शरद जोशींचा भर होता. सरकारकडून शेतीमालाचा भाव मान्य करून घेणे किंवा मिळविणे हे शरद जोशींचे , त्यांच्या संघटनेचे किंवा आंदोलनाचे कधीच उद्दिष्ट नव्हते हे ज्यांना समजले नाही तेच शरद जोशींचे मूल्यमापन शेतीमालाला भाव मिळाला कि नाही या मर्यादित चौकटीत करतील.
महात्मा फुलेंच्या काळात जगात औद्योगिकरणाला नुकतीच सुरुवात झाली होती. त्यामुळे शेतीच्या शोषणातून उभे राहिलेले औद्योगीकरण त्यांच्या मांडणीत येणे शक्य नव्हते. ब्राम्हणी व्यवस्थेत शेतकऱ्यांचे कसे शोषण होते आणि त्यातून मुक्त होण्याचा मार्ग दाखविणारे तत्वज्ञान फुलेंनी समर्थपणे मांडले. पुढे औद्योगीकरणाने ही ब्राम्हणी व्यवस्था मोडकळीस आली पण शेतकऱ्यांचे शोषण सुरूच राहिले. कारण प्रत्येक काळात व्यवस्था बदलत गेल्या तसे शेतकऱ्यांच्या व शेतीच्या शोषणाची साधने आणि व्यवस्था बदलत गेल्या. शेती आणि शेतकऱ्यांची शोषणातून कायम स्वरूपी मुक्तीची प्रक्रिया काय असेल हे शरद जोशींनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ही बदलाची प्रक्रिया दीर्घकाळ चालणारी असेल. मुक्त अर्थव्यवस्थेकडे ते या प्रक्रियेचा एक भाग म्हणून पाहत होते. शरद जोशींचे वेगळेपण कोणते असेल तर ते म्हणजे त्यांनी  समाजवादी विचाराच्या कैदेतून विचारकांची आणि सामान्यजणांची सुटका करण्याचा शतकातील सर्वात मोठा प्रयत्न आणि प्रयोग केला आणि त्यात ते कमालीचे यशस्वी झालेत !
---------------------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव , पांढरकवडा , जि. यवतमाळ
मोबाईल - ९४२२१६८१५८
--------------------------------------------------------------------------------------------  

Thursday, December 3, 2015

स्त्रियांचा देव आणि धर्म कोणता ?

स्त्रियांच्या धर्मस्थळी प्रवेशावरील निर्बंध हा काही त्या धर्मस्थळाच्या व्यवस्थापनाच्या बऱ्या-वाईट निर्णयाचा परिणाम नाही. जगातील धर्म नावाच्या संस्थेने स्त्रीच्या पदरी  दुय्यमत्व टाकण्यासाठी मांडलेल्या तत्वज्ञानाचा आणि उभारलेल्या व्यवस्थेची ती किनार आहे. मूळ प्रश्न निर्बंधाचा नाहीच. दुय्यमत्व हा मूळ प्रश्न आहे. स्त्रियांच्या पदरी आलेले दुय्यमत्व संपविण्यासाठी प्रार्थनास्थळाच्या व्यवस्थापनाला नाही तर साऱ्या धर्मव्यवस्थेला आव्हान देण्याची गरज आहे.
--------------------------------------------------------------------------------------------


देशात सुरु असलेल्या असहिष्णुतेच्या वादात नवी भर पडली आहे ती स्त्री विषयक धर्मीय असहिष्णुतेची. प्रश्न जुनाच आहे आणि अनादिकाळापासून चालत आला आहे. काही निमित्त घडले की स्त्री विषयक धार्मिक असहिष्णुतेची चर्चा काही काळ होते ती या असहिष्णुतेचा जन्मदाता असलेल्या पुरुषांच्या जगात. या चर्चेतही स्त्रिया मौनच असतात . मौन दोन्ही अर्थाने असते.पटत नाही पण पुरुषी वर्चस्व असलेल्या जगात लढणे सोपे नाही म्हणून मौन बाळगणाऱ्या स्त्रिया आहेत तशाच आपण ईश्वराची दुय्यम निर्मिती आहोत त्यामुळे घडते ते फार आक्षेपार्ह न वाटून मुकाट बसणाऱ्या स्त्रियाही आहेत. वैचारिकदृष्ट्या कोणत्याही बाजूचा पुरुष असला तरी कुटुंबातील पुरुष प्रधानता त्याला हवीच असते. प्रत्येक कुटुंबात - प्रत्येक धर्मीय कुटुंबात - स्त्रियांवर घोषित - अघोषित बंधने असतात. ही बंधने सामोपचाराने पाळायची व्यवस्था म्हणजे कुटुंब व्यवस्था अशी या महान व्यवस्थेची अचूक व्याख्या करता येईल. त्यामुळे अशा बंधनांना सरावलेल्या स्त्रिया आणि चटावलेले पुरुष जगाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत वावरत असल्याने स्त्रियांवर सार्वजनिक ठिकाणी असलेल्या बंधानांवर कधीच निकाली चर्चा होत नाही. आता सुरु झालेल्या चर्चेचे भवितव्य या पेक्षा वेगळे असण्याची शक्यताच नाही. कारण ज्यांच्यावर पुरुषी व्यवस्थेने घरीदारी बंधने लादली आहेत त्यांचीच बंधने झुगारून देण्याची तयारी नाही . बंधना विषयी चीड असल्याशिवाय तशी तयारी होणे शक्यही नाही. कुटुंबव्यवस्था ही भांडवलशाही व्यवस्थेसारखी आहे. भांडवलशाही व्यवस्थेला आव्हान निर्माण झाले की ती स्वत:त बदल करून घेवून टिकून राहते. कुटुंबातदेखील कुटुंब तुटू नये इतपत स्त्रियांची घुसमट होणार नाही अशी काळजी घेतली जाते आणि या काळजीपोटी चौकट ओलांडण्याची जी सुविधा स्त्रीला मिळते त्याला आम्ही स्त्री स्वातंत्र्य संबोधतो. यातून बाह्य बदल दिसत असले तरी मानसिकता तीच राहते. त्याचमुळे अशा प्रकारच्या स्त्री स्वातंत्र्यातून स्त्रिया गगनाला गवसणी घालत असल्या तरी त्यांचा धार्मिक ठिकाणचा प्रवेश या ना त्या कारणाने निषिद्धच असतो. प्रत्येक धर्म सांगतो जग ही ईश्वराची निर्मिती आहे. चराचरात ईश्वर वसतो. स्त्री तर ईश्वराची सुंदर निर्मिती म्हणून तिच्यावर स्तुती सुमने वाहिली जातात. अशी स्तुतिसुमने वाहणारीच ईश्वराच्या दरबारात जाण्यापासून प्रतिबंध घालतात. स्त्रीच्या पोटी जन्म घेवून तिचाच यांना विटाळ होतो. हे सगळे तत्वज्ञान पुरुषप्रधान दांभिकतेला साजेसेच आहे. मात्र याकडे निव्वळ पुरुषप्रधान समाजाची दांभिकता म्हणून पाहण्याची चूक करता कामा नये. कारण पुरुषांच्या दांभिकतेवर प्रहार करताना पुरुष निर्मित ईश्वरीय व्यवस्था बदलण्याकडे दुर्लक्ष होण्याचा धोका आहे.

धर्मस्थळी सर्व जातीच्या स्त्री-पुरुषांना प्रवेश मिळावा यासाठी प्रयत्न आणि आंदोलन अनेकदा झाले आहेत. दलितांना मंदीर प्रवेशाचा अधिकार मिळावा यासाठी साने गुरुजींनी पंढरपुरात केलेले आंदोलन किंवा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली झालेले काळाराम मंदीर प्रवेशाचे आंदोलन प्रसिद्ध आहेच, महाराष्ट्रा बाहेर याच कारणासाठी झालेला  गुरुवायूर मंदिराच्या प्रवेशासाठीचा लढा गाजला होता. मात्र स्त्रियांच्या प्रार्थनास्थळीच्या प्रवेशासाठी स्वतंत्र लढे झाल्याचा इतिहास नाही. नव्याने धर्मस्थळी स्त्री प्रवेशाची सुरु झालेली चर्चा स्त्रिया आणि स्त्री संघटनाच्या अभिक्रमातून झाली हे वेगळेपण सध्याच्या चर्चेला आहे. सुफीसंत हाजी अली यांच्या मुंबईस्थित दर्ग्यात आतवर प्रवेश करण्यास तिथल्या व्यवस्थापन समितीने केलेल्या मज्जावास काही महिलांनी आणि महिला संघटनांनी मुंबई उच्चन्यायालयात आव्हान दिल्याने ही चर्चा सुरु झाली . त्यानंतर शनीशिंगणापूर येथे एका तरुणीने मज्जाव असलेल्या चौथऱ्यावर चढून शनी देवावर तेलाचा अभिषेक केल्याने चर्चेने खळबळजनक स्वरूप घेतले. त्यातच केरळातील शबरामला देवस्थानात येणाऱ्या स्त्रियांच्या मासिकपाळीच्या तपासणीसाठी यंत्र बसविण्याच्या व्यवस्थापनाच्या निर्णयाने आगीत तेल ओतण्याचे काम केले. अनेक स्त्रियांनी आणि स्त्री संघटनांनी देवस्थानच्या या निर्णयाबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त झाल्या आहेत. तिकडे संसदेत कुमारी शैलजा यांनी देखील द्वारका मंदिराच्या प्रवेशाच्या वेळी त्यांची जात विचारण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित करून लोकशाहीच्या सर्वोच्च व्यासपीठावर या मुद्द्याची चर्चा घडवून आणली. सध्याची चर्चा प्रथमच स्त्रियांनी आपल्या विरुद्धच्या होत असलेल्या भेदभावा विरुद्ध आवाज उठविण्यातून सुरु झाली हे वेगळेपण नक्कीच आहे. मागे प्रधानमंत्रीपदी असताना इंदिरा गांधी यांना त्यांनी पारशी व्यक्तीशी लग्न केल्याचे कारण सांगून ओडीशातील जगन्नाथ मंदिरात प्रवेश नाकारला होता. थायलंडच्या धर्माने बौद्ध असलेल्या महिला राष्ट्रप्रमुखास देखील मंदिर प्रवेश नाकारण्यात आला होता. जगन्नाथ मंदिरास तब्बल दोन कोटीची देणगी देणाऱ्या स्विस महिलेस ख्रिस्ती असल्याच्या कारणावरून मंदिर प्रवेश नाकारण्यात आला होता. त्या त्या वेळी यावर वादळी चर्चाही झडल्यात. पण या प्रसिद्ध महिलांना प्रवेश त्या महिला आहेत म्हणून नाकारण्यात आला नसून त्यांचा संबंध इतर धर्माशी असल्याने नाकारण्यात आला अशी सारवासारव केली गेल्याने महिला विरुद्धच्या भेदभावाचा प्रश्न धसाला लागला नाही.                                                                                  

सध्या मात्र उपस्थित प्रश्न हा विशुद्धरूपाने महिला म्हणून धर्मस्थळी करण्यात येत असलेल्या भेदभावा बद्दल आहे. आणि त्यावरच्या  प्रतिक्रिया बघितल्या तर रूढी परंपरेच्या नावावर स्त्रियांना दुय्यम समजून दुय्यम वागणुकीला न्याय्य ठरविण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे विद्रूप चित्र आहे. काहींनी धर्म परंपरेत आणि धर्म व्यवस्थापनात कोणी हस्तक्षेप करू नये अशी सोयीस्कर भूमिका घेत स्त्रियांना दुय्यमत्व हा ईश्वरी निर्णय असल्याची बतावणी करीत आहेत. दुसरा मतप्रवाह आधुनिकतेचा बुरखा पांघरून स्त्रियांना या लढाई पासून परावृत्त करून सनातन्यांची अप्रत्यक्ष पाठराखण करणाऱ्यांचा आहे. त्यांच्या मते मंदिर प्रवेशाची लढाई प्रतिकात्मक स्वरुपाची ठरते व त्यातून काहीच बदल होत नाहीत. उगीचच शक्तिपात करण्याचे टाळावे असे सांगणारा वर्ग वाचलेली शक्ती भेदभावा विरुद्ध कशी वापरावी याबद्दल काहीच सांगत नाही. तिसरा विचारप्रवाह स्त्रीवादी भूमिका असणाऱ्या स्त्री-पुरुषांचा आहे. मंदिरात प्रवेश नाकारणाऱ्या मंदिराकडे आम्हीच पाठ फिरवितो असे म्हणणारा हा वर्ग आहे. यात बंडखोरी प्रकट होत असली तरी ती मुठभरा पर्यंत मर्यादित राहण्याचा आणि त्यातून सनातनी प्रवृत्तींना रान मिळण्याचा धोका आहे.  पहिल्या मतप्रवाहाच्या सनातनी  मंडळीनी  घटनेतील २६ व्या कलमाची ढाल पुढे करून समता आणि न्यायावर आधारित राज्यघटनेलाच नाकारण्याचा प्रयत्न चालविला आहे. मुलभूत हक्क विषयक आणि कोणत्याही नागरिका विरुद्ध जात, धर्म , वंश आणि लिंगाच्या आधारावर भेदभाव करण्यास मनाई करणारे घटनेचे १४ वे आणि १५ वे  कलम याचे मात्र त्यांना स्मरण नाही. हाजी अली दर्ग्यातील महिलांच्या प्रवेशास करण्यात आलेल्या मनाईला आव्हान देण्यात आल्याने घटनेतील २६ व्या कलमानुसार धर्मपालनाच्या व धर्मव्यवस्थापनाच्या अधिकाराचा नव्याने अर्थ लावण्याची संधी उपलब्ध झाली आहे. स्त्रियांच्या अनुकूल निर्णय लागला तरी त्यामुळे स्त्रीयांविरुद्ध्चा भेदभाव संपेल या भ्रमात राहण्याचे कारण नाही. संपूर्ण राज्यघटना स्त्रियांच्या पाठीशी असताना भेदभाव संपलेला नाही , तो एखाद्या कलमाचा नव्याने अर्थ लावल्याने संपण्याचा प्रश्न नाही. कारण धर्माने स्त्रीवर लादलेले दुय्यमत्व हाच कुटुंबसंस्थेतील लादण्यात आलेल्या दुय्यमत्वाच्या आधार आहे. धर्माने हुशारीने लादलेल्या दुय्यमत्वाचा स्त्रीने भाबडेपणाने स्विकार करून मानसिक गुलामगिरी पत्करली आहे. स्त्रियांच्या याच मानसिक गुलामगीरीवर तर तिची कुटुंबसंस्थेतील गुलामगिरी सुरु आहे. धार्मिक गुलामगिरी आणि कुटुंबातील दुय्यम स्थान या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. दुसरे दोन्ही मतप्रवाह स्त्रियांच्या या धार्मिक गुलामगिरीला आव्हान देण्यापासून पळ काढणारे आहेत.                                                                                                            


देवींची पूजा करण्यासाठी पुरुषांना मज्जाव नाही , मात्र देवीच्या मंदीरात प्रवेश करायला स्त्रियांनाच मज्जाव असल्याची उदाहरणे आजही पाहायला मिळतात. वंश परंपरेने पुजारी पद प्राप्त होण्याची धार्मिक परंपरा असलेल्या ठिकाणी या परंपरेचे पालन करीत कर्नाटक सरकारने नेमलेल्या एका महिला पुजाऱ्यास त्या मंदिराच्या गर्भगृहातच प्रवेश करायला मनाई आहे ! याचा एकच अर्थ होतो. धार्मिक परंपरा महत्वाच्या नाहीत तर धर्मासाठी स्त्रीचे दुय्यमत्व महत्वाचे आहे. स्त्रियांना असे दुय्यम लेखणे ही काही विशिष्ट अशा एखाद्या धर्माचे वैशिष्ट्य किंवा मक्तेदारी नाही. सर्व धर्मातील समान धागा कोणता असेल तर तो आहे स्त्रियांना कमी किंवा दुय्यम लेखणे. प्रत्येक धर्माची धर्माभिमानी मंडळी सांगतील की आमच्या धर्मात स्त्रियांचे स्थान किती वरचे आहे. धर्माने त्यांची किती काळजी घेतली आहे. जी काही बंधने आहेत ती काळजीपोटीच आणि स्त्रियांच्या भल्यासाठीच ! धर्माची स्त्रियांबद्दलची ही काळजी आणि हा कळवळाच तिच्या गुलामीचे कारण बनला आहे. धर्मातील ही काळजी आणि कळवळा आणि कुटुंबातील स्त्री विषयक काळजी आणि कळवळा यात असे विलक्षण साम्य आहे आणि परिणामही सारखाच तो म्हणजे गुलामी. स्त्रीची ही गुलामी किंवा दुय्यमत्व धर्मपरत्वे कमी जास्त असू शकते. इस्लाम मध्ये अधिक प्रमाणात तर बौद्ध धर्मात कमी प्रमाणात असेल . पण ज्यात स्त्रियांना दुय्यमत्व नाही असा धर्म नाही . धर्मातील हेच दुय्यमत्व समाजव्यवस्थेत आणि कुटुंब व्यवस्थेत पाझरले आहे. धर्म वेगळा असेल पण स्त्रीला समानता आणि स्वातंत्र्य नाकारणारी समाजव्यवस्था व कुटुंब व्यवस्था कुठेही सारखीच आढळेल. स्त्री विषयक दृष्टीकोनात फरक असेल तर त्या फरकाचे प्रतिबिंब त्या धर्मियाच्या कुटुंबव्यवस्थेत प्रतिबिंबित झाले असते. फरक आहे तो कमी-जास्त असा तुलनात्मक. त्यामुळे या धर्मात अन्याय होतो म्हणून दुसऱ्या धर्मात प्रवेश करून समान बनण्याचा मार्ग स्त्रियांसाठी उपलब्धच नाही. धर्मातच त्यांच्या गुलामीचे मूळ असल्याने धर्म आणि धर्मव्यवस्थेला नकार देणे हाच गुलामीतून बाहेर येण्याचा मार्ग ठरतो. तुम्ही काय धर्मस्थळी प्रवेश नाकारता , आम्हीच येत नाही अशी अर्धवट बंडखोरी कुचकामाची आहे. जगातील देव आणि धर्माची व्यवस्था पुरुषांनी स्त्रीला गुलामीत ठेवण्यासाठी निर्माण केली आहे हे ओळखून जगाच्या पाठीवरील सर्व देवांना आणि धर्माना नाकारण्याचे पाऊलच स्त्रियांची गुलामगिरी संपवील.
-------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव ,पांढरकवडा, जि. यवतमाळ
मोबाईल - ९४२२१६८१५८
--------------------------------------------------------------------